मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले.  अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले.  तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर! 

मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा.             लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.

प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!

तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’

ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं  दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ  मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत? 

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

 🌸 विविधा 🌸

☆ प्रज्ञा… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

‘प्रज्ञा ‘हा शब्द आपल्या ऐकण्यात,  बोलण्यात, वाचण्यात नेहमी येतो. पण त्याच्या अर्थाविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. भारतीय मानसशास्त्रात ‘प्रज्ञा’ही संकल्पना अतिशय सुंदर रित्या स्पष्ट केलेली आहे. प्राचीन काळात ऋषिमुनींनी निर्माण केलेले साहित्य ही आपली अशी संपत्ती आहे की त्यामुळे आज भारताचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर सुरू झाला आहे. अशा भारतीय मानसशास्त्रातील एक संकल्पना’प्रज्ञा’. याविषयीचे विचार येथे व्यक्त केले आहेत.

संस्कृत मध्ये ‘प्रज्ञा’असा मूळ शब्द वापरतात. याला पूरक असे ‘प्राज्ञ’व ‘प्राज्ञा’ असेही शब्द आहेत. व्यक्तीचे शुद्ध आणि उच्च विचार युक्त शहाणपण,  बुद्धिमत्ता आणि आकलन म्हणजे ‘प्रज्ञा ‘. ही शहाणपणाची अशी पातळी आहे की तर्काने आणि निष्कर्षाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा उच्च आहे.  प्रज्ञ= प्र +ज्ञ . प्र म्हणजे परिपूर्ण आणि ज्ञ म्हणजे माहीत असणे किंवा संकल्पनेचा अत्यंतिक जवळून अभ्यास करणे.  प्रज्ञा या संकल्पनेविषयी वेद , उपनिषद व योगशास्त्रात संदर्भ सापडतात.

ऐतरेय उपनिषदात प्रज्ञेविषयी खालील श्लोक सापडतो.

तत्प्रज्ञानेत्रम प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञानं ब्रम्ह (iii. i. 3).

जे अस्तित्वात आहे ते म्हणजे शारीरिक व आध्यात्मिक ज्ञान.  या ज्ञानाचे मूळ प्रज्ञा आहे म्हणजे स्वजाणीव किंवा सुषुप्ती.  कौशितकी उपनिषदामध्ये इंद्राने मृत्यूचे वर्णन करताना प्राण आणि प्रज्ञा शरीरात एकत्र राहतात व मृत्यूचे वेळी एकत्रित निघून जातात असे म्हटले आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत.  पंचेंद्रियांची कार्येही प्रज्ञेशिवाय होऊ शकत नाहीत. तसेच प्रज्ञेशिवाय विचार यशस्वी होऊ शकत नाही.

वेदांत सार मध्ये प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

अस्य प्राज्ञात्वम स्पष्टोपाधि तया नती प्रकाशत्वात॥४४॥.  

आत्मा हा निर्गुण असतो.  ईश्वर मात्र सर्व गुणांनी युक्त असतो व चराचरावर राज्य करत असतो पण प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याच्या अज्ञानाचा एक भाग म्हणजे सदोष बुद्धिमत्ता. सुषुप्ति अवस्थेतील आत्मा जेव्हा आनंदमय विज्ञानघन असतो तेव्हा त्याची बुद्धिमत्ता ही प्रज्ञा असते.

मांडुक्योपनिषदात प्रज्ञा या विषयी म्हटले आहे की,

आनंदभुक चेतोमुखःप्राज्ञः॥

प्रज्ञा म्हणजे जागृती अवस्थेत साधन लाभलेल्या(असलेल्या)आशीर्वादाचा आनंद घेणारा उपभोक्ता.

उपनिषद रहस्य या पुस्तकात प्रज्ञाचे इत्यंभूत वर्णन केले आहे. प्रज्ञा ही जगाचे चक्षु असून जगाचा आधारही आहे. प्रज्ञा प्रत्यक्ष ब्रम्ह आहे.  सर्व स्थावर जंगम, वस्तू, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी व आकाशात उडणारे सर्व पक्षी, सर्व पंचमहाभूते व देवता हे सर्व प्रज्ञेतच अंतर्भूत होतात व प्रज्ञेमुळे जिवंत राहतात असे उपनिषद्काराचे मत आहे.

पतंजली योगसूत्रामध्ये प्रज्ञेचा उल्लेख खालील श्लोकात केलेला आढळतो.  

ॠतंभरा तत्र प्रज्ञा ॥

निर्विचार समाधी विषयी स्पष्टीकरण करताना असे म्हटले आहे की,  ज्ञान हे जेव्हा निष्कर्षाच्या आणि ग्रंथांच्या पलीकडे जाते तेव्हा ते फक्त सत्यानेच भरलेले असते. मन हे शुद्ध असते अशावेळी असलेल्या स्थितीत प्रज्ञा जागृत असते.  

संस्कृतीकोष मध्ये व काही वेबसाईटवर( संदर्भामध्ये दिलेल्या आहेत) प्रज्ञा या संकल्पनेविषयी लिहिताना असे म्हटले आहे की , प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञानाचे किंवा जगण्याचे इंद्रिय स्वरूप. प्रज्ञा हे प्राचीन संस्कृत नाम असून त्याचा सखोल अर्थ शहाणपण हाच आहे . प्रज्ञा हे देवी सरस्वतीचे नाम आहे . सरस्वती ही कलेची व वादविवादाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे आकलन, ज्ञान व संकल्पनेशी  अत्यंत जवळीक असणे असेम्हटले आहे तर महाभारतानुसार,  प्रज्ञा म्हणजे संकल्पनेचे अध्ययन, संकल्पनेचा शोध असे म्हटले आहे . शतपथ ब्राह्मण व सांख्यायन श्रोत-सूत्र यांच्या नुसार शहाणपण,  ज्ञान,  बुद्धी,  तर्क , आराखडा मांडणे,  साधन वापर या गुणधर्मांसाठी प्रज्ञा हा शब्द वापरला आहे.

बुद्ध संप्रदायानुसार प्रज्ञा किंवा पन्ना( पाली )म्हणजे शहाणपण . याचा अर्थ वास्तवातील सत्याबद्दल असलेली मर्मदृष्टी .  प्र म्हणजे जागृती, ज्ञान किंवा आकलन आणि ज्ञ म्हणजे उत्स्फूर्त ज्ञानाची उच्च, व्यापक, जन्मजात बहरलेली अवस्था होय.

प्रज्ञेचे एकूण तीन प्रकार आहेत.

  1. श्रुतमय प्रज्ञा
  2. चिंतनमय प्रज्ञा
  3. भावनामय प्रज्ञा

श्रुतमय प्रज्ञा म्हणजे असे ज्ञान की जे फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे.  हे ऐकिवज्ञान अनुभूतीच्या स्तरावर उतरलेलं असेलच असे नाही . श्रुतमय ज्ञान प्रेरणा घेण्यासाठी गरजेचं असतं. ज्ञान ऐकल्यानंतर पुढचा टप्पा असतो ज्यात चिंतनाची आवश्यकता असते. या प्रज्ञेला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात आणि चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती घेतली जाते.  अनुभूतीनंतर जे ज्ञान होते त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात.  भावनामय प्रज्ञा सर्वात महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती श्रुतमय प्रज्ञेचा साक्षात्कार करेलही व चिंतन ही करेल पण त्याचा अनुभव घेईलच असे नाही म्हणून प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्वानुभवाच्या बळावर जे जे काही उतरते त्याला ‘प्रज्ञा ‘असे म्हणतात.

या संकल्पनेचा एवढा विचार करणे ही सध्याच्या काळातील प्राथमिक गरज आहे. मुलांना कसे वाढवावे याविषयी पालकांना तसेच विद्यार्थ्यांना किती सखोल मार्गदर्शन करावे याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन मिळते. प्रत्येक मुलातील ‘प्रज्ञा’जागृत झाल्याशिवाय त्याचा विकास परिपूर्ण होणार नाही व मुले आयुष्यात समाधानी होणार नाहीत म्हणून भारतीय मानसशास्त्रातील संकल्पना सर्वांनी अभ्यासल्या पाहिजेत.

संदर्भ

  1. भारतीय संस्कृती कोश -पंडित महादेव शास्त्री जोशी
  2. उपनिषद रहस्य -गुरुदेव रानडे
  3. प्रवचन सारांश -विपश्यना शिबिर
  4. द प्रिन्सिपल उपनिषद- स्वामी निखिलानंद
  5. http://www. pitrau. com”Meaning of Pradnya”
  6. www. bachpan. com”Meanimg of Pradnya”
  7. Sanskrit Dictionary(revised 2008)-Lexicon (http://www. sanskritlexicon. unikoein. de)
  1. The Golden Book of Upanishads-Kulshreshtha Mahendra

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी फुले आणायला गेले आणि बघतच राहिले.त्या मावशींनी एक वृत्तपत्राचा कागद घेतला त्यात फुले,तुळस,बेल ठेवले आणि मोठ्या निगुतीने छान पुडी बांधली.आणि त्यावर छान दोरा गुंडाळला.त्यांची एकाग्रता बघून असे वाटले,जणू त्या खूप मौल्यवान वस्तू किंवा औषध त्यात बांधत आहेत.आणि तसे तर ते  होते.ज्या फुलांनी देवाची पूजा होणार आहे ती असामान्यच!

त्यांनी तो दोरा गुंडाळत असताना मनाने मला पण गुंडाळले ( फसवले नव्हे ).माझे भरकटत चाललेले मन जागेवर आणले.त्या फुलांच्या पुडीमुळे मी मात्र बालपणात पोहोचले.आणि आठवले कित्येक वर्षात आपण अशी कागदी पुडी पाहिलीच नाही.दुकानात जायचे आणि चकचकित प्लास्टिक मध्ये टाकून वस्तू आणायच्या.त्यातील बऱ्याच वस्तू मशीनमध्येच चकचकित कपडे घालून येतात.मग लक्षात आले,माझ्या लहानपणी सर्वच वस्तू कागदाच्या पुडी मधून यायच्या.ही आजची फूल पुडी बघून मन भूतकाळात शिरले.

मला चांगलेच आठवते प्रत्येक दुकानात वस्तू बांधून देण्याचे कागद वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले असायचे.त्या वरून दुकानदाराची पारख करता यायची.काही दुकानदार त्या कागदांची प्रतवारी करून ठेवायचे.म्हणजे प्रत्येक वस्तू साठी व वस्तूच्या वजना प्रमाणे ( वजना प्रमाणे आकारमान पण बदलायचे ) कागदाचे वेगवेगळ्या आकारात तुकडे करुन ठेवलेले असायचे.काही जण ते लहान मोठे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायचे.अगदी इस्त्री केल्यासारखे!आणि वस्तूचे वजन करून झाल्यावर मोठ्या काळजीने कागद काढून घ्यायचे.व व्यवस्थित घडीवर घडी घालून पदार्थ त्यात ठेवायचे.त्यावेळी असे वाटायचे जणू हे त्या पदार्थला कपडेच घालत आहेत.  काही जण दुकानातच वेगवेगळ्या सुतळीत किंवा जाड दोऱ्यात सर्व कागदाच्या तुकड्यांचे कोपरे जुळवून ओवून ठेवायचे.त्यातही लहान मोठे अशी वर्गवारी असायची.आही जण मात्र वृत्तपत्राचे गठ्ठेच एका कोपऱ्यात ठेवायचे.व वस्तू मापून झाली की टरकन कागद फाडून त्यात वस्तू गुंडाळायचे.त्या वस्तू कागदात बांधताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असायच्या. 

आतील कागद बाहेरच्या कागदाला आधार देत असायचा.जणू लहानांचे महत्वच सांगत असायचा.त्या नंतर त्यावर दोरा बांधला जायचा.तो दोरा मात्र खूप ठिकाणी एकाच पद्धतीने दिसायचा.बहुतेक तराजूच्या अगदी बाजूला किंवा वरच्या बाजूला मोठे रिळ असायचे.व त्याचे एक टोक खाली लोंबत असायचे.आणि ते टोक ओढले गेल्यावर ते रिळ एकाच लयीत नाचत असायचे!दोरा संपत असेल तरी कोणाच्या तरी उपयोगी पडतो म्हणून त्यालाही आनंद होत असावा.

प्रत्येक दुकानाची पुड्या बांधायची खास शैली असायची.आणि ती बघूनच वस्तू कोणत्या दुकानातून आणली ते समजायचे.हे झाले दुकानदाराचे कौशल्य!

आमचे कौशल्य या पुड्या घरी आल्या नंतरचे!त्या कागदात काय आहे याची इतकी उत्सुकता असायची कारण कागद पारदर्शक नसल्याने आणि त्याला दोऱ्यात गुंडाळल्या मुळे आत काय आहे ते दिसायचेच नाही.ती पुडी दुसऱ्या कोणी आणली असेल तर ही उत्सुकता जरा जास्तच असायची.आणि स्वतः वस्तू आणलेली ( मोठ्यांच्या सांगण्यावरून ) असेल तर पोटात बारीक धडधड व छोटासा गोळा यायचा.कारण आणायला सांगितलेली वस्तू चांगली असेल तर कौतुक व शाबासकी,वस्तू ठीक असेल तर काही नाही पण जर वस्तू नीट नसेल तर जगबुडी झाल्या सारखी बोलणी आणि एक दोन धपाटे ठरलेले असायचे.नीट बघता आले नाही का ते काका कोणती वस्तू देतात? असा आमच्या अकलेचा उद्धार ठरलेला असायचा.आमचे कौशल्य या पुढचे.डब्यात गेलेल्या वस्तूने परिधान करुन आईच्या हाताने सोडलेला कागद घ्यायचा आणि त्यावर हात फिरवून छान सरळ करायचा.तो दोन्ही बाजूंनी वाचायचा.त्या वरची चित्रे बघायची व्यंग चित्रे असतील तर हसून घ्यायचे.सिनेमाच्या जाहिराती असतील तर मोठ्यांच्या चोरुन बघून घ्यायच्या.हो आमच्या लहानपणी तेवढेच करावे लागायचे.त्या नंतर तो कागद पलंगाच्या गादीच्या खाली राहिलेली इस्त्री करायला जायचे.त्यावेळी हे कागद फेकून दिले जात नसत.काही दिवसांनी तो कागद घरातील कोणती जागा मिळवणार आहे ते ठरायचे.म्हणजे काही कागद डब्यांच्या खाली जायचे.काही डब्यांच्या झाकणाच्या आत बसायचे.काहींच्या नशिबात चकलीचे चक्र असायचे तर काहींना तळलेली चकली मिळायची.आणि काही कागद तेलकट डबे,निरांजन पुसणे याच्या कामी यायचे.तिच व्यवस्था पुडी बरोबर आलेल्या दोऱ्याची.तो दोरा सोडल्यावर एखाद्या काडीला किंवा दोरा संपून राहिलेल्या रिकाम्या रिळाला गुंडाळून ठेवला जायचा.आणि योग्य ठिकाणी वापरला जायचा.त्या वेळी भराभर फेकून देणे हा प्रकार नव्हता.आणि हे सगळे करण्यात कोणाला कमीपणा पण वाटत नसे.तेव्हा कोणालाच प्लास्टिक चे वारे लागले नव्हते.आणि हायजीन च्या कल्पना वेगळ्या होत्या.समाजातील गरीब,श्रीमंत सगळेच एकाच दुकानातून व वृत्तपत्राच्याच कागदातून सामान आणायचे.कारण मॉल उदयाला आले नव्हते.विशेष म्हणजे रिड्यूस,रीयूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणली जायची.

आयुष्यात किराणामाल या शिवाय अनेक पुड्या यायच्या.कित्येक घरी फूल पुडी यायची ती पानात बांधलेली असायची.भेळेच्या गाडी वरची भेळ पण खायला व बांधून कागदातच मिळायची.आणि भेळ खाण्यासाठी चमचा पण जाड कागदाचाच असायचा.या शिवाय भाजलेले शेंगदाणे,फुटाणे शंकूच्या आकारातील निमूळत्या पुडीत मिळायचे.ती पुडी फारच मोहक दिसायची आणि ती पुडी घरात कोणी आणली की बाळ गोपाळ आनंदून जायचे.देवळातील अंगाऱ्याची चपटी पुडी परीक्षेला जाताना खूप आधार देऊन जायची.त्या वेळी केळी सुद्धा कागदात बांधून यायची.यात अजून विशेष पुडे आहेतच.बघायला आलेल्या मुलीला पेढ्यांचा मोठा पुडा मिळायचा.शिवाय साखर पुड्यात पण त्या ताटांमध्ये साखरेचे पुडे इतर साध्या पुड्यांमध्ये रंगीत कागदात ऐटीत बसायचे.

आता हे वाचून जर कोणाला असे वाटले की मी पुड्या सोडत आहे.तर त्याला माझा इलाज नाही.ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांना यातील सत्यता नक्कीच पटेल.आणि लहानपणात तेही थोडा फेरफटका मारुन येतील.

तर माझं हे असं होतं.अशी कोणतीही वस्तू मला आठवणीत घेऊन जाते.आणि मी असे काही लिहिते.असो!तुम्ही वाचता म्हणून किती लिहायचे ना?

या पुडीच्या निमित्ताने सगळ्या पुड्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.आणि ही आठवणींची एक पुडी मी सोडून दिली आहे. आता ही पुडी तुम्हाला कोणकोणत्या पुड्यांची आठवण देते ते आठवा बरं!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

२९/९/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’आफ्टर दि ब्रेक…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सुरवातीला अधिक महिना, मग श्रावण महिना,त्या नंतर गौरी गणपती हयामुळे दोन अडीच महिने नुसती भक्तगणांची धावपळ होती. पूजाअर्चा , देवदर्शन, व्रतवैकल्ये, ह्यामध्ये बहुतेक सगळे गुंतले होतें. श्रावण आणि अधिक महिन्यातील व्रतवैकल्ये आणि गणपती महालक्ष्मी उत्सव ह्यांमुळे हे सगळे दिवस प्रचंड उत्साहाचे, चैतन्याचे आणि धावपळीचे गेलेत.

ह्या सगळ्या धावपळी नंतर प्रत्येकाला आता थोडीशी विश्रांती, थोडीशी शांतता, अगदी मनापासुन हवीहवीशी वाटते, नव्हे आपलं शरीर आता आरामाची, जरा उसंतीची आतून मागणी करीत असत.आता जर पंधरा दिवस जरा शांत, स्थिर गेलेत तर पुढें नवरात्र, दिवाळी ह्यासाठी लागणारा उत्साह, शक्ती आपल्यात तयार होईल असं मनोमन वाटतं.

सहज मनात आल ज्या प्रमाणे आपलं त्याचं प्रमाणे देवाचं सुध्दा असेल. त्यांचे ही हे सगळे दिवस प्रचंड व्यस्ततेत गेले असतील. ती देवळांमध्ये होत असलेली प्रचंड गर्दी, भक्तांकडून होणारा तो दूध पाण्याचा अभिषेकाच्या निमित्याने होणारा मारा, ती कचाकचं तोडण्यात येऊन देवाला वाह्यलेली फुलं, पत्री, तो प्रसादाच्या पदार्थाचा कधी कधी अतिरेक आणि सगळ्यांत कळस म्हणजे ह्या नंतर भक्तांकडून मागण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी नवसाची बोलणी, ह्या सगळ्यामुळे देऊळ वा देव्हाऱ्यातील देव सुध्धा जरा उबगलेच असतील नाही ?

अर्थातच मी संपूर्ण आस्तिक गटातीलच आहे, देवावर माझा प्रचंड विश्वास आहे, ह्या शक्तीपुढे कायम नतमस्तक रहावसच आपणहून वाटतं, फरक जर कुठे पडत असेल तर तो भक्तीत न पडता तो हे दर्शविण्याचा पद्धतीत पडतो. मला स्वतःला दिवसाची सुरवात आणि दिवसाचा शेवट हा देवाच्या दर्शनाने झाला तर मनापासुन आनंद मिळतो, सुख वाटतं. परंतु हे करतांना ती गर्दी असलेली देवळ, भरमसाठ तोडलेली फुलं, पत्री हे मनापासुन नको वाटतं वा कुणी केलेलं दिसलं ते मला अस्वस्थ करुन जात. असो

आता पंधरा दिवसाच्या ब्रेक नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी ह्यांचे वेध लागतील. तेव्हा सगळ्यांनी जरा विश्रांती घ्या आणि नव्या उत्साहाने परत सण, सोहळे ह्यांच्या स्वागताला सज्ज व्हा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज सोनमर्ग स्थलदर्शन होते. श्रीनगरहून सकाळी लवकरच निघालो. तिथून सोनमर्ग पर्यंतचे अंतर ८६ किलोमीटर होते. पण संपूर्ण रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि तुलनेने बराच लहान होता. त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सावकाश जावे लागत होते. या रस्त्यावर मिलिटरीच्या वाहनांची खूपच वर्दळ होती. त्यांची वाहने आली की इतरांना सरळ बाजूला थांबावे लागत होते. एकेका कॉनव्हाॅय म्हणजे ताफ्यात शेकडोनी वाहने असतात. पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने जातात. एवढ्या प्रतिकूल वातावरणातले त्यांचे हे झोकून देऊन काम करणे पाहून त्यांचे खूपच कौतुक आणि अभिमान वाटला. आमच्या सॅल्युटला ते पण कडक  सॅल्युटने उत्तर देत होते.

सोनमर्गला जायला जवळजवळ चार-पाच तास लागले. पण प्रवासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सर्वांच्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या सुरू होत्याच. पण बाजूचा निसर्ग कितीही पाहिला तरी समाधान होत नव्हते.

एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी होती. दरीच्या पलीकडे बर्फाच्छादित उंच पर्वत, मध्येच हिरवीगार कुरणे, मधे मधे स्वच्छ सुंदर सरोवरेही दिसत होती. जिकडे बघावे तिथले दृश्य म्हणजे एक एक चितारलेला कॅनव्हासच वाटत होता. सोनमर्ग इथल्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे. सोनमर्ग म्हणजे ‘सोन्याची कुरणे’. इथे हिरवळीची मैदानी कुरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्फाच्या टोप्या घातलेली पर्वत शिखरे आणि हिरवीगार कुरणे ही सोनमर्गची वैशिष्ट्ये आहेत. सोनमर्गला ‘सरोवरांची नगरी’ पण म्हणतात. इथे लहान मोठी असंख्य सरोवरे आहेत. त्यातले ‘विशनसर’ सरोवर तर खूप प्रेक्षणीय आहे. नितळ निळेशार पाणी, सभोवती हिरवीगार कुरणे यामुळे अतिशय सुंदर दिसणारे हे मोठे सरोवर सर्वांना आकर्षित करते. वसंत ऋतूत तर इथे रंगीबेरंगी फुलांनी जागोजागी चादर पसरलेली असते.

असा आजूबाजूचा निसर्ग पहात, प्रवासाचा आनंद घेत आम्ही सोनमर्गला पोहोचलो. इथे ‘बबलू’ या मराठी रेस्टॉरंटमधे  आम्हाला चक्क पिठलं भाकरीचे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले.

इथून वेगवेगळ्या चार पाच पॉईंटना छोट्या वाहनाने जाता येते. आम्ही तिथल्याच मोठ्या पठारावरून थोड्या अंतरावरील शिखरावर चढून गेलो. तिथून थाजीवास ग्लेशियर दिसते. ते संपूर्ण दृश्य अप्रतिम दिसत होते. त्याच्या समोरच्या उंच शिखरावर बर्फाने घातलेली टोपी म्हणजे जणू हिऱ्याचा मुकुट शोभून दिसत होता. सूर्योदयाच्या वेळी पहिल्या सूर्यकिरणात हा बर्फ पिवळा दिसतो तेव्हा जणू सोन्याचा मुकुट वाटतो. पण तो नजारा आम्हाला त्यावेळी बघणे शक्य नव्हते.

शुभ्र हिमाच्या शिखरावरती

 सहस्त्ररश्मी तळपला

 सुवर्णवर्खी शाल ओढूनी

 सुवर्णहिम झळकला ||

बाजूच्या उतारावर मेंढ्या चरत होत्या. एखाद्या सुंदर चित्रावरच आपण उभे असल्याचा भास होत होता. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. हाच निसर्ग संध्याकाळी वेगळाच दिसत होता. तो अनुभवत आम्ही परत निघालो.

एकूणच सोनमर्ग इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच ते ट्रेकर्सचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. ट्रेकिंग साठी इथे असंख्य ठिकाणे आहेत. इथले ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. इथेच अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प पण आहे.

सोनमर्गच्या असंख्य नितळ पाण्याची सरोवरे, हिरवीगार कुरणे, रंगीत फुलांचे गालिचे, दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्याच्या मधूनच जाणाऱ्या नागमोडी घाटाने आम्ही परत आलो.

श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम, सोनमर्ग अशा काश्मिरच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या दर्शनाने मन भरून आणि भारूनही गेले. खरोखरीच हे नंदनवन भारताचे भूषण आहे. आधुनिकीकरणासाठी इथल्या निसर्गाला कसलीही हानी पोहोचवलेली नाही. म्हणूनच हे अनाघ्रात सौंदर्य आहे तसेच  बावनकशी राहिलेले आहे. हे सर्व पाहून मन तृप्त समाधानाने भरले होते. आमची ही नंदनवनाची सफर आता खरोखरच आनंदाचा ठेवा बनवून राहील.

 – समाप्त –

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ३” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ३” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज आम्ही पहेलगामला भेट देणार होतो. अगदी उत्साहात सर्वजण तयार होऊन निघाले. अनंतनाग जिल्ह्यातले हे ठिकाण सृष्टी सौंदर्य आणि उत्साहवर्धक हवेसाठी प्रसिद्ध आहे. इथे वर्षात चार ऋतू व्यवस्थितपणे अनुभवता येतात. सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, आसमंतात उंचचउंच पाईन आणि देवदार वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. हे सर्व पहात पहात आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या जवळून खळाळत वाहणारी लिद्दर नदी, पाण्याचा खळखळ आवाज, हिरवीगार वृक्षराजी यामुळे वातावरण खूप छान होते. जाताना वाटेत प्रसिद्ध अनंतनाग मधून पुढे गेलो. काश्मिरी भाषेत नाग म्हणजे पाण्याचा झरा किंवा प्रवाह. झेलम नदी बेहरीनाग मधून उगम पावते. संगम गावात झेलम नदी आणि लिद्दर नदीचा संगम होतो.

आम्ही पामपूरमधे केशर मळ्याला भेट दिली. इथे ५० स्क्वेअर किलोमीटरच्या टापूत केशर पिकवतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा त्याचा सीझन असतो. त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेतली. केशर खरेदी बरोबर कावा चहाचा आस्वादही घेतला.

इथून पुढे ‘अवंतीपुर मंदिर अवशेषां’ना भेट दिली. अवंतीपूर राजा अवंतीवर्मांची राजधानी होती. इथे अवंती स्वामी म्हणजे विष्णू आणि अवंतीश्वर म्हणजे शिव अशी दोन दगडी मंदिरे होती. या मंदिरात अतिशय सुंदर कोरीव काम, भव्य मूर्ती होत्या. पण भूकंप आणि भूस्खलनात मंदिराचे अवशेषात रूपांतर झाल्याचे समजले. अजूनही तिथे काही मूर्ती, खांब वगैरे शाबूत आहेत. त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. आता पुन्हा हे मंदिर पुनरुज्जीवीत करण्यासाठी काम सुरू आहे. याच ठिकाणी ऑंधी सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’  हे गाणे चित्रीत झाल्याचे समजले.

पहेलगाम हे गाव छोटसं पण पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पहेलगाम म्हणजे मेंढपाळांचं गाव. इथून छोट्या वाहनांनी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो. सुरुवातीला पोहोचलो चंदनवाडीला. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे हे प्रवेशस्थळ आहे. इथल्या पायऱ्या चढून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि पुढे जाते. प्रत्यक्ष अमरनाथाला नाही पण पहिल्या पायरीला हात टेकून अमरनाथाला मनोभावे नमस्कार केला.

समोर सगळीकडे बर्फचबर्फ होता. इथला बर्फ थोडा कडक घसरडा असल्याने हातात काठ्या घेऊन गमबूट घालून पर्यटक फिरत होते. बर्फात खेळत होते. बर्फाखालून वहाणारा खळाळता पाण्याचा प्रवाह मध्येच उघडा झाल्याने छोटे ग्लेशियर तयार झाले होते. सर्वांचे फोटो सेशन उत्साहात सुरू होते. नजर जाईल तिथवर पसरलेला बर्फ, बर्फाच्छादित झाडे, शिखरे यामुळे निसर्गाची अद्भुत लीला इथेही अनुभवायला मिळत होती.

इथून परत येताना बेताब व्हॅलीला गेलो. या व्हॅलीचे मूळ नाव हजन व्हॅली असे होते. पण इथे हिंदी चित्रपट ‘बेताब’चे शुटिंग झाले आहे आणि त्यानंतर ही व्हॅली ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. समोर बर्फाच्छादित पर्वतशिखरे, पाईन आणि देवदार वृक्षांची जंगलासारखी दाट झाडी, आभाळाला स्पर्श करू पाहणारी उंच उंच झाडे, दूरवर पसरलेली हिरवीगार कुरणे, जवळच वहाणारा खळाळता जलप्रवाह असे अतिशय विलोभनीय सृष्टी सौंदर्य सभोवार दिसत होते. त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करीत तृप्त मनाने परत फिरलो.

वाटेत पुढे क्रिकेट बॅट बनविणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली. विलोची  झाडाच्या लाकडापासून या बॅट्स बनवितात. हे लाकूड थंडी, उन, वारा, पाऊस या कसल्याही परिस्थितीत अजिबात खराब न होता आहे असेच राहते हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा उद्योग इथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.

एकूणच आजचे स्थल दर्शन खूप छान झाले होते. मनाला भुरळ घालणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांचे दर्शन, उदरनिर्वाहासाठी स्थानिकांची चालणारी धावपळ अशा संमिश्र भावनात निसर्ग किमयेला मनोमन नमस्कार करीत उद्याच्या सोनमर्ग भेटीची आस घेऊनच हॉटेलवर परतलो.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आम्ही आज गुलमर्गला भेट देणार होतो. प्रत्यक्ष हिमशिखरावर चढाई. मनात खूप उत्सुकता होती. पहाटे साडेपाच वाजता आमची बस निघाली. त्यामुळे गाडीतून सूर्योदय बघायला मिळाला. अगदी सूर्योदयापासूनची निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच देवदार वृक्ष, सूचीपर्णी झाडे, सफेदाची झाडे होती.

तो धावता निसर्ग अक्षरशः नजर खेचून घेत होता. मधूनच हिमशिखरे दिसत होती. शिखर दिसले की एकमेकांना हाका मारून दाखवणे आणि त्याचे वर्णन करणे अखंड सुरू होते. सगळेच जण अतिशय उत्साहीत होते.

गुलमर्गच्या आधी तांगमर्गला सर्वांनी फरकोट, हातमोजे आणि गमबूट घेतले. तिथून छोट्या गाड्यांनी सर्वजण पुढे गुलमर्गला गेलो. वळणावळणाचा  घाटरस्ता आणि त्यातून दिसणारा निसर्ग खुणावत होता. इथून आता खास आकर्षण असणाऱ्या गोंडोला राईडने म्हणजेच केबल कारने पर्वतावर जायचे होते.

सुरुवातीला केबल कारने पहिला टप्पा कांडोरी स्टेशनवर गेलो. आम्ही अंदाजे दहा हजार फूट उंचीवर पोहोचलो होतो. एकदम वातावरणात फरक जाणवत होता. उंचावरची बर्फाच्छादित शिखरे, धुके, खोल दरी यांचे दृश्य खूपच सुंदर होते. ज्यांना हवेचा त्रास जाणवत होता,  पुढे उंचावर जायचे नव्हते असे अनेक जण याच टप्प्यावर हाती काठी घेऊन किंवा घोड्यावरून समोरील उंच टेकडीवर चढत होते. इथला बर्फ जुना असल्याने खूप टणक आणि घसरडा होता. इथे काचेचे इग्लू रेस्टॉरंट आहे.

या स्टेशनवरून आम्ही केबल कारने अफरवत पर्वतावरील दुसऱ्या टप्प्यावर गेलो. तिथे आम्ही १३५०० फूट उंचीवर आलो होतो. केबल कारने वर जाताना खाली खोल खोल दरी,  उतारावरील उंच उंच पाईन वृक्ष आणि वरची एकदम उंच शिखरे यामुळे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. असे अधांतरी तरंगत जाण्यातला थरार मात्र जबरदस्त होता. आजूबाजूचे दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्व झाडे, पर्वताचा बराचसा भाग बर्फाच्छादित असल्याने पांढरा दिसत होता.  दुसऱ्या टप्प्यावर आलो आणि शब्दशः बर्फात उतरलो. चारीबाजूने बर्फाच्छादित शिखरावर पोहोचलो होतो. समोरचे दृश्य बघून अक्षरशः नजरबंदीच झाली.

शिव शंभूची पवित्र भूमी

 बर्फाच्छादित शुभ्र कडे

विलोभनीय निसर्गाचे

 भव्य दिव्य दर्शन घडे ||

तिथे एकदम खूपच थंड हवा होती. सर्वांनी सर्व जामानिमा परिधान केलेला असल्याने थंडीचा त्रास होत नव्हता. बर्फ एकदम ताजा होता. अगदी भुरभूरीत. हाताने गोळा करता येत होता. तिथे आल्यावर सर्वच पर्यटकांचे बर्फातले खेळ सुरू झाले. नातवंडांनी गोळे केले, बाहुल्या बनवल्या, चक्क बर्फावर लोळणही घेतली. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी गॉगल्स घातले होते. एकंदरीतच प्रत्येकाचे रूप एकदम इथे वेगळेच झाले होते.

या ठिकाणी फोटो काढायची तर पर्वणीच होती. विविध पोज मध्ये सर्वांचेच फोटो सेशन सुरू होते. बरेच जण बर्फात स्किईंग, स्नो-बोर्डिंग करत होते. इतके दिवस ऐकू येणारी हिमशिखरांची साद इथे वरती आल्यावर शांत झाली होती. आम्ही वरपर्यंत येऊ शकलो याचे समाधान खूप मोठे होते. त्यामुळे एक खूप मोठा आनंददायी अनुभव मिळाला होता

जवळजवळ दोन अडीच तास इथे घालवायला मिळाले. किती  बघू आणि किती नको असं झालं होतं. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधानच होत नव्हतं. ऐकणं, सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक असतो त्याची इथे चांगलीच प्रचिती आली.  निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्याच्या समाधानात केबल कारने पुन्हा खाली आलो.

गुलमर्ग हे पीर पंजाब रेंजमध्ये आहे. ते पूर्वी ‘गौरी मार्ग’ म्हणून ओळखले जात असे. केबल कारने म्हणजेच गोंडोलाने अफरवत पर्वतावर आपण जातो. इथून खिल्लनमर्गचे विलोभनीय दर्शन होते. अप्रतिम नजारा दिसतो. काश्मीर ट्रीपचे खास आकर्षण म्हणजे ही गुलमर्गची गोंडोला राईड. ही गोंडोला आशियातील सर्वात उंच तर जगातील दुसरी सर्वोच्च आणि दुसरी सर्वात लांब केबल कार आहे. एका कारने सहा जणांना जाता येते.  इतरांच्या केबल कार वर जाता येता पाहणे, आपण स्वतः जाता येतानाचा अनुभव घेणे, त्या वेळेचे निसर्गदर्शन हा एक खूप वेगळाच पण सर्वांगसुंदर अनुभव आहे. पांढरे झालेले असंख्य उंचच उंच पाईन वृक्ष, बर्फाच्छादित उंच शिखरे आणि खाली खोल दरी यामध्येच ऊन आणि धुक्याचा पाठशिवणीचा खेळ हे अतिशय मनोरम दृश्य असते. केवळ एक अविस्मरणीय असा बेजोड अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो.

परत येताना काश्मिरी कार्पेट फॅक्टरीला भेट दिली. प्रत्येक प्रांताचे एकेक वैशिष्ट्य असते. काश्मिरी गालिचे ही इथली खास निर्मिती. कार्पेट कसे बनवतात याची झलक आणि असंख्य सुंदर असे नमुने बघितले. अगदी लाखाच्या पुढे किंमत असलेला अप्रतिम गालिचा बघीतला. एक अतिशय उत्तम आणि खास अशी ही कलाकारी आहे. ही कार्पेटस् घराच्या दिवाणखान्याला किंवा बैठकीच्या खोलीला एकदम खानदानी रूबाब बहाल करतात. अशा रीतीने आजचा दिवसही अतिशय छान गेला. हिमशिखरांचा एक अविस्मरणीय असा सहवास अनुभवता आला. आता वेध होते ते पहेलगामचे.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची

दरवेळी हे नाट्यगीत ऐकताना हिमालयाची ओढ जागी व्हायची. खरं तर ती शुभ्र हिमशिखरे डोळा भरून पाहण्याची माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छा असते. पण ती प्रत्यक्षात येणे इतके सोपे नसते. इतकी वर्ष ती शिखरं साद घालीत होती. यावर्षी आम्ही तिला प्रतिसाद दिला. या सुट्टीत काश्मीरला भेट देण्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात आले.

भारतभूच्या  ‘नंदनवना’ची सफर ठरली. नियोजनाचे सर्व सव्यापसव्य पार करीत आम्ही अगदी सहकुटुंब त्या देवभूमीत जाऊन पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. त्या संधीप्रकाशात ‘दल’ सरोवरात एका शिकाऱ्यातून आमच्या नियोजित हाऊस बोटवर जाऊन पोहोचलो. विविध रंगात, विविध प्रकाराने, रोषणाईने सजविलेले शिकारे, मोठ्या हाऊस बोटस् आणि त्यांची पाण्यातील प्रतिबिंबे ! एकूणच भुरळ घालणारं मोठं मोहक वातावरण होतं.

आत्तापर्यंत सिनेमातून पाहिलेली शिकाऱ्यातली गाणी आठवली. काश्मिरी गालिचे, कलाकारी, लाकडी कलाकुसर, झुंबरं यामुळे हाऊस बोट मधील वातावरणात आपोआपच शाही महालाचा आभास जाणवत होता. या बोटीवर राहण्याचा अनुभव खूप खास होता. एक वेगळाच आनंद मिळला.

या हाऊस बोटची संपूर्ण लाकडी बांधणी आणि रचना खूप वेगळी असते. देवदार वृक्षापासून ती बनवतात. हे लाकूड पाण्यामधे खराब न होता सुरक्षित रहाते. एक बोट बनवायला अंदाजे ३ ते ५ कोटी पर्यंत खर्च येतो. या बोटी इथल्या पर्यटनाच्या खासियत आहेत. करोना काळानंतर आता पर्यटनाने पुन्हा वेग पकडला आहे.

चार चिनार’च्या बेटावर जाताना फक्त आपापल्या कुटुंबासोबत केलेली अडीच तीन तासांची शिकारा राईड केवळ अविस्मरणीय होती. साथीला ‘आपलं माणूस’, संथपणे जाणारी बोट, आजूबाजूला जाणारे असंख्य शिकारे,  दूरवर पसरलेले दल सरोवर, पार्श्वभूमी वरती उंच उंच चिनार, देवदारची झाडे, पर्वतरांगा केवळ अप्रतिम ! अगदी स्वप्नवत अनुभव होता तो.

चार चिनारच्या बेटावर प्रसन्न, आल्हाददायक वातावरण होते. दूरवर दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, ‘कावा’ चहाची सुंदर चव, कश्मिरी फिरन / फेरन मधील फोटो सेशन असे सुखद क्षण घेऊन परत फिरलो.

परत येताना फ्लोटिंग मार्केटमध्ये काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, कार्पेट्स, लाकडी वस्तू, ज्वेलरी यांच्या शोरूमस्, दुकाने बघितली. या सरोवरात गवताच्या बेटांवर वाफे बनवून शेती केली जाते ही गोष्ट खूप वेगळी होती.

यानंतर बघितले ते पुरातन धार्मिकस्थळ म्हणजे शंकराचार्य मंदिर. गोपाद्री पर्वत किंवा शंकराचार्य टेकडीवरील शंकराचार्य मंदिराला ‘जेष्ठेश्वर मंदिर ‘ असेही म्हणतात. या मंदिरात शंकराचे अति भव्य लिंग आहे. शंकराचार्यांचे साधना स्थळ पण तिथे आहे. उंच पायऱ्या चढण्याचा काहीही त्रास न होता आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या पवित्र मंदिराला भेट देता आली याचे मनाला खूप समाधान मिळाले. या मंदिर परिसरातून श्रीनगरचे आणि भव्य निसर्गाचे विलोभनीय दर्शन झाले‌. हा मंदिर परिसर मिलिटरीच्या अधिपत्याखाली असल्याने सर्व व्यवस्था, स्वच्छता वगैरे गोष्टी उत्तम आहेत.

त्यानंतर श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘निशात बागे’ला भेट दिली. असंख्य नमुन्याचे गुलाब पाहून मन अतिप्रसन्न झाले. अगदी छोट्या गुलाबापासून खूप मोठ्या आकाराचे कलमी गुलाब होते. असंख्य रंग, आकार, एकाच फुलात वेगवेगळ्या रंगछटा, वेली गुलाब असे एकाहून एक वेगवेगळे गुलाब पाहून ‘हे पाहून का ते’, ‘ हे सुंदर का ते जास्त सुंदर ‘ असे होऊन गेले.  शोभेची छोटी छोटी फुले सुद्धा तितकीच विविध आकार आणि रंगात आकर्षित करीत होती. चिनारचे मोठे मोठे वृक्ष वातावरण जास्तच शितल आणि आल्हाददायक बनवीत होते. बागेच्या मध्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा, कारंजी नेत्रसुखद होती. एकंदरीत ही बाग ‘ दि गार्डन ऑफ प्लेजर’ हे नाव सार्थ करत होती.  

त्यानंतर ‘शालिमार बागे’ला भेट दिली. इथेही मोठे मोठे चिनार वृक्ष, असंख्य रंगीत गुलाब, धबधबा, कारंजी, राणीमहाल, इतर दोन-तीन जुन्या इमारती आहेत. प्रचंड मोठी अशी ही बाग माणसांनी पण भरलेली होती.

एकंदरीतच अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, शिकारा सफर, शंकराचार्य मंदिर दर्शन यामुळे श्रीनगर मधील पहिला दिवस खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्यक्ष हिमशिखरावर जायची जास्ती उत्सुकता होती.

क्रमशः… 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य  आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?

गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं.  “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात.  त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया. 

देश पारतंत्र्यात होता.  ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे  पिचलेला होता.  समाज विस्कटलेला होता.  अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता.  ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही  होता.  मात्र सामान्य जनांना,   परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध  एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी,  स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे. 

वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते.  ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी  जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती,  उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून,  ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती.  आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.

लोकमान्य टिळकांनी १८९३साली  केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली.  समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता.  या माध्यमातून  त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली.  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले.  थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे  राष्ट्रकारण होते.  एक अत्यंत उदात्त,  प्रेरक असे कारण होते.  धर्मकार्य हा केवळ बहाणा होता.  स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते. 

या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली.  आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.

मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे  व्यक्त करावेसे वाटतात. 

माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला.  पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे.  या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले.  गणेश मूर्तीभोवती  केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले.  गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली.  कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले.  उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले.  ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते.  लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे.  त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय.  सण उत्सव हे संघटनात्मक असतात.  समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात.  अहमहमिका, चढाओढ दिसते.  राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो.  शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते.  म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही  एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली.  स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात.  ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच.  आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान  यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची,  ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.

म्हणूनच  नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको.  एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको.  नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे.  आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.

तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print