☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा..☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात…… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो….. ‘ज्याचे होते त्याला दिले’…. फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो…….त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.
अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे….
त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही…….. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती, ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा…..आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.
शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात….म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.
आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात…..तशी मनाची साफ-सफाई करु…. आणि तिथे आनंद पेरु या. तो शतपटीने उगवून येतो…. त्याची जोपासना करु….. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच …..
“दु:ख सोडून द्यावे,
निर्माल्य बनून जाते.
आनंद पेरत जावा,
समाधान बनून रहाते.”
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केलेले सह्याद्रीचे वर्णन … हे वाचून छातीच दडपून गेली.)
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!
त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो! आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य! तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली, त्याच्या घोटीव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…
सह्याद्रीला इतके नटवले सजवले, तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो– रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा ! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी. दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊ हं ! तोपर्यंत वाट पहा !”
रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात. दाट दाट झाडी, खोल खोल दर्या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातकी वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! —–
असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्री बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर रहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही आहे. कारण तेही मराठ्यांच्याइतकेच शूर
आहेत ! सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याही. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर- रांगांच्या मधल्या खोर्याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत. प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थ ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखे नाही का होत ? कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही. मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, ती गंगा यमुनांची. सह्याद्री हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते ! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. काही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.
मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.
—शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात…
मुंबई, १० एप्रिल – जगात फार कमी लोकांमध्ये माणूसकी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत-नकळत खूप काही शिकत असतो. मी गौरव गद्रे आज तुम्हाला माझ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहे. अगदी एका छोट्याशा कृतीमधूनही तुम्ही कसा बदल घडवू शकता हे मी त्या अनुभवातून शिकलो.
नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी मी वांद्रे स्टेशनला थांबलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पूर्ण स्टेशन माणसांशी भरून गेलं होतं. ऑफिसला उतरण्यासाठी मला मधल्या डब्यात बसणं सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या मागे असणाऱ्या डब्याकडे ट्रेनची वाट पाहत उभा होतो.
इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं तान्हं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण आपल्या मोबाइलमध्ये, पेपरमध्ये पाहू लागले. थोड्यावेळाने ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं. आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होण्यापेक्षा जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतली दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं.
अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या एका आजीने तिला अंगावरचं दूध पाजायला सांगितलं. तिने सुरुवातीला फक्त हो हो म्हटलं, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात येता ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकडावर बसली आणि बाळाला पाजू लागली. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं की तिला मॅनर्स नाहीत, अशिक्षित आहे.. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. ही घटना घडेपर्यंत मीही त्यांच्यापैकीच एक होतो.
ती महिला शिक्षित होती की अशिक्षित.. सुसंस्कृत होती की नव्हती या नको त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं आहे. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच वांद्र्याच्या स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणारा जाणारा त्या बाईकडे कटाक्ष टाकून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्ष जास्त होतं. आपल्या समाजाची मानसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या मनात राहून राहून येत होता.
काहींनी तर तिच्याकडे अश्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो, इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक मुलगा माझ्यासमोर आला. हाही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला. मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं.
तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आणि ती अचानक माझ्यासमोर का आली.. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि शांतपणे आपल्या मुलाला पाजू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच धक्का बसला. ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही… मी अशा पद्धतीने का विचार केला नाही…??? याचाच मला प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन-तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली.
प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा..!!
– गौरव गद्रे
संग्राहक – सुश्री मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…!
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!
जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो. मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!
? श्री स्वामी समर्थ ?
सग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
काही वर्षांपूर्वी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच, पुण्याजवळ रात्री मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले. पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी हाकलून लावले. दुसऱ्या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणाऱ्या एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळासारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते. त्या बांधवाकडे पाणी मागितले. पण पाणी थोडे अन आम्ही 25 जण– शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच. पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले,
” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “. यावर तो आदिवासी म्हणाला– “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “– तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणाऱ्याचा धर्म कोणता ? मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की हा आदिवासी म्हणतो तो? जशी रात्र उतरत होती तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता. हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते. कुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता, आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता. ते शत्रू वाटत होते. पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली. त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. खूप काहीतरी गवसल्याचा आनंद तेव्हा मनात दाटला होता.
—-हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत. माणसाला माणसाचा शत्रू बनवणारा, परस्परांच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?
संग्रहित…. !
प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ देव-बीव सगळं झूठ आहे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
“देव-बीव सगळं झूठ आहे..थोतांड आहे..’मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थेटर ‘ च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात..”
डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता कि “मी आज किटी-पार्टीला जात आहे.मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात की जेवा”…
डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..
लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं..”देव-बिव सगळं झूट आहे” -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही यावर ठाम..जगात एकच सत्य..’मेडिकल सायन्स’..बाकी सब झूट है’..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली
“बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय”……
हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स..”
“साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही ‘ देव ‘च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल…हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला..”
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते याच विचारात दंग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ?
चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो…चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक ‘सत्कृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही?
आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो…
डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती..त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..
एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता…
डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…..!!
प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
-अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले. सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं. त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य, जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती होते, ते उठून उभे राहिले आणि लिंकनना उद्देशून म्हणाले, ” मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका की तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते.”
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं की याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे, आणि त्यांची लायकी दाखवली आहे.
मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक? ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठेपणा सिद्ध करतात, तेही अगदी शांतपणे—– लिंकन ही असेच !!
—-सभागृह काय होणार याकडे जिवाचा कान आणि डोळ्यात जीव आणून पहात होतं.
प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली , आणि त्याला म्हणाले,
“सर, मला माहित आहे हे, की माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते. तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत की ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट बनवत होते, कारण त्यांच्यासारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं.”
—“ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते, त्यांच्या हातात जादू आणि कला होती. त्यांनी बनवलेल्या चप्पल-बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते, आपलं संपूर्ण मन आणि कसब त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय? कारण हे कसब मलाही अवगत आहे की हे बूट कसे बनवायचे. आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा. मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन– पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही. ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!”
—-सर्व सभागृह बधिर झालं होतं, कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. अब्राहम लिंकन ही काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.
यातून एकच गोष्ट लक्षात घ्या, प्रसंग कसाही असो, आपला तोल जावू देवू नका.
कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या.
” आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही ” –हे वाक्य मनावर कोरून ठेवा.
आणि— कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मन:शांती ढळू देवू नका.
“काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो— तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते..!!