मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 270 ☆ वसंत… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 270 ?

☆ वसंत… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(वसंतोत्सव काव्याचा)

ऋतूराज येता सजे सोहळा

उन्हाच्या जरी भोवती रे झळा

बहावा असा पीतवर्णी झुले

अहाहा किती सानुली  ही फुले …

*

जरी लाल पांगार वाटे नवा

जुना तोच तेथे असे गारवा

कसा रोज कोकीळ गातो तिथे

दिसे आमराई सुहानी  जिथे

*

वसंतात चौफेर रंगावली

फुलाच्यांच आहेत साऱ्या झुली

सुखासीन सारी मुलेमाणसे

जमीनीत आता  सुखाचे ठसे

*

कशी साठवू आज डोळ्यात मी

निळ्या ,लाल रंगातली मौसमी

सुगंधात न्हाते ,फुले मोगरा

जणू जीव झाला बसंती-धरा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ चारोळ्या… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

घन अंधारी, नदीकिनारी

एक काजवा लहरत जाई

प्रकाश टिंबे मांडितो परि तो

जळतही नाही, विझतही नाही.

*

तप्त रस सोनियाचा

खाली आला फुफाटत

सारा शांतला शांतला

फुलाफुलांच्या देहात

*

किती आवेग फुलांचे

वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही

उभ्या उन्हात जाळते.

*

किती कशा भाजतात

उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ

बहाव्याच्या फूलमाळा

*

किती किती उलघाल

होते काहिली काहिली

एक लकेर गंधाची

सारे निववून गेली

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गझल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काय सांगू गझल हीतर राम आहे

ईश्वराच्या साधनेचे प्रेम आहे

*

ध्यास आहे जो जयाच्या अंतरीचा

तोच येथे गझल होतो नेम आहे

*

मानता नाजूक नाते कृष्ण राधा

कोण सांगा राधिकेचा शाम आहे

*

लावली ज्याने समाधी साधनेची

गझल त्याला लाभलेले दाम आहे

*

शब्द असतो बांधलेला भावनेशी

त्यात अवघा साठलेला जोम आहे

*

माणसाला माणसांची जाण नाही

कोण येथे जाणणारा व्योम आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य…… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

भ्रष्टाचाराचे भवितव्य… ☆ श्री सुनील देशपांडे 

आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा आदर्श म्हणून स्वीकार केला परंतु प्रशासन ही लोकशाहीची शोषण यंत्रणा ठरली हे सुद्धा नाकबूल करून चालणार नाही. एके काळचे स्वतः पंतप्रधान जेव्हा सांगतात की एक रुपयांपैकी ८५ पैसे यंत्रणेमध्ये गायब होतात आणि प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसे पोहोचतात. याचा अर्थ प्रशासन यंत्रणा ही ८५% भ्रष्टाचारी आहे आणि शोषक आहे. प्रशासन यंत्रणेवर एवढा मोठा आरोप करून सुद्धा इतकी वर्ष होऊनही त्या आरोपाचे खंडन सुद्धा प्रशासन यंत्रणेतील कोणीही अजून पर्यंत केले नाही. भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासन यंत्रणेपासून झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात मूठभर ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून राज्य करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे होते. प्रशासन यंत्रणा ही राज्यकर्त्यांची बटीक झाली ही फक्त पगारामुळे नव्हे, तर त्यांना मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या स्वातंत्र्यामुळे झाली. राज्यकर्त्यांपुढे लाचार होण्याचे भ्रष्टाचार हे सर्वात प्रमुख कारण होते. या प्रशासन यंत्रणेच्या भ्रष्टाचार स्वातंत्र्यामुळेच ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर एकतंत्री राज्य करणे शक्य झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रशासन यंत्रणा ब्रिटिश कालीन प्रशासन यंत्रणेप्रमाणे जशीच्या तशी चालू राहिली. त्यावर अंकुश ठेवणे राजकीय सत्ताधाऱ्यांना संपूर्णपणे कधी जमलेच नाही. उलट पक्षी त्या प्रशासन यंत्रणेनेच स्वतःच्या सोयीसाठी हळूहळू राजकीय सत्ताधाऱ्यांनाच भ्रष्टाचारी जगामध्ये ओढून घेतले.

 आता जर राज्यकर्त्यांना खरोखरच काही करायचं असेल तर त्यांना दुसऱ्या एखाद्या अभिनव पद्धतीने प्रयत्न करून बघावे लागतील. त्याचेही भले बुरे परिणाम कालांतराने दिसतीलच. त्यानंतर नवीन काही प्रयोग होतीलच.

नव्हे त्यांना ते तसे करावेच लागतील.

मला अजून आठवते ज्यावेळी मा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक व्यंगचित्र आले होते. एक व्यक्ती त्यांना म्हणते आता तुम्ही पंतप्रधान झाले आहात तर सर्व भ्रष्टाचा-यांना दूर करा.

त्यावर ते असे उत्तर देतात ‘ If I have to remove all corrupt persons, then, one man cannot run the government’

व्यंगचित्रकाराने अगदी वर्मावरच बोट ठेवले होते.

मी जर भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करायची असेल तर काही दिवस माझ्या कार्यालयात सुद्धा भ्रष्टाचारी असतील तरी त्यांचे बद्दल लगेच कारवाई करता येणार नाही. तशी केली तर माझ्या कार्यालयामध्ये स्टाफच राहणार नाही. जर मी माझ्या पक्षातल्या लोकांवर प्रथम कारवाई करायची ठरवली तर माझे पद व अधिकार सुद्धा राहणार नाही.

शुद्धीकरणाची सुरुवात आता दूर वरून बाहेरून आत मध्ये करण्याची गरज आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या दूरच्या लोकांच्यावर आणि विरोधी पक्षांवर कारवाई प्रथम सुरू करणे हाच पर्याय शिल्लक उरतो. फक्त एवढेच व्हावे की विनाकारण चांगल्या व्यक्तींना त्रास होऊ नये. जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे वरच कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही धडाक्याने चालू आहे हे पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस स्व पक्षातले किंवा जवळचे लोक सुद्धा त्या भीतीने भ्रष्टाचारामधून मुक्त झाल्यास उत्तमच. बाहेरची कार्यवाही हळूहळू पूर्ण झाल्यास, सगळ्यात शेवटी स्वतःच्या जवळच्या लोकांच्यावर कार्यवाही सुरू करता येईल.

अशा तऱ्हेचा एक नवीन पॅटर्न जर राबवता आला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःच्या पक्षात सामावून घेतलेले भ्रष्टाचारी लोक सुद्धा आत्ताच्या वॉशिंग मशीन मुळे नाही पण नंतरच्या ब्रेन वॉशिंगमुळे भ्रष्टाचारापासून दूर राहतील असा एक प्रयोग जर करत असतील तर काही हरकत नाही.

आत्तापर्यंतच्या परंपरेने जे काही चालले आहे त्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने पण सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता असेल तर एक नवा प्रयोगही करून पाहायला हरकत नाही. फक्त अशा कारवाया करताना विरोधी पक्षाचे असले तरीसुद्धा त्यापैकी खरोखरच भ्रष्ट असतील त्यांच्यावरच कार्यवाही व्हावी. विनाकारण विरोधातले म्हणून बदनामीसाठी त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु ती कार्यवाही न्याय यंत्रणे मार्फत व कायदेशीर मार्गानेच होणे आवश्यक असल्याने त्याला कालावधी प्रचंड मोठा लागणार आहे. ही त्यातली अडचणीची बाब ठरू शकेल. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. सध्या बहुता तसेच घडते आहे. कारवाईची सुरुवात जोर जोरात गाजावाजा करून होते आहे. एकदा ती न्याय यंत्रणेच्या चक्रामध्ये अडकवून टाकली की मग शांतता कोर्ट चालू आहे! ती केस केव्हा निकाली निघू शकेल हे कोणी सांगू शकेल काय?

सध्या तरी अनेक प्रकाराने यंत्रणेमध्ये बदल करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे छोटेखानी प्रयत्न चालू आहेत. लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करणे. ऑनलाइन पद्धतीने काही गोष्टी केल्याने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज भासू नये. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतील असे पाहणे. यातूनही खूप फरक पडतो आहे, पडला आहे.

काही बाबतीत सरकारी यंत्रणांची काही कामे खाजगी यंत्रणांकडे दिल्यास जो पैसा भ्रष्टाचारामधून काळ्याधना मध्ये जात होता, तो अधिकृतपणे खाजगी यंत्रणांना मिळाल्यास काय हरकत? लोकांचीही सोय आणि ती सोय झाल्यामुळे त्यांची चार पैसे खर्च करण्याची तयारी याचा सुवर्णमध्य निघेल. सध्या अशी यंत्रणा पासपोर्टच्या संबंधात वापरली जात आहे ती यशस्वीही होत आहे असे दिसते.

अशा वेगवेगळ्या मध्यस्थ सेवा निर्माण केल्यास लोकांचीही सोय होईल आणि रोजगाराचीही निर्मिती होईल. अनेक सरकारी यंत्रणांमध्ये आता ऑनलाईन अर्ज विनंती ही पद्धत सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही ऑनलाईन पद्धती पडत नाही. अशावेळी तरुणांसाठी अशा सेवांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती निर्माण करता येईल. सध्या रेल्वे, विमान इत्यादी आरक्षण सेवा अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि जनतेच्या उपयोगाची सुद्धा आहे. जुन्या पद्धतीने सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालून कंटाळून शेवटी नाईलाजाने खुर्चीवरील बाबूला पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घेत असत. त्याऐवजी आता झालेले ऑनलाईन कामाचे प्रकार याबाबत सेवा देणाऱ्या बेरोजगार तरुणांना पन्नास शंभर रुपये सेवा शुल्क त्यांचे कडून ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेणे हे जास्त योग्य होईल. अशाप्रकारे

सामान्य जनतेची क्रयशक्ती जेवढी असेल त्यातून विविध सेवा उद्योगांना जास्त कामाची संधी मिळेल. त्यामुळे सामान्यजनांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे यावर भर दिला जाणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजना राबवून सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळता ठेवण्याची योजना राबवत आहे का ? पण त्याचवेळी ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली तर ही गोष्ट सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीने धोकादायक आणि नुकसानीची ठरेल. त्यामुळे अशा योजना या फक्त मर्यादित कालावधीसाठी किंवा वेगळ्या पद्धतीने परंतु त्यामधील धोके टाळून राबवता येणे शक्य आहे काय याचाही विचार करून अत्यंत कौशल्याने योजनांची निश्चिती करणे आवश्यक ठरेल.

उद्योग व्यवसायामध्ये सरकारी यंत्रणांची लुडबुड कमी करणे. कर प्रणालीचे सुलभीकरण. अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन सरकारी कामकाजाचे सुलभीकरण. अशा विविध गोष्टी करण्याचा हळूहळू प्रयत्न चालू आहे असे दिसते.

या सर्व प्रयत्नांचे योग्य ते परिणाम कालांतराने दिसतीलच कारण हे परिणाम झपाट्याने होत नसतात, परंतु त्यासाठी एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. सरकार जरी बदलले पक्ष जरी बदलले तरी हे बदल पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा परिणाम शून्य.

अर्थात भविष्यावर नजर ठेवून वाट पाहणे, याशिवाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या नशिबात दुसरे काय आहे?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चैत्रपालवी… भाग – १  + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)

या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.

आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.

ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.

एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.

“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “

कधी तिची आईच म्हणायची,

” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “

कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.

त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.

या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये? 

सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.

श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.

श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”

असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.

पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “

” मग?”

त्यानंतर डॉक्टर म्हणाले,

” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “

खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.

आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.

यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.

त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,

” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”

“म्हणजे?” नंदाने विचारले.

” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “

नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,

” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “

पण असं होत नाही ना?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “Training and Employment Centre: एक आढावा…!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ Training and Employment Centre : एक आढावा…!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

याचना करणाऱ्या मंडळींसाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र सुरू करत आहोत. तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

पण तयारी झाली झाली, म्हणता म्हणता, एक एक गोष्ट आठवत आहे, आणि त्या तयारीत दिवस निघून जात आहेत.

काहीही असो, अक्षय तृतीयेपासून हे सेंटर पूर्ण जोमाने काम करायला सुरुवात करेल.

दुसऱ्यांचे काही “शुभ” होत असेल तर “चिंता” करणारे अनेक शुभ(?)चिंतक आपल्या सर्वांच्या आसपास असतात.

अशापैकी अनेकांचे अनेक सवाल…

‘डॉक्टर हे लोक खरंच काम करणार का ??? 

ते सेंटरवर येणार का ??? 

बसचा पास काढून दिला तरी सुद्धा हे लोक बस मधून येऊ शकतील का ???’

अगदी मनापासून सांगायचं तर आमच्या या एम्प्लॉयमेंट सेंटरची बातमी जेव्हा आमच्या भिक्षेकरी समाजात सांगितली, तेव्हापासूनच इथे कामाला येण्यासाठी, आमच्या लोकांची चढा ओढ सुरुवात सुरू झाली.

साडेतीनशेच्या वर माझ्याकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. आणि अजूनही दिवसागणिक ते वाढत आहे.

कामाला येणाऱ्या लोकांची संख्या पाहून माझे डोळे दिपले…!

पण इथे मात्र मी कमी पडलो….!

रोज 200 रुपये प्रमाणे एका महिन्याच्या चार सुट्ट्या सोडून 5200 रुपये होतात.

सुरुवातीला 30 लोकांना जरी आपण कामावर घेतले, तरी दर महिन्याला मला रुपये 1,56,000 (एक लाख छप्पन्न हजार रुपये) इतका पगार वाटावा लागणार आहे.

कच्चा माल आणि इतर अनेक खर्च वेगळे…

इतका निधी दर महिन्याला माझ्याकडे जमा होणार का ? 

ज्या विश्वासाने माझ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून कामासाठी नोंदणी केली आहे, त्यांचा विश्वास माझ्याकडून तुटला तर जाणार नाही ना ? या विचाराने रात्र रात्र झोप येत नाही…!

असो…

सुरुवातीला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींवर फोकस केला आहे.

कोणती बस पकडायची, कुठे उतरायचे, कसे जायचे याची काल आम्ही रंगीत तालीम केली.

कामासाठी ज्यांची निवड केली आहे, अशा सर्वांना PMT बसमधून घेऊन आलो.

या सर्वांची भीक मागणे सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, स्वयं प्रकाशित होऊन “मध्यरात्रीचे सूर्य” होण्याची मनापासून असलेली “मनीषा” पाहून भारावून गेलो…!

All is well…. All is well…. असं सतत स्वतःशी म्हणत पुढे पुढे सरकत आहे…

जे करतो आहे ते आपणा सर्वांच्या साथीने…. 🙏 🙏

पुढे जे होईल ते कळवित राहीनच….

आपले स्नेहांकित,

डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे 

11 एप्रिल 2025

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी परशुराम जन्मोत्सव आहे. — त्यानिमित्ताने सादर.) 

|| कराभ्यां परशुं चापं दधानं रेनुकात्मजम ||

|| जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम || १ ||

*
|| नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम || 

|| मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनं || २ || 

*
|| भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम || 

|| गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम || ३ ||

*
|| वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम || 

|| तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम || ४ || 

*
|| परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः || 

|| रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम || ५ || 

*
|| शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं || 

|| रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ || 

*
|| मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं || 

|| य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

*
॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीपरशुरामस्तोत्रं संपूर्णम् ॥

☆ ☆ ☆ ☆

☆ श्री परशुराम स्तोत्र : मराठी भावानुवाद  ☆

रेणुका तनय धनुर्धारी हाती परशु धारिला

जामदग्नी भार्गव रामा नमन क्षत्रियसंहारकाला ॥१॥

*
भार्गव रामासी वंदन रेणुकाचित्तनंदना नमन

मातृसंकट विमोचक अद्भुत क्षत्रियांचा विनाशन ॥२॥

*
दक्ष भयभीत स्वजनांस्तव दक्ष धर्मा रक्षित 

प्रिय गतवर्गासी वीर जमदग्नी जिवलग सुत ॥३॥

*
महादेवा केले वश दृप्तभूप कुलाचा नाश

तेजोमय कार्तवीर्य संहारक करी भवभयनाश ॥४॥

*
दक्षिण करात परशु धरिला वाम हस्ते धरी धनू

भृगुकुलवंशज रमणीय मनोहारी घनश्याम तनू ॥५॥

*

शुद्ध बुद्ध महाप्रज्ञावान पण्डित रणधुरंधर

श्रीदत्तकरुणापात्र राम विप्रगणांचे करी रंजन ॥६॥

*
चिरंजीव पावन पंथे शोषितो अंश सागराचा 

जपतो जो राम नामासी प्रसाद तया कार्यसिद्धीचा ॥७॥

*

॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचित निशिकान्त भावानुवादित श्रीपरशुरामस्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परमेश्वरा!” – अनुवाद: श्रीमती स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “परमेश्वरा!” – अनुवाद: श्रीमती स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी

की हत्ती नाही करत विचार वजन कमी करण्याचा

 

कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची

घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची

 

हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी

आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी

 

सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची

जिराफाचे नाही झिजत माकडहाड किंवा मणका कधी

 

पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी

आणि चोवीस तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी

 

उच्च स्वरात कूजन करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी

पक्षी नाही अपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधी

 

मग आपल्यालाच का भय चिंता कंटाळा थकवा झीज स्खलन

काळजी माया भोग आणि रोग ..!

 

पशु पक्ष्यांसारखे सहज सोपे साधे

जगता आले तर !

प्रयत्न तर करून बघावा

 

मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा!

कोणताही अर्ज केला नव्हता

नव्हता लावला कोणताही वशिला

तरीही

डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यंत

चोवीस तास रक्त प्रवाहित ठेवतोस

जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस

निरंतर पडत राहतात ठोके हृदयाचे लयबद्ध

असं ते कोणतं यंत्र बसवलं आहेस देवा!

 

पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत

निर्वेध संदेशवहन करत राहतोस

कोणती शक्ती आहे ही ..नाही कळत मला.

 

हाडं आणि मांस यांच्यामधून वाहणारं रक्त

याचे मूळ आणि अर्थ कसे मी शोधावे 

 

हजार हजार मेगापिक्सेलवाले दोन कॅमेरे

अहोरात्र बारीक बारीक दृश्य टिपत असतात

 

दहा हजार चवी आणि अगणित संवेदनांचा अनुभव देऊ शकणारी

जिव्हा नामक अफाट सेन्सर प्रणाली

 

विविध फ्रिक्वेन्सीचे आवाज काढणारी स्वरप्रणाली

आणि येणाऱ्या असंख्य आवाजाचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान

 

७५ टक्के पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या

त्वचेवर असणारी कोट्यवधी छिद्रं

पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेजचा

 

कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ

गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावलं कधीही

 

केवढी अजब रचना, काळजी, शक्ती, यंत्रणा, प्रतिपाळ

स्मृती शांती समज ही …… सगळंच अदभूत अविश्वसनीय

माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणता तंत्रज्ञ बसला आहे न कळे

या सगळ्याचे भान ज्ञान राहू दे बस,

तूच बसवलेल्या वसवलेल्या आत्म्यामध्ये. 

राहो सदबुद्धी कृतज्ञता स्मरण चिंतनाचे भान

हीच एवढी प्रेरणा प्रार्थना.

परमेश्वरा …. तू कोण कुठे असशील त्या चरणी.

अनुवाद  : श्रीमती स्मिता गानू जोगळेकर

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जीवनरंग” – लेखिका : सौ. पुष्पा प्रभुदेसाई ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “जीवनरंग” – लेखिका : सौ.  पुष्पा प्रभुदेसाई ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  जीवनरंग 

लेखिका : सौ. पुष्पा प्रभूदेसाई, मो. ९४०३५७०९८७

प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 

 ९८५०६९९९११

मूल्य : रु. ३२०/-


सौ.  पुष्पा प्रभुदेसाई

☆ जीवनरंग —विविधरंगी जीवनाचे चित्रण ☆

 मिरज येथील सो. पुष्पा प्रभूदेसाई यांचे ‘जीवनरंग’ हे पहिलेच पुस्तक. ते २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. लेखिकेने स्वतःचा परिचय करून देताना स्वतःला ‘गृहिणी ‘ असे म्हटले आहे. त्यामुळे संसाराशी संबंधित कथा किंवा लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती. पण हा लेख संग्रह वाचून झाल्यावर वाटू लागले की लेखिका ही फक्त गृहिणी नसून तिच्यात एक प्राध्यापिका लपलेली आहे व या लेखसंग्रहामुळे ती आपल्या समोर आली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, या संग्रहातील लेख हे विविध विषयांवरील व अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहीलेले आहेत. केवळ विषयांची विविधता नव्हे तर तो विषय स्वतः समजून घेऊन तो दुस-यालाही समजावून सांगायचा आहे ही तळमळ त्यांच्या लेखनातून दिसून येते. यातील अनेक लेख पूर्वी दैनिके, दिवाळी अंक यातून प्रकाशित झाले आहेत. काही लेख निरनिराळ्या निबंध स्पर्धांना पाठवलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्पर्धेत पुरस्कारही मिळवले आहेत, ज्यात राज्य स्तरीय प्रथम पुरस्कारांचाही समावेश आहे. यावरुनच या लेखांच्या अभ्यासपूर्णतेची कल्पना येईल.

विषय साधा असो किंवा विशेष माहितीपूर्ण, अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा असल्यामुळे कोणताच लेख कंटाळवाणा वाटत नाही. उलट, लेखिकेने स्वतःची मते मांडताना काही काव्य पंक्ती, सुभाषिते यांचा वापर केलेला असल्यामुळे लेखांचे लालित्य वाढत गेले आहे. लेखिकेला पशू, पक्षी यांबद्दल विशेष सहानुभूती असल्यामुळे त्यांच्याविषयी लिहीताना मात्र त्यांच्यातील गृहिणी दिसून येते. तसेच आपला देश आणि थोर विभूती यांच्याविषयी लिहीताना त्यांच्या मनातील देशप्रेम व आदर अगदी सहजपणे व्यक्त होतो. त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार व त्यांनी त्यांची केलेली जपणूक त्यांच्या लेखनातून सहजपणे प्रतिबिंबित होते.

या लेखसंग्रहात एकूण सत्ताविस लेख समाविष्ट आहेत. काही लेख आकाराने लहान असले तरी विषयांची गरज लक्षात घेऊन लेखन केले असल्यामुळे त्यात अपुरेपण जाणवत नाही. आकाराने मोठे असलेले लेख हे माहीतपूर्ण व अभ्यासपूर्ण आहेत. लेखाच्या आकारापेक्षा आशय महत्वाचा असल्यामुळे सर्वच लेख वाचनीय झाले आहेत.

या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर लेख लिहीलेले आहेत.

‘मला भावलेला गणेश ‘ या पहिल्याच लेखातून त्यांनी गणेशाच्या त्यांच्या कल्पना सांगताना ज्ञानमय, विज्ञानमय अशा गणेशाचे दर्शन घडवले आहे.

‘पर्यावरण आणि मी ‘ आणि ‘वटवृक्षाची सावली ‘ या दोन लेखांमध्ये लेखिकेने पर्यावरणाचे महत्त्व, त्याची होणारी हेळसांड, निसर्गाविषयीची माणसाची उदासीनता याविषयी सविस्तरपणे लिहीले आहे. वटवृक्षाचा इतिहास, महत्व, पौराणिक संदर्भ देऊन या वृक्षाचे जतन करणे कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले आहे.

‘ अखंड सावधपण ‘ या लेखात निसर्गातील लहानसहान पशुपक्षी हे सतत किती सावध असतात व त्यांचा हा सावधपणा माणसाने कसा शिकण्यासारखा आहे हे पटवून दिले आहे. अमीबा, वाळवी, मुंग्या, झुरळ यांसारखे कीटक, नाकतोडा, टोळ, मधमाशा, कुंभारीण यांसारख्याचे सावधपण, विविध जलचरांचे सावधपणा, बदक, राजहंस, कोंबडी, सुगरण पक्षीण या सा-यांविषयी लिहिलेले वाचताना मनोरंजन तर होतेच पण आपले ज्ञानही वाढते. याशिवाय अस्वल, गेंडा, मोर, कुत्रा यांविषयीही त्यांनी लिहिले आहे. निसर्गात प्राणी, पक्षी सावध असतातच पण झाडांना देखील सावधपणा असतो, संवेदना असतात हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. हे संपूर्ण लेखन वाचताना लेखिकेच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक करावेसे वाटते.

‘सहवासातून जीवन घडते’ हा लेख म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी लेखिकेला असलेले प्रेम, सहानुभूती यांचे दर्शन घडवणारा लेख आहे. वृक्ष, वेली, वनस्पती यांच्यापासून उत्तम नैसर्गिक औषधे मिळत असतात. त्यांचे जतन, संवर्धन कसे करावे याविषयी सांगणारा लेख म्हणजे ‘वनौषधी संरक्षण’. काही दिवस चालवलेल्या स्वतःच्या टेलिफोन बूथ सेवेतून त्यांनी जपलेली समरसता ‘ सामाजिक समरसता ‘ या लेखातून स्पष्ट होते.

समान विकासासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नदीजोड प्रकल्प असे लेखिकेने आवर्जून सांगितले आहे. त्यांनी लिहीलेला ‘ नदीजोड प्रकल्प ‘ हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीलेला लेख आहे. या प्रकल्पाची ज्याला काहीही माहिती नाही त्याने हा लेख वाचल्यास संपूर्ण प्रकल्पाची कल्पना येऊ शकते.

असाच आणखी एक अभ्यासपूर्ण लेख म्हणजे ‘ भारतीय समृद्ध रेल्वे ‘ हा होय. भारतातील पहिल्या रेल्वेपासून अगदी या लेखाच्या लेखनापर्यंत झालेल्या प्रगतीचा आलेखच त्यांनी मांडला आहे. भारतीय रेल्वेचा व्याप किती मोठा आहे व तिला समृद्ध का म्हटले आहे हे लेख वाचल्यावरच समजून येईल.

‘ विवेकानंद स्थापित रामकृष्ण मिशनचे ऐतिहासिक कार्य’ या लेखातही त्यांनी मिशनचा सुरुवातीपासूचा इतिहास कथन केला आहे. सुरुवातीची बिकट अवस्था व नंतर होत गेलेला विस्तार व कार्य पाहून मन थक्क होते.

जनावरांसाठी समाजसेवा करणा-या संस्था, स्थानिक लोक, स्वतः:चा सहभाग याविषयी त्या ‘ माणुसकिचे व्रत ‘ या लेखात लिहीतात. दुस-या एका लेखात त्या त्यांना आवडलेल्या एका पुस्तकाविषयी लिहीतात. ‘ विश्व चैतन्याचे विज्ञान ‘ या डॉ. रघुनाथ शुक्ल या प्रकांड पंडित शास्त्रज्ञाचे हे पुस्तक असून अध्यात्म आणि विज्ञान यातील ज्ञानाचा संगम घडवणारे हे पुस्तक एकदा तरी वाचावे असे आहे याची खात्री पटवून देणारा हा लेख आहे.

‘आनंदाचे डोही ‘ हे अमरनाथ यात्रेचे सुंदर प्रवास वर्णन आहे तर ‘ एक झोका ‘ हे ‘ व्यक्तीचित्रणं.!. ‘ भक्तीयोग ‘ या लेखातून गीतेतील भक्तीयोगाविषयी त्या लिहितात. काही लेखांची शिर्षके त्यातील विषय स्पष्ट करतात. उदा. – मुलांना कसे वाढवावे ?, वृद्धाश्रमाची गरज काय आहे ?, विधुर(एक आत्मचिंतन) इत्यादी. पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी सण म्हणून एकच असले तरी ती साजरी करण्याची पद्धत कशी बदलत गेली आहे हे त्यांनी ‘ दिवाळी–कालची आणि आजची ‘ या लेखातून पटवून दिले आहे. मराठी भाषेविषयीचे त्यांचे प्रेम आणि आदर ‘ मराठीचा बोलू कौतुके ‘ या लेखातून व्यक्त होते.

जगताना आपण जीवन भरभरुन अनुभवणे आणि त्याचे विविध रंग इतरांनाही उलगडून दाखवणे यात लेखिका सौ. पुष्पा प्रभूदेसाई यशस्वी झाल्या आहेत. म्हणूनच या लेखसंग्रहाचे ‘जीवनरंग ‘ हे शिर्षक सार्थ ठरते. याच वृत्तीने त्यांनी अधिकाधिक लिहावे व जीवनाच्या सर्व अंगांचे दर्शन घडवावे यासाठी त्यांना शुभेच्छा.!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 99 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 5 ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

इस सप्ताह से प्रस्तुत हैं “चिंतन के चौपाल” के विचारणीय मुक्तक।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 99 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 5 ☆ आचार्य भगवत दुबे ✍

मुरझाये देखती कभी चेहरे जो लाल के, 

रखती कलेजा सामने थी माँ निकाल के,

बीमार वृद्ध माँ को उसके समर्थ बेटे 

असहाय छोड़ देते हैं घर से निकाल के।

0

कोई तीरथ न माँ के चरण से बड़ा, 

माँ का आँचल है पूरे गगन से बड़ा, 

माँ की सेवा को सौभाग्य ही मानना 

कोई वैभव न आशीष धन से बड़ा।

0

सम्बन्धों के तोड़े जिनने धागे होंगे, 

तृष्णा में घर-द्वार छोड़कर भागे होंगे, 

छाया कहीं न पायेंगे वे ममता वाली 

पछताते वे जाकर वहाँ अभागे होंगे।

0

खुद रही भींगी हमें सूखा बिछौना दे दिया 

भूख सहकर भी हमें धन दृव्य सोना दे दिया 

कर दिया सब कुछ निछावर माँ ने बेटों के लिए

वृद्ध होने पर उसे, बेटों ने कोना दे दिया।

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares