मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक असणाऱ्यांनी पुढील कानमंत्र अवश्य आचरणात आणायला हवेत.

नावे लक्षात ठेवणे —

जर तुम्हाला असे वाटत असेल की, लोकांमध्ये तुम्ही प्रिय व्हायला हवेत, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इतरांची नावे लक्षात ठेवणे. हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. जगातील कुठल्याही भाषिकाला आणि कोणत्याही देशातील रहिवाशाला जर सर्वात प्रिय काय असेल तर ते स्वत:चे नाव होय. स्वत:च्या नावाइतका महत्त्वाचा आणि गोड शब्द दुसरा असूच शकत नाही. खरे म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे लक्षात ठेवणे हे तुमच्या करिअरमधील महत्त्वाचे कौशल्य आहे आणि तुम्ही ते आत्मसात केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीची कितीही काळानंतर भेट झाली अन् तुम्ही त्या व्यक्तीला नावाने हाक मारलीत तर आपोआपच त्याच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी निर्माण होते.

नेपोलियन बोनापार्ट या महान योद्ध्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन, जो फ्रान्सचा सम्राट होता, अभिमानाने सांगत असे की, कामाच्या प्रचंड तणावातही तो इतरांची नावे लक्षात ठेवू शकत असे. याविषयी त्याचे तंत्र अगदी सोपे होते. जर एखाद्याचे नाव त्याला नीट ऐकू आले नाही, तर तो मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला म्हणायचा, ” माफ करा मला तुमचे नाव स्पष्ट ऐकू आले नाही.” आणि त्यानंतर सांगितलेले नाव तो लक्षात ठेवायचा. संभाषणादरम्यान समोरच्या अनोळखी माणसाचे नाव वारंवार उच्चारून ते नाव लक्षात ठेवणे ही त्याची खुबी होती.

चांगले श्रोते बना ….

स्वत:बद्दल बोलायला सर्वांनाच आवडते. पण ते मन:पूर्वक ऐकणारा श्रोता त्यांना हवा असतो.

जर तुम्ही चांगले संभाषणकर्ते बनू इच्छित असाल तर आधी चांगले श्रोते बना. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. अधूनमधून “हो का?”  “असं का?”  “त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात?” असे प्रश्न विचारा म्हणजे समोरचा माणूस आणखी उत्साहाने बोलू लागेल; आणि तुमच्या ध्यानीमनी नसतांना असे अनेक मित्र आपसूकच तुम्हाला मिळतील.

इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य दाखवा

सुप्रसिद्ध रोमन कवी पब्लीअस सायरस याने म्हटले आहे की, इतरांनी आपल्या गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवावे असे वाटत असेल तर आधी आपण इतरांच्या गोष्टीत स्वारस्य दाखवायला हवे. एक चांगला श्रोता होणे हे तर पुष्कळ महत्त्वाचे आहेच. पण त्यानंतरची पायरी म्हणजे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांच्या सुखदु:खात आस्था दाखवून खऱ्या अर्थाने समरस होता आले पाहिजे. कुणाचे कौटुंबिक प्रश्न असतील तर कुणाचे नोकरीतील प्रश्न असतील. त्यासंबंधी आस्थेवाईकपणे चौकशी करून, त्याविषयी काळजी व्यक्त करून दिलासा द्यायला हवा. “कुणीतरी आपली काळजी करणारे आहे,” या विचाराने माणसाला दिलासा मिळतो, धीर येतो; आणि यातूनच कधीही न तुटणारी नाती आणि प्रेमाचे बंध निर्माण होतात. आपल्या करिअरच्या यशस्वीतेसाठी हीसुद्धा एक गुरुकिल्ली आहे.

टीका करू नका.

परिस्थिती कुठलीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या. पण कुणावरही, कधीही उघडउघड टीका करू नका. नापसंती दर्शवू नका किंवा सरळसरळ तक्रारीचा सूर काढू नका. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्या नजरेत आणून द्या. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रगती होत नसते. इतरांना त्यांच्या चुकांबद्दल संशयाचा फायदा द्या. दोषी व्यक्ती आपोआपच स्वत:चे तोंड लपवील.

माझ्या तरुण मित्रांनो,  वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमचे करिअर यशस्वी झालेच म्हणून समजा.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मोबाईल वरील मेसेजेस वाचत होते .पेडोंगी नावाचे खेचर आर्मीमधे रसद पुरवत होते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडून आपल्याकडे कामाला लावले. संधी मिळताच पाठीवरच्या मशीन गन आणि बॉम्ब गोळ्या सहित 25 किलोमीटर चालून भारतीय हद्दीत आल. त्याचा सत्कार झाला. आणि गिनीज बुक मध्ये नाव पोचल . खरंच देशभक्त.

हे वाचत असताना आमच्या येथे घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. अनेक गाढवांचा घोळका निघाला होता. एक गाढव मात्र अगदी हळूहळू असहाय्यपणे लंगडत  चाललं होतं. माझ्यासारख्या प्राणी प्रेमिला गप्प बसवेना.  स्वप्नीलला हाक मारली. गाढव कोणाच का असेना पण त्यावर उपचार करायला हवेत. स्वप्नील एकटा काही करणे शक्य नव्हते. राहत संस्थेच्या किरण नाईक आणि पीपल फॉर ऍनिमल संस्थेच्या अशोक लकडे ना बोलावून घेतले. दोघांनी पकडून त्याला गॅरेजमध्ये ठेवलं. संपूर्ण पाय  सडला होता. त्यातून पाणी वहात होतं. त्यात किडे झाले होते. मालकाने काम करून घेऊन सोडून दिले होते .फोन करून डॉक्टरना  बोलावून घेतले. त्यांनी गाढवांचा पाय पाहिला मात्र आणि काय! यातून हे वाचणं शक्य नाही. इंजेक्शन देऊन सोडवायला हव असा सल्ला दिला.

जीव घेण दोन मिनिटाच काम  पण जीव वाचवायला काही दिवस लागतात .प्रयत्न तरी करून बघू. शेवटी त्याचं प्रारब्ध असं म्हणून प्रयत्न सुरू केले. गाढवाला खाण्याची सुद्धा  ताकत नव्हती. औषध लावलं तर जखमेवर रहात नव्हतं. जवळ जाणं शक्य नाही, इतका घाण वास येत होता .दोन दिवस पिचकारीने पाण्याने जखम धुवून काढली. दोन दिवसांनी औषध व बॅंडेज बांधले. पण तेही पायावर रहात नव्हते. शेवटी जखम उघडी ठेवली. एका वेळेला एक संपूर्ण ट्यूब लावावी लागायची. आता ते रोज ड्रेसिंग व्यवस्थित करून घ्यायला लागलं. किरण व अशोक गवताच्या  पेंड्या ,भरडा आणत होते .त्यांच्या गाडीचा आवाज त्याला कळायला लागला. आवाज आला की ते ओरडायला लागायचं. हळूहळू जखम भरून यायला लागली. आता गाढवाची सगळ्यांशी मैत्री झाली होती. किरणना तर आपण यशस्वी झाल्यासारखे वाटायचे. ते आले की पहिल्यांदा गाढवाला मिठी मारायचे. त्याच्याशी बोलायचे. जाता-येता कोणी कोणी विचारायचे “काय हो गाढव  पाळलंय काय ?”हसायला यायचे.

तीन आठवड्यांनी गाढवाची जखम  बरी झाली. एक दिवस गाढवाचा मालक  तणतणत आला.” माझं गाढव तुम्ही इथं ठेवलंय होय कधीचा हुडकतोय”. सगळ्यांनी त्यालाच  फैलावर घेतल. गाढवाच्या सडलेल्या पायाचे आणि बऱ्या झालेल्या पायाचे फोटो दाखवले.’ पावलावर दवाखाना असून त्याला उपचार न करता राबवून घेतलंस ,म्हणून सगळ्यांनी तोंडसुख घेतलं .आता त्याला बोलायला जागा नव्हती. त्याला तंबी दिली. औषधाचा खर्च 2000 आला म्हणून सांगितलं. शेवटी कसेबसे त्याने पाचशे रुपये काढून दिलेन .  त्याच पाचशे रुपयांची पुढील उपचारासाठी औषधे घेऊन त्याला दिली. गाढवही त्याच्या ताब्यात दिलं

दोन दिवसानी गाढव त्याच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायला लागलं. जाताना पाच मिनिट गॅरेज जवळ थांबून सगळ्यांकडे पहायचं. जीवदान मिळाल्याबद्दल धन्यवाद देण्याचा अविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसायचा. गाढवाचे प्रारब्ध, सगळ्यांचे प्रयत्न आणि सर्वात मोठी परमेश्वराची कृपा या. त्रयीतून गाढवाचा जीव वाचला.

काय म्हणावं गाढवाचा शहाणपणा की मालकाचा गाढवपणा!. वेडेपणाला गाढवाची उपमा का देतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

ऑस्ट्रेलियातील एका grandpa ची गोष्ट आहे. हे आजोबा रोज पहाटे समुद्र किनारी फिरायला जात. जाताना हातात एक टोपली असायची. किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले “Grandpa, हे काय करता?” आजोबा हसले आणि म्हणाले “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो,  अगं भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात पण त्यांची चाल मंद असल्याने बिचारे पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अश्याना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.” ही गोष्ट वाचल्यावर वाटले आपल्याही समाजात असे अनेक आजोबा, आजी  समाजातील मुलामुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडण्यास मदत करतात. त्यापैकीच ही एक देवी, ” मालती ताई निमोणकर”

नाव जरा अपरिचित  वाटले ना?  गुजरवाडीत एका उंच ठिकाणी एका आश्रमात राहायच्या. एकदा चैत्रात आम्हा मैत्रिणींना  बोलावून हळदी कुंकू केले होते. गुजरवाडीतील पण बायका आल्या होत्या. भजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच ह्या आजी. नागपूर जवळील मध्यप्रदेशातील एका छोट्याश्या गावात राहत होत्या. घरी अत्यंत कडक अश्या चालीरिती. पण सासू सासरे सुधारलेले होते. मॅट्रिक झालेल्या आजीने त्या काळी लग्न झाल्यावर BA केले. घरी खूप राबता होता. अश्या वातावरणात वाढलेल्या मालती ताई वरून पाहता खूप सुखी होत्या. दोन उच्चविद्याविभुषित मुली, उच्चविद्याविभुषित मुलगा,  सून,  सधन पती,  काय नव्हते?  परंतु मनातून मात्र  त्या समाधानी नव्हत्या.

सर्व जवाबदार्यांतून मुक्त झाल्यावर, लग्नाला ४० वर्षे झाल्यावर त्यांनी घरात एक निर्णय सांगितला. मी हे घर सोडून समाज कार्यासाठी बाहेर पडत आहे. थोडे समाजाचे देणे फेडून पहाते. घरातल्यांनी समजावले,  थोडे दटावले पण, म्हणाले, एकदा बाहेर पडलीस तर ह्या गृहस्थाश्रमात पुन्हा येणे नाही.. पण आजी ठाम राहिल्या आणि त्यांच्याच मुशीत घडलेल्या त्यांच्या लेकीने त्यांना पाठिंबा दिला.  एके दिवशी ह्या ध्येयाने पछाडून त्या आनंदवनात दाखल झाल्या. साधारण ५९-६० वर्षे वय. पहा, आपल्या घरातली वाटी, भांडी जरी हरवली तरी आपण कासावीस होतो. आजींनी क्षणात आपला भरलेला संसार सोडला. आनंदवनात बाबा व साधना ताईंनी त्यांना आपल्या बराकी जवळच खोली दिली. साधना ताईंचे आणि त्यांचे फार जुळले होते. पण अत्यंत कोमल हृदयाच्या मालतीताई कुष्ठरोग्यांची पीडा पाहून खिन्न होत. माणसाला पुस्तकाप्रमाणे वाचू शकणाऱ्या बाबांच्या डोळ्यांनी हे वाचले आणि त्यांनी डॉ. हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले ह्यांच्या बरोबर काम करण्यास सुचविले. आणि त्या तेथून पुण्यात दाखल झाल्या.

पुण्यात ओंकार ट्रस्ट व डॉ. हर्डीकर ह्या संयुक्त कामात त्या दाखल झाल्या.  गुजरवाडीत डॉ. शरयू घोले ह्यांच्या संस्कार वर्गाची धूरा त्या सांभाळू लागल्या. मुले आणि आजी खूपच रमून जात. आणि इथेच पुढे एक निवासी आश्रम सुरु झाला. ‘अनाथ आश्रम’ हा शब्द जरी उच्चारला तरी आजींना आणि त्यांच्या सहकारी  मानसी ताई ह्यांना राग येत असे. “अगं, आम्ही नाही का त्यांचे पालक?  सनाथच आहेत ही मुले. “शुभम,  मयूर अशी ५ व ३ वर्षाची मुले दाखल झाली आणि आजींचे विश्वाचं बदलले. आजींचे व शरयू ताईंचे कार्य वाढू लागले. हळू हळू मुलांची संख्या वाढली. तिथेच त्यांची शाळा सुरु झाली. आजी मुलांची खूप काळजी घेत. हे चालू असतानाच आजी वाडीतील स्रीयांना एकत्र करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवू लागल्या. अनेकांना त्यांचे निवास स्थान हे माहेरंच होते. मी पण त्याचा खूपदा अनुभव घेतला आहे. आजींच्या आश्रमात खूप प्रसन्न वातावरण होते. मुले तर आजींच्या भोवती सतत लुडबुडत असायची. मुलांसाठी आजींचा शब्द म्हणजे ‘वेद वाक्य’ होते. एक राम नावाचा छोटा तर म्हणायचा “मी मोठा होणार, खूप शिकणार आणि आजीला सोन्याची पैठणी आणणार.”

एक प्रसंग आठवतो! काही मुले अवती भोवती च्या परिसरात गवत काढायला गेली. रविवार होता, १-२ वाजे पर्यंत काम करून ती जेवायला आली. माझा ३ ला गणिताचा तास होता. मीही पोहोचले. तर काय! आजी सर्वांच्या हाताला तेल लावत होत्या. मी विचारले “काय झाले?” “अगं, गवत काढताना हाताला चरे पडलेत ना म्हणून मी तेल लावत आहे.” असे होते ते आजी-नातवांचे नाते. माझ्या तर डोळ्यात पाणीच आले. अनेक वर्ष ही माउली तिथे काम करत होती पण त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या दोन्ही लेकीने त्यांना नंतर घरी परत आणले. आज त्या ८५ वर्षाच्या आहेत आणि आपल्या लेकीकडे अमेरिकेत ध्यान साधना करत वानप्रस्थाश्रमात मग्न आहेत!

चला येणार का अमेरिकेत ह्या देवीचे दर्शन घ्यायला?

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा. … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,

भक्ती ते कठीण । सुळावरची पोळी   

निवडी तो बळी । विरळाशू

वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.

भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.

देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.

भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले.  असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.

भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.

व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.

‘भक्त’  या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय?  तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला,  तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय?  तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर?  ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच  निघाला. मग काय!  एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’.  आता साध्य आहे ‘व्यवहार’!  देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने  जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या  ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

 (सुश्री शिल्पा मैंदर्गी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू करत आहोत.  धन्यवाद – सम्पादक मंडळ (मराठी))

(हम आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी  के ह्रदय से आभारी हैं। उन्होंने हमारे आग्रह पर अपने जीवन की अब तक की लड़ाई पर विमर्श हम सबके साथ श्रृंखलाबद्ध साझा करना स्वीकार किया है।  आप हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। हम आदरणीया सौ अंजली गोखले जी के भी आभारी हैं। ई-अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग सम्पादक – हेमन्त बावनकर )

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

मी शिल्पा. शिल्पा मैंदर्गी. ई अभिव्यक्तिच्या साहित्यिकांमध्ये मला सामावून घेतल्या बद्दल सर्व प्रथम हेमंत बावनकर सर, सुहास पंडित सर आणि उज्वला तांईचे मनापासून आभार !

मी जन्मतः पूर्ण अंध नाही. साधारण तिसरी पर्यंत मला धूसर दिसत होते. अगदी लहान असताना आजीला शंका आली आणि माझ्या आईबाबांची डोळ्याच्या डॉक्टरांकडे धाव सुरू झाली. डॉक्टरांनी खूप तपासण्या केल्या. खूप स्पेशलिस्टना दाखवले. पण सर्वांचे म्हणणे एकच होते, ते म्हणजे हिची दृष्टी जाणार.

घरी मी दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर मोठी होत होते. बरोबरीने खेळत होते, दंगा करत होते. जेवढे दिसत होते, तेवढ्यावर माझे सगळे सुरु होते. मला गांभीर्य काही नव्हतेच कारण मला काही समजतच नव्हतेना! मला कमी दिसते, तेही मला कळत नव्हते. सगळ्यांचेच असे असते, असेच मला वाटे. आईच्या बोटाला धरुन शाळेत जायची, यायची त्यामुळे माझ्यात काही कमी आहे असे कधी जाणवले नाही.

तिसरीमध्ये गेल्यापासून माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली. आई बाबा खूप धिराने घेत होते. एकाही ऑपरेशनचा उपयोग झाला नाही. जवळ जवळ ८ – १० ऑपरेशन्स झाली पण काही फरक नाही. मात्र शाळा अभ्यास नियमित सुरु होते. माझे बाबा विद्यामंदिर शाळेमध्ये शिकवत होते. माझ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. ते मला खूप गोष्टी सांगत. पाचवी मध्ये गेल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.पहिल्या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी सादर केले आणि आश्चर्य म्हणजे मला पहिल्या नंबर चीढाल मिळाली.

अभ्यास, शाळा, वक्तृत्व स्पर्धा, घरी दंगा, डोळ्याचे इलाज सगळेच सुरु होते. दिसणे अंधूक अंधूक होत पूर्ण बंद झाले होते. पण डोळ्या मधून सतत पाणी येत होते. ते थांबवण्याचे ही ऑपरेशन झाले. ते झाले मद्रासला म्हणजे आत्ताच्या चेनईला. डॉक्टरांनी आई बाबा ना आता डोळ्याच्या बाबतीतले सर्व प्रयत्न थांबवायला सांगितले. नाहीतर विनाकारण मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता होती. आई बाबांनी ते मान्य केले आणि माझा अभ्यास, वक्तृत्व इकडे लक्ष द्यायचे ठरवले.

मला घरी अडगळीत टाकले नाही किंवा तेही हताश झाले नाहीत. मला सतत प्रोत्साहित करत राहिले. घरी मी खेळत होते, भांडत होते. दंगा ही करत होते. हिला दिसत नाही, म्हणून माझे फाजील लाडही केले नाहीत.

ऑपरेशन्स झाल्यामुळे माझे डोळे म्हणजे नुसत्या पांढऱ्या खोबण्या झाल्या होत्या. दुसऱ्यांना भयावह दिसू नये म्हणून ऑपरेशन करून बुब्बुळ बसवले. तेही एकाच डोळ्याला बसले. डॉक्टरांनीच मग अथक् प्रयत्नांनी मला कृत्रिम डोळा बनवून दिला. जो मी अजूनही वापरते, काढते, घालते. अर्थात मला त्याचा काहीच उपयोग नाही. माझे डोळे फवत समोरच्या साठी आहेत. त्यांना भिती वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून. थोडक्यात काय माझे डोळे अर्थात कृत्रिम तुमच्या साठी’, माझ्यासाठी नाहीत बरं !

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

लग्नात सप्तपदी चालून सातजन्म एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात दोघेजण, तेव्हा खोलवर मनात रुजते ती आपुलकीची, प्रेमाची, आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव. एकमेकांची सुख, दुःख,आता दोघांची होऊन जातातआणि नकळत माझे, तुझे हे आपले होऊन जाते. कोणते ही संकट आले, तर त्याला दोघांनी मिळून सामोरे जाऊन त्या संकटाशी दोन हात करायचे आहेत ह्याची जाणीव होते.

काळ्या मण्यांचा सुरेख दागिना जेव्हा आपला जोडीदार आपल्या गळ्यात बांधतो तेव्हा पावित्र्याची, कर्तव्याची, प्रेमाची जाणीव होते. सगळ्या दागिन्यात हा उठून दिसत असतो. मुहूर्तावर बांधलेला तो मुहूर्त मणी सगळ्या अलंकाराना मागे टाकतो आणि सौभाग्याचे लेणे म्हणून दिमाखात सजतो.

त्याचे पावित्र्य घेऊन जेव्हा नववधू घरचा उंबरठा ओलांडते तेव्हा ती घरची लक्ष्मी म्हणून गृह प्रवेश करते. तांदुळाने भरलेले मापटे जेव्हा ती ओलांडून आत येते तेव्हा माझे हे घर आनंदाने समृद्धीने सुखशांतीने भरून जाऊदे हीच मनोकामना करत असते.

ती ह्या नवीन घरात रूळायचा मनोमन प्रयत्न करत असते. फक्त हे करत असताना तिला साथ हवी असते ती आपल्या जोडीदाराची. त्याने समजून घेण्याची. ज्याच्या विश्वासावर ती आपली सारी माणसे, आपले माहेर मागे सोडून आलेली असते. नवीन घरात नवीन माणसांचे स्वभाव आवडीनिवडी समजून घेण्यासाठी तिला साथ हवी असते आता आपल्या मित्राची. म्हणजेच आपल्या नवर्‍याची.माझ्या मते जर आपला जोडीदार उत्तम मित्र बनू शकला तरच उत्तम जोडीदार बनू शकतो. नाही तर तिथे पुरुषी अहंकार डोकावतो.

एका गाडीची आता आपण दोन चाक आहोत आणि आपल्याला आता बरोबरीनं जायचे आहे हे जर त्याला उमगले तर खरच सुखी संसार होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण हे त्याला खरच उमगत असते का? का फक्त मणी गळ्यात बांधले म्हणजे आता ती आपल्या मालकीची झाली, आता तिने त्याच्या होला हो म्हणून फक्त चालत रहायचे त्याच्या बरोबर त्याची साथ नसतानाही?

त्या काळ्या मण्यांनां खरा अर्थ तेव्हा मिळतो जेव्हा नवरा आपल्या बायकोला आपल्या बरोबरीचा दर्जा देतो, मान देतो.मान देणे म्हणजे तिच्या प्रतेक म्हणण्याला होला हो करणे नव्हे, पण तिच्याही मनाचा, मतांचा आदर करणे, तिलाही भावनां आहेत ह्याची जाणीव ठेवणे .खांद्याला खांदा लावून जेव्हा दोघ संसाराचा गाडा ओढतात तेव्हा होतो खरा सुखी संसार.

आता नेहमी मला प्रश्न असा पडतो की ह्याची जाणीव खरच नवऱ्याला असते का?का असूनही तो डोळेझाक करतो सोईस्कर रित्या? कित्येक घरं अजूनही अशी आहेत जिथे अजुनी पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी म्हणीन तेच आणि तसेच, जिथे बायकोच्या भावनांना शुन्य किंमत असते. की एकदा काळे मणी बांधले गळ्यात की तिच्यावर हक्क गाजवायला मोकळा होतो तो ?आपण जे सांगू ते तिने करायचे,तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून?

जो हे गळ्यात बांधतो त्याला हीआपली सहचारिणी, अर्धांगिनी आहे ह्याची जाणीव असते का? आता तीची सुख दुःख ही आपली आहेत ह्याची कल्पना असते का?तिच्या भावनांची कदर खरच केली जाते का?

मंगळसूत्र नुसते काळे मणी नसून शक्ति असते तिची. दागिना नसून सौभाग्य असते तिचे. तिचा अभिमान असतो. ज्याच्या जिवावर ती आपले घर, आई, वडील सगळे सोडून आलेली असते ते फक्त त्याच्या विश्वासाच्या आधारावर. हा विश्वास टिकून द्यायचा की नाही हे सर्वस्वी जोडीदाराच्या हातात असते. तस झाल नाही तर तो नुसताच एक दागिना म्हणून गळ्यात राहतो.

एक सामान्य दागिना. फक्त काढता येत नाही म्हणून गळ्यात अडकवलेला.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

(19.8.2020)

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

वाल्याकोळ्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. त्याने अयोग्य जीवनप्रणाली अंगिकारिली होती. परंतु जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हां त्याने प्रायश्चित्त घेतले. परिणामतः वाल्याचा एक महान ॠषि वाल्मिकी झाला. ही गोष्ट परत-परत ऐकताना एका गोष्टीची मला तीव्रतेने जाणीव झाली.   ‘प्रायश्चित्त’! हे एव्हडे सोपे होते का? कि पाप करायचे-प्रायश्चित्त घ्यायचे आणि परत पुण्यवान् व्हायचे!नाही मंडळी!यात खरी विचार करण्याची आणि घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे- ‘चुकीची जाणीव होणे- पश्चात्ताप होणे आणि प्रायश्चित्त घेणे; म्हणजेच सुधारणा करणे. चुकीची पुनरावृत्ती न होऊ देणे-हेच खरे प्रायश्चित्त आहे.

आज या कोरोनाच्या धांदलीत ही गोष्ट आणि त्यातील स्व-सुधारणेची गोष्ट परत-परत डोके वर काढत आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध? तर विचार करता असे लक्षात येते की चूक-जाणीव- पश्चात्ताप-प्रायश्चित्त -ही साखळीच माणसाला सुधारण्याच्या मार्गावर नेते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते.

कोरोना भारतात प्रवेशला ही काही आपली चूक नाही.  परंतु त्याचा फैलाव इतक्या वेगाने झाला , होतो आहे ही मात्र नक्कीच आपली चूक आहे. कारण आपल्यात स्वयंशिस्त, स्व-अनुशासन या गोष्टींची कमालीची कमतरता आहे. साध्या-साध्या गोष्टींतूनही ही कमतरता जाणवते. फक्त प्रशासनाला दोष देऊन काय ऊपयोग? प्रशासनाने काळजीपूर्वक आखलेल्या योजना कागदावर किती छान वाटतात !पण मग त्यांचे अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत? तर ऊत्तर परत तेच आहे-स्वयंशिस्त नाही. शिस्त आपण तर पाळायलाच हवी, परंतु इतरांनाही पाळायला लावायला हवी.  आज तर ‘ माझ्यापुरतेच ‘ पहाण्याचा अलिखीत नियमच झाला आहे जणूं!वेगाने पसरणार्या या महामारीचा आवेग एकट्या-दुकट्याला आवरणारा नाही. समूह-संसर्गाला समूहशक्तिच आटोक्यात आणु शकते. विलगीकरण हाच जर उपाय आहे तर तो तितक्याच प्रखरतेने पाळायलाच हवा. विलगीकरण हे आपले प्रायश्चित्त आहे. ते जितक्या काटेकोरपणे पाळले जाईल तितक्या लवकर वाल्याकोळ्याचे पाप नाहीसे होईल. प्रायश्चित्तातील कठोरताच शांत जीवनाचे  फळ देईल.

म्हणूनच स्वयंशिस्तीचा झेंडा फडकवायला हवा.  स्वयंशिस्त हीकाही आताचीच गरज आहे असेही नाही. सदा  सर्वदा सदाचारी समाज घडविण्याची ती एक गुरूकिल्ली आहे किंवा व्यवहारी भाषेत बोलायचे यर असे म्हणता येइल की काही दिल्याशिवाय काही मिळत नसते. म्हणूनच स्वयंशिस्त पाळा, म्हणजेच स्व-संतुलन राखा तरच प्रगती होइल. प्रत्येक गोष्ट जशी मला हवी तशीच ती दुसर्यालाही हवी हे ध्यानात घेतले पाहिजे. माझे सुख मिळवण्यासाठी मी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवू नये.  ‘स्व’ ला अनुशासित ठेवा तरच निरोगी , सभ्य, स्वच्छ, सदाचारी समाज निर्माण होईल.

©  सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अद्वैत ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

परिचय

  • एम. ए. (म्युझिक), SNDT विद्यापीठात प्रथम क्रमांक
  • संगीत अलंकार (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) विशेष योग्यता प्राप्त.
  • एम. कॉम. (अकाउंट्स अँड कॉस्टिंग)
  • PHD student (ABGMVM)
  • सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.
  • गेल्या दहा वर्षांपासून मराठी मासिकांमधे, दिवाळी अंकामध्ये सातत्याने लेखन.
  • पूर्वी शब्दबंध हा कथासंग्रह, गवतूचं गाणं आणि घनिष्ठ मैत्री हे बाल कथासंग्रह व कल्पवृक्ष कन्येसाठी ही काव्यसंवादरुपी पुस्तिका प्रकाशित झाली आहे.
  • गेल्याच महिन्यात निरभ्र  व भूपातला निषाद हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • कालच जाहीर झालेल्या डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथस्पर्धेच्या निकालानुसार ‘ज्याचं त्याला’ ह्या कथेस विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

अर्थातच कविवर्य ग्रेस!

आज अचानक ह्या ओळी सामोऱ्या आल्या आणि नव्यानं भेटल्या! पूर्वी हे वाचल्यावर काय उमटलं होतं मनात आठवत नाही… मात्र आज राधा आणखी खोलवर रुतली…! खरंतर पदोपदी मोहवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या ह्या गोष्टी तरीही सगळ्याचे अर्थ लागणं तितकं सोपं नाही.. पण माणूसपणातला न आवरणारा हाही एक मोह… आपल्या नजरेतून सगळं पाहाण्याचा!.. म्हणून अक्षरं मांडणं अनावर झालं!

राधा स्वतः कृष्णमय होऊन गेली आणि कृष्णाला तिच्याजवळ असण्या-नसण्याचा  पर्यायच तिनं ठेवला नाही… तिनं त्याला कधी स्वतःपासून वेगळं केलं/मानलं नाही आणि ना कधी स्वतः त्याच्यापासून वेगळी झाली… त्यामुळं तिच्याजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडे उरला नाही… म्हणूनच तो तिला पुरून उरला… आजही तो उरलाय तो फक्त राधेसोबत… राधाकृष्ण होऊन!

इतकं अतूटपण निभावणं म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर क्षणोक्षणी चटके सोसत निखाऱ्यावर चालत राहाणं… त्यातला सोपं वाटण्याचा पर्याय विश्वासाशी जोडलेला… अंतरी तो आहेच ह्या अढळ विश्वासाशी… जगण्यातल्या क्षणांत त्याच्या असण्या-नसण्याशी तसूभरही संबंध नसलेला…! अपार मोह पडला तरी हे निभावणं सोपं नाही… पण हे जमलं तर मिळवण्यासारखं काही  उरतच नाही… तोच मोक्ष तीच मुक्ती म्हणजेच ‘राधा’ अनुभवणं!

तुलना मनात उभी राहातेच राहाते… ग्रेस प्रभृतींनीही ह्या रचनेत रूक्मिणी-सत्यभामा आणि राधा ह्यांच्यातलं तुलनात्मक वेगळेपणच इतकं अचूक मांडलंय की वाचताक्षणी राधा नेमकेपणी कडकडून भेटावी… त्यांनी म्हटलंय रुक्मिणी-सत्यभामेला साध्यापेक्षा साधन महत्वाचं वाटलं आणि राधेला साध्य कळलं होतं, तिचं लक्ष फक्त साध्याकडं होतं… फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण… म्हणूनच त्यानं त्यांना साधन दिलं आणि स्वत: राधेला साध्य झाला!

मनात आलं की  रुक्मिणी-सत्यभामेला कृष्णापेक्षा  कृष्णाचं आपल्यावरचं  प्रेम आणि आपला त्याच्यावरचा हक्क जगासमोर सिद्ध होणं जास्त गरजेचं वाटलं आणि राधेनं त्याला ते सिद्ध करून दाखवायचा पर्यायच ठेवला नाही, अर्थात तिला त्याची गरजही भासली नाहीच… कारण तो आपल्याजवळ च असल्याचा तिचा विश्वास!… तसंही आपणच पर्याय निर्माण न करणं किती चांगलं! आपल्याला मिळणार असलेल्या गोष्टीवर आणि ती मिळणारच ह्यावर अतूट विश्वास ठेवणं हा एकच पर्याय, हे एकच ध्येय आणि हा एकच ध्यास… कुठल्या अडथळ्याला मधे येण्याचा पर्यायच उपलब्ध नाही… आणि त्यातूनही काही आलंच आड तरी विश्वासाच्या भक्कम तटबंदीसमोर ते दिसणार नाही आणि टिकणारही नाही!… केवढं प्रचंड आत्मबल, केवढा दुर्दम्य आशावाद आणि किती अर्थपूर्ण जगणं… कृष्णानं राधेला बहाल केलेलं कि राधेनं कृष्णमय होऊन अल्लद ओंजळीत पाडून घेतलेलं!?

सत्यभामा-रुक्मिणीच्या बाबतीत तो लौकिकार्थाने त्यांचा होऊनही त्यांच्याजवळ उरला नाही आणि राधेजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडं नव्हता!… भूल पडते ह्या अशा आयुष्याची… त्याच्याशिवायही त्याच्यासोबत त्याचं होऊन जात जगण्याची आणि खरंतर राधेचं गारूड पसरत जातं मनभर… पण ती स्वतः उरलीच कुठं होती म्हणून मग तिच्या अवघ्या अस्तित्वावरचं त्याचं गारूड आपल्यातही भिनत जातं आणि आपल्या दृष्टीनं सर्वव्यापी ठरतो तो! तसा तो आहेच सर्वसाक्षी, सर्वव्यापी.. पण राधेचा होऊन अंतरी ठसला, तिच्या नेत्रांतून दिसला, तिच्या जाणिवांनी अनुभवला की परिपूर्णतेचं एक वेगळं वलय त्याच्याभोवती तेजाळतं आणि कसलाच किंतू मनात न उरता त्याच्या अस्तित्वाचीच खात्री पटते!

अस्तित्वाची खूण ही अंतरीच पटावी… प्रतिकांतून नाही, दृश्य स्वरूपात नाही! बाह्यरूपात भुलावण होऊ शकते, अंतरी नाही! त्याच्या प्रीतीच्या प्रतिकाचा ध्यास घेतलेल्यांना साधं ते प्रतीकही पूर्णपणे मिळालंच नाही आणि फक्त त्याचा ध्यास घेतलेल्या राधेसोबत तो युगानुयुगे उरलाय! एका दृष्टीनं हाही त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच… ज्याला जे हवं त्याला ते देणारा ‘तो’… राधेला ‘तो’च हवा होता तर फक्त त्या एका जन्मी नाही तर युगानुयुगे तिची साथ निभावणारा!

कुणाची आस धरण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन जाणंच खरं… कारण ती आपली स्वत:ची अनुभूती, कुणावरही अवलंबून नसलेली… हे ढळढळीत सत्य राधा जगली आणि अनंतयुगे त्याच्यासोबत अमर झाली!

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

ती आईला आणि नातवाला भेटायला निघालीय. म्हातारपण लहान मुलासारखं अस तं  म्हणून आईला काय खाऊ न्यायचा, नातवाला काय न्यायचा याचा ती विचार करते. आता तीही थकलीय पण दोन्ही ठिकाणी काळजाचे घड होते. त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तिला उत्साह येतोच. नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतर  ते गावाजवळ राहत होते। मुलगा नोकरिमित्त शहरात। माहेर जवळच होतं तिथून.  आईला भेटून तसंच मुलाकडे जायचं.  दोघांनाही काहीतरी न्यायला हवं हे सतत आतून वाटतं. मोकळं जाणं बरं वाटत नाही. विकतचे खाण्याचे पदार्थ घेणे पटत नाही. भले ही भेट महिन्या दोन महिन्यातून का असेना.  विकतचे काही नेणं तिला आवडतच नाही.  विकत त्याचं ते घेऊ शकतातच की.  आपलं माया, प्रेम त्यात उतरणार आहे का?

आईसाठी बिनतिखटाची चार थालीपीठ केली.  नातवाला एक घेतल. खजूर आईसाठी तर काजू बदाम नातवासाठी खडीसाखर दोघांना आवडते.  रव्याचे लाडू लेकासाठी बेसनाचे सुनेला आवडतात.  माहेरी भाऊभवजयीला, भाचरांना लाडू. असा सगळा हिशोब करत तिची आवरा आवरी चाललेली.  नवऱ्याचा दोन्ही वेळेचा सैपाक करायचा.  उद्यासाठी मदतनि

साला सांगायचं कसा कसा सैपाक कर…  नवऱ्याला बजावलं, चारदा जेवण झालं की, नीट झाकून ठेवा। चपतीचा डबा पाण्याच्या ताटात ठेवा, नाहीतर मुंग्यांनी लगेच भरतो। वेळेत गोळी खा आणि तसा मेसेज करा. हे सगळं करुन नऊच्या गाडीने निघायला हवं. नाहीतर गाडी चुकली कीं बारालाच एकदम. तिची घाई चाललेली.

नवऱ्याच्या सूचना ऐकयला लागत होत्याच.  परवा लवकर निघ. वगैरे, वगैरे…

तिला आईजवळ दोन दिवस आणि नातवाजवळ चार दिवस राहावं वाटत होतं, पण नवऱ्याला एकटं सोडून नकोही वाटत होतं. ती म्हणायची आपण मुलाजवळच राहू पण नवऱ्याला हे पटत नाही.  स्वातंत्र हवं प्रत्येकाला.

एकत्र राहून नाही का मिळत????  कुणाच्या जगण्यात ढवळाढवळ नाही करायची.  आपापली कामे करायची.

तिला मात्र एकत्र राहण्यामुळे सुरक्षित वाटतं. तसं एकेकट नाही वाटत. आतापासून सवय लागली एकमेकांची तर पुढे सेवा करतील. तिला मुलांपासून दूर राहणं पटतच नाही. मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या भावना का कळू नयेत???

ती एसटीत बसली तेव्हा तिला विसावा मिळाला. शांतपणे ती डोळे मिटून बसली.  काय घेतलं, काय राहिलं तर नाही ना याची मनोमन उजळणी करत असताना तिचं मन भरून आलं.  का कुणास ठाऊक तिला रडावस वाटलं.  दुःख नाही राग नाही तरी असं का व्हावं????

ती विचार करत असताना जाणवलं,  आपली आई असच सगळ करायची.  नको म्हटलं तरी ऐकायची नाही. तिचा त्रास बघून रागवायचेही, तरी ती करत राहायची॰  एकदा दिवाळी झाल्यावर आम्ही गेलो होतो आणि तिचे लाडू संपलेले. लेक आली आणि लाडू नाहीत म्हणजे काय….

आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी परतायचे होते. ती पहाटे उठली,  जात्यावर डाळ दळली.  कारण बेसनही संपले होते। आम्ही उठायच्या आत तिचे लाडू तयार झाले होते. किती वाजता उठली होतीस असं विचारलं तर म्हणाली,  झोपले कुठे होते ?…

आत्ता कळू लागलंय ती हे सगळं का करत होती?  हे करण्यात तिला केवढी ऊर्जा मिळत होती. कष्टाचं तिला काहीच वाटत नव्हतं. यालाच तर प्रेम माया जिव्हाळा म्हणतात.

हे प्रेम एकत्र राहून नातवाला शिकवायला हवं.  सहवासातील प्रेम त्याला नाही मिळालं तर तो माणूसघाणा होईल, असं तिला वाटायचं. पण नवरा ऐकत नाही.

तिला नातवापासून दूर राहावं लागतं.  त्यामुळे तिला वाईट वाटतं….

आई फोनसाठी जीव तोडते. सतत फोन कर म्हणते,  तेव्हा कळते की आपल्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी जीव किती आसुसलेला असतो.

ही असोशी कशानेही मिटत नाही. नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तीही अशीच व्याकुळ होते.  आत्ता तिला आईचं मन कळू लागलंय.  ती आजी झाल्यानंतर……

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नातं कस असावं, तर एखादा गोफ सुरेख विणलेला असतो तस असावं. एकमेकांची मने घट्ट सुबक विणलेली असावीत.

एकाच्या दुःखाने नकळत दुसर्‍याच्या पापण्या ओल्या व्हाव्यात, तर एकाचे सुख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावे.

नात्याला कोणते लेबल असलेच पाहिजे असे नाही,पण असलाच तर खरेपणा असावा, प्रेम, जिव्हाळा असावा, विश्वास असावा आणि महत्त्वाचे म्हणजे नात्यात पारदर्शकता असावी. जे असेल ते उघड आत बाहेर काही नाही, लख्ख प्रकाशा सारखे.

नातं माऊ गोधडी सारख असावं, मायेच्या उबेन भरलेल हव. हव हव असवाटणार खरखरीत रगा सारख नसावं, जे हव तर असत पण नाईलाज म्हणून.

मला खरच मनापासून वाटते की एखाद तरी नातं अस नक्की असावं, जिथे हक्काची एक हाक असावी, मायेची एक थाप असावी आणि न मारलेली हाक सुद्धा त्या व्यक्तिला ऐकु जावी.

खूप कमी जणांच्या नशिबात अशी नाती असतात आणि ज्याला ती मिळतात तो खरा भाग्यवान नाही का? असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print