श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “प्रिय…” ☆ श्री आशिष मुळे ☆
पहाटेच्या गार वाऱ्यात अर्धोंमिलीत माझ्या डोळ्यात अन् शिणलेल्या माझ्या मनात दिसलीस तू सूर्यकिरणांच्या तेजात.. किती वर्ष झाली तुला दूर जाऊन काळही गेला आता वेळ विसरून दिसलीस का मग अशी अचानक जाताना तर गेली होतीस तुझं मन सावरून.. विचारायला जमलं नाही तुलाही अन मलाही पण आज विचारायला हरकत नाही माझ्यातली हिंमत आजही तीच आहे पण तुझ्यातली भीती काही गेलेली दिसत नाही.. म्हणून विचारतो, खरंच काय मिळवलस? जनरिती समोर तेव्हा झुकून आणि विचार कर काय गमावलस वादळात माझा हात सोडून.. दोष नाही देत तुला, डोळ्यातून पाणी काढू नकोस आता तरी मनातलं, जिभेवर आणायला लाजू नकोस आजही मित्रच आहे तुझा, तुझ वाईट कधी चिंतणार नाही दुखलं तुला काही तर आजही डोळ्यात पाणी थांबणार नाही.. आज मीही लूजर नाही आणि तूही विनर नाही याचा मला खरंच आसुरी आनंद होत नाही कारण जातानाही तू मला काही देऊनच गेलीस जिंकायच्या ऊर्मीला माझ्या ज्वाळा बनवून गेलीस.. त्याच आगीवर आजही जगतो आहे जगता जगता इतरांनाही ऊर्जा देतो आहे आता परत येऊ नकोस अन भडकलेली माझी चिता अशी मधूनच विझवू नकोस…
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कवितेवरच हृद्य लेखन भावलं .