मराठी साहित्य – विविधा ☆☆ रामनवमी दिना निमित्त – कर्तव्यदक्ष, आदर्श, पुरुषोत्तम श्रीराम ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ रामनवमी दिना निमित्त – कर्तव्यदक्ष, आदर्श, पुरुषोत्तम श्रीराम ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

भारतीय संस्कृतीचे श्रीराम एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे.परब्रम्हाचा तो सातवा अवतार आहे.पृथ्वीवर ज्यावेळी अत्याचार माजतो,मानवी जीवन विस्कळीत होते,दैत्याचे तांडव अमर्याद सुरु असते त्यावेळी पृथ्वीला हे  सर्व सहन न होऊन ती गाय रुपाने वैकुंठात जगाच्या पालन कर्त्या कडे जाते.वत्याला विनवणी करते.या संकटातून मला वाचव.तेव्हा दुष्टांचा संहार व सृष्टांचे पालन करण्याकरता प्रभू पृथ्वीतलावर अवतार घेतात. श्रीरामांनी त्रेतायुगात भगवान विष्णूच्या दशावतारात सातव्या क्रमांकावर अवतार घेतला.तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमीचा.पुष्य नक्षत्र,कर्क रास हा दिवस श्रीरामाच्या जन्माचा होय.भारतीय संस्कृतीच्या एका दैदिप्यमान हिर्याच्या तेजाने सर्व    पृथ्वी चमकून गेली.एका आज्ञाधारक कर्तव्य दक्ष,आदर्श व्यक्तिमत्वाचा जन्म झाला..

त्रेतायुगानंतर व्दापार व नंतर आजचे कलियुग आहे.श्रीराम हे युगपुरूष आहे.रामायणाचा नायक श्रीराम आहे. आजही श्रीराम नवमी ठिकठिकाणी मोठ्या आनंदाने साजरी करतात.

रामायणाच्या कथेचा मध्यवर्ती बिंदू श्रीराम.गुरू वशिष्ठ यांचेकडून विद्या घेऊन पुढे ते विश्र्वास इतरांच्या मग रक्षणासाठी गेले.तेथे त्यांनी असुरांना आपल्या विद्येची चांगलीच चुणूक दाखवली.व आपल्या गुरुचे रक्षण केले.

आज्ञा शिरसावंद्य या न्यायाने आई व वडील यांच्या आज्ञेचे पालन केले.चौदा वर्षाचा वनवास पत्करला व राज्याचा त्याग केला.केवढी ही नि:स्वार्थी वृत्ती.

अंजनीसुत वीर हनुमान हा रामाचा प्रिय भक्त  होता.श्रीरामाच्या संकट काळी तो वेळोवेळी कामास आला. लंकाधिपतीने जेव्हा सीतेचे हरण केले तेव्हा सीतेचा शोध लावण्यात हनुमानाला यश मिळाले.पुढे आपल्या विराट रुपाने लंकादहन केले. असा हा चिरंजीव हनुमान चारी युगात कार्यरत होता. व  आहे.

रावण हे अंहकाराचे प्रतीक असलेला दुष्ट असूर.राम रावण युध्दात आपल्या युध्द नीतीने रावणाला पराभूत केले. ते श्रीरामानेच.

श्रीरामाचे अनेक गुण हे  वाखाणण्यासारखे आहेत.तो एक  अत्यंत प्रजादक्ष राजा, उत्कृष्ठ शासक, कर्तव्य निष्ठ राजा होता. आईवडिलांची आज्ञा पाळणारा आज्ञाधारक पूत्र ,एक पत्नीत्वाचा पुरस्कर्ता होता.एक बाणी,एक वचनी  होता.

शुद्ध व निर्मळ मनाचे श्रीराम होते याचे उदाहरण म्हणजे वनवासातुन परत आल्यावर त्यांनी कैकयीच्या चरणावर प्रथम माथा ठेवला.

आज आपण कलियुगाच्या मध्यावर उभे आहोत.आजचा समाज बदलत आहे.संस्कृतीपासून लांब चालला आहे.संस्कृतीची मुल्ये लोप पावत आहे.

अशा परिस्थितीत भारतीय तत्वज्ञान व मुल्यांची जोपासना करण्यासाठी  युगपुरुषांची गरज आहे.या भवसागरातून तरुन जाण्यासाठी श्रीराम व्यक्तीमत्व ही एक नौका आहे

आजच्या दिनी युगपुरूषाचे स्मरण  कृती युक्त अंत:कर्णाने केल्यास देशासमोर असणार्या बर्याचशा समस्यांचे निराकरण होऊ शकते.

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज सकाळी नेहमीसारखी फिरायला बाहेर पडले.नेहमीचा रस्ता,पण चालता चालता एकदम थांबले.माझं लक्ष बाजूच्या झाडाकडं गेलं. तर एरवी उदास वाटणाऱ्या या झाडाचा आजचा रुबाब बघितला.

हिरवट, पिवळ्या कळ्या फुलांची झुंबरे त्यावर लटकत होती. ही किमया कधी झाली असा प्रश्र्न पडला, तर शेजारचा गुलमोहर तसाच,कात टाकल्यासारखा. लाललाल लहानशा पाकळ्या आणि मध्ये शुभ्र मोती असे गुच्छ दिसू लागलेले. मला वाटलं लाजून लालेलाल झाला कि काय?

मग चटकन लक्षात आलं कि या तर ऋतुराजाच्या आगमनाच्या खुणा.

शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गाच्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने,तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार.कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते.वसंत राजाच्या स्वागतात दंग होते.कोकिळ  आलापांवर आलाप घेत असतो.लाल चुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर  डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्यासारखे वाटते.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले,जाई,जुई चमेली,मोगरा, मदनबाण,नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.

या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीची झुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी व पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्या छटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.

आपण हिला घाणेरी म्हणतो पण गुजरात,राजस्थान मध्ये या फुलांना “चुनडी”म्हणतात.त्यांचे कपडेही असेच चटकदार रंगांचे असतात.पळस,पांगारा रंगलेला असतो. हिरव्या रंगांच्या तर किती छटा.जणू त्याअनामिक चित्रकाराने मनापासून निसर्गदेवीला रंगगंधानी सजवले आहे.त्यासाठी नानाविध रंग आणि मदहोश सुगंधाच्या खाणीच खुल्या केलेल्या आहेत.

आंब्याची झाडे तर अतीव सुखातअसतात.फाल्गुनातील मोहोराचा गंध आणि त्यात लांब लांब देठांना लोंबणाऱ्या कैऱ्या उद्याचा “मधाळ ठेवा.”अगदी नारळा-पोफळीच्या झाडांना सुद्धा फुलं येतात.नखाएवढी फुलं एवढ्या मोठ्या नारळांची.

अगदी टणक पण हातात घेतली  कि त्याच्या इवल्याशा पाकळ्याही मृदू भासतात.पोफळीला फुटलेले इवल्याशा सुपाऱ्यांचे पाचूसम तकतकीत हिरवे लोंगर अगदी लोभस दिसतात.कडुलिंबाचा जांभळट पांढरा मोहोर तर गंधाने दरवळणारा. करंजाची झाडं सुद्धा नाजूक फुलांनी डंवरलेली.फणसाशिवाय हे वर्णनअपुरेहोईल.फणसाची झाडे सुद्धा टवटवीत दिसू लागतात.हळूहळू अगदी खालून वर पर्यंत इवलेसे फणस लटकलेले असतात. खरतर यादरम्यानउन्हंकडक.पणफुलायचा,गंधाळण्याचा या वृक्षलतांनी घेतलेला वसा पाहून मन थक्क होते.जांभूळही यात मागे नसतोच.

त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान,मोठी,सुबक,बेढब,लांबोडकी,गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी.वसंत ऋतू चैतन्याचा . कुणासाठी काहीतरी करण्याचा.नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत.सुगरण पक्षी आपली कला घरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात.काही नर पक्षी गातात, काही नाचतात. इकडं झाडं,वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गुल,साऱ्या सृष्टीतचहालचाली,लगबग.वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात.कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हा मधुमास.निसर्गाचा मधुर आविष्कार. म्हणून तर चैत्र मास “मधुमास”होतो.

आता ऋतुपतीच्या आगमनासाठी सृष्टीचा कण न कण आतुरलेला.संयमाची सारी बंधने  निसर्ग राणी झुगारून देते.पक्षीगणांची सृजनासाठी आतुर,सहचरीची आर्जवे करणारे मधुरव, कोकिळ कंठातील मदमस्त ताना वातावरण धुंद करतात.

सजलेल्या,पुष्पालंकार ल्यायलेल्या गंधभऱ्या सृष्टीराणीच्या मोहात हा गंधवेडा,रंगबावरा वसंत पडला नाही तरच नवल.मग हा वसंतोत्सव पूर्ण वैशाख संपेपर्यंत रंगलेला असतो. निसर्गाचे हे बेबंद रुप, सौंदर्यासक्ती, कलाकारी खरंच थक्क करते.

गंधवेडा कि तू रंगबावरा|

ऋतुपती तू सदैव हसरा|

रत्युत्सुक रे मत्त मदभरा|

सृष्टीवेड्या रे जादुगारा||

 

आनंदाचा सुखमय ठेवा|

वाटत येशी तूची सर्वा|

फुलपंखी हा पर्णपिसारा|

फुलवित येशी चित्तचकोरा||

 

गंध उधळसी दाही दिशांना|

उजळत येशी दिशादिशांना|

धरतीच्या रे ह्रदय स्पंदना|

उत्सुक सारे तुझ्या दर्शना||

                

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चुटपूट…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चुटपूट” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

व्हाट्सएपचं वेगवेगळ्या समुहाचं एक आगळंवेगळं जग असतं,नव्हे आहे. ह्या जगात नानाविध लोक,काही त्यांनी लिहीलेल्या,काही फाँरवर्डेड पोस्ट ह्या निरनिराळ्या विषयांवर असतात. कधी कधी एकच पोस्ट फिरतफिरत वेगवेगळ्या समुहांवरुन अनेकदा येते. मला हे जग बघितलं की आमच्या शेतातील धान्य निघतांना एक शेवटचा टप्पा असतो,ज्याला “खडवण” असं म्हणतात त्याचीच आठवण येते. ह्या खडवणीत जरा बारीक माती,खडे ह्यांच प्रमाण जास्त आणि धान्याचं प्रमाण कमी असं असतं.शेतकऱ्यांचं एक ब्रीद वाक्य असतं “खाऊन माजावं पण टाकून माजू नये”ह्यानुसार प्रत्येक शेतकरी अगदी निगूतीने ती खडवण निवडून धान्य बाजूला काढून अन्नदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कुठलाही शेतकरी धान्याचा शक्यतो एकही दाणा वाया जाऊ देत नाही. ह्या व्हाट्सएपचं च्या जगात पण आपल्या प्रत्येकाला ही शेतकऱ्यांची भुमिका बजवावी लागते. चांगल्या,दर्जेदार, वाचनीय, ज्यामुळे आपल्या पुढील आयुष्यात नक्कीच काही तरी चांगले शिकू,आचरणात आणू. अर्थातच  हे व्हाट्सएप समुह जरा निवांत वेळ असणाऱ्या, जबाबदा-या पार पाडलेल्या मंडळींसाठी मात्र खूप चांगले हे ही खरेच.

अशाच एका व्हाट्सएप ग्रुपवर जळगावच्या डॉ. श्रीकांत तारे ह्यांचे स्वतःचे “चुटपुट”नावाचे अनुभव कथन खूप जास्त भावले आणि त्या लिखाणाने विचारात देखील पाडले. ह्या लेखात आपलं माणूस असेपर्यंत त्याच्या आवडीच्या सोयीच्या गोष्टी करणं हे आपल्याला खूप जास्त समाधान देऊन जातं आणि कदाचित चुकून, अनवधानाने आपल्या हातून ती व्यक्ती असेपर्यंत ह्या गोष्टी करणं झाल्या नाहीत तर कायमची न संपणारी, आपल्या शेवटपर्यंत स्मरणात राहणारी ही एक “चुटपुट” लागून जाते ह्याबद्दल खूप छान लिहीलयं.प्रत्येकाने वाचावीच अशी ती पोस्ट. संपूर्ण पोस्ट तर  येथे पाठवू शकत नाही त्यामुळे फेसबुक वर कदाचित त्यांच्या वाँलवर ती आपल्या सर्वांना वाचायला मिळेल. आपल्याला पटलेल्या,दर्जेदार गोष्टी आपण वाचून त्या इतरांना वाचायला सांगण ह्यामध्ये पण एक आनंद असतो.

बरेचवेळा आपण आपल्या लोकांना गृहीत धरतो,त्यामुळे त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करीतच नाही, आणि मग इथेच आपले सगळे सुखाचे कँल्यक्युलेशन चुकायला सुरवात होते. सध्या आपल्या सगळ्यांचच जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. जी गोष्ट परस्परांना देण्याघेण्यासाठी अतिशय मौल्यवान असते ती म्हणजे परस्परांनी एकमेकांना दिलेला आपला स्वतःचा वेळ,आणि आज बहुतेक आपल्या सगळ्यांना देण्यासाठी वेळ नाही ही एक शोकांतिकाच. ह्या परस्परांना वेळ देण्यामधूनच एकमेकांच्या मनातील भाव,ईच्छा ह्या न बोलता, सांगता एकमेकांना आपोआप कळायच्या मात्र आता वेळेचा अभावी एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट अभावानेच आढळणारं, म्हणून आपण त्यावर तोडगा म्हणून आपली भुमिका गुळमुळीत न राहता दुसऱ्या व्यक्तीला सडेतोड सांगणं हे कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अत्यावश्यक ह्या सदरात मोडतं.मग हे नातं पालक अपत्यांमधील असो वा जोडीदारांमधील.आपली आवडनिवड, आपली स्वप्नं, आपल्या ईच्छा,आपल्या गरजा  ह्या परस्परांना स्पष्टपणे सांगून ,त्यावर विचारविनिमय करुन तोडगा काढल्यास कुणाही एका व्यक्तीला कायम तडजोड वा कायम मनं मारुन,ईच्छा ,गरजा अपूर्ण ठेऊन जगावं लागणार नाही. आणि मग परस्परांना निदान एक माणूस म्हणून आपण समजावून घेऊ शकू.

एका अनुभवामुळे मनात असे अनेक विचार आलेत, असेच अजून कितीतरी वेगवेगळे विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतीलच ही खात्री. त्यामुळे वाचत रहा बरेच वेळा आपल्या वाचनातूनच,वेगवेगळे अनुभव जाणून घेउनच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं ही मिळायला मदत होते हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 62 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक तीन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 62 –   स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान –  लेखांक तीन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.

प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती.

आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून ते परतले. समाजाला जाग आणण्याचा आणि आपल्या देशातील बांधवांचे पुनरुत्थान घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी केला. त्याच बरोबर स्वतविषयी अहंकार असणार्‍या पाश्चिमात्यांना आपल्या पौर्वात्त्यांच्या अनुभवापुढे नम्र होण्यास स्वामीजी प्रवृत्त करणार होते. आणि त्यासाठी भारताचा अध्यात्मिक संदेश जगभर पोहोचविणार होते. कारण सर्व मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्ये आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली आहेत. हे त्यांनी अनुभावातून आणि वाचनातून जाणून घेतलं होतं. 

स्वामीजींनी ध्यान केलं होतं जगन्मातेचं आणि चिंतन केलं होतं भारतमातेचं. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं. २५ ,२६, २७ डिसेंबर १८९२ ला स्वामीजींच्या वैचारिक आंदोलनाने सिद्ध झालेल्या याच शिलाखंडावर भव्य असे विवेकानंद शिलास्मारक उभे आहे.

कन्याकुमारीचे विवेकानंद शिला स्मारक हा धर्म कार्याच्या विकासाचा पहिला टप्पा होता. त्यानंतर विवेकानंद केंद्र राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले हा दूसरा टप्पा तर विवेकानंद केंद्र इंटरनॅशनल  ही पुढची संकल्पना . या पातळीवर स्वामीजींच्या स्वप्नातले विश्वव्यापी काम सुरू आहे.

स्वामीजींचे जीवन पाहता त्यांचे चरित्र आणि त्यांनी दिलेला संदेश खूप सुसंगत आहेत. ते हिंदुत्वाचे सर्वोत्कृष्ट प्रतींनिधी तर होतेच पण, ते सर्वाधिक थोर आणि जाज्वल्य असे आंतरराष्ट्रीयवादी ,आधुनिक भारतीय सत्पुरुष होते .  

स्वामीजी कन्याकुमारीला पोहोचले तेंव्हा ते एक संन्यासी होते. पण या तीन दिवसांनंतर परिवर्तन होऊन तो, राष्ट्र उभे करणारा श्रेष्ठ नेता,जगाला त्याग आणि सेवेचा नवा संदेश देणारा श्रेष्ठ गुरु, एक खरा देशभक्त म्हणून जगन्मान्य झाला. स्वामीजींच्या स्वप्नातल्या कार्ययोजनेला प्रत्यक्ष स्वरूप देणारं हे  वैचारिक आंदोलन केंद्रच आहे. आज ही श्रीपाद शिला विवेकानंद शिला म्हणून सर्वदूर परिचित आहे. या स्मारकाचे प्रेरणास्थान एकनाथजी रानडे आहेत. १९६३ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांची आठवण म्हणून हे शिला स्मारक करण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणी आल्या.पण हे स्मारक आज या इतिहासाची साक्ष तर देतच आहे आणि कामासाठी प्रेरणा व विचार पण देतंय.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द …अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत.   हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा “मुल्यात्मक” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे .

विज्ञान …..एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे , उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की … अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता , भयता , प्रांतीयता , वंशवादता , अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की , मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे , आव्हान आहे  आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही …वर्तमानकाळ नाही …अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही . विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मार्च…महिना परिक्षेचा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मार्च…महिना परिक्षेचा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मार्च महिना हा सगळ्यांसाठीच धावपळीचा, दगदगीचा आणि आव्हानाचा सुद्धा. शिक्षणक्षेत्र आर्थिक क्षेत्र,आणि मुख्य म्हणजे गृहीणी ह्यांच्या साठी तर हा महिना खूप जास्त महत्वाचा.

कँलेंडरवर नजर टाकली तर हा महिना खूप सुट्ट्यांचा दिसतो मात्र खासियत अशी की पेंडींग कामे,टारगेट्स ह्यामुळे ह्या सुट्ट्या नुसत्या दिसायलाच कँलेंडरच्या बाँक्समध्ये विराजमान असतात. कामाच्या रामरगाड्यामुळे एक तर ह्या सुट्ट्या अर्जत नाहीत आणि चुकून मिळाल्यातरी महत्वाची कामे सतत नजरेसमोर येत असल्याने त्या सुट्ट्यांमध्ये घरी मन रमत नाही वा सुट्ट्यांचा मनमुराद आनंदही उपभोगता येत नाही. सुट्ट्या मिळाल्या तरी हे माहिती असतं साठवून ठेवलेली कामे आपल्यालाच करायची असल्याने ही सगळी कामे नजरेसमोर फेर धरून नाचतात आणि त्यामुळे जीवाची तगमग ही होतेच. गृहीणींच्या भाषेत बोलायचं तर नजरेसमोर असतो धुणी, भांडी ह्यांचा घासायला,धुवायला असणारा ढिगारा आणि नेमकं टाकीतील पाण्याचा साठा संपून गेल्यावर जणू “जल बीन मछली “सारखी तगमगती अस्वस्थता.

हा मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी,शिक्षक प्राध्यापक मंडळींसाठी,  शिक्षणमंडळ आणि विद्यापीठ ह्यामध्ये काम करणा-यांसाठी खूप ताणाचा, कामांचा असतो.

हा महिना राजकारणी मंडळींसाठी पण खूप महत्त्वाचा असतो.कित्येक दिवस खूप अभ्यास करुन मेहनतीनं सत्तेवर असणाऱ्या पक्षाला खर्चाचा ताळमेळ बसवत अंदाजपत्रक सादर करावं लागतं. राज्याच्या ,देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बसविणं किती कठीण कामं असतं नं.आपल्याला साधं आपल्या घरातील जमाखर्च आणि अंदाजपत्रकाचा ताळमेळ बसवितांना सगळे देव आठवतात. हे तर पूर्ण राज्याचे, देशाचे कामं आणि इतकही करुन कौतुक वाट्याला येत नाही ते नाहीच. विरोधी पक्ष कुठलाही असो तो पक्ष त्यातील फक्त त्रुटी,कमतरता तेवढ्या शोधीत राहणार. माझ्या बघण्यात अजून एकदाही असा प्रसंग आला नाही ज्यामध्ये विरोधी पक्ष हा सत्तेवर असणाऱ्या मंडळींचे कौतुक करतोयं. असो

जणू मार्च महिना हा सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठीच तयार झालेला महिना असावा. विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभराच्या केलेल्या कष्टांचे, श्रमाचे मुल्यमापन ह्याच काळात होतं जणू. बँकर्स, सी.ए.,आँडीटर्स, कर भरणारी जनता ह्यांची तर अक्षरशः “निंद हराम” करणारा हा महिना. टारगेट्स पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या साठीचा हा कालावधी.

मार्च महिना हा गृहीणींसाठी पण खूप धावपळीचा आणि दगदगीचा महिना असतो. ह्या महिन्यात धान्य विकत घेऊन, त्याला ऊन दाखवून मग त्यावर कीडनाशक कडूलिंबाचा पाला टाकून ते धान्य साठवणूक म्हणून कोठ्यांमध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम गृहीणींचे असते. त्याचबरोबर वर्षभर बेगमी म्हणून साठा करण्याचे पदार्थ उदा.पापड,कुरडई, लोणची, शेवया,वेफर्स आणि असे अनेक पदार्थ करण्याचं गृहीणींच्या कामाची सुरवात मार्चपासूनच होते.

नुकतीच थंडी गायब होऊन उन्हाळ्याला सुरवात झालेली असते.त्यामुळे ह्या हवामाना मधील बदलांमुळे सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी ही घ्यावीच लागते. तरीही व्हायरल इन्फेक्शन हे हात धुवून मागे लागण्या मुळे डाँक्टर्स आणि पेशंट ह्यांच्यासाठी सुद्धा गर्दीचा काळ.पण खरी परीक्षा ही तब्येतीने धडधाकट असणाऱ्या आपल्या घरच्या मंडळींची असते.

हे आर्थिक वर्ष, आपणा सर्वांना भरभराटीचे जावो ,आरोग्य व्यवस्थित राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

माझा (शालेय) इतिहास…

माझा इतिहास असायचे कारण नाही. तो भूतकाळ आहे. पण इतिहास म्हटले की वजन येते. त्यामुळे हा कालखंड म्हणजे माझा इतिहास.

(माझ्या मतानुसार चांगल्या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्यांचे नांव होते, तर विपरीत परिस्थितीत चांगले करणारा इतिहास घडवतो. माझे नांव पण नाही, मी इतिहास देखील घडवला नाही. पण फक्त इतिहास म्हटले की वजन येते म्हणून शालेय इतिहास इतकेच.)

इतिहास म्हटले की व्यक्ती, लढाई, संघर्ष, हुकूमशाही, बंड, अन्याय, अत्याचार असेच आणि बरेच डोळ्यासमोर येते.

माझ्या शालेय इतिहासात असे खूप काही नाही. माझ्यावर अन्याय झाला नाही. मी बंड देखील केले नाही. किंवा मशाली आणि पलित्याखाली (रस्त्यावरच्या दिव्याखाली) अभ्यास देखील केला नाही.

पण लढाई, संघर्ष, आणि पालक व शिक्षकांची संयुक्त  हुकूमशाही काही प्रमाणात होती. माझ्या लोकशाहीची काहीप्रमाणात मुस्कटदाबी झाली होती. मुस्कटदाबी यासाठी की मी काय शिकावे यांचे स्वातंत्र्य मला नव्हते. युती, आघाडी असे शब्द मला तेव्हा माहीत नव्हते. किंवा समजले नव्हते. नाही तर पालक, शिक्षक, संस्थाचालक यांची आघाडी असे म्हटले असते किंवा माझी आणि इंग्रजीची युती भल्या पहाटे Good morning बरोबर (शपथ घेऊन) सुरू झाली, आणि Good night बरोबरच (राजीनामा देत) अवघ्या काही दिवसांत किंवा तासांतच तुटली, संपुष्टात असे सांगितले असते. ही युती तुटण्यासाठी कुठलीही (घड्याळाची) वेळ कारणीभूत नव्हती, किंवा कोणाचाही हात त्यात नव्हता. पण शपथ घेतांना आणि राजीनामा देतांना धनुष्यातून बाण सुटला,  अथवा सोडला होता हे नक्की. (बाण सुटला की परत घेता येत नाही, दुसराच घ्यावा लागतो.)

इतिहासात आक्रमणं झालीत. तशी माझ्या शालेय जीवनात आक्रमणे होती. (याला परिक्षा म्हणत असत.) पण ही समजण्यासाठी मला हेर ठेवायची गरज नव्हती. आक्रमणे गनिमी कावा किंवा मी बेसावध असताना झाली नव्हती.

या आक्रमणाची (परीक्षांची) रितसर सूचना यायची. सूचना अगदी शके XXXX, माहे फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन कृष्ण पंचमी अशी नसली तरी, यात इंग्रजी महिना तारीख, वार, वेळ, विषय यांचा उल्लेख असायचा. अचानक वार होत नव्हते. थोडक्यात शत्रू दिलदार होता.

ही  आक्रमणे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच व्हायची. एका वर्षाच्या कालावधीत लहानमोठी मिळून साधारण सहा आक्रमणे असायची. (यात दोन चाचणी, एक सहामाही, परत दोन चाचणी, आणि एक वार्षिक परीक्षा असा क्रम देखील ठरलेला असायचा.)

पाचवी ते दहावी असा महत्वाचा आणि उमेदीचा काळ समजला तरी सहा वर्षे आणि प्रत्येक वर्षात चार अशा एकूण पंचवीस (दहावीत आक्रमणाला तोंड देण्याची पुर्वतयारी म्हणून एक सराव परीक्षा घेत असत.) आक्रमणे झाली. काही आक्रमणे मी तह करून थांबवली. हे तह तोंडी होते. (यालाच तोंडी परीक्षा असे नांव होते. शिक्षकांच्या लेखी याला कमी महत्त्व असावे. कारण त्यांचा भर लेखी परीक्षेवर असायचा, तसे ते तोंडी सांगत असत.)

या आक्रमणांना तोंड मी दिले होते. पण माझ्यावर (ओरडून) तोंडसुख मात्र घरच्यांनी घेतले होते. कारण…… मार्क कमी मिळाले हेच होते. पण तोंडी परीक्षेत माझा (तोंडाचा) दाणपट्टा बऱ्यापैकी फिरायचा.

या आक्रमणाची सूचना घरच्यांना देखील असायची. त्यामुळे त्या काळातल्या माझ्या हालचालींवर त्यांची बारीक नजर असायची. माझी रणनिती काही प्रमाणात तेच ठरवायचे. दहावीत तर तयारी जय्यत होती.

इतिहासात शिकायला, वाचायला, तह, वेढा, स्वकियांची मदत, रसद पुरवठा असेही काही होते. पण याचा अनुभव शेवटी म्हणजे दहावीच्या आक्रमणावेळी अनुभवला. तो देखील सोबत असणाऱ्या इतरांच्या बाबतीत.

एकतर या दहावीच्या आक्रमणाला  परक्या मुलुखात तोंड (दुसऱ्या शाळेत) द्यायचे होते. माझ्या सारखेच अनेक अशा आक्रमणाला तोंड देण्यासाठी आले होते. त्या मुलखाला शत्रू सैन्याचा (पोलिसांचा) वेढा असायचा. तो वेढा भेदून काही स्वकिय (दोस्तराष्ट्र) रसद पुरवण्याची पराकाष्ठा करत असल्याचे मी पाहिले होते. (याला काॅपी पुरवणे असे म्हणत असत. थोडक्यात काॅपीमुक्त अभियानाला देखील इतिहास आहे असे म्हणावे लागेल.) पण खूप कमी जणांना रसद पुरवता येत होती. काही वेळा रसद यायची, पण योग्य ठिकाणी पोहचायची नाही. कारण वेढा सक्त असायचा. (त्यावेळी फितुरीचे प्रमाण कमी होते असे म्हणावे लागेल.)

या आक्रमणात वापरली जाणारी शस्त्र म्हणजे पेन, पेन्सिल, रबर, पट्टी यांची जय्यत तयारी असायची. नि:शस्त्र होण्याची वेळ कधीच आली नाही.

जवळपास सगळ्याच आक्रमणात माझा विजय झाला असला तरी त्याचा विजयोत्सव साजरा करण्याइतका तो दैदिप्यमान कधीच नव्हता.

पाचवी ते दहावी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात आमचे शिक्षण झाल्याने या दोन्ही सत्रात शिकवणारे जवळपास सगळेच शिक्षक माझे कमी अधिक प्रमाणात गुरू होतेच. किंवा सगळ्या शिक्षकांना गुरुस्थानी मानण्याचा तो काळ होता. असे सांगायचे कारण…..

हल्ली इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिंच्या गुरू बाबत देखील बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगतात. काही त्यात रंग भरण्याचेच काम करतात. पण माझा इतिहास दैदिप्यमान नसल्याने अशा चर्चा घडत नाहीत, घडणार देखील नाही. कदाचित तू खरेच माझा विद्यार्थी होता का? असा प्रश्न एखादा गुरु मलाच करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा या माझ्या शालेय इतिहासातील काही दस्तऐवज (शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका) आजही माझ्या जवळ आहेत. त्याची आता खूप गरज नसली तरी ते दस्तऐवज मी सांभाळून ठेवले आहेत. (पण ते माझ्या पुढच्या पिढीला मी दाखवत नाही.)

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

या दिवशी पूजा करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येक रुढी ,परंपरेला शास्त्रीय आधार आहे.या दिवशी अभ्यंगस्नान करून, ब्रह्मदेवाची दवणा ( थंड असतो म्हणून ) वाहून नंतर महा शांती केली जाते. ” नमस्ते बहू रुपाय विष्णवे नमः।” हा मंत्र म्हणून विष्णुची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे ज्ञान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने, आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते.आरोग्य लाभते. समृद्धी येते.अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करतांना, एका उंच वेळूच्या टोकाला ,भरजरी  खण किंवा साडी ,साखरेच्या गाठी, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची  डहाळी, आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा चांदीचा कलश  सजवून, गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते.याला ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडुलिंब आणि आंब्याच्या झाडाच्या पंचांगांचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. ( ते देववृक्ष आहेत. )कलश रुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. ( अँटेनाच्या कार्या प्रमाणे. )या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून, वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्नं करून, प्रसाद म्हणून ,कडूलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकातले संबंध वाढावेत ,अशी एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणीस सुरुवात करतात. पारंपारिक वेषभुशा करुन, मिरवणूक काढून, आनंद लुटतात. कोणी नवीन खरेदी करतात. किंवा नवीन कामाला सुरवात करतात.

आपल्या प्रत्येक  सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. जाणून घ्यायला हवा. या शुभ दिनानिमित्त येणारे नवीन शुभ कृती संवत्सर, शालिवाहन शके १९४५ हे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष,  एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.

याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे  ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.

गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला  इंद्राने दिलेल्या कळकाची काठी  त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन  दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने  क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक  तेव्हापासून सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.

व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ?

☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सांगलीत जुन्या स्टेशन रोडवरून आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावरच LIC ऑफिस लागतं. “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” या आशेवर लोकांच्या जीवन विमा पॉलिसीवरचा विश्वास जपणाऱ्या या इमारतीमध्ये दिवसभर लोकांची लाईफ लाईन धावपळ करीत असते.

बऱ्याच वेळा संध्याकाळी सात नंतर सांगलीतून घरी येताना याच LIC ऑफिसच्या गेटच्या बाजूच्या भिंतीवर सिग्नलकडे तोंड करून आरामात बसलेला हा अनामिक कुत्रा दिसायचा. त्याची ऐट मनाला भावून जायची. नकळत त्याची छबी टिपण्याचा मोह आवरायचा नाही.

” बचत भी और सुरक्षा भी – हे ब्रीद उराशी बाळगून ही पॉलिसी घराघरांशी नातं जोडून आहे. स्वतःचं जीवन समृद्ध करणारी माणसं रस्त्यात कुत्रं आडवं आलं की हाड हाड करतात. तोच हा कुत्रा याच माणसांच्या पैशाचं ईमानईतबारे रक्षण करत बसलाय असं याच क्षणी वाटून जायचं.

गेली कित्येक दिवस सायंकाळी हाच एकटा कुत्रा ऐटित, याच जागेवर बसायचा. येता जाता त्याची आणि माझी अशी वारंवार नजर भेट व्हायची….पण काही दिवस झालं तो आता तिथं दिसत नाही. येता जाता मनात हूरहूर वाटत रहायची.

ते ठिकाण आल्यानंतर आजही काही क्षण नजर त्या ठिकाणी जाते. त्याची रिकामी जागा अस्वस्थ करते . त्याचं काय झालं असेल ? त्याचं बरं वाईट तर झालं नसेल ना ?( पुन्हा भीती  रस्त्यावर त्याचं बेवारस चिरडण्याची ). झालं असेल बरं वाईट तर माणसासारखा त्याचा वीमा कोणी काढला असेल का ? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्याच रस्त्यावरच्या गतिरोधकावरून हळू केलेली गाडी रोजच्याच स्पीडनं पुढं दामटवतो.

मनात मात्र तो कुत्रा, LIC ची ती  “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” ची टॅगलाईन आणि माझाच जीव मुठीत घेऊन मी तुमच्यासारखाच धावत असतो….!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares