मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 169 ☆ आसरा…! ☆ श्री सुजित कदम ☆

अभंग वृत्त

इवलासा जिव

फिरे गावोगाव

आस-याचा ठाव

घेत असे…!

 

पावसाच्या आधी

बांधायला हवे

घरकुल नवे

पिल्लांसाठी..!

 

पावसात हवे

घर टिकायला

नको वहायला

घरदार..!

 

चिमणीच्या मनी

दाटले काहूर

आसवांचा पूर

लोटलेला..!

 

पडक्या घराचा

शोधला आडोसा

घेतला कानोसा

पावसाचा….!

 

बांधले घरटे

निर्जन घरात

सुखाची सोबत

होत असे..!

 

घरट्यात आता

रोज किलबिल

सारे आलबेल

चाललेले..!

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

इतकं पण धावू नका…

आणि अकालीच वरती जाऊ नका !

अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.

मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !

आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.

इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !

असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.

दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?

मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”

मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !

कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!

खूप वाईट वाटतं अशावेळी !

अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!

मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.

डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?

बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !  

घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !

© डाॅ. धनंजय देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… – भाग -१ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पाणी… – भाग – ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा तीन वाजून गेले होते.मे महिन्याची ती दुपार.हवेत भयंकर उष्मा होता.अंगाची लाहीलाही होत होती.प्लँटफाँर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं.गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते.पँसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच.चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

“दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी”

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा?”

नातवाने निरागसपणे मान डोलावली.त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली.देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला.त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता.ही तर लहान मुलं होती.बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता.त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता.देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो  प्लँटफाँर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला.पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं.त्याने समोरच्या प्लँटफाँर्मवर नजर टाकली.तिथल्या नळांना ही पाणी दिसत नव्हतं.स्टेशनमास्तरच्या आँफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

“बाबूजी पाणी हाये का कुठं?लेकरांसाठी पाहिजे हुतं”

कर्मचाऱ्याने त्याला वरुन खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?”

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी?आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू?आमीबी बाहेरुन मागवतो.जाय त्या कँन्टीनमधी पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.देवबा तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का?”

कँन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये?नाय.मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी…”

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी.बाहर जाओ,हाँटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला.रोडावरच्या हाँटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो.पानी नही मिलेगा.बोतल दे दू?बीस रुपयेकी है”

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाँटेलवर गेला.तिथून तिसऱ्या.चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत.पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला.पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं.देवबा म्हणजे शेतकरी माणूस.दोन एकरची कोरडवाहू शेती.शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा.मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले,नद्यानाल्यातलं,जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं.असं झालं की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा.त्यातून पदरी दोन मुली ,मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती.मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच.पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती.शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं.शहरात रहाणाऱ्या मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता.खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं.पाण्याचा प्रश्न बिकट झालेला.दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची.दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा.तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं.त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची.मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा.पण आता त्याचं वय झालं होतं.तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला.तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता.नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाही मिळालं?दादू परत पाणीपाणी करतोय.मला पण तहान लागलीये”

नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला.तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली.साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला.पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं.कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत.त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना.ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं.सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस.समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं.त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता.आता हिंमत दाखवावीच लागणार होती.त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला.ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती.देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं.तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला.पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं.काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे?”कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं.लेकरं लय तहानलीयेत”

तो एका माणसाला म्हणाला.तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले.त्यांचंही बरोबरच होतं.अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात.तिथून घ्या ना” एक बाई म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे.उकळून थंड केलेलं.ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार?”

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा”

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता.देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का?आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं दुसरं पुण्य नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?”

“तीन जण”तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला.त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा.बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला.मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने आणि आनंदाने हसला. देवबा नातवांकडे आला.थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली.त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली.देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

पँसेंजर आली.प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली.खिडकीतून उतरतीचं ऊन आता अंगावर येत होतं.त्यासोबत गरम हवेचे झोतही आत येत होते.छताचा पंखाही आवाज करत गरम हवा फेकत होता.

दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं.या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं.आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती.त्याने मनाला आवर घातला.असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं.आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता.त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

 क्रमश: भाग १

 © श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा पाली हिल इथे एका अत्याधुनिक इमारतीत “सशुल्क पाहुणा” (पेईंग गेस्ट) म्हणून राहू लागलो. खरं तर माझी ऐपत नव्हती. पण मी नशिबवानच म्हणायचो, म्हणून काही हळव्या भावनेतून ही जागा मला मिळून गेली. घरमालक पती-पत्नी दोघेही वयस्कर होते आणि त्यांच्या मानाने ती जागा फारच ऐसपैस होती. त्यांना एकाकी वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची मुले परदेशात होती. म्हणून त्यांना अशी मोठी भीति वाटत होती की, दोघांपैकी कुणाला काही झालं, तर त्यांना इस्पितळात कोण घेऊन जाईल?  

त्यांनी त्या सदनिकेतील एक लहानशी खोली मला भाड्याने दिली. त्या माझ्या तरूणपणाच्या काळात मी जगण्याच्या, स्थिरावण्याच्या धडपडीत होतो. जेवणाखाण्यासाठी खर्चायला फार पैसे नसायचे. मग मी लिंकिंग रोडवरील टप-या किंवा हातगाडीवर मिळणारे भेळपुरी, वडापाव असे स्वस्तातले पदार्थ आणत असे, कधी मालकांच्या मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेत असे आणि माझ्या खोलीत बसून खात असे. 

एके दिवशी मावशींनी त्यांच्या स्वयंपाकघरात मला जेवायला बोलावलं. मग दुस-या दिवशी मी थोडी जास्तच भेळपुरी घेऊन गेलो आणि त्यांनाही खाण्याचा आग्रह केला. थोडंसं कां कूं करत त्यांनी ती खाल्ली. काका तर म्हणाले की, त्यांना वीसेक वर्षं तरी झाली असतील असं चटकमटक टपरीवरचं खाणं खाऊन ! त्यांच्या मुलांनी असं उघड्यावरचं खायला बंदी केली होती ना .

हलके हलके हा मुळी पायंडाच पडून गेला. ते दोघेही माझी घरी परतण्याची वाट पाहू लागले. मी आणत असलेल्या चटकदार खाण्यामुळे त्यांच्या आयुष्यातला आनंद वाढला होता. आता, मलाही कौटुंबिक वातावरणात असल्यासारखे वाटू लागले. मग त्यांनी माझ्याकडून वचनच घेतले की, ही गोष्ट म्हणजे आमच्यातलं गुपित राहील आणि यदाकदाचित त्यांच्या मुलांची आणि माझी गाठ पडलीच, तर हे मी त्यांना अजिबात कळू देता कामा नये. दर आठवडाअखेर नियमितपणे त्यांच्या मुलांचा चौकशीचा फोन येई, पण आमचे हे गुपित त्यांनी कधीच उघड केलं नाही.  

मग मात्र मी मुंबईतील खाऊगल्ल्यांचा धांडोळा घेऊ लागलो. लांब अंतरावरची ठिकाणे लोकलमधून, तर मैलोन् मैल चालत जाऊन मुंबईचे कानेकोपरे पालथे घालून गाजलेली खास खाऊठिकाणे शोधून काढली – क्रॉफर्ड मार्केटजवळच्या ‘गुलशन- ए-इराण’ चा खिमापाव, विलेपार्लेमधील ‘आनंद’चा डोसा, किंवा ग्रँट रोडवरच्या ‘मेरवान’चा बनमस्का आणि मावा सामोसा, किंवा शीवच्या ‘गुरूकृपा’तील छोले सामोसा, कधी स्वाती स्नॅक्समधून खिचडी, तर कधी चेंबूरच्या ‘सदगुरू पावभाजी’तील पावभाजी.

या प्रकाराने मला जगण्याचा हेतु सापडला, तर वृद्ध दांपत्याला मिळाली जगण्याची आशा.  जेवणाच्या टेबलावरच्या त्या क्षणांनी आमच्या तिघांचे एक छोटेसे घट्ट कुटुंब बनून गेले. नव्वदीच्या आसपासचे हे वृद्ध काका मला रोज काही ना काही किस्से त्या वेळी ऐकवत असत. पुढे कधी तरी एकदा मावशींशी बोलता बोलता मला कळलं की, दिवसभर ते अगदी गप्प गप्प असत, चुकूनही बोलत नसत. जेवणाच्या टेबलावरच्या या क्षणी मात्र त्यांच्यात एकदम चैतन्य संचारे.

वयोपरत्वे त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांचा विसराळूपणा वाढू लागला आणि एक दिवस विसरण्याचा कडेलोट झाला. मी त्यांचा मुलगा नाही, हे ते विसरूनच गेले. त्यांच्या वाढदिवशी, व्ही.टी. स्टेशनजवळच्या ‘पंचम पुरीवाल्या’कडून मी पु-या आणि बटाट्याची भाजी घेऊन गेलो. खूप वेळ त्यांनी स्वादाचा सुगंध घेतला आणि अचानक त्यांच्या मुलाच्या नावाने मला हाक मारली. मावशी म्हणाल्या की, त्यांचं ऑफिस ‘पंचम’जवळ असल्याने ते बरेचदा तिथे बटाटा भाजी, पुरीचं जेवण घेत असत. पण ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या मुलाने ‘तिथं खायचं नाही’ असं निक्षून बजावलं होतं. तासभर होऊन गेला. काकांनी मजेमजेत पुरी भाजीचा आस्वाद घेतला. मग उठले, वॉकर घेऊन सावकाश चालत त्यांच्या खोलीत गेले आणि एक खोकं घेऊन परत आले. पुन्हा एकदा त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या नावाने हाक मारली आणि ते खोकं माझ्याकडे सुपूर्द केलं. म्हणाले, ” तू तुझं मुलाचं कर्तव्य बजावण्याइतका मोठा होशील, तेव्हा तुला देण्यासाठी हे राखून ठेवलं होतं. आज तू तसं वागलास. आता हे  तुझं ! “

… मी खोकं उघडलं. त्यात एक “हिरो” – शाईचे पेन होते. मग मावशींनी खुलासा केला की, त्या पेनाने त्यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेली ती ‘भेट’ होती.

त्या रात्री मला ‘हिरो पेन’ नव्हतं मिळालं, तर मला एक वडील मिळून गेले.  ते पेन मी जपून ठेवलं आहे. ते मलाही माझ्या मुलाकडे एक दिवस असंच सोपवायचं आहे,  जेव्हा मी म्हातारा आणि दुबळा झालेला असेन आणि माझा मुलगा मला माझं आवडतं खाणं आणून देईल ..

आपला जन्मदाता पिता एकच असतो. तरीही, आपण अनेक पित्यांचा पुत्र होऊ शकतो.

 हा पितृदिन आनंदात जावो !      

मूळ इंग्रजी लेखक – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री

मराठी रूपांतर व प्रस्तुती  : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून “ब्युनोस आयर्स” हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.

त्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू पद्धतीची बारा देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा ! भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.

देवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.

‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली.  ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.

देवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणतात.

देवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते ! त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत ! वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.

तेथे गौतम बुद्धाचे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पंथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.

हस्तिनापुरातील देवळात पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत ! भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यातून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.

‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदे, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.

अगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत ‘श्रीमहाभारता’ चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.

ब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar ) या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

लेखक : ल. ग. पटवर्धन

पुणे 

दूरभाष – (020) 25384859,  इमेल : – [email protected]

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एका राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो …..  कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच ! 

राजा बेचैन होतो. ” प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?” 

” महाराज, आपण त्याला काट्यात टाकू या” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.

लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय….. 

“महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकू या” राणी दुसरा मार्ग  सुचवते.

दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही….. 

“ते काही नाही महाराज, आपण त्याला उकळत्या तेलात टाकू ” सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. . 

दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल उकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.

राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो …

— लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत, हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती ‘राजे’ आपल्या अवतीभोवती असतात ना ! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय, तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या अमलात आणणारे  ‘ प्रधान’, ‘सेनापती’ यांची कमतरता नाही. गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे ‘आनंदी कावळे’ ही आहेतच !

वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ‘सुखी माणसाचा’ सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो ‘आनंद’; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद, ते यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ‘कवडसा’ आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. 

इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?

कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा ‘आनंदी कावळा’ तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात.. 

त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पक्षी का नक्षी… – कवी – श्रीपाद  देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  “ पक्षी की नक्षी ?” – कवी – श्रीपाद  देशपांडे ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

ऊन सावली सुंदर नक्षी 

फांदीवर तो बसला पक्षी 

छायाचित्र हे कुणी काढले 

वळून पाहतो निरखून पक्षी —

निसर्ग रचना किती मनोहर 

वसती येथे अगणित पक्षी 

सौंदर्याची जाण ना त्याला 

पंखावर ही दुर्मिळ नक्षी —-

बघणार्‍याने बघत रहावे 

कुणी अचानक दृश्य टिपावे 

तोच म्हणे मी याचा साक्षी 

सावली मधून ही बनते नक्षी —-

एकच फांदी एकच पक्षी 

निसर्ग असे जो त्यांचा साक्षी 

ऊन कोवळे कोवळी पाने 

त्यातून इतकी सुंदर नक्षी —-

वर्णन करण्या शब्द अपुरे 

इतका सुंदर दिसतो पक्षी 

सुंदरता हा निसर्ग देतो 

आपण व्हावे त्याचे साक्षी —

         (हा फोटो ज्याने कुणी काढला त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार) 

कवी – श्रीपाद देशपांडे 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #190 – कविता – आइने में स्वयं के… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता  “आइने में स्वयं के)

☆  तन्मय साहित्य  #190 ☆

☆ आइने में स्वयं के☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

कर्म से है निकट का रिश्ता

नहीं हूँ जानता मैं भेद कि,

सत्कर्म और दुष्कर्म क्या

धर्म के अंदर छिपा

वह मर्म क्या

 

निर्विवादी वाद

पूँजी,धर्म जाति विवाद भाषा

इन सभी से दूर हट कर

जानता हूँ सिर्फ इतनी बात

शोषित पीड़ित दुखियों के

रहूँ मैं हर घड़ी में साथ

 

गंध पर

प्रतिबंध में नहीं चाहता

स्वच्छंद विचरे

किंतु थकित निराश बोझिल

छंद से अनुबंध कर ले

तो मधुर सूरसाज निकले

 

पाप क्या संताप क्या

है पुण्य जाप अलाप क्या

इष्ट और विशिष्ट

है नहीं लक्ष्य मेरा

बस जरा सी बात

केवल जानता हूँ

आईने में हृदय के

मैं स्वयं क्या आप क्या!

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 15 ☆ खींच कर लकीर… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “खींच कर लकीर।)

✍ जय प्रकाश के नवगीत # 15 ☆ खींच कर लकीर… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

पानी पर

खींचकर लकीर

भरते हैं सागर का दम।

 

अंगद का पाँव जमा

चाट लोकतंत्र

आँखों में धूल झोंक

भोग राजतंत्र

 

फिर बैठे

बन गए अमीर

लौलुपता नहीं हुई कम।

 

भावों के ऊसर में

शब्दों की फसल

छंद के लिफ़ाफ़े में

रख कोई ग़ज़ल

 

और कहें

स्वयं को कबीर

पाल रहे मीर का भरम।

 

तिनकों पर इतराएँ

डकराएँ खूब

अघा गए चर-चरकर

निर्धन की दूब

 

फैलाएँ

झूठ,बन फकीर

बेचें ईमान और धरम ।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – ककनूस ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – लघुकथा – ककनूस ??

‘साहित्य को जब कभी दफनाया, जलाया या गलाया जाता है, ककनूस की तरह फिर-फिर जन्म पाता है।’

उसकी लिखी यही बात लोगों को राह दिखाती पर व्यवस्था की राह में वह रोड़ा था। लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने मिलकर उसके लिखे को तितर-बितर करने का हमेशा प्रयास किया।

फिर चोला तजने का समय आ गया। उसने देह छोड़ दी। प्रसन्न व्यवस्था ने उसे मृतक घोषित कर दिया। आश्चर्य! मृतक अपने लिखे के माध्यम से कुछ साँसें लेने लगा।

मरने के बाद भी चल रही उसकी धड़कन से बौखलाए लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने उसके लिखे को जला दिया। कुछ हिस्से को पानी में बहा दिया। कुछ को दफ़्न कर दिया, कुछ को पहाड़ की चोटी से फेंक दिया। फिर जो कुछ शेष रह गया, उसे चील-कौवों के खाने के लिए सूखे कुएँ में लटका दिया। उसे ज़्यादा, बहुत ज़्यादा मरा हुआ घोषित कर दिया।

अब वह श्रुतियों में लोगों के भीतर पैदा होने लगा। लोग उसके लिखे की चर्चा करते, उसकी कहानी सुनते-सुनाते। किसी रहस्यलोक की तरह धरती के नीचे ढूँढ़ते, नदियों के उछाल में पाने की कोशिश करते। उसकी साँसें कुछ और चलने लगीं।

लम्बे हाथों और रौबीली आवाज़ों ने जनता की भाषा, जनता के धर्म, जनता की संस्कृति में बदलाव लाने की कोशिश की। लोग बदले भी लेकिन केवल ऊपर से। अब भी भीतर जब कभी पीड़ित होते, भ्रमित होते, चकित होते, अपने पूर्वजों से सुना उसका लिखा उन्हें राह दिखाता। बदली पोशाकों और संस्कृति में खंड-खंड समूह के भीतर वह दम भरने लगा अखंड होकर।

फिर माटी ने पोषित किया अपने ही गर्भ में दफ़्न उसका लिखा हुआ। नदियों ने सिंचित किया अपनी ही लहरों में अंतर्निहित उसका लिखा हुआ। समय की अग्नि में कुंदन बनकर तपा उसका लिखा हुआ। कुएँ की दीवारों पर अमरबेल बनकर खिला और खाइयों में संजीवनी बूटी बनकर उगा उसका लिखा हुआ।

ब्रह्मांड के चिकित्सक ने कहा, ‘पूरी तन्मयता से आ रहा है श्वास। लेखक एकदम स्वस्थ है।’

अब अनहद नाद-सा गूँज रहा है उसका लेखन।अब आदि-अनादि के अस्तित्व पर गुदा है उसका लिखा, ‘साहित्य को जब कभी दफनाया, जलाया या गलाया जाता है, ककनूस की तरह फिर-फिर जन्म पाता है।’

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares