सुश्री प्रभा हर्षे
🌸 विविधा 🌸
☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
देव आहे तरी का?
जगात सर्वत्र लोक खूप संभ्रमात आहेत. गोंधलेले आहेत की, इतकी सगळी क्रूरता समाजात उघडपणे वावरत असताना, देव गप्प का? देव आहे तरी का? आणि तो असला तर आंधळा-बहिरा-मुका आहे का?
हल्ली लोकांचे स्वच्छंदी वागणे, घसरती सामाजिक नैतिक मूल्ये, देशादेशामधील युद्धे, देशांतर्गत विविध गटांमध्ये वैर, गल्लोगल्ली घडत असलेले अपराध, अपहरण, घरफोड्या, लुटालूट इ. सर्व पाहून लोकांना आश्चर्य तर वाटतेच पण त्यापेक्षा शंकाच जास्त वाटते की, हे सर्व देव का घडू देतो? त्याला हे दिसते की नाही? तो काही करत का नाही? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का? तो आहे तरी का नाही?
अर्थात आपल्या सर्वांना हे माहित आहे की, देवाने काही ते सर्व दुष्कृत्य सुरू केलेले नाही. हे सर्व अनर्थ वारंवार घडतात कारण आपण देवाकडे दुर्लक्ष करतो. आज समाजात दुष्टता आहे, अन्याय आहे, कारण लोक स्वार्थी, लोभी, कामलोलुप, हावरे व अधाशी आहेत. आपली खरी समस्या ही आहे की, हल्ली मोठ्यामोठ्या शहरातील सामाजिक स्थिती गुन्हेगार निर्माण व नियंत्रित करीत आहेत.
हे गुंड बँका, लुटतात. पैसे घेऊन कोणाचाही खून करतात, जाळपोळ करतात, व बलात्कार करतात. हे काही एका दिवसात जादूने निर्माण झालेले नाही. ते तुमच्या आमच्या घरातच निर्माण झालेले आहेत. कदाचित आपल्या शाळा-कॉलेजमध्ये ते शिकले असतील. आपल्याच समाजात वावरत मोठे झाले. कदाचित त्यांच्या लहानपणापासून लहान-मोठ्या चुकांसाठी आपण त्याला क्षमा करीत आलो. शेजारच्या कंपौंडमधून पहिल्यांदा जेव्हा मुलांनी आंबा तोडून आणला तेव्हा, आपण म्हणालो, “जाऊ द्या! लहान आहेत! ” त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या अपराधाकडेही आपण दुर्लक्ष केले. कारण त्यांना आपण अजूनही शिक्षण-प्रशिक्षण देत आहोत, अशी आपली धारणा होती. हळूहळू वाढत्या वयाबरोबर त्यांच्याकडून सहज घडणाऱ्या अपराधांचे स्वरूपही अधिक गंभीर झाले. ट्रेनमधील उपकरणे तोडणे, सीट-कव्हर फाडणे, खरेदीच्या निमित्ताने दुकानातील वस्तू उचलणे, लायब्ररीच्या पुस्तकातील पाने फाडणे, कट्ट्यावर बसून मुलींची छेड काढणे, मारामारी करणे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या तारुण्यातील उत्साहाचे मात्र निरूपद्रवी प्रकटन आहे, असे आपल्याला वाटते. गंभीर गुन्हाची नोंद होऊन केस चालली तरी कोर्ट त्यांना वीस वर्षाची कठोर शिक्षा न करता, वय लहान असल्यामुळे फक्त दोन वर्षे तुरुंगात ठेवण्याचा दंड देत असे. त्यावेळी ही देव आंधळा-मुका-बहिरा होता का? देव होता तरी का?
आपल्या नैतिकतेचा कणा असा मोडला जात होता. ऋषी- संस्कृतीचा अनादर केला जात होता. राष्ट्रीय सन्मान धुळीला मिळत होता. आपल्या आध्यात्मिक वैभवाचा अपमान होत होता. आणि हे करणारे आपणच विचारत होतो, ” अरे! देवा आहे कोठे? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?
मिसरूड फुटायला लागली व तरुण दाढी करायला लागला म्हणजे त्याला देशातील लक्षावधी लोकांचे भवितव्य ठरवण्याची योग्यता आपोआप प्राप्त होत नाही. सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात कार्य करण्याचे योग्य प्रशिक्षण तरुणांना मिळाले पाहिजे. त्यांच्यात असणारा उत्साह दांडगा आहे. महत्त्वाकांक्षा नक्की महान आहेत. पण फक्त तेवढ्यासाठी त्यांचा उदोउदो होणं आश्चर्यकारक वाटत. ज्येष्ठ लोकांमधील समृद्ध अनुभवाची उणीव ते कशी भरून काढतील?
अपरिपक्व व अनुभवहीन असे पुढारी समाजाचे नेतृत्व करू लागतात. आणि सर्व क्षेत्रात गोंधळ माजतो. व्यापार, अर्थव्यवस्था, उत्पादन, शिक्षण, धर्म संस्कृती… कोठेच काहीही नीट राहत नाही. महागाई उच्चांक गाठते, बेरोजगारी वाढते, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नेहमीचीच बाब होते. आपणच हे घडवून देतो आणि वर विचारतो, “अरे! देवा आहे का? असला तर तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?
आपल्या देशातील तरुणांवर आपण अन्याय करीत आहोत. आईच्या कुशीतून घाईघाईने काढून त्याला पार्लमेंटमध्ये, डायरेक्टरच्या खुर्चीत आणि गल्लीबोळातील मंडळ राजकारणाच्या नेतृत्वाच्या आसनांवर बसवीत आहोत. आणि ते ज्या अनियंत्रित, बेफाम तरुणांच्या जमावाला उद्युक्त करून विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. त्यांच्यापेक्षा हे काही अधिक शहाणे नसतात. हे स्वतः बेताल, बेफाम आणि बेपर्वा असल्यामुळे परिणाम विनाशकारी असतात.
बंद, दंगली जाळपोळ इ. च्या माध्यमातून लोकांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण त्यातून काहीही सामाजिक उपलब्धी होत नाही. प्रगती होत नाही. गरिबी, उपासमार वाढते. इतकेच नव्हे राष्ट्रीय सुरक्षिततेलाही तडा जातो. आणि आपण विचारतो, “देव आहे का? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?
स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आपण हास्यस्पद मूर्खपणाच्या परिसीमेपर्यंत ताणले आहे. पाहिजे आहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, Freedom is not in doing what you like, but in liking everything you have to do. आवडेल ते करायला मिळणे नव्हे, तर जे करावे लागत आहे त्यात आवड निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्याला जे करावयाचे आहे ते तो करतो. जे बरळायचे आहे ते बरळतो. आपल्यासमोर काही आदर्शच नाहीत. आपल्यात काही शिस्तच नाही. देव नाहीच असं आपण वागतो आणि देव आहे का? असलाच तर तो काय आंधळा-बहिरा-मुका आहे का? असे विचारतो.
काहीही करून समाजाने आता भानावर आले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर शाळा-कॉलेजामधून मुलांना काय शिक्षण मिळत आहे, हे पालकांनी पाहिले पाहिजे. पाल्याच्या प्रत्येक कृतीसाठी पालकांनी स्वतःला जबाबदार समजले पाहिजे. समाजात अपराध्यांची एक नवीन जात निर्माण होऊ लागली आहे. जिच्यामुळे असंख्य लहान मुले भिकारी बनवत आहेत, अपराधी बनवत आहेत, अपंग बनवत आहेत, बळी जात आहेत.
हल्लीची मुले देवळात जायला तयार नाहीत. त्यांना धर्माबद्दल आपुलकी नाही. संस्कृती बद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही. अध्यात्मिक मूल्यांची चाड नाही, असे आपण रोजचेवर फार ऐकतो. आणि असाहाय्यपणे खांदे उडवून गप्प बसतो. ज्या संस्कृतीचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांकडून झाले पाहिजे. तिचीच लक्तरे ते पार्लमेंटमध्ये सर्रास उडवित आहेत. आणि आपण म्हणतो…
कोणत्याही समाजाची प्रगती शांती शक्ती समृद्धी आणि संपत्ती, तसेच आरोग्य, शिक्षण व कायदा- सुव्यवस्था हे सर्व समाजातील दक्षतेनेच शक्य आहे. जे तरुण निर्धारित नियमांचे उल्लंघन करतात व त्यामुळे सामाजिक विनाशाला आमंत्रित करतात, ते अत्यंत भयंकर अपराधी मानले गेले पाहिजेत. ते ‘खोडकर मुलं’ नव्हेत. सुधारणेच्या पलिकडील ‘अपराधी’ आहेत. त्यांचे लाड करता कामा नये. त्यांना क्षमा करून उपयोग नाही. त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विनाश ओढवणे आहे.
या, स्वयंशिस्त व आत्मसंयम असणाऱ्या लोकांचा एक नवा देश निर्माण करूया. जो शक्तीने तरूण आणि बुद्धीने ज्येष्ठ असेल. सर्वांनी परस्पर प्रेमाने एकत्र येऊन श्रम करूया. उत्पादने वाढवूया. न्यायाने प्रत्येकाला त्याच्या अधिकारानुसार समृद्धी आणि ऐश्वर्याचा वाटा देऊया.
नक्कीच, देवसुद्धा मग आंधळा-बहिरा-मुका राहणार नाही. तो आहे. तो आता येथे आहे. तो नेहमीचआपल्याबरोबर आहे.
०००००
लेखिका : सौ सुनंदा म जोशी
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈