मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र जीवाचे… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ मैत्र जीवाचे… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

तशी मैत्री तर जमते पुष्कळांशी 

पण जीवाचं मैत्र ….. ते जुळत नाही सर्वांशी ….. 

 

हे जीवाचं मैत्र ……. 

    याला ना स्थळकाळाचे .. ना वयाचे बंधन 

           ना कसल्या औपचारिकतेचं कुंपण …… 

    असे ना कुठलीही जातपात 

            त्याने फरकच पडत नाही त्यात …… 

     तो..की.. ती, हा प्रश्नच नसतो मुळात 

            कारण तो उगवतच नाही मनाच्या तळात …… 

     नाही अपेक्षा सततच्या भेटीगाठींची 

            नाही गरज सततच्या संवादाची …… 

      याला लागत नाही कुठलेच 

             व्यावहारिक देणे – घेणे …… 

कारण …… 

       कारण हे तर मनाच्या आत आत …. 

              “ प्रेमळ निरपेक्ष स्नेहाने नटलेले लेणे “ …. 

 

      मी तर सजलेय या लेण्याने …… 

               तू …? ……. 

© सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परवा अचानक…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “परवा अचानक…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

परवा अचानक….  

शाळेतला जुना बाक भेटला..

शरीर तुटकं पाय बारीक,

थोडा म्हाताराच वाटला…

 

“ओळखलसं का मला?”,

विचारलं त्याने हसून…

वेळ असेल तुला तर,

बोलू या थोडं बसुन…

 

गाडी पाहताच आनंदला,

हलवली तुटकी मान…

” खुप मोठा झालासं रे,

पैसा कमावलास छान “.. 

 

“ओळखल्यास का बघ ह्या,

माझ्यावरच्या रेघा…

भांडण करुन मिळवलेली,

दोन बोट जागा…

 

अजूनही भेटतात का रे, 

पक्या, मन्या, बंटी…?

टाळ्या देत करत असाल,

मनमोकळ्या गोष्टी…

 

डबा रोज खाता का रे,

एकमेकांचा चोरुन?

निसरड्या वाटा चालता का,

हाती हात धरुन..?… 

 

टचकन् डोळ्यात पाणी आलं,

कंठ आला भरुन…

मित्र सुटले, भेटी सरल्या,

सोबत गेली सरुन…

 

धावता धावता सुखामागे,

वळून जेव्हा पाह्यलं…

एकटाच पुढे आलो मी,

आयुष्य मागे राह्यलं…

 

त्राण गेलं, आवेश संपला,

करावं तरी काय..?

कोरड पडली घशाला,

थरथरले तरणे पाय…

 

तेव्हढ्यात आला शेजारी,

अन् घेतलं मला कुशीत…

बस म्हणाला क्षणभर जवळ,

नक्की येशील खुशीत…

 

“अरे वेड्या पैश्यापाठी,

फिरतोस वणवण…

कधी तरी थांबून बघ,

फिरव मागे मन…”

 

मित्र सगळे जमव पुन्हा,

जेव्हा येईल वीट…

वंगण लागतं रे चाकांना,

मग गाडी चालते नीट…

 

शाळेतल्या त्या सोबत्याचा,

खूप आधार वाटला…

परवा अचानक शाळेतला,

जुना बाक भेटला…

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्रत्वाचा सल्ला… (चित्र एकच… काव्ये तीन) ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  मित्रत्वाचा सल्ला… (चित्र एकच… काव्ये तीन) ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

श्री आशिष बिवलकर

[1] मित्रत्वाचा सल्ला

एकमेकांशी स्पर्धा करणारेही 

एकमेकांच्या सोबतच जगतात !

माणूस असो वा प्राणी 

आपल्या सोईप्रमाणेच वागतात ! 

कवी : आशिष बिवलकर. बदलापूर. 

          ९५१८९४२१०५ 

 

श्री प्रमोद वामन वर्तक  

[2] – मित्रत्वाचा सल्ला

पाऊस धो धो पडतोय 

गाठ पडली बिळात,

विसरला नाहीस ना रे

हरवले तुला खेळात ?

शर्यतीत गाजर खाऊन

झोपलास झाडाखाली,

असं कसं विसरलास

शर्यत लागल्ये आपली ?

सल्ला देतो तुला मित्रा

गर्वाच घर खाली असतं,

हवा डोक्यात गेली की

बक्षीस हमखास हुकतं !

इसापनीतीत प्रसिद्ध 

ससूल्या आपली जोडी,

हट्ट करून शर्यतीसाठी

काढू नको परत खोडी !

काढू नको परत खोडी !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

☆☆☆☆☆☆

सुश्री नीलांबरी शिर्के

[3] मित्रत्वाचा सल्ला

पावसाने धुमाकुळ घातला

शर्यत नकोच भाऊ

कासवदादा चल आपण दोधे

एकमेकां  सोबत देऊ –

शर्यत आपली विसर आज

सुरक्षित  आधी होऊ

संकट आले जरी काही तर

आधार एकमेक होऊ – 

पाणी जादा इथवर तर

पाठीवरती घेशिल ना !

हळूहळू चालत चालत 

सुरक्षित  जागी नेशील ना ! –

खेळता प्रतिस्पर्धी आपण

संकटी आधार होऊ

यापुढे जगूया असे की

मित्र नव्हे, खरे भाऊ — 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈[3]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सत्य… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सत्य ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

जेव्हा जेव्हा दर्पणी बघते

आयन्यात मी रूप पाहते

सांगे दर्पण मजसी हासून

कशास बाई असे मुखवटे

 

यौवन आता तुझे संपले

वेलीवरचे फूलही सुकले

कशास आता रंगरंगोटी

केस रुपेरी भाळी चमकले

 

सुरुकुतलेले तुझे वदन

त्या वदनाला कशास आवरण

सर्वांगावर जरा पसरली

कुठे कुठे तू देशील लिंपण

 

उघड मनाच्या कवाडाला

स्वीकारून तू सत्याला

जगत रहा क्षण आनंदाचे

खुलवील तुझ्या रूपाला

 

सुविचारांचे देणे घेणे

तुझे हासणे तुझे बोलणे

सन्मान तुझ्या व्यक्तित्वाला

वदनावरती तेज विलसणे

 

घटका जाती पळे जाती

वय वर्षे हरवती

हरित तृणांच्या मनावरती

आयुष्ये खेळती

 

आरशाने कथन केले

सत्य उपदेशीले

कधीच नाही खोटे बोलत

आता मी जाणीले

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

कबूल आहे तिचंच असतं घर

पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

 

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी

पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी 

नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी

फार नाही, पुरेल तिला मदत जराशी

लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून

सांगावं मनातलं काही जवळ बसून

ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

आई राहून सासरी लेकीला माहेर देते

पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?

जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण

मग आईला कुठलं माहेरपण?

 

तिला ओळखणारं तिचंच अंगण

समजूतदारपणावर विश्वासलेलं मोकळेपण

शरीर मनाला विसाव्याचे क्षण

आईलाही हवं असेल का माहेरपण?

 

आईलाही हवा असेल कधी विसावा

वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा

ज्या हातांना तिनेच लावलंय वळण

आईलाही द्यावं कधी माहेरपण…… 

 

 देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला.

… .’ तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले…आणि विचारलं दुसरं काही मागा….  तर तुम्ही काय मागणार..?? ‘ 

….त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

” माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार …. कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. “ 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त भेट…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “फक्त भेट…” 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा 

काय चाललंय मनात तुझ्या 

भेटून फक्त बोलत जा 

मोकळं सोड स्वतःला जरा 

कधीतरी मोकळं होत जा 

हलकं वाटेल तुझंच तुला 

मन रिकामं करत जा 

जुन्या आठवणी गप्पागोष्टी 

आमच्यात सुद्धा रमत जा 

आलेच कधी वाईट विचार 

बिनधास्त फोन करत जा 

काय आहे आयुष्य अजून 

निदान मनातले वाटत जा 

पहा किती फरक पडतो 

आनंद तेव्हढा लुटत जा 

पन्नाशीला आलोय आपण 

संपर्कात तेव्हढं रहात जा 

काय हवं काय नको तुला 

कुणाला तरी सांगत जा 

मित्र असतात कशासाठी 

मैत्री तेव्हढीच जपत जा 

आम्ही फक्त मस्त जगतो 

तसाच मस्त जगत जा 

पैसा नाही लागत त्याला 

मनातले मात्र सांगत जा 

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा …… 

           येवून फक्त भेटत जा …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भलरी गीत… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ भलरी गीत… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी

 

आल्या रिमझिम सरी

पेरणीला या लई भारी

खाचरात भरे पाणी

गाऊ या पाऊस गाणी

 

मनाला येई तरतरी

सपान आलं सामोरी

चिखलात माझी राणी

करते भात लावणी

 

मायेत भिजल्या पोरी

चमकती चंद्रकोरी

आनंदात ही धरणी

पहा देवाची करणी

 

दिवस आज भाग्याचा

गंध श्रावणसरींचा

रोपे खोचून भाताची

पूजा करूया लक्ष्मीची

 

प्रसन्न ती होईल गं

भरभरून  देई गं

घास खाऊ या सुखाचा

भ्रतार माझ्या प्रितीचा

 

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आतुरले मन माझे,

    घनाने बरसावे !

तुझ्या जलधारात,

   मी चिंब चिंब भिजावे!

 

किती ओढ घेई तू,

  तृषार्त मी, तृषार्त मी!

एक एक थेंबासाठी,

  मनी झुरत आहे मी!

 

 तुझ्या मनाची मर्जी,

   सत्त्व पाहते सर्वांचे !

 आभाळाकडे डोळे लावून

    सुकले गं डोळे त्यांचे!

 

  हिरवाई बहराचे दिवस,

    असे दिसती सुकलेले !

 एकेक दिवस जाई ,

    मन माझे मिटलेले !

 

 लवकर ये सत्वरी,

   वाट पाही भूवरी!

शांतव तू जीवाला,

   हीच ओढ अंतरी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दोन पेले… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– दोन पेले… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुगंधाने भरले असे दोन पेले

 आकर्षक  रंग तया लाभलेले

 नासिके समीप प्याल्यास नेता

  दरवळात  गात्र प्रफुल्लित झाले …… 

   मोहकवर्णासवे  दो चषकांना

   ओठाशी घ्याया मन राहवेना

   तबक पाचुचे सौंदर्यात वाढ

   निसर्गापुढे झुकतात माना …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares