मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

पुस्तक – चांदणं (बालकविता संग्रह)

लेखक – प्रा. सौ. सुमती पवार

बालमित्रांनो, नमस्कार..

हो, मी सुमती पवार बोलते आहे. यापूर्वी दहा बालगीतं संग्रहातून आपण भेटलो आहोत. आता तुमच्यासाठी कवितेचं चमचमतं ‘चांदणं’ मी घेऊन आले आहे.

अहो, चांदणं कुणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडते. चांदणं आवडत नाही असा माणूस दुर्मिळच, हो ना? चांदणं, चंद्र आपल्याला खूप आनंद देतात, प्रसन्नता देतात. या चांदण्यावर मराठी कवितेत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. असा चांदण्यांचा म्हणजे आनंद देणार्‍या बालगीतांचा खजिना मी तुम्हाला अर्पण करते आहे. चांदण्यांचा आपण वेगवेगळ्या अंगांनी आनंद घेतो तसाच हा संग्रह तुम्हाला जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा परिचय करून देणार आहे. या ‘चांदणं’ संग्रहात अनेक विषयांच्या सुंदर सुंदर कविता देण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात देवबाप्पापासून निसर्गापर्यंत अनेक विषय आहेत. आपल्या मायमराठीचे महात्म्य आहे. भारतमातेचा अभिमान आहे.

“तव मातीमध्ये मम राख मिळो

पावन होईल जीवन आमुचे

अश्रू न कधी डोळ्यात तुझ्या

तुज दिवस दाखवू भाग्याचे”

अशी भूमिका आपली असली पाहिजे. असे मला वाटते. मित्रांनो, निसर्ग मला फार आवडतो. निसर्ग कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतो. निसर्गातील झाडं, पानं,फुले, फळे, पक्षी, तारे, वारे हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ नाही. म्हणूनच निसर्गातील विविध विषयांवर तुम्हाला कविता दिसतील, आवडतील. तुम्हालाही निसर्गात रमायला, सहलीला जायला आवडते, हे मला माहीत आहे. मला तर झाडे म्हणजे ‘यक्ष’च वाटतात. आदर्श गाव कसं असावं, तेही मी तुम्हाला सांगितले आहे. झाडांनी नटलेला हिरवागार, प्राण्या-पक्ष्यांनी नटलेला गाव कुणाला आवडणार नाही? पक्षी झाडांवर सुंदर घरटी बांधतात. सुगरण झुलता बंगला बांधते, हो ना? पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार पाचूचे रान असते. त्या हिरव्यागार गवतावरून चालताना मला स्वर्गात चालल्याचा भास होतो. भोवताली सारा निसर्ग, पाने, फुले हात जोडून, झाडे तुमचे स्वागत करत असतात, स्वर्ग याहून काय वेगळा असतो? पाणी, दातृत्व, आई ,तुम्हाला पडलेले अनेक प्रश्‍न मी यात मांडलेले आहेत . तुमच्या सोबत मी ही लहान होते नि मला माझे बालपण स्मरते.

मग मी थेट भूतकाळात, बालपणात तुम्हालाही घेऊन जाते.या पुस्तकात पपई आहे तसेच पुस्तकही आहे. फळं खाल्ली पाहिलेत प्रकृतीसाठी आणि पुस्तकं वाचली पाहिजेत ज्ञानासाठी! निसर्गात नेहमी आनंद सोहळा चालू असतो. तो अनुभवायला, डोळसपणे बघायला आपण शिकलं पाहिजे. संध्याकाळी, सकाळी क्षितिजावर रोज रंग सोहळा असतो तो आपण बघितला पाहिजे, ते” कोण’ या कवितेतून मी सांगितले आहे. ‘जरा एकदा’ घाटातून फेरफटका मारायला तुम्ही जावे, असे ही मला वाटते.

इथे फुलपाखरे आहेत, नजारे आहेत. मोट आहे, आजीचं विद्यापीठही आहे. दिवाळीपासून होळीपर्यंत सर्व आनंद देणारे विषय, या पुस्तकात तुम्हाला मिळतील व खूप खूप आनंद देतील, असे मला वाटते.

तर मित्रांनो, अशा विविध विषयांनी नटलेल्या ‘चांदणं’ या संग्रहाचं तुम्ही खूप खूप स्वागत कराल, अशी मला अपेक्षा आहे.

 

© प्रा. सौ. सुमती पवार ,नाशिक

दि: १६/१२/२०२०

मो ९७६३६०५६४२

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “ चार नगरातले माझे विश्व” – डाॅ.जयंत नारळीकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “ चार नगरातले माझे विश्व ” – डाॅ.जयंत नारळीकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तक – चार नगरातले माझे विश्व–आत्मचरित्र

लेखक- डाॅ.जयंत नारळीकर

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

दिग्गज शास्त्रज्ञानं घडवलेलं रसाळ विश्वदर्शन

ही कहाणी आहे असामान्य बुद्धीमत्ता असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वडिलांकडून आलेल्या बुद्धिमत्तेचा वारसा पुढे नेणा-या आणि आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणा-या भारतीय शास्त्रज्ञाची..

पाश्यात्य देशात व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत आपल्या  मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.जयंत नारळीकर…” चार नगरातले माझे विश्व ” हे त्याचं आत्मचरित्र…

प्रसिद्ध व्यक्तिभोवती एक वलय हे असतेच त्यात जर व्यक्ती डाॅ. नारळीकर यांच्यासारखी असेल तर ही उत्सुकता आपल्याला अधिक असते. अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींची भाषणे लेख इ. हे सर्वांपर्यंत पोहोचलेले असते आणि माहीतही झालेले असते पण नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन डाॅ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या जीवनातले विविध पैलू या आत्मचरित्रात मांडले आहेत. आत्मचरित्र फिरतं ते बनारस, केंब्रिज मुंबई आणि पुणे या शहराभोवती…

यात केंब्रिजबद्दलची माहिती आपणास जास्त वाचावयास मिळते. त्याचे मुख्य कारण ते म्हणजे भारतीयांना केंब्रिजबद्दल असलेले  आकर्षण..  ते केंब्रिज मथ्ये असताना न चुकता (नियमितपणे) घरी आई वडीलांना पत्र लिहून आठवड्यातल्या घडामोडी कळवतं असतं. त्यांची ती सर्व पत्रे त्यांच्या आईने जपून ठेवली होती. आणि त्या पत्राचा उपयोग केंब्रिजचं दर्शन घडवताना करण्यांत आला आहे.

डाॅ. नारळीकरांनी आडनावाच्या कथेपासून सुरूवात केली आहे. ते म्हणतात नारळीकर हे नाव कशावरून आले असावे ? नारळी नामक गावातून आल्यामुळे, का नारळाच्या झाडांच्या लागवडीचे मालक असल्यामुळे ?  याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. त्या झाडांना नारळाएवढे मोठे आंबे लागत म्हणून त्यांचे नाव पडले नारळीकर हे उत्तर गृहीत धरले तर एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे नारळीकरांचे मूळ आडनाव काय होते ? असो..  त्यांचे  वडिल केंब्रिज मधू उच्चविद्या विभूषित होऊन परतले ते बनारसला त्यामुळे डाॅ.नारळीकर यांचे बालपण बीएचयूच्या आवारातच गेले आणि शिक्षणही बनारसमध्ये झाले.

लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी १९४० ते १९५० च्या दशकातलं चित्रण रंजक पद्धतीने केले आहे. केंब्रिज मध्ये जाण्यासाठीची त्यांची धडपड आणि ट्रायपाॅस परिक्षेची तयारी यांची माहिती देताना  तिथल्या सामाजिक रूढी, परंपरा यांचं वर्णनही त्यांनी सुरेख केले आहे. हाॅएल यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या बरोबरचं संशोधन हा कालखंड वाचताना वैज्ञानिक भाषा कुठेही अवघडतेने मांडलेली नाही. संशोधनानंतर गृहस्थाश्रमातील प्रवेश मुंबईत ‘टीआयएफआर’ मध्ये केलेले काम, पुण्यात ‘आयुका’ ची उभारणी इत्यादींची माहिती त्यांनी अत्यंत सुरेख आणि सुबक पद्धतीने मांडली आहे..  जीएमआरटीचे नियंत्रण केंद्र पुण्यात सुरू करण्याची कल्पना आणि त्याही पुढे जाऊन सुरू झालेलं आंतरविद्यापिठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्राची स्थापना यांची कथा तर वाचण्यासारखी अप्रतिम अशी…

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शालेय जीवन ते आयुकातून निवृत्त होईपर्यंतच्या आपल्या प्रवासात भेटलेल्या दिग्गजांची व सहका-यांची ओळख त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत करून दिली आहे. त्यामुळे ते केवळ आत्मचरित्र न राहता त्या त्या कालखंडाची ओळख आपल्याला करून देणारा एक दस्तावेज..

या पुस्तकातून यशापयशाच्या भोव-यात सापडलेल्या आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असे मला आवर्जून सांगावेसे वाटते…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कविता संग्रह – “मृगजळाकाठी” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कविता संग्रह – “मृगजळाकाठी” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : कविता संग्रह – मृगजळाकाठी

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती : २७फेब्रुवारी २०१७

किंमत : रु.१००/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

मृगजळाकाठी विसावण्यापूर्वी  थोडं कवियत्री सौ. ऊज्वला केळकर यांच्याविषयी..

ऊज्वलाताई या हाडाच्या शिक्षीका. मुख्याध्यापक पदावरुन आता निवृत्त असल्या तरी विद्द्यार्थांमधे असलेला प्रचंड ऊत्साह आजही त्यांच्यात टिकून आहे.

विवीध साहित्य प्रकारातील आणि अनुवादित अशी जवळ जवळ साठाच्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.चंद्रपाखीची वाट नंतर “मृगजळाच्या काठी ” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.  या संग्रहातील कविता सहा विभागात वाचायला मिळतात.

सर्व कविता मुक्तछंद, छंदोबद्ध, कणिका, हायकु या काव्याप्रकाराच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत..

त्यांच्या सर्वच कविता भावना, बांधीलकी आणि विचारांनी समृद्ध आहेत.कqविता वाचताना, निसर्ग प्रेम, संवेदनशील मन, वैचारिक दृष्टीकोन,शब्द आणि भाषेवरील प्रभुत्व, प्रामुख्याने जाणवते. कल्पकता आणि मन:चक्षुने रेखाटलेली शब्दचित्रे कवितेतून जाणवतात. मनाला भिडतात, आनंद देतात.

“गंध गाभार्‍या तळी” या विभागातल्या निसर्ग कविता सृष्टीची विवीध रूपे उलगडतात. पानगळ, शिशीरऋतु च्या रुपाशी आपलं भावुक नातं जुळतं. “अवलिया” च्या,  रुपात

एक व्यक्ती म्हणूनच, शिशीर ऋतु ऊभा ठाकतो.

भरली झोळी फकीर गेला

धुळीमातीची विभूती लावूनी

मलीनधुक्याचे लक्तर लेऊन

सृष्टी बसली भणंग होऊनी…

अवलिया येतो, गळलेली पानेफुले झोळीत भरतो, त्याच्या येण्यानं सृष्टी धुळकट,ओकीबोकी, रूक्ष बनते. वाचता वाचताच जाणवते हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून

साक्षात शिशीर ऋतुच.कवियत्रीच्या कल्पनेला,मन मग भरभरून दाद देतं….

“सांज सजे अलबेली रात काळोखी..”

या विभागातून रात्रीची अनेक रुपे डोळ्यासमोर येतात. रात्र.. कुणाची अशी तर कुणाची कशी..

“सांज सजे अलबेली..कुणी हिला नादावली..”

किंवा

“चंद्र नकली,चांदण्याही चांदव्याला टांगुन आले”

 नाहीतर…

“रात्र लडिवाळ.गोष्टीवेल्हाळ..”

रात्र..”मृतवत् जीवनात प्राण फुंकणारी..”

रात्र.चंद्रबनातून अलगद ऊतरणारी…”

“चंचल,मद् होश नटनारी रात्र…”

अशी, कधी व्याकुळ, वेदनादायी, प्रेममयी, कुटील कारस्थानी रात्र या काव्य पंक्तीतून आपल्याही जाणीवांना टोकरते….कविता आणि कवियत्री एकरुप झाल्यासारख्या वाटतात.

“पाऊस,रानातला..अंगणातला..मनातला..कवितेतला..”

या विभागात वाचक पावसात चिंब भिजतो.. पावसाविषयीच्या विवीध भावना…पाऊस हवा,पाऊस नको..पाऊस लडीवाळ, बालीश..ऊदास नाहीतर वादळी..

कवियत्रीचं मन पावसाशी गप्पा मारतं. रागावतं, भांडतंही. नव्हे धिक्कारही करतं!!

“घन ओंबून आले ।क्षण माथ्यावर झुकले। परि न बरसले….”

“पाऊस ऊरी जपताना।कोसळे भिंत भवताली।

मोकळ्या स्तनांवर झुकली ।घनगर्द तुझी सावली।

ऊज्वलाताईंच्या या काव्यातले हे टपटपणारे शब्द

मनातल्या बोथट बीजांना अंकुर फोडतात..

“कविता तुझ्या माझ्या..त्याच्या तिच्या…”

या विभागात नाती ऊलगडतात..” स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आर्त,स्वप्नाळु,ओढाळ,सैल घट्ट भावनाविष्कार या कवितांतून जाणवतात.

“प्रवाह” ही कविता काहीशी रुपकात्मक वाटते.

वादळ आणि झाड यांच्यातील हा संवाद आहे. धडका देणारं वादळ आणि झाडांची रुजलेली मुळं.. एका परिपक्व नात्याचेच महत्व सुंदरपणे ऊलगडत जाते.

“तुझ्या प्रवाहावर झोकून देणं कसं घडेल?

त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग..!

या थोड्याच शब्दांत केव्हढा मोठा आशय!!!

“व्रतोत्सव “या विभागात जगण्याचं व्रत घेतलेल्या माणसांच्या कविता आहेत..

“तूही पेटव तुझ्या अंतरात

एक आशेची शलाका

जी ऊजळून टाकेल

काळजात कोंडलेले

शाश्वत नैराश्य…आणि करील तेजोमय अवघे प्राण..

सकारात्मक विचार जणु जगण्यास बळ देतात.जगणं फुलवतात…

आपल्या एकाकीपणाकडेही तटस्थपणे पाहताना, कवियत्री म्हणते,

मीच दिलेल्या शस्त्रांनी ।

माझे बंध तोडून!

मीच दिलेल्या ऊंटावर।

मीच दिलेले जवाहर लादून।

सारे गेले निघुन।

मला एकाकी टाकून…।।

तेव्हां जाणवतो जगातला पोकळपणा..धूसर खोटेपणा..

“अनुवादित कविता” हा शेवटचा विभाग. यात मान्यवर हिंदी कवींच्या अनुवादित कविता आहेत.

आपल्याला आवडलेलं रसिकांच्यात वाटावं, या समृद्ध भावनेतून केलेली ही पुरवणी. ऊत्कृष्ट विचारांचं ऊत्कृष्ट भाषांतर.

घनश्याम अग्रवाल यांची अनुवादित,”देशभक्तीची कविता..” मनाला भिडते. देशभक्तीची एक नवीनच सापडलेली व्याख्या थक्क करते.कविता दूर सरहद्दीवर असते

डबडबलेल्या डोळ्यांनी बघते

विचार करते

जितकं दु:ख वेदना इथे आहे

तितकच दु:ख वेदना तिथेही आहे..

कवितेसाठी तहान लागली असता

स्वत:ला पिणं, म्हणजे देशभक्ती

कुणा दुसर्‍यामधे

 स्वत:ला ढाळून जगणं

म्हणजे देशभक्ती….

कविता किती निस्पृह मनातून आलेली असते याचाच वस्तुपाठ हे शब्द देतात.

“मृगजळाकाठी..” या कवितासंग्रहावर लिहीताना एक सांगावसं वाटतं की मूळात हे शीर्षकच किती बोलकं आहे..अस्तित्वातच नसलेल्या भासमय गोष्टी मिळवण्यासाठी आपण अव्याहत धडपडतो…पण जे स्वप्नांत असतं ते कवितेत मात्र गवसतं..आकारतं.. आणि मग त्या मृगजळाकाठी आपली आनंददायी सैर घडते… कविता वाचतांना त्या काव्याची ,कवीच्या मनातली पार्श्वभूमी आपल्याला अवगत नसली तरीही आपल्या मनांत विवीध अर्थ उलगडतात आणि त्यातच आपण डुंबतो…तरंगतो..हे तरंगणं म्हणजेच काव्याचं यश…

ऊज्वलाताई या कवितांतून हा अनुभव देतात,म्हणूनच हा कवितासंग्रह वाचनीय आहे असे मी खात्रीपूर्वक म्हणू शकते..

माझ्या आनंदातले काही कण आपणही वेचावेत….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “अमिबा” – श्री श्रीकांत सिंधु मधुकर ☆ श्री ओंकार कुंभार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “अमिबा” – श्री श्रीकांत सिंधु मधुकर ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

पुस्तक – काव्यसंग्रह – अमीबा

कवी – श्रीकांत सिंधु मधुकर

प्रकाशक – अंतर्नाद पब्लिकेशन

प्रथम आवृत्ती – 15 आँगस्ट 2018 (रायगड)

मूल्य –  100 रुपये

पृष्ट संख्या – 76

 

पुस्तक परिक्षण

श्री श्रीकांत सिंधु मधुकर या नवोदित कवीने एका वेगळ्याच नावाने लिहलेला हा सुंदर काव्य संग्रह आहे. काव्यसंग्रहाला अमिबा हे नाव का ठेवावस वाटले ते मलपृष्ठावर सांगितलेले कवीच्याच शब्दात सांगायचे झाले तर कवी म्हणतात, “माणसाचं आयुष्य अमिबासारखं हवं. एकपेशीय, तरीही स्वच्छंदी. हवा तसा आकार घेऊनही सार्यांच्या नजरेत बरोबर असणार्या साध्या आणि सोप्या अमिबासारखं! ज्याच्या नावात आईचा अ, माझा मी आणि बाबांचा ब आहे, तो जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणून या काव्यसंग्रहास अमिबा म्हणावसं वटतं.”

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर इंद्रधनू कडे कौतुकाने पाहणारे आई, वडील आणि मुलगा यांची छायाकृती आपणास पहावयास मिळते. मुखपृष्ठाद्वारे मुखपृष्टकार मधुरा जोशी यांनी आपणास एक छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे आयुष्यातील काळोखाच्या समयी इंद्रधनू च्या रंगांनी जीवन बहरुन जाते, जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त होते.

कवी श्रीकांत हे पट्टीचे गिर्यारोहक आहेत आणि एक उत्तम कवीही. अमीबा या काव्यसंग्रहात 69 कविता आहेत आणि कवितांना आशयघन करणार्या चित्रांचीही खूप सुंदर रेलचेल आहे. हा पूर्ण कवितासंग्रह मुक्तछंदात लिहला आहे.   सगळ्याच कविता या सुंदर आहेत. कवितेत कवीने वेगवेगळे विषय खूपच छान व वेगळेपणाने हाताळले आहेत व मांडणीही वेगळेपणाने केली आहे.

मित्र या कवितेत शेवटी मित्राची छान व्याख्या करताना कवी म्हणतो,

“एक मित्र असावा असा सुचणार्या कवितांप्रमाणे श्रीमंत

एक असला तरी भासावा असा शंभराहूनी मूर्तिमंत !!”

पहिला पाऊस या कवितेचा शेवटही कवीने असाच सुंदर केला आहे.

“मनात त्यांच्या भिजविणारा

मज थेंब भेटला होता

दारावरी ज्यांच्या असा तो

पाऊस दाटला होता.”

सूर्यपुत्र या पहिल्याच कवितेत कवी कर्णाची भावना आपल्या शब्दात व्यक्त करताना म्हणतो,

“नियतीने मारलं तरी

मरण मला कधी आलच नाही

जे तत्वांसाठी जगतात एकनिष्ठ

ते मरूनही कधी मरत नाहीत.

शरीरं जाळली जाऊ शकतात

आणि कपडेलत्ते संपत्तीही

जाणिवा कधी जळत नाहीत

काळ पलटून गेला तरीही.”

आपल्या रायबा कवितेही तरुण पिढीच्या डोळ्यात रसरशीत अंजन घातले आहे. त्यातील काही ओळी…

“राबाकडे बुलेट नव्हती

रायबा नव्हता नाचत डिजेवर

रायबाला नव्हती माहीत मदिरा

नव्हता झिंगला तो कधी वेशीवर

रायबाला दिसलच नव्हतं

परस्रीचं ते खणी रुपडं कधी

असायचं लक्ष ज्याचं तिच्या पैजणावर”

शेवटी किन्नरांच्या व्यथा किन्नर या कवितेतून मांडताना कवीचे सामाजिक भान किती प्रगल्भ आहे ते जाणवते. त्यामध्ये कवी मांडतो…

कवितेतील काही ओळी अश्या…

ते स्पष्ट बोलत नाहीत,

 ते एकमेकांना फसवतात!

 ते दंगली घडवून आणतात,

 ते बाईला नाचवतात!

ते मढ्यावरचही मिळून खातात!

‘ते’ म्हटलं की तुम्हाला ‘ते’ आठवत नाहीत

कारण काय तर त्यांना लिंग आहे

आम्ही शरीरानं नपुंसक असू;

पण मनानं ते खोल अपंग आहेत

उपेक्षु नकोस मला किन्नर म्हणून

विचार माझे तुझ्याहून स्वच्छ आहेत,

परिस्थितीनं डावललं जरासं तरी

या सर्वांहून मी उच्च आहे!

शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावेसे वाटते. ते म्हणजे सर्वांनी हा कवितासंग्रह मुळातून पूर्ण वाचायला हवा. आवर्जून विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावयास हवा.

असा हा अप्रतिम काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला आणि त्याचा पुस्तक परिचय मला आवर्जून द्यावासा वाटला. कारण, या कवितासंग्रहाची शैली होय. श्रीकांत सिंधू मधुकर यांचा हा काव्यसंग्रह वाचकाला भरभरून काही तरी अलौकिक देतो म्हणूनच. कविंना व काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद!

©️ श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शारदा संगीत” – श्री प्रकाश नारायण संत ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शारदा संगीत” – श्री प्रकाश नारायण संत ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संतांच्या ‛वनवास’ या कथासंग्रहाचा पुढचा भाग म्हणजे ‛शारदा संगीत’! आई- वडिलांपासून दूर आजी- आजोबांकडे नुकताच राहू लागलेला लंपन वनवासमध्ये चित्रित केला आहे. तर कोवळ्या वयातून हळूहळू मोठा झालेला लंपन शारदासंगीतमध्ये चित्रित केला आहे. आई- वडिलांना सोडून आज्जी – आजोबांकडे राहायला लागल्यामुळे आपल्याला वनवासी समजू लागलेला लंपन आता थोडा mature झाला आहे. सुमीशी त्याची गट्टी जमली आहे. त्याचेही एक विश्व तयार झालेले यात दिसून येते.

एकूण पाच दीर्घकथांचा यात समावेश आहे. वनवास मधील गोंधळलेला लंपन ‘शारदा संगीतमध्ये’ आजूबाजूच्या वातावरणात रमलेला दिसतो.त्याचे वर्तुळ अधिक विस्तारलेले दिसते. या कथांमध्ये केवळ व्यक्तीच नव्हे तर त्याच्या खेळण्याचा अविभाज्य भाग असणारे ग्राउंड, आगगाडीचे रुळ, घसरगुंडी या निर्जीव घटकांना पण एकप्रकारची संजीवनी देऊन लेखकाने सजीवत्व प्राप्त करुन दिले आहे. शिवाय म्हापसेकर मास्तरांची शांत पण शिस्तप्रिय असणारी प्रतिमा, उच्चपदस्थ असूनही अतिशय नम्र व माणुसकी जपणारे जमखंडीकर, मास्तरांच्या अनुपस्थितीत तितक्याच सक्षमपणे क्लास चालू ठेवणारी लक्ष्मी, सरस्वती केरुर, ‛परचक्र’ कथेतील जीवनातील एक काळी बाजू दाखविणारे  करसुंदीकर अण्णा व त्यांचे कुटुंब लंपनचे अनुभवविश्व अधिक समृद्ध करुन जातात.

त्यांच्या लेखनाची एक सिग्नेचर स्टाईल होती. “मॅड स्वैपाकघर, एकदम बेष्ट, मॅडसारखा झोपून गेलो, काजूबीयांचे रिक्रुट, सुमीने आणि मी एकोणीस तास शोध घेतल्यानंतर मांजराचे पिल्लू सापडले, बाबांशिवाय इतर बविसशे लोक तिथे होते” अशी  वाक्ये वाचताना संतांची ती विशिष्ट शैली जाणवते. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील गावात त्यांचे हे बालपण गेल्यामुळे त्या भाषेचा एक विशिष्ट बाज वाचकाला सुखावून जातो. आणि प्रत्येकाच्याच मनात दडलेला तो लंपन शब्दांच्या माध्यमातून वाचकाला सापडतो. म्हणूनच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“शाळा” हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अनेकांकडून त्याची भरभरून स्तुती झाली. म्हणून मी आवर्जून तो बघितला. पण मला काही तो फारसा रुचला नाही. तोपर्यंत मी पुस्तक वाचले नव्हते. पण तेवढ्यातच माझ्या साहित्यिक मित्राने या चित्रपटावर व पुस्तकावरही खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि मी आधी जाऊन हे पुस्तक खरेदी केले.

पुस्तक वाचू लागले आणि मग मला चित्रपटातील संदर्भ उलगडत गेले. बऱ्याचदा असे घडते की एखादे पुस्तक आपण वाचलेले असते आणि आपल्या कल्पेनेतून त्या पात्रांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे त्यावर तयार केलेली कलाकृती आपल्याला भावतेच असे नाही. पण ‛शाळेच्या’ बाबतीत माझा उलटा प्रवास होता. तरीही मला पुस्तकच जास्त भावले , कारण त्यातील वातावरण, व्यक्तिरेखा लेखकाने ठळकपणे मांडल्या आहेत. वेळेचे किंवा शब्दांचे बंधन नव्हते . त्यामुळे मुकुंदाचे भावविश्व सहज उलगडले गेले आहे.

खरे तर हे पुस्तक म्हणजे मुकुंद आणि त्याच्या मित्रांचा पौगंडावस्थेतील भावभावनांचा प्रवास आहे. आत्ताच्या भाषेत आणि आत्ताच्या काळाला अनुसरून  म्हणायचे झाले तर “ first crush” ही रुढ झालेली आणि कौतुकाने मिरवली जाणारी  संकल्पनाच लेखकाने यात मुकुंद, सुऱ्या, चित्रे, फावड्या यांच्या माध्यमातून मांडली आहे. त्या अर्धवट वयातील त्यांचे अपरिपक्व विचार, संकल्पना, मस्ती याचे चित्रण यात आहे. सुऱ्याने केवड्याला प्रपोज करणे आणि त्यातून घडलेले रामायण! त्या प्रसंगात मुकुंदच्या वडिलांनी दाखवलेला संयम एक आदर्श पालक   आपल्यासमोर उभा करतो.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मांडली गेलेली ही कथा आहे. म्हणजेच साधारण ७० ते ८० च्या दशकातील! त्यामुळे त्या काळातील सामाजिक, राजकीय संदर्भ देत लेखकाने कथानकाला कुठेही धक्का न देता वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील आहे. त्यामुळे त्यांना घरातून मिळणारे संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच मुकुंद जरा चलबीचल झाला तरी पुन्हा झटून अभ्यास करतो आणि परीक्षेत सुयश प्राप्त करतो.

वास्तविक  त्या वयात असणाऱ्या सर्व मुलामुलींच्या आयुष्यात घडणारे हे सर्व प्रसंग आहेत. फक्त स्थळ- काळात थोडा बदल असेल. कालानुरूप प्रसंग, संदर्भ थोडे बदलत असतील. पण सर्वांनीच अनुभवलेले हे भावविश्व या पुस्तकात मांडले गेले आहे. जणू काही आपलेच अनुभव वाचत असल्यासारखे वाटते. म्हणूनच सर्वांनी एकदा तरी वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आपल्या आयुष्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तर काही व्यक्ती आपल्या नकळत आपल्याला प्रभावित करत असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे वडील! त्यांचे दादा ; पण खऱ्या अर्थाने बापमाणूस!

‛आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाच्या तब्बल १६१ आवृत्त्या निघाल्या आणि देशी- विदेशी अशा एकूण १७ भाषांमध्ये ते अनुवादित झाले. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. नरेंद्र जाधवांनी या पुस्तकात आपले वडील, आज्जी ,आई यांच्याबद्दल एक एक प्रकरण लिहिले आहे. शिवाय वडिलांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र त्यात समाविष्ट केले आहे. ते  वाचताना त्या भाषेचा बाज आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. थोडासा मिश्किल, पण शिस्तप्रिय असणारा बाप मनाला मोहवून जातो. “तू तुझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होन्याचा प्रयत्न कर. माझं म्हनन एवढंच हाये का तू जे करशील तेच्यात टापला जायाला पायजे. तुला चोर व्हायाच? पण मग असा चोर व्हय, का दुनियाने सलाम केला पायजे.”  असे सांगणारा बाप ‘सर्च फॉर एक्सलंस’ हेच तत्वज्ञान सांगतो असे जाधवांना वाटते.

जाधव कुटुंबात एकूण ही सहा भावंडे, आई- वडील व आज्जी अशी एकत्र राहिली. वडील बिपीटी मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यामुळे  डॉ. जाधवांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले. अर्थातच तिथले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण उच्चभ्रू समाजापेक्षा वेगळे होते. पण जाधवांच्या बापाकडे असणाऱ्या डोळसपणामुळे ही भावंडे कायम वेगळ्या वाटेने गेली आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करून दाखवली.

हा सर्व विलक्षण प्रवास वाचण्यासारखाच आहे. ती एक कथा आहे एका कुटुंबाची ज्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत एक नवे क्षितीज गाठले आहे. हे एका सामान्य असणाऱ्या असामान्य माणसाने स्वतः च्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र आहे असेही म्हणता येईल. तर ही सर्वाना प्रेरणादायी ठरेल अशी सर्व भावांची यशोगाथा आहे जी त्यांनी आपल्याच शब्दात मांडली आहे.

पुस्तकाचा आकृतिबंध(form) हाही एक मराठी भाषेतील नवीन प्रयोग मानला जातो.

म्हणूनच सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्व पुस्तकांचा “ बाप”!

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक

 श्रीमती अनुराधा फाटक

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

दत्तगुरू ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असून ती युगायुगात आहे.प्राचीन परंपरा असलेल्या या संप्रदायातील श्रेष्ठ विभूती म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ अक्कलकोट ! यांची ओळख वाचकांना व्हावी या हेतूने माझ्या अल्प बुध्दिप्रमाणे मी हे लेखन केले आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ हे संप्रदायातील एक महापुरुष ! दत्तात्रेयांचा इतिहासकालीन पहिला व नरसिंह सरस्वतींचा पूर्वावतार ! त्यांच्या लीलातून मिळालेला जीवनबोध या संप्रदायाने महत्त्वाचा मानला.

नरसिंह सरस्वती यांनी व्रते,वैकल्ये,कर्मकांड यांची पुर्नस्थापना करून सर्व सामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. पडत्या काळात विस्कळीत झालेली धर्माची वर्णाश्रम व्यवस्था टिकवून धरली.तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे नवे आदर्श स्वतःच्या आचरणाने सिद्ध केले.

श्री स्वामी समर्थांचे जीवन सदैव तृप्त असणाऱ्या महासागरासारखे होते. स्वामी सोवळे ओवळे मानणारे नव्हते. शुद्ध आचरण म्हणजे सोवळे आणि ओवळे म्हणजे अशुद्ध आचरण ही त्यांची भावना होती.

यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी केलेली ही शब्द साधना! वाचकांनी याचा अनुभव घ्यावा.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “तळातून वर येताना” – श्री हणमंतराव जगदाळे ☆ श्री किशन द़ उगले

पुस्तकाचे नांव : तळातून वर येताना

लेखिका : श्री हणमंतराव जगदाळे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तळातून वर येताना” – श्री हणमंतराव जगदाळे ☆ 

संघर्षमय जीवनाची यशोगाथा– समिक्षक – श्री किशन द़ उगले 

ज्या ज्या कलाकृतीच्या मुळाशी मानवतावादी जाणिवांचा संघर्षाचा सामना निर्मळ अंत:प्रवाह झुळझुळतो आहे. जे साहित्य जननिष्ठ प्रतिभावंतांनी जनासाठी जनहितार्थ निर्माण केलेले आहे व ज्या साहित्याला जीवनाचे प्रेरणेचे आणि समस्यासंकटा निर्मूलनाचे अधिष्ठान आणि कलात्मक सौंदर्यांचे भान आहे ते सर्वच हितैशी सृजन म्हणजे अक्षर साहित्य व तेच निखळ जन साहित्य होय, प्रस्तूत ‘तळातून वर येताना’ या आत्मकथनात वास्तवतेने मांडलेले, केलेले कार्य याचा जन्मापासून ते स्वेच्छा सेवानिवृत्ती पर्यंतचा मागोवा घेतलेला दिसून येतो. शौर्यत्व गाजविणे व साहित्य लेखन ही सातारा इथल्या मातीची निर्मिती आहे. पोलीस या विषेशनातूनच या साहित्य कार्याचा समाजजिवनाशी असलेला दृढ संबंध स्पष्ट होतो. ग्रामीण व शहरी यांच्या जिवनातील प्रसंग व त्यांना तोंड देणे, सुख दुःखे त्यातील सुक्ष्मातीसुक्ष्म छटा अधोरेखित करणारे हे वास्तवदर्शी, त्यातून साकारणारी पोलीस संस्कृती, याचे चित्र आपल्या पुढे साकार करते. जनसंस्कृतीच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनार्थ जे साहित्य निर्माण होतं तेच खरं जनसाहित्य होय. शुभमुल्यांच्या कार्याच्या रक्षणार्थ अशुभाशी, अमंगलाशी संघर्ष करायला सिद्ध होणारे हणमंतराव जगदाळे वाचकांच्या मनात घर करून बसतात.

पालकांच्या कणखर, दणकट,  महत्त्वकांक्षी , बळकट बोटाच्या आधारे जिवनाचे सोने होणे, विविध अनुभव इतरांच्या मदतीवर मोठे होणे, ‘अस्वस्थ अधांतर’ मधून एका मागासवर्गीय मित्राकडून (दिनकर) पाच रू. मदत ही जिवनाचे सुवर्णकाळ बनविते. फौजदार होणे, एका डोळ्यात आसू तर दुसर्‍या डोळ्यात हसू असा संगम घडलेला दिसतो. लेखक पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ या तत्वाशी एकनिष्ठ असल्याने माणसे जोडणे, मदत करणे, आनंद वाटणे, बापुचा वारसा चालविणे या गोष्टी जाणिवपुर्वक मांडलेल्या आहेत. पाहिल्या केसचा आनंद, शरदला मदत करणे, पंढरपूर पोलीस स्टेशनमधील अनुभव, मंद्रुप पो. स्टेशनातील अनुभव , हिंदमाता खाणावळ, सोलापूर शहर चावडी पो. स्टेशनातील प्रसंग सावित्रीबाई बरोबर संसार सुख, तिकीटाचा काळाबाजार यासाठी करावी लागणारी कसरत उल्लेखनीय वाटते. स्त्रिविषयक आपुलकी, स्त्रियांचे उपदेश, मुलांचा जन्म, कराड पोलीस स्टेशनमधील घटना सी.आय.डी. मधील कार्य, कृष्णाकाठचे कुंडलला जाण्याचे वास्तव चित्रण,  भांडणे मिटवणे, तुटणारा संसार  जोडणे, या कार्यामुळे लोकप्रियता प्राप्त झालेली दिसून येते. लोक पुरस्काराचे मानकरी, ‘व्यवस्थापन पंढरीच्या वारीचे’ यामधे वारीचे सुख, पालखी सोहळ्याचा आनंद, चोख बंदोबस्त याचे यथार्थ वर्णन केलेले दृग्गोचर होते.  अहमदनगरमधील दारूमुक्ती ही अविस्मरणीय घटना वाटते. स्त्रियांच्या कल्याणासाठी केलेला एल्गार खऱ्या अर्थाने जगविण्याचा मानस होता. विश्वास नांगरे पाटील यांच्या सानिध्यातून कार्यप्रणालीची पताका फडकली. जालना येथील सहाय्यक आयुक्त असताना पाणीटंचाईचा प्रसंग मनाला खंत वाढवितो.

हणमंतराव जगदाळे सर हे नोकरीला देव मानणारे. प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत.

लोकांची सेवा हीच आशिर्वादाची शिदोरी मानून कार्य केले. नैसर्गिक जगणे, महाराष्ट्रातील अती संवेदनशील जुन्नर गावात एकोपा निर्माण करणे, ‘पोलीस मेगासीटी ‘ ला कायदेशीर स्वरूप देणे, गोळीबारात झालेल्या मयताची कबुली देणे, समाजात स्वार्थांधता वाढीस लागणे, राजकीय लोक भ्रष्टाचारी असतात यावर प्रचंड विश्वास,  पोलीस खात्याविषयी नाराजी व हे खाते नावापुरतेच राहील , जनतेचा भ्रमनिरास करतील ही भविष्यवाणी सत्यात उतरत आहे याबद्दल लेखक खंत व्यक्त करताना दिसतात. भविष्याचा वेध सांगताना, विचार मांडताना आपल्याच  अवतीभवती घडणारी/घडलेली वास्तवाधिष्ठित घटना प्रसंगाची कलात्मक गुंफण आहे. असा प्रत्यय आत्मकथन वाचकाला येतो.

या आत्मकथनकाराची आत्मनिष्ठा ग्रामजनाकडे वळलेली स्पष्ट दिसून येते. मानवी जिवनावर, त्यांच्या दुःखावर, त्यांच्या व्यथांकित जगण्यावर, अगतिक, असहाय्य परिस्थिती शरण न होता आत्मविश्वासपुर्वक धडपडण्यावर लेखकाची निष्ठा आहे. त्यामुळे माणुसपणावर त्यांची निष्ठा आहे. या कथनकातील घटकांचा मेळ मनात विलक्षण व्याकुळता व प्रेरणा उत्पन्न करतो. सार्वत्रिक आव्हान क्षमतेच्या कसोटीवर एक जिवनाभिमुख अनुभवाची कलाकृती म्हणून ‘तळातून वर येताना ‘ यशस्वी ठरली आहे. अत्यंत सुबोध, सरळ, अनलंकृत अशी भाषाशैली आत्मकथनातून अनुभवायला मिळते. जगदाळे सरांच्या लेखणीतील साधेपणाने या आत्मकथनाला विलक्षण सौंदर्य आणि सामर्थ्य प्रधान केले आहे. कृत्रिमतेचा अजिबात स्पर्श नसलेला निसर्गावर , कार्यावर निखळ स्वरूपातील शुद्ध कर्म संस्कृती वर लेखकाची निष्ठा आहे. समाजातील अपराधी , अन्यायी व्यक्तीच्या मानसिक क्रिया, प्रतिक्रियांचा अर्थपूर्ण शोध या आत्मकथनात आलेला दिसून येतो. त्यामुळे यास सच्चा आत्माविष्कार करते. हे एक उत्तम प्रेरणादायी, अर्थसंपन्न, बहुआयामी कलाकृती आहे. वैयक्तिक नेणिवेकडून सामुहिक नेणिवेकडे झालेला लेखकाचा संघर्ष व भाव प्रवास यामध्ये दिसतो! ‘संघर्ष संवाद’ हे या कलाकृतीचे प्राणतत्व होय. तसेच एक समर्थ आशयसंपन्न लेखन कृती असून मनोविश्लेषणाला प्राधान्य देणारी व पोलीस जिवनाचे दर्शन घडविणारी रेखीव आत्मकथन आहे. आशयाची व्यापकता ही केवळ पोलीस जाणीवेपुरतीच मर्यादित नसून आखिल मानवतेला सामावून घेणारी व वाचकांना विचारांची नवी दिशा देणारी आहे. वाचकाच्या मनात प्रचलित समाजव्यवस्था, राजकारण, सोसायट्या, अन्याय, छ्ळ, भ्रष्टाचार इत्यादी विषयी चीड निर्माण करणारी व त्याला परिवर्तन सन्मुख करू पाहणारी कलाकृती आहे. तसेच अशा या सर्व भ्रष्ट, स्वार्थांध, शोषक, किळसवाण्या वातावरणाला समर्थपणे शह देणे केवळ तरुण पिढीलाच शक्य आहे. तेव्हा या नव्या सर्जनोत्सुक पिढीमध्ये. क्षमता वादातीत आहे. जनकल्याणासाठी शुभमुल्याचा उद्घोष करणारी व मंगल, सुंदर, पवित्र विचारावर वाचकांना सुद्धा ठेवायला लावणारी ही जनसंस्कृतीची समृद्धी साधणारी असाधारण अशी कलाकृती आहे. म्हणूनच ती श्रेष्ठ जन आत्मकथन आहे असे गौरवाने म्हणावे लागते. येथील भावनार्थयुक्त प्रतिमा त्याच जिवनाशयातून प्रस्फुरित झालेल्या आहेत. उरबडवेपणा, नटवेपणा या प्राथमिकतेतील दोषांतून हे कथन खूप दूर आहे. जीवन दर्शनातली मुल्ये गर्भता परिवर्तनाच्या असोशीने सहजतेने विश्लेषीत होत जाते. पोलीस जीवनाशी एकरुपलेली विविध रुपे सरसोत्कट वाटतात. आशयानुकुल प्रतिमा रुपबंधातली सहजता, कथनातील प्रभावीपणा,  शैलीची जननिष्ठ वास्तवता, पोलीस मुल्यांच्या आत्मीयतापुर्ण, सहजाविष्कार व एकूणच कथेची व्याप्ती आणि परिणिती यांचे जननिष्ठेत झालेले विसर्जन कथेला वास्तवतेबरोबर आव्हान क्षमता बहाल करून जातात. त्यात शैलीचा साधेपणा, निरागस, सत्यकथन जिवन संघर्षाकडे पाहण्याची प्रगाढ जाणीव दिसून येते. साध्या भाषेने धारण केलेली अंर्तलय,  अनुभुतीचा अस्सलपणा, स्वजाणिवेच्या पलीकडे जाणारी व्यापक कार्य पोलीस निष्ठा धारण केलेली कर्तव्ये, संघर्ष जाणीव यामुळे जगदाळे सरांचे कार्य स्वत्वाच्या पलीकडे जाऊन सर्व थरातील वाचकांना आव्हान करते.

आस्वादकांच्या भुमिकेतून त्यांची महात्मता  जनप्रर्वतन क्षमता तपासताना प्रगाढता, व्यापकता, अर्थपुर्ण संदेश व जनसंस्कृतीस त्या कलाकृतीने दिलेले योगदान विचारात घेतले जाते. १९७६ ते २०१२ या काळात अत्यंत वेगाने, प्रामाणिकपणे, तडफदारपणे, नेकीने केलेले कार्य अतिशय संघर्ष आणि धडपडमय झाले आहे. नावलौकिक, सहकाऱ्याचे प्रेम, आदर, जिव्हाळा संपादून, घरदार विसरून केलेली पोलीस सेवा ही सर्वांनाच डोळ्यात अंजन  घालणारी आहे. जगदाळेसाहेबांनी सहज, सरळ जे घडले आहे ते सत्यात उतरविले आहे. पराक्रमाविषयी बढाई , शाबासकी घेणे, प्रसिद्धी मिळविण्याच्या मागे  लागणे, स्तुती सुमनांचा वर्षाव करून घेणे यापासून खूप दूर राहिले आहेत. जिवाची पर्वा न करता कौटुंबिक सुखाचा त्याग करणे व कर्तव्य पुर्ण करणे या गोष्टी जगदाळे सरांनी निष्ठा ठेवून नोकरी हीच ईश्वर भक्ती, देशसेवा व्रत धारण केलेले दिसून येतात. सहनशिल सहिष्णुता, मन विचलित न होणे, तहान भूक विसरणे, विश्रांतीला दूर ठेवणे अशा अनेक मुल्यांची जोपासना उद्गित झालेली आहे. त्यामुळे वाचकाला अंतर्मुखी समाधान मिळून जगण्याचे बळ , सेवेची ऊर्जा, कर्तव्याला वंगन प्रेरणा मिळते.

भ्रष्टाचारास थारा न देणे, कष्टाबद्दल रडगाणे न गाणे, यशाची गर्वोवृत्ती नको, अशा अनेक नवनिर्मितीच्या खुणा तसेच कर्तव्यदक्षतेची सुगंधी दखल, कष्टाची निखळ पखरण अनुभवणे याचा परिपोष हिरवळी सारखा पसरतो व समाजाला आदर्श जीवन प्रणालीची दिशा मिळते. म्हणून पोलिस अधिकाऱ्यानेच नव्हे तर समाजातील सर्वानी वाचावे, अभ्यासावे असे हे आत्मकथन स्पृहणीय आहे. अभिनंदनिय संग्राह्य असावे म्हणूनच विद्यापिठाने अभ्यासासाठी नेमावे. तसेच या आत्मकथनात चैतन्यपुर्ण अशी स्वयंपुर्णता व इतर अनुभवापेक्षा व्युहात्मक वेगळेपण आलेले आहे. आस्वादकाला त्यामुळे अनुभव चैतन्य लाभून जीवन जगण्याची स्फुर्ती मिळते. अनुभुतीची अभिव्यक्ती सफल झाल्याने वाचकालाही ती समृद्ध अनुभुती प्राप्त होते. त्यामुळे अनुभव आत्मकथनाचे आस्तित्व फलद्रुप झालेले दिसून येते. प्रत्यक्षात अनुभव, संघर्ष, त्याग, मुल्य व भविष्याचा वेध मांडलेला आलेख म्हणजे ‘तळातून वर येताना’ हे आत्मकथन होय. अशीच साहित्यनिर्मिती फळास यावी अशी अपेक्षा यासाठी पुढील साहित्य लेखनास हार्दीक शुभेच्छा.

शेवटी.

॥ इवलेसे रोप लाविले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी ॥

समीक्षक

श्री किसन दत्तात्रय उगले, (महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई), ता. उदगीर . जि. लातूर – ४१३५१७

मो. 9850251540

लेखक

श्री हणमंतराव जगदाळे,  (निवृत्त पोलीस उपअधीक्षक )

प्रकाशक

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

२५१ क, शनिवार पेठ , पुणे. पीन -४११०३०

फोन -०२० २४४७१७२३/२४४८३९९५ .

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ विनोदी कथा संग्रह – “फास्टफूड” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विनोदी कथा संग्रह – “फास्टफूड” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : फास्ट फुड

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : शिवसृष्टी प्रकाशन

पहिली आवृत्ती : मधुश्री प्रकाशन तर्फे १९९८ (रु.९०/—)

तिसरी आवृत्ती :  १८ अक्टूबर २०१८

किंमत : रु. २४०/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

सौ. ऊज्वला केळकर यांचा “फास्ट फुड”हा विनोदी कथा संग्रह नुकताच वाचनात आला.आणि मनापासून त्यांवर लिहावसं वाटलं.

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.कथांचा आकार लहान असला तरी अनेक प्रसंगांच्या गुंतागुंतीतून सकस विनोदनिर्मीती होत,कथा आशयपूर्ण शेवटास हसत खेळत पोहचते.

वास्तविक विनोदी लेखन प्रक्रिया ही सोपी नसते.निरीक्षण आणि प्रतिभा यांची ऊत्कृष्ट देन असणार्‍यांनाच हे जमते.हे पुस्तक वाचताना ऊज्वला ताईंच्या बाबतीत हे नक्कीच जाणवते.कथेतील विनोद हा ओढून ताणून आणलेला वाटत नाही तसेच केवळ हास्यासाठी द्वयर्थी शब्द वापरून केलेला पाचकळ,हीणकस विनोद ह्या कथांतून आढळत नाही.

विसंगती ,वास्तव आणि सहजता यांचे अचुक मिश्रण झाल्यामुळे विनोदाला दर्जा प्राप्त होतो. आणि त्याचा अनुभव या कथा वाचताना येतो.

या अकराही कथांमधे, केंद्रस्थानी, वेगवेगळी मानसिकताही वेगवेगळ्या विषयातून जाणवते.त्या त्या वेळच्या सामाजिक संदर्भातून हलकी फुलकी कथा जन्माला येते.

फास्ट फुड ही शीर्षक कथा आजकालच्या ईन्सटंट, सगळं काही तत्काळ या परिस्थितीवर मजेदार भाष्य करते. या फास्ट फुड मनोवृत्तीमुळे होणारं,नैसर्गिक असंतुलन, आणि त्याला निसर्गानेच घातलेली खीळ ही मध्यवर्ती कल्पना. मग भूलोकी, निरीक्षण करायला पत्रकार आणि फोटोग्राफर बनून आलेले , नारद आणि विष्णुदेव, यांनी घेतलेली सौ. संशोधिनी ब्रह्मे यांची मुलाखत…आणि  परमेश्वरी योजनानांच छेद देणरे त्याचे संशोधन भगवंत कसे ऊधळून लावतात याची मस्त हास्यकथा म्हणजेच “फास्ट फुड” कथा.

निसर्गापुढे मानव श्रेष्ठ असूच शकत नाही ,याची प्रचीती देणारी ही कथा…

घोरवाडी गावाचा सरपंच ढोरवाडी गावात नुकत्याच घडुन गेलेल्या कार्यक्रमावर कुरघोडी करण्यासाठी शिक्षक दिन आयोजित करतो,आणि या शिक्षक दिनाचा कसा घोळ होतो  हे खुसखुशीत ग्रामीण भाषेत वाचायला खूप मजा येते. “शिक्षक दिनाची गोष्ट” ही कथा वाचताना मला शंकर पाटील, द. मां मिरासदार, यांचीच आठवण झाली…

साहित्यक्षेत्रातल्या नकलीपणाला, बनावटगिरीला वाचा फोडणारी कथा म्हणजे “इथे साहित्याचे साचे मिळतील” ही कथा…काहीशी ऊपहासात्मक. ऊपरोधीक पण हंसत हंसत मर्मावर बोट ठेवणारी..

“स्वर्गलोकात ईलेक्शन” ही कथा अतिशय मार्मीक.

रूपकातून निवडणुक या भ्रष्ट ,राजकीय हेवेदावे ,यावर प्रकाश टाकणारी मजेदार गोष्ट!!

सर्वसाधारणपणे माणसाच्या काही सुप्त इच्छा असतात.

आपली, वैशिष्टपूर्ण ओळख असावी, आपला सन्मान व्हावा, झालास तर धनलाभही व्हावा.. आणि त्यासाठी केलेल्या धडपडीतून नेमकं काय निष्पन्न होतंआणि सारंच कसं हास्यास्पद ठरतं…हे  “शारदारमण गिनीज बुकात” शारदारमणांची सेटी, “मी मंगलाष्टके करते”

तसेच”हातभर कवीसंमेलनाची वावभर कहाणी या कथांतून अनुभवायला मिळतं.

“माझा नवरा माझी पाहुणी”ही कथाही मनुष्य केवळ संशयामुळे,भयग्रस्त होऊन मजेला कसा मुकतो ,हे गंमतीदारपणे सांगते.असे अनुभव कळत नकळत आपल्यालाही आलेले असतात म्हणून या गंमतकथेशी आपण जोडलेच जातो.

वरसंशोधन हा तसा ज्वलंत प्रश्नच आहे.”वन्संसाठी वर संशोधन..” या कथेतून याचाच शोध घेतलाय्.विनोद,हा वास्तवता आणि विसंगतीतूनच निर्माण होतो.ही कथा वाचताना हे जाणवतं.

“असे पाहुणे येती….”ही शेवटची कथा वाचल्यावर,

पुस्तक वाचुन संपले अशी एक चुटपुट मनाला लागते.

या कथेतले मिलीटरी शिस्तीचे मामा,कणखर बाणा असलेली आत्या ,तिचा नातु आणि या भिन्न वृत्तीच्या पाहुण्यांची सरबराई करताना ऊडालेली यजमानांची धांदल वाचताना अगदी सहज हसु येते.आणि कथेच्या शेवटी मामा आणि आत्यांची यजमानांची केलेली स्तुती पत्रे वाचून मन थोडं डुबतंही..माणसं निराळी असतात,

आपलं स्वास्थ्य बिघडवतात पण म्हणून ती वाईटच असतात ,असं नसतं. हे मनाला स्पर्शून जातं…

जाता जाता इतकंच ..फास्टफुड एक वाचनीय,निखळ विनोदी पण विचार देणारा कथासंग्रह…विनोदाच्या नादांत कुठेही संयम न सोडणारे ,सभ्य भाषेतील ऊत्तम लेखन…

ऊज्वलाताई तुमचे अभिनंदन आणि वाचकाची आवड पूर्ण करणार्‍या  पुस्तक प्रकाशनाबद्दल मनापासून आभार…आणि पुस्तकाच्या या तिसर्‍या आवृत्तीनंतरही अनेक आवृत्त्या प्रकाशित  व्हाव्यात या हार्दिक शुभेच्छा…!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print