मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.

याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,

त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल, 

नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल… 

हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.

मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय, 

आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!   

मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस! 

म्हणून तो तरणा पाऊस! 

आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस! 

किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

मघा नक्षत्रातला पाऊस असा कोसळत असतो की तरण्या विवाहितेला घराबाहेर पडताच येत नाही, तिला शेतांत धन्याच्या मागे जाता येत नाही की गावात कुठे जाता येत नाही. अशा सुनेला मग तो पाऊस सासूसारखा वाटू लागतो, चोवीस तास नजर ठेवणारा!

पूर्वा नक्षत्रातला पाऊस हा एका वेळेनुसार कोसळतो आणि ओसरतो देखील, त्याचं कोसळणं म्हणजे चपळ पर्जन्योत्सव होय. त्याची लगबग नि त्याचं कमी वेळेत भरपूर कोसळणं हे एखाद्या कामसू सुनेसारखं आहे, म्हणून तो सुनेचा पाऊस होय.

अर्थात ही केवळ नक्षत्रे लक्षात राहण्यासाठीची नावे होत, कारण हरेक स्त्रीला आधी सून व्हावं लागतं नि मग सासू बनावं लागतं, जे कुणालाच चुकलं नाही. त्यामुळे ही नावे कुणाएकीला दुखावण्यासाठी ठेवलेली नव्हती हे नक्की!

आता सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे. त्यानंतर पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती अशी नक्षत्रांची रांग असेल.

या प्रत्येक नक्षत्रासाठी गावगाड्यात स्वतंत्र म्हणी आहेत ज्यांना मातीचा अमीट दरवळ आहे..  

‘पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.’ (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे)

‘पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा’ (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील),

‘पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा’ (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),

आश्लेषा नक्षत्रासाठीची म्हण – ‘मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा.’

म्हणजे काय ? तर आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत !

‘पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख’ ( असं का म्हटलंय – पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं ) (REPOST)

‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ आणि

‘पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती!’

या म्हणींना मातीचा गोडवा आहे आणि यात अस्सल बोली भाषेतलं जिवंत सत्व आहे!

गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. 

शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लहेजा ढंगदार आणि न्यारा आहे. 

गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही…   

लेखक – अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…! 

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. 

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकॄष्ण।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांची प्रतिक्षा ! 

७ सप्टेंबर,२०१९. या आधी त्या दोन डोळ्यांत कित्येक वर्षे फक्त चंद्रच चमकताना दिसायचा…अमावस्या असली तरी ! आज मात्र दोन्ही डोळ्यांत अमावस्या भरून राहिलेली आहे. हजारो किलोमीटर्स दूर आणि वर असणा-या चंद्राच्या अंतरंगातील ओलावा शोधून काढण्याच्या प्रयत्नात या माणसानं रक्ताचं पाणी केलेलं असताना त्या चंद्राने याच्याच डोळ्यांत दीर्घकाळ टिकून राहील असा ओलावा भरून टाकला ! 

सामान्य पुरुषाचं रडणं खरं तर भित्रेपणाचा,असहाय्यतेचं लक्षण मानलं जातं…पण शूर पुरुष जेव्हा रडतात तेव्हा त्यांचे अश्रू फुलांना जन्माला घालण्याचा प्रण करीत वाहात असतात. जगाला शंभर टक्के यशाचीच गोडी समजते. यापेक्षा कमी जग खपवून घेत नाही. शंभर आणि नव्व्याण्णव यामधील एकचा फरक नव्याण्णवची किंमत अगदी कमी करून टाकतो. 

कैलासविदवू सिवन...एका सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म. माध्यमिक शिक्षण मातृभाषा तमीलमध्ये घेतलेलं….खाजगी शिकवणी न लावताही अभ्यासात उत्तम गती. दैवाने प्रदान केलेल्या बुद्धीला कष्टाचं खतपाणी घालून देशाच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन केंद्राचा प्रमुखपदी विराजमान होण्याची किमया. आणि हाती घेतलेलं चांद्रयानाचं व्रत. कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षांचं भलंथोरलं ओझं वागवत वागवत प्रचंड कष्टानं चांद्रयान-२ विक्रम लॅन्डर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला निगर्वी, मितभाषी माणूस. त्यादिवशी चंद्रालाही हळहळ वाटली असेल…अगदी जवळ येऊनही चांद्रयानाला चंद्राशी नीट गळाभेट घेता नाही आली ! खरं तर फक्त ही गळाभेटच शिल्लक राहिली होती…बाकी जवळजवळ सर्व कामगिरी उत्तम बजावली होती चांद्रयान-२ ने. मात्र ऐनवेळी अपयशाने पायांत खोडा घातला आणि जगाच्या लक्षात त्याचं केवळ कोसळणं लक्षात राहिलं. आमराईमधल्या सर्वांत डेरेदार आम्रवृक्षावर वीज कोसळावी आणि फळं जळून जावीत अशी स्थिती झालेली… 

… तोंडातून शब्द फुटू शकत नव्हते तेव्हा आसवांनी शब्दांची जागा घेतली. टाळ्या वाजवण्याच्या बेतात असलेले अनेक हात खाली झाले, नजरा दूर झाल्या. उभ्या देशाचा विश्वास गमावल्याची भावना मनात जोरात शिरली…आणि आसवांचा बांध फुटला ! देशाच्या नेतृत्वाने सांत्वन केलं, धीराचे चार बोलही सांगितले. सबंध देश निराश झाला होताच…आणि ते साहजिकच होते. पण त्याचक्षणी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्धार झाला. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच ध्यासाने काम केले…चुकांचा मागोवा घेतला आणि त्या सुधारण्याच्या योजना नव्याने आखल्या. दिवस निघून गेले, वर्षे निघून गेली….आणि १४ जुलै २०२३ चा दिवस उगवला आणि २२ जुलै २०१९चा दिवस आठवला ! 

आजच्या २३ ऑगस्टला सुद्धा ७ सप्टेंबर मनात घर करून होता. चांद्रयान-२ शेवटच्या काही मोजक्या मिनिटांत यशापासून दूर जाऊन कोसळलं होतं ! आज असं व्हायला नको…पण गतवेळी झालेल्या चुका, अपघात यांपासून नव्या दमाच्या शिलेदारांनी धडा घेतला आहेच…सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री होती मनात….तसंच झालं….केवळ चांद्रयानच नव्हे तर के.सिवन नावाच्या या मोठ्या माणसाचं हळवं मनही चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं… डोळ्यांत पौर्णिमेचा चंद्र उतरला होता ! आताच्या आसवांना तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांपूर्वीच्या आसवांची याद आली…..मात्र त्या आणि या आसवांमध्ये पृथ्वी आणि चंद्र नव्हे तर जमीन-अस्मानाचा फरक होता….आताची आसवं आनंदाची होती…..! 

कैलासविदवू सिवन साहेब…हा देश आपला सदैव ऋणी राहील ! आपले हार्दिक अभिनंदन ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रत्येकाचा कृष्ण… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रत्येकाचा कृष्ण ☆ श्री सुनील देशपांडे

कृष्णचरित्राचा अभ्यास केल्यास, अभ्यास म्हणण्यापेक्षा चिंतन केल्यास, काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट कृष्णजन्माची…

कृष्णजन्म तुरुंगात झाला. माणसाला जन्मापासून अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मग तो कितीही संपन्न  किंवा राजघराण्यातील का असेना. जन्माआधीपासूनच मृत्यू  मागे लागलेला.  वातावरण भयभीत. अशा परिस्थितीमध्ये प्रासादातले सुख सोडून एका गुराख्याच्या घरी बालपण.  या ठिकाणी संपूर्ण उच्चनीचतेच्या आणि जातीयवादाच्या कल्पना मुळातच उखडून काढूनच श्रीकृष्णाचे बालपण पार पडत असतं. 

श्रीकृष्ण हा त्या त्या वयातील आणि विशेषतः बालवयातील घटनांमधून जास्त वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रकट झालेला जाणवतो. बालवयात संस्कार किती गरजेचे असतात आणि सुसंस्कारामुळे माणूस कसा घडत जातो याचा परिपाठच श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये आणि त्याच्या कुमारवयापर्यंतच्या चरित्रामध्ये आढळतो. श्रीकृष्ण चरित्र हे इतकं अद्भुत रसायन आहे की कळत्या न कळत्या वयातील बालकांपासून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, मनाला भावणारे आणि सर्वस्पर्शी असे हे चरित्र आढळून येते. म्हणूनच तर श्रीकृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुषोत्तम म्हणून केला जात असावा.  श्रीकृष्ण चरित्र ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, त्यामध्ये महर्षी व्यासांची प्रतिभा त्या व्यक्तिमत्त्वाच्या घडवणुकीत  प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीवर संचार करत असलेली आढळून येते. बाललीला, खोडकरपणा, खेळकरपणा  या सर्व बालपणीच्या नैसर्गिक भावनांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच हे व्यक्तिमत्व बालपणापासूनच आपले लाडके व्यक्तिमत्व होऊन जाते. 

एकदा एका निम्न प्राथमिक शाळेमध्ये साधारण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या एक दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.  त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं.  आता या मुलांना कृष्णाबद्दल काय सांगणार ? परंतु त्यांच्या दहीहंडीचा खेळ चालू असतानाच मला काही ओळी सुचल्या. त्या ओळींच्यावर त्या मुलांनी खूपच सुंदर नाच केला. त्या ओळी त्या मुलांना खूप आवडल्या त्या ओळी अशा होत्या,

खांद्यावरती  उभे राहूया उड्या मारुया कोणी.

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

पुढे पुढारी, 

कृष्ण मुरारी,

मागे सारी,

सेना न्यारी,

नाचू कोणी, गाऊ कोणी, 

उड्या मारूया कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी….. 

सुदाम आला, 

गोपी आला, 

गोटु आला, 

मोटू आला, 

उंच कुणी वा बुट्या कोणी, 

सारे खाऊ लोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी……  

उंच मनोरे, 

करती पोरे, 

वारे वारे, 

म्हणती सारे,

दमते कोणी, 

घसरे कोणी, 

मटकी फोड़े कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

करूया कल्ला,

हल्ला गुल्ला, 

चविष्ट काला, 

मट मट खाल्ला, 

यम्मी यम्मी म्हणते कोणी 

भरे तोबरा कोणी. 

शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..  

हे गाणे त्या मुलांना इतके आवडले की त्याच गाण्यावर नाचत नाचत मुले घरी गेली. 

कसलं भाषण ? कसले प्रमुख पाहुणे ? 

लहान मुलांचा कृष्ण हा सगळ्यात आवडता देव (खरं म्हणजे देव हे आई वडील म्हणतात म्हणून त्याला देव म्हणतात) परंतु मुलांना तो देव न वाटता स्वतःचा सवंगडीच वाटतो.  म्हणूनच लहानपणापासून कृष्णचरित्राचे झालेले संस्कार हे लहान वयात व्यक्तिमत्त्व घडवण्याचे संस्कार आहेत. 

कुमार वयातील खोडकर पणा, तारुण्यातील शृंगारिकता. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन घेतलेले शिक्षण, त्या शिक्षणामध्ये सुद्धा गरीब श्रीमंतीचा भेद न करता जुळलेले मैत्रीबंध. गुरूंच्या घरी सगळ्या प्रकारची कामे करणे, गुरुप्रती आदर बाळगणे या सगळ्या घटनांवरून श्रीकृष्णाला खरे म्हणजे व्यासांनी कुठेही देवत्व बहाल केलेले नाही. श्रीकृष्णाचे देवत्व हे चरित्र ऐकणार्‍यांनी वाचणाऱ्यांनी त्याच्या विविध गुण प्रभावामुळे त्याला बहाल केलेलं आहे. 

लहानपणी त्याच्या चरित्रात त्याच्या बालपणातील चमत्कारांचे प्रसंग हे, कीर्तनकार कथेकरी आणि त्याच्या चरित्राचे गुणगान करणाऱ्या त्याच्या भक्तांनी नंतर श्रीकृष्णाच्या चरित्राला जोडलेले आहेत, असे मला वाटते. श्रीकृष्ण राजघराण्यात जन्मला, गुराख्याच्या घरात वाढला, गुरुगृही शिकला, सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातील व्यक्तींशी मैत्री केली. तो योद्धा होता पण अजिंक्य नव्हता. त्याचाही पराभव करणारा होताच. त्यालाही त्याच्या राज्यातून पळवून लावणारा भेटला. प्रजेसकट पळत पळत द्वारकेपर्यंत जाऊन तेथे आपल्या राज्याचे पुनर्वसन करावे लागले. ही खरं म्हणजे नामुष्कीची गोष्ट. परंतु या सर्वाचं जे काही विवेचन व्यासांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे. अर्थात या पराभवाचा बदला योग्य त्या व्यक्तीकडून त्याने घेतला हे अर्थातच ओघाने आलेच. अन्यायाच्या विरोधात लढणारा न्यायनिष्ठ पण न्यायनिष्ठूर नव्हे, तर समन्वयाने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा. शांती प्रेमी पण वेळप्रसंगी शांतीचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात कोणत्याही थरापर्यंत जाण्याचा सल्ला देणारा.  उत्कृष्ट राजकारणी आणि तत्त्ववेत्ता.

माझ्यासारख्या सामान्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास ही दूरचीच गोष्ट आहे.  पण किमान त्याच्या चरित्राचं चिंतन ही सुद्धा एका जन्मामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकणारी गोष्ट नव्हे.  त्यामुळे कृष्णचरित्राचा अभ्यास नव्हे पण कृष्ण चिंतन हा माझ्या विरंगुळ्याचा विषय आहे. मी कृष्णभक्त नव्हे, देव म्हणून मी त्याची पूजा करणार नाही. पण जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत व्यक्ती चरित्र म्हणून ते व्यक्तिमत्व मनावर प्रभाव पाडून जातं.   त्या चरित्राचे चिंतन हा प्रसन्नतेचा आणि मानसिक ऊर्जा वर्धनाचा भाग म्हणून मी त्या चिंतनात रमतो. 

वरील सर्व विवेचनात एक गोष्ट माझ्याही खूप उशिरा लक्षात आली. तुमच्याही लक्षात आली की नाही माहित नाही. परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा, मी  संपूर्ण लेखामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही खटकत नाही…..  यालाच तर अद्वैत म्हणत नसतील ?

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ श्वासांची उलट गणती ! — एन. वल्लरमथी ☆ श्री संभाजी बबन गायके 

अंक शिकवले जाताना ते एक ते दहा असेच शिकवले जातात. पण शून्य स्वतंत्र नाही शिकवला जात. शून्य असतेच….अध्याहृत ! त्याच्या पुढची पायरी म्हणजे दहाच्या पटीत शंभर पर्यंत. मानवी जीवनाचं सूत्रच जणू ही मोजदाद. आयुष्यमर्यादा शंभर आणि जन्माच्या एकातून आरंभ झालेला प्रवास शून्य नावाच्या अंतिमात विलीन होणं सुद्धा तेव्हढंच नैसर्गिक ! शून्याचा शोध तर जगाला भारताचीच देणगी. कुठलीही स्पर्धा, शर्यत सुरू करताना एक—दोन—तीन म्हटलं जातं. हा छोटासा प्रवास स्पर्धकांना भला भासतो. 

एरव्ही साध्या व्यवहारात एक तर दहा ते शून्य अशी गणती केली जात नाही. पण अवकाश मोहिमांमध्ये दहापासून मागे मागे सरणारा प्रवास शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत जीव टांगणीला लागतो…हे भारताने चांद्रयान-३ प्रक्षेपणाच्या वेळी अनुभवले ! या आणि अशा अनेक मोहिमांच्या वेळी हे शून्य प्रत्यक्षात जगलेली एक महिला तीन सप्टेंबरला शून्यात विलीन झाली. एन. वल्लरमथी हे त्यांचं नाव. ‘ दिवसेंदिवस विकसित होत जाणारा, मोठा मोठा होत जाणारा चंद्र ‘ हा वल्लरमथी या नावाचा अर्थ….यापेक्षा आणखी कोणता योगायोग असू शकतो चांद्रमोहिमेत काऊंटडाऊन करणा-या व्यक्तीच्या बाबतीत? 

तमिळनाडूमधल्या अरियालूर मध्ये एक जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या वल्लरमथी यांनी माध्यमिक शिक्षण तमील भाषेत घेतले होते ! अंगभूत हुशारीच्या जोरावर त्यांनी इंजिनियरींग आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन मध्ये उच्च पदवी संपादन केली. एकोणीसशे चौ-याऐंशी साली वल्लरमथी इस्रो मध्ये आल्या. 

Insat 2A, IRS IC, IRS ID, and TES सारख्या अतिशय महत्त्वाकांक्षी अवकाश योजनांमध्ये त्या सहभागी होत्या. २०१२ मध्ये भारताने रडार इमेजिंग सॅटेलाईट -१ अर्थात ‘ रिसॅट ‘ हा भारताने स्वत:च्या हिंमतीवर निर्माण केलेला उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या वल्लरमथी ! या कामाच्या शेवटच्या वर्षात वल्लरमथी दिवसातील फक्त पाच तास स्वत:साठी ठेवत. बाकी संपूर्ण वेळ प्रकल्पासाठी !  या कामगिरीबद्द्ल त्यांना दोन हजार पंधरा मध्ये ‘ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कारा ‘ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यासाठी वल्लरमथींना निवडण्यात येणे हे त्यांच्यासाठी आणि इस्रोमधील महिला शास्त्रज्ञांसाठी अभिमानाचे होते. 

अवकाशात प्रक्षेपक सोडण्यापूर्वीची वीस मिनिटे अतिशय महत्त्वाची आणि नाजूक असतात. इतक्या दिवसांची अथक मेहनत याच वीस मिनिटांमध्ये यशस्वी किंवा दुर्दैवाने अयशस्वी होणार असते. परंतू यातील शेवटची दहा-अकरा सेकंड्स खूपच तणावपूर्ण असतात. हाच तो काल….ज्यामध्ये जे काही शिल्लक राहिलं आहे ते सांगून मोहिम थांबवता येते..अन्यथा एकदा का शून्य झाले की आपल्या हातात काहीही नाही रहात ! हा काऊंटडाऊन उच्चारणारी व्यक्ती अतिशय प्रशिक्षित आणि बुद्धीमान असावी लागते. एरव्ही उलट आकडे उच्चारणे तसे सोपे काम असू शकते. पण एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मोहिमांमध्ये जराशीही चूक होऊन चालत नाही. आणि त्यात सा-या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मोहिमेत तर मानसिक तणाव किती मोठा असेल, याची कल्पना करवत नाही. हे आपण सर्वांनी चांद्रमोहिमेत अनुभवले असेलच. असो. माझ्यासारख्या किंवा आपणांपैकी ब-याच जणांना यातील तांत्रिक बारकावे माहित असण्याची शक्यता कमीच आहे. पण काऊंटडाऊन म्हणजे आय.पी.एल. सामन्यातील सामूहिक किंवा एखादा पूल सुरूंग लावून पाडण्याच्यावेळी केलेले काऊंटडाऊन..केवळ आकडे उच्चारणे नव्हे, हे मात्र समजते. 

चांद्रयान-३ मोहिमेवेळी हे काऊंटडाऊन करणा-या एक महिला होत्या, त्या ज्येष्ठ,अनुभवी अंतराळ शास्त्रज्ञ होत्या हे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जास्त समजले. आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा माणसाला कर्तव्यासाठी तहानभूक विसरायला लावते. वल्लरमथी यांना मोहिम यशस्वी झाल्यानंतर आणि आपले सूर्ययान आदित्य यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाल्यानंतर आपल्या कष्टांचे चीज झाल्याचे समाधान निश्चितच झालेले असणार. यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी परलोकीची यात्रा आरंभ करावी, हा योगयोगच म्हणावा लागेल. ‘ एन.वल्लरमथी…आपला प्रवास निर्विघ्न पार पडो…तुम्हाला असलेलं अवकाशाचं वेड आता कदाचित तुम्हाला त्या विशाल,अनंत,अनाकलनीय अवकाशाची खरीखुरी सफर घडवत असेल. तुमच्या जाण्याचं काऊंटडाऊन खुद्द काळानेच म्हटलं असावं, असं वाटल्यावाचून राहवत नाही. 

… मॅडम  तुमच्या आत्म्यास सदगती मिळो, ही समस्त भारतीयांच्या वतीने अवकाशाच्या आणि सकल सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना. आपल्या भविष्यातल्या काऊंटडाऊनसाठी तुम्ही हव्या होतात..तुमच्या आवाजात आम्हांला दहा ते शून्य अंक नव्याने शिकल्यासारखं वाटलं !    

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती वेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? इंद्रधनुष्य ?

☆ ती वेळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज गोकुळात नंदा घरी मोठी गडबड उडाली होती ! यशोदा अस्वस्थ होती येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत ! घरातील मंडळी आणि तिच्या सख्या तिची काळजी घेत होत्या. कधी एकदा ते बाळ जन्माला येतंय याची सारे गोकुळ वाट बघत होते ! बाहेर श्रावणाच्या सरीवर सरी येत होत्या. सारं रान कसं हिरवंगार झालं होतं ! गोपगोपाळ आनंद घेत होते सृष्टीचा ! मुक्त, भारलेले, चैतन्यमय वातावरण गोकुळात होते !

त्याउलट मथुरेत कंसाच्या कारागृहात वसुदेव- देवकी सचिंत बसले होते. देवकीचे दिवस भरत आले होते. कंसाचे मन अस्वस्थ होते. कंसाने आत्तापर्यंत जन्मलेली सातही बालके जन्माला आल्याक्षणीच मारून टाकली होती. प्रत्येक जन्माला येणारे बाळ त्याचा ‘आठवा’, त्याला मारणारा ‘काळ’असेल का? या भीतीने प्रत्येक  बाळ त्याने यमसदनास पाठवले होते. पण खऱ्या ‘आठव्या’ चा जन्म आज होणार होता. तेही बाळ मारलं गेलं तर …म्हणून वसुदेव देवकी दुःखी होते…. 

… पण आज परमेश्वरी लीलेचा अवतार होणार होता ! बंद कारागृहाच्या आत नवचैतन्य घेऊन ते बाळ जन्माला येणार होते. हुरहुर होती ती अशांना की, येणारा जीव  परमेश्वरी अंश असणार आहे हे माहीत नसणाऱ्याना !

रात्रीचे बारा वाजले. बाहेर पावसाची धुवांधार बरसात चालू होती !.देवकीने जन्म दिला होता एका बाळाला ..सुकुमार, सुकोमल अशा… आता कंसाला सुगावा लागण्याच्या आत ते बाळ बाहेर काढायला हवे होते !वसुदेवाने एक टोपली घेतली. त्यात मऊ शय्या तयार केली .देवकीने  ते गोजिरवाणी बाळ हृदयाशी धरले. त्या इवल्याश्या जिवाला तिला सोडवेना ! बाळाला कुशीत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मन घट्ट करून तिने  बाळाला टोपलीत  ठेवले. मऊशार वस्त्राने पांघरले. जणू तिने आपल्या मायेचे आवरण त्याच्यावर घातले, की ज्यामुळे ते कोणत्याही संकटापासून दूर राहणार होते ! तो गोंडस जीव तिला हसत होता. जणू म्हणत होता, ‘ अगं,मी तर जगाचा त्राता !  काळजी करू नकोस, मी सुरक्षित राहीन !’ 

वसुदेव बाळाची टोपली घेऊन यमुनातीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. ‘ या बाळाला मी कसं नेणार पार?’ असा विचार त्याच्या मनात येत होता. टोपली डोक्यावर घेऊन मोठ्या धीराने त्याने नदीच्या पाण्यात पाय टाकला. समोरचा जलमार्ग कापून जायचे होते त्याला ! पण  जसा टोपलीतील बाळाच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला तसे पाण्याचा प्रवाह त्याच्यासाठी मार्गच बनला जणू ! ती वेळ त्याची होती. दोघेही यमुना पार झाले. तिकडे नंदाच्या घरी यशोदेच्या कुशीत नुकतेच जन्माला आलेले कन्यारत्न होतेच. यशोदेच्या कुशीत त्या बाळाला ठेवून तिच्या बाळाला नंदाने वसुदेवाच्या स्वाधीन केले. आपल्या कुशीत नुकतंच जन्माला आलेला बाळ दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं ! किती वाईट वाटलं असेल यशोदेला ! आणि हेही माहीत होतं की, हे बाळ आपल्याला परत दिसणार नाहीये ! यशोदेची लाडकी मथुरेत आली वसुदेवाबरोबर ! 

देवकी प्रसूत झाल्याचे कळताच कंस कारागृहात आला. बाळाचा जन्म होऊन दुसरं बाळ तिथे आणण्याच्या या प्रक्रियेत किती वेळ गेला असेल देव जाणे ! पण कृष्ण सुरक्षित स्थळी पोचला आणि यशोदेची कन्या देवकीकडे आली ! त्यागाची, कसोटीची वेळ होती प्रत्येकाच्या ! वसुदेव- देवकीने मनावर दगड ठेवून आपलं बाळ दुसरीकडे सोपवले होते, तर नंद- यशोदेने आपली  छोटी लेक दुसऱ्याच्या हाती दिली होती !

तो बालजीवही त्यागासाठी सिद्ध होता जणू ! वसुदेव देवकीला उघड्या डोळ्यांनी त्या बालिकेच्या मृत्यूला पहावे लागणार होते ! जीवनातील एक कसोटी पूर्ण करावी लागणार होती. 

… या सगळ्यांना खेळवत होता तो ‘ परमात्मा ‘ .. ज्याचा जन्म, दुष्टांच्या संहारासाठी झाला होता. त्यासाठी बालरूप घेऊन तो पृथ्वीवर अवतरला होता ! त्याच्या नवीन जन्माची हीच ती ‘ वेळ ‘ होती.

कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना कृष्णाचे हे आश्वासन आपल्या मनात कायम रहाते,

‘यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत,

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मन शुद्ध तुझं ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मेजर शशीधरन नायर !… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…!) इथून पुढे —

सैन्यतुकडी पुढे निघालेली असताना वाटेवर बेमालूमपणे लपवून, जमिनीत पेरून ठेवलेल्या एका सुरूंगाने घात केला आणि साहेबांना आणि जीवन गुरंग नावाच्या एका रायफलमन सैनिकाला पुरतं घायाळ केलं…. शर्थीचे वैद्यकीय उपचार व्यर्थ ठरले! 

तिरंगी राष्ट्रध्वज पांघरलेली, फुलांनी सजवलेली शवपेटी… त्यात मेजर शशीधरन साहेबांचा निष्प्राण देह…. घरी आला… शेवटच्या दर्शनार्थ… ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादत होता. तिला धावत जायचं होतं त्याचं अंतिम दर्शन घ्यायला…. पण पायांत शक्ती नव्हतीच आधी पासून, आणि आता त्या पावलांना आधार देणारे हातही निघून गेले होते…. जीवनरथाचं एक चाक निखळून पडलं होतं!

तिने त्याचा हात हातात घेतला….. त्या अचेतन हातामधली ऊब तिच्यासाठी अजूनही तशीच होती. ती थोडी मागे सरली…. तिच्या चाकाच्या खुर्चीमागे तो उभा असल्याचा भास झाला तिला… जणू तो म्हणत होता… ‘मी आहे तुझ्या पाठीशी!’ 

शूर वीर सैनिकाच्या मानवंदनेसाठी हवेत गोळीबाराच्या एकवीस फैरी झाडण्यात आल्या…. चिता धगधगू लागली.. ती आता स्तब्ध, नि:शब्द.. तिच्या डोळ्यांतील आसवांचा पूर पापण्यांशी झगडतो आहे…. त्याने तिला उचलून घेतल्याच्या आठवणींच्या डोहात ती बुडून गेलेली…. गोळीबाराच्या आवाजानं सैरभैर होऊन स्मशानातील झाडांवरून उडून गेलेली पाखरं आता पुन्हा फांद्यांवर येऊन बसली होती.. शांत! 

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुमबसरी गावचे विजयन नायर पुण्याजवळच्या खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्रात नोकरीसाठी आले होते. शशीधरन हे विजयन आणि लता नायर यांचे एकुलते एक सुपूत्र.

शशीधरन राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सैन्याधिकारी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या पदकवायतीमधील सावधान-विश्रामचा आवाज घरबसल्या ऐकता ऐकता मोठे झाले. देशभरातून आलेले सुदृढ, बुद्धीमान आणि आत्मविश्वासाने भारलेले युवक बघून त्यांनाही वाटायचं… ‘आपल्याही अंगावर हा गणवेश चढवता आला तर?’

तसं कुटुंबातलं, घरातलं फारसं कुणीही सैन्यसेवेत नव्हतं. याचाच अर्थ शून्यातून आरंभ करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं… एकट्यानं. त्यासाठीचा मार्ग शशीधरन यांनी निवडला आणि त्या मार्गावर आत्मविश्वासाने पावलेही टाकली.  

केंद्रीय विद्यालयांतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकू लागले. अर्थातच एन.सी.सी. मध्ये प्रवेश घेतलाच… कवायतीसाठी शशीधरन दर रविवारी वीस किलोमीटर्सचं अंतर सायकल हाकत यायचे आणि परत जायचे….. हे एवढं सायकलींग, त्यात पुन्हा कवायत… थकून जायला व्हायचं… स्वप्नं अशीच तर पूर्णत्वास जातात! 

एके दिवशी शशीधरन डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये दाखल झाले… आणि एक कणखर सैन्याधिकारी म्हणून भारतीय सैन्यात रुजू झाले!

पुण्यात सुट्टीवर आलेले असताना त्यांचा परिचय तृप्ती यांचेशी झाला… परिचयाचं रुपांतर प्रेमात झालं…. साखरपुडा झाला ! आणि काहीच दिवसांत तृप्ती यांना multiple arteriosclerosis नावाचा विकार जडल्याचं निष्पन्न झालं. या विकारात रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती कडक होऊन जातात. रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. 

तृप्ती यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही बाब नायर यांच्यापासून लपवली नाही. मित्र-नातेवाईकांनी ‘हे लग्न करू नये’ असा सल्ला शशीधरन यांना दिला, पण साहेबांनी त्यांना साफ नकार दिला. आणि मोठ्या दिमाखात तृप्ती यांना मिसेस तृप्ती शशीधरन नायर असं हक्काचं नाव दिलं… एका सैन्याधिका-याची पत्नी म्हणून सन्मान प्राप्त करून दिला. 

पण पुढे दुर्दैवाने सौ. तृप्ती यांचा आजार बळावला आणि त्यांचे कमरेखालील शरीर लुळे पडले. मेजरसाहेबांनी तृप्ती यांची सर्वतोपरी काळजी घेतली… त्यांना अतिशय सन्मानाने वागवलं. हे दांमप्त्य अनेकांसाठी प्रेमाचा आदर्श बनलं! मेजरसाहेब ११ जानेवारी,२०१९ रोजी देशासाठी कश्मिरमध्ये हुतात्मा झाले!

लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत साहेब आपल्या ट्विटर पोस्ट म्हणतात… 

‘If you do not know or have not read about the love story of Maj Shashidharan and Trupti Nair. Then you do not know what pure and selfless love is!!’

‘मेजर शशीधरन आणि तृप्ती यांची प्रेमकहाणी तुम्हांला माहिती नसेल, तुम्ही ती वाचली नसेल तर तुम्हांला पवित्र आणि नि:स्वार्थ प्रेम माहित नाही, असं होईल!’     

“My dear countrymen, Please tell your children about Maj Nair, his life is a lesson in how to respect a woman and how to honour your words!!,”

“माझ्या देशवासियांनो, आपल्या मुलांना मेजर शशीधरन नायर यांच्याविषयी सांगा… शशीधरन यांचे आयुष्य म्हणजे महिलांना कसा आदर द्यावा, आपला शब्द कसा पाळावा, याचा आदर्श वस्तूपाठच आहे.”

अहलावत साहेबांचा हा सल्ला प्रत्येकाने मानला तर किती छान होईल. भारतीय सैन्यपरंपरेमध्ये महिलांचा सन्मान करणे, हे महत्त्वाचे तत्व मानले जाते आणि ते सैनिकांमध्ये बिंबवले जाते. मेजर शशीधरन नायर साहेबांनी हे तत्व प्रत्यक्ष जगून दाखवले. 

मेजर शशीधरन नायर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. साहेबांच्या हौतात्म्याच्या काहीच वर्षे आधी त्यांचे पिताश्री विजय नायर देवाघरी गेले होते! साहेबांच्या मातोश्री लताजी यांना, त्यांच्या पत्नी तृप्तीताईंना जीवनाची लढाई लढण्यासाठी परमेश्वर अधिक शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना!

३० जुलै हा शशीधरन साहेबांचा जन्मदिवस. हुतात्मा सैनिकांच्या जन्मदिनी, बलिदानदिनी, उमा कुलकर्णी या भगिनी या सैनिकांची आठवण आपल्याला करून देतात. त्यानुसार त्यांनी मेजर साहेबांची आठवण करून दिली. मेजरसाहेबांची प्रेरणादायी प्रेमकहाणी मला समजली तशी आपल्यासमोर नव्याने मांडली. आपणही इतरांना सांगाल ना?  धन्यवाद! जयहिंद! 

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

… गोष्ट एका विशालहृदयी सैनिकाची ! 

नियतीने स्वर्गात बांधलेली त्यांची लग्नगाठ आता सैल होईल आणि सुटून जाईल, असं सर्वांनाच वाटलं होतं. किंबहुना त्याच्या काळजीपोटी त्याच्या आप्तांनी, मित्रांनी त्याला ‘ ही गाठ सोडवून घे ‘ असा सल्लाही दिला होता… जगाला व्यवहार जास्त प्रिय असतो आणि त्यात चुकीचंही काही नाही म्हणा ! 

पण हा पडला शिपाईगडी… शब्दाचा पक्का… इमान राखणारा! देशासाठी तळहातावर शीर घेऊन मरणाला सामोरं जाण्याची खरीखुरी तयारी ठेवणारा जवान ! 

लढाई सीमेवरची असो किंवा जीवनातली… दोन्ही आघाड्यांवर निष्ठा महत्त्वाची! प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असतं असं म्हटलं जात असलं तरी त्याला प्रेमात कोणताही अपराध करायचा नव्हता !

त्याला ती अशीच योगायोगाने भेटली होती… सुंदर, सालस आणि मनमोकळी. पहिल्याच भेटीत त्यानं तिला आपलं काळीज बहाल केलं…. महिलांशी अत्यंत सुसंस्कृतपणे वागणारा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तो तिला भावला नसता तरच नवल! तिने त्याच्या हातात निर्धास्तपणे आपला हात दिला…. आणि ते दोघं आता एक झाले… प्रेमाच्या आणाभाका झाल्याच आणि या प्रेमाच्या या अलंकाराला  व्यवहाराचं, समाजमान्यतेचं साखरपुड्याच्या गोडीचं कोंदणही लगोलग लाभलं… सीमेवरील कर्तव्ये बजावताना थोडेशी उसंत काढावी आणि लग्नबंधनात स्वत:ला बांधून घ्यावं, असं ठरलं ! 

मोहरलेल्या मनाची ती, आनंदाच्या वाटेवर अलगद चालत निघालेली.. पण कसा कुणास ठाऊक, त्या पावलांमध्ये शारीरविकाराचा काटा शिरला… विव्हल होऊन गेली ती. चालणारी पावलं आता कुणाच्यातरी आधाराची मिंधी झाली. कशी चालणार सप्तपदी? लोक म्हणाले… ‘ थांबव तुझा हा प्रवास. त्यालाही मोकळं कर या तुझ्यासोबतच्या प्रवासातून… त्याला त्याची एखादी वाट खुणावेलच कधी ना कधी तरी !’

तिलाही हे पटलं… आणि त्याला काही इलाजही नव्हताच की ! लग्न म्हणजे शरीराचा व्यवहार…. यात एक व्यंग आणि एक अव्यंग अशी जोडी विजोड. त्याच्या कानांवर सुद्धा हा आघातच होता… पण असे आघात पचविण्याची सवय असते सैनिकाच्या मनाला. तो म्हणाला… “आमचं लग्न झालं असतं आणि मी लढाईत माझे पाय गमावले असते तर तिने मला सोडले नसते… माझी खात्री आहे !”

तो सीमेवरून थेट आला आणि विवाहवेदीवर चढला.. ती विकल… असहाय… तो तिचे पाय झाला…. एकट्यानं अग्निप्रदक्षिणा केल्या… एक पाऊल त्याचे आणि एक तिचे. सातव्या पावलावर वधूने वराला वचन द्यायचे असते.. ‘मी तुझ्याशी माझे मैत्र अविनाशी ठेवीन… काहीही झाले तरी… आता आपली पावले जोडीने जीवनाच्या वाटेवर सुखाने मार्गाक्रमण करीत जातील !’ 

तिची पावले आता तर जमीनीला स्पर्शूही शकणार नव्हती…. पण तो म्हणाला… ‘ मी चालेन तुला कवेत घेऊन !’ आणि देव, ब्राम्हण, सगे-सोयरे यांच्या साक्षीने तिचा पत्नी म्हणून स्विकार केला….. आता चार पावलांचा प्रवास दोन पावलं करू लागली होती. दिवस फुलपाखरांची सोंगं घेऊन येतात… नकळत उडूनही जातात. 

आठ महिन्यांत तिच्या शारीरविकाराने उसळी घेतली आणि निम्म्या देहाची आणि संवेदनांची ओळख कायमची पुसली गेली. हे तर निम्मं जगणं… अर्धाच श्वास घेणं जणू! पण तो तसूभरही डळमळला नाही! आता तिचे श्वासही तोच घेऊ लागला आणि तिच्या उरलेल्या देहात चैतन्य भरू लागला. 

तो कुठंही एकटा जात नसे… ती सोबत पाहिजेच. त्याचा तसा आग्रहही असायचा. ती संकोचून जायची. त्याने तिची भीड चेपवली. लग्नसमारंभ, मेजवान्या, हॉटेल्स, भेटी-गाठी या सर्वांत तो तिला चाकांच्या खुर्चीतून न्यायचा… आणि वेळप्रसंगी तिचा भारही वहायचा… प्रेमानं ! बघणारे स्तिमित होऊन जायचे.. आणि तिचा हेवाही करायचे ! 

रंगरूप, तारूण्य, विचार, भावना आणि आर्थिक, सामाजिक स्थान यांच्यात तफावत पडत गेल्यावर एकमेकांपासून दुरावणारी, प्रसंगी खुशाल अनैतिकतेच्या मार्गाने जाणारी दांम्पत्ये पाहण्याची सवय झालेला समाज…. त्याला आश्चर्य होणारच! पण भारतीय सैन्यामध्ये महिलांचा सन्मान राखण्याची, जपण्याची शिकवण ही अंगभूत. सहकारी, अधिकारी त्याच्या  ह्या दिलदारपणावर बेहद्द फिदा होते.

युद्धात पाय गमावलेला एखादा सैनिक जेंव्हा चाकांच्या खुर्चीवर बसलेला असतो, तेव्हा त्याच्या खुर्चीमागे त्याची पत्नी चालत असलेली पाहण्याचा अनुभव असलेले डोळे हे दृश्य बघून विस्फारले जायचे… आणि त्याच्याकडे मोठ्या आदराने बघत रहायचे…. तिला संकोचून जायला होऊ नये अशा बेताने… आणि ती सुद्धा आता सरावली होती ! 

दिवस म्हणजे पाखरं… उडून जाण्यासाठी खाली उतरलेली. तो सीमेवर गेला आणि कर्तव्यात गुंतला… आता त्याची दोन मनं होती… एक कामात आणि एक तिच्या आठवणींमध्ये रमलेलं. 

तो असाच सुट्टीवर आला आणि त्याने तिला मनसोक्त हिंडवून-फिरवून आणलं! आणि त्याची सीमेवर जायची वेळ आली नेहमीप्रमाणे, आणि निघाला सुद्धा ! 

त्याला आता संघर्षरत सीमेवर कर्तव्यासाठी नेमलं गेलं होतं… ती मनातून घाबरली… तो म्हणाला होता ‘मी परत येईन! आधी नव्हतो का परतलो…. उंच पर्वतशिखरांवरून, मृत्यू भरलेल्या जंगलांतून आणि प्रत्यक्ष सीमेवरूनही? आपल्या घराजवळच नव्हती का काही महिने पोस्टींग मिळाली मला? तेंव्हा होतोच की सोबत! आता सीमांनी पुन्हा एकदा बोलावणं धा   डलं आहे… जायला पाहिजे… राणी!’

आणि मेजर शशीधरन साहेब सीमेवर रुजू झाले. शत्रूने रस्त्यात सुरुंग पेरून ठेवलेले होते… त्यात आधीच आपले काही जवान जखमी झाले होते. अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारणं अनिवार्य होतंच. ही कामगिरी करण्यासाठी निघालेल्या गोरखा रायफल्सच्या पथकाचे नायक होते… मेजर शशीधरन नायर!… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…! 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆

भाऊ माझे अतिशय आवडते लेखक आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या सांजवात या कथासंग्रहाचा परिचय करून देत आहे. भाऊंचे लेखन म्हणजे जीवनाचा वास्तववाद. लेखन हे काल्पनिक असले तरी ते वाचताना, हे कथानक भोवताली घडले आहे असे वाटत राहते.

सांजवात: लेखक वि.स.खांडेकर 

प्रथम आवृत्ती 1948 

प्रकाशक.. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे 

या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत.

1.तीन जगे 

2.शिखर 

 3.दोन मोसंबी 

4.शांती 

5.सोन्याची गाडी 

6.दोन भुते 

7.सांजवात 

यापैकी शांती, शिखर व दोन भूते या तीन रूपक कथा आहेत. 

तीन जगे : … 

समाजातील तीन वर्ग म्हणजे खांडेकरांनी मांडलेली ‘ तीन जगे ‘ ही कथा होय. श्रीमंत वर्ग ,कनिष्ठ वर्ग व मध्यमवर्ग असे तीन वेगवेगळे विश्व आहेत. आजही या तीन वर्गात फार मोठी तफावत आहे. ती पुढे कधी भरून येईल असं वाटत नाही. या कथेत शेटजी नावाचे एक पात्र आहे. हा कथासंग्रह लिहिला तेव्हा गांधीयुग होते. त्यामुळे गांधीजींची शिकवण कथासंग्रहात डोकावते आहे. कथेतील शेटजी गांधीजींच्या व्याख्यानाला जातात, पुतळा उभारण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. रोशन नावाच्या आपल्या रखेलीवर वारेमाप खर्च करताट., पण एका हरिजन विद्यार्थ्यास शिकायला पैसे देत नाहीत. यालाच म्हणतात खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे. समाजातही अशाच रूपाची अनेक माणसे दिसून येतात. मयत झालेल्या व्यक्तीस खांदा द्यायला पुण्य समजतात, श्रदांजली लिहिताना भावूक होतात, पण नियातीपुढे हतबल झालेल्या जिवंत माणसास टेकू देण्यास असमर्थतता व्यक्त करतात.

दोन मोसंबी :   

दुःख मांंडताना वेदनेच्या भळभळीलाही फुलांच्या महिरपीत सजवावं .हे भाऊंचे वैशिष्ट्ये .दोन मोसंबी ही कथा वाचताना अश्रू येतात.या कथेचा नायक एक कवी आहे.कवीची भाची आजारी असते.तिला दोन मोसंब्या हव्या असतात.पण जगाचं सुख दुःख मांडणा-या शब्दानं श्रीमंत असलेल्या कवीच्या खिशात दमडीही नसते.खिशात एखादा आणा सापडतो का ? हे चाचपण्यासाठी कवी खिशात हात घालतो ,तर खिशात पैसा नव्हताच पण कविता लिहिलेला एक कागद सापडतो.कवितेवर काही पैसे मिळतील व भाचीसाठी मोसंबी घेता येईल म्हणून कवी संपादक ,चित्रपट व्यावसायिक यांच्याकडे जातो.कुठेही पैसा मिळत नाही पण अवहेलना मात्र खिसाभरून मिळते.इकडे आजारी भाचीला झोप लागते.झोपेतच तिला दोन मोसंब्या मिळाल्याचं स्वप्न पडतं.अन् या स्वप्नाच्या बळावरच ती ठणठणीत बरी होते.स्वप्नावरचं जीणं म्हणजे गरीबीचं आवसान होय.मूळ कथा आपण वाचावी.

सोन्याची गाडी :

ही कथा मूल्य पेरणारी कथा आहे. कथेचा नायक दादासाहेब लहाणपणी चोरी करतो. दादासाहेबांचे वडील त्यांना खूप मारतात. पण रात्रीच्यावेळी सगळे झोपलेले असताना वडील ढसढस रडत असतात. उरातला बाप अंधारात उफाळून आलेला असतो. स्फूंदण्याचा आवाज ऐकून बालपणीचे दादासाहेब उठून वडिलांजवळ येतात. लेखकाने बाप-लेकातील रंगवलेला संवाद कोण्याही काळातील बापलेकाची भाषा आहे. तो संवाद म्हणजे अमर उपदेश आहे. मुलाने चोरी केल्याचे कळताच हवालदिल झालेल्या बापाच्या मनात येतं..  गुलाबाच्या झाडाला कुठून कीड लागते कळत नाही. पण कीड लागल्याचे कळताच त्याच्या फांद्या वेळीच छाटाव्या लागतात नाहीतर झाड मरून जातं. वडील मुलाला सांगतात …  विकाराची वाळवी मनाला लागली की पोखरलेल्या मनामुळे आयुष्य भंगूर व्हायला वेळ लागत नाही.

सांजवात : 

कथासंग्रहाचे शीर्षक असलेली सांजवात ही या पुस्तकातली शेवटची कथा. देशभक्ती ,ध्येय व तत्व यांची सांगड म्हणजे सांजवात. सांजवात कथेचा नायक दिनकर गांधीजींच्या विचाराने भारावलेला आहे. तो स्वतः नास्तिक आहे. पण त्याची आई दररोज तुळशीवृंदावनापुढे सांजवात लावत असते. आई म्हणजे दिनकरचा गुरूच. सांजवात लावण्यामागचे कारणही आई त्याला सांगत असते, पण दिनकरला ते पटत नाही.1942 च्या क्रांतिकारी आंदोलनात तो सक्रीय सहभागी असतो. गांधीजींच्या विचाराने तो भारावलेला असतो. पण आईला व भावाला त्रास होऊ नये म्हणून तो माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवतो. आईला याची कुणकुण लागताच ती त्याला जे सांगते त्या मातृपदेशाला तोडच नाही. मॕक्झिम गॉर्की लिखित आई कादंबरीची आठवण व्हावी असा तो प्रसंग आहे. आई दिनकरला म्हणते .. “ बाळा असं कृतघ्न होऊ नकोस. देशासाठी तू फासावर जा.” … खरं तर असे सर्वच संवाद मूळ कथेत वाचायला हवेत. .

आईचा काही दिवसानंतर मृत्यू होतो. आईच्या मृत्यूनंतर नास्तिक असलेला दिनकर उठतो व तुळशी वृंदावनासमोर सांजवात लावतो. ती वात म्हणजे आपली आईच आहे,असं त्याला वाटत असते. आईच्या मृत्यूनंतर तो दररोज सांजवात लावतो. 

… भाऊंनी जे जे लिहिलं ते अमर ,अभिजात आहे. भाऊंनी लिहिलेल्या साहित्यावर एकूण २८  चित्रपट निघाले आहेत. देशातील व परदेशातील काही भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.ही गोष्ट त्यांचे अलौकिकत्व सिद्ध करते.

आज भाऊंचा स्मृतिदिन. स्मृतिदिनी भाऊंना विनम्र अभिवादन करताना एक गोष्ट सांगण्यास मला स्वतःचाच अत्यंतिक अभिमान वाटतो की भाऊंनी लिहिलेल्या सर्व कादंब-या ,तीन कथासंग्रह मी  वाचलेली आहेत. पण एकही नाटक न वाचल्याची खंत आहे हेही तितकेच खरे. 

– समाप्त – 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆

2 सप्टेंबर हा दिवस वि. स. खांडेकर यांचा स्मृतिदिन. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे मराठी साहित्यातला कोहिनूर हिरा.एका शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी त्या शब्दाला उपमानाचे विविध अलंकार चढवून ,इंद्रधनूची कमान सजवून तो शब्द मांडावा तो खांडेकरांनीच. वि.स.ना भाऊ या नावाने संबोधत असत, पण हेच भाऊ साहित्यातला ‘ दादा ‘ माणूस होता ,बाप माणूस होता.

ऊंचा जन्म कोकणातला .आजोळचं राहणं एका गणपती मंदिरातलं. गणपती मंदिरातच त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले होते. गणेश आत्माराम खांडेकर हा बालक शाळेत खूप हुशार होता. वडिलांचं छत्र जास्त दिवस मिळालं नाही. बाल गणेश जेमतेम बारा तेरा वर्षाचा असतानाच वडील सोडून गेले. मामाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 1913 साली ते मॕट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा अहमदाबाद ,बेळगाव,मुंबई या बोर्डातून ते पहिल्या दहात होते. वाचन व लिहिण्याची त्यांना खूप आवड होती.सोळाव्या वर्षीच त्यांनी ‘ रमणीरत्न ‘ नावाचे नाटक लिहिले होते.त्यावेळचे प्रख्यात नाटककार वासुदेवा शास्त्री त्यांना म्हणाले होते की ,’ हे नाटक तू लिहिले आहेस.यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.’ ते नाटक म्हणजे उत्कट प्रेमाचा आशय होता.हे नाटक प्रकाशित होऊ शकले नाही.

शिरोडे जि.सिंधुदुर्ग येथे भाऊंनी जवळपास अठरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ययाति,अमृतवेल वगळता त्यांच्या अनेक साहित्यकृती शिरोड्याच्या शाळेतच जन्माला आल्या. ‘ हृदयाची हाक’ ही  पहिली कादंबरी लिहिली व भाऊ थेट  ज्ञानपीठापर्यंत पोहचले. साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च मानाचं पद स्वीकारत असताना त्यांच्या पूर्णतः दृष्टीहीन डोळ्यात सगळा जीवन चित्रपट उसळला असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर ते खूप पोरके झाले होते. मामा वगळता जवळच्या नात्यातून कोणाची मदत होत नव्हती. त्यांचे चुलते सखाराम यांनीही मदत नाकारली होती. या सखारामला चौदा अपत्य होऊनही फक्त एकटी वारणाक्का जिवंत होती. पुढे याच सखारामने वारसा चालविण्यासाठी गणेशला दत्तक घेतले व हा गणेश म्हणजेच तिथून पुढचा विष्णू सखाराम खांडेकर होय. वारणाक्का बहिणीने दिलेले भाऊ हे कौटुंबिक नाव त्यांना आयुष्यभर चिटकून राहिले.

भाऊंनी अमर्याद लेखन केले. लेखनाचे विषय व त्या विषय अनुषंगाने उभी केलेली पात्रे अजरामर झाली.

‘रिकामा देव्हारा‘ ही त्यांची कादंंबरी स्त्रीचे महत्व सांगणारी आहे. ज्या घरात स्त्रीस देवतेसमान मानले जात नाही, ते घर म्हणजे रिकामा देव्हाराच होय. एवढ्या एका ओळीवरून कादंबरीच्या विषयाची प्रचिती येते. ‘ जळलेला मोहर ‘ मांडताना त्यांनी स्वप्नभंग झालेल्या स्त्रीची कथा मांडली आहे.’ अश्रू ‘ कादंबरीचा नायक म्हणजे शिक्षकी व्यवसायतल्या गुरूजीच्या तत्वनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना होय.

लहानपणीपासूनच प्रकृतीने कृश असलेल्या खांडेकरांना उत्तम प्रकृतीमानाचे स्वास्थ्य लाभले नाही. दोन्ही डोळे अधू होते .कणकण व अंगातला ताप तर कायम पाचवीला पुजलेला. शिरोडे येथे कार्यरत असताना एकदा सर्पदंशही झाला होता. वाढत्या वयानुसार डोळ्याचा नंबरही वाढत गेला.1972 साली भाऊंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली  व  जगाला शब्दसूर्याचा प्रकाश देणारा हा शब्दमहर्षी कायमचा अंधकारमय झाला. चार लेकरं पदरात देऊन पत्नीनेही जाण्याची घाईच केलेली होती. जीवापाड जपलेली उषा ,अर्ध्या वाटेतच काळोख करून गेली होती. पत्नीवियोगानंतरचं आयुष्य अत्यंतिक खडतर असतं. पत्नी उषाताईच्या अकाली जाण्याने भाऊ खचले होते .वाचन व लेखन या दोन शक्ती त्यांच्या प्राण होत्या. मंदाकिनी ही त्यांची लेक भाऊंची आईच झाली होती. स्वतःची नोकरी सांभाळत तिनं अंध भाऊचे आजारपण सक्षमपणे पेलले होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. 

राम गणेश गडकरी हे वि.स.खांडेकरांचे गुरू. एकदा बालगंधर्वाच्या घरी गडकरी व विशीतला वि.स.गेले होते. त्यावेळी हा तरूण कोण ? या बालगंधर्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले होते.. ‘  हा तरूण श्रीपाद कोल्हटकरांच्या गादीचा वारसदार आहे.’ त्या काळात सांगली म्हणजे नाट्यासाठी स्वर्गभूमी होती व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या रंगभूमीचे निर्विवाद देव होते. इतक्या मोठ्या माणसासोबत झालेली तुलना व तुलना करणारे गडकरी म्हणजे साहित्य क्षेत्रातला अढळ तारा…. या दोन्हीचा सुखात्म परिणाम खांडेकरांच्या हृदयात लेखनाचे बीज पेरून गेला व त्यांनी जे पेरले ते आज जगासमोर आहे. स्वातंत्र्य,  समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांची कास वि.स.खांडेकरांच्या लेखनात दिसून येते. प्रस्तावना हे भाऊंचे खास बलस्थान. औपचारिक प्रस्तावना असं न लिहिता भाऊ ‘ दोन शब्द ‘ असं लिहून पुस्तकाची पार्श्वभूमी लिहितात. ‘ पहिले प्रेम ‘ या पुस्तकाला तर कादंबरीपेक्षा प्रस्तावनाच मोठी वाटावी इतकी ती विस्तृत आहे. स्वतःच्या सर्व ग्रंथासह इतर ६३ लेखकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

त्यांच्या प्रस्तावनेचे गारूड कुसुगाग्रजांच्या नजरेतून सुटले नाही. कुसुमाग्रजांनी वि.स.च्या प्रस्तावनेवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. साहित्य क्षेत्राततल्या एका प्रज्ञासूर्याला दुस-या प्रज्ञासूर्याकडून वेगळी मानवंदना काय असू शकते ? नाटक, कादंबरी, समीक्षा ,कविता, कथासंग्रह ,ललितलेखन,निबंधलेखन,नियतकालिकासाठी स्तंभ लेखन,संपादन, अग्रलेख….  असं जे जे म्हणून साहित्यातलं काही असेल त्या प्रत्येक क्षेत्रात भाऊंनी एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे अनभिषक्त राज्य केले आहे. तुमची कोणती साहित्यकृती तुम्हाला फार आवडते ?असं भाऊंना विचारल्यावर भाऊ मिश्किलपणे म्हणत.. ‘ आईला सगळी लेकरं सारखीच.’ तरीही भाऊंना ‘ उल्का ‘ कादंबरी खूप आवडत असे. त्यांनी उल्केच्या प्रास्ताविकातही हे लिहिलं आहे.

उल्का म्हणजे काही अंशी त्यांचं स्वतःचं कथानक आहे. तत्वाला मुरड घालणाऱ्या व मरेपर्यंत तत्वाला चिकटून राहणाऱ्या अशा दोन मतप्रवाहांची कथा म्हणजे उल्का. या कादंबरीत भाऊसाहेब हे एक पात्र आहे. अनेक लोकांना हे पात्र म्हणजे वि.स.खांडेकरच वाटतात. वि.स.खांडेकर लेखनाच्या श्रीमंतीत कुबेराहून अधिक श्रीमंतीचं जीवन जगले पण आर्थिक सारीपाटावर त्यांचे घर नेहमीच दैन्यावस्थेचे प्रतीक राहिले.सहकारी शिक्षकमित्राच्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या एका कादंबरीचे संपूर्ण मानधन देणारा हा दाता ,स्वतःसाठी मदतीची याचना करू शकला नाही. अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडलेली विवंचना लोकांना पुस्तकाचाच भाग वाटली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print