“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँसाहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते !
फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल, तर तो असा साग्रसंगीत खावा की जणू संगीताची मैफलच आहे.
तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.
शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.
पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात, तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो, तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात, तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते, तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !
काही राग काफी थाटाचे असतात, तसे इथे देखील ‘ कॉफी ‘ थाट असेल तर मजा कुछ औरच ! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.
काही स्वर आरोहात वर्ज्य असतात, तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.
बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स- ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.
भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला की जशी खुमारी वाढते, तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो.
यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत, तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा.
चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.
शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी त्यांच्या बरोबर ते ओढे, म्हणजे कट्यारमधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.
करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.
शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.
मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.
– भूपाल पणशीकर
संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
… कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढंच माहीत होतं…
… पुढे कधीतरी MMM म्हणजे मदन मोहन मालवीय हे मला कळले…
… पण गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…
… बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधीपर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर…” मनी मेकिंग मशीन “चा अर्थ कळतो…
… सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटींचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…
… याच देणगीसाठी ते हैदराबादच्या निजामाला भेटले… विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता… पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते…
… समोर बसलेल्या पंडितजींकडे पाहून आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता… नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजींना वहाण दाखवत होता…
… पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली… नबाबाने दुसरा पाय पुढे केला. पंडितजींनी तीही मोजडी काढून घेतली आणि ‘ बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो ‘ म्हणून बाहेर पडले…
… आपण पंडितजींना जोडे दिले या आनंदात… नवाब खुशीत गाजरं खात होता…
… आणि तोपर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली… पंडितजी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत… नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…
… आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी नबाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले… लिलावाची बोली सुरू झाली… नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्यावर आपली बोली लावू लागला… पंडितजींचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोलीच्या वर प्रत्येकवेळी बोली लावत होते… अर्थात तशी योजना खुद्द पंडितजींनीच केली होती…
…पंडितजींची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली… बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी… पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला… बोली थांबली… लिलाव संपला…
… आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नबाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो–हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये… जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता, आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होते…
… “हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा… नबाबाची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा… भारत मातेचा थोर सुपुत्र… MMM… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण करणारा हा आधुनिक महर्षी… स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास…
पंडितजींच्या चरणी शतकोटी वंदन
संग्राहक :- श्री सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
(पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली ! ) इथून पुढे ——-
गडाच्या चढाला प्रारंभ केला, त्या वेळी तर अक्षरश: काळोख दाटला, आणि त्यांत सुया टोचाव्यात, तसे अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब. कसेबसे रात्री नऊ -दहाच्या सुमारास गडावर पोहोचलो, अन् शेडग्याने धर्मशाळेत गोळा करून ठेवलेले सर्पण जाळीत रात्रभर अंगे शेकीत बसून राहिलो. सहज चर्चा निघाली किल्ले बघण्याची. बाबाने बोलता बोलता म्हटले, की सिंहगड, पुरंदर, राजगड अन् तोरणा हे किल्ले मी असंख्य वेळा पाहिले आहेत ! एकूण दुर्ग किती पाहिले, ते आठवत नाही!
पुरंदर हे तर बाबाचे घरच. पुरंदरे हे नावच त्या किल्ल्यावरून पडलेले. एवढ्याने भागले नाही. या घराण्याला पर्वतीजवळची दोन चाहूर जमीन मलिकंबरने इनाम दिलेली. वतनाचे ते कागद अजून सुरक्षित आहेत. त्यानंतर मराठेशाहीत या घराण्याने तोलामोलाची स्वराज्यसेवा केलेली. पूर्वजांच्या कमरेला तलवार सदैव बांधलेली.
पण अशा तर किती पूर्वजांच्या किती कुलदीपकांनी आपापल्या तलवारी मोडीत फुंकून टाकल्या आहेत. आपापल्या वतनांच्या कागदांनी पाणी तापवायचे बंब पेटविले आहेत. पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे एरवी मोल ते किती ?
पण ते या बहाद्दराने सांभाळले. त्याला शिकल करून, सहाणेवर धरून ते पाजळले. त्याची लखलखीत तलवार हाती पेलली !
बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण अशी शब्दकळा कुणाजवळ ? बाबाचे शिवचरित्र वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे. आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली सप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला !
पण हे एवढे शिवमहाभारत लिहूनही लटके प्रौढत्व कसे ते अंगी अजिबात नाही. अंगीचे शैशव या साऱ्या उद्यमामुळे हारपले नाही. एवढा प्रचंड खटाटोप, हा नजर फाडून टाकणारा प्रवास, हे डोंगरदऱ्या भटकणे, हे सगळे करूनही मूळचा अवखळपणा लवलेश उणावला नाहीं.
छत्रपतींच्या जीवनाचा सारा तपशील जसा मितिवार, प्रहर-घटिकानिशी मुखोद्गत, तसेच, इतर पाठांतर काही कमी नाही. गडी जरा खुलू द्या. रानांत भटकत असतां सभ्यतेचे बंध थोडे सैल होऊं द्या. मग पाहा चुटक्या – चुटक्यांचा धबधबा कसा वाहूं लागतो, ते. कुणाकुणाच्या नकला, कुणाकुणाचे स्वर, कुणाकुणाचे खाकरणे, ठसकणे, अगदी सही सही ! इतिहासाच्या पंचपक्वान्नाच्या जोडीला लावणी- फटक्यांची चटणी-लोणचेही हजर !
पु.लं. नी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये कुण्या एका मुलीविषयी लिहिले आहे, की तिने जन्मभर चालतच रहावे !
बाबासाहेब पुरंदरे हा मनुष्य संगतीला लाभला. की वाटते, याने जन्मभर बोलतच रहावे ! असे साभिनय बोलणें, की त्याला तुलनाच नाही !
नागपूरचा एक प्रसंग सांगतो. विदर्भ साहित्य संघ आणि मोरभवन अशा दोन टोलेजंग इमारती एकीसमोर एक उभ्या आहेत. मध्ये सडकच काय ती. एका अतिशय विख्यात, वक्तृत्वाबद्दल सुप्रसिद्ध, एका काळी मराठी वाचकांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविलेल्या, पिकलेल्या प्राध्यापकांची शृंगाराने सिक्त झालेली व्याख्याने मोरभवनात सुरू होती. त्याच वेळी या तरूणाची शिवचरित्रावरील व्याख्याने समोरील विदर्भ साहित्य संघात चालू झाली. शिवचरित्र हे शिवधनुष्यच आहे. भलत्याने त्याला स्पर्श करू नये.
पण कौतुक सांगतो, की ज्या वयात शृंगार अतिशय रोचक वाटतो, अशा तरूणांचे जथेच्या जथे मोरभवनातली शृंगाररसाने आर्द्र व्याख्याने टाकून विदर्भ साहित्य संघात गर्दी करू लागले.
अशी ही जुगुलबंदी आठ दिवस चालली होती. शेवटी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह तुडुंब भरून लोक बाहेर उभे राहून बाबांचा वाक्प्रवाह पिऊन जाऊ लागले.
शेवटी मोरभवनांतील एका पेन्शनर श्रोत्याने कुतूहल म्हणून विचारले,
“काय, हो ? इथे काय राज कपूर पाहायला लोक जमले आहेत काय ?”
उत्तर मिळाले,
“नव्हे ! इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग सांगत आहेत !”
समाप्त
लेखक – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 1 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
घड्याळांत सहाचे ठोके पडले, अन् आम्ही पन्हाळा किल्ला उतरायला प्रारंभ केला. आषाढ मासीच्या काळोख्या रात्री धूमधूम पावसात भिजत शिवछत्रपति पन्हाळा उतरून ज्या आडवाटेने विशाळगडीं पोहोचले, त्याच वाटेने जायचे, असा आमचा संकल्प होता.
दहा-पाच पावले उतरलो, अन् पाहिले, की बाबासाहेब थांबले आहेत ! आता हा माणूस प्रवासाच्या आरंभीच हे असले करायला लागला, तर हा रानावनांतला पंचेचाळीस मैल प्रवास कसा पार पडायचा ! काहीसा चिडून मी हाका मारू लागलो. आपल्या मुद्रेवरचे हसूं मावळू न देता बाबासाहेब म्हणाले,
“त्याचं काय आहे, अप्पासाहेब, उजवा पाय थोडासा लचकला. कसा, कोण जाणे ! पण निघताक्षणी त्यानं दगा दिला. हा निघालोच – गुडघ्याला रूमाल बांधताक्षणी !”
– अन् ते दु:ख वागवीत हा मराठी शाहीर ते रानावनांतले, अवघड वाटेवरले कंटाळवाणे पंचेचाळीस मैल तस्सा चालत राहिला ! मुद्रेवरचे स्मित त्याने कणभरही झाकोळू दिले नाही.
या माणसाला मी चांगला ओळखून आहे ! शिवचरित्रावरील भक्तीपोटी हा काय वाटेल ते करू शकतो, या विषयी माझ्या मनी तिळप्राय शंका नाही.
वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळा सुरू झाला होता. वरंध घाट बंद झाल्यामुळे महाडहून पुण्यास परततांना महाबळेश्वरमार्गे यावे लागत असे. मोटार महाबळेश्वरीं थांबली होती. पावसामुळे झडपा बंद करून घेतल्या होत्या. कुतूहलामुळे मी माझ्या मागची झडप उचलून पावसाचे झरपणे पाहात बसलो होतो. तों वाईकडच्या रस्त्याने कुणी सायकलस्वार चिंब भिजून आलेला दिसला. एकटाच होता. अंगातलें कुडते अंगाशी अगदी चिकटून गेले होते. मस्तकावरून पाणी निथळत होते. दात थडथडत होते.
पाहिले, तर गडी ओळखीचा वाटला. मी तिथल्या तिथून जोरजोराने हांक मारू लागलो. आइकून तो काकडलेला सायकलस्वार मोटारीकडे वळला.
मी आश्चर्याने विचारले,
“बाबा, कुणीकडे ?”
स्मित करून बाबासाहेबांनी म्हटलें,
“प्रतापगडावर.”
“एवढ्या पावसांत ? अन् एकटे ? मोटारीने का गेलां नाही ?”
“तिथं एक कागद आढळांत आला, असा सांगावा पोचला. निघालो, झालं !”
एक जुना कागद आढळांत आला, असा म्हणे सांगावा आला. तेवढ्यासाठी हा माणूस पुणे ते प्रतापगड हा प्रवास वाटेतले तीन घाट चढून, या लागत्या पावसाळ्यांत, सायकलवरून करायला निघाला होता !
पण हे काहींच नव्हे. आम्हांला केवळ पुरंदर्यांचे शिवचरित्र दिसते. मोहोरेदार कागदावर छापलेले. चित्रे घालून सजवलेले. मराठी ग्रंथसंपत्तीचे केवळ शिरोभूषण असे श्री. ब.मो.पुरंदरेलिखित ‘राजा शिवछत्रपति’ ! पण त्यापाठीमागचे हे कष्ट, हे रक्त आटवणे कुणाला माहीत आहे ? जिथे जिथे शिवचरित्र घडले, तो बहुधा सर्व प्रदेश या तरूण पुरुषार्थ्याने पायांतळी घालून अक्षरश: विंचरून काढला आहे. अमुक एका खिंडीतून शिवछत्रपतिंचे सैन्य अमुक एका वेळी मुघलांसमोर उभे ठाकले, असे वाचले मात्र की त्या वाटेने तसतसा प्रवास करून तो सगळा प्रांत डोळ्यांखाली घातलाच पाहिजे. प्रतापगडाभोवतालचा तो पारघाट, ते जनीचे टेंब, ती जावळी, ते कोयनापार हे सगळे भटकले पाहिजे. या येडपट संकल्पात कोण जोडीदार मिळणार ? त्या भयानक प्रदेशांत भयानक झाडी. अस्वलांची आणि बिबळ्यांची वस्ती. हे रान तुडवीत बाबाबरोबर कोण हिंडणार ? ठीक आहे. न मिळो ! अंग काट्यांनी फाडून घेत हे महारण्य एकट्याने धुंडाळायचे. अन्न आहे आहे, नाही ! नाही ! चिंता करतो कोण ? देवाने तारूण्य दिले, ते कशासाठी तर मग ?
या मस्ताना जोग्याने वाचले, की शिवछत्रपति आग्र्याहून नर्मदा ओलांडून दक्षिणेत शिरले. लगेच रेल्वेत बसून आग्रा गाठले, अन् भिडू निघाला तिथून पायी. सामानाचा लबेदा नाही. पाठीवर एक पिशवी, तिच्यांत कपड्यांचा जोड आणि एक पांघरूण. कोण करतो हो, हे सगळे ? कुणाच्या छातीत एवढी हिंमत ?
आम्ही एकदा निघालो रायगडावर. दिवस होते सरत्या उन्हाळ्याचे. मी, पुरंदरे, अमरावतीचे देशमुख आणि बेदरकर. म्हटलें, की लवकरच पावसाळा लागेल, आणि मग मार्ग बंद होईल. पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली !
क्रमशः….
लेखक – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ Being alive is a special occasion. – डॉ संजय मंगेश सावंत ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
Being alive is a special occasion !!!
काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने, डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठविला, Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can,, Now a days being alive is a special occasion !!!
आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा,,,
सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे,,,
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो. दोघेही ८० च्या आसपास असावे. राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देतानासुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणा नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगल खाणं नाही, की कपडा नाही. परंतू असते एखाद्याची परिस्थिती नाजूक, असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो.
एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमधला प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता. ते बाबा मला म्हणाले, “ डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ?” मी लगेच त्यांना तो देऊन टाकला,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, “ त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, “– मी अचंबित –निघताना पुन्हा म्हणाले,” अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला. यात बसणार नाहीत.“ त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यासदेखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो,,,
दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला, “ सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होतात, ते आजोबा सकाळीच गेले,,,” पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,,, ‘ ना खुद खाऊंगा, ना खाने दुंगा ‘ असं आयुष्य जगतच, कसलाही उपभोग न घेता, नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते— आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमातच ते गेले.
मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झाले. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या. मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्यादेखील मोडल्या नव्हत्या. परंतू ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, पण या साड्यांमुळे नीताचा व तिचा नेहमी वाद व्हायचा,” कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत,,, कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते “ –वगैरे वगैरे. “ मला कोण बघणार
आहे ?”, तिचे नेहमीचे उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!
आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज कशाला वापरायच्या, म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायचा मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण ‘ नंतर वापरू ’ असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात,,,
आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी, आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते, कारण बोलण्यासाठी ती व्यक्तीच उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो– त्याच्यावरच आपला अधिकार असतो.—म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान–मग त्या वस्तू असोत वा विचार— आजच वापरून टाका– त्या ‘ आउटडेटेड ‘ होण्याअगोदर !!!
डॉ संजय मंगेश सावंत
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
पशुपक्षांना खायला, पाणी प्यायला देणे चांगलेच आहे. पण त्याने त्यांच्या नैसर्गिक सवयींमध्ये फरक पडतो. त्या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख. लेखक माहीत नाही पण मते मात्र पटली.********
पुण्य करताना पाप होतंय-……महापाप…..
प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना,माकडांना,पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो ! आणि कौतुक करतो आपण !!!!
प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खूश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि सहानुभूतीचे विचार आहेत–
थोडी उसंत घ्या—आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा :—
निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय;
त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे !
वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे -सोयीचे पदार्थ, आयते भरवून, त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय, त्यांच्या पुढील पिढ्यांना आयतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा — हे सिद्ध झालंय) सवय लावतोय ! त्यामुळे ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने ! त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात.
खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरे च्या सवयी आपण लावल्या;
त्यामुळे त्यांची वजने वाढली.–झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले शेवटी.
त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही.
परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्यापलीकडे भवितव्य उरले नाही.
या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे ;खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात-!!!—– आणि हे पाप आपल्या हातून होते !!
—आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय–पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग ( किंवा adict) बनवतो !
आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले, किंवा रोज कोणी 500 ची नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील— आणि त्यात त्यांचा दोष नसेल.
असेच झालेय बऱ्याच ठिकाणी!!!
मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक–कधी हल्लेखोरही होतात–आयत्या चमचमीत अन्नासाठी!!
अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो.
विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती.
पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या !!
आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोपशी पण झाली आहेत-
हे पाप कोणाचे?
परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते.
आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही, कारण अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली. म्हणजे
इतर पक्षांवर अन्याय.
कबुतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना!!!!
कबुतरखान्याजवळच्या लोकांशी बोला—आपल्या बेगडी पक्षीप्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.
दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने तिचा आहार देणे अपेक्षित आहे.
मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात-पोट फुगते- अपचन होते हे सिद्ध झाले आहे.
या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल अशी नैसर्गिक वनसंपदा जपू या- -देशी झाडांनी ती वाढवूया.
जुन्या काळातल्या ‘ पुण्य ‘ या विषयीच्या संकल्पना तपासून योग्य तिथे विधायक बदल करूयात.
संतांनी हेच सांगितलंय !
कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया…..
तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका—मीही तुमच्याइतकाच प्राणिप्रेमी आहे.
पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही —त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखू या. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे.
(सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत. त्यामुळे फॉरवर्ड करून आपले प्राणी- पक्षी प्रेम व्यक्त करा.)
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈