मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘शॉप’ या शब्दावरून ‘शॉपी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमुटभर_गोडी…… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ चिमुटभर_गोडी…… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

” भाजीत चिमूटभर साखर घाल गं म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते ” 

 स्वयंपाक करताना आजी म्हणायची भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहीत असायचं कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी ,थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ”  म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची . 

चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो असं म्हणायची. 

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल ,चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो, असं आई पण म्हणायची . म्हणूनच  त्यांचे संसार विना कलह झाले.

कामवाल्या बाईबाबतही असंच.  तिने कधी दांडी मारली ,कधी उशीरा आली तरी ती पण एक संसारी बाई 

आहे ,आपल्यापेक्षा  तिला आव्हानं असतात जास्त.  मग अशावेळी “ का गं आज उशीर झाला ? बरी आहेस 

ना ?काळजी घे गं बाई. चल दोन घास खाऊन घे “ म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील. 

थोडी माणुसकी खूप मोठं काम करते . 

थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात. आजी  नेहमी म्हणायची आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण . एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.

आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं .

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू  शकतो .

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ धुंधुरमास स्पेशल… अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो. आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या. ”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला ?” मग वहिनींनीही किंचित खोकत, ”हो हो, आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”, बोलत दोघी पुढे निघून गेल्या. मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर,’ म्हणजे काय?’ हा प्रश्न तरी निदान मला आणि माझ्या मित्राला पडला नाही. कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय ? हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते. पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो. त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच पाहिजेत.

सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, येवढं ह्याचं प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी, कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णयमधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार ?

ह्या ऋतूमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार, फरसबी, वांगी, मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा, आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय, हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही, तर अगदी पुण्यातदेखील ठीकठिकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा. शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं. काही दिवस आधी, रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं. तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार, गवार, गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते. माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते. शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं, हिरवं वांगं गोवऱ्यांवर भाजण्यात दुसऱ्या सूनबाई दंग असतात. काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात. मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या, हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच. भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं. घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो. नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात. चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात. घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं. एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत, आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“ सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”, अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”, म्हणत लाजून पसार होते. ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो. त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात. हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून, खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मूगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपऱ्यात उभी असते. सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना. नवीन धाकट्या काकूला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात. “धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”, असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही. असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत. रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते. जे जे लोक, संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं. पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी. कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमिली व्हॅल्यू” आहे. त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी, बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन, वरती प्रत्येकी एक स्कूप आईस्क्रीमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.

शब्दांकन – अंबर कर्वे 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सवाई नावाचे गारुड ! – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

वडिलांबरोबर पहिल्यांदा मी या महोत्सवाचा आनंद लुटला. त्यातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही.दोन्ही हातात दोन व्यक्तींचा हात धरुन पंडित भीमसेन जोशी रंगमंचावर अवतरले. मला गद्यात बोलता येत नाही मी गाण्यात बोलतो त्यामुळे आता काही बोलत नाही असं काहीतरी म्हणून ते आत गेले.आणि मग वसंतराव आणि पु. ल.या दोन देशपांडे कलावंतानी मैफिल ताब्यात घेतली. पेटीवर पु. ल. यांचा सफाईदार हात फिरत होता.तबल्याचा ‘ठेका नाना मुळे यांच्याकडे होता. स्वरांची आरास बांधत हजारो रसिकांना त्या हिंदोळ्यावर झुलवत वसंतराव आनंदाच्या क्षणाचे मुक्त हस्ते वाटप करत होते. कसे विसरु हे ? 

शास्त्रीय संगीत आणि पुणे यांचे नाते तसे खूप जुने.सरदार आबासाहेब मुजूमदार यांच्या कसब्यातल्या वाड्यात गणपतीत देशभरातील मोठे कलावंत येवून आपली कला पेश करत.केसरी वाड्याच्या गणपती उत्सवातही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली,अजूनही लावतात.लक्ष्मी क्रिडा मंदिर या छोटेखानी व्यासपीठावर. नुमवि शाळेच्या पटांगणावर अनेक स्वर्गीय मैफिली रंगल्या. बी जे मेडिकल आर्ट सर्कलने ही अनेकवेळा कानसेनांना तृप्त केले.

पण या सर्वांमध्ये सवाई गंधर्व महोत्सव वेगळा ठरतो.याचे मुख्य कारण म्हणजे इथे उल्लेख केलेले संगीत महोत्सव;काही खासगी,काही सार्वजनिक, पण फार मोठ्या संख्येने रसिकांना सामावून घेणारे नव्हते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही मोजक्याच रसिकांची, अभिजनांचीच मिरासदारी राहिली. दिवाणखान्यात,खाजगी मैफिलीत  रमलेल्या शास्त्रीय संगीताला पंडित भीमसेनजीनी भल्या मोठ्या  मोकळ्या मैदानात आणलं.अभिजानांएवढेच सर्वसामान्य श्रोतेही रसिक आहेत,किंवा काकणभर जास्तच रसिक आहेत हे गुपित सवाईने उघड केले .शास्त्रीय संगीताचे केलेले हे लोकशाहीकरण  हे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. 

वर्षातून किमान तीन वेळातरी महाराष्ट्रातून ,देशातून आणि परदेशातूनसुद्धा अनेक भाविकांचे पाय पुण्याकडे वळतात.जून महिन्यात आळंदी आणि देहूहून सुरु होणाऱ्या पंढरीच्या वारीसाठी,दुसऱ्यांदा आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी गणपती उत्सवात.आणि तिसऱ्यांदा  ’सवाई गंधर्व महोत्सवात स्वराभिषेकात न्हाऊन  निघण्यासाठी. मिळेल ती एसटी ,रेल्वे पकडून या  गान पंढरीचा वारकरी आपल्या आयुष्यातल्या काही i रात्री स्वरांच्या संगतीत व्यतीत करतो. 

कॉलेज जीवनात; पुण्यात माझी राहण्याची दोन ठिकाणे झाली. एक ५७१ ,शनिवार पेठ ,होय प्रभा विश्रांती गृह ज्या जागेत आहे आणि जिथे सई परांजपे यांनी आपल्या ‘कथा’ चित्रपटाचे चित्रीकरण केले तो साळुंखे यांचा वाडा.दुसरी जागा ३५८ ,शनिवार पेठ. वीराची तालीम चौकात . दोन्ही जागा रमणबाग शाळेच्या परिघात .सवाई मधली ओळ न ओळ ,प्रत्येक तान,वाद्यांचा झंकार, पदन्यासाची    छमछम आपसुक  कानावर पडायची त्या दोन्ही जागेत.  

१९५२ साली पंडित भीमसेन जोशी यांनी आपली गुरुभगिनी गंगुबाई हनगळ,पंडित फिरोझ दस्तूर यांच्या सहकार्याने सुरु केलेली ही गानयात्रा,आपले गुरु सवाई गंधर्व यांना दिलेली एक अक्षय्य अशी गुरुदक्षिणाच आहे. इथे किती दिग्गज ऐकायला मिळाले, किती वादकांनी हृदयाच्या तारा छेडल्या,आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात.  मुंबई दूरदर्शनच्या माझ्या ५ वर्षांच्या काळात अनेक नावाजलेले, बुजुर्ग कलावंत जवळून ऐकले.त्यांच्या ध्वनीचित्रमुद्रणाचाही अनुभव घेतला. पण सवाईची  मजा औरच.   

गुलाबी थंडीला अधिक देखणे करणाऱ्या शाली पांघरुन  हजारो प्रेक्षक तल्लीनतेने श्रवणानंद लुटताना पाहणे हाच मुळात एक सुंदर दृश्यानुभव ठरतो.या महोत्सवाने आणखी एक गोष्ट दिली ती म्हणजे युवा कलाकारांना व्यासपीठ .या महोत्सवात   सामील करून त्यांना कला प्रवासाच्या हमरस्त्यावर आणून सोडले. हवसे ,नवसे ,गवसे साऱ्याच उत्सवात असतात.याला सवाई सुद्धा अपवाद नाही . सवाई ला चाललो आहे असे म्हणून अनेक तरुण तरुणींनी या उत्सवाच्या पेंडॉलला आपले संकेतस्थळही केले. पण हे गोड अपवाद सोडले तर या मंतरलेल्या रात्री म्हणजे गायन ,वादन ,नृत्य यांची लयलूटच असते.

मल्लिकार्जून मन्सूर, गिरिजादेवी ,माणिक वर्मा, हरिप्रसाद चौरासिया ,किशोरी आमोणकर,जितेंद्र अभिषेकी, राजन साजन मिश्र,वीणा सहस्रबुद्धे ,उल्हास कशाळकर ,राशीद खान  या श्रेष्ठ कलावंतानी  सवाईचा मंडप आपल्या स्वराविष्कारानी अनेकवेळा उजळून टाकला  आहे.  आप्पासाहेब जळगावकर या ज्येष्ठ संवादिनी वादकांनी तर ५७ वर्षे या उत्सवात आपल्या बोटांची जादू पेश केली आहे . 

कुमार गंधर्व यांनी सादर केलेला राग भटियार,पंडित रवी शंकर यांनी झंकारलेला  ललत, प्रभाताई अत्रे यांची  ‘तन मन धन तोपे वारू’ ही कलावती रागातील बंदिश , जसराज जी यांचा दरबारी , आलापी आणि तानांनी नटलेली;अनेक नयनरम्य वळणे घेत परवीन सुलतानानी सादर केलेली  ‘गुजरी तोडी या रमलखुणा मनावर गोंदल्या गेल्या आहेत.

मालिनी राजूरकर यांचा बहारदार टप्पा,आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहणारी अभिसारिका साकार करणारा अश्विनी भिडे यांचा बागेश्री,कौशिकी चक्रवर्ती हिने सादर केलेली ‘याद पियाकी आये’ ही आर्त ठुमरी काय काय म्हणून आठवावे? 

शिवकुमार शर्मा यांनी  संतूरच्या सुरावटींनी काढलेली रागेश्रीची रांगोळी,’ ही सगळी मनात चिरंतन जाऊन बसलेली स्वरशिल्पं आहेत . कंठ संगीताचा अनुभव देणारे गाणारे व्हायोलीन वाजवणाऱ्या एन.राजम या विदुषीच्या बोटातली जादू याच सवाईनी आम्हाला दाखवली. वैजयंतीमाला या भरतनाट्यम नृत्यांगनेचे ‘संत सखू’  हे नृत्यनाट्य पाहणे म्हणजेच एक मनोहारी उत्सव..सवाई नसते तर कुठं पाहिलं असते हे आम्ही ?

गाणे हे आनंदाचे कारंजे असते, इंद्रधनुष्य असते हे भान माझ्या वडिलांच्या संगीत प्रेमाने मला दिलेली फार मोठी इस्टेट आहे .रेणुका स्वरुप शाळा आणि रमणबाग शाळा या दोन्ही ठिकाणी हा नेत्रदीपक सोहोळा, गानयज्ञ याची देही याची डोळा आणि श्रवण इंद्रीयांने अनुभवण्याचे भाग्य माझ्या भाळी लिहिणाऱ्या त्या अज्ञात शक्तीचे आभार मानावेत तितके कमी आहेत. 

डिसेंबर मधल्या त्या रविवारी पुण्यात येणाऱ्या सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांना ‘जो भजे हरी को सदा’ या पंडितजी यांच्या भैरवीच्या आर्त स्वरांनी अनेकवेळा कृतकृत्य केले आहे. ‘जमुना के तीर’ या स्वतः सवाई गंधर्व यांनी गायलेल्या ठुमरीचे स्वर ध्वनिमुद्रिकेच्या माध्यमातून कानात आणि मनात साठवत रसिक या गान पंढरीला  निरोप देतात. माथी बुक्का ,गळ्यात तुळशी माळ नसलेले, पण विठ्ठलाचे स्पष्ट दर्शन झालेले हे हजारो  वारकरी; हीच आपल्या  शास्त्रीय संगीत विश्वाची खरी दौलत आहे…. कधीही न संपणारी . 

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ स्वयंपाक_बुद्धिमत्ता (उगीच विचारांची भेळ) – सुश्री केतकी ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी – वरण – भात – कोशिंबीर – चटणी – उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू – चिवडे – मिठाया – पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

एकदा काही कारणाने माझ्यावर एका ३० वर्षाच्या हुषार, शिकलेल्या, स्मार्ट आणि चुणचुणीत बाईला स्वयंपाक शिकवायची वेळ आली. मीही हो म्हटलं पटकन. तिचं वय बघता तिला थोडं तरी काहीतरी येत असेल, थोडी काही समज असेल, असा एक सहज गैरसमज मी करून घेतला आणि धक्क्यावर धक्के बसायला लागले. 

स्वयंपाक = कागदावर लिहिलेली एक रेसिपी असा तिचा आणि (मी कितीतरी वर्षं स्वयंपाक करत असून) माझा पण समज होता. 

मग झाली मजा सुरू—- 

– फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

– गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव,   का झारा? कढई का पातेलं? 

– पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

– एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

– ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

– प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा— आवरता कसा घ्यायचा?

– दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत, बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे)– हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

– मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

– पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी — याची सांगड कशी घालायची?

– उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

– वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही, तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकवायला लागणार आहे.  आणि ते काही दिवसांमध्ये शिकवणं जवळजवळ अशक्य आहे. आणि त्याला लागणारी बुद्धिमत्ता बहुतेक या हुशार आणि चुणचुणीत मुलीकडे नाहीच आहे. 

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे—’ involvement’ . उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

तिला काही रेसिपी लिहून दिल्या, काही व्हिडिओ पाठवले, काही पुस्तकं सुचवली आणि विषय संपवला.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, पण प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायका पुरुषांच्या हुषारीला दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी एकदा रोज—  निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

लेखिका :  सुश्री केतकी

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घाई करताना… –– सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ घाई करताना… – सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

फार घाई होते हल्ली… प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई… क्षण फुकट वाया गेला म्हणून… लगेच गळे काढायची पण घाई…माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…ते पटकन जगाला दाखवायची घाई….जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

नजरेत दृश्य येताक्षणी कँमेऱ्यात बंद करायची घाई…विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!….  चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई….. बालांना किशोर व्हायची घाई…किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर….. काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई… दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई… प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई… श्वास थांबताक्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…! …. मुक्कामाला पोहचायची घाई….कामावरुन निघायची घाई… सिग्नल संपायची घाई….पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…सगळंच पटकन उरकायची घाई…आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई… आठ दिवसांत वजन कमी करायची घाई… महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….! पाच मिनिटात गोरं व्हायची घाई… पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई… एक मिनिटात वेदना शमवायची घाई… एनर्जी ड्रिंक पिऊन वडीलधाऱ्यांना दमवायची घाई……. 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई… .. भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही…. 

.. मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धीपेक्षाही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

नातवाचा अभ्यास घेताना मला हे बदल फार जाणवले, विशेषतः ‘अक्षरबदल’ !  शेंडीवाला ‘श’ शेंडी कापून थेट मुंडक्याने रेषेला चिकटवला. लयदार ‘ल’च्या हाती काठी देऊन टाकली. नातू म्हणाला, ‘ शाळेत असंच शिकवलंय.’ आता नवीन प्रचलित पद्धती आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे मी गप्प बसले. पण अशा वेळी मी त्याला आवर्जून आपल्या वेळी शाळेत काय शिकवलं, हे सांगत रहाते. पण मजा अशी आहे की, हे बदल कोण, केव्हा, कशासाठी करतं, हेच मुळी कळत नाही. जाग येते तीही कित्येक पिढ्या यात भरडल्या गेल्या की.   

— माझ्या आठवणीत माझ्या शैक्षणिक कालात (१९५६ – १९६६) घनघोर बदल झाले. माझे अर्धेअधिक शिक्षण जुन्या पद्धतीने झालेले — म्हणजे —

इंग्लिश भाषेचा समावेश, जो आठवीपासून अभ्यासक्रमात असे, तो पाचवीपासून सुरू झाला. तोवर आम्ही सहावीत सरकलो होतो, मग आम्ही त्या एका वर्षात पाचवी, सहावी अशा दोन पुस्तकात दबलो.

शुद्धलेखन – तेव्हा आठवतंय, शुद्धलेखन घालताना शिक्षिका किती जाणीवपूर्वक उच्चार करायच्या, त्यामुळे कळायचं तरी. (कां, कांहीं, आंत, नाहीं, जेंव्हा, तेंव्हा, कीर्ति, मूर्ति इ.) ह्या अनुस्वारांचा उद्देश त्यावेळी बालबुद्धीला उमगला नाही आणि कळवण्यास अत्यंत खेद होतो की अजूनही कळला नाहीये.                                                                   

नवीन पद्धतीत किती तरी अनुस्वार गायब झाले, (ते बाकी बरीक झाले.) -हस्व – दीर्घ बदलले.                                                          

पण आता संगणकावर काही जोडाक्षरे टंकित केली की चमत्कार होतो – उदा. अद् भुत – आता  ‘भ’ द’च्या पायाला लोंबकळतो – अद्भुत / उद् घाटन – यातही तसेच – ‘द’च्या पायाशी ‘घ’ – उद्घाटन.

विचार करा – ‘अब्द’, जो उच्चारतांना ‘ब’चा उच्चार ‘द’च्या आधी आणि अर्धा होतो – अ+ब्+द या पद्धतीने बघायला गेल्यास अ+द्+भु+त अशी उकल करता येते. पण या नवीन टंकपद्धतीने मात्र हा अद्भुत – अ+भ्+दु+त असा वाचला जाईल. तेच ‘उद्घाटना’चे – उ+घ्+दा+ट+न. वा+ङ्+म+य – या नवीन पद्धतीत वाङ्मय – ‘म’चा उच्चार पूर्ण करायचा की ‘ङ्’चा? अशी आपल्या जोडाक्षरांची तोडफोड अपेक्षित आहे का?  

‘र’ हे अक्षर अर्धं होऊन विविध प्रकारे जोडाक्षरांत येते. उदा. – अर्धा, रात्र, व्रण, तऱ्हा, कृपा इ. यातील आडवा होऊन जोडला जाणारा ‘रफार’ टंकलिपीत गायब झाला – आता असा ‘र’ जोडायचा तर गो+र्+हा असं टंकित केलं की तो ‘गो-हा’ न दिसता ‘गोर्हा’ असा दिसतो. मग चेहेरा होतो गोर्हामोर्हा!

दशमान पद्धती आणि नाणी – दशमान पद्धत सोपी होती, पण आपण या ‘बदला’च्या (transit period) तडाख्यात (की चरकात?) सापडलो होतो – डझन, औंस, पौंड, इंच, फूट, मैल यांची सांगड कि.मी., सें.मी., किलोग्रॅम वगैरेशी झगडून जमवली. (अजूनही इंच, फूट, डझन सोप्पं वाटतं.) माझी उंची मला फूट-इंचात सांगता येते. पण सें. मी. म्हटलं की झालीच गडबड. फळं डझनाच्या भावात असत, ती वजनावर मिळू लागली. चोवीस रूपयात डझनभर मिळणारे चिक्कू चोवीस रूपये किलो घेताना सहाच मिळू लागले.  (एवढेच बसतात वजनात?) नाण्यांनी तर घोळसलंच. पैसे, आणे, रूपये हे आबदार वाटायचे, नाण्यांना वजनही चांगलं असे. कमी किंमतीचा पैसा तांब्याचा, आणि तरी चांगला ढब्बू असायचा, किंवा भोकाचा ! भोकाची नाणी गोफात बांधून ठेवता यायची. (भोकाचे पैसे वापरून लोकरीच्या बाळमोज्याचे छोटे गुंडे करता यायचे.) नाणी – आणा, चवली, पावली, अधेली (अशी गोंडस नावे असली तरी) वजनदार असत. रूपया तर ठणठणीत – त्याला ‘बंदा’ म्हणावा असाच ! सुरुवातीला रूपया चांदीचा होता – त्यातून ब्रिटिश राजवटीतील रूपये तर कलदार चांदीचे – राजा छाप, राणी छाप असे होते. हे चलनातून बाद केल्यावर ते दागिन्यांच्या पेटीत गेले. मग दिवाळीत ओवाळणीपुरते बाहेर येत, परत कडीकुलपात !

नवी नाणी चिल्लर दिसत – एक पैसा – गोल, तांब्याचा – आकार नखावर मावेल एवढा ! पुढे तर तो ॲल्युमिनिअमचा चौकोनी झाला. एक आणा म्हणजे सहा नवे पैसे. दोन आणे म्हणजे बारा नवे पैसे. तीन आण्यांचा भाव एका नव्या पैशाने वधारला – म्हणजे एकोणीस नवे पैसे झाला. का? तर दशमानात एक रूपया = शंभर नवे पैसे, तर त्याचे चार भाग पंचवीस नवे पैसे म्हणजे जुने चार आणे – आता पंचवीसला चाराचा भाग समान कसा बसणार? तीन आण्याच्या पदरात एक नवा पैसा टाकून केली जुळवाजुळव ! त्यातून दोन, तीन, पाच, दहा, वीस पैसे नक्षीदार, पण (जनभाषेत) ती आलमिनची  नाणी, वजनाला हलकी – पुढे पुढे ती लमाण्यांच्या पोशाखावर जडवलेली दिसू लागली.

पावलीचं, अधेलीचं रूपांतर पंचवीस पैसे आणि पन्नास पैशात झालं आणि त्यांचे चेहरे पडेल दिसू लागले.

त्यातल्या त्यात रूपया जरा बरा म्हणायचा, तर अलिकडे तोही पन्नास पैशाच्या आकारात गेला आणि त्याचा रुबाबच  संपला. पाच आणि दहा रूपयाची नाणी अजून तरी अंग धरून आहेत.  

पण काय आहे, शिक्षणातील या  बदलांनी बालमनात घातलेले उटपटांग गोंधळ, ‘ बाल ‘ पांढरे झाले तरी अजून ठिय्या मारून आहेत, त्याचं काय करावं बरं????…. 

© सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चकवा… लेखक अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

??

☆ चकवा… लेखक अज्ञात☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

माझे वडील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतःच जात असत. रात्रीची वेळ. त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता. वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते. तिथल्या तिथेच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले. तो  ‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून. 

आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्यापलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…

खरेदीचा चकवा :आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी, त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं. माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले. मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले. सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पाडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान  बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला. बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.

मोबाईल हा दुसरा चकवा :  एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा तर सगळ्यात वाईट. ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंडं, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्याठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.

 झोप हा तिसरा चकवा : पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही. इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच चकव्यात म्हणून समजा.

टीव्ही… चा चकवा :  इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल.  इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास ! …. चकवाय स्वाहा!

Sale: हा तर सगळ्यात फसवा चकवा. अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्याशिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे. 

क्रेडिट कार्ड :  हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार. केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाहीत ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.

हॉटेलिंगचा चकवा : हा चकवा नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं ?  स्टार्टर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं ? उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं ? ….  आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? पण चढाओढ ….  ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे. 

हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे. किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा…  कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.

विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ? 

ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?

फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही…

इथे चकव्यात अडकणारे पण आपण, आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे, किंवा किती गोष्टी गमवायच्या, हे आपल्यालाच ठरवावे लागेल.

लेखक :  अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

(Innovative Communication Skills of Gadgebaba.)

आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  …….

☆  वंदन दीपस्तंभाला … ☆

बाबांचा संवाद होता ,

संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;

भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,

संविधाननिर्मात्या बाबांशी |

पोटतिडीक होती,

वंचितांच्या शिक्षणाची;

विषमतेच्या चिखलात रुतलेल्या  –

माणसाच्या उत्थानाची |

घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा 

आणि माणसांच्या मनांच्या 

आंतरबाह्य स्वच्छतेचा; 

 बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!

— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —

गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६  हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात  जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.

गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—

कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.

पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.

समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.

गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.

नियतकालिकातून  केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन  ठायी ठायी दिसते. 

 अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत  आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.

संदर्भ — 

१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील. 

२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे. 

३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर. 

४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.

५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर. 

६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत. 

७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.

श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.🙏🏻

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 2 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 2 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते. इथून पुढे —

ते म्‍हणाले, ” सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो , परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे.” 

मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार. म्‍हणून मी एक युक्ती केली. जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती. आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, ” सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या.”  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो. 

आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची ! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो.  या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता ! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले, ” सर, लवकर चला. पेशंटला बघा चला.” मी लगेचच जाऊन पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती. 

माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.

त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. “मी प्रयत्न करतो!” या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे “ डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली?” मग मी त्‍यांना सांगितले की, “ पेशंट ज्‍यावेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा. त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला, पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहिनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढून घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. “  अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते. 

पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो. माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनीही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वरचरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला. पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.

आता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलावून घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य ! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरंच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले “ हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना?” तर तो म्हणाला, ” यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड.” आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यातील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून  ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. ” ही इज अ बॉर्न फायटर ! तुमचा मुलगा सुखरूप परत आला !” आणि आम्‍ही लढाई जिंकली होती ! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती

हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिस्चार्ज र्होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की, इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.

खरंच ! आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !

हीच खरी दिवाळी  

— समाप्त —  

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print