मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माणुसकीचा खळाळता झरा…डॉ. जयंत नारळीकर” – लेखक : श्री भगवान दातार ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

??

☆ “माणुसकीचा खळाळता झरा…डॉ. जयंत नारळीकर” – लेखक : श्री भगवान दातार ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. या थोर शास्त्रज्ञाला शतशः प्रणाम.

या महान शास्त्रज्ञाच्या मनातली माणुसकी दाखवून देणारी एक आठवण आज मनात पुन्हा प्रज्वलीत झाली.

(छायाचित्रे – डॉ. नारळीकर, मंगलाताई नारळीकर आणि संगीता खंडागळे)

६ मे २०१३ च्या साप्ताहिक सकाळमध्ये मी एक लेख लिहिला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या एका कामगाराच्या पत्नीने आपल्या हिंमतीवर धावपटू म्हणून कसं नाव कमावलं याची ती यशोगाथा होती. जिचं सगळं लहानपण आईच्यामागे खुरपणी करत धावण्यात गेलं अशा संगीता खंडागळे हिची ही कर्तृत्व गाथा होती.

– – शाळेचं तोंडहि न पाहिलेली व दिवसाला २ रुपये मजुरी मिळवणारी ही मुलगी लग्नानंतर पुण्यात आली. बोपोडीतल्या एका झोपडपट्टीसदृश वस्तीत तिचा संसार सुरु झाला. तिनेच सांगितलेल्या तिच्या कहाणीत नारळीकर दांपत्याच्या मनातला माणुसकीचा झरा मला ऐकायला मिळाला.

आपल्या जिद्दीवर तिनं अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धातली सुवर्णपदकं पटकावली होती.

पुण्यात एकदा तिनं मॅरेथॉन स्पर्धा पाहिली. मला असं पळता येईल का असा भाबडा प्रश्न तिनं तिच्या नव-याला विचारला. तेथून ती पळण्याच्या इर्ष्येने झपाटली गेली. त्यानंतर सुरु झाली तिची अखंड मेहनत.

साडी नेसणा-या व पायात स्लिपर घालणा-या संगीताताईंनी विद्यापीठाच्या ग्राऊंडवर पळण्याचा सराव सुरु केला. भल्या पहाटे ती पळायला जात असे. घरी लवकर परतण्याची घाई होती, कारण दोन छोट्या मुलांना घरी झोपवून ती पळायला यायची. दोन चार दिवस गेले. मुलं घरी उठून रडायला लागली. शेवटी मुलांना बरोबर घेऊन ती जायला लागली. एका झाडाखाली मुलांना बसवून ती त्यांच्या अवती भवती, तिथल्या तिथं धावायची. मुलं घाबरतील या भीतीनं तिला दूरवर जाता येत नव्हतं.

योगायोगाने एक दांपत्य तिथं रोज फिरायला येत असे. साडी वर खोचलेली ही बाई अनवाणी पायांनी तिथल्यातिथं धावत असल्याचं पाहून त्यांचं कुतुहल चाळवलं गेलं. त्यांनी तिची चौकशी केली. आम्ही तुझ्या मुलांकडे पाहतो, तू पाहिजे तेवढं लांब जात जा असं त्यांनी तिला सांगितलं आणि मग तो रोजचाच परिपाठ सुरु झाला. ते दांपत्य म्हणजे डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगलाताई.

थंडी वाढायला लागली. मुलांना इथं त्रास होईल. तेंव्हा तू त्यांना आमच्या घरीच सोडत जा असं त्या मॅडम संगीताला म्हणाल्या. संगीतालाही ते पटलं. मुलांना त्यांच्या घरी सोडून ती पळण्याचा सराव करायला लागली. त्या काळात दोघेहीजण त्या मुलांची काळजी घेत, त्यांचं खाणं पिणं बघत. मॅडमनी त्यातल्या थोरल्याला थोडं शिकवायलाही सुरुवात केली.

काही दिवस गेले. घरी टी. व्ही. वरच्या एका कार्यक्रमात संगीताने नारळीकरांना पाहिलं आणि ती चमकलीच. दुस-या दिवशी, तुम्ही डॉ. नारळीकर का?, असं तिने थेट डॉक्टरांनाच विचारलं. तेंव्हापासून या परिवाराशी तिचा स्नेह जडला. तिच्या मुलींच्या लग्नाला हे दांपत्य आवर्जून उपस्थित होतं.

मोठं मन म्हणजे आणखी वेगळं काय असतं ? 

शाळा न शिकलेल्या, पहिली स्पर्धा बूट न घालता पळणा-या संगीताने पुढे देशोदेशीच्या स्पर्धेत भाग घेतला. अनेक पदकं पटकावली. ही सगळी कथा त्या लेखात मी लिहिली होती.

डॉ. नारळीकरांचे निधन झाल्याची बातमी ऐकून मला ती कहाणी आठवली.

माणुसकीचा एवढा खळाळता झरा ज्याच्या मनात वाहतो त्याला देव माणूसच म्हटलं पाहिजे!

लेखक : श्री भगवान दातार

(bhagwandatar@gmail. com)

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल!!! ☆ सुश्री शीला पतकी 

1975 पूर्वी ज्यांनी एसएससी परीक्षा दिली ते अकरावीत होते त्याला मॅट्रिक ची परीक्षा असं म्हणत. ती परीक्षा अवघड पहिला तो एक टप्पा पार करणार विद्यार्थी त्यामुळे एसएससी परीक्षेला क्लास कुठला मिळाला? मार्क किती पडले? असले प्रश्न कोणीही विचारत नव्हते मॅट्रिक पास झालास, वा! वा! अभिनंदन!!! … कारण खरोखरच ते तितके अवघड होते. कॉपी प्रकरण अजिबातच नव्हते. शाळेचे मार्क हा विषयाच नव्हता, म्हणजे एकूण बाह्य परिस्थितीवर पास होण्यावर अजिबात अवलंबून नव्हते त्या विद्यार्थ्यांची स्वतःची गुणवत्ता असेल तरच विद्यार्थी पास होत असे. त्यामुळे मॅट्रिक पास झाला म्हणजे त्यांनी खूप काही मिळवले असे समजले जाई. लोक अभिनंदन करत… आई-वडील आनंदाने पेढे वाटत.. आईला तर अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, “झाला बाई पोरगा एकदाची मॅट्रिक”ही भावना. त्यानंतर कुठेतरी नोकरीही लागत असे. अगदी सरकारी सुद्धा. एसएससी म्हणजे अकरावीच्या वर्गात येईपर्यंत फारशा शिड्या त्या विद्यार्थ्याला लागत नव्हत्या स्वगुणावर पास होऊन त्याला पहिली ते अकरावी पर्यंतचा प्रवास करावा लागे. अगदी एखाद दुसऱ्या मार्काने कुठेतरी तो वर ढकलला जाई अन्यथा एक मार्काने सहावी सातवीत नापास झालेले विद्यार्थी मी पाहिले आहेत. मग एसएससी ला आल्यानंतर अभ्यासाची फार गंभीरता नव्हती पण एकदा घरातून सांगितले जाई यंदा मॅट्रिकला आहेस तू जबाबदारीने अभ्यास कर वेळ घालवू नकोस. उन्हाळ्यात कोणतेही वर्ग नव्हते. शाळा कोणताही जादा तास घेत नव्हत्या. शिकवण्या लावल्या जात नव्हत्या. मुलाने स्वतःच्या स्वतः अभ्यास करायचा. गाईड वगैरे फारसा प्रचार नव्हता पाठ्यपुस्तका शिवाय कुठला आधार नव्हता आणि शिक्षकांशिवाय दुसरे मार्गदर्शन नव्हते. एखाद्या घरातून यापूर्वी शिकलेली जर पिढी असेल तर कुणीतरी अडल्या नडल्या वेळी मार्गदर्शन करीत असे इतकेच. काही घरातून तर शिकणारी ती पहिलीच पिढी होती एसएससी ला आहे म्हणून आया काही वेगळं करत नसत घरात पाहुणेरावळ्यांचा सुकाळ असायचा मुलगा अकरावीचा आहे हो म्हणून कोणी येऊ नका असे कोणालाही सांगितले जात नव्हते. आया फरशा काम करत नसल्यामुळे(बाहेर जाऊन)रजा वगैरेचा प्रश्न नव्हता नाहीतर आजकाल मुलगा मुलगी दहावीला म्हणलं की आईची एक महिना रजा ठरलेली जणू काही बाईच अभ्यास करणार आहे असो आईचं काम एवढेच वेळेवरती जेवायला खायला. घरातला जो कोणी मोठा करता माणूस असे तो फक्त अभ्यासाला बसा किंवा काही कमतरता आहे का एवढे बघत असे. यापेक्षा पालक सभा वृत्तपत्रातून मार्गदर्शन ऑनलाईनच नव्हते त्यामुळे तो भागच नव्हता, बरे होते ते. त्यामुळे विद्यार्थ्याला येणारे अतिरिक्त टेन्शन अजिबात नव्हते मुळात घरातून कोणाच्याही अपेक्षा नव्हत्या आपलं दुकान चालवावं म्हणून त्याने तेच काहीतरी केले पाहिजे असंही काही नव्हतं त्यामुळे त्या वेळचे विद्यार्थी भयमुक्त आणि तणावमुक्त शिक्षण घेऊ शकले त्यामुळे ते सखोल असावेत. वर्षभर अशाप्रकारे विद्यार्थी नियमित अभ्यास करत असे एखादा विद्यार्थी हुशार असेल विशेषतः संस्कृत मध्ये तर शंकर शेठ शिष्यवृत्तीचे आकर्षण असायचे त्या विद्यार्थ्यावर शाळेत थोडे अधिक खटपट करीत असत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शंकर शेठ स्कॉलरशिप मिळत असे आणि आयुष्यभर तो विद्यार्थी हा शंकरशेठ मिळवणारा बर का… म्हणून मिरवत असे आता संस्कृत आज शंभर पैकी 100 मार्क मिळवणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले आणि मला शंका निर्माण झाली की शिक्षकांनाच काही संस्कृत येते की नाही. या सगळ्या मध्ये आपल्या एका पिढीच्या रिझल्टच्या आठवणी फार रम्य आहेत

मॅट्रिक चा निकाल साधारण जूनच्या तोंडावरती लागत असे वर्तमानपत्राच्या प्रेस मध्ये हा निकाल आदल्या दिवशी छपाईसाठी येत होता पूर्वी पूर्ण नावाची छपाई होत होती अगदी सुरुवातीच्या काळाला पण त्यानंतर नंबर यायला लागले मग ज्यांची ओळख प्रेस मध्ये असेल ती मंडळी प्रेस च्या आजूबाजूच्या खिडक्यातून चिठ्ठ्या पाठवून पाठवून संध्याकाळपर्यंत रिझल्ट मिळ वित असत मग भल्या पहाटे वर्तमानपत्राला सायकलवरून एसएससी परीक्षेचा निकाल असे ओरडत जायचा वाड्यात घरात एसएससी ची मुलं असतील तर बरीच मंडळी जागी असायची मग तो पेपर विकत घ्यायचा आणि त्यामध्ये नंबर पाहणे सुरू… झालास का पास वगैरे एका मिनिटात 100 जण चौकशी करायची आणि एकदाचे नंबर समोर यायचा.. झालो पास म्हणून तो मुलगा ओरडायचा.. सगळ्या वाड्याला आनंद.. आई म्हणायची देवापुढे साखर ठेव बरं देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली जायची पोरग पटापटा सगळ्या वाड्यातल्यांच्या पाया पडायचे दुसऱ्या दिवशी स्नान संध्या वगैरे सगळं आटोपून वडील आणि मुलगा पेढे आणायला पेढ्याच्या दुकानावर मग पेढे वाला विचारायचं का झाला वाटतं मुलगा मॅट्रिक? वडील अभिमानाने सांगायचे हो ना 50 टक्के मार्क पडले… अरे वा! छान!! असे म्हणत दुकानदार एखादा पेढा जास्त टाकायचा मग घरोघरी पेढे देण्याचा कार्यक्रम घरामध्ये त्या दिवशी काहीतरी गोड धोड केले जायचे मग दुसऱ्या दिवशी पासून मुलाच्या नोकरीचा किंवा कॉलेजचा शोध सुरू व्हायचा

मॅट्रिक परीक्षेच्या निकालात बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला एक किस्सा मला अजून आठवतो ते माझ्या नापासांच्या शाळेत मुलांशी गप्पा मारायला आले होते. त्यानी सांगितलेली हकीगत फारच रंजक आहे. ते म्हणाले, ” एसएससी चा निकाल लागणार ते आदल्या दिवशी पासून अंतःकरणात धडधडत होती कारण गणित विषय मला नेहमीच अवघड जात होता त्यामुळे मी नापास होतो की काय अशी मला भीती वाटत होती पहाटे आईने मला दोन आणे देऊन पेपर आणायला पिटाळले पेपर विकत घेताना मला धडधडत होते पेपर उघडला त्यावर बलवंत मोरेश्वर पुरंदरे हे नाव वाचले आणि मला प्रचंड आनंद झाला छापून आलेले हे पहिले माझे नाव मी तडक घर गाठले घरातील सर्वांना पास झाल्याचे सांगितले आईला नमस्कार केला तिने एक रुपया ठेवला आणि सांगितले पेढे घेऊन ये मी पेढे घ्यायला जाताना गणिताचे पुस्तक एका पिशवीत गुंडाळून घेतले त्याला घट्ट दोरी बांधली आणि सायकलवर बसून खडकवासला गाठले तिथे जाऊन त्या बंडलला दोन-तीन दगड मांडले आणि ते पुस्तक पाण्यात फेकून टाकले पुन्हा याच्या वाटेला जाणार नाही. आणि मग तडक पेढे घेऊन घरी. गणिताचे सर्वात मोठे ओझे होते माझ्या डोक्यावरून उतरले होते बरे मुलांनो पुढे जरी गणित लागलं नाही तरी दहावी तो अभ्यास करावाच लागतो तेव्हा तुम्ही तो छान करा आणि उत्तम गुणांनी पास व्हा असा आशीर्वाद देतो “असे म्हणून त्यांनी भाषण संपले जेव्हा जेव्हा एसएससी परीक्षेचा निकाल असतो त्या त्यावेळी मला बाबासाहेबांच्या या गोष्टीची आठवण येते.

काल परवा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला बोर्डाचे पर्सेंटेज 92 टक्के च्या पुढे अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के.. शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी.. सगळेच आकडे अचंबित करणारे होते त्या काळात 40-45% निकाल लागत असे 70 72% चा विद्यार्थी बोर्डात यायचा आता शंभर टक्केच अनेक विद्यार्थी.. हुशारी वाढली गुणवत्ता वाढले का परीक्षा सोपी झाली काहीच कळत नाही. 100 ही मार्काची मर्यादा आहे म्हणून नाहीतर किती मार्क विद्यार्थ्यांनी घेतले असते कोण जाणे एसएससी निकालानंतर शंभर टक्केवाल्या मुलांचे काय होते याचे आम्ही कधी मूल्यांकन केले नाही विद्यार्थी पुढे काही घडतात काय हे पाहिले नाही जे चाललंय ते चालू दे असं म्हणण्याची आपली पद्धत झाली आहे. परवा निकाल लागल्यानंतर माझ्याकडे शिकवणीला येणाऱ्या एका विद्यार्थिनीची तयारी मी अ ब क ड पासून करून घेत होते तिला एसएससीची काहीच पात्रता नव्हती हे मला ठाऊक त्यांच्या शाळेने तिचा फॉर्म भरला होत.. चार वर्षे शिक्षणाचा गॅप होता तिला काना मात्राचे एकही शब्द आजही लिहिता येत नाहीत. इंग्रजी गणित विज्ञान हे विषयआकलनाच्यापलीकडे… मराठी वाचता येत नाही अशी विद्यार्थिनी 42% गुणांनी पास झाली आहे आणि मी गेले चार वर्षे जिच्यावर खूप मेहनत घेऊन शिकवले प्रत्येक विषयाचे पाच पाच पेपर बसून सोडवून घेतले त्या मुलीला 58% मार्क पडले त्याचे मला खूप समाधान वाटले पण या 42% च्या मार्काने मात्र मी अजून शुद्धीवर नाही असे मला वाटते एसएससी बोर्ड कुणाला फसवत आहे यात आपण फसतो आहे हे जाणून सुद्धा गप्प असणारा कोणता वर्ग आहे पालक शिक्षक शाळा शिक्षण विभाग एसएससी बोर्ड यावरच खरे एक मोठा लेख तयार होईल आणि मी तो लिहिणार आहे असो.

पण आमच्या वेळच्या मॅट्रिकच्या आठवणी अर्थात 75 च्या आधी असणाऱ्या पिढीच्याआठवणी अत्यंत रम्य आहेत सुंदर आहेत एवढे मात्र खरे… आणि प्रत्येक एस एस सी परीक्षेच्या निकाला दिवशी ती रात्रीची जागरण ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल असे ओरडणारा वर्तमानपत्र वाला… कौतुकाने एक पेढा जास्त टाकणार स्वस्तिक पेढेवाला ही सगळी मंडळी डोळ्यासमोर येतात गुणवत्तेचा फक्त गुणवत्तेशी संबंध होता परिस्थितीशी नव्हता त्यामुळे कौतुकाच्या बातम्या फारशा येत नसत वाड्यातला पोरगा मॅट्रिक झाला तर सगळ्या वाड्याला आनंद त्या दिवशी तो हिरो असायचा निकालाची ती मजा आता नाही एवढे मात्र खरे काही वेळेला एखादा रिझल्ट चुकलेला असायचा.. मला आठवते तशी तार सुद्धा बोर्डाकडून येत असे आणि ती दुरुस्ती व्हायची एसएससी बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांनाही आदल्या दिवशी तार येत असे वृत्तपत्र वाले त्यांच्या मुलाखती घेत दुसऱ्या दिवशी फोटोसह पेपर मध्ये मुलाखत येत असे नापास झालेल्या मुलांना आई-वडील दिलासा द्यायचे अरे चुकलं असेल येईल कळेल दोन दिवसात.. पण हे फारदा घडत नव्हतं क्वचित असे होत असे त्यामुळे रडणाऱ्या पोरांना पोरींना आई-वडील समजूत घालत ‘अरे चुकीच्या दुरुस्तीमध्ये उद्या बघू आपण ‘. ती सुद्धा एक मजाच होती.

मॅट्रिकच्या परीक्षेच्या अनेक आठवणीत या लेखाच्या निमित्ताने 75 पूर्वी मॅट्रिक झालेल्या सगळ्यांना या आठवणीत पुन्हा एकदा रमता येईल आणि मग घरामध्ये आपल्याला ते सांगतील अरे आमच्या वेळच्या मॅट्रिक परीक्षेचा निकाल म्हणजे काय…. वगैरे वगैरे सांगा आणि जरा कंपल्सरी बसून ऐकायला पण लावा आनंद घ्या…!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… आत्या – भाग – ४२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… आत्या – भाग – ४२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आत्या 

“नाना चौक, ग्रँड रोड, मुंबई. ” येथील ईश्वरदास मॅन्शन या सुखवस्तू लोकांच्या इमारतीत माझे आजोबा (आईचे वडील) राहत. मम्मी (आजी) संध्या, (मावस बहीण) आणि भाईंची बहीण असे चौघेजण त्या इमारतीतल्या ब्लॉक मध्ये पहिल्या मजल्यावर राहत. अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटकं, आखीव चौकटीतलं त्यांचं आयुष्य होतं. या चौघांपैकी भाईंची बहीण म्हणजे आईची आत्या आणि सवयीने आम्ही सगळेच तिला आत्या म्हणत असू.. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व लहानपणापासून नकळत माझ्या मनावर ठसलेलं आहे. वास्तविक तिच्या आयुष्याचा पूर्वेतिहास मी कधी जाणून घेतलेला नाही. माझ्यापुरतं आणि खरं म्हणजे आम्हा सर्वच कुटुंबीयांपुरतं आत्याबद्दल जे माहीत होतं ते हेच की तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर भाईंनी तिचा भावाच्या मायेने आणि कर्तव्य बुद्धीने सांभाळ केला. तिला ते त्यांच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून ती भाईंबरोबरच राहत होती.

आत्याला “वसंतप्रभा” नावाची एकुलती एक मुलगी होती. ती मात्र भाईंच्या घरी आत्याबरोबर कधी राहत असल्याचं स्मरत नाही शिवाय जेव्हापासून आत्याबद्दल माझ्या आठवणी आहेत त्यावेळी वसंतप्रभाचे लग्न झालेले होते आणि ती तिच्या पतीबरोबर सुखाने डोंबिवलीत संसार करत होती. मधून मधून ती तिच्या कमलिनी नावाच्या मुली बरोबर आत्याला भेटायला भाईंकडे येत असे. त्यावेळी आत्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून जाणारा आनंद मात्र मला आठवतो. नात आणि मुलगी भेटल्याचे समाधान तिच्या चर्येवर दिसायचं शिवाय माझी आई, मावशी आणि वसंतप्रभा यांच्यातलं बहिणी बहिणींचं नातंही तसं उल्लेखनीय होतं.

मी सात-आठ वर्षाची असताना मम्मी गेली. आजोबांचं आणि आजीचं विलक्षण प्रेमाचं नातं होतं. आजी गेल्यानंतर आजोबा खूपच एकाकी झाले. प्रचंड मानसिक पोकळीत ते जगत होते त्या वयात मला एवढी जाण नव्हती पण मम्मीचं आणि आत्याचं जे नणंद भावजयीचं नातं होतं ते काहीसं घर्षणयुक्तच होतं. आत्या असहाय्य, निराधार म्हणूनच भाईंनी तिच्या बाबतीतलं भावाचं नैतिक कर्तव्य सांभाळलं होतं आणि मम्मीनेही त्यांच्या या भावनेला दुःख पोहोचेल असं वर्तन कधीही केलं नाही पण कुठेतरी अंतस्थ तिची घुसमट होत असावी. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायचा. खरं म्हणजे या मानसिक कोंडीचा ताप माझे आजोबाही सोसत असावेत पण भेगाळलेलं नातं कधी तुटलं नाही हे महत्त्वाचं. शिवाय चार भिंतींच्या पलीकडे हे पडसाद कधी गेले नाहीत. आजी-आजोबांचे घट्ट प्रेमळ नातं आणि भावाच्या संसारातलं आत्याचं समंजस! गृहीत धरलेल्या नात्याचं अस्तित्व याला मात्र कधी तडा गेला नाही. आजी असतानाही आणि ती गेल्यानंतरही.

आजी गेल्यानंतरची आत्या मला अधिक आठवते. एकट्या पडलेल्या भावाचा आधार म्हणून बहिणीच्या मायेने आजोबांची मनापासून काळजी घेणारी आत्या माझ्या मनात राहिलेली आहे. माझ्या मनातली आत्या वृद्धत्वाकडे झुकणारी होती. तिची राहणी अतिशय टापटीपीची होती. ती नेहमीच पांढरी फुलाफुलांचे प्रिंट असलेली, स्वच्छ नऊवारी लुगडी नेसायची. तिने तिच्या लुगड्यांना कधी इस्त्री केलेली मी पाहिली नाही तरीपण तिच्या साड्या अगदी व्यवस्थित घडी असलेल्या इस्त्री केल्यासारख्याच वाटायच्या. तिचा रंग गोरा, चमकदार होता. डोक्यावरचे केसही ती आवरून सावरून त्याचा घट्ट बुचडा बांधायची. मध्यम बांधायची आणि मध्यम उंचीची आत्या दिवसभर घरातली काम करूनही मला कधी विस्कटलेली, थकलेली वाटलीच नाही. जसे माझे आजोबा शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते होते तशीच आत्याही होती. ओंगळपणा, रेंगाळणं, कसंतरी उरकणं हे तिच्या स्वभावातच नव्हतं. आजोबा, संध्या आणि नंतरच्या काळात आणखी एका सदस्याची वाढ झाली होती आणि ती म्हणजे माझी मोठी बहीण ताई हिची. दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आणि मावशीचा परिवार भाईंकडे राहायला जायचो. स्वयंपाकाचा सर्व भार आत्याच पेलायची. आम्ही मुलं मात्र खेळातच रमलेले असायचे. आई, मावशी तिच्या कामात हातभार लावायच्या पण मुख्य सूत्रधार आत्याच. विलक्षण चव होती तिच्या हाताला! तिच्या हातच्या एकेका पदार्थाची चव जिभेवर आजही रेंगाळते. इतकंच नव्हे तर, ” आजची तुझी शेंगांची आमटी अगदी आत्यासारखीच जमलीय” असं कोणी म्हटलं की १०० पैकी १०० मार्क मिळवल्याचा आनंद होतो. पदार्थ नुसता चविष्टच नाही तर त्याचे रंग, रूप, नेटकेपणा, आकर्षक मांडणी याबाबतीत आत्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. इतके सारे पदार्थ ती एकाच वेळी बनवायची पण कधीही ओट्यावर पसारा नाही, वेडावाकडा भाज्या कापल्यानंतरचा कचरा नाही. मसाल्याच्या डब्यातले पदार्थही कधी एकमेकात मिसळले नाहीत. ज्यात शिजवले जायचं ते भांडंही कधी लडबडलेलं नसायचं. सगळं अगदी नीटनेटकं, स्वच्छ, चकचकीत. त्यावेळी आत्याच्या या सवयीचा धाकच वाटायचा. तिला मदत करावी की न करावी असाच प्रश्न पडायचा मला. कारण “राम! राम! राम! काय बाजार मांडून ठेवला आहे. ” असं म्हणून ती उगीच फटकारेल याचंच भय वाटायचं.

मे महिन्याच्या सुट्टीतला पापड लाटण्याचा एक मोठा कार्यक्रम आत्याबरोबरचा असायचा. अदल्या दिवशीच आत्या वर्षभर कपाटात सांभाळून ठेवलेली पोळपाट- लाटणी धुवून पुसून ठेवायची. आजोबांच्या घरातल्या, दिवाणखान्याला लागून असलेल्या ऐसपैस गॅलरीत जुन्या स्वच्छ साड्या अंथरायच्या, , चारी टोकांवर वजनं ठेवून द्यायची, पापडाचे पीठ बांधून कुटणं ओढणं आणि लाट्यांना तेलात घोळवून ठेवणं ही सगळी कामं आत्याच्या देखरेखी खालीच व्हायची. जराही इकडचे तिकडे झालेलं मला आठवतच नाही. लाटलेले पापड एखादी रांगोळी काढावी तशी ती एकसारखी रांगेत वाळत घालायची. हा पापडांचा कार्यक्रम तसा दोन-तीन दिवस चालायचा. रात्रीच्या जेवणात खिचडी बरोबर तो ताजा ओलसर तळलेला बुडबुडे आलेला कुरकुरीत पापड खायला काय मजा यायची! एकदा का उंच पत्र्याच्या कोठीत हे वाळलेले पापड व्यवस्थित भरले गेले की पापड मिशन संपायचं.

आज सगळं आठवून लिहितानाही मला खूप काही हरवून गेल्याची भावना सतावते. लहानपणी या घरातल्याच उपक्रमांनी आम्हाला खूप शिकवलं. एकत्र सामुदायिकपणे काम करण्याचा आनंद, मेहनत, चिकाटी आणि एक प्रकारचे स्वनिर्मितीचे समाधान काय असते हे अनुभवायला मिळाले. त्याचे महत्त्व त्यावेळी नसेल जाणवलं पण आज बाजारातून सारं काही रेडिमेड आणून रेखीव वेष्टनातून सोडवून, दिसण्यास आकर्षक असणाऱ्या पदार्थांना स्वाहा करताना त्यात हरवलेलं, कधीही न सापडणारं, ज्याला नावही देता येणार नाही असे काहीतरी मी शोधत राहते. त्यावेळी घरोघरी अशा रांधणाऱ्या, राबणाऱ्या गृहिणींमधली स्त्री आणि माझ्यात वास करणारी आजच्या आणि उद्याच्या मधली स्त्री यांना तुलनात्मक रीतीने जेव्हा मी पाहते ना तेव्हा आत्याचं कुठल्याही कामात मनापासून झोकून देणारं, शिस्तप्रिय आणि हसतमुख व्यक्तिमत्व मी विसरू शकत नाही. शिवाय याही पार्श्वभूमीवर आत्याचं एक वेगळं अस्तित्व होतं. भावाच्या संसारात राहूनही तिनं तिचं एक विश्व निर्माण केलं होतं. ती रसिक होती कलाकार होती. झाडं, पाना -फुलांची तिला मनस्वी आवड होती. गच्चीच्या एका कोपऱ्यात कुंड्यांमधून तिने अनेक झाडं लावली होती. जास्वंदी, गुलाब, मोगरा, तुळस झिपरी टेबल पामसारखी बरीच झाडं तिने लावली होती आणि त्या झाडांची निगा ती स्वतः राखत असे. त्यांना पाणी घालणं, माती कोरणं, आकार देणं सारं काही इतकं कलात्मकतेने ती करायची! कुठेही पाण्याचे, मातीचे वेडेवाकडे सांडलेले ओघळही दिसायचे नाहीत. रोज सकाळी अगदी अलगद गुलबक्षी, सदाफुली, तगरीची फुले तोडून देव्हार्‍यात पूजेसाठी ठेवायची. पूजा बहुतेक आजोबाच करायचे. कधी कधीच आत्या करायची. देवांना धुवून पुसून चंदन, गंध फुलं वाहून, उदबत्तीच्या वासात निरांजनाच्या मंद प्रकाशात देव्हारा कसा छान उजळायचा! आत्याची पूजाही कशी देखणी असायची, सुंदर असायची. सजलेल्या त्या देवांकडे पहातच रहावसं वाटायचं. कदाचित त्यावेळी पूजाअर्चा म्हणजे रिकामे उद्योग, एक काम असंच वाटायचं का? आज मात्र याही रिकाम्या उद्योगाचे अर्थ निराळे जाणवतात. चित्त एकाग्र करण्याचा तोच एक संस्कार नव्हता का? आणि कुठल्याही कामात सौंदर्याची जपणूक कशी करायची आणि का करायची याचाही एक वस्तूपाठ मनावर नकळतपणे बिंबवला गेला होता.

आमच्याशिवाय आत्याने स्वतःचा असा परिवार जमवला होता. खरं म्हणजे ईश्वरदास मॅन्शन मध्ये राहणारी सगळीच कुटुंबं आर्थिकदृष्ट्या भक्कम होती. अनेकजण उद्योग, व्यवसाय, सरकारी कामकाजात उच्च हुद्द्यावर होते. सर्वांचीच राहणी, उच्च, उंच आणि वेगळ्या दर्जाची होती पण अशाही माणसांच्या समूहात आत्याला रमाबेन, शहाबेन, लाठीबेनसारख्या जिवलग मैत्रिणी लाभल्या होत्या. त्या आत्याच्या चाहत्या आणि प्रशंसक होत्या. त्या अगदी प्रेमाने, आपुलकीने आत्याला भेटायला येत, गप्पा मारत. आत्या म्हणजे “विमलबाई पंढरीनाथ दिघे” अस्सल मराठी पण या गुजराती बायकांशी तिचे चांगलेच जमायचे. आत्या त्यांच्याशी फक्कड गुजराती भाषेत बोलायची तेव्हा खूपच मजा वाटायची. आत्याचे बेसन लाडू आणि रमाबेनचे ढोकळे एकमेकांच्या घरात आवडीने खाल्ले जायचे. शिवाय या मैत्रीतला एक महत्त्वाचा धागा म्हणजे आत्याची कलाकारी. आत्या अतिशय सुरेख बारीक धाग्यांचे, मणी लावलेले क्रोशाकाम केलेले बटवे सफाईदारपणे विणायची. आत्याचे बटवे साऱ्या बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध होते. आत्याच्या या बटव्यांना मोठमोठी गिऱ्हाईकं रमाबेन, लाठीबेन आणून द्यायच्या. बटवे विकून आलेल्या पैशात ती तिचे वैयक्तिक खर्चही भागवू शकायची. त्याच पैशातून ती तिच्या मुलीसाठी नातीसाठी भेटी आणायची.

दुपारी आवर सावर झाली की ती मधल्या खोलीतल्या मोठ्या खिडकीजवळ कॉटवर बसून तिचं विणकाम उघडायची. मग्न होऊन एकचिताने विणकाम करणारी आत्या आजही माझ्या नजरेसमोर आहे. ती क्रोशाची सुई, त्यावर घातलेले टाके आणि त्यातून धाग्यांची वीण उलगडवत जाणारी तिची गोरीपान काहीशी वक्र झालेली बोटं मला आजही दिसतात. विणकाम संपलं की ती स्वतःच्याच हाताने तिची मनगटं दाबायची. त्यावेळी नकळतपणे मी एका सक्षम, स्वावलंबी, सहनशील स्त्रीच्याच रूपात तिला पहायचे.

पाणी आणि प्रतिबिंब ही दोन्हीही नजरेला त्यांच्या अस्तित्वाप्रमाणे वेगवेगळी दिसतातच. भावाच्या आधाराने जीवनाचा डोंगर चढणाऱ्या आत्यालाही तिचं अस्तित्व होतं. स्वावलंबनाची सक्षम धार तिथे होती. आत्या निराधार असेल कदाचित पण ती लाचार कधीच नव्हती. तिच्या अंगच्या गुणांना तिने कधी पेटीत बंद करून ठेवले नाही. तिच्या कलाकारीला तिने छंद आणि व्यवसायाचे रूप दिले. तिने धाग्यांच्या, शिंपल्यांच्या, कवड्यांच्या अनेक बाहुल्या बनवल्या, कपडे शिवून कापूस भरून पक्षी, प्राणी, जलचर बनवले, झबली, स्वेटर, टोपरी, मोजे विणले, साड्यांना लावण्यासाठी सुंदर किनारी, सुती फुलं केली, नाना प्रकारची तोरणे ही बनवली. फॅशन शोसाठी उपयोगी पडणारी वस्त्रे तिने कुणाकुणासाठी शिवली या साऱ्यांची गणतीच नाही. आमच्या ज्ञाती वर्धापन दिनानिमित्त भरणाऱ्या कला प्रदर्शनात आत्याने अनेक बक्षीसंही मिळवली. व्यक्ती स्वातंत्र्य जपणार्‍या त्याकाळच्या स्त्रियांमध्ये मी आत्याला प्रातिनिधिक स्वरूपात पाहते. आज वाटतं आत्या नावाचा एक मूर्तीमंत कुटीरोद्योगच आमच्या आयुष्यात होता. खूप शिकलं, खूप पदव्या घेतल्या, खूप कीर्ती मिळवली, खूप माया जमवली, वर्तमानपत्रातून, स्क्रीनवर चमकलात म्हणजेच तुम्ही तारे झालात का? पण आमच्या आत्या सारखे फारसे न चमकलेले तारे कधी कधी आपल्या घरातच असतात. त्यासाठी वैज्ञानिक दुर्बिणीची गरज नसते. असे तारे पाहण्यासाठी मनाचीच दुर्बीण करावी लागते….

– क्रमश: भाग ४२.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण ☆ सुश्री शीला पतकी 

वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते. साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या, ‘‘बाई, माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो दोन महिन्यांपूर्वी वारला. ” मला जरा धक्काच बसला. कारण मुलगा अगदी तरुण होता… २३-२४ वर्षांचा. त्या बाई पुढे म्हणाल्या, ‘‘त्याची बायको वीस वर्षाची आहे. तिचे काय करावे मला समजत नाही. ”

मी म्हटलं, ‘‘किती शिकली आहे? ”… 

त्या म्हणाल्या, ‘‘आठवी नापास झालीय. कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती. मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली. पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले. पोरगी देखणी आहे. वयाने लहान आहे. मी कामाला जाते. घरात माझा दुसरा तरूण मुलगा आहे. म्हणजे तिचा दीर आहे. मला काही सुचत नाही. मी काय करू? ”… मी म्हणाले, ‘‘बाई, शिकवा मुलीला. शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. धुणेभांडे करण्यासाठी ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात”…

मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग. बोलके डोळे… लांब केस… छान उंची, बांधा. हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते. मी म्हणाले, ‘‘हिला शिकवा. ” त्या म्हणाल्या, ‘‘आता कुठे शाळेत पाठवणार? ”… मी म्हणाले, ‘‘माझ्या शाळेत पाठवा. नापास मुलांच्या… तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकूया”… त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती. मी त्यांना सांगितले की ८,०००/- रुपये फी भरावी लागेल. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ” 

मी म्हणाले, ‘‘फुकट शिक्षणाची किंमत नसते. मी तुम्हाला एक मार्ग सुचवते”… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती. मी त्यांना एक मार्ग सांगितला की, ‘‘सकाळी ८ ते ११ पर्यंत बालवाडीला सेविका म्हणून तिने काम करावे. साडेअकराला शाळेत बसावे. साडेपाचला शाळा सुटते. जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे. मी तिला महिना पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून कट केले जातील. याप्रमाणे तिची जी काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची शाळेची फी भरेन. फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावीच लागेल. ”

त्यांना ते पटलं. पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या. मी त्यांना दिलासा दिला, ‘‘ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही काळजी करू नका. ” त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे. तुम्ही सांभाळा. ” मी म्हणाले, ‘‘हरकत नाही. आता ती माझी जबाबदारी आहे. ” याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली.

मुलगी हुशार होती. कामाला चपळ होती. एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं. त्यामुळे शाळेला सुट्टी नाही. काम उत्तम व नेटके करत होती. अभ्यासाची गोडी वाढली. आमच्या अनेक शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली. थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची. परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती. या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले. तिचा उत्साह वाढला. मुलगी खरंच हुशार होती, पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती.

हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दरमहा मासिक घातलं जाते. त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी. आणि ते कार्य दुपारी बाराला असते. याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे. तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची… तिला काहीच कळत नव्हते. संसार म्हणजे काय हे कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता. त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती. ती म्हणाली, ‘‘बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय”… मी म्हणाले, ‘‘बोला. ” त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती. ती हिच्या नावावर केलेली आहे. पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही. तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला. पण अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरी येईल. काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो, म्हणून”… ‘‘अगदी खरे आहे. ” मी म्हणाले, ‘‘मग काय विचार केलात? ” 

त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते”… खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते. पण तरीही आईच्या सावधपणाने मी त्यांना म्हंटलं, ‘‘का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमच्या थोड्याशा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का? ” त्या म्हणाल्या, ‘‘नाही हो बाई. पोरीला सावत्र आई आहे. बाप कुठवर बघणार. माझ्या घरात तरी काय वेगळं आहे. माझा नवरा आजारी. पोरगा अपंग. ” 

लहानपणी झाडावरून पडून एक हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडंसं अपंगत्व आलं होतं त्या मुलाला. बाकी मुलगा चांगला होता. निर्व्यसनी होता. एका दुकानात काम करत होता. बाईचं स्वतःचं घर अगदी भर पेठेत होतं. जुन्या चाळीत रहात असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते. त्यामुळे दोन खोल्यांचं छप्पर डोक्यावर होतं. बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता. आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता. या सर्व दृष्टीने विचार करता ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता’ या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच. मी म्हंटलं, ‘‘मुलीच्या वडिलांना बोलावून घ्या. ”

आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले. बरोबर त्यांच्या नात्यातली चार माणसंही आली. बोला-चाली झाल्या. लग्न ठरले. पण मी त्यांना एकच अट घातली की, ‘लग्न रविवारी करायचं. मुलगी शाळा बुडवणार नाही. ’ एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले. त्यांच्या गावाकच्या त्यांच्या देवाच्या दारात जाऊन लग्न करायचे ठरले. मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या. अर्थात् हे सगळं तिला एकटीला बाजूला घेऊन समजून सांगितले. तिला विचारले, ‘‘हे तुला चालणार आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस. तुझी आणि तुझ्या नवऱ्याची बेडरूम जी होती, तीच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे. त्याच घरात तुला वावरावयाचे आहे. हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? ”

तिची मानसिक तयारी चांगली झाली होती. ती म्हणाली, ‘‘हो. मी हे करेन. तो दिर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याच आहे आणि ती माझी आई पण आहे. ” तरीही ‘आई आणि बाई’ या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याच. मी तिला सांगितले, ‘‘तुझा पहिला नवरा हा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी, त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस. पुरुषांना हे आवडत नसते. त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे. पण त्याचा अहंभाव दुखावेल असे, पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस. आठवणी सांगू नकोस. हे पथ्यं पाळ. म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. ”

हे खरंतर खूप अवघड होते. पण तिला निभावणे भाग होते… झाले… मग काय? लग्न झाले… सोमवारी नवी नवरी आणि जावई पाया पडायला आले. शाळा सुरू झाली. जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला… त्यानंतर आमची अभ्यासिका, परीक्षा, सराव परीक्षा… हे सगळं पार पडलं. आणि मुलगी ७५% गुणांनी पास झाली…

मग पुढचा विचार सुरू झाला. तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलावून घेतले. आणि सांगितलं की, आता स्वत:च्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षण तिला दिले पाहिजे. ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते. लगेचच मी आमच्या इथे असलेल्या ‘मुळे हॉस्पिटल’ मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला. गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षांच्या नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळाला.

‘आता या तीन वर्षाच्या कोर्समध्ये मूल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या’… इतके मी त्यांना सांगितले. खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या, पण काय करणार… इलाज नव्हता. त्यांनीही हे सगळं वेळोवेळी ऐकलं… अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली. लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, त्याच महिला डॉक्टरने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले. नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला.

नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती. आज ती तिथे उत्तम काम करीत आहे. दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे. दोन गोंडस मुले झाली आहेत. संसार सुखाचा चालला आहे. स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…!

मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले, तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे. आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख-समाधान हे मला तिच्या चेहऱ्यावर वाचता येते व लक्षात येतं की, हे केवळ शिक्षणाने घडले आहे.

दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात. ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल, अशा गोष्टी तुम्हाला सापडतात. लक्षात ठेवा शिक्षणाला पर्याय नसतो… न शिकता मोठी झालेली माणसंही आहेतच… पण ते वेगळे. शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही, तर सुखी होतो. म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे की शिका. आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या. जमलं तर एखाद्याला लिहायला, वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…!

मग काय? … करा सुरुवात… ‘जून’मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा. शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षणाची गोडी लावा. त्याला प्रवाहात आणा. खरंच, इतके तरी आपण करू शकतो ना…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मुक्त मी… विमुक्त मी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “मुक्त मी.. विमुक्त मी…” ☆ श्री जगदीश काबरे

जन्माला आलो तेव्हा पहिली पाच मिनिटे मी नागडा होतो, मला कुठले नावही नव्हते, जात आणि धर्मही नव्हता, मी कुठल्याही प्रकारचे पाप आणि पुण्यही केलेले नव्हते की कोणत्याही निष्ठुर कळपात नव्हतो. पण हे स्वातंत्र्य फक्त पहिले पाच मिनिटेच टिकले.

या पहिल्या पाच मिनिटांनंतर त्यांनी माझे नाव, राष्ट्रीयत्व, धर्म आणि जात ठरवले आणि माझ्या कपाळावर ठसठशीतपणे त्याचा शिक्का मारला. मग मी माझे आयुष्य अशा गोष्टींसाठी लढत आणि बचाव करत घालवालं ज्या मी कधी निवडल्या नव्हत्याच. पण नंतर नंतर मला त्यांची नशा चढली.

म्हणजे पाच मिनिटानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य गुलामीत आणि पारतंत्र्यात घालवलं. कारण देव, देश आणि धर्माच्या सळ्यांनी तयार केलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यात त्यांनी मला कैद केले होते.

पण एका क्षणी मेंदू विचार करायला लागला आणि या कैदखान्याची जाणीव झाली. मग मी देव, देश आणि धर्मापेक्षा माणूस, माणुसकी आणि मानवतेला प्राधान्य देऊ लागलो. त्याबरोबर या सोन्याच्या पिंजऱ्याच्या सळया तटातट तुटू लागल्या आणि मी मुक्त झालो… खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. सगळ्या मानव जातीकडे मी प्रेममय नजरेने पाहू लागलो. प्राणी, वनस्पती आणि आकाश माझे सगेसोयरे झाले. माझे मन आभाळमायेने दुथडी भरून वाहू लागले.

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय माउली… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय माउली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय माउली,

बा विठ्ठला,

देवा, तू असा आहेस ना? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…

आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो…

मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…

खरं सांगू का?

प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते… आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते…

तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल…

तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,… कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय?

देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…

देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…

विठू माउली,

तुला सगळंच ठावे…, तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना…

तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…

अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती… पण तू चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली… आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू…?

अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…

एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…

हे तुला करायला आवडेल…

तुझ्या मनातलं बोललो ना…?

मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…

बरं, आता परतीला निघतो…

जाताना रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जातो…

देवा, आणखी एक गोष्ट मागाविशी वाटते… मागू का?

तू नाही बोलायच्या आधीच मागतो…

…… तुझ्या नामाचे प्रेम दे……! देशील ना?

तुझाच,

एक वारकरी…!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गरज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ गरज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एका मैत्रिणीच्या आईचे परवा ९५ व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. ६५ वर्षांचा त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठ-दहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी १०० माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…. पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रात मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली!

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी, हा यक्ष प्रश्नच!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, १०० माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेन्टेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही… असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले. आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता-करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली.

या उस्तवारीत प्रचंड मनःस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमविण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले, ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगताना ‘ती’ मैत्रीण खरंच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले…

*१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

*२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

*३) आपल्यासाठी वस्तू, वस्तूंसाठी आपण नाही. नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात व वस्तू राखण्यात जाते.

*४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

*५) जितकी अडगळ कमी, तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

*६) विकत घ्यायच्या आधी ‘का? ‘ चा शोध लावावा.

*७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

*८) ‘दान’ हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

*९) आजचा संचय, उद्याची अडगळ.

*१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

*११) जेवढ्या वस्तू कमी, तितके घर मोकळा श्वास घेते. माणसे शांत व समाधानी असतात. मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

*१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशांची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच. हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

*१३) ‘किमान गरजा’ ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

*१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच असतो.

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पासवर्ड… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ पासवर्ड… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” आई, तू रडू नकोस हं” इवल्याश्या गो-या गो-या हातांनी आईला मिठी मारत श्रीहान बोलला..

श्रीहान.. माझ्या बहिणीचा नातू.. भाचा सौरभ नि भाचेसून यशश्रीचा लेक.. पाच वर्षांचा.. गोड नि लाघवी मुलगा..

सौरभ, यशश्री, सानवी म्हणजे श्रीहानची थोरली बहीण आणि श्रीहान.. सोलापूरला आमच्याकडे आलेले..

रात्रीची जेवणं झाल्यावर 

आम्हा मोठ्यांच्या गप्पा रंगल्या..

नि सानवी नि श्रीहान खेळात गढून गेले..

खेळाचं रूपांतर कधी भांडणात झालं ते कळलच नाही..

पाठीवर पडलेल्या धपाट्याचा जोरदार आवाज ऐकू आला.. नि आम्ही तिकडे धावलो..

श्रीहानचे निळेशार डोळे पाण्याने गच्च भरले होते..

पण त्याला आपण शूर आहोत, हे दाखवायचं होतं.. त्यामुळे डोळ्यातून पाणी बाहेर पडू न द्यायची त्याची धडपड चालली होती..

लेकराच्या भरलेल्या डोळ्यांनी आईचं हृदयही गदगदलं…

तिने त्याला छातीशी धरलं..

“श्रीहान, तू शूर आहेस नं..? रडायचं नाही.. ” तिने त्याच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवला..

त्यानं का कुणास पण तिच्या डोळ्यात पाहिलं…

“आई, तू… रडू नकोस हं…” त्याच्या चिमुकल्या हातांनी तिला कवेत घेतलं..

त्याच्या या आईला ” तू रडू नकोस” म्हणण्यानं सगळ्यांनाच हसू फुटलं.. त्याच्या माऊलीला सुद्धा…

आईच्या चेह-यावरच्या त्या हास्यानं काय जादु केली.. माहीत नाही..

त्याच्या अंगात काहीतरी संचारलं..

त्याने पटकन डोळे पुसले.. नि बहिणीच्या पाठीत जोराचा गुद्दा घालून तो विजयी भावनेने आईकडे पाहू लागला.

आईच्या चेह-यावरच्या एका हास्यानं त्या पिल्लात केवढा आत्मविश्वास निर्माण झाला..! !

नवजात अर्भक.. भुकेच्या नि वेदनेच्या पलीकडील काहीही न कळणारं..

आईच्या, जिवलगांच्या चेह-याकडे… त्यांच्या चेह-यावरच्या हास्याकडे.. त्यात स्वत:बद्दल असलेल्या कौतुकाकडे पहात मोठं होतं.. नि अगदी महिन्या-दोन महिन्याच्या वयात “हसणं” ही भावना त्याच्यात अलगद जन्माला येते..

ते आपल्या मातेकडे पाहून पहिल्यांदा हसतं तेंव्हा त्या माऊलीला आकाश ठेंगणं होऊन जातं..

आणि ती जेंव्हा पुन्हा त्याच्याकडे पाहून प्रतिसादात्मक हसते, तेंव्हा त्याला आयुष्याचा ” पासवर्ड” मिळतो..! !

त्याचं कुशीवर वळायला लागणं, पालथं होणं, बसायला लागणं, उभं राहणं, चालणं, धावणं.. प्रत्येक पहिल्या कृतीच्या वेळचा माऊलीच्या चेह-यावरचा आनंद.. दहा हत्तींचं बळ देणारं हसू.. त्या बाळाला.. प्रगतीच्या मार्गावर अलगद पोहोचवतं..

आपल्या आजारपणात पाण्यानं भरलेले नि आपल्या यशानं चमकलेले माऊलीचे डोळे यांतला फरक कळण्याइतकं ते बाळ मोठं होतं नि आईच्या चेह-यावर हसू आणण्यासाठीची त्याची धडपड सुरू होते..

शाळेत मिळालेले चांगले गुण, परीक्षेत मिळवलेला पहिला नंबर, निरनिराळ्या स्पर्धांमधून, खेळांमधून मिळालेल्या यशाने जन्मदात्रीबरोबरच, वडील, आजी-आजोबा, भावंडं, गुरुजन यांच्या चेह-यावरचं कौतुकाचं हास्य आता त्याचा प्रेरणास्त्रोत झालेला असतो..! !

वाढत्या वयाबरोबरच निसर्ग पासवर्डची साईट बदलतो..

“तो ” असेल तर त्याला ” तिच्या ” चेह-यावरचा 

 आणि

” ती ” असेल तर तिला ” त्याच्या ” चेह-यावरच्या आनंदाचं व्यसन लागतं..

त्या खास चेह-यावरचं कौतुक पाहण्यासाठी तो कायकाय करतो…

कुणी आभाळाएवढं शिक्षण घेतं..

कुणी सातासमुद्रापार जातं..

कुणी जीवावरचा धोका पत्करून काम करतं..

कुणी जीवापलिकडचे काबाडकष्ट करतं..

कुणी स्वत:ला सजवतं..

कुणी पोटातून हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी अन्नपूर्णेची उपासना करतं…

तर कोणी घरच्या लक्ष्मीच्या चेह-यावरच्या समाधानासाठी लक्ष्मीची आराधना करतं! !

कुणाची गज-याची, कुणाची हि-याच्या दागिन्याची….

कुणाची नाजुक बोटांनी बनवलेल्या अलवार चिरोट्याची..

तर कुणाची घट्टे पडलेल्या हुळहुळत्या हातांनी थापलेल्या भाकरीची…

प्रत्येकाची वेगवेगळी धडपड…

पण सगळ्यांचा पासवर्ड मात्रं तोच..

जिवलगाच्या चेह-यावरचं ” हसू “…! !

आणि एकेदिवशी त्यांच्या वेलीवर एक नाजुकशी कळी उमलते..

नि ती त्यांच्याकडे पाहून जेंव्हा पहिल्यांदा खुदकन् हसते…

तेंव्हा वर्तुळ पूर्ण झालेलं असतं..

अख्खी अलिबाबाची गुहा त्या ” इवलुशा तिळाच्या पासवर्डनं ” सताड उघडलेली असते..

डोळ्यात न मावणा-या त्या खजिन्याच्या तेजानं डोळे वाहू लागतात..

आता त्या दोघांचं सारं काही सुरू होतं ते त्या “कळीच्या” चेह-यावरचं ते “पहिलं हसू” त्या दोघांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसच ठेवण्यासाठी..

भोवतालची तमा न बाळगता, लाज सोडून अगदी गर्दीतही अंगावर पाजलेलं दूध, तान्ह्याचं रडणं थांबून त्याचा हसरा चेहरा पाहण्यासाठी जागलेल्या अनंत रात्री, चिमुकल्यानं बोळकं पसरून केलेल्या हास्यामुळे होणा-या विश्वदर्शनासाठी पाठ दुखत असतानाही त्याचं घोडा होणं नि पिल्लाला घरभर फिरवून आणणं..

बक्षीस घेताना त्या बालजीवाच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासाठी तिने घेतलेली दिवसरात्र मेहनत…

सारं काही फक्त त्या काळजाच्या तुकड्याचं हसू चिरंतन रहावं म्हणून…

“बदल”… हाच आत्मा असणारा निसर्ग…

आईवडिलांचा चेहरा पहात…

त्यांच्या दु:खाने दु:खी होत् नि त्यांच्या आनंदाने मूठभर मांस अंगावर चढणारं ते लेकरू मोठं होतं..

त्याची मरूस्थळं बदलतात..

त्याचं वेगळं विश्व निर्माण होतं..

जिथं या मावळत्या सूर्यांच्या उर्जेची गरज नसते.. ना त्यांच्या चेह-यावरच्या आनंदाची..

आता फक्त असतं…..

त्याच्यासाठी तिच्या आणि तिच्यासाठी त्याच्या सुरकुतलेल्या चेह-यावरचं थकलेलं हसू…! !

तिने चेपून दिलेली त्याची दुखरी पावलं, त्यानं आणून दिलेला किराणामाल, त्याचे दात काढलेले म्हणून तिनं निगुतीने केलेली मऊसर खिचडी…

तिने न सांगताही त्याने आणलेली तिची औषधं…

सुनेसमोर त्याने खंबारपणे घेतलेली तिची बाजू…

अशा जगाच्या दृष्टीने किरकोळ गोष्टीही

जोडीदाराचा चेहरा हसरा करण्यासाठी पुरेशा असतात…

अशातच एक दिवस तो देव नावाचा कोणीतरी त्यातल्या कुणातरी एकाला घेऊन जातो… राहिलेल्याची करूण मजा पाहण्यासाठी…

आता त्या एकट्याला कुणाच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी जगावं, हे कळेनासं होतं..

जगण्यासाठीचा पासवर्डच हरवलेला असतो!!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्रीमधील मंदी… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

??

☆ मैत्रीमधील मंदी… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

‘मैत्रीमधील मंदी’

एक अत्यंत समर्पक आणि अंतर्मुख करणारा विषय…

मी अलीकडे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या फेब्रुवारी अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला.

या लेखात ‘Friendship Recession’ म्हणजेच मैत्रीमधील मंदी कशी आपल्या दैनंदिन व्यवहारात शिरकाव करत आहे, हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

American Perspectives Survey नुसार, 1990 पासून अमेरिकन प्रौढांमध्ये “एकही जवळचा मित्र नाही” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण चारपट वाढून १२% वर गेले आहे, तर “१० किंवा अधिक जवळचे मित्र आहेत” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झाले आहे.

माझं मत आहे की जर भारतातील शहरी भागात अशीच एखादी सर्व्हे केली, तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढत आहेत, पण खरे ‘मित्र’ कमी होत आहेत.

पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो, तरी एखाद्या बारमध्ये गेले, काउंटरवर बसलो आणि ओळखीच्या, अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगल्या असं सहज घडलं असतं.

पण आजकाल अनेकजण एकटे टेबलवर बसतात, गर्दीकडे पाठ करून.

अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे, एकटे जेवणं हे प्रकार मागील दोन वर्षांत २९% ने वाढले आहे.

Stanford University तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक रचायला शिकवण्यासाठी ‘Design for Healthy Friendships’ नावाचा अभ्यासक्रम चालवते.

हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाही, तर एक सांस्कृतिक संकट आहे.

मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही; ती आता एक प्राथमिकता असली पाहिजे.

आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणामध्ये गुंतवतो, हे सर्व झपाट्याने बदलतंय.

एकटेपणा हा आता निवड नाही, तर एक नवा नॉर्म बनत चाललाय.

आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही, तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही, तर मैत्री टिकवण्याचीही क्षमता गमावून बसण्याचं कारण बनतो.

जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही, तर “संबंध” – हा आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत – आपल्याला नकळत गमवावा लागेल.

पूर्वी जिथे नैसर्गिकरीत्या मैत्री फुलायची अशा संस्था – धार्मिक कार्यक्रम, क्लब्स, क्रीडा संघटना, रोटरीसारख्या स्वयंसेवी संस्था – या आता संख्येने आणि प्रभावाने दोन्ही प्रकारे कमी होत चालल्या आहेत.

आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंततोय – सोशल मीडिया, कुटुंबातील जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यात.

हो, पाळीव प्राणी!

माझ्याच अनेक मित्रांनी भेटीला येणं केवळ पाळीव प्राण्यांच्या कारणास्तव टाळले आहे.

आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही, ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली, अशा स्वरूपात आली आहे.

हे सगळं असूनही, मैत्रीचे महत्व अधोरेखित करणारे भरपूर संशोधन उपलब्ध आहे.

Bonnie Ware या हॉस्पिस परिचारिकेच्या ‘The Top Five Regrets of the Dying’ या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे –

“I wish I had stayed in touch with my friends. ”

“मला वाटतं, मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं. ”

संशोधन सांगतं की –

“Social isolation म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज १५ सिगारेट पिण्याइतकं धोकादायक असू शकतं. ”

मैत्री ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.

Harvard University च्या ८० वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट सांगितलं गेलं की,

“आपल्या आयुष्यातील आरोग्य व आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता (predictor) म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे, तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे. ”

Survey Centre on American Life च्या अहवालात एक मूलभूत सत्य आहे:

“More friends equals more life satisfaction. ”

“अधिक मित्र = अधिक आयुष्यात समाधान. ”

जसं गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो, तसंच मैत्रीसुद्धा!

ती एक दिवसात होत नाही – तिच्यासाठी लागतो वेळ, प्रयत्न आणि मनापासूनचा सहभाग.

माफ करा, विसरून जा,

गरज वाटली तर माफी मागा,

फोन करा,

बिल भरा,

ट्रिप प्लॅन करा,

एखादं गिफ्ट द्या,

स्मृती निर्माण करा –

जरी ती आठवण केवळ स्वतःसाठीच असेल तरीही!

शेवटी मिर्झा गालिब यांचा हा शेर शेवटसाठी खास –

“दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे ऐ खुदा…

तेरे साथ तो मरने के बाद भी रह लेंगें…”

मित्र व्हा, आणि सदैव आशीर्वादित राहा. – 🙏

लेखक : अनामिक

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कालाय तस्मै नमः…” – लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

??

☆ “कालाय तस्मै नमः…” – लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नेहाचा फोन आला.

“आई, veg माखनवला ची रेसिपी सांगा ना पटकन. मिहीरचा बंगलोर वाला मित्र फॅमिलीला घेऊन जेवायला येतोय. “”

“इतकं आयत्यावेळी कसे कळवतात.? “

हा विचार मनात दाबून नेहाला म्हटलं, “अगं सगळ्या भाज्या, पनीर वगैरे आहे का तुझ्याकडे. “?

“आई, मी भाज्या, पनीर, दही आणि श्रीखंड आत्ता online order केलंय. येईल अर्ध्या तासात””

बरं, म्हणून मी तिला रेसिपि सांगितली.

फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला, वस्तूंची मुबलकता, “सेवेसी तत्पर agencies, आणि या सगळ्याचा मनसोक्त उपभोग घेताना न कचरणारी आजची पिढी..

यामुळे कोणावर अवलंबून रहायला लागणं, किंवा दुसऱ्यांकडून कसली गरज भासणं हे आता जवळ जवळ संपुष्टात आलंय.

…. हेच कारण असेल का आजची पिढी आपल्या माणसांपासून दुरावत चाललीय त्याचं..? ? ?

मगाशी आला माझ्या मनात विचार की आयत्या वेळेला कसे कळवतात. पण आता हसूच आलं.

चाळीस वर्षापूर्वी आमच्या कडे असेच आयत्या वेळी पाहुणे, मित्र यायचे, किंवा आम्हीही जायचो.

त्यावेळी संपर्काची काही साधनं नव्हतीच. मोबाईल तर सोडाच, landline पण अभावाने आढळायची.

त्यामुळे त्याचं काही वाटायचंही नाही. फरक इतकाच की त्या काळी 24/7 किराणा, वस्तू, देणारी दुकानं नव्हती.. की रोख पैशाशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.

त्यामुळे असे अचानक कोणी आले तर आम्हाला शेजाऱ पाजाऱ्यांवर अवलंबून रहायला लागायचंच.

क्रेडिट डेबिट कार्ड्स नव्हती. की on line बँकिंग नव्हतं. Bank बंद झाली आणि काही पैशाची अडचण अचानक उभी राहिली तर जवळ राहणाऱ्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून शेजाऱ पाजाऱ्यांकडून चक्क पैसे मागायला लागायचे.. तो काळच तसा होता. त्यामुळे एकमेकांची मदत लागायचीच. म्हणून तर इतकं मिळून मिसळून, एकमेकांना धरून राहणारे आहोत का आपण….? ?

तेव्हा निदान वस्तूंची टंचाई नव्हती. आर्थिक स्तर उंचावला होता. म्हणून अवलंबित असणं थोडं मर्यादेत होतं.

पण माझा बालपणीचा काळ तर त्याहून निराळा होता. शिवाजी पार्कसारख्या विभागात चाळीत माझं बालपण गेलं. सगळेच मध्यमवर्गीय. बेताची कमाई आणि वस्तूंची टंचाई.

मला आठवतंय, त्यावेळी शिवाजी पार्कसारख्या परिसरात एकही डेअरी नव्हती. आरेच्या सेन्टरवर फक्त सकाळी दूध मिळायचं ते ही कार्डवर आणि अर्धा लिटर. कुठे गावाला गेलो, दुपारी, संध्याकाळी परतलो तर दुसऱ्या दिवशीपर्यंत दूध नाही मिळायचं.

रात्री पाणी यायचं.. तोपर्यंत पाणी नाही… पण चाळीचा मामला, एकदम खुल्लमखुल्ला… चाळभर सगळ्यांना सगळ्यांची खबर असायची. कुठे गेलेत कधी येणार, सगळं.. घराच्या किल्ल्या दोन जणांकडे तरी असायच्याच. कोणीतरी घर उघडून पाणी भरून ठेवलेलं असायचं. कोणी तरी सकाळी आमच्या कार्डवर दूध आणून ठेवायचं. (कोणीही दोन चार दिवसासाठी कुठे जाणार असेल तर दुधाचं कार्ड शेजारी जमा करण्याचा अलिखित कायदाच होता जणू.. तेवढे दिवस जरा त्यांच्याकडे दुधाचा सुकाळ)

फ्रीझ कुठे होते? म्हणजे ओघाने दोन तीन वेळेला दूध तापवणं आलंच.. दुधाची इतकी टंचाई, तर दही कुठून मिळणार हो. मग आई पिटाळायची छोटीशी वाटी देऊन शेजारच्या काकूंकडे.. “विरजण” मागायला.

इतक्या कठीण परिस्थितीशी सामना करताना एकमेकांना धरून राहणं, प्रेमाने गुण्यागोविंदाने राहणं ओघाने यायचंच. एकोपा होता, माणुसकी होती, माझं तुझं असा भेदभाव नव्हता. आम्हा लहान मुलांमध्ये ही नव्हता. चार आणे तासावर घेतलेली सायकल, दोघात चालवायचो. एखाद्याकडे बॅट असायची, ball वर्गणी काढून आणायचा. रांगोळीचे रंग, ठिपक्यांचा कागद मजल्यावर एक असायचा. देण्याघेण्याचा, वाटून घ्यायचा संस्कार नकळत रुजला..

एवढं कशाला? आमच्या मजल्यावर थर्मामीटर फक्त काळेकाकूंकडे होता.

ताप आला की कोणीही कोणत्याही वेळी त्यांच्याकडे थर्मामीटर मागायला जायचे. पण काकूंचा “पारा” कधीही चढलेला पहिला नाही…

तात्पर्य काय…

गरज आणि परस्परांवर अवलंबून रहायला लागत असल्यामुळे माणसं कायम जोडलेली राहिली.

आज परिस्थिती खूपच निराळी आहे. आजच्या पिढीला सगळं सहज उपलब्ध आहे. सुखसोयी, सुविधा, पायाशी लोळण घेतायत. माझं कुणावाचून काहीही अडत नाही हा अटीट्युड आपोआप बनत चाललाय.

स्वतः च्या वर्तुळापलीकडे त्यांना कोणाशी खास संपर्क ठेवावा असं वाटत नाही. हेच पुढे पुढे जात नात्यातही दुरावा आणू पाहतय.

…. म्हणूनच बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते, मुलांना आमच्यासाठी वेळ नसतो, एखाद्या फोनची पण आम्हाला वाट पाहावी लागते, आमच्या मदतीची आता त्यांना गरज नाही, ते आमच्यावर अवलंबून नाहीत म्हणून आटला का ओलावा,? संबंधात आला का दुरावा..?

– – – काय वाटतं तुम्हाला.??

*

लेखिका : सुश्री नीलिमा जोशी

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares