मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ नभांगणातून आग ओकितो… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ नभांगणातून आग ओकितो… ☆ श्री सुनील देशपांडे 

वीस वर्षे झाली, परंतु अजूनही तो दिवस आठवतो.

स्कूटर वरून नाशिक गावातून एमआयडीसी मधील फॅक्टरी कडे चाललो होतो. असेच मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यातले दिवस. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि जाता जाता मातीचा खमंग सुगंध एकदम नाकात भरला. मन एकदम प्रसन्न झालं. प्रफुल्लित झालं. मला काही समजेचना. मी एका वेगळ्याच जगात गेल्यासारखा झालो.

आणि माझ्या डोक्यात काही शब्द घुमायला लागले…

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

बस तेवढीच ओळ. डोक्यामध्ये गुंजारव करायला लागली.

मी फॅक्टरी वर आलो माझ्या केबिन मध्ये बसून कागद आणि पेन हातात घेतले ती ओळ निघून काढली आणि विचार करत बसलो. पण काही सुचेचना! पुढचा एकही शब्द एकही ओळ सुचेना. असं कधी यापूर्वी झालं नव्हतं. एखादी ओळ सुचते आणि नंतर हळूहळू पुढील ओळी सुचत जातात. फार तर त्या लिहून काढल्यानंतर त्यात थोडे बदल करावेसे वाटतात. काही ओळी पुन्हा लिहाव्या लागतात. काही अधिक चांगल्या ओळी सुचतात. आणि कविता पूर्ण होते.

पण याबाबतीत काहीच होईना. मी अस्वस्थ झालो. मूड गेला. चहा मागवला. तरी सुद्धा काही सुचेना. पुन्हा बाहेर पडलो, टपरीवर जाऊन एक सिगरेट मारली. पण काहीच नाही… अस्वस्थ अस्वस्थ.

पुन्हा फॅक्टरी वर येऊन कामांमध्ये गुंतून घेतलं. तो विषय तिथेच थांबला.

अधून मधून कधीतरी ती ओळ आठवायची आणि असेच अस्वस्थतेत काही तास जायचे. पण पुढे काही सुचायचं नाही अशी तब्बल दोन वर्षे गेली!

त्यानंतरही अनेक कविता सुचल्या लिहिल्या. लेखनही केले. परंतु त्या होळीच्या पुढे काहीच सुचैना.

एक ओळ म्हणजेच कविता?

तसे आमच्या मित्राचे नरेश महाजनचे एक पुस्तक ‘लव्हाळी’ वाचनात आलेच होते. एक ओळीच्या कविता. त्याला त्याने लव्हाळी हे नाव दिले होते. पण त्यामध्ये एक ओळ अशी सुचते की तेवढ्यातच कविता होऊन जाते. एकदा कविता होऊन गेली की अस्वस्थता रहात नाही.

त्याच्या एका लव्हाळीचे उदाहरण देतो

तुझी वेणी, जीवघेणी!

बस्स! यापुढे काही असू शकत नाही.

या दोन-तीन शब्दातच पूर्णत्व आहे.

परंतु माझ्या त्या ओळींमुळे मी कायम अस्वस्थ असे. काहीच सुचत नाही आणि ती एक ओळीची कविता सुद्धा नव्हे. त्या एका ओळीत पूर्णत्व आहे असे वाटत नाही.

बघता बघता दोन वर्ष गेली. संध्याकाळी एका कवी संमेलनानंतर चहा पिताना आमचा एक कवी मित्र आणि डॉक्टर सुद्धा. डॉ सुधीर करमरकर त्याला ती ओळ ऐकवली. त्यालाही ती ओळ आवडली आणि त्यानंतरची अस्वस्थता ती सुद्धा त्याला सांगितली.

तेव्हा तो म्हणाला मला असे वाटते की तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोयस म्हणून तुला पुढे काही सुचत नाही. कधीही जेव्हा पुढचा मार्ग बंद होतो त्या वेळेला मागे वळून पाहायचे असते. मला असे वाटते की ही ओळ तुझ्या कवितेची शेवटची ओळ आहे आणि शेवटची ओळ असल्यामुळे पुढे काही सुचणे शक्यच नाही. त्या दृष्टीने विचार करून पहा नक्कीच सुचेल. माझ्या डोक्यात वीज चमकल्यासारखे झाले. अरे खरंच आपण या दृष्टिकोनातून विचारच केला नाही कधी. तोही दिवस मे महिन्यातलाच आणि तसाच काहीसा घरी जाता जाता एका ओळीच्या दोन ओळी झाल्या.

मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होउनी आली,

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

त्यानंतर घरी आलो मस्तपैकी चहा करून घेतला आणि टेबलवर बसलो.

आणि मग आठवत बसलो दिवसभराची उन्हाने झालेली काहिली, दुपारची मरगळ, जणू काही सगळं आयुष्य थांबून गेलंय आणि एवढ्यात, …. एकदम वारा आला, छोटासा ढग काही पाण्याचे शिंतोडे उडवून गेला आणि मग तो मातीचा सुगंध आ हा हा…. हे सर्व आठवलं आणि मग माझी लेखणी पाझरू लागली……

नभांगणातुन आग ओकितो ग्रीष्म आज बलशाली.

तगमग तगमग अवनीवरती लाही लाही झाली.

सचेतनाला अचेतनाची मरगळ येथे आली.

चराचरातून सृजनशीलता आज लोप पावली.

मृतवत सारी सृष्टी आणिक प्रसन्नता लोपली.

शुष्क वृक्ष अन् पान न हाले शुष्क जणू सावली.

भूगर्भातून जीवन शोषी दिनकर हा बलशाली.

भूपृष्ठाची तडतड होऊन तृषार्तता रणरणली.

जीवन धारा आज जशी की बाष्प रूप जाहली.

चराचराची जीवनतृष्णा कुंठित स्तंभित झाली.

मेघसावळा दिसे अचानक वरुणाची सावली.

तुषार काही उधळून नंतर लुप्त कुठे जाहली.

आगमनाची वर्षेच्या परि वार्ता सुखवून गेली,

निद्रित साऱ्या सजीवतेला हलवून उठवून गेली.

मृद्गंधाच्या लहरीवरती स्वार होऊनी आली,

प्रसन्नता अन् सृजनशीलता ठाई ठाई रुजली.

 बऱ्याच वेळेला अनेक जण विचारतात तुम्हाला कविता सुचते कशी? तर ती ही अशी…

कवितेचा जन्म, नाही सुखासीन।

सहू रात्रंदिन ।। शब्दवेणा ।।

 

© श्री सुनील देशपांडे

(पुणेरी नाशिककर)

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

देव आहे तरी का?

जगात सर्वत्र लोक खूप संभ्रमात आहेत. गोंधलेले आहेत की, इतकी सगळी क्रूरता समाजात उघडपणे वावरत असताना, देव गप्प का? देव आहे तरी का? आणि तो असला तर आंधळा-बहिरा-मुका आहे का?

हल्ली लोकांचे स्वच्छंदी वागणे, घसरती सामाजिक नैतिक मूल्ये, देशादेशामधील युद्धे, देशांतर्गत विविध गटांमध्ये वैर, गल्लोगल्ली घडत असलेले अपराध, अपहरण, घरफोड्या, लुटालूट इ. सर्व पाहून लोकांना आश्चर्य तर वाटतेच पण त्यापेक्षा शंकाच जास्त वाटते की, हे सर्व देव का घडू देतो? त्याला हे दिसते की नाही? तो काही करत का नाही? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का? तो आहे तरी का नाही?

अर्थात आपल्या सर्वांना हे माहित आहे की, देवाने काही ते सर्व दुष्कृत्य सुरू केलेले नाही. हे सर्व अनर्थ वारंवार घडतात कारण आपण देवाकडे दुर्लक्ष करतो. आज समाजात दुष्टता आहे, अन्याय आहे, कारण लोक स्वार्थी, लोभी, कामलोलुप, हावरे व अधाशी आहेत. आपली खरी समस्या ही आहे की, हल्ली मोठ्यामोठ्या शहरातील सामाजिक स्थिती गुन्हेगार निर्माण व नियंत्रित करीत आहेत.

हे गुंड बँका, लुटतात. पैसे घेऊन कोणाचाही खून करतात, जाळपोळ करतात, व बलात्कार करतात. हे काही एका दिवसात जादूने निर्माण झालेले नाही. ते तुमच्या आमच्या घरातच निर्माण झालेले आहेत. कदाचित आपल्या शाळा-कॉलेजमध्ये ते शिकले असतील. आपल्याच समाजात वावरत मोठे झाले. कदाचित त्यांच्या लहानपणापासून लहान-मोठ्या चुकांसाठी आपण त्याला क्षमा करीत आलो. शेजारच्या कंपौंडमधून पहिल्यांदा जेव्हा मुलांनी आंबा तोडून आणला तेव्हा, आपण म्हणालो, “जाऊ द्या! लहान आहेत! ” त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या अपराधाकडेही आपण दुर्लक्ष केले. कारण त्यांना आपण अजूनही शिक्षण-प्रशिक्षण देत आहोत, अशी आपली धारणा होती. हळूहळू वाढत्या वयाबरोबर त्यांच्याकडून सहज घडणाऱ्या अपराधांचे स्वरूपही अधिक गंभीर झाले. ट्रेनमधील उपकरणे तोडणे, सीट-कव्हर फाडणे, खरेदीच्या निमित्ताने दुकानातील वस्तू उचलणे, लायब्ररीच्या पुस्तकातील पाने फाडणे, कट्ट्यावर बसून मुलींची छेड काढणे, मारामारी करणे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या तारुण्यातील उत्साहाचे मात्र निरूपद्रवी प्रकटन आहे, असे आपल्याला वाटते. गंभीर गुन्हाची नोंद होऊन केस चालली तरी कोर्ट त्यांना वीस वर्षाची कठोर शिक्षा न करता, वय लहान असल्यामुळे फक्त दोन वर्षे तुरुंगात ठेवण्याचा दंड देत असे. त्यावेळी ही देव आंधळा-मुका-बहिरा होता का? देव होता तरी का?

आपल्या नैतिकतेचा कणा असा मोडला जात होता. ऋषी- संस्कृतीचा अनादर केला जात होता. राष्ट्रीय सन्मान धुळीला मिळत होता. आपल्या आध्यात्मिक वैभवाचा अपमान होत होता. आणि हे करणारे आपणच विचारत होतो, ” अरे! देवा आहे कोठे? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

मिसरूड फुटायला लागली व तरुण दाढी करायला लागला म्हणजे त्याला देशातील लक्षावधी लोकांचे भवितव्य ठरवण्याची योग्यता आपोआप प्राप्त होत नाही. सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात कार्य करण्याचे योग्य प्रशिक्षण तरुणांना मिळाले पाहिजे. त्यांच्यात असणारा उत्साह दांडगा आहे. महत्त्वाकांक्षा नक्की महान आहेत. पण फक्त तेवढ्यासाठी त्यांचा उदोउदो होणं आश्चर्यकारक वाटत. ज्येष्ठ लोकांमधील समृद्ध अनुभवाची उणीव ते कशी भरून काढतील?

अपरिपक्व व अनुभवहीन असे पुढारी समाजाचे नेतृत्व करू लागतात. आणि सर्व क्षेत्रात गोंधळ माजतो. व्यापार, अर्थव्यवस्था, उत्पादन, शिक्षण, धर्म संस्कृती… कोठेच काहीही नीट राहत नाही. महागाई उच्चांक गाठते, बेरोजगारी वाढते, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नेहमीचीच बाब होते. आपणच हे घडवून देतो आणि वर विचारतो, “अरे! देवा आहे का? असला तर तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

आपल्या देशातील तरुणांवर आपण अन्याय करीत आहोत. आईच्या कुशीतून घाईघाईने काढून त्याला पार्लमेंटमध्ये, डायरेक्टरच्या खुर्चीत आणि गल्लीबोळातील मंडळ राजकारणाच्या नेतृत्वाच्या आसनांवर बसवीत आहोत. आणि ते ज्या अनियंत्रित, बेफाम तरुणांच्या जमावाला उद्युक्त करून विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. त्यांच्यापेक्षा हे काही अधिक शहाणे नसतात. हे स्वतः बेताल, बेफाम आणि बेपर्वा असल्यामुळे परिणाम विनाशकारी असतात.

बंद, दंगली जाळपोळ इ. च्या माध्यमातून लोकांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण त्यातून काहीही सामाजिक उपलब्धी होत नाही. प्रगती होत नाही. गरिबी, उपासमार वाढते. इतकेच नव्हे राष्ट्रीय सुरक्षिततेलाही तडा जातो. आणि आपण विचारतो, “देव आहे का? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आपण हास्यस्पद मूर्खपणाच्या परिसीमेपर्यंत ताणले आहे. पाहिजे आहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, Freedom is not in doing what you like, but in liking everything you have to do. आवडेल ते करायला मिळणे नव्हे, तर जे करावे लागत आहे त्यात आवड निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्याला जे करावयाचे आहे ते तो करतो. जे बरळायचे आहे ते बरळतो. आपल्यासमोर काही आदर्शच नाहीत. आपल्यात काही शिस्तच नाही. देव नाहीच असं आपण वागतो आणि देव आहे का? असलाच तर तो काय आंधळा-बहिरा-मुका आहे का? असे विचारतो.

काहीही करून समाजाने आता भानावर आले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर शाळा-कॉलेजामधून मुलांना काय शिक्षण मिळत आहे, हे पालकांनी पाहिले पाहिजे. पाल्याच्या प्रत्येक कृतीसाठी पालकांनी स्वतःला जबाबदार समजले पाहिजे. समाजात अपराध्यांची एक नवीन जात निर्माण होऊ लागली आहे. जिच्यामुळे असंख्य लहान मुले भिकारी बनवत आहेत, अपराधी बनवत आहेत, अपंग बनवत आहेत, बळी जात आहेत.

हल्लीची मुले देवळात जायला तयार नाहीत. त्यांना धर्माबद्दल आपुलकी नाही. संस्कृती बद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही. अध्यात्मिक मूल्यांची चाड नाही, असे आपण रोजचेवर फार ऐकतो. आणि असाहाय्यपणे खांदे उडवून गप्प बसतो. ज्या संस्कृतीचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांकडून झाले पाहिजे. तिचीच लक्तरे ते पार्लमेंटमध्ये सर्रास उडवित आहेत. आणि आपण म्हणतो…

कोणत्याही समाजाची प्रगती शांती शक्ती समृद्धी आणि संपत्ती, तसेच आरोग्य, शिक्षण व कायदा- सुव्यवस्था हे सर्व समाजातील दक्षतेनेच शक्य आहे. जे तरुण निर्धारित नियमांचे उल्लंघन करतात व त्यामुळे सामाजिक विनाशाला आमंत्रित करतात, ते अत्यंत भयंकर अपराधी मानले गेले पाहिजेत. ते ‘खोडकर मुलं’ नव्हेत. सुधारणेच्या पलिकडील ‘अपराधी’ आहेत. त्यांचे लाड करता कामा नये. त्यांना क्षमा करून उपयोग नाही. त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विनाश ओढवणे आहे.

या, स्वयंशिस्त व आत्मसंयम असणाऱ्या लोकांचा एक नवा देश निर्माण करूया. जो शक्तीने तरूण आणि बुद्धीने ज्येष्ठ असेल. सर्वांनी परस्पर प्रेमाने एकत्र येऊन श्रम करूया. उत्पादने वाढवूया. न्यायाने प्रत्येकाला त्याच्या अधिकारानुसार समृद्धी आणि ऐश्वर्याचा वाटा देऊया.

नक्कीच, देवसुद्धा मग आंधळा-बहिरा-मुका राहणार नाही. तो आहे. तो आता येथे आहे. तो नेहमीचआपल्याबरोबर आहे.

०००००

लेखिका : सौ सुनंदा म जोशी

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.

आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू.

  • परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्या आधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
  • आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्या समोर एक अपघात होता होता राहिला.
  • सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
  • अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.

– – – वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.

बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला? आणि पाने का नासली? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.

आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.

आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.

आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदे ही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.

आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.

एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.

देश हमे देता है सबकुछ।

हम भी तो कुछ देना सिखे।।

भारत माता की जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आयुष्य क्षणभंगुर आहे…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “आयुष्य क्षणभंगुर आहे…”  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

विमान धावपट्टीवर सरकत होतं…

खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजच… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – “पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस. “

कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – “सगळं नीट होऊ दे. “

पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.

एक मोठा आवाज, आगीच्या ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.

पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…

त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.

“Call me when you land… “

“Miss you already… “

“Take care… “

कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello? ” म्हणणारा कोणी तरी.

कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…

आज जे गेले, त्यांच्या हसण्याचे प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत.

त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं…

 “आयुष्य क्षणभंगुर आहे…

त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून. “

एक नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –

ज्यांनी कालच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले… जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले.

मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत ‘मृत्यूशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.

सहेली शब्द प्रांगण ग्रुप तर्फे…

भावपूर्ण श्रद्धांजली..

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आंबोळीचं शेत…’ – शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आंबोळीचं शेत…‘ – शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

वैशाख महिन्याचे दिवस. भर दुपारची वेळ. रणरणतं उन्ह. कोल्हापूर शहराच्या बाजूलाच एका शिवारांतून एक बाई लगबगीने चालली होती. डोक्यावर टोपली. टोपलीत नव-यासाठीं जेवण आणि पाण्याने भरलेला तांब्या होता. चालता, चालता, मध्येंच गच्च झाडी असलेली पायवाट लागली. वाट नेहमीचीच. पण कां कोणास ठाऊक. पण या ठिकाणी येताच तिला नेहमीच भिती वाटायची. अचानक कोणी समोर आला तर? कांहीं अतिप्रसंग केला तर? ओरडलो तरी मदतीला कोणी पोचणार नाही अशी ती जागा.

आजही तोच विचार तिच्या मनात आला. पण नेहमीप्रमाणे तिने तो झटकून टाकला. पावलं लगबगीने पडायला लागली. एवढ्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. बाई मनातून बरीच घाबरली. टापांचा आवाज जवळ ऐकायला यायला लागला. बाई आणखीनच घाबरली. एवढ्यात तो रुबाबदार घोडेस्वार तिच्या समोर उभा ठाकला.

बाईंची भितीने गाळणच उडाली. दरदरून घाम फुटला. तशी बाई धीटच होती. घोडेस्वाराने विचारले, “काय ग, कूठें चाललीस? ” “धन्याला जेवण घेऊन चाललीया, ” बाईने उत्तर दिले. “कोठे आहे धनी तुझा? ” घोडेस्वाराने परत प्रश्र्न विचारला. “पलीकडच्या शेतामध्ये काम करतुया. “बाई उत्तरली. “असं का. कोणाचं शेत? तुमचं की दुस-याच्या शेतात? ” बाई आतापर्यंत बरीच सावरली होती. म्हणाली, “आर माझ्या भावा, आमी गरीब मानसं. आमचं कूठून आलंय शेत. ” बाई मोठी हिकमती होती. भावा असं म्हणून तिने स्वत:च्या रक्षणाचे एक हत्यार बाहेर काढले होते. “बरं, आज जेवणांला काय आहे? ” घोडेस्वाराने विचारले. बाईंची भीड आता बरीच चेपली होती. ती म्हणाली, “अहो, आमी गरीब मानसं. आमचं ते जेवन काय असणार. आंबोळ्या आनी चटनीचा गोळा. ” ” मला खायला देशील का? ” घोडेस्वाराने विचारले. “आर, माझ्या भावा, खावा की. ” बाई म्हणाली.

बाईने जेवणाची टोपली खाली ठेवली. घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला आणि खाली जमिनीवर मांड ठोकून बसला. बाईने टोपलीतल्या आंबोळ्या, त्यावर लसणीचा लाल लाल गोळा आणि पाण्यानं भरलेला तांब्या घोडेस्वाराच्या समोर ठेवला. घोडेस्वाराने खायला सुरुवात केली. खातां, खातां घोडेस्वाराने तिला विचारले, “अग, तूं या आंबोळ्याना कशी काय भोकं पाडतीस? सुईने की काय? ” त्याबरोबर बाई मोठमोठ्याने हसली व म्हणाली, “आर माज्या भावा, यडा की खुळा र तू? ” आतापर्यंत तीची भिती पळून गेली होती.

बाईने घोडेस्वाराला आंबोळ्या कश्या करतात ते सविस्तरपणे सांगितले. आदल्या दिवशी तांदूळ कसे फुगत घालावे लागतात, मग दुसऱ्या दिवशी ते पाट्यावर कसे वाटतात, मग तापलेल्या तव्यावर कसे भाजतात, तापलेल्या तव्यावर पाणी वाळल्यानंतर तिथं भोकं तयार होतात. “आसं होय. ” असं म्हणून तो घोडेस्वार खळाळून हसला. बाईपण खळाळून हसली. घोडेस्वाराने चटणी बरोबर आंबोळ्या खाल्ल्या. त्यावर पाणी प्याला व त्या बाईला विचारले, “अग, आता तुझ्या नव-याला जेवण? ” ” त्याची काळजी तुम्हाला नग. आता मी घरला जाईन. परत आंबोळ्या आनी चटनी करून नव-याला नेईन. ” बाई म्हणाली. घोडेस्वार घोड्यावर स्वार झाला आणि निघून गेला.

बाई परत घरी आली. परत आंबोळ्या केल्या. लाल तिखट चटणी केली. पाण्याचा तांब्या भरला. सगळं पाटलींत ठेवले आणि परत नव-याकडे यायला निघाली. इकडे नवरा ठरल्या वेळेत बायको आली नाही याची काळजी करत होता. एवढ्यात त्याला दूरवरून येणारी बायको दिसली आणि जीवाला बरं वाटलं.

बाई आली आणि तिने टोपली खाली ठेवली. नव-याने विचारले, ” अग, एव्हढा उशीर कां झाला? “

मग बायकोने सगळं सविस्तर सांगितले. त्या आडवळणाच्या जागीं तो रुबाबदार घोडेस्वार कसा आला, त्याला भावा कसं म्हटलं, आंबोळ्या खाताना छिद्रांची हकिकत सांगितली आणि आपण त्याला यडा की खुळा म्हणून छिद्रे कशी होतात ते सांगितले. यावर दोघेही नवरा- बायको भरभरून हसली. नव-याने जेवण केले आणि तांब्यातले पाणी घटा-घटा प्यायला. दोघांनी संध्याकाळपर्यंत शेतात काम केले व सूर्य अस्ताला जाण्याच्यावेळीं घरी परतली.

दोघं नवरा-बायको घराकडे पोंचली. पहातो तो काय? दोन सैनिक घराकडे उभे होते. नवरा-बायको दोघेही घाबरली, एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहीली. दोघांपैकी एक सैनिक म्हणाला, ” उद्यां सकाळी दहा वाजता तुम्हां दोघानाबी कोल्हापूरच्या दरबारात हजर व्हायला हवं. ” निरोप देऊन दोघेही सैनिक परतले.

इकडे दोघं नवरा-बायको भयभीत होऊन एकमेकांवर काही तरी वंगाळ काम केल्याचा संशय घ्यायला लागली. मन था-यावर नव्हतं. रात्रीच्या जेवणाकडे दोघांचं लक्ष नव्हतं. कसेतरी दोन घास घशाखाली घातले आणि दोघंजण अंथरुणावर पडलीं पण झोप लागत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळत रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा लवकरच पहाटे दोघं जणं उठलीं. नव-याने गाईचं दूध काढणे, गुरांना रानांत सोडणे, दुधाचा रतीब टाकणं, ही कामं केली. बायकोने शेण भरून गोठा साफ करणे, घरांतील इतर सगळीं काम आटोपली. दोघं नवरा-बायको कोल्हापूरच्या दरबारात जायला निघाली. मनात धाकधूक होतीच. काय चूक झाली असेल आपणाकडून. कशाला बोलावले असेल दरबारात. हेच प्रश्र्न दोघांच्याही मनात येत होते.

अर्धा- पाऊण तास पायपीट केल्यावर दोघेही कोल्हापूरला राजवाड्यात पोंचली. त्यांना दरबारात नेण्यांत आले. दरबारात प्रचंड गर्दी होती. लोक अनेक तक्रारी घेऊन शाहू महाराजांकडे आले होते. जसजशी गर्दी कमी होत होती, तसतशी नवरा-बायको घाबरलेल्या अवस्थेत पूढे पूढे जात होती. गर्दी बरीचकमी झाली. संपूर्ण दरबार आता दिसत होता. एवढ्यात शेतकऱ्याच्या बायकोचे लक्ष सिंहासनाकडे गेले आणि आश्चर्याने ती नव-याला म्हणाली, ” अहो, ह्योच तो कालचा रुबाबदार घोडेस्वार. ” नवरा म्हणाला, ” अग, ह्यो तर आमचे शाहू महाराज. ” बायको आता आणखीनच घाबरली व म्हणाली, ” आरं म्हाज्या देवा, म्हणजे कालचा तो घोडेस्वार म्हणजे साक्षात शाहू महाराज व्हते. महाराजांना मी काय काय म्हटलं? भावा म्हटलं, यडा की खुळा म्हटलं. ” बाई आता भितीने थरथर कापायला लागली. नवरा म्हणाला, “म्हाराज काय शिक्षा देतात ती मुकाट्याने भोगायची आता. “

थोड्या वेळात ही नवरा-बायको थरथर कापत शाहू महाराजांच्या पायांवर घालून घेणार एवढ्यात शाहू महाराजांनी आपला हात पुढे केला आणि म्हणाले, “दिवाणजी, या माझ्या बहिणीची साडी-चोळीने ओटी भरण्याची व्यवस्था करा, आणि या माझ्या बहिणीच्या नव-याला त्या शिवारात सहा एकर जमीन वतन द्या. “

दोघांही नवरा-बायकोच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वहात होत्या. दोघंही आदरयुक्त भावनेने शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक झालीं. भितीची जागा आता आदराने घेतली होती. शेतकऱ्याच्या बायकोची साडी-चोळीने ओटी भरण्यात आली आणि तिच्या नवऱ्याला सहा एकर वतनाचा कागद देण्यात आला.

भरलेल्या अंत: करणाने आणि सद्गतीत मनाने दोघेही नवरा-बायको घरी परतली. वतन दिलेल्या त्या शेताला आजही “आंबोळीचं शेत” ह्याच नावाने ओळखतात.

शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘गंभीर मनोवृत्तीने विचार करता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘गंभीर मनोवृत्तीने विचार करता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असलेल्या शाळेत आयोजित केलेल्या एका समारंभात, एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक भावनिक भाषण दिलं — जे ऐकणाऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.

शाळेचं व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्या वडिलांनी विचार मांडला :

“जेव्हा निसर्गाच्या प्रवाहात बाहेरून कोणतीही ढवळाढवळ होत नाही, तेव्हा निसर्गाची व्यवस्था पूर्णत्वाकडे झुकते.

पण माझा मुलगा, हर्बर्ट, इतर मुलांप्रमाणे शिकू शकत नाही. त्याला गोष्टी समजत नाहीत. मग त्याच्या बाबतीत निसर्गाची व्यवस्था कुठे आहे? “

प्रश्न ऐकून सगळं सभागृह सुन्न झालं. वडील पुढे बोलू लागले:

“माझा विश्वास आहे की, हर्बर्टसारखं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम मूल जेव्हा या जगात येतं, तेव्हा आपल्याला मानवतेचं खरं रूप पाहण्याची संधी मिळते — कारण अशा मुलाला इतर लोक कसे वागवतात, त्यातून ती मानवता प्रकट होते. “

त्यांनी एक प्रसंग सांगितला.

एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, काही मुलं बेसबॉल खेळत होती.

हर्बर्टने वडिलांना विचारलं :

“बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का? “

वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखा मुलगा आपल्या संघात नको असतो. पण त्यांना हेही जाणवले की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.

वडील मुलांपैकी एकाकडे गेले आणि विचारलं,

“हर्बर्टला थोडं खेळता येईल का? “

त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला, “आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात घ्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू. “

हर्बर्ट हळूहळू स्मितहास्य करत बेंचकडे गेला, संघाचा जर्सी चढवला. त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

हर्बर्टच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब बाकीच्या मुलांनीही पाहिलं — आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातला अभिमानसुद्धा.

नवव्या इनिंगची सुरुवात झाली. हर्बर्टने हातमोजा घालून उजव्या फील्डमध्ये उभं राहत खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे कुठलाही बॉल आला नाही, तरी तो फक्त खेळात असल्यानेच इतका आनंदी होता की चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं, आणि वडील प्रेक्षकांतून जल्लोष करत होते.

नवव्या इनिंगमध्ये संघाने काही धावा केल्या. आता, दोन बॅट्समन बाद, तिन्ही बेस भरलेले — आणि हर्बर्ट फलंदाजीसाठी तयार होता.

हा निर्णय — हर्बर्टला फलंदाजीची संधी देणं — जिंकायची संधी गमावणं होतं. तरीही त्याला ती संधी दिली गेली.

सर्वांना माहीत होतं की, हर्बर्टला बॅट नीट पकडता येत नाही, तर बॉल मारणं तर दूरची गोष्ट होती.

पण बॉलरला लक्षात आलं — समोरचा संघ हर्बर्टला आनंद देण्यासाठी जिंकण्याची संधी सोडत आहे.

त्याने बॉल अगदी हळू फेकला — जसा हर्बर्टला मारता येईल असा.

पहिल्या प्रयत्नात हर्बर्टने मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकला.

दुसऱ्यांदा, त्याने बॉल मारला — अगदी सौम्यपणे — आणि बॉल पिचरच्या पुढ्यात थांबला.

पिचर सहज बॉल पकडून पहिल्या बेसवर फेकून हर्बर्टला आऊट करू शकत होता. पण त्याने बॉल मुद्दामहून पहिल्या बेसमनच्या डोक्यावरून उंच फेकून दिला.

सर्व प्रेक्षक ओरडू लागले:

“हर्बर्ट, पहिल्या बेसकडे धाव घे, धाव घे! “

हर्बर्ट धावत गेला — ते अंतर त्याने कधीच गाठलं नव्हतं.

“दुसऱ्या बेसकडे धाव घे! “

परत एका खेळाडूने — तो सर्वात लहान मुलगा होता— बॉल पकडला आणि जाणलं की तो ‘हिरो’ बनू शकतो. पण त्यालाही जाणवलं की हर्बर्टसाठी मोठं काहीतरी घडतंय. त्याने बॉल तिसऱ्या बेसमनच्या डोक्यावरून फेकला.

हर्बर्ट तिसऱ्या बेसवर पोहोचला. पुढचे धावपटू होमप्लेटवर पोहोचले.

सर्व मुलं आणि प्रेक्षक ओरडत होते,

“होमप्लेटकडे धाव घे! “

हर्बर्ट धावत जाऊन होमप्लेटवर पोहोचला — हात वर करून उभा राहिला — विजयी हसत. त्याचे वडील त्याचं कौतुक करत उभे होते.

आणि तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला मिठी मारली — जणू त्यानेच ‘ग्रँड स्लॅम’ मारून सामना जिंकवला!

वडील डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाले—

“त्या दिवशी या मुलांनी मिळून खऱ्या प्रेमाचं आणि मानवतेचं एक अद्वितीय उदाहरण जगापुढे ठेवलं. “

हर्बर्ट पुढचा उन्हाळा पाहू शकला नाही. त्या हिवाळ्यातच तो गेला. पण त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट कायम राहिली — तो एकदा ‘हिरो’ झाला होता.

आईने त्याला आनंदाश्रूंत मिठी मारली होती — आणि त्याच्या वडिलांचा हसतमुख चेहरा हे त्याला आयुष्यभर पुरेसं होतं.

एक छोटंसं शेवटचं सांगणं:

आपण दररोज शेकडो विनोदी मेसेज एकमेकांना पाठवतो. पण जेव्हा आयुष्याचं खरं सौंदर्य सांगणारे, प्रेम आणि माणुसकी शिकवणारे संदेश येतात — ते पुढे पाठवताना आपण थोडं थबकतो.

तुम्ही जर हा मेसेज कोणाला पाठवायचा का, याचा विचार करत असाल — तर ज्या व्यक्तीने तुम्हाला तो पाठवला, त्याला विश्वास आहे की आपल्यामध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून तुमच्या संपर्कात असलेली प्रत्येक व्यक्ती हे ऐकण्याच्या योग्यतेची आहे.

कोणीतरी एक शहाणा माणूस म्हणाला होता:

“प्रत्येक समाजाची खरी कसोटी ही तिथल्या सर्वांत दुर्बल घटकांशी तो कसा वागतो यावरून होते. “

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दिसलीस तू फुलले ऋतू.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दिसलीस तू फुलले ऋतू…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

भावना त्यालाच कळतात ज्याला त्याची जाणीव असते.

तारुण्याच्या त्या टप्प्यावर तुझं माझ्या आयुष्यात येणं.. हा खरोखरच नियतीचा योगायोग होता… पहिल्या नजर भेटीतच कलिजा खलास झाला होता… कळले नाही कधी मी नजरकैदेत बंदिस्त कसा झालो… हरवले भान स्व:ताचे…. जगणेच विसरून गेलो… बस्स तोच एक क्षण आला नसता आयुष्यात तेव्हा! .. असे त्या भेटीनंतर कैकदा वाटून गेले… मिळणार नाही साथ तिची हेही तेव्हाच कळून चुकले.. सौंदर्यवतीचे चाहते लाखो असले, तरी भाग्यवान तो एकच असतो… पण पण जुनी ओळख ती कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून राहीली होती तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा कधीच न उचंबळून न येणारी… ताटातूट ठरलेली घडलीच काही क्षणातच… अन दोन वळून वळून बघणारे चेहरे काही अनामिक भावनांचे कंगोरे घेऊन समोरून निघून गेले.. दोन ओंडक्यांची पुन्हा कधीच घडणार नसते गाठभेट हे ही तितकेच सत्य असते… अबोल नि असफल प्रीतीच्या वेलीचे सलणारे काटे… मनाला घायाळ करतात.. समजूत घालता घालता मनं थकून जातं.. काळाचं औषध विरहाचं दु:ख विसरायला लावतो… आणि दुसऱ्या प्रेमाच्या तडजोडीने मनाची तगमग दूर करायची मदत घेतो… आता सारं काही आलबेल नि आनंदाच्या लहरीवर जीवनाचे तरंग तुषार उधळण करत जात असतं… आणि आणि एक दिवस नियतीला पुन्हा खोडसाळपणा करण्याची हुक्की येते…

ध्यानीमनी नसताना एक दिवस सकाळी मार्निंग वाॅकला बागेत असताना तिचे माझ्या सामोरी येणे… अगदी तसेच पहिल्या त्या भेटीसारखे… नजरेला नजर मिळताना… ओळख आहे का? असा निशब्द प्रश्न त्यातून विचारला जाताना.. डोळेच ते एकमेकांना भिडल्या भिडल्या अनेक गोष्टी नजरेने नजरेला नजर करूनही गेले… शब्दांची वाट न पाहता… काही क्षणातच आम्ही दोघं एकमेकांच्या समोरूनच गेलो… आणि गुंतलेले हट्टी मन ओढून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना मात्र मनाची चलबिचल वाढवत गेले… ती जुनी ओळख कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून बसलेली, तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा एकदा उचंबळून येते… तेही क्षणैक ठरते… आता देहाचं तारूण्य ओसरून कधीच गेलेलं असतं, वार्धक्याची रूपेरी देहावर पसरलेली असते… तरीही अजूनही मनात कोवळे तृणांकूर उमलू पाहतात… आम्ही एकमेकांना पाहिलेलं असतं तेव्हा… भावभावनांची खळबळ उरात उठते.. अजूनही आपण तुला विसरलेलो नाही हेच नजरेतून सांगणे असते… काही गोष्टींमुळे आपण एकत्र जरी आलो नाही, आणि कितीही दूर दूर अंतरावर आपण असलो तरीही मनातल्या प्रेमरज्जूने आपण एकमेकांशी कायमचे बांधले गेलो आहोत… हे ही नसे थोडके… होय ना! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

वट पौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे.

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राज्याची कन्या सावित्री हिचा शाल्व राजा धृमत्सेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याच्या शी विवाह झाला. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसा होते तेव्हा सावित्रीने उपवास करून व्रत केले. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात.

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

पूर्वी बायकांना घराबाहेर जायची परवानगी न्हवती. सणावारांच्या मुळे त्यांना घराबाहेर जाऊन पूजाअर्चा करून चांगले वस्त्र परिधान करून सख्यांना भेटायची संधी मिळावी हा हेतू साधून हे व्रत केले जायचे.

तीस वर्षा पूर्वी मला माझ्या मैत्रिणी बरोबर हे व्रत करायला जायची संधी मिळाली. गणपतीच्या मंदिरात वटवृक्ष असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजे साठी बायकांची तिथे खूप गर्दी झाली होती.

मंदिराबाहेर पाच फळे व फुले विकायला विक्रेते बसले होते. खरे तर ती फळे खूप कोवळी होती व खाण्या लायक ही न्हवती तरीही ती सुवासिनींची ओटी भरण्यासाठी विकत घेतली जात होती.

पूजेसाठी रांगा लावून सगळ्या बायका थांबल्या होत्या. मधल्या वेळात काही बायका आपल्या नवऱ्या व सासूबद्दल कुरबुरी व तक्रारी सांगत होत्या. सासरी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सांगत होत्या. तिथे आलेल्या काहीजणी आपल्या संसारात तितक्याशा सुखी न्हवत्या व एक रीती रिवाज म्हणून व्रत करत होत्या. भरजरी साड्या, दागिने व गर्दी ह्या मुळे कधी एकदा पूजा संपते असेच बहुतेक जणींना झाले होते. नंतर नंतर गर्दी एवढी वाढली की वडा भोवती प्रदक्षिणा घालतांना एकमेकींचे धागे वडा भोवती गुंडाळून कशीबशी पूजा पूर्ण केली गेली. त्यात काही जणी मनापासून तर काही एक रीत म्हणून किंवा लोकांना काय वाटेल पूजा केली नाहीतर म्हणून तिथे पुजेसाठी आल्या होत्या.

खरतर नवऱ्या बायकोच्या नात्यात संवाद, विश्वास, आणि समजूतदारपणा महत्त्वाचे आहे. नवरा बायकोचे नाते हे प्रेमाने, आपुलकीने, आणि एकमेकांचा आदर करून टिकून राहावे व अडीअडचणीच्या वेळी त्यांनी एकमेकांना साथ द्यावी हे महत्वाचे आहे. नवऱ्यासाठी व्रत करणे उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

नंतरनंतर ह्या पूजेला बदलते स्वरूप आले. बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळू लागल्या व सुवासिनी ह्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करू लागल्या. काहीकाही जणी घरात फांदी विकत आणून दहा पंधरा जणी एकत्र जमून पुजा करून फराळ करू लागल्या. काही बायका आपल्या सोयीप्रमाणे कामाच्या ठिकाणी वडाचे झाड शोधून हे व्रत पुर्ण करू लागल्या.

काही घरात ज्यांची मुलगी परदेशात आहे ते आभासी पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल करून पूजा करून हे व्रत करायच्या.

आता तर ह्या पूजेला एक इव्हेंट म्हणून पाहायला लागले आहेत. सोसायटी मध्ये सुवासिनी एकत्र जमून ही पूजा करतात. सेल्फी, फोटोचा कार्यक्रम व कुठे तरी बाहेर हॉटेल मधे उपवासाचे खाणे हे सगळे आठवड्या पूर्वीच नियोजन करून हे व्रत केले जाते.

ह्या कार्यक्रमात ड्रेस कोड, एका प्रकाराच्या साड्या परिधान करणे एकत्र जमुन गुजगोष्टी करणे हे हि तितकेच महत्वाचे असते.

एकूण काय पूर्वीचे व्रत असो किंवा आत्ताचे सेलिब्रेशन असो ह्यात सुवासिनींनी एकत्र येणे आपले सुखदुःख एक मेकांना सांगणे, आपले मन मोकळे करणे एकमेकींना कठिण प्रसंगी आधार देणे, वेळ प्रसंगी एकमेकींना मदत करणे एवढे साध्य झाले तरी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर  ☆

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

(हा लेख दै. प्रहारमध्ये छापून आलेला आहे. कॉपीराईट कायदा लागू. आवडल्यास लेखकाच्या नावासहच शेयर करावा.)

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com 

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ चिंतन… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….

वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात म्हणजे वाचूया

साधारणपणे जानेवारी महिन्याच दिवस असावे. सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन. शाळेला हुरडयाची सुट्टी होती. त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळं पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो.. शेतात चालावं असं वाटत होतं. चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला, पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता. आणि मला ते स्पष्टपणे आठवते!

मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. माझं वय तेव्हा 10 ते 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये, मार्केटमध्ये, भजनाला, कीर्तनाला, रथ बघायला, चित्रपट बघायला घेऊन जायची. तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची. तिला चौफेर ज्ञान होतं.

19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल. शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती. गोष्टी सांगायचा तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती. आता आजीबद्दल जास्त सांगत नाही, प्रसंगाबद्दल आपण बोलूयात. तर ती मला सिद्धेश्वरच्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं. आजी बरोबर जायचं त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानं इथपर्यंत लागलेली होती, तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे, तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती. आजी म्हणाली ‘ रस पिऊ यात का’ ‘ बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये ‘ इती मी..

तिथेच बाजूला एक स्टॉल होता. एक पांढरं कापड.. त्या समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता ‘ अपने खुद को टीव्ही पे देखो.. अपने को टीव्ही पे देखो ‘.. तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं. काहीतरी नवीन होतं तर आजी म्हणाली ‘काय आहे? ‘ तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल. म्हणून ‘आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का? ‘ ‘तुम्हाला नाही, अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा ‘. ‘ पैसा कितना लगेगा? ‘ तो म्हणाला ‘ चाराने.. कितना टाइम देखेगा ‘ तो. ‘ मला दोन मिनिट ‘.. आजी मला म्हणाली ” तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा, मशीन समोर उभे रहा, मी तुला टीव्हीवर पाहीन “. मी म्हणलं ” काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे? ” तिचं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली ” हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते ” या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी तो पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्हीसारखं खोकं होतं तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला. मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले. मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं.. टीव्हीवर बघितलं. तर सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे.. तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो आहोत की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली.

नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेलवरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती. एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्यार्थिनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं… पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं.. ” अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील, कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले.

आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती. आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली. परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares