मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिन पैशाचे दिवस… भाग – १ ☆ श्री मेहबूब जमादार ☆

श्री मेहबूब जमादार 

? जीवनरंग ❤️

☆ बिन पैशाचे दिवस… भाग – १ ☆ 🖋 मेहबूब जमादार

तो 1967 चा काळ असावा.  त्यावेळी आमच्या चिंचेच्या बनाशेजारी गुऱ्हाळ घर होतं.  दरवर्षी सुगी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं.  गुऱ्हाळासाठी लागणारा ऊस आमच्या सगळ्या भाऊबंदांचा होता.  तर काही शेजारील शेतकरी तोडायला सांगत.  त्यावेळी तांबडा देशी ऊस असायचा.  तो खायला फारच गोड होता. 

दिवाळी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं. ऊस तोडायला अन तो गाडीतून आणायला सात ते आठ मजूर लागत.  इंजिन वरती दोघं  असायचे. इंजिन चालू झालं की घाणा  चालू व्हायचा.  त्या घाण्यात ऊस घालण्यासाठी दोन मजूर लागायचे.  एक जण ऊस द्यायचा.  एक जण  प्रत्यक्ष घाण्यात ऊस घालायचा. त्याचा रस लोखंडी मांदाणं  होतं त्यात पडायचा.  ते भरलं की रस उंचावरच्या  लोखंडी टाकीत  इंजिनच्या मदतीने  लोखंडी पाईप मधून टाकला जायचा.  ती टाकी भरली की दुपारी चार वाजता काईल चुलवानावर ठेवायची.  त्यात तो रस टाकला जायचा.

गुऱ्हाळात सगळ्यात महत्त्वाचा कामगार म्हणजे गुळव्या. गुळव्या चांगला असला तर गुळ चांगला तयार व्हायचा. काईल  मध्ये रस टाकला की चुलवान उसाचं  वाळल चिपाडं टाकून पेटवलं जायचं.ते  पेटवायला दोन माणसं लागायची. त्यानां  चुलवाण्या  म्हणत. त्याचं काम चार वाजता चालू व्हायचं ते रात्री बारा एक वाजेपर्यंत जवळजवळ तीन आदनं  पूर्ण होईपर्यंत चालायचं. आगीमुळे ती बिचारी घामे घूम होत. त्यांचं  अंग काळ दिसे.  एकूण गुऱ्हाळाला जवळजवळ पंधरा ते सोळा माणसे लागत. त्यावेळी गुऱ्हाळ व्यवस्थित चाले.

गूळ तयार व्हायला लागला की त्याचा वास आमच्या वाडीत पसरत असे.  त्यावेळी लगेच आम्ही सारी मुलं गुऱ्हाळघरा शेजारी जमा होत असू.  पण तिथे एक राखणदार ठेवलेला होता.  तो आमच्या शेजारच्या गावातला होता.  तो काय आम्हाला तिथे येऊ देत नसे.  आम्ही सारी मुलं त्याला फार त्रास देत असू.  शेवटी तो म्हणायचा, गुळ तयार झाला की तुम्हाला थोडा थोडा गूळ खायला देतो तुम्ही चिपाड फक्त घेऊन या म्हणजे झालं.

तो  तयार झालेला मलईदार गुळ आमच्या चिपाडावर ठेवायचा.  तो फार गरम असे. पण त्याची चव इतकी लाजवाब असे की तो सारा गूळ आम्ही तिथेच फस्त करत असू.  ते दिवस मजेचे होते.  बिन पैशानं  हे  सारं आम्हाला मिळायचं. 

तो एखादी दिवशी लिंबू आणा म्हणायचा. आणि सगळ्यांना लिंबू पिळून रस शोधून जर्मन च्या मापातनं प्यायला द्यायचा. त्या उसाचा मालक म्हणायचा,

“घ्या रे पोरांनो रस!  अगदी पोटभर प्या ”

गूळ तयार झाला की काईल उतरायला लागायची. त्यावेळी काईलच्या  एका हूकातुन  समोरच्या दुसऱ्या हुकात एक गोल लाकूड बसवलेलं  असे. असे तीन हुक या बाजूला आणि तीन हुक समोरच्या बाजूला असत. प्रत्येक हूकाकडे दोन ते तीन माणसे लागायची.  प्रत्येक बाजूला सात ते आठ माणसे अशी पंधरा-सोळा माणसे लागायची. तरच ती काईल उचलत असे. ती काईल  उचलताना माणसं श्लोक म्हणायची,

“बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय”

असं म्हणत ती सारी काईल फरशीच्या तयार केलेल्या वाफ्यात पालथी केली जायची.  त्यावेळी गुळ पातळ असायचा.  फारच गरम असायचा.  वाफ्यात  टाकला की तो थंड व्हायचा.  हळूहळू तो घम्यात भरला जायचा. घम्यात पहिलंच धुतलेलं पांढरं कापड अंथरलेलं असे. 

गुळ इकडे तिकडे सारायला लांब दांड्याचे  हत्ये  असायचे.  तर भरायला लाकडी लहान हत्ये  असायचे.  एका काईल  मधून गुळाच्या जवळजवळ पाच सहा ढेपा तयार होत. त्या ढेपाच वजन जवळजवळ वीस  किलोच्या आसपास असायचं. प्रत्येक मालकाचा गुळ अलग ठेवला जायचा. काही वेळा गि-हाईक  तिथे येऊन गूळ घेऊन जायचा. समजा नाहीच खपला तर मालक ट्रक सांगून सांगलीच्या किंवा कोल्हापूरच्या बाजारपेठेत तो विकून येत. 

त्या काळात आमच्या ओढ्यात सीताफळ,  पेरू,  आंबा,  जांभळीची झाड होती. दिवाळी संपली की पेरू आणि सीताफळ पाडाला यायची.  पोपटाने झाडावर एखाद्या फळाला टोच मारली की आम्हा मुलांना कुठलं झाड पाडाला आलय  ते समजायचं. ओढा  आमच्या घरापासून हजार बाराशे फूट लांब होता.  तिकडे जाण्यासाठी माणसांना अन गुरानां  एकच वाट होती.

आम्ही चार पाच जण एका वर्गातच शिकत होतो. रविवारी सुट्टी असल्यावर ओढ्यात जाऊन सीताफळ  ठीकं  भरून आम्ही आणत असू.  ती  पिकायला कुणाच्यातरी गोठ्यात ठेवत असू. पिकली की रोज सायंकाळी शाळा सुटली की पोटभर सिताफळ खात असू.

आमच्यातला गण्या तर म्हणायचा,

“शंकरया लेका  थोडी खा ,नाहीतर पोटातच झाड उठल बघ सिताफळीच !”

यावर सारी हसायची. कोण जास्त सीताफळ खातय,   त्याची तर इर्षा लागायची. आम्हाला पोटासाठी या वस्तू केव्हा विकत घ्याव्या लागल्या नाहीत. सारे गणित आमचे बिन पैशाचं होतं. 

काही वेळेला कोकणातल्या बाया बिबे घेऊन यायच्या.  त्यांना मिरच्या दे ऊन ह्या बिब्या विकत घेतल्या जायच्या त्यावेळीही पैसा लागत नसे.  फक्त मालाची आदला बदल केली जायची. 

सुगी चालू असतानाच काही माणसं खळ्यावर धान्य मागायाला येत. त्यात पेठे चा नामदेव मामा दरवर्षी यायचा.  एरवी तो वरकी पाव व तंबाखूची पुडया विकायचा. पेठेत तंबाखू आणि तपकीर प्रसिद्ध होती.  तो खळ्यावर यायचा, त्यावेळी ज्वारीची मळणी चालू असायची. त्याला सूप  भरून धान्य दिलं की तो दहा-बारा वर्की पाव किंवा आठ दहा  तंबाखूच्या पुड्या त्या सुपातच  टाकायचा. त्यावेळी त्याचे पैसे किती होतात हे कोणच बोलत नसे. सार काहीं  अदलाबदलीवर चाले. गड्यांना पगार सुद्धा माणसं ज्वारी देत.  सुगीला दुप्पट ज्वारी मिळे.  त्यामुळे काम करण्यासाठी माणसं खुश असत.   कामावरचे  गडी दिवस मावळला तरी कामावरून घरी जात नसत. काही वेळेला रात्रीला जेवणाचा वकुत होई. तरीपण अर्ध काम सोडून कोण घरी जात नसे. त्यावेळी मालक सुद्धा दुप्पट धान्य गडयानां  मजुरी म्हणून देत असे.   

क्रमश : भाग पहिला 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आभाळमाया… लेखक – श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ आभाळमाया… लेखक – श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

घरी विठ्ठल तुळस आणून तीन चार वर्षं झाली असतील. यंदाच्या फेब्रुवारी – मार्च पर्यंत ती सदैव छान बहरलेली होती. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तिचा विवाह सोहळा व्हायचा. 

बाबांना दिवसातून तीन चार वेळा तुळशीची पानं खायला लागायची. आई वाटीत काढून ठेवायची. दररोज देवघरातल्या कृष्णाला तुळशीचा छोटासा हार आई करायचीच. कर कटीवर असणाऱ्या पांडुरंगाचाही एक तुलसीहार असायचाच. 

दररोज सकाळी देवघरातल्या देवांची पूजा झाल्यावर आई तुळशीला पाणी घालून, हळद कुंकू वाहून, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून, उदबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायची. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा, हळदकुंकू आणि उदबत्ती व्हायलाच हवी.

दिवा लावला देवापाशी

उजेड पडला तुळशीपाशी…

“घरात, अंगणात तुळस असली की घरावर संकटं येत नाहीत. तुळस आपल्या अंगावर झेलते आणि घराला जपते.” असं आई नेहमी सांगते. 

फेब्रुवारी – मार्च मधे विठ्ठल तुळस छान बहरलेली. नेमकं त्याच वेळी आईचं मोठ्ठं दुखणं रिपोर्ट झालं. बाबा जाऊन सहा महिने होतायत तोवर हे आईचं दुखणं. जे तिनं बाबांच्या दवाखान्याच्या धकाधकीत मुलांवर आपल्या आजारपणाचं ओझं नको म्हणून तसंच अंगावर काढलं होतं. आमच्या आख्ख्या घराचं धाबं दणाणलं होतं. आईचं मेजर ऑपरेशन करायचं ठरलं. आम्ही सगळे टेन्शनमधे आणि ही बाई बिनधास्त. ॲडमिट झाली अगदी हसत-खेळत. 

“घाबरू नका रे. सगळं नीट होणारेय. माझा रामराया आहे, तुझे समर्थ आहेत, आईचे माऊली आहेत आणि सगळ्यात भारी तुझा मित्र मारुतीराया आहेच की माझ्याबरोबर… मग मला काय धाड होणारेय… मी ठणठणीत बरी होणारेय… अजून प्रयागराज-काशी करायचंय मला… 

एक काम कर, आपल्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालून, तिथं दिवा लावून, नैवेद्य दाखवून तिला निरोप द्या, तिला सांगा… की मी परत येणारेय तोवर माझ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे… घर सांभाळायला मी सांगितलेय म्हणावं ! आणि येताना माझ्यासाठी चार पाच पाने घेऊन या!”

ऑपरेशनच्या दिवशी सकाळी उठून आईनं आपलं आपलं व्यवस्थित आवरलं, रोजचा हरिपाठ म्हटला, रामरक्षा, भीमरुपी म्हटली आणि “मारुतीराया, चल रे माझ्याबरोबर, धर माझा हात !” असं म्हणत तुळशीची पानं चघळत ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. 

ऑपरेशन झालं. नंतरचे रिपोर्ट नॉर्मल आले. आई घरी आली. दारातच माझ्या बायकोने तिची मीठमोहरीनं दृष्ट काढली. पण घरात यायच्या आधी आई अंगणात तुळशीकडे गेली. बायकोकडून पाणी घेतलं आणि तुळशीला घातलं. हळदकुंकू वाहून नमस्कार केला… “तू होतीस म्हणून मी निर्धास्त होते बघं… थोरल्या बहिणीचा मान घेतेस तर त्याबरोबर मी नसताना घराला सांभाळायची जबाबदारी पण मग तुझीच आहे ना… सगळं कसं छान सांभाळलंस गं बाई तू… आता आराम कर… मी आलेय आता !”

आईचं रुटीन पूर्ववत् व्हायला नंतरचे दोन महिने तरी लागले. हळूहळू ती पूर्ववत् झेपेल तशी घरातली कामं करू लागली आणि मुख्य तिच्या आवडीचं काम… रोजची देवपूजा अगदी षोडशोपचारे करु लागली… 

एप्रिलमध्ये तिला प्रयागराज- काशीला पाठवलं. घरातून निघताना तुळशीजवळ गेली, नमस्कार केला पण चेहेऱ्यावर काळजी दिसत होती.

“का गं ? चेहेरा का असा काळजीत पडलाय ?” मी विचारलं.

“माझं तसं काही नाही रे… पण ही बघ की… थोडी काळवंडलीय रे… सुटत चाललीय असं वाटतंय… नविन आलेली पानंही आकाराने छोटीच आहेत आणि वाढही मंदावल्यासारखी वाटतेय…”

मलाही ते जाणवलं. 

“अगं आई, उन्हाळा सुरु होतेय ना म्हणून थोडं तसं झालं असेल. आपल्यासारख्या माणसांना ते वातावरण बदलाचे त्रास होतात. ही तर वनस्पती आहे. तिलाही थोडा त्रास होणारच की. पण होईल ती नीट. या बदलत्या वातावरणाला घेईल ती जुळवून. बहरेल ती. तू नको काळजी करू. तू निर्धास्त जाऊन ये.”

घरातून तिचा पाय निघत नव्हता पण ती प्रवासाला गेली आणि प्रयाग राज आणि काशीला जाऊनही आली. 

रामेश्वरहून आणलेल्या वाळूचे शिवलिंग काशीला गंगेच्या तीरावर करुन काशी विश्वनाथाची रूद्राध्याय आवर्तन करुन प्रार्थना केली.

आई परत आल्यावर तिला चांगलंच जाणवलं… तुळस मंदावली होती. थोडी थकली होती. रंग बदलत होता. पण पालवी फुटत होती. आशा पालवत होती. तोवर मे महिना आला. कडक उन्हाळा लागला. सकाळी पाणी घातलं तरी संध्याकाळी पानं मलूल होऊन जायची. 

दररोज संध्याकाळी दिवा लावताना आई तिला सांगायची, “सांभाळ गं तब्ब्येतीला… ऊन जरा जास्त आहे पण तुला सावलीही आहे… तरी पण तू अशी अशक्त का होतेयस ? काही होतंय का ? माझी नको काळजी करुस. मी आता ठणठणीत आहे. आता हे पुढचे रिपोर्ट नॉर्मल आले की तू आणि मी झिम्मा खेळायला मोकळ्या !” हळदकुंकू वाहून आई रामरक्षा म्हणत तिथंच बसायची. 

ऑपरेशन नंतर चार महिन्यांनी आईच्या काही टेस्ट करुन रिपोर्ट घ्यायचे होते. २७ जूनला टेस्ट झाल्या.

२९ जून… आषाढी एकादशी… आई पूजा करतेय… पांडुरंगाला तुळशीचा हार घालतेय… पण मनात तिच्या खंत आहे की तो हार घरच्या तुळशीचा हार नाहीये. पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे आईनं तुळशीचीही पूजा केली… घोगऱ्या आवाजात तिला म्हणाली, “बाई गं… हे असं काय करुन घेतलंयस स्वतःचं ? कसली काळजी करतेस ? नीट राहा गं… किती हडकली आहेस बघ एकदा… तुझी काळजी वाटतेय गं… आणि मला कसली तरी भितीही वाटतेय… सांभाळून घे गं बयो !”

संध्याकाळी मी आईचे रिपोर्ट घेऊन आलो. सगळे नॉर्मल होते. तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो.

“काकू, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. सगळं छान झालंय. तुमची कमाल आहे… आता सगळी औषधं बंद… फक्त एक गोळी दिवसभरात… ती पण तुमच्या बी.पी.साठीची… आता निर्धास्त राहा… भरपूर फिरा, मजा करा ! आणि आता माझ्याकडे यायचं असेल तर या मुलाकडं म्हणून हक्कानं यायचं…  पेशंट म्हणून अजिबात यायचं नाही… कळलं !” 

घरी येईपर्यंत रात्र झाली होती. घरी आल्या आल्या आई अंगणात गेली तुळशीसमोर ! तुळस मलूल झालेली होती. निरांजनाच्या उजेडात ती खूप थकलेली वाटत होती. तिनं खूप काही सोसलंय असं जाणवत होतं. खरं खोटं करण्याच्या पलिकडंच होतं ते सगळं. आणि मी ते करायच्या फंदातही पडणार नाही कारण आई तिथं गुंतली होती. आईला धक्का लावून काय मिळवायचंय ? 

जेवताना आई अस्वस्थ होती. जेवण झाल्यावर सुपारी चघळत आई म्हणाली… “उद्या तुळशीचं नविन रोप घेऊन ये. या तुळशीला निरोप द्यायची वेळ आलीय. आज तिच्याकडे बघताना माझे रिपोर्ट नॉर्मल का आलेत हे कळ्ळलंय मला… थोरली बहीण रे… धाकट्या बहिणीला जपलं तिनं… सांभाळलं तिनं… उद्या तिचा निरोपाचा दिवस… पाठवणीचा दिवस ! खूप झेललं तिनं, खूप सोसलं रे… आता नको तिला अडकवायला…”

आई डोळे पुसत झोपायला गेली. मी सुन्न होऊन बसलो. हे असं सगळं कुठून येतं असेल हिच्या मनात ? कसं सुचत असेल ? का ही माणसं हा असा एवढा जीव लावतात? 

कळे तोच अर्थ

उडे तोच रंग

ढळतो तो अश्रू

सुटतो तो संग

 

दाटते ती माया

सरे तोच काळ

ज्याला नाही ठाव

ते तर आभाळ

 

घननीळा डोह

पोटी गूढ माया

आभाळमाया…

 

आभाळमाया !

सकाळी तुळशीचं नविन रोप आणलं. आईनं त्याची पूजा केली. दोन्ही तुळशीची भेट घडवली.

“बाई गं… तू आलीस आणि ही निघालीय. तू हिचे आशिर्वाद घे आणि हिला संतुष्ट मनानं निरोप दे… गळाभेट होऊ दे… या हृदयीचे त्या हृदयी संवाद होऊ दे… गुजगोष्टी-कानगोष्टी होऊ देत आणि मग प्रसन्न वदने एकमेकींचा निरोप घ्या…”

हळदकुंकूमार्जन झालं, आरती झाली आणि आईनं स्वतःच्या हातानं वृध्द झालेली तुळस बादलीतल्या पाण्यात ठेवली आणि नमस्कार करत म्हणाली…

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्…

आई हळवी झाली होती. घरात आली आणि म्हणाली… “तुळस वनस्पती असली म्हणून काय झालं… आपल्या घरातलीच होती ना ती… नातं जुळलं होतं रे तिच्याशी… तुझे बाबा शेवटपर्यंत विचारायचे, “तिला पाणी घातलं का ? तिला दिवा लावला का ?” ते गेल्याचं कळलं होतं बघ तिला. तेव्हापासूनच ती एकटी होत गेली. आणि माझं हे सगळं दुखणं तर तिनं स्वत:वर घेतलं… 

बहिणाबाई म्हणवून घ्यायची भारी हौस होती तिला… सगळं नीट करुन गेलीय… सुखानं गेलीय… समाधानाने गेलीय… आणि जाताना ही तिची लेक आपल्याकडे सोपवून गेलीय… सांभाळायचं बघ तिला आता… तिला मोठी करायची…  कृष्णानं सांगितलेय ते आठवायचं आणि आपली समजूत घालून घ्यायची…

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि 

नैनं दहति पावकः

न चैनं क्लेदयन्त्यापो 

न शोषयति मारुतः…

आत्मा अविनाशी आहे… त्याला अंत नाही… तो फक्त शरीर बदलतो… गेली तरी ती इथंच आहे… “

भर दुपारी मी गारठलो होतो. 

मी आईकडे बघत होतो.

आई तुळशीकडे बघत होती.

आईच्या डोळ्यात नक्षत्र होते…

लेखक : श्री उमेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दोन लघुकथा — मोबाईलडा / समेट” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “दोन लघुकथा — मोबाईलडा / समेट” ☆ श्री मंगेश मधुकर 

(१)मोबाईलडा

बरीच रात्र झाली तरी रूममधला लाइट चालू होता.

“बंटी ए बंटी,रात्रीचा दीड वाजलाय.झोप आता”ममा ओरडली.

“तू अजून जागीच”

“मी हेच विचारतेय”

“हा,पाच मिनिटं”

“दार उघड.काय करतोयेस”

“काही नाही.थोडा वेळ थांब”

“तो मोबाईल बाजूला ठेव”

“तुला कसं कळलं”

“तू आजकाल दुसरं काही करतोस का?”

“ममा,गुड नाइट,”

“फोन माझ्याकडं दे”

“ठेवला.”लाइट बंद झाल्यावरच ममा आपल्या रुममध्ये गेली.

——

सकाळी दहा वाजून गेले तेव्हा झोपलेल्या बंटीला ममानं उठवलं.

“कशाला उठवलसं”

“किती वाजले ते पाहिलं का”

“रात्री झोप म्हणून मागे लागतेस आता झोपलो होतो तर उठवलं.काय काम होतं.”

“काही नाही”

“मग झोपू द्यायचं ना.”

“लवकर झोपायला काय होतं”

“ममा,सकाळ सक्काळी सुरू करू नकोस.”

“म्हणजे,तू कसंही वागायचं अन आम्ही बोलायचं सुद्धा नाही का”

“मला यावर वाद घालायचा नाहीये”

“नीट वागलास तर कोण कशाला बोलेल” 

“तुझं चालू दे.फ्रेश होऊन येतो”

“फोन घेऊन जाऊ नको”

“का?”

“जिथं तिथं फोन सोबत पाहिजेच का?जरावेळ लांब राहिला तर काही बिघडत नाही.टॉयलेटमध्ये फोन कशाला.घाणेरडी सवय.”

“मी फोन घेऊन जाणार.काय करायचं ते कर”बंटीनं ऐकलं नाही.ममा बोलत राहिली.

—-

“ममा,भूक लागलीये’” फोन पाहत ब्रश करत बंटी म्हणाला

“हsssम ”मोबाईलवरची नजर न हटवता ममानं उत्तर दिलं.

“नुसतं ‘हू’ काय करतेस.खायला दे.”

“देते”

“कधी?,मला आत्ता पाहिजे”

“देते म्हटले ना.जरा मोबाईल पाहू दे”

“माझ्यापेक्षा मोबाईल जास्त महत्वाचा आहे का?”

“येस”

“काय खाऊ”. 

“मोबाईलच खा”

“उगीच डोक्यात जाऊ नकोस”बंटी खेकसला. 

“ए,नीट बोलायचं”

“तू पण”

“मी नीटच बोलतेय”

“मोबाईल खा असलं बोलणं बरोबर ये.”

“का,मोबाईलनं पोट भरत नाही”

“ममा”बंटी चिडला. 

“स्वतः बनवून खा.मी काहीही करणार नाही”

“मग मी ऑर्डर करतो”

“नाही.आत्ता जर ऑर्डर केलं तर यापुढे घरात स्वयंपाक बनवणार नाही.”

“तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे.”

“तुझं वागणं”

“आता मी काय केलं”

“घरात लक्ष असतं का?आमच्यापेक्षा मोबाईल जास्त महत्वाचा झालाय.धड बोलत नाही की वागत नाहीस. कायम अस्वस्थ.एकटाच हसतो,स्वतःशीच बडबडतोस.घरात असूनही नसल्यासारखा.जेवताना,आंघोळ करताना, झोपताना जळूसारखा हाताला फोन चिकटलेला.”

“माझ्यामुळे तुम्हांला काही त्रास नाही ना.मी डिस्टर्ब करीत नाही मग तुम्ही मला करू नका.एवढं सिंपल.”

“हे घर आहे.रेल्वे प्लॅटफॉर्म नाही.कोणाशी बोलणं नाही की विचारपूस नाही फक्त आपल्याच विश्वात.”

“मी माझ्या सर्कलमध्ये कनेक्ट आहे”

“हो पण फक्त व्हर्च्युली.परवा मावशी घरी आली तर काय बोलावं हे तुला समजत नव्हतं.एकदम ब्लॅंक झाला.दिवसभर बाहेर अन घरी आलास की मोबाईलच्या ताब्यात असतोस”

“तुमच्या जनरेशनला मोबाईल विषयी प्रचंड राग का?”

“आम्हीसुद्धा फोन वापरतो पण तुझ्याइतकं पागल झालो नाही.”

“मोबाईल ईज ब्रिदिंग.मोबाईल इज लाईफ!!”

“कॉलेजला गेलास म्हणजे शिंग फुटली नाहीत.दहा वर्षाचा असताना पहिल्यांदा मोबाईल हातात घेतलास आणि आता त्याच्याशिवाय दुसरं जगच नाही.चोवीस तास सोशल मीडिया आहेच फक्त स्वतःवर कंट्रोल पाहिजे.” खिडीकीतून सहज लक्ष गेलं तर रस्त्यावरून एकजण झोकांड्या खात चाललेला.त्याला पाहून ममा म्हणाली “तो बघ.एवढ्या सकाळी सुद्धा पिऊन टाईट,त्याच्यासाठी दारू ईज ब्रिदिंग,दारू इज लाईफ.मग तब्येतीची वाट लागली तर दारू सोडायची नाही.जसा तो तसाच तू .. 

“म्हणजे ”

*”तो बेवडा,दारुडा अन तू…”

“मी काय?”

“मोबाईलडा” बंटीनं लगेच  फोन लांब ठेवला तेव्हा ममा हसली “ पोहे केलेत.खाऊन घे आणि जे बोलले त्यावर विचार कर”

“माताजी,आत्तापासून फोन आचारसंहिता ..” अंगठा उंचावत बंटी म्हणाला.

लेखक : मंगेश मधुकर 

===============================

(२) “समेट

आजचा ऑफिसमधला दिवस शांततेत चाललेला.काही विशेष काम नव्हतं.तितक्यात ते दोघं आले. 

“नमस्कार मॅडम”तो म्हणाला पण ती काहीच बोलली नाही उलट जरा वैतागलेली वाटली. खुर्चीकडे हात करत मी म्हणाले “नमस्कार,बसा.कसे आहात”

“चाललंय.”त्यानं त्रोटक उत्तर दिलं.चेहऱ्यावरची निराशा जाणवत होती.ती मात्र तुसडेपणानं म्हणाली “कधी एकदा सुटका होईल असं झालंय”

“वेळ गेलेली नाही.अजूनही विचार करा.”मी 

“जितक्या लवकर वेगळं होता येईल ते बरंय.”ती 

“घाई करू नका”

“उलट फार उशीर झालाय.याच्यासोबत चार वर्ष कशी काढली ते माझं मला माहिती!”ती ताडताड बोलत होती.तो मात्र शांत होता.त्याची धडपड नातं टिकविण्यासाठी तर तिला घटस्फोटासाठी घाई झालेली .

“हे नातं संपवून मोकळं व्हायचयं”ती

“मोकळं झाल्यानंतर काय?”पुढचा काहीच विचार केला नसल्यानं माझ्या प्रश्नावर ती गडबडली. 

“तुमचं लव मॅरेज ना”

“तिथंच फसले”शेजारी पाहत ती म्हणाली.त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“तू एकटीच फसलीस?”माझा प्रश्न तिला कळला नाही.

“म्हणजे”ती 

“आधी प्रेम नंतर लग्न.दोघांनी एकमेकांना फसवलं”

“त्यानं फसवलं मी नाही”ती 

“हाऊ कॅन बी यू सो शुअर,त्याचंही म्हणणं तुझ्यासारखचं असेल तर ..”

“तो पुरुष आहे.सगळा दोष बाईला देणारच”

“विषय भलतीकडे नेऊ नकोस.टाळी एका हातानं वाजत नाही.त्याचं अजूनही प्रेम आहे.मागचं विसरून पुन्हा सुरवात करण्याची मनापासून इच्छा आहे.”

“नुसतं म्हणायला काय जातं.बोलणं आणि वागणं वेगवेगळं असणाऱ्या माणसावर विश्वास कसा ठेवू.असे लोक फक्त स्वतःची सोय पाहतात.एक नंबरचे सेल्फीश असतात.हा पण तसाच आहे.”

“हीच गोष्ट तुला पण लागू पडतेय.आत्ता तू पण फक्त स्वतःचाच विचार करतेस.” माझं बोलणं तिला आवडलं नाही.एकदम रडायला लागली तेव्हा त्याला बाहेर जायला सांगितलं.पुढचे काही क्षण शांततेत गेले.

“सॉरी,एकदम भरून आलं”रुमालानं डोळे पुसत ती म्हणाली. 

“मनात खूप गोंधळ आहे ना”

“हंssssम!!.स्वतंत्र व्हायचंय हे शंभर टक्के कन्फर्म”

“वेगळं होण्याविषयी अजूनही द्विधा मनस्थिती आहे.”

“बरोबर की चूक हेच ठरवता येत नाहीये.अनेकांशी बोलले तर गोंधळ अजून वाढला.”

“अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस.”मान फिरवून ती दुसरीकडं पाहू लागली. 

“इतक्या वर्षाच्या अनुभवावरून सांगते.तुमच्यातला प्रेमाचा बंध अजूनही शाबूत आहे.नातं रिस्टार्ट करा.पुन्हा एकदा सगळ्याचा नव्यानं विचार कर.मगच निर्णय घ्या.”

“तुम्ही पुन्हा जोडण्यासाठी फारच आग्रही वाटताय.”

“करेक्ट!!माझं कामच ते आहे.तोडण्यापेक्षा जोडणं केव्हाही चांगलंचं.”

“पण प्रत्येकवेळी नाही”ती 

“मान्य!!प्रयत्न करायला हरकत नाही.तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेत आहात.असं मला वाटतय.”

“असं काही नाही.आमच्यात खूप भांडणं होतात.दोन टोकाचे स्वभाव आहेत.”ती

“नॉर्मल आहे.हा सगळ्या जोडप्यांचा प्रॉब्लेम आहे.”दोघांबरोबर बऱ्याच मिटिंग झाल्या परंतु आज ती मन मोकळं करत होती.त्याचं वागणं,सवयी याविषयी बोलत होती. 

“मग पसंत कसं केलंस.त्याच्या खास आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या?”माझ्या अनपेक्षित प्रश्नानं ती गडबडली. 

“ईश्य!!खूप आहेत”ती चक्क लाजली.

“बघ,स्टील यू हॅव स्पेशल फिलिंग्ज् फॉर हिम”

तिनं उत्तर दिलं नाही.  

“वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्यावर मतभिन्नता असणारच.प्रेम म्हणजे सगळं कसं छान छान तर लग्न म्हणजे परखड वास्तव.प्रेमात एकमेकांच्या आनंदासाठी धडपडणाऱ्यांना लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडीची तयारी नसते तिथूनच प्रॉब्लेम सुरू होतो.लग्नाआधी भारी वाटणाऱ्या सवयी नंतर त्रासदायक वाटतात आणि मग सुरू होतो ‘तू तू,मै मै’ चा खेळ.”

“आमचं असंच झालंय.”

“नवरा-बायकोच्या नात्यात वाद,भाडणं जरूर असावीत पण ती ताटातल्या लोणच्यासारखी,भाजीत मीठ असावं परंतु मिठात भाजी टाकली तर चव बिघडणारच.”

“किती छान बोलता.म्हणूनच ममानं तुमच्याकडंच का पाठवलं हे समजलं”छान हसत ती म्हणाली.

“आता कुठं तरी जाणवतेय की दोघांकडून चुका झाल्यात.वी नीड टू लर्न अडजेस्ट.मी तयार आहे पण तो तयार होईल का ?

“आमचं आधीच बोलणं झालंय.तो तयार आहे”मी बोलत असतानाच तो आला. नजरानजर झाल्यावर दोघं हसले.मला फार आनंद झाला कारण प्रयत्नांना यश आलं. अजून एक नातं तुटण्यापासून वाचलं.पुन्हा पुन्हा “थॅंकयू” म्हणत हातात हात घालून दोघं केबिनच्या बाहेर पडले आणि लगेचच सहकारी केक घेऊन आले.आज माझा कामाचा शेवटचा दिवस.फॅमिली कौंन्सलर म्हणून पंचवीस वर्ष काम केल्यानंतर रिटायर होणार होते.सगळे भरभरून बोलले तेव्हा वातावरण भावुक झालं.इतकी वर्ष बोलायचं काम केलं पण आजही भाषण करायचं म्हटलं की दडपण येतं.उत्सवमूर्ती असल्यानं बोलायला उभी राहिले.“सर्वांचे खूप खूप धन्यवाद!! थोडक्यात सांगते की आपण रोज दोन आयुष्य जगतो.एक खाजगी अन दुसरं ही नोकरी जिथं वैयक्तिक भावनांना बाजूला ठेवून समोरच्याला समजावून सांगायचं हे अतिशय अवघड आहे.इथं येणारे  वैतागलेले,चिडलेले असतात.बऱ्याचदा  आपल्यावर राग निघतो तरी शांत राहावं लागतं परंतु तेच लोक जेव्हा इथून हसत हसत बाहेर जातात.तो आनंद,समाधान हे फार मोलाचं असतं.माझी इथल्या करियरच्या पहिल्याच केसमध्ये यशस्वी समेट झाला तसाच शेवटची केसमध्ये सुद्धा यशस्वी समेट झाला. हा फार चांगला योगायोग आहे.याचं मोठं समाधान आहे.मी स्वतंत्रपणे हाताळलेल्या पहिल्याच केस मध्ये घटस्फोट टाळण्यात यश आले.तेव्हाचा आनंद अजून विसरलेले नाही.”

“मी पण नाही” केबिनच्या दारात उभी असलेली विमल म्हणाली.

“विमल,तुम्ही आणि इथं” मी विचारताच विमल येऊन घट्ट बिलगल्या. 

“आज तुम्ही रिटायर होताय म्हणून खास आलेय. मॅडममुळे संसार वाचलेली मीच ती पहिली व्यक्ती. त्यांच्याचमुळे माझं आयुष्य दोनदा सावरलं”

“दोनदा”मी आश्चर्यानं विचारलं.

“मॅडम,तुम्ही माझा संसार तर वाचवलातचं आणि माझ्या लेकीचा सुद्धा..”विमलनं दाराच्या दिशेनं बोट केलं तिथं मघाचेच तो आणि ती हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभे.त्यांना पाहून आपसूक डोळे वहायला लागले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे सासर ते माहेर…  ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ हे सासर ते माहेर…  ☆ सौ. वृंदा गंभीर

माझ्या चुलत भावाचं आत्ताच लग्न झालं. माझे काका काकू खूप साधे सरळ आहेत प्रेम, माया तर त्यांच्यात ठासून भरलेली आहे. कुणाला दुखवणं त्यांना कधीच जमलं नाही.

माझ्या काका काकूंना एकच मुलगा आहे. अभी त्याचं नाव. अभी दिसायला फार सुंदर आहे. उंचापुरा, गोरागोमटा, शांत व समजदार आहे. त्यांची परिस्थिती बेताची पण खाऊन पिऊन सुखी अशी आहे. त्रिकोणी कुटुंब, अगदी सगळ्यांनी कौतुक करावं असंच…

अभीचं शिक्षण पूर्ण झालं. काका ही रिटायर्ड झाले. आता अभीच्या लग्नाचे वेध लागले होते. स्थळ बघायला सुरवात केली…

काकूंच्या मनात सुने विषयी खूप स्वप्न होते. त्या नेहमी म्हणायच्या “मला सून नको, मुलगी हवी आहे. ती माझ्या घरची लक्ष्मी असणार आहे. मला तिचे खूप कोडकौतुक करायचे आहे, खूप सुखात समाधानात ठेवायचे आहे…. मिळेल, ना अशी मुलगी अभिला.” खूप काळजी करायची काकू. 

काकू अभिला सांगायची “ती गृहलक्ष्मी असेल. तिच्या आवडी निवडी जपायच्या. तिला कधी दुखवायचं नाही. प्रेमाने एकोप्याने राहायचं. एकदा मनं जुळली कि नातं घट्ट होतं, दोघांमधलं प्रेम वाढतं व संसार फुलायला लागतो.”

आम्हाला खूप भारी वाटायचे. काकूंचे विचार किती सुंदर आहेत‌ खरच काकू सूनेला खूप छान वागवणार अशी खात्री होती.

अभिला एक स्थळ आलं. आम्ही मुलगी बघायला गेलो. मुलगी बघताच पसंद पडली. आम्ही लगेच होकर सांगितला व घरी आलो. नंतर ते पाहुणे आले. बैठक पार पडली. काका काकू म्हणाले, “आम्हाला काहीच नको. देवाच्या कृपेने आम्ही सुखी आहोत. घरात कसलीच कमी नाही. हा, फक्त मुलीची कमी आहे, ती तेवढी द्या आम्हाला.” 

मग लग्न ठरलं. तारीख काढली. सगळे लग्नाच्या तयारीला लागले. जसजसे लग्न जवळ येत होते तसतसे काकूंचे स्वप्न वाढत होते‌. ‘आम्ही दोघी फिरायला जाणार, सर्व एकविचाराने करणार, गावात एक आदर्श सासुसून म्हणून वावरणार, सगळ्यांना असं वाटायला हवंय कि आम्ही मायलेकी आहोत.’ अभी पण खूप खुश होता. तोही जोडीदाराबद्दलची स्वप्नं रंगवत होता,,,

लग्नाचा दिवस उजडला. नवीन स्वप्नांनी सजलेला तो दिवस उत्साही व आनंदी होता. सगळे नटून थटून आनंदी दिसत होते. एकापेक्षा एक सुंदर दिसत होते. 

लग्न घटिका जवळ आली. ब्राम्हणाने सावधान म्हटले आणि काकूंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. लग्न सोहळा व्यवस्थित छान पार पडला. सगळं विधिवत झालं व वऱ्हाड परतीच्या वाटेने निघाले…

लक्ष्मीने पाहिलं पाऊल घरात टाकलं. खूप धूमधडक्यात स्वागत करण्यात आलं. लक्ष्मी पूजन झालं…

आणि जेवणं करून सगळे रात्रीच्या विश्रांतीसाठी गेले. काकूंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळच्या आंघोळी देवदर्शनाला जायचं याची त्यांना काळजी. 

सकाळ झाली. सगळे उठले. नवरा नवरीच्या आंघोळी झाल्या. ते नाष्टा करून देवदर्शनाला गेले.

घरात पाहुणे खूप होते. तिन दिवस पूजा, गोंधळ वगैरे कार्यक्रम झाले. पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. उरले फक्त काका काकू, अभी आणि स्वप्नाली….

अभी आणि स्वप्नाली फिरायला गेले नाही, कारण अभिची रजा संपली होती. स्वप्नाली जास्त बोलत नव्हती. अभी बरोबर जेमतेम बोलणं होत होतं. अभिच्या आईने तिला विचारलं “तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? अगं नवऱ्याचं मन जिंकण्याचे हेच दिवस असतात.”

पण तिला वेगळंच वाटतं होतं. काय कारण होतं माहित नाही, पण ती दोघं एकत्र आलेच नाही.

नवीन आहे म्हणून सगळे समजून घेत होते. तिला काम जास्त जमत नाही म्हणून सगळं काकू करुन घेत होत्या. त्या म्हणत “अजून नवीन आहे, शिकेल हळू हळू‌. माझीच मुलगी असती तर मी काय केलं असतं? आता ती माझीच आहे. मी नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल….”

एक दिवस अभिला मित्र चिडवत होते. अभी खूप रडला व स्वप्नाली कशी वागते ते त्याने मला सांगितलं. मी तिला ‘बाहेर फेरफटका मारून येऊ’ असं सांगितलं व तिला घेऊन गेले. तिला खूप समजून सांगितलं तेंव्हा कळलं कि असं वागायचं ते तिला माहेरून शिकवून पाठवलं होतं.

मग काकू तिची आई झाली व सगळं समजून सांगितलं तेंव्हा अभी स्वप्नाली एकत्र आले, त्यांच्यात प्रेम वाढू लागलं.

तिच्या माहेरून सगळ्यांचे सारखे फोन यायचे ‘कशी आहे, जेवणं केलं का, काय केलं होतं जेवायला, भाजी काय होती, काम कोण करतं, सासू कशी आहे, ती काही करते की नाही, की फक्त बसून रहाते….. तू जास्त काम करू नको, बसून तर खाते तुझी सासू, भरपूर धडधाकट आहे, करू दे तिलाच काम… तू तूझं आरामात रहायचं, नवऱ्या बरोबर फिरायला जायचं, हॉटेल मध्ये जेवायला जायचं, नवऱ्याला आपलंसं करायचं, सासूचे गाऱ्हाणे सांगायचे…. नवऱ्या समोर अगदी गोड वागायचं’ असं बरंच शिकवलं जायचं. एकाचा झाला की एकाचा फोन यायचाच. असाच दिवस निघून जायचा, पण काकू शांत होत्या. त्यांना फक्त मुलाचा संसार छान झालेला पहायचा होता. 

काकूंना कोणी विचारलं “सून कशी आहे, काम करते का नाही ?’तर त्या ‘हो’ म्हणायच्या, “सगळं काम करते, स्वयंपाक छान करते. मुलगी छान आहे.” वेळोवेळी समजून घेत होत्या,,,

अभीच्या सर्व लक्षात येत होतं. आई एकटीच सगळं करते, बायको काहीच करत नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. काकू त्याला म्हणायच्या, “बाळा, बाई माणसाला काम चुकत नसतं. तिला काम करावंच लागतं. आणि बसून तरी काय करणार, मला पण थोडी हालचाल हवीच ना. बसून काय मास येणार का. शरीर पण चांगलं राहायला हवं ना” असं बोलून अभिला शांत करत.

हळूहळू घरात बदल जाणवू लागला, पण काकूंनी शांत रहाणं पसंत केलं होतं.

असेच काही महिने गेले. एकदा स्वप्नाली आजारी पडली तेंव्हा काकूंनी तीची खूप सेवा केली. ती बरी होते की नाही असं वाटतं होतं. काकूंनी नवस, उपवास केले, देवाला प्रार्थना केली, ‘माझी मुलगी सुखरूप घरी येऊ दे’ असं साकडं देवाकडे घातलं.

स्वप्नाली बरी झाली पण आता तिच्यात बदल झाला होता. तिला सासर आपलं वाटायला लागलं. आता हेच घर आपलं आहे असं वाटलं. ती आता माहेरी कुणाशी जास्त बोलत नाही कारण तिला माणसं कळायला लागली होती. मला तर असं वाटलं की देवाने मुद्दाम परीक्षा घेतली तिला सासरचे लोक कसे आहेत ते दाखवण्यासाठी. त्रास झाला पण तिला माणसांची पारख करता आली. आज ती तनमनाने सासरची झाली व शिकवणारे किती चुकीचं शिकवत होते ते तिच्या लक्षात आलं. आता सासूला सारखं “आई आई” करते, कुणी काय बोललं ते सगळं सांगते. 

काकू तिला म्हणते, “अग हे सगळं तुझंच तर आहे. मी जरी कष्ट करून मुलाला वाढवलं, नोकरीला लावलं ते पुढचं चांगलं होण्यासाठीच ना. तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुम्ही खूप नाव कमवावं, मोठं व्हावं म्हणूनच ना.”

तिला आता चांगलं वाईट, खरं खोटं कळायला लागलं होतं, म्हणून तिने स्वेच्छेने माहेर कमी केलं होतं. शेवटी आई ती आईचं असते, ती मुलाची असो वा मुलीची, ती फक्त मुलांचं सुख बघत असते, देवाजवळ मागत असते, हे स्वप्नालीला आता पटलं होतं.

पुढे स्वप्नालीच्या भावाचं लग्न झालं तिची वाहिनी छान शांत होती, पण जे लोक मुलीचा संसार होऊ देत नव्हते ते सुनेला कसं वागवणार होते. तिने थोडे दिवस सहन केलं व नंतर तिच्या भावाला घेऊन बाहेर पडली. आता तिचे आई वडील एकटेच राहतात. ना मुलीचं प्रेम ना मुलाचं प्रेम.

प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आपल्यालाच पडावे लागते हे विधिलिखित आहे. हे कालचक्र आहे. जे कराल ते भराल, जे पेरलं तेच उगवतं.

आता अभी व स्वप्नाली चा संसार सुखात चालू आहे. काकूला सूनेऐवजी मुलगी मिळाली आहे. अभिमान वाटतो मला काकूंचा, किती विचार पूर्वक निर्णय घेतात व वागतात त्या. एवढा संयम येतो कुठून त्यांच्याकडे. जर प्रत्येक स्त्रीने काकू सारखा विचार केला तर घरं, कुटुंबं एकत्र राहतील व प्रगती होत राहील,,,

विचार बदला समाज बदलेल. स्त्रीचं मन ओळखायला शिका. आज स्त्रीच स्त्रीची वैरी आहे, मुलगी काय न सून काय, स्त्रीच आहे. तो आपलाच अंश आहे हे लक्षात असू द्या म्हणजे प्रत्येक संसार सुखाचा होईल, वृद्धाश्रम बंद होतील, घटस्फोट होणारच नाहीत. तेंव्हा विचार करा व आचरणात आणा. विजय आपलाच आहे…

“नारी शक्ती जिंदाबाद “

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बकेट लिस्ट… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

अल्प परिचय :

सौ.प्रांजली हेमंत लाळे.

शिक्षण – एम.ए.बी.एड.(इंग्रजी साहित्य)

व्यवसाय – शिक्षिका आणि बिझिनेस(पैठणी व ज्वेलरी)उद्योजिका.

आवड – चित्रकला, काव्य लेखन, कथा लेखन. समाजसेवा.

सध्या मनमाड येथे वास्तव्य.

? जीवनरंग ?

☆ बकेट लिस्ट…  ☆ सौ. प्रांजली लाळे

लिनाने धाडकन दरवाजा आपटला आणि सोफ्यावर स्वतःला झोकून दिले. खुपच वैतागली होती आज ती. घरातील कामे, मुलांची चिडचिड, नवरोबाची आरडा-ओरड.. ओह माय गॉड!! कुठेतरी निघून जावं इथून.. डोळे गच्च मिटून घेतले.. 

डोळ्यासमोर आधी माहेरचे तरंगले.. आई, जी तिची मनापासून वाट पहातेय.. तिच अशी एकमेव व्यक्ती आहे जी तिच्यावर निरपेक्षपणे प्रेम करते.. ‘हम्म.. जावं का आईच्या कुशीत शिरायला.. मनसोक्त रडायला..’ क्षणात आसू तरळले.. पण आईबरोबर बरीच माणसं आहेत तिथे.. ज्यांना आपलं येणं पटत नाही.. मग कुठे जावं..एक हुंदका देत तिने स्वतःलाच विचारले..

लिना आणि तिचा धाकटा भाऊ आईची लाडकी लेकरं.. बाबांनंतर एकमेकांना सांभाळत मोठी झालेली.. एकमेकांचा आधार होते ते.. आईनं बाबांची कमी कधी भासू दिली नाही.. मुलंही वेळेआधीच समजदार झाली. आईच्या पेन्शनमध्ये भागत नव्हते. म्हणून धाकटा लवकर नोकरीस लागला.. नोकरी सरकारी असल्याने भवितव्याची चिंता नव्हती.. पुढे लग्न होऊन स्थिरस्थावर झाला. 

लिनाने नोकरी करता करता पदव्युत्तर शिक्षण घेतले.. अबिरचे स्थळ सांगून आले.. अबिरमध्ये नावं ठेवण्यासारखे काही नव्हते. देखणा नवरोबा मिळाला.. थोडी घाईच झाली लग्नाची.. अवघं विसावं संपून एकवीस लागलेलं.. पहिल वहिलं स्थळ.. ‘झट मंगनी पट शादी’ झाली..

बालपणापासून गाण्याची प्रचंड आवड होती लिनाला.. गाण्याच्या दोन परीक्षा पास होती ती.. पण ती आवड तिथेच थांबवावी लागली. अगदी गानकोकिळा नव्हती ती, पण आवाज सुरेल होता लिनाचा.. 

बाप नसलेल्या घरात एक अनामिक पोरकेपण असतं.. घरात एक भिती वावरत असते हळुवारपणे.. चुकायचे नाही कुठे.. खुप मर्यादा येतात मुलींना सगळीकडे.. असो..

आज लिनाची खुप चिडचिड होत होती.. पहाटे पाच पासनं तिचं स्वयंपाकघर जागं व्हायचं.. भांड्यांचे सुरेल संगीत जे सुरु व्हायचे ते दुपारी आवरसावर झाले कीच थांबायचे.. राग भैरवी पासून राग मल्हार पर्यंतचे अनेक राग इथेच उमटायचे.. स्वयंपाक घर हेच  तिचे संगीत मंच!! प्रत्येकाची आवड जपता जपता तिनं स्वतःकडे कधी पाहिलेच नाही.. आणि म्हणूनच आज तिची घुसमट बाहेर पडली..

आज कारणही तसेच घडले होते.. अबिर आज जरा उशिरा जाणार होता ऑफिसला.. तिलाही जरा बरं वाटले.. ती खरंच कंटाळली होती ‘मै और मेरी तनहाई’वाला अमिताभचा डायलॉग म्हणून.. अबिरच्या गळ्यात हात टाकून लडिवाळपणे म्हंटली, “नकोच ना जाऊस आज बाहेर.. आपण कुठेतरी फिरून येऊ..”

अबिर एका वेगळ्याच तालात होता.. फटकन म्हंटला, “आता काय आपले फिरायचे दिवस राहिलेत का? दोन-तीन वर्षांत मुलांची लग्न होतील..”

लिना खरर्कन जमिनीवर आली.. इतकी वर्षे ज्या घरासाठी राबली, ज्या माणसासाठी त्याग केला.. त्याच्या खिजगणतीतही आपण नाहीत.. आपण काहीही केले तरी इथे कुठेही नोंद होणार नाही.. खूप तळमळली बिचारी..

सोफ्यावर बसल्या बसल्या मोनाची आठवण आली.. आणि तीला फोन केला.. 

मोना एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.. भरपूर मैत्रीणी होत्या तिला.. “मोना येतेस का गं घरी..” डोळ्यात अश्रू होते. आवंढा गिळला तिनं.. “हो येते गं..  बरेच दिवस आपली भेट ही नाही. आज क्लबची मिटिंग आहे. दुपारी येते.” म्हटलं.

दुपारी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मोनाचे घरात आगमन झाले.. हिने भावनातिरेकाने कडकडून मिठीच मारली तिला.. मनमोकळे रडून घेतले तिच्याजवळ.. कुठेतरी रितेपण जाणवत होते तिला आज.. मोनाने पाठीवर थोपटत शांत केले तिला…

“मोना मला आता स्वतंत्र व्हायचे आहे.. मनसोक्त जगायचं आहे. उंच आकाशात भरारी घ्यायची आहे गं..”

मोना उद्गारली, “काय झाले गं.. इतकी काय दुखावलीस?”

सकाळचा प्रसंग सांगितला लिनानं तिला.. मोना स्तब्ध होऊन ऐकत होती.. कारण एन जीओत रोजचेच होते हे. “दुपार नंतर फ्रीच असतेस ना तु.. मला जॉईन हो.. ग्रुप्समधे सामिल करते तुला.. घरातील टेन्शन उंबरठ्याच्या आत.. तुझ्या गाण्याला मुक्त कंठ दे.. परीक्षा दे.. आमच्या शाळेत गायन शिकवायला हवंच आहे मला कोणीतरी.. उद्याचा उषःकाल वेगळाच असेल बघ.

आणि हे बघ, आपली मुलं आता मोठी झालीत. त्यांचे त्यांना पाहू दे जरा.. काम करण्याची सवय लाव त्यांना.. स्वयंपूर्ण बनव मुलांना.. कोठेही अडायला नको त्यांचे तुझ्यावाचून.. नवऱ्याशी सविस्तर मोकळेपणाने बोल.. नाही तर कुढतच जगशील.. बकेट लिस्ट रिकामी करायला लाग.. हवं तसं जग.. मेकओव्हर कर स्वतःचा.. बघ नवराही म्हणेल ‘ओ मेरी जोहरजबी’ तुला..

कालच महिला दिन साजरा झाला आहे.. तेव्हा तु यायचं आहेस महिला मंडळात.. आजच तुला निमंत्रण देऊन ठेवते.. शुभस्य शिघ्रम।”

लिनानं मनाशी ठाम रहायचे ठरवले. सुरुवात केली आजपासूनच.. मुलं आली की लगेच त्यांना हॉलमध्ये बोलावले.. स्पष्ट मतं मांडली.. कामं ठरवून दिली.. मुलांनाही जाणवलं आई बदलतीये.. थोडे नाराज वाटले.. पण होममिनिस्टरनेच बंड पुकारला म्हंटल्यावर काय करणार? 

नवरोबा थकून भागून आले.. पाणी टेबलवर होते.. घ्या म्हंटली हाताने.. “उद्या मिटिंग आहे माझी मंडळाची.. उद्या बाहेरुन काही मागवून घ्या.. रोज सकाळी शाळेत जाणार मी गाणं शिकवायला.. बिझी असणार मी सुद्धा आता..” 

अबिर पहातच राहिला.. हा मेकओव्हर पचनी पडायला जड जाणार हे त्याने ओळखले.. पण काही पर्याय ही दिसत नव्हता.. स्वतःलाच शोधायला निघालेल्या बायकोला बकेट लिस्ट पुर्ण करण्यात मदत करायलाच हवी आहे ना!!!

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.) – इथून पुढे –

“माई , खूप काम आहे काय गं तुझ्याकडे. चेहरा बघ किती कोमेजलाय तुझा.” 

“काही नाही गं आई. आहेत नेहमीची कामं. बाकी काही नाही.” 

“माझीही खूप सेवा करावी लागते तुला.” 

“अगं तुझ्या सेवेचा त्रास नाही होत मला. तू कशाला काळजी करतेस. बघ कशी ठणठणीत आहे मी. तू झोप आता.” मी आईच्या अंगावर पांघरुण घातले.

चला आता रात्रीच्या प्रशांतवेळी प्रसन्ना सिल्क मीलच्या बॅलन्सशीटचं काम उरकविण्यासाठी मी लॅपटाॅप हाती घेतला. यांच्या बॅलन्सशीटमध्ये मला कॅपिटल वर्क इन प्रोसेस, इन्व्हेन्टरी आणि व्यापारप्राप्तीचा दिलासा वाटला. मीलच्या इमारतीचे वाढीव बांधकाम होत होते, तसेच साठवलेला कच्चा माल, अर्धवट प्रक्रिया झालेला कच्चा माल, पूर्ण झालेला पण विक्री बाकी असलेला माल, यातून बराच फायदा होणार होता. कंपनीने काही दीर्घकालीन तरतूदीही केलेल्या होत्या. मी माझे विश्लेषण पूर्ण केले आणि निद्रेच्या कुशीत शिरले.

प्रथमेश रि रोलिंगचा बॅलन्सशीट अहवाल मात्र मी चांगला नाही देऊ शकले. कंपनीने वेळोवेळी अल्पकालीन व दीर्घकालीन तरतूदी वापरल्या होत्या. व्यापारी देयकेही भरपूर होती आणि इतर बर्‍याच लायबिलीटीझमुळे मी ते नाकारलं.

“निलीमा, अभिनंदन. आज विभागीय कार्यालयातून तुमच्यासाठी अभिनंदनपर लेटर आलं आहे. तुमच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. लेटस् सेलिब्रेट. आज एक छोटीशी पार्टी आपल्या स्टाफलाही देऊया.”

आजपर्यंत मी अनेक बॅलन्सशीटचं काम केलं होतं, टॅली केलं होतं, पण आयुष्याचं बॅलन्सशीट, ते मात्र मी नाही टॅली करू शकले. आयुष्यभर मी प्रत्येकाला देतच राहिले, खूप देयके भरली. पण ॲसेटस् नाही मिळवू शकले. मी खूप चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्या वाटेला चांगलं येईलच हा विश्वास फोल ठरला होता. कारण इतर घटक परिणाम करणारे होते. कधी घर, कधी समाज, आपले म्हणणारा मित्र गोतावळाही, कधी रूढी, कधी परंपराचा गुंता, हा चक्रव्यूह तोडणे जमलेच नाही.

जीवनाच्या ताळेबंदात आर्थिक स्थितीला फारसे महत्व नसते, कारण पैसा सर्वस्व नाही, तर माणूस किती आनंदी आहे आणि किती उपयुक्त आहे हे महत्वाचे. जीवनात नाव, यश, किर्ती बरोबरच आपल्या व्यक्तीची सोबत, घर, कुटुंब व त्यातून मुलाबाळांच्या रूपातून होणारी गुंतवणूक, भावनिक आस्था, त्यातून निर्माण होणारं प्रेम व्यक्तीला समृद्ध करत असतं. प्रत्येकाच्याच वाटेला हे सुख येत नाही व जीवनाचा ताळेबंद संतुलित होत नाही.

काय दोष होता माझा ? माझं शिक्षण ? माझी बुद्धीमत्ता ? माझं सौदर्य ? कि माझं सुख पाहू न शकणारे नात्यांचे बंध, मी नेस्तनाबूत कशी होईल हे पाहणारे माझे शुभचिंतक ? हितचिंतक ? 

पण जाऊ देत. त्या त्या घटकांनी आपापली कामे केली. माझा जीवनाचा ताळेबंद असंतुलित केला. पण हे संतुलन मी का साधू नये. स्वतःला या कष्टातून मलाच बाहेर यावं लागेल. माझ्याकडे चांगलं नाव आहे आणि प्रतिभाही आहे. शब्दांची संपत्ती आहे. ही अविनाशी संपत्तीच माझ्या जीवनाचा ताळेबंद मजबूत करणारी ठरणार आहे.

सद् भावना ही एक आणखी माझी संपत्ती, आणि ती मिळवायला मला आयुष्य वेचावे लागले आहे. माझ्या समवेतचा भोवताल, त्यातील दुःख, वेदना तसेच प्रसंगी आनंदालाही मी चढवलेला शब्दांचा साज, लेखणीची धार माझ्या सोबतीला आहे.

मोबाईलच्या रिंगटोनने माझी तंद्री भंग पावली. सु का देवधर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातून फोन होता. “नमस्कार मॅडम, मी प्रिन्सिपाॅल अनिल महाजन बोलतोय. पुढच्या आठवड्यात वासंतिक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करीत आहोत. त्यातील “जीवनाचा ताळेबंद” यावर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. आपण येणार ना मॅडम.” 

“होय सर, मी अवश्य येईन.”

“धन्यवाद मॅडम, मी ईमेल वर निमंत्रण पत्र पाठवतोय मॅडम, पुनश्च धन्यवाद.” सरांनी फोन ठेवला.

“माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲसेटस् आणि लायबिलिटीझच संतुलन म्हणजे बॅलन्सशीट आपण शिकलात. लायबिलीटीझ जितक्या कमी तितके चांगले मानले जाते. पण जीवनाचे बॅलन्सशीट फार वेगळे असते मित्रांनो. जीवनाचा ताळेबंद म्हणजे व्यक्तीचं आत्मचरित्रचं म्हणता येईल. घर, कुटुंब, मित्र गोतावळा, नात्यांचे बंध, आपला भोवताल, सगळेच घटक महत्वपूर्ण ठरतात. फार खोलात न शिरता काही महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे. तुम्ही या देशाचे भावी सूज्ञ नागरीक आहात. तुम्हांला मी काय शिकवावं.

तर जीवनाच्या ताळेबंदात आमचा जन्म हा ओपनिंग बॅलन्स, मृत्यू हा क्लोजिंग बॅलन्स, आमच्या सर्जनशील कल्पना, सद्भावना संपत्ती, पुर्वग्रहदूषित विचार, द्वेष, ईर्शा, मत्सर, क्रोध हे आमचे दायित्व, ह्रदय ही वर्तमान संपत्ती, आत्मा ही स्थिर संपत्ती, ‌नाव, यश, किर्ती हे आमचं खेळतं भांडवल, शिक्षण, ज्ञान, अनुभव हे सर्व आमचे जमा खाते, लोभ, स्वार्थ हे आमचे दायित्व.

शिक्षण, ज्ञान, आणि आत्मसात केलेल्या कौशल्यामुळे तुमच्याकडील सगळी संपत्ती जरी कोणी काढून घेतली तरी तुम्हांला पुन्हा श्रीमंत होण्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण तुमच्याकडील आयुष्याचा ताळेबंद हा मजबूत असणार आहे.

बस एवढंच माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मला इथे बोलावलंत, तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली. ऋणी आहे मी आपली. नमस्कार आज मलाही आंतरिक समाधान वाटले.”

– समाप्त – 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅलन्सशीट – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅलन्सशीट – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

सकाळी साडेपाचचा अलार्म वाजला. चला उठायला हवं, पण उठवलेच जात नाही आहे. शरीरच नकार देतंय. अंगात तापाची कणकण वाटतेय. आज रजा घ्यावी काय ऑफिसातून? नको, कामाचं आधीच प्रेशर आहे, त्यात रजा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल . कितीही उपसला तरी कामाचा ढिग काही कमी होत नव्हता. या कर्ज विभागात तर कामाची कमतरताच नसते. जुनी कर्ज प्रकरणे, त्यांची वसूली, त्याचा पाठपुरावा, वेळोवेळी त्यांना पाठविलेल्या नोटिसा, दरवर्षी घेतले जाणारे बी सी लेटर्स,  क्षेत्रीय व विभागीय कार्यालयाने वेळोवेळी मागविलेली माहिती, स्टेटमेंटस्, नवीन कर्ज प्रकरणे, त्यांची सगळी कागदपत्रे, बॅलन्सशीटचे विश्लेषण करणे, खाते एनपीए होऊ नये म्हणून प्रयत्न करणे, एनपीए झालेले खाते पुन्हा ॲक्टीव्ह करण्यासाठी झटणे, एक ना हजार अशी कामे, जीव नुसता मेटाकुटीला यायचा. काही वेळा मनात विचार यायचा, घ्यावी स्वेच्छा निवृत्ती, पण दुसर्‍याच क्षणी मन म्हणायचं, ‘आव्हानांना घाबरतेस काय ? स्विकार चॅलेंज आणि चल पुढे, प्रामाणिकपणे काम करायचे. मग कसल्या अडचणी ?’

घड्याळ बाबाकडे लक्ष गेले. बापरे सहा वाजलेत. उठले. सकाळची सगळी आन्हीकं आटोपली. आईला उठवलं, शंभरवर्षीय आई सर्वस्वी आम्हां भावंडांवर अवलंबून होती. तिला दात ब्रश करायला लावले. तिची वेणी घातली, स्नान उरकलं, चहा पाजला.

आईला सांभाळणारी बाई नऊ वाजेला यायची. मी फटाफट स्वयंपाक उरकला, डबा भरला व धावतपळत ऑफिस गाठलं. 

आपल्या टेबलाशी आले. पी सी चालू केला आणि डे बिगीनला सुरूवात केली. काही महत्वाचे ईमेल आहेत काय पाहिले. त्यांना उत्तरे लिहिली. ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत काय ते पाहिलं. एक तक्रार होती, त्याचा समाधानकारकपणे निबटारा केला.

इतक्यात माझ्या पी सी वर माझ्या वरीष्ठांचा मेसेज आला. मॅडम भेटून जा.

मी केबिनमध्ये गेले. “निलीमा मॅडम तुलसी पाईप्स, गौरव इंडस्ट्रीज, प्रथमेश रि रोलिंग, प्रसन्ना सिल्क मील यांच्या बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करायचं आहे. तुम्ही केली काय सुरूवात. आम्हांला अगदी अग्रक्रमाने हे काम करायचं आहे. आता हा जानेवारी महिना, मार्चला आपलं क्लोजिंग. त्याच्या आत ही कर्जे मंजूर झाली पाहिजेत जेणे करून आमची तोट्यात गेलेली शाखा हा तोटा भरुन नफ्याकडे वाटचाल करील. नफा तर नाही होणार लगेच, पण आमचा तोटा तर कमी होईल. हळूहळू आमची ही गाडी राईट ट्रॅकवर आली कि पुढील भविष्यही मग उज्वल राहिल. यासाठी तुमचाही हातभार हवा निलीमा मॅडम. या चार दिवसात तुम्ही मला चारही बॅलन्सशीटचं विश्लेषण द्याल अशी मी अपेक्षा करते, जेणे करून मला पुढील प्रोसेस करता येईल.”

“मॅडम बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करणं किती अवघड आणि जोखमीचं असतं. फार बारकाईने अभ्यासपूर्ण हे काम करावं लागतं. आमची बारीकशी चूकही महागात पडू शकते‌” 

“होय निलीमा मॅडम, म्हणून तुमच्यासारख्या हुशार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे हे काम सोपवतेय. यापूर्वीही तुम्ही बर्‍याच बॅलन्सशीटचं विश्लेषण केलं आहे. यावेळीही तुम्ही चांगल्याप्रकारे हे काम कराल असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही ते करणारच याची खात्रीही आहे. मग शुभस्य शीघ्रम. आणि होय, हे काम झालं कि तुम्ही घ्या दोन दिवस सुट्टी. तुमची तब्येत बरी नसतांनाही तुम्हांला काम करावं लागतंय याचं वाईट वाटत आहे, पण तुमची कामाप्रतीची निष्ठा व तुमचं मनोधैर्य हे काम करण्यास ऊर्जा देईल. ऑल दि बेस्ट.”

मी आपल्या सीटवर स्थानापन्न झाले. “विवेक जरा चहा सांगशील रे माझ्यासाठी.” मी ऑफिसबाॅय ला आवाज दिला. गरम चहाचा एकएक घोट संपवत मी थोडीशी रिलॅक्स झाले. “दिपीका जरा तुलसी पाईपची फाईल दे गं”. फाईलमधून मी बॅलन्सशीट काढलं. “मनी कंट्रोल वेब साईट ओपन केली आणि बॅलन्सशीटच्या विश्लेषणाला सुरूवात केली. तुलसी पाईपच्या इतरही उपकंपन्या होत्या जसे तुलसी प्लाॅस्टिक, तुलसी स्टील, तुलसी ट्यूब सोल्यूशन. आम्ही फक्त तुलसी पाईपसाठी कर्ज देणार होतो म्हणून स्टँडअलोन बॅलन्सशीटच मला बघायचं होतं.

तुलसी पाईपची इमारत, वाहने, यंत्रसामग्री खरेदीसाठीची कर्जे, त्याचा परतावा, इक्विटिझ आणि लायबिलिटीझ मध्ये शेअर कॅपिटल रेशो स्थिर होता. एकंदरीत हे बॅलन्सशीट तसे ओ के होते. माझे विश्लेषण पूर्ण करून मी माझे कव्हरींग लेटर तयार केले. 

उद्या सर्कल हेडची ब्रांच व्हिजिट होती. त्यांना काय माहिती हवी, काय काय चेक करायचं आहे व ते कसं व्यवस्थित असेल याची यादीच मॅडमने माझ्याकडे दिली. रात्री उशिरापर्यंत मी व मॅडम सुलेखा आम्ही दोघींनी ते काम पुर्ण केलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

आज मला गौरव इंडस्ट्रिजच्या बॅलन्सशीटचं विश्लेषण करायचं होतं. कंपनीची दिर्घकालीन कर्जे होती. तसेच शेअर कॅपिटलही भरपूर होतं. यातुन कंपनीचे दायित्व बरेच असल्याचे दिसत होते. मी कंपनीच्या आयपीओ पोस्ट वाचायला घेतल्या आणि शेअर फेस व्हॅल्यू व शेअर व्हॅल्यूतून शेअर प्रिमियमचा अंदाज घेतला. टॅक्स आणि लाभांश देऊन बरीच रक्कम शिलकीत राहात होती. तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निळे मलम… भाग – २ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ निळे मलम… भाग – २ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला.’

 ‘कोणता उपाय?’

 ‘निळे मलम.’ ) — इथून पुढे 

‘निळे मलम , वाढत्या वयाचा परिणाम तुझ्या डोक्यावरही झालाय. विचारतोय काय? आणि तू उत्तर काय देतीयस?

‘बरोबर बोलतीय मी! बस आपण समजू शकत नाही. तसंही आपण मला कधी समजून घेतलय?’

‘खूप सांकेतिक बोलायला लागलीयास आज काल.’ सोमेशने चिडून म्हंटलं.

‘स्पष्ट करते. लहानपणी गरम दूध हातावर पडल्यामुळे माझा हात खूप भाजला होता. एक तर भाजल्यामुळे होणारी जळजळ आणि द्सरीकडे ही चिंता, की हातावर फोड येऊन माझा हात खराब झाला तर? माझ्या हाताचे डाग पाहून लोक हसतील. मी ओरडून ओरडून रडत होते. तेव्हा आईने जवळ असलेल्या शाईचा दौतीतली शाई माझ्या हातावर ओतली.

‘हे काय केलंस आई? एखादं औषध लावायचं ना! आता माझ्या हातावर फोड उठले तर? त्याचे डाग किती खराब दिसतात.’ मी रडत रडत आईला म्हंटलं

‘बेटी, हे औषधच आहे. बघ. याने तुझी जळजळही थांबेल आणि तुझ्या हातावर फोडही उठणार नाहीत.’ आईने समजावलं.

‘खरोखरच त्या निळ्या शाईने मला खूप आराम मिळाला. जळजळ थांबली आणि फोडही आले नाहीत.’

तू अजूनही भरकटतच आहेस.’ सोमेश चिडून म्हणाला.

‘मुळीच नाही. तिथेच येते आहे मी. विचार करा. तुमच्याशी लग्न करून मी या घरात आले. कधी तुम्ही माझं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केलात? तुमची गरज भागवण्याचं मी केवळ साधन झाले. कधी माणूस म्हणून माझ्याकडे बघितलत, मला तरी आठवत नाही. तुमची उपेक्षा, अवहेलना, यामुळे माझंही हृदय खूप जळत होतं. मी पुन्हा घाबरले, की कुठे फोड उठू नयेत. नाही तर इच्छा नसतानाही त्यातून झरणारं पाणी समाजाच्या चर्चेचा विषय बनेल. ‘

‘म्हणजे?’

‘म्हणजे आत्तापर्यंत तरी लोकांना असं वाटतय, की आपल्यामधे प्रेमाचा झरा  वाहतोय. आपण दोन शरीर आणि एक आत्मा असलेले आहोत कारण सामान्यत: आपण समाजापुढे असाच चेहरा घेऊन फिरतो. आपण दोघं म्हणजे नदीचे दोन किनारे आहोत, ज्याच्या  आत एक ज्वालामुखी खदखदतोय, हे कुणालाच माहीत नाही. तुमच्याशी जोडली गेल्यावर मला खूप एकाकीपण वाटलं.’

‘तू जरा जास्तच , इच्छा, अपेक्षा बाळगल्यास… अं?’ सोमेश डोळे वाटारून  म्हणाला.’

‘इच्छा, अपेक्षा बाळगणं, हा प्रत्यक माणसाचा हक्क आहे. शिवाय, प्रत्येक बाईच्या काही इच्छा, काही कामना, अभिलाषा असतातच आणि जेव्हा त्या अपूर्ण कामनांसोबत जगावं लागतं ना सोमेश, तेव्हा खूप पीडा होते. मी ते एकाकीपण भोगलय, जेव्हा तुम्ही असूनही माझ्याबरोबर नव्हतात. माझं सुख तुमचं. माझं दु:ख मात्र माझं एकटीचं होतं तेव्हा. उशीलाच साथीदार बनवून तिच्या गळ्यात हात टाकून माझं दु:ख माझ्या वेदना वाटत होते मी. तिला माझ्या आसवांनी भिजवत होते. मला माहीत होतं, की मी म्हणजे अमृता नाही, जिला सहजपणे आपलं दु:ख वेदना सांगण्यासाठी आणि रडण्यासाठीही इमरोजचा खांदा मिळेल.’

एरवी सोमेशच्या पुढे येताना सुलभाची  बोलती बंद होते. आज न जाणे तिला एवढी ऊर्जा कुठून आली.

‘तर मग हा मार्ग शोधून काढलास तू, आपल्या  मनातलं दु:ख बाहेर काढण्याचा?’

‘काय वाईट आहे यात? तुम्ही मला कधीच समजून घेतलं नाहीत … आताही समजू शकणार नाही. आशा स्थितीत माझ्यापुढे दोनच रस्ते होते. एक तर बाथरूममध्ये जाऊन अंतरातला लाव्हा फ्लशबरोबर वाहून टाकायचा किंवा कुणाला तरी सांगून हलकं व्हायचं. पण काळजातलं दु:ख कुणाला ऐकवणार? जिथे सात फेर्‍यांचं बंधन आपलसं झालं नाही तिथे कुणाकडून काय अपेक्षा ठेवणार? दुसरा रास्ता हा होता की कुणी सहप्रवासी असा शोधायचा की जो जीवनात साथ देईल, माझ्याविषयी सहानुभूती बाळगेल, माझे दु:ख, वेदना समजून घेईल.- माझीही काळजी करणारा, माझाही विचार करणारा असेल आणि विश्वास बाळगा सोमेश… मिळालाही असता. किती तरी वेळा वाटलं, शोधावा असा जीवनसाथी, जो माझ्या भावनांना समजून घेईल, माझ्यावर मनापासून प्रेम करेल, ज्याच्या खांद्याववर डोके टेकून मी आपलं ओझं हलकं करू शकेन. जसे तुम्ही माझ्याबाबतीत बेपर्वा आहात, तशीच  मीही आपल्याबाबतीत बेपर्वा होईन. माझं वर्तमान जगू शकेन. ‘

‘म्हणजे आत्तापर्यंत तू मुडदा होतीस, आता जगू इच्छितेस.’

‘सोमेश केवळ श्वासोच्छवास करणं, एवढीच काही जीवंत रहाण्याची खूण नाही. जीवंत असण्यासाठी काही स्वप्न, इच्छा, अभिलाषा असणंही गरजेचं असतं. दररोज कुणी तरी  माझ्या आतून ओरडून ओरडून विचारतं… तू मृत आहेस..? उठ.जागी हो.  खरं तर त्यानेच माझ्या जिवंत असण्याची जाणीव कारून दिलीय. आता मी बघू इच्छिते, ती स्वप्ने, जी तुमच्या भीतीने मी पाहिली नाहीत. सगळी कर्तव्ये पार पाडूनही, जेव्हा नाराजीचा मुकुट माझ्या  माथ्यावर जडला, तेव्हा वाटलं या मनाला थोडं, सुख, आराम, चैन का देऊ नये? अश्रूंमध्ये माझं दु:ख वाहवून टाकत होते, त्यापेक्षा ते कागदावर उतरवणं मला जास्त चांगलं वाटलं. प्रेमाच्या खत-पाण्याच्या अभावाने निर्जीव झालेल्या संवेदना मलाच जडवत करू नये यसाठी विचार केला की, शब्दांच्या कॉंक्रीटचा का होईना, एक महाल बनवावा. भावना-संवेदनांची जी बीजे मनाच्या मातीत नुसतीच पडून आहेत, ती खत-पाणी घालून अंकुरित करावी. एवढा तरी हक्क आहे ना मला?’ सुलभात आज एवढी ताकद कुठून आली कुणास ठाऊक? स्वत: सोमेशही हैराण झाला.

“सोमेश ! आम्हा बायकांच्यात एक कमजोरी असते. आम्ही  ना, भविष्याची डोरी आधीच हातात, घेऊन ठेवू इच्छितो. यामुळे अनेकदा अर्तमानाचं टोक आमच्या हातून सुटून जातं. मीदेखील माझ्या जीवनाच्या तराजूनं माझं सुख तोलून बघितलं, तेव्हा मला वाटलं माझ्या वर्तमानापेक्षा मोठा आहे माझ्या माता-पित्यांचा अभिमान, जो त्यांना त्यांच्या लेकीबाबत आहे. माझ्या सासू-सासर्‍यांचा सन्मान, जो  त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या वागणुकीने मिळवलाय. लोक आपल्या दोघांमधील विसंवादाचे साक्षीदार बनावे, याच्यापेक्षा, पुन्हा एकदा निळे मलमच, पुन्हा एकदा माझं दु:ख, वेदानांना कमी करण्याचं साधन बनवावं, असं मला वाटलं. माझ्या आतील दु:ख याच  मलमानी बाहेर येत गेलं आणि मी समाजापुढे एक सुखद, संपूर्ण दांपत्यच्या आभासी जगाची  जाणीव करून देत, चेहर्‍यावर हसू आणत जगत राहिले.’

सोमेश गप्प बसून सुलभाकडे बघत राहिला.

सुलभाला जाणीव झाली, की एका शिकार्‍याच्या पंजाच्या हातून तिने आपली स्वप्ने वाचवली आहेत.

– समाप्त – 

मूळ कथा – नीला मलहम  

मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निळे मलम… भाग – १ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ निळे मलम… भाग – १ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

आकाशात ढग विखुरलेले होते. मन मात्र एका संतापाने लिप्त झालेलं, कोमेजलेलं…. का ही केवळ सुलभाच्या मनाचीच छाया होती. तिचा प्रत्येक दिवस असाच जातो. सकाळी सकाळी थकलेला भागलेला देह, ओरडणारा, किंचाळणारा दिवस. देहाबरोबर मनदेखील मरतं, तेव्हा कदाचित अशीच स्थिती होत असेल.

काल रात्री तिने एक स्वप्न बघितलं. एक असं स्वप्न ज्यात कुणी तरी आपल्या हातात तिच्या स्वप्नांना कैद करू इच्छित होतं आणि ती आपली स्वप्ने त्याच्या तावडीतून सोडवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत होती. खूप संघर्ष केल्यानंतर त्याच्या हातातून आपली स्वप्ने मोकळी करण्यात ती यशस्वी झाली. स्वप्नांबरोबर आपलं जीवनही स्वतंत्र करणं जमलं तिला. पळत पळत ती एका हिरव्या-गार मैदानात आली. तिथे उभं राहिल्यावर तिला निवांतपणा, शांतता जाणवू लागली. एका वृक्षाच्या सावलीत उभं राहून सुलभा विचार करू लागली, जर आज तिने आपली स्वप्ने वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, तर तिला ती नेहमीसाठी गमवावी लागली असती.

एवढ्यात घड्याळाचा गजर झाला. सहा वाजले होते. तिच्या आरामाची निर्धारित वेळ संपली होती. तिने गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि आपल्या तोंडावर पाण्याचे हबके मारले, तोच पेपर वाचता छतावरून सोमेशने ‘सुलभा…. सुलभा’ म्हणत पत्नीला हाक मारली.

‘जी… आले आले. ’ स्वैपाकघरात जाऊन गडबडीने तिने गॅस बंद केला. कमरेला खोचलेला पदर खांद्यावरून घेतला आणि भरभर पायर्‍या चढताना विचार करू लागली, ‘आता काय झालं? सकाळी सकाळीच आरडा ओरडा सुरू केलाय. प्रत्येक गोष्टीत काही तरी खोड काढायची सवयच आहे लाटसाहेबांना. ’             

‘काय झालं?’ जवळ येत घाबरत तिने विचारलं.

‘हा तुझाच फोटो आहे नं? ‘ सोमेशने रागानेच पेपर सुलभाकडे करत विचारलं.

‘हो!’ सुलभाने पेपरवरून धावती नजर फिरवत म्हंटलं॰

‘याचा अर्थ तुला माहीत होतं’

‘होय. मोबाईलवर सूचित केलं होतं त्यांनी. ’

‘असं कसं होऊ शकतं?’

‘काय कसं होऊ शकतं?’

‘हेच की साहित्य क्षेत्रात सुलभा बाजपेयीला, तिच्या गीतांसाठी महादेवी पुरस्कार प्रदान केला जातोय. वरिष्ठ साहित्याकारांचं म्हणणं आहे की त्यांच्या गीतात महादेवी जी यांच्या गीतांसारखं दु:ख, वेदना झळकते. ’ सोमेशने एका श्वासात सगळी बातमी वाचून दाखवली.

‘तू कधीपासून गीतं लिहायला लागलीस? तीही दर्दभरी गीतं. ’

‘जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून’

‘व्हॉट यू मीन….. जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून… म्हणजे? सरळ प्रश्न विचारलाय, सरळ सरळ उत्तर दे. ’           

‘सरळच तर उत्तर दिलय’. ’

‘म्हणजे माझ्याबरोबत तू खूश नाहीस. बंधन आहे हे तुझ्यासाठी ?’’

‘खरं सांगायचं तर हो. ’ सुलभाने दृढतापूर्वक म्हंटलं.

‘आधीच बोलली असतीस तर, हे बंधन तुला वागवावं लागलं नसतं. तुला स्वतंत्र केलं असतं. ’

‘बोलले असते, पण विचार केला, की कधी तरी तुम्हाला जाणीव होईल….. मग मुलं झाली. त्यांच्यासाठी हे बंधन स्वीकारावं लागलं. ’

‘घरात सगळया सुविधा असून तुला हे बंधन वाटतं. कोणत्या गोष्टीची  कमतरता आहे तुला इथे?’’

‘त्या गोष्टीची… ज्याच्यासाठी मुलगी आपलं माहेर विसरून, एका अनोळखी माणसाबरोबर एका न पाहिलेल्या प्रवासासाठी निघते. ’

‘बघतोय, हे साहित्य जरा जास्तच चढलय तुझ्या डोक्यावर. साधं उत्तर देताना इज्जत घटते तुझी. ’

‘सरळ साधं ऐकायचं असेल, तर ऐका. लहानपणी मीदेखील स्वप्नामधे एक राजकुमार पहिला होता. विचार केला होता, त्याच्याबरोबर जीवनातील सार्‍या खुशा वाटून घेईन. तो मला आपल्या प्रेमाने संभाळेल. मी त्याचा घर-संसार सांभाळेन. मुलांना वाढवेन. सौभाग्यवती असताना मरेन. याच इच्छेने जीवन संपवेन. ’

‘मग काय नाहीये तुझ्याजजवळ? घर, मुले, तुझं सौभाग्य, म्हणजे मी…. मग रडगाणं कशासाठी?’

‘रडणंच तर राहिलाय आता जीवनात. जेव्हा आई-बाबांनी जीवनाचा दोर तुमच्या हातात सोपवला, तेव्हा वाटलं होतं, तुम्ही माझे सहप्रवासी, माझा विचार करणारे माझ्या सुख-दु;खात सहभागी व्हाल, आपण एकामेकांच्या आत्म्याला स्पर्श करू. पण कुठे घडलं असं? आपले संबंध देहापुरतेच  सीमित राहिले. ‘  

‘तुला जरा  जास्तीचेच पंख लागले नाहीत ना?’

पंख तर केव्हाच आपली उड्डाण विसरले. हसत-खेळत जीवन जगावं, एवढीच इच्छा होती माझी, पण आपण तर जसा काही हसण्यावरच कर्फ्यू लावलात. ’

‘मग तोडायचास ना हा कर्फ्यू… कुणी आडवलं होतं. ’

‘हे केवळ तुम्ही पुरुषच म्हणू शकता. आई-बाबा आम्हा मुलींना चांगलं बनण्याची घुटी पाजूनच पाठवतात. काहीही असो, नकारात्मकतेत, सकारात्मकता शोधत रहा. पण आता थकले. चांगलं होण्याचा सूळ वागवताना आता मात्र थकले अगदी. मन उत्तर देऊ इच्छितं.

‘काय बोलतीयास, कळतय का तुला? ‘ सोमेश चिडला. तो आज सुलभाचे हे  नवीन रूप पाहून हैराण झाला होता.

‘आपण सरळ शब्दात बोलायची आज्ञा केलीत, मी आपल्या आज्ञेचे पालन केले. ’

‘तू जरा जास्तच  बोलतीयस असं नाही वाटत तुला?’

‘मी तर काही बोलूच इच्छ्त नव्हते. जेव्हापासून या घरात आले, आपणच बोलताय. आपण म्हणता त्याप्रमाणेच तर जगते आहे. आपल्या खांद्यावर आपल्या स्वप्नांचे शव ओढते आहे. मोकळेपणाने हसणंही आपल्याला पसंत नाही. माझं सारं कौशल्य देह सजवण्यात खर्च केलं आपल्यासाठी. …. आता त्या कौशल्याचाच उबग आलाय. ’

‘बस.. बस.. मी एवढंच विचारू इच्छितो, की हा लिहिण्याचा रोग का लावून घेतलास? याच्या माध्यमातून लोकांना तू आपलं दु:ख सांगू इच्छितेस?’

तेच तर सांगतीय, …. तुमच्या भीतीने संस्काराची भारी भक्कम चुनरी डोक्यावरून ओढून घेतली. मनपसंत स्वप्ने कधी बघितलीच नाहीत, उलट लहानपणाची सगळी स्वप्ने गोळा करून, मानाच्या अंधार कोठडीत ठेवून दिली. आपल्या नाराजीचा मुकुट नेहमीच डोक्यावर ठेवला. त्याची बोच आता टोचू लागलीय. आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला. ’

‘कोणता उपाय?’

‘निळे मलम.’

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा – नीला मलहम  

मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मृत्युपत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “मृत्युपत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं . तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी आठवत राहायची… 

….. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली.

तो दिवस आठवला.

 चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होत. तिने विचारलं

” काय करताय?”

”  महत्त्वाच काम करतोय..मृत्युपत्र लिहितोय..विचार करून ते लिहायच असत..”

” काय मृत्युपत्र..आत्ता …कशासाठी?”

” आत्ता नाही तर कधी  करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको”

” म्हणजे वाटणी का “

यावर तो जरा रागवलाच..

“नुसती वाटणी नसते ती… बरं ते जाऊदे..  उगीच काहीतरी विचारत बसु नको..तुला काय त्यातल समजणार ?एक वाजायला आलाय जेवायला वाढ “

ती गप्प बसली .खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा  काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं. नेहमीचच होतं ते .. त्याचं बोलणं तिने  मनावर घेतलं नाही. मनात  मात्र कुठेतरी वाईट वाटलच…

का कोण जाणे… पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होत..

आज लेक भेटायला आली .तेव्हा तिने विषय काढला .म्हणाली..

“मला पण मृत्युपत्र करायच आहे .”

“तुला ?…मृत्युपत्र ?…कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात ?” मुलीनी हसतच विचारलं..

तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती .पुढे म्हणाली ..

“अगं एक  महत्वाचं विचारायचं होतं मृत्यूपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं लागतं का ?ते बदलता येत नाही ना ?” … आईचा शांत संयमित  आवाज ऐकून लेकीच्या  लक्षात आलं…आई गंभीरपणे काही सांगते आहे..ती म्हणाली….

” हो नाही बदलता येत .पण आई असं का विचारते आहेस?”

” मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद.. पेन ..  घे लिहून …”

“कशाची वाटणी करणार आहेस ?काय आहे तुझ्याजवळ?”

लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं … ती तंद्रीतच बोलत होती …. 

“भावानी बहिणीला  वर्षातून एकदा माहेरपण करायचं..

राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं .त्याला ओवाळायचं .तबकात  अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील …भावाला  घरी बोलवायचं … गौरीला माहेरची सवाष्ण हवी ..नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची.. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं ..त्याला मदत करायची.. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं.  तिच्यावर माया करायची.. आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेनी  आपुलकीनी राहायचं … आत्या ,काकु,मामा ,मामी सगळी नाती जपायची .. एकोप्याने रहायच.. पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं …..”

एवढं बोलल्याने ती दमली.  मग श्वास घेतला.  थोडा वेळ थांबली.

लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती…आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…

”  तु विचारलस ना…माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ?खरंच ….काही नाही ग… मला वाटणी नाहीच करायची …तर तुमची जोडणी करायची आहे .

तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून  राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”

लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली .तिने आईचा हात हातात घेतला…त्यावर थोपटले .. आश्वासन दिल्यासारखे……लाखमोलाच सदविचारांचं धन आईनी वाटल होत..

दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते पण आत आले त्यांनीही तिचा हात हातात घेतला. चौघांचे डोळे भरून वाहत होते .

आता ती निश्चिंत झाली होती .

खूप दिवसांनी ती समाधानाने हसली.

मनात म्हणाली …

“ रामराया आता कधीही येरे न्यायला… मी तयार आहे..”

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print