मराठी साहित्य – विविधा ☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

आपण एखाद्या परिचित किंवा अपरिचित घरात पाय टाकला तर कोणता अनुभव यायला हवा? त्या घरातील माणसांनी किमान “या”  असं म्हणावं!पेलाभर पाणी द्यावं.अपरिचित असू तर कोण? कुठले? अशी साधी चौकशी करावी.बरं घर म्हंटल्यावर त्या घरातील माणसांच्या बोलण्याचा, हसण्याचा, मुलांच्या ओरडण्याचा, भांडणाचा आवाज तरी कानावर पडायला नको का? पण हल्ली घरात आवाज असतो तो दूरदर्शन चा. घरं कशी अबोल झाल्यासारखी वाटतात.घरात माणसं असून ही एक वेगळीच शांतता जाणवते.या शांततेला कुठला चेहरा आहे हेही अनाकलनीय असतं.मंदीराच्या गाभा-यात जाणवणारी शांतता, ध्यान विपश्यना अशा साधनेत अनुभवायला मिळणारी शांतता,प्रचंड दडपणाखाली निर्माण झालेली शांतता किंवा एखाद्या वनराईतून संथपणे वाहणा-या नदीकाठ ची शांतता या प्रत्येक प्रसंगात, क्षणात जाणवणा-या शांततेला तिचा स्वतःचा एक चेहरा आहे, हे आवर्जून जाणवतं. पण घरात माणसं असून ही निर्माण झालेली शांतता अनुभवतांना तिचा चेहरा एकदम अनोळखी वाटायला लागतो.

आठवणीतल्या घरातलं लहानपण आठवलं की एक गोष्ट लक्षात येते की     पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती…त्यामुळेच घर कसं भरलेलं वाटायचं.मुलांची भांडणं झाली की आजी आजोबांचं कोर्ट! हट्ट पुरविणारे ही तेच! संध्याकाळी ” शुभं करोती ” म्हणजे मुलांच्या हजेरीची वेळ!संस्कृत मधील अनेक श्लोक, स्तोत्र पाठ करवून घ्यायची जबाबदारी आजोबांकडे.आणि गोष्ट सांगून मनोरंजन आजीकडे.सतत पाहुणे आणि येणा-या जाणा-यांचा राबता!त्यामुळे घरात माणसं असल्याचं जाणवायचं. घर चैतन्याचं आवार वाटायचं.आता अशी घरं आठवणीत गेलीत. पूर्वी घरात ‘आम्ही’ होतो, आता घरात ‘मी’  वास्तव्य करतांना दिसतो.’मी’  ‘मी’ मध्ये संवाद कसा होणार? गप्पा कशा रंगणार?

या ‘मी’ मुळे हल्ली शेजारधर्म ही उरला नाही. फ्लॅट पद्धतीत आपल्या आजूबाजूला, वर खाली घरं असली तरी त्या घरांचा आपल्या घराशी संपर्क नसतो. माणसांची सलगी नसते. नावही माहीत नसतात.फक्त जाता येता ओळख असल्याचं दाखवायचं… बळजबरीनं हसायचं. शेजारधर्म हा एकोपा वाढवणारा, सहकार्याची भावना जागवणारा असतो. नात्याची वीण घट्ट करणारा असतो. पण सा-याच घरात ‘मी’. मग दोष कुणाला द्यायचा?’मी ‘ आणि ‘मी’ चं मैत्र झालंयं का कधी?  ‘मी’ ला ‘आपण’ मध्ये विरघळून जायला हवं तेव्हाच मैत्र निर्माण होतं.  घर केवढं आहे याला महत्व नाही.फक्त त्यात माणसं असावीत.माणसा-माणसात आत्मीयता जिव्हाळा असावा. घरातून बाहेर गेलेल्याला घराची ओढ वाटावी.इतरांच्या सुखासाठी स्वतःतला ‘मी’ विरघळविण्याची सवय असावी. अशी माणसाला माणसांची ओढ, माणसाला घराची ओढ, घरांना घराची ओढ निर्माण झाली की ” हे विश्वचि माझे घर” म्हणणारा, ज्ञानोबा एखाद्या घरातून विश्वकल्याणाचं स्वप्न घेऊन बाहेर पडेल.कुणी सांगावं?

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक  परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी एक म्हण आहे.त्यानुसार आपल्या आवडीनिवडी, कल हा बालपणी पासून लक्षात येतो.अर्थातच ह्यात काही अंशी बदलही होतोच. माझ्या लहान बहिणीचा सेवाभावी कल ओळखून ही वैद्यकीय पेशा स्विकारुन रुग्णसेवा उत्तम करेल हे लहानपणीच लक्षात आलं.ती ह्या शिक्षणाच्या मार्गाने गेली नाही परंतु तिची रुग्णांची सेवा मनापासून करण्याची सवय मात्र अजूनही तशीच आहे. तसचं आमच्या व्हाट्सएप समुहामधील  एक सदस्या श्रुती आंबेकर ह्या तर विदेशात राहून आवडीने मनापासून रुग्णसेवा करतात ह्याच खूप कौतुक वाटतं. आज ही आठवण यायला आजचा दिवस खूप खास.

एखादी आपत्ती, संकट ह्यांचा अनुभव आल्यानंतर त्यातील गांभीर्य हे कळायला लागतं

तमाम जगाला हा अनुभव कोविड च्या येऊन गेलेल्या जीवघेण्या लाटेने दिला . ह्या अनुभवा नंतर मात्र जवळपास प्रत्येकाला “सर सलामत तो पगडी पचास”ह्या म्हणीवर विश्वास बसायला भाग पाडले. ह्या आणिबाणीच्या काळात महत्त्वाचे, विश्वासाचे जिव्हाळ्याचे तसेच  आजार,दवाखाने, रुग्ण ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.

12 मे .   “जागतिक परिचर्या दिन”. आज आपण ह्या दिनाच्या निमीत्ताने “जगाची सुश्रुषा”हे घोषवाक्य सत्यात उतरविणा-या सर्व परिचारीकांचे मनापासून धन्यवाद. खरतरं त्या करीत असलेल्या सेवेसाठी धन्यवाद हा शब्दच मुळी खूप तोकडा आहे.

असं म्हंटलं जातं सेवा करणं ह्या मागे बरेच वेळा स्वार्थ दडलेला असतो परंतू सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की कोरोना काळात सुद्धा अमरावती ला सरकारी दवाखान्यात आणि अनेक कोवीड आयसोलेशन सेंटर मध्ये ह्या परिचारीकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वृद्धांची, रुग्णांची निस्वार्थ भावनेने मनापासून सेवा केली. नुसतेच औषधोपचार न करता रुग्णांना तुम्ही नक्की बरे होऊन घरी जाणार हे मनावर ठसवितं भक्कम मानसिक आधार पण दिला. विशेष म्हणजे हा चांगुलपणाचा परिचारीकांचा अनुभव एकट्यादुकट्याचा नसून अनेकांनी अनुभवला आहे. खरोखरच आपले ब्रीदवाक्य आचरणात आणून जगणाऱ्या ह्या परिचारीकांना मानाचा मुजरा.

नाइटिंगेल ह्यांचे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आढळणार नाही. ह्या परिचारिका, लेखिका,संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 मध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केला.त्यांनी शरीरासोबतच त्यांच्या मनावरील जखमा भरून काढल्या.त्यांना लेडी विथ दी लँप ही उपाधी मिळाली.त्यांचा जन्मदिवस 12 मे हा त्यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केल्या जातो.

आजच्या दिनी कौशल्यवान,सेवाव्रती, प्रेमळ, सामाजिक कार्यात भाग घेणारी,आणि रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारी परिचारिका अरुणा शानबाग हीचेही हटकून स्मरण होतचं.

आजच्या ह्या दिनी परिचारिका नाइटिंगेल व अरुणा शानबाग ह्यांना अभिवादन करुन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसलं की मन असे स्वैर पणे फिरत असते! सध्या बाहेर फिरणे कमी झाले आहे,पण या बाल्कनीतल्या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येते! दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीनंतर येणारी संध्याकाळची वार्याची झुळुक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते!थंडी किंवा पावसाळ्यात या झुळुकेचे तितके महत्त्व नाही,

पण उन्हाळ्यात ही झुळुक खूपच छान वाटते. दु:खानंतर येणारं सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!सतत सुखाच्या झुल्यावर झुलणार्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्या नंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला आनंद देतात आणि गार वार्याच्या झुळुकीचा आनंद देतात!

हीच झुळुक कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही, पण दुसऱ्या कुणाकडून तरी,अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र मैत्रिणींकडून मिळते.

तो प्रेमाचा सुखद ओलावा त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळुक असते.

कधीं कधीं साध्या साध्या गोष्टीतून ही आपण आनंद घेतो.

गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते तेव्हा खिडकीतून येणारी वार्याची झुळुक आपल्याला ‘हुश्श् ‘ करायला लावते! कधीं अशी झुळुक एखाद्या बातमी तून मिळते! अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळूक च असते. माणसाचे आयुष्य सतत बदलते असते. कधी एका पाठोपाठ एक इतकी संकटे येतात की या सर्वाला कसे तोंड द्यावे कळत नाही, पण अशावेळी अचानक पणे एखादी चांगली गोष्ट घडते की त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते.

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवर्या चा अॅक्सिडेंट झाला. जीव बचावला, पण हाॅस्पिटलमध्ये दोन महिने पडून रहावे लागले. दोन लहान मुलं होती तिला, नवर्याचा व्यवसाय बंद पडलेला,रहायला घर होते, पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरी चा काॅल आला,ट्रेनिंगसाठी एक महिना जावं लागणार होतं,मुलांना कुणाजवळ तरी सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली. नोकरी कायम स्वरुपी झाली. आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळवार्यात झाडं, घरं, माणसं सारीच कोलमडतात. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात

असतेच असे नाही, पण झुळुक ही सौम्य असते. ती मनाला शांति देते.

लहानपणी अशी झुळुक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा,आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळुकीसारखा वाटायचा. रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकंफुलकं पीस व्हायचं आणि वार्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळुक अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या रूपात ही ‘झुळुक’ आपल्या ला साथ देते. कधी कधी

आपण संकटाच्या कल्पनेनेही टेंशन घेतो. प्रत्यक्ष संकट रहातं दूर, पण आपलं मन मात्र जड झालेले असते. अचानक कुणीतरी सहाय्य करतं,संकट जाते आणि एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात आपण कठीण काळातून जात होतो. मन साशंक झाले होते., अस्थिर होते.

जीविताची काळजी तर होतीच, पण भविष्याची होती. अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देताना लोक अगदी हवालदिल झाले होते. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! रोजच्या बातम्या आपल्या ला आशा – निराशेवर झुलवत होत्या. लवकरच हे ‘कोरोना’ चे संकट दूर होईल असं ऐकलं की समाधानाची झुळुक येत होती तर पुढील दहा दिवस धोकादायक आहेत ऐकलं की मनात ्वादळ उठतं होतं!आता हे रोगाचं उच्चाटन हळूहळू होत जाईल ही आशा आपल्या मनी होती. निसर्गाने हिरावून घेतलेलं आपलं स्वातंत्र्य परत मिळवून आपण जर जाणीवपूर्वक वापरले तरंच आपल्याला ही सुखाची झुळूक मिळणार! याची जाणीव माणसाला होत होती.

संध्याकाळी येणारी वाऱ्याची झुळूक ही अशीच सौम्य,आनंद देणारी आहे. तिच्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यांचे थैमान नसते. ती हळूहळू अंगात भिनते. तिचा आस्वाद घेता आला पाहिजे.

कोरोनाचे वादळ घोंघावत होतं ते हळूहळू शांत होत गेले. लोकांनी संयमाने आणि धीराने तोंड दिले.

अशावेळी कुठून तरी आशादायी स्वर येतात, ‘दिस येतील, दिस जातील. . . गाण्याचे! हे संकटाचे वादळ जाऊन झुळुक येईल आशेची, आनंदाची!

वादळ जेव्हा परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधी तरी ते लयाला जाणारच असते!

ते वादळ जाऊन शांत झुळूक येईल या आशेवर प्रत्येक भारतीय आलेल्या वादळाला धीराने,संयमाने तोंड देऊन त्या शीतल झुळुकीचे सर्वांत करण्यास तयार होता! सुदैवाने त्या कोरोनाच्या वादळाला आपण धैर्याने तोंड दिले आणि ती जीवनातील शीतल झुळूक अनुभवता आली हे आपले भाग्यच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मातृदिनानिमित्त स्व आईस पत्र… ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

?विविधा ?

☆ मातृदिनानिमित्त स्व आईस पत्र… ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

ति. आई

तुझ्या त्या…. चतु:आयामी ते अनंतआयामी.. दिक्कालातीत अनादी अनंताच्या अतर्क्य, प्रवासाला निघून आज ऐहिक काल गणनेनुसार सहा वर्षे लोटली. एकेका ऐहिक क्षणाला तुम्हा दोघांच्या श्रीमंत स्मृतीची भिजलेली  झालर असते. बाबा गेले तेंव्हा कदाचित दु:खाची तीव्रता तुझ्यामुळे तेवढी जाणवली नाही. तूच ते दु:ख स्वतः च्या खांद्यावर उचलून आम्हा भावंडांना जाणवू दिले नाही. पण आता तुझी उणीव ही एक निर्वात पोकळीच आहे.

आजही तुझा आम्हाला आभास होतो. मला तर असे अनेक वेळा वाटते की, कुठून तरी गाण्याची ती लकेर ऐकायला येईल! ” तू जहा,जहा चलेगा मेरा साया साथ होगा…”  आणि खरंच सांगतो मी थोडा आश्वस्त होतो. ” तू कभी उदास होगा तो उदास होंगी मै भी..  नजर आवू या ना आऊ…  ” ही ओळ स्मरताच मी आतून ओलाचिंब होतो…. पापण्यांना अश्रूंचा भार सोसवत नाही…

वाटतं कुठून तरी अवचित  ” मिलू… मुकुंदा… मुचकुंदा.. म्हणून लाडिक हाक ऐकू येईल.. पण आभासी विश्व आणि व्यावहारिक विश्व ह्यात महत अंतर आहे नाही ? इहलोकातील क्षणभंगूर   वास्तव्य हा मानवी जीवनाचा पूर्णविराम म्हणायचा कि अर्धविराम ? हाच संभ्रम मला पडतो. तुझ्या स्मृतिदिनी अनेक अनादी प्रश्नांची पुनःपुन्हा उजळणी होते. जीवन म्हणजे काय ?  मृत्यूची आवश्यकता काय ? जीवनाची सार्थकता कशात ? इत्यादी सर्व अनुत्तरीत प्रश्न सभोवताल फेर धरून नाचतात.

आई…  जाणिवेच्या पल्याड,  त्या ज्ञात अज्ञाताच्या प्रदेशात…  तुझ्या त्या अनंताच्या अनाकलनीय गूढ प्रवासात सुख, दुःख असतात कां  गं ?  स्मृती तरी ? 

तुला स्मृती असो, नसो ! इहलोकात तुझ्या स्मृती ठायी ठायी आहेत.

ठेच लागली तरी, भिती वाटली तरी, विस्मय वाटला तरीही.. आई गं.. म्हणून आपसूकच उदगार बाहेर पडतो. आई , शिक्षणासाठी माय लेक एकाच कॉलेज मध्ये एकत्र जाण्याची उदाहरणे दुर्मिळच! पण ते उदाहरण बाबांच्या प्रेरणेने तु प्रस्तुत केले. ती तुझी ज्ञानपिपासा ! तुझे ते संस्कृत, मराठी, इंग्रजीवरील प्रभुत्व ! शब्दोच्चाराचे महत्व !! प्रसंगा प्रसंगावर समयोचित संस्कृत श्लोक उद्धृत करणारी प्रतिभा .. प्रेरक उदाहरणे, उद्बोधक प्रसंग आजही स्तिमित करून जातात..

त्या काळी.. संसार सांभाळून मराठीत एमए करणे.. हे एक  समाजापुढे आदर्श असे उदाहरणच  होते. आणिबाणीतील ति.बाबांच्या अटके विरूद्ध  केन्द्र सरकारला ऐतिहासिक  न्यायालयीन लढा देत नमवणे… एका नृशंस उन्मत्त मदांध पाशवी राजसत्तेला झुकवणे… कुठून आणलेस गं इतके धाडस ? इतके बळ..? कुठून आले हे सामर्थ्य?  एक कुटुंब वत्सल स्त्री ते उन्मत्त राजसत्तेच्या कराल दाढेतून बाबांना सोडविणारी सावित्री हा प्रवास कसा तू साधला ?

मला आजही आठवून अस्वस्थ व्हायला होतं.. तू असतीस तर मला सांगूच दिले नसतेस. पण बाबा जेंव्हा मिसा ( म्हणे मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी अॅमक्ट ) अंतर्गत तुरूंगात नुकतेच गेलेले असतांना आपल्या घराच्या बाहेर रस्त्यावर अश्लाघ्य शब्दांत गलिच्छ लिहिलेले मी पहाटे पहाटे तुला तुझ्या हातांनी पुसतांना बघितले … माझ्या अंगाची तर लाही लाही होत होती. पण  ” दे डोन्ट नो व्हॉट दे आर डुईंग ” असे म्हणत आपल्या क्षमाशील, उदार अंतःकरणाचा परिचय दिलास… अविश्वसनीय वाटतं सगळं. युद्धस्थ कथा रम्य..! ह्या उक्तीप्रमाणे हे सर्व स्मरतांना आज रोमांचक वाटतं … नाही ?

आई ! मध्यंतरी आपली कामठीची वास्तू बघायला जाण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकलो नाही. पण आज तिथे तर फक्त श्रीमंत आठवणी आणि श्रीमंत वास्तूचे उदास भौतिकीय भग्नावशेषच उरलेत बघ. जेथे विद्यार्थ्यांचा एकेकाळी वावर होता … तेथे श्वापद ? मन अतिशय विदीर्ण आणि विषण्ण करणारा अनुभव होता तो !

आई ! तुझे ते प्रेयस आणि श्रेयस मधील फरक सांगणारे संस्काराचे तरल बंध आम्हाला अजूनही जखडून ठेवताहेत.. तसे ते दुर्दैवाने अव्यावहारिकच असतात. आज तुझ्या आणि ति. बाबांच्या संस्काराच्या श्रीमंत शिदोरीवर आम्हा सर्वांची ऐहिक दृष्ट्या यशस्वी वाटचाल सुरू आहे.

बाबांनी केलेले रेषांचे संस्कार, तू केलेले स्वरांचे, सुरांचे, शब्दांचे, सर्जनशील अक्षर संस्कार आज उपयोगी पडताहेत. शालेय निबंध लिहितांना तू केलेल्या तुझ्या सुचना आजही लिखाण करतांना उपयोगी पडतात. आज कलेच्या विस्तीर्ण प्रांगणात मी पदार्पण केलेले आहे. आई समाजाने तू केलेल्या सृजन संस्काराची माझ्या निमित्ताने का होईना पुरेशी दखल घेतलेली आहे. माझ्यावर पुरस्कारांची, सन्मानांची अक्षरशः लयलूट होत आहे. सन्मान स्विकारतांना, मी किती निमित्तमात्र आहे हे मनोमन  जाणवत राहतं.

पण  फक्त हे सर्व बघायला तू हवी होतीस.  बाबा असायला हवे होते.

 तुला ठावूक आहे ?तुमचे केवळ अस्तित्व सुद्धा आम्हा सर्वांनाच नव्हे तर शेकडो विद्यार्थ्यांना  उर्जादायी असेच होते.

आमच्या असंख्य चुका तुम्ही माफ केल्यात. आम्ही काही मागावे असे काहिच नाही.. पण तुम्ही दोघांनी थोडी घाई नसती केली तर..? मरण कल्पनेशी थांबे तर्क मानवाचा.. पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा….

तुला प्राध्यापक ग्रेस ( प्रा. माणिक गोडघाटे ) तू मराठीत एमए करतांना, नागपूरला मॉरिस कॉलेज मध्ये शिकवीत होते. त्या ग्रेसनी, ” ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..” ही कविता माझ्यासारख्या मातृवियोगींसाठीच लिहिली असावी.

तुझ्या मांडीवर डोके ठेऊन, तुझी खरखरीत बोटे जेंव्हा माझ्या केसांतून फिरताना जो रेशमी स्पर्श होत असे तो आता पुन्हा होणे नाही. असह्य आहे हे सारे ! एक मात्र खरंच की तू गेलीस आणि आमचे शैशव, बाल्य संपले.. आम्ही पोरके झालो.

आज खरोखरच मन पिळवटून  मातृभाव मनातून दाटून येतोय.. कृतज्ञता आहेच..  साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करण्याखेरीज माझ्यासारखा मर्त्य मानव आणखी काय करू शकतो ?

तुझाच…

मिलू, मुकुंदा ..मुचकुंदा

© श्री मिलिंद रथकंठीवार

रेखाचित्रकार, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मातृदिनानिमित्त – लेकीस पत्र ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

?  विविधा ?

☆ मातृदिनानिमित्त – लेकीस पत्र ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

प्रिय सौ.अंजूस..

शुभ आशिर्वाद.

आज जागतिक मातृदिन…

तूं आई झालीस तो क्षणं आमच्या आयुष्यातील खूप सुंदर क्षणं होता.

आनंदाची फुलं ओंजळीत घ्यावा असाच.आतां तूं दोन मुलांची-सुप्रिया, निरंतरची आई आहेस. अन् सूनेचीही म्हणजे सौ.गायत्रीची.. तुझं आईपण तूं छान अनुभवतेस अन् निभावतेसही…! ते पाहून माझी ओटी भरुन गेलीय. यापेक्षा आतां मला काय हवं..

तुझ्या आईपणाचा अभिमान वाटतो.

खरंतर आतां आपलं नात॔ नकळत बदलत चाललय– आयुष्याच्या यावळणावर..!  माय-लेकी तर आहोतच आपण. तुझ्या उमलत्या वयात छान मैत्रीणी झालो होतो. आतां या नात्यात भूमिकांची अदलाबदल होत असते कधी-कधी…! तूं माझी आई अन् मी तुझी लेक…

ही भूमिकाही तूं छानच पेलतेस 😢

मायेइतकचं दटावतेसही.

आवडते ही तुझी-माझी बदलती भूमिका मला..!👍

या तुझ्यातील आईला-आईपणाला मनापासून खूप सुंदर शुभेच्छा.🌹

 – तुझीच आई..

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 67 – उत्तरार्ध – स्वामी विवेकानंद, एक महान यात्रिक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 67 – उत्तरार्ध – स्वामी विवेकानंद, एक महान यात्रिक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

रामकृष्ण मिशन चे काम सुरू झाले. स्वामीजिंचा प्रवास, भेटीगाठी, काम वाढवण्याच्या दृष्टीने सुरूच होता. भारतात भारतीय शिष्य आणि परदेशी शिष्य काम करत होतेच. पण परदेशातील शिष्य यांच्याशी पण पत्रव्यवहाराने संपर्क होत होता. सतत मार्गदर्शन चालू होते, काश्मीर, पंजाब, खेतडी, नैनिताल, कलकत्ता, आल्मोरा, अमरनाथ, मायावती, पूर्व बंगाल असं सगळीकडे संचार झाला. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा दीड वर्षे ते पाश्चात्य देशांचा प्रवास करून परतले. बेलूर मठात पोहोचल्यावर मन प्रसन्न झाले. एक दिवस विश्रांती झाल्यानंतर एकेक वृत्तान्त कळू लागला. आपल्या कार्यासाठी ज्यांनी स्वतच्या देशाचा त्याग केला आणी आपल्या हिमालयासारख्या दुर्गम भागात राहून मोठ्या कष्टाने अद्वैत आश्रम उभा केला. आपले एक स्वप्न साकार केले ते सेव्हियर पती पत्नीने. त्यातले स्वत: सेव्हियर कार्य करता करताच निधन पावले, तर गुडविन आधीच गेले होते. या दोन इंग्रज शिष्यांनी भारतमातेच्या चरणी आपली जीवनपुष्पे वाहिली, याचे स्वामीजींना दु:ख झाले. मिसेस सेव्हियर मायावतीला होत्या, त्यांचे ताबडतोब सांत्वन करायला गेले पहिजे आणि तशी तार त्यांनी मिसेस सेव्हियर यांना केली. प्रकृती ठीक नसतानाही स्वामीजी प्रतिकूल हवामान व परिस्थितीत ,गैरसोयीचा प्रवास असतानाही ते शिष्यांबरोबर गेले.   

मदतीशिवाय त्यांना चालणेही कठीण झाले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,  त्यावर बरोबर असलेल्या  विरजानंदाना ते म्हणाले, “पहा मी किती दुबळा आहे जणू वृद्ध होऊन गेलो आहे. हे एव्हढेसे चालायचे आहे तेही मला बिकट वाटते आहे, पूर्वी पर्वत प्रदेशात २५- २५ मैल चालायलाही काही वाटायचे नाही. माझ्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे हेच खरं”. ते ऐकून विरजानंद मनातून हादरून गेले. मिसेस सेव्हियरना भेटणे आपले कर्तव्य आहे म्हणून हा खडतर प्रवास ते करत होते.मिसेस सेव्हियर ने आपले दु:ख बाजूला ठेऊन स्वामीजींचे स्वागत केले. पतीच्या निधनाचे दु:ख मोठे असतानाही आपण घेतलेले व्रत चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले, मायावतीला स्वामीजी पंधरा दिवस राहिले. सेव्हियर पती पत्नी ने  इथे अद्वैत आश्रमाचे काम मार्गी लावले होते. इथल्या वास्तव्यात अनेकजण स्वामीजींना भेटायला येऊन गेले. मायावती हून स्वामीजी कलकत्त्याला निघाले, बेलूर मठात आल्यावर आणखी एक धक्कादायक वृत्त समजले ते म्हणजे खेतडीचे राजा अजित सिंग यांचे अपघाती निधन झाले. या अकस्मात दुर्घटनेमुळे स्वामीजीना मोठा धक्का बसला. राजा अजित सिंग हा त्यांचा मोठा आधार होता.

बेलूरला आल्यावर मठाच्या व्यवस्थेतील काही कायदेशीर पूर्तता आणि विश्वस्त मंडळ करून घेतले. ब्रह्मानंद ,शिवानंद, प्रेमानंद, सारदानंद, अखंडानंद, त्रिगुणातीतानंद, रामकृष्णानंद, अद्वैतानंद, सुबोधानंद, अभेदानंद, आणि तुरियानंद यांचे विश्वस्त मंडळ करून त्यांच्यावर कारभार सोपवला, यात त्यांनी एकही पाश्चात्य शिष्य घेतला नाही, ते दुरदृष्टीने कायदेशीर गुंतागुंत होऊ नये म्हणून. ६ फेब्रुवारीला रीतसर नोंदणी करण्यात आली. विवेकानंदांनी कोणतेही अधिकार पद स्वीकारले नाही. स्वत:च्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघाचे काम आले. भारताच्या इतिहासात एक नवे पान उघडले गेले होते, स्वामीजींनि पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. फेब्रुवारीत रामकृष्ण परमहंस यांचं जन्मदिन बेलूर मठात साजरा झाला तेंव्हाही स्वामीजीना खूप समाधान वाटले.

त्यानानंतर त्यांनी पूर्व बंगालचा प्रवास आखला आणि आई भुवनेश्वरी देविंची इच्छा पण पूर्ण करावी असे मनात होते. बंगालच्या या सुपुत्राने एकदा तरी आपल्या गावात यावे अशी तिथल्या लोकांची इच्छा होती. चंद्रनाथ आणि कामाख्यादेवी ही  तीर्थ क्षेत्रे भुवनेश्वरी देविंच्यासह स्वामिजिनी केली आणि आईसाठी काही केल्याचे समाधान त्यांना होते. या यात्रेत तिथल्या भेटी, स्वागत, आपल्या मुलाबद्दल लोकांचे प्रेम आणि आदर पाहून भुवनेश्वरी देविंना मनोमन समाधान वाटले. हाच तो आपला लहान बिले ना ? असे नक्की वाटले असेल.

पूर्व बंगाल आणि आसामचा हा प्रवास दोन महिन्यांचा झाला आणि स्वामीजींची प्रकृती आणखीनच ढासळली ,विश्रांती नाही, सतत कामाचा ताण यामुळे दम्याचा त्रास आणखीन बळावला .आपलं अखेरचा क्षण जवळ आला की के अशी शंका स्वामीजींच्या मनात डोकावली. प्रवासात ते अनेकांना पत्र लिहीत असत. अधून मधून जरा बारे वाटले की लगेच उत्साहाने पुढचे नियोजन करीत. एकदा त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती भेटले तेंव्हा त्यांनी सहज प्रकृती बद्दल विचारले, तर स्वामीजी म्हणाले, “ अरे बाबा आता प्रकृतीची चौकशी कशाला करायची? प्रत्येक दिवशी शरीराचा व्यापार बिघडत चालला आहे. जे काही आयुष्याचे थोडे दिवस आता राहिले आहेत ते मी तुम्हा सर्वांसाठी काहीना काही करण्यात घालवेन आणि असा कार्यमग्न असतानाच एके दिवशी या जगाचा निरोप घेईन”.

दुर्गापूजा उत्सव बंगाल मधला महत्वाचा उत्सव, आता स्थिरावलेल्या बेलूर मठात दुर्गा पूजा व्हावी असे सगळ्यांच्याच मनात आले. स्वामीजींच्या अंगात बराच ताप होता. श्री दुर्गा प्रतिष्ठापना झाली होती. अष्टमीला मुख्य पूजेला स्वामीजी कसेबसे आले. नवमीला थोडे बरे वाटले तेंव्हा देवीसमोर त्यांनी काही भजने म्हटली. श्रीरामकृष्ण यांची आवडती भजने त्यांनी गायली. हे पाहून भुवनेश्वरी देवींना बरे वाटले. बरोबर केलेल्या  तीर्थयात्रेपासूनच त्यांना माहिती होते की आपल्या मुलाची प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्याला भेटायला त्या मधून मधून मठात येत असत. आल्यावर बाहेरूनच ‘बिले..’ अशी हाक मारत आणि विश्वविख्यात बिले, संन्यासीपुत्र नरेन आईची हाक आल्यावर भरभर खाली येइ. दोघांच्या गप्पा होत. मग त्या परत जात.  

एकदा नरेंद्र लहान असताना आजारी पडला, तेंव्हा तो बरा व्हावा म्हणून बोललेला देवीचा नवस आपल्याकडून पूर्ण करायचा राहिला हे अनेक वर्षानी लक्षात आले. तेंव्हा आता कालीमातेला जाऊन, विशेष पूजा करून मुलाला तुझ्यासमोर लोळण घ्यायला सांगेन असा तो, आता पूर्ण करायला हवा. आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून विवेकानंद बरे नसतानाही गंगेत स्नान करून कालिघाटावर ओल्या वस्त्रानिशी मंदिरात गेले. पूजा केली, तीन वेळा  लोळण घेतली, गाभाऱ्याला सात प्रदक्षिणा घातल्या. विधिपूर्वक होम हवन केले. आईला खूप समाधान झाले आणि इतक्या वर्षानी नवस पूर्ण झाल्याचा आनंद पण.

साधारण २८ जून चा दिवस, शुद्धानंदाना विवेकानंद यांनी पंचांग घेऊन बोलावले आणि ते चालून तिथी पाहून ठेऊन घेतले. नंतर ची ४,५, दिवस रोज ते पंचांग चालायचे आणि स्वतशीच काही विचार करायचे ,बाकी सर्व रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. १ जुलैला विवेकानंद, मठाच्या बाहेर हिरवळीवर फेऱ्या मारत होते. त्यावेळी प्रेमानंदाना एका  जागेकडे बोट दाखवून म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणी माझे दहन करा”. अंत्यसंस्काराचा एव्हढा स्पष्ट उल्लेख केलेला कोणाच्याच लक्षात आला नाही.

२ जुलै बुधवार – एकादशी, विवेकानंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला होता. त्या दिवशी भगिनी निवेदिता बेलूर मठात स्वामीजींना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासाठी काही पदार्थ विवेकानंदांनी मागवले, हात धुण्यासाठी निवेदिता उठल्या तेंव्हा स्वामीजींनी त्यांच्या हातावर स्वत पाणी घातले, एक पणचं घेऊन हात पुसले. हे पाहून निवेदिता खजील झाल्या. त्या म्हणाल्या स्वामीजी हे मी तुमच्यासाठी करायचे तर तुम्हीच..? स्वामीजी म्हणाले,  का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायांवर पाणी घातले होते ना? . पण ती त्यांची अखेरची वेळ होती असे निवेदिता म्हणणार पण आवंढा गिळला. कदाचित ही शेवटची वेळ..?ही खरचच दोघांची अखेरची भेट ठरली .

४ जुलैचा दिवस उजाडला. शुक्रवार, नेहमीपेक्षा स्वामीजी लवकर उठले. ध्यानसाठी देवघरात गेले. दारे खिडक्या बंद केल्या. तीन तास एकटे खोलीत होते. त्यानंतर दार उघडून बाहेर येताना कालिमातेचे गीत गुणगुणत बाहेर आले.श्री रामकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर बसून इतका वेळ ध्यान मग्न झालेले विवेकानंद स्वतच्याच नादात मुग्ध असे बाहेर येऊन फेऱ्या मारू लागले ,इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. सकाळी पण अतिशय प्रसन्नपणे हसत खेळत सर्वांच्या बरोबर अल्पोपहार घेतला होता . आणि आज आपल्याला उत्साह वाटतोय असेही म्हणाले होते. दुपारच्या जेवणानंतर तीन तास संस्कृत व्याकरणाचा वर्ग त्यांनी घेतला. दुपारनंतर प्रेमानंदांच्या बरोबर बेलूर मध्ये तीन किलोमीटर लांब पर्यन्त फेरफटका मारून आले.आल्यावर संन्यासांशी गप्पा झाल्या.

आल्यावर खोलीत जाऊन आपली जपमाळ मागवून घेतली, तासभर जप झाला. मग अंथरुणावर आडवे झाले उकडते आहे म्हणून थोडा वारा घालण्यास शिष्याला सांगितले.थोडे तळपाय चोळले तर बरे वाटेल म्हणून तेही शिष्याने चोळले. डाव्या कुशीवर वळलेले, हातात जपमाळ तशीच, पाठोपाठ दोन वेळ दीर्घ श्वास घेतला. नंतर काही हालचाल नाही. न्यू वाजले होते, जेवणाची घंटा वाजली होती. जवळचा शिष्य घाबरत घाबरत खाली आला. प्रेमानंद आणि निश्चयानंद वर धावत आले. रामकृष्ण यांचे नाव घेतले तर ही दीर्घ समाधी उतरेल स्वामीजींची असे वाटले पण नाही, डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावले गेले. मध्यरात्री पर्यन्त बरेच प्रयत्न केले. प्राणज्योत मालवली आहे हे डॉक्टरांचे शब्द ऐकून सारा बेलूर मठच दु:खाच्या छायेत गेला.

स्वामीजींचे वय यावेळी ३९ वर्ष, ५ महीने, आणि २४ दिवस इतके होते. सगळीकडे वाऱ्या सारखी बातमी गेली. भारतात, परदेशात तारा  गेल्या. बेलूर मठाकडे चारी दिशांनी दर्शनासाठी लोंढे येऊ लागले. भुवनेश्वरी देवी पण आल्या. त्यांचा अवखळ बिले अवखळपणेच साऱ्या जगात फिरून येऊन आता शांतपणे पहुडला होता. भले जगासाठी तो कीर्तीवंत असला, तरी या जन्मदात्रीचा तो पुत्र होता. पुत्रवियोगाने तिच्या हृदयाला किती घरे पडले असतील? शब्दच नाहीत.   

बिल्व वृक्षाची जागा प्रेमानंदाना विवेकानंद यांनी ४,५ दिवसांपूर्वीच दाखवली होती. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान, असामान्य, अलौकिक सुपुत्राची ही जीवनयात्रा.

 – मालिका समाप्त –

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शततंत्रवीणेचा सम्राट ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

?विविधा ?

☆ शततंत्रवीणेचा सम्राट ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

असे म्हणतात, कि संतूर हे वाद्य इराण आणि मेसोपोटेमिया या भूभागात विकसित झाले. परंतु जेंव्हा संतूर या शब्दाचा वेध घेतलाअसता, असे दिसून येते कि संतूर हा शब्द भारतीय लोकसंगीतात शततंत्रीवीणा या नावाने प्रचलित होता आणि अपभ्रंशाने त्याचे नाव संतूर म्हणून रूढ झाले.

अक्रोडाच्या झाडापासून तयार केलेले हे संगीत वाद्य सर्व साधारणपणे  समलंब चौकोनी आकाराचे असते.  या वाद्याची ओळख वैश्विक स्तरावर नेण्याचे श्रेय हे नि:संशय पंडित शिवकुमार शर्मा यांचेकडे जाते. पंडितजींची जन्मभूमी जम्मू काश्मीर आहे.. पण कर्मभूमी सारे विश्व आहे. आज त्यांची इहलोकाची यात्रा पुरी झाली. शिवकुमार शर्मा यांचे जसे संतूर वर प्रभुत्व आहे तसेच तबल्यावर देखील प्रभुत्व होते.

भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी त्यांचे पिताश्री यांचेकडून गिरवले आणि शिवकुमार यांनी त्यांचे, गॉड गिफ्ट असलेले चिरंजीव राहुल यांना, तो वारसा प्रदान केला. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी काही फार मोठा जाणकार नाही.. परंतु सिलसिला या चित्रपटातील गाणी आणि संगीत यांची भुरळ मला जी पडली, ती अमीट अशीच आहे. सिनेमातील सर्वच गाणी आगळी वेगळीच होती, त्यांना एक नवाच गंध होता. तेंव्हापासून सुरु झालेला हा सिलसिला रसिकांच्या मनात असाच आजन्म राहील हे निश्चित.

पंडित शिव ( कुमार शर्मा ) आणि हरी (प्रसाद चौरासिया ) या व्दयीला सिलसिला चित्रपटाने सिने संगीतकार म्हणून एक स्वतंत्र, विशेष असे स्थान, रसिकांच्या मनात मिळाले. तसे सिने संगीतकार म्हणून त्यांनी फार सिनेमांना संगीत दिले, अश्यातला भाग नाही. परंतु वरील सिनेमे वगळता व्ही शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटात एका प्रसंगासाठी देखील त्यांनी पार्श्वसंगीत दिलेले होते.

शिवकुमार शर्मा , हरिप्रसादजी चौरासिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांचे सह “कॉल ऑफ द व्हॅली” नामक अल्बम केला. त्याने शास्त्रीय संगीत विश्वात त्यांचे स्थान अढळ झाले. तत्पश्चात “व्हेन टाइम स्टुड स्टील”, “हिप्नॉटिक संतूर”, “ए सब्लाईम ट्रान्स”, “द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्ज”, “द फ्लो ऑफ टाइम” “द इनर पाथ” इत्यादी रसिकाला शाश्वतअनुभूती प्रदान करणारे, शुद्ध हिंदुस्थानी अल्बम रसिकांच्या भेटीला आले आणि पसंतीला उतरले. भारत सरकारने, त्यांच्या ह्या प्रतिभेची नोंद घेत राष्ट्रीय नागरी पुरस्कारांच्या क्रमवारीतील द्वितीय अर्थात पद्मविभूषण आणि चतुर्थ अर्थात पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव देखील केला.

अश्या यशस्वी विश्वमान्य संगीतकाराची भेट घेणे हे अशक्यप्राय होते. त्यांच्या पुणे भेटीचा कार्यक्रम असल्याचे कळताच मी पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क साधून त्यांची भेट निश्चित केली. पद्मश्री विजय घाटे यांचे देखील मी रेखाचित्र काढून त्यांची स्वाक्षरी मिळवली होती, तेंव्हापासून त्यांचा वरदहस्त मला सतत लाभत आहे.

एक मोठ्ठा कार्यक्रम, पुण्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केलेला होता. रसिकांच्या प्रचंड गर्दीत त्यांची भेट घेणे अशक्यच होते. मी आणि माझा मित्र सुनील दामले आम्ही दोघे कार्यक्रमाच्या स्थानी दाखल झालो. पोलिसांची एखाद दुसरी बाचाबाची वगळता आम्ही सुखरूप त्या अतिथी कक्षाच्या बाहेर पोहोचलो. पण तेथून सन्माननीय पद्मश्री विजय घाटे यांचेशी संपर्क होईना. थोड्या प्रतिक्षे पश्चात खुद्द पदमश्री विजय घाटेंचा निरोप आला तेंव्हा मात्र आमचा जीव जणू भांड्यातच पडला आणि आम्हाला कॅमेरा आणि रेखाचित्रासह आत जाण्याची अनुमती मिळाली. आम्ही अत्यंत विजयी चर्येने अतिथींच्या कक्षात पोहोचलो. मी दबकत दबकत, अंग चोरून एका कोपऱ्यात उभा होता. शिवकुमारजींनी मला त्यांचे शेजारी बसण्याची अनुमती खुणेने दिली… मी बिचकत बिचकत त्यांचे शेजारी बसलो. माननीय विजय घाटेंनी माझा परिचय एक आर्टिस्ट म्हणून करून दिला. एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पद्मश्रीने विभूषित असलेल्या कलाकाराने, माझा परिचय दुसऱ्या पदमश्री पदमविभूषण इत्यादी सन्मानाने विभूषित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला करून दिला हे माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद होते. मला ह्या प्रथितयश कलाकारांच्या सोबतीला बसण्याचे सद्भाग्य लाभले, हे अभिमानास्पदच होते.

पंडितजींचे व्यक्तिमत्व अत्यन्त लोभस असे होते.. काश्मिरी सौंदर्य, चकचकीत त्वचा, मार्दव स्वर, सभ्य, सुसंस्कृत,  संभाषण मला अतिशय भावले. पंडितजींच्या प्रस्तुतीकरणाला थोडा अवकाश होता आणि त्यामुळे मला अपेक्षेपेक्षा अधिक अवधी मिळणार होता.

मी पुनश्च माझा त्रोटक परिचय करून दिला.. छंदासंबंधी सांगताच,

” बहोत खूब.. ” असे म्हणून माझी पाठ थोपटली.

” कुछ परेशानी तो नही हुई ना ? “ त्यांनी विचारले..

त्यावर मी नकार दिला..

” फोटोग्राफर तो बहोत आते है, लेकिन ऐसा मौका वीरलाही मिलता है.. “ पंडितजी उत्तरले. मी काढलेले पोर्ट्रेट त्यांनी उंचावून बघितले. त्यांना ते पोर्ट्रेट आवडले.

” मेरे बाल बनानेमे कोई दिक्कत तो नही आई ना ? “ त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसांवरून हात फिरवीत विचारले.

त्यांनी माझ्या वर्मावर जणू बोट ठेवले. खरेच शिवकुमार शर्माजी, झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम इत्यादींचा चेहेरा चितारणे तुलनात्मक दृष्ट्या एकवेळ सोप्पे पण त्यांची गुंतागुंतीची केश रचना पेन्सिलने रेखाटणे एक दिव्य मला वाटते.

” सर दिक्कत तो आई .. “ मी प्रांजळपणे बिचकत बिचकत म्हणालो.

त्यावर ते हसत म्हणाले, ” फिर भी आपकी कोशिश अच्छी रही… है ना घाटेजी ? “ त्यांनी माननीय विजय घाटे यांना उद्देशून विचारले. त्यांनी रेखाचित्रवर स्वाक्षरी केली.

त्यावर मी म्हटले,  “सर उनके बाल भी वैसे हि है.. “ यावर सगळे खो खो हसले. एवढी खेळीमेळीची भेट होईल हे मला कदापि वाटले नाही..

हि माणसे खरोखरच मोठी असतात, विनम्र असतात, पण बरेचदा चहापेक्षा किटली अधिक गरम असते असेही अनुभव येतात..

मी त्यांचे चरण स्पर्शिले.. आणि विजयी मुद्रेने बाहेर पडलो.

हा प्रसंग देखील माझ्या मनाच्या कप्प्यात कोरल्या गेला.. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना हा प्रसंग आठवून डोळे पाणावतात..

© श्री मिलिंद रथकंठीवार

रेखाचित्रकार, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही गीतांच्या रचना ह्या जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंगच बनल्यात. ह्या ऐकल्यावर स्फूर्ती, स्वाभिमान, देशप्रेम, निष्ठा, जागृत होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत, वंदेमातरम, ए मेरे वतन के लोगो, रंग दे बसंती, महाराष्ट्र गीत,मेरे देश की धरती आणि अशी कित्येक स्फुरणगीतं.

“वंदेमातरम” ह्या आपल्याला अतिशय पूज्य असणा-या गीताचे रचयीते बंकीमचंद्र ह्यांची जयंती नुकतीच  आठ मे ला झाली.त्यांना विनम्र अभिवादन.काही बाबी,काही घटना, काही प्रसंग तर काही गीतं ह्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान असतं.

आज अशी काही गीतं आठवलीत की आपण चटकन आदराने स्तब्ध उभे राहतो , काही गीतं ऐकली की स्फुरण चढतं. आजही “जन गण मन ” व “वंदेमातरम”गीत कानी पडले की आपली मान गर्वाने उंच होते.

१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं ” वंदेमातरम” हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

मुळात वंदे मातरम् हे गीत बंगाली व संस्कृत ह्या दोन भाषांच्या मदतीने फुललयं,तयार झालयं. ह्या दोन्ही भाषांचा सरसकट अभ्यास नसल्याने वा त्या नीट अवगत नसल्याने  काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.

वंदेमातरम गीताचा विषय निघाल्यावर एका छोट्या मुलाने त्यातील काही शब्दांचा अर्थ विचारल्याने मला स्वतःला देखील त्याचा नीट, अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेण्याची अनिवार ईच्छा झाली.

पहिल्यांदा ह्यातील सुरवातीच्या तीन चार ओळी म्हणजेच ध्रुवपद आणि नित्य गायल्या जणारे कडवे ,त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे,

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,

शस्यश्यामलाम्, मातरम्!

वंदे मातरम्!

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,

सुखदाम् वरदाम्, मातरम्!

वंदे मातरम्, वंदे मातरम्॥

 ह्या गीताचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे,

हे माते मी तुला मनोमन वंदन करते, पाणी म्हणजेच आपले जीवन,ह्या पाण्याने भरभरून ओसंडून वाहणारी, परिपूर्ण, फळांनी लदलदलेली,बहरलेली, पण त्याच बरोबर दक्षिणेकडील वा-याच्या झुळकांनी,लाटांनी शांत असणाऱ्या निरनिराळ्या पिकांनी समृद्ध  असलेल्या अश्या माझ्या मातेला,माझ्या भारतभू ला  मी प्रणाम करते.

शुभ्र धवल चमकत्या चांदण्यांमुळे बहरलेल्या ह्या पवित्र भूमीवरील रात्र ही  आल्हाददायक असते. फुलांच्या मदतीने फुललेली, वृक्षांच्या साथीने मढलेली, येथील ही आमची भूमाता ही खरोखरीच विलक्षण शोभून दिसते. म्हणूनच येथील पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी ची अनूभुती देणा-या ह्या  भूमातेला माझे वंदन, माझा  प्रणाम !

ह्या गीताचे रचयिते मा.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

बंकीमचंद्र ह्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण करून वंदेमातरम ह्या गीताने दिवसाची चांगली सुरवात करत जाऊया.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मध्यंतरी काँलनीत शेजारी एक नवीन बि-हाड आलं.अतिशय आटोपशीर, मोजकं सामान आलं.नेहमीच्या उत्सुकतेने आपल्या नेहमीच्या कुवतीनुसार मनात आलं अजून मागून बाकीचे सामान येणार असेल.पण नंतर कळलं त्या कुटुंबात मोजकं आणि आटोपशीर सामान आहे. कळल्यावर ,बघितल्यावर खूप जास्त कौतुक वाटलं,आणि थोडी स्वतःच्या हव्यास म्हणा सोस म्हणा त्याची लाजचं वाटली.

मग कुठे जरा डोळे उघडून माझी स्वतःची स्वारी आवरासावरीकडे वळली. भसाभसा कपाट उपसली. आधी नंबर लावला कपड्यांच्या कपाटाचा. ते साड्यांचं,ड्रेसेस चं कलेक्शन बघितल्यावर क्षणभरासाठी का होईना स्वतःची स्वतःलाच लाज वाटली. किती हव्यासासारखे जमवितो आपण. मनात आल जवळपास थ्रीफोर्थ आयुष्य निघून गेलं.उर्वरित आता जे काही दिवस असतील ते नोकरीतील निवृत्तीनंतर घरीच राहण्याचे. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा विनीयोग कसा करणार ?

त्याक्षणी प्रकर्षांने जाणवून गेलं प्रत्येक व्यक्तीने पसारा हा घालावा पण त्याचा त्याला आवरता येईल इतपतच घालावा. मनात आल हा पसारा मला आवडतोय म्हणून मी मांडून ठेवला हे खरयं पण हा पसारा आपल्यापश्चात घरच्यांना आवरतांना नाकी नऊ आणेल हे पण नक्की. म्हणजेच आपण दुस-याचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवतोयच की.

खरंच  ज्या माणसाला कुठेतरी थांबायचं, आवरत घ्यायचं,आटोपत़ घ्यायचं हे नीट वेळेवर उमगलं तो शहाणा,सुज्ञ माणूस समजावा. पूर्वी जी वानप्रस्थाश्रम नावाची संकल्पना होती ती किती यथार्थ होती नाही कां ?

जी गोष्ट कपड्यांची तीच वस्तु वा भांडी ह्यांचीपण. थोडक्यात काय तर प्रश्न हा किती संग्रह, साठवणूक करतो आणि तो संग्रह वा साठवणूक खरंच आपल्या पुढील पिढीसाठी फायद्याची वा आवश्यक असणार आहे ह्याचा पण आपल्याला  गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे.दिवसेंदिवस हा काळ धावपळीचा दगदगीचा येतोय तेव्हा जातांना तरी पुढील पिढीच्या समस्या वाढवून जाऊ नये ही मला प्रकर्षाने जाणीव झाली.

आता आपला हा पसारा आवरता घेऊन नवीन पिढीला त्यांच्या मनाने पसारा घालायला वाव द्यावा हा नवीन विचार ह्या वर्षात सुचला हा प्लसपाँईंटच म्हणावा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

 🌸 विविधा 🌸

☆  संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆ 

संत एकनाथांची गौळण : एक भावानुभव! 🙏🏻 

असा कसा देवाचा देव बाई ठकडा       

देव एका पायाने लंगडा!                         शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो           

करी दह्या दुधाचा रबडा!                        वाळवंटी जातो किर्तन करितो               

घेतो साधुसंतांसी झगडा!                        एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई             

देव एकनाथाचा बछडा!!

*****

मराठी भाषेचे पहिले संपादक संत म्हणजे…संत एकनाथ! भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत ; त्यांपैकी एक…भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ! मानवी जीवनातील उच्च मूल्यांची ओळख करून देणारे…एक उत्तम साधक, कथा-कथक, ज्ञान प्रसारक!एक उत्कृष्ट कीर्तनकार!!त्यांनी अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनवली. साधी सोपी सर्वांना समजेल अशी, निरूपणातील भाषेपेक्षा , प्रबोधन करणारी, सामान्यांना कळेल अशी भाषा वापरून  गौळण हा काव्यप्रकार समाज मनात रूढ केला रूजवला. सुंदर अशा काव्य वैभवाने नटलेला हा काव्यप्रकार श्रोत्यांची गानसमाधी लावणारा, भक्ती चे अमृतपान करविणारा ठरला. श्रोते तन्मयतेने डोलू लागले. अशाच एका प्रसिद्ध गौळणीचा आनंद लुटू यात…  शब्द वैभव, शब्द योजनेतली चतुराई, नादमाधुर्य आणि कानांत रुंजी घालत रहाणारे शब्द… या सगळ्याच शब्द गुंफणीचा अनोखा अनुभव देणारी ही गौळण!!                     

एकनाथांनी लोकांना समजेल अशी साधी सोपी सुलभ भाषाशैली वापरत    लोकव्यवहारातील शब्द वापरलेली ही गौळण….देवाबरोबर सलगी साधत, लटक्या तक्रारीच्या सुरात एकनाथ सांगताहेत… 

” आश्चर्य च नाही कां हे??? अहो, हा रांगणारा बाळकृष्ण लंगडा म्हणवला जात असला तरी मोठा  ठकडा आहे. लब्बाड आहे.भुरळ घालून कधी डोळ्यात धूळ घालून… फसवून गोपींच्या घरी जाऊन… शिंकं तोडून, मडकं फोडून,दही-दूध सांडून त्याचा रबडा करतो..पत्ताच लागत नाही.  एकनाथांनी कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन करतांना लोकव्यवहारातील  ठकडा हा शब्द प्रयोग करत..यमक चा प्रभाव साधत… काव्यात गेयता तर आणलीच आहे… पण जोडीला जो एक ठसका जाणवतोयं ना त्यात त्यामुळे साधलेली परिणाम कारकता  आणि मना-मनांची घेतलेली पकड.. .शब्दातीत!!  मधुरा भक्ती चा अननूभूत असा अविष्कार आहे ही गौळण! ही भक्ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून च एकनाथांनी लोकभाषा आणि बोली भाषेतील शब्द प्रयोग केला आहे.                

संस्कृत भाषेतील ज्ञानामृत सर्वसामान्यांना मिळावे यासाठी एकनाथ विद्वत्जनांचा विरोध सहन करत…वाळवंटी जाऊन किर्तन करीत. एकनाथ आपल्या कवनांत आपल्या गुरूदेवांचा  नेहमीच उल्लेख करत… एका जनार्दनी!!!!🙏🏻 ही त्यांची नाममुद्रा च आहे! या गौळणीत शेवटी एकनाथांनी त्यांच्या लाडक्या देवाशी… त्याला बछडा असं संबोधत… फक्त साहचर्य च नाही तर एकरूपत्व. …तद् रूपत्व लाभावे अशी भिक्षा मागत कृपादृष्टी चं दान पदरात द्यावं अशी याचना ही केलीयं! प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ घालत  लोकभाषेतील शब्द बद्ध असा हा गीत प्रकार समाजात त्यातल्या सहजता आणि सुलभता, गेयता या रचनावैशिष्ठ्यांमुळे जास्त रूजला, बहरला, कीर्तन-भजनात म्हंटला जाऊ लागला. वरील गौळण आजही मोठ्या ठसक्यात आणि तिच्या शब्दालंकार युक्त लावण्या चा आस्वाद देत श्रोत्यांच्या मनात ठसते हे वेगळं सांगायला नको ना??                

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print