मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आकाशाशी जडले नाते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आकाशाशी जडले नाते?  सुश्री वर्षा बालगोपाल 

पद न वाजवता गुपचूप येऊन का

नभ सख्याने ठरवले डोळे झाकायचे?

पद गात होती धरा सखी तन्मयतेने

भाळला आणि विसरला जे करायचे॥

*

लहर आली त्याला ठरवले होते जणू

खोडी काढून तिची थोडे उचकवायचे

लहर प्रितीची आली, पहातच राहिले

मुग्ध होऊन  विसरले भान जगताचे॥

*

कर घेतले करात नकळत नभाने

शपथेने म्हणे जन्मांतरी ना सोडायचे

कर माझ्याशी लग्न वदे धरा प्रेमे मग

आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 224 ☆ तपस्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 224 ?

तपस्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पहाट ओली धुक्यातील ही,  धुंद गारवा,सभोवती

वृक्षवल्लरी सुखात गाती, मधुमिलिंदही गुणगुणती

*

गाव कोणते, कुठली वस्ती, सारे काही, अनोळखी

तुझ्यासवे मी इथवर आले, आत्म्यामधली, ही तलखी

*

तहान माझी युगायुगांची, तू माझा रे स्वप्नसखा

या देहावर त्या देहाचा, जणू घातला, अंगरखा !

*

मैथुनातले सुख अनुभवती, मनुष्यप्राणी-पशुपक्षी

या आत्म्यावर, देहावर ही, गोंदवलेली, ही नक्षी!

*

तृप्त जाहले, तव स्पर्शाने, मिटली सारी मम तृष्णा

ओढ, वासना, आसक्तीही, असे तपस्या… रे कृष्णा !

© प्रभा सोनवणे

२ एप्रिल २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगी सर्व सुखी ☆ प्रेमकवी दयानंद ☆

प्रेमकवी दयानंद

परिचय 

श्री.दयानंद लक्ष्मण घोटकर

शिक्षण  एम्.ए.बी.एड्.

  • गायक,संगीतकार, लेखक, कवी, बालसाहित्यिक
  • सांस्कृतिक क्षेत्रात ४२ वर्षे कार्यरत
  • झलक, निषाद या संस्थांसाठी सुमारे २५०० सांस्कृतिक कार्यक्रम सादर
  • पुणे फेस्टिवल साठी ‘पुणे नवरात्री महोत्सवात सहभाग
  • दूरदर्शन, आकाशवाणी साठी मालिका,संगितिका, गीतरामायण, बालोद्यान इ.सहभाग व सादरीकरण.
  • मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन
  • शिक्षकांसाठी बालचित्रवाणीतील कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार
  • बालसाहित्य , सीडी,कॅसेट प्रकाशित
  • अ.भा.साहित्य संमेलन, आळंदी येथे सहभाग
  • अंगणवाडी,बालवाडी ,शिक्षक प्रौढसक्षरता विभागासाठी शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती

विविध सन्मान : पणे महानगरपालिका,नॅशनल मुव्हमेंट आर्ट,अ.भा.जैन संघटना,कुलफौंडेशन, रोटरी क्लब, अ.भा.नाट्यपरिषद पुणे कलांगण मुंबई अशा अनेक संस्थांकडून सन्मान व पुरस्कार प्राप्त.

सभासद : अभिनव कला भारतीय संघटना,अ.भा.नाट्यपरिषद परिषद,हरि किर्तनोत्तेजक संस्था, गानवर्धन आदी नामांकित संस्थांचे सदस्य आहेत.

? कवितेचा उत्सव ?

☆ जगी सर्व सुखी ☆ प्रेमकवी दयानंद

जगी सर्व सुखी

असा मीच आहे

एक कल्पवृक्ष कवितेचा

माझ्या मनात आहे…

 

किती अद्भुत सुगंधी

पाने, फुले विविधरंगी

वेचण्यात, गुंफिण्यात एक धुंदी..

 

कधी आनंद, कधी दुःख

कधी स्वप्न, कधी सत्य

कधी प्रीती, कधी विरह

सा-यांचे स्वागत अगत्य…

 

विविध रस, रुप, स्पर्श,गंध

अन् लय, ताल, वृत्त, छंद

चारोळी, शायरी, काव्य

सा-यात होतो धुंद…

 

हसतो, रडतो, खेळतो

मौनातुनी कधी बोलतो

मी लिहूनी होतो, शुद्ध, स्वच्छ

शब्द, सुरांच्या जगात रमतो…

© प्रेमकवी दयानंद

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी  ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी  ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆

लेखक – राजीव गजानन पुजारी

प्रकाशक – क्राऊन पब्लिशिंग, अहमदाबाद

पृष्ठ संख्या – २८८

किंमत – ₹ ३५०/-

मागील आठ दिवसांत श्री राजीव पुजारी लिखित ‘अंतराळवेध’ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे अंतराळ क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी मोलाचा खजिनाच आहे. पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते मुखपृष्ठ. पुस्तकाच्या नावाला साजेसेच हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर भारताला ललामभूत ठरलेला विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर चांद्रपृष्ठाच्या पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसतात. वरच्या उजव्या कोपऱ्यात अमेरिकेचा पर्सिव्हिरन्स रोव्हर मंगळभूमीवर कार्यरत दिसतो. वरच्या उजव्या कोपऱ्यात भारताचा मानदंड असणाऱ्या इस्रोचा लोगो दिसतो व दोहोंच्या मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ विक्रम साराभाई यांचे छायाचित्र दिसते. पर्सिव्हिरन्सच्या खाली चांद्रयान -३ च्या चंद्रावतरणाचा क्षण अचूक दाखविला असून त्या खाली इस्रोचा प्रक्षेपक अवकाशात झेपवतांना दिसतो. मुखपृष्ठ पाहूनच वाचकांना पुस्तक खरीदण्याचा मोह होतो. मालपृष्ठावर पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे.

पुस्तक एकूण चार विभागात आहे. पहिल्या विभागात नासाची मार्स २०२० मोहीम दहा भागांत विशद करून सांगितली आहे. पहिल्या भागात पर्सिव्हिरन्स रोव्हर विषयी जाणून घेण्याचे सात मुद्दे विस्ताराने सांगितले आहेत. दुसऱ्या भागात प्रथमच दुसऱ्या ग्रहावर स्वायत्त उड्डाण भरणाऱ्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी जाणून घेण्याच्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत. तिसऱ्या भागात मार्स २०२० मोहिमेविषयी तांत्रिक माहिती सांगितली आहे. चौथ्या भागात मंगळ ग्रहाविषयी व मार्स २०२० यानाच्या प्रक्षेपणाविषयी माहिती दिली आहे. पाचव्या भागात यानाचा मंगळाच्या वातावरणात प्रवेश, अवरोहण व प्रत्यक्ष मंगळावतरण याविषयीची माहिती आहे. सहाव्या भागात यान मंगळावर उतरल्यावर त्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या याविषयीची माहिती आहे. सातव्या भागात रोव्हर व खडकाचे नमुने सठविण्याच्या प्रणालीविषयीची माहिती आहे. आठव्या भागात मंगळाकडे जातानाच्या मार्गक्रमणाचे टप्पे, त्या टप्प्यांवर असणारी वैज्ञानिक उपकरणे व मोहिमेचा उद्देश विशद केला आहे. नवव्या भागात रोव्हरला ऊर्जा पुरविणाऱ्या MMRTG विषयी माहिती आहे तसेच उड्डाणापासून ते अवतरणापर्यंत यान व पृथ्वी यांदरम्यान दूरसंभाषण कसकसे होत होते या विषयीची माहिती आहे. दहाव्या भागात यानावर असणारी प्रायोगिक उपकरणे म्हणजे MOXIE व इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी माहिती दिली आहे तसेच नमुने गोळा करण्याची प्रणाली व एकंदरीतच यानाच्या जुळणीच्यावेळी घेतलेल्या कम्मालीच्या स्वच्छतेसंबंधी अचंबित करणारी माहिती दिली आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात नासा व इस्रोच्या विविध मोहिमांची माहिती दिली आहे. यात LCRD, IXPE, DART, LUCY, जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना व मंगळ नमुने परत योजना या नासाच्या मोहिमा तसेच SSLV-D1, SSLV-D2, चंद्रयान ३, आदित्य एल 1 या इस्रोच्या मोहिमांविषयी साद्दंत माहिती दिली आहे. तसेच गुरूत्वीय लहरींच्या वैश्विक पार्श्वभूमीच्या शोधाविषयी विस्तृत माहिती आहे. हे वाचून लेखकाच्या अंतराळाविषयीच्या सखोल अभ्यासाची अनुभूती येते.

पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात दोन अंतराळविज्ञान कथा आहेत. पहिली कथा आहे ‘आर्यनची नौका’. हि कथा मानव भविष्यात मंगळावर करू पाहणाऱ्या वसाहतीसंबंधी आहे. सध्या मंगळ जरी शुष्क दिसत असला तरी एकेकाळी तो सुजलाम् सुफलाम् होता. कालांतराने त्याचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण नाहीसे झाले. याच्या परिणामस्वरूप तो शुष्क झाला. या कथेत इस्रोने मंगळाचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण कसे पुनरुज्जीवीत केले, ऑक्सिजनची पातळी कशी वाढवली, ध्रुवांजवळील व घळींमधील गोठलेले पाणी द्रवरूपात आणून मंगळ सुजलाम् सुफलाम् कसा केला व पृथ्वीवरील निवडक माणसांनी इथे वसाहत कशी वसवली याचे वैज्ञानिक शक्यतांच्या अगदी निकट जाणारे कल्पचित्र रंगवले आहे.

दुसरी कथा आहे ‘ भेदिले शून्यमंडळा ‘. या कथेत लेखकाच्या स्वप्नात यंत्रमानव मंगळावर जातात. तेथे उत्खनन केल्यावर त्यांना मंगळावर एके काळी वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेली जमात होती असे निदर्शनास येते. उत्खननात त्यांना कांही विज्ञान विषयक पुस्तके मिळतात. त्यातील एक पुस्तक कृष्णविवरांसंबंधी असते. त्यात कृष्णविवरात प्रवेश कसा करायचा याचे विवरण असते. तदनुसार लेखक कृष्णविवरात प्रवेश करून धवल विवरातून बाहेर येऊन समांतर विश्वात जातो व पृथ्वीवर भारताने हरलेली मॅच तिथे भारत जिंकल्याचे त्याच्या निदर्शनास येते. दोन्ही कथा वाचतांना लेखकाचा अभ्यास व त्याची कल्पनाशक्ती यांचा कसा उत्कृष्ट मिलाफ झाला आहे याची प्रचिती येते.

चौथ्या भागात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, त्याची विविध केंद्रे, तेथे चालणारे संशोधन याची माहिती दिली आहे. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी इस्रो वाढविण्यासाठी योगदान दिले आहे त्यांची चरित्रे थोडक्यात दिली आहेत.

पुस्तक पेपरबॅक स्वरूपात असून फॉन्ट मोठा असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही. एकूणच हे  ‘अ मस्ट रीड’ पुस्तक आहे.

परिचय : सौ. सुनीता पुजारी, सांगली 

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगपंचमी विशेष – रंग माझा कोणता ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

रंगपंचमी विशेष – रंग माझा कोणता ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

रंग तुझ्या आवडीचा तूच मजला देऊनी

तू कसे पुसशी मला रंग माझा कोणता ?

*

कोणत्या रंगात नसतो ? तूच मजला सांग ना

मी जसा दिसतो तुला तोच माझा रंग ना ?

*

नीलवर्णी व्योम आहे श्यामवर्णी मेघ आहे

हरित वर्णी पर्ण आहे धुम्रवर्णी सांज आहे

*

पीतवर्णी ऊन आहे श्वेतवर्णी तेज आहे

रक्तवर्णी मी प्रभा  काजळीशी रात्र  आहे

*

इंद्रधनु होऊनिया मीच तुजला मोहवितो

चांदण्याच्या लेपनाने  रात्र  सारी सजवितो

*

माय काळी,कोंब  हिरवे,हे कसे रे साधते

मिश्ररंगातून बघसी रोज संध्या  रंगते

*

रंग सारे  हीच माया जाणूनी घे सत्य  माझे

सुख आणि दुःख  यांनी,रंगते जगणे तुझे

*

रंग कोणता का असेना अंतरंगी मज स्थान  दे

रंग येई जीवनाला सुख अथवा दुःख  असू दे.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #231 ☆ आॕनलाईन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 231 ?

☆ आॕनलाईन ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आॕनलाईन खरेदीचा रोग मला जडला

बँक खात्यामधला होता पैसा खर्ची पडला

*

नव्हती फार हालचाल देह थोडा वाढला

दम लागतो मला आता जर जिना चढला

*

वेळेवरती येई पिज्जा पोटामध्ये ढकला

मनातून धन्यवाद देऊन टाका कुकला

*

स्वयंपाकाचा घरात प्रसंग नाही घडला

भाजीचा मी देठ कधीही नाही होता खुडला

*

एकदा केला प्रयत्न प्रसंग बाका घडला

होता पहिल्या घासाला नवरा माझा रडला

*

बाहेरच्याच खाण्यावर जीव माझा जडला

त्याचसोबत औषधानं जीव थोडा पिडला

*

सुई पासून सारं काही येत होतं घरला

घरामध्ये बॉक्सचाच होता कचरा भरला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ती… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– ती – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

डौलदार ऐटीत चाल ,

दिसतेय तुझी ग लेकी |

रॅम्पवॉकवर चालणारी मॉडेल 

तुझ्यापुढे पडेल फिकी |

*

कळशीभर पाण्यासाठी दाही दिशा,

चिमुकले चाले तुझी वणवण |

छोटीशी कळशी हातात घेउन,

तुझ्याच सारख्या कित्येक जण |

*

नुसती आश्वासने देऊन,

तोंडाला पानं पुसली जातात |

पिढ्यानं पिढ्या हेच चाले,

समस्या जिथल्या तिथेच राहतात |

*

कळशी पाण्याने भरेल की नाही,

कुठे नाही त्याची कसली शाश्वती |

डोळे अश्रूंनी नक्कीच भरतील,

मिळवलेल्या स्वातंत्र्याची फलश्रुती |

*

गावोगावी कोवळ्या कळ्या,

पाण्यासाठी मैलोन्मैल भटकतात |

योजनांच्या झारीतील शुक्राचार्य,

मलिदा खाऊन खुर्चीला चिकटतात |

*

कोरडा दुष्काळ आवडे सर्वांना,

लाटती मयताच्या टाळूवरचे लोणी |

हंडाभर पाण्यासाठी पायपीट,

वाली न उरला व्यवस्थेत कोणी |

*

प्रजासत्ताकाचे अमृत वर्षं,

अमृत सोडा पाणी ही राहिले दूर |

जाहिरातबाजीचे उधळतात घोडे,

धुराळा उडवीत दौडती खूर |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवा पुढती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ देवा पुढती☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

ज्यांच्या त्यांच्या घरात आता

ज्याने त्याने सुखी असावे

शुभंकरोती म्हणताना ही

शुद्ध तुपाचे दिवे जळाले

आठवण होता साठवणीच्या

सर्व तिजो-या खुल्या कराव्या

काळासोबत उजळत गेल्या

घटनांना ही स्पष्ट बघावे

*

कोणासोबत काय करावे

मनात सारे ठरवत जावे

जुने गीत जर आठवले तर

मनात ते ही खुशाल गावे

मिटून डोळे शांतपणाने

करून घ्यावी ध्यानसाधना

देवपुजेच्या ताम्हाणातील

कृष्णाला पण नित्य भजावे

*

देवापुढच्या निरांजनाला

पदराखाली हळू जपावे

वाया गेल्या निर्माल्याला

पुन्हा एकदा स्पर्शून घ्यावे

मनातली मग दूर करावी

नको तेवढी अडगळ सारी

काळाजातल्या कोप-यातले

दडून बसले नाव स्मरावे

*

मिटून डोळे हात जोडता

बनून कापूर विरून जावे

पद्मासन मग मोडत आसता

ओले  डोळे  हसत  पुसावे

गंधचंदनी भाळावरचा

उपहासाने हसेल तेव्हा

मस्तक नमवून देवापुढती

बावरलेले मन आवरावे

*

मनात सुंदर गाव वसावे

म्हणून माझे ते कळवावे

काळजातला चंद्र पाहता

हसून पुढती निघून जावे

माथ्यावरच्या पदरासंगे

आपुलकीने करीत चाळा

तुळशीला मग घालत पाणी

वळून मागे पुन्हा बघावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 166 ☆ अभंग… मनं शुद्ध व्हावे ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 166 ? 

अभंग…मनं शुद्ध व्हावे ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

मनी नसे भाव, म्हणे देवा पाव

फुकटचा भाव, काय कामी.!!

*

सर्वच ठिकाणी, स्वार्थ फक्त शोधी

आणिक उपाधी, शोध घेई.!!

*

वरवडे सर्व, क्रिया आणि कल्प

मनात विकल्प, भरलेला.!!

*

उपास तापास, व्रत नि वैकल्य

कैसे ते साफल्य, होईल हो.!!

*

कविराज म्हणे, मनं शुद्ध व्हावे

बाकीचे सोडावे, कृष्णावरी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

रसास्वाद  : ज्योत्स्ना तानवडे

समाजात गैर रूढी, परंपरा चुकीच्या धारणा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या विरुद्ध अनेक समाजसेवी कार्यकर्ते अतिशय तळमळीने कार्य करीत असतात. पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. तरीही मोठ्या निर्धाराने ते आपला लढा सुरूच ठेवत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची तळमळ मांडली आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अजून मी आहे या त्यांच्या एका वेगळ्या विषयावरच्या अतिशय सुंदर कवितेतून. आज आपण त्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

☆ अजून मी आहे ☆

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

 

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्री-भृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती-जमातीतील तेढ मिटविण्याचे

———

———

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

 

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ (व्रात्य) पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

 

कधी संभ्रम पडला सश्यासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत राहणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून.

 

म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे

अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

 

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

मुक्तछंदातील ही कविता प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. कवी समाजाच्या भल्यासाठी झटणारा एक प्रामाणिक, तळमळीचा कार्यकर्ता आहे. तो त्याच्या वाटचालीविषयी आपल्याशी संवाद साधतो आहे.

तो आयुष्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मानवी जीवनाचा थांग सहजासहजी लागणे शक्य नसते. पण तो जिद्दीने असा थांग शोधतो आहे. समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. कवी आपली अशी कर्तव्ये करण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आनंदात जगताना समाजासाठी असलेले आपले कर्तव्य सुद्धा उत्तम रीतीने पार पाडायला हवे. दोन्हीचा छान समन्वय साधायला हवा.

कवी अशी वाटचाल बऱ्याच काळापासून करतो आहे. हे ‘अजून’ या शब्दातून स्पष्ट होते आहे. निवृत्तीचे वय होत आले, बरीच वाटचाल झाली तरी त्याने आपली सामाजिक भूमिका बदललेली नाही. तो पूर्वीच्या जोमाने अजूनही काम करीत आहे.

कवीने इथे अन्योक्ती अलंकाराचा छान वापर केलेला आहे. स्वतःचे मनोगत सांगत असताना ही कविता समाजातील थोर कार्यकर्त्यांना उद्देशून पण आहे. त्यांच्या प्रती आदर दाखवणारी आहे.

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्रीभृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती- जमातीतील तेढ मिटवण्याचे

———-

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

मन व्यथीत करणाऱ्या असंख्य दुष्प्रवृत्ती समाजात आहेत. त्यातून असंख्य वाईट घटना घडतात. स्त्रीभृणहत्या हा तर मानवतेला लागलेला फार मोठा कलंक आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने स्त्रीवर सतत अन्याय, अत्याचार केलेले आहेत. जाती-जमातीत तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडणारी विघातक कृत्ये केली जातात. कवीने या फक्त या तीन स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर दोन ओळी नुसत्याच मोकळ्या सोडल्या आहेत. त्यांना फार मोठा अर्थ आहे. समाजाच्या  भल्यासाठी काम करण्याच्या अनुल्लेखित अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची यादी खूप मोठी आहे. हेच त्या दोन ओळी दर्शवितात.

समाजात इतर वाईट कृत्ये, अत्याचार, स्वकेंद्रित व्यवस्था अशा अनेक अपप्रवृत्ती, आपत्ती आहेत. त्यांना संपवण्याची, समाज धारणा बदलण्याची अशी कितीतरी स्वप्ने कवीने पाहिलेली आहेत. मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात तसेच कवीने असंख्य दृष्टीने, विविध अंगाने ही स्वप्ने पाहिली आहेत. त्याची तीव्रता मोराच्या पिसाऱ्यातील डोळे ही उपमा अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते. या गोष्टींमुळे कवीच्या  मनात खूप आर्तता दाटलेली आहे.

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ ( व्रात्य )पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

कवीने पुन्हा पुन्हा काही स्वप्नं बघीतली. त्यातल्या काहींची चाहूलही लागली. आता ती स्वप्ने खरी होतील अशी आस वाढली आणि ती स्वप्ने एखाद्या नाठाळ पोरासारखी दूर निघून गेली. एखादे नाठाळ ( व्रात्य ) पोर कसे करते, त्याला एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस असे कितीदाही बजावले तरी ते अजिबात ऐकत नाही. तशीच ही स्वप्नेही फक्त वाकुल्या दाखवतात आणि सत्यात न येता नाहीशी होतात. त्यांना ‘नाठाळ’ ही अगदी छान आणि समर्पक उपमा कवीने योजलेली आहे.

रणरणत्या वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नसतेच. तो फक्त आभास असतो. तसाच काही स्वप्नांचा फक्त आभासच होता. त्यामुळे कवीच्या पदरी निराशाच येते.चक्रवाक जसा पावसासाठी आर्ततेने वाट पाहत असतो तसेच कवीचे मन आर्तपणे आशा निराशेच्या हिंदोळ्यावर नुसतेच झुलत राहते. पण हाती काही गवसत नाही.

कधी संभ्रम पडला सशासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्त्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी ?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्त्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत रहाणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून

ससा जसा बिळातून बाहेर जाताना बावचळतो. बाहेर कोणी नाही ना, कोणत्या दिशेला जावे, नक्की काय करावे अशी त्याची संभ्रमावस्था होते. तशीच इथं स्वप्नं सत्यात येत नसल्याने आता नक्की काय करावे अशी कवीची संभ्रमावस्था होते आहे. माकडीण जशी पिलाला उराशी अगदी कवटाळून धरते तशीच कवीने आपली स्वप्ने निगुतीने जपलेली आहेत. पण ती खरी होत नाहीत हे बघून शेवटी कवीला आपली तत्त्व तर खोटी नाहीत ना अशी शंका वाटू लागते. एखाद्या चकव्यातल्या कोणत्याही वाटेने गेले तरी शेवटी पहिल्याच ठिकाणी परत येणे होते. वाट पुढे जातच नाही. तसंच काहीसं स्वप्नांच्या बाबतीत झाल्याने कवीला संभ्रम पडला आहे. तरीही त्याने जिद्द सोडलेली नाही.

दीपस्तंभ जसा कितीही लाटा आदळल्या तरी ठाम रहातो तसाच कवी सुद्धा कितीही अडथळे आले, समाजाचा विरोध अंगावर आला तरी खचून न जाता आपल्या विचारांवर ठाम आहे. त्याचबरोबर दीपस्तंभ जसा मार्ग दाखवण्याचे काम करतो तसाच कवी सुद्धा समाजाला योग्य विचार, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम करतो. आपली तत्त्व, आपली स्वप्नं, आपल्या आदर्शांना त्याने अजूनही आपल्या उराशी तसेच घट्ट कवटाळून धरलेलं आहे. दुर्दम्य आशावादाचे प्रतीक म्हणजे कन्याकुमारी. तशीच आशा कवीच्या मनात अजूनही शाबूत आहे. आशा निराशेची बरीच पायपीट झाली. तरीही कवी खचलेला नाही. निराश झाला नाही. ती स्वप्ने खरी करण्यासाठीचा त्याचा लढा अद्यापही तसाच सुरू आहे. हे वास्तव ‘अजूनही’ या शब्दातून सामोरे येते. कितीदाही जाळी तुटली तरी पुन्हा पुन्हा ती विणत रहाणाऱ्या कोळ्याचा आदर्श त्याच्या मनावर पूर्णपणे ठसलेला आहे. त्यामुळे कवी अजूनही आस न सोडता धडपडतोच आहे.

 म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे .

म्हणूनच कवी सांगतो आहे की ,” मी हार मानलेली नाही. अजूनही मोठ्या जिद्दीने मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहे. कितीही अपयश आले तरी त्यातूनही धडा शिकत नव्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेतो आहे. या जीवन प्रवाहात कितीही जरी गटांगळ्या खाव्या लागल्या तरी, मी त्यात तग धरून आहे आणि त्याचा थांग अजून शोधतोच आहे. या माझ्या प्रयत्नांना समाजाने नावे ठेवली, मला अपमानित केले तरीही मी माझी कर्तव्यं सोडलेली नाहीत. समाजाच्या सुखासाठी मी धडपडतोच आहे आणि समाजऋण फेडायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.” म्हणूनच शेवटी कवी मोठ्या  उमेदीने सांगतोय,”  मी हरलेलो नाही. मी अजून आहे.”

समाजातील अन्याय्य प्रथा बंद व्हाव्यात, समाजमनात चांगला बदल व्हावा, समाज पुन्हा एक होऊन जवळ यावा यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारा कवी हा असंख्य लहानथोर समाजसेवकांचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशी माणसे शेवटपर्यंत ध्यास न सोडता या अन्यायाविरुद्ध लढत रहातात. यातूनच अनेक वाईट अन्यायकारक गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणूनच इथे कवीही जिद्द न सोडता ‘मी अजून आहे’ असे सांगतो आहे.

एखाद्या कुटुंबावर काही संकट आले, कुणी काही त्रास देत असेल, अन्याय करत असेल तर घरातील वडीलधारी व्यक्ती घरातल्यांना समजावते,” घाबरू नका. मी अजून आहे.” तशीच भूमिका हे समाजसेवक बजावत असतात. समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. पाठीराखे होतात. हेच वास्तव कवी  इथे सांगतो आहे.

कवितेची सौंदर्य स्थळे :–  समाजाच्या भल्यासाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचे हे मनोगत यथार्थ वर्णन करण्यासाठी कवीने ‘चक्रवाकाची आर्तता’ ही उपमा दिली आहे. परमोच्च आर्तता म्हणजे चक्रवाक. त्यामुळे या शब्दातून कवीचीही आर्तता अचूक लक्षात येते. कवी अनेक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे, हे सांगण्यासाठी मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यांची सुंदर उपमा दिलेली आहे.

समाज बदलण्यासाठी कवी जी स्वप्ने बघतोय त्यांचेही खूप अचूक आणि समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ही स्वप्न काहीही झाले तरी खरी होत नाहीत हे सांगतोय ‘नाठाळ’ शब्द. त्यातून व्रात्य, नाठाळ मुलासारखी अजिबात न ऐकणारी ही स्वप्नं  कवीला सतत सतावतात हे लक्षात येते. ही स्वप्न आभासीच ठरतात. तरीही ती चोर पावलांनी चाहूल देत असतात. असे असूनही यामुळे खचून न जाता कवी ठाम राहतो कसा तर, दुर्दम्य आशावादी कन्याकुमारी सारखा, दीपस्तंभासारखा ठाम राहतो. या सर्व उपमा कवितेच्या सौंदर्यात भर घालत सखोल अर्थ उलगडून दाखवतात.

या कवितेतील ‘अन्योक्ती’ अलंकारांमध्ये मुळे ही कविता कवी बरोबरच अशा सर्व थोर सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर दाखविणारी झाली आहे.

अशा या अतिशय आशयघन कवितेमध्ये कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी एका अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ मांडलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares