☆ आदिशक्ती परमेश्वर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
एकदा एका अत्यंत श्रीमंत इस्रायली माणसाची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली.
मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की, “त्यांच्या आयुष्यात अशी कोणती घटना घडली, की ज्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले?”
ते म्हणाले, “एकदा मी रस्त्यावर फिरत असताना अचानक मला एका इस्पितळाच्या बाहेर झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला. त्याने हात जोडून डोळे मिटले होते. पण त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला होता.
त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची मी धीराने वाट पाहत राहिलो. मग मी त्याला विचारले की “तुम्ही इतके अस्वस्थ आणि दुःखी का आहात?”
त्याने सांगितले, ” मला पत्नीच्या ऑपरेशनसाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज आहे, अन्यथा ती मरेल.”
मी विचारले, “तुम्ही देवाकडे मदत मागत होतात का?”
तो म्हणाला, “हो.मी फक्त माझ्या देवाची प्रार्थना करत होतो.”
योगायोगाने माझ्याकडे त्यावेळी खूप पैसा होता. म्हणून मी त्याला एक लाख रुपये दिले.
त्याने लगेच डोळे मिटले आणि मान वाकवून देवाचे आभार मानले आणि मी केलेल्या मदतीबद्दल माझेही आभार मानले.
त्याच्या हावभावाने मी खूप प्रभावित झालो आणि मी त्याला माझे कार्ड दिले, ज्यावर माझा वैयक्तिक फोन नंबर आणि वैयक्तिक ईमेल लिहिलेला होता.
मी त्याला म्हणालो, ‘कधीही तुला आणखी कशाची गरज असेल, तू फक्त मला फोन कर. तुझ्याकडे मदत येईल.’
पण त्याने माझे कार्ड आणि प्रस्ताव दोन्ही नाकारले.”
अब्जाधीश पुढे म्हणाले, “त्याने सांगितलेले कारण ऐकून माझे आयुष्य बदलले.तो म्हणाला, ‘मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर आणि ईमेल पत्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जेव्हा जेव्हा मला कशाचीही गरज असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावणार नाही तर माझ्या हृदयात बसलेल्या माझ्या रामाला, ज्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला बोलवीन.’
त्याच्या रामावरच्या गाढ श्रद्धेने क्षणात माझ्या अहंकाराचे तुकडे केले.
कोणत्यातरी शक्तीने मला तिथं आणलं, असा विचार करायला भाग पाडलं आणि त्याला मदत करून मला खूप आनंद झाला. तेव्हापासून जेव्हा मी कोणाला मदत करतो, तेव्हा मी लगेच त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला यासाठी पात्र मानले.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दृष्टांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत.
यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले.
त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.
म्हणून रामायण वाचताना शत्रुघ्नाच्या निस्सीम कार्याकडे आपण आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे.
कल्पना करा की,
राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ वनात आहेत.
बंधू भरत नंदिग्रामात आहे.
चौदा वर्षेपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे.
ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे.
तुम्ही राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते.
राजनीतीप्रमाणे -असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही.
अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले होते .
दोघे भाऊ वनात होते .
वडील स्वर्गाला गेले.
मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले?
ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते.
काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचा. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल.
शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे होते .
प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न होती . कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रुपात करत होती.
कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होत होता .
ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नव्हता .
मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात होता . पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नव्हती .
थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही. शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे.
अयोध्येचे संपूर्ण कुटुंब, राज्य आणि सेना त्याने चौदा वर्षं सांभाळली.
आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही.
पुढे गुरुदेव वसिष्ठ गेले .
नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत गेला .
भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात.
पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही.
ही मंडळी फोटोकरता नाहीतच.
पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केले नाही, असे म्हणणे कृतघ्नपणा आहे.
एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवरती उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही.
हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीच निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील?
इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.
म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो. त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे.कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले आहे.
आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात बेसावध क्षणी देखील सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही.
वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे.
नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे.
पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे.
आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.
जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा.
त्या पायाखालच्या दगडाला आठवा. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.
मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन. पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का?
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या.
अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळपिठाची ओळ.
बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं सुंदर कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.
थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली.
अजून तांदूळपिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या, त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटेसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.
मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या .त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या .
विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.
नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, “इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटं सुद्धा टिकली नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं ?”
त्या हसल्या, म्हणाल्या, “रांगोळी काढत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली.रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !”
इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.
कशातही अडकून राहू नये , सोडून द्यावं.संयमाने, आनंदाने, क्षमाशील व्रताने जीवन जगावं.
रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच अल्पजीवी आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.
लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
“मी आजच्या अतिथींना विनंती करतो की, त्यांनी दीप प्रज्वलन करावं…..”
असं निवेदक म्हणाला
आणि स्मितहास्य फुललं.
अतिथी. … !
माझ्याशी महिनाभर आधी बोलून तारीख , वार , वेळ नक्की करून कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केलेला मी ‘अतिथी ‘कसा काय ठरलो?
तिथी , वार, वेळ न ठरवता जो येतो तो अतिथी.
पण अगदी मोठमोठय़ा कार्यक्रमाच्या पत्रिकेतदेखील ‘प्रमुख अतिथी’ अमुक अमुक असं चक्क दहा दिवस आधीच लिहिलेले असतं.असो !
पण खरंच विचार केला तर आजच्या काळ, काम, वेग या बंधनात पुरते गुरफटून घेतलेल्या टेक्नोसेव्ही मोबाईल जगतात ‘अतिथी ‘म्हणून येणं किंवा जाणं शक्य आहे का?
पंधरा- वीस वर्षांपूर्वी ही मजा नक्कीच होती.
“कालपासून तुझी सारखी आठवण येत होती आणि आज तू हजर “, असं म्हणताना तो खुललेला चेहरा दिसायचा.
“आलो होतो जरा या बाजूला. बरेच दिवस भेट नाही…”
“तुमच्या हातची थालीपीठांची आठवण झाली. चला तेवढंच निमित्त…”
“बसा हो भावोजी, कांदा चिरलेलाच आहे. दहा मिनिटांत थालिपीठ देते आणि आज दहीही फार सुरेख लागलंय हो! आलेच. “
असा संवाद जर आज ऐकवला तर, “बापरे ! किती मॅनर्सलेसपणे वागत होती माणसं ? न कळवता असे कसे कोणाच्या दारात उभी ठाकू शकतात ? भयंकर आहे.” अशा प्रतिक्रिया नक्कीच येतील.
कारण अतिथी परंपरा आता कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती हद्दपार होणे किती महत्वाचे आहे, हे आम्हाला पटले आहे.
आम्ही स्वतःभोवती एक सोयीस्कर लहानसं वर्तुळ आखून घेतलंय. त्या परिघामध्ये उपयुक्ततेनुसार माणसं वाढतात किंवा कमी होतात.
“येतोय”..”निघालोय”. ..” बस मिळाली” ..”ट्रेन पकडतोय”…”लिफ्टमधे आहे”… अशा अपडेशनमधे कोठेतरी अचानक मिळणारा भेटीचा सुखद धक्का हरवून गेलाय.
परवा मुलीने “अतिथी देवो भव”चा अर्थ विचारला…
तिच्याच भाषेत सांगायचं म्हणून म्हटलं, “outdated software आहे. हे आता नाही कुठे कुणी install करत.”
एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला न सांगता, न कळवता, भेटून तर पहा.
old version किती user friendly होतं, याचा अनुभव नक्कीच येईल .
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
ही हाळी ऐकून रावसाहेब धोतराचा सोगा सावरत लगबगीने बाहेर आले …
सरकारकडून पत्र होतं ..
ते त्यांनी लगबगीनं फोडलं आणि एका दमात वाचून सरळ उभे राहिले. लगबगीने आत गेले व त्यांच्या कपाटातल्या एका खणात ते पत्र ठेवून त्यास कुलूप लावले व चावी कनवटीस लावली.
एक दीर्घ सुस्कारा सोडला.
तिथून निघाले. सरळ बाहेर आले.आत डोकावून त्यांनी मोठ्या आवाजात आवाज दिला.
‘जरा माळावर जाऊन येतो बरं.’
आणि परतीच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता कसलीशी खूणगाठ मनाशी बांधली व आलेला हुंदका गिळला .बराच वेळ ते शून्यात नजर लावून बसले होते.
दिवस ढळायची वेळ झाली, तसे ते सावकाश निघाले वाड्याकडे.
ते जरा गप्पच दिसत होते. ते पाहून सारजाबाईंनी विचारलेही, ‘काय झालं’ म्हणून.
पण ते ‘काही नाही’ म्हणून दुस-या विषयावर बोलू लागले.
‘सुनबाईंना कोण घेऊन येणार ? कधी येणार ? की आपण धाडू या मनोहरला ? (रावसाहेबांचा कारभारी) पण २/३ दिवस असा विचार चालला असता सुनबाईंना घेऊन तिचे भाऊ आले .
जुळी मुले अगदी जयंतसारखी दिसत आहेत. सारजाबाईंनी बाळंतिणीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला.घर कसं भरून गेल्यासारखं दिसत होतं.
वाड्यावर बाळांच्या आगमनाने चैतन्य आलं होतं.
दिवस कसे भराभर जात होते.अजय सुजय आता चालू लागले होते.थोडेथोडे बोलायचेदेखील.
सुनबाई आनंदी होत्या आता लवकरच मुलांचे बाबा येणार होते घरी.
‘मुलांना पाहून किती खूश होतील!’ह्या जाणिवेने ती पुलकित झाली..
पण मुलांच्या देखभालीत ती मामंजींना विचारायचे विसरून जायची की जयंत कधी येणार? काही पत्र आले का? रोज रात्री ती ठरवायची की उद्या विचारीन पण राहूनच जायचे.
आज मात्र तिने पदराची गाठच मारून ठेवली की सकाळी मामंजींना विचारायचेच.
सकाळी संधी साधून तिने ‘जयंत कधी येणार,याबद्दल काही कळले का?’ हा विषय काढला. तेव्हा रावसाहेब उत्तरले,
‘अग कालच त्याच्या ऑफिसवरून संदेश आला होता. त्याची ड्यूटी वाढली असल्याने त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त परदेशी पाठवलेय व ते मिशन गुप्त असल्याने तो पत्रव्यवहार नाही करू शकणार, असं सांगितलं त्याच्याऑफिसमधून. कधी नव्हे तो तुला जरा विसावा मिळाला. तू दुपारी झोपली होतीस, म्हणून तुला सांगायचे राहून गेले .बरं झालं, तू आठवण काढलीस.’
ती जरा हिरमुसलीच.
आता काम संपणार कधी आणि जयंत येणार कधी ? मुलांना कधी भेटतील त्यांचे बाबा ? बाबांना कधी भेटतील त्यांची मुलं ?
ती विचार करू लागली.
तितक्यात सुजयच्या आवाजानं तिची विचारशृंखला तुटली व ती मुलांच्यात गुंग झाली.
एक वर्ष उलटलं.
तिचं रोज वाट पाहणं सुरूच होतं.
मग रावसाहेबांनी भर दुपारी बातमी आणली की ‘टपाल कार्यालयात संदेश आलाय की जयंताला शत्रूच्या लोकांनी पकडलेय. तो कधी सुटेल काही सांगता येत नाही.’आणि सुनबाईच्या डोळ्यातून खळकन दोन टीपे गळली.
ती निर्धाराने म्हणाली, ‘मामंजी, ते येणारच सुटून. मी सावित्रीसारखी देवाला आळवेन. माझा विश्वास आहे देवावर. हे येतीलच.तुम्ही काळजी करू नका.’
दिवसांमागून दिवस गेले.
वर्षांमागून वर्ष.
सुजय, अजय आता कॉलेजला जाऊ लागले.
ते आपल्या आईला म्हणत,
‘आई, तुला वाटतं का की बाबा परत येतील?’
तशी ती चवताळायची व म्हणायची,’ते येणारच!
युद्धकैदी सोडतात ना त्यात तेही सुटतील!’
सासुबाईंनीही डोळे मिटले, जयंताची वाट पाहत. मामंजी घरात फारसे राहत नसत .
महिनाभराने मामंजींची खोली साफ करायला सुनबाई त्या खोलीत गेल्या.
त्यांना जयंताची सगळी पुस्तके,लहानपणीचे कपडे एका कपाटात व्यवस्थित ठेवलेले दिसले.
त्या एकेक वस्तू प्रेमाने हाताळत होत्या .जणू त्या वस्तूंमधून जयंत त्यांना दिसत होते .आतल्या खणात काय असावे बरं, इतके किल्ली कुलपात .?
मामंजी तर सगळे व्यवहार माझ्यावर सोपवून निवृत्त झाले होते .सासुबाईही कशात लक्ष घालत नसत.
मग काय असावे बरे आत ?
त्यांनी तो खण उघडला.आत सरकारचे पत्र होते.
त्या मटकन खाली बसल्या
आणि वाचू लागल्या…
‘जयंत रावसाहेब भोसले सीमेवरील बॉंबहल्ल्यात शहीद!’
दुसरे पत्र मामंजीचे. सुनबाईस.
‘चि.सौ.कां.सुनिता,
हो. मी तुला सौ.म्हणतोय कारण मला तुझ्या सौभाग्यलंकारात जयंतास पाहायचे होते .तुला विधवेचे आयुष्य जगू द्यायचे नव्हते .म्हणून मी जयंताची बातमी सर्वांपासून गुप्तच ठेवली होती. मला आणखी एक गोष्ट सिद्ध करायची होती की विधवेने कुलाचार केला तरी देव कोपत नाही. तू माझी स्नुषा नसून सुकन्याच आहेस. तुझ्या मंगळसूत्राने, तुझ्या कुंकवाने, तुझ्या हिरव्या बांगड्यांनी, तुझ्या जोडव्यांनी, तुझ्या किणकिण वाजणा-या पैंजणांनी मला घरात लक्ष्मीचा निवास असल्याचे जाणवायचे .
तू अशीच सौभाग्यलंकार लेऊन रहा .व अखंड सौभाग्यवती म्हणूनच तुझे या जगातून जाणे होऊ दे.
ही या बापाची इच्छा पुरी कर.
-तुझा पित्यासमान मामंजी.’
तिने पत्राची घडी घातली .
अगदी गदगदून पोटभर रडली.
शांतपणे आपले अश्रू पुसले.
कोणी नसताना दोन्ही पत्रे जाळली.
दिवाबत्ती केली.व सुनांच्या हळदीकुंकवाच्या तयारीला लागली.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “शांता…” – लेखिका : श्रीमती जयश्री दाणी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी शांता. नाही ना ओळखले? श्रीरामाची थोरली बहीण. अवघे रामायण श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीतेच्या विविध कथातरंगांनी व्यापले असताना माझा उल्लेख तिथे कुठेच आढळत नाही. अर्थात मला अनुल्लेखाने मारणे हा कुणाचाच उद्देश नव्हता. मी होतेच तशी अदृश्य. गुप्त. अयोध्येत अनोळखी.
माझी ओळख फक्त कौसल्यामातेच्या हृदयात जागी होती. कदाचित तातही मला पदोपदी स्मरत असतील. मी त्यांची पहिली लेक ना! कसे अलगद मला ओटीत टाकून दिले दोघांनी वर्षिणी मावशीच्या. अंगदेश नरेश रोमपाद आणि राणी वर्षिणीला अनेक वर्षे लोटली तरी अपत्य झाले नाही. माता कौसल्येच्या भेटीला दोघे आले असता माझ्या अवखळ बाललिलांनी त्यांचे मन मोहून गेले.
” मला तुझी ही देखणी, मेधावी सुपुत्री देशील का?” माता वर्षिणीने केविलवाण्या आसुसलेल्या स्वरात विचारले. कौसल्या मातेचे मन द्रवले. तिने आणि तात यांनी क्षणात मला दत्तक देऊन टाकले. मला विचारायची गरज नसेल का भासली? कधीतरी पुढे मेंदूत असे विचार येऊनच गेले की माझ्याजागी जर पहिला पुत्र असता तर त्याला इतक्या सहजासहजी दत्तक दिले असते?
अंगदेश नरेशांनी मला प्रेमाने वाढवले. वेदविद्या, शिल्पकलेत निपुण केले. पण मी कन्या असल्याने तिथेही मला राजपद सांभाळायचा अधिकार नव्हता. एकदा तात रोमपद आणि माझा सुसंवाद सुरू असताना एक गरीब ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला. तात यांचे थोडे दुर्लक्ष झाले त्याच्याकडे. दुखावलेल्या ब्राम्हणाने देश सोडला. इंद्रदेवांना ते सहन झाले नाही आणि त्यांच्या क्रोधाने अंगदेशात दुष्काळ पडला.
अस्वस्थ मातापिता ऋषी श्रृंग यांच्याकडे गेले. ऋषीवर्यांनी सांगितलेल्या उपायाने अंगदेशाची भूमी पुन्हा हिरवीगार झाली. प्रसन्न पित्याने माझा विवाह ऋषीदेवांशी लावून दिला. कालांतराने राजा दशरथ यांनी आयुष्याचा उत्तरार्ध जवळ येत आहे, हे बघून कुलगुरू वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाने पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. प्रमुख अतिथी म्हणून यांना व मला मान मिळाला. नाथ म्हणाले, “आतिथ्य स्विकारले तर माझे पूर्वपुण्य पूर्ण लयाला जाईल.” मी म्हणाले, “जाऊ द्या. पितृऋण उतरवायची तेव्हढीच संधी.”
यज्ञपूर्तीच्या वेळी दिलेल्या पायसाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या व पुढे मनुष्य जन्माला हरघडी पडणाऱ्या प्रश्नाला ठोस, समर्पक उत्तर देणारे ‘रामायण’ घडले हे सर्वश्रुतच आहे.
रामायण ही रामाची कथा आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ अशा रघुकुलाची गाथा आहे. त्यात माझे संपूर्ण अस्तित्व लुप्त झाले असले तरी माझ्याही रोमारोमात राम आहे! फारशी चर्चा नसली तरी मी, शांता आणि पती ऋषी श्रृंग यांना या चौघा राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळाले आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे माझे मंदिर आहे. या मंदिरात मी पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे. हा पल्ला गाठणे शक्य नसेल तर वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या
“आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥”
या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?
लेखिका:श्रीमती जयश्री दाणी
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्यसंस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.
वकील म्हणाले, “अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते रॉयल्टी वगैरे देतात?”
गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली.
करकऱ्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व ते म्हणाले, ”यावर सही करून द्या.”
गदिमांनी विचारले, “कशासाठी ?”
“ मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही.”
क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,
“मग गीतरामायण लिहिलं, याला काहीच अर्थ उरणार नाही. वकीलसाहेब, अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं? “
करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले.कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम अशा अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या. किती हा मनाचा मोठेपणा!गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात-
‘नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचे मूल्य मुनिजना
अवघ्या आशा श्रीरामार्पण’
*
प्रभू रामाच्या चरणी गदिमांची सेवा रुजू झाली आहे.
‘अवघ्या आशा श्रीरामार्पण!’
*****
लेखक : श्री.सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू).
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शनाया आईला विचारत होती, ‘आई तू किती शिकली आहेस गं?’
आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली, मग मंद हसली. ‘
आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूचं?’
‘अगं, आज शाळेत झिरो पिरेड (शून्य प्रहर) होता. त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते. कुणी म्हणालं, माझे बाबा डॉक्टर आहेत. कुणी म्हणालं, माझी आई सी ए आहे. कुणाचे आई बाबा दोघंही नावाजलेले वकील आहेत. असं काय काय सांगत होते. माझी वेळ आली तेंव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले. माझी आई खूप खूप शिकली आहे. ती डॉक्टर आहे. मला जेंव्हा ताप येतो तेंव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याचा घड्या ठेवते. माझ्या पोटात दुखतं तेंव्हा ती मला ओवा मीठ देते. ती गायिका आहे, कारण माझ्याबरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते. आणि मला झोप येत नाही तेंव्हा ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते. ती उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्टं, एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळतं तेंव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते. मला कधी कधी क्षुल्लक भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेंव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करुन देते. ती उत्तम ज्योतिष जाणते कारण माझ्या मनात काय चाललंय ते तिला बरोबर कळते. माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते. ती उत्तम शेफ आहे, कारण बाहेरचं खाऊन माझं आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते. ती उत्तम ब्युटीशीयन आहे कारण माझ्या गँदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते. ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणितं ती मला पूर्ण समजेपर्यंत शिकवत रहाते. ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते. ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाचवेळी अनेक गोष्टी ती लीलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री पार अवीट आहे. आई, तुला सांगू, सर्व मुलं आणि बाई तन्मयतेने ऐकत होती आणि माझं बोलणं झाल्यावर तास संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजवत होती. मला खूप रडू आलं.’
आई ऐकत राहिली. आपली शानू एवढी मोठी झालीये. तिने शनायाला जवळ घेऊन कुरवाळलं.
‘आई, बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमाने! म्हणत होत्या, हिची आई खूप भाग्यवान आहे.’
— आईला गहिवरून आलं. तिने देवाला दिवा लावला आणि तूप, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. देव बोलला असता तर म्हणाला असता, ‘यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत नं धरणारी आहे. ही साक्षात माझी म्हणजे देवाची यत्ता आहे!’
लेखक – अज्ञात
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
धर्माची आवश्यकता समाजाला का असते, हे सांगणारी घटना तुम्हा भावंडांना, तुमच्या मित्रांना योग्य वयात अनुभवायला मिळाली.
माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे आपल्या पूर्वजांनी चांगलं जाणलं. आणि त्या उत्सवाला धांगडधिंग्याचं स्वरूप न येऊ देता कलागुणांच्या, सद्गुणांच्या उत्कर्षाचं स्वरूप यावं यासाठी पायंडे घालून दिले. नियम केले. श्रद्धेची चौकट घालून दिली.
तुम्ही आत्ता पाहिलंच असेल.. पुण्याहून १५००+ किमीवर आणि बेंगळुरूहून १९०० किमीवर असलेल्या श्रीराममंदिराच्या निमित्ताने तुमच्या सोसायटीत कितीतरी कार्यक्रम झाले. इतके लोक एकत्र आले. कुठेही खाण्यापिण्यावर भर नव्हता. पिण्याचा तर प्रश्नच नव्हता. खाण्यासाठी कुणीही कुठेही एखादा प्राणी, पक्षी, अगदी त्याचं अंडंसुद्धा मारलं नाही. नेहमीच्या कार्यक्रमांमधे येणाऱ्यांना खूश करणे हा एक मुख्य हेतू असतो. इथे तसं काही नव्हतं. जो तो त्याला करावंसं वाटतंय, म्हणून सहभागी होत होता. त्याचे काहीही लाड होणार नाहीत, हे पक्कं माहित असूनसुद्धा. विचार करून पहा आपल्या मनाशी.. आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यात काय काय फरक होता ते.
कितीतरी जणांनी आपल्यातल्या कला जोपासल्या. सुंदर रांगोळ्या, दीपोत्सव, काव्य, गायन, वादन, नृत्य, जी जी म्हणून कला श्रीरामचरणी अर्पण करता येईल ती जे कलाकार आहेत त्यांनी केली. कल्पकता वाढीला लागली. आणि प्रत्येकाने ती “इदं न मम (हे माझं नाही), श्रीरामाय स्वाहा (श्रीरामाला अर्पण)” अशा भावनेनं सादर केली. किती लाईक्स, किती कौतुक हे विषय मागे पडले. करण्यातला आनंदच सुखावणारा ठरला. जाणवलं का तुम्हाला ते?
जे कलांचा आस्वाद घेत होते तेही अती चिकित्सकपणा, कुचकटपणा करत नव्हते.. सगळ्यांना सगळ्यांचं कौतुक.. ही किती गोड गोष्ट होती ना?
याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम होता. त्याच्या चरित्रातच एवढी प्रेरणा आहे की ७००० वर्षांनीही लोकांना चांगलं जगण्याची तो प्रेरणा देतोय. म्हणूनच तो जरी हाडामांसाचा एक माणूस असला तरी एक राजा म्हणून विष्णूचा अवतार मानला गेला, आणि देवत्व पावला. इतका चांगला माणूस म्हणजे देवाचाच अवतार, अशी लोकांची भावना आजही आहे. मुळातच हिंदू धर्म प्रत्येक सजीव गोष्टीत, ज्यांच्यात चैतन्य (energy) आहे त्या सर्वांमध्ये असलेलं ते चैतन्य म्हणजे दैवी (divine) शक्ती मानतो. जे चांगले असतात, त्यांच्यात ती शक्ती अधिक. म्हणून आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक चांगले होण्यावर हिंदू धर्माचा भर आहे. आपल्यातला सर्वोत्तम कोण? तर हा मर्यादापुरुषोत्तम श्रीराम !
या उत्सवाआधी कित्येक जणांना ही काळजी होती की उत्साह उन्माद व्हायला नको.. हिंदूंनी अल्पसंख्यांकांना त्रास द्यायला नको. मी तरी अशा काही घटना ऐकल्या नाहीत. कारण उत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंना त्रास द्यायला कुणी आलंही नाही. ही देखील एक खूप मोठी जमेची बाजू. यात जास्त सांगत बसत नाही कारण आता पुढच्या २-५ वर्षात तुम्ही सुजाण नागरिक बनाल, मतदान करायला पात्र ठराल. हा अभ्यास तुमचा तुम्ही केलेला बरा. तुम्हाला पडणारे प्रश्न बऱ्याच लोकांना विचारा. आणि तुमची मतं तुम्ही ठरवा.
पण सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहजगुण आहे. या जगाला चालवणारी काही एक शक्ती आहे, आणि ती शक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊ शकते. ज्याची त्याची त्या शक्तीच्या रूपाची कल्पना वेगळी असू शकते. अट एकच, त्या श्रद्धेनं माणूस सज्जन बनला पाहिजे. सुदृढ बनला पाहिजे. तसं असेल तर त्या माणसाच्या श्रद्धेचा आपण सन्मानच केला पाहिजे, हे हिंदूंच्या नसानसात आहे. तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्येही हे आहे, आणि तुमच्यातही आहे. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही हेच सांगाल. हीच आपली संस्कृती.
हे नेहमी लक्षात ठेवा.. आपण सज्जन तर असलेच पाहिजे. पण समर्थही असलं पाहिजे. त्यासाठीचा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम ! त्याचं चरित्र नक्की अभ्यासा !
पटलं तर तुमच्या मुलांना नक्की वाचायला द्या नाहीतर सोडून द्या
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈