श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर

वारीचा पहिला दिवस – पहिला अनुभव – पहिली परीक्षा

एका ओळीत चालत मुखाने हरिनाम स्मरण करीत हळू-हळू शहरातील रस्त्यांवरून वारी चालली। पुढे जाता जाता अजूनही काही दिंड्या येऊन सहभागी होऊ लागल्या …. जसे गावागावातून वहात येणाऱ्या लहान नद्या पुढे एका नदीत येऊन मिसळतात नि एक मोठी नदी निर्माण होते … तसेच काहीसे वाटून गेले. वारीचा खरा उत्साह आता दिसू लागला होता। चहुकडे नुसता नामाचा गजर, भारी गर्दी, त्यांत आता आमच्या दिंडीचे वारकरी वेगळे होऊन गेले। रांग वगैरे सगळी संपली। आता आपण फक्त एका गावचे नाही …  आता संपूर्ण विश्व आपला परिवार आहे असा भाव निर्माण झाला। वारकरी आपसांत एकमेकांना माऊली हे असे संबोधतात । भक्तीची ही असाधारण भावना बघून माझे मन भारावून गेले, आणि त्याच क्षणी मी निर्णय केला की  घरी गेल्यावर हे सर्व विस्ताराने लिहायचे,  ज्याने श्रध्देचा हा अनुभव इतरांना घेता येईल। 

आता थोडे त्यांचे वर्णन, जे स्वतः प्रत्यक्ष वारीत नव्हते पण ज्यांची भावना वारकऱ्यांपेक्षा कुठेही कमी नव्हती। शहरांत चालत असतांना पदोपदी पाण्याची बॉटल, त्या दिवशी एकादशी असल्यामुळे, राजगिरा पापडी, लाडू, केळी, चहा, शेंगदाण्याचे लाडू, साबूदाणा, असे बरेच काही घेऊन अनेक श्रध्दाळू रस्त्याच्या कडेला उभे राहून विनवणी करून वारकऱ्यांना देत होते। काही काही ठिकाणी तर एक दोन वर्षाच्या पोरांना छान धोतर किंवा छोटंस नउवारी घालून सजवून कडेवर घेऊन त्यांच्या हातून वस्तू देत होते- काका याच्याहातून एक तरी घ्या। असा प्रेमळ आग्रह करत होते. एके ठिकाणी तर एक मध्यम वयाचे गृहस्थ हातात एक दोन रुपयांची नाणी घेऊन वारकऱ्यांना एक एक देत होते, त्यामागे भावना ही असावी की वस्तु नाही तरी अशी काही सेवा आपल्या हातून व्हावी। धन्य तेची जन, जयांचे संत चरणी मन !! पुढे मिलिट्री, डॉक्टर हे सर्वपण सेवेत हजर होते। याच ठिकाणी माऊलींच्या रथाचे पहिले दर्शन मला झाले। खूप जवळून पाहता आले।

पुणे सोडल्यावर माझी पहिली परीक्षा सुरू झाली, जेव्हा समोर दिवेघाट दिसायला लागला। याक्षणी यात्रेवर निघायच्या आधीचे सर्वांचे बोलणे मला आठवू लागले। सात महिन्यापूर्वी हृदयाघात कारणाने दोन स्टेंट घालावे लागले असल्यामुळे सगळयांनी खूप शंका व्यक्त केल्या होत्या की आता काय ही परीक्षा पास होणार का? देवाचे नाव घेतले नि सर्वांच्यासोबत घाटाच्या रस्त्यावर पहिले पाऊल ठेवले। वर सूर्यनारायण पूर्ण तेज घेऊन हजर होते। आता या मार्गी खाण्या-पिण्याची सोय जवळपास संपली होती.  वर तळतळतं ऊन नि खाली ज्ञानबा-तुकाराम-एकनाथ-मुक्ताबाई चा सतत गजर। येथे मी विशेष उल्लेख करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे भरपूर टैंकर सोबत होते. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होत होती। घाटात एकीकडून पायी चालणारे नि अर्ध्या भागात दिंडीची वाहनं, रुग्ण्वाहिका चालत होत्या। दर एक दीड तासांनी रस्त्याच्या काठावर थांबायचे, दोन घोट पाणी घेऊन पुढे चालायचे। एका उत्साहात बिना काही त्रासाचा आठ कि.मी. चा हा घाट अखेरी संपला आणि पुढे समतल मैदानांत डाव्या बाजूला  ठेवूनिया कर कटेवरी उभा तो विठोबा–  अशी भली मोठी मूर्ति दिसली. एकदा वाटले – आलो का काय पंढरपुराला !!! पुढे पुष्कळ चालून सायंकाळी सुमारे पाच वाजता सासवडला आमच्या ठरलेल्या ठिकाणी- दादा जाधवराव मंगल कार्यालय येथे आलो।

तिथे अजून ही दिंड्या थांबल्या असल्याचे दिसून आले। संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि प्रवचनाचा पहिला कार्यक्रम झाला। त्या वेळी दिंडी प्रमुख डॉ भावार्थ देखणे आणि त्यांच्या भार्या सौ पूजा देखणे यांस व्यासपीठावर ऐकायची संधी मिळाली। वारकरी संप्रदायाशी पूर्वीचा काही परिचय नसल्यामुळे माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता। या अगोदर कधीच मी हरिपाठ ऐकला नव्हता। आतापर्यत काही बंधु भगिनींशी प्राथमिक ओळख झाली होती। वारीबद्दल माहिती साठी इंटरनेटवर बरंच काही वाचलं होतं.  पण माझा अनुभव त्यापेक्षा बराच वेगळा होता। प्रवचन आणि हरिपाठ अत्यंत सुरेख झाला, इथे मी देखणे दंपतिचे अभिनंदन करू इच्छितो की या तरुण वयात आणि स्वतः उच्चशिक्षित नि कॉर्पारेट क्षेत्रात उच्च पदी असूनही देवाच्या कामात येवढे कौशल्य !! मला स्तुत्य वाटले। त्यांच्या संगतीला टाळवादकांची ती एकसम पदचालना-पावली, जसे काही नृत्यच आणि पखावजाची ती उत्तम साथ, सर्व तरुण वयाचे, आनंद वाटला। आजचा दिवस सर्वात जास्त चालणे झाल्यामुळे पुढे १५ जूनला सासवडला विश्राम होता। इथे माझ्या पायाला झालेल्या छाल्यांकरिता मी औषध घेतले।

१६ जून :: येळकोट येळकोट जय मल्हार : जेजुरी तीर्थक्षेत्र अंतर २०.९४ कि.मी. 

सासवडच्या विश्रांतीनंतर नवीन उत्साह घेऊन आम्ही निघालो जेजूरीला। हे मल्हारी मार्तण्ड किंवा खंडोबाचे जागृत तीर्थस्थान आहे। एका उंच गडावर पायऱ्या चढून दर्शनाला जावे लागते। अतिशय गर्दी आणि थकवा असल्यामुळे मी दर्शनाला जाऊ शकलो नाही, किंवा खण्डोबाची मला आज्ञा नसावी असेही म्हणता येईल। येथे गावाच्या सुरुवातीला उजव्या हाताला एक प्राचीन देऊळ पाहिले, ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी ‘लवथवती विक्राळा‘— ही शंकराची आरती लिहिली असा तिथे उल्लेख केला होता। देवळाला लागून एक तलाव दिसला जो अत्यंत घाण होता। आजच्या रस्त्यात पुन्हा चहा-कॉफी, वडापाव, उसाचा रस, सोडा आणि खूप काही खाय-प्यायची दुकानं होतीच. त्याशिवाय अनेक संस्थांतर्फे अन्न, पाणी, चहा याची मोफत वाटप केले जात होते। उसाच्या रसाच्या सगळया स्टॉलवर आधीच रेकॉर्ड केलेली कमेंटरी फार मजेदार होती। चंद्रभागेच्या पाण्याने जोपासलेल्या उसाचा अमृतासारखा गोड रस ‘ विठाई रसवंती ‘च्या नावाने फक्त पाच रुपयांत एक ग्लास मिळत होता, तो यात्रेत मी एक दोनदा घेतला सुध्दा। वारीला जातांना रस्ता कसा असेल याची शंका आता मिटली होती, कारण पूर्ण रस्ता रुंद हायवे होता, कुठेच उतार चढाव आणि वळण नव्हते। येथे आमचे मुक्कामाचे ठिकाण शोधायला खूप विचारावे लागले। आजचा मुक्काम श्री.आगलावे यांच्या धर्मशाळेत होता। रात्री दररोजप्रमाणे हरिपाठ ज्या ठिकाणी झाला ते एक अतिशय सुंदर राम मंदिराचे आंगण। छान गार वारा होता आणि सोबत सरस हरिपाठ। याच सत्संगात सौ.  माईंची अभंग प्रस्तुति – ‘ खंडेराया तुज करिते नवसू-मरू दे रे सासू- खंडेराया ‘, आणि सोबत डॉ. भावार्थचे संबळ वादन हे मी पहिल्यांदा ऐकले। खरं तर हे वाद्य पण पहिल्यांदाच पाहिले। त्या वास्तुचे मालक पण तिथे उपस्थित होते। रात्री नऊ वाजता जेवण नि नंतर विश्रांति।

– क्रमशः भाग दुसरा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments