मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ मे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते प्रसंग माझ्या मनात ताजे आहेत!)

ताई गेली ते विरहाच्या दुःखाबरोबरच गजानन महाराजांच्या सांत्वन करणाऱ्या आशीर्वादांचं अमूल्य दान आम्हा सर्वांच्या असं स्वाधीन करून! पण तरीही त्या क्षणापासून माझ्या मनाला मात्र एक रूखरूख लागून राहिली होती. काही केल्या तो सल कमी होत नव्हता. होय. अज्ञान आणि अहंकारापोटी माझ्या हातून गजानन महाराजांचा अक्षम्य अनादर झाल्याची ती बोच होती. ताई गेल्याच्या हतबल करणाऱ्या दु:खाच्या पार्श्वभूमीवर तर ती मला अधिकच बोचरी वाटत होती!

“कोण गं हे गजानन महाराज?” असं मी ताईला विचारलं होतं ती गोष्ट ताई आजारी पडण्यापूर्वीच्या कितीतरी वर्षं आधीची. त्यामुळे एरवी त्याचा ताईच्या आजारपणाशी आणि जाण्याशी तसा अर्थाअर्थी कांही संबंध जोडावा असं वाटलंही नसतं. पण गजानन महाराजांवरील अतूट श्रध्देपोटी, ताईनं स्वतःचा काडीमात्रही स्वार्थ नसलेलं असं पोटतिडकीनं त्यांच्याकडे कांहीतरी मागणं, केवळ आपल्या पश्चात आपल्या आजारपणामुळे नवऱ्याला सगळं कांही हरवून गेलेल्या निष्कांचन अवस्थेत परावलंबी आयुष्य जगण्याची वेळ येणाराय या कल्पनेने असहाय्य अशा मनोवस्थेत मनाला त्रास देत राहिलेली स्वत:ची ही कैफियत तिने बिनतोडपणे महाराजांपुढं मांडणं, आणि मुख्य म्हणजे त्याबदल्यात स्वतःचे भोग आणि असह्य वेदना आतल्याआत सहन करण्याची तयारी तिने दाखवणं आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीही तिला जे हवं ते असं राजमार्गानं तत्काळ देणं हे सगळंच मला हलवून जागं करणारंच ठरलं होतं. ताईला ‘कोण गं हे गजानन महाराज?’ असं मी विचारणं हे कुतुहलापोटी नव्हतं यांची बोचरी जाणीव मला ताई गेल्यानंतरच्या त्या अस्वस्थ मन:स्थितीतच झाली आणि सतत टोचतही राहिली. माझं विचारणं कुतूहलापोटी नव्हतंच. ताई माझ्याकडे दुर्लक्ष करून खूप वेळ ती पोथी वाचत बसली होती या रागापोटी आणि शिवाय ‘पूर्वापार आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा मार्ग सोडून ही अशी पोथी तिने कां वाचावी?’ या नकारात्मक विचारामुळे नकळत मनात उभारलेल्या अहंकारापोटीच मी तिला उपहासाने ‘ कोण गं हे गजानन महाराज?’ हा उर्मट प्रश्न विचारलेला होता. हेच जर केवळ अज्ञानापोटी, कांही नवीन जाणून घ्यायच्या उद्देशाने मी विचारलं असतं तर ताईने तेव्हाच मला खूप छान समजावून सांगितलं असतं. पण तो आनंद माझ्या नशिबात नव्हता हेच खरं. माझ्या विचारण्याचा रोख तिच्या लक्षात आला तेव्हा ती कांहीशा नाराजीनेच माझ्याकडे पाहून फक्त एकच वाक्य बोलली होती. ‘तू स्वतःच ही पोथी वाच एकदा, म्हणजे तुला समजेल हे गजानन महाराज कोण ते. ‘ ती म्हणाली होती !

ताई गेली आणि हा सगळा भूतकाळ आठवून मी स्वत:लाच कोसत राहिलो. माझ्या मनातला तो अहंकाराचा कणभर काटा मी अलगद उपटून फेकून दिला, तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अगदी ‘ती पोथी खरंच एकदा तरी वाचायलाच हवी’ असं मला उत्कटतेने वाटलं तरी त्यानंतरही माझं मन स्वस्थ नव्हतंच. ‘आपण स्वत: शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं, स्वत:ची चूक कबूल करून त्यांची क्षमा मागायची ‘, असं तीव्रतेने मनात आलं खरं पण ते तातडीने अंमलात आणणं जमणार नव्हतंच. कारण ताईच्या आजारपणात सलग बरेच दिवस मी रजेवर होतो. आता याक्षणी कर्तव्याला प्राधान्य देऊन लगोलग ऑफीस-ड्युटीवर हजर होणंच गरजेचं होतं. अर्थात मी हाच निर्णय अंमलात आणला खरा पण तो मात्र मनोमन गजानन महाराजांना साक्षी ठेवूनच. त्या रात्री मी देवापुढे बसून डोळे मिटले. हात जोडून महाराजांना प्रार्थना केली. मी तोवर कधी त्यांचा फोटोही पाहिलेला नव्हता. त्यामुळे मिटल्या नजरेसमोर महाराजांचं मूर्तरूपही नव्हतंच. त्यांच्या नावाच्या रूपातलं अमूर्त रूप होतं ते फक्त माझ्या अस्वस्थ अंत:करणात!

‘मला शेगावला येऊन आपलं दर्शन घ्यायचंय. अनवधानानं कां होईना माझ्या हातून घडलेल्या आपल्या अनादराबद्दल मला तिथं येऊन मनःपूर्वक आपली क्षमा मागायचीय. माझ्या हातून अल्पशी कां होईना आपली सेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. आपला आशीर्वाद असू दे. ‘

मी मनोमन अशी प्रार्थना केली तेव्हा कुठे मनातली रूखरूख थोडी कमी झाली.

त्या क्षणी मला हे माहितही नव्हतं की अचानक एखादं अस्मानी संकट यावं तशा अनेक अनपेक्षित घटना माझ्या सरळरेषेतल्या सुरळीत अशा बॅंकेतल्या नोकरीमधल्या तोवरच्या माझ्या दिनक्रमात अनेक अडथळे निर्माण करणार आहेत! आश्चर्य म्हणजे याचा प्रत्यय मला रजा संपून ऑफिसमधे जॉईन होताच लगेचच आला!

तेव्हा मी ऑडिट डिपार्टमेंटला होतो. ताईचं

दिवस-कार्य संपवून मी कामावर रुजू झालो त्याच दिवशी अहमदनगर ब्रॅंचमधे माझी ट्रान्सफर झाल्याचं आदेश-पत्र माझ्या हातात पडलं! तोवर सुरळीत चालू असलेल्या माझ्या रुटीनचा विचार केला तर त्याला अचानक मिळालेलं हे वळण माझ्यासाठी अनपेक्षित आणि कांहीसं अडचणीचंच ठरणारं होतं. अर्थात ऑडिट डिपार्टमेंटमधला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ उलटून गेलेला असल्याने तिथून बदली होणार होतीच पण ती इतक्या तातडीने आणि तेही अहमदनगरला होणं हे माझ्यासाठी फारच गैरसोयीचं ठरणार होतं. अर्थात रूटीनचाच हा एक अपरिहार्य भाग म्हणून ते स्विकारणंच आवश्यक होतं!

मी नगरला लगेचच जॉईन झालो आणि पहिल्याच दिवसापासून तिथे साचून राहिलेल्या पेंडिंग कामांच्या व्यापात गुंतून गेलो. पहिले मॅनेजर मी येण्यापूर्वी पंधरा दिवस आधीच अकौंटंटकडे चार्ज देऊन रिलिव्ह झालेले होते. त्यामुळे ब्रॅंचचं संपूर्ण काम विस्कळीत होऊन गेलेलं होतं. ते पंधरा दिवस श्वास घ्यायलाही फुरसत न मिळालेल्या अकौंटंटने मला पहाताच सुटकेच्या निश्वास सोडला आणि त्याच क्षणापासून माझी मात्र घुसमट सुरू झाली!

ताई गेल्याचं दु:ख मनात कोंडून तिथल्या नवीन चक्रांत अक्षरशः भिरभिरत राहिलो. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसायलाच दोन तीन आठवडे उलटून जावे लागले. तोवर बाहेरचं जेवण, रात्रीची जागरणं, दिवसभरातली बँकेतल्या कामाची गडबड यातून घरगुती जेवणाची सोय बघायला थोडीही उसंत मिळाली नाही. नंतर तिथल्याच आमच्या एका स्टाफच्या ओळखीने घरगुती जेवणाचे डबे देणाऱ्या एका गरजू कुटुंबात माझी दोन्ही वेळच्या ताज्या जेवणाची अखेर सोय झाली. ही माझ्यासाठी एक सुखद घटनाच होती. त्या रात्री मी अंथरूणाला पाठ टेकली तो खूप दिवसांनंतर मला लाभलेला एक शांत, निवांत क्षण होता! त्या क्षणी ‘ शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागण्याचा ‘ बरेच दिवस मनाच्या तळांत पडून राहिलेला विचार झेपावत वर आला. या विचाराचा स्पर्श झाला आणि कांहीतरी राहून गेल्याची रूखरूख मन अस्वस्थ करू लागली. अर्थात माझी इच्छा कितीही तीव्र असली, तरी माझी दैनंदिन कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांनाच प्राधान्य देणं सध्या आवश्यक आहे हे मीच मला समजावलं. ‘याबाबतीत जे करायचं ते महाराजच करून घेतील’ हा विश्वासच मनातला अंधार नाहीसा करणारा ठरला.

माझी जिथे घरगुती जेवणाची झालेली होती ते घर आणि त्या घराशी माझे जुळलेले भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्याक्षणी तरी मला कल्पना नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “विज्ञान आणि तत्त्वज्ञान…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विज्ञान आणि तत्त्वज्ञान…☆ श्री जगदीश काबरे ☆

विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे नाते परस्परावलंबी आहे, पण विज्ञान हे तत्त्वज्ञान होऊ शकते का? हा प्रश्न खोलात जाऊन विचार करण्यासारखा आहे. कारण विज्ञान आणि तत्त्वज्ञानात सूक्ष्म फरक आहे. तो असा…

1) विज्ञान अनुभवाधारित आहे; ते निरीक्षण, प्रयोग आणि पडताळणी आणि कारणमिमांसेवर आधारलेले असते.

… तर तत्त्वज्ञान तर्कशक्ती आणि संकल्पनात्मक विश्लेषणावर अवलंबून असते.

2) विज्ञान निसर्गाच्या नियमांना उलगडण्याचा प्रयत्न करते. (उदाहरणार्थ, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र).

… तर तत्त्वज्ञान सत्य, अस्तित्व, नैतिकता आणि ज्ञानाच्या मर्यादा तपासते. (उदाहरणार्थ, तत्वज्ञानातील ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, अस्तित्ववाद).

3) विज्ञानात गृहीतकाची सिद्धता आणि गृहीतकाला खोडून काढण्याची प्रक्रिया असते.

… तर तत्त्वज्ञानात विचारप्रणाली आणि संकल्पनांच्या वैधतेची चर्चा होते.

4) विज्ञान नवीन अनुभवसिद्ध ज्ञान निर्माण करते.

…. तर तत्त्वज्ञान हे कल्पनांचे विश्लेषण करते.

5) विज्ञानाचा पाया तत्त्वज्ञान असते. कारण विज्ञानातील मूलभूत प्रश्न तत्त्वज्ञानानेच निर्माण केले आहेत. वैज्ञानिक संशोधनाची दिशा तत्त्वज्ञानाच्या विचारांवर आधारित असते. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यांतील काही संकल्पना (जसे की सापेक्षता, क्वांटम यांत्रिकीतील बहुविश्व सिद्धांत) या तत्त्वज्ञानाच्या मर्यादेत येतात.

6) विज्ञानाच्या यशस्वीतेचा आधार प्रायोगिक तपासणीवर आहे, जो तत्त्वज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळा आहे. कारण विज्ञानाच्या प्रक्रियेत “तत्त्वज्ञानासारखा शुद्ध तर्क आणि अनुमान” पुरेसा नसतो; त्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग महत्त्वाचे असतात.

म्हणून विज्ञान हे स्वतः तत्त्वज्ञान नसले तरी त्याचे मूळ तत्त्वज्ञानात आहे आणि तत्त्वज्ञानाशिवाय विज्ञानाचा विकास शक्य नाही. त्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे स्वतंत्र असले तरी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पाहिले -. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे

नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.) – आता इथून पुढे — 

मुंबई हे रोजी रोटी देणारं शहर. त्यामुळे जो उठतो, तो काम मिळवण्यासाठी मुंबईकडे धाव घेतो. त्यामुळे तिथे लोकांची गर्दीच गर्दी. लोकसंख्या वाढली, म्हणून जमीन काही वाढत नाही. मग समुद्र हटवून, तिथल्या दलदलीचा निचरा करून जमीन तयार केली जाते. त्यात या तयार केलेल्या जमिनीवर बंगले, इमारती, बागा, तळी वगैरे तयार केली जातात. लोकांची राहायची सोय होते. उदाहरण द्यायचं झालं, तर अंधेरीच्या पश्चिमेस`स्वामी समर्थ नगराचे देता येईल. या भागाचं व्यवहारात परिचित असलेलं नाव म्हणजे लोखंडवाला कॉम्पेक्स. सुरुवातीला दलदल आणि खारफुटी जंगल असलेला भाग नंतर विकसित केला गेला. या भागात राहणार्‍या लोकांना आपण पॉश एरियात राहतो, याचा अभिमान आहे, पण हा एरिया पॉश होत असताना, दलदल नष्ट केली गेली. त्या प्रदेशातील कांदळी किंवा खारफुटीची जंगल नष्ट झाली. तिथलं शैवाल नष्ट झालं. खारफुटीच्या जंगलात भरपूर जीव जगतात. तिथे अंडी घालण्यासाठी मासे तसेच इतरही अनेक जलचर येत असतात. या खारफुटीच्या जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड झालेली आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे खारफुटीवर विपरित परिणाम होत असतो. समुद्राच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रवाळांच्या वसाहती (कोरल्स) नष्ट होणे. या वसाहती असख्य जिवांना आसरा देतात. अन्न पुरवतात. पण त्या अतिशय संवेदनाशील असल्याने प्रदूषण वाढले, की त्या नष्ट होतात. या वसाहतींमध्ये जगातील सर्वाधिक जैव विविधता बघायला मिळते. त्या नष्ट होणे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. म्हणून इकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.

खारफुटी जंगलाचं आणखीही एका दृष्टीने महत्व आहे. त्यामुळे वादळ आणि मोठ्या सागरी लाटांची तीव्रता कमी होते. हे जंगल सागरी लाटा आणि वारे यांच्यामुळे होणारी किनार्‍याची धूप कमी करण्यास मदत करते. जमिनीवरून समुद्रात काही प्रदूषके मिसळत असतात. त्यातील गाळ आणि जड धातू खारफुटी जंगलांमुळे गाळले जातात आणि त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते. किनार्‍यावरील प्रवाळांच्या अस्तित्वाकरताही कांदळ वनांची नितांत आवश्यकता आहे.

मुंबईत आणि ठाणे, बेलापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ इ. अनेक ठिकाणी आपल्याला खारफुटीची जंगलं नाहीशी करून त्या त्या भागाचा विकास करताना पर्यावरणाचा र्‍हास झालेला दिसेल. या भागात खूपच कारखाने आहेत. सागराजवळ कारखाना उभा राहतो. त्यातून गरम पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे तिथल्या पाण्याच्या नैसर्गिक तापमानात बदल होतो. यामुळे शैवाल कमी होते. त्यामुळे पूर्वीचे मासे, झिंगे, खेकडे स्थलांतर करतात. कारखान्यात तयार होणारे प्रदूषित घटक, प्रदूषित पाणी अखेर समुद्रात (जिथे समुद्र नसेल, तिथे नदीत) सोडले जाते. यामुळेही समुद्राचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे जलजीवांची मोठ्या प्रमाणावरहानी झाली आहे. अजूनही होते आहे. समुद्रातील कचराकुंडीमुळे आणि तिथले पाणी प्रदूषित झाल्यामुळे त्या भागातील कासवं, मासे मृत झालेली आणि भरतीच्या पाण्याबरोबर किनारपट्टीवर येऊन पडलेली आपण सातत्याने वर्तमानपत्रातून वाचतो. टी. व्ही. वरही बघतो.

साधारण ७०च्या सुमाराला मला वरळीला १५-२० दिवस राहावे लागले. वरळीचा समुद्र किनारा खडकाळ. किनार्‍यावरून खडकावर जाऊन बसायचं. समोरचा मोकळा, निळाईचा समुद्र. दूरवर बोटी. समुद्रावरून येणारा गार वारा. मन प्रसन्न व्हायच़ पुढे दहा एक वर्षानंतर आणि नंतरही थोड्या थोड्या अंतराने जेव्हा जेव्हा तिथे गेले, तेव्हा तेव्हा पाण्याची निळाई काळिम्यात बदलत चाललेली जाणवली. त्यात कचरा वाढत चालल्याचं जाणवलं. वार्‍याबरोबर दुर्गंधही येऊ लागला. पाण्यात पाय बुडवणं, हात घालणं, या गोष्टी नकोशाच वाटू लागल्या.

वरळीला आता संरक्षक भिंत बांधलेली आहे. पण त्यावर बसलं, तर आधी दिसतो कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या. मोठेमोठे प्लॅस्टिक आणि कापड-किंतानांचे तुकडे, बाटल्या, अनेक प्रकारचं भंगार आणि असंच घाण-साण. या कचराकुंडीचं आधी दर्शन घ्यायचं आणि नंतर मान उचलून समुद्राकडे पाह्यचं. ही स्थिती काही केवळ वरळीच्या समुद्राचीच नाही, मुंबईतील अनेक समुद्र किनारे असे प्रदूषित आहेत. मुंबई, ठाणे कोणत्याही समुद्रावर गेलं, तर अलिकडे सगळीकडे समुद्राच्या स्वच्छ निळ्या पाण्याऐवजी काळे पडलेले व त्यात कचरा साठलेले पाणी दिसते. त्याचा घाण वासही येतो. पाण्याला हातही लावावासा वाटत नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईसारख्या महानगरीत निर्माण होणारे सांडपाणी व मैलापाणी. या पाण्यापैकी काही पाण्यावर प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाते, पण बाकीचे बरेचसे पाणी तसेच समुद्राला मिळते.

डॉ. प्रकाश जोशी यांचं रमणीय सागर किनारे हे पुस्तक २०११साली प्रकाशित झालं. त्याच्या आधी दोन-तीन वर्षाचं त्यांचं निरीक्षण. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `लोकसंख्या वाढ, पर्यटक वाढ, सांडपाणी, रासायनिक कारखाने, खाणकाम, वाळू उत्खनन, नवी बंदरं अशा बाबी म्हणजे एकूणच`विकास प्रक्रिया, भारतीय सागर किनार्‍यांच्या पर्यावरण विनाशास कारणीभूत ठरल्या. सागरातील जीवसृष्टी मुख्यत: सूक्ष्म अशा प्लँट तसंच शैवाल जातीच्या वनस्पतींवर अवलंबून असते. रासायनिक प्रदूषणामुळे या वनस्पतींना पोषक अशा सोडियम, पोटॅशियम, कॅलशियम, हायड्रोकार्बन्स, हरित द्रव्य आदि घटकांचं संतुलन बिघडतं. ’

आपल्या कोकण आणि गुजराथच्या किनारपट्ट्या रासायनिक प्रदूषणाच्या बळी ठरल्या आहेत. खाणकाम आणि पर्यटनाच्या अतिरेकापुढे गोव्यानं पर्यावरणाची पर्वा केली नाही. नव्या बंदरांच्या हव्यासापायी गुजरातनं आपल्या किनार्‍यांचं स्वास्थ्य बिघडवलं. पूर्व किनार्‍याच्या काही भागाला डेझर्टेशनचा धोका आहे. पूर्व किनार्‍याला रासायनिक प्रदूषणाची फारशी बाधा पोचलेली नाही. आंध्र प्रदेशातील नेल्लोर तथा तामिळनाडूच्या तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या किनारी भागात, किनार्‍याकाठी कृत्रीम तळी बनवून त्यात कोळंबीची पैदास केली जायची. त्यामुळे अनेक खेड्यातील विहिरी, नाले इ. जलस्त्रोत दूषित झाले. खारट झाले. अनेक खेड्यांचं टँकर्सच्या पाण्यावरचं अवलंबित्व वाढलं. अशा अनेक गोष्टी केवळ एका बदलामुळे घडू लागतात. यामुळेच पर्यावरणातील विविध घटकांचे संबंध फार महत्वाचे असतात. आपण आपल्या फायद्यासाठी बर्‍याचदा पर्यावरणातील एखाद्या घटकाची हानी करतो, पण त्यावेळी पर्यावरणातील इतर घटकांची आपल्या नकळत हानी होत असते.

या सार्‍या विवेचनाचा अर्थ विकासच नको. आपण गुहामानवाच्या काळातलं जीवन जगायला हवं, असा मुळीच नाही. विकास करताना पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, हे बघायला हवं, एवढाच याचा अर्थ आहे. पर्यावरणातील एखाद्या घटकाची आपण हानी करतो, याची आपल्याला जाणीव असते, पण त्याचवेळी अजाणतेपणे इतर अनेक घटकांची हानी होते, याची आपल्याला कल्पना नसते. जमीन विकासासाठी खारफुटीचं जंगल तोडताना, त्यातील कांदळीसारख्या वनस्पती, लहान झाडं-झुडुपं नाहिशी होणार, हे माहीत असतं, पण त्याचबरोबर त्याच्या आश्रयाने राहणारी कासवं, झिंगे, बेडूक, खेकडे, पक्षी, त्याच्यापुढे असलेलं शैवाल, त्याच्यावर जगणारे बारीक-सारीक सूक्ष्म जीव, त्या जीवांवर जगणारे कीडे-मकोडे या सगळ्या जीवसृष्टीचीही हानी होते, हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची प्रजनन स्थानं नाहिशी होतात. खोल पाण्यातले अनेक प्रकारचे मोठे मासे अंडी घालण्यासाठी इथे येतात. पिले लहान असेपर्यंत किनारपट्टी लगत वावरतात आणि मोठी झाली, की खोल समुद्रात जातात. खारफुटीचे जंगल तुटले, की माशांच्या अंड्यांचे आश्रय स्थान नाहिसे होते. ते अंडी घालायला येत नाहीत. मग किनारपट्टीवरील लहान मासेही कमी होतात. एवढे सगळे परिणाम समुद्र किनार्‍याकाठचे खारफुटीचे जंगल तोडल्याने होतात.

आता प्रश्न असा, की या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, तरी आपण सामान्य माणसे काय करू शकणार? एखाद्या योजनेत पर्यावरणाचा मोठ्या प्रमणावर र्‍हास होतोय, असं दिसलं, तर आपण एकत्रितपणे आवाज उठवू शकतो. तामीळनाडूमध्ये तंजावूर आणि पुड्डुकोट्टाई जिल्ह्यांच्या समुद्रकाठच्या गावातून कृत्रीम तळी तयार करून कोलंबीची शेती केली जायची. त्यामुळे गावातील विहिरी, ओढे, यांचं पाणी खारट झालं. जमिनीत मीठ फुटलं. एके ठिकाणचं सगळं गावच्या गाव उठून दुसर्‍या जागी स्थलांतरित झालं. तिथे लोकांनी आवाज उठवला आणि कोलंबीची कृत्रीम शेती बंद पाडली. अशाच प्रकारे गोव्यातील खाणकामाविरुद्ध आवाज उठवला गेला आणि गोव्यातील खाणकाम आता बंद करण्यात आले आहे.

सध्या मुंबईमध्येही खारफुटीवर होणारे अतिक्रमण लक्षात घेता, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे, की मुंबईच्या खाड्या, अभयारण्याची जागा म्हणून घोषित करावी. मुंबई पुरापासून वाचवण्यासाठी, भरतीचे पाणी मुंबईवर आघात करू नये, म्हणून खारफुटीची गरज आहे. खाड्यांना अभयारण्याचा दर्जा मिळाला, तर येथील खारफुटीचे रक्षण होईल, कारण तसा दर्जा प्राप्त झाला, तर कठोर नियमांचे पालन होईल. पाणथळ जागेत होणार्‍या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवता येईल. सध्या त्या संबंधी काही नियम असले, तरी त्यात शैथिल्य आले आहे. त्यामुळे पर्यावणात ढवळा-ढवळ होते आहे. अभयारण्य म्हणून तो भाग जाहीर केल्यास, नियमांचे काटेकोर पालन करणे भाग पडेल. न केल्यास मोठ्या प्रमाणात दंड, शिक्षा होऊ शकेल. मुंबईभोवती पसरलेल्या खारफुटीचे रक्षण होणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी १४ फेब्रुवारी २०१८ला निवेदन केलं, की येत्या काळात खारफुटी क्षेत्रावर पाहरा ठेवण्यासाठी १०८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाईल.

सरकारी प्रयत्न आणि त्याला लोकांच्या इच्छाशक्तीची साथ यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल.

– समाप्त –

(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे) 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

पाण्याची मला अगदी लहानपणापासून ओढ आहे. तळ्याचे ध्यानमग्न पाणी, ओढा-नद्यांचं वाहतं पाणी, समुद्राचं हेलकावे घेणारं सर्वदूर पसरलेलं पाणी, ही पाण्याची सगळीच रूपं मला मोहवतात. त्यातही संध्याकाळच्या वेळी सागर किनार्‍यावर केलेली भटकंती, म्हणजे `आनंदाचे डोही आनंद तरंग’.

माझं नित्याचं वास्तव्य समुद्रापासून दूर, मात्र नदीचा सहवास सासरी-माहेरी दोन्हीकडे. लहानपणी मामांकडे दादरला गेलं, की ३-४ वेळा तरी दादर चौपाटीवर फिरायला जाणं होई. प्रथम पाण्यात पाय बुडवून उभं राह्यचं. पायाखालून हळू हळू वाळू सरकत जायची. वाळूबरोबर मीदेखील आत सरकत जायची. पाण्यात, पाय असे मनसोक्त संतोषले, की वाळूवर बसायचं. त्यात पाय खुपसून त्यावर वाळूचा डोंगर रचायचा. पाय काढून त्यालाच किल्ला म्हणायचं.

.. मग समोर क्षितिजापर्यंत पसरलेला सागराचा विस्तार बघायचा. तेजोनिधी आता हळूहळू क्षितिजाकडे सरकू लागलेला असायचा. दूरवरच्या लाटांवर त्याची सोनेरी किरणे झिळमिळू लागलेली असायची. हा तेजोनिधी पिवळा, केशरी, नारिंगी, लाल, असे रंग पालटत लाल होऊन पाण्यात बुडी मारायचा. मग भेळ-पुरी, पाणी-पुरी असं काही चटक मटक खाऊन घरी परतायचं.

.. कागद वगैरे टाकायला तेव्हा वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराच्या `मला खाऊ घाला’, असं म्हणणार्‍या कचरापेट्या अस्तित्वात आल्या नव्हत्या आणि तेव्हा सागर किनार्‍यावर इतका कचराही नव्हता. प्लॅस्टिकचा कचरा आजिबात नव्हता आणि पर्यावरणाविषयी जागरुकता तर तेव्हा मुळीच नव्हती. ही सुमारे साठ – पासष्ठ वर्षापूर्वीची हकिकत सांगते आहे मी! दिवस पालटले. अलिकडे सूर्यास्त समुद्राच्या पाण्यात नाही, स्काय स्कॅपर इमारतींच्या मागे होतो. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाची चर्चा होऊ लागली आहे. लोकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती होऊ लागलेली आहे. भेळेच्या वगैरे गाड्या बर्‍याच दूर उभ्या करण्याची सक्ती आहे. किनारे प्रदूषित होऊ नयेत, म्हणून प्रयत्न होऊ लागले आहेत, पण यापूर्वी झालेली हानी अपरिमित आहे.

गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आणि माझी मामे बहीण लता काळे व प्रा. गोविंद काळे गोव्याला वास्तव्यास गेले. मीही तिथले समुद्रकिनारे बघण्याच्या ओढीने गोव्याला गेले. त्यावेळी कोलवा, कलंगुट, मीरामार हे समुद्र किनारे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते. किनार्‍यावर समुद्राचे दर्शन घेणारे आम्ही तेव्हा तुरळकच लोक होतो. अजून तिथे भेळ-पुरीच्या गाड्या लागल्या नव्हत्या की आस-पास खाद्य विक्रीची छोटी मोठी दुकाने, गाळे थाटलेले नव्हते.

८० साली काणकोण येथील पाळोळ्याच्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो, तेव्हा तर तिथल्या निसर्गाने आलिबाबाच्या गुहेतील वैभवाप्रमाणे आपलं वैभव आमच्यासाठी खुलं करून ठेवलं होतं. अगदी अनाघ्रात सागर किनारा. पावला-पावलावर लावण्याची वेगळी कळा. वेगळं दृश्य. किनार्‍याच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीवर चढलं, की सागर किनार्‍याची चंद्रकोर दृष्टीस पडायची. भरतीच्या वेळी चोहो बाजूंनी पाणी त्या टेकडीला गळामिठी घालतं. प्रत्येक कोना-कोनातून तिथे वेगळीच रम्यता दिसायची. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेले, कासवाच्या पाठीसारखे दिसणारे जमिनीचे तुकडे, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. पुढे केव्हा तरी डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकात पाळोळ्याचं वर्णन वाचलं, आणि पुन्हा एकदा पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला.

मध्यंतरी प्रा. कोमरपंतांशी फोनवर बोलणं झालं. पाळोळ्याच्या सी-बीचवर फिरल्याची आठवण बोलता बोलता ओघा-ओघाने निघालीच. तशी प्रा. कोमरपंत विषण्ण होऊन म्हणाले, `ते रूपवैभव आता उरलं नाही. गोव्यातील पर्यटन विकासामुळे गोवा संपन्न होऊ लागला खरा, पण हा विकास होता होता, इथले समुद्र किनारे, इथलं पर्यावरण यांची अपरिमित हानी होत चाललीय, इकडे मात्र दुर्लक्ष झालं. ‘ माझ्या डोळ्यापुढे बहुतेक सगळ्याच समुद्रकिनार्‍यांवर टाकलेले भेळेचे वा अन्य खाद्य पदार्थांचे कागद, बिसलरीच्या आणि हो दारूच्याही रिकाम्या बाटल्या, कॅन आणि विविध प्रकारचा कचरा डोळ्यापुढे आला आणि वाटलं, लावण्यमयी देहावर कोडाचे विद्रूप चट्टे पडलेत.

त्यांच्याशी बोलता बोलता डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकाची पुन्हा आठवण झाली. डॉ. प्रकाश जोशी भूगोलाचे अभ्यासक. पायी भटकंती करून त्यांनी भारतातले सगळे किनारे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. अनुभवले होते. पाकिस्तानच्या सीमेला लागून कच्छच्या लखपत ते बांगला देशच्या सीमेला लागून असलेल्या सुंदरबनापर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. आपल्या अनुभवावर आधारित, `रमणीय सागर किनारे’ हे पुस्तकही त्यांनी लिहीलं आहे.

समुद्र किनारे म्हणजे काही पुळणीचे, वाळू-रेतीचेच समुद्र किनारे नव्हेत. दलदलीचे किनारेही असतात, तसेच एखाद्या योग्यासारखे धीर-गंभीर खडकाळ किनारेही असतात. प्रत्येक ठिकाणचं पार्यावरण वेगवेगळं असतं. डॉ. प्रकाश जोशी म्हणतात, `पुळणीच्या समुद्र किनार्‍यावरील सजीवांची जीवनशैली वेगळी, तसेच खडकाळ किनार्‍यावरच्या आणि दलदलीच्या समुद्रकाठी असणार्‍या सजीवांची जीवनशैली वेगळी. पुळणीवर कोरडी वाळू बाजूला सारत, समुद्रजंत जिमिनीत शिरतात. खेकडे स्वत:ला पुळणीत गाडून घेतात, पण त्याचवेळी आपल्या श्वासनलिकेची अँटेना बनवून हवेतला प्राणवायू शोषून घेतात. शरीरावरील चमच्यासारख्या काट्यांनी समुद्रकंटक जमीन खणतात. या सगळ्यामुळे पुळण जिवंत वाटते.

खडकाळ किनार्‍यावरील जीवसृष्टीचं स्वरूप वेगळं. खडकातील खोबणी आणि भेगांच्या आश्रयाला मृदु शरिरी, कठीण कवची जल सजीव असतात. खडकावरील शेवाळं, खेकडे, समुद्रपंखे, समुद्रतारे आदि सजीवांचं वास्तव्य स्थान. ओहोटीच्या कोरड्या काळात शेवाळाकडून त्यांना आर्द्रता, ओलावा मिळतो. समुदकंटक, स्पंज, सीनट इ. जलजीव इथे ठिय्या मारून असतात. भरती ओसरताना, ओहोटीच्या प्रारंभी शीलाकळी हा कंकण प्राणी आर्द्रता शोषून घेत असतो. त्यावेळी लक्षावधी बुडबुडे फुटत असतात. त्याचा आवाज अस्पष्टशा कुजबुजीसारखा येतो. लाडघरच्या (जि. रत्नागिरी) किनार्‍यावर संध्याकाळी असा आवाज ऐकू येतो. प्रवाळही खडक चिकटे. समुद्रफूल हा तर महान चिकट्या. खडकाच्या खडबडित खोबणीत तो आपला मांसल भाग असा काही गच्च धरून ठेवतो, की त्याला त्या खडकापासून अलग करणं जवळ जवळ अशक्य. कोकण, मुंबई या ठिकाणी पुळणी, खडकाळ, दलदल असे तिन्ही प्रकारचे किनारे आहेत.

निरंजन घाटे लिहितात, `उथळ सागरात आपल्याला शेवाळे, खेकडे, छोटे मासे, कासवं आढळतील, तर भरती-ओहोटीच्या पुळणींवर खेकड्यांचे प्रमाण जास्त असेल. तिथली रेती खूप बारीक असेल. वाळूच्या दांड्यावर नि स्थिरावलेल्या वालुकापट्ट्यावर मर्यादावेल असेल, तिच्या आश्रयाने टिटवीचं घर असेल. दलदलीच्या प्रदेशातील परिस्थिती आणखी वेगळी असेल. तिथं कांदळीचं किंवा खारफुटीचं जंगल असेल. त्याच्या आश्रयाने अनेक कीटक, बेडूक, पक्षी वावरतात. राहतात. प्रजनन करतात. ‘

प्रत्येक प्रकारच्या समुद्रकिनार्‍याचं पर्यावरण वेगळं असतं, असं म्हणताना पर्यावरण म्हणजे नेमकं काय? आणि अलिकडे प्रदूषणामुळे किंवा अन्य कारणांनीही पर्यावरणाचा र्‍हास होतोय, असं म्हंटलं जातं, म्हणजे नेमकं काय होतय, हे समजून घ्यायला हवं.

अभिजित घोरपडे म्हणतात, `पर्यावरण म्हणजे आपला परिसर व पृथ्वीवरचे सर्व काही सजीव प्राणी आणि निर्जीव गोष्टीसुद्धा. याचं कारण प्रत्येक सजीव, सर्व वस्तू, पदार्थ, अगदी दगड-गोटेसुद्धा, यांचा निसर्गात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग असतो. ‘

निरंजन घाटे लिहितात, ` ‘पर्यावरण म्हणजे एखाद्या किंवा विचाराधीन सजीवाच्या दृष्टीने सुयोग्य जीवनावश्यक परिस्थिती. ही सजीवानुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुरूप बदलत असते. ‘ पर्यावरणाचा विचार स्वत:पासून करायला हवा, असं निरंजन घाटे यांना वाटतं. कारण आपणही पर्यावरणाचा एक घटक असतो. भूमी, म्हणजे आपल्या पायाखालची जमीन. जल – जमिनीवरचं दृश्य जल, समुद्रासाखा अफाट जलविस्तार आणि हो, भूजलसुद्धा आणि खडकही, पर्यावरणचा भाग आहेत. त्या त्या ठिकाणची जमीन, पाणी, हवा, वनस्पती यावर तिथली प्राणीसृष्टी अवलंबून असते. हे सारे घटक परस्परावलंबी आहेत.

पर्यावरण म्हणजे काय? हे नुसतं समजून घेणं पुरेसं नाही. हल्ली पर्यावरणाच्या संदर्भात विशेष चर्चा होऊ लागलीय, कारण माणसाच्या विकास प्रक्रियेने पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.

– क्रमश: भाग १ 

(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे) 

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ब्लड रिपोर्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ब्लड रिपोर्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

…….

सकाळी चहा पिण्याआधी, आणि जेवणानंतर साधारण दिड तासाने, अशा दोन्ही वेळेस सुई टोचून घेत दिलेल्या रक्ताचे रिपोर्ट आता हातात पडले होते.

शाळेत असतांना वार्षिक परिक्षेचा निकाल मिळण्याआधी जेवढी उत्सुकता असायची तेवढीच आजही ब्लड रिपोर्ट साठी होती.

फक्त शाळेत भाषा, गणीत, सामाजिक शास्त्र, विज्ञान असे विषय आणि त्यापुढे कमीतकमी आवश्यक असणारे, आणि मिळवलेले गुण असे आकडे असायचे. तर इथे CBC, Liquid Profile

Liver function test, Thyroid profile

Urine-R/M

Blood sugar- Fasting&PP

HbA1c अशी नांव असणाऱ्या विषयांपुढे रक्तात आवश्यक असणारे आणि सापडलेले गुण यांची आकडेवारी होती.

शाळेत काही ठिकाणी अर्धा अर्धा गुण देऊन अपूर्णांकात आमची (पूर्ण नसलेली) बौद्धिक क्षमता दाखवणारे शिक्षक होते. तर रिपोर्ट मध्ये सुद्धा असेच अपूर्णांकात आकडे देत आमच्या शरीराची क्षमता दाखवली होती.

शाळेतल्या विषयात बरेच कष्ट (ज्याला सोप्या भाषेत अभ्यास म्हणतात.) करून जेमतेम गुण मिळवण्यापर्यंत मजल मारली जात होती. पण या ब्लड रिपोर्टमधल्या काही विषयांचे आकडे मर्यादित ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार होते. म्हणजे शाळेत आकडे वाढवण्यासाठी कष्ट. तर रिपोर्ट मधले काही आकडे कमी करण्यासाठी प्रयत्न.

माझ्या अर्धांगिनीने सगळा रिपोर्ट पाहिला असला तरी तिचा फोकस मात्र फक्त शुगर या एका गोड असणाऱ्या आणि या वयात जाणवणाऱ्या गोष्टीवर जास्त होता.

आणि ती हळूच म्हणाली… रिपोर्ट तुमचाच आहे नां…

मी म्हटलं हो… पण का विचारतेस असं…

नाही, शुगर थोडीशी प्रमाणाबाहेर आहे म्हणून. आणि त्या बद्दलच मला शंका वाटली… म्हणजे बाकी काही वाढणं शक्य असेल… पण शुगर…

बोलतांना जराही गोडवा नसणाऱ्या तुमच्या रक्तात इतकी शुगर आलीच कुठून. हाच विचार मनात येतोय. बरं गोड बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या गोडव्याने रक्तातली शुगर कमी होईल का?… किंवा ज्याच्या रक्तातच इतकी शुगर आहे, त्यांच बोलणं गोड का नाही?… असाही विचार आला.

इतक्या वर्षात तुम्हाला मी पूर्ण ओळखते. यांनी फक्त रक्ताच्या काही थेंबांचा अभ्यास करून सांगीतलेला गोडवा मला कधीच दिसला, किंवा जाणवला का नाही?… असे वेगवेगळे विचार फक्त कागदावर दाखवलेल्या तुमच्या गोडव्यामुळे मनात आले… रक्तातला गोडवा वागण्यात का दिसत नाही. संक्रांतीला सुद्धा सगळे तिळगुळ घ्या गोड बोला, असं म्हणतात. पण तुम्हाला हातावर तिळगुळ ठेवल्यावर तोंडाने फक्त गोड बोला. इतकच म्हणतात.

इतकं बोलल्यावर ती खरंच अर्धांगिनी आहे याची खात्री झाली. आता कंट्रोल करायच्या गोष्टींवरून मला ट्रोल केल जात होतं.

पराभूत उमेदवारांना जसं वाढलेले मतदार, ठराविक वेळी वाढलेलं मतदान, याचबरोबर यंत्रांत काही घोळ आहे का? … कारण समोरच्याला इतकी मतं मिळतातच कशी?… अशी शंका येते. तशीच काहीशी शंका तिला माझ्या शुगर बद्दल आहे. गोडवा नसताना शुगर वाढतेच कशी?…

शाळेच्या रिपोर्ट मध्ये सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून पुढच्या वर्गात ढकलला आहे. परिश्रम घ्या. असा शेरा असायचा. तर या रिपोर्ट वरुन गोळाबेरीज करून पुढलं वर्ष चांगलं जाण्यासाठी परिश्रम घ्या. उगाचच चालढकल करु नका. हेच सांगतील. शाळेत ढकलल्यामुळे पुढल्या वर्गात जात होतो. तर आता पुढल्या वर्षात जायचं असेल तर चालढकल चालणार नाही असंच सांगतील.

रिपोर्ट मधल्या पुढच्या काही विषयांकडे बारीक नजर जाण्याआधीच मी शांतपणे तो रिपोर्ट घडी करून पाकिटात टाकला. आणि आलोच डाॅक्टरांना भेटून. असं सांगत बाहेर पडलो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माळ्यावरचे ओझे…” – लेखक : श्री विजय लिमये ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? विविधा ?

☆ “माळ्यावरचे ओझे” – लेखक : श्री विजय लिमये ☆ श्री मोहन निमोणकर

युरोपात, अमेरिका मध्ये ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाही त्या वस्तू आपापल्या गेटसमोर टॅग लाऊन ठेऊन देतात, ज्यांना गरज आहे त्यांनी त्या घेऊन जाणे. आता भारतातही काही ठिकाणी माणूसकीची भिंत कल्पना उभारली गेली आहे. जिथे तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवता येतात आणि ज्यांना गरज आहे ते लोक घेऊन जातात. आता काही एनजीओ सुध्दा ही सेवा कार्य करीत आहेत.

मी पैज लावून सांगतो, आपल्या देशातील असे एकही घर नाही जिथे माळे विविध वस्तूंनी खचाखच भरलेले नाहीत. माळे खाली केले तर त्यातून नाना तर्हेच्या वस्तू मिळतात. एकंदरीत हे माळे अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठीच वापरले जातात.

थोडा विचार करूया, सर्वांच्या लक्षात येईल, जी वस्तू आपण मागील तीन वर्षात एकदाही वापरलेली नाही ती आपण आपल्या उर्वरित आयुष्यात एकदा सुद्धा वापरणार नाही. मग अश्या वस्तू माळ्यावर साठवून ठेवण्याचा काय उद्देश असणार आहे? घरातील एकूण सामानापैकी पन्नास टक्के सामान आपण विविध कारणांनी वापरणार असतो, ज्याचा मी वर सांगितल्याप्रमाणे तीन वर्षातून एकदा तरी उपयोग होतो, बाकीचे सामान आपण केवळ असुदे, लागेल कधीतरी या आशेने उगीच साठवून ठेवतो.

तमाम भारतीयांना विनाकारण अनेक वस्तू साठवण्याची सवय आहे. एका नातेवाईकाचा पुण्यातील वाडा पाडून अपार्टमेंट करण्याचे ठरले, तेव्हा वाड्यातून मोठा ट्रक भरून जुने सामान निघाले, जे आताच्या जमान्यात भंगार या सदरात मोडले. पितळ व तांब्याची भांडी, स्टीलचे अनेक तांबे, गंज, व विविध आकाराची भांडी, चमचे, वाट्या, पेले, भाजी, आमटी वाढण्यासाठीचे डाव आणि मोठे चमचे. या शिवाय पूर्वीचे पत्र्याचे चौकोनी डबे, तेलाचे मोकळे डबे, तांब्याचा बंब, विविध आकाराची घमेली, जुन्या सुटकेस, ट्रँक, अश्या नानाविध वस्तू निघाल्या. या वस्तू मागील दोन पिढ्यांनी विनाकारण साठवून ठेवलेल्या होत्या, ज्या येणाऱ्या काळानुसार कालबाह्य झालेल्या होत्या. आजोबांनी व वडिलांनी जे सामान पोटाला चिमटा देऊन जमवले, नातवाने ते सर्व किलोच्या भावात विकले, त्यांनी ते त्यांच्या जमान्यात विकले असते तर आताच्या कैकपट जास्त किंमत मिळाली असती.

मध्यम, उच्चमध्यम, व श्रीमंत वर्गातील महिलांची घरातील कपाटे साड्या व ड्रेसेसनी इतकी खचाखच भरलेली असतात, तरीही त्या कपड्यांच्या बाबतीत असमाधानीच असतात आणि कपड्यांची कपाटे नेहेमी अपुरीच पडतात. दुसरीकडे, अश्याही महिला आहेत ज्यांना अंग झाकण्यापुरताही कपडा मिळत नाही.

आजही लग्न व इतर समारंभात मोठयाप्रमाणात आहेराच्या वस्तू दिल्या व घेतल्या जातात, या सामानातील बऱ्याच वस्तूंची रवानगी थोड्याच दिवसात माळ्यावर होते. या सामानातील थोड्या फार वस्तू पुन्हा भेट म्हणून सरकवल्या जातात. वित्तीय लाभाचा विचार करता, हा खूप मोठा तोटाच आहे कारण आपला खूप पैसा अश्या तर्हेने अडकलेला राहतो. ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांना ते अडगळीत टाकावे लागते, आणि जे गरीब आहेत त्यांना चार भांडी जमवताना, रक्ताचे पाणी करावे लागते.

सेकंड होम घेणारे असेच असतात, त्यांच्या त्या सेकंड होम चा उपभोग रखवालदार घेतो. घरमालक वर्षातून जास्तीत जास्त दोन तीन वेळा त्या घरात येतो, मोजून तीन ते पाच दिवस राहून जातो. रखवालदार अथवा मुनीम, घर सांभाळणारा उरलेले तीनशे पन्नास दिवस त्या घराचा फुकट उपभोग घेतो.

जर तमाम भारतीयांनी हि माळ्यावरची कधीही न लागणारी अडगळ गरजवंतांना दिली तर मी सांगतो उत्पादन उद्योगात वीज वापर घटेल, वाहतुकीवरचा खर्च कमी होईल ज्यामुळे प्रदूषण किमान पाच टक्क्यांनी कमी होईल. जश्या चलनी नोटा तिजोरीत पडून राहिल्या कि चलन टंचाई होते, तीच गोष्ट अश्या वस्तू माळ्यावर पडून राहिल्याने होतो.

अनेक लोकांच्याकडे जुन्या गाड्या, सायकली विनाऊपयोग पडून असतात, केवळ वेळत न विकल्यामुळे, त्यांची किंमत वर्षसरताना कमी कमी होत जाऊन भंगार रूपात परिवर्तन होते. विविध सरकारी गाड्या, वस्तु, फर्निचर सुद्धा केवळ वेळेत लिलाव करून न विकल्यामुळे प्रचंड नुकसान होते, हे नुकसान आपल्यासारख्या करदात्यांच्या टॅक्स रूपात दिलेल्या पैशाचे असते, याची जाणीव सरकारदरबारी कुणालाही नसते.

आज, समाज परिवर्तनाची नितांत गरज आहे, निदान माळ्यावरच्या वस्तू तरी उदारतेने द्यायला शिका, कदाचित त्या चार सहा वस्तूनी कित्तेक लोकांचे संसार उभे राहतील. त्याचा पर्यावरणावर होणार भार हलका होण्यास मदत होईल.

मोह सोडा, इथून परलोकी काहीच घेऊन जायचे नाही, मग इतके ओझे जोपासायची काही गरज आहे का?

म्हणतात ना,

देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….

देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….

घेणाऱ्याने… घेता घेता… देणाऱ्याचे… हातचं घ्यावे।

चला तर एक माणूसकीची भिंत ऊभी करूयात.

धन्यवाद 🙏

लेखक : श्री विजय लिमये

मो. 9326040204

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पडछाया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पडछाया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

उरात ठसली माझ्या तुझ्या प्रतिमेची पडछाया…

आणि तू जेव्हा जातोस समोरून तेव्हा ढवळून काढते अंतःकरणाला माझ्या… आणि नसतोस दिसत तेव्हा तुझ्या विरहात एकेक आठवणींचा पापुद्र्यांचे फोपडे उन्मळून पडतात.. भळभळ वाहणाऱ्या जखमेवरची खपली पडून जावी तशी…. जसे कढत आसवांचे डोळ्यातून कढ ओघळत जावे तसे…. मी अचल.. मी निर्जीव… मला कुठे असावे भावनांचे कोमल अंत:करण.. असा असतो तुझा मुळी माझ्याबाबतीतला गैरसमज… पण तुला सांगू पाषाण हृदयाला सुद्धा प्रेमाचा फुटतो पाझर असचं म्हणतात सारे…. त्याचं अंतरग आतून असतयं मृदू नि कोमल… मी जरी वरून दिसली तशी राकट दगड, पण मी तशी नाहीए… स्व:ताची सुखदुःख नसली म्हणून काय झालं! माझ्या सानिध्यात जे जे म्हणून आले त्यांच्या त्यांच्या सुखदुःखात मीही सहभागी झाले! … माझ्या भावलेले त्यांच्या भावनांचे कंगोरे मला दिलेल्या अंर्तबाह्य रंगरंगोटीतून प्रकट करते झाले…. मग मला तू असं कसं म्हणू शकतोस कि भावनाहीन आहे म्हणून! … उलट मी तर म्हणते तूच खरा भावनाहीन आहेस… फक्त आपल्या मुसक्या आवळून लगाम दुसऱ्याच्या हाती सोपवून तू त्यांच्या तालावर नाचत सारं आयुष्य काढतोस… आणि तुझ्यावर स्वारहोणाऱ्याची सुख दुखाची ओझी वावगत राहतोस… तुला काय वाटतं हे तुला सांगावसं वाटलं तरी बोलायचं स्वातंत्र्य तुला कुठे असतं! … अगदीच असह्य होतं तेव्हा पुढच्या पायाच्या टापा उंचावून जोरजोराने खिंकाळत राहतोस! … समजणाऱ्याने कसं समजावं रे ते तुझे आनंदाचे पडसाद आहेत की दुःखाचे.! . की ज्याने त्याने लावून घ्यावेत आपल्या मन स्थितीनुसार मतितार्थ… आणि तसा तुला दुसऱ्याच्या सुखदु:खाशी काहीही देणंघेणं असते कुठे म्हणा? … डोळ्यावर झापड लावलेली असतात आणि ते फक्त तुला गंतव्यस्थानाचा मार्गच तेव्हढा दाखवतात… कानात वारू शिरलेला असल्याने तू उधळत निघतोस.. तहानभूक विसरून नि देहभान हरपून.. वायू गतीने दौडत जाणे इतकंच तुला ठाऊक असल्यानं तुला वारू म्हणूनही तुला ओळखतात एव्हढंच… याच्या पलीकडे काय? काहीही नाही… इतकचं काय अवतीभवती पाहणं तुझ्या नशीबीही नाही कोणंतरी आपल्यावर फिदा आहे याची तुला शुद्धही नाही! … माझ्या मनीचा मी राजा याच भावनेत तू कायमच गुरफटलेला… रस्त्यावरून जातोस तेव्हा तुझ्या तगडक तगडक पदरवाचा ध्वनी घुमतो तेव्हा त्या नादाची कंपने माझ्या शरीरावर उमटतात… शहारून जाते काया सारी… अन तुला बघायला मला डोळे नसले जरी संवेदनाचे अंर्तचक्षू तुला टिपून घेतात… एक आनंदाची लहर सगळ्या कायाभर लहरून जाते… एक गोड शिरशिरी ची अनुभूती येते… पण तुझं लक्ष असतं का तिकडे… खुळ्या मनाची समजूत घालता शब्दही किती पडती तोकडे…. प्रत्यक्षात तुला भेटता येणं शक्य नसलं तरी तुझ्या प्रतिमेवरच मी वेडी अभिसारिका होते… बघं तुला जमेल का काही क्षण माझ्याजवळ उभा राहता येतेय का? बघशील का मला क्षण एक टक लावून… जाणून घेशील का माझ्या डोळ्यात दडलेले भाव मनीचे… तुला ते नक्कीच आवडेल.. मग करशील मान डोलावून दुजोरा देशील.. याच केवळ एका प्रतिसादाची मी अपेक्षा करतेय… मुकी असली तरी गुज माझ्या मनीचे तुला कळावेत म्हणून धडपडतेय… बाकी काही नाही जमलचं तरी स्थित प्रज्ञा सारखे जागी निश्चल उभं राहणं का कुठं चुकलयं…

… त्या रस्त्यावरून रोज ठरल्या वेळी मी जात असताना केतकी खिडकीतून मला पाहत असे आणि एक दिवस अचानक तिची माझी नजरानजर झाली आणि केतकीने ती खिडकीच बंद करून घेतली… आणि मी पुन्हा इकडे तिकडे न पाहता सरळ रस्त्यावरून चालत पुढे निघून गेलो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहंकार… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ अहंकार… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

अहंकार हा डोळ्यात गेलेल्या एखाद्या कुसळासारखा असतो जोवर ते काढून टाकत नाही तोवर आपल्याला जग बघता येत नाही. अगदी तसंच दृष्टीवर अहंकाराचा जर पडदा असेल तर वास्तवापासून आपण नेहमीच दूर राहतो आणि ते आपल्यासाठी नुकसानकारक आहे.

अभिमान, अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये एका पुसटश्या रेषेइतकं अंतर आहे. आत्मविश्वास दृढ झाला की तो ही रेषा पार करून अभिमानाकडे वळतो. अति अभिमानाचा पगडा ती रेषा ओलांडून आत्मप्रौढी मिरवतो. आत्मप्रौढीमुळे अहंकार बळावतो. हळूहळू माणसाच्या नकळत होणारा हा बदल लक्षात येत नाही. माणूस आत्मकेंद्री बनतो. आत्मकेंद्रीपणा अहंकारात मोठी भूमिका बजावतो. सरते शेवटी अहंकार माणसाच्या विकासातला मोठा अडसर ठरतो. षड्ररिपू अहंकाराच्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले असतात ते या अहंकाराला खत पाणी घालतात. अहंकार हा व्यक्तिमत्त्वाचा मानसिक घटक आहे अशा अहंकाराचा झालेला उद्रेक माणसाची मानसिकताही भस्मसात करून टाकतो. माणसाचा अहंकार त्याला दृष्टीने आंधळा, मतीने भ्रमपूर्ण आणि गतीने थांबवत असतो. भले भले यशस्वी आणि समजदार लोक अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेतात.

एका मर्यादेपलीकडे गेलेला हा अहंकार त्याला समाजापासून दूर लोटतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्या इतपतच तो असावा हे मोजमाप माणसाला न जमल्यानं अहंकाराचा अतिरेक होतो. जसा जसा अहंकार वाढत जातो तस तसा त्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या सृजनशीलतेवर, विचारशक्तीवर एक प्रकारचं पुट चढतं. अहंकारावर त्याला जर मात करता आली नाही तर मात्र तो सर्व सात्विक आनंदांना पारखा होतो. त्याच्या ठाई असलेल्या पैसा बुद्धी सौंदर्य सत्ता ह्या उत्तम मानल्या जाणाऱ्या गोष्टी नगण्य वाटू लागतात…

अहंकाराची कीड ही एक प्रकारची वाळवी आहे. ती सुबुद्ध माणसाचाही तोल घालवू शकते.

आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व असणे, कोणाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर मानणे, प्रत्येक क्षणोक्षणी स्वतःलाच वरचढ, श्रेष्ठ समजणे, बाकी सर्वांना कस्पटासमान, नीच समजणे. ही अहंकाराची लक्षणे… अहंकार म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेच्या अतिरंजित दृष्टिकोनातून उद्भवणारा आनंद.

या अहंकारावर मात कशी करायची तर आत्मपरीक्षण करून आपल्याला अहंकार का आणि कशासाठी आहे हे आपणच शोधून काढलं पाहिजे.

स्वतःत बदल घडवून आणण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. मनःशांतीतला मोठा अडथळा हा अहंकार आहे हे वेळीच लक्षात आलं पाहिजे. आपण कितीही विद्वान असलो तरी प्रत्येक समोरच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखा असतं याची जाणीव व्हावी. सतत यश मिळणार याला प्रसंगी अपयश देखील चाखता आलं पाहिजे एकूण काय तर आपल्या क्षमतेवर आणि बुद्धिमत्तेवर दृढ विश्वास ठेवून अहंकाराला सीमित ठेवून सृजनशील व्हायला हवे…. यातच शहाणपण आहे.

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर आणि त्याच क्षणी ‘ हे गजानन महाराज कोण? ‘ हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती!)

ताई आयुष्यभर अतिशय स्वाभिमानाने जगली होती. आता आयुष्याची अखेरही स्वाभिमानानेच व्हावी अशीच तिची इच्छा होती. म्हणूनच तर पाणी नाका-तोंडात जायची वेळ आली तेव्हा हक्काचा आधार म्हणून तिने गजानन महाराजांना साकडं घातलं होतं आणि त्यांनीही तिचं गा-हाणं ऐकलं होतं. त्या पाच लाखांच्या लाॅटरी-बक्षिसाचा प्रसाद तिला देऊन त्यांनी तिच्या मनावरचं ओझं अलगद उतरवून ठेवलं होतं!

दुःखाचे, अडचणीचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यांत येतात, पण त्या प्रतिकूल परिस्थितीचा मनापासून स्वीकार करून त्याला धैर्याने तोंड देतानाही स्वतःचं तत्त्व आणि सत्त्वही निष्ठेने जपणारी माणसं मात्र अपवादात्मकच असतात. माझी ताई आणि केशवराव यांनी ते जपलेलं होतं हे ताईच्या अखेरच्या दिवसांमधल्या ज्या दोन प्रसंगांवरून मला प्रकर्षानं जाणवलं, त्या प्रसंगांनाही माझी आई साक्षी होतीच. तिच्यामुळेच तर त्या दोघांची सत्वशील समाधानीवृत्ती अधोरेखित करणारे ते दोन प्रसंग मला समजू शकले. हे दोन्ही प्रसंग म्हणजे ताई आणि केशवराव या दोघांचीही गजानन महाराजांनी घेतलेली सत्त्वपरीक्षाच होती! आणि म्हणूनच ते दोघेही त्या कसोटीला कसे खरे उतरले हे आवर्जून सांगावेसे वाटते.

ही सत्त्वपरीक्षा सुरू झाली ती ताईला लॉटरीचं बक्षीस लागलं त्या क्षणापासूनच! या बक्षिसाच्या रकमेमुळे कॅन्सर ट्रीटमेंटच्या खर्चाची सगळी आर्थिक गरज परस्पर भागणार होती हे जसं खरं तसंच त्याच क्षणापासून ताईचा परतीचा प्रवास पुढे अधिकच वेगाने सुरू झाला हेही खरं! कारण ती पुढे मग हळूहळू थकतच गेली. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मलूलपणाचा लवलेशही नसायचा. तिच्या नजरेतल्या कृतार्थतेच्या रूपातलं एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेलं असे. पण तिच्या थकलेल्या शरीरावर मात्र त्याची कांहीच मात्रा चालत नसल्यासारखी ती असहाय्यपणे पडून असायची.

त्या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग. ती भिंतीकडे तोंड करून कुशीवर झोपलेली होती. शेजारीच केशवराव खुर्चीत पेपर वाचत बसले होते. लॉटरीचं बक्षिस लागल्यानंतरच्या आठवड्याभरातली ही गोष्ट. तेव्हा अजित ग्रॅज्युएशननंतर एका सीए-फर्ममधे आर्टिकलशिप करत होता. तो ऑफिसमधून त्या दिवशी परत आला तो एक वेगळाच निरोप घेऊन. आल्या आल्या आपल्या बाबांना तो त्याबद्दलच सांगू लागला. अजितच्या अगदी जवळच्या मित्राचे वडील जे प्रतिष्ठित व्यापारी होते, त्यांच्याकडून आलेला तो प्रस्ताव होता. तिकीट बॅंकेत भरून खात्यावर परस्पर पैसे जमा होताना टॅक्स वजा होऊन पाच लाखांऐवजी साडेतीन लाखच जमा होणार होते. त्याऐवजी बक्षिस मिळालेलं तिकीट घेऊन बक्षिसाचे पूर्ण पाच लाख रूपये द्यायला त्या मित्राचे वडील तयार होते. एरवी होणारी कराची वजावाट न होता त्यांच्या हातात पूर्ण रक्कम यावी हाच त्यांचा हेतू होता. स्वतःचे दोन नंबरचे पैसे चलनात आणण्याचा मार्ग म्हणून मध्यस्थामार्फत हे असे प्रकार सर्रास केले जातात हे मी ऐकून होतो, पण अशा व्यवहारांत आधी ते तिकीट त्या मध्यस्थाकडे सुपूर्द करावे लागते आणि ट्रेझरीकडून अपेक्षित रक्कम त्यांना मिळाली की त्यानंतरच ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे लाभार्थीला दिले जातात. ‌पण या प्रस्तावानुसार ताईच्या कुटुंबाबाबतची सद्भावना आणि निकडीची गरज लक्षात घेऊन मित्राचे वडील बक्षिसाची पूर्ण रक्कम तिकीट ताब्यात मिळताच त्याच क्षणी यांना द्यायला तयार होते.

” हे बघ, तू घरी जाऊन तुझ्या बाबांशी हे सगळं बोलून घे आणि त्यांना लगेच माझी भेट घ्यायलाही सांग ” असं ते म्हणाले होते. भिंतीकडे तोंड करून पडून राहिलेल्या ताईने अजितचं बोलणं ऐकलं आणि ते संपताच केशवराव कांही बोलणार एवढ्यांत आपली मान इकडे वळवायचा कसाबसा प्रयत्न करीत क्षीण तरीही ठाम आवाजात ती म्हणाली,

” त्या पैशातल्या फक्त साडेतीन लाख रुपयांवरच आपला अधिकार आहेs.. बाकी पैसे आपले नाहीत. सरकारी नियमाप्रमाणे जे मिळतील तेवढेच पैसे आम्हाला पुरेत. त्यांना त्यांचे पैसे नकोत म्हणून सांग.. “

” अगं, निदान मी काय म्हणतो ते ऐकेपर्यंत थांबायचंस तरी. ” केशवराव हसत म्हणाले.

” तू अगदी माझ्या मनातलं बोललीयस. मी त्याला हेच सांगणार होतो. “

खरं तर गरजू आणि हतबल अवस्थेत कुणालाही मोह पडावा अशा या प्रस्तावाबद्दल त्या दोघांनाही क्षणभरसुद्धा विचार करावासा वाटला नव्हता हे महत्त्वाचं. त्या प्रतिकूल परिस्थितीतही योग्य आणि अयोग्य यातली सीमारेषा त्यांच्या बाबतीत कणभरसुद्धा पुसट झालेली नव्हती. लक्ष्मीचं सात्त्विक रूप आणि मायावी रूप यामधला फरक ओळखण्याइतकं त्या दोघांचंही मन त्याही परिस्थितीत सजग होतं हे मला जास्त महत्त्वाचं आणि कौतुकास्पदही वाटतं!

नेमक्या गरजेच्या क्षणी परमेश्वराकडून मिळालेला हा आधार त्या दोघांनीही किती समतोल मनाने आणि प्रामाणिकपणे स्वीकारलेला होता हे अधोरेखित करणारा असाच हा दुसरा प्रसंग…

बक्षिस मिळालेलं तिकीट बँकेत कलेक्शनसाठी द्यायची वेळ आली तेव्हा ताईचं बचत-खातं बँकेत उघडणं आवश्यक होतं. त्यावेळीही….. ौ

‘अशा परिस्थितीत ‘माझं खातं कशाला उघडायचं? ‘ असंच ती म्हणाली होती. ‘ते कां नको’.. याबाबतचे तिचे विषय अतिशय स्पष्ट होते.

” मी काय हो, आज आहे आणि उद्या नाही, पहाताय तुम्ही. मला या व्यवहारी गोष्टीत आता गुंतवू नका. तुमचं खातं आहेच त्या बँकेत. त्याच खात्यावर बक्षिसाचं तिकीट जमा करायचं. हे पैसे माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठीच मागितलेले होते. “

ताईने केशवरावांना निक्षून सांगितलं. एरवी व्यावहारीकदृष्ट्या विचार केला तरीही तिचं म्हणणं योग्यच होतं. ब्रँच मॅनेजर म्हणून काम करताना ‘डेथक्लेम सेटलमेंट’ साठी वारसदारांना करावी लागणारी यातायात मी उघड्या डोळ्यांनी अनेकदा पाहिलेली होती. तो त्रास आपल्या पश्चात आपल्या माणसांना होऊ नये अशीच ताईची इच्छा असणारच. आणि मलाही तेच योग्य वाटलं होतं. पण केशवरावांची याला तयारी नव्हती. आम्ही सर्वांनी परोपरीने सांगूनही त्यांनी अगदी टोकाच्या हट्टाने सेव्हिंग खातं उघडलं ते ताई आणि अजित यांच्याच जॉईंट नावावर. खात्यावर बक्षिसाचे पैसे जमा झाले तेव्हा ताई हॉस्पिटलमधे अखेरचे दिवस मोजत होती! त्यादिवशी केशवराव दवाखान्यांत गेले ते ताईच्या नावाचं बँक पासबुक सोबत घेऊनच. पासबुकावरचं तिचं नाव आणि तिच्या खात्यांत बक्षिसाची रक्कम जमा झाल्याची नोंद त्यांनी तिला आवर्जून दाखवली..!

‘गजानन महाराजांनी तिला दिलेला प्रसाद होता तो! म्हणून तो तिच्या नावावर जमा होणंच मला आवश्यक वाटलं. आत्ता या क्षणी तिला देण्यासारखं यापेक्षा अधिक मोलाचं माझ्याकडे दुसरं कांहीही नव्हतं. ‘ केशवराव म्हणाले होते! !

ईश्वरी कृपालोभ स्वीकारतानाही तो समतोल वृत्तीने कसा स्विकारावा याचे हे दोन्ही प्रसंग मूर्तिमंत उदाहरण होते! जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ हे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते माझ्या मनात ताजे आहेत!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कंटेंट क्रिएटर्स — दिसतं तसं नसतं… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ कंटेंट क्रिएटर्स — दिसतं तसं नसतं… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

ऋचा खूप छान विडिओज बनवते. सोशल मिडियावर तिला खूप लाईक्स मिळतात. ती सतत नवनवीन सामग्री युट्यूब, फेसबुक वर पाठवत असते. ती युट्यूबवर बोलते, तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. ती स्क्रिनवर दिसतेही सुंदर. तिला भेटल्यावर मला छान वाटलं. पण तिच्या चेहर्‍यावर काही आनंद नव्हता. हिरमुसलेला चेहरा. विचारात गढलेली, जणु स्वमग्न अशी ती. स्वत:वरच नाराज झाली होती. नंतर ती म्हणाली, “मला कळतंच नाही, मी का सतत सामग्री निर्मिती करते. पाकळ्यांमधे अडकलेल्या भुंग्यासारखी माझी अवस्था झाली आहे. सतत सामग्रीला लाईक्स हवेत. चांगले कमेंट्स हवेत. बघ्यांची संख्या वाढली पाहिजे. पुढचा व्हिडिओ चांगलाच झाला पाहिजे. या सगळ्याचा ताण येतोय. थांबायचा विचार करते. नेमकं त्याचवेळी प्रेक्षक संख्येत लक्षणीय वाढ होते. माझा उत्साह वाढतो. मी पुन्हा नवं देण्याच्या विचारात गुरफटते. मी सतत तणावात आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे. “

जगभरात ऋचासारखे २०७ मिलियन पेक्षा जास्त आणि भारतात आठ कोटी पेक्षा जास्त कंटेट क्रिएटर्स म्हणजेच सामग्री निर्माता आहेत. पैकी ७५% जणांना ताण आहे. २२% लोकांना वारंवार ताणाचा सामना करावा लागतो. ७९% निर्मात्यांनी बर्नआऊटचा अनुभव घेतला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सामग्री निर्माता म्हणजे दिसतं तसं नसतं. एका सर्वेक्षणानुसार २०२७ मधे सामग्री निर्मिती क्षेत्रात ५०० अब्ज डाॅलर्सची वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या या क्षेत्राचं आकर्षण वाढतंच चाललं आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांना करियर, प्रसिद्धी आणि यशासाठी हा मार्ग सहज सोपा आणि लोकप्रिय वाटतो. याचे समाधानकारक फायदे असू शकतात. पण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मानसिक ताण वाढत जाण्याची दाट शक्यता आहे.

३८ वर्षाच्या नसीम नजाफी अघदाम हिने कॅलिफोर्नियामधील यु ट्यूबच्या कँपसमधे जाऊन तिथल्या कर्मचार्‍यांवर गोळीबार केला. त्यात तीन जणं जखमी झाले. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. तिचं असं म्हणणं होतं की, तिच्या सामग्रीकडे युट्यूबने दुर्लक्ष केलं. तिच्या सामग्रीमधे काटछाट केली. त्यामुळे तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

सामग्रीची निर्मिती करणं कठीण आणि आव्हानात्मक असतंच. वेळेवर विडीओ पोस्ट केला नाही तर लोक विसरतील, व्यवसाय ठप्प होईल याची चिंता लागून राहते. शिवाय प्रत्येकाला आकर्षणापोटी अनेक प्रश्न पडतात. जसं की, मी पण बनू का सामग्री निर्माता? विडिओज आत्तापासूनच करू की कसं? माझा विडिओ चांगला झालाय की नाही? किती हजार लोकांनी तो बघितला? मी पुढं कोणत्या विषयावर विडिओ करू? माझा व्हिडीओ ५० हजार तरी लोक बघतील ना? तो किती लोकांना आवडला? जर विडिओ अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना आवडला तर ते आवडणं टिकवून ठेवण्याचा ताण. कमी लोकांना आवडला तर आवड वाढवण्याचा ताण. सामग्री निर्मात्याच्या आनंदाचं, दु:खाचं, ताणाचं बटन लोकांच्या आवडी निवडीच्या हिशोबानं चक्राकार फिरत राहतं. तिथं चालू बंद काही नाहीच. म्हणूनच स्वत:च्या यशावर, कौशल्यावर स्वत:च प्रश्न उपस्थित करणारा मानसिक आजार इंपोस्टर सिंड्रोम, सततच्या कामामुळं येणारा प्रचंड थकवा (क्रिएटर बर्नआऊट), अवास्तव दर्जा टिकवण्याची चिंता, इतर निर्मात्यांबरोबरची तुलना, सतत अपयशाची भीती अशा मानसिक आजारांना हे सामग्री निर्माते जणु निमंत्रणच देत असतात. सामग्री निर्माते मिस्टरबीस्ट सातत्यानं सुट्टी न घेता काम करतात. ट्विटरवर झालेल्या संवादात ते म्हणाले, “सुट्टी न घेता काम केल्याने ताण येतो. मी मानसिकदृष्ट्या मरत आहे. “

सामग्री निर्मात्यानी क्राफ्ट (वाचणे, लिहिणे.), कलेक्ट (चिंतन, मनन करणे), रिफ्लेक्ट (विडिओ निर्मिती करणे) हे टप्पे लक्षात ठेवावेत. आपण सामग्री देता देता थकतोय याचं भान असावं. स्वत:च्या मूल्यांचा विसर पडू देवू नये. प्रेक्षकांशी सहसंबंध प्रस्थापित करावेत. ताण किंवा चिंता निर्माण करणारे ट्रिगरिंग पाॅइंट माहीत करून घ्यावेत. याशिवाय नियमित विश्रांती घेणे. वास्तववादी ध्येय निश्चित करणे. संगीत ऐकणे. बाहेर फेरफटका मारणे. स्वत:चे ऊर्जा स्त्रोत शोधणे. मित्रांकडून सहकार्य घेणे. ध्यान, योग करणे. पुरेशी झोप घेणे. पौष्टीक जेवण करणे. कुटुंबासोबत वेळ घालवणे. गरजेनुसार समुपदेशकाचा सल्ला घेणे. आठवड्यातून एकदा स्वत:च्या कामगिरीचं विश्लेषण करणे. इ. गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. ‘जिंका किंवा मरा’ याप्रमाणे ‘प्रकाशीत करा किंवा मरा’ असा टोकाचा मानसिक दबाव येऊ शकतो. रोमन जीवन तत्त्चज्ञानाचे अनुयायी स्टोईक लोक म्हणतात, ‘आपण आपल्या प्रतिक्रिया आणि आपली कृती यावरच नियंत्रण करू शकतो. ‘ त्यामुळं कंटेंट क्रिएटरच्या भाषेत लाईक्स, शेअर, फाॅलोअर्स संख्या अशा यशाच्या मागे लागू नये. शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य चांगलं ठेवावं. तरंच ना सामग्रीची चिंता. ना निर्मितीची.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares