मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी प्रथम. प्रेमाच्या माणसांसाठी मी यश. मी सुद्धा आपल्या भारताच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या अभिमानाने कडक सल्यूट बजावला असता ३० नोव्हेंबरला सकाळी आमच्या पासिंग आऊट परेड मध्ये आणि अंतिम पग पार करून सैन्याधिकारी झालो असतो… पुढे आणखी प्रशिक्षणासाठी गेलो असतो, आणि काही वर्षांत देशाच्या सीमेवर जाऊन उभा राहिलो असतो… पण आता मी नाहीये त्या माझ्या बॅचमेटसच्या शिस्तबद्ध, रुबाबदार रांगेत. माझी जागा दुसरा कुणीतरी भरून काढेलच…. सैन्य थांबत नाही कुणासाठी.

बारा-पंधरा वर्षे हृदयात घट्ट रुतवून ठेवलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला केवळ चाळीसच दिवस उरलेले होते… आणि एवढ्यातच प्राणांचं पाखरू उडून गेलं..!

आईला मानलं पाहिजे माझ्या, आणि वडिलांनाही. दोघंही व्यवसायाने शिक्षक. मी एकुलता एक. पण मी लष्कराच्या वाटेने जायचं म्हणालो तेंव्हा त्यांनी नाही अडवलं मला. खेड्यात राहून शिकलो सुरुवातीला, आणि मग सैनिकी शाळेत जागा पटकावली. तसा मी काही फार बलदंड वगैरे नव्हतोच कधी, पण लढायला आणि सैनिकांचं नेतृत्व करायला आवश्यक असणारी मानसिक कणखरता, शास्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान मात्र मी कष्टपूर्वक प्राप्त केलं होतं एन. डी. ए. मधल्या खडतर प्रशिक्षणात….. थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल चार वर्षे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पासिंग आऊट परेड व्हायची बातमी आई-बाबांना कळाली तेंव्हापासून त्यांनी एन.डी.ए. मध्ये ही परेड पाहण्याची, माझ्या खांद्यावर, छातीवर ऑफिसरची पदकं पाहण्याची स्वप्नं रंगवायला आरंभ केला होता….. फक्त महिना-सव्वा महिन्यांची तर प्रतिक्षा होती. दोघांच्या पगारातून रक्कम शिल्लक ठेवत ठेवत त्यांनी माझा आतापर्यंतचा खर्च भागवला होता. मी अभ्यासात हुशार होतोच, सहज इंजिनियर, डॉक्टर झालो असतोच म्हणा. पण मला लष्करी वर्दीचं आकर्षण लहानपणापासून… नव्हे, तसा माझा हट्टच होता… आणि आई-बाबांनीही या एकुलत्या एका लेकाचं मन नाही मोडवलं.

माझी एन.डी.ए. मध्ये निवड होणं ही किती मोठी गोष्ट असेल हे ज्यांनी प्रवेश परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी, ही दिव्यं पार पाडली असतील त्यांना जास्त चांगले समजू शकेल. आईबाबांना मात्र आपला मुलगा सैन्याधिकारी होणार याचीच मोठी अपूर्वाई होती. प्रशिक्षणास दाखल होताना बाबांनी फॉर्मवर सही करताना वाचलंही होतं…. ‘प्रशिक्षणादरम्यान काही झालं तर, अगदी मृत्यू झाला तरी ‘माजी लष्करी अधिकारी’ अशी ओळख आणि नुकसानभरपाई मिळणार नाही….’ तसा कायदाच आहे लष्कराचा. आता हा नियम मोठ्या लोकांनी तयार केला आहे आणि आजही हा नियम लागू आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच की!

त्या फॉर्मवर सही करताना बाबांनी आईकडे एकवार पाहिलंही होतं ओझरतं… पण असं काही आपल्या प्रथमबाबतीत होईल असा विचारही त्यांचं मन करू धजत नव्हतं. मूळात सैन्य म्हणजे मृत्यूची शक्यता हे समीकरण त्यांनाही माहीत होतंच… त्यांनी काळजावर दगड ठेवून मला एन.डी.ए. च्या पोलादी प्रवेशद्वारातून निरोप दिला…. “यश यशस्वी हो!” दिवस होता १८ एप्रिल,२०२१.

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इतिहासात प्रशिक्षणार्थी सैन्याधिकाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू होण्याच्या तीन घटना घडून गेल्या होत्या…. २ जुलै, २००९ रोजी कॅडेट नितिश गौर, ६ जानेवारी,२०१२ रोजी कॅडेट के. विघ्नेश, ३ फेब्रुवारी,२०१३ रोजी कॅडेट अजितेश अतुल गोएल हे ते तिघे. आता मी चौथा १८ नोव्हेंबर,२०२३ ला या तिघांना जॉईन झालो! लक्ष्य गाठण्याच्या सर्वांत जवळ येणाऱ्यांत मात्र मी प्रथम आलो…

केवळ सव्वा महिना! लष्करात गेलो असतो, लढलो असतो आणि वीरगतीस प्राप्त झालो असतो तर देहाचं सोनं झालं असतं आणि मुख्य म्हणजे आई-बाबांना माझ्या जाण्यानं दु:ख झालं असतं तसा अत्यंत अभिमानही वाटला असता! अर्थात आताही त्यांना माझा अभिमानच वाटत असेल… मी पूर्ण प्रयत्न केले याबद्दल. बाकी एकुलता एक लेक गमावण्याचं त्यांचं दु:ख इतर कुणी समजूही शकणार नाही, हेही खरेच. असो. ईश्वरेच्छा बलियेसी!

असंच काहीसं बोलला असता ना प्रथम ऊर्फ यश महाले जर त्याला आपल्याशी तो आपल्यातून निघून गेल्यानंतरही बोलता आले असते तर?

आजवर एकट्या एन.डी.ए. मधून सुमारे ६००० हजार प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे २.०६% प्रशिक्षणार्थी विविध वैद्यकीय कारणांनी पुढे प्रशिक्षण सुरू ठेवण्यापासून आणि अर्थातच अधिकारी बनण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि ही गोष्ट अपरिहार्य सुद्धा आहेच… देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे…. पण या मुलांचं पुढे काय होतं? हे फारसं कुणाला ठाऊक नाही असं दिसतं. ही मुलं साधी, सामान्य का असतात? लाखोंमधून शेलकी निवडून काढलेली असतात. त्यांचे पालक काळजावर दगड ठेवून त्यांना लष्करात धाडत असतात. लष्करात घेताना एकही व्यंग चालत नाही आणि तोच लेक आईला परत देताना धड दिला जाईल किंबहुना धडासह दिला जाईल, याची शाश्वती कुणासही देता येत नाही!

प्रशिक्षणादरम्यान उदभवलेल्या वैद्यकीय कारणांनी किंवा मृत्यू झाल्याने प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही, सबब त्यांना माजी लष्करी कर्मचाऱ्याचा दर्जा देता येणार नाही, आणि अर्थातच माजी लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू होणारे आर्थिक लाभही देता येणार नाहीत… हे सकृतदर्शनी व्यावहारीकच वाटणे साहजिकच आहे…. पण थोडा अधिक विचार केला तर परिस्थिती भयावह आणि अत्यंत निराशाजनक आहे.. आणि मूळात समाजाला शोभणारी नाही.

ही तरणीताठी, बुद्धीमान, देशप्रेमी आणि धाडसी मुलं (आणि हल्ली मुलीही) देशासाठी मरणाच्या वाटेवर स्वत:हून चालायला निघतात…. ती काही स्वखुशीने जखमी होत नाहीत किंवा मरणही पावत नाहीत! जखमी होणाऱ्या या मुलांना देय असलेल्या रकमांचे आकडे पाहून काळजात कसंतरी होतं. विविध योजनांमधून रूपये साडे तीन हजार, रूपये सहा हजार नऊशे, सात लाख असे काहीसे आकडे आहेत हे… त्यात किती टक्के अपंगत्व हा भाग आहेच. शासकीय नोकऱ्यांमधील काही (विशेषत: निम्नस्तरावरील) पदांच्या भरतीत प्राधान्यही देतात! एवढं पुरेसं वाटतं आपल्या व्यवस्थेला. आणि ही व्यवस्था काही आजची नाही!

याच पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळात बळी घेणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या, धावा घेणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या करमुक्त काहींना पाच लाख, काहींना सात-सात कोटी, मॅन ऑफ दी मॅचचे लाखभर रूपये, या रकमा नजरेत भरतात, यात नवल नाही. रणांगणावरील बळी आणि मैदानावरील बळी यात फरक असला पाहिजे.

शिवाय प्रशिक्षणात जखमी झालेल्यांना आयुष्यभर सोसावं लागणारं ‘दिव्यांगत्व’ हा तर निराळाच मुद्दा आहे. मृत प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांना काय देत असेल व्यवस्था हे ठाऊक नाही! असो.

गेल्या काही वर्षांत लोकसभेत आणि राज्यसभेत याबाबतीत तत्कालीन सरकारांना बिगरतारांकीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरेही दिली गेलीत. काही उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत, असे समजते. पण त्या पुरेशा नाहीत असं समजायला वाव आहे.

आपल्या यश साठी आपण काही करू शकतो का? ही आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी व्यवस्थेला विनंतीपर पत्र, ईमेल, आवाहन करू शकतो. आपल्या प्रतिनिधींमार्फत आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतो.

महाराष्ट्र राज्यशासनही आहेच.

रस्ते अपघातात मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातलगांना त्वरीत लाखो रूपयांची नुकसानभरपाई जाहीर केली जाऊन दिलीही जाते. यश महालेंच्या बाबतीत राज्य सरकारला असे काही करण्याचे सुचवू शकतो.

एक नागरीक म्हणून काही निधी उभारून यश अर्थात प्रथमचे यथोचित स्मारक उभारून, त्याच्या नावाने अकॅडमी स्थापन करून, उदयोन्मुख तरूणांना प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्यासाठी आर्थिक तरतूद करता येईल. किंवा यांसारख्या अन्य सकारात्मक बाबींचा विचार करता येईल.

प्रथमच्या आईबाबांचे नुकसान मात्र आपण काहीकेल्या भरून देऊ शकणार नाही आहोत…. हे मान्य करतानाच आपण काहीतरी केले पाहिजे हे मात्र तितकेच खरे आहे…. कारण देशाला अशा यश आणि प्रथमची गरज कायमच भासणार आहे. यात आपली मुलं कधीच कमी पडणार नाहीत हे खरं असलं तरी आपण काय करणार आहोत… हेही महत्त्वाचे आहे.

दिवंगत Squadron Cadet Captain Pratham Mahale यांना भावपूर्ण श्रद्धांजली… जयहिंद सर ! 

(मी अनाधिकाराने वरील विचार मांडले आहेत.. व्यवस्थेविरोधी लेखन नाही…. पण काही सुचवू पाहणारे मात्र निश्चित आहे. आणि असा विचार असणारे अनेक लोक आहेत. त्यांनी एकत्र आले पाहिजे. लेखाच्या आरंभीचे लेखन मी यशच्या भूमिकेत जाऊन केले आहे. बाकी आपण सूज्ञ आहातच.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच 

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । 

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

कर्मापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कथिसी जनार्दना

घोरकर्म आचरण्या उद्युक्त का करिशी कृष्णा ॥१॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । 

तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ २ ॥ 

तुमच्या या वाणीने झाली भ्रमित माझी मती

कल्याणकारक आता सांगा मजला निश्चित युक्ती ॥२॥

श्रीभगवानुवाच

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । 

ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३ ॥ 

कथित भगवान

विश्वामध्ये निष्ठा असते दोन प्रकाराची

ज्ञानयोगे सांख्ययोग कर्मयोगे निष्ठा योग्यांची ॥३॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । 

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ 

ना आचरता कर्म निष्कर्मता ना होई प्राप्त

त्यागाने कर्माच्या केवळ सिद्धी ना होई प्राप्त ॥४॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । 

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ५ ॥ 

सृष्टीने सकलांना दिधले गुण जीवन जगण्या कर्मी

क्षणमात्र ना जीवनात कोणी राहू शके अकर्मी ॥५॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । 

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥ 

मूढ करितो जरी आपला इंद्रियसंयम

मनी तयाच्या सदैव जागृत विषयचिंतन ॥६॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । 

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥ 

अनासक्त होऊनी मनाने इंद्रिय नियमन

श्रेष्ठ पार्था रे ते निश्चित कर्मयोगआचरण ॥७॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । 

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८ ॥ 

शास्त्रविहित तू कर्म करावे राहून अकर्मी मनी 

देहाचा निर्वाह न सिद्ध होतो अकर्मी राहूनी ॥८॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । 

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥ 

यज्ञार्थ व्यतिरिक्त कर्मांने मनुजा कर्मबंधन

सोडुनिया फलाशा तू करी कर्म आचरण ॥९॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । 

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ १० ॥ 

कल्पारंभी प्रजापतीने यज्ञासवे प्रजा निर्मिली

मनोरथांची पूर्ती होईल यज्ञाची महती सांगितली ॥१०॥

– क्रमशः भाग तिसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । 

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ 

आचरणासी श्रेष्ठांच्या  अनुसरती सामान्य

बोल तयांचे  समस्त जगत मानिती प्रमाण्य ॥२१॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । 

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ 

तिन्ही लोकी मजला पार्था  ना कर्तव्य काही

मजला अप्राप्त असेही काही या विश्वात नाही

देहाचे परि जाणुनिया भोग विन्मुख ना झालो

जीवनात जी विहीत सारी कर्मे करीत आलो ॥२२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ 

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ । 

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

सावध राहूनीया मी पार्था नाही केली कर्मे

सर्वनाश जगताचा होइल जाणुन घे  वर्मे

मलाच अनुसरते हे विश्व मजला श्रेष्ठ मानून

अकर्मी होता मीच सारे होतील रे कर्महीन ॥२३-२४॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥ 

कर्मे करिती कर्मासक्त असती अज्ञानी

कर्म करावी अनासक्त ज्ञानी विद्वानांनी 

संग्रह करणे लोकांचा मनी धरुनी इप्सिता

कर्माचरणी मनुजे व्हावे हे कर्तव्य भारता ॥२५॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । 

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ २६ ॥ 

परमात्मस्वरूपी लीन स्थित ज्ञानी विद्वान

कर्मासक्त अज्ञान्याचा करू नये बुद्धीसंभ्रम

शास्त्रविहित आचरुनीया कर्मे आदर्श मांडावा

कर्म करण्याचा सकलांना सुमार्ग दावावा ॥२६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । 

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥ 

मनुष्यद्वारे कर्मे घडती गुणपरत्वे प्रकृतीच्या

अहंकारमूढ मानतो परी कर्ता मी मम कर्मांचा ॥२७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । 

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ 

समस्त गुण स्थायी गुणात शूर अर्जुना जाण

ज्ञान्या उमगते त्यांचे विभाग कर्म तथा गुण 

जीवन त्याचे असते सदैत तयात विहरत

तयामध्ये तो कधी न बद्ध होउनी आसक्त ॥२८॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । 

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ २९ ॥ 

आसक्तीने मूढ जाहले गुणकर्मातच लुब्ध 

अर्धज्ञानी ते अज्ञानी असती मंदबुद्ध

बुद्धिभेद ना कधी करावा त्यांच्या आचरणात

प्रज्ञावाने मग्न असावे कर्मा आचरत ॥२९॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । 

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥ 

चित्तासी तव एकरूप कर म्या परमात्म्याठायी

अर्पण करी रे तव कर्मांसी माझीया पायी

त्याग करोनी आशेचा ममत्वाचा अन् संतापाचा

शस्त्र धरोनी सिद्ध होई वसा घेउनी युद्धाचा ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

भारतीय प्रमाणवेळ फ्रान्सपेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक १४ जुलै, २०२३ रोजी फ्रान्समध्ये सकाळचे दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे होतील, त्याच क्षणी एका मराठमोळ्या योद्ध्याचा भरभक्कम आवाज घुमेल आणि आसमंत थरारून उठेल! 

त्याच्या एका आज्ञेसरशी एकशे चोपन्न पावलं तिथल्या लष्करी संचलन पथावर आपल्या मजबूत पावलांचा पदरव करीत मोठ्या डौलाने चालू लागतील ! त्यांच्या पुढे असतील महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन अमन हनुमानराव जगताप…. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा ! 

फ्रान्समध्ये भारतीय सैनिकांची पडलेली ही काही पहिली पावलं नसतील. दोन्ही महायुद्धांमध्ये भारतीय सैनिक दोस्तसैन्याच्या बाजूने लढले आणि हजारोंच्या संख्येने धारातीर्थीही पडलेत! पहिल्या महायुद्धाने एक लाख तीस हजार भारतीय सैनिकांपैकी सुमारे चौऱ्याहत्तर वीरांचा बळी घेतला तर सदुसष्ट हजार योद्ध्यांना अपंगत्व पत्करावे लागले. दुसऱ्या महायुद्धातून तर तब्बल सत्त्याऐंशी हजार सैनिक माघारी परतले नाहीत! 

या युद्धांची कारणे, परिणाम काहीही असली, शत्रू-मित्र देश कोणतेही असले तरी, या युद्धयज्ञात एक लाख एक्केचाळीस हजार भारतीयांनी बलिदान दिले आहे, हा इतिहास आहे. यात पंजाबी वीरांची संख्या सर्वाधिक, अर्थात सुमारे त्र्याऐंशी हजार भरते. कणखर मनाच्या पंजाबी देहांतल्या रक्तात परंपरेने वहात असलेलं सैनिकी रक्त आज आपल्या स्वतंत्र भारताचे एक मोठे बलस्थान आहे!  

राष्ट्रगीताच्या पहिल्याच ओळीत आधी पंजाब आणि अखेरीस मराठा हे शब्द येतात, हा एक योगायोग खचितच नसावा! 

फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात चौदा जुलै हा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि फ्रान्स देश या दिवसाच्या स्मृती तेथील जनमानसात कायम रहाव्यात म्हणून या दिवशी खास लष्करी पथसंचलनाचे आयोजन करतो.

आपला भारत आणि फ्रान्स यांचं लष्करी नातं तसं खूप जुनं असलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत या संबंधांना उत्तम भक्कम परिमाण लाभले आहे. राफेल विमानांनी आपल्या वायूदलाला अधिक बळ प्राप्त झालेले आहे. जागतिक राजकारणातही फ्रान्स आपला मित्रदेश आहे. 

भारत-फ्रान्स लष्करी सहकार्याचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याचं निमित्त साधून फ्रान्सने भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. याच बरोबर भारताच्या तिन्ही सेनादलांची प्रत्येकी एक तुकडी या पथसंचलानात सहभागी होत आहे. राजपुताना रायफल्सचा वाद्यवृंदही आमंत्रित केला गेला आहे. 

भारताचे लष्करी सामर्थ्य, सैनिकांचा रुबाब जगाला दाखवण्याची ही संधी साधणं हेही खूप महत्त्वाचं आहे. या दृष्टीने हा समारंभ साऱ्या भारतासाठी महत्त्वाचा ठरावा! 

यातील वायूदलाच्या संचलनाचे नेतृत्व एक महिलेच्या हाती असणार आहे… स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी हे त्यांचं नाव. तर भारतीय आरमाराचं प्रतिनिधित्व कमांडर व्रत बघेल करणार आहेत. 

पंजाब रेजिमेंटचं राष्ट्रीय दिनांवेळचे राजपथावरील संचलन हे अतिशय नयनरम्य अभिमानास्पद वाटावे असेच असते. फ्रान्स मध्ये ‘बॅस्टील डे परेड’वेळी आपल्या भारतीय पायदळाचे प्रतिनिधित्व पंजाब रेजिमेंट करणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात या रेजिमेंटने २०१८ मध्ये आणि २०२३ मध्ये उत्कृष्ट पथकाचं पारितोषिक पटकावले आहे. यातील २०२३ च्या संचलनाचे नेतृत्व केले होते कॅप्टन अमन हनुमानराव जगताप यांनी!

अर्थातच फ्रान्स मधली ही जबाबदारीही या आपल्या कॅप्टन साहेबांच्या खांद्यांवर आहे आणि ते ती उत्कृष्टपणे निभावतील यात शंकाच नाही.

फ्रान्स मधील संचलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी कॅप्टन साहेबांविषयी (विशेषत: दै.सकाळ, पुणे) माहिती प्रसिद्ध केली होतीच. पण त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी स्वत: कॅप्टन अमन साहेबांनी स्वत:चा एक छोटा जीवनपट एका युट्यूब विडीओच्या माध्यमातून प्रसारीत केला आहे. हा विडीओ खूप प्रेरणादायी आहे. त्यात बालक अमन हे लष्करी गणवेशात सल्यूट करताना दिसतात एका छायाचित्रात. बालपणीचा त्यांचा देशसेवेचा ध्यास आज एका अभिमानास्पद वळणावर येऊन ठेपला आहे. 

पुण्यात जन्मलेल्या आणि नगरमध्ये शिक्षण घेतलेल्या कॅप्टन अमन हनुमानराव जगताप साहेबांनी अगदी ठरवून आपले लष्करी जीवन घडवले आहे. राजपथ संचलन हे एका अर्थाने त्यांच्या खूप आवडीचं आणि सवयीचं बनलं आहे, असेच आढळते.

एन.सी.सी. मध्ये विद्यार्थी कडेट असताना दिल्लीच्या राजपथावर एन.सी.सी. पथकाच्या पथसंचलनाचे नेतृत्व अमन साहेबांकडेच होते आणि त्यावर्षी त्याच पथकाला प्रथम क्रमांक मिळाला होता! पुढे सैन्यात भरती झाल्यावर त्यांची नेमणूक पंजाब रेजिमेंटमध्ये झाल्यावर त्यांनी संचलनाचे नेतृत्व करावे, हे जणू ओघाने आलेच! त्यांची शिस्त, पथसंचलनातील जोश, रूबाब, अचूकता, सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि नियंत्रण, त्यात अत्यंत रुबाबदार पंजाबी सैनिक, या गोष्टींमुळे त्यांच्या पथकाला सर्वश्रेष्ठ स्थान न मिळते तरच नवल! 

चौदा जुलैच्या पथ संचलनात भारताच्या पायदळाच्या संचलन पथकाच्या अग्रभागी अत्यंत अभिमानाने आणि रुबाबाने चालत नेतृत्व करणाऱ्या या मराठमोळ्या मर्दाला पाहताना प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेलच! 

कॅप्टन साहेब, आपल्याला शुभेच्छा ! जयहिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपण यांना ओळखलंत का? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

आपण यांना ओळखलंत का? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

हे आहेत क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, क्रांतिकारी भगतसिंह यांचे सहकारी. 

भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त. यांनी नॅशनल असेंब्ली मध्ये बाॅम्ब टाकला होता. तेव्हा हे नाव सर्वतोमुखी झाले. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना फाशी झाली आणि बटुकेश्वर दत्त यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेथील यातनामय शिक्षेने त्यांना क्षयरोगाची बाधा झाली, परंतु ते वाचले. नंतरही अन्यत्र त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

१९४७  साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा बटुकेश्वर दत्त यांची सुटका झाली. अंजली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे आता पोटाचा प्रश्न उभा राहिला. स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणार्या बटुकेश्वर दत्त यांना दोन वेळच्या जेवणासाठी गोळ्या -बिस्कीटे विकावी लागली. 

त्यांना कळाले की पटना येथे बस चालवण्यासाठी लायसन्स मिळत आहे. त्यासाठी ते कमिश्नरला भेटले परंतु त्यांना स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले. काय वाटले असेल या क्रांतिकारकाला? ज्याला ब्रिटीश सरकार भयभीत व्हायचे, ज्याने स्वतंत्र भारतासाठी सर्वस्व अर्पण केले, तो आता स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे घालत होता.

१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते

” बटुकेश्वर दत्त यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो  दवाखान्यात तळमळत आहे,  विचारणारासुध्दा कोणी नाही ?” 

हा लेख प्रसिध्द झाला तेव्हा सरकारला जाग आली, पण वेळ निघुन गेली होती. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. शेवटी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी सांगितले की आधी पैसे भरा. लोक म्हणाले “अहो, हे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त आहेत” डाॅक्टर म्हणाले “आम्ही नाही ओळखत, आधी पैसे भरा”

या क्रांतिकारकाचे मन नक्कीच म्हणाले असेल  “जर मी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेवसोबत फासावर गेलो असतो, तर मला हा दिवस पहावा लागला नसता”

२० जुलै १९६५ रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा अंत्यसंस्कार हुसैनीवाला येथे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या समाधिजवळ करण्यात आला. भगतसिंहाच्या आई विद्यावतीदेवी  त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या बटुकेश्वर दत्तांना “भगतसिंहच” मानत असत.

स्वतंत्र भारतात अशा हजारो क्रांतिकारकांची आम्ही उपेक्षा केली. सावरकरांसारख्या क्रांतिकारकाची तर मेल्यानंतरही उपेक्षा केली जात आहे. आज ज्यांची गीते भारतातल्या तरुणांच्या ओठावर असले पाहिजे, त्यांना आम्ही विसरलो आहोत. टिपु सुलतानसारख्या अत्याचारी लोकांच्या जयंत्या सरकारी खर्चाने साजऱ्या झाल्या आणि मातृभुमीसाठी समर्पण करणार्या क्रांतिकारकांच्या समाध्यांवर “ना दीप जलते है, ना फुल चढते है” अशी अवस्था आहे. क्रांतिकारी रामप्रसाद यांनी लिहिले होते,

कभी वह दिन भी आयेगा,

की आझाद हम होंगेl

अपनी ही जमी होगी l

अपना आसमाॅ होगा

शहिदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले

वतन पर मरमिटनोवाला यही निशाँ होगा ll

परंतु  या क्रांतिकारकांना  काय माहित ज्यांच्यासाठी आपण फासावर जात आहोत, ते आपली आठवणही काढणार नाहीत. तेच लोक आपल्याला विसरुन जातील. पंडीत नेहरु जेव्हा म्हणाले की, “आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य मिळवले ” तेव्हा या लोकांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील? 

हे स्वातंत्र्य आम्हाला “बिना खड्ग बिना ढाल” मिळाले नाही.

हजारो क्रांतिकारकांना त्यासाठी फासावर जावे लागले आहे.

महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांची आज जयंती…

अशा महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन ! 🙏

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थुंकेगिरी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “थुंकेगिरी…” ☆ श्री मंगेश मधुकर

रिक्षाचा स्पीड कमी करून ड्रायव्हर पचकन रस्त्यावर थुंकला.तेव्हा राजा संतापला.

“दादा,थांबा.असं रस्त्यावर थुंकणाऱ्या रिक्षातून मला  जायचं नाही !!”

“माफ करा साहेब, पुन्हा असं करणार नाही ” वयस्कर रिक्षावाला म्हणाला, पण  राजाने ऐकले नाही.तो रिक्षातून उतरलाच… 

राजा.. वय चाळीशीच्या उंबरठ्यावर, शिडशिडीत अंगकाठी, जेमतेम साडेपाच फुट उंची, डोक्यावर निम्मं उडालेले छप्पर, बारीक डोळे आणि नाकावरून सतत घसरणारा चष्मा एका हाताने सावरत बोलायची सवय. .बायको- दोन मुलींसह छोट्या फ्लॅटमध्ये राहणारा टिपिकल मध्यमवर्गीय.  पंधरा वर्षापूर्वी एका कंपनीत चिकटला आणि तिथंच इमाने-इतबारे नोकरी करीत राहिला. एरवी नाकासमोर चालणारा राजा एका बाबतीत मात्र कमालीचा तिरसट होता. थुंकण्याची त्याला प्रचंड किळस वाटायची. एरवी सशाप्रमाणे भिऊन जगणाऱ्या राजाला कोणी थुंकताना दिसले की त्याच्या अंगाचा  तिळपापड व्हायचा. लगेच टकळी सुरु व्हायची. याचमुळे अनेकदा भांडणे झाली. राजाची बायको आणि मुली त्याच्या या सवयीला वैतागली होती. अनेकदा समजावले पण राजाच्या वागण्यात फरक पडला नाही. 

दिवाळीच्या सकाळीच चकचकीत फोर व्हीलर मधून जाणारा एकजण रस्त्यावर थुंकला आणि त्याचा प्रसाद बाईकवरून जाणाऱ्या राजाला मिळाला.  मग काय !!!!  

प्रकरण पोलीस चौकीत गेले….. 

“ तुम्ही चांगल्या घरातले दिसताय ” चढ्या आवाजातच इन्सपेक्टरांनी राजाला विचारले.

“ साहेब माझी काहीही चूक नाही ” राजा

“ परत तेच, चांगले शिकलेले वाटता आणि असा विचित्र हट्ट करता ”

“ प्रश्न तो नाही. मला यांना सॉरी म्हणायचे आहे ” आडदांड,दाढीधारी,महागडे कपडे घातलेल्या आणि सोन्याने मढलेल्या नवश्रीमंताकडे बोट दाखवत राजा म्हणाला.

“ तुम्हांला का सॉरी म्हणायचं?? ”

“ साहेब,मी सांगतो ” .. नवश्रीमंत

“ यांच्यानंतर मी बोलतो ” .. राजा. 

“ साहेब,चूक झाली. कान धरतो पुन्हा असं करणार नाही. त्याचं झालं असं की सकाळी आम्ही फॅमिली मेंबर स्कोर्पियोमधून प्रोग्रामला चाललो व्हतो. मला गायछापची सवय, बार लावला होता. सवयीने  मी  पिंक टाकली आणि ती नेमकी याच्या अंगावर पडली आणि समदा तमाशा झाला. लगेच “सॉरी” बोल्लो… एकदा नाही तीनदा.  पण हा माणूस उलटा माझ्यावरच xxxx xxx. आमच्या गाडीसमोर बाईक आडवी लावून भांडायला लागला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. माज्या चुलत्याने पन हात जोडून माफी मागितली. आपल्या रुमालाने याच्या कपड्यावरचे पडलेले डाग पुसले. पण ह्यो ऐकायलाच तयार नाही. लई समजून सांगितले. पण यानं भांडण सुरु केलं. एवढ ऐकण्याची आपल्याला सवय नाही आणि हा कायबी बोलायला लागला. डोकं सटकलं, दिली एक ठेवून. मला वाटलं,आता तरी गप बसलं ..  पण कसलं काय? हा जास्तच पिसाळला. गाडीसमोर आडवा झाला. गर्दी जमली. ट्राफिक जाम, निसता गोंधळ.. कुणीतरी पोलिसांना फोन केला म्हणून आम्ही इथं ”.

“ एवढंच होय. फार ताणू नका. चूक झाली माफी मागितली विषय संपला. वाढवू नका ” इन्स्पेक्टर यांनी राजाला समजावले. 

“ साहेब,आता मी बोलू.” .. राजा.

“आता काय बोलायचे. आपसात मिटवून टाका. चला निघा ” .. इन्सपेक्टरांनी ऑर्डर दिली तेव्हा इतका वेळ उभा असलेला राजा चटकन खुर्चीत बसला.

“ हा अन्याय आहे. तुम्हांला माझी बाजू ऐकून घ्यावीचा लागेल. त्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि यांनाही जाऊ देणार नाही. परत गाडीपुढे आडवा पडेन ” .. एका दमात राजा बोलला.

“ हात वापरू नको. कमरेत लाथ घाल. पट्ट्याने तुडव. सगळी आकड निघाली पाहिजे ”  लॉकअप मध्ये एकाची धुलाई चालली होती तिकडे पाहत इन्सपेक्टर म्हणाले. तेव्हा तिकडून मारण्याचा आणि ओरडण्याचा आवाज वाढला. इन्सपेक्टरांनी राजाकडे पाहिले तेव्हा तो प्रचंड घाबरला पण त्यांच्या नजरेला नजर न देता उसनं अवसान आणून बसून राहिला. खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले होते. उजवा पाय जोरजोरात हालत होता.

“ मग,तुम्हांला अजून काय पाहिजे,बोला ” शक्य तितक्या शांत आवाजात वैतागलेल्या इन्सपेक्टरांनी राजाला विचारले.

“ धन्यवाद साहेब…. रस्त्यावर थुंकताना आपल्याकडे लोकांना काहीच वाटत नाही. मनाची नाहीच तर जनाचीही लाज नसते ” 

“ ए,लाज कोणाची काढतो.xxxx” राजाच्या बोलण्यामुळे नवश्रीमंत भडकला. इन्सपेक्टरांनी दटावले तेव्हा तो शांत झाला.

“ जरा सांभाळून आणि मुद्द्याचं बोला ” इन्सपेक्टर

“ साहेब,थुंकताना कमालीचा कोडगेपणा आपल्या लोकांच्यात भिनला आहे. पाणी पिऊन गुळण्या करणारे, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर सडा टाकणारे बाईकवाले , कारवाले  सगळीकडे दिसतात. आताच्या साथीच्या आजारात सुद्धा अनेक ठिकाणी पचापच चालूच आहे.” राजा तावातावाने बोलत होता.

“ साहेब,भाऊकीत टिळ्याचा प्रोग्राम आहे. आधीच लई उशीर झालाय.आम्ही जाऊ का?? ” नवश्रीमंत.

.. इन्सपेक्टरांनी राजाकडे पाहिले. “ माझी काहीच हरकत नाही. फक्त मला पण यांना सॉरी म्हणायचे आहे .ते यांनी म्हणू दिले की जाऊ दे ” राजा

“आता तुम्ही कशाला सॉरी म्हणताय?? ” इन्सपेक्टर वैतागले.

“ तोच तर प्रोब्लेम आहे. म्हणून तर सगळे इथे आले आहेत ” हवालदार म्हणाले.

“ म्हणजे !! काय ते नीट सांगा ” इन्सपेक्टर

“ साहेब,हा माणूस येडायं, आम्ही हात जोडून सॉरी म्हटलं पण हे बेणं ऐकायला तयार नाही. तोंडाला येईल ते बोलायला लागला. आदी गप होतो पण लईच डोक्यात जायला लागला म्हणून मग……” नवश्रीमंत.

“ गाडीमधून रस्त्यावर थुंकलेलं नेमकं यांच्या अंगावर पडले परंतु लगेच माफी मागितली. आता या साहेबाचं म्हणणं आहे की ते यांच्या अंगावर आधी थुंकणार आणि नंतर माफी मागणार ” हवालदार म्हणाले तेव्हा इन्सपेक्टरांनी मिश्कीलपणे राजाकडे पाहिले. तो कमालीचा शांत होता. चेहऱ्यावर ठामपणा होता. 

खरंतर इन्सपेक्टरांना राजाचे म्हणणे मनापासून पटले होते. रस्त्यावर कुठेही कसेही थुंकणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्याही मनात सुद्धा प्रचंड राग होता.

राजाची “सॉरी” म्हणण्याची आयडिया फार आवडली, पण तसे उघडपणे बोलले असते तर प्रकरण वेगळ्याच दिशेला गेले असते.म्हणून त्यांनी हवालदारांना बोलवून काही सूचना केल्या. लगेचच हवालदार सगळ्यांना घेऊन चौकीच्या बाहेर आले.

“ दादा,हा माणूस तिरपागडा दिसतोय. गप बसणार नाही आणि माग बी हटणार नाही.  तेव्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या आणि मॅटर संपवा. उगीच टाईम घालवण्यात काही फायदा नाही आणि तुम्हांलाच उशीर होतोय.” हवालदार नवश्रीमंत आणि त्याच्या घरच्यांना समजावत होते. 

“हवालदार साहेब, तो अंगावर थुकणार म्हंजी….. याच्या तर आयला xxxxxx ” नवश्रीमंताने राजाची गचांडी पकडली.  

हवालदाराने पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तापलेला नवश्रीमंत शांत झाला. अखेर “नाही-हो” करत तयार झाला. तेव्हा राजाने लगेच खिशातून मसाला पान काढले. ते पाहून हवालदाराने कपाळावर हात मारला.

नवश्रीमंत राजापुढे जाऊन उभा राहिला, पण “नाही नाही” म्हणत परत मागे गेला.  असे दोनतीन वेळा झाले. शेवटी हवालदारांनी कायद्याच्या भाषेत दम दिला. तेव्हा पान खाणाऱ्या राजापुढे महागडा शर्ट घातलेला नवश्रीमंत गच्च डोळे मिटून उभा राहिला.

काहीवेळातच पचकन थुंकल्याचा आवाज आला आणि नंतर “सॉरी,सॉरी,माफ करा ” असे राजाचे शब्द ऐकु आले. शर्टवर उमटलेली लाल रंगाची नक्षी बघून नवश्रीमंताला स्वतःचीच प्रचंड किळस आली. चटकन त्याने अंगातला शर्ट काढला. हाताच्या चिमटीत पकडून त्याने गाडीच्या डिकीत टाकला. 

“आई शप्पथ यापुढं रस्त्यावर कदीच थुकणार नाही. तर पब्लिकमध्ये थुकताना हजार येळेला इचार करीन.” .. नवश्रीमंत.

“ तुम्हांला त्रास झाला त्यासाठी माफ करा. पण माझा नाईलाज होता. घरात आपण कुठंही थुंकत नाही मग रस्त्यावरच का?? ” 

राजाची अनोखी थुंकेगिरी इन्सपेक्टरांना पटली होतो. खिडकीतून राजाकडे पाहत अंगठा उंचावून त्यांनी “वेल डन” खुण केली. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिला प्रकाश – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिला प्रकाश – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

(सायके मोहिमेने सुदूर अंतराळातून लेसरद्वारा पृथ्वीशी साधलेला दूरसंवाद )

६) विलंब (Latency) :-

अंतराळाशी दूर संवाद विनाविलंब होत नसतो. या दूर संवादाच्या वेगावर एक वैश्विक मर्यादा असते, ती म्हणजे प्रकाशाचा वेग जो १,८६,००० मैल प्रती सेकंद एवढा असतो. पृथ्वी समीप कक्षांमधील अंतराळ याने पृथ्वीशी माहितीची जी देवाण-घेवाण करतात त्यामध्ये होणारा विलंब नगण्य असतो. पण जसजसे आपण पृथ्वीपासून दूर जाऊ त्यावेळी होणारा विलंब हे एक आव्हान बनते. जेव्हा मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ असतो – साधारण ३५ दशलक्ष मैल- त्यावेळी होणारा विलंब चार मिनिटांचा असतो. ज्यावेळी मंगळ व पृथ्वी यांच्यातील अंतर जास्तीत जास्त असते – साधारण २५० दशलक्ष मैल- त्यावेळी होणारा विलंब २४ मिनिटांचा असतो. म्हणजेच अंतराळवीरांना पृथ्वीकडे पाठविलेला संदेश मिशन कंट्रोलला पोहोचायला ४ ते २४  मिनिटे वाट बघावी लागेल आणि आणखीन  ४ ते २४ मिनिटे मिशन कंट्रोलने त्यांना दिलेले उत्तर मिळण्यासाठी वाट बघावी लागेल. ज्यावेळी माणूस मंगळावर वसाहत करेल, त्यावेळी पृथ्वीशी त्यांनी केलेल्या संभाषणात, विलंब हा एक घटक आहे हे गृहीत धरून दूरसंवाद अभियंत्यांना दूरसंवाद प्रणालीचे नियोजन करावे लागेल.

७) अडथळा /हस्तक्षेप (Interferance) :-

आपण जसजसे अंतराळात दूर दूर जाऊ तसतशी अंतराळयानाने पाठविलेल्या विदेची व अंतराळयानाकडे पाठवलेल्या विदेची गुणवत्ता ढासळत जाते. त्यामुळे पाठविलेल्या संदेशांमध्ये चुका उत्पन्न होऊ शकतात. दुसऱ्या मोहिमांकडून व सूर्याकडून येणारी प्रारणे, तसेच आपण सूर्यमाले बाहेर गेल्यास अंतराळातील इतर गोलकांकडून (celestial bodies) येणारी प्रारणे यांचा संदेशाच्या गुणवत्तेमध्ये हस्तक्षेप होतो. मिशन ऑपरेशन व कंट्रोलला अचूक विदा प्राप्त व्हावी म्हणून अंतराळ संशोधन संस्था हस्तक्षेप पकडणे व तो दूर करणे यासाठी विविध उपाय योजतात. यांमध्ये कॉम्प्युटरला अशी आज्ञावली दिली जाते जेणेकरून तो हस्तक्षेप विरहित माहिती (वापरण्यायोग्य विदा) अभियंत्यांना देतो.

हॉलिवूड सिनेमांमध्ये परग्रहवासीय विनासायास पृथ्वीवासीयांशी संवाद साधू शकतात असे स्वप्नरंजन दाखविले जाते. नासा, इस्त्रो अशा अंतराळ संस्थांमधील अभियंते हे स्वप्न वास्तवात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातीलच एक टप्पा म्हणजे लेसर आधारित दूरसंभाषण होय.

नासाच्या सायके (psyche)अंतराळयानाने १४ नोव्हेंबर २०२३ च्या पहाटे पृथ्वीकडे १६ दशलक्ष किलोमीटर अंतरावरून यशस्वीरित्या लेसर संकेत पाठविला व अंतराळक्षेत्रात दूरसंभाषणाचे एक नवीन दालन उघडले. ५ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपित केलेले सायके हे अंतराळयान मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान असणाऱ्या व  विविध खनिज द्रव्याने परिपूर्ण अशा सायके याच नावाच्या लघुग्रहाकडे प्रवास करीत आहे. या लघुग्रहाचा अभ्यास केल्याने पृथ्वीच्या लोहयुक्त गाभ्याविषयी अधिक माहिती मिळेल. हे अंतराळयान आणखी एक प्रयोग करणार आहे, यामुळे सुदूर अंतराळाच्या अन्वेषणास नवीन आयाम मिळणार आहे. या प्रयोगाअंतर्गत १४ नोव्हेंबर २०२३ रोजी यानाने पृथ्वीकडे लेसरद्वारे प्रायोगिक तत्त्वावर विदेचे प्रक्षेपण केले. सुदूर अंतराळातून अतिवेगाने प्रवास करत असताना अंतराळयान त्याने प्राप्त केलेला विदा कसा बरे पाठवीत असेल? पृथ्वीवर ज्याप्रमाणे आपण बिनतारी संदेश पाठितो, अंतराळयान विद्युत चुंबकीय वारंवारितेच्या विविध बॅन्डविथस् वर विदेचे सांकेतन करते. सध्याचा विचार केला तर बहुतेक सर्व अंतरिक्ष संदेशन रेडिओ लहरी वापरून केले जाते. विद्युत चुंबकीय वर्णपटात रेडिओ लहरींची तरंग लांबी सर्वात जास्त असते पण वारंवारिता सर्वात कमी असते. ज्यावेळी सर्व घटक समान असतात तेव्हा जास्त बँडविड्थ असणारा संकेत  घट्ट तरंगांमध्ये जास्त विदा सामावून एका सेकंदाला जास्त विदा वाहून नेतो. त्यामुळे वैज्ञानिक विदा पाठवण्यासाठी जास्त बँडविड्थ  वापराण्याला प्राधान्य देतात आणि हे काम आव्हानात्मक आहे. संप्रेषणासाठी इतर विद्युत चुंबकीय लहरींपेक्षा रेडियो लहरी जास्त करून वापरल्या जातात, कारण त्याचे सुयोग्य प्रसारण (propagation) होय. कोणत्याही हवामानात, झाडाझुडपांच्या अडथळ्यांमधून आणि जवळजवळ सर्व बांधकाम साहित्यातून अडथळ्यांना वळसा घालून त्या पुढे जातात. कमी तरंग लांबींच्या लहरी अडथळ्यांवर आपटून विखुरल्या जातात. विदेच्या वेगवान संप्रेक्षणासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन विषयक संस्थेने एक अनोखा प्रयोग करायचे ठरविले. याला सुदूर अंतरिक्ष प्रकाशीय संप्रेषण (Deep Space Optical Communication- DSOC) असे संबोधण्यात आले. यात अंतराळयानाशी संपर्क साधण्यासाठी आवरक्त समीप (near infrared) लेसर संकेतांचा वापर करण्यात आला आहे.

नासाच्या मते DSOC च्या वापरामुळे विदा संप्रेषणाचा वेग तेवढ्याच आकार व क्षमता असणाऱ्या रेडिओ संप्रेषण प्रणालीच्या वेगापेक्षा किमान दहापट वाढेल. त्यामुळे HD व्हिडिओंसह विदेचा मोठा साठा संप्रेषित करता येईल.

DSOC पारेषग्राही (transcevier) असणारे सायके हे पहिलेच अंतराळयान आहे. याचा वापर करून हे यान  पहिली दोन वर्षे पृथ्वीशी उच्चपट्टरुंदी (high band width) प्रकाशकीय दूरसंवाद साधेल.

कॅलिफोर्निया राज्यामधील राईटवूड जवळ असणाऱ्या नासाच्या टेबल माउंटन फॅसिलिटी येथील प्रकाशकीय संप्रेषण दुर्बीण प्रयोगशाळेतून (optical communications telescope laboratiry)१४ नोव्हेंबर २०२३ रोजी लेसर शलाके द्वारा प्रक्षेपित केलेला संकेत सायके वरील पारेषग्राहीने टिपला व या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाने ‘प्रथम प्रकाश’ साध्य केला. उच्चपट्टरुंदीच्या प्रसारणाला असणाऱ्या मर्यादा लक्षात घेतल्या तर हे तंत्रज्ञान कसे काम करते हे समजून घेणे खूप मनोरंजक आहे. नासाच्या अहवालानुसार ‘अचूक वेध’ हे याचे उत्तर आहे. यानावर असणारा लेसर पारेषग्राही आणि जमिनीवरील लेसर प्रक्षेपक या दोघांनी अचूक वेध घेणे आवश्यक आहे. हे म्हणजे हलत्या डाईमचा (२सें.मि. आकाराचे एक नाणे) एक मैल अंतरावरून वेध घेण्यासारखे आहे. यानावरील पारेषग्राही यानाच्या कंपनांपासून विलग करणे, यान व पृथ्वी यांच्या सतत  बदलणाऱ्या स्थितीशी जमवून घेणे आणि कमकुवत लेसर संकेतांमधून विदा प्राप्त करणाऱ्या नवीन संकेत प्रक्रियेच्या तंत्रज्ञानामुळे हे साध्य झाले आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये या तंत्रज्ञानाचे पूर्वी प्रात्यक्षिक झाले आहे. पण DSOC मुळे सुदूर अंतराळात देखील हे तंत्रज्ञान वापरता येणे शक्य आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चंद्रापेक्षाही सुदूर अंतराळात प्रवास करण्याची मानवाची महत्त्वकांक्षा आहे. त्यावेळी वेगवान दूरसंभाषण ही काळाची गरज आहे. नासाच्या अंतरिक्ष तंत्रज्ञान मोहिमेच्या निदेशालयाचे टूडी कोर्टीज म्हणतात, “‘पहिला प्रकाश’ मिळविणे हा DSOC च्या अनेक महत्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. मानवाच्या मंगळावर मानव पाठविणे या उत्तुंग  झेपेला पाठिंबा देणारी ही घटना आहे.”

संदर्भ :

१) nasa.gov/missions/tech-demonstration/space-communications 

२) Indian Express च्या १६.११.२०२३ च्या अंकातील लेख 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिला प्रकाश – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिला प्रकाश – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

(सायके मोहिमेने सुदूर अंतराळातून लेसरद्वारा पृथ्वीशी साधलेला दूरसंवाद )

काल्पनिक विज्ञानचित्रपट व टी.व्ही. सिरीयल्समध्ये परग्रहवासीय पृथ्वीवरील व्यक्तींशी दूरसंवाद साधताना दिसतात. त्यावेळी ते किती सोपे वाटते नाही! लक्षावधी प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या दूरच्या ग्रहावरून हे परग्रहवासी पृथ्वीवासीयांशी व्हिडिओद्वारे जो दूर संवाद साधतात त्यातील चित्रांची व आवाजाची गुणवत्ता अप्रतिम असल्याचे जाणवते आणि या दूरसंवादात परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांशी  बोलणे व दिसणे क्षणाचाही विलंब न होता झालेले दिसते. या काल्पनिक दूरसंवादाची क्षमता वास्तवाशी मेळ खाते का? तर मुळीच नाही!!

पृथ्वीवरून अंतराळाकडे व अंतराळातून पृथ्वीकडे करण्यात येणारा दूरसंवाद ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. सुदैवाने इस्त्रो, नासा व इतर अंतराळ संस्थांकडे अंतराळातून मिळालेला विदा पृथ्वीकडे आणण्याची क्षमता व कौशल्य आहे. इस्त्रोचे दुरमिती, अनुपथन आणि समादेश ( ISRO Telemetry, Tracking and Command – ISTRAC) नेटवर्क व भारतीय सुदूर अंतराळ संपर्क व्यवस्था ( Indian Deep Space Network – IDSN) तसेच नासाचा अंतराळ दूरसंवाद आणि दिक् चलन कार्यक्रम ( Space Communications and Navigation – SCaN) आणि सुदूर अंतरीक्ष संपर्क व्यवस्था ( Deep Space Network – DSN ) व इतर देशांच्याही याप्रकाराच्या प्रणाली यांमुळे चंद्रयान सारख्या मोहिमा, आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष थांबा (international space station), चंद्र व मंगळावरील बग्ग्या (rovers) किंवा नासाची आर्टिमिस योजना यांचेबरोबर विदेचे अदानप्रदान करणे शक्य झाले आहे.

चला तर मग, अवकाशीय दूरसंवाद साधतांना येणारी आव्हाने व विविध देशांच्या अंतराळसंस्था या आव्हानांचा सामना करतांना सध्या कोणते तंत्रज्ञान वापरतात व भविष्यात कोणते तंत्रज्ञान वापरणार आहेत याचा आढावा घेऊया.

१) मूलभूत माहिती :-

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर अवकाशीय दूरसंवाद दोन गोष्टींवर बेतला आहे. त्या म्हणजे प्रक्षेपक(transmeter) व ग्राहक किंवा प्राप्तकर्ता (receiver). प्रक्षेपक विद्युतचुंबकीय लहरींवर  मॉड्युलेटरच्या मदतीने संदेश (message) संकेतन (encode) करतो. संदेशानुसार किंवा पाठविल्या जाणाऱ्या विदेनुसार लहरींच्या गुणधर्मात बदल घडून येतो, ज्यामुळे पाठवल्या जाणाऱ्या विदेचा  मतितार्थ कळून येतो. या लहरी मग अंतराळातून प्राप्तकर्त्याकडे जातात. प्राप्तकर्ता मग या विद्युतचुंबकीय लहरींचे ग्रहण करून त्या  डिमॉड्युलेट करून संकेताचे उकलन किंवा विसंकेतन करतो. हे म्हणजे आपल्या घरातील वायफाय राऊटर व  त्याच्याशी संलग्न उपकरणांसारखे आहे. राऊटरला इंटरनेटद्वारे मिळालेला विदा तो प्रत्येक उपकरणांकडे प्रक्षेपित करतो. अवकाशीय दूरसंचार हा साधारण याच धर्तीवर घडवून आणला जातो. फक्त त्याचा आवाका मोठा व अंतर खूपच जास्त म्हणजे काही प्रकाश वर्षांइतके असू शकते.

२) दूरसंवाद उपकरणांचे जमिनीवरील जाळे :-

अंतराळाशी दूरसंवाद म्हणजे फक्त अंतराळयानाचा अँटीना जमिनीकडे रोखणे एव्हढेच नाही. नासाच्या दूरसंवाद अँटीनांचे जाळे जगभरात – सर्व सात खंडामध्ये- पसरलेले आहे. या अँटीना अंतराळयानांकडून येणारे प्रक्षेपण ग्रहण करतात. जमिनीवरील स्थानके आणि अंतराळयाने यांच्यातील दूरसंवादाची योजना नेटवर्क अभियंते काळजीपूर्वक आखतात. अंतराळयान अँटीनावरून जात असतांना अँटीना विदा ग्रहण करण्यासाठी सज्ज आहे याची ते खात्री करतात.

भूस्थित अँटीना विविध आकार व क्षमतेच्या असतात. अंतरीक्ष स्थानकला बॅकअप दूरसंवाद पुरविणाऱ्या अतिउच्च वारंवारीतेच्या लहान अँटीना ते ११ अब्ज मैल अंतरावर असणाऱ्या व्हॉयेजर अंतराळयांनांसारख्या सुदूर मोहिमांशी दूरसंवाद साधणाऱ्या २३० फुटी अँटीनांएवढ्या अजस्त्र!!

३) अंतराळ सहक्षेपक (space relays):-

थेट जमिनी बरोबर दूर संवाद साधण्याबरोबरच अनेक मोहिमा सहक्षेपक उपग्रहांद्वारा पृथ्वीशी संवाद साधतात. उदाहरणार्थ अंतराळस्थानक अनुपथन आणि विदासहक्षेपक उपग्रहांकडे  (Tracking and Data Relay Satellites – TDRS) विदा पाठविते. नंतर हे उपग्रह न्यू मेक्सिको व गुआम येथील भूस्थानकांकडे हा विदा सहक्षेपित करतात. चंद्रयान ३ चा लॅन्डर चंद्रयान दोनच्या ऑर्बिटर कडे विदा पाठवायचा, नंतर हा ऑर्बिटर पृथ्वीकडे विदा सहक्षेपित करायचा. सहक्षेपकांमुळे दूरसंवाद उपलब्धतेसाठी खास फायदा मिळतो. उदाहरणार्थ TDRS पृथ्वी भोवतालच्या अंतराळात तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पृथ्वी समिप कक्षेतील अंतराळयाने आणि जमीन यांच्यातील संवाद अखंडित राहतो आणि आपणास पूर्ण पृथ्वीचा विदा प्राप्त होतो. अंतराळयान भूस्थीत स्थानकावरून जाण्याची वाट बघत बसण्यापेक्षा टीडीआरएस दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस विदा सहक्षेपित करतात.

४) बँडविड्थ :-

नासा व इस्त्रो विद्युत चुंबकीय वारंवारितेच्या (frequency)विविध बँड्समध्ये विदा संकेतन करीत असतात. या वारंवारितांच्या श्रेणी म्हणजेच बँडविड्थ्सच्या वेगवेगळ्या क्षमता असतात. मोठ्या बँडविड्थ्स प्रत्येक सेकंदाला जास्त विदा वाहून नेतात, त्यामुळे अंतराळयान जमिनीकडे विदेचे प्रक्षेपण जास्त त्वरेने करू शकते. सध्या सर्वच अंतराळसंस्था दुरसंवादासाठी प्रामुख्याने रेडिओ तरंगांचा वापर करतात. पण आता नासा आवरक्त समीप लेसरचा वापर संप्रेषणासाठी करायचा प्रयोग करीत आहे. याविषयीची माहिती पुढे येईलच. या प्रकारच्या संप्रेषण पद्धतीमुळे – ज्याला प्रकाशकीय दूरसंवाद असे संबोधण्यात येते- पूर्वी कधीही मिळाला नव्हता एवढा विदा पाठवण्याचा वेग प्राप्त होणार आहे. लेसर दूरसंवाद सहक्षेपक प्रक्षेपण प्रात्यक्षिकांमुळे (Laser Communication Relay Demonstretion- LCRD) प्रकाशकीय दूरसंवादाचे फायदे समोर आलेच आहेत. या मोहिमेत कॅलिफोर्निया आणि हवाई स्थित भूस्थानकांमध्ये  प्रकाशकीय दुव्याद्वारे (optical link) पृथ्वीसमीप कक्षेतील उपग्रह वापरून विदेचे सहक्षेपण pकरण्यात आले. नासा लवकरच अंतराळ स्थानकावर प्रकाशिय अग्र (optical terminal) बसविणार आहे. यामुळे अंतराळस्थानक एलसीआरडी द्वारा जमिनीकडे विदा सहक्षेपित करू शकेल.

५) विदा पाठविण्याचा वेग :-

जास्त बँडविड्थ्स  म्हणजे मोहिमेसाठी विदेचा जास्त वेग. अपोलो ११ ज्यावेळी चंद्रावर उतरले त्यावेळी त्यांनी पाठविलेले व्हिडिओ कृष्णधवल रंगात व अस्पष्ट होते. तुमच्यापैकी जर कोणी ते बघितले तर तुम्हाला आढळेल की त्यात आपण ज्याला मुंग्या म्हणतो तशा दिसायच्या. अगदी नजीकच्या काळात आयोजिलेल्या आर्टीमिस-२ मोहिमेमध्ये यानावर प्रकाशीय अग्र असतील, त्यामुळे चंद्राच्या कक्षेतून मिळणारे व्हिडिओ ४ के अल्ट्रा हाय डेफिनेशनचे असतील. विदेच्या वेगवान देवाणघेवाणीसाठी बँड विड्थ हा एकमेव अडथळा नाही. विदेच्या वेगावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांमध्ये प्रक्षेपक व प्राप्तकर्ता यांच्यातील अंतर, अँटिनाचा किंवा प्रकाशीय अग्र यांचा आकार, दोन्ही बाजूकडे उपलब्ध असणारी ऊर्जा क्षमता यांचा समावेश होतो. विविध  देशांच्या अंतरिक्ष संस्थांमधील अभियंत्यांना विदेचे वेगवान आदान प्रदान करण्यासाठी या सर्व गोष्टींचा समतोल साधावा लागेल.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

उत्तराखंडमधील बारकोट ते सिलक्यारा ह्या बोगद्यात अडकलेले 41 कामगारांची सुटका होण्याकरिता आता फक्त 14 मीटर अंतर  खोदायचे राहिले आहे !

 12 नोव्हेंबर रोजी हे कामगार बोगदा कोसळल्याने अडकले त्यांना 10 दिवसात आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला  आहे. शेवटचे 14 मीटर अंतर पार झाले की उद्यापर्यंत हे  सगळे सुखरूप बाहेर पडलेले असतील.

हा आहे नवा भारत!  तांत्रिक प्रगती आणि आत्मविश्वास ह्या बळावर हे साध्य झाले आहे.

चार धाम रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा सिलक्यारा  बारकोट बोगदा  राष्ट्रीय महामार्ग 134 वरती यमुनोत्रीच्या बाजूला बनवला जात आहे.

काम सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगद्यावरील जमीन माती कोसळून 41 कामगार आत अडकले. त्यानंतर सुरू झाला त्यांना सोडवण्याचा  प्रयत्न !

1.नॅशनल हायवे  इन्फ्रा  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,  

2.टीहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,  3.सतलज जल विद्युत निगम, 

4.ओएनजीसी आणि 

5.रेल विद्युत निगम लिमिटेड 

.. ह्या पाच सरकारी कंपन्या ह्याच परिसरात काही ना काही काम करत आहेत. त्यांना ह्या सुटकेच्या कामासाठी पाचारण केले गेले.

याकरिता एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला गेला. ह्यातील प्रत्येक कंपनीला त्यातील एकेक जबाबदारी दिली गेली.

  1. ह्यात बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडून साधारण 80 मीटर लांबीचा आडवा, 900 मिमी व्यासाचा बोगदा तयार करून त्यातून 800 मिमी व्यासाचे लोखंडी पाईपटेलिस्कोपिक पद्धतीने घालणे.ह्या 800 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून ह्या कामगारांना सोडवणे.
  2. बोगद्याच्या बारकोट बाजूने 480 मीटर लांबीचा आडवा बोगदा खोदणे.
  3. हा बोगदा ज्या टेकडी खालून जातो, तिच्या माथ्यावरून सुरुवात करून साधारण 90 मीटर खोलीचे विवर खोदून त्यातून कामगरापर्यंत पोचणे .
  4. बारकोट बाजूनेएक खोल विवर खोदणे.
  5. कामगारापर्यंतअन्नपाणी तसेच व्हिडिओ कॅमेरा पोचवण्याकरिता चार इंच पाईप लाईन बनवणे.

ह्या प्रत्येक कामगिरी वरील कंपन्यांना अनुक्रमे देण्यात आल्या.

ह्या कामाकरीता लागणारी अजस्त्र यंत्रसामग्री, खोदाई यंत्रे, युद्ध पातळीवर प्रयत्न करून परदेशातून मागवण्यात आली. 

भारतात  वेगवान  माल वाहतुकीकरिता  समर्पित रेल्वे परिवहन मार्ग बनवला गेला आहे. त्यावरून एक खास  मालगाडी चालवून गुजरातमधील करंबेली ते ऋषिकेशपर्यंत  सामग्री पोचवली गेली. ह्या मालगाडीने 1075 किमी अंतर 18 तासात पार केले. 

सर्व पाचही कंपन्यांनी त्यांना नेमून दिलेले काम एकाच वेळी सुरू केले. जो पहिल्यांदा पोचेल तिथून कामगारांना बाहेर काढायचे ठरवले. ह्यासाठी अजस्त्र मालवाहू ट्रक ट्रेलर जातील असे रस्ते बनवण्यात आले.

अडकून 6 दिवस झाल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्याने, आतील कामगारांचे मनोधैर्य खचत चालले होते.  बोगद्याच्या ज्या भागात कामगार अडकले होते त्याची लांबी 2 किमीआहे आणि त्या भागात सिमेंट काँक्रिट चे छत सुद्धा पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामगार सुरक्षित असण्याबाबत खात्री होती.  फक्त त्यांना बाहेर  काढण्याकरिता नवा भारत कामाला लागला. नवीन भारताची इच्छाशक्ती आणि तांत्रिक प्रगती कामाला लागली. 

18 नोव्हेंबर रोजी  रेल विद्युत निगमला चार इंची पाईप कामगारांपर्यंत पोचवण्यात यश आले. त्यातून व्हिडिओ कॅमेरा टाकून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. कामगारांच्या नातेवाईकांना त्यांच्याशी बोलायला दिले गेले. कामगारांना सहा दिवसानंतर काही पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले. ह्यात सुकामेवा चॉकलेट  पॉपकॉर्न असा आहार होता. एका मानसोपचार तज्ञ , योगा प्रशिक्षक ह्यांची नियुक्ती करून कामगारांचे मनोधैर्य  खचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली

त्यानंतर ह्या चार इंची पाईप लाईन च्या जागी सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली.  त्यातून खिचडी दलिया असे गरम अन्न कामगारांना देण्यात आले अडकल्यानंतर 7 दिवसांनी असे गरम अन्न त्यांनी खाल्ले. तसेच कामगारांना टूथ ब्रश,  पेस्ट, टॉवेल,  कपडे,  अंडरगारमेंट,  साबण  असे अत्यावश्यक सामान सुद्धा ह्या नवीन पाइपलाइन द्वारे पोचवण्यात आले.

ह्यातील बरेच कामगार  तंबाखू खाणारे आहेत , त्यांनी गेले दहा दिवस तंबाखू खाल्ला नाही, त्यामुळे त्यांना withdrawl symptom येऊ नयेत त्यातून मानसिक विकार होऊ नयेत म्हणून त्यांना तंबाखू सुद्धा पोचवण्यात आला.

त्यांच्या कुटुंब तसेच इतर बाहेरील कामगारांनी त्यांना सतत बोलत ठेवले  जेणेकरून त्यांचे मनोधैर्य कायम राहील.

तारीख 19 नोव्हेंबर भारतीय वायू दलाने झारखंड येथील खाणीमधून काही महत्वाची यंत्रसामुग्री  मालवाहू विमानाने  आणली. तसेच अमेरिकेहून खास   खोदाई मशीन आणण्यात आली. त्याने बचाव कार्याला अजून जोर प्राप्त झाला.

हे सगळे बचाव कार्य National Disaster  Management Authority चे प्रमुख निवृत्त जनरल अता हसनैन ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.

त्यांनी एक गोष्ट फार उत्तम केली, की कोणत्याही चॅनलवाल्यांना बोगद्याजवळ येऊन बातम्या चालविण्यास आणि बचाव कार्याचे व्हिडिओ काढून ब्रेकिंग न्युज चालविण्यास मज्जाव केला. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून रोज आढावा घेतला जात होता.

तारीख 20 नोव्हेंबर रोजी जिनिव्हा येथील International  Tunneling and Undergound Space Association चे प्रमुख अरनॉल्ड डिक्स ह्यांना सुद्धा बचाव कार्यासाठी आणण्यात आले. त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाचवपथकाला काही इजा झाल्यास किंवा तिथे जमीन खचल्यास , स्वतःच्या सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने काँक्रिट बॉक्स कल्वर्ट टाकून बचाव पथकाच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला. अरनॉल्ड  डिक्स ह्यांनी बारकोट टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील विवर खोदणारे पथक( पंचसूत्री पैकी  तिसरा पर्याय) पहिल्यांदा कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज बांधला.

तारीख 21 नोव्हेंबर,   आज बोगद्याबाहेर 41 अँब्युलन्स 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली. कोविड करिता बनवलेले एक छोटे हॉस्पिटल  पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करण्यात आले. तिथे  15 डॉक्टर ची एक टीम तयार ठेवली गेली.

काल परवा पासून पंचसूत्री पैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिल्क्यारा बाजूने आडवा बोगदा खोदणाऱ्या टीमला भलतेच यश मिळाले त्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलचा वापर करत दोन दिवसात जबरदस्त प्रगती केली आणि कामगारांपासून फक्त 14 मीटर अंतरापर्यंत येऊन त्यांचे ड्रिल एका कठीण वस्तूला आदळले.

हे ड्रिल मशीन पुन्हा बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि दुप्पट जोराने  खोदाईचे काम सुरू केले गेले.

चिली देशात असेच एका खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात 69 दिवस लागले होते. तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रचंड मदत कार्य केले होते. थायलंड आणि म्यानमार सीमेवर एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना असेच दहा दिवसानंतर बाहेर काढण्यात आले होते.

हा लेख तुम्ही वाचेपर्यंत नॅशनल हायवे  इन्फ्रा  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चमूला 900 मिमी व्यासाची पाइपलाइन आडव्या स्थितीत ड्रिल मारून कामगारांपर्यंत पोचण्यात यश आले असेल आणि शेवटचे 14 मीटर  अंतर पार करून कामगार यशस्वी रित्या बाहेरदेखील आले असतील. ह्यामागे सर्वांची मेहनत फळाला येईलच !

हा आहे नवीन भारत, तांत्रिक प्रगती आणि इच्छाशक्तीच्या  बळावर हा भारत कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास सक्षम आहे.  ह्या बदलेल्या भारताचा मला अभिमान आहे!

लेखक : श्री कपिल काळे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काला पानी“—- नेटफ्लिक्स वेबसिरीज… ☆ डॉ.माधवी किशोर ठाणेकर ☆

डॉ.माधवी किशोर ठाणेकर

परिचय 

डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर )
M.D.(Homeopathy), M.D.(Alt.medicine), Diploma in panchakarma & reiki,

Dr.Thanekar’s wellness centre इथे गेल्या 18 वर्षांपासून consultant..

“सगळीकडे उपचार करुन कंटाळला असाल तर आमच्याकडे या ” या tagline खाली अनेक असाध्य आजारावर उपचार..

Smile foundation या संस्थेचे vice president म्हणुन कार्यरत..पुणे येथे मतिमंद आणि गतिमंद मुलांची निवासी शाळा सध्या सुरु..

सकाळ कडुन धन्वंतरी पुरस्कार प्रदान..

अनेक मासिकामधून,वर्तमानपत्रातून अनेक लेख,कविता प्रसिद्ध.

? इंद्रधनुष्य ?

☆ “काला पानी“—- नेटफ्लिक्स वेबसिरीज… ☆ डॉ.माधवी किशोर ठाणेकर ☆

अंदमान निकोबार बद्दल महाराष्ट्रीयन लोकांना आकर्षण आहे कारण आपल्या सावरकरांना तिथेच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती..तिथला सेल्युलर जेल,बारी, काळेपाणी ह्या गोष्टी अनेकांना माहिती आहेत..

या series चे नावच ‘काला पानी’ असल्यामुळे याचा संबंध अंदमानशी आहे हे उमगत होतंच..

दिवाळीची मिळालेली सुट्टी आणि त्यातही लेकीबरोबर निवांतपणे वेगळं काहीतरी बघायचं म्हणुन ही series बघायची ठरवली..एखादा एपिसोडच बघायचा असं ठरवून आम्ही दोघी बघायला बसलो खऱ्या पण या series ची पकड एवढी मजबुत बसली की दोन दिवसात सातही एपिसोडस बघितले..

तीन मुख्य पण अशा कितीतरी गोष्टींची जाणीव जसं वय वाढेल तसं आपोआपच आपल्याला होत असते..

१.नशीब किंवा destiny ही एक अद्भुत गोष्ट आहे..

२.आपण सगळे एकमेकांशी कोणत्यातरी अदृश्य धाग्याने जोडलेले असतो.

३.पृथ्वीवर कुठंही रहात असलो तरी आपल्या सगळ्यांचे आयुष्यावर असणारी मालकी ही निसर्गाचीच असते..

 हे परत एकदा अधोरेखित करायचे काम ह्या series मध्ये केले आहे..

अंदमान हा अनेक बेटानी बनलेला भारताच्या main land पासुन दुर असलेला भाग.. पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी.. इथल्या विमानतळावर उतरलेले एक साधेसुधे मध्यमवर्गीय बिहारी कुटुंब -नवरा बायको,तेरा चौदा वर्षाचा मुलगा आणि सहा सात वर्षांची मुलगी..टुरिस्ट गाईड म्हणुन त्यांना मिळालेला चिरंजीवी (चिरू ),त्याचा मित्र आणि ड्राइव्हर,चिरूचे कुटुंब-आई,आजारी वडील आणि निसर्ग प्रेमी अभ्यासक भाऊ,त्याची मैत्रीण ज्योत्स्ना, लेफ्टनंट काद्री, भ्रष्टाचारी SDOP केतन ,मेडिकल ऑफिसर सौदामिनी सिंग,त्यांचे assistant डॉक्टर्स, ATOM या मल्टिनेशनल कंपनी चे अधिकारी,त्यांच्या मुख्य डायरेक्टर ची पत्नी आणि इतर बरेच लोक या सगळ्यांचीच एकत्रितपणे एका संसर्गजन्य जैविक आजाराने कशी ससेहोलपट होते,याची कथा म्हणजे ही series..ORAKA ही मूळ आदिवासी जमात निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी आहे..त्यांच्या जाणीवा या आधुनिक माणसापेक्षाही प्रगल्भ आणि निसर्ग पूरक आहेत आणि त्याच आधारावर या संकटाशी कशा प्रकारे त्यांना मात करता येते,हे यात आहे..

आधुनिक जीवनशैली,तिचा उपभोग घेणे,मज्जा करणे आणि त्यासाठीच वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणे ही गोष्ट साध्य करणारा माणुस योग्य की प्रतिकूल परिस्थितीतही मूल्य शाबीत ठेवून निसर्ग जपणारी माणसे योग्य?माणसाचे माणुसपण हे देण्यात आहे,हिसकावून,ओरबाडून घेण्यात नाही,अंतर्मनातील जाणीवा प्रगल्भ असणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे हेच खरे आयुष्य,अनेकांना वाचवण्यासाठी प्रसंगी एकाचा बळी देणे हे निसर्गाचे तत्व समूहाशी असणारी बांधिलकी दाखवते पण एका व्यक्तीसाठी,तिच्या निव्वळ ऐषारामासाठी जेंव्हा हजारोचे जीव धोक्यात आणले जातात ते निसर्गविरोधी असते आणि म्हणुनच Human नसते..हे यात सांगितले आहे.. याची शिक्षा अनेक लोक भोगतात आणि विनाकारण मरून जातात..

 माणसाचा स्वार्थीपणा आणि निव्वळ स्वतःसाठी जगणे हे कुठल्या थराला पोचु शकते?आयुष्य क्षणभंगूर आहेच पण तरीही ते आहे,जगावेच लागते आणि जेंव्हा अत्यंत विपरीत परिस्थितीत ते टिकवावे लागते तेंव्हा मूळ स्वभाव हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि उरतो तो त्याक्षणी instinct नुसार करायच्या बधीर आणि निर्रढावलेल्या कृती..survival of fittest म्हणजे सद्यस्थितीत नक्की काय?असे अनेक प्रश्न ही series उपस्थित करते आणि आपण फक्त्त एक बाहुले आहोत नशिबाच्या हातचे या जाणीवेने अस्वस्थ होतो..

या series चे screenplay writing, cinematography, acting एकदम best..चिन्मय मांडलेकर,अमेय वाघ,आशुतोष गोवारीकर ही मराठी मंडळी यात आहेत आणि सुंदर अभिनय करतात..मोना सिंग ही माझी आवडती नटी यात आहे पण थोड्या काळासाठीच.. यातला सगळ्यात मोठा ऍक्टर आहे तो निसर्ग आणि तो पुरेपूर acting करतो आणि मनात घुसतो..

thriller entertainment म्हणुन नक्की  बघण्यासारखी ही series आहे,हे नक्की..

© मधुकिशोर (डॉ.माधवी किशोर ठाणेकर)

२२नोव्हेंबर २३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print