मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भज्यांचे विश्व —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “भज्यांचे विश्व —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

संपूर्ण महाराष्ट्राला एकाच धाग्याने बांधून ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या ? असे जर कोणाला विचारले तर कोणी पंढरपूरच्या विठोबाकडे बोट दाखवेल, कोणी लोककला म्हणेल, तर कोणी सहयाद्री पर्वत सांगेल.

माझ्या मते या सगळ्या सांस्कृतिक व भावनिक गोष्टी झाल्या.

पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जोडणारी एकच गोष्ट म्हणजे धागा नसून भजी हा सर्वमान्य पदार्थ आहे यावर कोणाचे दुमत नसावे. भजी न आवडणारा माणूस अजून तरी मी पाहिलेला नाही.

खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांची मुलाखत T V वर पाहिली होती. 

त्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत त्यांच्याकडून अनेकदा भजी या गोष्टींचा उल्लेख व त्या विषयीच्या  उपमा आल्याचे मला आठवते.

..  थोडक्यात काय तर त्यांच्यासारख्या उद्योगपती पासून माझ्यासारख्या उचापती माणसाला भजी ही प्रिय गोष्ट आहे.

भज्यांची पहिली ओळख ही लहानपणी पत्ते खेळताना झाली. 

एक्क्या मध्ये किलवर, बदाम किंवा चौकट चा एक्का हातात आला तर विशेष आनंद होत नसे. पण इस्पिक एक्क्याचे भजे आले की चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नसे. त्या पानाचा तो गोलाकार डिझाइन असलेले रंग फार आवडत असे.

भजी दोन प्रकारे खाल्ली जातात. एक म्हणजे  घरात व लग्न , मुंज वगैरे समारंभात. दुसरी म्हणजे हॉटेल, ढाबा , टपरी अशा ठिकाणी.

घरातील भजी थोडा सात्विकपणा घेऊन येतात. त्याला पवित्र कार्यक्रमाची जोड असल्याने कांदा लसूण माफक वापरले जातात. घोसावळी ,कोबी किंवा प्लेन असेच प्रकार केले जातात.

गोड केळ्याची भजी हा मला आवडणारा प्रकार खूप कमी केला जातो व विशेष लोकप्रिय नाही. पण गरम गरम भजीच्या कव्हर मधून जेव्हा गरम केळे डोकावते तेव्हा जिभेला व मनाला दोन्ही प्रकारे चटका देऊन व लावून जाते.  

शाळकरी व कॉलेज वयात स्वयंसेवक म्हणून वाढप्याचे काम करणाऱ्या लोकांसाठी लग्नातील आचारी लोक खास भजीचा घाणा काढत. 

तेव्हाचे आचारी हे व्यावसायिक केटरिंग कॉन्ट्रॅक्टर झालेले नसत. एक पंगत झाली की दुसरी बसे पर्यंत असे भज्यांचे घाणे मी स्वतः अनेकदा रिचवले आहेत.

बाहेरची भजी प्रथम खाल्ली तो दिवस मला चांगला आठवतोय. एक दिवस वडील सकाळी सकाळी आम्हाला बंडगार्डनला घेऊन गेले होते. १९७० च्या सुमारास तिथे बोटिंग चाले.

बोटिंग झाल्यावर एका टपरीवर भजी व चिंच गुळाची चटणी खाल्ली व तेव्हापासून भजी व चिंच गुळाची चटणी हे समीकरण फिक्स झाले.

हॉटेलमध्ये भजीबरोबर टोमॅटो सॉस दिले की माझे पित्त खवळते.

कालानुरूप आपले पुणे बदलले आहे पण तीन भजीवाले अजूनही अढळ ध्रुवपद घेऊन बसले आहेत.

बाजीराव रोडवरील विश्रामबागवाड्या समोरचा, रतन टॉकीज समोरचा व फडके हौदा जवळील रेल्वे बुकिंग ऑफिस जवळचा. शाळकरी वयात यांच्याकडील भजी फक्त गणेशोत्सवात खाल्ली जात. गेल्या काही वर्षांत तर hygene वगैरे मुळे तिकडे लक्ष दिले  जात नाही ही गोष्ट वेगळी.

पुण्यात भजी टिकवून ठेवण्यात वाटा उचलणारे म्हणजे टिळक रोडवरील रामनाथ हॉटेल

आषाढ महिन्यात चातुर्मास सुरु होण्याआधी माझे सासरे नेहमी तिथली भजी आणायला सांगत. कागदाच्या पुडीत ती घरी आणेपर्यंत पिशवी अगदी तेलाने माखून जात असे. पण दोन भजी व त्याबरोबर कडक मिरची पोटात गेली की तबियत एकदम खूष !

गणपती चौकातील आरोग्य मंदिर ची बटाटा भजी ही पण अशीच सुंदर. बेडेकरांनी जरी मिसळीत नाव मिळवले असले तरी त्यांची भजीही उत्तमच.( सध्या देतात की नाही ते जाणकार मित्रांनी सांगावे )

तुळशीबागेत सुध्दा श्रीकृष्ण उपहार गृहातील मिसळीला भजी हवीतच.

सुजाता हॉटेलमध्ये भजी सूप नावाचा प्रकार मिळे. चिंच गुळाचे पाणी त्यावर कांदा, कोथिंबीर, शेव व भजी – -अहा हा ! अजून आठवले तरी तोंडाला पाणी सुटते.

बादशाहीमध्ये सुद्धा एकदा जेवणाबरोबर extra चार्ज लावून भजी खाल्ल्याचे आठवते. गोल भजी, खेकडा भजी हे दोन प्रामुख्याने विकले जाणारे ब्रँड.

महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा , एखादे तरी भजीचे हॉटेल मिळणारच. का कोणास ठाऊक पण अशा दुकानात भजी हा पुरुष माणूस करत असतो तर काउंटर वर नेहमी त्यांची पत्नी असते. 

मला या दुकानात जर सर्वात काय आवडत असेल तर पीठ पातेल्यात काढून त्यात पाणी, मसाला , तिखट, कांदा घालून कढईत सोडे पर्यंतची कृती .बहुतेक सर्व मंडळी त्यात इतकी गर्क झालेली असतात की जणू समाधी लागली आहे.

मग हळूहळू कढईच्या टोकावरून किंवा मध्यातून एकेक भजे तेलात सोडणे. मग लाल रंग येईपर्यंत वरखाली करून झाऱ्यावर निथळत ठेवणे. एकदा तो भज्यांचा lot अल्युमिनियमच्या परातीत टाकला की पुढचे काम पोऱ्या करणार.

भजी ही कागदाच्या पुडीत धरून खाल्ली तर जास्त मस्त लागतात. मधूनच पुडी बाजूला करून मीठ लावलेली मिरची दाताखाली चावायची. त्यासारखे स्वर्गसुख नाही.

जोडीला चुरलेली भजी , तिखट व लसूण घातलेली चटणी असेल तर काय विचारायलाच नको.

ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात काही राग हे सर्वकालीन म्हणजेच केव्हाही गायले तरी चालतात तसेच भजी पण सर्वकालीन खाद्य आहे.

भजी खाण्याचे आवडते ठिकाण म्हणजे एखादे हिल स्टेशन, सिंहगड, सज्जनगड , वरंध घाट, ताम्हिणी घाट .

महाबळेश्वरच्या आर्थर सीटला सकाळी सकाळी नऊ वाजता जाऊन भजी खाणे हे माझे आवडते काम.

काही वेळेला तर आदल्या दिवशीचे तेल वापरून केली आहेत हे समजते, पण त्यांची चव न्यारीच आणि कधीच बाधत नाहीत.

लोणावळा येथील भजी पॉइंटची भजी ही नेहमीच किलोवर घ्यावीत नाहीतर कुटुंबात कलह माजू शकतो.

उटी येथे एकदा लांब मिरची घालून केलेले भजे एकट्याने फुल्ल खाल्ले. लग्न नवीन झाले असल्याने बायकोवर इंप्रेशन मस्त मारले गेले.

पुणे कोल्हापूर मार्गावर ज्या बस नॉनस्टॉप जातात त्या कराडच्या अलीकडे अतीत गावाच्या बस स्थानकात फक्त भज्यांसाठी थांबतात. तो आस्वाद मी असंख्य वेळा घेतला आहे.

सुखाच्या कल्पनेत माझे एक सुख म्हणजे कुठलेतरी डोंगरगाव, जांभुळपाडा, बामणोली अशा नावाचे गाव असावे, हवा ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असावा, डोंगर दऱ्यांवर धुके असावे , एखाद्या पत्र्याच्या टपरी वर भजी चालू असावीत, मग पुडीत भजी, मिरची, लाल चटणी व तिखट लागले की लालबुंद कडक चहाचा घुटका

आयुष्यात दुसरे काही नकोच  मग !

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाचे लक्ष आहे बरं का… लेखक : अज्ञात ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाचे लक्ष आहे बरं का… लेखक : अज्ञात ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”  “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली… 

एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे… 

“बस्  मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता काही हरकत नाही,   ठीक आहे,    होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ,अभिमान,दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 

घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली,” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास!   काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  आई आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,” आज तुला झोप येण्यासाठी,मोबाईल संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.”  खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की,  ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.                   

देवाचे लक्ष आहे बरं का ….. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “१ एप्रिल —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “१ एप्रिल —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

म्हणजे गंमत..चेष्टा.. मस्करीचा दिवस. हो.. नेहमीच कसे गंभीरपणे जीवन जगायचे, किमान एक दिवस तरी बनवाबनवीचा.. गमतीचा हवाच. अर्थातच फुल म्हणजे वेड्यात काढणारी.. धक्का देणारी गंमत. पण ही जिवघेणी नको तर बुद्ध्यांक तपासणारी.. समोरच्यालाही हसवणारी हवी.      

अशी ही एक कथा सांगितली जाते की या दिवसाचा प्रारंभ चक्क १३८१ चा. त्यादिवशी म्हणजे ३२ मार्चला इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अँनचे लग्न आहे अशी अफवा पसरली. लोक आनंदोत्सव साजरा करु लागले. तेव्हा नंतर कळले की ३२ मार्च कॅलेंडरमध्ये नाहीच. १ एप्रिल आहे. तेव्हापासून हा गमतीचा दिवस सुरू झाला. 

…पण कधीकधी अशीही गंमत केली जाते जी ऋणानुबंध जुळवते. आज लग्न ही समस्या झालीय. खरं म्हणजे आसपास आवडणारा जोडीदार दिसतो. सारे काही अनुरुप असतानाही बोलण्याचे ध्यैर्य नसल्यामुळे लग्न जुळत नसते. मग काही उत्साही १ एप्रिलचा फायदा घेतात. म्हणजे ‘वाजली तर पुंगी’. बाजू उलटलीच ..’तो’ किंवा ‘ती’ अंगावर धावली तर लगेचच आजचा दिवस कोणता ?.. असे म्हणत हसत सुटका करुन घेता येते.

पण ही १ एप्रिल ची मात्रा लागू होत आज अनेक संसार सुखात सुरू आहेत. त्यांच्यासाठी तर आजचा दिवस फारच महत्वाचा. त्यांचे अभिनंदन. 

एकमेकांना आपल्या मनातील भाव कळण्यासाठी १ एप्रिलचा हा दिवस फलदायी ठरला. तेव्हा इतरांनाही असा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा.

आता अजूनही कुणाला याचा फायदा झाला, हृदयातील प्रेम व्यक्त करत सुखी संसार सुरू झाला तर आम्हांला अवश्य कळवा. हल्ली लग्नातील जेवणाचे वाढलेले दर बघता आम्हाला बोलवू नका, फक्त कळवा. बोलवले नाही तरीही आमच्या शुभेच्छा आहेतच.

आणि.. हो समजा तुम्ही बोलवले तरीही वेळ.. पैसा.. प्रवासाची दगदग यामुळे यायलाही परवडत नाही हो.. पण हे मान्य न करता आमचा अहंकार दुखावतो. आम्ही ओरडून जाणीव करुन देतो. असो.. हे असे एप्रिल फुल.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “छापा की काटा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “छापा की काटा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

दोघांचीही निवृत्ती झाली होती,साठी कधीच ओलांडली होती.

अजूनही परिस्थिती ठीक होती,हातात हात घालून ती चालत होती.तो राजा ती राणी होती.जीवनगाणे गात होती,झुल्यावर- ती झुलत होती,कृतार्थआयुष्य जगत होती.

अचानक त्याची तब्बेत बिघडते,मग मात्र पंचायत होते.तिची खूपच धावपळ होते,पण कशीबशी ती पार पडते.

आता तो सावध होतो,लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,वारसाची पुन्हा खात्री करतो,मृत्यूपत्राची तयारी करतो.

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,पासबुक तिच्या हातात ठेवतो, डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,तिलाच पैसे काढायला लाव तो,पुन्हा तिला सोबत घेतो,वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, तिलाच रांगेत उभं करतो,बिल भरायचं समजाऊन सांगतो,

अचानक तिला सरप्राईज देतो,टचस्क्रीन मोबाईल हाती ठेव- तो,वाय-फाय नेटची गंमत सांगतो,ऑन लाईन बॅकींग समजा- ऊन देतो,तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,नवा सोबती जोडून देतो.

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,प्रत्येक व्यवहार पाहू लागते, कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो.

निश्चिंत होत तो हळूच हसतो,बदल त्याच्यातला ती पहात असते,मनातलं त्याच्या ओळखतं असते,थोडं थोडं समजतं असते,काळजी त्याचीच करत राहते.

एक दिवस वेगळेचं घडते,ती थोडी गंमत करते आजारपणाचा बहाणा करते,अंथरूणाला खिळून राहते,भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते…चहात साखर कमी पडते, तरीही त्याचे ती कौतुक करते,नाष्ट्यासाठी उपमा होतो,पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,

दिवसामागून दिवस जातो,अन् किचनमधला तो मास्टर होतो.

कोणीतरी आधी जाणार असतं,कोणीतरी मागं रहाणार असतं…

पण मागच्याचं आता अडणार नसतं,अन् काळजीचं कारण उरणार नसतं,सह-जीवनाचं नाणं उडत असतं,जमीनीवर ते पडणार असतं,आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो…

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुलला बहावा…” ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुलला बहावा…” ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

सोनसळी लेऊन अंगावरती 

भरजरी शेला सोनेरी

काटक तनु तव झाकून घेसी,    

कुसुमे गुंफून सोनेरी

*

बहार म्हणावा की बहर म्हणावा      

रंग तव तनुचा झळकतो वर्ण सोनेरी

वसुधेची ही ऐश्वर्य संपदा, 

लोंगर लोंबती सुवर्ण रंगी सोनेरी…

(कवी अज्ञात) 

किंवा… 

सुवर्णाची फुले

सुवर्णाचे  मोती

मधे मधे पाचू

श्रीमंती ही किती?

*

मोजदाद  याची

करावी कशाने?

घ्यावे नेत्रसुख 

आनंदी मनाने

(कवयित्री नीलांबरी शिर्के) 

…. असा हा नजर खिळवून ठेवणारा …. ज्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांनाही जणू बहर यावा असा बहावा … बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा ” नेचर इंडीकेटर ” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला ‘ शॉवर ऑफ फॉरेस्ट ‘ असेही म्हणतात. आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो …..  

कवयित्री इंदिरा संत यांनीही या देखण्या बहाव्याचं किती सुंदर आणि बोलकं चित्ररूप वर्णन केलंय बघा — …      

नकळत येती ओठावरती 

तुला पाहता शब्द वाहवा, 

सोनवर्खिले झुंबर लेऊन 

दिमाखात हा उभा बहावा।।

*

लोलक इवले धम्मक पिवळे 

दवबिंदूतुन बघ लुकलुकती, 

हिरवी पर्णे जणू कोंदणे 

साज पाचुचा तया चढवती ॥

*

कधी दिसे नववधू बावरी 

हळद माखली तनु सावरते 

झुळुकीसंगे दल थरथरता 

डूल कानिचे जणू हालते ।।

*

युवतीच्या कमनीय कटीवर 

झोके घेई रम्य मेखला, 

की धरणीवर नक्षत्रांचा 

गंधर्वांनी झुला बांधला॥

*

पीतांबर नेसुनी युगंधर 

जणू झळकला या भूलोकी, 

पुन्हा एकदा पार्थासाठी 

गीताई तो सांगे श्लोकी ।।

*

ज्या ज्या वेळी अवघड होई 

ग्रीष्माचा तुज दाह सहाया, 

त्या त्या वेळी अवतरेन मी 

बहावा रुपे तुज सुखवाया ॥

(कवयित्री :  इंदिरा संत) 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

मा. श्रीमती निर्मला सीतारामन यांचे विचारात पाडणारे प्रगल्भ चिंतन !

तिरुचिरापल्ली येथील आमच्या संयुक्त कुटुंबाच्या घरात आम्ही 5 ते 95 वर्षे वयोगटातील 14 जणं राहत होतो. सर्व मुले, नातवंडे, आजी-आजोबा जे कुणी होते ते त्यात अगदी आनंदाने आणि ‘समाधानाने राहिले, जगले …!’ पण आज, मी दोन्ही वडिलोपार्जित घरे सोडली आहेत.  ज्या बागेची माझी आई तासनतास निगा राखत़ होती, काळजी घेत होती तीचा आता पालापाचोळ्याने ताबा घेतला आहे. जांभुळ, शेवगा, काही कडुनिंब आणि पिंपळ मात्र अजून टिकून आहेत. परंतु हे ही खरं की सर्व सौंदर्य क्षणिक असतं. दुर्लक्ष झालेल्या गोष्टींवर नियमांचे नियंत्रण कसे राहणार ! दुर्लक्ष किती शक्तिशाली असतं हे आता लक्षात येते. असंख्य रंगांची मनमोहक फुलं होती … ती ही गेली.  माझी आई खारूताई, मोरांना रोज दाणे घालायची, त्या पक्षांच्या कुटुंबाचे काय झाले असेल याची मला हुरहूर वाटत असते.  बुलबुल, चिमण्या, पोपट, अन्य पक्षी, कोकिळा यांनी किलबिल चालू असे. माकडांची एखादी टोळी, जे कधीतरी महिन्यातून एकदा या ठिकाणी येऊन नासधूस करीत असत.

“माणसे निघून गेली की घर घर राहत नाही”.

सुरुवातीला मला विकावेसे वाटले नाही आणि आता जावेसे वाटत नाही. 

कालौघात तेथे राहणाऱ्या चौदापैकी दहा जण जग सोडून निघून गेली.

मी आमच्या आजूबाजूच्या परिसरात फिरले आणि एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांची अशीच अवस्था झालेली मी पाहिली. काही जागा आता आईवडीलांना सोडून रहाणाऱ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या अपार्टमेंट्सने घेतली आहे.

ओऽहो ! सारं कसं शांत शांत! सर्व काव काव संपली की!!

आपण घरे बांधण्यासाठी किती आटापिटा करतो, ताणतणावात जगतो, नाही?  खरं तर आमच्या मुलांना याची गरज असते का? किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्यासाठीची आपली मरमर !

पर्मेश्वरानी दिलेलं आयुष्य तसं पाहता एक भाडेतत्त्वावर मिळालेली संधी असते.  त्याला कुठल्याही वाटाघाटीच्या सीमा नसतात पण त्यावरही ताबा मिळवण्यासाठी आपण बॅंक हप्त्यांच्या ओझ्याखाली विवेकशुन्य जीवन जगत असतो.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व काही एकतर संपलेल असेल, भांडणात अडकलेलं असेल किंवा विकलं जाईल.

प्रत्येक वेळी मी ‘कायमचा पत्ता’ विचारणारा फॉर्म भरते तेव्हा मला आपल्या मानवी मूर्खपणाचेच हसू येतं.

झेनची एक कथा आहे की एक वृद्ध भिक्षू एका राजाच्या राजवाड्यापाशी गेला आणि त्याने रक्षकाला सांगितले की या अतिथी गृहात मला एक रात्र घालवायची आहे.” “तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?” रक्षक चिडून म्हणाला.  साधू म्हणाला, “मी दहा वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा येथेच थांबलो होतो, तेव्हा येथे दुसरा कुणीतरी राजा होता. काही वर्षांनी, त्याची गादी कोणीतरी घेतली नंतर कोणीतरी. जिथे रहिवासी सतत बदलत राहतात ते एक अतिथीगृहच असतं.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात “घर ही केवळ अशी एक जागा आहे जिथे तुम्ही बाहेर जाऊन खूप काही मिळवता अन् मिळवलेल्या सगळ्या गोष्टी येथे साठवत असता!”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात.  जेव्हा घरात सगळे असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घर रिकामं पडतं, तेव्हा आपल्याला सगळ्यांचा सहवास हवा असतो!

आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी जगणं सोडून देणाऱ्या व शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून मानलेल्या अतिथिगृहातून निघून जाणाऱ्या माणसांवर पशू, पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील!

विवेकशुन्य मानवी इच्छा, अन् काय !!

स्वैर अनुवाद :  श्री नंदकिशोर मुळे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानाचे आत्मवृत्त… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ कानाचे आत्मवृत्त लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

मी आहे कान !

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत ‘ कान !

कारण आम्ही दोन आहोत !

आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही.

कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या,

चांगलं असो की वाईट,

सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हांला ‘खुंटी’ सारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे.

आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला !

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं.

त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही.

डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक!

पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटॅालचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

किती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे सर्व भार सांभाळायला !

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी  रहा ! …

टवकारलेत ना कान !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना . पुणे तेथे काय उणे  !

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते || 

(जातिकोश – जायफळ)

वसंततिलका 

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

मालिनी 

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे…!!

सौजन्य :  श्री आनंदराव जोशी

(एक अस्सल पूर्वाश्रमी सदाशिव पेठी आणि आजीव पुरणपोळीचे उपभोक्ते ! )

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

गावातलं एक शेतकरी कुटुंब.

आई, वडील व तीन मुलं, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब.वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक आणि मेहनती. एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली.नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या.

मात्र घरातली  कोणती कामं कुणी करायची,यावर गोंधळ होऊ लागला आणि कामं खोळंबू लागली. एकीला वाटायचं की,’ हे काम मी का करू? धाकटीने करावं.’ असं इतर दोघीनाही वाटायचं अन् त्यामुळे गुंता वाढत गेला.

वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन् एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल त्यांनी चक्क वाटणीच करून दिली.

ते म्हणाले, “सर्वांत लहान सून… हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा, हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिनं पाहायचा. बाकी दिवसभर मग तिनं वाटलं, तर इतरांना मदत करावी, मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आरामदेखील करू शकते.

मधली सून…. नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिनं घरची धुणीभांडी पाहायची.बाकी काही नाही केलं तरी चालेल.

थोरली सून…. जुन्या काळातली आहे.कष्टाळू आहे. शेतीभातीचे ज्ञान आहे.परंपरा रीतिरिवाज माहीत आहेत.तर आजपासून तिनं फक्त शेताकडं पहायचं.बाकी तिन्ही मुलं शेतात असतातच. त्यांना हातभार लावायचा. घरची बाकी कामं नाही केली तरी चालेल.

यावर मग सासू बोलली, “सगळ्यांना कामं सांगितलीत. मलाही काही काम सांगा की,मी काय करू ते.”

सासरा म्हणाला, “खूप वर्षं तू माझ्या बरोबरीनं कष्ट केले आहेस.त्यामुळं तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं असं वाटत नाही.आराम कर, सुख घे.”

तर सासू म्हणाली, “तसं नको.नुसतं बसून आजारी पडेल मी ! काहीतरी काम सांगाच.”

सासरा म्हणाला, “बरं,मग एक काम कर.आजपासून घराची मुकादम तू. सगळीकडं लक्ष ठेवायचं.पै पाव्हणे पाहायचे आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील, तिथं तू त्यांना पाठबळ द्यायचं.”

कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खूश !

आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालू लागले.गाडी रुळावर आली आणि अशाच एक दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती.भाकरी भात वगैरे झाला होता. फक्त आता भाजी राहिली होती. भाजीही चिरून वगैरे तिने घेतली. कढई चुलीवर चढवली.फोडणी केली. नंतर चिरलेली भाजी टाकली. तिखट, मसाला, हळद टाकली. मीठ मात्र टाकलं नाही. का नाही टाकलं ? तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो. म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते. (गोष्टीच्या निमित्तानं नव्या पिढीच्या महिलांना ही टीप दिली)

आणि रश्श्यासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली. इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघालीय. तर पाच मिनिटं तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटल.

पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती. त्यात वेळ जाणार होता.

मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडं (म्हणजे जावेकडं) गेली. अन म्हणाली की, “माझी मैत्रीण निघालीय. मला जायचंय, तर आजच्या दिवशी जरा भाजीला उकळी आल्यावर मीठ तेव्हढं घालता  का ?”

त्यावर मधली जाऊ म्हणाली, “माझ्यापेक्षा लहान असून मला काम सांगतेस ? तुला काही संस्कार बिंस्कार आहेत की नाहीत? निघ तू…. तुझं तू बघ.”

धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली.

थोरलीने तर मधलीपेक्षा मोठा आवाज करून धाकटीला “तुझं तू बघ” म्हणून घालवून दिलं .

धाकटी मग तोंड लहान करून शेवटी हायकमांडकडे

(सासूकडे) गेली. तसं सासूनंही नकार देत… “तुझं तू पहा. मला आता कामं झेपत नाहीत बाई,” असं म्हणत तिला घालवून दिलं.

या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेव्हढ्या वेळेत भाजीला उकळी आली पण ! ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ टाकून झाकण ठेवून ती गेली मैत्रिणीला भेटायला.

 

आणि मग या दोन सुना व सासू स्वतःशीच विचार करत बसल्या की,’आपण केलं ते चूक की बरोबर ?’

मधलीनं विचार केला,’कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली.  आपण घालवून दिली. हे बरोबर नाही केलं आपण.’

असं म्हणत ती स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

थोरलीनंही तसाच विचार केला आणि थोड्या वेळानं तीही स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

आणि सासूलाही पश्चाताप झाला, ‘नको होतं इतकं रागवायला तिला.’असं म्हणत  थोड्या वेळानं तिनंही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकलं.

सर्वांनी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की, आपण चुकलो होतो, पण नंतर दुरुस्ती केली.

पण आता जिथं एक चमचा मीठ पडायचं होतं, त्या भाजीत चार चमचे मीठ पडलेलं.

दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले.

सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं.

सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला अन त्यांच्या लक्षात आलं, भाजी खारट झालीय.

त्यांनी सुनेला सांगितलं, “अग बेटा,घरात दही आहे का ? असेल तर वाटीभर आण.”

सुनेनंही पटकन जाऊन दही आणलं. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं अन मस्त मजेत जेवण करून शेताला निघालेसुद्धा.(बाय द वे दुसरी टीप : पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा. काम होऊन जातं.)

नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली.

त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुणेनं “काही खरं नाही भाजीचं,” असं सांगितलं.

थोरल्या मुलानं आईला विचारलं, “आबा जेवून गेले का ?”

आईनं ‘हो’ सांगितल्यावर त्यानं विचारलं, “काय जेवले आबा?”

तर आई म्हणाली, “हेच जेवण की, जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहीत, त्यांनी दही मागून घेऊन ते भाजीत टाकून खाल्लं, बाबा.”

यावर पटकन तिन्ही मुलं म्हणाली, “आम्हालाही दही आणा.”

त्याप्रमाणं मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून ते शेतात गेले.

नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या, तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूनं याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी “मी पण मीठ टाकलं,”असं सांगितलं. शेवटी मग त्यांनीही भाजीत दही मिसळून जेवण केलं.

गोष्ट इथं संपलीय !

 एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं  वाद होऊ शकतो, मनं कलुषित होऊ शकतात, अशावेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, जी कृती करून नकळत मार्गदर्शन करतो, तो बाकीच्यांनी मानला, तर मग वरील गोष्टीप्रमाणे  वाद न होता तो मुद्दाच अडगळीत पडतो आणि घरात एकोपा राहतो.

प्रश्न मीठ जास्त पडण्याचा नसतो तर नंतर त्यावर काय करावं ? याचा असतो.

प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता. पण त्यानं तसं केलं नाही. कारण  बिनभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचं दही कसं मिसळायचं हे तो शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली अन तेही जेवण करून खूश झाले. वाद टळला.

कुटुंबप्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील. पण तुमच्यापेक्षा चार पावसाळे त्यानं जास्त पाहिलेले असतात. त्या अनुभवाचं भांडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात.

ते लाथाडू नका ! स्वीकारा !

त्यातच भलाई आहे!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही. पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मुलांना मार मिळत असे!

  1. मारल्यावर रडल्या बद्दल.
  2. मारल्यावर न रडल्या बद्दल.
  3. न मारता रडल्या बद्दल.
  4. मित्रांबरोबर खेळल्याबद्दल.
  5. मित्रांबरोबर न खेळल्याबद्दल.
  6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्याबद्दल.
  7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल
  8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.
  9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.
  10. उपदेशपर गाणं गायल्याबद्दल.
  11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.
  12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्याबद्दल.
  13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केल्याबद्दल.
  14. खायला नाही म्हटल्यावर.
  15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.
  16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्याबद्दल.
  17. हट्टी असल्याबद्दल.
  18. खूप उत्साही असल्याबद्दल.
  19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्याबद्दल.
  20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्याबद्दल.
  21. खूप सावकाश खाल्ल्याबद्दल.
  22. भराभर खाल्ल्याबद्दल.
  23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्याबद्दल.
  24. पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्याबद्दल.
  25. चालताना घसरून पडल्याबद्दल.
  26. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्याबद्दल.
  27. मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्याबद्दल.
  28. मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्याबद्दल.
  29. मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्याबद्दल.
  30. रडणार्‍या मुलाकडे पाहून हसल्याबद्दल.

उगाच नाही आपण इतके निर्मळ, शहाणे झालो…

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print