ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

चित्र – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

दीपोत्सवी या सजली धरणी
चांदण्याच जणू आल्या भूवनी
मंगलवाद्ये मंगल समयी
लक्ष्मी पुजन घराघरातूनी

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ४ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

आली दिवाळी आनंदाची

आज दिवाळी. आज लवकर उठून ‘मोती’स्नान झाले आहे. घरा-दारात, अंगण-ओसरीत पणत्यांची आरास सजली आहे . इमारती विद्युत माळांनी लखलखत आहेत.

आज श्रीकृष्णाने नरकासुर या दुष्ट राक्षसाचा पहाटे वध  केला आणि सारा प्रदेश भयमुक्त केला, अशी पुराणकथा आहे. म्हणून सकाळी उठून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करायचा ही परंपरा॰  उत्तरप्रदेश , दिल्ली इ. भागात ज्याप्रमाणे दसर्‍याला रावण दहन करण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे गोव्यामधे नरकासुर दहनाची प्रथा आहे. तिथे वेगवेगळ्या भागात नरकासुराचे कागदी पुतळे तयार करतात. त्याच्या पोटात फटाके वगैरे दारू भरतात. आदल्या रात्री नरकासुराची मिरवणूक काढली जाते. आपण नाही का अनंत चतुर्दशीला गणपतीची मिरवणूक काढत, तशी इथे नरकासुराची मिरवणूक निघते आणि नरक चतुर्दशीच्या पहाटे त्याचे दहन केले जाते.

दिवाळी हा दिव्यांचा उसव. तुमचं सारं जीवन प्रकाशाने उजळो, असा संदेश देणारा हा दीपोत्सव. पण काहींच्या जीवनातला अंधार या दीपोत्सवानेही जात नाही. अशांच्यासारख्या जीवनात प्रकाशाची वाट उलगडणारी एक व्यक्ती म्हणजे डॉ. तात्याराव लहाने. आज थोडं त्यांच्याविषयी—

सरकारी रुग्णालये म्हणजे अनास्था, निष्काळजीपणा या विचारांना छेद देणारा, रुग्णासेवेचं एक आगळं वेगळं मॉडेल म्हणजे तात्याराव लहाने. त्यांनी मुंबईच्या जे.जे. इस्पितळाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागाला नेटका, सुबक आकार आणला आहे. आपल्या टीमला रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आणि कार्यक्षम बनवून, त्यांनी लाखो गरीब, गरजूंना दृष्टी मिळवून दिली. २००७ पर्यन्त त्यांनी मोतीबिंदूच्या एक लाख यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्याबद्दल शासनाने त्यांना २००८ मधे ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. आपल्या विभागात स्वच्छता राहते आहे ना, इकडे त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिले. २००४मधे जे.जे. रुग्णालयात रेटिना विभागाची सुरुवात त्यांच्या प्रयत्नाने झाली. . अद्ययावत यंत्रणेने आपला विभाग त्यांनी सुसज्ज केला.

लातूर जिल्ह्यातील मकेगाव या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. शाळा शिकताना गुरे राखण्याचं काम त्यांनी केले.  पाझर तलाव फोडण्याचंही काम त्यांनी केलं. १० वी पर्यन्तचे त्यांचे शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे त्यांची हुशारी आणि शिक्षकांची मदत यामुळे ते डॉक्टर झाले. १९८१ साली त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून मेडिसीनची पदवी घेतली. या काळात त्यांनी आपल्या रूममेटचा स्वैपाक करून आपल्या जेवणाची सोय केली. ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत झाडांना पाणी घालण्याचं ते काम करत. अशी छोटी छोटी कामे करत ते एम.बी.बी.एस. झाले. १९८५ मधे त्यांनी ऑप्थल्मॉलॉजीमधे एम.बी.बी.एस.केले. 

९१ साली त्यांच्या दोन्ही किडन्या फेल गेल्या. त्यामुळे आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावं लागायचं. त्यावेळी ते आंबेजोगाईत होते. तिथे ही सोय नसल्यामुळे त्यांनी मुंबईला बदली मागून घेतली. ९५ साली त्यांच्या आईची किडनी त्यांना बसवण्यात आली. .हा आपला दुसरा जन्म आहे आणि तो गोर-गरिबांची सेवा करण्यातच घालवायचा, असा त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे ते वागले. आपल्यातला सेवाभाव त्यांनी आपले सहकारी आणि कर्मचारी यांच्यातही  रुजवला.

चंद्रपूर, नंदूरबार सारख्या दुर्गम समजल्या जाणार्‍या भागात, पब्लिक हेल्थ सेंटरच्या माध्यमातून कॅम्प घेतले. माहिती दिली. शस्त्रक्रिया केल्या. वंचित आणि गरजूंना सेवा पुरवण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. दर वर्षी ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात जात. तेथील कुष्ठरोग्यांवर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया करत. नेत्रदानासाठीही त्यांनी लोकांना उद्युक्त केले.     

समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात (१८फेब्रुवारी २०११) त्यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मिळाला. त्यांना छ्त्रपती शाहू पुरस्कारही २०२०ला  मिळाला. कधी कधी १८ ते २३ तास काम या कर्मयोग्याने केले आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या जीवनावर चित्रपटही निघाला आहे.

अशा कर्मयोगी डॉ. तात्याराव लहाने यांना आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी विनम्र अभिवादन  ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  /*खरे खुरे आयडॉल्स- युनिक फिचरच्या पुस्तकावरून

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचा उत्सव व्हावा…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याचा उत्सव व्हावा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे

ध्यास असावा नित नूतनाचा उगा कशाला झुरणे

लावीत जावे मनामनातून आनंदाचे झाड

धडपडताना जपत रहावे मूल मनातील द्वाड.

 

कशास बुरखे विद्वत्तेचे कशास आठ्या भाळी

वाचियले ते कुणी कधी का लिहिले काय कपाळी

फुलवित जाव्या चिवटपणाने स्वप्नफुलांच्या वेली

उगारील जो हात,तयाच्या हातावरती द्यावी टाळी.

 

असतील,नसतील सुंदर डोळे;तरी असावी डोळस दृष्टी

ज्याच्या त्याच्या दृष्टीमधूनी दिसेल त्याची त्याची सृष्टी

शोधित असता आनंदाला कधी न व्हावे कष्टी

मर्म जाणतो तोच करीतसे सुख सौख्याची वृष्टी.

 

वाट वाकडी असली तरीही सरळ असावे जाणे

काट्यामधूनी,दगडामधूनी जावे सहजपणाने

शोधित जाता ताल सुरांना सुचतील मधुर तराणे

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मी पूजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ लक्ष्मी पूजन  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अमावस्या  अश्विनाची

दिवाळीचा मुख्य सण

अंधाराला सारूनीया

प्रकाशात न्हाते मन. . . . !

 

धनलक्ष्मी सहवास

घरी नित्य लाभण्याला

करू लक्षुमी पूजन

हवे सौख्य  जीवनाला… !

 

धन आणि अलंकार

राहो अक्षय टिकून

सुवर्णाच्या पाऊलाने

यावे सौख्य तेजाळून.. . . !

 

प्राप्त लक्षुमीचे धन

हवा तिचा सहवास

तिच्या साथीनेच व्हावा

सारा जीवन प्रवास. . . . !

 

सुकामेवा ,  अनारसे

फलादिक शाही मेवा

साफल्याची तेजारती

जपू समाधानी ठेवा.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 85 – फराळ..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #85 ☆ 

☆ फराळ..! ☆ 

(दिवाळी निमित्त खास छोट्या दोस्तांसाठी.. बालकविता…!)

आई म्हंटली दिवाळीला

फराळ करू छान

फराळात चकलीला

देऊ पहिला मान..!

 

गोल गोल फिरताना

तिला येते चक्कर

पहिलं कोण खाणार

म्हणून घरात होते टक्कर..!

 

करंजीला मिळतो

फराळात दुसरा मान

चंद्रासारखी दिसते म्हणून

वाढे तिची शान..!

 

एकामागून एक करत

करंजी होते फस्त

फराळाच्या डब्यावर

आईची वाढे गस्त..!

 

साध्या भोळ्या शंकरपाळीला

मिळे तिसरा मान

मिळून सा-या एकत्र

गप्पा मारती छान…!

 

छोट्या छोट्या शंकरपाळ्या

लागतात मस्त गोड

दिसत असल्या छोट्या तरी

सर्वांची मोडतात खोड..!

 

बेसनाच्या लाडूला

मिळे चौथा मान

राग येतो त्याला

फुगवून बसतो गाल..!

 

खाता खाता लाडूचा

राग जातो पळून

बेसनाच्या लाडू साठी

मामा येतो दूरून..!

 

चटपटीत चिवड्याला

मिळे पाचवा मान

जरा तिखट कर

दादा काढे फरमान..!

 

खोडकर चिवडा कसा

मुद्दाम तिखटात लोळतो

खाता खाता दादाचे

नाक लाल करतो…!

 

दिवाळीच्या फराळाला

सारेच एकत्र  येऊ

थोडा थोडा फराळ आपण

मिळून सारे खाऊ..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दारावरती तोरण, अंगणी 

               ताजी सडा – रांगोळी 

                        अवतीभवती लखलखती 

                                     सांगती पणत्यांच्या ओळी 

                                                  आली, आली दिवाळी आली ——

——– दिवाळी आली आणि घरोघरी जराशी विसावली की मग ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते “ नरकचतुर्दशी “ या नावाने. या दिवशी नरकासुर या राक्षसाचा, कृष्ण, सत्यभामा, आणि काली यांनी वध केला, आणि त्याचा आनंद यादिवशी साजरा केला जाऊ लागला, अशी पुराणकथा तर सर्वश्रुतच आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी, म्हणजे चंद्रप्रकाशात , वाटलेले तीळ अंगाला चोळून मग अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे, आणि असे केल्याने, दारिद्र्य, दुर्दैव आणि अनपेक्षित अप्रिय घटना, यापासून संरक्षण होण्यास मदत होते, असेही मानले जाते. नंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून 

‘करट‘ नावाचे छोटे फळ पायाने चिरडणे, अशासारख्या प्रथाही आहेत. विचारांती असे जाणवते की या प्रथा-पद्धतींमागचा खरा आणि उदात्त हेतू हाच असावा की, ‘ आळस , वाईट विचार आणि त्यामुळे घडणारी वाईट कृत्ये यामुळे आयुष्यात नरकसदृश परिस्थिती निर्माण होते याची जाणीव सर्वच माणसांना व्हावी, आणि सर्वांच्याच आयुष्याला  सज्ञानाचा, सत्प्रवृत्तींचा , आणि सत्कर्मांचा प्रकाश सदैव व्यापून रहावा.’  

या दिवसाला — काळी चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी, भूत चतुर्दशी, काली चौरस, आणि नरक-निवारण चतुर्दशी– अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. 

हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो— 

कालीमातेने नरकासुराचा वध केला होता असे मानून काही भागात यादिवशी महाकाली म्हणजे शक्तीचे पूजन केले जाते. 

काही तमीळ कुटुंबांमध्ये या दिवसाला “ नोम्बू “ असे म्हणतात, आणि याच दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.

कर्नाटकात तसेच गोवा आणि तामिळनाडूमध्ये दिवाळी वसुबारसेला नाही, तर नरकचतुर्दशीला सुरु होते, असे मानतात. 

राजस्थान-गुजरातमध्ये याला “ काली चौरस “ असे म्हणतात. दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसांची काळी- म्हणजे वाईट नजर कोणावर पडू नये म्हणून कुलदेवतेचे पूजन केले जाते. याच सुमारास शेतातले नवे धान्य घरात आलेले असते, त्यासाठी यादिवशी देवाचे आभार मानले जातात. 

गोव्यात कागद-गवत आणि फटाके यापासून नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळा बनवून, त्याचे दहन केले जाते. तिथेही ‘ करट ‘ हे कडू फळ पायाखाली चिरडून जणू नरकासुराला चिरडून मारतात.  

पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेचा आदला दिवस “ भूत-चतुर्दशी “ म्हणून पाळला जातो. तिथे असा विश्वास बाळगला जातो की, या दिवशी आधीच्या चौदा पिढयांमधल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबातल्या हयात असलेल्या नातेवाईकांना भेटायला येतात. त्यावेळी त्यांना घराचा रस्ता कळण्यासाठी आणि घराभोवती घुटमळणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि दुष्ट शक्तींना हुसकावून लावण्यासाठी घराभोवती चौदा दिवे लावले जातात. घरातले अंधारे कोपरे-कोनाडे प्रकाशाने उजळून टाकले जातात. 

दक्षिण भारतातील काही भागात या दिवसाला “ दीपावली भोगी “ असे म्हटले जाते. म्हणजे दिवाळीचा आदला दिवस.

“विविधतेत एकता “ हे आपल्या देशाचे अनेक बाबतीत दिसणारे वैशिष्ट्य या दिवशीही प्रकर्षाने दिसून येते, कारण हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चालीरीतींनुसार साजरा केला जात असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्यामागील विचारात मात्र “संपूर्ण एकता “ आहे, असे निःशंकपणे म्हणायला हवे — आणि तो विचार म्हणजे– माणसाच्या मनातल्या विनाशकारक दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार-आचार, घातक सवयी, आणि एकूणच आयुष्य दुःखदायक आणि नरकसदृश्य  करणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा संपूर्ण विनाश व्हावा, आणि संपूर्ण मानवजातीलाच आनंदी- शांत- समाधानी, असे साफल्याने उजळलेले संपन्न आयुष्य जगता यावे. हाच विचार नरकासुरासारख्या इतर कितीतरी उदाहरणांचा प्रतीकात्मक उत्तम उपयोग करून, विविध सणांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा विचार ज्या ज्या  कुणी इतका जाणीवपूर्वक आवर्जून केला असेल, त्या सर्व महान माणसांना यानिमित्ताने कृतज्ञतापूर्ण  मनःपूर्वक नमस्कार. 

यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीतला हा महत्वाचा दिवस. या दिवशी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केले, ही पौराणिक कथा बहुतेकांना माहिती आहे. भारतीय संस्कृतीतील ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा मानली जाते. कारण अमावस्या, एरवी इतर अकरा महिन्यांमध्ये अशुभ मानली जात असली, तरी अश्विन महिन्यातली ही अमावस्या मात्र अतिशय शुभ मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, या अमावास्येच्या रात्री स्वतःला राहण्यासाठी योग्य असे स्थान शोधण्यासाठी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि ज्या घरी चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, आणि क्षमाशील पुरुष, आणि गुणवती, पतिव्रता स्त्रिया राहतात, त्या घरी रहाणे तिला आवडते. आत्ताच्या काळात मात्र लक्ष्मीचे हे योग्य घर शोधण्यासाठीचे जे निकष आहेत, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव लक्ष्मीने तरी करू नये अशी तिला मनापासून विनंती करावीशी वाटते, कारण पतिव्रता या शब्दात अपेक्षित असलेला एकनिष्ठपणा, आणि गुणसंपन्नता ही दोघांमध्येही असली पाहिजे. तसेच वर उल्लेखलेले गुणही दोघांनी , किंबहुना घरात राहणाऱ्या सर्वांनीच अंगी बाळगले, तरच ते पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी, आनंदी आणि इतरांना — आणि अर्थात लक्ष्मीलाही हवेहवेसे वाटेल —- पण हा विचार, काही अपवाद वगळता, जनमानसात अजून तरी म्हणावा तसा रुजलेला दिसत नाही याचा खेद वाटतो . असो.   

या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची संध्याकाळनंतर पूजा केली जाते. ही पूजा मुख्यतः धनलक्ष्मीची आणि कुबेराची केली जाते. पैसे, दागिने, व्यवसायाच्या वह्या, अशी चल आणि अचल लक्ष्मीची, थोडक्यात स्वतःकडे असणाऱ्या समृद्धीची ही पूजा असते.  तिच्यामुळेच आपण शक्य तितके सुखाचे जीवन जगू शकत आहोत ही कृतज्ञतेची भावनाच यावेळी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून, प्रार्थनांमधून व्यक्त होतांना दिसते. लक्ष्मीबरोबर कुबेराची पूजा  का ? तर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा संग्राहक समजला जातो. आणि संपत्ती कशी राखावी याची शिकवण त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते. 

चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती “ अलक्ष्मी “ समजली जाते, जिला अजिबातच पूजनीय म्हणता येत नाही, हे मात्र ही लक्ष्मीपूजा करतांना ध्यानात ठेवलेच पाहिजे.  जिथे सर्वतोपरी पावित्र्य, शुद्धता, सत्यता, आणि भक्ती असते तिथेच लक्ष्मी निवास करते. अशा ठिकाणी धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, आणि मुख्य म्हणजे गृहलक्ष्मीही समाधानी असणे गृहीत असते. घर स्वच्छ ठेवणाऱ्या केरसुणीचीही यादिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करणारी आपली थोर संस्कृती आहे खरं तर. पण एरवी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, कितीतरी घरांमध्ये गृहलक्ष्मीला केरसुणीसमानच  वागणूक दिली जात असल्याचे जाणवते. अशी घरे पाहतांना, “ यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे केरसुणी “ असे उलटे समीकरण आहे की काय ? ” असा उपरोधिक प्रश्न आपसूकच पडतो. म्हणून लक्ष्मीपूजनाचे बाकीचे सोपस्कार आणि प्रार्थना करतांना, “ आता माझी गृहलक्ष्मीच  या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याइतकी सक्षम आणि पुरेशी खंबीर होऊ दे गं लक्ष्मीमाते–कृपा कर.  माझे आयुष्य- माझे घर तिच्याशिवाय समृद्ध होऊच शकणार नाही — “  ही प्रार्थनाही प्रत्येक विचारी माणसाने फक्त  यादिवशीच नाही तर नेहेमीच  करावी ही माफक अपेक्षा आहे.

ही आणि आयुष्यातली यापुढची प्रत्येकच दिवाळी सर्वांना अतिशय सुख-शांती देवो या हार्दिक शुभेच्छा.   

       

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांदीकोपरे ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ सांदीकोपरे ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

एक व्यक्तिमत्त्व विकास शिबीर.दीदींनीच आयोजित केलेलं.प्रत्येकाने आपापलं होमवर्क वाचून दाखवून त्यावर चर्चा करण्याचं आजचं सत्र. ‘गतायुष्यातले असमाधानाचे प्रसंग आणि त्यांचं विश्लेषण’ हा होमवर्कचा विषय.

“मृणालिनीs”

दीदींनी नाव पुकारलं.मृणालिनी अस्वस्थ.कांहीशी गंभीर. शेजारीच बसलेल्या ओंकार कडे,तिच्या नवऱ्याकडे पहाणारी तिची चोरटी नजर.

“ओंकार,समजव बरं तिला.ती तुलाच घाबरतीय बहुतेक”.दीदी हसत म्हणाल्या. ओंकारने नजरेनेच तिला दिलासा दिला.ती उठली.दीदींनी पुढे केलेले कागद थरथरत्या हातात घेऊन सर्वांसमोर उभं राहून ते वाचताना ती भूतकाळात हरवली….

सुखवस्तू, प्रेमळ आईबाबांची ती मुलगी. सश्रध्द विचारांच्या संस्कारात वाढलेली. माहेरी कर्मकांडांचं प्रस्थ नव्हतं.तरी रोजची देवपूजा, कुलाचार, सणवार हौसेने साजरे व्हायचे.पण सासरी..?

तिचे सासरे स्वत: इंजिनिअर. स्वत:चं वर्कशाॅप नावारुपाला आणलेलं. ओंकार इंजिनिअर होताच आता सर्व सूत्रं  त्याच्याकडे.ओंकारचे कामाचे व्याप वाढत असतानाच त्याचं लग्न झालं. सासरघरची गरज म्हणून मृणालिनीने तिची आवडती नोकरी सोडली. पूर्णवेळचं गृहिणीपद स्विकारलं.तशी कुठलीच गोष्ट मनात घट्ट धरुन ठेवणारी ती नव्हतीच.सासू-सासरे दोघेही नास्तिक. त्यामुळे त्यांचाच (आणि अर्थात ओंकारचाही)हट्ट म्हणून त्याचं लग्न रजिस्टर पध्दतीनेच झालेलं.तेव्हाही तिने स्वतःच्या हौशी स्वभावाला मुरड घातली. सगळं आनंदाने स्विकारलं.

तरीही इथे रोजची देवपूजा नसणंच नव्हे तर घरी देवाचा एखादा फोटोही नसणं तिच्या पचनीच पडायचं नाही. अंघोळ करुनही तिला पारोसंच वाटायचं.

“आपण एक देव्हारा आणू या का छानसा?”ओंकारला तिने एकदा सहज विचारलं.

“भलतंच काय गं?आईदादांना आवडणार नाही आणि मला तर नाहीच नाही.”  थप्पड मारल्यासारखी ती गप्प बसली.त्या चुरचुरणाऱ्या ओरखड्यावर तिने स्वतःच फुंकर घातली.

बंगल्याभोवतीची बाग मग तिने नियोजन करुन आकाराला आणली.छान फुलवली.त्या बागेतल्या झोपाळ्यावर घटकाभर शांत बसलं की तिला देवळात जाऊन आल्याचं समाधान मिळायचं.तिचा छोटा सौरभ तर या बागेत हुंदडतच लहानाचा मोठा झालाय.

घर, संसार सांभाळताना तिने अशा तडजोडी केल्या ते आदळआपट करुन देवपूजेचं समाधान मिळणार नाहीच या समंजस विचारानेच.पण गेल्या वर्षीचा तो प्रसंग घडला आणि…

मृणालिनी वाचत नव्हतीच.जणू स्वतःशीच बोलत होती.

‘सौरभ जन्माला आला तेव्हापासून एक हौस आणि संस्कार म्हणून त्याच्या मुंजीचं स्वप्न मी मनाशी निगुतीनं जपलं होतं.त्याला आठवं लागताच उत्साहाच्या भरात मी आईदादांसमोर विषय काढला. आईंनी चमकून दादांकडे पाहिलं आणि दादा आढ्याकडे पहात बसले. त्यांची ही नि:शब्द, कोरडी प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती.

“तू ओंकारशी बोललीयस का?त्याच्याशी बोल आणि ठरवा काय ते”.

रात्री ओंकारकडे मुंजीचा विषय काढला.माझा उत्साह पाहून तो उखडलाच. ‘मुंजीचं खूळ डोक्यातून काढून टाक’ म्हणाला. ‘त्याची कांहीएक आवश्यकता नाहीs’असं ठामपणे बजावलंन्. आणखीही बरंच कांही बोलत राहिला.मला वाईट  वाटलं. त्याचा रागही आला.मन असमाधानाने, दु:खातिरेकाने भरुन गेलं. टीपं गाळीत ती अख्खी रात्र मी जागून काढली.

या घटनेला एक वर्ष उलटून गेलंय.या होमवर्कच्या निमित्ताने याच प्रसंगाकडे मी तटस्थपणे पहातेय. मला जाणवतंय की ती रात्रच नव्हे तर पुढे कितीतरी दिवस मी अस्वस्थच होते. कुणीतरी आपलं हक्काचं असं कांहीतरी हिसकावून घेतलंय ही भावना मनात प्रबळ होत गेली होती.

आज मी मान्य करते की माझ्या असमाधानाला फक्त ओंकारच नाही,तर मीच कणभर जास्त जबाबदार आहे.ओंकारने सांगायचं आणि मी हो म्हणायचं ही सवय मीच त्याला लावली होती. मलाही मन आहे,माझेही कांही विचार,कांही मतं असू शकतात हे मला तरी इतकं तीव्रतेने जाणवलं कुठं होतं?सौरभच्या मुंजीला ओंकारने नकार दिला आणि माझा स्वाभिमान डिवचला गेला. हे सगळं नंतर मी कधीच ओंकारजवळ व्यक्त केलं नाही.करायला हवं होतं. ते ‘बरंच कांही’ अव्यक्तसं मनाच्या सांदीकोपऱ्यात धुळीसारखं साठून राहिलंय.आज मनातली ती जळमटं झटकून टाकतेय….!

ओंकार,खरंच खूप कांही दिलंयस तू मला.पण ते देत असताना त्या बदल्यात माझं स्वत्त्व तू स्वत:कडे कसं न् कधी गहाण ठेवून घेतलंस समजलंच नाही मला.त्या रात्री तुझ्या प्रत्येक  शब्दाच्या फटकाऱ्यांनी तू मला जागं केलंयस.

आपल्या घरात देव नव्हते.आईदादांनी तुला दिलेला त्यांच्या नास्तिकतेचा हा वारसा. आस्तिक असूनही मी तो स्विकारला.माझ्या आस्तिकतेचे देव्हारे मात्र मी कधीच मिरवले नाहीत. पण तुमच्या लेखी या सगळ्याला किंमत होतीच कुठे?

माझी एकच इच्छा होती. सौरभची मुंज करायची.योग्य ते संस्कार योग्यवेळीच करायचे. त्याच्या जन्मापासून मनात जपलेली एकुलत्या एका मुलाच्या मुंजीतल्या मातृभोजनाची उत्कट असोशी.तू खूप दिलंस रे मला पण ही एवढी साधी गोष्ट नाही देऊ शकलास.तू मला झिडकारलंस. ‘असल्या थोतांडावर माझा विश्वास नाही’ म्हणालास. मग माझ्या विश्वासाचं काय? ‘तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या बाबतीत मी म्हणेन तसंच होणार’ एखाद्या हुकूमशहासारखं बजावलं होतंस मला.मग सौरभ माझा कोण होता रे?माझाही तो एकुलता एक मुलगाच होता ना?पण तू त्याच्या संदर्भातला माझ्यातल्या आईचा हा एवढा साधा अधिकारही नाकारलास. तुझं ते नाकारणं बोचतंय मला.एखाद्या तीक्ष्ण काट्यासारखं रुतलंय ते माझ्या मनात…’

आवाज भरुन आला तशी मृणालिनी थांबली.शब्द संपले. संवाद तुटला.पण आवेग थोपेनाच.ती थरथरत तशीच उभी राहिली क्षणभर.तिच्या डोळ्यातून झरझर वहाणारे अश्रू थांबत नव्हते.दीदीच झरकन् जागेवरून उठल्या आणि तिला आधार द्यायला पुढे झेपावल्या. पण त्यापूर्वीच कसा कुणास ठाऊक पण ओंकार पुढे धावला होता. त्याचे डोळेही भरुन आले होते.ते अश्रूच जणू मृणालिनीचं सांत्वन करत होते…!

त्या सांत्वनाने तिच्या मनातल्या सांदीकोपऱ्यातली

धूळ आणि जळमटं

कधीच नाहीशी झाली होती..!!

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ संकेत आनंदाचा…. ☆ सौ राधिका भांडारकर 

तेव्हां आम्ही धोबी गल्लीत रहात होतो.आमचं एक माडीचं घर होतं.तसं मोठं होतं पण खालच्या मजल्यावर दोन खणी घरात भाडोत्री होते. गद्रे आणि मोहिले. तशी गल्लीत नऊ दहाच घरं होती. काही बैठी काही एक मजली. एकमेकांना चिकटून. गुण्या गोविंदाने रहात होती.

तसे किरकोळ वाद ,भांडणं ,जळुपणा होता. पण किरकोळच. बाकी गल्लीतली सलाग्रे, मथुरे, मुल्हेरकर,दिघे,आब्बास, वायचळ ही मंडळी म्हणजे एक संपूर्ण कुटुंब होतं.सर्वधर्मीय,सर्वसमावेशक. आम्ही घराघरातील सगळीच मुले एकत्र वाढलो ,खेळलो, बागडलो.एकमेकांच्या घरातलं भुकेच्या वेळी मनमुराद खाल्लं. कुठलाही सण असो,एकत्रच साजरा केला. ईद,नाताळ, दिवाळी सारेच. ईदची खीरकुर्मा, नाताळचा केक,आणि दिवाळीचे करंजी लाडू  सगळ्यांचा आनंद लुटला….

आजही त्या सणांच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तितक्याच टवटवीत आहेत..

दिवाळी तर गल्लीतला सर्वात मोट्ठा सण !! कधी परिक्षा संपतात, आणि दिवाळीची मज्जा लुटतो अस्सं होऊन जायचं!!

जैन मंदीरात जाऊन संगमरवरी दगडाचे तुकडे गोळा करायचे.लपत छपत घरी आणायचे ,कुटायचे ,गाळायचे आणि वस्त्रगाळ पांढरी शुभ्र रांगोळी बनवायची.तांदळाची कांजी बनवायची- कंदील करायला. दुकानात जाऊन काठ्या, रंगीत जीलेटीन पेपर्स, सोनेरी, चंदेरी कागद आणायचे.आणि सगळ्यांनी मिळून घरोघरीचे कंदील बनवायचे. दिलीप ,शरद,हे मुख्य कलाकार.आम्ही मदतनीस. भांडणेही व्हायची पण गंमत कमी नाही झाली.

पेटत्या उदबत्तीच्या टोकाने, ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर आखून भोके पाडायची.

फराळ तर मिळूनच व्हायचा.आज काय मुल्हेरकरांच्या चकल्या, नाहीतर मथुर्‍यांकडे करंज्या…कुणाचा चिवडा कुणाची शेव..सामुदायिक मान मोडून केलेला फराळ..

अवीट गोडीचा अन् चवीचा..

मृदुला रांगोळ्या काय मस्त काढायची…घरोघरी तिला डिमांड….कुठे बदकाची, कुठे मोराची….गल्लीत रांगोळ्यांचं प्रदर्शनच व्हायचे….अभ्यंग स्नानाने सारी गल्ली सुस्नात व्हायची…धनाची पूजा..राक्षस म्हणून पायाखाली चिरडलेलं ते सांकेतिक चिराटं….ईड जावो, पीडजावो..सारे सुखी राहो..ही काळोखातच  काठी आपटून केलेली प्रार्थना घरोघरी घुमायची..

रात्री तर सारी गल्ली पण त्यांच्या मंद प्रकाशात उजळून जायची….फटाक्यांचीही आतषबाजी असायचीच….

अशी खूप सुंदर दिवाळी..नव्या वस्त्रांची ,नव्या रंगांची, निर्मळ प्रकाशाची…ना कसाला देखावा,ना चढाओढ…निव्वळ आनंद..सणाचा सांकेतिक सामुदायिक उत्सव…

काळ बदलतोच. काळाबरोबर कल्पना बदलणारच. जे काल होतं ते आज कसं असणार…जीवनाची गतीच वाढली..पराकोटीच्या तांत्रिक विकासाने जग जवळ आले.  पण आत्मे विखुरले..,रेडीमेडचा जमाना आला.आयता फराळ,आयत्या रांगोळ्या..आयते कंदील..पारंपारिक सण आजही धूमधडाक्यात होतातच….मला ” ,पण..”घालून काही भाष्य नाही करायचय्..सगळ्या नव्याचं स्वागतच आहे…

नवं जपताना जुनं चांगलं राखावंं…परंपरेतलं मूळ आणि उद्देश सांभाळावे. अतिरेक टाळावा. आनंद जपावा..पर्यावरण जपावेच..सृष्टीचेही आणि नात्यांचेही…

शुभ दीपावली…!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या गोड आठवणी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ त्या गोड आठवणी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आठवणीतली दिवाळी’ म्हटल्याबरोबर मनात असंख्य आठवणींची सुदर्शन चक्रे, भुई चक्रे, फिरू लागली. फुलबाज्या तडतडू लागल्या आणि असंख्य सुखद क्षणांची सोनफुले उधळत झाडे उंच उडू लागली. किती सुंदर होते ते दिवस.

माझे माहेर म्हणजे छोटेसे तालुक्याचे गाव. गावापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत पण शेतात अशी आमची वस्ती होती. आम्ही, काका, शेतात काम करणारे गडी  यांची घरे होती.

दिवाळीपूर्वी घराची रंगरंगोटी होई. दारापुढचे अंगण सारवून स्वच्छ केले जाई.आई अतिशय सुंदर ठिपक्यांच्या रांगोळ्या घालायची.मोठे अंगण असल्याने आम्ही प्रत्येकीने रांगोळी काढायची असा दंडक होता. सर्वांच्या वरती ठळक रेषेत वडील ॐ, श्री, स्वस्तिक अशी शुभचिन्हे रेखाटायचे. मग आम्ही रंग भरायचो.अंगण  एकदम खुलून यायचे.

गावामध्ये बरीच आधी वीज आली होती. पण आमच्या वस्तीवर १९७०च्या सुमारास वीज आली. त्यामुळे रोज कंदील लावायचो. दिवाळीत मात्र भरपूर पणत्यांची आरास असायची. पुढचे, मागचे अंगण, पायऱ्या, तुळशी वृंदावन उजळून उठायचे. घर एकदम प्रकाशमान व्हायचे.

दिवाळी आणि किल्ला यांचे समीकरणच असते. आम्ही भावंडे मोठा किल्ला बनवायचो. त्यावर मोहरी पेरून छान हिरवळ उगवायची. शिवाजी महाराज, मावळे, प्राणी अशी खूप चित्रे होती. वाई हे आजोबांचे गाव. तिथे ही चित्रे खूप छान मिळायची. संध्याकाळी रांगोळी घालून, चित्रे मांडून किल्ला सजवणे एक मोठे आनंददायी काम असायचे. एकदा गडबडीत महाराजांचे चित्र तुटले गेले. तर भावाने सिंहासनावर ‘महाराज लढाईवर गेले आहेत’ असा बोर्ड लावला. सगळ्यांनी त्याच्या समय सूचकता कौतुक केले. एकूणच ती मजा काही औरच होती.

दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे फराळाचे जिन्नस. आतासारखे हे पदार्थ बारा महिने बनवत नव्हते. विकतही  मिळत नव्हते. सर्व पदार्थ आई घरीच बनवायची. तेही जात्यावर पीठ दळून. दिवाळीपूर्वी बरेच दिवस आधी तिची तयारी सुरू व्हायची. माझी आई साक्षात अन्नपूर्णा होती. तिच्या हातच्या चकल्या ,चिवडा, अनारसे, शंकरपाळी, चिरोटे अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत असायचे. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते, जिभेवर चव रेंगाळू लागते. त्यावेळी एकमेकांकडे फराळाची ताटे दिली जात. आलेल्या ताटात परत आपले फराळाचे दिले जाई. आई-वडिलांचा लोकसंग्रह  खूप मोठा होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळाचे केले जाई.आईचे फराळाचे पदार्थ खाण्यासाठी काही जण आवर्जून घरी येत असत. जेवतानाची श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, गोड पोळ्या, खिरी ही पक्वान्ने आई घरीच बनवायची.श्रीखंडाचा चक्काही घरीच बनवला जाई.या खास पंगतीची गोडी न्यारीच असायची.

त्यावेळी शेतात थंडी पण बरीच असायची. त्यामुळे कोणी आधी आंघोळीला जायचे यावर भावंडांची चर्चा सुरू व्हायच्या. चुलीवर गरम पाण्याचा हंडा तयार, तेल उटणे लावून अभ्यंगस्नानाचा थाट असायचा.

प्रत्येक दिवशी साग्रसंगीत पूजा व्हायची. दिवाळी स्पेशल नव्या कपड्यांचे खास आकर्षण असायचे.हे कपडे घालून देवाच्या दर्शनाला जायचे. मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, सर्वांना शुभेच्छा देणे-घेणे यात दिवाळी आनंदात साजरी व्हायची. आज हे सर्व आठवताना मनामध्ये त्यांच्या स्मृतींनी फेर धरला आहे.आई- वडिलांच्या आठवणींनी मन भावूक झाले आहे. पुन्हा त्या दिवाळीची अनुभूती येते आहे. मग उगाच वाटून गेलं, खरंच ते दिवस पुन्हा कधी येतील का? 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ म्हणजे दिवाळी ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

सिग्नलला सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या त्या मुलीला पैसे देऊन तोच सोनचाफा तिलाच भेट दिल्यावर तिच्या मळलेल्या डोळ्यात उठलेली आनंदाची चमक म्हणजे दिवाळी…

केरसुणीचा फडा घेताना त्या आज्जीशी किंमतीची घासाघीस न करता दोन केरसुण्या घ्यायच्या आणि वर दहा वीस रुपये जास्त दिल्यावर, त्या आज्जीच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्यांमधून झिरपणारे मंद हसू म्हणजे दिवाळी…

दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी आपल्याजवळ पैसे आहेत याची ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते तो क्षण म्हणजे दिवाळी…

दमलेल्या तिला, “दमलीस ना ? बस जरा वेळ… मी तुला मस्तपैकी चहा देतो…” ही दिवाळी…

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या डब्यातून भरताना तिच्या मनांत ओतप्रोत झिरपत जाणारा तो खमंग आपलेपणा म्हणजे दिवाळी…

ऑफीसला निघालेलो असताना, तिने समोर यावं आणि हातांमधे चार पाच मोगऱ्याची फुलं ठेवावीत… हा मोगऱ्याचा गंध म्हणजे दिवाळी…

आपला मुलगा मोठा, समजूतदार झाल्याचा क्षण म्हणजे दिवाळी….

“बाबा, यंदा तुम्हांला आणि आईला मी नवीन कपडे घेणारेय…” हे ऐकायला येण्याचा क्षण म्हणजे दिवाळी…

“आज्जी, आजोबा, चला आज लाँग ड्राईव्हला घेऊन जातो तुम्हांला…” हे शब्द ऐकणं म्हणजे दिवाळी…

आपल्याला ऑफीसचा बोनस कधी मिळतोय याची वाट न बघता, मावशींना पूर्ण पगार आणि बोनस दिल्यावर, त्या फरशी पुसणाऱ्या मावशींच्या डोळ्यातला आनंद म्हणजे दिवाळी… 

परस्परांतील हेवेदाव्यांची, झाल्यागेल्या मतभेदांची जळमटं दूर करुन, ते सगळं विसरुन एकत्र येणं म्हणजे दिवाळी…

अशी दिवाळी आपणा सर्वांच्याच आयुष्यात आनंदाचे, सुखा – समाधानाचे दीप पाजळत येवो.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ कुमार गंधर्व ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  कुमार गंधर्व ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

कॅलिडोस्कोप डोळ्याला लावल्यावर जसजसं ते नळकांडं आपण गोल फिरवतो तसं असलेल्याच काचतुकड्यांतून वेगवेगळी  नक्षी तयार होत राहाते आणि प्रत्येकच वेळी त्या एकेका नक्षीच्या स्वत:च्या अशा सौंदर्यानं आपलं मन मोहून जातं. त्या विविध नक्षींपैकी कोणती नक्षी सर्वात जास्त सुंदर हे काही केल्या आपण ठरवू शकत नाही कारण प्रत्येकच नक्षी स्वत:च्या आकार-उकारात आणि रंग-रुपात तितकीच देखणी वाटते. ते इवलेइवलेसे चिमुकले म्हणावेत असे आकार  आपल्याला अक्षरश: अपरिमित आनंद देतात आणि आपण त्यात हरवून जातो. अगदी असंच कुमारजींचं गाणं! कुमारजी… कुमार गंधर्व ही उपाधी लाभलेले… शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली!

एका कन्नडभाषिक परिवारात ८ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेल्या कुमारजींमधला सुरासक्त कलाकार अगदी बालवयातच आपली चुणूक दाखवू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताच्या मैफिलीत आपल्या प्रभावशाली गायनानं कुमारजी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले होते. प्रोफेसर बी. आर. देवधर आणि अंजनीबाई मालपेकर हे त्यांचे संगीतातील गुरू! जन्मजात सुराची ‘जाण’, प्रतिभा, संगीतप्रेम, गुरूंचं नेमक्या मार्गदर्शनासहित एक ‘नजर’ प्रदान करणं आणि कुमारजींचंही गुरूंनी प्रदाण केलेलं नेमकेपणी पकडणं आणि पुढं ते विशालत्वाकडं नेणं ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला ‘गंधर्व’ अनुभवता आला.   

वयाच्या एका टप्प्यावर दुर्धर आजाराशी सामना करताना पुन्हा गाता यायला हवं असेल तर पाच वर्षं तानपुऱ्यासोबत गायचं नाही हा डॉक्टरांचा सल्ला कुमारजींनी व्रतासारखा आचरला. मात्र अंथरुणावर पडल्यापडल्या त्यांचं मन गातच राहिलं, सुरांतील बारकावे, सुराच्या अनंत छटा शोधत राहिलं. आयुष्यात सूर परतून यावा ह्या विलक्षण इच्छाशक्तीमुळंच आजाराशी  धैर्यानं सामना करून कुमारजींनी त्यावर मात केली. मात्र आजार जाताजाता आपल्या कायमच्या पाऊलखुणा कुमारजींच्या आयुष्यावर उमटवून गेलाच. एक फुप्फुस कायमचं निकामी झालं आणि उरलेल्या एका फुप्फुसावर सगळी जबाबदारी आली. ह्या मोठ्या कमतरतेचं कुमारजींनी ना रडगाणं गायलं ना सहानुभूती लाटण्यासाठी जगासमोर त्याचं भांडवल केलं. उलट गायनासारख्या दमछास हीच मुख्य बाब असणाऱ्या विषयात ‘तुटपुंजा श्वास’ चांगल्या अर्थानं भांडवल म्हणून वापरला.

एका फुप्फुसाचा आधार घेत, त्याला जपत पण रियाजाने ताकदवानही करत आपली गायनशैली इवल्याइवल्या स्वराकृतींनी सजवून अपार देखणी केली. त्याच त्यांच्या आणखी देखण्या झालेल्या गायनशैलीनं कुमारजींना असामान्यत्वाच्या रांगेत आणून उभं केलं. कुमारजींचं गायन नजाकतपूर्ण अशा  बारीकबारीक स्वराकृतींनी नटलेलं! एकाचा आनंद अजून घेतोय तोवर दुसरं देखणेपण पुढ्यात यावं इतक्या सहजी जणू सौंदर्यलडी त्यांच्या गायनातून उलगडत राहायच्या.

रागसंगीताची त्यांची नजाकतपूर्ण गायनशैली हा एक भाग झालाच मात्र त्याखेरीजही कुमारजींनी संगीतक्षेत्राला अपार संपत्ती प्रदान केली. आजारपणातून बाहेर येण्यासाठी त्यांना मानवेल अशा हवेत राहाण्याचा डॉक्टरांचा सल्ला मानून माळवा प्रांतात देवास इथे वास्तव्याला आलेल्या कुमारजींच्या कानांवर तिथलं संपन्न लोकसंगीत, लोकधुनी पडू लागल्या. त्या सुंदर स्वरसंगती कलासक्त, सुरासक्त, संगीतासक्त कुमारजींच्या मनात घोळू लागल्या. त्यातूनच पुढं कुमारजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली. त्या रागांची माहिती आणि कुमारजींनी रचलेल्या बंदिशी आपल्याला त्यांच्या ‘अनूपरागविलास’ ह्या पुस्तकाच्या एका खंडात एकत्रित स्वरूपात आढळतात.

‘कुमारजींनी गायलेली निर्गुणी भजनं’ ह्या गोष्टीची भक्ती करणारे, ती ऐकताऐकता ध्यान लागल्याची अनुभुती घेणारे लोक त्यांच्यापासून पुढच्याही प्रत्येक पिढीत आढळतात. आपल्या खास पद्धतीनं त्यांनी गायलेली कबीरभजनं मनाचा ठाव घेतात. त्यातील कबीराची शब्दसुमनं आणि त्यांतील अलौकिक अर्थाचा दरवळ कुमारजींच्या स्वरांतून रसिकांनी जसाच्या तसा अनुभवलाच, शिवाय, कुमारजींच्या वेगळ्या ढंगाच्या गायनशैलीनं त्यावर अनुपम सौंदर्याचा वेगळाच ठसा उमटला.

कुमारजींच्या एका मैफिलीत गायलेला तराणा ऐकून कविवर्य वसंत बापट त्यांना म्हणाले, ‘तुमचा तराणा ऐकत असताना मला मंदिरातल्या घंटानादाची आठवण झाली!’ त्यावर कुमारजी उत्तरले, ‘मूळ तराण्याच्या शब्दांना साहित्यिक दृष्ट्या काही अर्थ नसतो. पण गायक ते शब्द कसे गातो त्यानुसार त्याला अर्थप्राप्ती होते.’ निरर्थक शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याची कलाकाराची कुवत आणि जबाबदारी ह्याबाबत केवढा महत्वाचा विचार आहे हा!

‘गीत वर्षा’ सारख्या संकल्पना घेऊन कुमारजींनी अभिनव प्रयोग केले ज्यात वर्षा ऋतूशी संबंधित असलेल्या लोकसंगीत व रागसंगीत दोन्ही प्रकारांतील रचनांचा समावेश होता. ‘मला उमजलेले बालगंधर्व’ ह्या कार्यक्रमातून कुमारजींनी बालगंधर्वांच्या गायकीच्या सूक्ष्म अभ्यासातून त्यांना उमजलेली त्यांच्या गायकीची मर्मस्थळं, सौंदर्यस्थळं उलगडून दाखवली. अंगभूत चिंतनशीलता आणि सातत्यानं ध्यास घेऊन संगीताच्या अभ्यासात रममाण होण्याच्या वृत्तीमुळं असे अनेक देखणे प्रयोग कुमारजींनी रसिकांना सादर केले. असे अनेक अभ्यासपूर्ण प्रयोगांची, त्यांच्या सवच रागांची, रागसंगीतातही कल्याणप्रकार, मल्हारप्रकार इ. वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची त्यांची रेकॉर्डिंग्ज म्हणजे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल साहित्य आहे. 

कुठल्याही प्रकारचं संगीत निषिद्ध तर नाहीच, उलट प्रत्येक प्रकारच्या संगीतातलं सौंदर्य आपण शोषून घ्यायचं हे कुमारजींचं संगीताकडं पाहाण्याचं तत्व म्हणायला हरकत नाही. असा चतुरस्त्र विचारांचा, संगीताला जीवन समर्पित केलेला, सृजनशील, सौंदर्यासक्त कलाकार म्हणजे भारतभूचं भूषण! 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares