मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय वाचकांनों !  

आपण सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ अथवा ‘होली आई रे कन्हाई, रंग छलके सुना दे जरा बांसुरी’ सारखी कर्णमधुर गाणी टीव्ही वर पाहिली, की रंगपंचमीची सुरुवात फार आधीपासून झाली हे लक्षात येते. गुलालाने गुलाबी अन केशरी सुगंधी जलाने रंगलेल्या कृष्ण, राधा आणि गोपिकांच्या सप्तरंगी होलिकोत्सवाचे वर्णन आपल्याला सुपरिचित आहे. राधा आणि गोपींबरोबर कृष्णाची रसिक रंगलीला ब्रजभूमीत ‘फाग लीला’ म्हणून ओळखली जाते. ब्रज भाषेचे प्रसिद्ध कवी रसखान यांनी राधा आणि गोपी यांच्या सोबत कृष्णाने खेळलेल्या रंगोत्सवाचे अतिशय रसिकतेने ‘फाग’ (फाल्गुन महिन्यातील होळी) या सवैये काव्यप्रकारात बहारदार वर्णन केले आहे. उदाहरणादाखल दोन सवैयांचे वर्णन करते.

रसखान म्हणतात-

खेलिये फाग निसंक व्है आज मयंकमुखी कहै भाग हमारौ।

तेहु गुलाल छुओ कर में पिचकारिन मैं रंग हिय मंह डारौ।

भावे सुमोहि करो रसखानजू पांव परौ जनि घूंघट टारौ।

वीर की सौंह हो देखि हौ कैसे अबीर तो आंख बचाय के डारो।

(अर्थ: चंद्रमुखीसम ब्रजवनिता कृष्णाला म्हणते, “आज ही फाल्गुन पौर्णिमेची होळी बिनदिक्कत खेळ. तुझ्याशी ही धुळवड खेळून जणू आमचे भाग्यच उजळले आहे. मला गुलालाने रंगव, हातात पिचकारी घेऊन माझे मन तुझ्या रंगात रंगवून टाक. ज्यात तुझा आनंद समाहित आहे, ते सर्व कर. पण मी तुझ्या पाया पडते, हा घुंघट हटवू नकोस आणि माझी तुला शपथ आहे. हा अबीर माझ्या डोळ्यांत नको टाकूस, इतरत्र टाक, अन्यथा तुझे सुंदर रूप बघण्यापासून मी वंचित राहून जाईन!”)

रसखान म्हणतात-

खेलतु फाग लख्यी पिय प्यारी को ता सुख की उपमा किहिं दीजै।

देखत ही बनि आवै भलै रसखान कहा है जो वारि न कीजै॥ 

ज्यौं ज्यौं छबीली कहै पिचकारी लै एक लई यह दूसरी लीजै। 

त्यौं त्यौं छबीलो छकै छवि छाक सो हेरै हँसे न टरै खरौ भीजै॥

(अर्थ: एक गोपी तिच्या मैत्रिणीला फाग लीलेचे वर्णन करतांना सांगते, “हे सखी! मी कृष्ण आणि त्याच्या प्रिय राधेला होळी खेळतांना पाहिले. त्या वेळेला जी शोभा पाहिली, तिची तुलना कशी होणार? ते शोभायमान दृश्य अतुलनीय होते. अगं, त्यावर ओवाळून न टाकण्याजोगी एकही वस्तू शोधून सापडणार नाही. सुंदरी राधा जसजशी कृष्णाला आव्हान देते आणि त्याच्यावर एका मागून एक रंग उधळते, तसतसा कृष्ण तिच्या सौंदर्याने अधिकच वेडा होत जातो. राधेची पिचकारी पाहून तो हसत बसतो, पण तिथून पळून न जाता तिथेच उभे राहून तिने उडवलेल्या रंगात चिंब भिजत राहतो.”) 

या फाल्गुन महिन्यात केशरी अग्निपुष्पांचे वस्त्र लेऊन पलाश वृक्ष ऐन बहरात आलेले असतात. (त्याच पुष्पांना पाण्यात भिजवून सुंदर नैसर्गिक केशरी रंग तयार होतो). ही दैवी अन पावन परंपरा जपणारी गुलाल आणि इतर नैसर्गिक रंगांसमेत खेळल्या जाणारी होळी म्हणजे मथुरा, गोकुळ आणि वृंदावनातील खास आकर्षण. तिथे हा सण सार्वजनिक रित्या चौका-चौकात वेगवेगळ्या दिवशी खेळल्या जातो, म्हणूनच ही होळी फाल्गुन पौर्णिमेच्या महिनाभर किंवा पंधरा दिवस आधीच सुरु होते.  

मथुरेजवळ एक मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करतांनाचा माझा अनुभव अविस्मरणीय असाच होता. धुळवड जोरदार होतीच, पण होळीच्या या दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने होळी पोर्णिमेलाच सकाळी कॉलेजचे तमाम कॉरिडॉर गुलालाने रंगून गेले होते. अख्या स्टाफने कॉलेजमध्ये अशी ‘धुळवड’ खेळल्यावर दुपारी १२ वाजता पोबारा केला. होळी पोर्णिमेलाच ही अग्रिम धुळवड झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक धुळवड अर्थातच आपापल्या परिसरात साजरी केली गेली. मी मात्र बघायला जाणे शक्य असूनही बरसाना (राधेचे मूळ गाव) ची लठमार होळी बघितली नाही, त्याचे वैषम्य नक्कीच आहे. लठमार होळीचे हे जबरदस्त आकर्षक दृश्य दिसते राधेच्या गावात बरसानात, मथुरा, गोकुळ, वृंदावनातील अन स्थानिक पुरुष मंडळींना बरसानाच्या महिलांच्या लाठ्यांचा प्रतिकार करतांना बघून मजा येते. तसेही त्या भागात राधेवरील नितांत भक्ती दिसून येते. तेथील लोक बहुदा एकमेकांना अभिवादन करतांना ‘राधे-राधे’ म्हणतात.

आमच्या लहानपणी प्रत्येक घरी ऐसपैस अंगण असायचे अन घरोघरी होळी पेटवली जायची. होळीसाठी जुनी लाकडे, जुन्या झाडांच्या वाळलेल्या काटक्या, जीर्ण झालेले लाकडी सामान, इत्यादी गोळा व्हायचे. शेण गोळा करून त्याच्या लहान लहान गोवऱ्या थापायच्या अन प्रत्येक गोवरीच्या मध्ये एक छिद्र ठेवायचे, अशा गोवऱ्यांची माळ तयार करून पेटलेल्या होळीला अर्पण करायची. आता अशा माळा विकत घेता येतात. या होलिकोत्सावाची प्रसिद्ध कथा अशी की, होलिका या हिरण्यकश्यपूच्या बहिणीला अग्नीपासून भय नव्हते. याच कारणाने हिरण्यकश्यपूच्या पुत्राला म्हणजेच विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी ती पेटलेल्या अग्निकुंडात त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रत्यक्ष विष्णूची कृपा असल्याने प्रल्हाद जिवंत राहिला, आणि होलिका राक्षसी जळून खाक झाली. त्याचेच प्रतीक म्हणून दर फाल्गुन पौर्णिमेला अग्नी पेटवून त्यात आपल्या घरातील आणि समाजातील वाईट गोष्टी जाळून टाकणे हे अपेक्षित असते. मात्र निरोगी वृक्षांची कत्तल करून आणि जंगलतोड करून लाकडे जमा करून होळी पेटवणे योग्य नाही. झाडांचा नाश म्हणजे पर्यावरणास हानी पोचवणे होय. आधीच अतोनात वृक्ष तोड झाल्याने दूषित पर्यावरणाची समस्या गंभीर होते आहे. त्यात भर टाकून अशी होळी पेटवणे अयोग्य आहे. आजकाल प्रत्येक मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होळी पेटवतात. त्यापेक्षा दोन तीन किंवा जवळपासच्या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन प्रतीकात्मक लहानशी होळी पेटवून हा सण साजरा करावा असे मला वाटते.

माझ्या लहानपणीच्या धुळवडीच्या रम्य आठवणी पाण्याशी निगडित आहेत. नागपूरला आमच्या आईवडिलांच्या घरी खूप मोठं अंगण होतं. त्यात एक बरीच मोठी कढई होती, म्हणजे साधारण ३ वर्षांच मूल उभे राहील इतकी. त्याचा उपयोग एरवी १०० हून अधिक असणाऱ्या आमच्या झाडांना पाणी देण्याकरता होई. माझे ते आवडते काम होते. कढईत पाणी भरण्याकरता एक नळ होता, अन त्याला जोडलेल्या लांबच लांब पाईपने झाडांना पाणी देणे, खास करून उन्हाळ्यात अति शीतल असे काम होते. मात्र धुळवडीच्या दिवशी त्याच पाण्यात रंग मिसळून एकेकाला बुचकळून काढणे अन पिळून काढणे हा आमचा प्रिय उद्योग असायचा. अशीच सिमेंटची टाकी प्रत्येकाच्या घरी असायची, त्यांत एकामागून एक अशा आंघोळी करणे आणि जिथे जे मिळेल ते विनासंकोच खाणे, अशी धुळवड साजरी व्हायची.

कराड, कोल्हापूर अन सांगली पासून प्रत्येकी अंदाजे ४० किमी दूर असलेल्या इस्लामपूर येथे मी २०१६ ला नोकरीच्या निमित्याने गेले. तिथे धुळवडीचा (होळी पेटण्याचा दुसरा दिवस) इतर दिवसांसारखा एकदम नॉर्मल होता. मला कळेना, हे काय? चौकशी केल्यावर कळले की इथे ‘रंगपंचमी’ साजरी होते. रंगपंचमी म्हणजे होळी पौर्णिमेपासून पाचवा दिवस. मात्र मला हे माहितीच नव्हते. सुट्टी मिळो न मिळो, इथे रंगपंचमीच्या दिवशी सगळे आवर्जून सुट्टी घेतात. आमच्या मेडिकल कॉलेजमधील मुले भारताच्या विविध भागातील असल्यामुळे त्यांनी आपली डबल सोय केली, म्हणजेच धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी मस्ती! 

आता मोठ-मोठ्या निवासी संकुलांत धुळवड साजरी होते. हौसेला मोल नाही हेच खरे. बहुदा बॅकग्राऊंडला तत्कालीन चालणारी डिस्को गाणी अन त्यावर सानथोरांनी एकत्र येऊन आनंदाने बेधुंद नृत्य करणे हा अविभाज्य भाग! तसेच यासोबत कुठे कुठे (पाण्याचा अल्पसंचय असतांना देखील) कृत्रिम कारंज्यांची व्यवस्था आणि त्यात सचैल भिजणे. हा पाण्याचा अपव्यव खरंच अस्वस्थ करणारा आहे. त्यासोबत धुळवडीला मद्यपान आणि मांसाहार असलेल्या पार्ट्या देखील होतात. एकमेकांना रंगात रंगवून एकात्मकता वृद्धिंगत करणे हा धुळवड साजरी करण्यातला मूळ विचार आहे. मात्र त्याचे विकृत रूप समोर आले की दुःख होते. ज्यांचा कातडीवर वाईट परिणाम होतो आणि जे सतत धुवूनही जाता जात नाहीत असे केमिकल्स असलेले भडक रंग, तसेच चिखलात खेळणे, अचकटविचकट बोलणे, स्त्रियांची छेड काढणे, अश्लील शिव्या देणे, नशेत धुंद होऊन भांडण तंटा करणे, एकमेकांच्या जीवावर उठणे, कधी कधी तर चाकूने हल्ले करणे, खून करणे, इथवर अपराध होतात. या दिवशी वातावरण असे असते की, कांही ठिकाणी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची देखील भीती वाटते. होळीचे हे अनाकलनीय बीभत्स रूप आपल्या संस्कृतीत बसत नाही. या सर्वच असामाजिक वागणुकींला आळा बसायला हवा. पोलीस त्यांची ड्युटी करतातच, पण समाजभान नावाची चीज आहे ना! आपला सण साजरा करतांना इतरांच्या सुखाची आपण ‘होळी’ तर करीत नाही ना याचे स्मरण असू द्यावे.

मैत्रांनो, होळी हा सामाजिक एकात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच कोरड्या, सुंदर पर्यावरण स्नेही विविध रंगांचा वापर करून, वृक्षतोड न करता आणि व्यसनाधीन न होता हा राष्ट्रीय एकात्मकतेचा प्रतीक असा होलिकोत्सव आनंदाने साजरा करावा असे मला वाटते, अन तुम्हाला?  

गीत – ‘नको रे कृष्ण रंग फेकू चुनडी भिजते’ गीतप्रकार-हे शामसुंदर (गवळण) गायिका- सुशीला टेंबे, गीत संगीत-जी एन पुरोहित

‘होली आई रे कन्हाई’- फिल्म- मदर इंडिया (१९५७) गायिका- शमशाद बेगम, गीत- शकील बदायुनी, संगीत-नौशाद अली

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गाडी घुंगराची आली… गाडी घुंगराची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गाडी घुंगराची आली… गाडी घुंगराची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

व्हाट्सअपच्या ग्रुपवर काही अनपेक्षित असा खजिना मला मिळाला आहे.

जे मी कधी वाचले नव्हते ऐकले नव्हते असे अभंग गाणी वाचायला आणि ऐकायला मिळाली… त्याचा मला खूप आनंद झाला. हा ठेवा मी वहीत लिहून ठेवला आहे. आता कधीही काढून वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येतो .

 

यात काही गजानन महाराजांची पदे आली होती.

“गजानना या करी आवाहन आसनस्थ   व्हावे”

हे गजानन महाराजांचे आवाहन आले होते .त्यातील सहज शब्द मनाला भावतात. यात त्यांची यथासांग  पूजा सांगितली आहे…. आणि शेवटी..

 

“मिटतील चिंता हरतील व्याधी टाळतील आपत्ती

गजाननाच्या कृपाप्रसादे सहजमोक्ष प्राप्ती…”

असे शब्द आहेत..

 

कृपाप्रसाद….

 या शब्दाजवळ थोडं थांबायचं… विचार करायचा…

या प्रसादाची  गोडी किती अपूर्व असेल नाही का….. हा एकदा खाऊन संपणारा प्रसाद नाही….

त्यांची कृपा झाली की मन भरणार आहे .अजून काही हवं ही भूक संपणार आहे.

 

त्यांच्याकडे एकच मागणं आहे. डोक्यावर तुमचा वरदहस्त असू दे ….मग त्यानंतर काही मागायचे मनात येणारच नाही. 

“गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची….”

प्रत्यक्ष गजानन महाराजांची घुंगराची गाडी तिला न्यायला आलेली आहे. मग काय काय झालं असेल याचं सुरेख वर्णन या गीतात आहे…

 

तिच्या हातात वैराग्याची बांगडी भरली, सज्ञानाचे पातळ तिला नेसवले आणि संत गुरु कृपेची चोळी शीऊन दिली… आणि हे सगळं दृढनिश्चयाच्या पाटावर बसवून…

असेल कुणाच्या नशिबात असे माहेरपण… 

या शब्दांनी आपण थक्क होतो….ही शिकवण आपल्यासाठी पण आहेच की…हे  वाचल्यावर आपोआप समजते .

 

नंतर त्यांनी तिला मोक्षपदाची वाट दाखवून दिलेली आहे. 

लेकीचं मन कशानी शांत होणार आहे हे त्यांच्या शिवाय अजून कोण जाणणार……

 

“लागली समाधी सारे दंग समाधीत…..”

लागली समाधी…  मध्ये हृदय मंदिरात महाराजांना बसवून त्यांची मानसपूजा कशी करायची हे सांगितले आहे. ही वाचतानाच माझ्या मनातच ती पूजा सुरू होते….पूजा झाली की प्रसाद आलाच…

पण तो कशाचा मागायचा हे समजावून सांगितले आहे…

घर ,पैसा, अडका नकोच….. आता हवी आहे फक्त मन:शांती

किती सुरेख मागणं आहे ना… वाचून आपण लगेच भानावर येतो…

खरंच आहे एकदा मनःशांती  मिळाली की बाकी काही मागायचं मनातच येणार नाही…

 

एका गाण्यात गजानन महाराजांना एका भक्ताने जेवायला बोलावले अशी कल्पना केली आहे… प्रत्यक्ष महाराजांचे जेवण… त्यात सगळ्या पदार्थांची रेलचेल आहे पक्वान्नांपासून महाराजांना आवडणाऱ्या पिठलं भाकरी पर्यंत…. आपण वर्णन ऐकत राहतो …. अगदी सजवलेलं ताट आपल्याला समोर दिसत असतं ….आणि शेवटी…

“अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे  ब्रह्म्याचे पूजन…”

…. ही ओळ आपल्याला जागेवर आणते. विचारांना प्रवृत्त करते… महाराजांच्या प्रकटीकरणापासूनची कथा समोर येते. त्यांनी काय सांगितले आहे ते आठवायला लागते….

 

सुरेल आवाजातली गजानन महाराजांची बावन्नी ऐकत रहावी…

“चिंता साऱ्या दूर करी

संकटातुनी पार करी….”

महाराज आहेतच  आपल्याला सांभाळायला असे समजून घेऊन शांतपणे हे ऐकत बसावे…

ऊठूच नये…

 

घरात बसून वाचत राहू…. अभ्यास करत राहू….

पुढचं महाराज ठरवतील तसं…

बोला गजानन महाराज की जय !!!! 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवा बाजारात गेले होते••• आणि घरच्या उपयोगासाठी, किंवा नित्योपयोगी, काही वस्तू मिळत आहेत का ते पहात होते••• एका छोट्याशा दुकानासमोर, आपोआप पावले थबकलीच••• दुकान होते वेगवेगळ्या पिशव्यांचे••• मग त्यात अगदी पारंपारिक असलेला आजीबाईचा बटवा••• फॅशन म्हणून आलेला •••ते अगदी छोटी अशी मोबाईल बॅग म्हणून खांद्याला अडकवायची मोठा बंद असलेली साधीच पण मोहक अशी पिशवी•••

मग भाजी आणण्याकरता वेगळ्या पिशव्या••• किराणा आणण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• प्रवासाला जाण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• शाळेत न्यायच्या••• डब्बा ठेवायच्या •••कॉलेज कुमारांसाठी •••लॅपटॉप साठी••• सामान ने-आण करण्यासाठी•••टिकल्या ठेवण्यासाठी••• हातातच पर्स म्हणून वापरण्यासाठी••• महिलांचे दागिने ठेवण्यासाठी••• साड्या ठेवण्यासाठी••• रुमाल, ब्लाउज ठेवण्यासाठी••• उगीचच शो म्हणून वापरण्यासाठी••• लॉन्ड्रीचे कपडे देण्यासाठी •••अरे बापरे!•••

अजून खूप मोठी यादी••• लांबतच जाईल••• इतक्या तऱ्हेच्या पिशव्या त्या दुकानात होत्या••• दुकानाचे नाव पण कलात्मक ठेवलेले होते••• “BAG THE BAG”••• आणि सेक्शनला त्या त्या पिशव्यांची नावे दिली होती•••

दुकानात जाऊन हरखून जायला जायला झाले••• दुकानात गेल्यावर पिशव्यांचे एवढे प्रकार पाहून लक्षात आले ••• व्यवसाय करायचा म्हटल्यावर कोणताही करता येतो •••फक्त थोडा अभ्यास आणि लोकांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी••• बघा साधी पिशवी, पण त्याचे एवढे प्रकार •••एवढी रुपे••• एकदम समोर आल्यावर••• गरज नसतानाही, एखादी तरी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते कोणी •••

पिशवीची व्याख्या काय हो? पिशवी म्हणजे कोणतेही सामान, वस्तू, सहजपणे ने-आण करता येण्यासाठी, त्याला धरायला बंद असलेली, पण बंद नसलेली, किंवा बंद करता येण्याजोगी, वस्तू••• पूर्वी या सगळ्या पिशव्या जुन्या कापडापासून, कपड्या पासून, बनवल्या जायच्या••• पण आता फक्त कापडाच्या नाहीत तर कागदाच्या, प्लास्टिकच्या, ऍक्रॅलिक पदार्थांपासून, नवीनच बनवलेल्या पिशव्या मिळतात••• म्हणूनच खूप आकर्षक दिसून त्या घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही•••

यावरुनच आठवली ती स्पंजची पिशवी••• सध्या ती पाहायला मिळत नाही ••• पण काही वर्षांपूर्वी अशा बऱ्याच पिशव्या लोक वापरत होते •••दिसायला अगदी छोटी पिशवी••• पण त्यात सामान भरायला सुरुवात केल्यावर, कधी पोत्यासारखे रूप घ्यायची••• कळायचे पण नाही••• आपण अशा वस्तू त्यात भरू लागतो••• तसतसा स्पंज ताणून ती पिशवी मोठी मोठी होत जायची ••• त्यामुळे कुठेही सहज ने-आण करता येण्यासाठी ही पिशवी सगळ्याकडे असायची•••

 मग लक्षात आले •••आपल्या शरीरात सुद्धा किती पिशव्या आहेत ना ? पोट, किडन्या, हृदय, जठर, मेंदू, स्त्रियांना गर्भाशय, अगदी शरीरातील शिरा धमन्या या पेप्सी मिळणाऱ्या पिशव्या सारख्याच नाहीत का?

म्हणजे काहीही असो••• कुठेही असो •••कसेही असो••• पिशव्यांची गरज ही पदोपदी लागते ••• आणि ती आपण वापरतच असतो••• पण पिशवी ही अशी वस्तू आहे, जी वापरायची •••पण परत रिकामी पण करायची असते •••जर रिकाम्या न करता पिशव्यांचा फक्त वापर केला तर काय होईल हो? घरातली जागा निष्कारण व्यापली जाणार •••कितीही मोठे घर असले तरी; एक दिवस जागा कमी पडू लागणार ••• हो ना? म्हणूनच आपण त्या त्या पिशवीचा उपयोग तेवढ्यापुरता करत असतो •••पुन्हा पुन्हा वापरली तरी ती काढ घाल करून त्या पिशवीचा वापर करत असतो•••

पिशवी ची व्याख्या, पिशवीचा उपयोग, पिशव्यांचे प्रकार पाहून वाटले••• आपले मन हे पण एक पिशवी आहे ना? नक्कीच आहे••• आणि तिचे रूप •••त्या स्पंजच्या पिशवी सारखे आहे••• काहीही••• कितीही •••कसे पण कोंबा••• ती पिशवी सगळे धारण करते•••

मग लक्षात आले •••पण पिशवीतून काढ घाल ही नेहमी होत राहिली पाहिजे •••नाहीतर एक दिवस जागा कमी पडणार••• पण मग त्याचा वापर तसा करायला हवा••• पण कोणी तसा करत नाहीये••• या मनामध्ये मिळेल ते••• दिसेल ते •••फक्त कोंबत आलो आहोत••• विशेषत: नको त्या वस्तूच •••पहिल्यापासून जास्त प्रमाणात भरल्या गेल्याने, त्यात हव्या त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडत आहे•••

कोण केव्हा रागवले•••कोण केव्हा   भांडले••• कोण कोणाला काय बोलले••• हे सगळं बारकाव्यानिशी आपण आपल्या मनात ठेवत असतो••• म्हणून तेवढेच लक्षात राहते••• मग चांगल्या घटना, चांगले बोलणे, चांगले वागणे, याला मनात साठवायला जागा कमी पडते••• म्हणून आपण त्या वस्तू वापरून टाकून देतो•••

यामुळे प्रत्येकाचे मन हे नकारात्मक  गोष्टींनी भरले गेले आहे •••एक दिवस सुट्टीच्या दिवशी •••किंवा निवांत वेळी •••ही सगळी नकारात्मकता काढून फेकून दिली पाहिजे •••षड्रिपूंचे  जाळे काढून टाकले पाहिजे••• म्हणजे सकारात्मकतेला ठेवायला मनाच्या पिशवीत जागा होईल••• आत्मविश्वास त्यामध्ये भरता येईल ••• सगळ्यांचे चांगले गुण पाहण्याची दृष्टी त्यात जपता येईल••• या मनाच्या पिशवीला, अंतर्मनाचा बंद लावला की, किती छान या पिशवीचा वापर होईल ना?•••

कोणत्याही दुकानात न मिळणारी, पिशवी तुमची तुम्ही कलात्मकतेने सजवू शकता••• कधी त्याला चांगल्या वर्तणुकीची झालर  किंवा  लेस लावू शकता••• तर कधी चांगल्या विचारांच्या टिकल्या, आरसे लावून, आकर्षक करू शकता••• मग नकारात्मकता काढून, सकारात्मकतेला थारा दिलेली ही मनाची पिशवी, आजीबाईंच्या बटव्याची सारखी कधीच आऊटडेटेड न होणारी •••अशी असेल••• त्यातूनच कोणत्याही प्रसंगी••• कोणतीही ••• आवश्यक वस्तू तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा दूर करायला मदत करेल••• बघा प्रत्येकाने आपली मनाची पिशवी साफ करून ठेवा•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

??

☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत होता. कधी हा रंग कधी तो…., दोरा कधी वर कधी खाली, कधी मागून पुढे कधी पुढून मागं, अनेक रंगांचे, अनेक प्रकारचे धागे एकमेकांत गुंफून   आयुष्याचं एक वस्त्र तो विणत होता.ते सुंदर बनेल की कुरुप हे त्याचं त्यालाच माहीत नाही. फक्त विणत रहायचं, धावत रहायचं येवढंच त्याला माहीत ! बाकी सगळ रहस्यच! 

आवडता रंग हाती आला की गडी जाम खूश! मग हव तसं, हव तिथं तो रंगवून घ्यायचा, अनेक दोऱ्यात माळून सुंदर नक्षीकाम करून घ्यायचा. त्याला आवडेल तसं दोरा वर खाली हलवायचाआणि त्यातून निर्माण झालेल्या चित्राकडे,  आपल्याच निर्मिती कडे गौरवाने पहात रहायचा. वाटायचं हे क्षण असेच  रहावेत. हा आनंदाचा रंग कायम आपल्याच हातात रहावा. दुःखं,संकटं, विघ्न अशी छिद्रे आपल्या वस्त्राला नकोच. सौंदर्य नष्टच होईल  ना मग! इतरांनी आपलं वस्त्र बघितलं की नेहमी वाह वाहच केली पाहिजे असंच त्याला वाटायचं! 

पण शेवटी नियतीच ती! उचललेला चहाचा पेला ओठांपर्यंत पोहोचायच्या आधी कोणती अन् किती वादळ उठवेल सांगण कठीण! आयुष्य नावाचा खेळ असाच असतो ना! खेळ अगदी रंगात येतं अन् अचानक एका छोट्याशा चुकीनं सर्वस्व उद्धवस्त होतं. जणू काही त्या धोट्याच्या हातात नासका, कुजका, तुटका धागा येतो अन् सुंदर विणलेल्या कापडाला भली मोठी भोकं पडत जातात. कधी एकमेकांत गुंतलेले धागे निसटू लागतात, कधी घट्ट बसलेली वीण उसवू लागते, तर कधी धागेच एकमेकांना तोडू लागतात. 

किती विचित्र! वेळ बदलली की धाग्यांचे रंग सुद्धा बदलत जातात. जवळचे कोण, लांबचे कोण हे लक्षात यायला लागतं. काल पर्यंत अगदी मिठी मारुन बसलेले धागे झटक्यात लांब पळतात. जवळ कोण नसतच अशावेळी . सहाजिकच मोठं छिद्र निर्माण होणारच की तिथं!  वेळच तशी येते ना. आणि मग हा आयुष्याचा खेळ नकोसा होऊन जातो. कारण अगदी जवळच्या धाग्यांनी सुद्धा साथ सोडलेली असते. स्वतः होऊन असेल किंवा नियतीचा घाला असेल तो. पण छिद्र पडलेलं असतं हे मात्र नक्की! अशा वेळी काय करावं सुचत नाही. पुन्हा तोच तुटलेला दोरा बांधून घ्यावा म्हटलं तर धोट्याला माग कुठं जाता येतं. तो पुढेच पळणार. 

मागचं बदलता येत नाही अन् पुढचं रहस्य उलगडत नाही. एकच पर्याय हाती असतो. फक्त धावत राहणं, पळत राहणं,आलेला प्रत्येक क्षण अनुभवत राहणं..बस्स..! 

अशा वेळी कधी कधी कोणाचा आधाराचा धागा आपल्या वस्त्रातील छिद्राला सांधण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्या सारखं साफाईदारपणा नसतो त्याच्यात, ओबडधोबड का होईना, पण छिद्र झाकलं गेलं याचंच समाधान!

काहीतर खूप मोठं गमावल्याची सल कायम सलत राहते पण खूप काही चांगल अजून शिल्लक आहे याची आस सुद्धा लागून राहते. हीच तर खरी मेख आहे या प्राक्तन नावाच्या रहस्याची! हे रहस्य उलगडण्यासाठी, आयुष्याचं एक सुंदर वस्त्र विनण्यासाठी हा अनुभवाचा धोटा कायम धावत राहणंच योग्य आहे.  आपण फक्त त्रयस्तासारखं त्या आयुष्यरुपी वस्त्राकडे पहात रहायचं, संकटाच्या वेळीपण मन शांत ठेवून आलेल्या प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायचा, कारण त्यामुळेच मार्ग सापडत जातं, हवं ते गवसतं आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्य बदलत जातं.

म्हणूनच या प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत असतो. कधी हा रंग कधी तो………नेहमी सारखंच………

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातं…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ जातं… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

मी जातं…… जातीपातीतील नव्हे ! खूपच अनादी कालीन ! माझ्याशिवाय ह्या मानव जातीची भूक भागत नाही ! तसा माझा ह्या पृथ्वीवर जन्म केव्हा झाला ते सांगता येत नाही. गरज ही शोधाची जननीच ! त्यामुळेच माझा शोध कोणत्या अवलीयाने लावला ते ही अज्ञात ! 

कदाचित रामायण, महाभारत असेल किंवा त्यापुढेही माझा जन्म झाला असेल, नक्की सांगता येत नाही एवढं खर ! मानवी भूक निर्माण झाली व गहू बाजरी ज्वारी निर्माण झाली तेंव्हा पासूनच मी आहे ! पण माझं अस्तित्व अजुनी टिकून आहे, व पुढेही टिकून राहील ! 

मी मुळातच दणकट व खंबीर ! कारण मी दगडातून निर्माण झाले. माझं व स्त्रीच सख्य हे कायमच, स्त्री माझी बाल मैत्रीण ! तिच्या वाटेला आलेलं सुख दुःख मी स्वतः पाहिलंय ! तिच्या वेदना मी जाणल्या !

माझी घरघर व तिच्या प्रपंच्याची घरघर ही भल्या पहाटेच होत असे ! तीन मला ब्राम्ह्य मुहूर्तावर जाग करण्याची सवय लावली ! तिच्या खड्या आवाजातील ओव्या व माझी घरघर एकदमच एकावेळी चालू होतं असत. व आमच्या आवाजाने मग इतर लोक उठत असत.

माझी सुख दुःखाची दोन पाती (पाळ ) मी स्त्रीच्या गळ्यात बांधली ! हे कमी पडू नये म्हणून माझ्या वरच्या पाळीच्या कडेला गोलसर खळीत वेदनेचा दांडा बसवला गेला ! (कदाचित तो त्रिगुणात्मक असावा ) जेणेकरून तो दांडा हातात धरून मला गोलगोल फिरवता येईल अशी सोय पण केली ! खळी ही जणू माझ्या गालावरचीच खळी ! कायमची ! माझा दांडा व तिच्या वेदना ह्या केव्हा एकरूप झाल्या ते कळलेच नाही ! पाळ बाजूला केल तरी, तो वेदनेचा दांडा तसाच ठेवला जातो.

माझ्या खालच्या पाळ्याला मात्र मधोमध एक सुख दुःखाना एकत्र ठेवणारा, प्रेमाचा मजबूत खिळा आहे ! जेणेकरून दोन्ही सुख दुःखाची पाळी एकत्र नांदतील ! 

मी म्हटलं तर वर्तुळाकार ! म्हटलं तर शून्य ! 360 अंशातून कायम फिरते ! व माझ्या भोवती तो वेदनेचा दांडा पण फिरतोच ! माझ्यात व सृष्टीत काय फरक आहे ! ती पण गोल फिरत असतेच की सूर्यभोवती ! काहीवेळा वापर नसल्यास शून्या सारखी हरवते ! शून्यात टक लावून बसते ! 

माझ्या वरच्या पाळीत माझं ऊर्ध्वमुखी तोंड ! जे मुखात पडेल ते गोड मानून घेते ! कधी गहू, कधी ज्वारी, कधी कडवट बाजरी, कधी शुभ्र तांदुळ ! येणाऱ्या घासाला पवित्र मानून, त्याचे चर्वण करायचे व त्याचे कठीण अस्तित्व घालून त्याला सुता सारखे मऊ करायचे ! व बाहेर त्याला धुतल्या तांदळासारखा शुद्ध करून पाठवायचे ! 

जो पर्यंत संसार आहे, प्रपंच आहे, तोपर्यंत माझं हे काम असच अव्याहत पणे चालू असणार ! संसार म्हटलं की भूक आलीच ! ह्या संसारात मोक्ष मिळे पर्यंत हेच माझं अखंड व्रत ! व्वा काय जन्म दिलास देवा ! माझ्या ह्या भाळी दोन सुख दुःखाच्या पाळी, ऊर्ध्वमुख वर वेदनेचा दांडा ! तो ही शून्यात फिरणारा ! 

कित्येक दाणे मुखात येतात, कित्येक सुपात आहेत, कित्येक शुभ्र होऊन बाहेर पडले ! मी मात्र तशीच फिरत आहे. वरच्या पाळीत मात्र तू विविध नक्षी कोरलीस पण खालच्या पाळीच काय ? तिला मात्र छन्निचे घाव सोसावे लागतात ! 

माझं कालपरत्वे रूप बदललं ! यांत्रिकी झालं ! कोणी मिक्सर केलं म्हणून काय झालं ? माझ्या पाळ्या बदलाव्या लागल्या तरी, मी अजुनी वर्तुळातच फिरते ! ती कायमची येणार दळण दळत !! 

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठवणीतल्या आठवणी– ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साठवणीतल्या आठवणी–’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते आणि प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचीच मालमत्ता असु शकते व त्यात कडू गोड आठवणींचा भरगच्च  खजिना असतो. कडू आठवणी मनाच्या तळाशी दाबल्या की मग वर येतो तो सुंदर आनंदी आठवणींचा    साठा. मग त्या आठवणींचा ठेवा दुसऱ्यांना वाटावासा वाटतो. अगदी तसंच झालं आहे माझं.   

महाशिवरात्र आली की वडीलधाऱ्यांच्या आठवणी उफाळून येतात. वडीलधारी काळाच्या पडद्याआड जातात आणि आपण पोरकं होतो. अकाली पोक्तपणा येतो.

प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो ‘तुझ्यापेक्षा मला तुझ्या आठवणीच जवळच्या वाटतात, कारण त्या सतत माझ्याजवळ राहतात.’ अशीच एक माझ्या आई -वडिलांची सुखद आठवण आठवली.

माझे मेव्हणे श्री. दत्तात्रय पंडित, पंजाबच्या गव्हर्नरांचे, श्री काकासाहेब गाडगीळ यांचे  P. A. होते. त्यांच्यामुळे पुणे ते चंदीगड अशा लांबच्या प्रवासाचा योग आला. त्यावेळी सोयीस्कर गाड्या नव्हत्या. प्रवासात दोन-चार दिवस जात असत.

माझे वडील ति. नाना, दत्तोपंत स. माजगावकर कट्टर शिवभक्त होते. रोज सोवळं नेसून त्यांनी केलेल्या पार्थिव पूजेचा सोहळा अवर्णनीय असायचा. दंडाला कपाळाला भस्माचे पट्टे लावून स्पष्ट मंत्रोच्चारांनी केलेल्या मंत्रध्वनीने शंखनिनादाने आमची प्रभात, सुप्रभात व्हायची. रोज महादेवाची सुबक पिंड तयार करून यथासांग पूजा करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. 

तर काय सांगत होते! आमचा प्रवास सुरू झाला. पळणाऱ्या झाडांमधून सूर्याची सोनेरी किरणे आत आली तर कापराचा सुगंध नाकात शिरला. किलकीले डोळे विस्फारले गेले, कारण धावत्या गाडीत मांडी घालून प्रवासातही नेम न मोडता  नानांची पूजा चालू होती. शिवभक्त मंडळी सरळ मार्गी असतात. वाकडी वाट करून नेम मोडणं त्यांच्या तत्वात बसत नाही.

प्रवासातही आई -नाना पूजेच्या तयारीनिशी आले होते. नानांच्या पुण्यकर्माला आईची साथ होती. त्यावेळी लकडी पुलावर नदीकाठी काळीशार माती भरपूर असायची. आई अवघड लकडी पूल उतरून, नदी काठावरची काळी माती पिशवी भरून, खांद्यावरून आणायची. ती चाळणीने मऊशार चाळायची आणि देवघराच्या फडताळ्यात डब्यात भरून ठेवायची. देवाची तांब्याची उपकरणी लख्ख करण्याचं काम आम्हा मुलींकडे असायचं आणि त्याबद्दल आम्हांला बक्षीस काय मिळायचं माहित आहे? श्रीखंडाची गोळी. पण ती चघळतांना आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. आजकालची कॅडबरी पण त्याच्यापुढे नक्कीच फिक्की ठरेल.

तर त्या चंदीगड प्रवासात आईने काळ्या मातीचे बोचकंही बरोबर आठवणीने घेतलं होतं. आणि हो! काळीमाती भिजवायला पुरेसं घरचं पाणी फिरकीच्या तांब्यातून घ्यायला आई विसरली नव्हती. तेव्हा पितळीचे छान कडी असलेले तांबे प्रवासात सगळेजण वापरायचे. थर्मास चा शोध तेव्हां लागला नव्हता आणि प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या तर अस्तित्वातच नव्हत्या.

ति. नानांनी महादेवाची पिंड इतकी सुबक, इतकी सुबक बनवली की, रेल्वेच्या जनरल बोगीतली लोकं महादेवाची पिंड बघायला गोळा झाले. पार्थिव पूजा, मंत्र जागर, उत्तर पूजा पण गाडीतच झाली. सगळ्यांना इतकी अपूर्वाई वाटली. नानांच्या भोवती ही गर्दी झाली.

त्यावेळी रेल्वे डब्याच्या खिडक्यांना गज नव्हते. इतकी गर्दी झाली की एका पंजाबी ‘टीसी’ नें ही बातमी स्टेशन मास्तरला पुरवली. प्लॅटफॉर्मवर नानांची पूजा बघायला हा घोळका झाला.

योगायोग असा की कुणालातरी जवळच असलेलं बेलाचं झाड दिसलं.. गाडी सुटायला अवकाश होता. वयस्करांनी तरुणांना पिटाळलं. पटापट गाडीतून माकडा सारख्या उड्या मारून पोरांनी बेलाची पाने तोडली. भाविकांनी पिंडीवर मनोभावे वाहिली. भाविकांच्या श्रद्धेने छोटीशी पिंड हां हां म्हणता बेलाच्या पानाने झाकली गेली. 

रेल्वे डब्यात आपण चहा नाश्ता करतो ना त्या छोटेखाली टेबलावर ही पूजा झाली होती. गाडीच्या त्या जनरल बोगीला मंदिराचं स्वरूप आलं होतं. असा आमचा एरवी कंटाळवाणा वाटणारा प्रवास मजेशीर झाला. नंतर तर लोक नानांच्याही आणि जोडीने  आईच्या पण पाया पडायला लागले.   आई नाना अवघडले, संकोचले. आम्ही मात्र तोंडावर हात ठेवून हा सोहळा बघतच राह्यलो. खरं सांगु, तेव्हा तर माझे आई-वडिल मला शंकर-पार्वतीच भासले.

तर मंडळी, अशी ही भावभक्तीने भारलेल्या शिवभक्ताची ही आठवण कथा.

शिवशंभो  महादेवा तुला त्रिवार दंडवत. 

माझी सासरेही महा पुण्यवान  शिवभक्त होते. कारण महाशिवरात्रीलाच ते जीवा शिवाच्या भेटीला गेले. अशा या थोर वडीलधाऱ्यांच्या पूर्वपुण्याई मुळेच आपण सुखात आहोत नाही कां?

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

एकदा सकाळ सकाळीसच गोरटेली गोल गरगरीत बाई दवाखान्यात आली. प्रस्थ श्रीमंतांकडचं दिसत होतं. गळा दागिन्यांनी भरलेला. गळाच काय जिथे जिथे दागिने असायला हवेत तिथे तिथे ते विराजमान असलेले. आल्या आल्या ती सरळ वजन काट्यावरच उभी राहिली. वजनकाटा नव्वदच्या वर सरकला, तशी ती किंचाळलीच. “अग्गो बाई नव्वदच्या वर गेलं की हो! बरेच दिवस अठ्ठ्यांशीवर रोखून धरले होते. डॉक्टर काहीतरी करा, मला वजन कमी करायचेय, त्यासाठी मी तुमच्याकडे आलीय.”  मी तिला पुन्हा आपादमस्तक न्याहाळलं. मग सहजच बोललो, “यात दोन किलो वजन तुमच्या दागिन्यांचंच असेल.”  तिला नेमकं ते वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं. आपले दागिने ठीकठाक करत, टेबलावर ठेवलेली पर्स पुन्हा ताब्यात घेत समोर खुर्चीवर बसली पसरट फैलावून, व म्हणाली, “नाही हो डॉक्टर, माझं वजन इतकं काही नाहीये. आमच्या घरी कुणीही काट्यावर उभं राहिलं की काटा शंभरी पार जातो. सगळ्यांच्या तब्येती मस्त, हे एक वजनाचं सोडलं तर! ” मग तिने अख्ख्या खानदानाचा वजनी लेखाजोखाच मांडला. 

आता त्याचं (किंवा तिचं) असं होतं की ती पंजाबी होती. मेदस्वी असणं हे वंशपरंपरागत. त्यातही फॅमिली बिझनेस आलिशान दारूचं दुकान. सगळी उच्चकोटीची गिऱ्हाईकं. बिझनेस करता करता त्यांच्या बरोबर पिणं ही आलंच व आपसूक खाणंही. तेही प्रमाणाबाहेर. पुन्हा ते पंजाबी खाणं. मक्के की रोटी सरसों का साग, तेलतर्री व पनीरचा बोलबाला. शिवाय लस्सीचा मारा, मलई मार के. प्रकरण तसं गंभीरच होतं. म्हणजे वजन कमी करण्याबाबत. “मला हे सुटलेलं शरीर नकोसं झालंय. मी विशीत जशी शिडशिडीत होते तसं मला पुन्हा व्हायचंय.”  चाळिशीची असूनही नव्वदीला टेकलेल्या स्थूलदेहधारिणीने निक्षून सांगितले. 

“तुम्ही योग्य वेळी व योग्य ठिकाणी आलात. काळजी करू नका. मात्र तुमचा विशीतला एखादा फोटो असेल तर अवश्य दाखवा, म्हणजे शिडशिडीत असण्याची तुमची व्याख्या तरी कळेल!! ” असं मी म्हणताच तिने लागलीच मोबाईल काढून, दोन मिनिटे स्क्रोल करून एका सुंदर तरूणीचा फोटो मला दाखवला. कुणीही तिच्या प्रेमात पडावं असा!! मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तरीही विचारून घेतलं, “या तुम्हीच का?” यावर, “म्हणजे काय?” म्हणत, गोड लाजत तिने मान हलवली. आता आव्हान माझ्यापुढे होतं. गोल गरगरीत असण्यापेक्षा सुडौल असणं ही तिची प्रबळ इच्छा होती. वय फारसं उलटलेलं नव्हतं, तेव्हा तिला आश्वस्त करणं भाग होतं. तिची थोडक्यात हिस्ट्री घेतली तर तिने आयुष्याचा पटच रंगवला. नाशिक हे तिचं माहेर, इंदोर हे सासर. माहेराकडून मिळालेला वजनी वारसा सासरीही निभावला गेला. “खाना कंट्रोल ही नहीं होता हे पालुपद तिने कितीतरी वेळा उच्चारलेले. संयुक्त कुटुंबाचा गोतावळा, घरी पैपाहुण्यांचा राबता. खाणंपिणं याची रेलचेल. तरी “एवढ्यात पिणं मी कमी केलंय, वजन वाढत गेलं तसं, पण तेही थोडंफार सवयीचंच झालंय.” निर्विकारपणे तिने सांगितलं. “ ते अगोदर बंद करावं लागेल!” असं मी म्हटलं रे म्हटलं तिचा चेहेरा पडला. तरीही स्वतःला सावरत ती विशालकाय निश्चयाने उद्गारली, “ मैं कुछ भी करूंगी, मलाच हे ओझं सहन होत नाही. इतर तंदुरुस्त बायका पाहिल्या की माझा जळफळाट होतो, त्यांची डौलदार चाल, त्यांचे नखरे, फिगर मेंटेन केल्याचा अभिमान पाहून मी कष्टी होतेच होते. माझं वय काही फार नाही. इतक्या लवकर मी जाडगेलेसी कशी काय झाली याचं मलाच नवल वाटतं, तेव्हा इतर बायकांच्या बरोबरीने नव्हे पण त्यातल्यात्यात चांगलं दिसावं ही माझी तळमळ, मळमळ काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण आहे.”  तिने तिचा न्यूनगंड उघड केला. सहानुभूती वाटावी अशीच तिची जटिल समस्या! खरंतर तिचा विशीतला फोटो डोळ्यासमोरून हलत नव्हता. तसं असलं तर कुणीही सहज स्टेटस म्हणून ठेवला असता मोबाईलमधे. सिनेतारकांपेक्षाही ती उजवीच होती तेव्हा. तेव्हा तिला पुनश्च तिचं वैभव मिळवून द्यायचं याचा विडा मी उचललाच! 

तिचा न्यूनगंड घालवणं आवश्यक होतं. मी म्हटलं, “देखो, गोल गरगरीत असणं हा काही गुन्हा नाही. राऊंड हाही एक शेपच आहे. त्यात बदल करणं एकदम सोपं नाही, तसेच अवघडही नाही. वेळ लागेल, काही तपासण्या, काही पथ्यपाणी, व्यायाम शिवाय औषधं याने तुम्ही बरंच काही मिळवू शकाल, आयमीन घालवू शकाल! तेव्हा काळजी करू नका. ” 

आतापर्यंत चेहेऱ्यावर ताण घेऊन बसलेली ती एकेकाळची सौंदर्यवती आता थोडीफार प्रफुल्लित दिसायला लागली. वजन कमी होऊ शकतं असं म्हणणारा जणू मीच पहिला भेटलो असावा या आविर्भावात तिने सांगितलं, “माझा नवरा सहा महिन्यांसाठी कॅनेडात गेलाय, तो परत यायला आठ महिनेही लागू शकतील. मुलं ही बोर्डिंग स्कुलला शिकतात. तेव्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा माझा इरादा आहे. तुम्ही सांगाल ते पथ्यपाणी, गोळ्या औषधं सगळं करेन पण मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय! ”

एक डॉक्टर म्हणून मला तिच्या कटात सामील होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिचा विशीतला फोटो नजरे समोर ठेऊन !! 

(४/३/२०२४ रोजी झालेल्या ‘ वर्ल्ड ओबेसिटी डे ‘ निमित्त.) 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

केस विंचरताना छोटे झालेले, काहीसे पांढरे आणि थोडे कुरळे केस विंचरताना मनात आलं की, हेच का ते आपले लांब सडक केस! त्यांची आता रया गेली आहे! विचार करता करता केसांचा जीवनातील बदल माझ्या डोळ्यासमोर येत गेला….

बाळ जन्माला आलं की त्याला बघायला येणारे लोक त्याचा रंग,नाक, डोळे याबरोबरच त्याच्या जावळावर चर्चा करीत असतात.

एखाद्या बाळाला खूप जावळ असते तर एखादे बाळ एकदम टकलू असते! मग त्यावरून ते कोणाच्या वळणावर गेलं आहे, यावर बायका चवी चवीने बोलत असतात. त्यातून ती मुलगी असेल तर बघायलाच नको. तिची आजी तिच्या लांब सडक होणाऱ्या केसांची वेणी घालण्याची स्वप्ने बघू लागते. साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी लांब सडक केस हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. अंबाडा, खोपा यातून बाहेर येऊन स्त्रिया लांब सडक वेणी कडे वळल्या होत्या तो काळ! अजूनही दक्षिणेत लांब सडक केसांचे महत्त्व जास्त दिसते आणि त्या केसावर कायमच गजरा आणि फुले माळली जातात.

माझ्या लहानपणी आई आणि आजी दोघी बेळगाव, रत्नागिरी भागात राहिलेल्या असल्याने केसांचे कौतुक फार! दर रविवारी सकाळी केसांना तेल चोपडले जाई. पाटावर बसायचं, चार बोटं तेलाची जमिनीवर टेकवायची आणि केसांनाच काय पण हात पाय, पाठ, तेल लावून चोळून घ्यायचं! तेव्हा ते नको वाटायचं, पण सक्तीचंच असे. नंतर बंब भर पाणी तापवलेले असे. गवला कचरा (सुगंधी वनस्पती) घालून केलेली शिकेकाई  आमच्याकडे भरपूर असे. मग काय अभ्यंग स्नानाचा थाट!

कोकणात पावसाच्या दिवसात केस वाळायचे नाहीत म्हणून आई तव्यावर थोडे निखारे टाकून त्यात धूप घालायची, त्यावर एक टोपले पालथे घालून मंद आचेवर केस सुकवून द्यायची.तेव्हा त्याचा असा काही सुगंध घरभर दरवळायचा की बस! अजून ते सुगंधी दिवस आठवतात!

ओले केस वाळवण्यासाठी त्याची बट वेणी घालून दुपारपर्यंत केस वाळले की  आई केसांच्या कधी दोन तर कधी चार वेण्या घालून द्यायची. घरातल्या फुलांचा गजरा माळला की, इतर कोणत्याही वेशभूषाची गरज लागायची नाही. आम्हा सर्व मैत्रिणीचे केस लांब सडक होते, पण देशावर आल्यावर हे सर्व बदलले. कोकणात पाणी आणि हवा लांब केसाला पोषक आहे, तसेच जे लोक मासे खातात त्यांचे केस तर विशेष तुकतुकीत असतात! असे हे लांब केस मिरवीत माझे कॉलेज शिक्षण संपले.

लग्नात लांब केसांची वेणी घालून उभी राहिले. मुलीचे लांब केस ही जणू लग्नातली एक अटच वाटत असे त्याकाळी! पुढे बाळंतपणात केसांची लांबी आणि जाडी थोडी कमी झाली. आणि केसांचे प्रेम ही कमी झाले .चाळीशी च्या आसपास केसांचे शेंडे कमी केले की केस वाढतात असा समज होता आणि नाहीच वाढले तर आणखी थोडे कापून “पोनि टेल” वर येतात, तसंच माझं झालं! केसात रुपेरी चांदी दिसू लागल्यावर इतक्यात पांढरे केस दिसायला नको म्हणून वेगवेगळे डाय आणि मेहंदी लावली. त्याचा परिणाम म्हणून केस आणखीनच  कमी होऊ लागले. माझे मोठे दीर म्हणायचे,

“Once you dye, you have to dye, until you die..!”

तसं केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. केसाचा अनुवंशिक गुण हाही महत्त्वाचा आहे .काहींचे केस मुळातच दाट असतात तर काहींचे मुळातच विरळ असतात. माझ्या परिचयातील कोकणातील एक आजी साठीच्या होत्या, पण त्यांचे केस पांढरे शुभ्र झाले तरी लांब सडक होते, तर दुसऱ्या आजी  85 वर्षाच्या होत्या, तरी केस लांब आणि काळेभोर होते. एकंदरीत कोकणातील स्त्रियांचे केस खास असत!

अलीकडे प्रदूषण, हवेतील रखरखीत पणा, तेल न लावणे यामुळे केसांची वाढ कमी झाली आहे असे वाटते. केसांची निगा राखायला वेळ मिळत नाही आणि आधुनिकतेच्या नावाखाली केस कापणे ओघानेच होत आहे. अर्थात कापलेले केस ही मेंटेन करावे लागतात. नाहीतर आमच्या आईच्या भाषेत डोक्याचा अगदी “शिपतर”(टोपले )झालंय असं म्हटलं जाई! अगदी जन्मापासून केसांमध्ये असा हळूहळू बदल होत जातो. वयाबरोबर केसांची रया जाते.

नकळत आरशात बघताना  किती उन्हाळे- पावसाळे या केसांनी पाहिले हे जाणवते आणि नुसत्या उन्हा पावसानेच नाही तर अनुभवाने हे पांढरे झालेले केस विचारांची परिपक्वता दाखवत डोक्यावर शिल्लक आहेत असे उगीचच वाटते! असो, कालाय तस्मै  नमः! केसासारख्या छोट्याशा नाजूक विषयावर सुद्धा त्याच्या बदलत्या रंग रूपाचं वर्णन हे असं करावसं  वाटले !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.     

आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही. 

ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची .

गळ्यात चार मणी, हातात दोनच  काचेच्या बांगड्या. 

माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. 

त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे. 

लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश. 

तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. 

जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.

हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! 

ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता  ,कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE (right to education) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 

एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …

” अग तो बघ तो!

तो first आला ना, 

so मी  second आले …” 

आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. 

मी त्याची paper sheet पाहिली … 

मोत्यासारखं सुंदर अक्षर …! 

अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले ,

” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? “

माझे डोळे संताप ओकत होते. 

त्याची आई शांतपणे म्हणाली ,

” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! ”  

….. सणसणीत चपराक. 

मी निरुत्तर. 

मी खोचकपणे विचारलं, 

“कोणत्या क्लासला पाठवता याला?”

 ती म्हणाली,

” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे!’

हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. 

ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .

पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली. ….

” टिचरने खूप कौतुक केले  त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत, म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ” मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले … 

” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.

मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”,  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा”, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा ” स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी  ” जोहरी मम्मा ” … ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे. *फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक..  

लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता 

मी खरंतर एकट्याने फिरणारा फिरस्ता. माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकट्याने ६०% भारत भ्रमंती केली होती.

वपण लग्न झाल्यावर अनेकदा आम्ही म्हणजे, सौ.मधुरा व दोन्ही कन्यांसह स्वतः प्लॅन करून फिरायला जायचो. माझ्या गप्पा मारण्याच्या सवयीने अनेक लहान- मोठ्यांच्या ओळखी डोंबिवलीत होऊ लागल्या होत्या. त्यातील एक म्हणजे श्री.व सौ.दुनाखे दांपत्य. त्यांचा स्वतःचा ‘मधुचंदा ‘ नावाचा पर्यटन व्यवसाय. ते एकदा सहज गप्पांच्या ओघात म्हणाले ,’चला मनोजभै तुम्हीपण आमच्या बरोबर, सिमला-कुलू-मनालीला ! म्हटलं किती खर्च येईल? आम्ही दोघं व दोन लहान मुली. ही गोष्ट १९९७ सालची हं. तेव्हा चंद्रकांत दुनाखे म्हणाले २१००० रूपये. मी विचार केला आणि म्हणालो, ‘मी आत्ता अर्धे देईन, बाकीचे आल्यावर महिन्याभरात देईन, चालेल का ? त्यावर लगेच सौ.निलिमा दुनाखेंनी होकार दर्शवला. आणि दिल्ली-सिमला-कुलू-मनाली, असा  खऱ्या अर्थाने समूह सहलीचा आमचा प्रवास सुरु झाला. राजधानीने सकाळी दिल्लीत पोचल्यावर, श्री.दुनाखे यांनी दिल्ली स्थानकावरच आमचे स्वागत केले आणि  मग छान आरामशीर बसप्रवास सुरु झाला.

बसमध्ये मी इतका वेळ शांत कसा बसणार ? माझ्यासाठी मोठाच प्रश्न होता. म्हटलं चला आता अन् सुरू झालो. मी स्वतःची व माझ्या कुटुंबाची ओळख सांगितल्यावर प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला. ही ओळखपरेड संपली नि लगेचच जेवणाचा थांबा आला. मस्त सरसोका साग, मक्के की रोटी अन् लय भारी जम्बो लस्सी, क्या बात है! तिथल्या सरदारजी मालकाने सर्वांचे अगत्याने स्वागत करून, आग्रहाने खाऊ घातले. पाजी, की लाऊ जी? लगेच मैं बोल्या, ‘सरदार, अब मेरा पेट फाडेगा क्या? ‘,असं म्हणताच सरदारजी आणि नुकतीच ओळख झालेली मंडळी व त्यांची लहान मुलं खळखळून हसायला लागली.

आपला मित्र सर्वांच्या मनांत भरला ना राव!

असो, सुमारे नऊ तासांच्या प्रवासानंतर आम्ही  सारे, रात्री सिमल्याला पोचलो. बसमधून उतरताच प्रचंड थंडीने आमचे स्वागत केले अन् मग लगोलग मोठ्या मोठ्या खोल्या असलेल्या हॉटेलात जाऊन जेवण करून, सगळे गुडुप! सकाळी नाष्टा करून निघालो की बसने ! चक्क दोन दिवस सिमला दर्शन ! मॉल रोड, कुफरी, चाडविक फॉल्स,जाखू हिल, सिमला राज्य संग्रहालय, समर हिल अशी सर्वांग सुंदर स्थळं  पाहून पुन्हा त्याच अप्रतिम हॉटेलात रात्री मुक्काम ! तिसऱ्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा करून कुलूचा प्रवास सुरु झाला. चौफेर निसर्गाचं विलोभनीय दर्शन करत करत गाने तो बनता है ना ! मध्येच सुसु ,जेवण -चहा पॉईंट इत्यादि करत-करत संध्याकाळी कुलूला पोचलो.

अप्रतिम बंगलेवजा हॉटेल, क्या बात है ! आणि हिमाचल प्रदेशातील जेवण म्हणजे लाजवाब हो !  दुनाखेंनी कुलूला पोचल्यावर दुसऱ्या दिवसांपासून ते मनाली सोडेस्तोवर मात्र आपलं बुवा हं,  म्हणजे मराठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय केली होती .

तर मंडळी, बियास नदीच्या खोऱ्याच्या भागाला कुलू  म्हणतात. ताज्या भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, गहू, मका, तुती, देवदार, बार्लीची शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय ! इथली गरीब घरातली मुलं सुद्धा कसली गोड दिसतात हो ! आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने, विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छोटेखानी स्वर्ग असलेल्या कुलूला वेगळेच महत्व आले आहे. दोन दिवस कुलू व्हॅली भटकंती करून, पाचव्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता मनालीकडे निघालो.

कुलू ते मनाली माझ्या अंदाजाने बसने प्रवास ५६ किमी.चा. घाटाघाटातून प्रवास करत अखेर मनालीच्या टुमदार हॉटेलात पोचलो, अन् जेवण करून मनालीतील छोटेखानी मॉलरोडवर फिरायला गेलो. मधुचंदाच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारला. श्री.व सौ.दुनाखे यांचं व्यवस्थापन एकदम चोख, मानलं राव ! सहाव्या दिवशी हिडिंबा मंदिर पहात असताना तर मला काय फोटो मिळाला! मी जाम खूष. जुन्या मनालीतील मनु मंदिर पाहून परत भोजन व आराम करून नागरगढी हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी गेलो, त्याचं किती वर्णन करू तितकं कमीच.

सातव्या दिवशी नेहरू कुंड व विविध पारंपरिक वस्तू आणि इमारतींच्या प्रतिकृती असलेले, हिमाचलचा वारसा प्रदर्शित करणारे, लहानसे संग्रहालय पाहिले आणि संध्याकाळी मस्त आराम केला. आठव्या दिवशी सकाळी – सकाळी सुप्रसिद्ध रोहतांगपास या बर्फाच्छादित रुपडं असलेल्या, प्रसिद्ध ठिकाणी पोचलो. गमबूट, कोट, हातमोजे, टोपी प्रत्येकाच्या आकाराप्रमाणे परिधान करत, चालतोय चालतोय!आलटून -पालटून दोन्ही मुलींना कडेवर घेत, कसेबसे पोचलो अन् समोर जणू काही सिनेमातील दृश्य  अवतरलेलं! आपण आपल्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष पाहतोय, यावर विश्वासच बसेना, असा कोसो-दूर पसरलेला बर्फ !आहाहा! आमच्या पैकी बरेच जण  चक्क बर्फावर आडवे झालो. नंतर अर्थातच एकमेकांवर हो हो, तीच फेका-फेकी आम्हीही केली बरं.  पण -पण काहींच्या विकेट जायला सुरवात ना, कारण गमबुटात बर्फ गेल्यामुळे बधिर पणा यायला लागला आणि मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत नुसती धमाल व रडारड की! अन् तिथून सर्वांचे पाय बसकडे वळायला लागले. किती लांब ती बस? त्याला इकडे बोलवा ना ! अखेर हुश्श हुश्श करत सगळेच एकदा भाड्याचे सामान परत देऊन कसे-बसे बसपर्यंत पोचलो. आत जाऊन कधी एकदा बसतोय असं झालं ना ! हु §हु§हु§ बसमध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, चिडीचूप! 🤗

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो बुआ. त्यादिवशी सगळ्यांनी साडेतिनला गरम -गरम जेवणावर ताव मारला अन गुडुप! संध्याकाळी हळूहळू खोलीच्या बाहेर येऊन, चहाचे घोट घेत, कसली फाटली ना! याचीच चर्चा. पुन्हा गमती-जमती व जेवण करून गप्पांचा फड रंगला आणि हळूहळू आपल्या खोलीत रवाना. इकडे मी आमच्या खोलीत आलो आणि मधुराला कापरं भरलं. मी जाम टरकलो. लगेच सौ.दुनाखे वहिनींना बोलावलं. त्यांनी स्थानिक डॉ.ना फोनाफोनी सुरू केली, पण कोणी फोन उचलेना. कारण मनालीत त्यावेळी संध्याकाळी ७ नंतर सगळे डॉ.भेटणार नाही हं, असं म्हणायचे. मग हॉटेलची मालकीण आली, तिनं बघितलं आणि पांच मिनिटांत आख्खी ब्रँडीची बाटली आणून मधुराच्या पूर्ण शरीराला, तिने ब्रँडीने मसाज केला. एका तासानं ती शुद्धीवर आली अन् आम्ही सारे हुश्श! त्या पंजाबी मालकीणीने सांगितलं,’ ऐसा किसी किसीको होता है, जादा थंड में जाके आने के बाद ऐसा होता है! त्या पंजाबन बाईने एक पैसा घेतला नाही हा तिचा दिलदारपणा हो. ‘ये तो मेरी महमान है जी!’ सलाम त्या माउलीला.

या संपूर्ण प्रवासात सौ.मधुराला मी दम दिला होता, मी छायाचित्रकार आहे हे कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर मला सहलीचा आनंदच घेता आला नसता. आणि तिने ही गुप्तता पाळली चक्क. 🤗

नवव्या दिवशी आम्ही नाष्टा करून बाप्पा मोरया करत, बसमधून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच दिल्लीला निघालो. मनालीहून निघालेली बस अडीच तासात कुलू-मनालीच्या मध्येच बंद पडली. आम्ही वाट बघून खाली उतरलो, ड्रायव्हर आणि क्लीनर काय नक्की झालं ते बघत होते. कारण गेले दहा दिवस बसने कुठेही कुरकुर केली नव्हती. नेमकी बंद पडली आणि तीही रस्त्याच्या मधोमध  ना! त्यावेळेस घाटाच्या खाली कुठेही काहीही नव्हतं, फक्त रस्ता, सुंदर निसर्ग व बियास नदीच्या पाण्याचा खळाळता गोड आवाज! एका तासाने समजलं पाटा तुटला अन् बस दुरुस्त व्हायला

किमान ८/९ तास तरी लागतील, होईल हेही नक्की नाही. झालं, नुसता गोंधळ, आमचं विमान / रेल्वेचं आरक्षण आहे ते चुकणार, आता काय होणार, मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे. हो, आणि ९७ साली मोबाईल नव्हते व आजूबाजूला कुठंही फोन नव्हते. नाही म्हटलं तरी सहल आयोजक पण गोंधळून गेले ना! आम्ही रस्त्यावरच कडेला उभे होतो, तितक्यात श्री.दुनाखे म्हणाले, कोणाचंही नुकसान झाल्यास मी भरपाई देईन हे नक्की! त्यांची काहीच चूक नसताना हे  सांगणं, ही खरंच हिम्मत लागते! ती त्यांनी दाखवली. मला धरमशालाला जाऊन दुसऱ्या बसची सोय करावी लागेल, आणि मगच सर्वांना घेऊन निघावं लागेल. पण यासाठी संध्याकाळ होईल. मी म्हटलं तुम्ही ट्रक वगैरे जी दिसेल त्या गाडीने निघा, मी सांभाळतो सगळ्यांना अन् ते रवाना झाले.

गोंधळ  नुसता वाढतच चाललेला! मी सर्वांना शांत करत परिस्थितीची कल्पना दिली, आता कृपया शांत रहा अन्यथा काहीही होणार नाही.

मी दोघांना घेऊन रस्त्यावर पुढे चालत निघालो. अर्ध्या तासानं छोटं मंदिर दिसलं अन् माझ्या जीवात जीव आला. तिथं पोचल्यावर आत एक माणूस होता, त्याला विचारलं, स्टो वगैरे काही आहे का? सर्व कल्पना दिल्यावर त्याने होकार दिला अन आम्ही खूष झालो. बिचारा सामान घेऊन बस थांबली तिथं आला, त्यानं आडोसा पाहून स्टो पेटवला. मग दुनाखेंचे आचारी होते त्यांनी चहा बनवला. नंतर भात व डाळ शिजायला ठेवली.

इकडे मंडळींना चहा दिल्यामुळे, सगळे शांत झाले होते. आता मी वहिनींची परवानगी घेऊन, बसचा ताबा घेतला. मी फर्मान सोडलं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गमतीदार प्रसंग सांगा, असे म्हणताच एक एक करत बोलू लागले. कोणी म्हणालं लग्न झालं, मुलगा /मुलगी जन्मले / आई बाबांची पुण्याई / माझी कॉलेज मधली मैत्रीण, नेमकी माझ्याच गळ्यात पडली / लॉटरी५० रु. ची लागली / एकजण म्हणाले तुम्हीच भेटला / आमच्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिलाच हनिमून वगैरे करता -करता चक्क ३ तास हशा-टाळ्यात कसे गेले ते समजलंच नाही. मी लगेच खाली उतरून जेवण तयार झालं ना ते बघितलं आणि सर्वांना खाली उतरवलं व सांगितलं थोडं रस्त्याखाली या, इथं थोडी बसायला जागा आहे . सर्व मंडळींचं भोजन उरकेपर्यंत दुपारचे ३ वाजले. मी हुश्श झालो, दुनाखे वहिनी तर मनोमन माझे आभार मानत होत्या. मी म्हटलं लोकं ओरडणार हो साहजिक आहे, पण किती वेळ ओरडतील? 😂

नंतर ज्यांना डुलकी घ्यायची ते बसमध्ये गुडूप, आणि मी चहा बनवण्याच्या तयारीला. संध्याकाळी तिकडे अंधार लवकर पडतो.५ वाजता चहा दिला मंडळी एकदम खूष. केव्हा येणार दुनाखे, कसे येणार, असं करता -करता, रात्री ९ ला श्री.दुनाखे दुसरी बस घेऊन आले आणि सर्व सामान भरून, आपली आपली पार्सलं बसमध्ये बसली अन् गाडी बुला रही है करत, सकाळी दिल्लीत पोचलो.

मंडळी मधुचंदा ट्रॅव्हल्स, उत्तम सोयी, भोजन आणि भरभरून देणारे दुनाखे दांपत्य, काय आणि किती  सांगू ?

आज मधुचंदा खूप मोठी झाली आहे. मुलगा चेतन व सून सौ.अनुजा दोघेही तितकीच काळजी घेतात व देशविदेशात आनंदाने व सुखरूप फिरायला घेऊन जातात.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares