मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

महेशचं घर एका देवळासमोर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती.

चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला.  तर काचेवर एक चिठ्ठी अडकवलेली होती. त्या चिठ्ठीवर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता, आणि फोन करण्यास सांगितले होते.

त्याने त्या नंबरवर फोन लावला. 

पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘ मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. 

मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’

त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, आणि तो माफीही मागत होता. 

महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘ तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबूल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.”

यावर तो माणूस म्हणाला…

“कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर— तर माझ्यासारख्या माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? “ 

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.

त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.

प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.

पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर. 

मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”

“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “ 

मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”

ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”

एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.

त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.” 

खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.

अशीच परिस्थिती देशात राहणार्‍या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.

अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल. 

संग्राहक : विनय गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हीच शुभेच्छा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ हीच शुभेच्छा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना  वेटिंग रूम मध्ये बसून ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत, त्यांचा नातेवाईक लवकर पूर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा ही शुभेच्छा….!

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी  पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…..!

शेजारणीच्या घरचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा…..!

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं ही शुभेच्छा…..!

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…..!

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा…..!

आपल्या खिशाला कात्री लावून आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी स्वतःकरता काही न घेता मन मारुन दिवाळी  साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दिवाळी साजरी करता  यावी त्याबद्दल शुभेच्छा..!

सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे—-  हीच इच्छा…

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असं कुठं असतं का देवा? ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ असं कुठं असतं का देवा? ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर

जन्म दिलास माणसाचा

हाच एक जन्म जिथून

मार्ग खुला मोक्षाचा

दिलंस एक मन त्यात

अनेक विचारांचा वावर

आणि म्हणतोस आता

या विचारांना आवर 

दिलेस दोन डोळे

सौंदर्य सृष्टीचे बघायला

आता म्हणतोस मिटून घे

आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला 

नानाविध चवी घेण्यास

दिलीस एक रसना

आणि आता म्हणतोस

अन्नावर ठेवू नकोस वासना 

जन्मापासून नात्यांच्या

बंधनात अडकवतोस

बंध सगळे खोटे असतात

असं आता म्हणतोस

भाव आणि भावनांचा

इतका वाढवतोस गुंता

आणि मग सांगतोस

व्यर्थ आहे ही चिंता

संसाराच्या रगाड्यात

पुरता अडकवून टाकतोस

म्हणे शांतपणे ध्यान कर आता

अशी कशी रे मजा करतोस??

मेजवानीने भरलेले ताट 

समोर बघून उपास करायचा

हाच अर्थ का रे

सांग बरं मोक्षाचा?

वर बसून छान पैकी

आमची बघ हो तू मजा

पाप आणि पुण्याची 

मांड बेरीज आणि वजा

माहीत नाही बाबा मला

मिळेल की नाही मोक्ष

तू जवळ असल्याची फक्त

पटवून देत जा साक्ष ……

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

” नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवी चेतना भरून घ्यावी जाने त्याने हृदयागारी

उल्हासाचे रंग भरले  नभांतरी दशदिशांतरी “🌅

दिवाळी सुट्टीचा शेवटचा रविवार, उद्यापासून परत रोजचा दिनक्रम सुरु होणार. मस्त पडलेल्या  या थंडीत नव-उत्साहात ,नव्या चेतना नवीन स्वप्ने घेऊन सुरवात करायची.

” स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती

सूर सूर होता सर्व भावना निनादती 🎼

वाजतात पायीची बघ अजून नुपूरे

तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे”

“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी” म्हणता म्हणता दिवाळी येऊन केंव्हा गेली हे कळलच नाही. मात्र प्रत्येकाच्याच आनंदाची ‘जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे “

आता फूल घ्यायचे तर काट्यांचा सामना करायलाच पाहिजे का दरवेळेला? तरीपण

” हे फूल तू  दिलेले मजला पसंत आहे

आहे फुलात काटा तो ही पसंत आहे

कधी सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी

श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे “

ही देव गाणी आठवत, मनात गुंजन करत पुढे जात रहायचे

कवी यशवंत देव यांचा ३० आँक्टोबर स्मृतीदिन तर १ नोव्हेंबर जन्मदिन त्यांच्या स्मृतीस विनम्र 🙏🙏

“पडसाद कसा आला न कळे,अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केली कुणी

🎤🎼🎹

उरल्या सगळ्या आठवणी. “

(देवांचा चाहता)  अमोल 📝

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

बळे धुंधार सुटला वारा !

थोर प्रजन्य मोकळी धारा !

फडफडा पडती गारा रे !

हिंव वाजते थरार रे !! धृ !!

 

मेघ वोळले अंबरी !

विजु झमके तदनंतरी !

गर्जताहे नानापरी रे !

घरे उडती वरिच्या वरी रे !! १ !!

 

घडी मध्ये चि पाण जंजाळ !

पूर लोटले पाभळ !

नदि फुफाती चळचळ रे !

जाऊ नेदीति ओहळ रे !! २ !!

 

कडे कोसळती पर्वती !

जळे उदंड पडिल्या भिंती !

थंडवारे घरे गळती रे !

भूमीवर त्या पाझरती रे !! ३ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला थोर !

गुरे निघेतना बाहेर !

केव्हा दिसेल देव दिनकर !

लोक बहुत जाले जेर रे !! ४ !!

 

जळे उदंडचि लोटली !

नदीतीरे पीके वाहवली !

ठांई ठांई किती बुडाली रे !

गुरे माणसे पुरे नेली रे !! ५ !!

 

माळवदे किती पडली !

पेवामध्ये पाण्ये भरली !

मोठी मोठी झाडे उन्मळली रे !

पिके अवघी पिंगटली रे !! ६ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला फार !

खवळला नेणो जळधर !

तळी उचंबळली थोर थोर रे !

जेथे निघती पाझर रे !! ७ !!

 

कधी दिसतील उष्ण कीर्णे !

केव्हा उठेल मेघ धरणे !

जीवा होयील सुख पारणे रे !

रवि थोर तो याचकारणे रे !! ८ !!

 

रवि कीर्णीचा पाऊस !

लोक पावती संतोष !

रवि वेगळे कासावीस रे !

धन्य आमुचा सूर्यवंश रे !! ९ !!

 

— समर्थ रामदास स्वामी

 

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 ५३.

अगणित रंगाच्या रत्नांनी कौशल्यानं घडलेलं,

नक्षत्रांनी जडवलेलं हे कंगन सुरेख आहे.

 

पण भगवान विष्णूंच्या गरुडाच्या आरक्त सूर्यप्रकाशात पूर्णपणे तळपणाऱ्या पंखांच्या

विजेच्या आकाराची ही तू दिलेली तलवार

अधिक सुंदर आहे.

 

मृत्यूचा अखेरचा घाव बसल्यानंतरच्या दु:खाची

अखेरची धडपड व्हावी तशी ती चमचम करते.

एकाच भीषण आघातानं जाणीव होतानाच्या

शुध्द ज्वालेप्रमाणं ती तळपत राहते.

 

तू दिलेलं कंगन सुरेख आहे.

त्यावरील नक्षत्रासारखे मोती छान आहेत.

पण तू दिलेली तलवार हे स्वामी, किती सुंदर बनवली आहे!

ती पाहताना तिचा विचार मनात आला तरी भीती वाटते.

 

५४.

तुझ्याकडं मी काहीच मागितलं नाही की

माझं नावही तुला सांगितलं नाही.

तू परतून गेलास तेव्हा मी स्तब्ध राहिलो.

झाडांच्या सावल्या

वेड्यावाकड्या पसरलेल्या होत्या.

आपल्या तांबड्या घागरी काठोकाठ भरून

बायका गावाकडे परतत असताना

त्या मला पालवीत होत्या.

“घराकडे चल. सकाळ संपून दुपार होत आलीय.”

पण. . .

एकटाच विहिरीच्या आसपास भटकत राहिलो.

धूसर चिंतनात मी हरवून गेलो.

 

तू माझ्याकडे येत असताना

तुझ्या पावलांचा आवाज मला ऐकू आला नाही.

दु:खभरल्या नजरेनं माझ्याकडे पाहून

दमलेल्या आवाजात म्हणालास,

“अरे! मी तहानलेला प्रवासी आहे.”

मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो आणि

तुझ्या जुळलेल्या ओंजळीत पाण्याची धार धरली.

 

माझ्या माथ्यावरची पानं सळसळली.

दूरच्या काळोखात कोकीळ गाऊ लागला.

रस्त्यावरच्या वळणावरून ‘बाबला’ फुलांचा वास

दरवळला.

तू माझं नाव विचारलंस तेव्हा

शरमेनं मी उगी राहिलो.

माझं नाव लक्षात ठेवण्यासारखं

मी तुझ्यासाठी काय केलंय?

तुझ्या तहानवेळी मी तुला पाणी देऊ शकलो

याची जाण मी मनात जपून ठेवीन आणि

तिची गोडी माझ्या ऱ्हदयात फुलत ठेवीन.

 

सकाळ संपली, पक्षी उंच स्वरात गाताहेत.

निंबाच्या झाडावरची पानं सळसळताहेत आणि

मी विचार करतो आहे…

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 ‘वाटेवर काटे वेचित चाललो

वाटले जसा फुलाफुलात चाललो’

रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.

हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.

जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.

आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली.  पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.

आता तिला वाटेत येणार्‍या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.

पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.

एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.

प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.

म्हणूनच दुसर्‍या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.

आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.

ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••

“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि  आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्‍या प्रकाशवाटा असतात.”

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस … लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच

थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.

दिवसभर खेळून हात-पाय थंडीने उकलायचे.

किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर

पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’ राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे-रुपयाची नाणी.फटाके आणायला खारीचा वाटा.

फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.

एकदम ‘श्रीमंत’ झाल्यासारखं वाटायचं.

घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात

गळालेल्या फटाक्यांचीसुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे’ – आजी सांगायची. पण इथे झोप

कोणाला असायची! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.

न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात ऊब

आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.

तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान

वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.

मला तो आवडायचा. ‘मोती’ साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये, असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.

मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा. बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून…त्यातच मज्जा असते.

दिवस हळूहळू

उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा.

आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं?

लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.

सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये की

आता आपण खूप पुढे आलोय..?

 

गेले ते दिवस!

उरल्या त्या आठवणी!

 

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print