मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

१७ सप्टेंबर १९८८.. सकाळचे कार्यक्रम नुकतेच आटोपले होते. तात्यासाहेब आपल्या आरामखुर्चीत बसुन वर्तमान पत्र चाळत होते.बाईंच्या तसबिरी समोर लावलेल्या उदबत्तीचा खोलीत मंद दरवळ पसरला होता..मुखाने नेहमीप्रमाणे ‘श्रीराम‌..’असं सुरु होतं.

तोच जिल्हाधिकारी कार्यालयातुन एक कर्मचारी आला.. आणि साहेब येत आहेत.. आपण घरीच आहात ना..हे पहायला मला पाठवलं होतं.. तात्यांनी मान डोलावली..

थोड्या वेळात जिल्हाधिकारी सारंगी साहेब.. आणि कमिशनर अजय दुआ आले.

“अभिनंदन.. आपले नाव ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहे..”

आणि मग १८ सप्टेंबरच्या सर्वच वर्तमान पत्रात ही बातमी अग्रभागी छापली गेली.तात्यासाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

☆ ☆ ☆ ☆

ज्ञानपीठ कुणाला मिळतं?

ते ठरवण्यासाठी प्रत्येक भाषेतील तीन जणांची एक समिती असते.तिला L.A.C.म्हणतात.म्हणजे लॅंग्वेज ॲडव्हायजरी कमिटी.ही कमिटी आपापल्या भाषेतील एका लेखकाची शिफारस करते.. ज्ञानपीठ साठी.

मराठी साठी असलेल्या या कमिटीतील तिघे जण होते..बाळ गाडगीळ,म‌.द.हातकणंगलेकर, आणि प्रा.सरोजिनी वैद्य‌. या कमिटीने कुसुमाग्रजांच्या नावाची कधीच शिफारस केली नाही.आलटुन पालटुन त्याच त्या तीन नावांची शिफारस करत होती.ती तीन नांवें म्हणजे..पु.ल..विंदा..आणि गंगाधर गाडगीळ.

तर त्या वेळी केंद्रीय मंत्री पी.व्ही‌.नरसिंहराव हे ज्ञानपीठचे अध्यक्ष होते.महाराष्ट्र टाईम्स चे अशोक जैन त्यावेळी दिल्लीत होते.एका भेटीत ते नरसिंह राव यांना म्हणाले..

“जरा आमच्या मराठीकडे बघा एकदा. ‌कितीतरी वर्षात ज्ञानपीठ मराठीकडे आलं नाही.या सन्मानाला योग्य असे कुसुमाग्रज आहेत आमच्या कडे.”

हे ऐकून नरसिंह राव चकीत झाले.त्यांनी विचारलं..

“अहो, पण कुसुमाग्रज तर केंव्हाच वारले ना?”

अशोक जैन तर थक्कच झाले.म्हणाले..

“नाही हो.. कुसुमाग्रज छानपैकी जिवंत आहेत नाशकात.”

त्यानंतर साधारण दोन महिन्यांनी लेखक रवींद्र पिंगे दिल्लीत गेले होते.तिथे त्यांना डॉ.प्रभाकर माचवे भेटले.पिंग्यांना ते म्हणाले..

“अनायासे नरसिंह राव ज्ञानपीठचे अध्यक्ष आहेत.ते मराठी उत्तम जाणतात.तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर तारांचा भडीमार करा.. आम्ही दिल्लीतली बाजु सांभाळतो.मी स्वतः नरसिंहरावांशी बोललोय.डॉ.निशिकांत मिरजकरांनी कुसुमाग्रजांची थोरवी वर्णन करणारा इंग्रजी लेख लिहीला आहे.आपली पण लॉबी झाली पाहिजे.आपण प्रयत्न केले पाहिजे.. प्रत्येक वेळी आपले कुसुमाग्रज उपेक्षित रहातात.”

त्यानंतर एकदा L.A.C.चे प्रमुख बाळ गाडगीळ यांची आणि नरसिंह राव यांची दिल्लीत एका भोजन प्रसंगी भेट झाली.गाडगीळांनी ज्ञानपीठाचा विषय काढला.नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ मराठी कडे यावं असं तुम्हाला खरंच वाटत ना !मग तुम्ही एक ठराव लिहून द्या.त्यात कवी कुसुमाग्रज यांच्या नावाची शिफारस करा”

बाळ गाडगीळ पेचात पडले.कारण त्यांच्या कमिटीने कुसुमाग्रज यांच्या नावाचा कधी विचारच केला नव्हता.ते नाव कधीही कुणी सुचवलं नव्हतं.तसं त्यांनी नरसिंह राव यांना सांगितलं.शांत पण घट्ट स्वरात नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ सन्मान मराठीलाच मिळावा असं तुम्हाला खरंच वाटलं ना?मग आत्ताच्या आत्ता मला लिहून द्या..

L.A.C. कुसुमाग्रज यांच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ कडे करीत आहे.”

बाळ गाडगीळ यांनी तत्परतेने तसं लिहुन दिलं.लागलीच नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद बोलावली.अक्षरश: पाचच मिनिटांत नरसिंह रावांनी जाहीर केलं..

यंदाचा ज्ञानपीठ सन्मान कवी कुसुमाग्रज यांना जाहीर होत आहे.

आणि मग जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं दिपोत्सव सुरु झाला.तात्यासाहेबांना जितका आनंद झाला.. त्यापेक्षाही अधिक आनंद समस्त मराठी बांधवांना झाला.. आपल्या घरातच तो सन्मान आला हीच भावना प्रत्येकाची होती.

तात्यांचे एकामागून एक सत्कार समारंभ सुरु झाले. मुंबईत ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान समारंभ पण झाला.बाकी होता तो नाशिककरांकडुन होणारा सत्कार.तात्यांनी सुरुवातीला तर नकारच दिला.अखेर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रस्थापनेची घोषणा करण्यासाठी म्हणून एक समारंभ आयोजित केला गेला.या देखण्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते..प्रा.वसंत कानेटकर.

या घरच्या सत्काराला उत्तर देताना तात्यासाहेब म्हणाले..

“ज्ञानपीठाच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातुन हजारो रसिकांच्या प्रेमाची बरसात माझ्यावर झाली,ती मला खरोखरच महत्वाची वाटते.ज्ञानपीठालाही कवेत घेणारा प्रेमपीठाचा हा जो पुरस्कार मला मिळाला,यात माझ्या जीवनाची सार्थक झालं असं मला खरोखर वाटतं आणि आजचा हा समारंभ म्हणजे या सत्कारपर्वाचा कलशाध्याय आहे.”

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे आवडते साहित्यिक… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ माझे आवडते साहित्यिक ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

साहित्यिक प्रेमी,  बंधू भागिनींनो 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके कवी , ” विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज” यांचा जन्मदिवस . त्यांची स्मृती म्हणून आजच्या मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो . कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम पण केले . 

देश पातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी अनेक नामवंत  संतापासून , पंतापर्यंत आणि पंतापासून तंतापर्यंत, तसेच अनेक नामवंत साहित्यिकानी यात मोलाची भर घातली . अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेलेत. त्यांनी पण मराठी भाषा समृध्द केलीच .

पण मला अलीकडच्या काळातील, पुण्यातील प्रसिद्ध साहित्यिक ,स्त्रीरोगतज्ज्ञ “प्रा. डॉ. निशिकांत श्रोत्री “यांच्या बद्दल आज  तुम्हाला सांगायला आवडेल . व मराठी भाषेचा गौरव दिन , खऱ्या अर्थाने साजरा होईल असेच वाटते . हो ! पण माझी अवस्था आज काजव्याने सूर्याला ओवळण्या सारखी झाली आहे ! ! 

।। क्व च सूर्य वंश , क्व च अल्पा विषयामती ।।

मुळातच डॉ श्रोत्री यांचा जन्म पुण्यात पुण्य नगरीत झाला .  सुसंस्कारीत , ऋजु आणि बुद्धिमान घराण्यात , श्रोत्री कुटुंबियांत 1945  ला   झाला . जन्मजात कलेचा वारसा ज्यांना लाभला , ते डॉ निशिकांत श्रोत्री सर , साहित्य ,कला आणि नाट्य क्षेत्रात आपले नाव गाजवलेच . वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी जोरदार मुसंडी मारली . वैद्यकीय क्षेत्रात दुर्लक्ष नको म्हणून ह्या नाट्य क्षेत्रातील अभिनेत्याने , रंगभूमीवरून रजा घेतली ! 

कला क्षेत्राशी फारकत घेणे त्यांना रुचले नसावे . म्हणूनच आकाशवाणीवर नाटके , भावगीते रचना याद्वारे त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली . प्रसिध्द संगीतकार श्री गजानन वाटावे यांनी , डॉ श्रोत्री सरांच्या भावगीताना चाली लावल्या . त्यांचे बालपणीचे किस्से पण असेच नवल वाटावे असे आहेत .

लहानपणीच त्यांचे पाय पाळण्यात दिसू लागले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . मोंट्सरित असतानाच त्यांनी आपली बडबड गीत स्वतः रचून म्हणण्यास सुरुवात केली होतीच . घरीं त्यांचे आजोबा दादा भट ह्यांचे मार्गदर्शन पण होतेच . दादा भट हे कडक शिस्तीचे ! त्यांचा अभ्यास , व्यायाम , अन परवचा संस्कृत पाठांतर हे अगदी ठराविक वेळेत होत होते . एक शिस्तबद्ध वळण अन मुळात डॉ श्रोत्री हे अभ्यासू अन हुशार व्यक्तिमत्व आजोबांच्या देखरेखीखाली तावून सुलाखून निघालं . इयत्ता पाचवी मध्ये त्यांनी “कार्तिकस्वामीच लग्न ” ही विनोदी कथा लिहली . अन तेथूनच त्यांच्या काव्य साहित्याचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत ! त्यांच्या सिध्द हस्त लेखणीला माता सरस्वतीचा वरद हस्त लाभला होता.

त्यांनी मेरिटमध्ये बी जे मेडिकल  कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळाला , अन त्यांचं साहित्य तसेच नाट्य क्षेत्र पण बहरून आलं . पु ल देशपांडे यांचे “तुझं आहे तुझपाशीं ” ह्या नाटकात श्यामची भूमिका केली . अशी पाखरे येती , वाजे पाउल आपले अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या . अन येथेच पु ल देशपांडे ह्यांच्याशी ओळख झाली . नाटकानिमित्त डॉ श्रोत्री यांचे पु ल च्या घरी येणें जाणे सुरू झाले . काही नाटक पुणे रेडिओ स्टेशनवर पण प्रसारित झाली . बी जे आर्ट सर्कल हे त्यावेळी पुण्यातील सांस्कृतिक माहेरघर मिळाले खरे , पण डॉ श्रोत्री यांनी आपलं शैक्षणिक प्रगती सुध्दा उंचीवर नेऊन ठेवली .ते सतत विध्यापिठात प्रथम स्थान घेत , साहित्य क्रांती पण केली . 

एम डी गायनाकोलोजी मध्ये त्यांनी सर्व विध्यापिठात सुध्दा प्रथम श्रेणी घेतली . पदवी उत्तर शिक्षणातच त्यांचा डॉ  देशपांडे यांच्याशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर विवाहात कधी जाहले ते कळलं पण नाही . 

त्यांची ग्रंथ संपदा पण तोंडात बोट घालणारी आहे . 

कथा संग्रह , कथाकथन , काव्य संग्रह , लेख , ललीतलेख , कादंबऱ्या ह्या वाचनीय , सहज सुलभ प्रतिभेला गवसणी घालणाऱ्या वाटतात . हे सर्व कमी म्हणून की काय , त्यांनी संपूर्ण भगवद्गीता ह्यांचे काव्यमय भाषांतर तर केलेच त्याशिवाय , ऋग्वेद सारखा कठीण प्राय वेद सुध्दा काव्यमय भाषांतर करून प्रसिध्द गायका कडून गाऊन घेतला . ह्या सर्व ऋचांचे त्यांनी यु ट्यूब वर पण प्रक्षेपण केलं . विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे,रुक्ष अन क्लिष्ट अश्या  वैद्यकीय क्षेत्रात राहून 

जे कार्य केले ते खचितच , वखण्याण्यासारखे आहेच . शिवाय आचम्बीत करणारे आहे एवढे खरे . ऋजु स्वभावाचे असणारे डॉ . श्रोत्री ह्यांच्या प्रतिभेची गगन भरारी त्यांच्या काव्यातच नव्हेतर कथा , कथा सादरीकरण , कादंबरीत स्पष्टपणे दिसून येते . त्यांची ग्रंथ संपदा खाली दिलेली आहेच . त्यावर नुसता दृष्टी क्षेप टाकला तरी कल्पना येते . एवढी ग्रंथ संपदा असूनही ते आज पण साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत . साहित्यात नवनवीन प्रयोग पण करीत आहेत . त्यांच्या कार्याला माझा त्रिवार मुजरा तर आहेच . त्यांना दीर्घकाळ आयुआरोग्य मिळो व त्यांच्या हातून आणखी साहित्य सेवा घडो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी आपली रजा घेत आहे . खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरवंदिन साजरा केल्याचा आंनद आज मला मिळतो आहे हे पण नसे थोडके .

डॉ निशिकांत श्रोत्री सरांची ग्रंथ संपदा 

कादंबरी

 

अनिता   

दीड दिवस 

 ड्युशने

स्वप्नातल्या कळ्यानो

 सिद्धयोगी

वाटचाल

निवडुंगाचे फुल

हकनाक

सुवर्ण सिध्दी

शीतल छाया बाभळीची

अनोळखी

सौदामिनी

कर्मभूमी 

शिखंडी

पिसाट

कुंचले घेऊन हाती

महायोगी

राखेतील ठिणगी

उपासना 

शांतीवन

पद्मसंभव

साडेसाती 

शिर्डी ते पुटपार्थी

नादब्रह्म 

संरक्षीता

 

कथा संग्रह 

——–

ब्रह्मास्त्र

सुवर्ण पुष्कराज

डायग्नोसी

 

काव्य संग्रह 

——–

मनाची पिल्लं

साई अभंगवाणी

शब्दांची वादळ

अर्चना

गीतसत्य साई 

श्री साईनाथ चरित्र

निशिगंध

मुक्तायन

 

वैद्यकीय

——-

कुटुंबनियोजन आणि वैद्यकीय गर्भपात

स्त्री आणि आरोग्य

एड्स सेक्स सेक्सउल प्रशिक्षण

यौवनावस्था म्हणजे काय

सुरक्षित प्रसूती

हेल्थ डायरी

Surgical Principles in

Obstetrics & Gyaaecology

ध्वनिफीत 

——–

भजनांजली

सर्वधर्म परमेश्वर

मुलगी का मुलगा

नव्या युगाचा वसा

 

आकाशवाणी व दूरदर्शन

मान्यताप्राप्त अभिनेता

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !

कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

सन १९३७ !! फिलीप फॉक्स नामक ब्रिटीशाने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई महाराज साहेबांबद्दल अपमानकारक लेखन केलेलं होतं. ते लिखाण वाचून एका तरूणाचं मन बंड करून उठलं. या विषयावर अभ्यास करुन, त्यावर लेखन करुन, ‘ सत्य काय ’ ते जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी त्याने असंख्य ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळली. दुर्दैवाने त्या वेळच्या ब्रिटीश अंमलाखाली अनेक साधनं आधीच नष्ट झालेली होती. त्याच वर्षी त्याने झाशी, कानपूर, ग्वाल्हेर, ब्रह्मावर्तासारख्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. कागदपत्रं शोधून अभ्यासली, तपासली. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर कित्येक दशकांचा काळ उलटून गेलेला होता. १८५७ चे बंड व त्या काळचा इतिहास समजणं दुरापास्त झालेलं होतं. लॉर्ड जॉर्ज कॉनवेल या ब्रिटीशाने लिहिलं होतं – ” १८५७ चा खरा इतिहास या पुढे कधी बाहेर येईल किंवा कोणाला समजेल ही आशा व्यर्थ आहे “. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर अभ्यास करुन झाशीच्या राणी साहेब आणि १८५८ विषयाबद्दलची जास्तीतजास्त योग्य ती माहिती ‘ केसरी ’ मध्ये लेखमाला लिहून जनमानसापर्यंत पोचवायचं काम केलेलं अजोड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला. काशिनाथ हे तात्यासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव. स्वभावाने थोडे अबोल, मितभाषी पण जुन्या काळात मनस्वी रमणारे काशिनाथ इतिहासाबद्दल रूची बाळगून होते. त्यांचा ‘ १८५७ ’ व  ‘ नेपोलियन ’ या दोन विषयांवरचा अभ्यास थक्क करून टाकणारा होता. बी.ए. व वकिलीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पार पाडतानाही त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला, त्यात संशोधन केलं, हे खरोखर विशेष!! ॲडव्होकेट होत असतानाच त्यांनी ‘ज्योतिर्भूषण’ ही पदवीदेखील मिळवलेली होती ज्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

अतिशय पितृभक्त असलेल्या काशिनाथ केळकरांनी वडिलांचा लेखनवारसा पुढे चालवत ‘केसरी’ वृत्तपत्रामधून विपुल लिखाण केलं. त्यांनी केलेली वाङ्मय सेवा व साहित्य निर्मिती बहुत दखलपात्र आहे. “ आपल्या वडिलांचे लेखणीशिवाय आपण दुसऱ्या कोणासही गुरू मानले नाही ” असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, ” वाळवंटातील पाऊले ” मध्ये नमूद केलेलं आहे. जाज्वल्य पितृभक्तीचा झळाळता अभिमान त्यांनी आयुष्यभर बाळगल्याचे अशा वाक्यांतून सतत दिसत राहते. त्यांच्या जन्मपत्रिकेतला माणसाला प्रसिद्धी बहाल करणारा ग्रह मात्र अयोग्य घरात पडलेला होता. प्रसिद्धी मिळाली नाही तरीही या नादिष्ट लेखकानं केसरी पाठोपाठ ‘ सह्याद्री ’मध्येही पुष्कळ लेखन केलं.

स्वतःच्या लिखाण कामाखेरीज त्यांनी आपल्या वडिलांच्या हजारो पृष्ठांच्या अप्रकाशित साहित्याचे सहा ग्रंथ प्रकाशित केले. काशिनाथ केळकरांची ही कामगिरी अतिशय बहुमूल्य स्वरूपाची आहे. ” केळकर निबंधमाला ” या साक्षेपाने संपादित व प्रकाशित केलेला त्यांचा हा ग्रंथ ‘ केळकर अभ्यासकांना ’ न डावलता येण्याजोगा आहे. श्री. न. चिं. केळकर यांनी आपल्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे हक्क काशिनाथांकडे दिलेले होते. पूर्वपरवानगी शिवाय त्या साहित्याचा वापर करणाऱ्यांना ॲडव्होकेट काशिनाथांनी स्वतःच्या वकिली ज्ञानाची चुणूकही चांगलीच दाखवलेली होती.

घरी ते अनेकांच्या जन्म कुंडल्या तयार करून भविष्यकथन करीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या अंताचं त्यांनी वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं होतं. लेखन व इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत ते उत्तम चित्रही काढायचे. स्वतःच्या वडिलांचं व नेपोलियनचंही त्यांनी चित्र काढलं होतं. हे एक विशेषच म्हणावं लागेल. ऐतिहासिक लेखनामध्येही त्यांनी जुनी चित्रं शोधून आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करुन दिलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं चित्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

बापूंच्या आत्मचरित्राखेरीज महत्त्वाच्या इतर वाचनीय पुस्तकांची यादी खाली देत आहे:-

रामायणावरील काही विचार (१९२८)

शेतीवाडीची आर्थिक परीक्षा (१९३५)

हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (१९३२)

नेपोलियन व हिटलर (१९४६)

नेपोलियन व्यक्तीदर्शन (१९४६)

शमीपूजन (१९४७)

‘दोन घटका मनोरंजन’ हा त्यांचा निवडक लेख संग्रहही खूप मनोरंजक आहे. 

‘नेपोलियन’ व ‘१८५७’ या दोन विषयांवर बापू तासन्-तास बोलत. इतर कोणी नेपोलियनवर अभ्यास वा लिखाण केलं तर ते वाचून आवर्जून प्रतिक्रिया देत. थोर इतिहास अभ्यासक कै. म. श्री. दिक्षित यांच्या संग्रहामध्ये बापूंनी पाठवलेलं असंच एक ‘ शाबासकी पत्र ’ दिसून येतं.

श्री. न. चिं. केळकर यांचे अनेक गुण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी, काशिनाथ व यशवंत यांनी, अंगी बाणवले. वडिलांनी बांधलेलं घर त्यांनी जिवापाड सांभाळलं. बापू वयाच्या ८२व्या वर्षी १० एप्रिल १९८२ रोजी देवाघरी गेले.

आज २५ फेब्रुवारी! बापूंचा १२४ वा जन्मदिवस!!

अतिशय विपुल काम, संशोधन आणि लेखन केलेले, वडिलांची किर्ती आपल्या कामांमधून वृद्धिंगत करणारे कै. काशिनाथ नरसिंह केळकर हे विस्मृतीत गेलेले इतिहास अभ्यासक आज आपणा सर्वांसमोर आणत आहे. माझ्या अल्पशा लेखनसेवेतून या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करतो.

गेल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून बापूंचा जुना दुर्मिळ फोटो मिळवू शकलो आणि सर्वांचा समोर आणू शकलो हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही मला.

लेखक : श्री  नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दास नवमी… — ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

दास नवमी… ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री समर्थ रामदास स्वामी महानिर्वाणदिन माघ कृष्ण ९, शके १६०३ चैत्र शुक्ल ९ शके १५३० – रामनवमी या शुभमुहूर्तावर त्यांचा जन्म झाला त्याचे नांव नारायण ठेवले.हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.

वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते.

सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, “नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे.” हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, “नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?” त्यावर नारायणाने उत्तर दिले, “आई, चिंता करीतो विश्वाची”

नारायणाने मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला.

वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले.

नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले.

श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराण श्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच “अनुदिनी अनुतापे तापलो रामराया” अशी करुणाष्टके प्रगटली.

ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले.

श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे थोडी शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. वाई येथे मारुतीस्थापना करून पिटके, थिटे, चित्राव यांना अनुग्रह दिला नंतर माहुली व जरंडेश्वर येथे काही दिवस राहीले. शहापूर येथे सतीबाई शहापूरकर यांना अनुग्रह देऊन त्यांच्यासाठी चुन्याचा मारुती स्थापन केला. समर्थ स्थापित ११ मारुतीतील शहापूरचा हा पहिला मारुती. यानंतर क-हाड, मिरज, कोल्हापूर या भागात अक्का, वेण्णा, कल्याण व दत्तात्रेय हे शिष्य समर्थांना मिळाले.

उंब्रज येथे मारुती स्थापना करून समर्थ पंढरपूर येथे गेले. तेथे तुकाराम महाराजांची भेट झाली. परत येताना मेथवडेकर यांना अनुग्रह दिला. चाफळ येथील मठाचे कार्य दिवाकर गोसावींकडे सोपवले. माजगांव येथे मारुतीस्थापना करून समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले.

१६७६ साली समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती.

त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी १६८२ या दिवशी तंजावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले

माझी काया आणि वाणी ।

गेली म्हणाल अंत:करणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥

 

आत्माराम दासबोध ।

माझे स्वरुप स्वत:सिद्ध ।

असता न करावा हो खेद । भक्त जनीं ॥

माघ कृष्ण ९ , शके १६०३, (२२ जानेवारी, १६८२ ) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले.

ज्याठिकाणी श्रीसमर्थांवर अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी राममंदिर व तळघरात समाधीमंदिर बांधले.

त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला.

समर्थानी दासबोध आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी,काही स्‍फूटरचना, भीमरूपी- मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या रचल्या.

सोबत करुणाष्टकांची पी.डी.एफ. ची लिंक देतो आहे .

http://www.samarthramdas400.in/literature/karunashtake.pdf

शेवट करताना एवढेच म्हणावेसे वाटते

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।

असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।

जय जय रघुवीर समर्थ.

(संदर्भ :श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांची वेबसाईट) 

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमजवळ समुद्र सपाटीपासून आठशे फूट  उंच असलेल्या सुरेख व अप्रतिम  डोंगराचे नाव आहे  सिंहाचलम…!  सिंह आणि अचलम( पर्वत) म्हणजे सिंहाचलम..! सिंहाचा पर्वत ..!  समुद्रातीरावरच्या आंध्र प्रदेशातल्या  उत्तर विशाखापट्टणम पासून केवळ सोळा किलोमीटरवर  जवळ एक अप्रतिम असा पर्वत आहे आणि या पहाडावर एक सुरेख अनेक वृक्षांनी बहरलेले लहानसे स्वच्छ सुंदर शहरच आहे.पहाडा वरच्या रम्य वनश्रीत वसलेली जणूकाही देवभूमीच..! या उंच मार्गावर अननस,आंबे व अनेक फळांची व फुलांच्या झाडांची नुसती बहार आहे. या अनेक वृक्षांखाली मोठमोठ्या दगडी शिला स्थापित आहे आणि अनेक भाविक पर्यटक येथे दर्शना अगोदर नंतर  या सिंहाचलम पर्वतावर विश्रांती घेत असतात. हा पर्वत म्हणजे प्रभु नृसिंहाचे निवासस्थान मानले जाते.भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरिता प्रभू नृसिंह प्रगट झाले अशी अनादि काळापासून पारंपारिक मान्यता आहे आणि आपले बालपण अशा गोष्टीत रमून गेले होते.

लुनार वंशाचे ऋषि पुरुरवा हे आपली पत्नी उर्वशी सोबत वायु भ्रमण करत असताना एका विशिष्ट नैसर्गिक शक्तीने प्रभावित होऊन या सिंहाचलम पर्वतावर पोहोचले व त्यांना  एक विष्णूची प्रतिमा/मूर्ती  डोंगरात पुरलेली दिसली. ती मूर्ति काढून धुळ साफ करताना  भगवंताची आकाशवाणी झाली .मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन वर्षातून फक्त  एकदा भक्तांना मुळ मूर्तीचे दर्शन घडवावे व भक्तांचे कल्याण करावे.ऋषि पुरुरवा यांनी ही भगवंताची  आज्ञा मानून या शोधलेल्या ठिकाणी प्रतिमा /मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि भक्तांचा ओघ सुरू झाला. आज येथे भव्यदिव्य  श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात संपूर्ण चंदनाचा लेप असलेली  नरसिंहाची मूर्ती बघायला मिळते.या मंदिराची विशेषता अशी की येथे भगवान विष्णु हे वराह आणि नृसिंहच्या संयुक्त अवतारात लक्ष्मीसोबत स्थापित झालेले आहे आणि याची स्थापना भक्त प्रल्हादाने केली आहे असे मानल्या जाते.हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भक्त प्रल्हादाने हे मंदिर बांधले आणि ते काळाच्या ओघात या पहाडात गडप झाले आणि ऋषि पुरुरवा यांच्या दृष्टीस पडले.आतले मंदिर अतिशय भव्य असून बघितल्या बरोबर प्राचीनत्व जाणवते . मंदिरातले वातावरण अत्यंत भारावलेले असून मंद दिव्यांच्या आराशीची एक दिव्य झळाळी चन्दन मूर्ती समोर व मंदिरात दिसते.मूर्ती जवळ प्रवेश मिळतो. अकराव्या शताब्दीत मुळ मंदिराचे  गर्भगृह बांधल्या गेले असे समजते. विष्णूच्या  “वराह नरसिंह” रूपातले हे मंदिर आहे व इथल्या अनेक मंदिरात प्रत्येक खांबावर मूर्तीकलेचा प्राचीन  कलात्मक आविष्कार  बघायला मिळतो आणि त्या कलावंतांना दाद द्यावीशी वाटते. . वर्षभर मूर्ती चन्दन लेपाने झाकलेली असते आणि पुजारी पाटा वरवंट्यावर चंदनाचा लेप तयार करताना मंदिर परिसरात दिसतात. येथील मुख्य उत्सव चैत्र शुद्ध एकादशीला होणारा  “वार्षिक कल्याणम” आणि वैशाखातल्या तिसर्‍या दिवशीची “चन्दन” यात्रा असते  .याला “ चंदनोत्सव ” म्हणतात. मंदिरात कपाळावर चन्दन लाऊन चंदनाचा प्रसाद वाटला जातो. वैशाखातल्या अक्षयतृतीयेला संपूर्ण सिंहाचलमचे महोत्सवाचे  दृश्य बघण्यासारखे असते आणि देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. अक्षयतृतीयेच्या  दिवशी भगवान लक्ष्मीनृसिंहाचा ओल्या चन्दनाने अत्यंत आकर्षक शृंगार केल्या जातो. भगवंताचे वास्तविक स्वरूप केवळ याच एका दिवशी बघायला मिळते.

असुर शक्तिची संस्कृती  शक्तिशाली होत असताना असुर राज हिरण्यकश्यपू व कयाधुच्या पोटी विष्णुभक्त  प्रल्हादाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचे  वरदान असल्याने उत्तरप्रदेशातल्या हरदोईचा हा राजा हिरण्यकशपु  निरंकुश झाला होता.या राजाच्या  आदेशानुसार कुणीही राज्यात  विष्णुची भक्ति करू शकत नव्हते. पण पुत्र  भक्त प्रल्हादाची भगवान विष्णुवर  अतूट श्रद्धा असल्याने क्रोधित होऊन राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि बहीण होलीकाने या कपटात त्याला  मदत केले. होलिकेला आगीपासून संरक्षण असल्याने ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली परतू भगवंताच्या कृपेने प्रल्हादाला काहीच न होता होलीका भस्म  झाली आणि दुसर्‍याच  दिवशी भगवान नरसिंहाने विष्णुचे रूप घेऊन हिरण्यकशपुला मारले आणि प्रजेला अत्याचारा पासून मुक्त केले.ही घटना मात्र हरदोई येथे घडली असे समजते तर काही अभ्यासकांच्या मते ही घटना सिंहाचलमच्या पहाडावर  घडल्याचे सांगितल्या जाते.याची आठवण म्हणून होलिका दहन उत्सत्वाला हरदोइ पासून सुरवात झाली.  हिरण्यकश्यपुचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्याचा आणि तो तेथला राजा सुद्धा होता ..!   पण अत्यंत कठोर  तपस्येने व  भक्तीने त्याने ब्रंहादेवाकडून विचित्र वर मागून जवळपास अमरत्व प्राप्त केले. त्याला असे वरदान होते की कुठलाच मनुष्य,पशु, दैत्य, देवता, नाग, प्राणी, यांच्या कडून आकाश आणि जमिनीवर  मृत्यु येऊ नये. तसेच घरात व बाहेर , दिवसा व रात्री सुद्धा मृत्यु येऊ नये .पण भगवान विष्णुने नृसिंहाचे(ना स्त्री ना पुरुष)  असे रूप घेऊन त्याचा  अंत हरदोईच्या पहाडा वरील उंचीवरच्या  महालाच्या दरवाज्यात ऐन सायंकाळी केला आणि हिरण्यकशपुचे वरदान सुद्धा कायम राहिले.हिरण्यकश्यपूला मारल्यावर अनेक दिवसपर्यंत नृसिंहाचा क्रोध कायम होता व भक्त प्रल्हादाने हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. हाच क्रोधाग्नी शांत करण्याकरिता ते या  डोंगरावर  आले व “सिंहाचलम” हे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले . हरदोईला हिरण्यकशपुच्या किल्ल्यांचे काही अवशेष अजूनही बघायला मिळतात असे समजते. “हरिद्रोह” म्हणजे हरीचा द्रोह करणारा हे नाव हिरण्यकशपुने  ठेवले कारण तो हरी सोबत नेहमी द्रोह करायचा व पुढे त्याचे  हरदोई झाले.तर काही  अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार येथे हरीचे दोन अवतार झाले आणि ते  म्हणजे नृसिंह आणि वामन..! हरीने दोन वेळा येथे अवतार घेतले म्हणून याला “हरिद्वय”म्हणतात ..पुढे त्याचे हरदोई झाले अशीही मान्यता आहे . .हरदोईला हिरण्यकश्यपुची नगरी मानल्या जाते.प्रल्हाद कुंड व प्रल्हाद किल्ला व  नृसिंह मंदिर आजही हरदोईला बघायला मिळतात. याच्या वरून सिंहाचलम व हरदोई ही दोन्ही स्थळे प्रभु नृसिंहाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.भारतामध्ये नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत पण सिंहाचलमला नृसिंहाचे घर म्हटल्या जाते.         

पद्म पुराणानुसार प्राचीन काळात वैशाख महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह प्रकट झाल्याने हा त्यांचा जन्मदिवस मानला  जातो. 

असे हे भक्त प्रल्हाद व प्रभू नृसिंहाचे निवासस्थान   “नृसिंहाचलम” ..! पण काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन नृसिंहाचलम चे आज “सिंहाचलम” झाले ..!

लेखक :श्री श्रीकांत पवनीकर

पर्यटन लेखक, नागपूर.  

मो -9423683250

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘परीक्षा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘परीक्षा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. 

शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला. आता आली पंचाईत. त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला काही हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला. डायरेक्टर साहेब तर हादरुनच गेले. ब्लॅकबेरी घेण्याचा गाढवपणा केलाच आहे तर आणखी एक गाढवपणा करुया म्हणून एकेदिवशी त्यांनी आपली कार जुहू मार्केटच्या रस्त्यावरल्या एका टपरीवजा दुकानासमोर थांबवली.

दुकानावर अस्खलित इंग्रजीत “Cellphoon reapars” अशी पाटी लिहिली होती. तरीही धाडसाने शेखर कपूर दुकानाकडे आले. त्या कळकट दुकानात हाडकुळासा ११-१२ वर्षाचा पोर मळकट, फाटकी जीन्स आणि टीशर्ट घालून उभा होता. “ ब्लॅकबेरी ठीक कर पावोगे?,” कपूर साहेबांनी त्या पोराला अविश्वासाने विचारले. 

“ बिलकुल.. क्यों नहीं,” तो फाटका पोरगा आत्मविश्वासाने म्हणाला. तो ११-१२ वर्षाचा पोर आणि त्याचा १८-१९ वर्षाचा मोठा भाऊ या दोघांनी मिळून ब्लॅकबेरीचा खराब झालेला पार्ट बदलला आणि अवघ्या पाच सहा मिनिटात फोन ठीक करुन दिला. 

“ कितना देना है ?”

“पाचसो.”

आठवडाभर वाट पाहणे आणि तीस हजाराच्या तुलनेत ही फारच छोटी रक्कम होती. त्यांनी पटदिशी पाचशेची नोट त्या पोराच्या हातात ठेवली. शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता.

शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान अवगत कसं करतात ? मला त्यांच्या डोळयांत माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या पोरांची ही क्षमता विकसित केली पाहिजे, मला जाणवलं. ‘साहेब फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला’, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला. आणि मला माझे हात खरोखरच खूप अस्वच्छ वाटू लागले.” 

तुमच्या बरबटलेल्या हातांनी तुम्ही कसं नापास करणार या पोरांना?

 जगण्याच्या भरधाव रस्त्यावरली प्रत्येक परीक्षा ही पोरं लिलया पार करताहेत. या पोरांची कोणती परीक्षा घेणार तुम्ही? कोणत्या परीक्षेच्या तराजूत त्यांना तोलणार? 

मुळात बुध्दिमत्ता म्हणजे काय, हे आपल्याला तरी कुठं नीटसं कळलंय. 

दोन प्रकारच्या बुध्दिमत्तेपासून एकशे ऐंशी प्रकारच्या बुध्दिमत्तेपर्यंत मानसशास्त्रज्ञ चकरा मारताहेत. आता तर तुमच्या निव्वळ बुध्दयांकापेक्षा भावनिक बुध्दिमत्ता अधिक महत्वाचा आहे, हे सर्व मानसशास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही परीक्षेतील मार्कांपेक्षा तुमचं स्वतःवरील नियंत्रण, तुमची विश्वासार्हता, कर्तव्यनिष्ठा, लवचिकता आणि कल्पकता ही अधिक महत्वाची असते कारण या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे तुमची भावनिक बुध्दिमत्ता आहे. मानवी बुध्दिमत्ता स्वतःला कोंडून घेत नाही,खडक फोडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती स्वतःसाठी असंख्य रस्ते तयार करते, मल्टिपल ऑप्शन्स! आणि आपण लाखो रुपये खर्च करुन पोरांना महागडया शाळेत घालतोय, वर त्यांना तेवढ्याच महागडया टयुशन्स लावतोय. पण आपण त्यांचे हात मळू देत नाही, त्यांना या अनवट रस्त्यावरुन ऊन, वारा, पावसात बेडर होऊन चालू द्यायला नाही. आपल्याला पहिल्या प्रयत्नात सारं काही हवंय, आपण त्यांना चुकू देखील द्यायला तयार नाही म्हणून तर आपली पोरं चांगलं पॅकेज मिळवताहेत पण ती एडीसनच्या चुका करत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ‘युरेका योग’ नाही. आपण त्यांचा नारायण नागबळी विधी केव्हाच उरकलाय.

मन, मनगट आणि मेंदूचं नातं आपण विसरुन गेलोय. ज्ञानाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण हा साक्षात्कार असतो पण तो आपण पोरांना इस्टंट देऊ पाहतोय, आयता, शिजवलेला. पोरांना तो पचत नाही कारण तो त्यांनी शोधलेला नाही. लालासारखी पोरं, डाव्या हातचा मळ असावा तसं ब्लॅकबेरी काय आणि आणखी कोणता फोन काय, त्याचं मर्म आत्मसात करणारी पोरं, जगणं ‘ एक्सप्लोअर’ करताहेत, जगण्याला प्रत्यक्ष भिडताहेत म्हणून *त्यांच्यात भवतालाबद्दलची आंतरिक समज निर्माण होतेय. आम्हाला ती कळत नाही, हा या पोरांचा दोष नाही. त्यांना मोजायला आपल्याकडं माप नाही, आपली फूटपट्टी मोडून पडलीय आणि नापासाचे शिक्के आपण त्यांच्यावर मारतोय. त्यांना पुन्हा पुन्हा ‘ दहावी फ’ च्या वर्गात बसवतोय कारण आपली सगळी सो कॉल्ड मेरिटोरियस पोरं ‘अ’ तुकडीत बसलीत. हातात नापासाची मार्कलिस्ट घेऊन नाऊमेद झालेली ही सारी पोरं, हे सारे लाला, भीमा, जब्या, नौशाद, जॉर्ज सारे भांबावून गेलेत. परवा दहावीचा निकाल लागला तेव्हा या साऱ्यांसाठी मी फेसबुकवर लिहलं होतं –

“ कोणतंही बोर्ड, कोणतीही परीक्षा तुम्हाला तोपर्यंत नापास करु शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला नापास करत नाही. परीक्षेच्या फुटपट्टीने मोजावे, एवढे तुम्ही किरकोळ नाही आहात 

दोस्तहो …तेव्हा सर्व सो कॉल्ड नापास लोक हो, चिल …एकदम चिल! खरी परीक्षा वेगळीच आहे, तिथले विषय पण एकदम हटके आहेत… खोटं वाटत असेल तर दहावी बारावीला गटांगळया खाणाऱ्या नागराज मंजुळे, सचिन तेंडुलकर वगैरे मंडळींना विचारा …तुम्हांला ही लै मोठी नावं वाटतील पण अशी मंडळी तुम्हांला प्रत्येक गल्लीबोळात भेटतील जी बोर्डाची परीक्षा नापास झाले पण खऱ्याखुऱ्या परीक्षेत बोर्डात आले …

तेव्हा त्या परीक्षेची तयारी करा …!”

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री शक्तीचा जागर करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री शक्तीचा जागर करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो ! 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।” 

(अर्थ- जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, अर्थात त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदपूर्वक निवास करतात. जेथे त्यांची पूजा होत नाही, अर्थात त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व चांगली कर्मे देखील निष्फळ होतात.) हा अर्थपूर्ण श्लोक चिरंतन आहे, म्हणूनच आजच्या काळात देखील तितकाच प्रासंगिक आहे.

८ मार्च या अंतर्राष्ट्रीय महिला दिनानिमित्य अभिनंदन आणि शुभेच्छा! या सर्वांनाच लागू होतात. कारण आजचा काळ असा आहे की पुरुषांची म्हणून लेबल लावलेली कामे महिला बिनधास्तपणे करतात, तर या उलट स्त्रियांची पारंपारिक कामे कधी कधी पुरुषमंडळी अगदी निगुतीने करतात. (यासाठी पुरावा म्हणून मास्टर शेफचे एपिसोड आहेतच).

आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास

मंडळी आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगते. अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगातील स्त्रियांना २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यात क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे. ‘ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड निदर्शने केली. त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या प्रमुख मागण्या होत्या. सोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक स्तरावर समानता आणि सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क हे देखील मुद्दे होते. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी या अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लाराचा मंजूर झाला.

नंतर युरोप, अमेरिका आणि इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्री संघटनांना बळकटी आली. जसजसे बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तसतशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

स्त्रियांचे सक्षमीकरण- माझा अनुभव               

या निमित्याने मी महिला सशक्तीकरणाची एक आठवण शेअर करीत आहे. प्रवासात असतांना त्या त्या प्रदेशातल्या स्त्रिया कशा वागतात, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य कितपत विकसित आहे, हे मी उत्सुकता म्हणून बघत असे. साधारण २००३ चा काळ होता. (मैत्रांनो, मित्रांनो हे लक्षात असू द्या की, हा काळ वीस वर्षे जुना आहे. ) मी केरळ येथे फिरायला गेले होते, देवभूमीचा हा सुंदर प्रवास रम्य अशा हिरवाईतून करीत होते. नारळांच्या वृक्षांच्या लांब रांगा अन लगत समुद्राचे निळेशार जल (समुद्र कुठला ते विचारू नका प्लीज)! बसमधून असे विहंगम दृश्य दिसत होते. बस कंडक्टर एक मुलगी होती, विशीतली असावी असे मला वाटले. अत्यंत आत्मविश्वासाने ती आपले काम करीत होती. बस मध्ये फक्त महिलांसाठी असे समोरचे २-३ बेंच आरक्षित होते. त्यावर तसे स्पष्ट लिहिले होते. कांही तरुण त्यावर बसले होते. एका स्टॉपवर कांही स्त्रिया बसमध्ये चढल्या. नियमानुसार त्या राखीव जागांवरून तरुणांनी उठून जायला हवे होते. त्यांनी तसे केले नाही. त्या स्त्रिया उभ्याच होत्या. तेवढ्यात ती कंडक्टर आली आणि मल्याळम भाषेत त्यांना जागा रिकामी करा असे तिने सांगितले, मात्र ते तरुण हसत होते आणि तसेच बसले होते. मी आता बघितले की, ती रोडकीशी मुलगी रागाने लाल झाली. तिने त्यांच्यापैकी एकाची कॉलर पकडली अन त्याला जबरदस्तीने उभे केले. बाकीचे तरुण आपोआप उठले. तिने नम्रपणे त्या स्त्रियांना बसायला जागा करून दिली, अन जणू कांही झालेच नाही असे दाखवत आपले काम करू लागली.

मैत्रांनो मला आपल्या ‘जय महाराष्ट्राची’ आठवण आली. असे वाटले की इथं काय झाले असते? केरळात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे! (तेव्हां आणि आत्ताही) मेघालयच्या प्रवासाचे वर्णन मी नुकतेच एका लेख मालिकेत केले, तिथे देखील स्त्रियांच्या संपूर्ण साक्षरतेमुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे जे स्त्री शक्तीचे अद्भुत रूप मी ठायी ठायी अनुभवले, ते वारंवार नमूद केले आहेच.   

मंडळी, यात कुठलीच शंका नाही की, मतदानाचा हक्क तर महत्त्वाचाच, पण त्या योगे स्त्री स्वतंत्र झाली असे समजायचे कां? तो तर दर पाच वर्षांनी मिळणारा अधिकार आहे. स्त्रीला घरात आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का?  बरे, मांडले तरी ते विचारात घेतल्या जाते कां? हे सुद्धा बघायला नको कां? अगदी साडी खरेदी करायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य आहे कां, अन ते असले तरी स्वतःच्या पसंतीची साडी घेता येते कां? मंडळी प्रश्न साधा आहे पण उत्तर तितके सोपे आहे कां? ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ हे शब्द अजूनही जिवंत कां आहेत? १९५० साली आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या सिनेमातील ग दि माडगूळकरांची ही रचना आज देखील सत्याशी निगडित कां वाटावी? जिथं स्त्रीला देवीच्या रूपात पुजल्या जाते तिथे तिची अशी अवस्था कां व्हावी?

युनायटेड नेशन्सच्या ८ मार्च २०२४ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे, “महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा”. यात स्त्री अंकुराचे रक्षण, स्त्री आरोग्य, स्त्रियांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख जलदगतीने उंचावणे हे सर्व मुद्दे आहेत. पण स्त्रियांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार रोखणे आणि ते झाल्यास अपराध करणाऱ्याला कठोर शिक्षा करणे, या बाबी तितक्याच महत्वाच्या आहेत. समाजात स्त्रीचे स्थान अजूनही दुय्यम कां आहे? यावर सामाजिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. भलेही संविधानात नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही स्तरावर लिंगभेद नसावा हे स्पष्ट आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

मला या दिनाविषयी इतकेच वाटते की, स्त्रीला देवी म्हणून मखरात बसवू नये तसेच तिला ‘पायाची दासी’ देखील बनवू नये. पुरुषाइतकाच तिचा समाजात मान असावा. ‘चूल आणि मूल’ या सेवाभावाकरता सकल आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्रीचे कौटुंबिक आणि सामाजिक स्थान ते सर्वमान्य व्हावे. तिच्या भावभावना, बुद्धी आणि विचारांचा सदोदित सन्मान झाला पाहिजे. खरे पाहिलॆ तर हे साध्य करण्यासाठी ८ मार्चचाच ‘प्राणप्रतिष्ठेचा दिवस’ नसावा तर ‘प्रत्येक दिवस माझा’ असे समस्त महिलावर्गाने समजावे. त्यासाठी पुरुषमंडळींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यायची गरज असू नये. असा निकोप अन निरोगी सुदिन केव्हां येणार? प्रतीक्षा करावी, लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल! 

“Human rights are women’s rights, and women’s rights are human rights. ” 

 –  Hillary Clinton.

“मानवी हक्क हे स्त्रियांचे हक्क आहेत आणि स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत. ”   

– हिलरी क्लिंटन

धन्यवाद!     

Attachments area

टीप- संयुक्त राष्ट्र द्वारा प्रसारित एक गाणे शेअर करते

“One Woman” song to celebrate International Women’s Day (March 8th-2013)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – दिनांक ८ मार्च २०२४ 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।

स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥

*

कथित भगवंत

मनुज जो केवळ अग्नी अन् क्रियांना त्यागी

नाही संन्यासी अथवा तो नच असतो योगी

आश्रय नाही कर्मफलाचा करितो कार्यकर्म

तोचि संन्यासी तो योगी जाणुन घे हे वर्म  ॥१॥

*

न संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।

न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ २ ॥

*

संन्यासासी योग अशी ही अन्य संज्ञा पांडवा

संकल्पासी जो न त्यागतो तो ना योगी भवा ॥२॥ 

*

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।

योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥

*

आरुढ व्हाया कर्मयोगे निष्काम करणे कर्म

होता योगारूढ अभाव सर्व संकल्प हे वर्म ॥३॥

*

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।

सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ४ ॥

*

इंद्रियाच्या भोगामध्ये नसतो जो आसक्त 

संकल्पत्यागी मनुजा योगारुढ म्हणतात ॥४॥

*

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌ ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥

*

भवसागरातुनी अपुला आपण उद्धार करावा

अपुला बंधु आपण तैसा वैरीही जाणावा ॥५॥

*

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।

अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्‌ ॥ ६ ॥

*

आत्म्यावरती विजय जयाचा आत्म्याला प्राप्त

बंथु त्याच्या आत्म्याचा आत्मा तयाचा होत

आत्मा नाही अधीन तुजसम अनात्मन राहतो 

वैरी होउन आत्मा त्याचा शत्रूसम वर्ततो ॥६॥

*

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥

*

शीतोष्ण-सुखदुःखात जया न मानापमान

प्रशांति तयाच्या वृत्ती सुशांत अंतःकरण 

मन बुद्धी अन् देह इंद्रिये सदैव जया अधीन

प्रज्ञेत तयाच्या स्थित असते सच्चिदानंदघन ॥७॥

*

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।

युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ८ ॥

*

ज्ञान विज्ञानाने ज्याचे तृप्त अंतःकरण

स्थिती जयाची स्थिर असूनी विकारहीन

हेम अश्म मृत्तिका जयाला एक समान असती 

अद्वैत त्याचे भगवंताशी जितेंद्रिय त्या म्हणती ॥८॥

*

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।

साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥

*

सुहृद असो वा मित्र वा वैरी मध्यस्थ वा उदासीन 

बंधु असो वा द्वेष्य साधु वा अनुसरतो पापाचरण

घृणा नाही कोणाही करिता सर्वांठायी भाव समान

श्रेष्ठत्व तयाचे विशेष थोर याची मनी ठेव सदा जाण ॥९॥

*

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।

एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥

*

मन आत्म्यासी वश करुनी

योगी निरंतर निरिच्छ राहुनी

एकांती एकाकी स्थित रहावे

आत्मा परमात्मे विलिन करावे ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

अमीन सयानी

नुकतीच अमीन सयानी यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाल्याची बातमी आली आणि बिनाका गीतमालाचे दिवस आठवले.

अमीन सयानी यांचा ‘बहनों और भाईयों ’ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे ,कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. कोणताही कार्यक्रम असुदे , तो रंगतदार व्हायला पाहिजे तर त्याचा निवेदक देखील तसाच हुशार, अभ्यासपूर्ण असला पाहिजे म्हणजे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातोच जातो.

एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करत होते.

नभोवाणीवरील निवेदकांच्या बाबतीत जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एका नावापुढे सर्वजण नतमस्तक होतात तो आवाज असतो अमीन सयानीचा. “जी हाँऽऽ प्यारे बहेनों और भाईयों, तो अब अगली पायदानपर पेश होने जा रहा है…” असा आवाज ऐकला, की आजही तो काळ सर्रकन डोळ्यांपुढे चमकून जातो. थोडीथोडकी नाही तब्बल ४२ वर्षे त्यांनी ‘बिनाका गीतमाला’चे प्रसारण केले.

आकाशवाणीच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला. या माध्यमातून भारतीय सिनेमाला घराघरापर्यंत पोचवण्यात अमीन सयानींचा फार मोठा सहभाग होता . त्यांनी रेडीओवर अनेक प्रायोजित कार्यक्रम केले. त्या काळातील सर्वच कार्यक्रम ‘लाजवाब’ होते. एस. कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरीडॉन के साथी, शालीमार सुपरलॅक जोडी, बोर्नव्हिटा क्वीज कॉन्टेस्ट, मराठा दरबार की महकती बाते, रिको मुस्कुराहटे.

जाहिरात आणि विपणन या शब्दांची जादू समाजापर्यंत पोचायच्या कितीतरी वर्षे अगोदर अमीन सयानी यांनी ती आयडिया यशस्वी करून दाखवली होती. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. आजच्या पिढीला कदाचित खोटे वाटेल पण प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. श्रोत्यांशी मनापासून साधलेला संवाद, सोपी-सुलभ भाषाशैली, उत्कंठा वाढवणारे रसाळ निवेदन आणि सोबतीला सिनेमाच्या अस्सल सुवर्णकाळातील गाणी! रसिकांचे या स्वराशी नाते जुळले ते कायमचेच.

साठच्या दशकात एकदा ‘बिनाका’ सादर करताना एका पित्याने त्यांना पाठवलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले. त्या पित्याचा एकुलता एक मुलगा काही कारणाने रुसून घर सोडून गेला होता. आईवडील खूप दु:खात होते. त्या काळात संपर्काची माध्यमे अतिशय कमी होती. त्या कुटुंबाला ‘बिनाका’ ऐकायची भारी आवड होती. त्या पित्याने अमीनभाईंना विनंती केली, की जगाच्या पाठीवर माझा मुलगा कुठेही असला तरी बिनाका ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या कार्यक्रमातून त्याला घरी परतण्याचा सल्ला द्या. तो जरूर तुमचे ऐकेल. अमीन सयानी यांनी ते पत्र वाचून दाखवले. आणि काय आश्चर्य! महिन्याभरात त्या पित्याचे पत्र आले, मुलगा सुखरूप परत घरी आल्याचे.

त्या वेळेस तर गाणी ऐकण्याची साधने कमी होती . गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचा, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला.’’हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमाला सुरु झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली.

मा.अमीन सयानी  सांगत असायचे  ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा प्रत्येक आठवडय़ाला साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’

बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ होता . शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मन पासून राहुलदेव बर्मन पर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता.  

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

 जुन्या काळात तुमचे आमचे सर्वांचे आयुष्य आनंदी करणाऱ्या अमीन सयानी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालनकर्ता शंकर — ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ पालनकर्ता शंकर – ☆  श्री मकरंद पिंपुटकर

पालनकर्ता शंकर…

पौराणिक कथांमध्ये “शंकर” हा संहार करणारी देवता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात असलेले  ८१ वर्षांचे शंकरबाबा मात्र पालनकर्ता देवतास्वरूप आहेत.

महाराष्ट्रातील ‘अमरावती’ जिल्हा हा तसा कोरडवाहूच. पण येथील ‘परतवाडा’ तालुक्यातल्या रूक्ष ओसाड रखरखाटात, ‘वझ्झर’ गावच्या टेकाडावर मात्र मायेचं हिरवंगार पांघरूण अंथरलेलं आहे. ही माया आहे शंकरबाबा पापळकर यांची. 

खरंतर शंकरबाबा इथे येण्यापूर्वी मुंबईत ‘देवकीनंदन गोपाळ’ नावाचं नियतकालिक चालवत होते. मुंबईतील कुंटणखान्यातील – वेश्या व्यवसायातील स्त्रियांची कुचंबणा त्यांना विद्ध करून गेली.  “त्याहूनही वाईट परिस्थिती होती शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलींची. गावोगावांतून अशा मुलींना या ना त्या बहाण्याने मुंबईत आणलं जायचं आणि वेश्या व्यवसायात ढकललं जायचं,” आपल्या कार्याची सुरुवात कशी झाली ते विषद करून सांगताना शंकरबाबा सांगतात.

“मला हे सहन झालं नाही, आणि या अशा व अन्य अनाथ मुलामुलींना सहारा देण्यासाठी वझ्झर येथे मी ‘अंबादासपंत वैद्य बालसदना’ची पायाभरणी केली. जसजशी कामाची माहिती लोकांना होत गेली, विश्वासार्हता वाढत गेली, तसतसे ठिकठिकाणाहून आई वडिलांनी – समाजाने टाकून दिलेल्या अपंग, मतीमंद लेकरांना माझ्याकडे पाठवलं गेलं. अनेकांना तर खुद्द पोलिसांनीच माझ्याकडे आणून सोडलं.”

१९९० ते १९९५ या काळात २५ मुलं आणि ९८ मुली अशी एकूण १२३ लेकरं शंकरबाबांच्या आश्रयाला आली. १९५७ साली पारित झालेल्या कायद्यानुसार, अशा अनाथ मुलांना त्यांच्या वयाच्या १८ वर्षांनंतर ते केंद्र – तो आश्रम सोडणे भाग असतं. 

“पण जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत अथवा मतीमंद आहेत, अशांचा हा आधार काढून घेणं सर्वथा अयोग्य आहे. वयाच्या १८ वर्षांनंतर पुन्हा उघड्यावर पडलेले असे हे तरुणतरुणी पुन्हा अनाथ होतात, आणि उदरनिर्वाहासाठी वाम मार्गाला तरी लागतात अथवा कोणी त्यांचा गैरफायदा घेतो,” बाबा कळवळून सांगतात. “म्हणूनच मी कोणतीही सरकारी मदत घेत नाही. त्यामुळे नियमानुसार या मुलांना बाहेर काढणं मला बंधनकारक नाही.”

आणि म्हणूनच मुलांची संख्या १२३ झाल्यावर बाबांनी त्यांचेच नीट लालनपालन करायचे ठरवले, आणखी मुलांना स्वीकारलं नाही. या मुलांना त्यांनी शिकवलं, आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. 

बाबांना अनेक ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी बोलावले जाते. अशा कार्यक्रमांत मिळणारे मानधन, देणगी आणि समाजातील अन्य दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे हे व्रत चालू राहिले आहे. 

आपल्या आसऱ्याला आलेल्या या सर्वांना बाबांनी आपले नाव दिले. १९ मुलींची लग्नं लावून दिली, अगदी अंध विद्यार्थ्यांच्या देखील शिक्षणाची सोय केली, त्यातील एक अंध विद्यार्थिनी ‘माला शंकरबाबा पापळकर’ तर MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

“जी मुलं मतीमंद आहेत, अशांना मी वृक्षवल्लींची निगा राखायला शिकवलं. त्यांच्या मेहनतीनेच आज या बालसदनाच्या अवतीभवती ही वृक्षराजी उभी राहिली आहे.”

बालसदनातील मुलं – तरुण तरुणीच बाकीच्यांची काळजी घेतात. पोलियोग्रस्त रूपा सर्वांना जगातल्या घडामोडींचे updates देते. मूक बधिर ममता आणि पद्मा बाल सदनातील सगळ्यांच्या खानपानाची व्यवस्था बघतात. बेला सगळ्यांच्या दर महिन्याच्या आरोग्य तपासण्या, औषधं, दवाखान्याच्या वाऱ्या सांभाळते. प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा उचलत असतो.

यंदाच्या वर्षीचा मानाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाल्यावर शंकरबाबांची पहिली प्रतिक्रिया होती की “मी पंतप्रधानांची भेट मागणार आहे, १९५७ चा तो कायदा रद्द करणे कसं आवश्यक आहे हे मी त्यांना पटवून देणार आहे.”  

अशा आनंदाच्या क्षणीसुद्धा स्वतःच्या गौरवापेक्षा देशातील अंध, अपंग, मतीमंद अनाथांचे भले कसे होईल हाच विचार प्रथम आला. 

म्हणूनच सुरुवातीला म्हटलं, महाराष्ट्रातला शंकरबाबा पालनकर्ता देवता आहे. 

शंकरबाबांच्या मानवसेवेला साष्टांग दंडवत.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print