मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २५) – ‘चैत मासे’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २५) – ‘चैत मासे’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

होळीच्या निमित्तानं ‘होरी’विषयी लिहिताना जे लिहिलं होतं कि, लोकसंगीतातील जे प्रकार शास्त्रीय संगीताच्या आधारे सजवता येऊ शकतील ते अभ्यासू संगीतज्ञांकडून ह्या गायनशैलीच्या प्रवाहात आणताना ‘उपशास्त्रीय’ संगीताची एक धारा आपोआप निर्माण झाली असावी. त्यातच ‘चैती’ हा एक प्रकार येतो. नावांतच दिसून येतं त्यानुसार नुकत्याच सुरू झालेल्या चैत्र महिन्याशीच ह्या गीतप्रकाराचं नातं जोडलेलं आहे. पूर्वीच्या काही लेखांमधे आपण पाहिल्यानुसार विविध प्रकारच्या आवाजांतून विविध भावना व्यक्त करणं ह्या मानवाच्या सहजस्फूर्त आणि निसर्गप्रेरित गोष्टींत संगीताचं मूळ दडलेलं आहे. नंतर त्याला भाषाज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धिमान मानवाकडून जे सृजन होत राहिलं ते लोकसंगीताचं मूळ! मात्र निसर्गाशी मानवाचं जोडलेलं असणं ह्या सगळ्यातच दिसून येतं.

सर्वच प्रकारच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या तसं आज आपण ‘शास्त्रीय’, ‘उपशास्त्रीय’ ‘सुगम’ इ. संगीतप्रकार, त्यांची नावं, सादरीकरण शैली वगैरे गोष्टी पद्धतशीरपणे शिकू शकतो आहोत, अभ्यासू शकतो आहोत. मात्र जेव्हां ह्याच्या निर्मितीचं मूळ शोधत जातो तेव्हां पुन्हापुन्हा एकच जाणवतं कि, क्षण साजरे करण्याची मानवी मनाची उर्मी आणि निसर्गचक्रात येणाऱ्या बदलांचा मागोवा घेत त्यानुसार मानवी मेंदूनं चतुराईनं आपलं जगणं आणखी सुंदर करत जाणं हेच हाती लागलं.

नवीन वर्षाची सुरुवातच ह्या चैत्र महिन्यानं होते. ह्यावेळी वातावरणात उल्हास जागवणारा वसंत ऋतू अवतरत असतो. त्याच्याच खुणा म्हणजे कोकिळकूजन, वृक्षवेलींना फुटणारी नवी पालवी, फुललेल्या फुलांनी बहरलेले बगिचे, मोहरलेले आम्रतरू… हे सगळं वर्णन आपल्याला चैतीच्या शब्दांमधे आढळून येतं. शिवाय बहुतांशी चैतींमधे ‘हो रामा’ असे शब्दही हमखास आढळतात. अर्थातच हा संदर्भ रामावतारानंतरचा असावा. ह्याचा संदर्भ म्हणजे ह्याच महिन्यात नवमीला असणारी प्रभु रामचंद्रांची जन्मतिथी… रामनवमी! हाही साजरा करण्यासारखा क्षण, त्यामुळंच त्याला संगीतातही सामावून घेतलं गेलं! चैत्र महिन्यातल्या वसंत ऋतूच्या उल्हसित वातावरणाला हे संदर्भ जोडले गेल्यावर ते संगीतातही प्रतिबिंबित झाले, हे चैतीच्या शब्दांतून स्पष्ट दिसतं.

क्वचित काही चैतींच्या शब्दांत कृष्णलीलांचंही वर्णनही आढळून येतं. मात्र मुख्यत्वे चैत्रातलं निसर्गवर्णन हे प्रत्येकवेळीच अंतर्भूत असल्याचं हमखास दिसून येतं. पूर्व-बिहारमधे चैती विशेष प्रचलित असल्याचं आणि ह्यातील काव्य हे मुख्यत्वे ब्रज व अवधी भाषेत असल्याचं आढळून येतं. ह्या एकूणच कालावधीला म्हणजे माघातील शुक्ल पंचमीपासून चैत्रातील वद्यपंचमीपर्यंत वसंतोत्सव मानला जातो. त्यामुळं ह्या कालावधीतील उत्सवांच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच लोकगीतप्रकारात आपल्याला वसंतऋतूचं वर्णन आढळतं. होरी आणि चैत्री ह्या गीतांशिवाय ‘वसंतोत्सवा’वेळी गायले जाणारे आणखी काही लोकगीतप्रकारही आहेत. होळीच्यावेळी बुंदेलखंडात फाग आणि ब्रजमधे रसिया (राधा-कृष्णप्रेमावर आधारित) हे लोकगीतप्रकार आजही गायले जातात.

उत्तर भारतातील ग्रामीण भागांत वसंत व फागगीतांना चॉंचर किंवा चॉंचरी असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचं कारण म्हणजे ह्या प्रकारची बरीचशी गीतं ही ‘चॉंचर’ किंवा ‘चॉंचरी’ तालात गायली जातात. ह्याच तालाचं आणखी एक नांव ‘दीपचंदी’ हे सध्या जास्त प्रचलित आहे. ह्या तालाचा वापर हा विशेषत: वसंत, फाग, होरी, चैती, सावन, सोहर, बधावा, घाटो, पुरबी अशा लोकगीतांमधेच आढळून येतो. पूर्वीच्या काळी चौदा आणि सोळा दोन्ही मात्रांची चॉंचरी किंवा दीपचंदी प्रचलित होती. आता ह्यापैकी चौदा मात्रांचा ताल ‘दीपचंदी’ आणि सोळा मात्रांचा ताल ‘चॉंचर’ म्हणून जास्त प्रचलित आहे. ह्या तालांत आपण बऱ्याचदा ठुमरीही ऐकली असेलच… कारण ठुमरीची उत्पत्तीही लोकसंगीतातूनच तर झाली आहे. ह्या सोळा मात्रांच्या चॉंचर तालालाच आपल्याकडं काही भागात ‘अर्धी धुमाळी’ असंही म्हटलं जातं.

एक रंजक माहिती… चॉंचर किंवा चॉंचरी हा शब्द संस्कृतमधील ‘चर’ धातूपासून उत्पन्न झालेल्या चर्चर ह्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप चर्चरी किंवा चर्चरिका ह्या शब्दांचा अपभ्रंश म्हणता येईल. चर्चरी किंवा चर्चरिका ह्या शब्दाचे हर्षध्वनी, हर्षक्रीडा, वसंतक्रीडा, अभिनयपद्धती, ताल, छंद, नृत्य इ. अनेक अर्थ होतात. ह्यानुसार एकूण वसंत ऋतूतील उल्हसित, आनंदमय वातावरणाला शोभेल असं हे नांव ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या गीतांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या तालासाठीही वापरलं गेलं असावं.

ब्रज भाषेतील कृष्णभक्तीकाव्यांत गीत, नृत्य व ताल ह्या अर्थाने चर्चरी, चॉंचरी किंवा चॉंचर ह्या शब्दांचा सर्रास उल्लेख आढळून येतो. ह्यावरून असं म्हणता येईल कि, ब्रजप्रांतात चर्चरीगायन व नृत्याची परंपरा बऱ्याच जुन्या काळापासून चालत आलेली आहे.  ई.स. १४५६ मधे मेवाडच्या महाराणा कुंभाच्या पुढाकाराने संगीतराज हा ग्रंथ पूर्ण केला गेला. त्यातही गीत(प्रबंध), छंद, ताल ह्या अर्थाने चच्चरी(चर्चरी)चा उल्लेख आढळून येतो. त्यापूर्वी चौदाव्या शतकात आंध्रचे महाराज वेम ह्यांनी चर्चरीविषयी चर्चा केलेली दिसून येते. त्याआधी तेराव्या शतकातील शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथामधेही चच्चरीप्रबंध, चच्चरीताल व चच्चरीछंदाचा उल्लेख आढळून येतो. त्याहीपूर्वी म्हणजे बाराव्या शतकात आचार्य जिनदत्त सूरी ह्यांनी रचलेले ‘चर्चरी काव्य’ ही मध्यकालीन जैन साहित्यातील महत्वाची कलाकृती मानली जाते. अगदी प्राचीन संस्कृतसाहित्यातही चर्चरी नृत्य व गीताचं वर्णन आढळून येते.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १४ ) – राग~जौनपूरी/जीवनपूरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १४ ) – राग~जौनपूरी/जीवनपूरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगत~राग~जौनपूरी/जीवनपूरी

मागील आठवड्यांत आसावरी थाटांतील दरबारी कानडा रागाविषयीच्या विवेचनानंतर त्याच आसावरी थाटांतील राग जौनपूरी किंवा जीवनपूरी या रागाविषयी लिहावे असे मला वाटते.

आपल्याला माहीतच आहे की सर्वसाधारणपणे थाटातील स्वरांप्रमाणेच त्या त्या थाटोत्पन्न रागांतील स्वर रचना असतात. आसावरी  थाटात गंधार,धैवत व निषाद कोमल म्हणून दरबारी कानडा आणि जौनपूरी दोन्ही रागांत ग ध नी कोमल! हे सर्व स्वर सारखे असूनही दोन राग भिन्न का बरे वाटतात? त्याचे कारण रागांचे चलन!

षाडव ~ संपूर्ण जातीचा हा राग आरोही रचनेत सरळ मार्गी आहे तर अवरोही रचना मात्र वक्र स्वरूपाची असल्याचे आपल्या लक्षांत येते.

सा रे म प(ध)(नी) सां ~ आरोह

सां रें (नी)(ध)प (ध)म प (ग) रे सा.~असा वक्र स्वरूपी अवरोह.

असे असले तरी काही लोक सां (नी)(ध)प म (ग) रे सा असा सरळ अवरोहही घेतात.मात्र वक्रतेमुळे आणि गंधार व धैवताच्या आंदोलनामुळे रागाचे माधूर्य अधिक वाढते.तसेच तीच या रागाची ओळख आहे.

धैवत वादी व गंधार संवादी मानून हा राग सादर करायचा असतो. वादी धैवत हा उत्तरांगांतील स्वर असल्यामुळे याची बढत मध्य व तार सप्तकांतच केली जाते.रियाजासाठी मात्र मंद्र सप्तकांतही गाणे आवश्यक आहे.

आसावरी हा जनक राग प्राचीन आहे.जौनपूरी आणि आसावरी या दोहोत तसा फारसा फरक नाही.जौनपूरीत आरोही निषाद आहे तर आसावरीत आरोहात निषाद वर्ज्य आहे येवढाच काय तो फरक!हिंदुस्तानी संगीतातला आसावरी हा राग दक्षिणेकडे गायला जातो,पण ते जीवनपूरी व आसावरीचे मिश्रण असते.उत्तर हिंदुस्तानी संगीतातही हे दोन राग वेगळे ठेवणे बर्‍याचदां शक्य होत नाही.

मंगेश पाडगांवकरांच्या “दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी” ह्या कवितेला यशवंत देव यांनी जी संगीत रचना केली आहे ते आसावरी व जीवनपूरी यांच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण आहे.

दिवसा सादर होणारा हा राग मधूर तर आहेच,पण खेळकर वृत्तीचाही आहे.किशोरीताई अमोणकर यांची “छुम छननन बिछुवा बाजे”किंवा अश्विनी भिडे यांनी गायिलेली “अब पायल बाजन लागी रे” या बंदिशी ऐकल्या की जौनपूरीतला खेळकरपणा आपल्या डोळ्यासमोर साकार होतो, आणि मनाची सगळी मरगळ झटकून नवचैतन्य निर्माण झाल्याचा भास होतो.

मायकेल राॅबीन्सन या अमेरिकेतील संगीतप्रेमी माणसाने जौनपूरी ऐकल्यानंतर एखाद्या मादक आणि सुंदर स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते असे उद्गार काढले आहेत.

मानापमान नाटकांतील”प्रेमभावे जीव जगी या नटला”हे जौनपूरीतील पद असेच चेतना जागृत करणारे आहे.भक्तिरचनाही ह्या रागात गोड आणि भावपूर्ण वाटतात.याचे उदाहरण म्हणजे अभिषेकीबुवांनी गाजविलेला संत गोरा कुंभार या नाटकातील

“अवघे गरजे पंढरपूर/चालला नामाचा गजर”हा अभंग,तसेच “देवा तुझा मी सोनार”ही भक्तीरचना!सी रामचंद्र यांनी सरगम या चित्रपटांतील”छेड सखी सरगम”हे गाणे जीवनपूरी/आसावरी ह्या मिश्रणांतूनच संगीतबद्ध केले आहे.टॅक्सी ड्रायव्हरमधील”जाये तो जाये कहाॅं,मुघलेआझममधील”मुहब्बतकी झूठी कहानीपे रोये” ह्या गाण्यांवर जौनपूरीची छाप आहे असे जाणवते.

जौनपूर या गांवाच्या नावावरून जौनपूरी हे नाव आले असावे व नंतर त्याचे जीवनपूरी झाले असे काहींचे मत आहे.सुलतान शर्की या अमीर खुश्रोच्या शिष्याने हा राग बनविला असेही मानतात.

तानसेन वंशाचे गायक मात्र या रागाचे अस्तित्व नाकारतात.काहीही वाद असले तरी भारतीय संगीतात जौनपूरी अथवा जीवनपूरी या रागाला निश्चितपणे स्वतंत्र अस्तित्व आहे.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २४) – ‘एकमेवाद्वितीय आशाबाई’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २४) – ‘एकमेवाद्वितीय आशाबाई’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

आपलं बालपण आणि मग पर्यायानं जगणं समृद्ध करण्यात अनंत गोष्टींचा हातभार असतो. माझ्या पिढीच्या बालपणाचा विचार केला तर ‘आकाशवाणी केंद्र’ आणि त्यामुळं वाट्याला आलेले दर्जेदार सूर, शब्द, विचार ह्या गोष्टींचा वाटा फारच मोलाचा आहे. म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींत खूप वैविध्य होतं… फक्त सुराचा विचार केला तरी किती विविध सूर ह्या रेडिओ नावाच्या अद्भुत यंत्रानं आयुष्यात आणले. किशोरीताई, भीमसेनजी, कुमारजी, जसराजजी, शोभाजी, आशाबाई, लताबाई, सुधीर फडके, सुमनताई, वाडकरजी, अनुराधाजी हा प्रत्येकच आणि असे अनेक सूर म्हटलं तर किती वेगळे पण तितकेच देखणे! गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, जाई-जुई अशा प्रत्येकच फुलाचं सौंदर्य वेगळं… त्यांत तुलना कशी आणि कोणत्या निकषावर करणार!? माझ्याही मनात ह्या प्रत्येक सुरानं सौंदर्याची व्याख्या जास्त गडद आणि विस्तृत करत नेली. त्यांचे ऋण हे शब्दातीत आहेत.

मागच्या आठवड्यात आशाबाईंना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान घोषित झाला. खरंतर, मुळातच दैवी अंशानं सन्मानित झालेल्या व्यक्तींना मिळालेला कोणताही सन्मान, पुरस्कार हा त्या पुरस्काराचाच दर्जा वाढवणारा असतो. त्यामुळं त्याविषयी लिहिण्याचं काही प्रयोजनच नाही. मात्र ह्या बातमीच्या निमित्तानं पुन्हा आपसूक माझ्या मनोविश्वातला ‘आशा भोसले’ हा अमाप देखणा कोपरा धुंडाळला गेला. आशाबाईंच्या गळ्यातल्या बहुपैलुत्वाविषयी मी नव्यानं काही लिहावं इतका माझा वकुब नाही. म्हणून माझ्या त्या सुराशी असलेल्या नात्याला निरखावं हा सोपा मार्ग मी निवडला. आशाबाईंचा सूर हा खूप आपुलकीनं आपल्याला हृदयाशी धरतो असं मला वाटतं. एखाद्या शब्दलेण्याच्या अर्थाकाराशी एकरूपत्व साधत त्या भावविश्वात एका असोशीनं स्वच्छंदपणे किंबहुना स्वैरपणे स्वत:ला झोकून देण्याचा आशाबाईंच्या सुराचा जो स्वभावधर्म आहे त्याला अक्षरश: तोड नाही! अशा त्या झोकून देण्यातलं उन्मुक्तपणच मग ऐकणाऱ्याला आवेगानं येऊन भिडतं आणि तिथेच आशाबाई ह्या ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात.

तैयार, संस्कारी गळा हे तर गाणाऱ्याचं माध्यम! मात्र आपल्या सुरानं ऐकणाऱ्याच्या भावविश्वात घरटं बांधणं हे अलौकिकत्वाचं देणं आणि ते फेडताना ज्या काळजातून तो सूर उमटतो त्या काळजाचंही तावून-सुलाखून निघणं ओघानं आलंच! म्हणूनच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ हे गाताना हुंदके देत ढसाढसा रडणाऱ्या आशाबाई आणि त्यामुळं त्यादिवशी कितीतरीवेळा स्थगित झालेलं रेकॉर्डिंग, ही कथा ऐकायला मिळते. अशी संवेदनशीलता राखल्याशिवाय तो सूर ऐकणाऱ्यांची मनं आरपार छेदून जाणं कसं शक्य होईल!? एखाद्या सुरातल्या रसरशीत जाणिवाच तर ऐकणाऱ्याच्या मनात उतरतात आणि जाणिवांची ती अपार तरलता आशाबाईंच्या सुरांत लख्ख दिसते, म्हणून त्या आपल्या काळजाशी इतक्या सहजी संधान बांधू शकतात.

कोणताही गीतप्रकार असो… प्रत्येकच गीत `हे आशाबाईच गाऊ शकतात’ असं वाटायला लावतं, ह्याचं कारण म्हणजे केवळ त्यांना लाभलेला दैवी सूर नव्हे तर त्यांचा समर्पणभाव! पाणी जसं स्वत:चं वेगळं अस्तित्व विसरून आपल्याला येऊन मिळणाऱ्या रंगात रंगून जातं तसं आशाबाई त्या-त्या रचनेच्या शब्द-सुरांशी एकाकार होऊन जातात आणि मग तिथं काहीच ‘टिपिकल’ न उरता खास त्या-त्या रचनेचा असावा तोच रंग आशाबाईंच्या सुरांतून ओतप्रोत ओसंडत राहातो. ह्या सुराच्या किती आणि कायकाय आठवणी सांगाव्या… आणि सांगायला गेलंच तरी त्या कुठून सुरू कराव्या आणि कुठं व कसं थांबावं तरी!…

‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ अशी गीतं ऐकताना अगदी लहान, गोंडस, गोबऱ्या गालांचं मूल ज्यांच्या सुरांतून हसताना स्पष्ट जाणवतं तोच सूर ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ ह्या शब्दांना न्याय देताना तसूभरही मागं राहात नाही. ‘अजि मी ब्रम्ह पाहिले’, ‘ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर’ ह्या शब्दांतलं ब्रम्ह ज्यांच्या सुरांतून प्रकट होतं, ‘हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते’ ह्या शब्दांतला मीरेचा प्रेमभाव ज्या सुरांतून झरलेला ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, ‘जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम’ ह्या भाबड्या शब्दांतला अतूट भक्तिभाव जे सूर स्पष्ट दाखवतात तेच सूर ‘जा जा जा रे नको बोलू जा ना’, ‘हवास मज तू, हवास तू’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ‘चढाओढीनं चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ असे कित्येक अनोखे भावही अगदी नेमकेपणी टिपून ते आपल्या मनात उतरवतात. ह्यातल्या कुठल्याच रंगात रंगून जाताना तो सूर जराशीही गल्लत करत नाही.

‘तरुण आहे रात्र अजुनी’ मधल्या ऐन तारुण्यात वैधव्य भाळी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचा तो मूक आकांत, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ऐकताना श्वासांत जाणवू लागलेली थरथर, ‘का रे दुरावा का रे अबोला’ मधली ती काळजाला हात घालणारी मनधरणी,  ‘देव जरी मज कधी भेटला’ मधे उतरलेलं मूर्तिमंत आईचं काळीज, ‘नभ उतरू आलं’ मधलं त्या सुराचं झिम्माडपण, ‘गेले द्यायचे राहून’ मधली जखम भळभळत ठेवणारी खंत, ‘दिसं जातील दिसं येतील’ मधल्या संयमी सुरांतून डोकावणारा आशावाद, ‘केव्हांतरी पहाटे’ मधल्या सुरांतला गूढ चांदणभास, ‘मल्मली तारुण्य माझे,  तू पहाटे पांघरावे’ मधली ती प्रणयोत्सुकता, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ म्हणत त्या परमोच्च शक्तीला घातलेली विरक्तीभरली साद, ‘पाण्यातले पाहाता प्रतिबिंब हासणारे’ ऐकताना ओठांवर येणारं लाजरं हसू आणि मनात उमलणारे ते नवखे भाव, ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधली मन कुरतडणारी वेदना,

‘खेड्यामधले घर कौलारू’ मधली डोळ्यांसमोर सुरम्य खेडं उभं करणारी रमणीयता, ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधलं एक अगम्यपण, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ म्हणतानाचं सुरूपता वाट्याला न आल्यातलं दुखरेपण आणि एके क्षणी सत्य उमजल्यावर सुरांत उतरलेला त्या पिल्लाच्या देहबोलीतला डौल, ‘मी मज हरपुन बसले गं’ म्हणतानाचं ते सुराचं हरपलेपण, ‘स्वप्नात रंगले मी’ ऐकणाना आपलं भावविभोर होत गुंगून जाणं, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हां’ मधल्या अपूर्णतेतल्या गोडीनं अवघा जीव व्यापून टाकणं… हा प्रत्येक आणि असे अजून कित्येक भावरंग नेमकेपणी अनुभवताना आपण आशाबाईंच्या सुराचं न फेडता येण्यासारखं देणं लागतो.

आजच्यासारखी ‘ब्रेक-ब्रेक के बाद’ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नसताना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ सारखी पाच रागांत बांधलेली अवघड रचना सहजसुंदर सुरांत पेलणं, ‘घनरानी साजणा’ मधली सुराची जितकी उंची तितकीच खोलीही सहजी जपणं, ‘चांदणे शिंपीत जाशी’ मधली चंचलता सांभाळतानाही सुराचं नेमकेपण जपणं, वडील मा. दीनानाथांच्या शैलीत त्यांनी सादर केलेली नाट्यपदं अशा कित्येक गोष्टी दैवदत्त देखण्या सुराला आशाबाईंनी मेहनतीनं पाडलेले पैलूही दाखवतात… अर्थात मी करत असलेलं हे सगळंच वर्णन म्हणजे मुळाक्षरं गिरवत असलेल्या चिमुरड्यानं अनभिज्ञतेच्या कोषात असताना एखाद्या प्रतिभासंपन्नतेची स्तुती करण्याइतकं बालिश आहे. मात्र ह्या असामान्य सुरावर वेडं प्रेम करायला तर कोणत्याच गुणवत्तेचा निकष लागू होत नाही. त्याच प्रेमभावानं आज मी ‘ज्योतीनं तेजाची आरती’ असा प्रकार केलाय. अक्षरश: तसाच प्रकार… म्हणून केवळ बसल्याबसल्या मनात सहजी उमटलं ते लिहीत गेले, एक सामान्य पण वेडं प्रेम करणारी रसिक म्हणून! त्यांच्या सगळ्या कामाचा हा धावता आढावा म्हणावं इतकाही ह्याचा आवाका नाही. त्यांचा उर्दू, हिंदी ह्या भाषांचा अभ्यास आणि त्यातलं अजोड असं सांगितिक कर्तृत्व ह्या गोष्टीकडे वळायचं तर यादी संपता संपणार नाही. मराठीतलीच आधी कुठं संपलीये म्हणा!

आशाबाई, तुमच्या सुराविषयी, तुमच्या संगीतप्रवासाविषयी नुसतं लिहायच्या कल्पनेनंही दमछाक होतेय! तुमचा सूर, त्याचं अलौकिकत्व, समर्पणभावानं तुमचं त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आम्ही फक्त अनुभवावं आणि त्या दिव्य अनुभूतीच्या ऋणात राहावं! तुम्ही आणि तुमचा सूर चिरंतन होवो, ही त्या विश्वनियंत्याकडे आम्हा संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवाराची मन:पूर्वक प्रार्थना!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

दुपारी उज्वलाताईंचा फोन आला कि, उद्या होळी आहे तर तू उद्याचा लेख ‘होरी’ वर लिही आणि मला पटकन सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आपलं एक मराठी भावगीत आठवलं

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!’ मग जुन्या अभ्यासाच्या वह्या बाहेर काढल्या, वाचनातून मेंदूतल्या ‘होरी’च्या फोल्डरमधे असलेले संदर्भ गोळा करण्यासाठी स्मरणशक्तीला ताण दिला. सगळ्याचा मागोवा घेताना अगदी औरंगजेबाच्या संगीतप्रेमासहित बराच खजिना हाती लागला त्याविषयी पुढं लिहीनच, मात्र मगाचच्या गीताचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे सगळ्या माहितीतला एक समान धागा त्या एका ओळीतून दिसतो.

‘होरी’च्या एखाद्या प्रकारानुसार त्याची गायनशैली बदलत जाते मात्र त्यातल्या गीताचे शब्द हे होळीच्या उत्सवाचं वर्णन करणारेच असतात… अर्थातच ही गीतं ह्याच कारणास्तव ‘होरी’ किंवा ‘होरीगीत’ म्हणून ओळखली जाऊ लागली. वरील भावगीताचा विचार केला तर वर्णन वृंदावनातल्या होलिकोत्सवाचेच आहे मात्र ह्यातले काव्य वृत्तबद्ध आहे, भटसाहेबांचं शब्दलावण्यही संपूर्ण रचनेत दिसून येतं… कारण विषय ‘होरी’चाच आहे मात्र काव्याला केंद्रबिंदू मानून त्याची रचना झाली आहे. म्हणूनच हे गीतप्रकाराच्या दृष्टीने हे भावगीत आहे, होरी नाही. पारंपारिक होरीगीतांचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, होळीचे वर्णन असणे इतपतच तिथं साहित्याला/ काव्याला महत्व आहे. मात्र त्याला दर्जेदार साहित्य, उत्कृष्ट काव्य म्हणता येईल असे बहुतांशी नाहीच.

‘होरी’चं मूळ शोधताना पूर्वीच्या लोकसंगीतातच हा प्रकार मोडत असल्याचे दिसून येते. समूहानं रंग खेळत असताना ही गीतं गायली जात. अर्थातच त्यावेळी एखाद्या गायनशैलीशी ही गीतं जोडली गेलेली नसावीतच. फक्त तो उत्सव साजरा करतानाचा आनंद समर्पक पण बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे सहजस्फूर्त सुरावटींत व्यक्त करणे हेच इतर लोकसंगीतप्रकारांप्रमाणे घडत असावं. त्यामुळं ‘काव्य’ म्हणून ते लिहिणं, त्याचा साहित्यिक दर्जा ह्या गोष्टींचा विचारच तिथं अपेक्षित नाही.

पूर्वीच्या ‘ब्रज’ प्रदेशातील म्हणजे आजच्या मथुरा-वृंदावन व आजूबाजूच्या बऱ्याचशा प्रदेशातील होलिकोत्सव’ देशभर प्रसिद्ध आहे. असं वाटतं कि, तिथल्या ह्या होलिकोत्सवाला मोहक वलय द्वापारयुगात जसं कृष्णाशी ह्या उत्सवाचं नातं जोडलं गेलं तेव्हांपासून प्राप्त झालं असावं आणि ते साहजिकही आहे. साक्षात मनमोहनासोबत रंग खेळून होळी साजरी करण्यापेक्षा देखणा उत्सव कोणता असू शकतो! परंपरागतपणे त्या प्रदेशात पुढंही धामधुमीत हा उत्सव साजरा होत राहिल्यानं त्याचं वर्णन सर्वदूर पोहोचून तो प्रसिद्ध झाला असेल. त्याच काळापासून कदाचित ‘होरी’गीतांमधे बहुतांशी कृष्णासोबत साजऱ्या होणाऱ्या होळीचं वर्णन येऊ लागलं असावं. शिवाय पारंपारिक होरीगीतं ही ‘ब्रज’ भाषेतच आढळतात. त्याआधीच्या ‘लोकसंगीतातील’ होरीगीतं कशी होती हे माझ्या वाचनात आलेले नाही, मात्र त्यात कृष्ण-गोपिकांत रंगलेल्या होळीची वर्णनं असण्याची शक्यता नसणारच!.. अर्थात हा सगळा माझा ह्याबाबतीतला ‘होरा’ आहे!

पुढं कागदोपत्री ‘होरीगीतां’बाबत जे उल्लेख आढळतात ते फार रंजक आहेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीत निर्माण झाले. अर्थातच पुढं ह्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही मूळ लोकसंगीताने भुरळ घातली नसती तरच नवल होतं. त्यामुळं झालं असं कि लोकसंगीतातल्या ज्या काही उत्तम संगीतधुनी शास्त्रीय संगीताच्या आधारे सुंदर सजवून त्या गायनशैलीच्या निदान एका उपप्रवाहात आणता येतील त्या ‘उपशास्त्रीय’ ह्या प्रकारात अभ्यासू कलाकारांकडूनच सामावून घेतल्या गेल्या. विचार करता सहज लक्षात येईल होरी, चैती, झूला, कजरी इत्यादि आजच्या उपशास्त्रीय संगीतातील कित्येक प्रकार आपल्याला थेट लोकसंगीताच्या पाऊलवाटेशी नेऊन सोडतात.

ह्यापैकी ‘होरी’ गीतांबाबत विचार करायचा झाला तर धृपदशैली प्रचारात असताना त्या शैलीनुसार दुगुन, चौगुन, बोलतान, गमकाचा गीतविस्तारासाठी वापर करून ‘धमार’ ह्या चौदा मात्रांच्या विशिष्ट तालात जी गीतं गायली जाऊ लागली ती ‘धमार’ ह्याच नावानं ओळखली गेली. मात्र ह्या गीतांचे शब्द होलिकोत्सवाचे वर्णन करणारे असायचे. ‘धमार’ गाताना रागाची चौकट पाळूनच गायन केले जाते त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं धृपदशैली शिकलेल्यांनाच चांगल्याप्रकारे धमार गाता येतो. आजही धृपदगायकच उत्तमप्रकारे ‘धमार’ गाताना आढळून येतात. तर ‘धमार/धमारी/धमाली’ (प्रचारातील नांव ‘धमार’च!) हा एक होरीगीतांतलाच प्रकार आणि ह्या प्रकाराला ‘पक्की होरी’ असं म्हटलं जातं. याशिवाय धमार तालात फक्त काही वैष्णव संतांनी भक्तिरचना केलेल्या व त्यांनाही ‘धमार’ असेच संबोधले गेल्याचे व आजही त्यांचे अनुवंशी कीर्तनकार त्याला धमारच म्हणत असल्याचे आढळते. पुढं यवनकाळात आश्रयदात्या राजांविषयी स्तुतीपर शब्द काही बंदिशींच्या गीतांत रचण्याचा प्रकार सुरू झाला त्याला धमारही अपवाद नव्हते. फक्त धमारात होलिकोत्सवाविषयीच्याच काव्यात खुबीनं असे शब्द गुंफले जात. त्याविषयी माहिती पुढं येईलच.

‘कच्ची होरी’ ह्या प्रकारांतर्गत पुढील प्रकार येतात.

ख्यालगायनशैलीचा बराचसा प्रभाव असणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘ठुमरी’ हा जो प्रकार आहे त्यापद्धतीने जी होरीगीतं गायली जातात त्यांना ‘होरी-ठुमरी’ असं म्हणतात. खरंतर ही ठुमरीच, फक्त त्यातलेही काव्य होलिकोत्सवात रंगलेले असते. ही गीतं दीपचंदी, तीनताल, जतताल इ. ठुमरीसाठी वापरल्या जाणाऱ्या तालांतच गायली जातात. ह्या प्रकारांत मात्र रागाची चौकट पाळण्याचे बंधन नसते. ह्या गीताच्या विस्तारक्षेत्रात अनेक रागांना सामावून घेतले जाऊ शकते.

अशा प्रकारची काही होरीगीतं अगदी रागाच्या बंदिशीसारखी असतात. त्यांचा विस्तार रागाचे नियम पाळून बंदिशीप्रमाणेच केला जातो. रागानुसार काहीवेळा विस्तारढंग बदलतो… तो ठुमरीकडे जास्त झुकणारा असेल तर ती गीतं ‘बंदिश की ठुमरी’ ह्या प्रकारांतर्गतही धरली जातात. इतर होरीगीतं जी साधारण ‘दादरा’ ह्या उपशास्त्रीय गीतप्रकारानुसार गायली जातात त्यांना ‘होरी’ ह्याच नावानं ओळखलं जातं. ती दादरा किंवा केहरवा तालात निबद्ध असतात. ह्यांच्या विस्तारात रागनियम पाळण्याचे बंधन नसते.

संगीताविषयी विशेष रुची नसलेल्या व्यक्तीवर सहजपणे ‘हा संगीतातला औरंगजेब आहे’ अशी टिप्पणी केली जाते. औरंगजेबाच्या संगीतद्वेषाच्या कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र लिखितस्वरूपात औरंगजेबाच्या संगीतप्रेमाविषयी जे स्पष्ट उल्लेख आढळतात त्यात ‘होरी’ला किंबहुना ‘धमार/धमारी’ला स्थान आहे. औरंगजेब मंगलामुखींसोबत (गणिका) अगदी उत्साहाने, जोशपूर्ण रीतीने होळी खेळायचा आणि त्यावेळी त्या गातगात अशी प्रार्थना करायच्या कि, ‘शहेनशहा औरंगजेबाचे आयुष्यमान लोमश ऋषींसारखे असावे आणि त्यांनी नेहमी आपल्यासोबत अशीच जोशपूर्ण होळी खेळत राहावे!’ पूर्वी अकबर, शहेनशहा ह्या कलाश्रयी राजांची प्रशंसा काही बंदिशींतून दरबारगायक करत असत. त्याचप्रमाणे ती औरंगजेबाच्या काळी त्याच्याबाबतही केली गेली. औरंगजेब हा संगीतातला मर्मज्ञ होता, त्याला संगीताची कदर होती, मात्र काही ‘राजनैतिक’ कारणांमुळं त्यानं आपल्या दरबारातून संगीताला बहिष्कृत केले होते असाही उल्लेख आढळतो. तर ‘धमारा’ची रंगीन धूमधाम ही फक्त लोकजीवनात व वैष्णवांच्या मंदिरांपुरतीच मर्यादित न राहाता पार औरंगजेबाच्या अंत:पुरापर्यंत पोहोचली होती असं म्हणायला हरकत नाही.

अकबराच्या काळच्या एका धमाराचा अर्थ भारी गंमतशीर आहे. एकीकडे नायिकेच्या सख्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, ‘असं रुसून बसून काही साधणार नाही, होळी खेळलीस तरच तुझी मनोकामना पूर्ण होईल’ आणि दुसरीकडे अकबराला म्हणतात, ‘हिची समजूत इतकी सहजी पटणार नाही. शाह जल्लालुद्दीन तुम्ही ‘फगुआ’ (फाल्गुनात दिली जाणारी भेटवस्तू) द्या, म्हणजे आपोआप ती तुम्हाला वश होईल.’  त्या धमाराचे शब्द आहेत-

होरी खेलेई बनैगी, रूसै अब न बनैगी।

मेरो कहो तू मानि नवैली, जब वा रंग में सनैगी॥

कैई बेरि आई-गई तू, नाही मानत ऊंची करि ठोडी भौहें तनैगी।

साहि जलालदीन फगुआ दीजै, आपुतें-आप मनैगी॥

ख्यालगायनशैलीला जनमानसांत स्थान मिळवून देणाऱ्या मोहम्मदशाह रंगीलेच्या दरबारातील सदारंग, अदारंग व महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी ‘सदारंगांनी’ रागांच्या अनेक बंदिशींप्रमाणेच काही धमारांमधेही मोहम्म्दशाहचे नाव गुंफल्याचे दिसून येते. पुढं सदारंगांचे पुत्र मनरंग ह्यांच्याही ‘धमार’रचना आढळतात. तसेच नूररंग ह्यांनीही ‘धमारी’ रचल्याचे आढळून येते. मात्र ह्या सर्वांनीच धमाराचं कृष्णाच्या लीलांशी असलेलं नातं जपून त्यानुसारच रचनांचं लेखन केल्याचं दिसून येतं.

जाताजाता, आपणां सर्वांना होलिकोत्सवाच्या अनेकरंगी शुभेच्छा!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगत~संपन्न भैरव कूळ

प्राचीन काळी संगीतांतील उत्पत्ती देव देवतांपासून झाल्याचे मानले गेले. पंचमहाभुतांना देवता मानून त्यांची स्तुती आणि प्रार्थना मुख्यतः संगीताद्वारे केली जात असे. अशा संगीतात काही रागस्वरूपे देव देवतांच्या नावानेच अस्तित्वात आली.पुढे त्या त्या रागांना देव~देवतांची वर्णने लावण्यांत आली. अशा प्रकारच्या रागांमध्ये भैरव हा प्रमूख आहे. भैरव म्हणजेच शिव शंकर, शंभू महादेव!

हा भैरव थाटजन्य राग. रिषभ व धैवत कोमल. वादी~संवादी अनुक्रमे धैवत व रिषभ.सात स्वरांचा संपूर्ण जातीचा हा राग प्रातःकाळी गायला जातो. “जागो मोहन प्यारे” ह्या गाण्याच्या ओळी कानांवर पडल्या की भैरव रागाचे दर्शन घडते. यशोदा मैय्या तिच्या नंदलालाला प्रातःकाळी उठविते, “उठी उठी नंदकिशोरे”, “प्रातसमय भई भानूदय भयो, ग्वाल बाल सब भूपति थाडे” अशा वर्णनाच्या बंदीशी ह्या भैरव रागांत ऐकायला मिळतात. पहाटेच्या वेळी चित्त प्रसन्न होते.

सा (रे) ग म प (ध) नी सां

सां नी (ध)प म ग (रे) सा असे ह्याचे सरळ आरोह अवरोह असले तरी सादर करतांना वक्र स्वरूपांत आढळतो, जसे रिषभाला मध्यमाचा स्पर्ष”ग म(रे) सा, धैवताला ग म नी(ध), नी(ध)प असा निषादाचा स्पर्ष हे भैरवाचे खास वैशिष्ठ्य आहे. गायन/वादन रंजक करण्यासाठी पूर्वांगांत सा ग म प ग म(रे)सा, आणि उत्तरांगांत ग म नी(ध)सां अशी वक्र स्वररचना करतात. शांत रस हा या रागाचा आत्मा म्हणता येईल.

अकबराच्या दरबारांतील  तानसेनाने या रागाविषयी “कहे मिया तानसेन सुनो शाह अकबर। सब रागनमे प्रथम राग भैरव।” असे म्हटले आहे. संगीत मार्तंड पं. जसराजजी यांच्या संगीत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण भैरव रागानेच सुरू होते हे बर्‍याचजणांना माहीत असेलच.

अतिशय संपन्न असे हे भैरव कूळ आहे. अनेक वर्षांपूर्वी कुमार गंधर्वांनी ‘भैरव के प्रकार’ अशी एक मैफील केली होती. ह्या मैफीलीत भैरवाबरोबरच सादरीकरणांत थोडेफार फेरफार करून अहीर भैरव, शिवमत भैरव, भवमत भैरव, बीहड भैरव, बैरागी भैरव, बंगाल भैरव, प्रभात भैरव, धुलिया भैरव, आनंद भैरव नटभैरव, भैरव बहार असे भैरवाचे अनेक प्रकार सादर करून श्रोत्यांना भैरवाचे वैभव दाखवून दिले होते.

“नवयूग चूमे नैन तुम्हारे” हे सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेले भैरवातील गीत रात्रीकडून पहाटेकडे नेते. “जागो मोहन प्यारे” ह्या पारंपारिक बंदीशीत काही वेगळे शब्द आणि सूर चपखल बसवून लतादिदींच्या आवाजांत ऐकतांना वेगळाच आनंद मिळतो. खेड्यांतून शहरांत आलेला एक तरूणराज कपूरपाण्यासाठी वणवण फिरतो, पहाट होते, प्राचीवर सूर्यबिंब उगवते, पण पाणी न मिळाल्यामुळे त्रासलेल्या त्याला एक सामान्य पाणी भरणारी स्त्रीनर्गीसत्याच्या ओंजळीत घागरीने पाणी घालते. भैरवाच्या सुरांनी भरलेली ती पहाट~चित्रपट संपतो पण भैरव कायम मनांत रेंगाळतो.

कालिंगडा, रामकली,जोगिया ही भैरवाचीच रूपे! “मोहे भूल गये सांवरिया” हे बैजू बावरांतील गीत, सामनामधील “तुम्हावरी केली मी मर्जी बहाल”, जाळीमंदी पिकली करवंद”ह्या लावण्या म्हणजे भैरवाचे चंचल रूप कालिंगडा.

रामकलीतून भैरवाचे मृदू स्वरूप दिसते.भीमसेन जोशी “सगरी रैन मै जागी”ह्या बंदीशीने सवाई गंधर्व उत्सवाची सांगता करीत असत.

जोगिया म्हणजे करूण रसांत भिजलेला भैरव!”पिया मिलनकी आस”ही ठुमरी ऐकतांना डोळे न पाणावणारा श्रोता विरळाच.सौभद्र नाटकांतील”माझ्या मनीचे हितगूज सारे ठाऊक कृष्णाला”हे बाल गंधर्वांनी अजरामर केलेले पद.गीत रामायणातील परित्यक्ता सीतेच्या तोंडी असलेले “मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे”हे गीत श्रोत्यांना देहभान विसरावयास लावते.

असे हे सूर संपन्न भैरव खानदान! हे जाणून घेतल्याशिवाय संगीत शिक्षण अधूरे आहे.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार वाद्यांचे विभाजन कोणत्या प्रकारांमधे होते हे आपण गेल्या दोन-तीन भागांत पाहिले. वाद्यांच्या बाबतीत आणखी थोडा मागोवा घेत गेलो तर जुन्या ग्रंथकारांच्या कृपेने काही मनोरंजक गोष्टी हाती लागतात. भगवान शंकरांचा डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य मानलं गेलं आहे. त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शंभू महादेव नृत्य करू लागले. त्याला तालसंगत करण्यासाठी ब्रम्हदेवाने एका अवनद्ध वाद्याची निर्मिती केली. त्याचा वाजवायचा भाग अर्थातच कातड्यानं मढवलेला होता. मात्र ढाचा मातीचा होता म्हणून त्या वाद्याला मृद्‌+अंग म्हणजे मृदंग म्हटलं गेलं. शिवपुत्र श्रीगणेशांनी हे वाद्य त्यावेळी वाजवलं. मृदंगाच्या उत्पत्तीची अशीआख्यायिका आहे. आणखी एका कथेनुसार वृत्तासुराला मारल्यानंतर आनंदित झालेले भगवान शंकर तांडवनृत्य करू लागले. त्यांच्या नृत्याला तालसंगत करण्यासाठी गणपतीने जमिनीत एक खड्डा खणला, त्यावर मृत वृत्तासुराचं कातडं पांघरलं आणि त्यावर तो ताल वाजवू लागला.

भगवान शंकरांच्याच बाबतीत आणखी एक कथा आढळून येते. ते कैलास पर्वतावर तप करत असताना मुरजासुर नावाच्या राक्षसाने त्यांना त्रास देऊन त्यांचा तपोभंग केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शंकरांचं त्याच्याशी तुंबळ युद्ध होऊन त्यात मुरजासुर मारला गेला. हात-पाय-मुंडकं तुटलेल्या अवस्थेतलं त्याचं शव तिथून गिधाडांनी उचलून नेलं. त्यांनी ते पंजांत धरून त्यातलं मांस बऱ्यापैकी खाल्लं. मात्र जास्ती वजनामुळं ते शरीर त्यांच्या पंजातून सुटून खाली एका झाडावर पडलं. काही काळानंतर ते शरीर पूर्ण वाळून त्याचा फक्त वाळक्या ताठरलेल्या कातड्याचा पोकळ सांगाडा झाडावर शिल्लक राहिला.

एके दिवशी जोरात वारं सुटल्यामुळं झाड्याच्या फांद्या त्या कातड्यावर आपटून सुंदर नाद निर्माण होऊ लागला. वनभ्रमण करत असलेल्या शंकरांनी तो सुंदर नाद ऐकला आणि उत्सुकतेपोटी त्या आवाजाच्या दिशेने येत त्या झाडाजवळ पोहोचले. ते कातडं पाहून त्यांना घडलेली सगळी घटना आठवली. त्यांनी त्या कातडी ढाचाच्या एका बाजूला डाव्या हातानं आघात केल्यावर ‘ता’ हा बोल उत्पन्न झाला आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताच्या आघाताने ‘घी’ हा बोल उत्पन्न झाला. त्यापुढंही ते दोन्ही हातांनी त्यावर आघात करत राहिले तसे वेगवेगळे बोल उत्पन्न झाले. थोड्यावेळानं शंकर तिथून निघून गेले.

त्यानंतर एकदा ते पार्वतीसोबत पर्णकुटीत बसले असताना पावसाचे थेंब कुटीच्या वाळलेल्या पानांवर पडू लागले तसा सुंदर नाद उत्पन्न झाला. तो नाद पार्वतीला खूपच आवडल्यानं तिनं शंकरांना विनंती केली कि त्यांनी अशा प्रकारचं काही वाद्य तयार करावं ज्यातून अशा सुंदर नादांची निर्मिती होईल. तेव्हां त्यांनी तिला मुरजासुराची कथा सांगितली आणि त्यातून उत्पन्न होणऱ्या विविध वर्णांचं विस्तृत वर्णन केलं. पुढं असं जे अवनद्ध वाद्य अस्तित्वात आलं त्याला ‘मुरज’ हे नाव मिळालं. मात्र दुसऱ्या एका ग्रंथातील वर्णनानुसार ‘मर्दल’ नावाच्या वाद्याची निर्मिती ही ‘मुरज’ नावाच्या राक्षसाच्या मृत शरीरातून झाली आणि ती श्रीकृष्णांनी केली.

अवनद्ध वाद्यांची माहिती घेताना सरोवरातील कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे निर्माण होणारा कर्णप्रिय नाद ऐकून स्वाती नामक ऋषींना तालवाद्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली हे आपण पाहिलं. त्यापुढची कथा म्हणजे तो सुंदर नाद त्यांनी आपल्या मनात अगदी साठवून घेतला आणि मग ते आपल्या आश्रमात परतले. तिथं त्यांनी विश्वकर्म्याला हा वृत्तांत सांगून त्या सुंदर नादाचं वर्णनही केलं आणि त्याला असा नाद निर्माण करणारं वाद्य तयार करायला सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या नादांचं वर्णन मनात ठेवून तसे नाद निर्माण होतील असं मातीचा ढाचा असलेलं जे वाद्य विश्वकर्मानं तयार केलं ते ‘पुष्कर’ ह्या नावानं ओळखलं गेलं. कालमानानुसार ह्याच वाद्याच्या आधाराने लाकूड, धातू इ.. गोष्टींचा वापर करत प्रयोग होत राहिले आणि त्यातूनच मृदंग, पटह, दर्दुर अशा वाद्यांची निर्मिती  झाली.

रामायणकाळात आजच्या रागसंगीतासारख्या शैलीला गंधर्वगान म्हटलं जायचं. प्रभू श्रीरामचंद्र स्वत: गंधर्वगानप्रवीण होते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र लव-कुशही संगीतज्ञ असल्याचा उल्लेख आढळतो. रावणही मोठा संगीतज्ञ होता. त्यानं निर्माण केलेल्या रावणास्त्र किंवा रावणहस्त ह्या तंतुवाद्याचा उल्लेख प्राचीन वाद्यांमधे आढळून येतो. लंका आणि भारताच्या काही भागात आजही हे वाद्य कालानुसार होत गेलेल्या परिवर्तित स्वरूपात उपलब्ध आहे. वीणेच्या प्रकारांमधेही ‘रावणी’ नावाच्या वीणेचा उल्लेख आढळतो. आपल्याकडील राजस्थान प्रांतातलं रावणहाथा हे वाद्य ह्याच ‘रावणहस्त’चं परिवर्तित रुपडं असावं जे पुढं आजच्या सुप्रसिद्ध व्हायोलिन ह्या वाद्याचा आधार मानलं जातं.

भगवान श्रीकृष्णांच्या केवळ मानवालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक पशु-पक्षी, वृक्षवेलींना किंबहुना अवघ्या विश्वालाच संमोहित करणाऱ्या जादुई बासरीवादनाविषयी तर आपल्याला कितीतरी सुरस कथा वाचायला मिळतात. श्रीकृष्ण हे महान संगीतज्ञ होते आणि त्यांच्यासारखा श्रेष्ठ बासरीवादक पुन्हा कधीच पृथ्वीवर अवतरला नाही. महाभारतात उल्लेखिलेले श्रीकृष्णाचा ‘पांचजन्य’नामक शंख आणि अर्जुनाचा ‘देवदत्त’नामक शंख हे मुख्यत्वे युद्धाच्यावेळी काही संकेत देण्यासाठी वापरले गेले तेही एक प्रकारचं सुषीर वाद्यच! जसे श्रीकृष्ण सर्वोत्तम बासरीवादक तसाच अर्जुन हा सर्वोत्कृष्ट वीणावादक असल्याचं मानलं जातं. अर्जुनही उत्तम संगीतज्ञ होता. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात अर्जुनानं बृहन्नडा नावानं स्त्रीरूप धारण करून विराट राजाची कन्या उत्तरा हिला संगीतशिक्षण देण्याचं काम पत्करलं होतं. अर्जुनाचं वीणावादनही समोरच्याला भान विसरायला लावायचं आणि ह्या कालखंडातील संगीताच्या विकासाचं मोठं श्रेय अर्जुनाकडं जातं, असं मानलं गेलं आहे.

बनारस घराण्याचे शहनाईवादक शहनाईची उत्पत्ती श्रीमहादेवांच्याच शृंग किंवा सींग ह्या सुषीर वाद्यातून झाली असं मानतात. ह्या वाद्याचं वादन पहिल्यांदा शिव-पार्वतीमीलनाच्या शुभसमयी झाल्याचंही मानलं जातं.  विवाहादि शुभकार्यप्रसंगी शहनाईवादनाची प्रथा आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीचं मूळ दर्शविणारी ही कथा जुन्या ग्रंथांमधे आढळून येते.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~ वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~वसंत

ऋतुचक्रांतील वसंत ऋतूचे आगमन झाले की शिशीरांत निष्पर्ण झालेल्या सृष्टीत नवचैतन्य येते. वृक्ष वल्लरींना नवी पालवी फुटून सर्वत्र निसर्ग बहरास येतो. संगीतांतील वसंत रागाचे ह्या ऋतूशी फार जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंताचे अवरोही स्वर कानावर पडले की उत्साहाचे वातावरण निर्माण झालेच पाहीजे.असा हा राग वसंत!

ह्या रागासंबंधी फार मनोरंजक अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की बूढन मिश्र नावाच्या एका गायकाने पटमंजीरी हा राग गायला आणि त्याच्या प्रभावाने एक प्रचंड वृक्ष निष्पर्ण झाला. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली.  तत्कालीन राजाने त्याच्या या गायनकौशल्यावर खूष होऊन त्याला बक्षीशीही दिली,परंतु त्याचवेळी जयदेव या गायकाला ही बातमी समजल्यावर त्याने वसंत राग आळवून पर्णविरहीत वृक्षावर पुन्हा नवीन पालवी नार्माण केली. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि हा राग याचे असे हे अतूट नाते आहे. गीत गोविंद या जयदेवाच्या अमर ग्रंथातील”ललित लवंगलता परिशीलन कोमल मलय समीरे” ही अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन आहे, ती वसंत रागांत गायली तर अधिक मनभावन ठरते.

हा आल्हाददायक राग वसंत ऋतूत केव्हाही गावा, मात्र इतर वेळी तो मुख्यत्वेकरून रात्रीच्या अंतीम प्रहरी गाण्याची/वाजविण्याची प्रथा आहे.

चैत्र~ वैशाख हा वसंत ऋतूचा काळ असला तरी माघातल्या वसंत पंचमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. या वसंतोत्सवाला फाग म्हणतात. त्यामुळे राधा~कृष्णाच्या रासक्रीडा नृत्य ~संगीतांतून सांगातली जाते.अब्दूलकरीमखाॅं साहेबांची “फगवा ब्रीज खेलनको चलोरी” ही वसंतातली बंदीश आजही पेश केली जाते.’नबी के दरबार’ हा वसंतांतील बडा ख्याल गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांच्याकडून रेडिओवर बर्‍याचदां ऐकल्याचे स्मरते.

वसंतच्या शास्त्रीय स्वरूपाबाबत प्राचीन काळापासून बरेच मतभेद आहेत. असे म्हणतात की गंधार व निषाद कोमल असलेला काफी थाटात गायला जात असे. कवी जयदेवाच्या गीतगौविंदमध्ये हा राग असा आहे. जग्गनाथपूरीच्या मंदीरांतही अजूनही काफी थाटातला वसंत गायला जातो. मात्र सध्या प्रचलित असलेला वसंत  पूर्वी थाटांतील आहे. यांतही दोन प्रकार आहेत. एका प्रकारात दोन मध्यम व शुद्ध धैवत घेऊन पंचम वर्ज्य केला जातो तर दुसरा प्रकार संपूर्ण मानला जातो. कितीही वाद असले तरी दोन्ही मध्यमांचा प्रयोग करणारा ललित अंगाचा वसंतच आज अधिक प्रचलित आहे.

वादी व संवादी स्वर अनुक्रमे तार षड्ज व पंचम असे आहेत, शुद्ध धैवताच्या प्रकारांत पंचम वर्ज्य असल्यामुळे शुद्ध मध्यम संवादी मानतात.

या रागाचे वैशिष्ट्य असे की षड्जापर्यंत अवरोह झाल्यावर लगेच शुद्ध मध्यम मुक्तपणे व स्वतंत्र घेतला जातो व नंतर मींडेच्या सहाय्याने ‘नी (ध)(म)(ध) नी सां’ असा आरोह केला जातो.राग ओळखण्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. उत्तरांगप्रधान असलेला हा राग स्वरसप्तकाच्या उत्तरांगांत अधिक खुलतो.

ह्या वसंत किंवा बसंत रागाबरोबर बसंतबहार, बसंतहिंडोल, बसंती~केदार असे बरेच जोड राग आहेत. कुमार गंधर्वांनी गौरी बसंत तर रातंजनकरबुवांनी बसंत मुखारी हे राग लोकप्रिय करून ठेवले आहेत.

“केतकी गुलाब जूही मन बसंत फूले” ही बसंत बहारची बंदीश प्रसिद्ध आहे. मंदारमाला नाटकांतील पं.राम मराठे आणि प्रसाद सावकार यांची “बसंतकी बहार आयी” ही जुगलबंदी न ऐकलेला श्रोता विरळाच! सर्व सामान्यांसाठी बसंतचे उदाहरण घ्यायचे झाले तर देवदास चित्रपटांतील माधुरी दिक्षित(चंद्रमुखी)हिचे “काहे छेड छेड मोहे गरवा लगाये हे वसंत रागांतील गाण्यावरील नृत्य.

वसंत ऋतूचे स्वागत करणारा आणि कलावंतांच्या विशेष पसंतीचा आणि अतिशय प्राचीन असा हा राग वसंत/बसंत!

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २१) – ‘तंतुवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यांचा आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे तंतुवाद्यं! तत्‌म्हणजे तार, ह्यावरून आपल्या लक्षात येईल कि ज्या वाद्यामधे तार/तारा वापरल्या गेलेल्या असतात त्याला तंतुवाद्य किंवा तत्‌वाद्य असं म्हणतात. ह्या वाद्यांच्या शोधाची कहाणी खूपच रंजक आहे. प्राचीन काळी निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना जंगली श्वापदांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आणि नंतर शत्रूंपासूनही स्वसंरक्षण करण्यासाठी मानवप्राणी ‘धनुष्य-बाण’ हे शस्त्र वापरत असे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. बाण सोडताना धनुष्याची प्रत्यंचा खेचावी लागते तीही किती अंतरावर बाण गेला पाहिजे हा अंदाज घेऊन! एकदा बाण सोडला कि ही खेचलेली प्रत्यंचा त्याच्या पूर्वस्थितीत येईतोवर कंप पावते आणि त्या कंपनांमुळं त्या प्रत्यंचेतून नादनिर्मिती होते.

तंतू कंपन पावल्यावर त्यातून नादनिर्मिती होते हे ह्यातून बुद्धिमान मानवप्राण्यानं हेरलं. त्यापूर्वी पोकळ वस्तूवर चामडं ताणून बांधलं तर आवाजाची गुणवत्ता आणि पातळी वाढते हे ज्ञान तालवाद्यांच्या निर्मितीप्रक्रियेतून त्याला मिळालेलंच होतं. मग ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून त्यानं लाकूड धनुष्याकारात कोरून त्यावर चामडं घट्ट बांधलं आणि त्याला तारही जोडली. अशाप्रकारे ‘वीणा’ जन्माला आली.

असं म्हणतात कि अगदी पूर्वी वीणा ही एकच तार असलेली होती जिच्या दांडीच्या वरच्या व खालच्या बाजूच्या भागात प्रत्येकी एकेक भोपळा होता. हिला ‘घोषा’ किंवा ‘घोषिका’ असं म्हटलं जातं. हिचा उल्लेख भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ ह्या संगीताच्या आद्यग्रंथात आढळतो. पुढं संगीत रत्नाकर ग्रंथात उल्लेखिली गेलेली ‘एकतंत्री वीणा ’ही एक तार असलेलीच होती! तिलाच ‘मूलवीणा’ किंवा ‘ब्रम्हवीणा’ असंही म्हटलं जातं. ही सर्व वीणांची जननी मानली गेली आहे आणि ह्या वीणेचं दर्शन किंआ स्पर्श मोक्ष देणारा असतो असंही मानलं गेलं आहे. ह्यातून एक गोष्ट नक्कीच दिसून येते कि, मानवानं त्याच्या आयुष्यात संगीताला दिलेलं भक्तीचं, अतीव श्रद्धेचं, आदराचं स्थान! आज आपल्याकडं भजनसंप्रदायात आवर्जून वापरली जाणारी एकतारी डोळ्यांपुढं आणली कि थोड्याफार फरकानं पूर्वीची एक तार असलेली वीणा कशी असेल ह्याची कल्पना येऊ शकते.

असं म्हणतात कि, एकतारीवर गाणं सर्वात कठीण असतं आणि जो एकतारीवर रियाज करतो तो नेमकेपणी अगदी सुरेल गाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे, एकाच तारेमुळं तिच्यातून गाणाऱ्याला फक्त आधारस्वर मिळत असतो आणि त्या एकाच सुराच्या आधारे इतर सगळे सूर लावणं हे कठीण काम! आणि हे कठीण काम जमतं तेव्हां गायकाचा सूर साधला जातोच कारण इतर सुरांचा त्या आधारस्वराशी तेव्हांच मेळ बसतो जेव्हां ते अगदी नेमकेपणी लागतात. म्हणूनच आजही असे एकतारीवर गाणारे कित्येक गायक (भले त्यांनी शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलेलं असो किंवा नसो) सुराला एकदम पक्के असतात, त्यांचा गाणं ऐकलं कि केवळ प्रचंड सुरेलपणाच्या किमयेनं आपण वेगळ्याच विश्वात पोहोचतो, इतर कसलाही दिखावा, तंत्रज्ञानाची साथ, बाकी कोणतेही साथीदार नसतानाही! ह्या वीणेला मोक्षदायिनी म्हणण्याचं कारण ह्यातच दडलं असावं.

पुढं हळूहळू वेगवेगळे प्रयोग होत तारांच्या वेगवेगळ्या संख्या व रचनेतील इतरही काही बदलांनुसार अनेक वीणा अस्तित्वात आल्या. आलापिनी वीणा, धनुकलीने वाजवली जाणारी धनुष्याकृती ‘पिनाकी वीणा’ (आधुनिक व्हायोलीनचं प्राथमिक स्वरूप), एकवीस तारांची मत्तकोकिला वीणा, सात तारांची चित्रवीणा, नऊ तारांची विपंची, सारिकायुक्त अशी किन्नरी वीणा, तीन तारा असणारी त्रितंत्री वीणा(जिला सतारीचं प्राथमिक रूप मानलं जातं), भरपूर म्हणजे शंभर तारा असलेली ‘शततंत्री’ वीणा, कात्यायनी वीणा अशा वेगवेगळ्या रचना व तारसंख्या असलेल्या अनेक वीणांचा उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथांमधे आढळतो. वेदिक काळात ‘वनस्पती’, ‘बाण’, ‘औडंबरी’, ‘क्षोणी’ इ. वीणा अस्तित्वात असल्याचाही उल्लेख आढळतो. राजा समुद्रगुप्त जी वीणा वाजवायचा ती सात तारांची ‘परिवादिनी’ नामक वीणा सुवर्णमुद्रांनी मढवलेली होती असाही उल्लेख आढळतो.

सतार ह्या तंतुवाद्याबद्दल एक महत्वाचा उल्लेख आढळतो कि, ख्यालगायनाला लोकप्रियता मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या महम्मद शाह रंगीलेंच्या दरबारातील सदारंग-अदारंग- महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी सदारंग म्हणजे ‘नियॉंमत खॉं’साहेबांचा धाकटा भाऊ ‘आमीर खॉं’ हा तीन तारा असलेल्या एका पर्शियन वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीतातील राग वाजवून पाहात असे, ते सतारीचं प्रारंभिक रूप! त्याने आणि पुढं इतरांनीही त्या वाद्यावर वेगवेगळे प्रयोग केले आणि आजची पूर्ण विकसित सतार जन्माला आली. नावाच्या साम्यामुळं ‘आमीर खुस्रो’ ह्यांना सतारनिर्मितीचं श्रेय दिलं जातं मात्र त्यात तथ्य नाही, कारण कागदोपत्री पंधराव्या शतकापर्यंत कुठंही ह्या वाद्याचा उल्लेख आढळत नाही.

तंतुवाद्यांमधे ते वाद्य वाजवण्याच्या पद्धतीवरून तत आणि वितत असे दोन प्रकार आढळतात. तत वाद्यं म्हणजे ज्या वाद्यांच्या तारा बोटांनी, नखांनी किंवा ‘नख्खी/मेजराब’ अशा गोष्टींनी वाजवल्या जातात. उदा. तानपुरा, एकतारी, तुणतुणं, सतार, वीणा, स्वरमंडल, सरोद, संतूर इ.

वितत वाद्यं म्हणजे जी वाद्यं बो किंवा गजाच्या सहाय्याने वाजवली जातात. उदा. इसराज, सारंगी, दिलरुबा, व्हायोलीन, आपल्या राजस्थानमधे आढळणारं ‘रावणहाथा’ हे वाद्य इ.

ह्या सर्व वाद्यांच्या रचनांमधे पोकळ भाग (ध्वनिवर्धक व अनुनाद निर्मिती करणारा) म्हणून वाळवून आतून पोकळ केलेले विविध आकारांचे, प्रकारचे भोपळे, नारळाची करवंटी इ. गोष्टींचा वापर होतो. व्हायोलीनमधे असे काही वापरले गेले नसले तरी साऊंडबॉक्स म्हणून लाकडाचाच ‘पोकळ भाग’ तयार केलेला असतो.

निसर्गाकडूनच मिळालेल्या जादूई तत्वांचा वापर करून मानवानं आपल्या बुद्धीकौशल्यानं, अभ्यासूवृत्तीनं आणि नैसर्गिकरीत्या लाभलेल्या शक्तींच्या आधारे कायकाय किमया घडवून आणली हे जाणून घेताना एकीकडं अभिमानानं ऊर भरून येतो आणि त्याचक्षणी निसर्गाच्या महान, अद्भुत शक्तींपुढं नतमस्तकही व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात एक उल्लेख अनावधानाने राहून गेला त्याविषयी…

तालवाद्यांपैकी ज्या वाद्यांमधे प्राण्यांचं कातडं वापरलेलं असतं त्यांना ‘अवनद्ध वाद्ये’ किंवा ‘चर्मवाद्ये’ असं म्हणतात, त्याचं कारण ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच ‘कातड्याने मढवलेले’ हे आपण पाहिलं. मात्र तालवाद्यांपैकी इतर वाद्यं, ज्यामधे धातूचे, लाकडाचे दोन तुकडे किंवा चकत्या किंवा नळ्या/काठ्यांचा एकमेकांवर आघात झाल्याने नादनिर्मिती होते त्या वाद्यांना घनवाद्ये असं म्हणतात. दोन्ही प्रकारातली वाद्यं ही तालवाद्यंच आहेत आणि दोन्हींतही नादनिर्मिती ही आघातानेच होते… फरक आहे तो फक्त कातड्याचा वापर त्या वाद्यात झाला आहे कि नाही, इतकंच!

सुषीर वाद्यांकडं वळायचं म्हटलं कि पटकन आपल्या डोळ्यांसमोर उभा राहातो मनमोहन मुरलीधर कृष्ण… आपल्या मुरलीवादनानं अवघ्या जगताला संमोहित करणारा! त्याचं वाद्य म्हणजे ‘बासरी’ ज्यात फक्त एका आकारबद्ध पोकळीत फुंकर मारल्यानंतर निर्माण होणाऱ्या कंपनांतून नादनिर्मिती होते. सर्व सुषीर वाद्यांमधे हे एकच तत्व लागू आहे. मात्र मुळात ह्या तत्वाचा शोध कसा लागला असावा? ह्या तत्वानुसार माणसाकडून अंत:प्रेरणेनं घडणारी गोष्ट म्हणजे शीळ! कोणत्याही वाद्याचा आधार न घेता गोड, मधूर शीळ कशी घातली जाते? तर तिथं असतं ते फक्त एकच तत्व, फुंकरीतून म्हणजेच हवेच्या साहाय्यानं केली जाणारी नादनिर्मिती! शीळ घालत असताना आपसूक निर्माण होणाऱ्या आपल्या तोंडाच्या आणि ओठांच्या स्थितीचा विचार केला असता लक्षात येईल कि, ह्या प्रक्रियेत घशातून येणारा हवेचा झोत तोंडाची पोकळीतून मार्गस्थ होऊन ओठांच्या एका विशिष्ट आकारामुळे योग्यप्रकारे नियंत्रित होत असल्यानं नेटकी व सुंदर नादनिर्मिती होते.

जुन्या ग्रंथांमधे उल्लेख आढळतात कि, प्राचीन काळी ‘अन्न’ म्हणून प्राण्यांची शिकार केल्यावर त्यांचं मांस खाल्यानंतर उरलेले अवयव शिल्लक तसेच राहात असतील. कधीतरी गमतीतच कुणीतरी प्राण्यांच्या शिंगांमधे फुंकर मारून पाहिली असेल आणि असं केलं तर त्यातून छान आवाज येतो हे लक्षात आलं असेल. हळूहळू पुढं हेही लक्षात आलं असेल कि शिंगांचा आकार, लांबी बदलली कि आवाजाची जात बदलते. नंतर ह्या गोष्टीचा उपयोग माणूस एखाद्या कारणासाठी सगळ्यांना एकत्र जमवण्यासाठी किंवा एकमेकांना काही संकेत देण्यासाठी करू लागला.

सर्वांना माहीत असणारी ह्याबाबतीतली काही उदाहरणं म्हणजे… ‘रणशिंग’ हे युद्ध सुरू होत असल्याचा संकेत देणारं वाद्य!… काही मंगल प्रसंगाच्या सुरुवातीला वाजवलं जाणारं व सैन्यसंचालन, मिरवणुकी ह्यातही आढळून येणारं अर्धचंद्राकृती ‘शृंग’ हे वाद्य, शिवाय ‘तुतारी’ हे वाद्यही बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या वाद्यांना मंगलवाद्यं मानलं जातं. कारण ही वाद्यं म्हणजे प्राण्यांची शिंगं, म्हणजे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आलेली!… पुढं मग इतर वाद्यांप्रमाणं वेगवेगळे प्रयोग ह्यात झाले. आज धातूचीही ह्या प्रकारची वाद्यं आपल्याला पहायला मिळतात, काही थोडा भाग धातूचा आणि उर्वरित भाग लाकडाचा अशीही असतात, मात्र त्यांचं मूळ हे प्राण्यांचं शिंग आहे.

ह्याच बरोबर बांबूसारख्या पोकळ नळकांडीत फुंकर मारून बघितली असतानाही आवाज येतोय हेही लक्षात आलं आणि त्यातून हळूहळू पावा, अलगूज, वेणू, बासरी ह्यांनी जन्म घेतला. झाडाच्या पातळ पानाची गुंडाळी (ज्याला बहुधा आपण पुंगळी म्हणायचो) करून त्यात फुंकल्यावरही सुंदर आवाज येतो हे आपण सर्वांनीच लहानपणी करून पाहिलं असेल. ही पिपाणीची शिशुअवस्था म्हणता येईल.

त्याचबरोबर झाडांची पानं एकावर एक ठेवून ती ओठांत धरून त्यात फुंकर मारून आवाज काढण्याचा उद्योगही आपण सर्वांनीच केला आहे. दोन पानांच्यामधे आपसूक तयार होणाऱ्या हवेच्या छोट्याशा पोकळीत फुंकर मारली गेल्यानंच त्यातून आवाज निघत असतो. आज ज्या वाद्यांमधे ‘रीड’ ही संकल्पना वापरलेली दिसून येते तिचा जन्म ह्या प्रकारातूनच झाला असावा.

अशाप्रकारे नादनिर्मिती होऊ शकते हे एकदा लक्षात आल्यावर ‘शंख’ हेही एक नैसर्गिक वाद्य माणसाला सापडलं. प्राचीन काळापासून हे वाद्य पवित्र मानलं गेलं आहे त्याचं कारणच कदाचित ‘परमशक्तीकडून झालेली ह्या वाद्याची निर्मिती’ हे असावं! नैसर्गिक शक्तीनं तयार स्वरूपातच आपल्याला बहाल केलेलं हे वाद्य वाजवताना मानवाला फक्त त्यात फुंकर मारण्याशिवाय काहीच करायचं नसतं आणि ‘परमोच्च शक्तीनं’ तयार केलेलं वाद्य म्हणजे त्यात काहीतरी शक्ती असणंही अपरिहार्यच! म्हणूनच जिथं शंख फुंकला जातो त्या जागेतील सर्व नकारात्मक शक्ती नाश पावून तिथलं वातावरण शुद्ध होतं असं आपल्याकडं विश्वासानं मानलं जातं. घराघरांतून पूजाविधीच्या वेळी शंखपूजन आणि शंख फुंकण्याचं कारणही हेच असावं.

गारुड्याची पुंगी म्हणजेही सुषीर वाद्यच! छोट्या आकाराच्या भोपळ्याच्या खालच्या भागात एकसारख्या लांबीच्या बांबूच्या दोन नळ्या प्रत्येकी एकेरी जिव्हाळीसहीत (रीड) मेणाने घट्ट बसवलेल्या असतात. त्यातल्या एका नळीला छिद्रं असतात व दुसरी नळी एकच आधारस्वर निर्माण करत राहाते. वरती भोपळ्याच्याच निमुळत्या भागातून फुंकर मारली कि नादनिर्मिती होते.

ह्या प्रकारच्या वाद्यांपैकी शास्त्रीय संगीतनिर्मिती करू शकण्याइतपत विकसित, प्रगत अवस्थेला पोहोचलेली वाद्यं म्हणजे बासरी, शहनाई, सुंद्री आणि दक्षिण प्रांतातील नादस्वरम्‌ ! ह्या प्रकरातील वाद्यं वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. काही वाद्यांचं निमुळतं टोक ओठांत धरून मग त्यात फुंकर मारली जाते, उदा. शहनाई, सुंद्री, पुंगी, पावा इ. आणि काही वाद्यांमधे बाहेरून फुंकर घालून नादनिर्मिती केली जाते. उदा. बासरी, शंख इ.!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~मधूवंती

“रंजयती इति राग” असे संगीतांतील रागांविषयी म्हटले जाते. कोणताही राग घ्या, रसिकांचे मनोरंजन करणे हेच त्याचे काम!राग म्हणजे तरी नेमके काय? तर कमीत कमी पांच व अधिकाधिक सात शुद्ध/कोमल स्वरांची गुंफण!

मधूवंती हा त्यामानाने आधुनिक असा सुमधूर राग.

कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांचे फार जवळचे स्नेहसंबंध होते.वसंतराव कुमारांना गुरू मानत असत.काही कारणांमुळे दोघांत वाद होऊन थोडा दुरावा निर्माण झाला होता,त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी

“मैं आऊ तोरे मंदरवा

पैय्या परत देहो मनबसिया”

अशा अस्थाईच्या दोन ओळी लिहून पाठविल्या.त्यावर कुमारांनी ताबडतोब “अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे।काहे धरो चरन मोरे मनबसिया।।” असा अंतरा लिहून पाठविला व बंदीश पूर्ण केली. तीच पुढे मधूवंतीतील बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली.

“मी तुमचाच आहे, माझे घरही तुमचेच आहे, असे असतांना माझे चरण धरण्याची काय गरज? असा या ओळींचा अर्थ आहे. दोघांच्या मैत्रीतील सामंजस्य जसे यांत दिसून येते तसाच मधूवंती हा शूद्ध मैत्रीचा राग आहे. याच्या नावांतच मधू आहे, तेव्हा या रागांतील माधूर्याविषयी वेगळे सांगावयास नको.

तांत्रिक द्दृष्ट्या हा राग तोडी थाटांतून निर्माण झाला आहे, परंतु तोडीप्रमाणे रिषभ/धैवत कोमल नसून शुद्ध आहेत. ह्याचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे या रागाचा जनक तोडी थाट असावा असे वाटते.

जाति~ओडव/संपूर्ण

वादीपंचम, संवादीषडज्, राग सादर करण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर. सहाजिकच मध्यम तीव्र आणि गंधार कोमल. वैचित्र्यासाठी कधीकधी अवरोही रचनेत कोमल निषाद वापरण्याची पद्धत आहे.

नि सा (ग)(म)प नि सां

सां नि ध प,(म)प (नि)ध प,(म)(ग)रे सा असे याचे आरोह नि अवरोह.(ग) (म) प नि सां नि ध प,(म) प (ग) (म)प (नी) ध प,(म)प (ग) (म)(ग) रे सा या स्वरसमूहावरून मधूवंतीची ओळख पटते.

सांझ भई,अजहूॅं नही आये प्रीतम प्यारे ही विलंबीत तीनतालमधील अश्विनी भिडे~देशपांडे यांची बंदीश प्रचलित आहे.बैरन बरखा रितू आई ही कुमारांची मध्यलय तीनतालमधील बंदीश वर्षाऋतूचे चित्र डोळ्यासमोर उभे करते.

असे म्हणतात की कोल्हापूरच्या पाध्येबुवांनी अंबिका असा राग तयार केला,पुढे विलायतखाॅंसाहेबांनी त्याचे मधूवंती असे गोजिरे नामकरण केले.

सुमन कल्याणपूर यांचे मधूवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम। एकदां दर्शन दे घनश्याम।।हे गीत रसिकजनांचे आवडते आहे. गीत रामायणांतील श्रीराम जेव्हा वनवासाला निघण्यापूर्वी सीतेचा निरोप घेण्यासाठी तिच्या महाली गेले तेव्हा काकूळतीने सीतेने हट्ट केला व ती म्हणाली, “निरोप कसला माझा घेता।जेथे राघव तेथे सीता।।” बाबूजींनी ही रचना मधूवंती या रागांतच निबद्ध केली आहे.

वरील गीतांतील शब्दांवरून मधूवंतीच्या स्वरांत विनवणी, नम्रता या भावना साकार होत असल्याचे आपणांस दिसून येते. बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी हे माणिक वर्मांचे गाजलेले गीत मधूवंतीच्या सुरांवरच आधारलेले आहे. मनमंदीरमे आयो शाम, रस्मे उल्फतको निभाये, पायलिया बावरी ही काही सिनेगीते मधूवंतीचीच झलक दाखवितात.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print