मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || चैत्रपालवी || ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

☆ || चैत्रपालवी || ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

साद देतसे चैत्राला, बहरातला वसंत.

गुढी उभारून करु नववर्षाचे स्वागत..

*

जिर्ण पर्णे टाकुनिया वृक्ष नव्याने नटले

मोहक चैत्रपालवी फांदी-फांदीवर डोले..

*

विविध रंगी फुलांचा सुगंध दरवळला

छत्र घेऊनी उन्हाचे गुलमोहर फुलला..

*

आम्रतरु मोहरला बाळकै-या खुणावती

हर्षभरे फांदीवरी राघू-मैना गाणी गाती..

*

रसभ-या फळांतुनी अमृतरस पाझरे..

गोड -आंबट द्राक्षांचे वेल दिसती साजरे…

*

वळिवाची एक सर तप्त ऊनं शमविते..

थंडगार वा-यावर हिरवाई डोलविते…

*

निसर्ग हा खुलेपणी भरभरुन देतसे..

मनी ‘चैत्रपालवी ‘ जपण्यास सांगतसे…

💦🌨️.

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “What a level of confidence!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

What a level of confidence !

माझ्या स्कुटरचा हेड लाईट ७ – ८ दिवसांपासून बिघडला होता. रोज बावधनहून घरी परत येतांना अंधार झालेला असतो, त्यामुळे हेड लाईट शिवाय गाडी चालवणे, जरा किंवा चांगलेच रिस्की वाटायचे. आळस केंव्हातरी अंगाशी येतोच – येतो, असं आपण मानतो. कल करे सो आज कर, वगैरे, अशा सगळ्या म्हणी मला पाठ आहेत. तरीही रिपेअर करायला मुहूर्त लागत नव्हता. आणि टाळाटाळ करण्याचं शुल्लक कारण होतं, आणि, ते म्हणजे, माझ्या नेहेमीच्या मेकॅनिकचे दुकान, माझ्या रोजच्या जाण्या – येण्याच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला होते.  

त्यामुळे, लाईट दुरुस्त करायचा, म्हणजे सकाळी त्याच्याकडे गाडी न्यायची, तो म्हणणार, साहेब तासाभरानी या, करून ठेवतो. चालत घरी यायचं. तो वेळेत करून ठेवेल, यावर आपला कधीच विश्वास नसतो. म्हणून आपण त्याला फोन करणार, ‘झालीय का’.  मग चालत जाणार आणि गाडी आणणार.  दिव्यासारख्या किरकोळ कामाकरता इतके सोपस्कार नकोत, म्हणून, ‘आज करे सो कल कर, आणि कल करे सो परसो कर ’ असा माझा उलटा प्रवास सुरु होता.

काल रविवार होता. दुपारी आमचे युरोप मित्र श्री नेरकर यांच्याकडे गेलो होतो. घरी परत येतांना लक्षात आलं, की, मेकॅनिकचे दुकान याच रस्त्यावर आहे. विचार केला, की, गाडी त्याच्याकडे टाकू, रिपेअर होईपर्यंत इकडे -तिकडे बघू, टाईम पास करू. बायको घरी चालत जाईल.  ‘कल करे सो आज कर, आणि आज करे सो अभी’, असा  विचार पक्का झाला. कार्पोरेशन बॅंकेजवळ पोहोचलो आणि लक्षात आलं, की, इथे एक स्पेअर पार्टचं दुकान आहे आणि तिथे मेकॅनिक पण असतो. विचार बदलला. इथेच गाडी टाकली तर काम लवकर होणार, हे नक्की. 

बायको चालत घराकडे निघाली, मेकॅनिकला लाईटबद्दल सांगितले. त्यानी चेक केले आणि म्हणाला स्विच बदलावा लागेल. मी पैसे विचारले आणि दुकानात पैसे देईपर्यंत, यानी स्विच काढला – नवीन बसवला, म्हणाला साहेब गाडी झाली, घेऊन जा. जुना स्विच त्यानी माझ्या हातात दिला. 

मी : (सवयीप्रमाणे विचारलं) गाडी चालू करून लाईट लागतो, हे चेक केले ना ? 

मेकॅनिक : साहेब, त्याची काही गरज नाही. गाडी चालवतांना अंधार पडला, की, बटन ऑन करा. लाईट लागणार 

मी : एकदा चेक तर करून घ्या 

मेकॅनिक : साहेब, दुकानात सगळा  माल ओरिजिनल असतो. त्यामुळे मालावर माझा पूर्ण विश्वास आहे. काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी कधीच मनात आणत नाही. त्यामुळे Always do it right, first time हा माझा मोटो आहे. काम चुकायची गुंजाईश – झिरो. 

मी (मनांत)  : हा माणूस आपल्यापेक्षा खूपच वर पोहोचलेला दिसतोय. 

मी मेकॅनिक ला थँक्स म्हणालो आणि गाडी सुरु केली. अजून लख्ख उजेड होता, पण सवयीप्रमाणे, माझा अंगठा लाईटच्या बटनावर गेला, की, निघण्यापूर्वी लाईट लावून बघावा म्हणून. पण लगेच विचार आला, की, मेकॅनिक ला बटणाच्या क्वालिटीवर आणि स्वतःच्या कामावर इतका विश्वास आहे, तर मला त्याच्या कामावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. माझा अंगठा आपोआप मागे आला. तेवढ्यात एका जवळच राहणाऱ्या मित्राचा फोन आला, थोडावेळ घरी येऊन जा, एक स्पेशल डिश आहे. 

मित्राकडून निघतांना चांगलाच अंधार पडला होता. गाडी सुरु केली. लाईट चे काम झाले आहे, हे माहित होते. बटन सुरु केलं आणि लाईट सुरु. मेकॅनिक बद्दल तोंडातून आपोआप शब्द आले – What a level of confidence !

घरी आल्यानंतर, मेकॅनिकचे, “काम करतांना, काम आणि मी, यामध्ये इतर काहीही  विचार मी मनात आणत नाही”, “Always do it right, first time हा माझा मोटो आहे. त्यामुळे काम चुकायची गुंजाईश – झिरो”, हे शब्द मनात घुमायला लागले. आणि मी भूतकाळात गेलो —

* कुणाच्या खात्यात बँकेत चेक भरायचा असेल, तर चेक लिहिल्यानंतर मी २-३ वेळा सगळे बरोबर आहे ना ! हे चेक करतो आणि बँकेत चेक बॉक्स मध्ये टाकण्यापूर्वी पुन्हा बघतो, कि, काही चुकले तर नाही ना !

* घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे असेल, तर ५-६ वेळा तरी कुलूप ओढून बघतो. नंतर गाडीत बसल्यानंतर काही वेळा मनात रुख-रुख राहते, की, कुलूप बरोबर लागलय ना, कार्पोरेशन चा पाण्याचा नळ बघायचा राहिला आहे – सुरु राहिला असेल तर काय होणार 

* कार लॉक करून आपण घरात येतो आणि मनात पाल चुकचुकते कि पार्किंग लाईट ऑन तर नसतील 

* एकदा आम्ही मित्र कारनी बाहेरगावी निघालो. थोडं पुढे गेलो आणि एक जण म्हणाला, गाडी मागे घे. दाराला बाहेरून कुलूप लावले आहे का नाही, आठवत नाही. संध्या चोऱ्या खूप होतायत. एक जण म्हणाला, बाहेरून एक्स्ट्रा कुलूप लावणे जास्त अनसेफ आहे. चोरांना खात्री असते, की, आत कुणी नाही आणि आपला मार्ग मोकळा आहे. लॅच चे कुलूप जास्त सेफ आहे, काळजी करू नको. पण मित्राला ते पटले नाही. आम्ही कार वळवली. घरी गेलो. कुलूप व्यवस्थित होते. तरी मित्रानी २-३ दा ओढून बघितले आणि आम्ही निघालो. 

* बऱ्याच वेळा आपण छोटा मोठा प्रवास करून, एखाद्या जागृत देवस्थानाला जातो. आत जातांना काहीतरी इच्छा घेऊनच आत जातो. मुद्दाम पूजेचे साहित्य विकत घेतो, फुलं घेतो. आत गेल्यावर व्यवस्थित दर्शन होतं. प्रसन्न मनानी आपण बाहेर पडतो. आणि मंदिराच्या बाहेर पडल्यावर लक्षात येतं, की, अरे, देवाकडे जे मागण्याकरता आपण इथपर्यंत आलो होतो, ते तर मागायचंच राहीलं .  

अशी भली मोठी यादी नजरेसमोरून जायला लागली. माझ्यासारखे अजून बरेच ‘मी’ नक्कीच असतील. आणि सगळ्यांचे असेच वेगळे वेगळे अनुभव पण असतील. या आपल्या अशा सवयीमुळे, वेळ तर वाया जातोच जातो आणि ताणतणाव पण वाढतात. जेवतांना कधी जोरदार ठसका लागतो, कधी पाय घसरून पडायला होतं, कधी भाजी चिरतांना चाकू हाताला लागतो, अपघात होतात, तब्येत बिघडते वगैरे, वगैरे.  

आणि या सगळ्याचं कारण काय? तर, कहींपे निगाहे – कहींपे निशाना आणि  Not doing things Right, at first time. ‘जहापे निगाहे – वहींपे निशाना’ हे जर जमवलं, तर काहीच कठीण नसतं. ह्याच आधारावर  स्वयंवर जिंकल्याचं महाभारतामधलं उदाहरण आहेच. आणि त्याकरता गरज आहे – मन लावून काम करण्याची – हातातले काम आणि मी यामध्ये इतर विचार न आणण्याची. असं म्हणतात, आंघोळ करत असाल तर – फक्त मी आणि आंघोळ यावर लक्ष ठेवा, जेवत असाल तर – समोरचे चविष्ट अन्न चावून खाणे आणि  मिळणारा आनंद यावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही बघत असाल तर फक्त टीव्ही एन्जॉय करा. टॉयलेट ला गेला असाल तर फक्त तेच – फोन नाही / फेस बुक नाही.  एका वेळेस एकच काम आणि ते पण मन झोकून. 

मी मनात खूणगाठ बांधली, की, या क्षणापासून Do it right – First time चा अवलंब करायचा. रोज सकाळी उठल्यावर मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे. रोज रात्री झोपण्यापूर्वी मेकॅनिकचे विचार, श्लोक म्हटल्यासारखे १० वेळा म्हणायचे, म्हणजे ते अंतर्मनात रुजतील. असं सांगतात, की, एखादी गोष्ट सतत ३० दिवस केली, तर ती सवय लागते आणि ६० दिवस केली, तर तो स्वभाव बनतो. 

आणि मग एक दिवस, आपलेच अंतर्मन, आपल्या कामाकडे बघून म्हणेल – What a level of confidence!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “का??…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “का??…” ☆ श्री मंगेश मधुकर

“ का? ”

रात्रीचे साडे अकरा वाजले तरी श्रीकांत लॅपटॉपवर काम करत होता. रूमचा लाइट पाहून आईनं दार वाजवलं.

“आई, काय काम आहे. झोप ना”नेहमीप्रमाणे श्रीकांत खेकसला.

“ए, विनाकारण ओरडू नकोस”

“सॉरी!! मातोश्री. प्रोजेक्टचं काम चालूयं. ते झालं की झोपतो”

“आधी दार उघड”

“काय कटकट ये”चडफडत श्रीकांतनं दार उघडलं.

“प्रोजेक्ट किती अर्जंट आहे”

“विशेष नाही”

“मग लवकर झोप”

“का?”

“सकाळी लवकर उठायचं आहे”

“सुट्टी आहे. मी निवांत उठणार”

“उद्या गुढीपाडवा पण आहे”

“सो व्हॉट…”

“सकाळी तुला गुढी उभारून पूजा करायचीय.”

“हे कधी ठरलं”श्रीकांत वैतागला.

“आत्ताच”

“गप ना. उगीच छळू नकोस.”

“आठ वाजेपर्यंत गुढी उभारु.”

“इतक्या सकाळी? ”जांभई देत श्रीकांत म्हणाला.

“खरंतर सात वाजताच उभारली पाहिजे पण उशीर झालाय म्हणून तुला सवलत. ओके!!”

“नॉट ओके, मला एक कळत नाही जर संध्याकाळी काढूनच टाकायची तर गुढी उभारायची कशाला?”

“शास्त्र असते ते! ! ”आई हसत हसत म्हणाली.

“बघ. तुझ्याकडे उत्तर नाहीये आणि हसलीस म्हणजे माझं म्हणणं तुला पटलं.”

“अजिबात नाही. आपला सण परांपरेनुसारच साजरा करायचा.”

“गुढी उभरण्या मागंच लॉजिक काय?”

“तू नवीन पिढीतला आजच्या भाषेत बोलायचं तर झेड जनरेशन मधला ना..”

“त्याचं इथं काय संबंध?”

“तुम्ही लोक खूप हुशाssssssर. मग गुढीचं उभरण्यामागचं लॉजिक गुगल कर. चॅट जीपीटी ला विचार.”

“ते तर करणारच आहे. सकाळी तुला सांगतो!!” श्रीकांत.

“चला त्यानिमित्तान तुला सणांची माहिती होईल.”

“येस. माहिती असणं केव्हाही चांगलं ना. नवीन पद्धतींचा स्वीकार करावा. स्वतःला अपडेट करावं”

“शंभर टक्के मान्य पण हा सिलेटीव्ह अप्रोच नको.”

“म्हणजे”

“सोकोल्ड मॉडर्न आणि झेड जनरेशनमध्ये भारतीय सणांना नावं ठेवण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येक सणाविषयी काही ना काही तक्रारी असतातच. हे कशाला? असंच कशाला? हेच का करायचं? वगैरे वगैरे…” 

“अच्छा म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. ”श्रीकांत.

“जरूर विचारा परंतु १४ फेब्रुवारी, ३१ डिसेंबर, वर्षभर साजरे केले जाणारे ‘डे’, त्याच त्या पार्ट्या आणि अजून काही.. साजरे करताना चकारही शब्द तोंडातून निघत नाही मात्र भारतीय सणांमध्येच लॉजिक शोधता. माझा आक्षेप त्यावर आहे.”

“कुठचा विषय कुठं नेतेयेस”

“बरोबर बोलतेय. सणवार आले की हे कशासाठी? का? असं तुझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलयं.”

“परत तेच. यात काहीच चुकीचं नाही. तुझ्याकडे उत्तर असेल तर कनव्हीन्स मी.”

“मला एवढचं सांगायचं की सरसकट नावं ठेवणं सोप्पंयं त्याऐवजी आपले सण, ते साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी नीट माहिती घे. मग बोल. खात्रीने सांगते की प्रत्येक ठिकाणी लॉजिक सापडेल. ” श्रीकांत विचारात पडला.

“आई, यावर नंतर बोलू. आता रात्र खूप झालीय. तू म्हणशील तसं करतो. सकाळी सातला गुढी उभारू हॅपी!! ”

“ठीकयं पण आधी माहिती घे आणि मनापासून वाटलं तर कर उगीचच जुलमाचा रामराम नको.” आई 

“दोन्ही बाजूनं कसं काय बोलतेस”

“बोलाव लागतं. विनाकारण सणांना टार्गेट केल्यावर राग येणारच.”

“आय एम सॉरी! ! तुला दुखवायचं नव्हतं”

“प्रश्न माझ्या दुखवण्याचा नाहीये. झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सगळंच तात्पुरतं झालेलं असताना वर्षानुवर्षे हे सण, परंपरा आजही उत्साहात, जल्लोषात, आनंदात साजरे केले जातात. ही बाब खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे झोप आता, बाकी उद्या बोलू. गुड नाइट”.

बरोब्बर सात वाजता अत्यंत उत्साहात श्रीकांतनं गुढी उभारली तेव्हा आईच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होतं. श्रीकांतनं कडुलिंबाचं एक कोवळ पान खाल्लं अन एकेक आई-बाबांना दिलं.

“अरे वा, गुढीपाडव्याचा अभ्यास केलेला दिसतोय.” आई 

“हो, थॅंकयू आई”

“तुलासुद्धा थॅंकयू”

“का?”

“माझं ऐकलं म्हणून”आई.

“तुझं ऐकल्यानं माझाच फायदा झाला. पाडवा म्हणजे गुढी अन गोड पदार्थाचं जेवण आणि सुट्टी एवढचं माहिती होतं. आपलं बोलणं झाल्यावर इंटरनेटवर गुढीपाडव्याविषयी चांगली, नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती मिळाली आणि आपल्या प्रत्येक सण का? आणि विशिष्ट पद्धतीनेच साजरा करण्यामागचं लॉजिक समजलं.”

“म्हणूनच तर पिढ्या बदलल्या तरी सण दिमाखात साजरे होतायेत. ”आई.

“मी ठरवलयं की माहिती नसताना किवा अर्धवट माहितीच्या आधारे व्यक्त होणाऱ्या जमान्यात यापुढे प्रत्येक सण का? साजरा करायचा याविषयी सोशल मिडियावर लिहिणार. याची सुरुवात आजपासून…”

“चांगल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!! आता नवीन परंपरेचे पालन करू” आई.

“म्हणजे”

“गुढीसोबत सेल्फी तर पाहिजेच ना” लगेचच आई, बाबा, श्रीकांत तिघांनीही गुढीसोबत फोटो काढले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 244 – गझल – आकाश भावनांचे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 244 – विजय साहित्य ?

☆ गझल – आकाश भावनांचे…! ☆

आकाश भावनांचे गझले तुझ्याचसाठी,

हे विश्व आठवांचे मतले तुझ्याचसाठी…! 

  *         

आकाश बोलणारे जमले तुझ्याचसाठी,

हे पंख, ही भरारी, इमले तुझ्याचसाठी…!

 *   

माणूस वाचताना, टाळून पान गेलो.

काळीज आसवांचे, तरले तुझ्याचसाठी..!

*

सारे ऋतू शराबी, देऊन झींग गेले

प्याले पुन्हा नव्याने, भरले तुझ्याचसाठी..! 

*

हा नाद वंचनांचा , झाला मनी प्रवाही

वाहतो कुठे कसा मी?, रमलो तुझ्याच साठी..!       

*

जखमा नी वेदनांची,आभूषणे मिळाली

लेऊन  साज सारा, नटलो तुझ्याचसाठी..!

*

काव्यात प्राण माझा, शब्दांत अर्थ काही

प्रेमात प्रेम गात्री, वसले तुझ्याचसाठी..!

*

आयुष्य सांधताना,जाग्या  अनेक घटना

हे देह भान माझे हरले तुझ्याचसाठी…!

*

कविराज रंगवीतो, रंगातल्या क्षणांना

चित्रात भाव माझे, उरले तुझ्याचसाठी..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्दांची वादळं… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

? मनमंजुषेतून ?

☆ शब्दांची वादळं… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

सुमारे तीस – पस्तीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का !

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात भरलेल्या कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपीठावर उभा होतो. हे सुनीत आहे. मी पहिलाच चरण म्हटला,

‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही ‘.

आणि अचानक माझ्या मागून, व्यासपीठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली. मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला, ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून ! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली. कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली. साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘ शब्दांची वादळं ‘!

आज घेऊन आलो आहे ही शब्दांची वादळं कविता: – – 

☆ शब्दांची वादळं ☆

शब्दांची अनेक वादळं आली कधी तसा डगमगलो नाही 

नजरांचे कुत्सित झेलले बाण विचलित असा झालोच नाही

आपण बरे आपले बरे ही वृत्ती कधी सोडली नाही

मार्ग आपला शोधत राहिलो कानावरचं मनावर घेतलंच नाही

नजर माझी वाईट म्हणत त्यांच्या वाटे गेलोच नाही 

नजरेसमोर आले त्यांना मात्र कधी टाळले नाही 

बोलणाराची वृत्तीच वाईट त्याचा बाऊ केलाच नाही

अनुभवाचे बसले चटके दुर्लक्ष करता आलं नाही 

*

अपयशाचा धनी झालो माझ्या, त्यांच्या खोटं नाही

सावली माझी वैरीण झाली, शुभ तिला ठाऊक नाही 

नजर माझी अशुभ म्हणता सत्याला या पडदा नाही

दृष्टी माझी टाळून जाता मांगल्याला अडचण नाही 

भीती आता माझी मलाच अपयशाला वाण नाही 

नको आरसा म्हणून मला असली दृष्ट सोसवत नाही

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 118 – देश-परदेश – मत चूको चौहान ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # 118 ☆ देश-परदेश –  मत चूको चौहान ☆ श्री राकेश कुमार ☆

मौके पर चौका लगाना चाहिए। ये सब दशकों से सुनते आ रहे हैं। विगत वर्ष ” राष्ट्रीय आडंबर विवाह ” सम्पन्न हुआ था। हमने उक्त परिवार के एक खास से पूछा, हमें बुलाना भूल गए थे। उसने तत्परता से बताया यदि हम उसको अपनी दिल की बात पहले बता देते तो इटली से लेकर जामनगर सभी कार्यक्रम में शिरकत कर चुके होते। दिल की बात बताने में हम हमेशा लेट लतीफ़ ही रहते हैं। युवा अवस्था में अपने पहले प्यार का इज़हार करने में भी चूक गए थे। खैर छोड़िए “अब पछताए होत क्या जब चिड़िया ही दूसरे के साथ उड़ गई”

 उक्त विवाह में भाग ना ले सकने का दुःख के लिए बस इतना ही कह सकते हैं, कि ” जिस तन लागे, वो तन जाने”

इस बार हमने मत चूको चौहान को अपना अड़ियल मानते हुए, दूसरे घराने के  परिवार के विवाह के निमंत्रण प्राप्त करने के लिए ” सारे घोड़े खोल दिए” थे। अपने मुम्बई की पोस्टिंग्स के कॉन्टैक्ट्स हो या, दिल्ली की सत्ता के गलियारे वाले संबंध हो। यहां ये स्पष्ट कर देवे, इसी मौके के लिए विगत वर्ष हमने दस दिन का गुजरात दौरा भी किया था।

लाखों जतन कर लो पर होता वही है, जो लिखा होता है। दूसरे परिवार ने तो इतनी सादगी से विवाह किया, कि पड़ोसियों को भी नहीं बुलाया हैं, फिर हम किस खेत की मूली हैं।

इस सादगी पूर्ण विवाह के लिए दूसरे परिवार का साधुवाद।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याची सुरावट ”सा रे ग म प ध नी सा’ या सप्तसुरातून साकार होत असते किंवा केली जाते. हे सूर जितके सच्चे, तितके त्यातून निर्माण होणारे गीत सुरेल निघते. सप्तसुरांच्या संगतीने आपले आयुष्य सुंदर सुरमयी बनते कारण यातील प्रत्येक सूर हा त्याच्या विचाराशी किंवा आशयाशी सच्चा राहतो.

*सा.. *आयुष्याचा प्रारंभ हाच ‘सा’ मधून होतो त्यामध्ये जीवनाचे सातत्य समाविष्ट आहे.

 रे… रेंगाळणे.. आयुष्याची वाटचाल चालू असताना आपण अधून मधून थांबतो किंबहुना रेंगाळतो..

ही वाटचाल जेव्हा शांतपणे सुरू असते, तेव्हा ‘रे’ सुराची निर्मिती होते.

ग.. विचारांना ‘ग’गती देतो. तर कधी

‘ग’ हा गमावल्याची भावनाही निर्माण करतो.

म… मानून घेणे, हे ‘म’ चे वैशिष्ट्य आहे.. जे आहे त्यात समाधान मानून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण सुखद करतो.

प.. मनाची व्याप्ती वाढवणे किंवा पसरवणे हे ‘प’ चे वैशिष्ट्य! सप्तसुरांतील ‘प’हा चढती कमान दाखवतो. !

ध.. ‘ध’धारण करणे.. मनाची शांतता धारण करणे हे शिकवणारा

हा ‘ध’ आहे. ‘ध-‘ धारयती हा पुढे

‘नि’ मध्ये जातो.

नि – निवृत्ती कडे वाटचाल..

जगण्यातून निवृत्ती घेता येणे हे बोलणे सोपे पण आचरण्यास अवघड असे तत्व!ही निवृत्ती ज्याला साधली त्याला ‘सा’ची सायुज्यता साधणे कठीण जात नाही..

सायुज्यता – मोक्षाच्या चार अवस्थांपैकी चौथी सायुज्यता!

ही साधली तर वरच्या ‘सा’च्याजवळ आपण पोचू शकतो असे म्हणायला हरकत नाही..

आयुष्याच्या सरगमातील हे ‘सारेगमपधनीसा’ चे सूर विचार केला तर किती वेगळे अस्तित्व दाखवतात ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शाळा सुटणारी मुले अर्थात गळती” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “शाळा सुटणारी मुले अर्थात गळती” ☆ सुश्री शीला पतकी 

दहावी काय कोणत्याही टप्प्यावर नापास झाले की मुले शाळा सोडतात पालकांना काहीच प्रॉब्लेम नसतात कारण दहा वर्षाचा मुलगा चहाच्या गाडीवर काम करून रोज शंभर रुपये मिळवतो शिवाय त्याचा चहा नाश्ता तिथेच चालतो म्हणजे तो खर्च नाही झोपडपट्टीतल्या पालकाकडे शंभर रुपये रोज मुलामुळे मिळतात मग ही मुलं शिक्षण नाही योग्य मार्गदर्शन नाही नको त्या वयात पैसा हातात त्यामुळे व्यसनाधीन होऊन बिघडतात

दुसरा मुद्दा म्हणजे आता सर्वच पालकांना इंग्रजी माध्यमाचे वेड लागले आहे. ऐपत नाही आर्थिक, घरामध्ये कोणतेही वातावरण नाही आणि सगळ्या घराने राबून विनाकारण एका मुलासाठी इंग्रजी माध्यमाचे पैसे भरत बसायचे.. त्याला ते झेपत नाही तो एखाद्या तुकडीत वारंवार नापास होतो आणि शाळा सुटते ती कायमची.. !या सगळ्यावर सरकारने एकच उपाय काढला तो म्हणजे नापासच करावयाचे नाही! त्यामुळे शिक्षणाचा स्तर खालावला परीक्षाच नाही म्हणल्यावर मुले कशाला अभ्यास करणार? शेवटी परीक्षा हा एक धाक होता.. मुलांनी अभ्यास करायला तोच मुळी संपला. शिक्षकही निवांत झाले… पण आम्ही शिकवत होतो त्यावेळेला एक मार्कही वाढवून देत नसू त्यामुळे मुलांना कसून तयार करून घेणे आणि आपल्या वर्गाचा निकाल उत्तम लावणे हे आमचे कामच होते पहिल्या वर्षी जेव्हा चौथीतल्या नापास मुलांनाही पाचवी ढकलण्यात आल तेव्हा माझ्या असे लक्षात आले की सहावीत आल्यावर या मुलींना वाचता येत नव्हते लिहिता येत नव्हते शेवटी मी त्यांचा एक स्वतंत्र वर्ग पाच तुकड्यातून तयार केला आणि त्या वर्गाला पूर्ण पहिली टर्म फक्त लिहायला आणि वाचायला शिकवायचे प्रत्येक शिक्षक आणि मग मराठीचा असो इंग्रजीचा असो गणिता चा… गणित शिक्षकाने पाढे पक्के करून घ्यायचे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया शिकवायच्या. इंग्रजी शिक्षकाने एबीसीडी आणि काही शब्द स्पेलिंग साठी त्यांना दिले होतेते शिकवावयाचे आम्ही हे सिल्याबस अभ्यास करून तयार केले होते परिणाम असा झाला की सहावीच्या दुसऱ्या सत्रात ही मुले अभ्यासू तर झालीच आव्हान स्वीकारायला तयार झाली. आपल्यासाठी कोणी विशेष राबत आहे या भावनेने प्रेरित झाली! पालकांची सभा घेऊन त्यांनाही वेळीच जाणिव दिली तेही थोडे बहुत सतर्क झाले आणि शेवटी या वर्गाचा निकाल शंभर टक्के आणि उत्तम लागला केवळ दहावीला प्रयत्न करून चालत नाही हे शिक्षकांना कोण सांगणार?( त्या नाही शिक्षणाचे फालतू कामे आहेतच आणि त्याचा ताणही आहे )पण असे काही वेगळे होण्यापेक्षा 35 पर्यंत आणून त्या मुलाला पास करण्याचा सपाटा बोर्डाने चालवलाच आहे वीस मार्गाच्या कुबड्या दिल्या मग उरले किती पंधरा मार्क.. पेपरच असे काढले की प्रश्नपत्रिकेच्या पहिल्याच पानात त्याला 15 मार्क पडतात. दहावीच्या परीक्षेला प्रश्न गाळलेल्या जागा, जोड्या लावा, वेगळा घटक ओळखा अशा फुटकळ प्रश्नांनी त्याला सहजच 20 मार्क मिळू लागले परीक्षकांचे कष्ट वाचले… नाहीतर परीक्षकांना सूचना 15 पर्यंत आलेल्या मुलाला वीस पर्यंत आणा वीस पर्यंत आलेल्या मुलाला 25 पर्यंत न्या आणि मग मॉडरेटर पर्यंत त्या मुलाला 35 मार्क मिळून जातात ही वाढवा वाढवी झाल्यामुळे मुलाला प्रत्यक्षात काहीही येत नाही आणि आपण स्वतःची त्या मुलाची पालकांची शाळेची आणि एकूण समाजव्यवस्थेची फसवणूक करीत आहोत. याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्यावर उत्तम समुपदेशक हवेत नेमके काय खरे आहे याची जाणीव त्या विद्यार्थ्याला झाली पाहिजे त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे त्याला त्याला वेगवेगळ्या लोकांच्या कथा सांगितल्या पाहिजेत नकारातून स्वीकाराकडे कसे जाता येते या वाटा त्यांना कळल्या पाहिजेत आम्ही आपलं काहीच करीत नाही 35 मिनिटांचा तास संपला की शिक्षकांचे त्या वर्गाप्रती काही देणे लागत नाही शिक्षक फक्त जबाबदार आहेत असे नाही पालक विद्यार्थ्यांना रोज शाळेत पाठवत नाही हे दुःख आहे मग कधी मध्ये शाळेत येणारे विद्यार्थी शाळेत रमत नाही बर शाळेत सगळेच फुकट मिळत असल्याने पालक राखोळी घातल्यासारखा विद्यार्थी शाळेत पाठवतात विद्यार्थ्यांनाही सगळे फुकट मिळत असल्यामुळे कसलीच जाण नाही पालकांच्या खिशाला तोशिष पडत नाही त्यामुळे शाळा म्हणजे गंमत झाली! शाळेमध्ये सध्या फक्त नाच गाणे चालू आहे कॅसेट लावून नाचणे नाटक तर संपतच आले नवीन क्रिएटिव्हिटी ला वाव नाही स्वतः काही लिहत नाहीत विज्ञानाला तर काहीच व्हॅल्यू नाही मुळात विज्ञान शिक्षक विज्ञान दृष्टिकोन असणारा असत नाही खेडेगावात तर अंधश्रद्धा दूर करा असे सांगणारे शिक्षक नवस फेडायला रजा घेऊन निघालेले दिसतात हे दुर्दैव आहे.. याच्या वरती विचार करायला कमिट्या ह्या थोरामोठ्यांच्या त्यात अनुभवी शिक्षकांचा समावेश नसतो त्यामुळे तोडगे भलतेच निघतात आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे शिक्षणाने धड माणूस घडत नाही धड कर्मचारी घडत नाही तिथे काही वेगळ्याच परीक्षा असतात आणि वेगळेच फंडे असतात माझ्या शेजारी बांधकाम चालू आहे बांधण्यात येणाऱ्या बीम जेव्हा भरतात तेव्हा तो सर्व बाजूने समान मापाचा असावा यासाठी एक कोयत्यासारखा सरकपट्टीवरचा वर्नियर कॅलिपर त्यांनी बनवला आहे अर्थात त्याला हे नाव माहित नाही ते मी त्याला सांगितलं सर्व बाजूने माप सारखे असावे यासाठीच ते उपकरण आहे आम्ही शाळेत शिकवलेले उपकरण वेगळं पण तेच कार्य करणारे अतिशय साधे पट्टीवरचे उपकरण त्याने सुंदर बनवले आहे ही आहे त्या त्या ठिकाणांची गरज आणि त्यासाठी वापरलेले किंवा केलेले प्रयत्न हे शिक्षणाच्या पलीकडे आहेत हे वापरणारा माणूस शिक्षित नाही आहे की नाही गंमत मला तर खूपदा मनात प्रश्न येतो की काही टक्के मुलाने शिकू नये त्याला फक्त लिहायला वाचायला शिकवावे त्याला कष्टाची विविध कामे करता येईल असे ट्रेन्ड करावे आणि त्या कामाला भरपूर मजुरी द्यावी गवंड्याला हजार रुपये पगार आहे रोज.. शिक्षित बीए बीएड 5000मासिक वर काम करायला मिळतात दुर्दैव आहे.. 100 जागांसाठी परवा 1000 इंजिनिअर लाईन मध्ये उभे होते हा व्हिडिओ पाहिल्यावर खूप वाईट वाटले आता मुलांनी शिकावं तरी किती पण रोजगाराची उपलब्धता नाही नवनवीन रोजगार हुडकणारी एक कमिटी हवी त्या त्या भागातली वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याचे नियोजन झाले पाहिजे मी एक दिवसभर लिहीत बसले तरी हे संपणार नाहीत असो एका लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार मी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे मांडले आहेत आणि माझ्या अनुभवातून काही लिहले आहे इतकेच….. !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ स्थितप्रज्ञ“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – स्थितप्रज्ञ – ? ☆ श्री सुहास सोहोनी

वर्षे सरली, युगे उलटली,

काळ किती लोटला

स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत

शिलाखंड एकला

 

सजीव प्राणी पक्षी त्यांसी

स्वर्ग, नरक अन् मोक्ष

निर्जीवांसी गति न कोणती

केवळ अस्तित्व

 

घडले नाही कधीच काही

उबूनि गेला जीव

अंतर्यामी आंस उठे परि

जिवास भेटो शिव

 

शिल्पकार कुणि दैवी यावा

व्हावी इच्छापूर्ती

अंगांगातुन अन् प्रकटावी

सुबक सांवळी मूर्ती

 

मोक्ष हाच अन् हीच सद्गती

निर्जीवाचे स्वत्व

छिन्नीचे घन घाव सोसुनी

लाभतसे देवत्व…

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आली गाडी.. गेली गाडी..…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares