मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

15 ऑगस्ट 1947c  … इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात अगणित बलिदाने देऊन भारत स्वतंत्र झाला. मोकळ्या हवेत श्वास घेऊ लागला.

त्यावेळी गोवा ह्या छोट्याशा प्रदेशावर पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत स्वतंत्र झाला तरी सीमेलगतचा गोवा प्रदेश अजून परकीयांच्या त्रासात पिचत पडला होता.  सालाझार या पोर्तुगीज अधिका-याने. हैदोस घातला होता. स्वातंत्र्य पूर्व काळी भारतीयांवर जे अत्याचार चालले होते,  तेच गोमंतकीयांवर पोर्तुगीजांकडून चालू होते. अशा वेळी भारतीय संग्रामाच्या वारे गोव्याकडे आले नसतं, तरंच नवल.

1946, डाॅ. राम मनोहर लोहियांच्या सत्याग्रहापासून गोव्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.

अॅड. विश्वनाथ लवंदे, श्री प्रभाकर सिनारी यांच्या बरोबर श्री दत्तात्रय देशपांडे हे गोवा स्वातंत्र्य संग्रामात स्थापन केलेल्या आझाद गोमंत दलाचे founder member.

श्री.  देशपांडे हे निपाणी जवळील रामपूर गावचे. बालपण सुखवस्तू परिस्थितीत गेलं तरी मालमत्तेच्या,  जमिनीच्या वादावरून हे कुटुंब त्रासात पडलं. रामपूर हे इतकं खेडं होतं की शाळेचीही सोय नव्हती. त्यांना तीन तीन मैल चालत जावं लागे. आपल्या बुद्धिची चमक त्यांनी दाखवली आणि ते मॅट्रीक उत्कृष्ट रित्या पास झाले. विद्यार्थी  जीवनापासून त्यांचे वाचन अफाट होते. ते एकपाठी होते.  लेखनाचीही आवड होती.

जेव्हा SSC  च्या पुढचे शिक्षण शक्य नाही असे समजले तेव्हा त्यांनी मिलिटरीत जाण्याचा विचार केला. घरच्यांची परवानगी न घेताच ते बेळगावला गेले आणि सैन्यात भरती झाले सुद्धा. सिकंदराबाद, जबलपूर येथे त्यांना पाठविण्यात आले. इराक व इराण ला सुद्धा ते गेले होते. तिथे सरकार विरोधी कारवाया केल्याने त्यांना कोर्टाला सामोरे जावे लागले.  नंतर त्यांना कोलकाता येथे पाठवले. तिथेच त्यांनी मिलिटरी सोडली व 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन ते Forward Block मध्ये गेले. तेव्हा ब्रिटिश सरकार विरुद्ध लढ्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या. ब्रिटिश पोलीस त्यांना पकडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी तिथून निघून  देशपांडे गोव्यात दाखल झाले. 1945 साली वास्को मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 1946 साली गोवा मुक्तीसाठी लढा सुरू झाला. हजारोंच्या संख्येने लोक ह्यात सामील झाले होते. 1947 साली अशाच कारवायांच्या संदर्भात देशपांडे ना अटक करण्यात आली. व कोर्टात हजर रहावे लागले. त्यांनी तिथे सडेतोडपणे व परखडपणे सांगितलं की,  गोवा हा भारताचाच भाग असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हा गुन्हा ठरत नाही. आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर कुठलीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. कोर्टात त्यांनी सादर केलेले स्टेटमेंट त्यांच्या तल्लख बुध्दीमत्तेचं, साहसी वृत्तीचं आणि कडव्या देशभक्तीचं प्रतीक आहे. या त्यांच्या स्फोटक व जाज्वल्यपूर्ण स्टेटमेंटमुळे त्यांना 28 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली.

क्रमशः….

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 9 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 9 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

अंदमानला जायला मिळण हा माझ्यासाठी सोनेरी क्षण होता. या सगळ्या स्मृती मी अजूनही जपून ठेवल्या आहेत.

अंदमान ला जायचं म्हणून मी जय्यत तयारी केली होती. माझ्या बाबांच्या मदतीनं सावरकरांच्या ‘जन्मठेप’ या पुस्तकाचं प्र. के अत्रे यांनी केलेलं संक्षिप्त रूप ऐकलं. त्यामुळे माझ्या मनाचे भूमिका तयार झाली. आपण नुसतं प्रवासाला जाणार नाही तर एका महान क्रांतिकारकांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीला मानवंदना देण्यासाठी जाणार आहोत हे पक्कं ठरवलं आणि तसा अनुभवही घेतला. आम्ही एकूण 128 सावरकर प्रेमी सावरकरांबद्दल आदर असणारे तिथे गेलो होतो. महाराष्ट्र,कर्नाटक,दिल्ली अशा विविध भागांमधून एकत्र जमलेलो होतो. जणूकाही अनेक आतून एकता निर्माण झाली होती. आम्ही सगळेजण हरिप्रिया ने पहिल्यांदा तिरुपतीला गेलो. बेळगाव स्टेशनवर सर्वांचे जंगी स्वागत झाले. सावरकरांच्या फोटोला हार घातला. छोटेसे भाषण हि झाले.घोषणांनी बेळगाव स्टेशन दुमदुमून गेले होते.. तो अनुभव सुद्धा रोमहर्षक होता.. आम्ही चेन्नई ला उतरलो. चेन्नई ते अंदमान आमचे, ‘किंग फिशर’विमान होते. माझ्याबरोबरकायम माझी बहीण होतीच. पण इतर सर्वांनी मला खूप सांभाळून घेतले. एअर होस्टेस ने पण छान मदत केली. त्या माझ्याशी हिंदीतून बोलत होत्या. विमानामध्ये पट्टा बांधला ही त्यांनी मदत केली. या प्रवासामुळे आयुष्यातली खरी मोठी उंची गाठली. विमानाचा प्रवास झाला आणि सावरकरांना त्यांच्या कैदेत असलेल्या खोलीमध्ये नमस्कार करण्याची संधी मिळाली.

अंदमानमध्ये आम्ही उतरल्यावर आम्हा सगळ्या सावरकर प्रेमींना पुन्हा एकदा सावरकर युगच अवतरले असे वाटले. आम्ही सगळ्यांनी तीन दिवस कार्यक्रम तयार केले होते. अंदमानमध्ये चिन्मय मिशन चा एक मोठा हॉल आहे. तिथे बाकी सगळ्यांचे कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी बेळगावच्या विवेक नावाचा मुलगा होता. त्याची उंची अगदी सावरकरां एवढी, तसाच बारीक. त्याच्या पायात फुलांच्या माळा, हातात माळा घालून जेल पर्यंत आम्ही मिरवणूक काढली. सावरकरांना जो ध्वज अपेक्षित होता तसा केशरी ध्वज आणि त्यावर कुंडली करून  नेला होता. तो ध्वज घेऊन सगळ्या लोकांनी मोठ्या आदराने प्रेमाने सावरकरांच्या त्या खोलीपर्यंत जाऊन त्यांना मानवंदना दिली. त्या जेलमधून फिरताना आतून हलायला होते. तो मोठा जेल, तो मोठा व्हरांडा, फाशीचा फंद, पटके देण्याची जागा, सगळे ऐकूनही मी थरारून गेले. सावरकरांना घालत असलेल्या  कोलूलामी हात लावून पाहिला तर माझ्या अंगावर काटा आला. आपल्या भारत मातेसाठी त्यांनी किती हाल सोसले, कष्ट केले, किती यातना भोगल्या, ते आठवलं तरी शहा रायला होतं. त्यांच्या त्यागाची आम्ही काय किंमत करतो असंच वाटतं.

आमच्याबरोबर दिल्लीचे श्रीवास्तव म्हणून होते. त्यांचे त्यावेळी 75 वय होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या वयाच्या बावन्न वर्षापर्यंत त्यांना सावरकर कोण हे माहिती नव्हते. त्यांचं कार्य काय हेसुद्धा ठाऊक नव्हते. पण पण एकदा त्यांच्या कार्याची व्याप्ती, खोली त्यांना समजली आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी सावरकरांच्या कार्यावर पीएचडी मिळवली.

श्रीवास्तव आजोबांनी आम्हाला जेलच्या त्या  व्हरांड्यामध्ये सावरकरांच्या खूप आठवणी सांगितल्या. त्यातली एक सांगते. आपल्या एका तरुण क्रांतिकारकांना दुसऱ्या दिवशी फाशी द्यायची होती. बारीने त्याला विचारले, “तुझी शेवटची इच्छा काय आहे?” त्यांनी सांगितले, “मला उगवता सूर्य दाखवा.” दूर बारी छद्मीपणे हसून म्हणाला, “तुमच्या साम्राज्याचा सूर्य मीच आहे.” त्यात थेट क्रांतिकारकांनी ताठपणे सांगितले, “तुम्ही असताना चाललेला सूर्य आहात. मला उगवता सूर्य दाखवा. मला सावरकरांना पाहायचे आहे.” धन्य ते क्रांतिकारक..

तेथील हॉलमध्ये कोल्हापूरच्या पूजा जोशी ने, “सागरा प्राण तळमळला” हे गीत सादर केले. रत्नागिरीच्या लोकांनी सावरकर आणि येसूवहिनी यांच्या मधला संवाद सादर केला. म्हणून म्हटलं ना तिथं पुन्हा एकदा सावरकर युग अवतरलं होतं.

आपल्या मातृभूमीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किती हालअपेष्टा सहन केल्या, ते आजच्या मुलांनाही समजायलाच हव्यात. त्याच साठी आपल्या सांगलीतल्या सावरकर प्रतिष्ठान चे लोक अजूनही नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत.

सर्वांनी सावरकरांचे, “माझी जन्मठेप” जरूर जरूर वाचावे अशी मी कळकळीने विनंती करते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

एखादा पुतळा रस्त्याच्या मधोमध उभारावा, तसा एक हत्ती एका रस्त्याच्या मधोमध उभा असतो. त्याच रस्त्याने चाललेले पाच आंधळे त्या हत्तीला धडकतात.  काय आहे हे ? प्रत्येक जण चाचपडून बघायला लागतो.. एकाच्या हाताला शेपटी लागते, त्याला वाटतं ती दोरी आहे. एकाच्या हाताला पाय लागतो, त्याला वाटतं ते झाड आहे.

एकाचा हात  दातावर आपटतो, त्याला वाटतं तो भाला असेल. एकाच्या हातात सोंड येते, आणि साप समजून तो झटकन सोडून देतो. एकाचा हात हत्तीच्या पोटावर पडतो. हात पोहोचेल तिथपर्यंत तो चाचपून पहातो, पण त्याला नक्की अंदाजच बांधता येत नाही. त्यांचे भांबावून चाचपडणे पाहून, तिथून चाललेला एक सद्गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन तो हत्ती असल्याचे त्यांना सांगतो आणि त्यांना प्रत्यक्ष हत्ती पाहिल्यासारखाच  आनंद होतो.

ही गोष्ट म्हणजे एक सुंदर रूपक-कथा असावी असे प्रकर्षाने वाटते. —— हत्ती म्हणजे अनाकलनीय असणारे परब्रह्म. आणि पाच आंधळे म्हणजे माणसाची पाच ज्ञानेंद्रिये —- डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा —-रूप, गंध,  नाद,  रस, स्पर्श —- यासारख्या सृष्टीतल्या महत्वाच्या अस्तित्व-गुणांची  जाणीव जाणवून देणारी पाच साधने. या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे, ज्ञानग्रहणक्षमतेमध्येही विविधता आणि स्वतःची अशी एक मर्यादाही —ज्यावरून माणसाच्या शरीरक्षमतेचीही एक मर्यादा ठरते. पण तरीही इतर सर्व योनींपेक्षा मनुष्य-योनी श्रेष्ठ का मानली जाते? चौऱ्याऐंशी लक्ष  योनी पार केल्यानंतर मानवजन्म मिळतो असे म्हणतात  आणि त्याचे वैशिष्ट्य हेच असते की,  या जन्मात,  या ज्ञानेंद्रियांमार्फत मानव या चराचर सृष्टीचे, इतर प्राण्यांपेक्षा खूपच जास्त ज्ञान मिळवू शकतो.  इतकेच नाही तर परब्रह्माचे,  म्हणजेच अंशरूपाने प्रत्येक सजीवात असणाऱ्या त्या सर्वोच्च प्राणशक्तीचेही ज्ञान मिळवू शकतो.  त्यात कायमचे विलीन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो.  त्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा एकत्रित उपयोग करण्याची क्षमता त्याला मिळालेली असते.  “ मानवी मन “ हे सहावे अतिशय प्रभावी पण अदृश्य असे माध्यम आहे,  त्याला या कामासाठी जुंपणे,  हे मात्र माणसाला प्रयत्नपूर्वकच साधावे लागते. अर्थात परब्रह्म हे हत्तीसारखे सहजपणे आकलन होण्यासारखे नसतेच— एका मानवजन्मात तर नाहीच नाही  पण या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने त्याच्या एका अंशाचा तरी अनुभव एका जन्मात घेता यावा, यासाठी मात्र माणूस सतर्कपणे प्रयत्न करु शकतो. उत्तम ऐकणे,  उत्तम बघणे-वाचणे, उत्तम आणि विचारपूर्वक योग्य बोलणे,  अस्पृश्य विचारांना चुकूनही स्पर्श न करणे,  दुष्ट- अनैतिक विचारांचा वासही नाकाला न लागू देणे —-अशासारख्या सदगोष्टी जाणीवपूर्वक करण्याचे ठरवले, तर माणसाचे मन त्याच्या बुद्धीच्या मदतीने, या इंद्रियांच्या वेगवेगळ्या कामांचा एकत्रित उपयोग करून त्या शाश्वत सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला लागू शकते. मग त्या एकमेव शाश्वत सत्याची — परब्रह्माची विशालता — सर्वव्यापकता समजण्यासाठी काय करावे याची दिशा तरी या जन्मात नक्की सापडू शकेल. शेपटी – पाय- दात – सोंड – पोट  हे  एकाच हत्तीचे अवयव आहेत,  हे जसे गोष्टीतल्या आंधळ्यांना समजते  आणि हत्ती नेमका कसा दिसतो  हे त्यांच्या बंद डोळ्यांआड असलेले वास्तव ते त्यांच्या परीने अनुभवतात,  तद्वतच,  या चराचर सृष्टीतली प्रत्येक सजीव,  चेतनामय गोष्ट त्या सर्वव्यापक परमचैतन्याचाच एक अंश आहे,  इतके तरी मानवजन्म मिळालेल्या प्रत्येकाने, या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करायलाच हवा आणि हो,  हत्तीची ओळख पटवून देण्यासाठी एक सद्गृहस्थ पुरेसा असला, तरी त्या परमचैतन्याची ओळख पटवून देण्यासाठी मात्र सद्गुरू -कृपा लाभणे अनिवार्यच असते.

ही गोष्ट सांगण्यामागे हाच हेतू असावा असे मला वाटते.

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 8 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 8 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझ्या नृत्याच्या प्रवासातील अत्युच्च बिंदू आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेल्या कोठडीमध्ये त्यांनीच लिहिलेल्या गीतावर आणि माझ्या गुरुं सोबत नृत्य करण्याचा आलेला दुर्मिळ योग. तो परम भाग्याचा क्षण आम्हाला लाभला आणि आमच्या जन्माचे सार्थक झाले.

2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाडशी उडीचे शतक वर्ष. या उच्चकोटीच्या साहसाला मानवंदना देण्यासाठी सावरकर प्रेमी नी स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान पदस्पर्श शताब्दी सोहळा, चार जुलै ते 12 जुलै 2011 या कालावधीत आयोजित केला होता. अंदमानच्या त्या तुरुंगात जाऊन सावरकरांच्या त्या कोठडीला नमन करण्याचे भाग्य ज्या निवडक भाग्यवंतांना लाभले त्यापैकी आम्ही तिघे म्हणजे मी, माझ्या गुरु सौ धनश्री आपटे आणि माझी मैत्रीण नेहा गुजराती या होतो.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अंदमानला जायला मिळालं. त्यासाठी सावरकरांचे आशीर्वाद, माझ्या आई बाबांचा खंबीर पाठिंबा, धनश्री ताई यांची मेहनत, आणि माझी बहिण सौ वर्षा आणि तिचे यजमान श्री विनायक देशपांडे यांच्या मदतीचा लाभलेला हात.

सांगलीमध्ये बाबाराव स्मारक समिती आहे. त्यामध्ये अनेक सावरकर प्रेमी काम करतात. त्यापैकीच एक आहेत श्रीयुत बाळासाहेब देशपांडे. 2011 हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या या धाडसी उडीचे शंभरावे वर्ष होते. केवळ देश प्रेमामुळे सावरकरांनी हे धाडस केले होते. आपली भारत माता पारतंत्र्यात अडकलेली त्यांना सहन होत नव्हतं. त्या एका ध्यासापोटी त्यांनी हा अतुलनीय पराक्रम केला. खरंतर त्यांच्या त्यामुळेच आपण सगळे भारतीय स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतो आहोत. मोकळा श्वास घेतो आहोत. त्याची थोडीतरी जाणीव आपण ठेवली पाहिजे ना! त्यांना मानवंदना प्रत्यक्ष त्या ठिकाणी अंदमानला जाऊन द्यायची असं या लोकांनी ठरवलं होतं. स्वातंत्र्यवीरांची गाणी नृत्याविष्कार करून मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यामध्ये मी, धनश्री ताई आणि नेहा यांनी नृत्य बसवली होती.

जवळजवळ दोन अडीच महिने आम्ही नृत्य बसवत होतो. सावरकरांनी तुरुंगातील त्या कोठडीमध्ये, काट्यांनी खिळ्यांनी लिहिलेल्या कविता सादर करायच्या ठरवल्या होत्या.त्या गाण्यांना विकास जोशी यांनी चाली लावून, सांगलीच्या स्वरदा गोखले तिच्याकडून त्या कविता गाऊन घेतल्या आणि आपल्या धनश्री ताई यांच्या अथक परिश्रमाने आणि मार्गदर्शनाने नृत्य अविष्कार बसवला.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आम्ही तिघींनी आमचे नृत्य सावरकरांच्या त्या कोठडीत केले जिथे त्यांना बंदिस्त ठेवले होते. ती 123 नंबर ची खोली आहे. एक विशेष म्हणजे लोकांना, पर्यटकांना पाहण्यासाठी ती खोली तशीच ठेवली आहे. आम्ही तिथे गेलो तो दिवस बरोबर सावरकरांनी जी धाडसी उडी घेतली तोच दिवस होता. त्यादिवशी सावरकरांचा फोटो तिथे ठेवला होता.संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. ज्या भिंतींना सावरकरांचा सहवास लाभला होता त्याच भिंतींना आम्ही सावरकरांची ती अमर गा णी, ते अमर काव्य त्यातून सादर करून दाखवलं. ती कोठडी छोटी म्हणजे फक्त दहा बाय दहाची होती. कशीबशी तीन-चार माणसं उभे राहू शकतील एवढीच. पण आम्हाला त्याच भिंतींना दाखवायचं होतं की त्यांच्यावर सावरकरांनी लिहिलेलं ते अमर अतुलनीय काव्य नृत्याच्या फुलांची ओंजळ त्याच ठिकाणी वहात आहोत.

धनश्री ताईंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सायं घंटा नावाचे काव्य नृत्या मध्ये सादर केले. ह्या कवितेचा आशय समजून घेण्यासारखा आहे. कै दे मध्ये असताना सावरकरांना हातांमध्ये को लू घालून अक्षरश: घाण्यावरील बैलाप्रमाणे जुंपून त्यांना तेल काढायला लागायचं. अतिशय कष्टाचं त्रासाचं काम होतं ते. त्यावेळचा तो बारी बाबा जेलर खूप क्रूरपणे वागायचा. कष्टाचे सगळी काम झाल्यावर संध्याकाळचे ते घंटा म्हणजे काम संपल्याची घंटा कधी असते यावर कैद्यांचे लक्ष असायचं. सायन घंटा वाजली म्हणजे हुश्य !तो दिवस संपला. ते काव्य ज्या खोलीत लिहिले गेले त्याच खोलीत धनश्री ताईंनी हे नृत्य सादर केलं. बारी बाबा करत असलेला छळ त्यांनी दाखवला. त्याचबरोबर सावरकरांच्या संवेदना उत्कृष्टपणे दाखवल्या.

मी आणि नेहा गुजराती आम्ही दोघांनी सावरकरांचं मातृभूमीचे मंगल काव्य अर्थात जयोस्तुते सादर केले. अतिशय बुद्धिमान अशा सावरकरांनी जे हे महाकाव्य लिहिलं आणि मंगेशकर बंधू-भगिनींनी जीव ओतून त्या उच्च भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या, आपल्या मनामध्ये भिनवल्या, त्या नृत्यामध्ये सादर करण्याचे परमभाग्य आम्हाला मिळालं.

जयस्तुते सादर करताना भारत माता मी झाले होते आणि नेहाने वाईट शक्ती साकारली होती. म्हणजे वाईट शक्ती आणि भारत मातेचे लढाई आम्ही उभी केली. तुम्हाला सांगते, “हे अधम रक्त रंजी ते” यावर नृत्य करताना माझ्या अंगामध्ये जोश संचारला होता. अंगावर रोमांच उभे राहिले होते. ती वाईट शक्ती लढाई मध्ये पायाशी पडली तेव्हा मला सुद्धा आनंद झाला. अशा तऱ्हेने जयोस्तुते या ठिकाणी सादर करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 7 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

पहाटेच्या वेळी एकदा एक कळी हळूच आली

आपले मनोगत हळुवार सांगून गेली.

रात्र कधीची संपली,पहाट झाली.

ही कळी म्हणजे माझ्या मनात नृत्य शिकण्या विषयी विचारांनी घेतलेला जन्म. या कळीला हळूवार फुंकर घातली धनश्री ताई रुपी वाऱ्या ने हळूवार फुंकर घालत असताना त्या कळीच्या आणि वाऱ्याच्या झालेल्या एकत्र प्रवासाविषयी थोडेसे.

खरेतर सुरुवातीला भरतनाट्यम हा नृत्यप्रकार शिकणे केवळ आणि केवळ डोळ्यांनी पाहून शिकणे हीच कला आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा अडसर ताईंच्या आणि माझ्या वाटेत उभा होता.

पण ताईंनी माझं मन नावाचं organजा गं करायला सुरुवात केली. आणि आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की शरीर हे केवळ माध्यम आहे, साधन आहे आणि शरीरा पलीकडे म्हणजे अतिंद्रीय शक्तीच्या आधाराने आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. ताईनी मग स्पर्श, बुद्धीआणि मनातील अंतरिक प्रेमभाव यांच्या माध्यमातून नृत्य शिकवायला सुरुवात केली. अशाप्रकारे नृत्यातील अडवू, हस्त मुद्रा शिकत असताना कधी आमचे सूर जुळून गेले हे कळलेच नाही.

नृत्यामध्ये बरीच अवघड वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात. जसे की डावा हात डोक्यावर असताना उजवा पाय लांब करणे, उजवा हात कडेला असताना डाव्या पायाचे मंडल करणे, भ्रमरी घेताना उजवा हात डोक्यावर ठेवूनडावा हात फिरवत उजवीकडून वळणे आणि त्याच वेळी गाण्या नुरूप चेहऱ्यावरचे हावभाव दाखवणे. अशा खूप अवघड अवघड गोष्टी ताईंनी अगदी कौशल्यपूर्ण रीतीने शिकविल्या. खरंतर दृष्टिहीन व्यक्ती ला समोर असलेले पाण्याचे भांडे घे हे सांगताना दुसऱ्याची खूप तारांबळ होते. पण इथे तर अच्छे मृत्य शिकवायचे होते.

नृत्याचे शिक्षण प्रशिक्षण जसजसे पुढे जात होते तसच या नवीन अडचणी समोर येत होत्या.  ८-९ वर्षे शिकल्यानंतर अभिनयाचा भाग आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो अभिनय  शिकविण्या विषयी. पण पण तिथेही ताईंनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून घेतला आणि लहान मुलांना गोष्टी सांगून जसे मनात भाव निर्माण केले जातात त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला.

माझ्या अनेक अडचणी मध्ये मला येणारी अडचण म्हणजे आवाजाची .नृत्यात गिरकी घेतल्यानंतर माझे तोंड प्रेक्षकांच्या कडे आहे की बाजूला हे मला कळत नसे. पण या अडचणीवरही ही ताईंनी मात केली आणि आवाजाची दिशा ही नेहमी माझ्यासमोरच ठेवली की ज्याच्या आधाराने माझे दोन फिरून समोरच येत असे.

ताईंचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट, माझी मेहनत, रियाज आणि साधना याचा परिपाक असा झाला की मी नृत्यामध्ये गांधर्व महाविद्यालयाची  नृत्य विशारद ही पदवी, कला वर्धिनी चा ५ वर्षा चा कोर्स, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा ची नृत्यातली एम. ए. ही पदवी,यशस्वी रित्या संपादन केली.ज्यामुळे आज मी अनेक ठिकाणी,माझ्या एकटीचा स्टेज प्रोग्राम करू शकत आहे.

या माझ्या यशाचे कौतुक अनेक वर्तमान पत्रांनी आणि दूरदर्शन वरील अनेक वाहिन्यांनी, प्रसार माध्यमांनी भरभरून केले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले

download.jpg

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

भक्ती संप्रदायाचा इतिहास जेव्हां वाचनात आला तेंव्हा साहित्याचे मुकुटमणी, संतांचे गुरु ज्ञानेश्वर यांना माऊली कां संबोधतात याची जाणीव झाली. भागवतधर्म म्हणजे काय? शैव व विष्णुरूपी पांडुरंग जो सर्व जातीपातीच्या, उच्चनीच, श्रीमंत, गरीब, विद्वान, सामान्य, सर्वांना एकाछत्राखाली सामावून घेतो.तो साक्षात ईश्वर संतांचा मायबाप, प्रसंगी, दिनांचा कनवाळू विठोबाराया!

आषाढी, कार्तिकीचे महत्व पूर्वापार चालत आले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरला जातात. वर्षाचे बारामहिने एकादशी असतेच, पण या दोन एकादशीना विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या सुमारास सूर्याचे दक्षिणायन असल्याने, देवांची रात्र सुरु होते. इथून पुढचे चार महिने चातुर्मास सुरु होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आहे.

उदा.कामिका,पुत्रदा,पाशांकुशा,षट्तिला,स्मार्त,भागवत,परिवर्तिनी,इंदिरा,रमा,प्रबोधिनी,मोक्षदा,सफला, आमलकी,वरूथिनी,मोहिनी,पापमोचीनी,निर्जला,योगिनी अशी नावे आहेत.

एकादशी म्हणजे विष्णूचे व्रत.आषाढी,कार्तिकीला पंढरपुरच्या विठोबाचे महत्व! पुंडलिकाची गोष्ट लहानपणी ऐकलेली,वाचलेली होती.पण प्रत्यक्ष पंढरपूर,तेथील मंदिर पाहण्याचा योग सासरघरी आल्यावरच  आला.नाहीतर एकाद्शी दिवशी उपवास करायचा फराळाचे पदार्थ खायचे एवढेच करायचो.

वयाबरोबर जाणतेपण येते,तसे मन प्रगल्भ होते आणि मग इतर गोष्टींची जाण येते. सासरघरचे वातावरण धार्मिक होते.दरवर्षी सासूबाई आळंदीला प्रस्थानाला जात.एकदा पुण्याला पालखी सोहळा पाहिला  होता. शाळेतल्या क्रमिक पुस्तकात संतांची अभंगवाणी समाविष्ट असे.त्यातून जी काही थोडी  बहुत तोंडओळख या ईश्वरभक्तीशी झाली तेवढीच! पण मनातून ईश्वरभक्तीच्या ओढीचे प्रेम जागृत व्हायला आवधीच लागला.

एकदा आमचेकडे,सासूबाईंनी,पंढरपुरला मोठी महापूजा घालायचे ठरवले.मी तशी या साऱ्यालाच नवखी होते.कशाला इतका घाट घालताहेत? असे आपले मला वाटले. सर्वानीच जायचे ठरले.

महापूजा सकाळीच असल्याने भीमेकाठी जाऊन, चंद्रभागेत स्नान करून तयार झालो.मी या सर्व गोष्टी खरोखर आलीप्तपणे  करत होते. पुजेची वेळ झाली.घरचे यजमान पूजेच्या अग्रभागी सोवळे नेसून सिद्द होते.आम्हीही सर्वजण गाभाऱ्यात जमलो.पंच्यामृताच्या कळश्या एकेक हाती घेऊन पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे देवाला स्नान घालणे सुरु होते.सासूबाई मला सांगत होत्या,”अग हात पुढे कर,तू पण देवाचे अंग चोळ,हाताने अंघोळ घाल”!त्यावेळी थोडे उचंबळून आले.साक्षात भगवंताला न्हाऊमाखूघालत होतो. पण जितका आनंद व्हावा तेवढा काही होत नव्हता.भक्तीची आस,भक्तीची कास देवभेटीची आळवणी,श्रद्धा ही सुद्धा जागृत व्हावी लागते. ईश्वराविषयीचे आकर्षण काही कोणी सांगीतल्याने,ऐकल्याने ओतले जात नाही.ते निर्माण व्हावे लागते,मनाच्या खोल गाभाऱ्यातून! जो ईश्वर, जे परब्रह्म,मूळ तुमच्यात वास करुन आहे, जे अंतस्थ आहे, अदृश आहे त्या मूळ जीवात्म्याला,निर्गुण निराकार परब्रहमाशी जोडण्याकरिता मनाचा हुंकार तुमच्या अंतस्थ ह्रदयातून उमटावा लागतो.तो अंतस्थ हुंकार, भक्तीची प्रेमनदी,भक्तीचा पान्हा,साक्षात भगवंताला न्हाऊ घालताना मजजवळ नव्हता,’मी रीतेपणीच गेले आणि रीतेपणीच आले’! म्हणून मला ईश्वरासमीप जाऊनही ते साक्षात ‘परब्रह्म’ भेटले नाही.भाव तेथे देव.भाव तो मनीच नव्हता, मग देव कसा भेटावा?

काही वर्षांनी पुन्हा पंढरीला जाण्याचा योग आला.यात्रा नव्हती.एरवीची एक संध्याकाळ होती.गर्दी तुरळकच होती. थोडा वेळ बारीत उभे राहून दर्शन झाले. गाभारा जवळ जवळ येऊ लागला, या वेळेसमात्र मागच्यापेक्षा मनात भक्तीची, देवाला प्रेमाने भेटण्याची ओढ होती. त्या तरंग लाटा मनात उचंबळू येऊ लागल्या. त्या आनंदाच्या भेट सोहळ्यात, पूर्वीच्या स्मृतीत मी हात वर उंचावून देवाला पाहू लागले, त्याच्या कायेला स्पर्शू लागले. एवढ्यात पुजार॒याचे दम भरलेले शब्द ऐकू आले, ‘बाई, पायाशीच हात लावा !’ अरे बापरे ! महापुजेवेळी साक्षात भगवंताला न्हाऊमाखू घालताना त्याचे अंग चोळले, अंघोळ घातली. बाळकृष्णाला, गोपाळाला पण आता तसा हा उंचावायचा नाही. बरोबर आहे, ‘बा, विठ्ठला, माझे पामराचे डोके तुझ्या चरणी लीनच व्हायला हवे. ते अशावेळी तुझ्या कायेला हात लावून आशीर्वाद का बरे घेणार !’ चूक झाली मायबापा चूक झाली. !’ असे मनाशी म्हणत मी पांडुरंगाच्या चरणी आपले मस्तक लीन केले, टेकवले. पुजाऱ्याने घाई चालवली होती. मी डोळेभरून ईश्वर पहिला. मनी त्याचे रूप आकंठ साठवून माझ्यावर प्रेमाची पाखर घालण्यास विनवले आणि पुन्हा आपल्या संसारी येऊन मग्न झाले. यावेळेस मला ईश्वराच्या सत्चीदानन्दाची जाणीव होऊ लागली. हृदयी ईश्वर भेटीचा प्रकाश होऊ लागला.

अशी ही ईश्वराची भक्ती, हृदयी भाव नसलेल्यांना वेडं करणारी ! भक्तीचा झरा वाहू लावणारी, असीम, उत्कट, अविनाशी ! दरवर्षी आषाढी येते. यावर्षीही आली आहे. पण यावर्षी मनाच्या गाभाऱ्यात वरील रहस्यमय अनुभवांचे गुंजन चालू आहे. जिकडे तिकडे पंढरपूरला पालखी निघाल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. मन तिकडे हळूहळू ओढ घेत आहे.

शैशवात मनात नसलेला भक्तीचा उगम. हा काही नंतर एकाकी झालेला नाही. बहिर्चक्षूंनी पाहिलेला देव. अंतरमनात वास करीतच होता. परंतु बौद्द्धिक पातळीवर त्याचा विचार केलेला नव्हता. ती अंतरमनातील भक्ती जागृत झाली. बुद्धीने मनाची जागृती एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. ह्यालाच भक्ती म्हणावं कां? देवाची भक्ती, त्याची आळवणी, त्याचे नामस्मरण सामान्यांनी करावे. हाच खरा सुखाचा मार्ग संतांनी शतकानुशतके दाखविला आहे. भक्तीच्या अशा नवविध पद्धती सांगितल्या जातात. देह हा इंद्रिय सुखाच्या पिंजऱ्यात अडून पडलेला आहे. त्या देहातील जीवात्म्याला त्या परिपूर्ण, अनादी अनंत परब्रह्माशी जोडून जिवाचे सोने होईल तेच खरे अंतिम सुख ! ‘देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो ! नुरो मस्तक ! कुटो हे शरीर ! नामाचा गजर सोडू नये ! नामाच्या गजराने, भक्तीने तो कृपाळू ईश्वर भक्तावर आपली कृपादृष्टी करतो. भक्ताच्या चिमुकल्या नामघोषाने फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा त्याला पुरते. इतका तो दयानिधी कृपाळू आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, पण आपली झोळी फाटकी असता कामा नये.

म्हणूनच ‘पुंडलिके वरदा हरिविठ्ठल, द्यानोबा तुकाराम,’ ह्या नामघोषात लाखो वारकऱ्यांनी भक्तीची ही उज्ज्वल परंपरा जागृत ठेवली आहे. हजारो वर्षे हे विठ्ठलाचे पाईक अखंड मुखी हरिचे नाम घेत. उन्हापावसाची, दगडाधोंड्यांची पर्वा न करता जिवाचे, देहाचे कवतीक सोडून, मैला मैलांचा प्रवास करीत, आपल्या मनातील नाद्ब्रम्हाला त्या परब्रम्हाशी एकरूप करण्या, भेटवण्या, पंढरपूरला त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात आणि आपले मस्तक लीन करतात. आपल्या अंतरमनातील उर्जा देवाच्या दर्शनाने तृप्त करून परतात.

वारीला जातो तो वारकरी होतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवली. भक्तीचा भाव ठेवला आणि वारीत मनाने जरी सहभागी झालो तरी आपणही वारकरी होऊ. प्रत्येकाच्या मनातले भक्तीचे स्वरूप जरी वेगळे असले तरी भाव तेथे देव आहेच ! भक्ती तेथे कृपा ! ईश्वराने अनेक प्रसंगी केलेली आपण पाहिली वाचली आहे. म्हणून या आषाढी निमित्त एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकऱ्याच्या स्वरात आपलाही स्वर मिसळून म्हणूया टाळी वाजवावी ! गुढी उभारावी !वाट ही चालावी ! पंढरीची.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

वारक-यांची पावले आषाढ आला की संसारातून बाहेर पडून पंढरीची वाट का चालू लागतात, ते कळलं.’ ग्यानबा तुकाराम च्या तालावर चालत विठुरायाच्या पायावर माथा टेकण्याचा आनंद आणि सुख काय असतं ते कळलं. किती भाग्यवान ते वारकरी…..

विठ्ठल दर्शनानंतर रखुमाई कडे गेलो.

श्रीराम-सीता, श्री शंकर- पार्वती, श्री विष्णू -लक्ष्मी, आणि विठ्ठल-रखुमाई ही चार देव- दांपत्ये. रामसीता म्हटलं की सतत रामाबरोबर असणारी सीता,  शंकर पार्वती कैलासावर बसलेले, विष्णू शेषशायी आणि लक्ष्मी त्यांचे पायाशी असे द्रुष्य समोर येते. विठ्ठल रखुमाई हे जोडपं आपल्यातलं वाटतं. सा-या जगाचा संसार समर्थ पणे सांभाळणारा विठ्ठल आणि सगळे भक्त “विठ्ठला, पांडुरंगा” म्हणत त्यांनाच आळवतात, म्हणून जणु रुसून दुसरीकडे जाऊन आपणही कमरेवर हात ठेऊन उभी असलेली रखुमाई.  घराघरातल्या गृहस्थ- गृहिणी सारखे विठ्ठल रखुमाई.

दर्शनाला रखुमाई जवळ पोचले, कित्ती गोड रूप ते! अगदी विठ्ठलाला साजेसे.

विठ्ठलाच्या उंचपु-या मूर्ती समोर ही गोड गोजिरी रखुमाईची  अतिशय लोभसवाणी मूर्ती. जगत्जेठी आणि जगतजननी.  पिवळा शेवंतीचा हार तिच्या हिरव्यागार शालूवर छान शोभत होता. काळीशार तेजस्वी मूर्ती,  नाकात नथ, कर्णफुले,  आणि कपाळी मळवट. हेच ते दैवी, अलौकिक सौंदर्य.  अनिमिषतेने बघतच रहावे अशी रखुमाई. नमस्कार केला आणि भारावलेल्या मनाने बाहेर आले.

बाहेर दुकाने गजबजलेली होती. पण विठूमाऊलीच्या दर्शनापुढे मला बाकी सगळे गौण वाटत होतं. अतिशय शांत मनाने आणि जड अंतःकरणाने तिथून निघालो.

40 वर्षांपूर्वी ची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. किती आभार मानावेत विठूरायाचे!

आभार तर मी मित्र मैत्रिणींचे  मानते, ज्यांनी मला त्यांच्या बरोबर सामील होण्याची संधी दिली. मी शतशः त्यांची ऋणी आहे. त्यांच्यामुळेच हा ” सोनियाचा दिनु ” मला दिसला. नकळत मनात अभंगांचे स्वर रुंजी घालू लागले.

“जातो माघारी पंढरी नाथा

तुझे दर्शन झाले आता ।।

तुझ्या नादाने पाहिली

ही तुझीच रे पंढरी

धन्य झालो आम्ही जन्माचे

नाव घेऊ तुझे आवडीने ।।

दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी ।

तुका म्हणे भक्ती करा सोपी

जाती पापे जन्माची पळूनी ।।

।। समाप्त  ।।

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मंदिराच्या परिसरात जाताच मला देवभूमीवर उभी असल्याचा भास झाला. नखशिखान्त आतून एक शक्ती लहर माझ्यात भिनल्यासारखे वाटले. सकाळी अकराची वेळ होती. सूर्य बराच वर आला होता. थंडीत त्याच्या उबदार किरणांची शाल अंगावर घेत दर्शनाच्या रांगेत सामील झालो. हळूहळू पुढे सरकत सरकत मंदिरात प्रवेश करते झालो. आत शिरताच दोन्ही बाजूंनी भिंतीवर विठ्ठल रखुमाई,  मंदिराबद्दल माहिती,  तिथे साजरे होणारे उत्सव, आषाढी कार्तिकी च्या वारीची आणि वारक-यांची माहिती,  रिंगण, इंद्रायणी चे महत्व,  अनेक संतांची चित्रे, अभंग, ओव्या,  ज्ञानेश्वर माऊली,  तुकाराम महाराज इत्यादींची सुचवेन, असा संत- खजिना बघायला मिळाला. सर्वात शेवटी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान होते. आमच्या मागे खानदेशातून आलेल्या भक्तांचा ग्रुप होता. ते सर्व जण  त्यांच्या भाषेतील विठ्ठलाचे अभंग सामुदायिक गात होते.ऐकायला खूप छान वाटत होतं, पण माझं लक्ष विठ्ठलाकडेच लागलं होतं.  मूर्ती अजून किती दूर आहे हे बघत होते. पुढे चालता चालता जरासं उजवीकडे वळून समोर पहाते तो……

‘सावळे सुंदर रूप मनोहर’, मकरकुंडले ल्यालेला,  कमरेवर हात ठेवून उभा होता.  मुखावर मंद हास्य, अतिशय सुंदर,  देखणा पंढरीचा राणा.

त्याच्या नजरेतून वहाणारे वात्सल्याचा झरा माझ्या डोळ्यात भरून आला.दृष्टी न हलवता पुढे जात होते. जवळ पोचताच भान हरखून मूर्ती बघतच राहिले. भटजी म्हणाले, आधी पायावर डोकं ठेवायचं, मुख दर्शन नंतर घ्या. मी विट्ठलाचे पाय धरून माथा टेकला.

रांगेत असल्याने पुढे सरकावेच लागते. मला तर विठ्ठलाच्या जवळून दूर व्हावेसेच वाटत नव्हतं. माहेराहून सासरी येताना प्रत्येक वेळी आई दारात दिसे पर्यंत मान मागे वळून वळून आईला बघत रहायचे आणि ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे डबडबलेले असायचे. आत्ता तीच अवस्था माझी झाली.  हो! ही सुद्धा विठू माऊली च ना!

परत मागे येऊन किंचित अंतरावर, मूर्ती पहाण्याची संधी मला मिळाली. बांधेसूद शरीरयष्टी, चेह-यावर सात्विक भाव, गळ्यात तुळशीहार, गुलाबी वस्र ल्यालेल्या विठोबा चं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेतलं. “राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपियेल्या” अशा देखणेपणातून मला त्याची आश्वासक कृपाद्रुष्टी जाणवली. जणु काही मला सांगत होता, “मी असताना तुला कसली चिंता?”

गर्दी असल्याने तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. पण त्या पाच मिनिटात सगळे विचार, सगळ्या चिंता, काळज्या, काळ-वेळ, सगळ्या सगळ्याचा विसर पडला. फक्त विठू माऊली आणि मी. दुसरं काहीच नाही.

“अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया

पहाता पंढरीचा राया”

अगदी अशीच मी एकरूप झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मन इतकं शांत झालं. ही सुखद अनुभूती मी प्रथमच घेत होते.

क्रमशः …

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…

लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.

माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.

अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि  ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.

मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य.  कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.

फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .

ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.

गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं  की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात  उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली.  नृत्या तला आनंद मिळाला.

मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.

असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print