डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स(divine, digital detox) 

निसर्ग हे या जगातील सर्वांगसुंदर चित्रकलेचे दालन आहे, रोज नवनवीन चित्रं घेऊन येणारं!

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

भारताच्या उत्तरपूर्व सीमेवर नांदणाऱ्या सात बहिणी अर्थात “सेव्हन सिस्टर्स”  पैकी एक बहीण मेघालय! दीर्घ हिरव्यागार पर्वतश्रृंखला, खळखळ वाहणारे निर्झर, अन पर्वतातच कुठे कुठे वसलेली लहान मोठी गावे! अर्थात मेघालयची राजधानी शिलाँग हिला आधुनिकतेचा स्पर्श आहे! (मंडळी, मी पाहिलेल्या शिलाँग सहित मेघालयाच्या अन्य मोजक्या ठिकाणांची सफर पुढील भागात!). आजची सफर अविस्मरणीय अन अनुपमेय अशीच होणार मित्र हो, खात्री असू द्या! अगदी इवलसं एक गाव अन मॉलीन्नोन्ग हे नांव! या गावाचे हे नाव जरा विचित्रच वाटते नाही का? ७० किंवा अधिकच वर्षांपूर्वी हे गाव जळून खाक झाले, गावकरी दुसरीकडे गेलेत, पण लगेचच परत येऊन त्यांनी नव्या दमाने हे गाव वसवले. खासी भाषेत “maw” चा अर्थ दगड अन ‘lynnong’ चा अर्थ विखुरलेले! येथील घरांपर्यंत घेऊन जाणाऱ्या दगडी वाटा याची साक्ष देतात.

कुठल्याही महानगरातल्या एखाद्या गगनचुंबी बिल्डिंगच्या रहिवास्यांच्या संख्येपेक्षाही कमी (२०१९ च्या नोंदीप्रमाणे लोकसंख्या अवघी ९००) गावकऱ्यांची वस्ती असणारं हे गाव (पर्यटकांना विसरा, कारण ते येत अन {नाईलाजाने} जात असतात!) “पूर्व खासी पर्वतरांगा”हे खास नाव असलेल्या जिल्ह्यात येणारं (in Pynursla community development block)! पर्यावरणाशी सुंदर समन्वय साधत माणूस तितकेच सुंदर जीवन कसे जगू शकतो, याचे आजवर मी पाहिलेले हे गाव सर्वोत्तम उदाहरण! म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त्याने हा भाग फक्त  या मनमोहिनीच्या कदमोंपे निछावर! काय आहे या गावात इतकं की “तारीफ करूँ क्या उसकी, जिसने इसे बसाया!!!” असं(शर्मिला समोर नसतांनाही) गावंस वाटतंय! स्वच्छ अन शुचिर्भूत गाव कसं असावं, तर असं! डिस्कवरी इंडिया या मासिकाने आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव (२००३), भारतातील सर्वात स्वच्छ गाव (२००५), असे गौरविल्यानंतर अनेकदा स्वच्छतेसाठी हे गाव प्रसिद्धीच्या झोतात राहिलय! सध्या मेघालयातील सर्वात सुंदर स्वच्छ गाव म्हणून त्याचा लौकिक आहे! कुठेही आपल्याला परिचित अशी दंडुकेशाही नाही, कागदी घोडे नाहीत. इथले बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मीय  आणि “खासी” जमातीचे आहेत (मेघालयात तीन मुख्य जमाती आहेत: Khasis, Garos व Jaintias). ग्राम पंचायत अस्तित्वात आहे, निवडणूकीत गावप्रमुख ठरतो. सध्या श्री थोम्बदिन (Thombdin) हे गावप्रमुख आहेत. (ते व्यस्त असल्याकारणाने त्यांची मुलाखत घेता आली नाही!) इथे आहे एक फलक, स्वच्छतेचं आवाहन करणारा!स्वयंशिस्त (आपल्याकडे फक्त स्वयं आहे), अर्थात, सेल्फ डिसिप्लिन काय असते (भारतात सुद्धा) हे इथं याची देही याची डोळी बघावे असे मी आवाहन करीन!सामाजिक पुढाकाराने गावातील प्रत्येकजण गाव स्वच्छता-मोहिमेत असतोच असतो. दर शनिवारी हे स्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने राबवल्या जाते. प्रत्येक स्थानिकाची हजेरी अनिवार्य अन गावप्रमुखाचा शब्द प्रमाण! याचे मूळ गावकऱ्यांच्या नसानसात भिनलंय, कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याच्या आवाक्यातले हे काम नोहे! अन हीच प्रवृत्ती पर्यटकांनी ठेवावी, निदान या गावात असेपर्यंत, असा या गावकऱ्यांचा आग्रह असतो!

इथे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या बांबूच्या बनाचे किती अन कसे कवतिक करावे! मला बांबू म्हटले की शाळेत बहुतेक रोज खाल्लेले केनचे फटके (रोज किमान ५) आठवतात, त्यातील ९९. ९९% वेळा  फटके शाळेत उशिरा पोचण्याकरता असत. (मित्रांनो, तसं काही विशेष नाही, शाळेची घंटा घरी ऐकू यायची म्हणून, जाऊ की निवांत, बाजूलाच तर आहे शाळा, हे कारण!) इथे बांबूचा वावर सर्वव्यापी! कचरा टाकण्यास जागोजागी बांबूच्या बास्केट, म्हणजेच खोह(khoh) , त्याची वीण इतकी सुंदर, की त्यात कचरा टाकूच नये असे वाटते! तिथल्या बायामाणसांना ऊन अन पावसापासून रक्षण करण्यास परत याच बांबूच्या अतिशय बारकाईने सौंदर्यपूर्ण दृष्टीने विणलेले प्रोटेक्टिव्ह असे कव्हर! अन्न साठवायला, मासे पकडायला अन दागिने घडवायला बांबूच! बांबूची पुढील महिमा पुढील भागात!

इथे सकाळी उठोनि स्वच्छता-सेविका कचरा गोळा करायच्या कामाला लागतात, प्लास्टिकचा वापर बहुदा नाहीच, कारण पॅकिंग लहान-मोठ्या पानांचे! उपलब्ध अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घरे बांधलेली( परत बांबूच)! जैविक कचरा जमा करून खत निर्माण करतात. इथे आहे open drainage system, पण कहर हा की त्यातले सुद्धा पाणी प्रवाही अन स्वच्छ, गटारे तुंबलेली नाहीत (प्रत्यक्ष बघा अन मग विश्वास ठेवा!)  सौर-ऊर्जेचा वापर करून इथले पथदिवे स्वच्छ रस्त्यांना प्रकाशाचा उजाळा देत असतात. शिवाय प्रत्येक घरी सौर-दिवे अन सौर-विजेरी (टॉर्च) असतातच, पावसाने वीज गेली की या वस्तू येऊन काम भागवतात! प्रिय वाचकहो, लक्षात घ्या, हे मेघालयातील गाव आहे, इथे मेघांची दाटी नेहमीचीच, तरीही सूर्यनारायण दिसेल तेव्हा सौर ऊर्जा साठवल्या जाते! अन इथे आपण सूर्य किती आग ओततोय, हा उन्हाळा भारीच गरम बर का, असा उहापोह करतोय! इथे हॉटेल नाही,  तुम्ही म्हणाल मग राहायचे कुठे अन खायचे काय? कारण पर्यटक म्हणून ही सोय हवीच! इथे आहे होम् स्टे(home stay), आल्यासारखे चार दिवस राहा अन आपापल्या घरी गुमान जा बाबांनो, असा कार्यक्रम! तुम्ही इथे फक्त पाहुणे असता  किंवा भाडेकरू!  मालक इथले गावकरी! आपण आपल्या औकातीत रहायचं, बर का, कायदा thy name!  कुठलाही धूर नाही, प्लास्टिकचा वापर नाही आणिक पाण्याचे व्यवस्थापन आहेच (rain harvesting). आता तर “स्वच्छ गाव” हाच या गावाचा USP (Unique salient Point), मानबिंदू अन प्रमुख आकर्षण! गावचा प्रमुख म्हणतो की यामुळे २००३ पासून या गावाकडे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे! गावकऱ्यांचे उत्पन्न ६०%+++ वाढलेय आणि या कारणाने देखील इथल्या स्वच्छतेकडे गावकरी आणखीनच प्रेमाने बघतात, सगळे गाव जणू आपले घरच अशी गावकी अन भावकी! विचार करण्यासारखी गोष्ट! स्वच्छ रस्ते अन घरं इतकी दुर्मिळ झाली आहेत, हेच आपल्याला लाजेनं मान खाली घालायला लावणारे कारण! 

प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, अन माझा मेघालयातील उर्वरित प्रवास हायेच की, पुढल्या भागांसाठी!!!

तवरिक वाट बगा बरं का मेघालयचं पाव्हनं!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

  • लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!    
  • एका गाण्याची लिंक सोबत जोडत आहे! 

https://youtu.be/obiMFcuEx6M “Manik Raitong”

अत्यंत सुमधुर असं मूळ खासी भाषेतील गाणं, गायिका “Kheinkor Mylliemngap”   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments