सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ निळे मलम… भाग – १ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

आकाशात ढग विखुरलेले होते. मन मात्र एका संतापाने लिप्त झालेलं, कोमेजलेलं…. का ही केवळ सुलभाच्या मनाचीच छाया होती. तिचा प्रत्येक दिवस असाच जातो. सकाळी सकाळी थकलेला भागलेला देह, ओरडणारा, किंचाळणारा दिवस. देहाबरोबर मनदेखील मरतं, तेव्हा कदाचित अशीच स्थिती होत असेल.

काल रात्री तिने एक स्वप्न बघितलं. एक असं स्वप्न ज्यात कुणी तरी आपल्या हातात तिच्या स्वप्नांना कैद करू इच्छित होतं आणि ती आपली स्वप्ने त्याच्या तावडीतून सोडवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत होती. खूप संघर्ष केल्यानंतर त्याच्या हातातून आपली स्वप्ने मोकळी करण्यात ती यशस्वी झाली. स्वप्नांबरोबर आपलं जीवनही स्वतंत्र करणं जमलं तिला. पळत पळत ती एका हिरव्या-गार मैदानात आली. तिथे उभं राहिल्यावर तिला निवांतपणा, शांतता जाणवू लागली. एका वृक्षाच्या सावलीत उभं राहून सुलभा विचार करू लागली, जर आज तिने आपली स्वप्ने वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, तर तिला ती नेहमीसाठी गमवावी लागली असती.

एवढ्यात घड्याळाचा गजर झाला. सहा वाजले होते. तिच्या आरामाची निर्धारित वेळ संपली होती. तिने गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि आपल्या तोंडावर पाण्याचे हबके मारले, तोच पेपर वाचता छतावरून सोमेशने ‘सुलभा…. सुलभा’ म्हणत पत्नीला हाक मारली.

‘जी… आले आले. ’ स्वैपाकघरात जाऊन गडबडीने तिने गॅस बंद केला. कमरेला खोचलेला पदर खांद्यावरून घेतला आणि भरभर पायर्‍या चढताना विचार करू लागली, ‘आता काय झालं? सकाळी सकाळीच आरडा ओरडा सुरू केलाय. प्रत्येक गोष्टीत काही तरी खोड काढायची सवयच आहे लाटसाहेबांना. ’             

‘काय झालं?’ जवळ येत घाबरत तिने विचारलं.

‘हा तुझाच फोटो आहे नं? ‘ सोमेशने रागानेच पेपर सुलभाकडे करत विचारलं.

‘हो!’ सुलभाने पेपरवरून धावती नजर फिरवत म्हंटलं॰

‘याचा अर्थ तुला माहीत होतं’

‘होय. मोबाईलवर सूचित केलं होतं त्यांनी. ’

‘असं कसं होऊ शकतं?’

‘काय कसं होऊ शकतं?’

‘हेच की साहित्य क्षेत्रात सुलभा बाजपेयीला, तिच्या गीतांसाठी महादेवी पुरस्कार प्रदान केला जातोय. वरिष्ठ साहित्याकारांचं म्हणणं आहे की त्यांच्या गीतात महादेवी जी यांच्या गीतांसारखं दु:ख, वेदना झळकते. ’ सोमेशने एका श्वासात सगळी बातमी वाचून दाखवली.

‘तू कधीपासून गीतं लिहायला लागलीस? तीही दर्दभरी गीतं. ’

‘जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून’

‘व्हॉट यू मीन….. जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून… म्हणजे? सरळ प्रश्न विचारलाय, सरळ सरळ उत्तर दे. ’           

‘सरळच तर उत्तर दिलय’. ’

‘म्हणजे माझ्याबरोबत तू खूश नाहीस. बंधन आहे हे तुझ्यासाठी ?’’

‘खरं सांगायचं तर हो. ’ सुलभाने दृढतापूर्वक म्हंटलं.

‘आधीच बोलली असतीस तर, हे बंधन तुला वागवावं लागलं नसतं. तुला स्वतंत्र केलं असतं. ’

‘बोलले असते, पण विचार केला, की कधी तरी तुम्हाला जाणीव होईल….. मग मुलं झाली. त्यांच्यासाठी हे बंधन स्वीकारावं लागलं. ’

‘घरात सगळया सुविधा असून तुला हे बंधन वाटतं. कोणत्या गोष्टीची  कमतरता आहे तुला इथे?’’

‘त्या गोष्टीची… ज्याच्यासाठी मुलगी आपलं माहेर विसरून, एका अनोळखी माणसाबरोबर एका न पाहिलेल्या प्रवासासाठी निघते. ’

‘बघतोय, हे साहित्य जरा जास्तच चढलय तुझ्या डोक्यावर. साधं उत्तर देताना इज्जत घटते तुझी. ’

‘सरळ साधं ऐकायचं असेल, तर ऐका. लहानपणी मीदेखील स्वप्नामधे एक राजकुमार पहिला होता. विचार केला होता, त्याच्याबरोबर जीवनातील सार्‍या खुशा वाटून घेईन. तो मला आपल्या प्रेमाने संभाळेल. मी त्याचा घर-संसार सांभाळेन. मुलांना वाढवेन. सौभाग्यवती असताना मरेन. याच इच्छेने जीवन संपवेन. ’

‘मग काय नाहीये तुझ्याजजवळ? घर, मुले, तुझं सौभाग्य, म्हणजे मी…. मग रडगाणं कशासाठी?’

‘रडणंच तर राहिलाय आता जीवनात. जेव्हा आई-बाबांनी जीवनाचा दोर तुमच्या हातात सोपवला, तेव्हा वाटलं होतं, तुम्ही माझे सहप्रवासी, माझा विचार करणारे माझ्या सुख-दु;खात सहभागी व्हाल, आपण एकामेकांच्या आत्म्याला स्पर्श करू. पण कुठे घडलं असं? आपले संबंध देहापुरतेच  सीमित राहिले. ‘  

‘तुला जरा  जास्तीचेच पंख लागले नाहीत ना?’

पंख तर केव्हाच आपली उड्डाण विसरले. हसत-खेळत जीवन जगावं, एवढीच इच्छा होती माझी, पण आपण तर जसा काही हसण्यावरच कर्फ्यू लावलात. ’

‘मग तोडायचास ना हा कर्फ्यू… कुणी आडवलं होतं. ’

‘हे केवळ तुम्ही पुरुषच म्हणू शकता. आई-बाबा आम्हा मुलींना चांगलं बनण्याची घुटी पाजूनच पाठवतात. काहीही असो, नकारात्मकतेत, सकारात्मकता शोधत रहा. पण आता थकले. चांगलं होण्याचा सूळ वागवताना आता मात्र थकले अगदी. मन उत्तर देऊ इच्छितं.

‘काय बोलतीयास, कळतय का तुला? ‘ सोमेश चिडला. तो आज सुलभाचे हे  नवीन रूप पाहून हैराण झाला होता.

‘आपण सरळ शब्दात बोलायची आज्ञा केलीत, मी आपल्या आज्ञेचे पालन केले. ’

‘तू जरा जास्तच  बोलतीयस असं नाही वाटत तुला?’

‘मी तर काही बोलूच इच्छ्त नव्हते. जेव्हापासून या घरात आले, आपणच बोलताय. आपण म्हणता त्याप्रमाणेच तर जगते आहे. आपल्या खांद्यावर आपल्या स्वप्नांचे शव ओढते आहे. मोकळेपणाने हसणंही आपल्याला पसंत नाही. माझं सारं कौशल्य देह सजवण्यात खर्च केलं आपल्यासाठी. …. आता त्या कौशल्याचाच उबग आलाय. ’

‘बस.. बस.. मी एवढंच विचारू इच्छितो, की हा लिहिण्याचा रोग का लावून घेतलास? याच्या माध्यमातून लोकांना तू आपलं दु:ख सांगू इच्छितेस?’

तेच तर सांगतीय, …. तुमच्या भीतीने संस्काराची भारी भक्कम चुनरी डोक्यावरून ओढून घेतली. मनपसंत स्वप्ने कधी बघितलीच नाहीत, उलट लहानपणाची सगळी स्वप्ने गोळा करून, मानाच्या अंधार कोठडीत ठेवून दिली. आपल्या नाराजीचा मुकुट नेहमीच डोक्यावर ठेवला. त्याची बोच आता टोचू लागलीय. आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला. ’

‘कोणता उपाय?’

‘निळे मलम.’

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा – नीला मलहम  

मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments