मराठी साहित्य – विविधा ☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

” नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवी चेतना भरून घ्यावी जाने त्याने हृदयागारी

उल्हासाचे रंग भरले  नभांतरी दशदिशांतरी “🌅

दिवाळी सुट्टीचा शेवटचा रविवार, उद्यापासून परत रोजचा दिनक्रम सुरु होणार. मस्त पडलेल्या  या थंडीत नव-उत्साहात ,नव्या चेतना नवीन स्वप्ने घेऊन सुरवात करायची.

” स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती

सूर सूर होता सर्व भावना निनादती 🎼

वाजतात पायीची बघ अजून नुपूरे

तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे”

“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी” म्हणता म्हणता दिवाळी येऊन केंव्हा गेली हे कळलच नाही. मात्र प्रत्येकाच्याच आनंदाची ‘जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे “

आता फूल घ्यायचे तर काट्यांचा सामना करायलाच पाहिजे का दरवेळेला? तरीपण

” हे फूल तू  दिलेले मजला पसंत आहे

आहे फुलात काटा तो ही पसंत आहे

कधी सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी

श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे “

ही देव गाणी आठवत, मनात गुंजन करत पुढे जात रहायचे

कवी यशवंत देव यांचा ३० आँक्टोबर स्मृतीदिन तर १ नोव्हेंबर जन्मदिन त्यांच्या स्मृतीस विनम्र 🙏🙏

“पडसाद कसा आला न कळे,अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केली कुणी

🎤🎼🎹

उरल्या सगळ्या आठवणी. “

(देवांचा चाहता)  अमोल 📝

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

बळे धुंधार सुटला वारा !

थोर प्रजन्य मोकळी धारा !

फडफडा पडती गारा रे !

हिंव वाजते थरार रे !! धृ !!

 

मेघ वोळले अंबरी !

विजु झमके तदनंतरी !

गर्जताहे नानापरी रे !

घरे उडती वरिच्या वरी रे !! १ !!

 

घडी मध्ये चि पाण जंजाळ !

पूर लोटले पाभळ !

नदि फुफाती चळचळ रे !

जाऊ नेदीति ओहळ रे !! २ !!

 

कडे कोसळती पर्वती !

जळे उदंड पडिल्या भिंती !

थंडवारे घरे गळती रे !

भूमीवर त्या पाझरती रे !! ३ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला थोर !

गुरे निघेतना बाहेर !

केव्हा दिसेल देव दिनकर !

लोक बहुत जाले जेर रे !! ४ !!

 

जळे उदंडचि लोटली !

नदीतीरे पीके वाहवली !

ठांई ठांई किती बुडाली रे !

गुरे माणसे पुरे नेली रे !! ५ !!

 

माळवदे किती पडली !

पेवामध्ये पाण्ये भरली !

मोठी मोठी झाडे उन्मळली रे !

पिके अवघी पिंगटली रे !! ६ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला फार !

खवळला नेणो जळधर !

तळी उचंबळली थोर थोर रे !

जेथे निघती पाझर रे !! ७ !!

 

कधी दिसतील उष्ण कीर्णे !

केव्हा उठेल मेघ धरणे !

जीवा होयील सुख पारणे रे !

रवि थोर तो याचकारणे रे !! ८ !!

 

रवि कीर्णीचा पाऊस !

लोक पावती संतोष !

रवि वेगळे कासावीस रे !

धन्य आमुचा सूर्यवंश रे !! ९ !!

 

— समर्थ रामदास स्वामी

 

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 ५३.

अगणित रंगाच्या रत्नांनी कौशल्यानं घडलेलं,

नक्षत्रांनी जडवलेलं हे कंगन सुरेख आहे.

 

पण भगवान विष्णूंच्या गरुडाच्या आरक्त सूर्यप्रकाशात पूर्णपणे तळपणाऱ्या पंखांच्या

विजेच्या आकाराची ही तू दिलेली तलवार

अधिक सुंदर आहे.

 

मृत्यूचा अखेरचा घाव बसल्यानंतरच्या दु:खाची

अखेरची धडपड व्हावी तशी ती चमचम करते.

एकाच भीषण आघातानं जाणीव होतानाच्या

शुध्द ज्वालेप्रमाणं ती तळपत राहते.

 

तू दिलेलं कंगन सुरेख आहे.

त्यावरील नक्षत्रासारखे मोती छान आहेत.

पण तू दिलेली तलवार हे स्वामी, किती सुंदर बनवली आहे!

ती पाहताना तिचा विचार मनात आला तरी भीती वाटते.

 

५४.

तुझ्याकडं मी काहीच मागितलं नाही की

माझं नावही तुला सांगितलं नाही.

तू परतून गेलास तेव्हा मी स्तब्ध राहिलो.

झाडांच्या सावल्या

वेड्यावाकड्या पसरलेल्या होत्या.

आपल्या तांबड्या घागरी काठोकाठ भरून

बायका गावाकडे परतत असताना

त्या मला पालवीत होत्या.

“घराकडे चल. सकाळ संपून दुपार होत आलीय.”

पण. . .

एकटाच विहिरीच्या आसपास भटकत राहिलो.

धूसर चिंतनात मी हरवून गेलो.

 

तू माझ्याकडे येत असताना

तुझ्या पावलांचा आवाज मला ऐकू आला नाही.

दु:खभरल्या नजरेनं माझ्याकडे पाहून

दमलेल्या आवाजात म्हणालास,

“अरे! मी तहानलेला प्रवासी आहे.”

मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो आणि

तुझ्या जुळलेल्या ओंजळीत पाण्याची धार धरली.

 

माझ्या माथ्यावरची पानं सळसळली.

दूरच्या काळोखात कोकीळ गाऊ लागला.

रस्त्यावरच्या वळणावरून ‘बाबला’ फुलांचा वास

दरवळला.

तू माझं नाव विचारलंस तेव्हा

शरमेनं मी उगी राहिलो.

माझं नाव लक्षात ठेवण्यासारखं

मी तुझ्यासाठी काय केलंय?

तुझ्या तहानवेळी मी तुला पाणी देऊ शकलो

याची जाण मी मनात जपून ठेवीन आणि

तिची गोडी माझ्या ऱ्हदयात फुलत ठेवीन.

 

सकाळ संपली, पक्षी उंच स्वरात गाताहेत.

निंबाच्या झाडावरची पानं सळसळताहेत आणि

मी विचार करतो आहे…

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 ‘वाटेवर काटे वेचित चाललो

वाटले जसा फुलाफुलात चाललो’

रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.

हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.

जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.

आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली.  पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.

आता तिला वाटेत येणार्‍या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.

पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.

एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.

प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.

म्हणूनच दुसर्‍या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.

आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.

ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••

“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि  आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्‍या प्रकाशवाटा असतात.”

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस … लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच

थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.

दिवसभर खेळून हात-पाय थंडीने उकलायचे.

किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर

पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’ राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे-रुपयाची नाणी.फटाके आणायला खारीचा वाटा.

फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.

एकदम ‘श्रीमंत’ झाल्यासारखं वाटायचं.

घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात

गळालेल्या फटाक्यांचीसुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे’ – आजी सांगायची. पण इथे झोप

कोणाला असायची! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.

न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात ऊब

आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.

तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान

वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.

मला तो आवडायचा. ‘मोती’ साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये, असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.

मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा. बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून…त्यातच मज्जा असते.

दिवस हळूहळू

उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा.

आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं?

लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये की

आता आपण खूप पुढे आलोय..?

 

गेले ते दिवस!

उरल्या त्या आठवणी!

 

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!

आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.

काय आहे हे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.

अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!

परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.

“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”

हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!

हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.

शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –

“Work in Progress!”

अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.

हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.

(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)

अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.

तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.

लेखक – स्वामी संजयानंद

संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, गाणे गात एक भिकारी जात होता. आजीने या गाण्यातील तत्त्वज्ञान छोट्या बंड्याला सांगितले आणि म्हटले, “अरे, असे भिक्षा मागून पोटाला भरणार्‍या, हातावर पोट असलेल्या , पोटाचा प्रश्न असणार्‍या , सगळ्यांना मदत करणे आपली संस्कृती आहे. आपल्या पोटासाठी केलेल्या अन्नातील काही अन्न भुकेल्यांना गरजूंना द्यावे म्हणजे मग त्यांचे समाधानाने भरलेले मन पाहून आपले पोट भरते.”

बंड्याला जरी सगळे समजले नाही तरी त्याने काही अन्न पोटात कावळे ओरडणार्‍या त्या भिक्षेकर्‍याला दिले.

नंतर त्याची पोटपूजा चालू झाली तशी आजी अजून त्याच्या पोटात शिरत म्हणाली, “तुला भूक का लागली?” बंडू म्हणाला, “काल पासून पोट उपाशी आहे म्हणून.” “बरोबर. म्हणूनच तुझे पोट खपाटीला गेले ना? अरे, आपल्या लेकरांच्या, आई वडिलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील पोटाला चिमटा घेऊन काम करत असतात बरं.

म्हणून घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी, तुला काय सांगते ते ऐक. पोट भरलेले असले ना , किंवा पोटात चारघास घातलेले असले ना की सगळे सुलभ होते. पण त्यासाठी आधी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. आधी पोटोबा मग विठोबा करू नये. देवाने सगळ्यांना पोट दिले आहे ना? सगळ्यांचे जीवन हे कशासाठी? पोटासाठी असते. तरी सगळ्यांना सारखे मिळत नसल्याने कोणाला पोट मारावे लागते, कोणाला पाणी पिऊन पोट भरावे लागते याचेच भान ठेऊन पोट तडीला लागेल एवढे खाऊ नये. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणून आपल्या अन्नातील काही भाग कायम दान करावा. दुसरे असे की आपल्यापेक्षा दुसर्‍यांकडे जास्त आहे म्हणून आपले पोट दुखू देऊ नये. कोणाच्या पोटावर पाय देऊ नये. कोणाला शिक्षा करायची झालीच तर एक वेळ पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.

तुम्ही पोटची पोरं रे. तुम्हाला अशी जीवनसुत्रे लहानपणापासूनच समजलेली बरी,”असे सांगून तिने बंड्याला पोटाशी धरले. 

आजी पुढे म्हणाली,”जे सुखवस्तू कुटुंबातले असतात त्यांची पोटे सुटलेली असतात. पोटाचा नगारा झालेला असतो. त्यांना गरीबांची दु:खे समजत नाहीत. ते अप्पलपोटीपणा करतात . आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोटपोट लोक पोटात एक ओठात एक नितीने वागतात . स्वत: च्या फायद्यासाठी ते दुसर्‍यांची पोटे जाळतात मग त्यांना पोटा ( कायदा) लागतोच. “

आजीने पोटतिडकीने सांगितलेले सगळे बंड्याला पटले. एका अनामिक हुरहुरीने त्याच्या पोटात कालवले. त्याचे समाधान पोटात न राहता चर्येवरून ओसंडत होते.

तेवढ्यात बंड्याची १३-१४ वर्षाची बहीण सोनी पळत पळत आजीच्या कुशीत शिरली. तिच्या पोटात भीतीने गोळा आला आहे हे समजत होते.आजीने विचारले, “सोनी, काय झालं बाळा?” सोनी म्हणाली, “आजी, मला आताच लग्न नाही करायचे. मला शिकायचंय.”

आजी म्हणाली, “हो की. अगं, अजून तुझं वय पण नाही झालं.”

“पण तो लखूशेठ आहे ना त्याच्या पोटात काही काळंबेरं आहे. तो लग्नाची गोष्ट घेऊन अण्णांकडे आला आणि अण्णांनी पोटदुखीवाला औषधाला आला त्याच्या बेंबीवर आयोडिनचा बोळा सारखे लगेच ‘आमच्या सोनीशी करशील का लग्न?’ विचारले आन तो तयार झाला.”

आजीचाही भीतीने पोटशूळ उठला.उगाच पोट गुरगुरू लागले. आजी म्हणाली, “मी समजावीन हो अण्ण्याला. तू नको भिऊस.”

अण्णाला समजावून आजीने ते संकट दूर लोटले. तर सोनीची चुलत बहीण मोनी-सात महिन्याची  पोटूशी- ती आजीपाशी आली. आजी गमतीनं म्हणाली, “आता जे काय आहे,ते अजून दोन महिने पोटातच ठेव बाई. मग दोन महिन्यांनी ते पोटात मावेनासे झाले की येऊ दे पोटातले मांडीवर.”

सगळेच पोट धरून हसले.

आजी मोनीला म्हणाली, “अगं मोने, तुमचा तसा नवाच संसार आहे. त्यात आता खाणारे तोंड वाढणार. म्हणून तुला पण चार गोष्टी सांगते बाई.  नेहमीच गोगलगाय पोटात पाय, असं असू नये.  तसेच पाठी येईन पोटी येईन पण सूड घेईन असे विचारही पोटात ठेवू नकोस. त्या बाळावर असले संस्कार करू नकोस. पण नवर्‍याला पोटाला न खाता  खर्च करण्याच्या वृत्तीपासून पोटातले ओठावर आणत घडाघडा बोलून दूर करण्याचा प्रयत्न कर.

अगं,प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. तर प्रेमाने पोटात शिरून हे तू सहज साध्य करशील.

बरं, चल. तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना? तुझ्या पोटाच्या नावाखाली सगळ्यांच्या पोटाच्या वळलेल्या दामट्या सरळ करू. सगळ्यांनाच पोट खळबळल्याची जाणीव झाली. पोटार्थी असलेले सगळे खाण्यासाठी सज्ज झाले.  खरं तर आजीचं वयाने पाठ पोट अगदी एक झालं होतं.पण काटक आजीने मस्त चमचमीत झणझणीत थालीपिठं केली. हे आजीचं प्रेम सगळ्यांनीच पोटात बांधलं. त्यावर आडवा हात मारताना पोटात जागा नव्हती, तरी चार घास जास्तच खाल्ले. पोट डम्म झालय, म्हणत दिलेल्या तृप्तीच्या ढेकराने आजीच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

लेखिका: सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी आई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  दुसरी आई  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

 एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले-

“आपल्याला काय होईल?

काय अपेक्षा आहे तुमची,

 मुलगा की मुलगी?

तुम्हाला काय वाटतं ?”

 

 त्यावर पती म्हणाला:-

“जर आपल्याला मुलगा झाला तर,मी त्याचा अभ्यास घेईन,

त्याला गणितं शिकवीन,

त्याच्याबरोबर मी मैदानावर

खेळायला, पळायला पण जाईन,पोहायला शिकवीन अशाअनेक गोष्टी मी त्याला शिकवीन.”

 

हसत हसत बायकोने

यावर प्रतिप्रश्न केला:-

“आणि मुलगी झाली तर?”

 

यावर पतीने खूप छान उत्तर दिले-

 

“जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही.”

 

 पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले-

 “का?असे का.?”

 

पती म्हणाला,

” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल.

 

मी कसे आणि कोणते कपडे घालावेत,मी काय खायचं, काय नाही खायचं,कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे,

आणि काय नाही बोलायचं,हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.

थोडक्यात जणू माझी

‘दुसरी आई’होऊन ती माझी काळजी घेईल.

 

मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन.

 

एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही ती आनंदाने समजून घेईल.”

 

पति पुढे म्हणाला-

“तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे.

 मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं, की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे.माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

 

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले-

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का,

की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल,

आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:-

“अगं तसं नव्हे गं,कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल,

 पण त्याला हे सगळं शिकावं लागेल ,मुलीचं तसं नाही,

 मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात.

एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल”

 

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली,

“पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?”

 

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणाला-

“हो.तू म्हणतीयेस ते खरंय.ती आपल्या सोबत नसेल,पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही.कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू.तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!!

अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.

 

 कारण,

 मुली ह्या परी सारख्या असतात,त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !

 

खरोखर मुली ह्या,

परी सारख्याच असतात!

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५२.

तुझ्या गळ्यातला गुलाबांचा हार

मागून घ्यावा असं वाटलं पण

मागायचं धाडस झालं नाही. सकाळ झाली.

तू निघून गेलास. बिछान्यावर काही पाकळ्या

राहिल्या होत्या आणि भिकाऱ्यासारखी मी

सकाळी एखाद- दुसरी पाकळी शोधीत राहिले.

 

अरे देवा! मला काय मिळालं?

तुझ्या प्रेमाची कोणती खूण?

फूल नाही, सुगंध नाही की गुलाबदाणी नाही.

विजेच्या आघातासारखी चमचमणारी

जडशीळ अशी तुझी तलवार!

 

चिवचिवाट करून पहाटपक्षी विचारत होता,

‘ बाई गं! तुला काय मिळालं?’

‘ नाही फूल, नाही अत्तराचा सुगंध,

 नाही गुलाबदाणी.फक्त तुझी भयानक तलवार!

 

मी विचार करीत बसले ‘ ही कसली तुझी भेट!’

ती मी कुठं लपवू? मी ती पेलू शकत नाही

याची शरम वाटते. कारण मी इतकी नाजूक!

मी ती पोटाशी धरते तेव्हा ती मला खुपते.

तरीसुद्धा तू दिलेल्या दु:खाच्या ओझ्याचा हा मान,

तुझी भेटवस्तू मी ऱ्हदयाशी धरते.

 

या जगात मला कसलीच भीती आता नाही.

माझ्या लढाईत तुझाच विजय होत राहील.

 

तू माझ्या सोबत्यासाठी मरण ठेवलंस.

मी त्याला आयुष्याचा शिरपेच चढवीन.

मला बंधनातून मोकळं करायला

तुझी ही तलवार आहे.

मला या जगात आता कशाचीच भीती नाही.

 

माझ्या ऱ्हदयस्वामी! क्षुद्र साजशृंगार मी

व्यर्ज केले आहेत.

आता कोपऱ्यात बसून मी रडणार नाही;

अवनत होणार नाही, उन्नत होईन व राहीन.

 

या तलवारीचा अलंकार तू मला बहाल केलास.

बाहुल्यांचा खेळ आता कशाला?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print