मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.) – इथून पुढे —

सुलीला गेल्यावर्षी सुक्यानानाची, कुत्र्यांनी फाडून खाल्लेली शेरडी आठवली. आणि तिला ऊभं वारं सुटलं.

जेवा-खायाचं सोडून सुली शेजारच्या रघूआप्पाच्या खोपीत घुसली. सुनंदा वैनीला तिनं विचारलं, 

“जेवलासा का?”

“हे न्हवं आत्ताच जेवले बग!”

“आणि तू गंऽ सुले. तू जेवलीस का?” 

“जेवले मी बी!” सुलीनं दाबून खोटंच सांगितलं. उगी लांबड लागाय नगो म्हणून.

“गाड्या काय आज लवकर येणार न्हाईत म्हणं!”

“व्हय गं, म्याबी ऐकलं मघा. अण्णाच्या गाडीची टायर फुटलीया जणू! बाकी येतील की सगळी.”

“व्हयवं, आता कवा दुरूस्ती हुतिया कुणास ठावं? कारखान्याची गाडी येणार, मग जॅक लावून दुसरा टायर घालणार. मग गाडी कारखान्यावर यिऊन खाली हुणार!”

“व्हय, रात उजडंल त्येला! झोप तू आपली बिनघोरी, का आमच्यात येतीस आजच्या रोज झोपायला?”

“आली आसती खरं, ती शेरडी एक व्याला झालीया. बाळाला आणि घेतलं पायजे. जागा पुरायची न्हाय तुमच्या खोपीतबी. झोपते आपली माजी मी!”

“झोप झोप, त्येला काय हुतंय? आणि आमी हायच की हितं. काय लागलं केलं तर कवाबी हाक मार. लगी येतो!”

“तुझ्या आईचा काय फोनबीन आल्ता काय? म्हातारीच्या तब्येतीचं कसं काय कळलं का?” 

“परवादिशी आल्ता. मुकादमाच्या मोबाईलवर. हाय बरं म्हणत्या. कवा बिगाडतंय, कवा सवंनी आसतीया. हाय तसंच म्हणायचं!”

आसंच काहीबाही दोघी बोलत बसल्या. तोवर बैलगाड्या आल्याचा आवाज आला. बैलांच्या गळ्यातील चाळ, साठ्यातला पत्रा वाजताना ऐकू येऊ लागला. “आरं शिरप्या हैऽ.. चलरंऽ..!” गाडीवानाचा आवाज लांबून येत होता.

सुली आपल्या खोपीबाहेर आली. आपला अण्णा आज येणार नाही, हे माहीत असूनही तिनं सगळ्या गाड्या नजरेनं धुंडाळल्या. त्यात तिचा अण्णा तिला कुठंच दिसत नव्हता. तिची घोर निराशा झाली.

हळूहळू सगळ्या गाड्या आपापल्या जाग्यावर गेल्या. उदास मनानं पाय ओढत ती आपल्या खोपीत आली. गाड्या आल्यामुळे तळ काही काळ जिवंत झाला. काही वेळ जनावरांना वैरणपाणी देतानाचे आवाज. पुरूष माणसं जेवताना बोलत असलेली. टोळीत काही दारूडेही होते. येताना टाकुनच आलेले. विनाकारण आपल्या बायकापोरांना शिव्या हासडीत होते.

काही वेळातच सारे चिडीचूप झाले. दमूनभागून आलेली अंगे विसावली. मेल्यागत मुरगाळून पडली. सुलीनंही पातेल्यातल्या भाताचे चार घास खावून घेतले. घास जात नव्हतं. भूकच मेली होती. भाताचं घास तसंच पाण्याच्या घोटाबरोबर गिळलं.

तळावर अंधार दाटला होता. रात्रीचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. पाण्यात पडल्यागत तळ शांत झालेला. सगळं वातावरण थंडगार झालेलं. मधेच एखाद्या बैलाच्या गळ्यातील घुंगरांची किनकिन नि रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. बाळाच्या शेजारी पटकूर हातरून तिने पाठ टेकली. तोवर शेरडीची धडपड ऐकू आली. ‘अगं बाईऽ..! वैरण टाकायची राह्यलीच की!’ असं स्वतःशीच पुटपुटत ती पुन्हा उठली. शेरडीला बारीक-बारीक कोंबऱ्या आणि शेवरीची मूठ टाकली. शेरडी कुरूकुरू शेंडे कुरतडू लागली.

बराच वेळ ती शेळीकडे एकटक बघत अंगणात उभी राहिली. वातावरण चिडीचूप झालेलं. तिनं आभाळाकडं बघितलं. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं टिपूर चांदणं पडलेलं. ढगाआडून चंद्राची कोर बाहेर आली. तिचा झिरपलेला पांढराशुभ्र प्रकाश खोपीवर पडला. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशानं सारा तळच न्हाऊन निघालेला. खोपीवरला वाळला पाला चंद्राच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघाला होता. हळूहळू खोपीच्या निर्जिव सावल्या आपले पाय पसरत चालल्या होत्या.

सुली आत आली. चुलीवरची चिमणी विझवली. अंथरुणावरती अंग टाकलं. तिला आपल्या आईची आठवण झाली. आईनं जाताना दिलेल्या सूचना तिला आठवल्या. झोपताना चिमणी बंद करायची. बाहेर कुणी बोलवलं तर जायचं नाही. ओळख असल्याशिवाय बोलायचं नाही. असं बरंच काहीबाही ती अंथरुणावर पडल्या पडल्या आठवत होती.

हळूहळू झोप येऊ लागली. डोळे पेंगुळले. तिला झापड पडली. पहाटेच्या निबिड अंधारातली अस्वलं तिला आठवू लागली. त्यांचे नख्या असणारे पंजे. तोंडावरचे काळेभोर केस. माणसांसारखी दोन पायांवर उभी राहून ती पुढे पुढे चालत येतायत… 

ती दचकून उठली. घामानं डबडबलेली. तोंड पुसलं. थोडं पाणी पिऊन घेतलं. पुन्हा अंथरुणावर पडली. तिने मन घट्ट केलं. कशाला घाबरायचं नाही, असं ठरवलं. ती पुन्हा झोपी गेली.

मध्यान रातचंच कसल्यातरी आवाजानं ती दचकली. काळजात चमक उठली. दाराबाहेर कुणीतरी खोकल्यासारखं झालं. तिने डोळे उघडले. अंधाराचा ती अंदाज घेऊ लागली. कोण असावं इतक्या रात्री? का आलं असावं? बुलटवाला मुकादम तर नसेल? असेल, तर तो का आला असेल? एवढ्या रात्री? त्याला माहीत आहे, आज अण्णा-आई घरात नाहीत. त्या संधीचा फायदा उठवायचा आहे का त्याला?

मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ते झटकून ती अंथरुणावरून उठली. खिडकीपाशी गेली. तिने एक डोळा बाहेर लावला. कोणच कसं दिसेना? ती तशीच थोडावेळ थांबली… कारखान्यावरची कुणी उडाणटप्पू पोरं आली असावीत का? काय नेम सांगावा तेंचा? ती तशीच थोडावेळ कोणोसा घेत थांबली. पण, परत काहीच हालचाल नाही. तिचे डोळे मिटू लागले.

तिथनंच गुडघ्यानं रांगत-रांगत ती अंथरुणावर आली. कलंडली. तिची झोप लागली. पुन्हा थोडा वेळ गेला. दार ढकलल्यासारखा आवाज आला. पाल चमकावी तशी ती चमकली. खडबडून उठली. खच्चून जोरात ओरडली, “कोणाय तेऽ..!”

बाहेर कुणी पळून गेलेल्या पावलांचा आवाज. लांब लांब जाणारा. तिने खिडकीतनं बघितलं तर बाहेर कुणीच नव्हतं. टिपूर चांदणं तळावर पसरलेलं.

ती अंथरुणावर येऊन बसली. कोण असावं ते? मुकादम? कारखान्यावरची पोरं? की आणखी कोण? आज्जीनं काढलेला नवरा नंदू तर नसेल? काळाकुट्ट. बसलेल्या नाकाचा. अंगावर केस असणारा. अस्वलासारखा दिसणारा! तिची मती गुंग झाली. कोण असावं? एवढ्या रात्री येण्याचा त्याचा काय उद्देश असावा? पेपरला आलेल्या, टिव्हीवर सांगितलेल्या बलात्काराच्या घटना ती ऐकून होती.

ती विचार करू लागली. असं घाबरून राहिलो तर आपणही उद्या पेपरची बातमी होऊन जाऊ? आई-अण्णानं येवडी आपल्यावर जबाबदारी टाकलीया ती पार पाडली पायजे. आता इथनं पळ काडायचा न्हायी. काय हुईल त्येला सामोरं जायाचं. आल्या संकटाला धिरानं तोंड द्यायला पायजे… खरंतर तिचं पोरपण आता सरलं होतं. विचाराला बळकटी आली होती. असे अनेक प्रसंग बाईच्या जातीला निभावून न्यावे लागतात, याची बारीकशी चुणूक आज यौवनाच्या उंबरठ्यावर असताना तिच्या वाट्याला आली होती.

विचार करता-करता तिचं लक्ष कुडाला अडकवलेल्या कोयत्याकडं गेलं. आणि लख्खकन तिच्या मनात विचार आला. त्या विचारासरशी तिने कोयता उपसला. हातात घेतला. त्याची धार तपासली. अगदी पुढं येणाऱ्या हाताचं मनगट एका घावात तुटण्यासारखी कारी धार होती त्याला. आणि कोयता चालवून ऊसाचे कंडके पाडायचा अनुभवही तिच्या गाठीशी होता.

ती पुन्हा झोपली. एक हात तिने बाळाच्या अंगावर टाकला होता तर दुसर्‍या हातात तिने कोयत्याची मूठ गच्च धरली होती. आता तिला कुणाची भिती वाटत नव्हती. मुकादमाची, कारखान्यावरच्या पोरांची, नंदूची आणि त्या अंधारातल्या अस्वलांची सुद्धा!

— समाप्त — 

©  श्री सचिन वसंत पाटील

विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली.

मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 2 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 2 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसाउजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच, तरी अंधार होईपर्यंत ती तिला तसीच दाबून ठेवते.) — इथून पुढे —

अण्णा पहाटे-पहाटे बैलगाडी जुंपून कामावर निघतो. अंतरा अंतरावर असणाऱ्या सात-आठ खोपीतला एक गडी आणि एकेक बैलगाडी. अशी वरात निघते. एकापाठोपाठ एक… त्यापाठोपाठ असणारी मुकादमाची बुलट. लांब लांब जाणारा बुलटचा आवाज… बुडबुडऽ… बुडबुडऽ… बुड बुडऽ… मग तळ रिकामा होतो. 

सुलीच्या घरातली एकुलती शेळी गाभण आहे. दिवस भरलेत तिचे. विल वाटतंय एक-दोन दिवसांत. शेळीचं बाळंतपण करण्यातही सुली तरबेज आहे. त्याची चिंता तिला नाही. पण ढिम्म् दुपार तिला खायला उठते. तळावर क्वचित कोणी माणूस. शेरडू, करडू, दुभत्या गायीम्हशी. एखांदी म्हाताकोतारी बाई. जनावरांच्या उसाबरीसाठी राह्यलेली. एवढेच सोबती.

शेरड्यांची उसाबर आवरल्यावर सुलीला भर दुपार उदास, एकलकोंडी वाटते. वारा गप्प गप्प होतो. वातावरण गुढगंभीर राहतं. मधेच एखादं शेरडीचं करडू आईच्या आठवणीनं कातर होऊन ओरडतं नि गंभीर दुपारच्या पोटात कुणीतरी सुरा खुपसल्यासारखं वाटतं. उगी मन अस्वस्थ होतं. काही सुचत नाही. कुठं जावावं? कुणाबरोबर बोलावं? सुली कंटाळते. हळूहळू दुपार टळते. उन्हं मवाळू लागतात. मग कारखान्यावरली उंडगी पोरं मोठ्या रस्त्यावरून हेलपाटे घालतात. पानपट्टी भोवताली टोळकं करून मावा खावून पिचीपिची थुकत बसतात. जातायेता खोपीत कुठं कोण दिसतंय का तपासून बघतात.

अलीकडं एका टोळक्याला सुलीचा शोध लागलाय. वाटेवरून तिरकं तिरकं बघत ती हेलपाटे घालतात. सुली दिसताच तोंडात बोटं घालून शिट्ट्या मारतात. विनाकारण गाडीचा हाॅर्न वाजवतात. अलीकडं त्यांचा त्रास खूपच वाढलाय. कधी कुठलं हिप्पीवालं पोरटं येऊन हात धरंल सांगता येत नाही. पण सुली घरात कुणालाच सांगत नाही. बोलत नाही. वाटेवरल्या पोरांच्या नजरेपासून लपत-छपत त्रास सहन करत रहाते. घरातलं सैपाकपाणी, जनावरांची उसाबर करत रहाते. अण्णाला काही कमी पडू देत नाही.

गावाकडं हुती तवा सुलीची आज्जी म्हणत होती, “पोरगी न्हातीधुती झालीय अण्णा.. अवंदा उजवून टाक.. ज्याचं धन जाऊंदे त्याच्या घरी!” 

तिनं लगोलग तेंच्याच टोळीतला एक नवरा मुलगा शोधून काढला. आज्जीच्या भणीकडनं लांबणं पावन्यापैचा संमंद होता. नंदू त्याचं नाव. सहा फुट उंचीचा नंदू आडदांड होता. ओबडधोबड हातपाय आणि भरीव मनगट असलेला ह्यो बापय खडबडीत तोंडाचा होता. अंगावर, हाता-पायांवर भरपूर केस होते. काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं. ऐन पंचवीशीतील नंदू कामाला वाघ होता. पहाटे पहाटेला कोयता घेऊन शेजंला भिडला की टण-दीड टण ऊस आडवा केल्याशिवाय मागं हटत नव्हता. हेच्या कोयत्याचा फडात कायम पयला नंबर. कोयता घेऊन ह्यो फडातनं बाहेर निघाला, की बारकी पोरंटोरं त्याला घाबरायची.

सुलीही त्याच्यापासून दबूनच असायची. त्याचे तांबरलेले डोळे बघितले की तिला भीतीच वाटायची. नवरा म्हणून काय, पण तो तिला शेजारी म्हणूनही आवडत नव्हता. उभ्या आयुष्यात ती त्याच्याशी कधी बोलली नव्हती. आजीची अशी समजूत होती की, तो कामाला वाघ आहे. त्याच्या मागं पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला दोन-दोन बायका पुरत नाहीत. पाण्यागत पैसा मिळवील त्यो. राणीगत ठेवील पोरीला. अशी आज्जीची समजूत होती.

जोडीदार कसा असावा याचीही तिने काही मनातल्या मनात स्वप्ने बघितलेली. नवरा मुलगा गोरागोमटा. उंचापुरा. भरदार छातीचा. मानेवर केस रूळणारा. नाका-डोळ्यानं देखणापान असावा… असं तिला वाटत होतं.

आज्जीनं, नंदूच्या स्थळाची गोष्ट एकदा अण्णांच्या कानावर घातली. नंदूबद्दल ती गुणगान गाऊ लागली. तर अण्णा म्हणालं, 

“अाजून कुठं मोठी झालीय ती, ल्हान पोरच हाय!”

“ल्हान का असतीया, हिच्याबरोबरीच्या पोरी बगजा.”

“नेमापरमाणं अठरा वरसं तरी हुंदेल. जाऊंदेल अजून दोन पावसाळं!”

त्यावर आज्जी म्हणाली, “हिच्याबरोबरच्या पोरी बगजा. लग्नं हून दोन-दोन पोरंबी झाली तेंनला!”

“जगाचं काय असायचं ते आसुंदे, माज्या पुरगीचं लगीन वय पुरं झाल्यावरच हुईल!” असं अण्णानी निकराचं सांगितल्यावर आज्जी पुढं काय बोलणार? गप्पच झाली ती. 

खूप खूप बरं वाटलं सुलीला. बापाच्या मयेनं गळा दाटून आला. कसायाच्या तावडीत घावलेलं कोकरू हातातनं सुटावं आणि लांब जंगलात पळून जावावं, तसं सुलीला वाटलं.

आठ वाजून गेले असावेत. अजून कसा आला नाही अण्णा? फडावरलं कोणच गाडीवान आल्यालं न्हाईत खरं. त्यामुळं गाड्या खाली झाल्या नसाव्यात… निदान मुकादम तरी फटफटीवरून यायला पायजे होता. काही निरोप-बिरोप घेऊन. त्योबी अजून आलेला नाही!

मांडीवर झोपलेल्या आपल्या धाकल्या भावाला थोपटत, त्याचे मऊसर केस कुरवाळीत सुली विचार करीत होती. बाळाला आता झोप लागलेली. तरी वेळ जावा म्हणून ती त्याला थोपटीत होती.

आजूबाजूच्या खोपटातल्या चुली विझत चालल्या होत्या. क्वचित कुठे हालचाल जाणवत होती. बोलण्याचा आवाज बंद झाला होता. दारापाठीमागली शेळी रवंथ करीत खाली बसली होती. तिने आता डोळे मिटले होते. चुलीवर ठेवलेली चिमणी एकाकी जळत होती. वाऱ्याच्या झुळकेवर तिची ज्योत आळोखे-पिळोखे देत होती. तीही आता आळसावली होती.

पोराला हाथरूण टाकायला म्हणून सुली आत गेली. कुडाशेजारची सप्पय जागा तिने निवडली. खाली पडलेलं खुरपं आणि कोयता तिने कुडाच्या कामठ्यात अडकवून ठेवला. खाली अंथरलेल्या पटकुरावर तिने एक मऊमऊ दुपटं अंथरलं. आणि त्यावर बाळाला घातलं. 

लांबनं कुठूनतरी बुलटचा आवाज येत होता. हळूहळू तो मोठा होऊ लागला. बुडबुडऽ.. बुडबुडऽ.. बुड बुडऽ… सुलीनं वाकून खिडकीतनं बघितलं. काळ्यामिट्ट अंधाराला चिरत बुलटचा फोकस पुढंपुढं सरकत होता. गाडीच्या आवाजावरनं सुलीनं ताडलं. ही मुकादमचीच गाडी हाय. उगीच घाबरल्यागत झालं तिला. ती चुलीजवळ जाऊन बसली. बाहेरचा अंदाज घेऊ लागली.

गाडी आली ती सुलीच्या दारातच येऊन उभी राह्यली. बाहेरून हाळी आली, 

“सुलेऽ.. ये सुलेऽ…!” 

पहिल्यांदा तिनं हाक ऐकून, न ऐकल्यागत केलं. पुन्हा दोन-तीन हाळ्या आल्या. आता बोललंच पाहिजे. ती वाकून पुढे झाली. दाराच्या वर्तुळातून तिचे दोन डोळे मांजरागत चकाकले. भितभित तिनं विचारलं, 

“कोण हाय त्ये!” 

“आगं मी हाय, मुकादम! तुझ्या अण्णाला यायला उशीर हुईल. टायर फुटलीया गाडीची. सकाळपतूर हुईल दुरूस्त. रातभर तिथंच थांबावं लागंल. जिवून झोप म्हणून सांगितलंय त्येनं!”

“हां.. हांऽ.. बरंऽ..बरंऽ..!”

“बाकी समद्या गाड्या कशा आल्या न्हाईत मग?” न राहून सुलीनं भीतभितच विचारलं. 

“येतील आत्ता एवड्यात. ह्या मुरगळ्यावर आल्यात नव्हंका!” असं म्हणून मुकादमानं गाडीला किक मारली. आपल्या खोपीपशी जाऊन तो थांबला.

आता अण्णा सकाळीच येणार, रात्रभर आपुन खोपीत एकटंच, या धास्तीनं सुलीच्या अंगाचा थरकाप उडाला. यापूर्वी कधीच आसं झालं नव्हतं. अण्णा नसलं तरी आई हमखास घरात असायची. त्यामुळं तिला निर्धास्त वाटायचं. पण, अशी वेळ कधी आली नव्हती. ती घाबरून गेली. पाय थरथरू लागले. काय करावं? आजच्या दिवस शेजारच्या कुणाच्यातरी खोपीत झोपायला जावावं का? पर आपली खोप, जनावरं वार्‍यावर सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला झोपाय जावावं. त्यात ती शेरडी एक व्याला झालीया. कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 1 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 1 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

सूर्य बुडाला. अंधार अस्वलाच्या पावलांनी आला आणि कारखान्या शेजारच्या फडकऱ्यांच्या खोपटास्नी मिठी मारून बसला. सांजवारा सुटला. वाऱ्यानं खोपटांवरचा चघाळा घोंगड्याच्या दशा हलाव्यात तसा हलू लागला.

गाड्या फडातनं भाईर काढून बाया कधीच्या परतल्या. धारापाणी, सैपाक करून, जेवनखाण आवरून झोपायच्या तयारीला लागल्या. खोपटाच्या अंगणात बसून सुली लहानग्या भावाला थोपटत होती. थोपटता-थोपटता तिचं विचारचक्र सुरू झालं… अजून कसं आपलं अण्णा आलं नाहीत? गाड्या लवकर खाली झाल्या नसत्याली? का कारखान्याची मिलच बंद पडली आसन्? एवढा कसा उशीर?

सोळा-सतरा वर्षाची सुली. फडकऱ्याच्या घरात शोभत नव्हतं असलं सौंदर्य. उकीरड्यावर वावरी उगवलेल्या आंब्याच्या सोनेरी रोपागत. तरतरीत, तजेलदार अंग. सोन्याहून पिवळं. मुळचाच सुबक रेखीव बांधा. गुलाबाची लहानशी कळी उमलून रूप यावं. हिरव्या पानांत, काट्याकुट्यांत उठून दिसावं, असं देखणं रूप. हे रूप बघून नकळत आजूबाजूच्या सगळ्या नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. ताठ मान आणि चालताना नकळत घडणाऱ्या डुचमळत्या हालचाली. सारंच देखणं. आगळंवेगळं. कारखान्यासमोरल्या त्या कुबट, गलिच्छ तळावरच्या वातावरणापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं. चिखलाच्या राडीत सुंदर, देखणं कमळ उमलावं तशी सुली.

आज्जी आजारी असल्यामुळं सुलीच्या आईला अचानक माहेरी जावं लागलं. नकळत सगळी जबाबदारी सुलीवर येऊन पडली. न्हायतर ती आशीच अर्दालिंबू म्हणून फिरत रहायची. कधी आईबरोबर ऊसाच्या मोळ्या बांधत, वाडं गोळा करत. तर कधी अण्णांचा धारदार कोयता हाती घेऊन ती कनाकन् ऊस खापलायची. एका घावात दोन कंडकं करायची. पण, आई गावाला गेल्यामुळं आता सगळंच थांबलं होतं. एका खेळकर पोरीवर घराची सारी जबाबदारी येऊन पडलेली.

सुलीला सैपाक येत होता. कालवण कसं करावं, भाकरी कशा थापाव्या, भाताला मिठ-पाणी किती घालावं, हे तिला आईनं शिकवलेलं. आणि बाकी सारं ती आईचं बघूबघून शिकलेली होती. बाईच्या जातीची उपजत जाण तिच्या ठायी होती. घरचं काम वढता वढता चार वर्षाच्या धाकट्या भावाला सांभाळणं, हे तर तिचं रोजचंच काम. 

रानामाळात, मोकळ्या वातावरणात वाढलेली सुली. दिसायला किरकोळ. पण, कामाला काटक. घरकामात लव्हाळ्यागत लवून हलणारी. सैपाकपाणी, जनावरांची उसाबर आणि घर संभाळण्याची जबाबदारी ती पेलू शकत होती. म्हणूनच तिची आई सगळ्या घराची जबाबदारी आपल्या लेकीवर टाकून माहेराला गेली होती. तिच्या आईच्या उसाबरीसाठी.

म्हातारीनं महीना झालं हातरूण धरलेलं. लेकीचा जोसरा काढलेला. कधी कोरभर भाकरी खायाची. तर कधी नुसतीच भाताची पेजवणी. घडाघडा बोलायची. वाटायचं, आता बरं वाटंल म्हातारीला. उठंल ती ह्या आजारातनं. आता काय होत न्हाय म्हातारीला. तोवर सांजकरून आणखी जास्ती व्हायचं. एकसारखी धाप लागून राह्यलेली. खोकून-खोकून छातीचा भाता झालेला. सुपात घेऊन पाकडल्यावानी वरला जीव वर नि खालचा खाली. भिरमिटल्यागत बडबडायची… ‘पावलांचा आवाज येतोय, कोणतरी मला न्ह्याला आलंय!’ असं म्हणायची. मग म्हातारी भोवतीनं लेकी, सुना, नातवंडं कोंडाळं करून बसायची. आत्ता जीव जातोय का मग जातोय… म्हणूनच सुलीची आई असा ऊसतोडणीचा सिझन मधीच सोडून माहेरी गेलेली.

सकाळी लवकर उठून अण्णाला फडावर जावं लागतं. मग सुली, घर-अंगण स्वच्छ झाडून, लोटून काढते. घर कसलं, पालापाचोळ्याची खोपच ती. पण, अण्णांनी त्यासाठी चांगलं कष्ट घेतलेलं. खोपीसाठी काठ्या-चिवाट्या आणि पटकुरांचा कौशल्यानं वापर केलेला. मोठाले येळू चिरून कामठ्या बनवलेल्या. दोन कामठ्यामधे ऊसाचा पाला भरून कुडासाठी छानशा झापी तयार केलेल्या. सुलीच्या आईनं, शेणामातीच्या काल्यानं भिंती लिंपून गुळगुळीत केलेल्या. अण्णानं खोपीत पाणी गळू नये, म्हणून खतांची मोकळी पोती टाकलेली. त्यावरनं निवडणुकीच्या डिजिटलची ताडपद्रीसारखी पट्टी टाकलेली. चारी बाजूनं गच्च आवळून बांधलेली. वाऱ्यानं उडून जाऊ नये म्हणून त्यावर छोटे-छोटे दगड ठेवलेले. तारेचे कट घातलेले. एक माणूस कसातरी वाकून आत जाईल, असं एक लहानसं दार ठेवलेलं. त्याला लावायलाही एक सुंदर छोटी झापडी. आत उजेड येण्यासाठी चौकोनी भसका पाडलेली एक खिडकी ठेवलेली. पावसाचं शितूडं आत येऊ नये, म्हणून तिला बाहेरून एक जाड प्लॅस्टिकचा कागद लावलेला. या खिडकीमुळं खोपीच्या आतलं सगळं बाहेरच्या उजेडासारखं लखलखीत दिसे. चुलीजवळ स्वयंपाक करता-करता जरा वाकून त्या खिडकीतून बाहेर बघता येई. कुणी आल्या-गेल्याची चाहूल घेता येई. दूरवरचंही दिसे. अगदी कारखान्याच्या गेटसमोरल्या मोठ्या रस्त्यावरची वर्दळसुद्धा दिसे. त्या खिडकीतून पुन्हा पुन्हा डोकावून बघणे, हा सुलीचा छंदच झाला होता.

झाडलोट झाल्यावर सुली, बैलं बांधलेल्या जागचं शेण गोळा करायची. त्याचा शेणकाला करून घर-अंगण सारवून काढायची. उरलेल्या शेणाच्या गोवऱ्या थापायची. अण्णानं रानातनं आणलेलं जळाणकाटूक आणि या गोवऱ्यावर त्यांचा स्वयंपाक आरामशीर होई.

अलीकडं या सुंदर घरात माणसांची वर्दळ जरा जास्तच वाढलीय. टोळीचा मुकादम हटकून घराकडं येतो. तो तरुण आहे. त्याचं लग्न झालं असलं तरी त्याची बायको त्याच्याजवळ रहात नाही. त्याची नजर चांगली नाही. निदान सुलीला तरी तशी वाटते. त्याच्याकडं बुलटगाडी आहे. तिच्यावरनं तो ऐटीत फिरत असतो. बाकीच्यांपेक्षा त्याचे कपडे स्वच्छ असतात. तो आला म्हणजे अण्णांबरोबर अंगणात तासन् तास गप्पा मारीत बसतो. आतबाहेर करणार्‍या सुलीवर डोळा ठेवून राहतो. तिच्या नाजूक हालचाली टिपत राहतो. अण्णा त्याला काही बोलत नाहीत. त्यांना हे कळत नाही का? की त्याच्यालेखी आपण एक अजाण पोर. तो एक करता-सवरता बापय. त्यात मुकादमाकडून अण्णांनी बरीच उचल घेतलेली आहे. हिशोबा-ठिशोबाच्या कामाचं निमित्त त्याला पुरेसं असतं. कधीमधी तो खिशातला मोबाईल काढून त्यावर जोरजोरात बोलत रहातो. दहा हजार… वीस हजार… लाख… असे मोठमोठाले आकडे तो ऐकवीत असतो.

तो घरात आला की सुलीच्या हालचालींवर मर्यादा येतात. काहीवेळा तर तो सकाळी उठल्या-उठल्याच येतो. मग अण्णा त्याच्यासाठी सुलीला चहा करायला सांगतात. चहा करून दिल्यावरही तो हलत नाही. बिडी फुकत उगी हिकडच्या-तिकडच्या गप्पा हाणीत रहातो. तो आत्ता जाईल, मग जाईल सुली वाट पहात रहाते.

तो जास्त वेळ थांबलाच, तर मग सुलीला आंघोळपाणी करणंही अवघड होऊन बसतं. कधीकधी ती बिन आंघोळीचीच रहाते. तर कधी भीत-घाबरत कुडाच्या झापडी पलीकडे अर्धेमुर्दे अंग ओले करून घेते. पहाटे परसाकडला जातानाही तिच्या मनावर प्रचंड ओझं असतं. भोवतालच्या अंधारात काळी अस्वलं आपल्यावर झडप घालण्यासाठी टपलीत, असं तिला सारखं वाटत रहातं. कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसाउजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच, तरी अंधार होईपर्यंत ती तिला तसीच दाबून ठेवते.

– क्रमशः भाग पहिला

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 2 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆

? जीवनरंग ?

☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 2 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆ 

 (मागील भागात आपण पाहिले – खोट्या अभिमानापायी  तुला तुझ्या प्रिय माहेर पासून मी तोडलं आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय, आपण सगळेच बाबांकडे जाऊ, मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनाने मला माफ करतील. आता इथून पुढे)

पण तुमचा स्वभाव असा बनायला काहीतरी कारण झाले  असेल ना? असं जन्मापासून काही कोणी माणूस रागीट नसतो.मुड चांगला असलेला बघुन  मी यांना विचारलं, लहानपणापासून आई बाबा आणि मी तिघांचं कुटुंब होतं त्यामुळे मी म्हणेन तेच आणि तसेच घरात होत असे.  बाहेरच्या जगामध्ये आवाज चढवल्या शिवाय किंवा आवाज चढवून बोलल्याशिवाय कुणाला आपली कदर नसते हे माझ्या लक्षात आलं. आणि तोच माझा स्वभाव होऊन गेला. नंतर नंतर सगळे आपल्या रागाला भितात ह्याचाच एक प्रकारचा मला प्रकारचा कैफ मला चढू लागला .माझा तर तो स्वभाव कधी बनून गेला ते माझं मलाही कळले नाही.पण आज मात्र मी तुझी क्षमा मागेन. आपण बाबांकडे नक्की जाऊ.पण या लॉकडाऊन मुळे आम्ही जाऊ शकलो नाही .आणि मग तर काय माझी आणि त्यांची साथच सुटली.       

‘आई, खरंच ग कसं समजावलस ग मनाला? भरून आलेले डोळे पुसत शरयुने विचारलं ,माझा नवरा चेष्टेत जरी मला काही बोलला ना तरी मी नाही सहन करू शकत.

अगं,बेटा, माझ्या माहेरच्या रम्य आठवणी तर माझ्याबरोबर सतत असतात .मनाला वाटेल तेव्हा मी माझ हे गाठोडे सोडून बसते कधी हसू येतं तर कधी आसू. आज चाळीस वर्ष झाली माहेर सोडून त्यांची काही खबरबात मला  नाही. तेव्हा आमचा खूप मोठा जुन्या पद्धतीचा वाडा होता.सारी समृद्धी होती .दाराशी गुर होती, शेती होती, आता काय आहे? कस आहे कोणाला ठाऊक?आज  तुमच्याशी बोलून छान वाटलं बर का मुलांनो, शेखर आज माझी नेहमीची गोळी दे बर. मधमाशांच्या पोळ्याला खडा लागावा तसे झाले आहे .हे आठवणींचे मोहोळ सुखाने झोपू देणार नाही. नुसती तगमग होत राहील त्यापेक्षा गोळी घेतलेलीच बरी.     

त्यानंतरचे काही दिवस शेखर शरयू स्नेहा सारखा लॅपटॉप घेऊन बसत होती ,एकदमच एवढ कसलं काम आलय कोण जाणे?आणि चार-पाच दिवसांनी  शेखर संध्याकाळी ऑफिस मधून आल्या आल्या मला आणि स्नेहा ला म्हणाला चला ,”आपल्याला देव दर्शनाला जायचे आहे.शरयू आणि ओंकार पण येणार आहेत. तरी पण एवढ्या उन्हात ?मुल लहान आहेत त्यांना त्रास होईल.मी बोलायचा प्रयत्न केला. नको ग आई ,आधीच खूप उशीर झालाय आता आणखी उशीर नको गाडी आहे  आपली काही त्रास होणार नाही. आता कोणी फाटे फोडू नका .मला रजा पण मिळाली आहे चार दिवसांची. उद्या पहाटेच निघू या.

मला तर या मुलांच काही कळतच नाही .परवा मी आठवण केली तर म्हटला ,सध्या जरा जास्त काम आहे नंतर बघू आणि आज अगदी गडबड करतात. लगेचच दुसऱ्या दिवशी प्रवासाची जय्यत तयारी करून आम्ही सगळे बाहेर पडलो खूप  दिवसांनी प्रवास करत असल्यामुळे मी गाडीचा, एसी चा त्रास होऊ नये म्हणून गोळी घेतली आणि मला प्रवासाची छान गुंगी चढू लागली मुलांवर सारं संपून मी खुशाल झोपेच्या स्वाधीन झाले .

आई, उतरायचे ठिकाण आले ग .शेखर मला उठवत होता एवढी कशी मेली झोप लागली म्हणून मी  चुटपुटत उठले. गाडीतून उतरायला स्नेहाने हात दिला माझा हात तिच्या हातात होता, आणि एका वाड्यासमोर मी उभी होते .आजूबाजूचा परिसर बदलला असला तरी ज्याचा ठसा कायम मनावर होता तो वाडा मी कसा बरं  विसरेन ?हे बहुदा स्वप्नच असेल .मी स्नेहाचा हात अजून जोरात दाबला तिला म्हटलं ,चिमटा तरी काढ मला,कसले कसले भास होतात, अजून झोपेत  आहे की जागी झाले तेच काही कळत नाही.

‘आई. अहो खरंच आहे. ‘

भव्य असा वाडा, व्यवस्थित तेलपाणी पॉलिश केलेला छान दरवाजा आज फुलमाळांनी सजवला होता. वाड्याचं दार अगदी रिमोट कंट्रोलने घडल्यासारखं अलगद उघडले. आणि दारात माझे वृद्ध आई-वडील माझ्या बहिणी भावजया भाऊ उभे होते चांदीच्या ताम्हनातील चांदीच्या निरांजनाने ओवाळून आम्हाला आत घेतले. त्या आधी थरथरत्या हाताने आईने भाकरतुकडा ओवळून पायावर पाणी घातलं, पाण्याच्या त्या डोळ्याला झालेल्या स्पर्शाने मी भानावर आले आणि आईच्या कुशीत कधी शिरले तिच्याशी काय बोलले मला काही आठवत नाही .सगळ्यांचेच डोळे ओलावले होते .घरातले सगळे माझ्याभोवती बसले होते. गप्पा काही संपत नव्हत्या आणि डोळेही वारंवार भरून भरून येत होते .तेवढ्यात भावजय गरम-गरम खमंग थालीपीठ त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबत रव्याचा भरपूर नारळ घातलेला लाडू असा नाश्ता    मोठ्या प्रेमाने आली. माझे डोळे थालीपीठ आणि लाडू बघूनच पुन्हा भरून आले मी आईकडे पाहिले. तिने नजरेनेच मला गोंजारलं , इतक्या वर्षानंतरही माझी आवड लक्षात घेऊन आईने माझी आवड जपली होती.

‘सासूबाईंना आता  काही काम होत नाही पण तुम्ही येणार म्हणून हे लाडू खास तुमच्याकरता त्यांनी स्वतः केले बर का  वहिनी म्हणाली, मी शेखरकडे पहिलं त्याच्या डोळ्यात हसू मावत नव्हतं .माझ्याकडे येऊन तो म्हणाला तुझी कहाणी ऐकून रहावलं नाही बघ आज-काल मोबाइलमुळे जग खूप जवळ आले त्यामुळे शोध घेणे ही अगदी सोप्पं होतं.बाबांच्या कपाटात मामांचे पत्ते होते ते शोधले , संपर्क केला एकदा येऊन ही गेलो आणि तुला आश्चर्यचकित करायचं सरप्राईज द्यायचं ठरवलं. आई ,खुश ना? अरे हे काय विचारणं झालं ?ग्रीष्माच्या काहीली नंतर वळवाची सर यावी ना तसं वाटतंय. उद्या चैत्रगौरीचे हळदीकुंकू करायचे आहे बर का वन्स. मांडणी तुमच्या पद्धतीने तुम्हीच करायची आहे आम्ही मदतीला आहोतच. तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही हळदीकुंकू करत होतो पण आरास मांडणी मात्र  फारशी नाही. सासुबाई म्हणायच्या ,”माझी गौर रुसली आहे. ती आली की मोठी आरास करून करू हळदीकुंकू.’

प्रत्येक जण काही ना काही प्रस्ताव माझ्यापुढे ठेवत होता आणि सुखाच्या सरीने मी चिंब चिंब भिजत होते इतकी वर्ष कोरडेपणाने काढलेल्या उन्हाळ्यामुळे हा हळवा पाऊस मी शोषून घेत होते आणि तृप्त तृप्त होत होते.

– समाप्त –

© सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे

मो. –  9762271250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 1 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆

? जीवनरंग ?

☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 1 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆ 

आई, अगं कुठल्या विचारात हरवली आहेस एवढी? तुझी तब्येत तर बरी आहे ना? रोज मी ऑफिसमधून येतो तेव्हा तू बागेत असतेस आणि आज गाडीचा हॉर्न ऐकूनही तुझ्याकडून काहीच कसा प्रतिसाद नाही? गाडीतून उतरून फाटक उघडून मी तुझ्या पर्यंत आलेलही तुला कळलं नाही?  काय झालं सांग की ग, डोळ्यात पाणी का ग ?स्नेहा काही बोलली का तुला सांग लवकर माझा जीव घाबरा झाला आहे.

अरे ,शेखर  मला बोलू देशील तर ना? किंचित हसत नलिनीबाई म्हणाल्या, ‘तुझ्या प्रश्नांची सरबत्ती थांबेल तेव्हा मी काही बोलेन ना. आणि माझी स्नेहा नाही  हो कधी काही मला बोलत. आज पाच वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण आमच्या दोघीत कधीतरी काही कुरबुर झाल्याचं ऐकलं तरी का?’

‘अगं मग  झालं तरी काय? तू अशी उदास का ?आणि डोळ्यात पाणी का?’

‘ही कातरवेळ जीवाला खूप हुरहुर लावून जाते बघ. रमले होते जुन्या आठवणीत आणि डोळे कधी भरून आले लक्षातही आले नाही .काळजी करण्यासारखं काहीच झालं नाही खरच!’    

‘आई, तुम्हाला बाबांची आठवण झाली का? त्यांना जाऊनही  आता वर्ष होईल.’ स्नेहाने कडेवरच्या छकुलीला खाली उतरवत विचारलं.     

‘ खरं सांगू का यांची आठवण नाही आली मला. माझ्या माहेरची, आई-बाबांची ,तिथल्या सगळ्यांची आठवण आली आणि डोळे वाहू लागले.’

‘आई , आज पर्यंत बाबांच्या धाकामुळे तू आम्हाला आमच्या आजोळबद्दल कधीच काही सांगितलं नाहीस, मे महिन्याच्या सुट्टीत माझे सारे मित्र आजोळी जायचे पण मला आणि शरयूला हे सुख कधीच अनुभवायला मिळाले नाही.’

‘आई, आज तरी आम्हाला सांग ना असं घडलं तरी काय? प्लीज सांगा ना मन मोकळं कर’.     ‘शेखर, स्नेहा तुम्ही म्हणताय तर सांगीन मी माझ्या माहेर विषयी पण त्याआधी आपण सारं आवरून घेऊ. ही छकुली मग झोपेला येईल . मलाही  आठवणींचा कप्पा क्रमवार लावायला जरा वेळ मिळेल.’

‘अरे जावई गेलेत टूरवर शरयू पण इकडेच येणार आहे  रात्री. तेव्हा दोघांनाही एकदमच सांगते .नाहीतर तुला एकट्याला सांगितले म्हणून रुसु बाई रुसुन बसेल लहानपणासारखी.’ 

काय सांगेल आई? या प्रतिक्षेत दोन तास कधी निघून गेले कळलंच नाही. आई लवकर ये. सगळं काही आटपल आमचं. स्नेहा, शरयू मुले झोपली ना? या पटकन तुम्ही दोघी पण.’

शेखर,” अरे मोठा झालास तू आता एका मुलीचा बाप झालास, एवढा उतावीळपणा शोभत नाही हो. किंचित हसत नलिनीबाई म्हणाल्या.

‘आई ,गेली कित्येक वर्ष मला हे ऐकायची उत्कंठा होती. आता नाही धीर धरवत. हो की नाही ग शरयु?

‘हो ग आई ,खरय दादा म्हणतोय ते.

आमच्या लग्नापासून या कहाणीला सुरुवात झाली. चारचौघींसारख ठरवून आमचं लग्न झालं .मुलाला उत्तम सरकारी नोकरी, राहता बंगला, सुस्वभावी असे सगळे गुण असणार्याव या स्थळात एक उणीव म्हणजे मुलाचे आई-वडील दोघेही एका अपघातात नुकतेच निवर्तले होते .आणि त्यांच्या शिवाय मुलाला कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते. मुलगा एकटा होता .मुलाला बाकी कुटुंब नसलं, तरी आता आपण सगळेच  त्याचे कुटुंबीय या विचाराने माझ्या बाबांनी या स्थळाला हो म्हटलं. आईची कुरकुर चालली होती की एक तर मुलीला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल आणि तिचे कोडकौतुक  पण काही होणार नाही .पण शेवटी माझ्या बाबांनी तिला समजावलं. मी तर काय काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते, मला हे मनापासून आवडले होते.  सगळ काही ठरलं म्हणजे माझ्या बाबांनी ठरवलं.मी सासरी यायला निघाले म्हणजे वरातीची तयारी झाली होतीच. वातावरणातील सकाळचा उत्साह कमी होऊन काहीशी उदासी आली होती .हा ताण कमी व्हावा या उद्देशाने यांच्याकडे माणसेच कशी नाहीत ,नातेवाईक  नाहीत यावरुन  कोणीतरी चेष्टेत काहीतरी बोलले.  बोलण्याच्या भरात ही चेष्टा वाढत गेली., तसतसा यांच्या रागाचा पारा चढत गेला यांचा प्रचंड तापट स्वभाव मला त्या वेळी प्रथम कळला. हे एक तापट माझे बाबा सातपट  तापट.तिकडे दुर्वास तर इकडे असतील तर  इकडे जमदग्नी ! शब्दाने शब्द वाढला, मस्करीची कुस्करी झाली .शेवटी ह्यांनी मला पुढे बोलावले आणि म्हणाले ,”नलिनी झाला प्रकार तू पाहिला आहेसच. तुला सासरी यायचं नसेल ,माझ्या बरोबर संसार करायचा नसेल, तर तो निर्णय तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर घे .मात्र एक निश्चित लक्षात ठेव की आता घेशील हा माहेरचा शेवटचा निरोप असेल. मी तर पुन्हा इथे पाऊल टाकणारच नाही. पण तुलाही  इथे कधी  येऊ देणार नाही. आत्ता या क्षणी तू निर्णय घेऊ शकतेस. पण एकदा निर्णय घेतला की माघार नाही .मंडपात एकदम शांतता पसरली.आईने मला गच्च मिठी मारली आणि  डोळ्याला पदर लावत ती क्षणार्धात आत निघून गेली .वडिलांनीही थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला ,अश्रूंच्या पडद्यामुळे आम्ही एकमेकांना नीट पाहू ही शकलो नाही. तेही आत निघून गेले .माझ्या ताई ,माई आपल्या पती राजांसह रडू दाबत उभ्या होत्या .एकोणीस वीस वर्षाच माझं वय आणि एवढा मोठा निर्णय मला क्षणात घ्यायचा होता. लग्न तर झालं होतं आणि आई-बाबा आत निघून गेल्यामुळे त्यांचा विचार अप्रत्यक्षपणे मला कळला होता. त्या वेळची सामाजिक परिस्थिती ,मनावर झालेले संस्कार त्यामुळे मी परिस्थिती ओळखून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि आमची वरात सासरी आली .बाकी स्वभाव म्हणशील तर उत्तम पण एकदा राग आला की कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नसत .राग थंड झाला की चूक मान्य  करून काहीच उपयोग नसे  होणारी गोष्ट तर होऊन गेलेली असे. त्यांचा मूड कशावरून बिघडेल हे ही सांगता यायच  नाही.  त्यांच्या त्या तापट स्वभावाचे खूप चटके मी सुरवातीच्या काळात सहन केले. एरवी स्वभावाने लाख असणारा हा माणूस पण हा विषय काढला की कठोरात कठोर होत असे. त्यांचा शब्द मात्र त्यांनी अगदी आयुष्यभर पाळला. मला कशाची कमी पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली माझ्यावर, तुमच्यावर, या घरावर, अमर्याद प्रेम केलं.

माझ्या बाबांनी, दादाने, भाऊने माझ्या दोघी बहिणीनी दिलजमाईचे खूप प्रयत्न केले .पण कशाचा काही उपयोग झाला नाही. लग्नानंतर वर्षाच्या आतच मला दिवस गेले, त्या वेळेला आईला भेटायची अनिवार तहान मला लागली होती .पण ते घडलेच नाही. यांच्याकडे पोस्टात टाकायला दिलेली पत्र त्यांची आलेली पत्र मला परवा यांचे कपाट आवरताना लॉकर मध्ये मिळाली, तेव्हा मला हा सारा उलगडा झाला .

या शरयूच्या लग्नानंतर मात्र हे खूप उदास असत .मी कारण विचारलं तर माझा हात हातात घेऊन  रडायलाच लागले. वयानुसार स्वभावातला रागीटपणाही  खूप कमी झाला होता .”मला म्हणाले तू न केलेल्या शुल्लक गोष्टीची सजा मी तुला आयुष्यभर देत आलो”. तुझ्या जागी दुसरी कोणी कजाग बाई असती तर तिने केव्हाच आपलं वचन मोडले असतं. आज माझ्या लेकीचं लग्न झाल्यावर मला कळतय, काळजाचा तुकडा काढून देणे म्हणजे काय ,शरयूच्या सुदैवाने तिचे सासर ,माहेर नांदत गोकुळ आहे. पण तू हे सारं कसं सहन केलंस? मी स्वतःला एवढ संवेदनशील समजतो, पण तुझे दुःख ,तगमग मात्र मला कळत असूनही मी न कळल्या सारखा दाखवलं .,आणि खोट्या अभिमानापायी  तुला तुझ्या प्रिय माहेर पासून मी तोडलं आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय, आपण सगळेच बाबांकडे जाऊ ,मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनाने मला माफ करतील.

क्रमश: १

© सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे

मो. –  9762271250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग 3 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग 3 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

(मागील भागात आपण पाहिले – “त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”  आता इथून पुढे)

आता श्रीकांत विचार करू लागला. तसे पाहिले तर सुजाता पाहिल्या पाहिल्या नाकारण्या–सारखी मुलगी नव्हती. या दोन दिवसातले तिचे वागणे देखील मर्यादाशील होते. त्या सुरेखासारखी ती सतत पुढे पुढे करीत नव्हती. कॉलेजमध्ये ती हुशार आहे. तिच्या आई-बाबांची तिला काळजी आहे. वाह्यात खर्चाची मुलगी दिसत नाही. तिच्या बाबांच्या बाजूने विचार केला तर त्यांची काळजी चुकीची नाही. आप्पांकडून त्यांनी कांही मागणे हेदेखील अनाठायी नाही. अन्यथा आम्ही त्यांचे कांही देणे लागतो , हे नाकारणार कसे ? अरे, तो रिक्षावालासुद्धा वेळेला त्यांच्या उपयोगी पडतोय. असे असेल व आप्पाना ठरविले असेल की ‘यशवंतांच्या वेळेला उपयोगी पडुया ‘  तर ते व्यवहार सोडून नाही.  हां …. लगेच लग्न झाले तर माझे पुढचे शिक्षण कदाचित लांबेल, थांबेल किंवा मेरिटमध्ये होणार नाही. त्याचा त्रास मला आयुष्यभर होईल. त्यामुळे लग्नाला मान्यता द्यावी व दोन वर्षे थांबायला सांगावे, हे उचित होईल. असा विचार करीतच श्री उठला व रमेशला बोलला की ‘चल, घरी जाऊ.’

श्रीकांत घरी आला व सर्वाना म्हणाला, ” माई, आप्पा आणि काका, कांही गोष्टी तुम्ही समजून घ्या. माझे शिक्षण अजून दीड वर्षे शिल्लक आहे. नोकरी मिळायला सहा महिने जातीलच. त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभे राहायला अजून दोन वर्षे तरी जाणार आहेत. त्यामुळे आणखी दोन वर्षांनी मी हे लग्न करेन. तोपर्यंत सुजाताचे शिक्षण ही संपेल. ज्या प्रामाणिकपणाने आप्पानी रुपये परत केले त्याच प्रामाणिक वर्तणुकीचा हवाला देऊन मीही काकांना वचन देतो की मला नोकरी लागल्या लागल्या मी सुजाताशी लग्न करीन . पण सुजाताची तशी तयारी आहे का व मी तिला मान्य आहे का हेही तिने माझ्यासमोर सांगितले पाहिजे. ”

सगळेच गप्प बसले. कारण श्रीकांत कांही खुसपटे काढून लग्न दोन वर्षे पुढे ढकलू शकतो हे दोघांनीही आधीच ओळखले होते . त्यावर काय बोलायचे व त्याचे मन वळवायचे याचे उत्तर कोणाकडे नव्हते. कदाचित सुजातालादेखील श्रीकांतचे बोलणे पटले असते. पण ही मोठी माणसे तिला कांही चॉईस देतील याची शक्यता नव्हती. माईला घरी कामाला मदत करणारी सून हवी होती. आप्पाना सुनेला नोकरीला पाठवायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसे होते. तिच्यात दुसरी खोटदेखील नव्हती. त्यामुळे श्रीला लग्नासाठी तयार कारणे आणि एकदम कमी खर्चात मंगल कार्य त्वरित  उरकणे एवढीच प्राथमिकता दोघांकडे होती. यशवंत काका सुद्धा थोडे दु:चित होऊन बसले. श्रीकांतने त्याच्या पुरता हा प्रश्न सोडविला होता. ही रात्र मात्र त्याच्यासाठी झोपेचे खोबरे झाल्याची होती. तिसऱ्या दिवसाचा सकाळचा नाष्टा शांत शांत झाला. कोणी फारसे बोलले नाही. सुजाताला यातले बहुतेक कांहीच माहीत नव्हते. त्या दिवशी दोघांचीही कॉलेजिस सुरू होती. त्यामुळे दोन दोन लेक्चर्स अटेंड करून आम्ही दोन तासात परत येतो असे सांगून दोघे कॉलेजला पळाली. त्यावेळी आकरा वाजले असतील. गप्पा चालू असतानाच यशवंत काकांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. रिक्षा आणायला श्रीकांतलाच पळावे लागले. तो चौकात आला व त्याला ती त्यांची नेहमीची रिक्षा दिसली. त्याने पटकन ‘यशवंत काकांना दवाखान्यात न्यायचे आहे’ असे सांगितले व रिक्षा घेऊन आला . रिक्षावाल्याला तो दवाखाना माहीत होता. ते दवाखान्यात गेले. डॉक्टर्सनी परत इसीजी काढला. तो काकांना आलेला दुसरा अटॅक होता. सिव्हीयर नव्हता, पण दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. डॉक्टरांनी अत्यावश्यक इंजेक्शन देऊन त्यांना झोपविले होते. कांही औषधे आणावी लागणार होती. रिक्षावाला अजून थांबला होता. त्याने पटकन जाऊन औषधे आणली. तोपर्यंत सुजाता आणि रमेश देखील दवाखान्यात आले. डॉक्टरनी संध्याकाळी काकांना डिस्चार्ज दिला खरा, पण त्यांना त्रास होईल, टेंशन येईल असे कोणी वागू नका असे त्यांनी बजावले. काकांनी जिने चढू नयेत किंवा उतरू नयेत हे सांगायला डॉक्टर विसरले नाहीत. थोडक्यात काकांची तब्येत हा त्या फॅमिलीचा कळीचा मुद्दा असणार आहे , हे श्रीकांतने ओळखले. कदाचित रात्री काकांना झोप नसावी व त्यामुळे त्यांना त्रास झाला असावा हीही शक्यता होती. दवाखान्यातून परत आल्यानंतर आप्पा श्रीकांतला बोललेच , “श्री, काकांना टेंशन-फ्री करणे हे केवळ तुझ्याच हातात आहे बघ. आता अशीही आणि तशीही सुजाता तुला पसंत आहे , तर आणखी दोन वर्षे थांबणे काकांवर अन्याय होतोय . मान्य आहे की लग्न लगेच झाले तर तुम्हा दोघांना दोन वर्षे तुमची मने मारावी लागणार आहेत. पण मग मी कशाला आहे? ती घरात म्हणजे आपल्या गावात तर थांबणार आहे व तुझे शिक्षण आम्ही करतोय ना ? माझ्या मित्राच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हे समजून घे रे ! “

श्रीकांत कांहीच बोलला नाही. मात्र विमनस्कपणे बाहेर गेला. ही मोठी माणसे मुलांकडून कशाकशाची अपेक्षा ठेवतील व इतरांबरोबर स्वतःला त्रास करून घेतील हे सांगता येत नाही , असे त्याच्या मनाने घेतले. तो बाहेर देवडीवर बसला असताना त्याला  सुजाता येताना दिसली. ” कांही नाही , शेजारी पाण्याची गरम पिशवी आणायला चाललेय.” ती बोलली व झपाझप पुढे गेली. श्रीकांतच्या डोक्यात आले की सुजाताच्या मनात काय आहे हे तिला विचारावे. पिशवी घेऊन आलेल्या सुजाताला त्याने थांबवले व “थोडा वेळ बैस” ,बोलला. ती पण अवघडून थोडे अंतर ठेवून बसली . श्रीकांतला नियतीचे हसू आले. “असे किंवा तसे , हिला माझी बायको व्हायचे आहे , तरीही नियती अशी लक्ष्मण रेषा का मारते?” त्याने स्वतःलाच विचारले. मात्र सुजाताला बोलला,

“कशी आहे आता काकांची तब्येत?”

“खूपच काळजी घ्यावी लागणार आहे.” ती खाली मान घालून बोलली.

“होय, खरे आहे,” श्रीकांत म्हणाला, ” पण हे असे किती दिवस ?”

” माझ्या लग्नाचे बाबांनी टेन्शन घेतलेय,” ती बोलली.

” म्हणजे तुला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत तर….?”

“होय, मी कांही आता लहान नाही. योग्य वयात मुलीचे लग्न व्हावे असे कोणत्या बाबाला वाटणार नाही? त्यात त्यांचा हा हार्टचा आजार. त्यांनी कोणावर भरोसा ठेवायचा? घरात आर्थिक तंगी आहेच. आता तर आजीच्या पेन्शनवर घर चाललेय. बाबाना त्यांच्या डोळ्यासमोर माझे लग्न व्हायला हवेय. तुम्ही इथे यायच्या आधी ते दररोज असेच बोलत असायचे. असेही म्हणायचे की तुझे लग्न मी ठरविले आहे गं. पण स्वतंत्र विचार करणाऱ्या तुम्हा मुलांवर अन्याय कसा काय करायचा? ” तिने सांगितले.

“बस्स … तुला एवढेच माहीत आहे? ” श्रीकांतने विचारले.

” म्हणजे ? तुम्हाला काय म्हणायचे आहे काय ? डॉक्टरनी आणखी कांही वेगळे सांगितले आहे काय ? ” तिने शंका घेऊन विचारले.

“अं … हं …! आजाराबद्दल नव्हे , मी लग्नाबद्दल विचारले.

“तुम्ही सांगा ना ?” तिने प्रश्नार्थक चेहरा केला.

“तुझ्या माझ्या लग्नाबद्दल . तुझ्या बाबांनी माझ्या आक्काच्या लग्नात आप्पाना पैसे देताना तुझ्या माझ्या लग्नाचे सूतोवाच केले होते. …..” श्री बोलला .

“अहो, हा तुमच्यावर अन्याय आहे. तुम्ही नका मान्य करू. आधी शिक्षण संपू दे. नोकरी किंवा व्यवसाय सुरू होऊ दे. आणि तुमच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करा.” ती चकित होऊन बोलली.

“तुला मी पसंत नाही का? “

“तसे नाही हो. चुकीचा अर्थ नका घेऊ. मी तर खुश असेन हो…, पण संसाराच्याही प्रायोरिटी असतात. मुलांच्याही असतात आणि मुलींच्याही.  त्यात अशा भावनांचा गुंता नको.”

” अगं पण …. हे मोठे लोक प्रेशर आणतील. त्यावेळी तू ‘नकार’  देशील?

“तुम्ही द्याल का ? ” तिने साशंकतेने विचारले.

“आजपर्यंत मी आप्पांचा शब्द खाली पडू नाही दिला . खूप कष्टातून त्यांनी मला पुण्याला इंजिनिअरिंगला टाकतेय. त्यामुळे मी आप्पांच्या प्रस्तावाला नकार नाही देऊ शकणार. कदाचित तुझ्या लग्नाची चिंता मिटल्यामुळे काकांची तब्येत सुधारेल. औषधांना रिस्पॉन्स मिळेल. काकांना कांही कमी जास्त झाल्यास आप्पा त्यांना व मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. फार अवघडून गेलोय मी.” श्रीकांत बोलला.  

सुजाताच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ‘आपल्या बाबांसाठी हा तरुण स्वतःचे भविष्य पणाला लावतोय’ ही बाब तिच्यासाठी असाधारण होती. “हे पहा,” ती म्हणाली , ” माझ्या बाबांचा तुम्ही एवढा आत्मीयतेने विचार करताय. मला तर गुदमरल्यासारखे झालेय. मी एवढंच सांगते की मला तुम्ही तुम्हाला पाहिल्या दिवसापासून खूप आवडला आहात. आता तर अधिक आदर आणि अभिमान वाटतोय. तुम्ही जसे सांगाल तशी मी वागेन. तुम्हाला शिक्षण संपवून नोकरी लागेपर्यंत मी तुमच्याकडे ना कांही मागणार, ना कोणता हट्ट करणार , ना कसली तक्रार करणार. ना हॉटेल, ना सिनेमा, ना फिरणे, ना साड्या …. मी कसलीच मागणी करणार नाही. आप्पा व माईंच्या मी आज्ञेत राहीन. सध्या माझे बाबा हीच माझी प्रॉयोरिटी आहे. मी यापेक्षा अधिक कांहीच सांगू शकणार नाही.” आणि मुसमुसतच ती घरात पळाली.

श्रीकांतच्या मनातील मळभ दूर निघून गेले होते. त्याचा चेहरादेखील किंचित प्रसन्न झाला होता. सुजाता त्याच्या अपेक्षेपेक्षाही मॅच्युअर होती. तिचा तिच्या बाबांवर खूप जीव होता. असे म्हणतात की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने आधीच स्वर्गात बांधलेल्या असतात. त्याचे प्रत्यंतर त्याला येत होते. त्याच्या भविष्याची कदाचित हीच मुहूर्तमेढ होती व म्हणून त्याने वडगाव ते बडोदा असा ध्यानी, मनी, स्वप्नी नसलेला प्रवास केला होता, यावर त्याने मनातल्या मनात शिक्का मारला आणि अचानक होणाऱ्या किंवा झालेल्या लग्नाबद्दल कॉलेजातील मित्रांना कसे तोंड द्यायचे? याची तो उजळणी करू लागला.

–  समाप्त 

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग 2 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग 2 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

(मागील भागात आपण पाहिले –  यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते. आता इथून पुढे –

दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यावर दहाच्या दरम्यान तिथला लक्ष्मी-विलास पॅलेस पाहायला जायचे होते. आप्पाना त्यात फार औत्सुक्य नव्हते, मात्र श्रीकांतला तो पहाण्यात खूप उत्सुकता होती. रमेश आणि सुजाता दोघेही बरोबर होते. काकांमुळे या दोघांनाही इथले कांही कर्मचारी ओळखत होते. काकांच्या त्या घरापासून अर्धा कि. मी. आत अंदाजे चारशे-पाचशे एकरातील निसर्गरम्य परिसरातील तो लांबीला अंदाजे पाचशे फूट , रुंदीला दोनशे फूट आणि तितकाच उंचीला असलेला प्रशस्त महाल म्हणजे जाणत्याना पडणारे एक स्वप्न असावे इतका तो देखणा होता. कांही कांही वास्तूंचे शब्दात वर्णन अशक्य असते, बस्स …पाहायचं आणि जेवढं डोळ्यात सामावेल तेवढं स्मृती पटलावर कोरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा , एवढं करणं शक्य होतं. आप्पा तटस्थपणे पहात होते, माई विस्मयाने पहात होत्या व श्रीकांत जे दिसतंय त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करीत होता. भारतीय, पर्शियन आणि इटालियन वास्तुकलेचा अद्भुत संगम असा तो महाल होता. आतून त्यांच्या नियोजित वापराप्रमाणे शैली व बाहेरून बव्हंशी इटालियन शैली असावी असे श्रीकांतला वाटले. सुजाता व रमेश त्यांना जे माहीत होते ते सांगत होते , पण त्या ऐकीव इतिहासाच्या पलीकडील ती बांधलेली, ठेवलेली, तासलेली, रंगविलेली कलाकृती होती. तिथल्या दर्शनीय वस्तू श्रीकांतने केवळ पुस्तकातून वाचलेल्या होत्या. नाही म्हणायला राजा रविवर्मा यांनी पुरुष आकारात साकारलेली व भिंतीवर माउंट केलेली धार्मिक चित्रे सर्वांच्या मनाचा ठाव गाठून गेली. धावत धावत सगळ्या तलवारी, भाले, स्टेच्यु, मूर्ती, वॉल हँगिंग, चित्रे, दगड, धोंडे, खडे, पुस्तके, राजांच्या वंशावळींचे माउंटिंग, सादर केलेली मांडणी, तिथली अनेक दालने, सगळे सगळे  पाहायला अडीच ते तीन तास लागले. जेंव्हा सर्वजण बाहेर आले, तेंव्हा  एखाद्या जादूनगरीतून आल्यासारखे त्या सर्वांना झाले. घरापर्यंतचे जाणे आणि दुपारचे भोजनदेखील लक्ष्मी-विलास च्या चर्चेत संपले.

सायंकाळी पाच वाजता चहा झाल्यानंतर आप्पानी एका गंभीर विषयाला तोंड फोडले. श्रीकांतच्या ध्यानी मनी नसलेला तो विषय होता. आप्पा बोलले ,

“श्रीकांत, आपण फक्त यशवंतला भेटायला आणि बडोदा पाहायला आलेलो नाही, तर आठ वर्षांपूर्वी तुझ्या आक्काच्या लग्नात ठरविलेले एक महत्वाचे वचन निभावायचे आहे व ते तुझ्या आयुष्याशी संबंधित आहे. खरे म्हणजे त्यासाठी आपण आलोय .”

श्रीकांतच्या कांहीच लक्षात नाही आले. तो थोडा सावरून बसला. यशवंत काकांनी सुजाताला व रमेशला  तिच्या खोलीत जायला सांगितले. त्यानंतर माई बोलली, ” श्रीकांत, त्यावेळी आम्ही खूपच अडचणीत होतो. यशवंत भाऊजी पुढे आले नसते तर आक्काचे लग्न मोडल्यात जमा होते. त्यांनी मदत केली हे खरेच, पण त्यावेळी ते सहज बोलून गेले की माझे पैसे मला परत मिळणार याची खात्री आहे. पण मला व्याज नको आहे. योग्य वेळी श्री साठी माझी मुलगी तुम्ही सून म्हणून पदरात घ्या. आम्ही यावर कांहीच बोललो नाही. मात्र  ‘ज्या त्या वेळी बघू ‘ असे तुझे बाबा मोघम बोलले होते. आता भाऊजी आजारी आहेत व त्यांना चिंता सुजाताच्या लग्नाची आहे. ही गोष्ट आम्हाला भाऊजीनी आधीच पत्रामध्ये कळविली होती. ‘आम्ही बडोद्याला येतो व तेंव्हा मुलांच्या इच्छेने ठरवू’ असे मोघम उत्तर तुझ्या बाबांनी दिले होते. तू दिवाळीला घरी येणार व त्यानंतर बडोद्याला यायचे त्यांनी आधीच ठरविले होते. मात्र मागील आठ वर्षात आम्हीही सुजाताला पाहिले नव्हते. आता दोन दिवस आपण एकत्र आहोत . आम्हा दोघांनाही सुजाता सून म्हणून पसंत आहे. भाऊजींचे म्हणणे आहे की श्री वर कोणताही दबाव नको. म्हणून ही बाब केवळ आपल्या पाचजणांत असेल. तू तुझे स्पष्ट मत द्यायला मोकळा आहेस. मात्र तू सर्व बाजूनी विचार करून निर्णय घ्यावास. तुझे शिक्षणाचे एक वर्ष अजून शिल्लक आहे व भाऊजीना त्यांच्या डोळ्यासमोर हे लग्न व्हावे असे वाटतेय. कारण त्यांचे हे अनिश्चित असलेले आजारपण. त्यांना स्वतःबद्दल भरोसा नाही आणि तुझ्या बाबांपुढे त्यांनी त्यांची व्यथा सांगितली आहे. तुझ्या आक्काच्या लग्नात जी आपली स्थिती होती, त्याच आर्थिक विवंचनेतून ते आज वाटचाल करताहेत. त्यांना तुझ्या बाबांकडून खूप आशा आहेत.”

सकाळच्या लक्ष्मीविलास पॅलेस च्या सुखस्वप्नातून श्रीकांतचे विमान अलगद त्याच्या संसाराच्या धावपट्टीवर उतरले. त्याच्यासाठी पटकन कांही उत्तर देणं शक्य नव्हतं. खरं म्हणजे तो त्याच्या आप्पांवर मनातून भडकला होता. पण ही गोष्ट आप्पानी किंवा माईने आधी सांगितली असती तर तो बडोद्याला आलाच नसता ! ही म्हातारी माणसे ‘आतल्या गाठीची असतात’ हेच खरे , तो मनोमन उसळला. त्याने सांगितले की ‘आप्पा, मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हो…. रमेशला घेऊन जातो.’ आणि तो बाहेर पडला. पाच मिनिटांनी रमेश बाहेर आला व तो त्याला बोलला, “अरे चल … आपण पिक्चरला जाऊ.” रमेश ‘होय’ म्हणून पुन्हा घरात गेला व बाहेर आला. आणि दोघे निघाले. श्रीकांत थोडा विमनस्क होता, पण हे रमेशला दाखवणे जरुरीचे नव्हते. भटकताना रस्ता चुकू नये म्हणून केवळ त्याने रमेशला बरोबर घेतले होते. पाच-दहा मिनिटे दोघे चालले असतील. मध्येच तो बोलला , ” रमेश, जवळपास एखादे मंदिर आहे का रे. आपण तिथे जाऊन बसू थोडा वेळ “

रमेशने रिक्षा थांबवली व बोलला , ” काका, सुर्यमंदिर ला जायचंय .” आणि रिक्षा धावू लागली. रिक्षावाले काका रमेशच्या ओळखीचे असावेत. साधारण वीस मिनिटांनी रिक्षा थांबली. पैसे न घेताच रिक्षावाले काका निघून गेले. श्रीकांतला आश्चर्य वाटले. त्याने म्हटले , “अहो…. पैसे घ्या ना ….” काका हसले व निघून गेले होते.

“दादा, काका पैसे नाहीत घेणार. बाबांनी त्यांना मागे कधी चार वर्षांपूर्वी खूप मदत केली आहे. आता बाबांना दवाखान्यात नेताना, आणताना व रात्रीही हे काका आमच्यासाठी खूप वेळ देतात.” रमेश बोलून गेला.

सूर्य मंदिर खरंच खूप छान बांधलं होतं. कोणाही नवीन व्यक्तीने खुश व्हावं. पण श्रीकांतचं मन थाऱ्यावर असेल तर ना? अजून तिसऱ्या सेमिस्टर ची लास्ट टर्म आणि बी. इ च्या शेवटच्या वर्षाच्या दोन टर्म, खिशात स्वतःची कमाई शून्य, ‘बायको’ या विषयाबाबत मित्र-मंडळींमध्ये फक्त जोक आणि जोक्स केलेले दिवस आणि आप्पा म्हणताहेत ,” लग्न कर. तेही त्यांनी आधीच ठरविलेल्या मुलीशी . साला…. हे माझे आयुष्य आहे की आप्पांची मालमत्ता …. वाटेल ते ठरवायला ? साला…. ही सुजाता , हिच्या काय मनात आहे कुणास ठाऊक ? तिलाही अद्याप खूप शिकायचे असू शकते ना ? साला …. ही मोठी माणसे समजतात कोण स्वतःला? ” श्रीकांतच्या मनात असलेच असंबंध विचार येत होते व जात होते. रमेशबरोबर तो फक्त शरीराने होता. तो कुठेकुठे नेत होता व हा ‘देखल्या देवा दंडवत’  घालीत होता. पण सुर्यमंदिरा बाबत जे कांही रमेशने ऐकवले ते सगळे ‘नळी फुंकली सोनारे … इकडून तिकडे गेले वारे ‘  अशी श्रीची स्थिती होती . त्याने अचानक रमेशला विचारले , ” का रे , तुझ्या दीदीचे लग्न करणार आहेत हे तुला माहिती आहे काय? “

“बाबा आजारी पडल्यापासून सारखे हेच म्हणताहेत व त्यामुळे दीदी खूप गंभीर असते. बाबा आजारी पडल्यापासून तिने हसायचेच थांबवले आहे. तुम्ही घरात आल्यापासून बाबांच्या चेहऱ्यावर आम्हाला ‘हासू’ दिसले. नाहीतर ते गप्प गप्प असतात. त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”

क्रमश: भाग २

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

श्रीकांत कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात होता. साल होते १९७४. त्याची पाचवी सेमिस्टर झाली व दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या. ड्रॉईंग, सबमिशन आणि स्टडीच्या जंजाळातून थोडासा मोकळा झालेला श्रीकांत आपल्या गावी म्हणजे वडगावला परतला. त्याला खरे म्हणजे या सुटीत  पाच-सहा दिवस मस्त झोप, खूपशी विश्रांती आणि शिवारातील शेतात मनसोक्त हुंदडायचे होते व अभ्यासाचा थकवा उत्साहात बदलायचा होता. तसे तो ठरवूनच गावी आला होता. पण ‘माणूस घडवितो आणि देव बि-घडवितो’ अशी एक इंग्रजी म्हण श्रीकांतने वाचली होती. त्याचे प्रत्यंतर त्याला आपल्या घरी नेमके याच दिवाळीला येईल , ही अपेक्षा नव्हती.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुगंधी तेल व उटणे लावून अंघोळ झाली , फराळ झाला आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे आप्पानी त्याला विचारले,

“श्री, किती दिवस सुट्टी आहे रे ?”

“आप्पा , परीक्षा संपवून आलोय. त्यामुळे चांगले तीन आठवडे सुट्टी आहे . सुट्टीत मी शेतात काम करायचे म्हणतोय. ” श्रीकांत बोलला.

“ते ठीक आहे. पण परवा भाऊबीजेला तुझ्या आक्काकडे जाऊन ये. तिच्यासाठी व तुझ्या भाचरांसाठी कपडे आणलेत, तेच ओवाळणीला टाक. वाटल्यास एखादा दिवस रहा व लगोलग परत ये. माझा बडोद्याचा दोस्त यशवंता आजारी आहे व त्याला भेटायला मला जावे लागणार आहे. लांबचा पल्ला आहे व मी रेल्वेतून प्रवास नाही केलेला. तुला माझ्या सोबत यावे लागेल. तुझी आई तयार असंल तर तिला पण घेऊन जाऊ या. आलं का लक्षात ? “

” होय आप्पा, जाऊ या की. पण खर्च खूपच होईल. मी येईन बरोबर.” श्रीकांत बोलला.      

“आधी ते भाऊबीज तर करून ये. मग बघू कधी निघायचं ते .” आप्पा बोलले व तो विषय तिथेच थांबला.

श्रीकांत भाऊबीजेला आक्काकडे जाऊन आला. तिथे भाऊजीसकट सर्वांना त्याने कपडे दिले. आक्काने पण दुपारी गोडधोड आणि रातच्याला मस्त मटणाचा बेत केला. दुपारी आणि संध्याकाळी आग्रह करायला आक्काची नणंद सुरेखा होती. नुकतीच बारावी झालेली व नाकीडोळी नीटस , पण सावळ्या रंगातही उठून दिसणारी ती श्रीकांतच्या बळेच पुढे पुढे करीत होती. त्याची आक्कापण त्यासाठी तिला प्रोत्साहन देत होती. सगळ्यांच्या आग्रहाखातर तो भाचे कंपनीला घेऊन तिच्याबरोबर भाऊजींचे शिवार देखील बघून आला. थोडक्यात त्याचा वेळ झकास गेला. दुसऱ्या दिवशी त्याने आक्काला बाय बाय केले, पण बाकीच्यांच्या पेक्षा सुरेखाच जास्त वेळ हात हलवीत होती हे कांही त्याच्या नजरेतून सुटले नाही. बोलण्याचा ओघात त्याने आक्काला सांगून टाकले होते की आठवड्याच्या शेवटी माई आणि आप्पांच्या बरोबर तो बडोद्याला आजारी यशवंत काकाकडे जाणार आहे.

त्याच्या बहिणीला त्याबद्दल फार आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. ती काकांना श्रीकांतपेक्षा अधिक ओळखत होती व तिला ते काका आवडत ही होते. तिच्या लग्नात याच काकांनी पुढे होऊन आप्पाना खूप आर्थिक मदत केल्याचेही तिला माहीत होते. त्यामुळे सगळेजण काकांचा मनापासून आदर करीत होते.

श्रीकांत परत गावी आला व त्याने आक्काची , भाऊजींची खुशाली आप्पाना , माईला सांगितली. त्यावेळी आप्पा बोलले, ” यशवंत काका आजारी आहेत. तुझ्या आक्काच्या लग्नात यशवंत ने पुढे होऊन मला रुपये दहा हजार दिले होते. त्यामुळे तर आक्काचे हे मालदार स्थळ मला निभावता आले व तिच्या आयुष्याचे सोने झाले. यशवंतला त्याचे पैसे परत करण्यासाठीच आपण जातोय. त्याच्या बऱ्याच ऋणातून मला मोकळे व्हायचे आहे.”

श्रीकांतला बऱ्याच ऋणाचा अर्थ नाही समजला पण हे पैशाचे डिटेल्स आजच समजले. आक्काच्या लग्नावेळी तो दहावीत होता व पैशाचे व्यवहार त्याला कोणी सांगीत नव्हते. त्यावेळी नुकतीच दहावीची परीक्षा झाली असल्याने आक्काच्या लग्नात त्याने भरपूर मजा केल्याचे त्याला आठवत होते. यशवंत काकाही त्याला बाबांचे एक चांगले दोस्त म्हणून व लग्नात त्यांनी आप्पाना मदत केली होती म्हणून आवडत होते. काकांची सासुरवाडी बडोदा होती. तिथल्या गायकवाड वाड्यात त्यांचे सासरे कामाला होते व त्यांनी यशवंत काकांनादेखील तिथे नोकरी लावली होती. आता त्यांचे  सासरे नव्हते व त्या सर्व कुटुंबाचा भार यशवंत काकांवर होता. जे थोडेफार त्याच्या कानावर होते ते एवढेच होते. बडोद्याला माई-आप्पाना घेऊन जायचे म्हणजे पुण्याहून डायरेक्ट अहमदाबाद रेल्वे नव्हती. पुना ते मुंबई आणि मुंबई ते बडोदा असा प्रवास करणे आवश्यक होते. रिझर्वेशन करून गेल्यास कांही त्रास नव्हता. श्रीकांतने आप्पाना विचारून घेतले व पुण्याच्या मित्राला सांगून चार दिवसानंतरची तीन तिकिटे रिझर्व्ह केली. थोडक्यात सर्वांचा बडोदा प्रवास निश्चित झाला.

काकांचा आकरावीतील मुलगा रमेश त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला आला होता. घरी जाण्यासाठी रमेशने टांगा ठरविला होता. टांग्यातून ते घरी निघाले. श्रीकांतसारखा उंच, गोरा व बडबड्या रमेश श्रीकांतला आवडून गेला. त्याच्याकडून सर्वाना समजले की काकांना दवाखान्यातून घरी आणले होते . घरी काका, काकी, काकीची आई, रमेश आणि त्याची एक वर्षांनी मोठी असलेली बहीण सुजाता असे पाचजण होते. त्याचे घर चांगले पाच खोल्यांचे होते. गायकवाड वाड्यात यशवंत काकांना मान होता. अर्थात त्याला कारण काकांचे सासरे व दोघांचे प्रामाणिक काम होते. सरकारांच्या नियमानुसार मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार करीत होते व त्यामुळे सुजाता आणि रमेश उत्तम शिकत होते. सुजाता आता कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. ती हुशार होती व घरी काकीना खूप मदतही करीत होती. तसे बडोद्यात मराठी बोलणारे लोक सरकार वाड्याच्या परिसरात बरेच होते. त्यामुळे तिथे कोणास परके वाटत नव्हते. हे सर्व श्रीकांतला रमेशने त्याच्या बडबड्या  व मोकळ्या स्वभावास अनुसरून टांग्याच्या घोड्याच्या टापांच्या आवाजात न विचारता सांगितले होते. श्रीकांतची व रमेशची गट्टी व्हायला त्यामुळे वेळ नाही लागला. टांग्यातून जाताना थोड्या अरुंद दहा-बारा फुटी रस्त्याने टांगा चालला होता. रस्त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीच्या इमारती होत्या. जवळजवळ वीस मिनिटे झाल्यानंतर टांगा एका प्रशस्त रस्त्यावर आला. ही बहुतेक उच्चभ्रू लोकांची वस्ती असावी. चार-पाच मिनिटात टांगा एका प्रशस्त प्रवेशद्वारातून आत गेला. समोर दोनशे फूट अंतरावर एक वाडासदृश इमारत व त्याच्या दोन्ही बाजूला छान राहण्यासाठीच्या इमारती होत्या. त्यातील मोठ्या वाड्यापासून दूर असलेल्या इमारती जवळ टांगा थांबला. या इमारतीत देखील चार-पाच कुटुंबे रहात असावीत. इमारतीच्या बाहेर एक गोरटेली मुलगी साडीमध्ये उभी होती. रमेश बोलला, “माझी ताई तुम्हा सर्वांची बाहेर वाट पाहतेय . बहुतेक बाबांनी तिला पाठवले असावे “

टांग्यातून सगळेजण उतरले. रमेश व सुजाताने त्यांच्या सामानाच्या दोन बॅगा घेतल्या. श्रीकांतने दोन घेतल्या. माई आणि आप्पा सुजाताच्या मागोमाग निघाले. त्या इमारतीतील दोन नंबरच्या दरवाजातून सगळे आत गेले. आत यशवंत काका व काकी उभे होते. काकींच्या आई जुन्या लाकडी खुर्चीवर बसल्या होत्या. नमस्कार, क्षेम-कुशल झाल्यानंतर प्रवासाचा शीण घालवण्यासाठी हात-पाय धुणे झाले. चहा व कांदापोहे झाले. श्रीकांत आणि अप्पांची बॅग रमेशच्या खोलीत गेली. माईंची बॅग सुजाताच्या खोलीत गेली. काकीनी पाणी गरम करून ठेवले होते. आंघोळीची खोली एकच होती. त्यामुळे सर्वांची आंघोळ वगैरे आटोपायला चांगला दीड तास गेला. यशवंत काका व आप्पा बऱ्यापैकी बोलत बसले होते. श्रीकांतची आंघोळीची पाळी येईपर्यंत त्याने एक डुलकी घेतली, नंतर फ्रेश झाला , आंघोळ केली, नवीन स्वच्छ कपडे बदलले आणि तोही यशवंत काकाबरोबरच्या बोलण्यात सामील झाला. आता चांगले चार-पाच दिवस तिथेच काढायचे होते, ते कसे जाणार ही एकच चिंता त्याच्या मनात घर करून होती. बोलण्याच्या ओघात काकांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचे व त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजले. कदाचित ऑफिसातील बैठ्या कामामुळे असेल, पण त्यांना दिलेल्या गोळ्यांवरून  त्यांची तब्येत नाजूक असावी असा कयास बांधता येत होता. सुजाता आणि रमेश दोघेही अभ्यासात हुशार होते. सुजाता बी कॉम.च्या पहिल्या वर्गात होती व रमेश आकरावीत होता. बारावीत मेरीटमध्ये येऊन त्याला इंजिनीअर व्हायचे होते. आप्पानी श्रीकांत समोर काकांना त्यांचे दहा हजार रुपये परत केले व त्यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. बडोद्याला आल्याचे मुख्य काम असे पूर्ण झाले होते. पहिला दिवस असा ओळखी, विश्रांती आणि एकमेकांचे क्षेमकुशल यातच गेला. यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते.

क्रमश: भाग १

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ करामत… ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ करामत…  ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

शाळा सुटली ; पण नेहमीसारखी धमाल करावीशी वाटेना. कोणाबरोबर बोलावंसंही वाटेना. मग मी मित्रांना सोडून एकटाच निघालो.

तसं तर अधूनमधून आईचं आणि आजीचं भांडण होतच असतं. पण कालचं भांडण मात्र खूप मोठं होतं.

आता शनिवारी आजी-आजोबा गावच्या घरी राहायला जाणार.

मला आजी-आजोबा खूप आवडतात. आई-बाबांएवढेच.

आईबाबा रोज सकाळी ऑफिसात जातात, ते रात्री घरी येतात. दुपारी शाळेतून आल्यावर आजीआजोबांना बघितलं, की मला खूप बरं वाटतं. कितीही दमलो असलो, कंटाळलो असलो, तरीही मग मी शहाण्या मुलासारखे बूटमोजे काढून कोपऱ्यात ठेवतो, दप्तर जागेवर ठेवतो. कपडे बदलून युनिफॉर्म हँगरला लावतो. हातपायतोंड स्वच्छ धुतो. मग आम्ही तिघं जेवायला बसतो.

मला भेंडीची भाजी आवडत नाही, हे आजीला बरोब्बर ठाऊक आहे. म्हणून ती मला थोडीशीच भाजी वाढते. ती मी पटकन खाऊन टाकतो.

तर आता मला रडूच येतंय. सोमवारपासून मी घरी गेल्यावर आजीआजोबा नाही दिसणार.

कसं मिटणार त्यांचं भांडण? मी तर एवढुस्सा आहे. काहीच करू शकणार नाही मी. आईला सांगायला गेलं, तर ती मलाच ओरडणार आणि आजीशी बोलायला गेलं, तर ती म्हणणार, “बाळा, लहान मुलांनी मोठ्यांच्या मध्ये बोलू नये.”

ठीक आहे.आहे मी लहान. पण मला वाटलं –  सगळ्यांनी एकत्र राहावं, तर चूक आहे का ते?

तेवढ्यात आठवण झाली. सकाळी आई चिडून बडबडत होती, “या भांडणांनी डोकं नसतं थाऱ्यावर. शिवाय ऑफिसमधून यायला उशीर झालेला. मग लक्षातच नाही राहिलं, त्यांची औषधं आणायचं. इथे आहेत, तोपर्यंत आपली जबाबदारी आहे. तिकडे गावाला गेल्यावर त्यांनाच उठून जायला लागणार, तेव्हा कळेल.”

मी दूध पित होतो. एकदम मला सुचलं, “आई, मी आणू आजीची औषधं?”

“आणशील तू? बरं झालं. म्हणजे त्यांच्या दुपारच्या गोळ्या चुकणार नाहीत. हे घे पैसे. आणि हे प्रिस्क्रिप्शन. आणि उरलेले पैसे….”

“आई, मी उरलेल्या पैशांतून सुतरफेणी आणू आजोबांसाठी?”

आई काहीच बोलली नाही. म्हणजे ती ‘नको’ म्हणाली नाही. म्हणजे सुतरफेणी घ्यायची.

तर मी औषधांच्या दुकानात गेलो. काकांनी दिलेली औषधं नीट बघून घेतली. आईने मागे सांगितलं होतं, तसं त्यावरच्या तारखापण बघितल्या. बिलावरची बेरीज, उरलेले पैसे… सगळं मोठ्या मुलासारखं बघून, तपासून घेतलं.

मग शेजारच्या मिठाईवाल्याकडे गेलो. तिथे सुतरफेणी घेतली.

आजोबांना फक्त मऊ पदार्थच खाता येतात. घट्ट पदार्थ खावेसे वाटले, तरी ते खाऊ शकत नाहीत. सुतरफेणी तर त्यांची एकदम आवडती.

मी कधीकधी आजोबांना विचारतो, “आजोबा, मी तुम्हाला आवडतो?”

ते म्हणतात,”होsss.”

मग मी विचारतो, “किती?”

मग ते सांगतात, “खूssप.”

मग मी म्हणतो, “असं नाही, आजोबा. खूप म्हणजे किती, ते सांगा.”

मग आजोबा मला जवळ घेतात, माझा पापा घेतात आणि म्हणतात, “तू मला खूप खूप आवडतोस. अगदी सुतरफेणीपेक्षाही जास्त.”

आज मी त्यांना सांगणार आहे, “मी तुम्हाला सुतरफेणीपेक्षा जास्त आवडतो, ना? मग मला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघंही इथेच राहा.”

मी घरी गेल्यावर बघितलं, तर आजी जेवायला वाढत होती. माझ्या ताटात खूप भेंडीची भाजी घातली होती. अगदी बटाट्याच्या भाजीएवढी. मग मी ठरवलं, आज भेंडीची भाजी असली, तरी सगळी भाजी खायची. नाहीतर आजीला वाईट वाटेल.

तेवढ्यात औषधांची आठवण झाली.

“आजी, ही घे तुझी औषधं.”

“अरे, तू आणलीस?”

“हो गं. काल आईला ऑफिसात खूप काम होतं ना? म्हणून तिला उशीर झाला आणि ती दमलीही होती. त्यामुळे औषधं आणायची राहिली. आज दुपारच्या गोळ्या चुकतील ना, म्हणून तिने मला आणायला सांगितलं. आणि हे बघ. आजोबांना आवडते, म्हणून तिने सुतरफेणी आणायला सांगितली.”

आजीच्या डोळयांत पाणी आलं.

“तशी गुणी आहे रे तुझी आई. ऑफिसमध्ये खूप काम, जबाबदारी, जाण्यायेण्याची दगदग…. दमून आल्यावर चिडचिड होते माणसाची. खरं तर, मीच समजून घ्यायला पाहिजे. आता नाही हो भांडायची मी.”

“मग तू इथेच राहशील ना? गावाला नाही ना जाणार?”

आजी काहीच बोलली नाही.

“आजी ss,”मी तिचा दंड धरून तिला हलवलं.

तरीही ती गप्पच होती.

“आजी, नको ना जाऊस मला सोडून.”

“नाही रे सोन्या. तुला इथे सोडून गेले, तर माझं लक्ष तरी लागेल का तिकडे? शिवाय मी गावाला गेले, तर ऑफिसातून आल्यावर घरातलं काम, तुझा अभ्यास…. सगळं तुझ्या आईवर, एकटीवर पडणार. झेपणार नाही रे तिला. तुझ्या बाबांना तर अजिबातच वेळ नसतो…”

आजीआजोबा इथेच राहणार, म्हणून मला एवढा आनंद झाला, की मला भेंडीची भाजीसुद्धा आवडली. मी आणखी मागून घेतली.

जेवून झाल्यावर हाततोंड धुतलं, तेवढ्यात आईचा फोन आला.

मग मी आईला सांगून टाकलं, “आई, आई, आजी म्हणत होती, तू खूप गुणी आहेस म्हणून. ती मला सांगत होती, तुला ऑफिसात किती काम असतं, जबाबदारीचं….”

“हो रे. त्यांना जाणीव आहे त्याची. कौतुकही आहे. माझंच चुकतं. मी उगाचच भांडत बसते त्यांच्याशी. यापुढे लक्षात ठेवीन मी आणि भांडणार नाही अजिबात.”

“मग आजीआजोबा गावाला…..”

“नाही, नाही. मी सांगेन त्यांना – इथेच राहा, म्हणून.”

“माझी शहाणी शहाणी आई!” असं म्हणून मी फोनवरच तिला पापा दिला.

 सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

गावातले मोठ्ठ सरकारी हॉस्पिटल. चांगलं चार पाच मजली. हॉस्पिटलच्या इमारतीवरील घड्याळतला काटा रात्रीच्या नऊ वर सरकला. तसे फ़ार काही वेळ झाली नव्हती पण बाहेर रास्त्यावर आज का कोण जाणे रात्रीचे बारा एक वाजले असावेत असे वाटणारी भयाण शांतता होती.

हॉस्पिटलच्या आत सर्व रोगी आपापल्या रूममध्ये आपापल्या कॉटवर पडले होते. काहीजण झोपी गेलेले, काही झोपण्याच्या तयारीत, काही कॉटवर बसलेल्या नातेवाईकांशी बोलत होते.

हॉस्पिटलमधल्या मोठ्या हॉल मधील  कोपऱ्यातील कॉटवर एक पेशंट अत्यवस्थ होता. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. तो पेशंट सत्तरीच्या घरात असावा. चेहरा सुकलेला. डोळे खोल खोल गेलेले.

डॉक्टर शेजारीच होते त्या पेशंटच्या. त्याला तपासायला आले असावे. कॉट शेजारच्या टेबलावर त्याचे वैद्यकीय रिपोर्ट होते. ते पाहून अधिकच गंभीर होताना दिसत होते डॉक्टर. गेले पंधरा दिवस झाले औषधे, इंजकशनाने त्याला होतं असलेल्या जीवघेण्या वेदना कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत होते.तेथेच असलेली नर्स त्या पेशंटची खूप काळजी घेतं होती.

सारे आसपासच्या कॉटवरील पेशंट, डॉक्टर आणि ती नर्स काय समजायचे ते समजून गेली होती. डॉक्टरांनीनर्सच्या कानात काही सांगितले. हळुवार पावलांनी त्यांनी वार्ड सोडला.

रिसेप्शन काउन्टरवरला फोन उचलला. टेलेफोनची डायल फिरवली……

पठाणकोट लष्करी छावणीतला  फोन वाजला.

‘ मी डॉक्टर, मोकाशी, गव्हर्मेंट हॉस्पिटल मुबंईहून बोलतोय.’

‘ हां जी, मै कॅप्टन बालवरसिंग….’

‘ बालवरर्सिंगजी  ये देखो भाई  डॉक्टर मल्होत्राको फौरन मुंबई हॉस्पिटलमे भेज दो. पेशंट सिरीयस है. ‘

बोलून फोन खाली ठेवला.

त्या वृद्धाची अवस्था खूपच  वाईट झाली होती. डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न चालला होता त्याचा. ओठ हालत होते त्याचे पण ओठातून शब्द बाहेर येतं नव्हते. आपली एहलोकांची यात्रा संपत चालल्याचे त्याला त्या अवस्थेत कळले असावे. त्याचा जीव एकुलत्या एक मुलात गुंतला होता. त्याची अखेरची भेट व्हावी वाटत असावे त्याला. त्याचा चेहरा सांगत होता हे. मरणाच्या दारात माया माणसाला अडकवून ठेवते. माणसाच्या जवळ येत त्याला बिलगते.

औषध एका प्याल्यातून नर्सने त्या विकलांग पेशंटच्या ओठाशी लावले. औषध ओठातून गळून पडले.

नर्सने मनगटी घड्याळात पहिले. रात्रीचा एक वाजला होता. वार्डच्या दाराशी हालचाल झाली. नर्सने दाराच्या दिशेने पहिले….

डॉक्टर मोकाशी एक लष्करी जवानांस बरोबर घेऊन येतं होते.

नर्सने त्या विकलांग वृद्ध पेशंटच्या अंगावरील चादर नीट केली. डॉक्टर मोकाशी व जवान दोघेजण वृद्ध पेशंट जवळ आले. जवानाने पहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा हलली नाही. चकित झाले डाक्टर आणि नर्स. आपला वडील मरणासन्न आहे हे दिसत असूनही त्याची स्तब्धता जीव कापून गेली.

काही क्षणात त्या जवानाच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.

‘ बाबा, तुमचा मुलगा भेटायला आला आहे.  ‘ म्हणत ओक्सबोकशी रडत जवान त्या पेशंटच्या अंगावर पडला.वृद्धाचा सुरकुत्या पडलेला हात आता

जवानाच्या पाठीवरून फिरू लागला.विकलांग वृद्धाच्या डोळ्यात आनंद धो धो वहात होता.किलकिल्या डोळ्यात तो विकलांग वृद्ध मुलाला साठवून घेतं होता. अस्पष्ट अस्पष्ट मुलांची आकृती दिसत असावी त्याला. त्या मुलाच्या अस्पष्ट दर्शनाने सुखावला होता तो. थरथरत्या ओठानी तो वृद्ध मुलाचे हात चुंबत होता. डोळ्यातून त्याचे दोन अश्रू टपकले  काना खालून त्या जवानाच्या  हातावर पडले

वृद्धाचे ओठ समाधानाने थरथरत होते. जवानांने आपला हात त्या वृद्धाच्या हाती दिला. वृद्धाचे डोके कपाळ कुरवाळू लागला. जवानांच्या खांद्यावरून फिरणाऱ्या वृद्ध हाताचा वेग मंदावत चालला… मंदावत .. मंदावत थाम्बला. वृद्धाने मान टाकली. जवानांने त्याचा हात वृद्धाच्या हातून सोडवला. वृद्धाकडे पहिले थोडेसे. चादर ओढून घेतली त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर.

त्या भयाण शांततेत घड्याळाची टिक टिक फक्त जीवघेणा आवाज करीत होती. वृद्धाच्या कॉट शेजारील  टेबलावरील औषधाच्या  अवाक होतं उघड्या पडल्या होत्या.

‘ सिस्टर, हा पेशंट कोण होता  ? ‘

त्या जवानांने विचारले. या प्रश्नाने त्या नर्सला धक्काचं बसला.

‘ हे काय तुमचे  वडील ना ते ? त्यांना ओळखत नाही ?

नर्सने प्रतिप्रश्न केला.

‘ नाही हे माझे वडील नाहीत. चुकीच्या माहितीमुळे मी इकडे आलो. आल्यावर मी जाणले. या वृद्धाची  काहीच मिनिटे राहिलीत. त्याला फक्त मुलाला अखेरचे भेटायचे होते. हे मला समजले. खरे सांगण्यात आता अर्थ नाही. त्यांच्या क्षीण झालेल्या दृष्टीला मुलगा ओळखता आला नाही. जवानच त्याचा मुलगा झाला.माझा हात त्यांच्या हाती दिला. हात हाती येताच समाधानाने त्याने प्राण सोडला.

जड अंतकरणाने तो जवान दवाखान्याच्या वार्डाबाहेर पडला. नर्स त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

लेखक – श्री शशिकांत हरिसंगम

वालचंदनगर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print