श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “कालची आजची अन कदाचित उद्याची गोष्ट…” ☆ श्री आशिष मुळे ☆
सांगायला माझ्याकडे
आहे एक गोष्ट
पचनी पडायला ती
आहेत महा-कष्ट
काय सांगू,
वाचून या वार्तांनी
होते मन अती विषीण्ण
अबुद्ध या लीलाधरांना
का नाही कुठलीच खंत
देवाच्या भोळ्या भक्तांना
निष्पापांत दिसत नाही देव
मेंदू-ज्वरात तयांच्या
शिजतो कोणाचा डाव
उचलाया समशेरी आज
प्रवृत्त करती काल
बळी त्यात उद्याचा
दिला जातो हकनाक
प्रवाह रक्ताचा नवयुवकांत
त्यास वळवती काही धूर्त
तापवती या युवाउर्जेस
कालचे उरले सुरले वृध्द
कधी कोणी बनवली
ती फक्त एक गोष्ट
पसरण्यास विषाणू तिचा
नाही काहीच कष्ट
ज्याला कोणी पाहिले नाही
सगळं त्याच्या भरोसे आहे
झेंड्या खाली त्याच्या
माणसाला युद्धाची खाज आहे
त्यालाही ह्यांचा आता
फार कंटाळा आला असेल
का दिला ह्यांना मेंदू
याचा पश्चाताप होत असेल
त्यापरीस ती जनावरं खरी
निसर्गाच्या चौकटीत जगतात तरी
कल्पनेत ह्यांच्या स्वर्ग अन परी
चौकटीपेक्षा ह्यांच्या तुरुंग बरी
म्हणा बोलून मी थोडीच
रया स्वर्गाची जाणार आहे
देवदुतांच्या या मेळाव्यात
फक्त सैतान मी दिसणार आहे
धर्म म्हणजे स्वप्न
की स्वप्न म्हणजे धर्म
प्रश्न हा मोठा गहन आहे
त्याचे उत्तर मात्र…
खरे त्यातच दडले आहे….
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈