मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

.

आणि हे स्वामी, मी भितरा अशी साद घालतो

 हे स्वामी, तू गातोस आणि मी शांत चकित होऊन

 ते फक्त ऐकत राहतो

तुझ्या संगीताच्या प्रकाशात सारे जग उजळून निघते

तुझ्या संगीताच्या जिवंत स्पर्शानं

आकाशाचा कोपरा अन् कोपरा उजळून निघतो

तुझ्या पवित्र संगीताचा ओघ पाषाणांचे अडथळे पार करून वाहातच असतो

तुझ्या गीतात सूर मिसळायची धडपड मी मनापासून करतो, पण आवाज उमटत नाही

मी गायचा प्रयत्न करतो, पण ध्वनीच उमटत नाही, अर्थ निघत नाही, ते फक्त अरण्यरुदनच ठरते

हे स्वामी, तुझ्या संगीतमय धाग्यात तू मला बंदिवान करून ठेवले आहेस.

 

४.

माझ्या जीवनाच्या जीवना,

माझ्या सर्वांगावर तुझ्या अस्तित्वाचा स्पर्श आहे,

ही जाणीव ठेवून मी माझे शरीर स्वच्छ व शुद्ध

ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो

 

माझ्या मनाच्या गाभाऱ्यात

श्रध्देची व सत्याची ज्योती

सतत तेवत रहावी म्हणून सत्याचा

प्रकाश  फेकणारा तूच आहेस

या जाणिवेने साऱ्या असत्यांचा पसारा

मी बाजूस सारतो

 

माझ्या अंत: करण्याच्या गाभाऱ्यात

तुझीच पुष्पांकित मूर्ती विराजमान आहे,

ही जाणीव ठेवून माझ्या अंत: करण्यातून

सर्व दुष्ट प्रवृत्ती सतत दूर ठेवायचा मी प्रयत्न करतो.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कुसुमाग्रजांची एक कविता आहे,

‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,

उतरली जणु तारकादळे नगरात,

परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,

त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’

आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्‍या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्‍या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मी मुक्तामधले मुक्त,

तू कैद्यांमधला कैदी।

माझे नि तुझे व्हायाचे,

ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते,

या मंद-समीरण लहरी।

माझ्यावर चित्रित होते,

गरूडाची गर्द भरारी।

जड लंगर तुझिया पायी,

तू पीस कसा होणार?

माझ्याहून आहे योग्य,

भूमीला प्रश्न विचार।

 

आभाळ म्हणाले ‘नाही’,

भूमिही म्हणाली ‘नाही’।

मग विनायकाने त्यांची,

आळवणी केली नाही।

 

पापण्यांत जळली लंका,

लाह्यांपरि आसू झाले।

उच्चारून होण्याआधी,

 उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी,

गंगेस हिमालय नाही।

शाई न स्पर्शली असूनी,

हे अभंग नदिच्या‘बाही’।

 

दगडाची पार्थिव भिंत,

तो पुढे अकल्पित सरली।

‘मी कागद झाले आहे,

चल ‍‍‍‍‍‍लिही’ असे ती वदली।

 

(वीर सावरकरांनी अंदमानात असताना, कागद-पेन यांना बंदी म्हणून गुपचूप बोरीचा काटा सोबत नेऊन, अंदमानाच्या भिंतीवर कोरून कविता लिहिल्या, काट्याची लेखणी झाली, भिंतीची वही झाली… ते रेखाटणारी एक कविता…!!)

कवी कोण आहे हे समजू शकले नाही.

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

  1. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं – “जगलास किती दिवस?”
  2. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं – “माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?” लाकडं म्हणाली, “मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?”
  3. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,”बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
  4. माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ? – देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
  5. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे? – दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
  6. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, “माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?” त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. “माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?”

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

प्रस्तावना-

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली साठी नोबेल पारितोषिक मिळाले. एक तत्त्वज्ञ, महाकवी यांची, गंगेच्या किनारी नीरव शांततेत, निसर्गाची अनेक अद्भुत रुपे पहात फिरताना तरल सर्वव्यापी काव्यनिर्मिती म्हणजे गीतांजली. प्रेम, समता आणि शांती यांचा संदेश देणारी. इंग्रजी भाषेतील गीतांजली मा. ना. कुलकर्णी यांच्या वाचनात आली. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते तसेच त्यांना साहित्याची आवड होती. संत साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करत असत. टागोरांची गीतांजली त्यांना निसर्गरुपी ईश्वराशी तादात्म्य पावणारी कविता वाटली. त्यांना मिळालेले ज्ञान, तो आनंद, इतरांना मिळावा म्हणून त्याचा मातृभाषेत भावानुवाद केला, जो पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाला. ई- अभिव्यक्ती – मराठी मध्ये या कविता क्रमशः प्रसिद्ध होत आहेत, ह्यासाठी सर्व संपादक मंडळाला मी कृतज्ञता पूर्वक धन्यवाद देते.

☆  गीतांजली भावार्थ

१.

हे नाजूक भांडे तू पुन्हा पुन्हा रिते करतोस,

आणि नवचैतन्याने पुन्हा पुन्हा भरतोस

 

ही बांबूची छोटी बासरी

दऱ्याखोऱ्यांतून तू घुमवितोस

तिच्यातून उमटणारे नित्यनूतन संगीत

तुझेच श्वास आहेत.

 

तुझ्या चिरंतन हस्त स्पर्शाने

माझा चिमुकला जीव आपोआपच

मर्यादा ओलांडतो

आणि त्यातून चिरंतन बोल उमटतात

 

माझ्या दुबळ्या हातात न संपणारं दान ठेवतोस,

युगं संपली तरी ठेवतच राहतोस,

आणि तरीही ते हात रितेच राहतात

 

तुझी किमया अशी की,

मला तू अंतहीन केलेस !

 

२.

मी गावं अशी आज्ञा करतोस यात

केवढा माझा गौरव

नजर वर करून तुला पाहताना

माझं ह्रदय उचंबळून येतं

बेसूर जीवन मुलायमपणे एका

मधुर संगीतानं फुलून येतं

आणि सागरावर विहार करणाऱ्या

समुद्र पक्ष्याप्रमाणं

माझी प्रार्थना पंख पसरते

 

माझं गाणं ऐकून तू सुखावतोस

तुझ्या सान्निध्यात एक गायक म्हणूनच

मला प्रवेश आहे

 

ज्या तुझ्या अस्पर्श पावलांना

माझ्या दूरवर पसरणाऱ्या गीतांच्या पंखांनी

मी स्पर्श करतो,

गाण्याच्या आनंद तृप्तीने मी स्वतःला विसरतो

 

– मा. ना.कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

फोन नंबर – 7387678883

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३६ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३६– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

[१६१]

आपली स्वत:चीच फुलं

भेट म्हणून

स्वीकारण्यासाठी

माणसाकडून

किती वाट पाहतो

ईश्वर

आतुर: उत्सुक

 

[१६२]

सूत कातता कातता

कुणी साधी भोळी स्त्री

गुणगुणत असावी

एखादं  प्राचीन लोकगीत

हरवलेल्या आवाजात

तशी आज ही धरती

गुणगुणते काही बाही

माझ्या कानाशी

 

[१६३]

आपआपल्या मंदिरात

आपलेच दिवे

ओवाळतात ते

आळवतात अहोरात्र

आपल्याच आरत्या

पण हे पक्षी

तुझ्याच प्रात:कालीन प्रकाशात

तुझ्याच प्रसन्न प्रार्थना

किती खुशीनं गातात. 

 

[१६४]

सर्व चुकांसाठी

आपले दरवाजे

जर

बंद ठेवलेस तू

तर

सत्यालाच प्रत्यक्ष

कोंडून ठेवशील तू

बाहेर…

 

[१६५]

कीर्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या

शेवटच्या टोकापर्यंत

जाऊन आल्यावर

सभोवार पसरलेली

ही पोकळ उदासी

आणि गुदमरणारे प्राण…

किती वांझ असतं शिखर

आणि किती निमुळतं

क्रूरपणे आसरा झिडकारणारं…

तूच आता दाखव वाट

हे प्रभो,

अद्याप धुगधुगत आहे

हा प्रकाश

तोवरच घेऊन चल मला

त्या दरीपर्यंत

खोल … खोल…

शांत… निवांत

आयुष्याचं मृदू फळ

पिकून तयार असेल तिथं

आणि

त्यावर तकाकत असेल

जाणिवेचा सोनेरी रंग

-समाप्त-

(या कवितांबरोबरच हे सदर इथे संपत आहे.)

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

केवढी विशेषणे … कमाल आहे. आणि प्रत्येक गोष्ट पटते.   

 

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निर्गवी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडुची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?”

कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?”

“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.”

“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.”

“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले.

साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं.

इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?”

“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?”

ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.”

कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!”

“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.”

मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते.

(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.)

 

श्री  प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वीरु ने लिहिले जयला पत्र… सुश्री प्रभा हर्षे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ वीरु ने लिहिले जयला पत्र… सुश्री प्रभा हर्षे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

प्रिय जय,

तू जाऊन आता जवळजवळ चाळीस वर्षे झाली. आज एका फेसबुक समूहातील एका उत्कृष्ट उपक्रमाच्या निमित्ताने तुला पत्र लिहायची संधी मिळाली!

मित्रा, माझ्या जिवलगा आपल्या मैत्रीच्या वेळेपासून जग खूपच बदलले आहे. आपली साईड कार वाली येझदी आता भंगारात किलोच्या भावाने विकली जाते. तू वाजवत असलेला माऊथ ऑर्गन यांत्रिक वाद्यांच्या कोलाहलात गंज लागून पडून आहे. मारामारीसाठी आपण वापरत असलेले सुरे आणि पॉईंट टूटू रायफल आता फक्त पोलिसांकडे क्वचित आढळतात. घोडे तर आता टांग्याला देखील ओढत नाहीत. फक्त रेसकोर्सवर एखाद्या डर्बीत धावतात!

आपल्या रामगढ मध्ये आता माझ्यासारखी काही म्हातारी खोडं सोडली तर कोणीच राहात नाही. गाव ओसाड झालाय. सगळे शहराकडे गेले आहेत. शहरांचा श्वास घुसमटतो आहे . इथे आता लुटण्यासारखं काही नसल्याने डाकू यायची शक्यताच नाही. तसही आपण दोघांनी गब्बरला संपवल्यावर रामगढकडे वाकड्या डोळ्यांनी बघायची हिम्मत कोणत्याच डाकुत नव्हती. पण मित्रा गब्बर परवडला रे! अगदी त्याने तुला मारला असला तरी! तो दाखवून, सांगून, वागून खुलेआम डाकू होता. घोड्यावरून यायचा आणि गाव लुटून जायचा. पण हल्ली डाकू हसतमुख चेहर्याने कधी पांढरा, कधी काळा, कधी खाकी, कधी इतर कोणत्याही रंगात येतात. हसतमुख चेहरा, महागड्या गाड्या, सोफिस्टिकेटेड रुपात येतात आणि नकळत लुटून जातात. पूर्वी डाकू गावापासून लांब, जंगलात, डोंगरात राहायचे. आता ते आपल्या शेजारच्या घरात, नात्यात, रोजच्या व्यवहारात, रस्त्यात कुठेही असू शकतात. आता सामान्य माणूस डाकुंच्या वस्तीत रहातो आणि रोज विविध गोंडस नावाच्या धाडी पडून लुटला जातो.

असो. पण आपले दिवस खरंच मस्त होते रे मित्रा. खूप साधे आणि सोपे. माणसं काळी किंवा पांढरी होती. हल्ली दिसणारी करड्या रंगाची नरो वा कुंजारोवा जमात महाभारतानंतर हल्लीच परत उदयास आली आहे. त्यावेळी आपण दोस्ती केली ती खुल्या दिलाने आणि गब्बरशी दुश्मनी केली ती पण खुल्या दिलाने. हल्ली छातीत गोळ्या घालणाऱ्या शत्रू पेक्षाही पाठीत विषाच्या सुया टोचणारे मित्र जास्त आढळतात. म्हणून हल्ली कशातच मन लागत नाही. मी आपल्या जुन्या आठवणींच्या आनंदात सुख शोधत असतो. कधीतरी गब्बरच्या त्या अड्ड्यावर फेरफटका मारतो. आता तिथे दगड फोडून खडी बनवायची यंत्र लागली आहेत. ते सर्व कातळ, बसंतीने नाच केला तो दगड, गब्बरने ठाकूरचे हात कलम केले ती वेदी सगळंच नष्ट झालंय!

बाकी ठाकूर दहा वर्षांपूर्वी निवर्तले. राधा वहिनींनी वाड्यात भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्या खोलीत लावलेला, चंदनाचा हार घालेला, तुझा माऊथ ऑर्गन वाजवतानचा फोटो अजून तसाच आहे. वाहिनी रोज तो आसवांनी पुसतात आणि तुझ्या तिथीला त्यांच्याच बागेतील बकुळीच्या फुलांचा हार फोटोला चढवतात!

जेलर साहेब केव्हाच रिटायर्ड होऊन गावाला गेले. मधून मधून पत्र येतात त्यांची. ते पण आता थकले आहेत. सुरमा भोपाली इतका म्हातारा झाला तरी आपल्या कथा अजूनही सांगतो. पण कथेत जय मारला गेला हे सांगताना त्याच्या घशात आजही आवंढा येतो. तो शांतपणे मफलर ने डोळे टिपतो! बाकी रामलाल काका गेल्याच वर्षी गेले. आता राधा वाहिनी एकट्याच आहेत. पण मी किंवा बसंती रोज एक चक्कर मारतो त्यांच्याकडे.

तू मौसिकडे शब्द टाकून जमवून दिलेले माझे आणि बसंतीचे लग्न तू गेल्यावर तीन महिन्यात झाले. डोक्यावर अक्षता पडल्या तेव्हा सर्वांच्या मागे उभा राहून मला आशीर्वाद देत असलेला लंबूटांग तू फक्त मलाच दिसलास आणि ढसाढसा रडलो मी! का गेलास तू मला सोडून? आपलं ठरलं होतं ना की “ये दोस्ती हम नही तोंडेंगे?” मग? तू आम्हा दोघांना फसवलस. मला आणि मृत्यूला. तो माझ्याकडे येणार होता पण तू त्याला ओढून नेलास!

असो. बसंती मजेत आहे. ती गावातल्या उरल्यासुरल्या पोरांसाठी नाचाचे क्लास घेते. मी दारू सोडून आता शेतकरी झालो आहे. तुला म्हणून सांगतो. बसंती आज आजी झाली तरी चाळीस वर्षांपूर्वी होती तितकीच आयटम दिसते. मग तिला हा आजोबा झालेला वीरु आजही काधीतरी आमराईत नेऊन नेमबाजीचा सराव करतो! बाकी जय अमेरिकेत असतो. जय म्हणजे आमचा मुलगा. त्याच नाव आम्ही जय ठेवलंय. तुझ्यासारखाच दिलदार आहे पोरगा. त्यालाही मुलगा झालाय. त्याच नाव आम्ही जयवीर ठेवलंय!

मी गेल्याच आठवड्यात रमेशजींना पत्र लिहिले आहे. त्यांना सांगितलंय की तुमच्या शोले नंतर अनेक भ्रष्ट आवृत्त्या आल्या. पण तुमच्या शोलेच्या नखाचीही सर नाही. तेव्हा रमेशजी फॉर ओल्ड टाईम सेक, अजून एक शोले होऊन जाऊ द्या! फक्त शेवटी जय मारता कामा नये! आमची यारी जगली पाहिजे!

आणि हो मित्रा, आमच्या देव्हार्यात देव नाहीत. एकही मूर्ती किंवा तसबीर नाही. आम्ही रोज यथोचित मनापासून पूजा करतो ती त्या तुझ्या कॉईनची! आणि मागे आरती सुरु असते, “जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सब से दुश्मनी! ये दोस्ती हम नहीं तोंडेंगे!”

तुझा जिगरी,

वीरु.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३५ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३५– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

[१५७]

आपल्या सफाईदार बोटांनी

प्रिये, तू स्पर्शलीस

माझा प्रत्येक

कण अन् क्षण

आणि

संगीत बनून आलं

शिस्तीचं राज्य…

 

[१५८]

‘मीच अस्सल’

म्हणून

प्रतिध्वनी

हिणवत राहतो

त्या

अस्सल ध्वनीलाच

 

[१५९]

फांद्यांना सफल करून

वैभवसंपन्न करण्यासाठी

कसलंच बक्षीस

मागत नाहीत मुळं

जमिनीखाली

निमूट पसरलेली

 

[१६०]

धुक्यानं वेढलेल्या

आयुष्याच्या

वाफाळणार्याष झळांना

इंद्रधनुषी रंग

बहाल करणारी

ही आसक्ती

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares