सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

दुसरी बाजू… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

पुस्तक – “दुसरी बाजू”

लेखिका – मीनाक्षी सरदेसाई

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन. कोल्हापूर

पृष्ठ संख्या – २१६

किंमत – ३९०

समाज मनाचा आरसा म्हणजे कथासंग्रह” दुसरी  बाजू”

ज्येष्ठ साहित्यिका मीनाक्षी सरदेसाई् यांनी ललितलेखन, बालसाहित्य, कादंबरी, कविता संग्रह, कथासंग्रह,अनुवाद लेखन असे लेखनाचे विविध प्रकार हाताळले आहेत. चाळीस पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांतील काही पुस्तकांना मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

त्यांचा “दुसरी बाजू”हा कथासंग्रह फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला.हा कथासंग्रह नुकताच वाचण्यात आला.या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.या सर्व कथा यापूर्वी विविध दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रत्येक कथा वाचनीय आहे.समाजातील लग्नव्यवस्थे विषयी  झालेले बदल,त्या बद्दलचा तरूणांचा बदलता दृष्टिकोन, वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्या.वयोवृध्दांची अगतिकता, हतबलता.लेखिकेने आपल्या कथेतून मांडली आहे.लेखिकेची भाषा शैली सोपी आहे.विषयाची थेट मांडणी करतात.कथेच्या मांडणीत,विषयात कुठे ही अतिशयोक्ती आढळत नाही.सगळ्या कथा समाजातील वास्तव स्थितीवर प्रकाशझोत टाकतात.कथेतील घटना आपल्या अवतीभवती घडणाऱ्या आहेत.कथेची भाषाशैली संवादात्मक आहे.प्रत्येक कथा सहज उलगडत जाते.कुठे ही ओढूनताणून कथा पूर्ण केली आहे असं वाचणाऱ्याला अजिबात वाटत नाही.कथेतील नायक,नायिका सामान्य घरातील आहेत.त्यांचे प्रश्न रोजच्या जीवनातील आहेत.

“दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचताना वाचक आपले अनुभव कथेला जोडू पाहतो.वाचकाला ही कथा आपलीच आहे असे वाटते.वाचकाच्या मनात कथेचे एक  स्थान निर्माण करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखनीत आहे.काही कथा विनोदी शैलीत आहेत तर काही कथा वाचकाला अंतर्मुख करतात .तर काही कथा नवा संदेश देतात.तरी कोणत्याही कथेतून लेखिका तत्वज्ञान सांगत नाही.काही कथा हलक्याफुलक्या आहेत.बऱ्याच कथेचे विषय सामान्य माणसाच्या जीवनातील असल्याने वाचकाला कथा आपल्या जीवनात घडत आहे असे वाटते. कथा वाचताना वाचक कथेशी एकरूप होतो.

‘दुसरी बाजू’ या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.’दुसरी बाजू’ हीच कथासंग्रहातील पहिली कथा आहे.समाजात लग्न व्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत.जुन्या चालीरीती बदलत आहेत.तरूणांची जीवनशैली फास्ट झाली आहे.थांबत बसायला वेळ नाही.पूर्वी सारखे पोहे खाऊन मुलगी बघायचा प्रोग्राम आज होत नाही.मुलेमुली आपल्या सवडीने हाॅटेल मध्ये भेटतात.मोकळेपणाने भेटतात.विचार जुळले तर लग्न ठरवतात.हे चांगले आहे.पण मुलींच्या अपेक्षा बदलेल्या आहेत.सगळं कसं रेडिमेड हवं असतं त्यांना.एक वेळ मुलीची बाजू लंगडी असली तरी चालेल.पण मुलांची बाजू शंभर टक्के परफेक्ट हवी.तसे नसेल तर काही कारण देऊन मुली मुलांना रिजेक्ट करू शकतात.या कथेत घरात जास्त माणसे आहेत, मला स्पेस कशी मिळणार? म्हणून,घराला लिफ्ट नाही म्हणून मुली मुलांना नकार देतात.घरातील म्हातारी माणसं मुलींना डस्टबीन वाटतात.आजच्या तरूणीचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे.आपले लग्न स्वतः ठरवण्यास त्या समर्थ झालेल्या आहेत.पण मुला मुलींच्या लग्न विषयीच्या अपेक्षा ही बदलेल्या आहेत.भौतिक सुखाचा अधिक विचार केला जात आहे. लग्न ठरवताना येणाऱ्या अडचणीचे  अनेक पैलू लेखिकेने या कथेत मांडले आहेत.तसे प्रसंग लेखिकेने या कथेत मांडली आहेत.एकीकडे शुल्क कारणांमुळे नाती सांभाळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे तर दुसरी कडे मुलांना मुलींशी कसे वागावे हे समजेनासे झाले आहे.मुलांच्या मनाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.या कथेत मुले मुलींना कसा धडा शिकवतात हे वाचनं रंजक आहे.ही कथा वाचकाला लग्न व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडते.

आज काल प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते.चारपैसे कमवून घरी आणने ही काळाची गरज झाली आहे.घर आणि नोकरी सांभाळताना महिलेची मोठी कसरत होत आहे. अशा वेळी घरात वडिलधारी माणसं असतील तर थोडे सोपे होते.वडीलधारी मंडळी म्हणजे खरं तर संस्काराचे विद्यापीठ. मुलांना,नातवंडांना संस्कारक्षम बनवण्यासाठी वडीलधारी मंडळी जीवाच रान करतात. त्यांच्या सानिध्यात मुले आली की ती संस्कार बनतात. संवेदनशील होतात.पण आजकाल हे दिसते कुठे ? वडिलधारी माणसं घरात नकोच आहेत. संकुचित वृत्ती मूळे, स्वार्थ बोकाळल्याने , आपमतलबीपणा वाढल्यामुळे, घरातील वृध्द माणसे ओझे वाटू लागली आहेत.त्याचा तिरस्कार केला जात आहे.हाच विषय अधोरेखित करणारी  आज्जू ही कथा आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी एक सुंदर कथा.सुनेला म्हाताऱ्या सासऱ्याची अडचण वाटते. नातवाचे मात्र आजोबांन वर नितांत प्रेम असते.आईचे आजोबांशी असणारे तुटक वागणे त्याला कळते.पण तो आईला काही बोलू शकत  नाही.आपल्या परीने आजोबांची काळजी घेत असतो.त्यांना जपतो. त्याच्या सानिध्यात राहतो.

ही कथा वाचताना वाचकाला आपले आजोबा नक्की आठवतील.

होम मिनिस्टर कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्रातील महिलांना वेड लावले.आपली कामे भराभर  आवरून महिला हा कार्यक्रम न चूकता बघतात. एखाद्या एपिसोड चुकला तर रिपिट डेलीकास्ट बघतात.’ पैठणी ‘ ही कथा लेखिकेने याच विषयावर बेतली आहे.महागडी पैठणी भेट म्हणून मिळणार,आपण टिव्ही दिसणार, पैठणी मिळाली की नवरा आपल्या उचलणार आणि आदेश भावजी आपल्या भेटणार या साऱ्या गोष्टींची महिलांच्यात क्रेझ आहे.आदेश भावजीना फोन लागला  म्हटल्यावर महिला कशा पद्धतीने या खेळाची तयारी करतात,आपल्या नवऱ्यांना कसे मर्जीत आणतात, त्यांना खेळ कसे शिकवतात हे सारं लेखिकेने विनोदी शैलीत रंगतदार मांडले आहे.ही हलकीफुलकी आहे. ही कथा मन ताजे करून जाते.

जगात मातृत्व हा सर्वात मोठा सन्मान आहे.आई शिवाय आईच्या मायेने सांभाळ करणारा जगात विरळाच असतो.त्यातल्या त्यात बाईला लेकराची माया येवू शकते.पण पुरूषाला आईची माया करायला येण  अवघडच.संतांन मध्ये हा गुण दिसला की आपण त्यांना माऊली ही उपाधी जोडतो.आई थोरवी सांगणारी ” आई म्हणोनी कोणी” ही कथा आहे.ही कथा आहे सानियाची.आपल्या मुलांचे पालनपोषण कोण ही करेल. पण आपल्या सवतीच्या मुलांचा,सवतीच्या  पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलांचा सांभाळ सानियाची आई करत असते.घडल्या प्रसंगात बिचाऱ्या मुलांचा काय दोष ? म्हणून ती आई पण स्विकारते.पण या दुसऱ्याच्या चार मुलांच्या लादलेल्या मातृत्वामुळे आईची झालेली कुंचबना सानियाने लहानपणापासून बघितलेली असते.या अशा  विचित्र भेळमिसळ असलेल्या मुलांना एकत्र वाढत असताना समाजातून,शाळेतून झालेली कुचेष्टा सानियाने सोसलेली असते.आपल्या आईने सोसलेली यातना बघितलेली असते.अशी वेळ कुणाच्या ही वाट्याला येवू नये असे तिला वाटे.आपल्या आईला  स्वतःचे व्यक्तीमत्व, अस्तित्वच कधीच मिळाले नाही तिचे असे हे आईपण काय कामाचे? हा विचार लहानपणापासून सानियाच्या मनात घट्ट रूतून बसलेला असतो.म्हणूनच ती मनिषला मुलांची आवड असताना सुद्धा स्वतःआई होण्यासाठी नकार देते.मुलांचा सांभाळ करण्याचा ठेका काही  बायकांनी घेतला नाही.पुरुष ही वेळप्रसंगी आपले ममत्व सिध्द करू शकतो.हेच ” आई म्हणून कोणी”  या कथेत दिसते. मनिषचे ममत्व या कथेत दिसते.ही कथा उत्कंठता वाढवणारी आहे.लेखिकेने पात्राच्या संवादातून कथा पुढे नेहली आहे.

“आली लग्नघटी” ही कथा म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव सोहम याच्या मनात येणाऱ्या विचाऱ्यांचे काहूर आहे.लग्न झाले की आपले व्यक्ती स्वातंत्र्य संपले.लग्नाच्या आदल्या दिवशी आपण आपले स्वातंत्र्य उपभोगावे असे सोहमला वाटत असते.उशिरा उठावे, मनाप्रमाणे वागावे अशी साधी अपेक्षा असते.पण घरातील बायका काही त्याची ही अपेक्षा पूर्ण करू देत नाहीत.तस ही

आपल्याला वाटते की लग्न म्हटलं की फक्त मुलीना खुप धडधडते,मनावर दडपण येते,आपण आपले घर सोडून परक्या ठिकाणी जाणार म्हणून मुली अस्वस्थ होतात.पण या कथेत मुलाच्या मनाची अस्वस्थता छान रंगवली आहे.हे ही होवू शकते.हे लेखिकेने दाखवून दिले आहे.

जेव्हा नवरा बायको दोघे करियर करत असतात तेव्हा एक पुढे एक मागे असेल तर स्विकारले जाते.समजून घेतले जाते.पण जेव्हा एकाच वेळी दोघाचे भाग्य उजळण्याची संधी येते तेव्हा माघार कुणी घ्यायची हा खरा प्रश्न असतो.दोघे समंजस असले तरी बऱ्याच वेळा  इगो आडवा येतो.”काही हरकत नाही” ही कथा म्हणजे अशाच समंजस पति पत्नीच्या नात्याची सुंदर गुंफण आहे.घर दोघांचे असते दोघांनी त्यासाठी समजूतदार दाखवावा लागतो. वेळप्रसंगी इगो आडवा न आणता आपल्या स्वप्नांना बाजूला करता आलं पाहिजे तर संसार टिकतो.कोण पुढे ,कोण मागे असे न मानता  दोघांचा समजूतदार पणा महत्वाचा असतो हेच सांगणारी ही कथा.ही कथा लेखिकेने खुप सुंदर हाताळली आहे

सूर जुळताना,बहिणा,सेम टू सेम ,आज काय स्पेशल?गुन्हा,खारीचा वाटा अशा एका पेक्षा एक सरस कथा या कथा संग्रहात आहेत.प्रत्येक कथेचा आपला एक नूर आहे.या कथा ही समाजातील विविध विषयावर भाष्य करणाऱ्या आहेत त्या वाचताना नक्की आनंद होईल.हा कथासंग्रह एकदा तरी वाचला पाहिजे असा आहे.” दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मी इथं मांडले आहेत.मिनाक्षीताईना पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments