सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
विविधा
☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆
वट पौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राज्याची कन्या सावित्री हिचा शाल्व राजा धृमत्सेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याच्या शी विवाह झाला. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसा होते तेव्हा सावित्रीने उपवास करून व्रत केले. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात.
भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
पूर्वी बायकांना घराबाहेर जायची परवानगी न्हवती. सणावारांच्या मुळे त्यांना घराबाहेर जाऊन पूजाअर्चा करून चांगले वस्त्र परिधान करून सख्यांना भेटायची संधी मिळावी हा हेतू साधून हे व्रत केले जायचे.
तीस वर्षा पूर्वी मला माझ्या मैत्रिणी बरोबर हे व्रत करायला जायची संधी मिळाली. गणपतीच्या मंदिरात वटवृक्ष असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजे साठी बायकांची तिथे खूप गर्दी झाली होती.
मंदिराबाहेर पाच फळे व फुले विकायला विक्रेते बसले होते. खरे तर ती फळे खूप कोवळी होती व खाण्या लायक ही न्हवती तरीही ती सुवासिनींची ओटी भरण्यासाठी विकत घेतली जात होती.
पूजेसाठी रांगा लावून सगळ्या बायका थांबल्या होत्या. मधल्या वेळात काही बायका आपल्या नवऱ्या व सासूबद्दल कुरबुरी व तक्रारी सांगत होत्या. सासरी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सांगत होत्या. तिथे आलेल्या काहीजणी आपल्या संसारात तितक्याशा सुखी न्हवत्या व एक रीती रिवाज म्हणून व्रत करत होत्या. भरजरी साड्या, दागिने व गर्दी ह्या मुळे कधी एकदा पूजा संपते असेच बहुतेक जणींना झाले होते. नंतर नंतर गर्दी एवढी वाढली की वडा भोवती प्रदक्षिणा घालतांना एकमेकींचे धागे वडा भोवती गुंडाळून कशीबशी पूजा पूर्ण केली गेली. त्यात काही जणी मनापासून तर काही एक रीत म्हणून किंवा लोकांना काय वाटेल पूजा केली नाहीतर म्हणून तिथे पुजेसाठी आल्या होत्या.
खरतर नवऱ्या बायकोच्या नात्यात संवाद, विश्वास, आणि समजूतदारपणा महत्त्वाचे आहे. नवरा बायकोचे नाते हे प्रेमाने, आपुलकीने, आणि एकमेकांचा आदर करून टिकून राहावे व अडीअडचणीच्या वेळी त्यांनी एकमेकांना साथ द्यावी हे महत्वाचे आहे. नवऱ्यासाठी व्रत करणे उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
नंतरनंतर ह्या पूजेला बदलते स्वरूप आले. बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळू लागल्या व सुवासिनी ह्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करू लागल्या. काहीकाही जणी घरात फांदी विकत आणून दहा पंधरा जणी एकत्र जमून पुजा करून फराळ करू लागल्या. काही बायका आपल्या सोयीप्रमाणे कामाच्या ठिकाणी वडाचे झाड शोधून हे व्रत पुर्ण करू लागल्या.
काही घरात ज्यांची मुलगी परदेशात आहे ते आभासी पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल करून पूजा करून हे व्रत करायच्या.
आता तर ह्या पूजेला एक इव्हेंट म्हणून पाहायला लागले आहेत. सोसायटी मध्ये सुवासिनी एकत्र जमून ही पूजा करतात. सेल्फी, फोटोचा कार्यक्रम व कुठे तरी बाहेर हॉटेल मधे उपवासाचे खाणे हे सगळे आठवड्या पूर्वीच नियोजन करून हे व्रत केले जाते.
ह्या कार्यक्रमात ड्रेस कोड, एका प्रकाराच्या साड्या परिधान करणे एकत्र जमुन गुजगोष्टी करणे हे हि तितकेच महत्वाचे असते.
एकूण काय पूर्वीचे व्रत असो किंवा आत्ताचे सेलिब्रेशन असो ह्यात सुवासिनींनी एकत्र येणे आपले सुखदुःख एक मेकांना सांगणे, आपले मन मोकळे करणे एकमेकींना कठिण प्रसंगी आधार देणे, वेळ प्रसंगी एकमेकींना मदत करणे एवढे साध्य झाले तरी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.
© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे
संपर्क : सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.
फोन : ७५०६२४३०५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈