श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ We are extremely sorry, officer! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
लेफ्टनंट किरण शेखावत madam, जय हिंद!
खरं तर to be sorry म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, गोष्टीबद्दल मनातून वाईट वाटणे, दिलगीर वाटणे, सहानुभूती वाटणे इत्यादी अर्थ असतो. Sorry म्हणणे म्हणजे माफ करा असा अर्थ अजिबात होत नाही. त्यासाठी to beg (somebody’s) pardon, to apologise अशी क्रियापदे आहेत! म्हणून किरण madam, we beg your pardon!
तुम्ही या आपल्या प्राणप्रिय हिंदुस्तान देशासाठी प्राणार्पण करून आज मितीला सुमारे दहा वर्षे आणि दोनेक महिने झाले आहेत. काल अचानक तुम्ही हुतात्मा झाल्याच्या फेसबुक पोस्ट्स मोठ्या संख्येने दिसू लागल्या! आपल्याकडे एकतर प्रत्यक्ष युद्धात (म्हणजे आजपर्यंत सुरु असलेल्या युद्धासारख्या) सैनिक मृत्यू पावल्याशिवाय त्याला फारसे महत्त्व देण्याची सर्वसाधारण पद्धत नाही. काही लोक हुतात्मा सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांचेविषयी, संबंधित सैनिकाच्या बलिदान दिवशी काही लिहित असतात, हे ही खरे आहे.. पण हे प्रमाण अत्यल्प म्हणावे इतके थोडे आहे! असो.
त्यामुळे काल आणि आज तुमचे फोटो आणि तुम्हांला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या फेसबुक पोस्ट्स दिसल्या तेंव्हा लगेच तुमच्या बलिदानाची तारीख पाहिली… २५ मार्च २०१५! शिवाय तुमचा जन्मदिन सुद्धा १ मे रोजीच होऊन गेला होता!
भारतीय नौसेनेत कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या तुम्ही पहिल्या महिला सैनिक अधिकारी ठरल्याचे त्यावेळी मुद्दाम नमूद करण्यात आले होते, हे आठवले! २०१५ मध्ये सोशल मिडिया आजच्या इतका फैलावलेला आणि मुख्य म्हणजे पैसे देणारा नसावा… म्हणून तुमची ही बातमी देशभर फारशी चर्चिली गेली नसावी!
पण या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचानक तुमचे छायाचित्र आणि तुमच्या हौतात्म्याची बातमी दिसू लागली. उगम कुठे झाला हे नाही समजले.. पण अनेक देशप्रेमी नागरीकांनी ही बातमी शेअर केली, हजारो लोकांनी comments केल्या… संपूर्ण देशभरात अशा हजारो पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या असतील! पण या कुठल्याही पोस्ट मध्ये तुमचे बलिदान २०१५ मध्ये झाल्याचा उल्लेख नाही. काही comments कर्त्यांनी या बाबीचा उल्लेख केला.. पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. अनेक लोकांनी वरची comment आहे तशी copy करून paste केली आणि इतरांच्या comments त्यांनी वाचल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही! ऑपरेशन सिंदूर मध्येच हे बलिदान झाल्याचा समज झाल्या असण्याची दाट शक्यता आहे!
तुमच्या बलिदानाविषयी कुणी पोस्ट करत असेल, तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही! परंतु सध्याच्या गंभीर परिस्थितीत २०१५ मध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत संदिग्ध पोस्ट करण्यामागे सरळ उद्देश असण्याबाबत शंका घेण्यास वाव आहे! पोस्ट वर जितक्या comments, जितके shares तितका पोस्ट करणा-यास followers, आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक हे आता लोकांना ठाऊक झालेले आहे… तुमचे बलिदान वापरून जर अशा पोस्ट केल्या असतील तर, यासारखे दुर्दैव आणि हरामखोरी दुसरी नसावी!
Madam, तुमचे पती सुद्धा नौसेनेतच अधिकारी आहेत. त्यादिवशी तुम्ही डॉर्नियर जातीच्या विमानात Flight Observer म्हणून उड्डाण केले होते… आणि हे एक प्रशिक्षण उड्डाण होते. तुमच्यासोबत लेफ्ट. अभिनव नागोरी साहेब आणि कमांडर निखील जोशी साहेबही होते. तुम्ही मुळच्या राजस्थानी, पण जन्म मुंबईतला. वडील सुद्धा नौसेनेत असल्याने तुम्ही त्यांच्या नेमणुकीच्या शहरात अर्थात विशाखापट्टनम मध्ये शास्त्र शाखेची पदवी मिळवून नंतर तुम्ही काही काळ एका बँकेत नोकरी केली आणि पुढे २०१० मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झालात… लेफ्टनंट बनलात. Intelligence Warfare अर्थात हेरगिरीवर आधारीत/हेरगिरी विरोधी युद्धकौशल्यात तुम्ही निपुण होतात. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनी केवळ महिलांचा समावेश असलेल्या पहिल्याच सैनिकी पथकात तुम्ही शानदार संचलनही करण्याचा मान मिळवला होता. तुमचे ते विमान दुर्घटनाग्रस्त झाले… समुद्रात कोसळले… लेफ्ट. नागोरी साहेब आणि तुम्ही मृत्युमुखी पडलात… कमांडर जोशी साहेबांना समुद्रातील मच्छिमारांनी वाचवले. तुमचा मृतदेह मात्र खोल समुद्रात विमानाच्या अवशेषांमध्ये सापडला. तुमच्या बलिदानाला सल्यूट! तुमच्या विषयीची पोस्ट अशा प्रकारे आणि ती देखील आजच्या परिस्थितीमध्ये केवळ विशिष्ट हेतूसाठी वापरली जाणे, हे खूप चुकीचे आहे. याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो…! (यामुळे तुमच्याविषयी अधिक लोकांना समजले हे खरे असले तरी तुमच्या बलिदानाची सविस्तर माहितीही या अधिकच्या लोकांना समजणे गरजेचे होते!)
गेल्या काही दिवसांत सोशल मिडीयावर नतद्रष्ट आणि अतिउत्साही लोकांनी Artificial Intelligence च्या साहाय्याने बनवलेले विडीओस ‘टाकून’ काय मिळवलं असेल ते सांगण्याची गरज नाही. तिकडे पाकिस्तानात सुद्धा असाच digital खेळ सुरूच आहे. हे झाले सामान्य लोकांच्या सोशल मिडीयाच्या वापराचे. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचा तर full season सुरु असल्याचे चिन्ह आहे. काही वाहिन्या उत्तम काम करताना दिसतात, मात्र त्यांनाही स्फोटक, रोमांचकारी वातावरण निर्माण करण्यावाचून राहवत नाही. एखादी ब्रेकिंग न्यूज दाखवण्याआधी सायरनचा आवाज ऐकवण्याची काय गरज? आणि बातमी ती काय? … अमकी अमकी बैठक सुरु होणार आहे! म्हणजे कुठेही जाऊ नका.. आमचे(च) channel पाहत रहा.. असा आग्रह! अनेक वाहिन्या आज तक असेच करीत आलेल्या आहेत, नको तेवढे एक पाऊल पुढे जात आहेत, प्रेक्षकांना नको एवढे डोळे उघडे ठेवायला भाग पाडत आहेत. यापेक्षा आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांचा जमाना बरा होता, असे म्हणायची वेळ आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे memes, विनोदी वाक्यरचना करणा-या ‘सर्जनशील’ लोकांना तर ऊत आलेला आहे. आय. पी. एल. सामना पहिल्यासारखी काहींची त-हा आहे. फटाके वाजवले तर लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते, हा साधा विचारही लोकांच्या मेंदूत येत नाही. यासाठी पोलिसांना आदेश जारी करावे लागतात… आपण कसे लढणार आहोत शत्रूशी? असे?
(पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेकी संघटना तिथल्या सरकारचे ऐकत नाही, हे आताच (पुन्हा एकदा) सिद्ध झाले आहे. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग यापुढे भारतापुढे असणार आहे… हे वास्तव आहे. म्हणून सामान्य लोकांनी जबाबदारी ओळखून वागणे हिताचे आहे!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खरच डोळे उघडणारा लेख आहे .अर्धवट वाचून लोक लगेच अग्रेषित करतात .सत्य परिस्थिती कळली तरी नंतर त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ऐकून घ्यायची तयारीच नसते लोकांची. सत्य माहिती सांगणारा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.