मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत

श्रीमती माया महाजन

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आत्मकथ्य – “इंद्रधनुष्य” – श्रीमती माया महाजन – श्रीमती उज्ज्वला केळकर सोबत ☆

(सुश्री नरेंद्र कौर छाबडा या हिंदीतील नामवंत लेखिका. त्यांच्या निवडक लघुतम कथांच्या अनुवादीत कथांचे पुस्तक ‘इंद्रधनुष्य’ नागपूर येथील चंद्रकांत प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)

इंद्रधनुष्य  : भावनांचे  रंगीबेरंगी आविष्कार

जे मला आवडते ते इतरांनाही सांगावे अशी माझी तीव्र इच्छा असते. म्हणूनच उत्तम दर्जाचे लिखाण वाचले की जो आनंद मिळतो तो इतरांनाही मिळावा या हेतूने, या इच्छेनेच मला अनुवाद क्षेत्राविषयी जवळीक वाटते.

माझी मैत्रीण नरेंद्रकौर छाबड़ा हयांच्या लघु कथा माझ्या वाचनत आल्या आणि त्या उत्तम कथा तुम्हालाही सांगाव्याशा वाटल्या. छाबड़ाजीना ही कल्पना आवडली आणि मी अनुवाद केला . जसजशी मी एकेक काथेचा अनुवाद करीत गेले  तसतशी मी स्तिमित होत गेले. नरेन्द्रकौरजींची दृष्टी केवळ सामान्य गृहिणीची नाही. पाहिलेल्या – अनुभवलेल्या घटनेचे बरे-वाईट प्रतिसाद त्यांच्या मनात उमटतात आणि त्यांच्यातील लेखिका अस्वस्थ होते . मग ते प्रतिसाद शब्दरूप धारण करून अवतरतात आणि वाचकालाही त्यात सामील करून  घेतात . प्रत्येक घटनेचा  विचार मात्र त्या समाज-कल्याणाच्या दृष्टीतून करताना दिसतात . त्या श्रध्द्धाळू देखील आहेत हे त्यांच्या समर्पण पत्रिकेवरूनच जाणवते . परमेश्वराच्या कृपादृष्टीवर त्यांचा नितांत  विश्वास आहे. अशा श्रद्धाळू आणि समाजहितैषी मनाच्या व्यक्तिच्या लेखणीतून तितक्याच भावगंभीर कथा जन्म घेतात – हेच नरेंद्रजिंच्या बाबतीत म्हणता येईल.मुळात मनुष्यजात ही गोष्टीवेल्हाळ आहे . काय घडले हे जाणण्याची उत्सुकता माणसाला ऐकायला, सांगायला आणि वाचायला भाग पाडते. मग हे पद्धतशीर  लिहिणे सांगणे कथेचे रूप घेते.

कथा हा साहित्य-प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कथेचे स्वरूप दीर्घ, मोठे, सर्व-साधारण , लघु आणि अतिलघु असे आपोआपच होते. त्याचेच आपण कादंबरी, दीर्घकथा, कथा, लघुकथा  आणि अतिलघुकथा  (अलक) असे वर्गीकरण करतो. माझ्या मते लघुकथा आणि त्यात अलक लिहिणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. लेखनाची सर्व वैशिष्ट्ये-भाषा सौन्दर्य, घटनेची मांडणी, पात्रांचे मनोव्यापार, संवाद  आणि वाचकांना खिळवून ठेवण्याची कला – ह्या सर्वाचा वापर कादंबरी वगैरे प्रकारात सहजपणे केला जाऊ शकतो आणि लघुकथा लेखकाचा इथेच कस लागतो. उत्तम आणि प्रभावी लघुकथा तीच असते जिच्यात हे सर्व गुण आढलतात.  नरेन्द्रकौर जींची कथा या निकषावर यशस्वी ठरते – म्हणूनच ती  वाचनीय झाली आहे. लघुकथेतील आशय नेमकेपणाने पण थोडक्यात मांडला गेला तरच ती प्रभावी ठरते.

नरेद्रकौरजींच्या काही वेचक कथांचा परामर्श इथे उदाहरणदाखल घेणे इष्ट ठरेल.

समाजातील काही  अनिष्ट चालीरीतींना नरेंद्रकौरजीनी आपल्या कथेत असे काही मांडले आहे की वाचक अंतर्मुख होऊन त्या सोडून देण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचतो. या कथा आहेत – भोज, समाजरीत, अपशकुनी, फालतू, चपराक  वगैरे.

बाई, पान, तिचा आनंद, महिला दिवस , युक्ति  या कथा स्त्रीत्वाची घुसमट साकारतात.  लेखिकेच्या मते  केवळ शिकल्याने  महिला स्वतंत्र होत  नाही तर शिक्षनाने तिच्यात  चूक गोष्टीना ‘नाही‘ म्हणण्याची हिंमत आली पाहिजे. उदा. ‘दुहेरी मानसिकता’ मधे लेक व सून यांच्याशी वागताना बाई कशी फरक करते ते रंगविले आहे; तर ‘पान‘ मधे स्त्रीवर पतिचा प्रभाव किती पराकोटीचा असू शकतो हे दाखविले आहे.’चपराक’ मधे मात्र स्त्री स्वतःच कशी सामाजिक चालीरितींना बळी पड़ते याचे प्रभावी चित्रण आहे. ’महिला दिवस’ या दिवसाची महिलेलाच किती व कशी किमत मोजावी लागते हे एक ज्वलंत वास्तवाचे चित्रण केले आहे ‘महिला दिवस’ या कथेत .

माणूसकी हे सभ्यतेचे दूसरे रूप आहे. नरेन्द्रकौर  यांच्या कथा माणूसकीचे दर्शन घडवताना  थेट आपल्या विचारांचाच कब्जा घेतात. यामधे ‘माणूसकी’  आणि ‘शिक्षा’ या दोन कथा तर जबरदस्त  धक्का देणार्‍या आहेत.’ माणूसकी ‘मधील आतंकवादी  स्वत:च रक्षक होतो तर  ‘शिक्षा‘ मधे एका मुलीची किन्नर कशी सुटका करतात – हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

काही सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न काही कथामधे लेखिकेने केलेला दिसतो. उदा. परिणाम, युक्ति, महिला दिवस, आधुनिकता, फैसला, नात  वगैरे.

माणूस परिस्थितीने लाचार होतो याचे हृदयद्रावक चित्रण आहे ‘मजबूरी, भोज, तडजोड़’ वगैरे कथांमधे.

एकंदरित नरेंद्रकौरजींच्या कथेचे विषय  सर्वत्र संचार करणारे आहेत ;त्याबरोबरच त्यांचे भाषाप्रभुत्वदेखील तितकेच प्रभावी आणि सफाईदार आहे . आजच्या धावपळीच्या दुनियेत लोकाना चटपट मनोरंजन हवे असते – ही जनमानसाची नस त्यानी अलकमधून बरोबर पकडली  आहे. पण ते केवळ मनोरंजन नसून जनजागृतिचे , लोक कल्याण विचारात घेणारे, आणि समाजहितैषी विचार मांडणारे आहे. म्हणूनच मलाही त्यांच्या कथांचा अनुवाद करावासा वाटला. अपेक्षा करते की मी त्याना पूर्ण न्याय दिला आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटला, ते पुस्तक वाचून मला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत   – माया महाजन

©   सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ तिसरं पुस्तक – सौ.गौरी गाडेकर ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ तिसरं पुस्तक – सौ.गौरी गाडेकर ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी☆ 

कथासंग्रह – तिसरं पुस्तक

लेखिका – सौ.गौरी गाडेकर

पृष्ठसंख्या – 188

सौ.गौरी गाडेकर यांच्या कथा नेहमी दिवाळी  अंकात असतात. मी अगदी  काॅलेजात असल्यापासून अनुराधा, माहेर, कथाश्री मधून वाचत आले आहे. त्यांच्या कथा नुसत्या अंकात  येतच नव्हत्या तर त्यांना पारितोषिके पण मिळालेली आहेत. त्यांचे कथा संग्रह 1)  नातं 2) आउटसायडर सहज आणि आता तिसरं नांवाप्रमाणेच तिसरं पुस्तक आहे.

 

त्यांची भाषा सोपी सहज कळणारी,प्रसंग ,माणसं नेहमी आपल्या आयुष्यात येणारी,मनोरंजक म्हणून मला भावते.

त्यांनी लिहिलेल्या ह्या कथासंग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील कथा आहेत.

‘लिव्ह इन’  ही कथा आजच्या काळात अतिशय समर्पक आहे. कित्येक जणांची मुलं परगांवी  किंवा आपापल्या नोकरी धंद्यात मग्न. आईवडिलांना द्यायला वेळ नाही. त्यातून त्यांचा किंवा तिचा लाईफ पार्टनर नसेल तर उतार वयात आलेला एकाकी पणा  ह्या वर डोळसपणे केलेला विचार ह्या  कथेत मांडला आहे.कथेचा शेवट कलाटणी देणारा आहे.

सुश्री गौरी गाडेकर 

ह्यांच्या  सगळ्याच कथेची भाषा सोपी.प्रसंग, व्यक्ती जिवंतपणे रेखाटण्याची हातोटी . हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.

केळ ‘ही महत्त्वाची कथा आहे.जी.ए.कुलकर्णी यांच्या कैरी व तुती या कथांची पश्चात कथा आहे.

ह्या कथेमध्ये त्या काळातील प्रेमळ, भाबडी माणसे, दुस-यासाठी पराकोटीचा त्याग करणारी निस्वार्थी माणसं, दुष्ट प्रवृत्तीचा मालक,आणि शेवटी सगळी सूत्रं  फिरवणारी नियती असं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलेलं आहे.

इंग्रजीचे सर ही कथा तर खूपच छान. शालेय जीवनातील या सरांनी केलेले संस्कार नायिकेच्या मनांत खोलवर होते की ती त्यांचा चेहेरामोहोरा विसरली .पण त्यांचे विचार वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.त्या सरांच्या द्वारे लेखिका आपल्याला बरंच काही सांगून गेली. ही कथा वाचतांना मला माझेच प्रतिबिंब थोड्या फार   प्रमाणात दिसले.

‘मालाडचा म्हातारा’ ही कथा एकाआईच्या मुलीवरच्या निस्सीम प्रेमाची, तिच्यासाठी केलेल्या त्यागाची, तर एका स्वाभिमानी स्रीने आपल्या संसारासाठी केलेल्या कष्टांची, सर्व माणसांची मने समजून घेणारी काकी  अशा स्रीच्यावेगवेगळ्या व्यक्तीरेखा लेखिकेने रेखाटल्या आहेत.त्या सगळ्याजणी आपल्यातल्याच आहेत असा भास होतो

‘तसली’ ही कथा छान बाळबोध चि.सौ.कां.ची आणि तिचा झालेला गैरसमज त्यातून झालेला विनोद. खूपच गंमतीशीर  ‘शाप ‘ ही कथा त्यातील सुमी, मेनका,आई ह्या व्यक्ती आपल्या समोर उभ्या  रहातात. मनांतून जात नाही.खरचं एखाद्या घराण्याला असा शाप असू शकतो का? इतकं सुंदर वर्णन  लेखिकेने केले आहे.म्हातारे सासरे,मनोरुग्ण सासू,छोटा मुलगा सगळ्यांची जबाबदारी पेलताना प्रेयसीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृतघ्न पुरुष बाहेर कसा आकर्षित होतो ह्यांचे लेखिकेनेह्रदयस्पर्शी वर्णन  केलं आहे

अनुताप ही कथा ह्रदयस्पर्शीआहे.आपल्याला नेहमी  वाटते आपल्या आई वडिलांचे कधी कधी चुकले पण खरंतर त्यांना त्या त्या वेळी जसा प्रसंग आला त्याला तोंड देण्यासाठी तसे वागावे लागलं.  जेव्हा आपण तशा प्रसंगातून जातो आणि आपली मुलं किंवा नातेवाईक आपल्याला दोष देतात तेव्हा आपल्याला आईवडिलांना दोष दिल्याचा पश्चात्ताप होतो.

लेखिका कधीकधी आपल्याच घरांतले प्रसंग सांगते असे आपल्याला वाटते .

‘प्राक्तन ‘ ह्या कथेत एकच व्यक्ती चित्र रेखाटताना किती सकारात्मक भाव दाखवते तीच व्यक्ती कथेत सगळं अनुभव दाखवताना वेगळे भाव दाखवते.अशी तक्रार स्वतः कथा लेखकाकडे करते.ही नेहमीपेक्षा वेगळीच कल्पना आहे.

एकूण थोडक्यात सांगायचे तर भाषा  सरळ सोपी,व्यक्ती,प्रसंग आपल्या  आजूबाजूला नेहमी घडणारे ,वाचून अंतर्मुख करणारे असतात. रोजच्या जीवनात येणारे ताणतणाव, अनुभव,याचे वर्णन हुबेहुब असते .त्यामुळे वाचकांचे कथांशी बंध जुळून येतात.सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे.

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “धुक्यातील वाट” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ.दीपा पुजारी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “धुक्यातील वाट” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. दीपा पुजारी ☆ 

कथा संग्रह  – धुक्यातील वाट

लेखिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

श्रीमती उज्ज्वला केळकर

धुक्यातील वाट हा  उज्ज्वला केळकर यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाच मनापासून स्वागत. या छोटेखानी पुस्तकातून लेखिकेने अनेक वेगवेगळ्या कथाविषयांना वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या या प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

सोळा कथांचा हा कथासंग्रह लेखिकेच्या अंगी असलेल्या अनेक पैलूंची ओळख करून देतो. भाषेवर प्रभुत्व असूनही सरळ,साधी,सोपी लेखनशैली, तरीही प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आहे. आशय समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली आहे. साधे लिखाणही मनावर कसे छापा उठवू शकते हे कळण्यासाठी हा कथासंग्रह जरूर वाचावा. ओघवते सहज लिखाण, साधी शब्दरचना, थोडक्यात आशय मांडणारं लेखनकौशल्य अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी हा कथासंग्रह  परिपूर्ण आहे.

दोन तीन पानांच्या लहानशा कथा थोडक्या वेळात वाचता येतात.म्हणूनच जास्त वाचनसमाधान देतात. यातील बहुतेक कथा संवेदनशीलते बरोबर सामाजिक बांधिलकीची लेखिकेला असलेली जाण लक्षात आणून देतात. यातील काही कथांचा आवर्जून ऊल्लेख करावासा वाटतो.

‘धुक्यातील वाट’ ही मुखपृष्ठ कथा खूप काही शब्दांच्या पलीकडचे सांगून जाते. सुरवातीला ही प्रेमकथा वाटते. पण कथानक जसजसे सरकत जाते तसतसे नायकाच्या मनातील विचारांचे पदर उलगडत जातात आणि ही कथा म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा केलेला आदर आहे, कलेला दिलेली नि:सीम दाद आहे हे लक्षात येते.सुरांच्या सम्राज्ञीला , तिच्या सुरावटींनी दिलेल्या आनंदघनाला तिच्याच चित्राच्या रुपात कुंचल्याचे अभिवादन आहे.या कथेतील धुक्याचं वर्णन करताना रोमरंध्रातून आत झिरपत चाललंय अशा शब्दात जेव्हा लेखिका करते, तेंव्हा आपणच धुक्यातून चालत असल्याचा भास   होतो.

‘पांघरूण’ ही  कथा दारिद्र्याच विदारक रुप दाखवते. परदेशातील धर्मादाय संस्था तेथील काही कुटुंबांच्या मदतीने शाळेतील काही मुलांना दत्तक घेते. तिथल्या पालकांनी पाठवलेल्या पत्रातून एक अनोख जग सर्जासमोर साकारत असतं.पण दारुड्या बापामुळं निरागस मन कोसळून जातं. झोपडीच वर्णन, ठिगळं जोडून आकाश शिवण्याची आईची धडपड, बेदरकार, बेफिकीर, चंगळवादी, स्वार्थी बाप यथार्थ ऊभे करण्यात शब्दप्रभुत्व लक्षात येतं.

‘अनिकेत’ या कथेत    समाजासाठी कळकळ , निसर्गसंवर्धनाची जाणीव, अशा विविध कार्यासाठी आपले आयुष्य वेचणारा अनिकेत , लोकांचा आवडता होऊनही कुठेच न गुंतता आपला प्रवास सुरु ठेवतो. समाजसेवेचे व्रत घेण्याची गरज स्वतःच्या वागण्यातून ठसवतो.

‘डायरी’ ही,  क्षणिक, फसव्या मोहाला बळी पडून तरुण आयुष्यातून कसं ऊठावं लागतं याची करुण कथा आहे. त्यांच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या पालकांची आधाराची काठी मोडते. भावस्वप्नं बघणारी मैत्रीणही कोलमडून जाते.मन सुन्न करणारी ही कथा नायकाच्या डायरीच्या रूपातून सामाजिक भान जागरुक  करते.

‘त्याची गडद सावली’ या  या कथेत नवीन जोडीदारा बरोबर सुसंवाद साधताना पहिल्या दिवंगत जोडीदाराच्या येणाऱ्या आठवणी, दोघांच्या स्वभावातील फरक यामुळे नायिकेची होणारी घुसमट स्पष्ट तरीही साधेपणाने मांडली आहे.

अशी घसमट पुरुषांची देखील होते हे ‘आंदोलन’ या कथेत दाखवले आहे. अनुरुपता नसेल तर संसारात अर्थ उरत  नाही. मोठ्या माणसांनी लहानपणीच अविचाराने मुलांचे लग्न केलं तर होणारा परिणाम ,त्यातून निर्माण झालेली हतबलता. वैवाहिक आयुष्य यशस्वी होण्यासाठी  कशाला महत्त्व दिले पाहिजे हे या दोन कथा सांगतात.

गरिबीनं ग्रासलेला,बापाविना पोरका, कुटुंबातील सगळ्यांना निदान घासभर अन्न मिळावं म्हणून नाईलाजाने वाईट मार्गाकडे वळलेला यशवंत साहेब एक विचारू असा प्रश्न विचारुन कोर्टाला तर निरुत्तर करतोच पण वाचकांना ही कुंठीत करतो.

आश्रमाबाहेरच्या जगाची प्रतिक्षा करणारा अनाथ रमेश असो वा लीडरचा नायक असो आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी  मनात घर करतात.

समोर धुसरं दिसत असतानाही, मनाला उभारी देणार्‍या , लढण्याचं बळ देणार्‍या , वास्तवतेची जाणीव आहे तरी दक्ष राहून पाऊलवाट चालायची आहे असा संदेश देणार्‍या  कथांच्या या संग्रहाला नावही साजेसं आणि योगेश प्रभुदेसाईंच मुखपृष्ठ ही तितकंच समर्पक!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॅारएव्हर फॅार्टी-एका योध्याची अमर कहाणी” – अनुवाद लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ अनुवाद लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे.  एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व मॅाम्सप्रेसो या ब्लॅागसाइटवर प्रकाशित झाले आहे. अनेक कथा, लघु कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार, शब्दांकन, कलाकृती असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या स्वतःच्या साहित्य वाचनाचे रेडिओवर कार्यक्रम होत असतात. अर्थगर्भ लिखाण करणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॅारएव्हर फॅार्टी – एका योध्याची अमर कहाणी” ☆अनुवाद – लेखिका – सौ. अनुराधा गोरे ☆ 

   

पुस्तक – फॅारएव्हर फॅार्टी – एका योध्याची अमर कहाणी

अनुवाद – लेखिका – सौ. अनुराधा गोरे

पृष्ठ संख्या – २३२

सर्व जग कोव्हीडचा सामना करत होते आणि त्याचवेळी भारतीय सेनेला आपली सीमा अबाधित ठेवण्यासाठी लढावे लागत होते. गलावण खोऱ्यातील युध्द किंवा भारत – पाकिस्तान सीमा रेषेवरील तणाव, अशा बातम्या आपल्याला नवीन नाहीत. त्यातच पुढे कानावर येणारी बातमी, “शत्रू पक्षाशी झालेल्या चकमकीत आपला एक जवान शहिद झाला……” दरवेळी अशी बातमी ऐकली की पोटात गलबलायला लागते आणि विचार सुरू होतो तो या जवानांच्या कुटुंबियांचा. काय करत असतील या जवानांच्या पत्नी आणि कसे असेल त्यांचे आयुष्य?

लष्करातील लोकांचे आयुष्य सामान्य नागरीकांप्रमाणे कधीच नसते. मग ते कसे असते? याचे उत्तर कर्नल वसंत वेणूगोपाळ यांच्या सुविद्य पत्नी सुभाषिनी वसंत आणि वीण प्रसाद यांनी लिहिलेल्या “Forerver Forty” या इंग्रजी पुस्तकात मिळते. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सौ. अनुराधा गोरे यांनी. सौ. अनुराधा गोरे या स्वतः शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आहेत.

माणसाच्या मृत्यू नंतर काळ पुढे सरकत असतो. पण त्याचे आयुष्य त्या एका वयाच्या आकड्यावर थांबलेले असते. अशोकचक्र विजेते कर्नल वसंत यांच्या मुलीने आपल्या वडीलांबद्दल काढलेले उद्गार “फॅारएव्हर फॅार्टी”. तेच नाव या पुस्तकाचे आहे.

“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” ही म्हण खरी ठरवणारे वसंत वेणुगोपाळ यांचे आयुष्य. त्यांना लहानपणापासून बंदुकीची, लष्करी गणवेशाची आवड होती. कॅालेज जीवनातील एन.सी.सी. मध्ये त्यांनी केलेली कामगिरी. त्यांची शिस्तप्रियता. अशा अनेक गुणांचे दर्शन त्यांचे बालपण आणि कॅालेजचे आयुष्य यात समजून येते.

नंतर सुरवात होते ती वैयक्तिक आयुष्याला. आपण सामान्य लोक आपल्या घरातील लोकांना, खास करून आपल्या जोडीदाराला गृहित धरतो. त्यांच्याकडून आपल्या अनेक अपेक्षा असतात. सैनिक कुटुंबातील अर्धांगिनीला हे करून चालत नाही. उद्याचा उजाडणारा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे, याची कधीच खात्री नसलेली ती अर्धांगिनी. दोघांच्या वैवाहिक जीवनात एकत्रित मिळणारे क्षण किती असतील, हे कधीच माहित नसणारी ती.

गेल्या साधारण दिड दशकात आपल्याला एकमेकांशी संपर्कात राहाणे खूप सोपे झाले आहे. पण लष्करातील कुटुंबियांसाठी हे नेहमीच एक आव्हान असते. त्यात सुभाषिनी आणि कर्नल वसंत यांचा काळ तर ऐंशी-नव्वदच्या दशकातील. एकमेकांशी संपर्क साधण्याचे साधन म्हणजे फक्त पत्र. त्यांनी लिहिलेल्या जवळपास चारशे पत्रातून हे पुस्तक जन्माला आले. ही पत्रे आणि त्यातील काही स्केचेस यातून ते आपल्या राहायच्या ठिकाणांचे हुबेहुब डोळयासमोर उभी करतात.

बरं ते पत्र वेळेवर पोहचेल याची खात्री कधीच नसायची. त्यातील मजकुर तपासला जायचा. म्हणजे आपल्याच जोडीदाराशी लिहिताना, फोनवर बोलताना किती जपून लिहावे, बोलावे लागते, याचे भान ठेवावे लागते.

सामान्य नागरिकाला लष्करातील प्रवेश परिक्षा, त्यांच्या संज्ञा, प्रतिज्ञा, रिती-रिवाज यातून कळतात. त्याचबरोबर त्यांचे खडतर, कष्टप्रद आयुष्य यांचे दर्शन यातून घडते. पाऊस असो किंवा वाळूची वादळे तंबूत राहाणे.

प्रेम आणि त्याग याचा खरा अर्थ हे पुस्तक वाचताना समजते. कारण बहुतेक वेळा घरातील सदस्यांचा वाढदिवस किंवा नवीन वर्ष अथवा सण अशावेळी, बहुतेक वेळा त्यांचे वास्तव्य दूर कुठेतरी दुर्गम भागांत असायचे.

पती निधनानंतर नायिकेने मांडलेले मनोगत सर्वोत्तम. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुभाषिनी यांनी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी एक संस्था स्थापन केली आहे.

असे लष्करी आयुष्य जवळून पहाण्यासाठी, कर्नल वसंत सारख्या शूरवीरांप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचले पाहिजे.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

पुस्तक  – संवादू अनुवादू

लेखिका – उमा वि कुलकर्णी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस 

मूल्य –  450 रु

संवादु अनुवादु (आत्मकथन)

‘उमा वि कुलकर्णी’ हे नाव वाचले की डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या पर्व, वंशवृक्ष, मंद्र या भैरप्पांच्या कादंबऱ्या! आम्हाला त्या मराठीत वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या त्या उमाताईंनी ! वास्तविक शिवराम कारंथ, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती यांच्याही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. काही पुस्तके, मालिका यांचेही लेखन केले आहे. परंतु भैरप्पा आणि उमताई हे समीकरण वाचकांच्या मनात अगदी पक्के बसले आहे. याच उमाताईंचे आत्मकथन म्हणजे ‘संवादु-अनुवादु’ हे पुस्तक!

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथे त्यांचे बालपण गेले. वास्तविक घरात मराठी भाषा बोलत असले तरी आजूबाजूच्या लोकांच्या सहवासात राहून कन्नड पण त्यांना उपजतच येत होते. शिवाय पंजाबी घरमालक, नायर शेजारी त्यामुळे मल्याळम , मिलिटरीचे ठाणे शेजारीच असल्यामुळे हिंदी- इंग्रजी भाषेचा संस्कार , असे विविध भाषांचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले.

नंतर विरुपाक्ष यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांना कन्नड बोलण्याचा सराव करावा लागला. ती भाषा कळत असली तरी बोलायला आणि लिहायला – वाचायलाही त्यांना जमत नव्हती. मग इतके अनुवाद त्यांनी कसे केले हा वाचकांना प्रश्न पडतो.

पण एक प्रसंग असा घडला की त्या अनुवादाकडे वळल्या. शिवराम कारंथ याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनी ती कादंबरी मिळवून वाचून काढली.त्यांचे वर्णन ऐकून उमाताईना पण ती वाचण्याची उत्सुकता वाटू लागली. पण नुसते कथानक ऐकून त्यांचे समाधान झाले नाही. मग उमताईंनी त्यांना ती हट्टाने वाचून दाखवायला सांगितली.आणि सहजच जे ऐकले ते मराठीत लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अनुवाद लिहिला गेला. तेथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.

त्याच प्रवासाची कहाणी म्हणजे हे आत्मकथन आहे. या प्रवासात उमाताई आपल्याला गुंतवून ठेवतात. त्यांनी ज्या लेखकांचे साहित्य अनुवादित केले ते सर्व लेखक वेगवेगळ्या विचारधारेचे होते. त्यांची लेखनशैली वेगवेगळी होती. तरीही त्याचा अनुवाद करताना कुठेही उमाताई कमी पडल्या नाहीत. त्यांची अनुवादित पुस्तके तितक्याच रसिकतेने वाचली जातात आणि हेच अनुवादकाचे कौशल्य आहे. कित्येकदा अनुवादकाला दुय्यम स्थान दिले जाते. तसेही अनुभव यात त्यांनी मांडले आहेत. आहे तसे, घडले तसे मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो केवळ त्यांचाच प्रवास नाही , तर वाचकांनाही उत्सुकता निर्माण करणारा आणि ती शमवणारा लेखनप्रपंच आहे. हे आत्मकथन आपल्याला अनेक गोष्टींवर विचार करायला लावणारे, अंतर्मुख करणारे आहे. जीवनप्रवासात आलेले कटू गोड अनुभव त्या एकाच तराजुतून तोलतात. म्हणूनच अपत्य नसल्याची खंत न बाळगता आपल्या पुस्तकरुपी अपत्यात त्यांनी तो आनंद शोधला.   अनुवादातून मिळणारा आनंद व्यक्त करताना त्या म्हणतात,“ मूळ लेखक कितीही प्रतिभावान असला तरी त्याच्या निर्मितीला मर्यादा आहेत; पण अनुवादकाला ही मर्यादा नाही.अनुवाद त्याला आयुष्यभर साहित्यक्षेत्रात रमायची सोय करुन देतो. आपल्या आयुष्यात अनुवादक कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती आपल्या वाचकांना देऊ शकतो.” वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद त्यांनी या लेखनात शोधला आणि हेच त्यांचे संचित आहे. म्हणूनच त्या म्हणतात की,“आमचे अनुवाद आणि आमचे जीवन इतकं एकमेकांत मिसळून गेले आहे की ते वेगळे काढणे आता शक्य नाही.”

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

कथा संग्रह  – शेल्टर

अनुवादिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

पुस्तक परिचय: शेल्टर ( हिंदीतील कथांच्या अनुवादाचे पुस्तक)

श्रीमती उज्ज्वला केळकर

लेखिका उज्वला केळकर यांचा ‘शेल्टर’हा अनुवादित कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे .

वेगवेगळ्या प्रतिथयश लेखकांच्या निवडक कथांचा अनुवाद लेखिकेने लीलया केला आहे.

एक एक कथा म्हणजे एक एक मोती आणि या मोत्यांचा सर गुंफण्यात आणि वाचकाला वाचनात सक्रिय ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

लेखिकेनं कथा अनुवादित केल्या आहेत नव्हे तर त्यांचे अनुसृजन झाले आहे असे म्हणावे लागेल .सामाजिक परिस्थिती ,पात्रांची मानसिकता,त्या त्या प्रांतातील पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि या सर्वातील बदल यांच्या तपशिलाने पुस्तक सजले आहे .

पुस्तकातील प्रत्येक कथा ही हलकीफुलकी, समजायला सोपी,हृदयाला भिडणारी आणि शेवटी एक संदेश देऊन जाणारी अशी आहे .

लेखिकेची भाषा प्रवाही आहे अनुवाद करताना संबंधित प्रांतातील त्या कथेतील पात्रांची नावे लेखिकेने जशीच्या तशी ठेवून कथेचा लहेजा कायम ठेवला आहे.

लेखिकेची सृजनात्मकता पाहून नक्की प्रेमात पडावं असा हा कथासंग्रह !!

एकूण तेरा कथा असलेला हा कथासंग्रह!! त्यापैकी काही कथांचा परामर्श मी इथे घेत आहे. मृत्युपत्र कथा अंतर्मुख व्हायला लावते आपल्या दोन्ही मुलांवर अपार प्रेम असलेली आई आपल्या सुनांना मुलीं प्रमाणे वागणूक देते.मुलांसाठी समान वाटणी असलेले मृत्युपत्र ही रजिस्टर करते. तिची आई ज्यावेळी तिला संभाळण यावरून दोन्ही मुलात वाद होतात तेव्हा मृत्यूपत्र बदलते आणि संपूर्ण संपत्ती ट्रस्टच्या नावे करते.

कहाणी अतिशय बोलकी आहे ती केवळ लेखिकेने खूपच touching feel दिला आहे म्हणून..

‘शेल्टर’ ही मुलाने अव्हेरल्यावर स्वतःचे शेल्टर शोधणाऱ्या आईची कथा ! मिस्टर कपूर हेच तिचं अखेर शेल्टर बनतात…..

‘कुणाचा फोन वाचतोय’ ही कथा म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला असं आपण म्हणतो ना तसं काहीसं कथानक …….आपण केलेल्या कथासंग्रहाला दाद मिळावी ही स्वाभाविक अपेक्षा असणाऱ्या राजदीप ची ही मनाची घालमेल दर्शवणारी कथा !फोनची वाट पाहण्यात आलेली त्याची अस्वस्थता खूपच छान रित्या लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचली आहे .

‘धूर’ या कथेतील केवल राम हा मुसलमान द्वेष्टा! त्याच्या भूतकाळातील अपमानाच्या खुणा अजूनही ताज्या आहेत. कोणताही स्वाभिमानी, आक्रमकांनी दिलेल्या जखमा विसरू शकत नाही .या त्याच्या तिरस्काराच्या ठिणगी वर कुटुंबीय वारं घालतात सरतेशेवटी तो ‘take the life as it comes’ या तत्त्वाचा स्वीकार करतो. त्याच्या मानसिकतेतील उतार-चढाव लेखिकेने छान अधोरेखित केले आहेत.

‘अढळ पर्वत’ या कथेत ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतलेल्या धरमदासला सन्मानपूर्वक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आमंत्रण असते पण तो नुसता सन्मान स्वीकारायला तयार नाही .गुंडांची दहशत समूळ मोडून काढायची चळवळ त्याला गप्प बसू देत नाही आणि त्यासाठी तो सज्ज होतो .

‘बंध नात्याचे’ या कथेमध्ये विधवा स्त्रीच्या मन भावना चितारल्या आहेत ती स्वतःसाठी आधार शोधते. याची जाणीव तिच्या मुलाला असत नाही. समाजाच्या विरोघात जाऊन समाजमान्य नसलेल्या गोष्टी करायला मुलगा तयार होत नाही. त्यामुळे तो तिला विरोध करतो. सर्व बंधने झुगारून ती मात्र आपल्या मित्राचा हात हातात घेते. अशी ही कथा लेखिकेने छान खुलवली आहे .

आपण डेटिंग ज्याला म्हणतो तशी काहीशी कथा ‘सहप्रवासी’! संपूर्ण संभाषणामध्ये दोघांचीही मते जुळत नाहीत परंतु संभाषणाच्या शेवटीशेवटी मनं जुळतात हे समजते हे केवळ लेखिकेच्या लेखन कौशल्यामुळे…

‘नातरा’म्हणजेच पुनर्विवाह मूळ लेखक भरत चंद्र रश्मी यांची याच नावाने असलेली ही कथा त्यातील नावे पात्र न बदलता लेखिकेने मांडली आहे विशिष्ट चालीरिती रूढी यांच्या कचाट्यात सापडलेल्या भुरीची ही कथा फारच हृदयस्पर्शी आहे.

‘खंधाडिया’ या कथेचे शीर्षक मूळचेच ठेवून लेखिकेने ही कथा रंगवली आहे तत्वनिष्ठ अशा बापाचं आपल्या लाच खाऊ आणि व्यभिचारी मुलाशी मुलाचे असलेलं हे द्वंद्व आहे. आपल्या सुनेला मुलगी मानून तिच्यासाठी लढणारा ढेडिया लेखिकेने खंबीरपणे उभा केला आहे.

‘तो क्षण’ ही या

कथासंग्रहातील शेवटची कथा! काही वर्षांपूर्वी झालेल्या कलहातून एक हिंदू आणि एक मुसलमान यामध्ये एक’ मजहब कि दीवार’ उभी राहते. मृत्यूची चाहूल लागलेले मौलाना अगतिक होतात. आपली शेवटची इच्छा प्रकट करायचा हक्क त्याना असतोच आणि ती पूर्ण करायची जबाबदारी आप्तांची…… पंडिताला भेटायची त्याची इच्छा पूर्ण होते पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते.

पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय आकर्षक चितारलेले आहे.

एकूणच जगण्याची कला शिकवणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे!!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ वाकळ – लेखिका मीनाक्षी सरदेसाई ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ वाकळ – लेखिका मीनाक्षी सरदेसाई ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

 

लेखिका मीनाक्षी सरदेसाई यांच्या अनेक कथा, ललित लेख दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहे. त्यातीलच निवडक 26 लेखांचा संग्रह म्हणजे ‘ वाकळ ‘.

वाकळ म्हणजे गोधडी, आजच्या काळात quilt. पूर्वी स्त्रिया दुपारचा वेळ सत्कारणी लावणे, जुनी लुगडी, धोतरे, यांचा वापर करून उबदार पांघरूणे हातानी शिवणे,  अंथरूण पांघरुण घरीच बनवून संसाराची एक गरज पुरी करण्यासाठी हातभार लावणे, असा साधा सरळ मानस. तो पूर्णं करायच्या प्रयत्नातून गोधडीचा जन्म झाला..त्यात वापरलेले तुकडे हे वापरणा-याच्या प्रेमाची,  आणि वात्सल्याची प्रचिती देतात,  असा प्रेमळ समज.

लहान मोठे,  रंगबिरंगी तुकडे जोडून त्याला चारी बाजूंनी नेटकीशी किनार लावून शिवलेली वाकळ घरच्यांना प्रेमाची,  आपलेपणाची ऊब आणि भावनिक सुरक्षिततेची हमी देत असे.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

लेखिकेने अनेक अनुभवांच्या, अनेक व्यक्तींच्या व अनेक आठवणींचे लिखाण एकत्र करून ही  संग्रहाची ‘वाकळ’  निर्मिली आहे.

संग्रहातील प्रत्येक रचनेला  स्वतःचे वेगळेपण आहे. चपखल अशा वैविध्यपूर्ण शब्दांतून प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब उभे रहातात.

सुरवातीच्या, म्हणजे वाकळीचा पहिला तुकडा “केशरचनेची गुंतावळ” . ऋषी मुनि,  देव-दानव, यांच्या केशरचनेपासून,  अत्याधुनिक शाॅर्ट कट असे दहा विविध प्रकार सामावले आहेत. शेवटी स्त्री सुलभ स्वभावानुसार त्या केसांचं कौतुकही करावं, अशी लाडिक मागणीही केली आहे. ‘ गुंतावळ’ म्हणण्यापेक्षा “कुंतलावली” असं नाजुक नाव द्यावं,  इतकं छान लेखन.

“लाडक्याबाई,” “अनाथांची आई”, ” गृहिणी”, “गुरुविण”, यातील व्यक्तिरेखा इतक्या सुंदर रेखाटल्या आहेत की त्या ओळखीच्या नसल्या तरी जवळच्याच वाटू लागतात. त्यांच्याच सारख्या आपल्या परिचित व्यक्ती मनात रुंजी घालू लागतात.

“सुवर्णमध्य”, “कागदी घोडे”, “विहिणी विहिणी”, “मूल्यशिक्षणाचे धडे”, तसेच  “डाॅक्टर तुम्ही सुद्धा”, “कामवाली सखी”,  “ओम् नमो जी आद्द्या”, “आलंय ते घ्यायला हवं”, या लेखनामधून सामाजिक परिस्थिती, घराघरातून थोडेसे अवघड झालेले प्रश्न, शिक्षण संस्था, वैद्यकीय व्यवसाय,  नातेसंबंधातली गुंतागुंत  आणि त्यातून समाजमनावर, कुटुंब व्यवस्थेवर होणारे परिणाम यावर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. व त्यावरचे उपायही समजावले आहेत.

“घडलंय बिघडलंय” हा छान खुमासदार लेख. वाचताना मनात खुदुखुदु हसू येतं. आपले पण असे घडलेले प्रसंग आठवतात. स्वयंपाक हे शास्त्र आहे. प्रयोग करता करता येणा-या अनुभवातून लागलेले शोध व त्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या यांचं शब्दांकन तंतोतंत पटतं.

माणसांव्यतिरिक्त असणारा प्राण्यांचा सहवास इतका जवळचा असतो कि त्यांना  आपण सोयराच मानतो.  “वाघाची मावशी”, आणि ” वानर”  त्यानाही समाविष्ट केले आहे.

“आईबाबा”, “बहिणी बहिणी”, “अनुभव”, “जामातो दशमग्रहृ”, या लेखांमधून अनुभव,  आप्तसंबंधातील प्रेम, तसेच न रूचणा-या गोष्टी तून स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडतात.

” सख्खे शेजारी “, आणि

” मायबोली ची लेणी ” हे या वाकळीचे सर्वात जुने तुकडे.  त्यांचा पोत, त्यांचा गाभा किंवा गर्भितार्थ आजच्या काळात ही लागू पडतो.

” येस बाॅस” हा एकदम नवीन तुकडा.

अशी ही ” वाकळ ” अनुभवांच्या तुकड्यांची.  पूर्वीच्या स्त्रियांच्या जीवनातील अव्यक्त जाणीवांवर प्रकाश टाकणारी, कष्ट,  दुःख,  सल, अपमान यांत भिजलेले तुकडे सांभाळणारी,  पतीचे प्रेम,  वडीलधा-यांचे वात्सल्य,  एकमेकींसह, जुळवलेल्या तुकड्यांबरोबर  जुळलेली मने, या सर्वांचा अनोखा पट उलगडणारी  ” वाकळ”.

स्थलकालाच्या सीमारेषा पार करणारी,  स्त्रीचे अंतरंग जपणारी, आधुनिक स्त्री च्या स्वावलंबनाचा व आर्थिक सक्षमतेचा मानदंड असणारी ही गोधडी म्हणजेच ” वाकळ “.

” वाकळ ” वाचता वाचता आपण ती कधी अंगावर घेतो, आणि  वाचन संपता संपता त्या उबदार दुलईत कधी शिरतो, कळतंच नाही.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सिद्धार्थ” ☆ सौ. राधिका भांडारकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सिद्धार्थ” ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: सिद्धार्ध

लेखिका : स्मिता बापट जोशी

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

पहिली आवृत्ती : २१ मे २०१९

किंमत : रु.१६०/—

सिद्धार्थ  हे पुस्तक वाचल्यावर पहिली प्रतिक्रिया द्यायची म्हणजे हे पुस्तक मातृत्वाच्या कसोटीची एक कहाणी सांगते. हा एक प्रवास आहे. सिद्धार्थ आणि त्याच्या आई वडीलांचा. या प्रवासात खूप खाचखळगे होते. आशा निराशेचे लपंडाव होते. सुखाचा नव्हताच हा प्रवास. सुखदु:खाच्या पाठशिवणीची ही एक खडतर वाटचाल होती.  वेदना, खिन्नता, चिंता, भविष्याचा अंधार वेढलेला होता.

सिद्धार्थच्या ह्रदयाला जन्मत:च छिद्र होतं. २६/२७ वर्षापूर्वी विज्ञान आजच्याइतकं प्रगत नव्हतं. शिवाय सिद्धार्थची समस्याच मूळात अवघड आणि  गुंतागुंतीची होती.

एका हसतमुख, गोर्‍या ,गोंडस बाळाला मांडीवर घेऊन प्रेमभरे पाहताना,या असाधारण समस्येमुळे त्याच्या आईचं ह्रदय किती पिळवटून गेलं असेल याचा विचारच करता येत नाही. त्या आईची ही शोकाकुल असली तरी सकारात्मक कथा आहे.

सिद्धार्धच्या आई म्हणजेच स्वत: लेखिका स्मिता बापट जोशी. सिद्धार्थला, त्याच्या शारिरीक, मानसिक त्रुटींसह मोठं करताना आलेल्या चौफेर अनुभवांचं, भावस्पर्शी  कथन या पुस्तकात वाचायला मिळतं..

सिद्धार्थच्या अनेक शस्त्रक्रिया, त्यातून ऊद्भवलेल्या इतर अनेक व्याधी..जसं की,त्याच्या मेंदुच्या कार्यात आलेले अडथळे…पर्यायाने त्याला आलेलं धत्व, बाळपणीचे लांबलेले माईलस्टोन्स.. चोवीस तास, सतत त्याच्यासाठी अत्यंत जागरुक, सावध राहण्याचा तो, भविष्य अवगत नसलेला काळ भोगत असाताना झालेल्या यातनांची ही चटका लावणारी जीवनगाथाच…

पण असे जरी असले तरी सकारात्मकपणे स्मिता बापट जोशी यांनी एक आई म्हणून दिलेली ही झुंज खूप ऊद्बोधक, या वाटेवरच्या दु:खितांसाठी, मार्गदर्शक आहे. Never Give Up ही मानसिकता या पुस्तकात अनुभवायला मिळते. आणि ती आश्वासक आहे. समाजाकडुन मिळालेले दु:खद नजराणे, ऊलगडत असताना, त्यांनी समाजाच्या चांगुलपणाचीही दखल घेतलेली आहे. किंबहुना त्यांनी त्यावरच अधिक प्रकाश टाकलेला आहे. राग, चीड याबरोबरच ऊपकृततेची भावनाही त्यांनी मनापासून व्यक्त केली आहे.

विज्ञानाची मदत असतेच. पण भक्कमपणे, अनुभवाने मिळालेले ज्ञान जोडून, या काटेरी प्रवासातही फुलांची बरसात कशी होईल,आणि त्यासाठी प्रयत्नांची केलेली पराकाष्ठा यशाचं दार ऊघडते, हे या पुस्तकात ठळकपणे जाणवते आणि म्हणूनच या पुस्तकाशी आपलं नातं जुळतं..

जन्मापासून ते वयाच्या सव्वीसाव्या वर्षापर्यंतचा, सिद्धार्थचा हा जीवनपट, एका जिंकलेल्या युद्धाचीच हकीकत सांगतो.

आज सिद्धार्थला एक स्वत:ची ओळख आहे.

ज्याला संवादही साधता येत नव्हता, तो आज “झेप” नावाच्या एका विशेष  मुलांच्या संस्थेत शिक्षक आहे,

जिगसाॅ पझल सोडवण्याच्या कलेने, त्यात असलेल्या प्राविण्याने, त्याचे नांव गिनीज बुक मधे नोंदले गेले.

स्मिता आणि भूषण या जन्मदात्यांच्या संगोपनाचा हा वेगळा प्रवास वाचनीय आहे..

पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात लेखिका त्यांच्या मनोगतात म्हणतात, “जेव्हां,स्मिता एक व्यक्ती आणि स्मिता ..सिद्धार्थची आई म्हणून विचार करते,तेव्हां मला हरल्यासारखे वाटते..

स्मिताला तिची स्वत:ची स्वप्नं,महत्वाकांक्षा अर्पण कराव्या लागल्या या भावनेने कुठेतरी दु:ख होऊन  पराभूत झाल्यासारखे वाटते.पण मग,सिद्धार्थच्या जडणघडणी मधे विजीगीषु वृत्तीची स्मिताच तर होती….हे जेव्हां जाणवतं तेव्हां दृष्टी बदलते. हात बळकट होतात.

…”आज या जगाला गर्जून सांगावसं वाटतं, आम्ही दोघीही जिंकलो.”

सुंदर!!

जरुर वाचावे असे हे पुस्तक..!!

© सौ. राधिका भांडारकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निसर्ग माझा, मी निसर्गाचा” – प्रा. विजय जंगम ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्ग माझा, मी निसर्गाचा  – प्रा. विजय जंगम ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव: निसर्ग माझा, मी निसर्गाचा

लेखक: प्रा. विजय जंगम

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर.

किंमत: रू.260/.

प्रा. विजय जंगम लिखित ‘निसर्ग माझा,मी निसर्गाचा हे अलिकडेच प्रकाशित झालेले पुस्तक नुकतेच वाचनात आले.सारे काही निसर्गाविषयीच असेल असे गृहीत धरून पुस्तक वाचायला सुरुवात केली.काही पाने वाचून झाली आणि असे वाटू लागले की आपण वर्गात बसलो आहोत आणि आपले सर आपल्याला एक एक विषय व्यवस्थित समजावून सांगत आहेत.पुस्तकाच्या नावात जरी निसर्ग हा शब्द असला तरी या पुस्तकाचा विषय फक्त निसर्गापुरता मर्यादीत नाही.कारण अमर्याद निसर्गाचा विचारही संकुचितपणे करता येणार नाही.त्यामुळे निसर्ग आणि मानव यांचा विचार करताना लेखकाला अध्यात्म,विज्ञान आणि तत्त्वज्ञान या शास्त्रांचाही विचार करावा लागला आहे.प्रथमदर्शनी अवघड वाटणारे हे विषय लेखकात लपलेल्या शिक्षकाने अतिशय सोपे करून सांगितले आहेत.

पुस्तकाची विभागणी छोट्या छोट्या बत्तीस प्रकरणांमध्ये केलेली असल्यामुळे एक एक मुद्दा समजून घेणे सोपे झाले आहे.सृष्टीची निर्मिती कशी झाली,त्यामागचा  वैज्ञानिक सिद्धांत काय आहे हे सुरूवातीला स्पष्ट करत एकेका प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.विश्वनिर्मिती मागील अध्यात्मिक दृष्टीकोन विषद करतानाच विश्वाची निर्मिती होण्याआधी काय होते याचाही शोध ते घेतात. पंचमहाभूते, सप्तसिंधू , ब्रह्मांड,जन्म मरणाचा फेरा, ब्रह्म, मूळमाया असे अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात. त्या सर्वांचे साध्या,सोप्या भाषेतील स्पष्टीकरण आपल्याला येथे वाचायला मिळते. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचा मानवी  शरीराशी असणारा संबंध, मानवाची गर्भावस्था, त्याची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतरेंद्रिये, मन आणि चित्त यातील फरक, पंचप्राण अशा अनेक विषयांवर सहजपणे भाष्य केले आहे.याशिवाय मानवाचा अहंकार,प्राकृतिक गुण,त्रिगुणी मनुष्यप्राणी, त्याचे सात्विक गुण, दुःख, सुख आणि आनंद यातील फरक यासारख्या अनेक विषयांसंबंधी असणार्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंतिम आणि अटळ असा मृत्यू, मृत्यूचे प्रकार याविषयी लिहीताना चिरंजीवित्व ही एक कल्पना आहे असे ते म्हणतात.

माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुरावत चाललेल्या नात्यासंबंधी चिंता व्यक्त करून निसर्गाच्या पुनर्जन्माचीच आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

श्री श्रीकांत वडियार यांनी चित्रित केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. निसर्गाचे मानवाशी असलेले अतूट नाते, पुढील पिढ्यांसाठीही त्याची असलेली आवश्यकता आणि निखळ नैसर्गिक आनंदाचे दर्शन घडवणारे हे मुखपृष्ठ योग्य रंगसंगती मुळे आकर्षक ठरले आहे.

पुस्तकात अनेक ठिकाणी येणारी संतवचने, संदर्भ, गीता,दासबोध, चाणक्य नीती,अशा ग्रंथातील दाखले हे लेखकाच्या वाचनसमृद्धीचे द्योतक आहेत.अनेक ठिकाणी त्यांच्या लेखणीतून उतरलेली वाक्ये ही सुवचनाप्रमाणे वाटतात.उदाहरण म्हणून, ‘उपाशीपण हे नेहमी भरकटलेलं असतं’, आनंद हा कधीच परावलंबी नसतो’, ‘माणसाला अंतर्मुख व्हायला दुःख ही एक संधी असते’, ‘वेदनाच खरं बोलते’ अशा काही वाक्यांचा उल्लेख करता येईल.

मला तर वाटते की निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्माच्या दारापर्यंत नेऊन पोचवणारा विज्ञाननिष्ठित भक्तीमार्ग या पुस्तकाने दाखवून दिला आहे.

 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दोन ज्योती” – – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन ज्योती  – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे नाव – दोन ज्योती  

लेखिका – श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशन -श्री नवदुर्गा प्रकाशन

 

दोन ज्योती (पुस्तक परिचय)

‘दोन ज्योती’ हा अनुराधा फाटक यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. त्यांचा हा 13 वा कथासंग्रह. राज्य पुरस्कारासकट ( भारतीय रेल्वेची कहाणी – भौगोलिक ) त्यांच्या विविध पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या दुहेरी विणीतून त्यांची कथा गतिमान होते. कल्पनारंजन असं की समाजात ज्या गोष्टी घडायला हव्यात, असं त्यांना वाटतं, त्या त्या गोष्टी त्यांच्या कथांमधून घडतात. ‘पालखीचे भोई’ मधील बाबा गावातील विविध धर्मियांची एकजूट करून माणुसकीची दिंडी काढतात. त्यांच्याकडे  भजनाला विविध जाती-धर्माचे लोक येतात. सकाळी तिरंग्याची पूजा करून व त्याला प्रणाम करून पालखी निघते. त्यात सर्व धर्माचे धर्मग्रंथ ठेवलेले असतात. आपआपल्या धर्माचा पोशाख केलेले वारकरी ‘पालखीचे भोई’ होतात.

श्रीमती अनुराधा फाटक

‘झेप’ मधील सायली हुशार पण घरची गरीबी म्हणून ती सायन्सला न जाता आर्टस्ला जाते. संस्कृत विषय घेते. दप्तरदार बंधूंकडे जुन्या औषधांची माहिती असलेली त्यांच्या आजोबांची दोन बाडं असतात. सायली त्यांचा मराठीत अनुवाद करून देते. पुस्तक छापलं जातं. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. वेगळ्या दिशेने झेप घेतलेल्या सायलीचं कौतुक होतं. कथेचा शेवट असा- भारतीय ज्ञान, बुद्धी, यांना साता समुद्रापार नेणारी ही झेप’ नव्या पिढीचा आदर्श ठरणार होती.

‘बळी’ ही ‘यल्ली ’ या जोगतीणीची व्यथा मांडणारी कथा. ती म्हणते, नशिबानं मलाच यल्लम्मा बनीवली आणि दारोदर फिरीवली. तिचा विचार करणारा, तिला चिखलातून बाहेर काढू इच्छिणारा, तसं केलं नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं म्हणणारा एक स्वप्नाळू तरुण तिच्याशी लग्न करतो. एकदा रस्त्यावरील  एका गाडीच्या अपघातात तो मरतो. शिक्षण नसलेल्या यल्लीला जगण्यासाठी पुन्हा जोगतीणच व्हावं लागत पण आपण मूल जन्माला घालायचा नाही , असं पक्कं ठरवते. कथेचा शेवट असा- ‘यल्लूचे डोळे गळत होते. त्या अश्रूतून मातृत्वाची बांधून ठेवलेली ओल वहात होती. कुणाचा बळी न देण्याचा निर्धारही. ती म्हणते, माझ्या आयुष्याचं बुकच वेगळं हाय. त्यात फाकस्त बकर्‍यावाणी बळीची गोष्ट.’ सजलेली –धजलेली यल्लम्मा  जग डोक्यावर घेऊन  निघाली. तिचाही बळी घेतला होता, समाजातील दुष्ट रुढींनी. खरं तर त्या अश्रूतून बांधून ……. न देण्याचा निर्धारही … इथेच कथा संपायला हवी होती. पण लेखिकेला स्वतंत्रपणे भाष्य करण्याचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या अनेक कथांमधून दिसते.

दोन ज्योती, घर, कलंक,पुरस्कार या कथा वृद्धाश्रमाच्या पार्श्वभूमीवरच्या. ‘दोन ज्योती’मधल्या सुमतीबाई, ‘घर’मधल्या कुसुमताई, कलंक’ मधल्या मीनाताई सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी आश्रमात आलेल्या. त्या तिथे केवळ रूळल्याच नाहीत, तर रमल्याही.त्यांचा आत्मसन्मान तिथे त्यांना मिळालेला. कुसुमताई सुनेच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या. त्या म्हणतात, ‘नवरा गेल्यापासून आजपर्यंत घरात आश्रमासारखी राहिले, आता या आश्रमात घरासारखी रहाणार आहे.’ मीनाताईंच्या मुलाने हाती लागलेल्या बनावटी पत्रांच्या आधारे, त्याची शहानिशा न करता आईवर लावलेल्या बाहेरख्यालीपणाच्या आरोपाने व्यथित होऊन त्या आश्रमात आल्या आहेत. शेवटी मुलाला आपली चूक कळते. तो त्यांना घरी न्यायला येतो, पण त्या ‘तुझ्या पश्चात्तापाने माझा कलंक पुसला, तरी मनाची जखम ओली आहे.’असा म्हणत पुन्हा घरी जायला नकार देतात. आत्मकेंद्रित, अहंमन्य, पैशाच्या मागे लागलेले, बायकोला गुलामासारखं वागावणारे वसंतराव. त्यांच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या सुमतीबाई नवरा न्यायला येणार, म्हंटल्यावर धास्तावतात. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका वसंतरावांनाच इथे ठेवून घेऊन हा पेच सोडवण्याचे ठरवतात. त्यावेळी पती-पत्नी यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलतात. भाषण दिल्यासारखं. वाटत रहातं, लेखिकाच त्यांच्या तोंडून बोलतेय. कथासंग्रहात असं वाटायला लावणार्‍या खूप जागा आहेत.  लेखिकेचा अध्यापणाचा पेशा असल्यामुळे कुठल्याही घटना-प्रसंगावर भाष्य करण्याचा लेखिकेला मोह होतो आणि अनेकदा संवाद भाषणात रूपांतरित होतात.

पुस्तकात पाहुणेर, गोफ, नवजीवन, मंगला, माणुसकी इ. आणखीही वाचनीय कथा आहेत. शब्दमर्यादेचा विचार करता, मासिका- साप्ताहिकातून चित्रपट परीक्षणे येतात, त्यात शेवटी म्हंटलेलं आसतं, ‘पुढे काय होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.’ तसंच म्हणावसं वाटत, ‘कथांचा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच आनंद घ्या.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print