मराठी साहित्य – विविधा ☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ते आपल्या आजूबाजूला वर्तमानपत्र, लॅपटॉप, मोबाईल असा सगळा पसारा मांडून बसले होते. स्वतः काढलेली, आपल्यासाठी इतरांकडून (मुद्दाम) काढून घेतलेली, जूनी, नवीन अनेक (फक्त आणि फक्त वाघांची) छायाचित्रे देखील ते परत परत पहात होते. (सारखे सारखे पाहून त्यांच्या मानेला देखील रग लागली होती. म्हणून त्यांनी मानेचा पट्टा परत एकदा नीट केला.) पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे (भागात) असलेले वाघ आणि जाहीर झालेली वाघांची संख्या याचा ताळमेळ काही बसत नव्हता. आपल्या मुलाच्या कॅमेऱ्यात काही (आपल्या) वाघांचे फोटो आहेत का? म्हणून त्यांनी मुलाला हाक मारली. पण तो आदि(च) कुठेतरी याच कामासाठी (नेहमीप्रमाणे) गेला होता.

मागच्या काही काळात यांना आकडेवारी गोळा करायची आणि आपणच सांगायची अशी सवय लागली होती. पण आज ते जाहीर झालेली आकडेवारी बघत होते. आकडेवारी नुसार वाघांची संख्या वाढली होती. पण मग हे वाढलेले वाघ नक्की कुठे आहेत? हाच प्रश्न त्यांना पडला होता. हे म्हणजे “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” प्रमाणे आपण प्रयत्न करुन देखील वाघांची संख्या आपल्या हद्दीत नाहीच वाघांचे ठाणे (घरोबा) दुसरीकडेच. अशीच परिस्थिती सध्या जाणवत होती.

यासाठी त्यांनी काटेकोरांना देखील कामाला लावले होते. पण कामाला लावण्या अगोदरच एखादे काम अंगावर घेण्याची सध्या त्यांना सवय लागली असल्याने काटेकोर अगोदरच कामाला लागले होते. काहीही करून हे काम वेळेच्या आधी संपवायचे असा त्यांचा विचार होता, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते आपल्या घड्याळात बघत होते. पण काटेकोरांसमोर देखील नाना अडचणी होत्याच. आता मदतीसाठी नक्की कोणाचा हात घ्यावा यावर ते विचार करत होते, पण या समस्येवर  काही प्रकाश पडत नव्हता. त्यांना आकडेवारी लवकर हवी होती, त्यामुळे दूरदृष्टीचे संजय त्यांना सध्यातरी नको होते. काकांना विचारावे असे वाटल्याने त्यांनी काकांना फोन देखील केला. काका म्हणाले अरे वाघांचे काय घेऊन बसला आहेस‌.

दुपारी वाघ गुहेत आराम करत होते तेव्हा यांची (चार) माणसे विनाकारण वणवण फिरत कारण नसतांना वाघ शोधत होते. तेव्हा वाघ सुरक्षित व आपापल्या गुहेतच होते. आणि रात्री दमून भागून यांची माणसे आराम करत होती तेव्हा वाघ गुहेतून बाहेर पडले आणि भक्ष्य शोधण्याच्या नादात ते दुसऱ्या हद्दीत कधी आणि कसे पोहोचले ते लक्षात देखील आले नाही. आणि आता तिथेच त्या वाघांना सुरक्षित वाटत असेल तर ते सुरक्षित असेपर्यंत तिथेच थांबतील, परतणार नाही ना……. वाघ जरी असला तरी तो इतरांसाठी…… त्याला स्वतःला सुरक्षित वाटले पाहिजे की नाही……..

प्रश्न सगळ्या वाघांचा असेल तर एकत्रित दिलेली आकडेवारी जवळपास खरी असेल. पण प्रश्न फक्त आपल्याच भागातील (आपले) वाघ आणि त्यांची संख्या असा प्रश्न असेल तर ते प्रत्येकाने आपले आपणच पाहिलेले जास्त बरे असते. कारण वाघांचे देखील काही प्रश्न असतीलच ना….. नाहीतर तो असा भटकला किंवा भरकटला असता का?

ते उगाचच आपली हद्द सोडून कशाला जातील.‌….. दुसऱ्या हद्दीत जातांना त्यांना देखील भिती असतेच. तु याचा विचार करु नकोस. तुला दुसरे काही काम नसेल तर मी सांगतो काय करायचे ते. असे म्हणत काकांनी फोन ठेवला सुध्दा……..

आता काय? वाघ किती? आणि त्यापैकी आपले किती? यातही लहान वाघ आणि मोठे वाघ यांची खरी संख्या कळण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबणे भाग आहे. या काळात प्रत्येकजण आपापल्या भागातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करेलच…… बाकी वाघ समर्थ आहेच………….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ वेळ… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

“शब्दकळा लावती लळा”

आजचा शब्द आहे = वेळ = 

वेळ एक फ्री हिट

कोणतीही स्पर्धा आपण त्या स्पर्धेसाठी वेळ काढून बघत असतो आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकाने कोणीतरी विजेता होतो. तेव्हा आपल्यालाही वेळेचे महत्व पटते .पण ती जिंकणार्‍याची जिंकण्याची वेळ असते तीच वेळ हरणार्‍याची हरण्याची वेळ असते. मग लक्षात येते की वेळ एकच असली तरी प्रत्येकाची वेळ वेगळी वेगळी असते.

मग वेळ लावून केलेल्या कामाला वेळ लागला म्हणायचं का वेळेत केले म्हणायचंअसं वेळेच्या बाबतीत वेळोवेळी काहीतरी वेगळेच मनात आले आणि मन वेळे बाबत विचार करू लागले.

वेळ शब्दाचा अर्थ २४ तासातील काही भाग असे म्हणता येईल. पण किती गंमत आहे पहा या वेळेची••••

वेळेच्या आधी क्रियापद लागून त्याची वेळ म्हटले तर अर्थ एक पण तेच क्रियापद नंतर लावले तर अर्थ वेगळा••••

बघा••• भरतीची वेळ,ओहोटीची वेळ,झोपेची वेळ, खायची वेळ, घ्यायची वेळ, द्यायची वेळ पण हेच उलटे केले तर?

वेळ भरली, वेळ ओसरली, वेळ झोपली, वेळ दिली/दिला ,वेळ घेतली/घेतला••••

मग विचार करताना असे लक्षात आले वेळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर डॉक्टरेट तर मिळेलच पण तरी सगळ्या प्रकारचा सगळ्या विषयाचा वेळ , यासाठी वेळच पुरणार नाही.

आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीशीर शब्द आहेत त्यापैकी सगळ्यात मजेदार शब्द मला वेळ वाटतो.

कारण तुम्ही जसे फिराल तसा वेळ फिरत राहील तुम्हाला फिरवत ठेवील आणि तुम्ही त्याला शेकडो क्रियापदे जोडू शकता असा सर्वव्यापी सर्वसमावेशक असा शब्द आहे वेळ.

या वेळेला कितीही क्रियापदे लावून वाक्प्रचार केले ना तरी सगळे वाक्प्रचार वापरले असे म्हणताच येणार नाही. थोडे शब्द फिरवून त्या वेळेची छटा बदलता येऊ शकते.

वेळ••••• असते,नसते,पळते,पाळते,देते,घेते,येत,जाते,बघते,ओळखते,बदलते,घालवते,टळते,गाजवते,रेंगाळते,झोपते,साधते,बाधते काहीही करू शकते.

वेळ••••

पहाटेची, झुंजुमुंजूची, सकाळची, मध्यान्हाची, दुपारची, संध्याकाळची, रात्रीची, एकांताची, कातरवेळ, झांझरवेळ, साजणवेळा, धुंदवेळ, वाईट वेळ, चांगली वेळ, शिळोप्याची वेळ, अंतिमवेळ किंवा•••

उठायची, बसायची, नाष्त्याची, चहाची, विधी करण्याची, जेवायची, फिरायची, विश्रांतीची ऑफिसला जायची, झोपायची अशी कोणतीही असू शकते.

वेळापूरच्या वृद्धाश्रमात रहायची वेळ आलेले  वेळापुरे आजी आजोबा बोलत होते, आपले लग्न वेळेवर झाले म्हणून लेकरं बाळं वेळेत झाली. तेव्हा वेळेची तमा न बाळगता काम केले. वेळात वेळ काढून मजा केली वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपण्यापर्यंत वेळेचे वेळापत्रक आखून वेळेचे नियोजन केले. म्हणूनच वेळेचे गणित बसून आपण सगळीकडे वेळेवर हजर होत होतो. वेळेची चालढकल केलेली तुम्हाला चालायचीच नाही.वेळेचे पक्के होतात. तुमच्या हुषारीने कामाने तुम्ही कितीतरी वेळा ऑफिसची वेळ गाजवली होती.

आजोबा पण म्हटले हो ना तू पण  मी रागवायची वेळ येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून वेळेचे भान ठेवत माझी एकही वेळ चुकवू द्यायची नाहीस. वेळ महत्वाची असते आणि वेळेचे महत्व तुला होते त्यामुळे सगळे सहज सोपे वाटत होते.

वेळ वाया न घालवता तू सतत कामात वेळ घालवायचीस.खूप कष्टातही हसून तू म्हणायचीस अहो वेळ सांगून येत नसते. ही पण वेळ निघून जाईलच आणि वेळ बदलून चांगली वेळ येईल. या तुझ्या सकारात्मकतेने संसाराचा वेळ कापरासारखा उडून गेला.

खरचं वेळीच मुलांना शिक्षण दिले वेळेची कदर करीत मुलांनाही वेळेचा वेळेवर तुकडा पाडायचे भान दिले. वेळेचा अपव्यय न करता वेळेचा सदुपयोग करायला शिकवले. त्यामुळे आपल्या सुखी संसाराची वेळ जमून आली होती.

तसेच वेळ आल्यावर बघू अशा बेफिकिर वृत्तीत न रहाता वेळेची मर्यादा पाळून वेळकाढूपणा न करता वेळ कोणासाठी थांबत नसते हे जाणून वेळेनुसार दिलेली वेळ पाळत वेळेच्या बंधनात राहून  एकमेकांना सांभाळलं म्हणून या साथीत ५० वर्षाचा वेळ कसा गेला हे कळलच नाही.

वेळ वखत पाहून वागलं म्हणजे वेळ गेल्यावर हळहळावे नाही लागत. पण बाई वैर्‍यावर पण अशी वेळ येऊ नये. पण वेळ सांगून येत नाही.

अगदी खरे आहे हो. आता बघा ना एवढा वेळ मेहेरबान असताना आपल्यावर अशी वृद्धाश्रमात रहायची वेळ येईल असे वाटले तरी होते का?

आपली दोन्ही पोरं मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून आपण भारावलो होतो. अचानक थोरल्याच्या मनात फॉरेनला जायचं खूळ आलं. नुकतीच तुमची रिटायरमेंट झाली होती. सुदैवाने मुबलक पैसा हाती होता. पण थोरल्याला लगेच फॉरेनला जायचे होते म्हणून त्याने वेळ साधून पैशाची मागणी केली. वेळ न दवडता त्याला मदत करणे वेळेत जमवायला पाहिजे होते. म्हणून वेळोवेळी केलेली गुंतवणूक , मिळालेले पैसे हे सगळे वेळेचा अभाव असल्याने हातची संधी जाउ नये वेळ गेला असे होउ नये म्हणून मी वेळीच घातलेल्या लगामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याला दिली.

ते बघून धाकट्याला झोंबलं. त्यानेही तोच मार्ग धरला आणि यावेळी थोडी वेळ निराळी आहे कारण वेगळ आहे पण पैशाची नड असल्याने तुम्ही दादाला दिले तर मलाही पाहिजेत म्हणून हट्टच धरला. त्याने वेळ पाहून खेळ मांडलेला मला कळत होतं . मी काही कारणे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी तुम्ही वेळ वखत पाहून नाही वागला. थोरल्याला दिले म्हणून राहिलेले धाकल्याला देऊन मोकळे झालात.  तुम्ही वेळ बदलेल या विश्वासाने यावेळी आपण मदत केली तर पुढच्यावेळी ते आपली मदत करतील या भ्रमात होता. 

ते किती चुकीचे होते हे उशीरा कळले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. आपले होणारे हाल पाहून एका सद्गृहस्थाने आपल्याला या वृद्धाश्रमात आणले आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली.

आजोबा म्हटले खरं आहे तुझं. वेळेमुळे कशाचे काय होईल काही सांगता येत नाही.  पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण रिटायर्ड होणार्‍यांना सतर्क करण्याचे काम करू. त्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागेल शिवाय कालची वेळ आज नसते हे शहाणपण आपणही घेऊन याच वृद्धाश्रमातील गरजूंची आपण मदत करूया. आता तर फक्त आपल्या दोघांसाठीच आपण जगणार असल्याने एकमेकांना भरपूर वेळ देऊ या. वेळ न वखत बसली खोकत अशी गत करून तेच तेच दु:ख उगाळत बसू नको. चल दोघांनी मिळून नवी सुरूवात करू. मागच्या वेळेची अनुभूती नकोच . वेळेचे गुलाम होणेही नको. आपण आपल्या वेळेनुसार वेळेला आपल्यापुढे वाकायला शिकवू. शेवटी वेळच आपला गुरू असल्याने त्याची विद्या त्यालाच देऊ. आणि हो , आता परत उदास सूर लावण्याची वेळ नको म्हणून वेळेची एक गंमत सांगतो.

तुला सांगतो हा वेळ आहे ना एक जादूगार आहे. केव्हा काय कोणत्याक्षणी बदलेल हे सांगता येत नाही.

आता हेच बघ ना पूर्वी क्रिकेट ५- ५ दिवस टेस्ट मॅचेस मधे खेळायचे. तेवढा वेळ बघणार्‍याकडे असायचा. मग नंतर ३ दिवसीय मॅचवर आला कारण लोकांचा वेळ कमी झाला. तो वेळ अजून कमी झाला आणि वन डे मॅच आली. आता २०-२० म्हणजे फक्त काही तासच.

पण मजा तेवढीच उत्सुकता तेवढीच आणि कौतूकही तेवढेच. वेळ कमी आहे म्हणून माणसाने आपली करमणूक नाही कमी केली.

अगं आता आपल्या जीवनातील ५० गेली अन ५ राहिली अशी गत असताना चल आपण वेळेशीच २०- २० खेळू.

आमच्यावेळी ५ दिवसाची होती तरी आमच्यावेळीच २०-२० पण आहे. यावेळी आपण जरा वेगळी मजा घेऊ.  वेळेचे चेंडू वेळेवर फ़टकावू, वेळेवर अडवू, वेळेवर झेलू . वेळेवर विकेट जाणारच आहे हे ध्यानात ठेऊन प्रत्येक वेळी मागच्या वेळपेक्षा वेगळ्या खेळाचे प्रदर्शन करू. वेळेला केळ आणि न्याहारीला सिताफळ खात

कोणत्याही वेळी टपकणारा वेळेचा चेंडू अवेळी विकेट न जाऊ देता चौकार षट्कार यांनी टोलवत राहू. वेळ बदलून क्षेत्ररक्षण करायचे तेव्हा दरवेळी चेंडू न आडवता फलंदाजालाच खेळते ठेऊ. वाटले तर तेथे थोडा वेळखाऊपणा पण करू. आपले मस्त वेळ घालवणे पाहून वेळेला रेंगाळायला लावू. आपल्याकडे थोडा वेळ आहे पण मॅच जिंकायचीच आहे म्हणून वेळेचे भान ठेवत ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून एक उनाडवेळ पुन्हा जगू या. वेळेचे भान हरपून आपण वेळेला चकवू या. वाढवेळ खेळात नसतो कधीतरी वेळ संपल्याचे वेळ सांगेलच पण त्यावेळी वेळेलाच नो बॉल म्हणून परत बॉल टाकायला लावू आणि मग त्या वेळेच्या चेंडूला फ्री हिट समजून सीमापार करू आणि नॉट आऊट राहून सामना जिंकू.

खरच वेळ एक फ्री हिट आहे त्याचा लाभ घेऊ.

हे पचवायला जरा वेळ लागेल पण वेळ बदलणे वेळेच्या हातात नाही तर तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ. चल आपण वेळीच हा पायंडा पाडू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द…अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत. हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा ” मुल्यात्मक ” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे.

विज्ञान… एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे, उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की… अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता, भयता, प्रांतीयता, वंशवादता, अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की, मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे, आव्हान आहे आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही…वर्तमानकाळ नाही…अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही. विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हात… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ हात… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला सांगा हात म्हणजे काय? हात तिच्या ••• एवढच?

हात एक अवयव आहे. शरीराचा महत्वाचा भाग आहे.हाताशिवाय काम करू शकत नाही. तरी कामात हात असणे म्हणजे ‘कामात’ हात ••• का कामात ‘हात’ •••हा प्रश्न पडल्याने हातातले काम तसेच राहू शकते.

असो पण आज मी तुम्हाला हाताची गोष्ट सांगणार आहे.

एका गावात एक कष्टाळू माणूस रहात होता. त्याचा हात चांगलाच चालायचा. त्यामुळे त्याच्या कामाच्या गतीसाठी कोणीच त्याचा हात धरू शकत नव्हते. यामुळेच तो आपली कामे तर आटोपायचाच पण सगळ्या गावकर्‍यांना हात द्यायचा.  त्याच्या याच स्वभावा मुळे तो ग्रामप्रमुखाचा उजवा हात बनला. त्याने असा हातात हात दिल्यामुळे ग्रामप्रमुखालाही कोणापुढे हात पसरायची किंवा हात जोडायची वेळच यायची नाही.

परंतु या कष्टाळू माणसाच्या मुलीचा हात एका धनाढ्य माणसाच्या मुलाने मागितला. तेव्हा ग्राम प्रमुखाच्या हातावर तुरी देऊन त्याला हातोहात फसवून स्वत: मुलीचे दोनाचे चार हात करण्यासाठी हातावर पाणी सोडून तिचे कन्यादानही केले.

त्यामुळे त्या ग्राम प्रमुखाचा हात अचानक सोडल्यामुळे हातच मोडला गेला. पण याला धडा शिकवण्यासाठी त्याने तयारी केली. तो म्हटला मी काही हातात बांगड्या भरल्या नाहीत.  मी असा हातावर हात धरूनही बसणार नाही. मी तुझ्याशी चार हात करायला तयार आहे.

या गरीब कष्टाळू माणसाला हात उचलणे शक्य नव्हते. त्याने पुन्हा त्याच्याशी हस्तांदोलन करणेही अशक्य होते. त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. यांच्यात फूट पाडण्याच्या कामात धनाढ्य माणसाचा हात असल्याचे उशीरा कळले.

जणू काही आयुष्याचे पत्ते खेळताना त्या धनाढ्याने याचा हात ओढला होता.

काय नशीबात आहे हे जाणण्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवला. त्याचा हात बघून ज्योतिष्याने मात्र हात साफ केला.त्याच्या भावनांवर हात मारला.

हात उंचावून म्हणाला सारं काही त्याच्या हातात आहे. असे म्हणून हात हलवून तो गेला सुद्धा.

निराश अंत:करणाने तो हात हलवत रिकाम्या हाताने परत आला.

पण म्हणतात ना••• हातच्या कंकणाला आरसा कशाला? तसे ग्राम प्रमुखाला चांगल्या कामाच्या प्रचितीने कष्टाळू माणसाचा हातगुण चांगला असल्याचे लक्षात आले आणि रातोरात या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्याच्याशी हात मिळवणी केली. गावाच्या भल्यासाठी असे करणे त्याच्या हातचा मळच होता.  त्यानंतर मात्र यांचे हात कधी सुटले नाहीत.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 

🌸 विविधा 🌸

☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

स्वतः वर प्रेम करा..

म्हणजे नक्की काय? आणि याचे फायदे काय?

आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे.रंग,रूप,उंची,तब्येत,एकूणच व्यक्तिमत्व यांचा स्वीकार करणे.आपण जरा समाजात बघितले तर बरीच माणसे अशी दिसतात की, आकर्षक अशा बाह्य गोष्टी काहीच नसतात.पण तरीही ती यशस्वी असतात.अगदी बरेच दिव्यांग सुद्धा असे असतात की ते इतरांसाठी काम करतात.मग आपणाच आपल्याला का कमी लेखायचे? या साठी एक उपयुक्त वस्तू आहे. ती प्रत्येक घरात अगदी प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असते.ती म्हणजे आरसा.याचा उपयोग कसा करायचा ते बघू.

मिरर थेरपी

सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःला आरशात बघावे.आणि सुंदर हसून म्हणावे मी स्वतःचा स्वीकार करत आहे.व स्वतःचे आभार मानवेत.ही कृती दिवसातून शक्य असेल तेवढ्या वेळा करावी.या मुळे काय होते? आपले मन स्वतःचा स्वीकार करते.व तसे मनाचे प्रोग्रॅमिंग होते.आणि तशाच सूचना मिळतात. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू लागतो.स्वतःला नावे ठेवणे बंद करतो.आपण बरेचदा दोन चेहरे घेऊन जगत असतो.इतरांसाठी आपला वेगळा चेहरा असतो.आणि स्वतः साठी वेगळा चेहरा असतो.त्या मुळे आपल्यावर ताण येतो. हे कमी करणे आपल्याच हातात असते.स्वतः वर प्रेम करणे व स्वाभिमान,अभिमान वाटणे यात फरक आहे.ज्यावेळी स्वतः वर प्रेम करतो त्यावेळी स्वाभिमान वाटतो.स्वाभिमान वाढला तर त्याचे रूपांतर अभिमान म्हणजे गर्व यात होते.यात खूप पुसट रेघ असते.आपल्याला अभिमान व स्वाभिमान सोडून स्वभान आणायचे आहे. त्या साठी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करावे.

स्वतःवर प्रेम केले की आपण आनंदी होतो.खोटा मुखवटा धारण करत नाही.स्वतः कडे साक्षी भावाने बघायला शिकतो.त्या मुळे स्वतः मधील गुण व दोष लक्षात येतात.एकदा हे लक्षात आले की आपण दोष कमी करू शकतो आणि गुणांची वाढ कशी होईल या कडे लक्ष देऊ लागतो.आणि अशी गुणी आनंदी असणारी व दुसऱ्यांना आनंदी करणारी व्यक्ती सर्वांनाच हवीशी वाटते.इथे आपल्या बाह्य रूपाचा काहीही संबंध उरत नाही.

हे सगळे फक्त एका साध्या गोष्टीमुळे घडते.आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिमोट कंट्रोल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रिमोट कंट्रोल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हा आपल्याला नवीन नाही. आपण सगळेच तो घरात वापरतो. फक्त त्यासाठी आपला टि.व्ही. त्याच्या रेंज मध्ये किंवा तो टी.व्हि.च्या रेंज मध्ये असावा लागतो. आपण हा टि‌.व्ही. समोर धरुनच उपयोगात आणतो. टी.व्ही. च्या मागच्या बाजूस धरुन याचा वापर करतो का?……. तर नाही.

पण एक असा रिमोट कंट्रोल आहे, जो मला समोरुन, बाजूने कंट्रोल तर करतोच, पण घरातील कोणत्याही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो मला कंट्रोल करतो. भिंतीचा अडथळा याला येत नाही. थोडक्यात रेंज म्हणजे सीमा याबाबत याची परिसीमा असते. तो मला कंट्रोल करतो तसेच माझ्या वागण्याबाबत मला ट्रोल देखील करतो. (ड्युअल फंक्शन)

हा चालता, बोलता, फिरता आहे. याचा सेल बदलायची गरज नसते. त्याच्या मनासारखे काही झाले तर तो आपोआपच चार्ज होतो………. आणि झाले नाही तरीही होतो…….. (फक्त फंक्शन मध्ये फरक जाणवतो.) रिमोट कंट्रोल ने आपण टि.व्ही. म्यूट करु शकतो. पण मनासारखे झाले नाही तर हा आपोआप चार्ज होतो तसाच कधी कधी म्यूट देखील होतो. हा एकमेव रिमोट कंट्रोल आहे, जो आपल्याला म्यूट करतोच, पण कधीकधी (म्हणजे बऱ्याचदा) तोच म्यूट होतो. (कारण सांगत नाही, उगाचच त्यावरून का….. रण पेटवायचे?……)

टि.व्ही. च्या रिमोट कंट्रोलवर तुम्हाला कोणतेही हावभाव दिसणार नाहीत. पण माझ्या या रिमोट कंट्रोलच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. (आणि आपल्याला दिसेपर्यंत ते तसेच असतात……. जमतंबुवा काही जणांना.) त्यामुळेच आपल्या बद्दल याच्या मनात सध्या काय भाव आहे? हे काहीवेळा समजते. काहीवेळा आपली ही भाव समजून घेण्याची हाव महागात पडते. (हाव भाव)

टि.व्ही. चा रिमोट कंट्रोल काही वेळा व्यवस्थित काम करत नसेल तर आपण त्यावर हलक्या हाताने किंवा जोरात चापट मारायचा प्रयत्न करतो. पण असा प्रयोग या माझ्या रिमोट कंट्रोलवर सफल होईलच हे सांगता येत नाही. (कारण तो सफल होण्यापेक्षा विफल होण्याची शक्यता जास्त असते. आणि फसणारे प्रयोग करण्यात काय मजा?)

त्याच्या आवाजावरून माझा (घरातला) आवाज कसा असावा हे आता मला आपोआप समजायला लागले आहे. त्याच्या आवाजाच्या चढ उतारावर माझ्या आवाजाची उतार चढ अवलंबून असते.

काय सांगता……… तुमच्या जवळ देखील या प्रकारचा आहे?………. मग जास्त काही सांगावे लागणार नाही. कंपनी वेगळी असली तरी फंक्शन साधारण सारखीच असतात.

आता तो समोरून, बाजूने आपल्याला कसा कंट्रोल करतो हे तुम्हालाही परिचित असेल. हा माझा रिमोट कंट्रोल मागे बसून सुध्दा मला कंट्रोल करतो.

कसा ते सांगतो. आम्ही दुचाकीवर जातांना हा मागे बसलेला असतो. आणि याचा एक हात असतो माझ्या खांद्यावर. मी कुठे बघतोय याचा (अचूक) अंदाज तो मागे बसून देखील घेत असतोच, पण मान डावी उजवीकडे झाली की काहीवेळा यांच्या खांद्यावरील हाताच्या बोटांची हालचाल सुरू होते. आणि त्या बोटांच्या दाबातील फरक जाणवतो. आणि अशा नुसत्या बोटांच्या हालचालींनी तो मागे बसून सुध्दा माझे फंक्शन कंट्रोल करतो. माझे इकडेतिकडे बघण्याने मागे बसून सुध्दा कधी कधी या रिमोट कंट्रोल मधून आवाज देखील येतो. तो आवाज अं, अहं, हं, असा थोडावेळ चालणारा पण मला ऐकू जाईलच इतका मोठा असतो. मग काय…….. नाईलाजाने मी काही वेळ समोर बघतो. बघावच लागतं.

अगोदर तो खांद्यावरचा हात प्रेमळ आधारासाठी असेल असाच माझा (गैर) समज होता. पण आता लक्षात आले तो मला कंट्रोल करण्यासाठी असतो.

एक मात्र खरं, कसाही असला तरी तो जवळ आणि सोबत असावा असे वाटते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाणी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वाणी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल येतांना एक दृश्य बघितले. काही मुलांचे दोन गट आपापसात जोरजोराने वादविवाद करीत होते. नेहमीप्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी,परस्परांवर शाब्दिक चिखलफेक दणक्यात सुरू होती. अर्थातच दोन परस्परांविरोधी गट म्हंटल्यावर आचारविचारांत फरक हा असणारच ,हे आपण नक्कीच समजू शकू,परंतु फक्त मीच योग्य, माझेच बरोबर ही भुमिका कुठेतरी विचारात पाडू लागली.

त्यांचे आरोपप्रत्यारोप बघून,ऐकून एक मात्र नक्कीच लक्षात आलं,संत ,महात्मे,गुरू हे वाणी,वाचा हे दुधारी शस्त्र आहे असं सांगतात, ते। किती अचूक असतं ह्याचा प्रत्यय ते भांडण, वादविवाद ऐकतांना आला. खरंच शब्द हे खूप जपून वापरावेत. एकवेळ मारलेला मार विसरता येतो म्हणतात परंतु शाब्दिक जखमा ह्या कायमचे व्रण ठेऊन जातात.

जर वाणीवर वा वाचेवर आपली स्वतःची कमांड ठेवायची असेल तर त्याची सुरवात आपल्या मेंदूपासून करावी लागते. जर डोकं हे कायम शांत,स्थिर ठेवायची वा मेंदू कधीही बिथरु न देण्याची किमया साधल्या गेली तर आपोआप आपल्या वाचेवर,मनावर,ह्याचा पगडा बसतो आणि मग आपल्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा खूप तोलूनमापून, विचारपूर्वक बाहेर पडतो.ही सगळी शक्ती संयमामध्ये एकवटलेली असते. स्वतःचे लगाम स्वतःच्या पूर्ण कंट्रोल मध्ये असले की अर्धी लढाई आपण तेथेच जिंकलेलो असतो.

ह्या सगळ्यामुळे खरंच जाणवतं की माझ्या वर त्या शांत शिवशंभुचीच कृपा मला शक्यतोवर कधीच,कुणाचाच, कशाचाच राग येत नाही आणि त्यामुळेच मेंदू कायम शांत राहून आपल्याकडून काही उणेदुणे दुखविणारे शब्द बाहेर पडतील ही भिती मला नसतेच. माझ्या एका मैत्रीणीने मला छान प्रश्न विचारला, आपला काही दोष नसतांना कुणी तुझ्या वर दोषारोप केले,तुझ्यावर ताशेरे ओढले तर तुला खरंच राग नाही येणार. मी उत्तरले, राग नाही येणार, वाईट मात्र वाटेल पण लगेच माझ्या लक्षात येईल आपली पात्रता,योग्यता आपणच ठरवायची,आपलं मनं हे आपल्याशी कायम खरं बोलत असतं.एकदा हे नीट समजून घेतलं तर पुढील सगळं सोप्पं होत जातं. वामनराव पै म्हणतात तसं “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

ह्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी राजकारणातील व्यक्तींकडून झाडल्या की तो कळस गाठतो. त्यांची घटके घटकेला बदलणारी मैत्री वा वैर,त्यांची ह्या बोटावरुन ह्या बोटावर बदलणा-या थुंकीसारखे विचार,मतं ह्याने तर आश्चर्यचकीतच व्हायला होतं.सरड्याहूनही फास्ट  घडोघडी रंग बदलण्याची क्षमता ही खास राजकारणाच्या आखाड्यात बघायला मिळते.असो

काल बघितलेले भांडण हे मित्रांचे पेल्यातच जिरणारं भांडण असतं हे ही खरच त्यामुळे आपल्या क्षणिक रागामुळे आणि त्यानंतर सुटलेल्या वाचेमुळे मैत्र गमावल्या जायला नको.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ नवरसांपैकी एक शांत रस ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणारे नवरस म्हणजे एक “अनमोल देणगी” रूपांत आपणास देवाने देऊ केलेला खजिनाच आहे. त्यातील कोणता रस कोठे आहे, व तो कसा जाणावा हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार, आवडीनुसार, जो तो आपले कर्म आनंद मिळवण्यासाठी करीत असतो. मनात ज्या प्रकारचे विचार निर्माण होतात, त्याप्रमाणेच भावभावनांमध्ये हे विविध रस दिसून येतात.”भूप रूप गंभीर शांत रस” हे भूप रागाची ओळख सांगणारे गीत शिकताना शांत रस याचा अर्थ बालवयात नीटसा कळलाच नव्हता. पण जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकू लागले, तेव्हा  मिळणाऱ्या एकांतात शांत रस समजू लागला. मला वाटते शांत रस व एकांत यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते आहे. एकांतात नेहमीच तुम्ही हा शांत रसाचे अनुभूती घेऊ शकता. मग कुठेही मिळणारा एकांत असो, अगदी आनंदाच्या प्रसंगी व दुःखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेत शांत रसाची भेट होतेच होते. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, तर कुठेही एकांतात मिळणारी शांत रसातील शक्ती तुम्हाला खूप काही देऊन जाते. अगदी जंगल भटकंती करत असाल, तर एखाद्या ठिकाणी थोडे शांत व स्तब्ध उभे रहा. जंगलातील ती निरव शांतता तुम्हाला विश्वरूप दर्शनासाठी नक्की सहाय्य करेल. नदीकिनारी शांत बसून नुसते पाण्यावर उठणारे तरंग पाहताना देखील, शांत रस अनुभवता येईल. किंवा एखाद्या डोंगर माथ्यावर थोडा विसावा घेताना, एकांतात शांत रसाचे अनुभूती आल्या वाचून राहणार नाही. देवाच्या गाभाऱ्यात समईतील ज्योत शांत रसाची जाणीव करून देते. उत्कट प्रेमळ क्षणांत ही, शांत रस अनुभवता येतो. मनातील व्याकुळता, विरह, दुःख हे सुद्धा कित्येकदा शांत रसामुळे निभावता येते. तन्मयतेने चैतन्य अनुभवता येते. तेथेही शांत रस उपयोगी ठरतो. शांत रसामुळे एकरूपता साधता येते. अहंकार गळून पडतो. व पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो. निर्मळता आवडू लागते. शांत रसात सर्व संकटे, दुःख, नष्ट करण्याची ताकद मिळवता येते. परमेश्वराशी अनुसंधान साधता येते. म्हणूनच ध्यान धारणेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. ती अंगिकारता आली तर, आपली सद्सत विवेक बुद्धी नेहमीच जागृत राहते. आणि नकळत होणाऱ्या चुका टाळता येणं शक्य होते. म्हणूनच हे जीवन समृद्ध होताना, शांत रसाची अनुभूती घेणे गरजेचे होईल.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर ☆

? विविधा ?

☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर 

पिंपळ एकटा उभा

आप्पाजी गेले तेव्हा मी आठ नऊ वर्षांचा असेल ..त्यांच्या जाण्याच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यांनी मातीच्या मोठ्या भांड्यात लावलेला पिंपळ त्यांच्याशिवाय पोरका उभा होता. दर दिवशी मध्यान्ही ते त्याची तांब्याच्या छोट्या गडूतून बुडाशी पाणी ओतून पूजा करायचे.आप्पाजी गेल्यानंतर त्याला पोरकेपणाचे चटके बसायला लागले. त्याचा पुरुष भरा पेक्षाही उंच असलेला देह मलूलपणे उभा होता. मातीच्या भांड्यातील माती सुकत चालली होती. शेवटी वडिलांनी त्याला घराबाहेर लावायचे ठरवले. घराच्या मागच्या भागात असलेल्या मारुतीच्या देवळा समोर लावावे असे मी सुचवले. देवळाच्या बाजूला विहीर होती विहिरीच्या खालच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तीन हात खोल खड्डा खणला. मातीच्या भांड्यासह पिंपळाचे झाड उचलून त्या खड्ड्याजवळ आणले. भोवतालचे मातीचे भांडे फोडताच मातीत एकजीव झालेली एकमेकांना घट्ट धरून गुंतून असणारी त्याची मुळे मोकळी झाली. त्याला तसेच त्या खड्ड्यात सोडले आणि स्थानांतर होऊन एका जागी तो स्थिर झाला .

खड्ड्यात अजून थोडी माती ढकलली. त्याच्या खोडाभोवती वर्तुळाकृती छोटी नाली खोदली. विहिरीवर बाया सकाळ-संध्याकाळ पाणी भरायच्या. विहिरी भोवती पाणी सांडायचे .

विहिरीच्या उतारावरून एक छोटी नाली काढून पिंपळाच्या आळाशी जोडली. विहिरीच्या काठावर सांडलं उबडलं पाणी नालीतून थेट पिंपळाच्या आळ्यात पोहोचायचं.  पिंपळाचे खोड हाताच्या मुठीत मावेल एवढे होते. त्याला गाय-बैल या कोणत्याही प्राण्याने अंग घासले तर मोडून जाईल या चिंतेनं त्याच्याभोवती बोराटीच्या काट्यांचे कुंपण केले. आता जोमाने वाढेल. आपल्यासोबत त्याची वाढही अनुभवता येईल…

 त्याची वाढ अनुभवताना आपल्या बालवयाची किती वर्षे उलटून गेली कळलंच नाही.

आता त्याचे खोड दोन्ही हातांच्या पंजात मावण्यापेक्षाही मोठे झाले होते .त्याने आपली जागा कोणत्याही संरक्षणाशिवाय पक्की केली होती. काट्यांच्या बाह्य कुंपणाची गरजच नव्हती .

या आठ वर्षात विहिरही खोल  गेली होती. आटत चालली होती .तिथे पाणी भरणाऱ्या बाया हातपंपा कडे वळल्या होत्या …त्याची मुळे खोलखोल गेली होती. आता त्याला बाहेरून मिळणाऱ्या पाण्याची गरज नव्हती. तो खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाला होता. त्यामुळे मीही निश्चिंत झालो होतो. तो सर्वांगानं फुलत होता .त्याच्या या फुलत्या वयात आपलेही फुलते वय मिसळत होते. त्याच्या उमलत्या तांबूस कोवळ्या पानांची लव वात्सल्य जाणीव फुलवत होती. कालांतराने पाने पोपटी होत गडद हिरवी होऊन सळसळत होती .त्या सळसळण्यातून आपण कितीदा मावळणारा चंद्र अनुभवला,कितीदा सूर्यास्त  अनुभवला..त्याच्यापाठीमागे उमटलेले

 सूर्यास्ताची फिके केशरी रंग गडद होई पर्यंत त्याचे सळसळणे अनुभवलेले.. बाल रंगात रंगविलेल्या चित्रांच्या जीर्ण कागदी स्मृतींच्या रंगछटा अजूनही जपून ठेवल्या आहेत.. आपण त्याच्यासोबत एकांत घालवलेले कितीतरी क्षण अंतर्मनाच्या तळ कप्प्यात साठवून ठेवले आहेत…..

…शेती माती जगवण्यास असमर्थ ठरली.. त्यामुळे पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागले ..

दररोजची त्याची भेट दोन तीन महिन्यांवर गेली. गावाला आलो की त्याला भेटल्याशिवाय आपली भेटच पूर्ण व्हायची नाही.  घरासमोरच बाभूळबन, वाहणारी  रायघोळ माय आणि आपला पिंपळ हेच खऱ्या अर्थाने आपलं जैव कुटुंब होतं बालपणात .त्यांची उराउरी भेट झाल्याशिवाय समाधान होत नव्हतं .त्यांच्या भेटीचा गंध उरात भरून पुढचे दोन-तीन महिने काढता यायचे .

पुढे पुढे बाभूळबन ,नदी यांच्या भेटीत त्रयस्थता जाणवायला लागली ..

त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची उदासीनता दिसायला लागली ..

ते पहिल्यासारखं मन उघडे करून वागत नव्हते. घर ही आपले खांदे पाडून बसलं होतं. त्याला कितीही डागडुजी केली तरी पहिल्यासारखं खुलत नव्हतं. पिंपळाचे मात्र तसे नव्हते, तो नव्या झळाळीने सळाळत होता. त्याची सळसळती  भेट आपलं बालवय जागवून तीच सळसळ निर्माण करीत होती. आता त्याच्या खोडाने हाताच्या मिठी इतका आकार धारण केला होता. एका हाताच्या मुठीत मावणारा त्याचा आकार आणि आताचा ही त्याची वाढ स्तिमित करणारी होती .आपण त्याला घट्ट मिठी मारून कितीतरी वेळ बिलगलेलो.. त्याच्या खोडावर डोकं टेकवून त्याची सळसळ अनुभवलेली. पश्चिमेचे क्षितीज तेच आणि मावळणारा चंद्रही तोच .बाकी सर्व बदलत गेले. पिंपळ ,क्षितिज आणि चंद्र मात्र आपल्या अवस्थेत कायम असलेले .काहीही न बोलता त्याचा माझा संवाद सुरू व्हायचा …

……..गावावरून कोणी आलं की,आपली पिंपळाची चौकशी ठरलेली…

 नेहमीप्रमाणे भावाकडे पिंपळा बद्दल बोलायला लागलो.. तेव्हा तो काही वेळ स्तब्ध राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याला पुन्हा विचारलं, त्यांनं जे सांगितलं ते ऐकून खूपच हादरलो ..शक्तिपात झाल्यासारखं वाटायला लागलं. पिंपळा शेजारी राहणाऱ्याने पिंपळाला मुळापासून तोडले होते. बालपणापासूनचा माझा जीवसखा एका मूर्ख माणसाच्या क्रूर कुर्‍हाडीचे घाव झेलून उन्मळला होता …..

आता गावात कसे जावे.. असे किती दिवस सुन्न गेले आपले ..

मोठा धीर धरून आपण गावात गेलेलो… घरा मागचे दार उघडून  पिंपळाच्या जागेकडे पाहिले .बुडापाशी बुंध्याची  निर्जीव खूण शिल्लक फक्त.. दार बंद केले डोळे डबडबले ..

 

त्याने पिंपळावर नाही घाव घातला.. आपल्या बालपणावर घातला….

ही तीव्र भळभळती जाणीव ओघळायला लागली..

आता गावात काय उरले..

बाभुळबनाची अनोळखी तिसरी पिढी  म्हातारपण भोगत उभी आहे ,ती आपल्याला ओळखत नाही. वाहणार्‍या रायघोळ नदीमायचे  रूप स्मृतिभ्रंश झालेल्या म्हातारी सारखे झालेले आहे ..

भावकीत घर ही हरवलं . गावात आता आपल्यासाठी उरलंच काय ही जाणीव देह मनाला कुरतडत राहते.

 

© श्री सुनील यावलीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ शब्द… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।

शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।

तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा।।

किंवा एके ठिकाणी ते असेही म्हणतात•••

घासावा शब्द | तासावा शब्द |

तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||

शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा

बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |

स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |

शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

– संत तुकाराम महाराज

तशी शब्दांची महती ही शब्दातीत आहे.  पण मला याठिकाणी शब्दाची  एक व्याख्या सांगावीशी वाटते, दोन किंवा अधिक अक्षरे जोडल्याने त्या अक्षरांना मिळालेला अर्थ म्हणजे शब्द.

मग शब्दाचा हा अर्थ असला तरी या शब्दाचा अर्थ त्याला क्रियापद जोडल्याने बदलतो. यासाठी एक प्रसंग  वर्णन करते.

कॉलेजातील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे आणि केव्हा पडले हे त्यांनाच कळले नाही . लग्नाचा विषय येताच तो म्हणाला मी तुला शब्द देतो   की मी माझ्या पायावर व्यवस्थित उभा राहिलो की तुझ्याशीच लग्न करेन. ती म्हटली मी हा शब्द घेते पण तू तुझा शब्द नक्की पाळशील ना?

तो म्हणाला मी आमच्या अण्णांचा शब्द मानतो. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. गावातही त्याच्या शब्दाचे वजन पडते त्यामुळे त्यांनी हो म्हटले की लगेच मी शब्द प्रमाण मानून तुझ्याकडे येणारच .

ती म्हणाली ए तू उगाच शब्दात अडकवू नकोस हां !! नंतर म्हणशील मी शब्द टाकला पण त्यांनी नाही माझा शब्द झेलला त्यामुळे माझा शब्द चालला नाही. असा तुझा शब्दाघात मी सहन नाही करू शकणार. तुला तुझ्या शब्दांची किमया तुझ्या अण्णांवर करावीच लागेल. तुला तुझा शब्द फिरवता येणार नाही. तू म्हणशील मी शब्द मागे घेतो पण शब्दांचा असा महाल बांधून माझा शब्द तुला तुडवता येणार नाही.

तो म्हणाला अगं वेडे तुझ्यावर उधळलेला शब्द  म्हणजे शब्दांची पेरणी करून शब्दांचे फळ मिळेपर्यंतच्या प्रक्रीयेचा आनंदोत्सव आहे.  मग उगीच शब्दाने शब्द कशाला वाढवायचा ?  त्यापेक्षा शब्द तोलूया. तू आणि मी शब्दजोडून आपण होऊया. या शब्दाची कधीच फोड नाही होणार  ही खात्री बाळगूया. आणि नि:संदेह होऊन म्हणू•••

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले.

असेच शब्दांसोबत हसता, खेळता, बोलता, चालता, रूसता, प्रेमात पडता, लिहिता, वाचता अनुभवूया शब्दांचा लळा.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print