मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

‘गीतम्‌ वाद्यम्‌ नृत्यम्‌ च त्रयम्‌ संगीतमुच्यते’ अशी संगीताची व्याख्या आपल्या प्राचीन संगीतज्ञांनी केली आहे. गेल्या काही लेखांमधे आपण मुळात संगीत कसे अस्तित्वात आले असावे आणि माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे आणि का झाले असावे, ह्याविषयी विचार केला. परंतू त्यावेळी फक्त गीत किंवा गायन ह्या प्रकाराला अनुसरूनच लेखन झालं. आता वाद्यं का आणि कशी अस्तित्वात आली ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. असं म्हटलं जातं कि सृष्टीच्या कणाकणात लय आहे. त्यामुळे वाद्यप्रकारांमधे तालवाद्ये ही सर्वात आधी अस्तित्वात आली. असं मानलं जातं कि, भगवान शंकरांकडून ‘डमरू’ ह्या पहिल्या तालवाद्याची निर्मिती झाली. दुसरी एक अशी कथा वाचायला मिळते कि, स्वाती नावाच्या एक ऋषींनी एकदा पावसाचे मोठाले थेंब कमळाच्या पानांवर पडताना त्याचा आवाज ऐकला. एका लयीत कानांवर पडत राहिलेला तो सुंदर आवाज ऐकून त्यांच्या मनात ‘अशी सातत्यानं लय राखण्यासाठी तालवाद्यं हवीत’ ही कल्पना आली. म्हणजे शेवटी निसर्गाच्या प्रेरणेतूनच ही कल्पना जन्मली.

जुन्या ग्रंथांमधे असा उल्लेख आढळतो कि भरतमुनींच्या काळात शंभरभर तरी तालवाद्यं अस्तित्वात होती. ‘ताल’ ही संकल्पना नंतरची! मात्र कोणत्याही गोष्टीला अंगभूत ‘लय’ असते आणि ती साधली गेली तरच ती गोष्ट जास्त प्रभावी ठरते हे निश्चित! ह्यावरून असं म्हणता येईल कि, गायन, नृत्य कलेतील अंगभूत लयसौंदर्य आणखी खुललून ते जास्त प्रभावी करण्याच्या प्रयत्नातून तालवाद्ये अस्तित्वात आली. गायनाला, नृत्याला अर्थपूर्ण जोड/साथ देण्यासाठी तालवादन अस्तित्वात आले आणि प्रगतशील मानवाच्या प्रयत्नांतून पुढे तर तालवाद्ये आणि तालसंकल्पना इतकी विकसीत झाली कि त्यांचंच ‘एकलवादन’ (सोलो) शक्य होऊ लागलं ज्यावेळी लयसौंदर्याचं प्रामुख्य आणि सूर फक्त साथ देण्यापुरते मर्यादित असतात.

तालाचा विचार करताना एका आवर्तनामधे ठराविक अंतराने ठराविक मात्रा राखणं हा महत्वाचा भाग येतो. मात्र अगदी सहजी गुणगुणतानाही लय साधली गेली तरच त्यातून आनंद मिळतो. बोली भाषेचाच वापर करून माणसाच्याच जगण्यातील महत्वाच्या क्षणांचा उत्सव करणारे छोटेछोटे गीतप्रकार अस्तित्वात येत असतानाच शेवटपर्यंत त्यातली लय पकडून ठेवण्यासाठी मानवाकडून सहजस्फूर्तीने त्या लयीच्या हिशोबाने ठराविक अंतराने टाळी वाजवली गेली असेल, कधी हाताने मांडीवर आघात करून लय राखली गेली असेल, पायाने ठेका धरला गेला असेल. ह्या क्रिया आपल्या प्रत्येकाकडूनही अगदी सहजी घडत असतातच. एरवीही घरी आरतीच्या वेळी एका लयीत टाळ्या वाजवणे, कोणतेतरी गीत ऐकत असताना आपल्याही नकळत पायाने ठेका धरला जाणे, एखाद्या गायकाच्या जोशपूर्ण गायनाला साथ देताना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे त्या गाण्याच्या लयीसोबत टाळ्या वाजवणे हे किती सहजी घडते! अशाप्रकारे लय साधताना मानवाने केलेला शारीरिक अवयवांचा उपयोग हा वाद्य कल्पनेचा प्रारंभकाल मानला जातो.

पूर्वीच्या जीवनमानाचा विचार केला तर लक्षात येईल कि स्वत:च्या शरीराच्या आधारे ठेका धरणे ह्याशिवाय भवताली उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा ह्या गोष्टीसाठी वापर करताना हुशार मानवाने दोन दगड एकमेकांवर आपटून, दोन लाकडाचे तुकडे एकमेकांवर आपटून पाहिले असतील. आजचे ‘टिपरी’ हे वाद्य म्हणजे दोन लाकडी काठ्यांचा एकमेकांवर आघात करणे हेच तर आहे! मात्र त्याचा उगम हा आदिमानवाच्या संगीतातील लय टिकवून ठेवण्याच्या गरजेतून झाला. आपल्याकडच्या चिपळ्या म्हणजेही एकसारख्या आकाराचे दोन लाकडी तुकडेच तर आहेत. पुढं धातूचा शोध लागला त्यानंतर चिपळीच्या तसेच करताल ह्यासारख्या वाद्याच्या लाकडी तुकड्यांमधे धातूच्या चकत्या बसवण्याचे प्रयोग झाले, टाळ, मंजिरी, झांज हे प्रकार अस्तित्वात आले. मात्र ह्या सगळ्याचं मूलतत्व एकच कि, दोन घन पदार्थांचा एकमेकांवर आघात केला तर नादनिर्मिती होते आणि त्याची लय पकडून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते हा आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेला शोध!

आपल्या देवघरातील छोट्या घंटा किंवा देवळातल्या मोठ्या घंटा म्हणजेही एका घन पदार्थाच्या तुकड्याने दुसऱ्या घन पदार्थावर होणाऱ्या आघातातून केली जाणारी नादनिर्मिती! घुंगरूं हेसुद्धा एक प्रकारचं वाद्यच ज्यामधे धातूच्या पोकळ गोलाच्या आत असलेल्या एका धातूच्याच तुकड्याचा आघात झाला कि नादनिर्मिती होते. पायांत बांधल्यावर आपल्या पायाच्या हालचालींमुळं किंवा हातात घेऊन वाजवताना हाताने घुंगरू हालवल्यामुळं हा आघात आपोआप होतो.

प्राचीन काळी अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरली जात असत. त्यावर बोटांनी आघात केला तरी सुंदर नाद निघतो हाही शोध त्यांना लागला. आज दक्षिणेतील घटम, कर्नाटक किनारपट्टींतल्या प्रांतातील घुमट, उत्तरेतील मटका ही वाद्यं हे त्याचंच उदाहरण!

प्राचीन काळी जंगलात राहाणाऱ्या मानवाचं मुख्य अन्न म्हणजे प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस शिजवून खाणं हे होतं. शिकार केलेल्या प्राण्याचा खाण्यालायक भाग म्हणजे त्याचं मांस! हळूहळू त्या प्राण्याचं कातडं, हाडं, शिंगं हा सगळा उर्वरित भागही कसा वापरता येईल ह्याचा विचार मानवाच्या मनात सुरू झाला असेल किंवा कधी तो आपसूक मानवाच्या समोर आला असेल. प्राण्यांचं कातडं बसायला वापरणं, त्याचा अंगरखा शिवून थंडीत आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून वापरणं ही त्याची काही उदाहरणं! वाद्यांच्याबाबत विचार करता एका बाबीचा उल्लेख जुन्या पुस्तकांत आढळतो कि, शिकार केलेल्या प्राण्यांचं कातडं वाळण्यासाठी झाडाला टांगून ठेवलं असताना ते वाळल्यानंतर सहज त्यावर माणसाच्या हाताचा आघात झाला आणि त्यावेळी ‘वाळलेल्या कातड्यावर आघात केला असता नादनिर्मिती होते’ हा शोध लागला. हळूहळू पोकळ भांड्यावर हे चामडं बांधून त्यावर आघात केला तर आणखी सुंदर नादनिर्मिती होते (कारण पोकळ भाग हा त्या नादाचा ‘रेझोनेटर’ आणि ‘अम्प्लिफायर’ म्हणून काम करतो) हे लक्षात आलं आणि त्यातून चर्मवाद्यांची निर्मिती झाली.

ह्या चर्मवाद्यांना ‘अवनद्ध वाद्यं’ असं म्हटलं जातं. ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच मुळी ‘कातड्याने मढवलेले’ असा होतो. आता डोळ्यांसमोर अशी अनंत वाद्यं उभी राहातील. लोकसंगीतात वापरली जाणारी अनेक तालवाद्यं ढोल, ताशा, हलगी, संबळ, टिमकी, नगारा इ. सगळीच ह्या प्रकारात येतात. ह्यापैकी काही वाद्यं हाताने आघात करून वाजवली जातात तर काही काठीने आघात करून! आज शास्त्रीय संगीतातील समाजमान्यता पावून सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तबला, पखवाज, मृदंग इ. वाद्येही ह्याच प्रकारातली! ह्या सर्वच वाद्यांमधे सध्या जो भाग लाकडी असतो तो पूर्वी मातीचा असायचा. पुढं मग कालमानानुसार लाकूड, धातू इ. गोष्टी वापरून विविध प्रयोग होत राहिले. ह्याचा अर्थ एकच कि अगदी प्राचीन काळापासून माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना निसर्गाकडून विविध गोष्टी शिकत आपला विकास साधला. संगीतही त्याला अपवाद नाही. ह्याच प्रक्रियेमधे उपलब्ध साधनांच्या वापरातून वाद्यांची उत्पत्ती होत राहिली. तालवाद्यांप्रमाणे तंतुवाद्ये आणि सुषीर वाद्ये कशी अस्तित्वात आली ह्याची रंजक कहाणी आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-३) – राग~मारवा, पूरिया ~सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-३) – राग~मारवा, पूरिया ~सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सोहोनी

सोहोनी म्हणजे पूरियाचीच प्रतिकृति,फरक इतकाच की पूरिया पूर्वांगात तर सोहोनी उत्तरांगात रमणारा राग. तार षड् ज हे सोहोनीचे विश्रांतीस्थान. मध्यसप्तकांतील सुरांकडे येऊन तो पुन्हा तार षड् जाकडे धांव घेतो. उत्तरांगातील धैवत आणि पूर्वांगांतील  गंधार हे याचे अनुक्रमे वादी/संवादी स्वर म्हणजे मुख्य स्वर.

मारवापूरियासोहोनी, सगळ्यांचे स्वर तेच म्हणजे रिषभ कोमल आणि मध्यम तीव्र.

सा ग (म)ध नी सां/सां (रें)सां,नी ध ग,(म)ध,(म)ग (रे)सा असे याचे आरोह अवरोह.कंठाच्या सोयीसाठी आरोही रचनेत रिषभ वर्ज्य केला जातो. सांनी ध, ग (म)ध नी सां ही रागाची मुख्य सुरावट त्याचे स्वरूप स्पष्ट करते. पंचम वर्ज्य असल्याचे वरील स्वर समूहावरून वाचकांच्या लक्षात येईलच. वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

मारवा कुटुंबांतील हे कनिष्ठ भावंड अतिशय उच्छृंखल, चंचल प्रवृत्तीचे असल्याचे लक्षांत येते.

मारव्यांत कोमल रिषभाला प्राधान्य तर सोहोनीत रिषभाचा वापर अत्यंत अल्प स्वरूपात त्यामुळे मारव्याची कातरता, व्याकूळता यांत नाही.

सोहोनीचा जीव तसा लहानच. त्यामुळे जास्त आलापी यांत दिसून येत नाही. अवखळ स्वरूपाचा हा राग मुरक्या, खटका, लयकारी यांत अधिक रमतो. नृत्यातल्या पद  रचना, एकल तबल्याचा लेहेरा अशा ठिकाणी सोहोनी चपखल बसतो. पट्टीचा कलावंत मात्र हा अल्पजीवी राग मैफिलीत असा काही रंग भरतो, की तो त्याला एका विशिष्ठ ऊंचीवर नेऊन ठेवतो, आणि त्यानंतर दुसरा राग सादर करणे अवघड होऊन बसते.

सुप्रसिद्ध अभिनेत्या भारती आचरेकर यांनी एकदां त्यांच्या मातोश्री कै. माणिकबाई वर्मा यांची आठवण सांगतांना एक किस्सा सांगितला होता. माणिक वर्मांनी एका मैफिलीत “काहे अब तुम आये हो” ही सोहोनीतील बंदीश पेश केली होती. रात्र सरत आल्यावर घरी परत आलेला तो, त्याच्याविषयीचा राग, मनाची तडफड पण त्याच क्षणी त्याच्याविषयी वाटणारी ओढ हा सगळा भावनाविष्कार त्या बंदीशीतून अगदी सहज साकार झाला होता. श्रोत्यांमध्ये पू.ल. देशपांडे बसले होते. ते सहज उद्गारले, “मी यापुढे कित्येक दिवस दुसरा सोहोनी ऐकूच शकणार नाही.”

राधा~कृष्णाच्या रासक्रीडेवर आधारित सोहोनीच्या अनेक बंदीशी आहेत. “रंग ना डारो श्यामजी गोरीपे” ही कुमारांची बंदीश प्रसिद्धच आहे.”अरज सुनो मेरी कान्हा जाने अब। पनिया भरन जात बीच रोकत बाट।” ह्या बंदीशीतही गोपींची छेड काढणारा नंदलाल आपल्याला दिसतो.

भक्तीरसाचा परिपोष सोहोनीच्या सुरावटीतून किती सहज दिसून येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पं.जितेंद्र अभिषेकीबुवांनी गायिलेला “हरीभजनावीण काळ घालवू नको रे” हा अभंग!

सिनेसंगीतात ह्या रागावर आधारित बरीच गाणी आढळतात. स्वर्ण सुंदरी मधील अजरामर गीत “कुहू कुहू बोले कोयलीया” यांत दुसरे अनेक राग असले तरी मुखडा सोहोनीचाच आहे. “जीवन ज्योत जले” हे आशा भोसले यांनी गायीलेले गाणे जुने असले तरी परिचित आहे. मुगले आझम

मधील “प्रेम जोगन बन” हे गीत सोहोनीलच! बडे गुलामअली खाॅं यांची “प्रेमकी मार कट्यार” ही ठुमरी काळजाचा ठाव घेणारी~ संगीतकार भास्कर चंदावरकरांनी सामना या सिनेमांत “सख्या रे घायाळ मी हरिणी” हे सोहोनीच्या स्वरांतच निबद्ध केलेले आहे.

सोहोनीबहार,सोहोनीपंचम, कुमार गंधर्वांचा सोहोनी~भटियार असे काही सोहोनीबरोबर केलेले जोड रागही रसिक वर्गांत मान्यता पावलेले आहेत.

चिरस्मरणीय असा हा सोहोनी भावदर्शी आणि चित्रदर्शी आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात आपण तामिळनाडू प्रांतात प्रचलित असलेल्या अंत्ययात्रेतील जोशपूर्ण तालवाद्यवादनाच्या प्रथेची कारणमीमांसा केली. अर्थातच आज सुशिक्षित समाज ही प्रथा पाळताना दिसत नाही, त्याचं कारणही संयुक्तिक आहेच. आज वैद्यकशात्र प्रचंड विकसित पावलेलं आहे. ईसीजी मशीनमुळं ह्या प्रथेमागचा उद्देशच सफल होत असताना ह्या प्रथेची गरज नाही हे त्यांना समजलं असावं. मात्र तळागाळातले लोक ही प्रथा धर्मिक समजून श्रद्धेनं/अंधश्रद्धेनं अजूनही पाळत असावेत… पण त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे तरी समजलं. ज्याला आपण परंपरा म्हणतो त्या गोष्टी का आणि कशा अस्तित्वात येत असाव्यात हे तरी माहीत होऊन आपला ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक व्हायलाही नक्कीच मदत होते. शिवाय ही गोष्ट त्यातल्या उपयुक्ततेसोबत त्याकाळच्या समाजव्यवस्थेचाही भाग असावी असंही वाटून गेलं. वाद्यवादनात पारंगत असणाऱ्या कलाकारांना पोटापाण्यासाठीची ही एक व्यावसायिक संधी म्हणायला हरकत नाही. इतर सांस्कृतिक समारंभांमधे मांगल्यदायी वातावरणनिर्मिती करणे आणि अशा दु:खद क्षणी त्या कलेची ताकद मृत्यूच्या खात्रीसाठी वापरणे ह्या उपयुक्तता झाल्या आणि दोन्ही प्रसंगी कलाकाराला आपलं कसब पणाला लावून अर्थार्जनाची संधी ही झाली समाजव्यवस्था!

मला दक्षिणेकडच्याच केरळ राज्यातील चेंडामेलम्‌  हा प्रकार आठवला.  चेंडामेलम्‌  म्हणजे चेंडा ह्या वाद्याचे अनेक वादकांनी एकत्र येऊन केलेलं समूहवादन म्हणता येईल. आज ही गोष्ट केरळची भावाभिव्यक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जात असलं आणि केरळमधील सर्व सांस्कृतिक उत्सवांमधे चेंडावादन अपरिहार्य असल्याचं सांगितलं जात असलं तरी अचानक वाटून गेलं कि जंगली भाग असलेल्या केरळमधे पूर्वीच्या काळी माणूसप्राणी समूहानं एकत्र येऊन काही धार्मिक उत्सव किंवा काही सणसमारंभ साजरा करत असताना जंगली श्वापदांना दूर ठेवण्याचा हा उत्तम मार्ग असावा. इतक्या धडामधुड आवाजाकडे कोणतंही जंगली श्वापद फिरकण्याची शक्यताच नसल्याने निश्चिंत मनानं माणसाला उत्सव पार पाडता येत असेल ही उपयुक्तता आणि कलाकारासाठी रोजगारनिर्मिती हा समाजव्यवस्थेचा एक भाग! मनात आलं कि अशा उपयुक्ततेच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या, समाजव्यवस्था भक्कम ठेवणाऱ्या, मात्र सर्वसामान्य माणसासाठी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेच्या आवरणात सजवून ठेवलेल्या कित्येक गोष्टी आपल्या सर्वार्थाने वैविध्यपूर्ण देशात असतील. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होताना प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुजाण व्हावा, जातीपातींचे निकष संपावेत, मात्र परंपरा जाणीवपूर्वक जपल्या जाव्यात… कला-संस्कृतीचं जतन, मान आणि समाजव्यवस्थेचं भान म्हणून म्हणूनही!

आपल्या मूळ विषयाकडं वळताना आणखी एक प्रथा आठवते. आपल्याकडं बहुधा लिंगायत समाजात (कदाचित इतरही काही समाजात असू शकेल) टाळ-मृदंगाच्या साथीत लोक अंत्ययात्रेत भक्तीपदं म्हणतात… अशी एक अंत्ययात्रा थोडी अंधुकशी माझ्या लहानपणच्या आठवणींच्या कुपीत आहे… आम्ही घरातले कोणत्यातरी कार्यक्रमाहून घरी परतत होतो. अचानक समोरून एक अंत्ययात्रा येऊ लागली. मला आठवतंय अगदी पालखी नव्हे पण साधारण त्याप्रकारचा आकार असलेल्य़ा एका डोलाऱ्यात शव ठेवलं होतं. अर्थातच काही लोकांनी त्या डोलाऱ्याला खांदा दिला होता. अंत्ययात्रेच्या पुढच्या भागात एखाददुसरा आणि मागच्या बाजूला काही लोकांनी दोन तीन छोटे कंदील धरले होते आणि लक्षात राहिलेली मुख्य गोष्ट म्हणजे अगदी नाजूक अशा टाळ आणि मृदंगाच्याही हलक्या आवाजात काहीजण भक्तीपद गात होते. साहजिकच त्या गायन-वादन दोन्हींतही खूप जोश नव्हता. म्हणजे इकडं दक्षिण प्रांतात पाहिलेल्या प्रकाराचा उद्देश काही तिथं लागू होत नाही.

आज ह्या गोष्टीचा विचार करताना वाटतं कि ह्या सर्वोच्च गंभीर क्षणी जीवनाचं सार, सत्य सांगणाऱ्या भक्तिरचना मनाला आधार देत असाव्या. केवळ जगन्नियंत्याच्या हाती असणारी आपल्या आयुष्याची सूत्रं, आपलं फक्त निमित्तमात्र असणं, आयुष्याचं क्षणभंगुरत्व ह्या गोष्टींची मनाला जाणीव करून ह्या क्षणापेक्षा योग्य क्षण कोणता असेल!? ते मंद सूर दु:खी मनावर थोडीशी फुंकर घालत असतील, त्या रचनेच्या शब्दांतून होणारी ‘सगळं ‘त्याच्या’ हाती, आपल्या हाती काही नाही’ ही जाणीव ते दु:ख सहन करायची ताकद देत असेल, शिवाय आपल्या जगण्यात षड्रिपूंमधे आपण किती गुंतून पडायचं ह्या विचाराला चालना देत असेल! विचार करता एकूण सुदृढ समाजमन घडवण्यासाठी अशा गोष्टी केवढी मोलाची भूमिका बजावत असतील!!

‘श्रीराम जयराम जय जय राम’ किंवा ‘राम नाम सत्य है’ चा गंभीर सुरांतला लयबद्ध जप तर अंत्ययात्रेत बहुतेक ठिकाणी केलेला दिसून येतो. अशाक्षणीच्या अतीव दु:खानं गेलेल्यांच्या आप्तेष्टांचं पिळवटणारं काळीज त्या लयबद्धतेत नकळत गुंगून जात असेल आणि मन शांतावायला त्याची मदत होत असेल. मन आणि मेंदूवर होणारा संगीताचा परिणाम प्रत्येकवेळी प्रत्येकाला जाणवतोच असं नाही, मात्र तो होतो नक्कीच! म्हणून अशा छोट्याछोट्या प्रथांमधला तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विचार पाहिला कि आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेपुढं नतमस्तक व्हावसं वाटतं!!

मध्यंतरी एक इंग्रजी लेख वाचनात आला ज्यात चीनमधील ‘कुसांग्रेन’ म्हणवल्या जाणाऱ्या स्त्रियांविषयी माहिती होती. ह्या स्त्रिया म्हणजे ज्यांना अंत्येष्टीच्या आधी साग्रसंगीत वाद्यवृंदासह गायन-नर्तन करायला बोलावलं जातं. अर्थातच अशावेळची गीतंही विशिष्ट प्रकारचीच असणार जी ऐकताना गेलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्टांच्या भावना उफाळून येत त्यांना भरपूर रडू येऊन त्यांच्या दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत होईल. काहीवेळा अशा अघटिताच्या धक्क्यानं एखादी कुणी व्यक्ती स्तब्ध होऊन जाते आणि तिला रडायलाही येत नाही. मात्र संगीताच्या प्रभावच असा असतो कि अशी व्यक्तीही धक्क्यातून बाहेर पडून तिच्या भावना प्रवाही होत रडू लागते!

ह्या प्रथेविषयी वाचताना मला आपल्या देशातल्या राजस्थान प्रांतातली रुदाली आठवली! प्राचीन रोम, ग्रीस, युरोप, अफ्रिका, एशियामधे अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत. प्र्त्येक ठिकाणच्या प्रथेत काही ना काही फरक असणार, मात्र उद्देश एकच असावा कि संगीतासारख्या अत्यंत प्रभावी गोष्टीचा वापर करून दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत करणं! आणि… अर्थातच पुन्हा समाजव्यवस्था हा भागही आलाच!

प्रथांचा गैरफायदा घेतला जाऊन काही व्यक्तींचं होणारं शोषण हा वेगळा मुद्दा आहे! मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं कि कोणत्याही प्रथेमागचा मूळ उद्देश हा वाईट नसावा. शेवटी काही ना काही काम मिळून प्रत्येकाच्या पोटपाण्याची व्यवस्था होणं हा उदात्त विचारच त्या ठिकाणी असावा! मात्र हे करत असताना ‘संगीत’ हे ‘अत्यंत प्रभावी’ माध्यम प्रत्येक ठिकाणी वापरण्याची चतुराई मात्र फारच कौतुकास्पद वाटते! संगीतकलेचा, तिच्या आपल्या जाणिवांशी असलेल्या नात्याचा वापर मानवी आयुष्यातल्या जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत प्रत्येकक्षणी केला गेलेला पाहाताना अक्षरश: थक्क व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-२) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा~पूरिया या प्रसिद्ध जोडीतील पूरिया या रागाविषयी आपण आज विचार करू या.

मागील लेखांत आपण पाहीले आहे की मारवा पूरिया सोहोनी ही एकाच कुटुंबातील सख्खी भावंडे! परंतु वादी~ संवादी स्वरांच्या भिन्नतेमुळे प्रत्येकाचे चलन स्वतंत्र, अस्त्तित्व स्वतंत्र! पूरियांत गंधार व निषाद ह्या स्वरांना अधिक महत्व आहे. रात्रीच्या प्रथम प्रहरी हा राग सादर केला जातो. मध्यम जरी तीव्र असला तरी मारव्याची उदासीनता पूरियांत नाही. मात्र ह्याची प्रकृती काहीशी गंभीरच! अधिकतर पूरिया मंद्र व मध्य सप्तकात गायिला वाजविला जातो, म्हणजेच हा पूर्वांगप्रधान राग आहे. स्वरांच्या वक्रतेमुळे हा राग मनाला मोहवितो. जसे~”नी (रे)ग, (म)ध ग(म)ग, ध नी  (म)ध ग(म)ग,” अशा प्रकारे वक्र स्वररचना आढळते. नि (रे)सा, ग(म)ध नी (रे)सा/सा नी ध (म)ग (रे)सा असे याचे आरोह/अवरोह आहेत. ‘ग, नी (रे)सा, नि ध नि (म)ध (रे) सा’ या स्वरसूमूहावरून पूरियाची तात्काळ ओळख पटते. या रागाचे पूर्ण चलनच वक्र आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खाॅं यांच्याविषयी असे सांगितले जाते की मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषदेत बडे गुलाम अली यांनी अल्लादिया खाॅं, फैय्याज खाॅं, हाफीज अली खाॅं यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मारवा आणि पूरिया हे दोन राग एकापाठोपाठ गायले होते, आणि त्यांचे गायन ऐकून बूजूर्ग मंडळी अगदी अवाक झाली. एका रात्रीतच बडे गुलाम अलीना मुंबईत प्रसिद्धी मिळाली.

वियोग,शृंगाररसोपयुक्त असा हा पूरिया,कारूण्यपूर्ण श्रृंगार हाच या रागाचा स्थायीभाव!

शूद्ध पूरियांतील गाणी सहसा सांपडत नाहीत, परंतु ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी’, ‘मुरलीधर शाम हे नंदलाला’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही काही भावगीते, भक्तीगीते पूरिया रागावर आधारित  म्हणून उदाहरणादाखल देता येतील. “जिवलगा राहीले दूर घर माझे” ह्या भावगीतांत पूरियाचे स्वर असले तरी त्याबरोबर धनाश्री येऊन तो पूरिया धनाश्री झाला आहे. पूरियांत नसलेला पंचम ह्यांत आहे. सूरत और सीरत या चित्रपटांतील ‘प्रेम लगन’, आई मिलनकी रात मधील कितने दिनो की बात आई सजना रात मिलनकी, ‘रंगीला मधील ‘समा ये क्या हुआ, रुत आ गयी रे रुत छा गई रे’ ही काही बाॅलीवूड गाणी पूरिया धनाश्रीची उदाहरणे सांगता येतील ह्या गाण्यांकडे पाहीले असता पूरिया हा करूणरसप्रधान शृंगार वर्णन करणारा राग असल्याचे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१७) – ‘नामी शक्कल’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग-१७) – ‘नामी शक्कल’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

चेन्नईत आल्यावर जेमतेम महिन्याभरात एक गोष्ट पहिल्यांदा पाहिली तेव्हां मला मोठा धक्का बसला होता. संध्याकाळी सहाच्या आसपासची वेळ असावी. घरापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या मंडईत मी भाजी आणण्यासाठी निघाले होते. अचानक ढोल-ताश्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला आणि त्या रस्त्यावरच्याच एका गल्लीतून एक मिरवणूक बाहेर येताना दिसली. पुढं लोक पायघड्या पडतील अशी भरपूर फुलं उधळत होते, पाठोपाठ आपल्याकडच्या ढोलक, ताशा, गोलाकार पण छोट्या आकाराचे ढोल अशी वाद्यं वाजवणारे लोक होते आणि त्या लोकांसोबत, आगे-मागे असलेले लोक बेभान होऊन नाचत होते, मधेच फटाक्यांची माळ ही वाजली. ह्या पुढच्या लवाजम्यापाठोपाठ एक सुंदर सजवलेली चंदेरी रथसदृश गाडीही येऊ लागली. त्या सगळ्याच प्रकाराकडं मी कुतुहलानं पाहात होतेच, मात्र तो सजलेला रथ पाहाताक्षणी वाटलं कि, थोडं पुढं जाऊन कोणत्या देवाची मिरवणूक आहे पाहावं.

ती मिरवणूक बऱ्यापैकी टप्प्यात आली तसा माझा चेहरा उत्साहानं, आनंदानं ओसंडून वाहात असावा. कारण माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहात गर्दीत माझ्या शेजारी असणारा एक मध्यमवयीन माणूस हातवारे करून मला काहीतरी सांगू लागला. तेव्हां तामिळ अजिबातच समजत नव्हतं. मात्र त्याच्या हातवाऱ्यांवरून तो मला ‘पुढं जाऊ नको’ असं सांगत असावा. दोन क्षण थांबून मी पाहिलं तर मिरवणुकीत सगळे पुरुष लोकच होते आणि म्हणून तो माणूस मला एकटीला पुढं जाऊ नको असं म्हणत असेल असं वाटलं. मग मी त्याला हिंदीत ‘भगवान का दर्शन करना है’ असं सांगत हात जोडून देवाला नमस्कार करतात तसा नमस्कारही करून दाखवला. पण त्याला ते काही कळलं नसावं. तो आणखी मोठ्या आवाजात मला परत तामिळमधे काहीतरी सांगू लागला. मग मी त्याला ‘गॉड गॉड… नमस्कारम्‌  नमस्कारम्‌’ असं म्हणून परत ती नमस्काराची ऍक्शन केली. तोवर अगदी जवळ आलेल्या मिरवणुकीला लोक आपोआप बाजूला होत वाट करून देत होते आणि मी मात्र किमान डोकावायला तरी मिळावं म्हणून जंगजंग पछाडत होते. बाजूच्या माणसानं परत काहीतरी सांगितलं आणि मी परत ‘गॉड, गॉड’ म्हणत किंचित रथाच्या दिशेनं पुढे जाताना त्या माणसानं कपाळावर हात मारून घेतल्याचं तेवढं मला दिसलं.

मी त्या रथापासून साधारण चार फूट अंतरावर असेन तेवढ्यात त्या रथासोबत चालणारा एक माणूस मी पुढं येताना पाहून वस्सकन्‌ माझ्यावर खेकसला. तसंही कानाला सवय होईपर्यंत ह्या भाषेतलं साधं बोलणं ऐकलं तरी माझ्या काळजात धडकी भरायचीच, ते वसकणं तर अजून जोरदार होतं म्हणून मी जामच घाबरले. आपसूक दोन पावलं मागं येतायेता टाचा उंचावून रथात डोकावायची संधी मात्र मी साधली… पण तिथं जे काही दिसलं त्यानं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या रथात एक मृत शरीर होतं आणि ती एक अंत्ययात्रा होती. अशाप्रकारे वाजतगाजत जाणारी अंत्ययात्रा मी पहिल्यांदाच पाहिली होती म्हणून तो चांगलाच धक्का होता. आता ह्या गोष्टीची सवय होऊन गेल्यानं काहीच वाटत नाही, मात्र तेव्हां हे पचायला फारच जड गेलं होतं.

नंतर ओळखी होतील तसं आजूबाजूला तोडक्यामोडक्या हिंदी-इंग्रजीतून साधलेल्या संवादातून काही गोष्टी कळल्या. गेलेल्या माणसाला रडत निरोप न देता अशाप्रकारे निरोप दिला कि लोकांना नाचताना पाहून ते आनंदात आहेत अशा समजुतीमुळं जाणाऱ्या आत्म्याला क्लेश होत नाहीत, शेवटचा निरोप रडून-भेकून कशाला द्यायचा आनंदानं द्यावा असंही कुणी म्हणालं, कुणी म्हणालं कि लोक नाचतात तेव्हां माणूस गेल्यानं झालेलं दु:ख आत साठून न राहाता त्याचा आपोआप निचरा व्हायला मदत होते, त्या दु:खानं धक्का बसला असेल तर त्याची तीव्रता आपोआप कमी होऊन मन हलकं व्हायला मदत होते. तसे भाषेच्या अडसरामुळं सगळे संवादही वरवरचेच होते. खरं कारण काहीही असो, मात्र मला त्यावेळी ते पटायला आणि पचायला खूपच कठीण गेलं होतं.

मध्यंतरी माझे कलीग असलेल्या चेन्नईतल्या एका सुप्रसिद्ध आणि अभ्यासू मृदंगवादकांच्या एका लेक्चरला गेले होते. तेव्हां त्यांनी ‘रिदम’ ह्या संकल्पनेविषयी बोलताना विषय अचानक ह्या गोष्टीकडं वळला. माझे कलीग लहानपणापासून अमेरिकेत वाढलेले आणि क्वचित चेन्नईत येऊन-जाऊन असे असायचे. दहा-बारा वर्षांपूर्वी ते चेन्नईला कायमचे स्थायिक झाले त्यावेळी अशी वाजतगाजत अंत्ययात्रा त्यांनीही पहिल्यांदा पाहिली. ते सांगत होते, ‘माझ्या मनात आलं कि हा रिदम आणि इतकं जोशपूर्ण वादन तर आपल्याला पटकन नाचायला प्रवृत्त करणारं आहे. मग ह्या दु:खाच्या क्षणी ह्याचा वापर का केला जात असावा? एका अगदी बुजुर्ग व्यक्तीकडं ह्या परस्परविरोधी वाटणाऱ्या गोष्टीबाबत चौकशी केली असता ती व्यक्ती सहजपणे म्हणाली कि, तो माणूस खरंच मृत झाला आहे कि अजून जिवंत आहे हे पाहाण्यासाठी असं वाद्यवादन केलं जातं!’ पुढं ते म्हणाले, ‘हे ऐकताच मी अवाक्‌ झालो. वाद्यवादनाचा/संगीताचा मन आणि शरीराशी असलेला संबंध एक वाद्यवादक म्हणून मला चांगलाच माहिती आहे. मात्र त्याचा हा असा वापर मला स्तिमित करणारा होता.’

ते ऐकून आपल्या पूर्वीच्या पिढ्यांची बुद्धीमत्ता आणि तर्कशास्त्राच्या आधारे गोष्टींचा वापर करण्याची क्षमता जाणवून त्यांच्याविषयीचा माझा आदर नव्याने कैकपटींनी वाढला. ज्या काळी वैद्यकशास्त्र ही गोष्ट अजून अस्तित्वात यायची असावी, हृदय सुरू आहे कि थांबलं आहे हे दाखवणारं मशीन अस्तित्वात यायचं होतं  त्याकाळी हुशार मानवानं माणूस मृत झालाय कि जिवंत आहे, हे पडताळून पाहाण्याची ही नामी शक्कल योजली असावी… तीही अर्थातच उपलब्ध साधनांच्या आधारे! ‘जोशपूर्ण वाद्यवादनातून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळं माणसाच्या शरीरामधे उत्पन्न होणरी उत्तेजना’ ह्या गोष्टीचा असा उपयोग खरोखरीच स्तिमित करणारा आहे.

बराचवेळ माणूस उठलं नाही, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, त्याच्या नाकासमोर धरलेलं सूत हाललं नाही तर तो मृत झाल्याचं मानण्यात येत असावं. मात्र कुठंतरी अशीही शक्यता असेल कि काही क्षणांसाठी त्या व्यक्तीची शुद्ध हरपली असेल, नाडीचे ठोके अत्यल्प असतील परंतू तो पूर्ण मृतावस्थेत गेला नसेल तर अशा जोशपूर्ण वाद्यवादनाने उत्तेजित होऊन त्याच्यात काहीतरी हालचाल जाणवेल. अशाप्रकारे तो जिवंत असल्याचं लक्षात आल्यावर त्याचा जीव वाचवण्याचे काही प्रयत्न करता येतील. संगीताचा माणसाच्या मन आणि शरीराशी असलेल्या संबंधाचा इतका सूक्ष्म अभ्यास आणि वास्तविकतेमधे ‘मृत्यूच्या खात्रीसाठी’ त्याचा असा चपखल वापर ह्याचं हे अत्यंत नेमकं उदाहरण म्हणता येईल.

क्रमश:…

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०) – राग~मारवा, पूरिया, सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मारवा,पूरिया,सोहोनी मारवा थाटोत्पन्न हे तीन राग! गोत्र एकच परंतु प्रत्येकाची कुंडली भिन्न, साम्य असूनही वेगळी दिसणारी! स्वभाव वेगळा, चाल वेगळी, स्वतंत्र अस्तित्व असणारी अशी ही तीन सख्खी भावंडेच!

मारवा थाट म्हणजे कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम घेऊन येणारा. अर्थातच या तीनही रागांत रे कोमल आणि म तीव्र, पंचम वर्ज्य, बाकीचे स्वर शुद्ध. अर्थातच यांची जाति षाडव~षाडव.

सगळे स्वर तेच असतांना प्रत्येक राग आपले स्वतंत्र अस्तित्व कसे काय टिकवितो हा एक मोठा प्रश्नच आहे नाही का?  याचे ऊत्तर असे की प्रत्येकाचे चलन संपूर्णपणे वेगळे आहे. दुरून येणार्‍या किंवा पाठमोर्‍या एखाद्या माणसाला आपण जसे त्याच्या चालण्यावरून अचूक ओळखतो तसेच ह्या रागांचे आहे.

ह्या लेखांत आपण मारवा या रागाचे विवेचन करूया.

मारव्याचे सर्व सौंदर्य शुद्ध धैवतात एकवटलेले आहे. या स्वराबद्धल जाणकारांत बरीच मतभिन्नता आहे. कोणी शुद्ध धैवत तर कोणी कोमल आणि शुद्ध या दोन धैवतामधील श्रुतींवर लागणारा धैवत मारव्यात असला पाहीजे असे मानतात. असा कलात्मक धैवत मारव्याचे सौंदर्य खुलवितो, अधिक मोहक रूप व्यक्त करतो. याच्या चलनांत पुर्वांगांत कोमल रिषभ व उत्तरांगांत शुद्ध धैवत प्रबळ आहे. राग विस्तार करतांना षड्जाचा कमीत कमी वापर असल्यामुळे कलाकाराची हा राग सादर करतांना कसोटीच असते. नी(रे)—ग(म)ध— (म)ध(म)ग(रे)—सा। ध आणि रे वर न्यास असे याचे स्वरूप आहे. कोमल रिषभांतून आर्त भाव उमटतात. दिवस व रात्र यांची संधि होण्याची, संधिकालीन वेळ मनाला एकप्रकारची हुरहुर लावणारी, उदास! अशावेळी मारव्याचे सूर त्यातील तीव्र मध्यमामुळे अधिकच कातर वाटतात.”पैया परत छांड दे मोरी गगरी।जाने दे पनिया भरनको शामसुंदर।।ह्या पंक्ती ऐकल्या की गोपींची आर्त विनवणी मारव्याच्या सुरांतून नेमकी समजते.

मारव्यात अनेक मराठी/हिंदी गीते संगीतबद्ध करण्यांत आली आहेत. अरूण दाते यांनी गायिलेले व र्‍हुदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला हे भावगीत मारव्याचे स्पष्ट रूप रसिकांस दाखविते. भक्तीतील करूणा आपल्याला धन्य ते गायनी कळा या नाटकांतील हे करूणाकरा ईश्वरा ह्या भजनांतून

अनुभवास येते.शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी हे सुमन कल्याणपूरचे भावगीत मारवा मधलेच!सांझ ढले गगनतले हम कितने है एकाकी ह्या शब्दांतूनच मारव्यातली ऊदासीनता दिसून येते.

अथांग सागराला भरती आली आहे,पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशांत उसळणार्‍या लाटांची गाज कानावर पडते आहे,अशा निसर्गाच्या रूपाचे दर्शन म्हणजे मारवा!

भैरवकालिंगडा,भूपदेसकार,तोडीमुलतानीप्रमाणेच मारवापूरिया ही जोडी प्रसिद्ध आहे.

पुढील लेखांत आपण पूरिया रागाविषयी बोलूया.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १६) – ‘क्षणसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १६) – ‘क्षणसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात मानवी आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण साजरा करताना माणसानं संगीताची मदत घेऊन ते क्षण आणखी देखणे कसे केले हा विचार केला कि विविध गीतप्रकार आठवून थक्क व्हायला होतं… मुळात एका जिवाच्या जन्माची चाहूल लागल्याचा एखाद्या भावी मातेच्याआयुष्यातील आनंदी क्षण सर्वांसोबत वाटून घेताना गायली जाणारी डोहाळतुलीचं कोडकौतुक करणारी, येत्या जिवाच्या आगमनाचं सहर्ष स्वागत आणि त्याच्यासाठी शुभचिंतन करणारी डोहाळगीतं, मग मूल जन्मल्यावर त्याला जोजवताना वेळोवेळी गायली जाणारी अंगाईगीतं आणि बारशाच्यावेळी त्याच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारी, त्या जिवासाठी परमात्म्याचे आशीष मागणारी, त्या निरागस जिवाचं गुणागान करणारी, त्या जिवानं पुरुषार्थ गाजवावा म्हणून सहजी दोन महत्वाच्या कानगोष्टी सांगणारी पाळणागीतं, पुढं त्या बालजिवाचं छोट्या-छोट्या बडबडगीतांतून केलेलं मनोरंजन आणि कधी अशा गीतांतूनच नकळत त्याला दिलेलं जगण्यासाठी आवश्यक तत्वांचं बाळकडूही संगीतामुळं सहज सोप्या पद्धतीनं मनात रुजायला मदत होते.

पुढं त्या जिवाच्या आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी गायल्या गेलेल्या मंगलाक्षतांचा विचार केला कि लक्षात येतं त्या मंगलगीतांमुळं त्या क्षणांतला आनंद द्विगुणित होतोच, शिवाय आयुष्यात येणारं ते बदलाचं वळण सहज पार करण्यासाठी कोणत्या जबाबदाऱ्यांची जाणीव मनात असावी हेही नकळत सुचवलं जातं.

मुलांच्या मौंजीबंधनाला सध्या एका संस्कारापेक्षा ‘इव्हेंट’चं जास्त रुपडं आलं आहे. पूर्वीसारखे हे बटू आता मातेला सोडून गुरुगृही राहायला जात नाहीत, स्वत:ची कामं स्वत: करून काबाडकष्ट काढून त्यांना शिक्षण घ्यावं लागत नाही हे जरी खरं असलं तरीही आता बाल्यावस्थेतला पहिला टप्पा पार झाला आहे आणि विद्याभ्यासासाठी आपल्याला एका निर्धारानं सज्ज व्हायचं आहे ही जाणीव त्या जिवात रुजणं आवश्यक आहेच. आत्ताच्या काळानुसार विद्याभ्यासासाठीच्या त्यांच्या काबाडकष्टांचं स्वरूप बदललं आहे इतकंच! पण कष्ट हे घ्यावे लागणार असतातच आणि त्यासाठी सातत्यानं मनोबल राखून ठेवण्याची गरज आणि त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं ह्या मंगलगीतांतूनच सूचित केलं जातं.

मातृभोजनावेळच्या गीतांतले संकेत म्हणजे आता आईचं बोट सोडून आपल्याला जास्त वेळ शाळेत राहून शिक्षण घ्यायचं आहे, त्यावेळी आई सोबत नसणार तरीही मन लावून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मंगलाष्टकांमधे बटूच्या विद्याभ्यासासाठी देवदेवतांचे आशीर्वाद मागितले जातात, त्या बटूनं आता खंबीरपणे, दृढनिश्चयानं, नियमांचं पालन करत संयम राखून विद्यार्जनासाठी परिश्रम करणं त्याचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी किती आवश्यक आहे हे सूचित केलं जातं, त्यासाठी मौंजीबंधनाच्या रुपानं त्याच्यावर काय संस्कार केले जात आहेत त्याचा अर्थ सांगितला जातो.

मंगलाष्टकाचे ते सूर जमलेल्या इतरेजनांचं मनोरंजन करतात, त्याच्या आप्तेष्टांचा आनंद द्विगुणित करतात, त्या सोहळ्याची रंगत वाढवतात आणि त्याचवेळी त्या बटूच्या मनात निश्चितच काही अनमोल भावतरंग उमटवतात. संगीताची ही केवढी मोठी किमया आहे. त्या क्षणापर्यंत ‘बाळ’ असणारा तो जीव थोडा का होईना वेगळा भासायला लागतोच. मंगलगीतं आणि मंत्रसंस्कार दोन्हीच्या सुरांमुळं सोहळा देखणा होतोच परंतू आयुष्यात महत्वाचं वळण येतंय आणि त्याला जबाबदारीनं सामोरं जायला हवं, हा विचार त्या बालजिवाच्या मनात त्याच्या त्यावेळच्या जाणिवेच्या कुवतीनुसार, त्याच्या बालबुद्धीनं केलेल्या आकलनानुसार का होईना अधोरेखित व्हायला मदत नक्की होत असणार.

त्यापुढचा मोठा संस्कार म्हणजे लग्नसंस्कार! दोन जिवांचं, दोन घराण्यांचं, दोन विचारप्रवाहांचंही मीलन होताना त्यातून नवीन सुंदरसं काही अंकुरावं, उत्पन्न व्हावं हा विश्वनियमही राखला जावा असा हा संस्कार! ह्या सोहळ्यातील पूर्वसंस्कार, प्रत्यक्ष विवाहसोहळा आणि त्यानंतरचेही सर्व विधी, धार्मिक प्रथा, चालीरिती सगळं अत्यंत संगीतमय आहे. सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवून जात्याची पूजा करताना कर्त्याधर्त्या गणेशाचं केलेलं स्तवन, घाणा भरताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, उत्सवमूर्तींना हळद लावताना गायली जाणारी गीतं, लेकीची पाठवणी करताना विहीणबाईंना तिला सांभाळून घेण्याची विनवणी करणारी गीतं, कारल्याच्या वेलाखालून विहीणबाई जाताना गायली जाणारी मांडवगीतं असे किती प्रकार सांगावे. ह्यावेळी जे उखाणे घेतले जातात ती भले गीतं नसतील, मात्र त्यातही एक लय सांभाळली गेली असेल तरच ते उखाणे रंगतदार होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण सोहळ्यात सुरू असणारं सनई, चौघडे अशा मंगलवाद्यांचं पार्श्वसंगीत जी वातावरणनिर्मिती करतं तिचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही.

प्रत्यक्ष दोन जिवांच्या डोक्यावर अक्षत पडते त्यावेळी गायल्या गेलेल्या मंगलक्षतांतून तर किती वैविध्यपूर्ण संकेत त्या दोन्ही जिवांना दिले जातात. सामोऱ्या येत असलेल्या वळणातली असीम सुंदरता सांगितली जाते, त्याबरोबरच ती सुंदरता राखण्यासाठी आपापला अहंभाव सोडून एकमेकांत विरघळून जाण्याची आवश्यकता, आता आपण एकटे नाही तर आपल्या दोघांचं मिळून एकच आयुष्य आहे हा अत्यावश्यक विचार आणि ह्यासोबत दोघांच्या आजवरच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडली गेलेली नातीगोती, भावसंबंध आदरभावानं जपणं, वृद्धिंगत करणं ह्या नव्या जबाबदारीविषयीही संकेत दिला जातो.

लग्नसमारंभानंतर वरगृही पूजेसोबतच प्रथा म्हणून काही ठिकाणी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. खास गोंधळी लोकांना बोलावून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अर्थातच अठरापगड जाती असलेल्या आपल्या देशात गोंधळाप्रमाणेच इतरही अनेक प्रथा विविध समाजांमधे अस्तित्वात आहेत आणि त्या-त्या गोष्टींत पारंगत असणाऱ्या कलाकारांना मुद्दाम आमंत्रित करून ह्या प्रथा साजऱ्या केल्या जातात.

त्यानंतर वर्षभरातल्या सणसमारंभांपैकी मंगळागौरीसारखे सण म्हणजे तर संगीतानेच सजलेले म्हणायला हवेत. त्यातले विविध खेळ आणि त्यावेळी गायली जाणारी गीतं म्हणजे ‘स्त्रीगीते’ ह्या लोकसंगीतप्रकारातला सुंदर भाग आहे. त्यात गीत आणि नृत्य ह्याचं सुंदर मिश्रण आहे. जगणं जास्तीत जास्त सुंदर करण्यासाठी क्षणांचा उत्सव करण्याची मानवी मनाची उर्मी संगीताच्या मदतीनं कशी नेमकेपणानं भागवली जाते ह्याची ही सगळी उदाहरणं म्हणता येतील. माणसाच्या जगण्यातली, संस्कृतीतली संगीताची प्रचंड व्याप्ती ह्या सगळ्या उदाहरणांतून आपल्याला दिसून येते.

अर्थातच मी जे-जे उल्लेख केले ते एकतर जगण्यातल्या व्यक्तिगत क्षणांमध्ये सामावल्या गेलेल्या संगीताविषयी आणि मला माहिती असलेल्या गोष्टींतून… मात्र ह्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकार निश्चितच अस्तित्वात आहेत. प्रांत व त्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यानुसार जन्मलेली तिथली संस्कृती, भाषा, समाजव्यवस्थेनुसार विशिष्ट जनसमुदाय अशा अनेक गोष्टींनुसार अक्षरश: अनेकविध गीतप्रकार अस्तित्वात आलेले आहेत.

राहाता राहिला मानवी आयुष्यातील सर्वात गंभीर क्षण… अंतिम क्षण… मृत्यू! ह्या क्षणातही मानवानं किती विविध दृष्टीकोनांतून संगीताला सामावून घेतलं आहे… भावनांचा निचरा होण्यासाठी, मनाला अंतिम सत्याची जाणीव करून देण्यासाठी इ. गोष्टींपासून ते अगदी मृत्यूची खात्री करून घेण्यासाठीही, ह्याविषयी माहिती पुढच्या लेखात पाहूया!

क्रमशः….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ९) – राग~ रागसारंग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ९) – राग~ रागसारंग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मागील आठवड्यांत सूर्योदय कालीन राग ललत संबंधी विचार मांडल्यानंतर आज मध्यान्ह काळचा अतिशय लोकप्रिय राग सारंग विषयी या लेखांत विवरण करावे असा विचार मनांत आला.

काफी थाटांतील हा राग! गंधार व धैवत वर्ज्य, म्हणजेच याची जाति ओडव. शुद्ध व कोमल असे दोन्ही निषाद यांत वावरत असतात, आरोही रचनेत शुद्ध आणि अवरोही रचनेत कोमल याप्रकारे दोन निषादांचा उपयोग. नि सा  रे म  प नि सां/सां (नि)प म रे सा असे याचे आरोह/ अवरोह. निसारे, मरे, पमरेसा या सुरावटीने सारंगचे स्वरूप स्पष्ट होते.वादी/संवादी अर्थातच अनुक्रमे रिषभ व पंचम.

स्वरांमध्ये थोडा फेरफार करून आणि रागाची वैषिठ्ये कायम ठेवून गानपंडितांनी सारंगचे विविध प्रकार निर्मिले आहेत.

उपरिनार्दिष्ट माहीती प्रचलित ब्रिन्दावनी सारंगची आहे.हिराबाई बडोदेकर यांची “मधुमदन मदन करो”ही ब्रिन्दावनी सारंगमधील खूप गाजलेली बंदीश. तसेच “बन बन ढूंढन जाओ”ही पारंपारीक बंदीश प्रसिद्ध आहे.”भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी”,”बाळा जोजो रे”,”साद देती हिमशिखरे” हे नाट्यपद,”संथ वाहते कृृष्णामाई” ही सर्व  गाणी म्हणजे ब्रिन्दावनी सारंगचे सूर.

शुद्ध सारंगः हा राग ओडव/षाडव जातीचा कारण ह्यात  शुद्ध धैवत घेतला जातो.दोन्ही मध्यम घेणे हे शुद्ध सारंगचे स्वतंत्र अस्तित्व. तीव्र मध्यमामुळे हा सारंग थोडा केदार गटांतील रागांजवळचा वाटतो. अवरोहांत तीव्र मध्यम घेऊन लगेच शुद्ध मध्यम घेतला जातो. जसे~ सां (नि )ध प (म)प रे म रे, निसा~~ अशी स्वर रचना फार कर्णमधूर भासते.सुरांच्या ह्या प्रयोगामुळे त्यांत एकप्रकारचा भारदस्तपणा जाणवतो.

“निर्गुणाचे भेटी आलो सगूणासंगे” हा रामदास कामतांनी प्रसिद्ध केलेला अभंग, “शूरा मी वंदिले” हे मानापमानांतील नाट्यगीत, “दिले नादा तुझे हुआ क्या है” ही मेहेंदी हसनची सुप्रसिद्ध गझल ही शुद्ध सारंगची उदाहरणे देता येतील.

मधमाद सारंगः  सारंगचेच सर्व स्वर ठेवून मध्यमाला महत्व दिले की झाला मधमाद सारंग. “आ लौटके आजा मेरे मीत हे रानी रूपमतीतील गीत हे या रागाचे उदाहरण.

सामंत सारंगः हा राग म्हणजे सारंग आणि मल्हार यांचे मिश्रण. सारंगप्रमाणे यांत धैवत वर्ज्य नसतो.सारंगचाच प्रकार असल्यामुळे मरे, रेप ही स्वर संगति दाखवून रिषभावर न्यास करून म रे म नि सा हे सारंगचे अंग दाखविणे अनिवार्य आहे. पूर्वार्धात प्रामुख्याने सारंग अंग व ऊत्तरार्धांत (नि )ध नी सा (नी) प असे मल्हार अंग म्हणजे  सामंत सारंग.

बडहंस सारंगः ब्रिन्दावनी सारंगमधेच शुद्ध गंधार वापरून बडहंस तयार होतो.

लंकादहन सारंगः कोमल गंधार घेऊन ब्रिंदावनी गायला की झाला लंकादहन.

गौड सारंगः सारंगच्या प्रकारातील हा अतिशय प्रचलित राग.जरी सारंग असला तरी ह्याची जवळीक अधिक केदार कामोदशी आहे. कारण शुद्ध व तीव्र दोन्ही मध्यमांची यांत प्रधानता आहे.पध(म)प किंवा ध (म)प हे स्वर समूह वारंवार या रागाचे स्वरूप दाखवितात.केदार प्रमाणेच प प सां  असा अंतर्‍याचा उठाव असतो. प्रामुख्याने स्वरांची वक्रता हा या रागाचा गुणधर्म!सारंग जरी काफी थाटोत्पन्न असला तरी हा गौडसारंग कल्याण थाटांतील मानला जातो.

“काल पाहीले मी स्वप्न गडे” हे गीत श्रीनिवास खळ्यांनी गौड सारंगमध्ये बांधले आहे. या रागाचे उत्तम उदाहरण म्हणजे हम दोनो या चित्रतपटांतील “अल्ला तेरो नाम”  हे भजन.

भर दुपारी गायला/वाजविला जाणारा सारंग हा शास्त्रीय राग! सूर्य डोइवर आला आहे,रणरणती दुपार,कुठेतरी एखाद्या पक्षाचे झाडावर गूंजन चालू आहे,कष्टकरी वर्गांतील काही मंडळी झाडाच्या पारावर बसून शीतल छायेत भोजनाचा आस्वाद घेत आहेत, अशावेळी हवेची एखादी झुळूक येऊन वातावरणांत गारवा निर्माण व्हावा तसा हा शीतल सारंग म्हणता येईल.या रागांचे स्वर कानावर पडतांच सगळ्या चिंता, काळज्या दूर होवून मन प्रसन्नतेने व्यापून राहिल्याचा प्रत्यय येतो.ह्या रागासंबंधी असे म्हटले जाते की हा राग ऐकत ऐकत भोजन केले तर ते अधिक रुचकर लागते. स्वर्गीय आनंद देणार्‍या या रागाने दुपारच्या भगभगीत समयाचे सोने केले आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १५) – ‘लोकसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १५) – ‘लोकसंगीत’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

विविध प्रसंगी आपल्या मनातील विविध अशा विशिष्ट भावना प्रकट करण्याची, व्यक्त होण्याची मानवाची सहज ओढ त्यानं आपली बोली भाषा आणि सहजस्फूर्त सूर-लयीच्या आधारानं भागवली आणि आज ज्याला आपण लोकसंगीत म्हणतो त्याची निर्मिती झाली. सामान्य लोकांच्या जीवनातून सहजपणे ज्याची निर्मिती होत गेली ते लोकसंगीत! लोकसंगीत हा शब्दच आपल्याला सांगतो कि हे लोकांचे संगीत आहे… त्यामुळं त्याची मालकी कुण्या एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजाची आहे, त्याच्या निर्मितीचे श्रेय हे संपूर्ण समाजाचं आहे. हे संगीत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातून सहजी, उत्स्फूर्तपणे उपजलं आणि तितक्याच सहजी ते त्यांच्या ओठी खेळत, विकसित होत राहिलं.

मुळातच मानवाच्या जगण्याशी संगीत किती सहजी बांधलं गेलं आहे ह्याचा विचार केला तर स्वस्थ मन:स्थितीत सहजपणे गुणगुणणं, विविध भावना आवाजांतून व्यक्त करत असताना त्या भावनेनुसार आवाजात होणारे चढ-उतार, अत्यानंदानं गिरक्या घेणं, नाचणं, एखादी धून कानांवर आल्यावर स्वयंप्रेरणेनं पायानं धरला गेलेला ठेका किंवा टाळ्या वाजवत साधलेली लय, आनंदानं किंवा संतापानंही व्यक्त होताना सहजपणे विशिष्टप्रकारे केलेले हातवारे, आनंदानं उड्या मारणं किंवा संतापानं दाणदाण पाय आपटणं, डोळ्यांच्या, पापण्यांच्या, अंगप्रत्यंगांच्या विशिष्ट हालचालींतून शब्दांशिवायही भावना व्यक्त करणं अशा कितीतरी उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या क्रिया आठवतील.

ह्या सर्व क्रिया ‘सूर, ताल, लय’ ह्या संगीतातील मूलतत्वांपैकी कुठल्या ना कुठल्या तत्वाशी आपसूक जोडल्या गेलेल्या आणि म्हणूनच ‘संगीत’कलेशी नातं सांगणाऱ्या आहेत, असं  म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढं शब्दसंपदा प्राप्त झाल्यावर बुद्धिमान व कल्पक मानवाच्या जगण्यातल्या अंगभूत संगीताला छान आकार प्राप्त होत गेला.

माणसाच्या दैनंदिन जीवनात उठल्यापासून झोपेतोवर संगीतच कसे सामावलेले आहे ह्याचा विचार करताना लक्षात येईल कि, पूर्वीच्या काळी पहाटे घरोघरी स्त्रिया जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. ह्या ओव्यांतून त्यांची सुख-दु:खं, आशा-निराशा, स्वप्नं, काळजी अशा विविध भावना आपसूक व्यक्त होत असत आणि अवजड जातं ओढताना त्यांना होणारे श्रमही हलके होत असत. अतीव शारिरिक कष्ट करताना होणारे श्रम हलके करण्याचं श्रमगीत हे एक उत्तम साधन आहे. शेतकरी गीतं, कोळीगीतं इ. श्रमगीतांचेच प्रकार!

पूर्वीच्या काळी लोकांनी नदीवर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देताना म्हटलेले ओंकार, श्लोक, पूजेच्यावेळी घंटानाद करत म्हटलेली आरती, जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक, दिवसभर कामकाजाच्या वेळेस श्रम हलके करण्यासाठी गुणगुणणं किंवा गाणी गाणं, मुलांनी शाळेत एका लयीत म्हटलेले पाढे, ठेक्यात म्हटलेल्या कविता, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी म्हटलेली शुभंकरोती आणि एकूणच लयदार परवचा, ‘त्याच्या’ आळवणीत गायलेलं भजन, लहान मुलाचं रडं थांबवण्यासाठी टाळ्या-टिचक्या वाजवण्यापासून, ‘अलेलेले’ अशा लयदार उद्गारांपासून ते खुळखुळ्याचा घेतलेला आधार व त्यांना निजवताना गायली गेलेली अंगाई अशा कितीतरी गोष्टींत संगीतच तर सामावलेलं आहे.

मानवप्राण्याच्या सामुहिक जीवनाला जेव्हां सुरुवात झाली तेव्हांपासून लोकसंगीत अस्तित्वात आलं. लोकसंगीत हे समूहाचे, समूहाकडूनच निर्मिले गेलेले आणि समूहासाठीच सादर केले जाणारे संगीत आहे. ह्यातील सामूहिक हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्याचे निर्मितीश्रेयही व्यक्तिगत नाही तर सामूहिक आहे. हे संगीत फक्त कोण्या एका व्यक्तीसाठी, ठराविक वर्गासाठी नव्हे तर प्रत्येकच व्यक्तीसाठी म्हणजे संपूर्ण समूहासाठी आनंददायक, अर्थवाही असते. ह्यातील शब्द व स्वररचना अगदी सहजस्फूर्त साधी-सोपी असल्याने संपूर्ण समूह, सगळे लोक त्याच्याशी जोडले जाऊ शकतात.

वर उल्लेखिलेल्या मानवाच्या भावाभिव्यक्तीतील ‘उपजत’ संगीतातूनच त्याच्या जगण्यातीत विविध प्रसंगांनुसार, त्या-त्या कालमानातील जीवनपद्धतीनुसार, त्या-त्या मातीतील संस्कृती व समाजव्यवस्थेनुसार, चालीरितींनुसार, विकसनशीलतेतून उदयास आलेल्या विविध संकल्पनांनुसार लोकसंगीताचे विविध प्रकार उदयास आले. जगण्यातल्या विविध प्रसंगी मनात निर्माण होणाऱ्या विविध भावनांशी जोडलं गेलेलं संगीत म्हटल्यावर मानवाच्या जगण्याचं, संस्कृतीचं प्रतिबिंब त्यात असणं अगदीच साहजिक आहे. खरंतर, संस्कृतीचा फार मोठा भाग हा संगीतानं व्यापलेला आहे हे लक्षात येईल.

माणसाच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक प्रसंगी त्यानं आपल्या भावाभिव्यक्तीसाठी घेतलेल्या संगीताच्या आधारातून जन्मलेले लोकसंगीताचे विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकार तर अक्षरश: अनंत आहेत. ह्याची कारणमीमांसा करायला गेलं तर जाणवतं कि, मनात निर्माण होणारी कोणतीही भावना नेमकेपणी व्यक्त करण्यासठी संगीत हे सहजस्फूर्त व अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आल्यावर बुद्धिमान मानवाने प्रसंग व त्यानुरूप भावनांचं नेमकं वर्णन करू शकणाऱ्या साध्या-सोप्या बोली भाषेतील शब्द आणि उत्स्फूर्त संगीतधून ह्यांची घातलेली ही सुरेख सांगड आहे. मानवाच्या अनुभूतीतून निर्माण होणारं हे संगीत असल्यानंच लोकसंगीत ‘सजीव अभिव्यक्ती’ असल्याचं मानलं जातं आणि ही अभिव्यक्ती जितकी सजीव तितकं दर्जेदार तिने त्या-त्या देशाचं प्रतिष्ठित संगीत साकार केलं आहे.

क्रमशः ….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगतराग ललत किंवा ललित

********

मारवा थाटोत्पन्न ललत किंवा  ललित या रागाचा विचार करतांना पहिली गोष्ट मनांत येते ती म्हणजे रागांतील स्वरांचा व निसर्गाचा किती घनिष्ठ संबंध आहे. सूर्योदयाची वेळ, हळूहळू वर चढणारा दिवस, मध्यानीची प्रखरता, सांजवेळ, रात्र, उत्तर रात्र, चोवीस तासांतील हे सगळे प्रहर सा रे ग म प ध नि ह्या स्वर सप्तकांतून रसिकाच्या मनःचक्षूसमोर साकार होतात. बर्‍याचदां मध्यम(म) ह्या स्वरावरून रागाची वेळ ठरविली जाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा राग ललत! एका पाठोपाठ येणारे दोन मध्यम (तीव्र,शुद्ध) हे या रागाचे खास वैशिष्ठ्य! या स्वरांची गंमत अशी की दिवसा शुद्ध असणारा मध्यम जसजशी रात्र चढू लागते तसतसा तीव्र होत जातो. ललत रागांतील तीव्र म रात्र नुकतीच संपल्याचे जाहीर करतो तर शुद्ध म दिवस वर येत असल्याची सूचना देतो.

“नि (रे) ग म(ध), (म)(ध), (म)म ग, ग (रे) ग (म), ग (रे) सा” अशी सुरावट ऐकली की द्दृष्टीसमोर अरूणोदयाचे चित्र उभे रहातेच.

अभिषेकी बुवांनी तेजोनिधी लोहगोल या कट्यार काळजांत घुसली मधील नाट्यपदाला म्हणूनच ललत रागांतील स्वरांचा आधार घेतला असावा.

पियु पियु रटत पपीहरा ही याच रागातील पारंपारीक बंदीश भावमधूर पहाटेचे वातावरण निर्मीते.

“खिन्न आंधळा अंधार आता

ओसरेल पार

लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल

आता उजाडेल…..”

ह्या मंगेश पाडगांवकरांच्या ओळी म्हणजे ललतचे पहाट घेऊन येणारे सूर.

या रागांत रिषभ आणि धैवत कोमल व बाकी इतर स्वर शुद्ध.  काही संगीतकार मात्र या रागाचा जनक मारवा म्हणून शुद्ध धैवत घेऊन सादरीकरण करतात. पंचम वर्ज्य असल्यामुळे जाति षाडव~षाडव.

नि (रे) ग म,(म)म ग,(म) (ध) सां

(रें) नि (ध) (म) (ध)(म) म ग (रे) सा

असे याचे आरोह/अवरोह.

प्रातःकालच्या मंगलमय वातावरणाबरोबरच

पवित्र प्रेमाचा आविष्कारही ह्या स्वरांतून आपल्याला जाणवतो.

“नैना भरायोरी

नींद उध्यारो जब रातही

तब पिया पास ना देखायोरी

मै का करू अब

शोक पियाके बिछुरन सन मोहे

हाय हाय कछु ना देखायोरी”

प्रेमरसांत आकंठ बुडालेली प्रेमिका डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे जवळ असलेल्या तिच्या प्रियकराला पाहू शकत नाही. कुमारजींनी त्यांच्या या बंदिशीतून तिच्या मनाची अवस्था साकारली आहे.

मृच्छकटीक नाटकातील ‘हे सखी शशीवदने’ पद, जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर हे ग. दि. मा/बाबूजी या जोडीचे पोस्टांतील मुलगी या चित्रपटांतील गीत, लता मंगेशकर व मन्ना डे यांचे ‘प्रीतम दरस दिखाओ’ ही सर्व गाणी ललतची ओळख करून देतात.

“इक शहेनशाहने  बनवाके हंसी ताजमहल…!”

मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या मुमताज बेगम साठी बांधलेला ताजमहाल ~प्रेमाचे प्रतीक~ म्हणजेच ललतचे सूर.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print