मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत  वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….

अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.

तर झालं असं..

चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!

कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.

29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि  पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….

दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या  गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या 

हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि  मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.

त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर  उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.

बिछान्यावर पडताच झोप लागली.

दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन  आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.

दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी  परिस्थिती अधिक आव्हानात्मक  होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency  लागली नाही.

रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या  गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती. 

एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण  डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत  असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

 क्रमशः…

लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

अल्प परिचय

शिक्षण – B.Arch.1985, ME Townplanning.1987

सम्प्रति –

  • दहा वर्षे आर्कीटेक्ट व इंटीरियर डिझायनर व्यवसाय.
  • अक्षरानंदन या संस्थेत एक वर्ष काम केले.
  • पालकनीती या मासिकाच्या संपादकीय मंडळावर 20 वर्षे.
  • पालकनीती परिवार या एन् जी ओ वर 1996 पासून विश्वस्त.
  • स्वतःच्या घरी ‘खेळघर’ या, झोपडपट्टीतील मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात.
  • 1998 पासून शिक्षण आणि पालकत्व या क्षेत्रात तज्ञ मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत.

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

खूप वर्षे झाली…. कधीपासून बरं? आपल्या मनातल्या विचारांबद्दल कळायला लागलं तेव्हापासून हा शोध मनात पिंगा घालतोय.

आपल्याच जगण्याकडे थोडे बाहेरून बघायला लागल्यावर कधी कधी काही उलगडल्यासारखं वाटतं… त्याबद्दल लिहायचं आहे.

कधी छान वाटतं? कशामुळे? कशामुळे रुसतो आनंद आपल्यावर?

आवर्जून प्रयत्न करून मिळवता येतो का आनंद? शोधुयात बरं … असं ठरवलं आणि लिहायला सुरूवात केली. 

बहुसंख्य वेळा मन व्यापलेलं असतं  कशाने तरी… काय असतं हे ओझं? 

काळजी, ताण, भविष्यात करायच्या गोष्टींची आखणी किंवा मनासारखं झालं नाही म्हणून राग, अचानक काही वाईट घडतं त्याचं दुःख, गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून असहायता… अशा अनेक गोष्टींनी व्यापलेलं असतं मन! 

त्यात मुळी जागाच उरत नाही आनंदाला! 

अच्छा असं होतंय का?

थोडे आणखी खोलात जायला हवे…… 

काळजी, ताण, राग, दुःख अशा भाव भावनांची वादळे आपल्या मनाचा अवकाश व्यापून रहातात आणि म्हणून आनंदाला जागा रहात नाही शिल्लक! म्हणजे हे तर अडथळे आहेत आनंदाच्या वाटेवरचे. पण असे कसे, आपण माणूस आहोत, भावना तर असणारच. ते संवेदनाक्षम मनाचे लक्षण आहे. 

या भावभावना उत्स्फूर्तपणे आपल्याही नकळत मनात उफाळून येतात आणि दंगा घालतात. मला आठवतंय, छोटीशी घटना घडते आणि खूप काही जुनं जुनं वर येतं आणि मन अस्वस्थ होऊन जातं. असं का होतं? खरंच या  भाव भावनांना समजून घ्यायला हवं आहे. भावनांचे वादळ जरा शमले, की ते सारे विसरून पुढे जायची घाई असते आपल्याला!

मनाच्या शांत अवस्थेत स्वतःच्या वर्तनाला, भावनांना निरखून पहायला वेळ काढला तर… ?

लहानपणी ऐकलेल्या एका प्रार्थनेच्या ओळी आठवताहेत,

” दिसाकाठी थोडे शांत बसावे,

मिटूनी डोळे घ्यावे क्षणभरी.

एकाग्र करोनी आपल्या मनाला,

आपण पहावे निरखोनी.”

——ही शांतता, हा ठेहेराव मिळवू शकू का आपण…?

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

नेहाशी, फोन  वर  बोलत  होते. “आई, तुम्ही सांगितलं तश्या  कापसाच्या गाद्या बनवून  घेतल्या हं.”

“बरं केलंत… इतक्या लहान  वयात  कसली  ती पाठदुखी आणि कंबरदुखी.!!”””मी म्हटलं..

इकडचं तिकडचं बोलून मी फोन  ठेवला—-

—-आणि  त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोहोचले .

मला  तो खांद्यावर  काठी  टाकून धनुष्यासारखी  दोरी ताणत  “एक विशिष्ट  टिंग टिंग “आवाज  करीत  चाळीत  शिरणारा लखन आठवला … कापूस पिंजून गाद्या शिवून  देणारा. शिवाजी  पार्कच्या १३० बिऱ्हाडं असलेल्या चाळीत  तो रोज यायचा . एकही दिवस  असा नाही जायचा  की त्याला काम नाही मिळालं…

.. माझ्या चाळीतल्या आठवणी  “चाळवल्या  “गेल्या… 

कित्ती लोकं यायची सकाळपासून !!!!

आता सोसायटी किंवा कॉम्प्लेक्समधेही  सकाळपासून माणसं येत असतात. पण ती “स्विगी” ची, नाही तर  “झोमॅटो”ची.  नाहीतर  “amazon, myntra, etc. ची.   कुठल्याही वेळी आणि बिन चेहऱ्याची , अनोळखी माणसं..

खरं  तर  इमाने इतबारे, कष्टाने  इकडची  वस्तू तिकडे “पोचवण्याचं  ” काम करीत  असतात बापडी.

पण मनात  “पोहोचू  “शकत  नाहीत.

याउलट  साठ सत्तरच्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी  होऊन मनापर्यंत  पोहोचली  कळलंच  नाही.

सकाळची  शाळा असायची. रेडिओ  वर मंगल  प्रभात सुरू असायचे . त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या “वासुदेवाची ” Entry व्हायची. तेव्हढ्या ” घाईतही  त्याला दोन पैसे  द्यायला धावायचो ..

रोज नाही यायचा  तो. पण त्याच्या विचित्र पोशाखाचं  आणि गाण्याचं वेड होतं आम्हाला…

कधी  एक गृहस्थ  यायचे . भगवी  वस्त्र ल्यायलेले. हातात कमंडलू असायचं. तोंडाने “ॐ, भवती  भिक्षां देही “असं म्हणत  सगळ्या चाळीतून  फिरायचे, कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचे ही नाहीत.

मी आईला  कुतूहलाने विचारायचे, “ ह्यांचाच  फोटो असतो का रामरक्षेवर ? “

आठवड्यातून  एकदा घट्ट  मुट्ट, चकाकत्या  काळ्या रंगाची  वडारीण  यायची . “जात्याला, पाट्याला टाकीय,…”

अशी  आरोळी  ठोकत . जातं नाही तरी  पाटा घरोघरी  असायचाच . त्यामुळे दिवसभर  तिला काम मिळायचंच .

तिची  ती विशिष्ट पद्धतीने  नेसलेली साडी.. अंगावर  blouse  का घालत  नाही याचं आमच्या  बालमनाला  पडलेलं कोडं असायचं. (हल्लीची  ती कोल्ड shoulder आणि  off shoulder ची  फॅशन  यांचं  चित्र बघून आली  की काय?)

हमखास  न चुकता  रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची  गाडी असायची . “मिठ्ठाची  गाडी आली , बारीक मीठ,

दहा  पैसे  किलो, दहा  पैसे  “!!!!  ही त्याची हाक ऐकली  की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो. 

तसाच  एक तेलवाला यायचा . कावड  असायची  त्याच्या खांद्यावर . दोन बाजूला दोन मोठ्ठे डबे . एकात खोबरेल  तेल एकात गोडं तेल. घाणीवरचं.. तेलाच्या घाणी एवढाच  कळकटलेला  आणि  तेलकट.. ढोपरापर्यंत  घट्ट  धोतर ., कधीकाळी पांढरं असावं, वर बंडी आणि काळं जॅकेट ..त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरपण माझ्या डोळ्यासमोर  येते.

अशा  तेलवाल्याकडून, पॅकबंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ  पोसली. हायजीनच्या कल्पनाही  घुसल्या नव्हत्या डोक्यात.

सकाळची  लगबग, गडबड  आवरून घरातल्या  दारात गृहिणी  जरा  निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास  बोवारीण यायची . मुळात कपड्यांची चैन होती कुठे  हो. पण त्यातल्यात्यात जुने कपडे  देऊन, घासाघिस  करून, हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर  चाळीतले  अनेक संसार  सजले  होते.

हे सगळं सामूहिक चालायचं हं . जी बोवारणीला कपडे  देत असायची  तिच्या घरात  गंज  आहे  का, परात  आहे  का, “लंगडी “आहे  का हे तिच्या शेजारणींना माहित असायचं.

अशाच  दुपारी कधी  कल्हई वाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत  तो फणसाच्या  झाडाखाली  बस्तान बसवायचा .

त्याचा तो भाता, नवसागराचा  विशिष्ट धूर  आणि वास..कळकटलेली  भांडी, पातेली, कापसाचा बोळा  फिरवून चकचकित  झालेली पहिली  की आम्हाला काहीतरी  जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चूर्र आवाज . तो गेल्यावर ते बॉलबेअरिंग्ससारखे  छोटेछोटे  मातीत पडलेले गोळे गोळा करायचे… 

कशातही  रमायचो  आम्ही. 

संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्यावेळी कुरमुऱ्याच्या पोत्याएवढाच जाडा– पांढराशुभ्र  लेंगा सदरा  घातलेला  कुरमुरेवाला यायचा . खारे  शेंगदाणे, चणे, कुरमुरे  हा त्या वेळचा  खाऊ …जो घेईल  तो एकटा नाही खायचा –  वाटून खायचा . चाळीचा  संस्कार होता तो.- “sharing is caring ” हे शिकवायला नाही लागलं आम्हाला..

घंटा  वाजवत , रंगीबेरंगी  सरबताच्या  बाटल्यांनी भरलेली  बर्फाचा  गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर  रस्त्यावर उभी  राहायची . महिन्यातून एखादेवेळी खायला आम्हाला परवानगी  मिळायची . १३० बिऱ्हाडातली कमीत कमी  दिडेकशे  पोरं तो बर्फाचा  गोळा कधी ना कधी खायची,  पण कोणी आजारी  पडल्याचं मला  तरी  आठवत  नाहीये..

संध्याकाळी सात वाजेपर्यंत  पटांगणात धुमाकूळ  घालून , गृहपाठ , परवचा, म्हणून गॅलरीमधे कोण आजोबा  आज  गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत  असायचो .

उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की “कुल्फीय..” ओरडत  डोक्यावर ओला पंचा  गुंडाळलेला मटका  घेऊन  कुल्फी विकणारा यायचा ..चाळीत  तेव्हा तरी  कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची  सहसा . पहिला  दुसरा नंबर आला तर  क्वचित मिळायची ..

अशी  ही बाहेरून येणारी सगळी  माणसं “आमची  “झाली होती.

शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नातेवाईकही “आपले “वाटायचे …

या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा  व्यक्तिमत्व विकास होत राहिला.

माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी  आजही अधूनमधून अशा “चाळवतात” .

पु. लं च्या बटाट्याच्या चाळीने  “चाळ  संस्कृती  “घराघरात “पोहोचवली.

आमच्या चाळीने  मात्र ती आमच्या  “मनामनात  “रुजवली …

लेखिका – सुश्री नीलिमा जोशी 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झपूर्झा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? झपूर्झा ? सौ राधिका भांडारकर ☆

शब्द गोठले. शब्दच तुटले. शब्दातीत आहे सारे. शब्दाविना, शब्दां पलीकडले..

अथांग समुद्राच्या शांत किनाऱ्यावर मुलायम वाळूत, एका झपुर्झा अवस्थेतच मी बसले होते. आणि पलीकडे क्षितिजावर, मावळतीला सूर्याची घागर हळूहळू कुठेतरी अज्ञातात बुडत होती.  अथांग आभाळात संध्या रंग उजळले होते. वार्‍याच्या झोताने मुठीतले  वाळूचे कण घरंगळत होते आणि बगळ्यांची माळ आकाशात मुक्तपणे विहरत होती.  खरोखरच हे सारं मनावर झिरपत असतानाची ही अवस्था शब्दातीत होती. अव्यक्त होती. शब्दां पलीकडची ती केवळ एक अनुभूती होती.

मातेला मुलाचे  मन न सांगताच कळते. त्याची भूक, त्याचा आनंद, त्याचं भावविश्व, त्याचा राग, त्याची व्यथा, त्याचा ताण, तिला न सांगताच कसे कळते? कारण हे वात्सल्याचं नातं शब्दांपलीकडचं असतं.तिथे संवादाची  गरजच नसते.

भक्ताचा ईश्वराशी घडणारा संवाद— हा सुद्धा शब्दाविना असतो.तो निर्गुण असतो.अंतराचा अंतराशी झालेला, शब्दांपलीकडे घडलेला एक भावानुभव असतो.

व्यक्त होत नाही ते अव्यक्त. आणि जे अव्यक्त असतं ते शब्दांशिवायच बोलत असतं.

एखादी नजर, एखादा स्पर्श, एखादीच स्मितरेषा, किंवा अर्धोन्मीलित अधर, भावनेचा कितीतरी मोठा आशय, शब्दाविनाच भिडवतो.  या शब्दांच्या पलीकडलं हे मौन असाधारण असतं. ती फक्त एक अनुभूती असते. ती अनेक रंगी ही असते. रागाची, लोभाची, प्रेमाची, क्रोधाची, भयाचीही. शब्दांत वर्णन करता येत नसली तरी  तिचं अंत: प्रवाहाशी नातं असतं. उमटलेले नुसते तरंग असले, तरी खूप खोलवर परिणाम करणारे असतात.

पन्नास वर्षानंतर, मला माझा बालमित्र अचानक भेटला.  सगळा ताठरपणा संपलेला, संथ, वाकलेला, दाट काळ्याभोर केसांच्या जागी काही चंदेरी कलाबूतच फक्त ऊरलेली. मी ही त्याला तशीच दिसले असेल ना? पण धाडकन् , समोरा समोर आल्यावर,  डोळ्यातल्या नजरेनं आणि ओठातल्या हास्याने तो पन्नास वर्षाचा काळ आक्रसून गेला. न बोलताच पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींचा एक मूकपट सहजपणे क्षणात उलगडून गेला.

“कशी आहेस?”

“बरी आहे.”

या पलीकडे शब्द जणू संपूनच गेले.पण त्या भेटीतला आनंद हा केवळ शब्दांच्या पलीकडचा होता.

आमचं नातं आता शब्दांपलीकडे गेलंय असं म्हणताना, त्यांना त्यातला घट्टपणा, अतूट बंध, विश्वासच जाणवतो. शब्दांपलीकडे याचा अर्थ अबोला नव्हे.मौनही. नव्हे तर एक अबोल, मूक समंजसपणा. जाणीव. खोलवर वसलेल्या प्रेमाची ओळख.

तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला निसर्गातले निश:ब्द संवादही ऐकू येतील. पक्ष्यांचं झाडांशी नातं, चंद्राचं रोहिणीशी नातं, धरणीचं पर्जन्याशी नातं, नदीचं सागराशी नातं, सागराचं किनार्‍याशी नातं, फुलाचं भ्रमराशी  नातं, चकोराचं चांदण्याशी नातं, कमळाचं चिखलाशी नातं. शब्द कुठे आहेत? पण नातं आहे ना? हेच ते शब्दांच्या पलीकडचं नातं!

दूर गावी गेलेल्या आपल्या धन्याला, त्याची निरक्षर कारभारीण, एक पत्र लिहिते. आणि जेव्हां तो,  ते पत्र उघडून पाहतो, तेव्हा त्यात फक्त एक कोरा कागद असतो. या कोर्‍या कागदाला सुकलेल्या बकूळ फुलांचा वास असतो. धन्याच्या पापण्या चटकन ओलावतात आणि तो त्या कोऱ्या कागदाचे चुंबन घेतो.

शब्द खोटे असतात. शब्द बेगडी असतात. शब्द पोकळ असतात. शब्द वरवर चे असतात. पण जे शब्दांच्या पलीकडे असतं, ते नितळ पाण्यासारखं, स्वच्छ स्फटिका समान  हिरव्या पाना सारखं, ताजं टवटवीत आणि खरं असतं.

म्हणूनच ….  शब्दांवाचूनी कळते सारे शब्दांच्या पलीकडले..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंती मनाची— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंती मनाची— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सोसायटी मध्ये गॅस ची pipeline टाकण्याचे काम सुरू झाले. खोदण्या साठी आलेले कामगार, आणि बायकापोरे यांचा नुसता कलकलाट सुरू झाला. सर्व बंगल्यांसमोरच मोठे खड्डे खणत होते. आमच्या गल्लीत पण मोठे खड्डे खणायचे काम सुरू झाले. 

मी रोज खिडकीतून हे दृश्य बघायची. त्या बायका  गड्यांच्या बरोबरीने पहार घेऊन जमीन खणत होत्या.

माती घमेल्यात भरून टाकायची, आणि मग संध्याकाळी ट्रक येऊन ती घेऊन जायचा. कमीतकमी आठ दहा दिवस तर हे काम चालणार होतंच.

दुपार झाली की सगळे लोक झाडाखाली जमत,आणि आणलेली भाजीभाकरी हसत खेळत खात. रोज मी त्यांच्या साठी कळशी भरून पाणी ठेवत असे. संध्याकाळी जाताना लख्ख घासलेली कळशी पायरीवर ठेवलेली असायची.

 आमच्या बंगल्या समोर काम करणारी एक मुलगी  छोट्या बाळाला घेऊन यायची. ते पोर असेल एक दीड वर्षाचे.

नुकतेच चालायला लागले होते. एका फुटक्या डबड्याला दोरी बांधली होती. ते मूल ते डबडे ओढत सगळीकडे  मजेने हिंडायचे.

त्याच्या आईशी माझी हळूहळू ओळख झाली.

“ काय ग नाव बाळाचे? “

“ नवसाचा आहे तो म्हणून मल्हारी हाये आमचा. “ तिने कौतुकाने सांगितले.

“ आणि तुझे ग? “

म्हणाली, “मी हाये रेसमा. मालकांनी हौसेने माझे नाव रेसमा ठेवलंय. “

मला हसूच आले. रेश्मा म्हणता न का येईना, पण नाव भारी होते की नाही?

तर रेसमा काळी सावळी, पण काय सुंदर  फिगर होती तिची–बघत राहावे अशी–

आत्ताच्या मुली झक मारतील अशी घाटदार. छान साडी असायची अंगावर. डोक्यात फूल, भरगच्च केस, नाकात मोरणी. आली की साडी बदलून जुने नेसायची. पोराला झाडाखाली जुन्या धडप्यावर निजवायची. तेही पडून खेळत राहायचे. मला मोठी गम्मत वाटायची या  कुटुंबाच. 

रेसमा चा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. मी  रोज तिच्या सुट्टीच्या वेळी गेटशी जाऊन गप्पा मारायची.

परदेशातल्या माझ्या  मुलींना मी रोज  reportingकरायची. डोक्याला हात लावून त्या म्हणायच्या–“ आई,तुझी पण कमाल आहे. दगडालाही बोलायला लावशील ग बाई तू. “ त्यांच्याकडे लक्ष न देता,माझ्या चौकश्या सुरूच असायच्या.

“ रेश्मा, कुठले ग तुम्ही? असलीच कामे करता का ? गावाकडे  कोणकोण असतं ? “

ही मंडळी सोलापूर कडची होती .त्यांचा मुकादम,अशी कामे आली, की या लोकांना गावाकडून घेऊन यायचा.

“ रेश्मा,किती ग रोज मिळतो तुम्हाला? “

“ ताई,गड्याला सातशे रोज आणि बाईला सहाशे पडतात रोज.” अभिमानाने रेश्मा सांगत होती. पण हे कायम नसते ना. मग गावाकडे करतो शेती. पण आता शहरच गोड वाटतं बघा.मी सांगतेय मालकाला, आपण पुण्यातच राहूया.

पोराला चांगले शिकवूया. तो नको आपल्या सारखा बिगारी व्हायला. “

 पोरगे मोठे निरोगी,गुटगुटीत होते. एक भाकरीचा तुकडा दिला की बसायचे चघळत.

नुकताच माझा नातू आणि मुलगी परदेशातून येऊन गेले होते. नातू त्याची खेळणी इथेच ठेवून गेला होता.

मी त्यातले एक छान सॉफ्ट टॉय शोधले. अगदी गोड कुत्रे होते ते.

दुसऱ्या दिवशी रेश्मा आणि मल्हारी आलेच. मी मल्हारीला ते कुत्रे दिले. आनंदाने त्याचे डोळे इतके चमकले.

त्याने आपल्या आईकडे बघितले. त्याची आई म्हणाली, “ अजून त्याला  नीट बोलता येत नाही तर तो मला विचारतोय घेऊ का असे.” 

“ घेरे बाळा,तुलाच दिलेय मी. खेळ त्याच्याशी.” मल्हारीला खूप  आनंद झाला. ते कुत्रे तो मांडीवर घेऊन बसला.

त्याच्या बोबड्या भाषेत त्याच्याशी बोलू लागला. ते डबडे कुठे टाकून दिले कोणास ठाऊक.

 रेश्मा म्हणाली, “ मावशी, तुम्ही ते खेळणे दिलेत ना, माझे काम अगदी हलके झाले बघा. मल्हारी आता एका जागी बसूनच खेळतो. आधी मला भीति वाटायची  हा चुकून खड्ड्यात तर नाही ना पडणार.” 

 रोज रोज ते कुत्रे आणि मल्हारीची जोडी सकाळी यायची.

एक दिवस म्हटले, “ अग रेश्मा, किती ग मळलेय ते कुत्रे. निदान धू तरी स्वच्छ.” 

रेश्माने कपाळाला हात लावला. म्हणाली “ अवो मावशी,त्याने दिले तर धुवू ना. चोवीस तास ते बरोबर असतय बघा–

झोपताना,जेवताना. वस्तीतली पोरे लै  द्वाड हायेत. त्याला भ्या वाटतं, कोणी चोरलं तर. म्हणून एक मिनिट त्याला दूर करत नाही .मावशी,मल्हारीला  कुत्र्याचे नाव विचारा ना.” 

“ मल्हारी,काय रे नाव तुझ्या कुत्र्याचे?”

लाजत लाजत बोबडा मल्हारी म्हणाला- “ लघु.”

आम्ही दोघी हसलो. रेश्मा म्हणाली, “ वस्तीत एक कुत्रा आहे रघु, म्हणून याचा पण रघु.”

 आता रस्त्याचे काम संपले होते. पाईपलाईन टाकून खड्डे बुजवले सुद्धा. रेश्मा माझा  निरोप घ्यायला आली

“ मावशी,लै माया केलीत आमच्यावर.आठवन ठेवा गरीबाची.”

पायावर डोके ठेवून तिने नमस्कार केला. मलाही गहिवरून आले. शंभरची नोट तिच्या हाती ठेवून म्हटले,

“ खाऊ घे मल्हारीला.”

 यालाही होऊन गेले 4 महिने. एक दिवस दुपारी बेल वाजली. कोण आहे  बघितले तर रेश्मा.माझ्या हातात एक पुडके दिले. “ अग हे काय? हे कशाला?”

“ काही  नाहीये हो जास्त. गावाला गेलो होतो ना, तर तुमच्यासाठी आमची शेंगदाणा चटणी आणि मसाला आणलाय बघा. सांगा बर का,आवडते का गरीबाची भेट.” 

 चहा पिऊन रेश्मा निघून गेली. पण मला विचारात पाडून गेली. —–

किती ही छोटी,गरीब माणसे. सहजच तिच्या बाळाला मी दिलेले खेळणे ती विसरली नाही. आपल्या परीने तिने कृतज्ञता व्यक्त केली.—-

हे इतके मोठे मन, या छोट्या माणसांना कोण देते?

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली…. ) इथून पुढे —-

रिलायन्स ग्रुपचे अंबानी, सौ नीता आणि श्री भावेश यांना भेटावयास महाबळेश्वरमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना भक्कम हात दिला…

—-रस्त्यावर …..फुटपाथवर दहा मेणबत्त्या विकून स्वतःचं घर चालवणारा लहान भावेश….. आज हजारो अंध बांधवांना घेऊन मेणबत्त्या तयार करून त्या जगातल्या बारा देशांमध्ये विकत आहे…. येणारा पैसा या हजारो अंध बांधवांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तो खर्च करत आहे….!

एक होती गांधारी…. जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली…. आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून शंभर “कौरव” जन्मले…. ! 

–एक आहे सौ. नीता, जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी डोळे उघडे ठेवले आणि तिने शंभरावर “अंध कुटुंबे” जगवली…. !

महाभारतातली गांधारी मोठी ? की आधुनिक युगातली सौ. नीता भावेश भाटिया …. ? माझी बहिण !

नदीतल्या पाण्यात दगड असतात आणि माती सुद्धा ….. दगड फक्त भिजत असतो…. माती पाण्यात विरघळून जाते…. ! नुसतं भिजणं आणि विरघळणं यात खूप फरक असतो…भिजणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून दुसऱ्याचे विचार मान्य करणं ….. परंतु विरघळणे म्हणजे स्वतःचं कोणतेही अस्तित्व न ठेवता…. जोडीदाराच्या विचारांशी समरस होऊन स्वतःला समर्पित करणे….

श्री भावेश भाटिया यांची पत्नी सौ नीता भावेश भाटिया असो किंवा माझी पत्नी डॉ मनीषा अभिजित सोनवणे असो…. 

या दोघी अक्षरशः माती झाल्या…. आणि म्हणून आम्ही आमची मुळं या मातीत रुजवू शकलो…. 

अशा अनेक अज्ञात नीता आणि मनीषा समाजात आहेत…. मी त्यांना प्रणाम करतो…. ! 

`भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन ` या तत्वावर मी आणि मनीषा आम्ही काम करत आहोत …. 

पण भावेश भाई हे तत्व स्वतः जगत आहेत आणि आचरणात सुद्धा आणत आहेत…. ! 

आणि म्हणून तो मला मोठ्या भावापेक्षाही जास्त आहे…. घरात जरी सगळ्यात थोरला मी असलो, तरी समाजामध्ये मी त्याला मोठ्या भावाचं स्थान दिल आहे…. !

पुण्यातील अंध भिक्षेकऱ्यांसाठी असाच एक प्रकल्प आमच्या माध्यमातून पुण्यात सुरु करण्याचं वचन मला भावेश भाईने दिलं आहे…! हा प्रकल्प सुरु झाला तर, पुण्यातील अंध बांधवांच्या आयुष्यात क्रांती घडेल…! 

यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रातील अंध भिक्षेकरी बांधवापर्यंत पोचवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे पुढचे स्वप्न असेल…. यात आपणा सर्वांचे आशीर्वाद हवेत….! 

कार्यक्रम झाल्यानंतर भावेशभाई मला हात जोडून म्हणाला, ‘ दादा आपके साथ सेल्फी ले सकता हूँ क्या….? ‘ 

मोठी माणसं अशीच असतात….  नेहमी दुसऱ्याला आदर देतात… 

उलट मी भावेश भाईला म्हणालो, ‘ आप तो मेरे बडे भाई हो…. मैं तो एक गरीब डॉक्टर हूँ ….आपके साथ खडा होने की मेरी औकात नही है ….आप मुझे चरणोमे रख लो… तो मेरी जिंदगी बन जायेगी….! ‘ 

यावर बसल्याजागी भावेशभाईने मला मिठी मारली आणि शून्यात पहात म्हणाला…., ‘ दादा मै तो आपको देख नही सकता हूँ .. लेकीन नीताको पूछूंगा फोटो मे मेरा छोटा भाई “अभिजीत” दिखता कैसे है….?  तू मुझे बता…. ! ‘

मी म्हणालो, “ नीताभाभी को क्या पूछना है दादा … ? मैं खुद आपको बताता हूँ …., ‘ हम दोनो दिखनेमे सेम टू सेम है… दो हात, दो पांव, एक नाक, दो कान…. सब same to same….बस फर्क सिर्फ इतना है…

आसमान सिर्फ आपसे दो गज दूरी पे है…. और मेरी उंचाई आपके घुटनो तक भी नही है ….!

बस फर्क सिर्फ इतना है…हमने हाथ मे मशाल पकडी है…. आप दिल मे लिए घुमते हो….!

बस फर्क सिर्फ इतना है.. इन्सान बनने की नाकाम कोशिश हमारी…. आप ईश्वर से भी बेहतर इन्सान बन गये हो….!

बस फर्क सिर्फ इतना है… हम आँखे लिए अंधे जी रहे है…. आप अंधेरे मे रहकर, दूसरोंको रोशनी दे रहे हो….! “

—– यानंतर काळ्या चष्म्याच्या आडून भर उन्हातही पाऊस कोसळून गेला….!

(१४ मे २०२२, वैशाख शु १३, धर्मवीर संभाजी महाराज जयंती)

 समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

सप्रेम नमस्कार !

शक्यतोवर मला मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान या विषयी काहीही लिहिण्याचे  मी टाळतो….

स्वतःचं कौतुक स्वतःच काय करायचं?  कोणी दुसऱ्याने कौतुकाने ते इतरांना सांगितलं तर भाग वेगळा !

आज मात्र आवर्जून एका पुरस्काराविषयी लिहिणार आहे… कारण त्या निमित्ताने भेटलेल्या

अनेक व्यक्तींचा परिचय मला करून देता येईल, घडलेल्या अनेक बाबी सांगता येतील…..

या महत्त्वाच्या बाबी सांगण्याअगोदर मला मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे !

१४ मे, धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जयंती… !

आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर…. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व !

“व्यसनमुक्त युवक संघ” या नावाची संस्था स्थापन करून हे गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून नव्हे, “झिजून” नव्या पिढीमधून एक उत्तम भारतीय नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गुरुजींनी संपूर्ण जावळी तालुका व्यसनमुक्त केला आहे…

आयुष्यात केवळ पाच माणसांना मी व्यसनमुक्त करु शकलो तरी जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल ….तिथे या ऋषितुल्य माणसाने पूर्ण एक तालुका व्यसनमुक्त केला आहे, यावरून त्यांच्या कार्याची स्पष्ट कल्पना येते…. !

—-अत्यंत करारी स्वभाव…. नजरेत जरब …. संवादाची धार तलवारीहून तीक्ष्ण…. कोणाचीही भीडभाड न ठेवणारा हा “खरा माणूस”…. अन्याय झाला तर कोणालाही पायाखाली चिरडण्याची ताकद… पण समाजात कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यासमोर कमरेत वाकून मुजरा करण्याएवढी नम्रता या माणसात आहे…. !

अशा या सच्च्या माणसाने स्थापन केलेल्या संस्थेकडून… त्यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा यावर्षीचा  “धर्मवीर श्री संभाजी महाराज पुरस्कार”  मला देण्यात आला.

याच सोबत ” श्रीमती राणी लक्ष्मीबाई पुरस्कार “ सौ निता भावेश भाटिया” यांना देण्यात आला.

श्री विवेक राऊत, श्री नवनाथ मालुसरे यांचे आम्ही ऋणी आहोत.

भावेश भाटिया यांना जगात….हो जगात, त्यांना कोणी ओळखत नाही असा माणूस नसेल….

अजूनही जर कोणाला त्यांची ओळख नसेल, तर माझ्या या जगप्रसिद्ध जिवलग मित्राबद्दल थोडक्यात सांगतो….

—-महाबळेश्वर इथं लहानपणी दृष्टी नसलेला भावेश फुटपाथवर बसून मेणबत्त्या तयार करायचा आणि त्या तो विकायचा…. खूपदा भीक मागावी अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण झाली, परंतू  तो परिस्थितीला शरण गेला नाही. आठ आठ दिवस उपाशी राहिला परंतू या स्वाभिमानी माणसाने भीक मागितली नाही…. !

भारतातील एक अब्जाधीश… उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन महाबळेश्वरला येऊन एक बंगला भाड्याने घेऊन महिना-महिना तिथे मुक्काम करत असत….

अब्जाधीशाच्या या फॅमिलीमधल्या एका चिमुरडीला या लहान भावेशने केलेल्या मेणबत्त्या आवडल्या…. त्याचा तो एकूण गरीब अवतार पाहून…. त्याची अंध अवस्था पाहून, मेणबत्ती खरेदी केल्यानंतर तिने त्याला टीप दिली…

तो तेव्हा  म्हणाला होता… “Honoured madam… मी ऋणी आहे आपला ….परंततू मला माझ्या कामाचे पैसे हवेत…  भीक नको…. माझ्या डोळ्यात ज्योत नसेल पण हृदयात नक्की आहे….”

ही चिमुरडी भारावली….

मग दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला आल्यावर “ती” भावेशला भेटायची….

अनेक वर्ष त्या दोघांमध्ये संवाद झाला आणि सूर जुळले….

अब्जाधीशाच्या त्या मुलीने रस्त्यावरच्या अंध भावेशशी घरच्यांना न जुमानता लग्न केलं….

—-हो हीच ती निता…. !

अब्जाधीशाच्या मुलीने एका भिकारड्या (?) मेणबत्ती विकणाऱ्या पोराशी लग्न केलं….. याचं घरातल्या लोकांना वाईट वाटलं….

या दोघांनीही त्या घरातून काहीही घेतलं नाही….हे दोघं पाच बाय पाच च्या पत्र्याच्या खोलीत राहू लागले….

“दूरदृष्टी” असलेल्या नीताने भावेशला सांगितले, “ तू एकटा किती मेणबत्त्या करशील आणि किती विकशील ?  त्यापेक्षा आपण इतर अंध बांधवांना एकत्र करू, तू त्यांनाही मेणबत्त्या करायला शिकव,  आपण हा व्यवसाय वाढवू…. आपल्यासोबत त्यांनासुद्धा पैशाची मदत होईल….! “

—ध्येयवेड्या भावेशने सर्व अंधांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला पाच अंध बांधवांकडून मेणबत्त्या करवून घेतल्या…. !

आता भावेशचं घर चांगलं चालू लागलं आणि त्यासोबत इतर पाच अंध बांधवांचं सुद्धा…

त्याने आणखी अंध बांधव एकत्र केले…. गोतावळा वाढत गेला….

—-एक अंध माणूस इतर अंध बांधवांचे पुनर्वसन करत आहे….

बघता बघता ही गोष्ट महाबळेश्वरमध्ये पसरली ….महाबळेश्वरमधून ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली ….. त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली….

क्रमशः …

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अदृश्य लेबल – भाग – 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ अदृश्य लेबल – भाग – 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

परवाचीच गोष्ट. नेहमी प्रमाणे घरातून म्हणजेच श्रीनगर, वागळे  इस्टेटमधून दुकानात जायला निघालॊ. गाडी रोडवर  आणली आणि घडाळ्यात बघितले. ९.४५ झाले होते, म्हणजेच नेहमीपेक्षा  १० ते १५ मिनिट्स मला निघायला उशीर झाला होता.  १० वाजता दुकान उघडण्याची वेळ आणि घर ते दुकान गाडीने कमीत कमी २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतोच. डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं . नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वेळेवर पोहचण्यासाठी माझी धडपड चालू होती. नशिबाने आज तसा रोडवर हेवी ट्रॅफिक नव्हता म्हणून काही गाडयांना ओव्हरटेक करत मी जेवढ्या वेगाने गाडी चालवता, नाही गाडी मारता येईल तेवढी मारत होतो. पुढे जुने पासपोर्ट ऑफिसकडून डाव्या रस्त्याला गाडी वळवून मी हजुरी रस्त्याला लागलो. रस्ता जरा अरुंद असल्याने मला काही करता वेग घेता येत नव्हता आणि गाडयांना ओव्हरटेकही घेता येत नव्हते. मी जरा मनाला आवर घालत, गाडीचा वेग कमी करत हळूहळू पुढे जात होतो. हळूहळू गाडी चालवत हजुरीचा रस्ता पार केला आणि पुढे लुईसवाडीच्या जरा मोठ्या रोडवर लागलो.

आता पुढचा रस्ता सगळा मोकळा दिसत होता तरीही माझ्या पुढे असलेली एक गाडी काही वेग घेत नव्हती. मला एकतर उशीर झाला होता आणि हा जो कोण होता तो गाडी आरामात चालवत होता. पहिल्यांदा मला वाटले कदाचित तो मोबाइलवर बोलत असणार, पण तसे नव्हते. मला त्याचा खूप राग आला होता. मी पहिले गिरगावात रहात असल्याने, राग आल्यानंतर सवयीप्रमाणे पुढची गाडी चालवणाऱ्याच्या खानदानाची माझ्याकडून जोरदार आठवण काढली गेली. माझ्या गाडीच्या काचा बंद असल्याने माझा आवाज बाहेर किंवा त्याच्याकडे पोचण्याचा काहीच प्रश्न नव्हता आणि माझा आवाज त्याच्याकडे पोचावा अशी माझीही अपेक्षा नव्हती.  पण त्या क्रियेने आपण जरा मोकळे होतो, हा आमचा गिरगावकरांचा अनुभव.

अजूनही पुढचा गाडीवाला वेग घेत नव्हता. आता माझा धीर सुटायला लागला. मी जोरजोरात हॉर्न मारू लागलो तरीही तो, त्याच्यापुढे पूर्ण रस्ता मोकळा दिसत असूनसुद्धा वेग काही घेत नव्हता. माझी सहनशीलता आता पणाला लागली. माझे एकसारखे  घड्याळाकडे लक्ष जात होते. मला खूप उशीर होत होता आणि जो कोण होता तो गाडी बैलगाडीच्या वेगाने चालवत होता आणि ओव्हरटेक करायला पण संधी मिळत  नव्हती. आता मी माझा अनावर झालेला राग, हॉर्न दाबूनच ठेवून प्रकट केला. मोठा कर्कशपणे हॉर्नचा आवाज येत होता आणि …

आणि माझं लक्ष त्या गाडीच्या मागच्या काचेवर  लिहिलेल्या वाक्यावर गेले. “अपंगांची  गाडी, जरा धीर धरा “

ते बघितल्यावर मलाच माझी लाज वाटली. मी जो काही मोठयाने हॉर्न वाजवून माझी अक्कल पाजळली होती त्याची मला शरम वाटली. आता माझी ही गाडी त्या गाडीच्या मागे हळूहळू  जात होती आणि मला त्याचा काहीही त्रास होत नव्हता. पुढे जरा डाव्या बाजूला मोकळी जागा होती तेंव्हा त्या पुढच्या गाडी चालवणाऱ्यानी गाडी डाव्या बाजूला घेऊन मला पुढे जाण्यासाठी जागा करून दिली. मी माझी गाडी पुढे घेऊन त्या गाडीच्या समांतर आणून, माझ्या गाडीची काच खाली करून त्याला सॉरी बोलून दिलगिरी व्यक्त केली. त्या माणसाने  माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले.

क्रमशः… 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आपण सर्वजण लहानपणापासून “व्यासोच्छिष्टम्  जगत्सर्वंम्” हे वाक्य वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. असा एकही विषय नाही की महर्षी व्यासांनी त्याला स्पर्श केला नाही. असे ते सर्व ज्ञानी होते. अशा भगवान वेदव्यास यांच्याबद्दल मला लहानपणापासून खूप उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळवावी असे वाटत होते.  

मी माहेरची ग्रामोपाध्ये,  माझी आई माहेरची जोशी. त्यामुळे आई-वडील दोघांकडूनही अध्यात्माचा वारसा मिळाला होता . वडिलांचं घर वाळव्याला. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तिथे जात असू. आईचं माहेर चिकुर्ड्याला. आंबे, जांभळे, करवंदे भरपूर. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जात असू. दोन्हीकडे पोथ्या पुराणे भरपूर असत. त्यावेळी मोबाईल ,टीव्ही तर सोडाच पण साधे वाचनालय किंवा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे घरातलीच पुस्तके  वाचण्याचा  छंद लागला. अनेक पोथ्या ,पुराणे वाचून झाली. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ” इति श्री वेदव्यास विरचितं***समाप्तम् ” असेच असायचे, हे लक्षात आले. त्यामुळे इतके छान लिहिणारे हे ऋषी कोण अशी उत्सुकता तेव्हापासूनच होती.

२०१७ साली मी नैमिषारण्यात गेले होते . तिथे व्यास गद्दी पाहिली. तो सारा परिसर अत्यंत पवित्र आणि भारावून टाकणारा होता. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते. भगवान वेदव्यास चिरंजीव आहेत. त्यांचे अस्तित्व त्याठिकाणी जाणवले. तिथे 88000 ऋषीमुनी वायुरूपाने आहेत असे म्हणतात. त्याची देखील अनुभूती आली. भगवान वेदव्यास यांची ती धीरगंभीर मूर्ती डोळ्यात साठवून घेतली. मोबाईल मध्ये भरपूर फोटो काढले. एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

तेथून परत आल्यानंतर “ नैमिषारण्य सुरम्य कथा “ हे पुस्तक लिहायला घेतले. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचायला मिळाले. त्यातूनही वेदव्यास यांची बरीच माहिती कळली.

“नैमिषारण्य सुरम्य कथा “ या माझ्या पुस्तकाची परवा तिसरी आवृत्ती निघाली. त्या संदर्भात मी बरीच व्याख्याने पण दिली.  त्यावेळी लक्षात आले की भगवान वेदव्यास यांच्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही .इतकेच काय, “व्यासपीठ म्हणजे काय? त्यामागील कथा काय ? “ हेही  कुणाला माहिती नाही. व्यासपीठ ,मंच, रंगमंच हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजून सगळे सर्रास वापरतात. पण त्यातील फरक कुणाला माहीत नाही. भगवान वेदव्यास यांच्यावर पुस्तकही उपलब्ध नाही .` तुम्हीच लिहा आणि आम्हाला द्या ` असे वाचनालयातून सांगण्यात आले. योगायोगाने याविषयीचे अनेक ग्रंथ वाचायला मिळाले.आणि मग माझ्या हातून “ ।। भगवान वेदव्यास ।। “  या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक लवकरच बुक गंगा वर उपलब्ध होईल. नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ही विनंती.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

गेले काही वर्ष हे जाणवतं आहेच आणि वाढतच चाललं आहे. आधीच सांगतो की माझं बालपण छानपैकी गेलं.  दरवर्षी नवीन पुस्तक, दिवाळीला नवीन कपडे , फटाके. सगळ्या सणांना भरपूर पाहुणे आणि गोड-धोड. दारिद्रय वगैरे काही खास सोसावं लागलं नाही. पण तरीही गेल्या २-३ आठवड्यात असे प्रसंग घडले की हे लिहावं वाटू लागलं. 

प्रसंग १ :

हा.. तर परवा एका मित्राकडे गेलो होतो. रात्री सहज गप्पा मारायला. त्याच्या बायकोने छान हापूस आंबे चिरले. अगदी बाठीला लागून चिरले. गोड होते आंबे. आंब्याच्या फोडी खाऊन झाल्या आणि ती ते सगळं टाकायला उठली. 

“अहो वाहिनी त्या बाठी राहिल्या आहेत अजून” 

“राहू दे हो भाऊजी इतकी काही गरिबी आली नाही आहे, जाऊदे ते आता. अजून आंबे चिरू का?”

“अहो गरिबीचा प्रश्न नाही, पण अजून गर आहे त्याला. आपल्याला नको पण मुलांना बोलवा. मजेत चोखतील.”  

तेवढ्यात दुसऱ्या मित्राची बायको म्हणाली “नको  ..सगळं तोंड बरबटून ठेवतील…मग उठा ..त्यांना धुवा..जाऊ  देना…छान गप्पा रंगल्या आहेत”

मला पुढच्या गप्पा नीट ऐकूच आल्या नाहीत. 

प्रसंग २:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून आम्ही चार मित्र फॅमिलीसहित महाबळेश्वरला गेलो होतो. हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. मित्र त्याच्या मुलाला सांगत होता. “सगळं भरभरून घेऊन ठेव, मी परत परत उठून रांगेत उभा रहाणार नाही” त्याचं ८ वर्षाचं कार्ट दोन हातात दोन डिश घेऊन चालत होतं आणि मित्र आपल्याबरोबर त्याची डिश भरून देत होता. टेबलावर तो मुलगा आला तेव्हा त्याच्या डिशमध्ये पुरीभाजी, मेदूवडा , चिकन सॉसेज , फ्रुटस , ऑम्लेटपाव , अमूल बटर , कॉर्नफ्लेक्स , मंचुरियन होते. मित्राने त्याला बसवले आणि हातातला ग्लासभर ज्यूस त्याच्यासमोर ठेवला. 

अजून दहा मिनिटात त्या मित्राची बायको शेजारच्या टेबलावरून त्यांच्या मुलाला ओरडत होती. “जाईल तेवढंच खा, बाकीचं टाकून दे”

आमच्याकडे वळून म्हणाली ..”नाहीतर खा-खा खातील आणि मग पोट धरून बसतील. दोन दिवस सुट्टी मिळालीये त्यात यांच्यामागे धावायची माझी अजिबात इच्छा नाही आहे.” 

तसंही आम्ही आराम करायला गेलो होतो. पुढचा काही प्लॅन नव्हता. मुलाला २-३ वेळा हवं तेवढच घेऊन दिलं असतं  तर काही बिघडलं नसतं. वाया तरी गेलं नसतं.. असो. 

प्रसंग ३ :

पिझ्झा पार्टी होती. तुडुंब पिझ्झा खाऊन झाला. मी खोकी गोळा करायला उठलो तर प्रत्येक खोक्यात पिझ्य्यांच्या कडांचा गोल केलेला होता. मागवलेल्या ६ पिझ्झानपैकी सगळे गोल पूर्ण करायला ५ कडा कमी होत्या. (त्यातल्या दोन माझ्या पोटात होत्या आणि अजून ३ कडांना माझ्यासारखा कोणीतरी धनी होता). म्हणजे बहुतेकांनी कडा खाल्ल्या नव्हत्या. खरं तर..घरापासून ५ मि. वर पिझ्झ्याचं दुकान आहे आणि आम्ही पण आल्याआल्या खाल्ला होता त्यामुळे कडा कडक वगैरे होण्याचा पण चान्स नव्हता. 

प्रसंग  ४ :

परवा दोन मित्र घरी राहायला आले होते. बायकोने सकाळचा चहा केला आणि सवयीने तिने दुधाचं रिकामं पातेलं आणि बारीक कड असलेला चमचा माझ्या पुढ्यात ठेवला. 

एका मित्राने विचारलं “हे काय”

“विचारू नका भाऊजी. तुमच्या मित्राच्या घरची परंपरा आहे. सकाळी साय वाडग्यात काढायची. मग ते नुसतं दूध दुसऱ्या पातेल्यात गाळायचं. गाळणीत आलेली थोडीशी साय पण सायीच्या वाडग्यात टाकायची आणि मग कर्त्या पुरुषाच्या पुढ्यात दुधाचं रिकामं पातेलं खरवडायला द्यायचं…. . मी आहे म्हणून या परंपरा पाळत टिकली आहे . दुसरी असती तर कधीच कंटाळून सोडून गेली असती”

सगळे हसले. 

एका मित्राच्या बायकोने विचारले. “पण मग तुम्ही सायीचे काय करता?”

“दही -लोणी – तूप”. “मग ती बेरी खायचा पण एक कार्यक्रम असतो..सुंठ…पिठीसाखर ….  काही विचारू नको”

माझ्या बायकोने विचारलं “तुम्ही काय करता सायीचं?”

“आम्ही चहाच्या गाळण्यातच दूध गाळतो मग साय पडते त्या गाळण्यातच..उगाच दोन गाळणी कोण करणार”

“आणि मग तूप ?”

“चितळ्यांचं”

तोपर्यंत सायीचं पातेलं खरवडण्यात माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. अशी साय खरवडताना माझी समाधी लागते. त्या चमच्या पातेल्याचा होणार कुर -कुर आवाज माझ्या कानी पडतच नाही. 

साय खरवडता खरवडता मी भूतकाळात गेलो होतो. माझे आजोबा सायीचं पातेलं खायचे, मग बाबा आणि आता मी (मी नसेन तर मुलं खातात आता).  घरात दूध-दुभतं कधीच कमी नव्हतं पण काहीही टाकायचं नाही. पूर्णपणे संपवायचं हे संस्कार अशा सायीच्या पातेल्यातूनच झाले. आजी तर बेरीचं रिकामं पातेलं पाणी घालून तापवायची, पाण्यावर तुपाचा तवंग दाटून यायचा तो काढून आजीचं निरांजन त्यावर दोन दिवस तेवायचं . 

उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस काढून झाला की मामा सगळ्यांना बाठी चोखायला द्यायचा. ज्याची सगळ्यात स्वच्छ त्याला १ वाटी एक्सट्रा आमरस ठरलेला. 

रिझल्ट लागला की सगळ्या जुन्या वह्यातील कोरी पाने फाडायची. बाबांना दाखवायची आणि मग त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करायच्या. पुढच्यावर्षी शाळेला सगळ्या नवीन मिळायच्या पण बाइंडिंगच्या वह्या रफ वर्क / शुद्धलेखन यासाठी वापरायच्या.   

घरी किराणाच्या पुड्या किंवा फुलपुडी यायची. आजीचं दोऱ्याचं एक बंडल होतं. कुठलीही पुडी आली की आजी त्याचा दोरा सोडून त्या बंडलाबरोबर गुंडाळून टाकायची आणि आजोबा तो पेपर परत व्यवस्थित घडी करून रद्दीच्या पेपरात ठेवून द्यायचे. दोऱ्याचं बंडल नंतर हार/माळ  करायला कामाला यायचे. 

Reuse-recycle साठी आम्हाला कधी शाळेत प्रोजेक्ट करावेच लागले नाहीत. टाकू नये –  हवं तेवढंच घ्यावं  ,  कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करावा हा संस्कार आहे. त्याचा तुमच्या पैशाशी, गरिबीशी , स्टेटसशी, शिक्षणाशी काही संबंध नाही. असं वागणं म्हणजे चिंधीगिरी, कंजूषपणा नव्हे.  हा श्रीमंत “मध्यमवर्गीय”  संस्कार आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच श्रीमंत होतो. 

टाकलेली साय , आंब्याची बाठ , पिझ्झ्याच्या कडा, अर्ध टाकलेलं ताट आणि मग हळूहळू टाकून देण्याचं काहीच वाटेनासं होतं.  पुढे जाऊन  ड्रॉईंग चुकलं म्हणून न खोडता सरळ चुरगळून टाकलेला कागद, सोल झिजला तर तो न चिकटवता टाकून दिलेला बूट , दर २-३ वर्षांनी बोर झालं म्हणून बदललेल्या गाड्या  आणि थोडंसं नाही पटलं तर लगेच बदललेले बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड. आणि मग तक्रार ” ही आजकालची पिढी म्हणजे ….” 

“अहो- आता बास …त्या पातेल्याला भोक पडेल” –  बायको सांगत होती. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. मी माझ्या ध्यानातून बाहेर आलो. चमचाभरून सायीचा बोकाणा भरला… आहाहा …सुख!

मग …उद्यापासून सायीचं पातेलं खायला सुरवात करताय ना? ती गरिबी नाही ..चिंधीगिरी नाही ..तो संस्कार आहे.  

-योगिया    

१७/०५/२०२२

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print