ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

र. वा. दिघे

रघुनाथ वामन दिघे (25 मार्च 1896 – 4 जुलै 1980) हे ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक होते.

ते बी.ए., एलएल. बी. होते. त्यांनी पुणे व पनवेल येथे 16 वर्षे वकिली केली. नंतर ते खोपोलीजवळच्या विहारी येथे राहून लेखन व शेती करू लागले.

 ते हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल 1954-55 साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’म्हणून त्यांचा गौरव केला.

1940-45 साली र. वां. नी शेतकऱ्यांच्या कळीचे प्रश्न आपल्या लेखनातून मांडले. आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. ‘फक्त शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करा’, ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे विचार त्यांनी त्याकाळी आपल्या कादंबऱ्यांतून मांडले होते.

त्यांच्या कादंबऱ्या बहुधा ग्रामीण पार्श्वभूमीवरील असत. त्यांचे नायक शेतकरी व वारकरी असत. ते संतांच्या शिकवणीनुसार नैसर्गिक आपत्तींशी झगडा देत.

त्यांच्या साहित्यात नाट्यपूर्ण, साहसी घटना, अद्भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णन, ठसठशीत व्यक्तिदर्शन व ग्रामीण जीवन यांचे प्रत्ययकारी चित्रण आढळते.

र. वां.नी ‘पानकळा’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’, ‘पड रे पाण्या’, ‘निसर्गकन्या रानजाई’, ‘गानलुब्धा मृगनयना’ वगैरे 11 कादंबऱ्या,’सोनकी’, ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’ इत्यादी 6 कथासंग्रह, ‘माझा सबूद’, ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड'(इंग्रजी) इत्यादी 3 नाटके व ‘गातात व नाचतात धरतीची लेकरं’ हा लोकगीतसंग्रह एवढे बहुविध साहित्य लिहिले आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग. ल . ठोकळ यांनी नंतर पूर्ण केली.

त्यांच्या ‘पाणकळा’वर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला.

र. वां.च्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ हा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर यांनी लिहिला आहे.

डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र. वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून ठाकूर यांनी पीएच.डी. मिळवली.

1940 साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ व ‘र. वां.ची ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी र. वां.चा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

अशा र. वा. दिघेंचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त  त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, अक्षरनामा. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक, नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता , अशी अनेकांगी ओळख असणारे श्री. मधुकर तोरडमल यांचा आज स्मृतिदिन. (२४/७/१९३२ – २/७/२०१७)

श्री. तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासूनच झाली होती. मुंबईतल्या पोद्दार शाळेत पहिल्या दिवशी स्वत:ची ओळख करून देत असतांनाच, आपल्याला नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिकेला सांगितले. ते लक्षात ठेवून बाईंनी त्यावर्षीच्या गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, आणि त्यांनी चिं.वि.जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले-  दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनीच केला… आणि मग शाळेत असेपर्यंत गॅदरिंग किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याची  जबाबदारी दरवर्षी त्यांच्यावरच सोपवण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आधी मुंबईतच एका कंपनीत कारकूनी केली… आणि तिथून नगरला येऊन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले….  राज्यनाट्य स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा  ‘एक होता म्हातारा’ या नाटकात साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे, सगळे त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि तेव्हापासून ते अवघ्या नाट्यसृष्टीचे मामा झाले. — इथूनच पुढे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवेश झाला. प्राध्यापकी आणि नाटक ही कसरतच होती. शेवटी नाटकाला प्राधान्य देत ते पुन्हा मुंबईला आले. आणि नाट्यक्षेत्रात आपला चांगलाच जम बसवला.

‘मामा’ हेच नाव अनेकांच्या तोंडी झाल्याने त्यांनी पुढच्या आयुष्यातल्या आठवणी “ उत्तरमामायण “ या त्यांच्या पुस्तकात सांगितल्या आहेत.

त्यांचं  नाव ऐकताच लगेचच आठवतं ते “ तरुण तुर्क म्हातारे अर्क “ हे नाटक आणि त्यात मामांनी अजरामर करून ठेवलेली प्रो.बारटक्के यांची भूमिका. या नाटकाचे ५००० हून जास्त प्रयोग झाले. सुरुवातीला काही समीक्षकांनी ‘‘ सुशिक्षित-सुसंस्कृत स्त्रियांनी हे नाटक बघू नये ’’ असे जाहीरपणे सांगितले, पण त्याचा परिणाम उलटाच झाला.. रसिकांची उत्सुकता वाढली. तिकिटासाठी रांगा लागायला लागल्या. या एकाच नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग होणे ही आश्चर्यकारक गोष्टच होती. विशेष म्हणजे – त्या  दिवशी सकाळच्या प्रयोगाला श्री. बाळ ठाकरे, दुपारी श्री. ग.दि.माडगूळकर, आणि रात्री वसंत देसाई या दिग्गजांनी सहकुटुंब हजेरी लावली होती.

याचबरोबर तेव्हाच्या सुप्रसिद्ध असणा-या चार नाट्यसंस्थांतर्फे सादर केल्या गेलेल्या अनेक नाटकातूनही  त्यांनी कामे केली. ‘अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, काळं बेट लाल बत्ती’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘मत्स्यगंधा’, ‘मृगतृष्णा’ ही त्यातली काही गाजलेली नाटके होत. त्यांनी स्वत:ची `रसिकरंजन` नावाची नाट्यसंस्थाही सुरू केली होती.

आत्मविश्वास, सिंहासन आणि अशाच काही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांनाही रसिकमान्यता मिळालेली होती. ‘संघर्ष’ या दूरचित्रवाणीच्या मालिकेतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

र.धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचा आणि अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंब-यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या व्यतिरिक्त, १५ नाटके, “आयुष्य पेलतांना “ ही रूपांतरीत कादंबरी, “ तिसरी घंटा “ हे आत्मचरित्र,  असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा २००९-१० साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा नाट्यपुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले होते . २००३ ला नगरला झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते .

मामा तोरडमल या अक्षरश: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामचंद्र महादेव तथा राम बापट यांचा आज स्मृतिदिन. (१८/११/१९३१ – २/७/२०१२) .

श्री. राम बापट यांची ख्याती प्रामुख्याने एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमधील कितीतरी नेते आणि कार्यकर्ते पन्नासहून जास्त वर्षे त्यांच्या सतत संपर्कात होते. त्यातील बऱ्याच चळवळींचे आणि संघटनांचे ते स्वतः सर्वेसर्वा होते. पण पेशाने मात्र ते एक हाडाचे शिक्षक होते. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात सन १९६५ ते १९९१ इतका प्रदीर्घ काळ ते आधी व्याख्याता म्हणून , मग प्रपाठक म्हणून आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे गाजली होती. त्यांची रसाळ व्याख्याने , आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती असे त्यांच्याबद्दल गौरवपूर्वक म्हटले जायचे. तसेच “ मौखिक परंपरेचे पाईक “ असेही त्यांच्या कार्याबद्दल बोलतांना आवर्जून म्हटले जायचे.

खरं तर एक सच्चा लोकशिक्षक हीच भूमिका मनापासून स्वीकारत त्यांनी “ लोकशिक्षणाचे “ जणू व्रतच अंगिकारले होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल . समाज-सुधारणांच्या बाबतीत  “ एक समाज-शिक्षक “ म्हणून त्यांचे योगदान फार महत्वाचे होते. विशेषतः दलित ,आदिवासी , मागासवर्गीय समाज आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण , याविषयीच्या चळवळींमध्ये त्यांना जास्त रस होता. त्यांनी अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा तर दिलीच. त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचयही लोकांना करून दिला. शिक्षण , मार्गदर्शन , आणि प्रबोधन या माध्यमातून तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचा मोठा आणि मोलाचा सहभाग होता.

याबरोबरच , नाट्यशास्त्र , कला , सौंदर्यशास्त्र , संरक्षणशास्त्र , या विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता , आणि या संदर्भातही त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. त्यांच्या एकूण भाषणांची संख्या हजारातच मोजावी लागेल.

त्यांच्या असामान्य विचारशक्तीचा देशभरात लौकिक होता.

त्यांच्या लिखाणाचा विचार करता त्यांना “ एका वेगळ्या पठडीतले साहित्यिक असंच म्हणायला हवं. त्यांचे प्रकाशित साहित्य असे —-

१) “ परामर्श “ – हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांसाठी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण अशा सहा प्रस्तावनांचा संग्रह आहे, आणि या संग्रहाला “ उत्कृष्ट मराठी गद्य “ म्हणून पुरस्कार दिल गेला आहे.

२) “ राज्यसंस्था  , भांडवलशाही , आणि पर्यावरणवाद “ या पुस्तकात त्यांचे काही लेख आणि व्याख्याने यांचा समावेश केलेल्या आहे.

३) “ भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म “ १९९७ साली नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या  “ विचारवेध “ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

थोर विचारवंत म्हणून ख्यातनाम झालेल्या श्री. राम बापट यांना मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश हरि पाटील 

“कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे दुसरे सुंदर व मनोगत दृश्य नाही.”

हे विचार आहेत लेखक व कवी गणेश हरि पाटील यांचे , जे ग.ह.पाटील या नावानेच प्रसिद्ध होते.मुलांचे भावविश्व जाणून घेवून त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे आजही फुलांसारखे ताजे टवटवीत वाटते.देवा तुझे किती सुंदर आकाश,पाखरांची शाळा भरे पिंपळावरती,शर आला तो धावून आला काळ,डरांव डरांव का ओरडता, छान किती दिसते फुलपाखरू या कविता आठवतात ना ? या सर्वांचे कवी आहेत ग.ह.पाटील.

त्यांची काही पुस्तके:बालशारदा,रानजाई,पाखरांची शाळा,लिंबोळ्या,एका कर्मवीराची कहाणी,आधुनिक शिक्षण शाळा,गस्तवाल्याची गीते इ.

ग.ह.पाटील यांचे निधन वयाच्या 83 व्या वर्षी 01/07/1989 ला झाले.त्यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेत त्यांचे स्मरण करू.

☆☆☆☆☆

लक्ष्मण नारायण जोशी

ल.ना.जोशी हे ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक,ग्रंथसंपादक व पत्रकार होते.त्यांनी मॅट्रीक नंतर पशूवैद्यकशास्त्र शिक्षण घेतले.

सुरूवातीला त्यांनी ‘इंदुप्रकाश’ व ‘गुराखी’ या पत्रांतून लेखन केले.त्या काळात केलेल्या लेखनामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना तुरूंगवास भोगावा लागला.त्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले.त्यांनी विविध एकवीस विषयांवर सुमारे दीडशे पुस्तके लिहिली आहेत.

त्यांच्या लेखनाची विविधता अशी:

चरित्रलेखन: संत एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, बाजीराव,महाराणा प्रताप इ.

भाषांतरे: अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर,ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर,धर्मसिंधु,सार्थ छंदोबद्ध पुरूषसूक्त व शेक्सपियरच्या तीन नाटकांचे भाषांतर. इ

स्वतंत्र लेखन : धंदे शिक्षण,फलाहारचिकित्सा,सचित्र ब्रह्मयोग विद्याशिक्षण,लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश, विनोदलहरी, शांतिनिकेतनमाला, सुगंधी शिक्षक, वर्णजल चिकित्सा शिक्षक  इत्यादी.

याशिवाय त्यांनी अकरा कादंब-या लिहील्या आहेत.

असे हे चतुरस्त्र लेखक वयाच्या 74 व्या वर्षी 01/07/1947 रोजी निधन पावले.त्यांना जाऊन इतका काळ लोटला असला तरी त्यांच्या समृद्ध लेखनामुळे ते अमरच आहेत.त्यांच्या स्मृतीस वंदन!

☆☆☆☆☆

रामचंद्र चिंतामण ढेरे

रा.चिं.ढेरे हे मराठी इतिहास संशोधक व लेखक होते.प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.सांस्कृतिक इतिहास या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांचे अनेक संशोधकांनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत व त्यांना सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.समकालीन कागदपत्रांचा संदर्भ पाहून इतिहास संशोधन करावे असे त्यांचे मत होते.त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता.त्यात संत साहित्य,लोकसाहित्य,

लोकसंस्कृती अशा विविध विषयांचा व मराठी वाड्मयाचा समावेश होता.हा सर्व संग्रह त्यांनी अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

साहित्य संपदा :

अमृतकन्या, श्री आनंदयात्री, कथापंचक, कल्पद्रुमाचे तळी, कल्पवेल, गंगाजल, चित्रप्रभा, श्री तुळजाभवानी, त्रिविधा, नाथ संप्रदायाचा इतिहास, नामदेव-एक विजययात्रा, पुण्याई, प्राचीन मराठीच्या लोकधारा, लोकसंस्कृतीचे विश्व, विराग आणि अनुराग, इत्यादी.

माहितीपुस्तिका:

एका जनार्दनी–पैठण

श्रीगुरूंचे गंधर्वपूर–गाणगापुर

श्रीगुरूदेवदत–औदुंबर,नृ.वाडी

श्रीगोदे भवतापहरी-नासिक,त्र्यंबकेश्वर

जागृत जगन्नाथ–जगन्नाथपूरी

क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी–उज्जैन  इ.क्षेत्रांच्या माहितीपुस्तिका.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 1987 – श्री विठ्ठल एक महासमन्वय

म.सा.प.चा गं.ना.जोगळेकर 2013

पुण्यभूषण-त्रिदल फाउंडेशन.2010

महर्षि वाल्मिकी पुरस्कार–पुणे म.न.पालिका 2013

अ.भा.यादव महासंघाचा विशेष पुरस्कार2015

साहित्य सेवा सन्मान,पुणे2016

अशा या संशोधक साहित्यिकाचे वयाच्या 86 व्या वर्षी 01/07/2016 ला निधन झाले.

त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळ कोल्हटकर

बाळकृष्ण हरी ऊर्फ बाळ कोल्हटकर (25 सप्टेंबर 1926 – 30 जून 1994)हे नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते.

त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. आर्थिक ओढाताणीमुळे त्यांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते.

सुरुवातीला काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरी केली. पेशाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ हे पहिले नाटक लिहिले.

तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी 30हून अधिक नाटके लिहिली.

त्यापैकी ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचे नशीब’इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले.

‘देव दीनाघरी धावला’, ‘वेगळं व्हायचंय मला’ वगैरे नाटकेही खूप गाजली.

त्यांची नाटके भावनाप्रधान, कौटुंबिक  व मूल्ये जपणारी असत.

त्यांचे संवाद चुरचुरीत व त्यांच्या शब्दप्रभुत्वाची साक्ष देणारे असत.

त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एखाद्याचं नशीब’ व ‘आकाशगंगा’ यासारखी काही नाटके सोडली, तर त्यांच्या बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी होती.

कोल्हटकर उत्तम कवीही होते.’आई, तुझी आठवण येते’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘उठी उठी गोपाळा ‘ व अशी त्यांनी लिहिलेली बरीच गीते अजूनही लोकप्रिय  आहेत.

अशा या भाषाप्रभूला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९  जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९  जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजीराव अनंतराव भोसले (१५ जुलै १९२७ ते २९ जून २०१० )

शिवाजीराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्हयात कलेढोण इथे झाला. त्यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला वाडिया कॉलेज व कोल्हापूरला राजाराम कॉलेज इथे झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेचाही त्यांनी लाभ घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून घेतली.

फलटणयेथील मुधोजी कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय शिकवले. अवघड विषय सहज, सोपा करून ते शिकवत. पुढे याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदाची धुराही संभाळली.

शिवाजीराव भोसले उत्कृष्ट व्याख्याते होते. भारतीय तत्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविन्द, स्वामी विवेकानंद, छ्त्रपती शिवाजी महाराज इ. विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्याने देत.  विवेकानंदांचे शिला स्मारक उभारण्याच्या वेळी शिला स्मारक समितीच्या वतीने त्यांनी देशभर व्याख्याने दिली.

शिवाजीराव भोसले यांचे साहित्य

१.    कथा वक्तृत्वाची २. जागर (खंड १ आणि २) ३. दीपस्तंभ, ४. देशोदेशीचे दार्शनिक    ५. मुक्तिगाथा महामानवाची,  ६. यक्षप्रश्न, ७. स्वामी विवेकानंद, ८. हितगोष्टी

पुरस्कार, मान-सन्मान

१.    आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार, २. सातारा भूषण, ३. फलटण भूषण ४. विद्याव्यास पुरस्कार, ५. रोटरीचा जीवन गौरव पुरस्कार, ६. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, ७. श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार,  ८. भारती विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार ९. चतुरंग प्रतिष्ठान – मानपत्र

शिवाजीराव भोसले – स्मृती पुरस्कार

पुण्याची, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृतीसमिती दर वर्षी १५ जूनला त्यांच्या नावाचा         

स्मृती पुरस्कार देते. आत्तापर्यंत या समीतीतर्फे बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, साहित्यिक द.मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, डॉ. ह.वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांना पुरस्कार मिळाले आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी – ( २७ नोहेंबर १९१५ – २९ जून ८१)

दि. बा. मोकाशी हे ख्यातनाम मराठी कथाकार व कादंबरीकर होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण इथे झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले व पुण्यात रेडियो दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. लामणदिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४७ मधे प्रसिद्ध झाला. 

दि. बा. मोकाशी यांचे अन्य साहित्य – कथा

१.    कथामोहिनी, २. आमोद सुनासी आले, ३. वणवा, ४. चापलूसी, ५. एक हजार गायी,  ६. आदिकथा,  ७. माऊली, ८. तू आणि मी हे त्यांचे काही कथासंग्रह 

कादंबरी –१. स्थलयात्रा, २. पुरुषास शंभर गुन्हे माफ, ३. देव चालले, ४ आनंद ओवरी, ५. वात्सायन

 यापैकी आनंद ओवरी व वात्सायन या कादंबर्याप चरित्रात्मक असून त्या अनुक्रमे संत तुकाराम व वात्सायन यांच्या जीवनावरच्या आहेत.

प्रवासवर्णन – पालखी व अठरा लक्ष पाऊले.  या पुस्तकातून प्रवास वर्णनापेक्षा समाज जीवनाचे दर्शन घडवण्यावर अधीक भर दिला आहे.

अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल्स’ या सुप्रसिद्ध कादंबरीचा ‘घणाघणती  हा उल्लेखनीय अनुवाद त्यांनी केला आहे.

दि. बा. मोकाशी  यांनी लहन मुलांसाठीही पुस्तके लिहिली.

विविध अंनुभूतीतून माणूस शोधण्याचा प्रयत्न ते आपल्या कथा -कादंबर्यांठमधून करतात. व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध  ते घेतात.  भावचित्रणातील नाजुकपणा व हळुवारपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या कथा –कादंबर्यांतमधून झालेला दिसतो. जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळीवरून अनुभव घेऊन त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.

दि. बा. मोकाशी  यांनी गूढकथा, पिशाच्च कथा,  रहस्य कथा अशा वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या आहेत.

‘संध्याकाळचे पुणे’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक. संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रुपे त्यांना दिसली, त्याचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडवले आहे.

पुरस्कार-

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार दि. बा. मोकाशी यांच्या गुपित, पालखी, स्थलयात्रा, आमोद सुनासी आले, देव चालले, जमीन आपली आई या पुस्तकांना मिळाला आहे.

त्यांच्या आनंद ओवारीचे भाषांतर अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेत यांनी केले आहे. ‘देव चाललेचे भाषांतर प्रमोद काळे ( इंग्रजी) यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या पुस्तकाचा अनुवाद हंगेरीयन व ओरिया भाषेतही झाला आहे. अमृतानुभव या ललित लेखाचा अनुवाद इंग्रजीत झाला आहे.त्याचप्रमाणे कामसूत्रकार वात्सायन आणि पालखीचाही इंग्रजीत अनुवाद झाला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर  (18 फेब्रु. 1911 – 29 जून 2000)

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म पुण्यातील येरवडा इथे झाला. ते भारतीय भूदलात कॅप्टन होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबर्यान लिहिल्या.

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे प्रकाशित साहित्य

कादंबर्याॅ – १.उधळल्या प्रभा दशदिशा, २. कळस चढवला मांदिरी ३. दख्खनचा दिवा हरपला, ४. घटकेत रोविले झेंडे, ५. नवरत्ने हरपली रणांगणी, ६. पेशवाईतील कर्मयोगी, ७.राघो भरारी, ८. राज्य तो छत्रपतींचे, ९.शर्थीने राज्य राखले, इ. त्यांच्या कादंबर्या  प्रकाशित आहेत.

कथा संग्रह – काळदरीतील वीरगळ

प्रवास वर्णन –  अरुणाचलच्या सीमेवरून

याशिवाय बाहिरी ससाणा (भयकथा), महाभारत एक पर्व, हेर नयन हे नृपतीचे अशी आणखीही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शिवाजीराव भोसले या विद्वान आभ्यासकाचा, श्रेष्ठ वक्त्याचा आणि लेखकाचा आज स्मृतीदिन. त्याचप्रमाणे आज नामवंत लेखक दि. बा. मोकाशी आणि कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचाही आज स्मृतीदिन त्या निमित्त या तिघांनाही  भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लोकप्रिय कवी व गीतकार श्री. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा आज जन्मदिनही आणि स्मृतिदिनही . 

( २८/६/१९२२ – २८/६/१९९० ) 

पेशाने प्राध्यापक असणाऱ्या श्री खांडेकर यांची प्रेमातल्या विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण करणारी कविता रसिकप्रिय झाली होती हे तर खरेच. पण त्याचवेळी, समाजातील दांभिकता आणि अन्याय, याविरुद्ध बंड पुकारण्याची त्यांची प्रामाणिक प्रवृत्तीही त्यांच्या काव्यामधून अनेकदा दिसून येत असे . 

“ श्लोक केकावली “ , “ संजीवनी : ही काव्ये , तसेच “सं. एकच प्याला “ , “ सं. शारदा “ अशी नाटके यांच्या संहितेच्या संपादनाचे मोलाचे काम श्री. खांडेकर यांनी केले होते.

“ चंद्रप्रकाश “, आणि “ गंधसमीर “ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. 

श्री. भालचंद्र खांडेकर यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

व. पु. काळे

वसंत पुरुषोत्तम काळे (25 मार्च 1932 – 26 जून 2001) हे ख्यातनाम लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.

ते पेशाने वास्तुविशारद होते व मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते.

वपुंनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.त्यांची ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’,’आपण सारे अर्जुन’, ‘घर हरवलेली माणसं ‘ वगैरे पुस्तके  विशेष लोकप्रिय आहेत.

त्यांचे कथाकथनाचे 1600पेक्षा जास्त कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून रसिक वाचकांना भेटणारे ते पहिले मराठी लेखक होते.

त्यांच्या कथा- कादंबऱ्यांत जागोजागी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, प्रेरणादायी विचार आढळून येत.

वपुंवर ओशो रजनीशांचा प्रभाव होता.

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, पु. भा.भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता.

अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आज वपुंचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना नम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

द्वारकानाथ माधव पितळे म्हणजेच नाथमाधव  (एप्रिल १८८२ – २१ जून १९२८)

नाथमाधव  यांना अवघे ४६ वर्षांचे आयुष्य लाभले. यातला बराचसा काळ त्यांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. स्त्री शिक्षण आणि पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. 

त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. कुलाब्याला ते तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीला लागले।. शिकारीची त्यांना आवड होती. एकदा सिंहगड परिसरात ते शिकारीला गेले होते. त्यावेळी टेहळणी करताना ते कड्यावरून खाली कोसळलले. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असताना, त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी अनेक मराठी, इंग्रजी ग्रंथ या काळात वाचून काढले. यातून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांची पहिली कादंबरी ’प्रेमवेडा’ १९०८ साली प्रकाशित झाली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्याकाळी हा चित्रपट खूप गाजला. या कादंबरीचे ३ भाग आहेत.

नाथमाधव यांच्या २३-२४ कादंबर्‍या आहेत.  त्यापैकी स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याची स्थापना, सावळ्या तांडेल, वीरधावल, रॉयक्लब अथवा सोनेरी टोळी, मालती माधव, देशमुखवाडी इ. कादंबर्‍या विशेष गाजल्या.

नाथमाधव यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांना आदरांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आलो तुझ्या दुनियेत, नव्हतो चोर वा डाकू आम्ही , एकही ना चीज इथली, घेऊनी गेलो आम्ही

ते ही असो, आमुच्यासवे आणिला ज्याला इथे , भगवन, अरे तो देहही मी टाकुनी गेलो इथे—

— अशा शब्दात देवालाच सत्याची जाणीव करून देणारे सुप्रसिद्ध गझलकार , शायर व कवी श्री. वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर यांचा आज स्मृतीदिन. ( २९/१२/१९०८ – २०/६/१९९७ )

मराठीतले जिंदादिल शायर अशी ओळख असणारे भाऊसाहेब हे खरे तर  “ मराठी शायरीचे जनक “ . शायरी हा अधिकतर उर्दू – हिन्दी भाषेत रूढ असणारा काव्यप्रकार त्यांनी मराठी भाषेत रुजवला, देशभर पोहोचवला, आणि त्याला जणू “ चिरतरुण “ करून ठेवलं. 

वेद , तत्वज्ञान , आणि इतर शास्त्रांचा अभ्यास असणारे भाऊसाहेब पेशाने वकील होते. यवतमाळ जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटले कायम जिंकणारे वकील अशी त्यांची ख्याती झाली होती. शिवाय ` सहा पट्टेरी वाघांना लोळवणारे शिकारी `म्हणूनही ते ओळखले जात . शिकारीवर कायद्याने बंदी आल्याने त्यांना तो नाद सोडावा लागला. पुढे दृष्टिदोष झाल्याने त्यांना वकिली सोडावी लागली, पण काव्यरसिकांसाठी ती पर्वणी ठरली असे म्हणावेसे वाटते. कारण त्यानंतर ते कविता या साहित्यप्रकाराकडे वळले, आणि मराठी शायरी या नव्या प्रांताची त्यांनी लोकांना अगदी जवळून ओळख करून दिली. हळूहळू त्यांच्या रचना इतक्या लोकप्रिय झाल्या की महाराष्ट्रभर आणि इतर राज्यांमध्येही त्यांच्या शायरीचे कार्यक्रम होऊ लागले, आणि त्यांना रसिकांची प्रचंड दाद मिळू लागली  . विनोद आणि प्रणय यांची रेलचेल असणारी, इतकी प्रसिद्ध झालेली शायरी लिहायची सुरुवात त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी केली होती, हे सांगितले तर खरे वाटणार नाही. याचवेळी एकीकडे त्यांनी शायरी ह्या काव्यप्रकाराचा खोलात जाऊन अभ्यास केला. आणि मग तत्वज्ञान आणि जीवन या अनुषंगाने विविध विषयांवर त्यांनी शायरी लिहिली. वर सुरुवातीला उद्धृत केलेल्या त्यांच्या दोन ओळींवरून हेच दिसून येते. उर्दू शायरीपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र अशी त्यांची मराठी शायरी खूपच लोकप्रिय झाली असली, तरीही ते विनम्रपणे असे व्यक्त व्हायचे की —

सांगेल काही भव्य ऐसी , शायरी माझी नव्हे —

तो कवींचा मान , तितुकी पायरी माझी नव्हे —

“जिंदादिल“ , “ दोस्तहो “ हे  अतिशय गाजलेले काव्यसंग्रह, तसेच “ मराठी मुशायरा “ , “ मराठी शायरी “ ,

“ मैफिल“  असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. भाऊसाहेबांच्या  “ दोस्तहो “ या गजल संग्रहातल्या चारोळ्यांची भाषा तर इतकी सोपी आहे की चारोळी नुसती वाचली की त्यात काय सांगायचे आहे हे वाचकाला पूर्णपणे लक्षात येतं— म्हणजे त्याचे वेगळेपणाने रसग्रहण करायची गरजच उरत नाही – आणि ही त्यांच्या लेखणीची ताकद होती.- याच्या  उदाहरणादाखल या पुढच्या काही ओळी —–  

“आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे….  मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे .. “ 

किंवा — 

“जातो तिथे उपदेश आम्हा, सांगतो कोणीतरी– कीर्तने सारीकडे, चोहीकडे ज्ञानेश्वरी …

 काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका– जाऊ सुखे नरकात आम्ही , तेथे तरी येऊ नका … 

मराठी कवितेत शायरीची अशी नवी आणि वेगळीच वाट निर्माण करणाऱ्या श्री. भाऊसाहेब पाटणकर यांना भावपूर्ण आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रमेश राजाराम मंत्री

रमेश मंत्री हे प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी कादंबरी, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारचे लेखनही केले आहे. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात एम.ए.पूर्ण करत असतानाच त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांतून लेखन करण्यास सुरूवात केली होती. पुढे काही दिवस त्यांनी दैनिक पुढारीचे सहसंपादक म्हणूनही काम केले होते.

इंग्लंडला जाऊन त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय शिक्षण पूर्ण केले.1958 ते 1978 या प्रदीर्घ काळात अमेरिकेच्या माहिती खात्यात त्यांनी सेवा केली. त्यानिमीत्ताने त्यांचे जगभर हिंडणे झाले. अनुभव समृद्ध झाले. त्याचा उपयोग त्यांना लेखनासाठी झाला. अनुभव आणि प्रतिभा यांची साथ लाभल्यामुळे अनेक प्रवास वर्णने त्यांच्याकडून लिहून झाली. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग ही प्रवासवर्णने वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

मराठी साहित्यात भर घालणारी काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी श्री.रमेश मंत्री यांनी केली आहे.मराठीत विनोदी फॅटसी रूढ करण्याचे श्रेय त्यांना जाते.जेम्स बाॅड च्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनीच जन्माला घातली.मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ त्यांनीच सुरू केल्या.कोल्हापूर येथील 1992  साली भरलेल्या अ.भा. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शने भरवली व वाचन चळवळीस हातभार लावला.उत्साह,उत्सवप्रियता, विनोदबुद्धी, कठोर शिस्त व सततची कार्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर त्यांनी 130 हून अधिक पुस्तके प्रकाशित केली.एवढेच नव्हे तर 1979 या एका वर्षात त्यांनी 34पुस्तके प्रकाशित केली.

त्यांची काही पुस्तके:

हसण्याचा तास- पहिला, दुसरा, तिसरा, कागदी सिंह, ओठ सलामत तो,मावशी हरवली, हास्यधारा,बोल बोल म्हणता,अति झाले अन् हसू आले.

तरंगणारे शहर, थंडीचे दिवस, सुखाच्या रात्री, सुखाचे दिवस, सूर्यपुत्रांचा देश जपान.

उत्तरकाळ, हुलकावणी इत्यादी.

अशा या विक्रमी लेखकाचा 19/06/1998 ला अंत झाला.

हसण्याचे तास घेऊन जगणं सुसह्य करणा-या रमेश मंत्री यांना  आज स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : महाराष्ट्र नायक, मराठी सृष्टी, विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print