डॉ गोपाळकृष्ण गावडे
इंद्रधनुष्य
☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – १ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆
ठेविले अनंते तैसेचि रहावे? – हा कसला निराशावाद?
कसला निराशावादी आणि निष्क्रियता आणणारा विचार आहे हा! म्हणजे मनुष्याने कसली प्रगती करायचीच नाही की काय? तुकाराम महाराजांनी अभंग लिहला म्हणून काय झाले? त्यानुसार चालले तर संपूर्ण समाज आळशी होईल.
तुकाराम महाराजांच्या या अभंगावर समाजातील महत्त्वाकांक्षी लोकांमधून असा सूर उठताना दिसतो.
आजच्या इंजिनिअरला पहिली औद्योगिक क्रांती आणणाऱ्या वाफेच्या इंजिनची आकृती सुद्धा काढता येणार नाही. कारण निरोपयोगी ज्ञान लगेच नष्ट होते. तुकाराम महाराजांनी तिनशे वर्षांपूर्वी एका अभंगात लिहून ठेवलेले हे ज्ञान मनुष्य जातीसाठी इतके निरूपयोगी असताना अजून नष्ट कसे झाले नाही? मला मोठा प्रश्न पडे.
त्याची आज मिमांसा करू. आधी पूर्ण अभंग वाचू —- (गाथा – अभंग क्रमांक 1191)
*
हेचि थोर भक्ती आवडती देवा|
संकल्पावी माया संसाराची ||
*
ठेविले अनंते तैसेचि रहावे|
चित्ती असू द्यावे समाधान||
*
वहिल्या उद्वेग दुःखची केवळ|
भोगणे ते फळ संचिताचे ||
*
तुका म्हणे घालू तयावर भार|
वाहू हा संसार देवापायी ||
*
आता अर्थ समजून घेऊ.
हेचि थोर भक्ती आवडती देवा|
संकल्पावी माया संसाराची ||
आधी संसार म्हणजे काय ते समजून घेऊ.
संसार म्हणजे ही जगत. प्रत्येक जीव आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी देणे घेणे व्यवहार करत असतो. या व्यवहाराद्वारे प्रत्येक जीव आपला निर्वाह करतो. ज्या वातावरण आणि परिस्थिती मध्ये जीवांचा जन्म, वावर, व्यवहार आणि मृत्यू होतो त्याला संसार असे म्हणतात. असे म्हणतात की हे संपूर्ण संसार ही मायेची उत्पत्ती आहे.
आता माया म्हणजे काय ते समजून घेऊ.
माया हे ईश्वरी शक्तीपासून निर्माण झालेले तत्व असून ते प्रत्येक जीवाच्या बुद्धीत अविद्या रूपी भ्रम निर्माण करते.
अविद्या रुपी भ्रम काय आहे? तो भ्रम कशा बाबतीत होतो?
जीवाच्या अस्तित्वाच्या नेमके स्वरूप समजून घेण्याच्या प्रक्रियेत हा भ्रम निर्माण केला जातो.
हे ब्रम्हांड एक ऊर्जेने भरलेल्या एका बिंदू मधून निर्माण झालेले आहे. म्हणून सर्व जगात ऊर्जमय आहे.
1) जड निर्जीव ऊर्जा – निर्जीव पदार्थांच्या अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. अणू जरी वर वर पदार्थ (matter) भासत असला तरी अणू ज्या मूलभूत कणांपासून बनलेला आहे त्यांचे स्वरूप फक्त ऊर्जा आहे.
2) जड सजीव ऊर्जा – सजीव शरीरीतील अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. शरीर हे एक जटिल मशीन आहे. उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या काळात जीवांचे शरीर एक जटिल मशीन मध्ये बदलले आहे. तरी हे मशीन स्वतः चालू शकत नाही. त्याला कुणी तरी एक चालक लागतो. म्हणून या शरीर रुपी मशीनला जड (चालवली जाणारी) ऊर्जा असे म्हणतात.
3) चेतन ऊर्जा- सजीव शरीराच्या जन्म, स्थिती, मृत्यू आणि पुनर्जन्म यासाठी कारणीभूत असलेली ऊर्जा. ही ऊर्जा शरीर नावाच्या जटिल यंत्राला चालवते. म्हणून या ऊर्जेला चेतन ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेला जीवात्मा असे म्हणतात.
सत् म्हणजे जी आपले स्वरूप कधीही बदलत नाही अशी स्थायी ऊर्जा. चेतन ऊर्जा कधीही आपले स्वरूप बदलत नाही. म्हणून चेतन ऊर्जा सत् ठरते. सत् अर्थात चेतन ऊर्जा हे प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचे स्थायी स्वरूप आहे.
जी ऊर्जा आपले स्वरूप सतत बदलत राहते तिला असत् असे म्हणतात. जड सजीव ऊर्जा अर्थात शरीर आणि जड निर्जीव ऊर्जा अर्थात पाच महाभूते यांच्या मध्ये सतत स्थित्यंतर होत असते. चेतन ऊर्जेच्या प्रभावाखाली पंच महाभूते एकत्र येऊन शरीर नावाचे जटिल यंत्र निर्माण करतात. चेतन ऊर्जेने शरीर या जड सजीव ऊर्जेची साथ सोडली म्हणजे शरीर मृत होते. मृत शरीर अल्पावधीत विघटित होऊन परत पंच तत्वात सामील होते. अशा प्रकारे शरीर असत् ठरते.
शरीर असत् असले तरी ते व्यक्त स्वरूपात असते. सत् आत्मा मनुष्य बुद्धीला अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे आत्मा ही केवळ कल्पना असून शरीर हेच माझ्या अस्तित्वाचे खरे स्वरूप आहे असे भ्रम निर्माण होतो. बुद्धीने स्वीकारलेले अनुभवसिद्ध सत्य ज्ञान म्हणजे विद्या. स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप (आत्मा) बुद्धीला मान्य असणे म्हणजे विद्या.
स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप बुद्धीला मान्य नसणे आणि त्या ऐवजी भलत्याच तत्वात (शरीरा) स्वत्व शोधणे या प्रकाराला अविद्या असे म्हणतात.
स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप समजून घेताना परमेश्वरी शक्ती प्रमाणांचे मायाजाल मांडून मनुष्य बुद्धीला भ्रमित करते. असा भ्रमित मनुष्य अविदया स्विकारून शरीरामध्ये आत्मभाव ठेवायला लागतो. जीवाच्या बुद्धीने शरीरात आत्मभाव शोधला की शरीराच्या गरजा म्हणजे शरीराचे संवर्धन (पालन, पोषण, रक्षण) आणि प्रजनन याची जबाबदारी मनुष्यावर पडते. शरीरा संवर्धन आणि प्रजनन करण्याची प्रकृती मनुष्यामध्ये निर्माण होते. प्रत्येक जीवाच्या हातून शरीर संवर्धन आणि प्रजनन यासारख्या मूलभूत गोष्टी घडल्या तर प्रजातीचे संवर्धन होते. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास फारसा झालेला नसल्यामुळे ते अविद्येला सहज बळी पडतात आणि आपल्या अल्पमतीप्रमाणे शरीरामध्येच आत्मभाव ठेवतात. मनुष्य जन्मात बुद्धीचा विकास झालेला असल्यामुळे विचारांचे स्वातंत्र्य येते आणि ही अविद्या दूर करण्याची संधी मिळते. पण मायेच्या प्रभावामुळे बहुतेक मनुष्यांच्या आयुष्यातून ही संधी चुकते.
मायेच्या प्रभावाखालील मनुष्यबुद्धी शरीरामध्ये आत्मभाव ठेवते. विकसित झालेली मनुष्यबद्धी विविध गोष्टींचे संकलन करून शरीर संगोपन आणि प्रजनन सोपे करण्याची धडपड करत राहते. किंबहुना उत्क्रांतीच्या काळात मनुष्य बुद्धीचा विकासच संकलनासाठी झालेला आहे. आज मनुष्य बुद्धीचा उपयोग करून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करतो. मनुष्यबुद्धी सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करताना काही रोल अथवा भूमिका स्वीकारते. मनुष्य निभावत असलेल्या प्रत्येक भूमिकेची त्याच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते. या प्रतिमेच्या आकारालाच अहं आकार अर्थात अहंकार असे म्हटले जाते. मायेच्या भ्रमातून निर्माण होणाऱ्या अविद्येच्या प्रभावाखाली असलेली मनुष्यबुद्धी हळूहळू या बाह्य अहंकारातही आत्मभाव शोधू लागते. अशा प्रकारे शरीराच्या निर्वाहासाठी चाललेल्या धडपडीतून अहंकार निर्माण होतात. मनुष्य आपले प्रकृतीदत्त आणि बुद्धीदत्त कर्तव्य करताना शरीर आणि इतर बाह्य अहंकारात आत्मभाव ठेऊन जगाशी देवाण-घेवाण व्यवहार करत असतो. त्यातून त्याच्या भोवती जे विश्व निर्माण होते त्यालाच संसार असे म्हटले आहे. मनुष्य स्वतःचे खरे अस्तित्व विसरून नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले अहंकार हेच आपण आहोत असे मानू लागते. अशा बाह्य अहंकारामध्ये आत्मभाव निर्माण झाल्यास त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी मनुष्यावर येऊन पडते. नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले बाह्य अहंकार तर शरीरापेक्षाही कमी वेळ टिकत असल्याने ते तर पूर्णतः असत् असतात.
परमेश्वरी शक्तीच्या मायेतून अविद्या जन्माला येते. जीवाच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप सत् अर्थात अनादी-अनंत आत्मा असते. पण मायेमुळे मनुष्य बुद्धी असत् ला सत् मानू लागते. असे अज्ञान स्वीकारणे हिच ती बुद्धीची अविद्या.
शिव आणि शक्ती मिळून अर्धनारी नटेश्वर परमेश्वर तयार होतो. शिव-शक्ती परम आत्मा असून जगत त्यांचे भौतिक शरीर आहे. शिव मध्ये सृष्टीच्या निर्वाहाचे संपूर्ण ज्ञान असूनही तो निसर्ग असतो. शिवाची शक्ती शिवाच्या त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सृष्टीचा निर्वाह चालवणारी क्रियाशील ऊर्जा असते. अशा प्रकारे शक्ती परमेश्वरी शरीराचा निर्वाह चालवते. या परमेश्वरी शरीराच्या निर्वाहासाठी या शरीरात म्हणजे सृष्टीत सतत सृजन, स्थिती आणि नाश चालू असतो. ज्या गोष्टी जीर्ण होऊन नष्ट झालेल्या असतात त्यांच्या जागी नवीन गोष्टी जन्म घेत असतात. पण ऊर्जेच्या संवर्धनाच्या नियमानुसार कुठलीही ऊर्जा नष्ट करणे शक्य नसल्याने गोष्टींचा जन्म, स्थिती आणि मृत्यू म्हणजे केवळ ऊर्जेचे स्थित्यंतर असते. गरजेनुसार जन्म, स्थिती आणि नाश करण्याची जबाबदारी शक्तीवर असते. शक्ती जीवांच्या माध्यमातून हे काम करून घेते. जीवांनी आपल्या अस्तित्वाचे खरे स्वरूप विसरून शक्तिच्या या कामासाठी स्वतःला झोकुन द्यावे यासाठी शक्ती मायेचा निर्माण करते. जर सामान्य जीवाने शरीर आणि इतर अहंकारात आत्मभाव शोधला नाही तर शरीर संगोपण, प्रजनन आणि यश संकलन सारखे कार्य करण्यात उदासीनता निर्माण होते. तसे झाल्यास त्या जीवाच्या शरीराचा, त्या प्रजातीचा आणि पर्यायाने सृष्टीचा निर्वाह होणे अवघड होईल. म्हणून परमेश्वरी शक्तीने माया निर्माण केली गेली. सर्व जीवनामध्ये केवळ मनुष्य आपल्या विकसित बुद्धीने हे मायाजाल समजून घेऊन त्याच्या वर उठू शकतो.
प्रत्येक प्रजाती ही शक्तीचे सृजन असून ते ठराविक काळ टिकणे तिच्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक जीवाने शरीर संगोपण आणि प्रजनन करणे आवश्यक असते. जीवाला तशी प्रेरणा मिळत रहावी म्हणून माया जीवाच्या बुद्धीत अविद्या निर्माण करते. मग प्रत्येक जीवाच्या बुद्धीला शरीर आणि अन्य बाह्य अहंकार म्हणजेच मी स्वतः आहे असे वाटू लागते. मग ती बुद्धी स्वतःचे (शरीर आणि इतर बाह्य अहंकारांचे) अस्तित्व टिकवण्यासाठी शरीर संगोपण आणि प्रजननाचे मुलभुत कार्य तसेच यश संकलनाचे वाढीव कार्य करू लागते. त्यातून जीवाचे आणि पर्यायाने प्रजातीचे संवर्धन होते.
अशा प्रकारे माया संसाराच्या निर्वाहासाठी आवश्यक असल्याने तिचा पूर्णतः त्याग करणे शक्य नाही. पण तिच्या निर्मितीच्या उद्देशाकडे तटस्थपणे पाहत मनुष्याने स्वतःला तिच्या वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावा. शरीरात आत्मभाव जरी ठेवला नाही तरी शरीराचा निर्वाह संसाराच्या निर्वाहासाठी गरजेचा आहे याचे भान ठेऊन भ्रमात राहून नव्हे तर जागरूक राहून शरीर संगोपन करावे. परमेश्वरावर भक्ती ठेऊन परमेश्वराचे सृजन टिकवण्यासाठी जबाबदारी म्हणून शरीर संगोपन करावे. शरीर संगोपन सोपे व्हावे आणि योगमार्गला प्रतिष्ठा मिळावी म्हणून यश संकलन सुद्धा करावे. जगरहाटी चालवण्यासाठी परमेश्वराची माया उपयुक्त आहे असे मानणारे भक्त परमेश्वराला आवडतात.
ठेविले अनंते तैसेचि रहावे|
चित्ती असू द्यावे समाधान||
मायेच्या प्रभावाने सर्व जीव शरीर या अहंकारात म्हणजे असत् मध्ये आत्मभाव ठेवतात. मग जीवनामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती निर्माण होते. या प्रकृतीच्या प्रभावाने असा जीव स्वतःच्या म्हणजे या शरीराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी धडपड करतो. शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन अशा प्रकृतीदत्त कर्तव्य करण्याच्या बदल्यात प्रकृती जीवाच्या आदिम मेंदू (lymbic system) मध्ये अशी संप्रेरके तयार करते की जीवाला अशा कृतीतून सुख मिळू लागतो. अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध या क्रियांमधून मिळणारा हाच तो आनंद आहे. या प्रकृतीदत्त कर्तव्याच्या विरुद्ध वर्तन केल्यास जीवाच्या मनात आधी अनुभवलेले हे सुख मिळवण्यासाठी व्याकुळता निर्माण होते. त्यामुळे कुठलाही जीव अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. या प्रकृतीदत्त कर्तव्याची वेळोवेळी पूर्ती झाल्याने जीवाचे शरीर संगोपन आणि प्रजनन होते. प्रजातीच्या सर्व जीवांनी असे प्रकृत्तीदत्त कर्तव्यपूर्ती केल्यामुळे प्रजातीचे संवर्धन होते.
मनुष्य सोडून इतर प्रत्येक जीव केवळ प्रकृतीच्या शरीर संगोपण आणि प्रजनन या दोन नियमांनी बांधलेला आहे. पण उत्क्रांतीच्या काळात मनुष्य प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास झाला. त्यामुळे मनुष्याला प्रकृती सोबत बुद्धीच्या अधीन राहून काम करावे लागते. आता हे बुद्धी काय प्रकरण आहे ते पाहू.
मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात मनुष्याचा व्यवहार सुद्धा इतर प्राण्यांप्रमाणे शरीर संगोपन आणि प्रजनन करणाऱ्या प्रकृतीदत्त इच्छेने (lymbic system) नियंत्रित होत असे. या लिम्बिक सिस्टीम मध्येच शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन करण्याची मूलभूत अंत:प्रेरणा निर्माण होते. ही लिम्बिक सिस्टीम मनुष्य प्राण्यामध्येही असते. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातच मनुष्य प्राण्याला जाणवले की शरीर संगोपन आणि प्रजननासाठी पूरक गोष्टींचे संकलन करून ठेवले तर हे प्रकृतीदत्त कार्य सोपे होते. मग गोष्टींचे संकलन करण्यासाठी आवश्यक असा विचार करू शकणारा मेंदूचा भाग हळूहळू विकसित होऊ लागला. या भागाला आम्ही डॉक्टर नियोकॉर्टेक्स (Neocortex) असे म्हणतो. या भागामुळे परिस्थितीचे पूर्ण आकलन करून संकलनासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये निर्माण झाली. या क्षमतेला बुद्धी असे म्हटले गेले. मनुष्यामध्ये बुद्धीचे मुख्य कार्य प्रकृतीदत्त कर्तव्य सोपे व्हावे म्हणून गोष्टींचे संकलन करणे आहे.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ गोपाळकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈