मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

घड्याळात पाच वाजले तसे हातातले पुस्तक बाजूच्या टेबलवर ठेऊन रावसाहेब उठले आणि किचन मध्ये जाऊन बारीक गॅसवर चहाचे आदण ठेवले. बाथरूममध्ये जाऊन हात-पाय, तोंड धुतले आणि  बेसिनवर अडकवलेला नॅपकिन घेऊन तोंड पुसत गॅसच्या कट्ट्याजवळ आले. चहाला उकळी फुटली होती. त्यांनी फ्रीज मधील दुधाच्या पातेल्यातून अर्धा कप दूध छोट्या पातेल्यात घेऊन दुधाचे पातेले परत फ्रीजमध्ये ठेवले आणि छोटे पातेले गॅसवर ठेवले. . दूध साधारण गरम झाल्यावर त्यात उकळी फुटलेल्या चहाच्या पातेल्यातील अर्धा कप कोरा चहा ओतला आणि चांगला उकळल्यावर कपात गाळून घेऊन ते बाल्कनीत आले. रोजच्याप्रमाणे बाल्कनीतल्या आरामखुर्चीत चहाचे घोट घेत बसून राहिले

नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या या बाल्कनीतून समोर, वर पाहिले की फक्त आभाळच दिसायचे. . मावळतीला कळलेला सूर्य दिसायचा. .  ही बाल्कनी त्यांना खूप आवडायची पण ती मुलाच्या मास्टरबेडरूमची बाल्कनी असल्याने ते फक्त याच वेळी बाल्कनीत घडीभर बसायचे. या टू बीएचके फ्लॅट मधील त्यांच्या बेडरूमलाही छोटी बाल्कनी होती. त्यांच्या मुलाने तिथेही त्यांच्यासाठी छानशी आराम खुर्ची आणून ठेवली होती. पण ती बाल्कनी रस्त्याच्या दिशेला होती. समोर दुसरी इमारत झालेली होती अकरा मजल्याची. . त्या बाल्कनीतून खाली बघितले की रस्ता दिसायचा. . वर्दळ दिसायची आणि समोर, वर पाहिले की इमारत. आणखी वर पाहिल्यावर दिसणारे समोरच्या इमारतीच्या वरचे तुटपुंजं आकाश बघायला त्यांना आवडायचे नाही.

त्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर काही वेळाने घड्याळात पाहिलं. सहा वाजत आले तसे ते कप घेऊन उठले. बाल्कनीचे काचेचे सरकते दार लावले. मास्टर बेडरूमचे दार ओढून घेतले. सिंकपाशी येऊन स्वतःचा कप, छोटे पातेले आणि गाळणे स्वच्छ धुवून कट्ट्यावर पालथे घातले. कोऱ्या चहाचे पातेले झाकल्याची, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लावल्याची खात्री केली.  रुममध्ये जाऊन दरवाजामागे अडकवलेला विजार- सदरा घातला आणि पलंगाजवळच उभी टेकवून ठेवलेली काठी घेऊन बाहेर पडले. बाहेर पडताच फ्लॅटचे दार ओढून घेतले. . पुन्हा आत ठकलून लॅच लागल्याची खात्री करून घेतली आणि काठीचा हलकासा आधार घेत चालू लागले. साऱ्या गुळगुळीत फरशा. . काठीवर भार द्यावा तर काठीचा आधार मिळण्याऐवजी काठी घसरून पडण्याचीच भीती इमारतीतून चालताना नेहमीच त्यांच्या मनात तरळून जायची. . त्यामुळे ते सावध पावले टाकत चालायचे. . तशीच सावधानता बाळगत ते रोजच्या शिरस्त्यानुसार चालत, लिफ्टमधून खाली येऊन इमारतीबाहेर पडले आणि उजवीकडे वळून पदपथावरून चालू लागले.

रावसाहेब चालत चालत मैदानासमोर आले तसे पदपथावरून रस्त्यावर उतरून दोन्हीबाजूला पाहत रस्ता ओलांडून मैदानाच्या प्रवेशदारातून आत शिरले आणि त्यांनी नेहमीच्या  बाकाकडे पाहिले. तिथे कोणीही बसलेले नाही हे पाहून त्यांच्याही नकळत त्यांना बरे वाटले आणि ते हळूहळू चालत येऊन त्या बाकावर बसले.

मुलांच्या खेळासाठी महानगरपालिकेने विकसित केलेले हे मैदान फ्लॅटपासून जवळच होते त्यामुळे ते रोज संध्याकाळी तिथं येऊन बसत. चार भिंतीबाहेरचा तो मोकळेपणा त्यांना हवाहवासा वाटे. मैदानात एकबाजूला बाग होती. . तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती. . भोवतीने झाडे होती त्याच्या सावलीत बसण्यासाठी बाके होती त्या बागेमध्येच ज्येष्ठाना फिरण्यासाठी वेगळा पथ निर्माण केला होता. तर या बागेला लागूनच मोठ्या मुलांना खेळण्यासाठी मोठं मैदानही होते. तिथे बऱ्याचदा क्रिकेट च्या मॅच ही होत असत. तिथेच हॉलीबॉलचे ग्राउंड ही होते. बाग व मैदान याच्या दरम्यान झुडपांचेच सुंदर कुंपण ही होते. रोजच्यासारखाच मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या क्रिकेट पिच वर मोठ्या मुलांचा क्रिकेटचा खेळ अगदी उल्हासात, जोशात चालू होता. त्यांचे  फोर, सिक्स, आऊट, क्लिनबोल्ड, रन. . रन असे वेगवेगळे आवाज कधी स्वतंत्र तर कधी संमिश्र ऐकू येत होते.

फ्लॅटच्या चार भिंतीत स्वतःचाही आवाज फारसा न ऐकलेल्या त्यांना मुलांचे ते आवाज ऐकून बरे वाटले. त्यांनी बाकावर बसतानाच हातातील काठी बाजूला टेकून ठेवली आणि अवतीभवती नजर टाकली.  त्यांच्या समोरच काही अंतरावर एक मुलगा एकटाच बॉलने खेळत होता. . दुसऱ्या कोपऱ्यात  त्याच्याच वयाची तीन चार मुले गवतावरच बसली होती. त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या असाव्यात. . त्या मुलांच्याच मागच्या बाजूला जवळच असणाऱ्या बाकांवर बहुदा त्या मुलांच्या पालक असणाऱ्या  महिला बोलत बसल्या होत्या.. पण बोलत असतानाही अधून मधून  त्या मुलांकडे लक्ष देत होत्या. . मधूनच कुणीतरी. . ‘ नो नो बेटा. . ‘ असे काहीतरी म्हणत, काहीतरी सुचवत सांगत होत्या.

हे सारे पाहताना त्यांच्या मनात आले ‘, पालकांच्या नजरेच्या पिंजऱ्यात खेळण्याचा किती आणि कसा आनंद मिळत असेल या मुलांना ? वारा पिलेल्या वासरासारखे मुक्त, मोकळे हुंदडणे या मुलांना माहीत तरी असेल का ? ” त्यांना गावाकडच्या मुलांचे खेळणे, हुंदडणे आठवले आणि त्यांच्या मनात गावाकडच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जुने कपडे… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री सुजाता गोखले ☆

? जीवनरंग ❤️

☆ जुने कपडे… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री सुजाता गोखले  

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन  भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.

 “नाही ताई ! मला नाही परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या हव्यातच.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून काढून आपल्या हाती परत घेतले.

“अरे भाऊ ! अरे, केवळ एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत..! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशाच तर फार जास्त होतात. केवळ मी म्हणून तुला दोन साड्या तरी देऊ करतेय.”

“राहू द्या, तीन पेक्षा कमी मध्ये तर मला अजिबातच परवडत नाही.” तो पुन्हा बोलला.

आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका वेडसर तरुण महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला आपल्याला कांही खायला द्या म्हणून विनंती केली.

अशा लोकांबद्दल असलेल्या घृणेमुळे  त्या श्रीमंत महिलेनं एकवार जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली.

जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपलं उमलतं तारुण्य झाकायचा तीचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.

त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर तरुण भिकारणीच्या पात्रात टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं तर मग काय भाऊ! तू काय ठरवलंय ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”

यावर कांही न बोलता भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या, पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला…

विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला उठली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली… तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला, त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी देत होता.

आता हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार भारी झाल्यासारखं वाटू लागलं होतं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं. घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं  देऊ करायला एकाएकी कां तयार झाला होता याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं. आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणिव झाली होती.

कुणाला कांही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं….!!

🙏आपल्यापाशी काय आहे  आणि किती आहे यानं कांहीही फरक पडत नाही. आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी.🙏

संग्राहिका – सुश्री सुजाता गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

? विविधा ?

☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिका-याला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची  परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते .

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद , समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं ,  यात सर्व काही आलं .

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने  शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते . तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा  आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या  परिणामांचे , त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे , नवीन तक्रारीचे स्वरूप   हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना  अनेक विचार त्याच्या मनात  गर्दी करून असतात . याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही . मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते . आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची  हतबलता  त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.

मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील  एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात.  मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून  धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता  घाईघाईने पायऱ्या चढत , रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.

“साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा .

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते.  तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो . ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने , ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची , त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या

कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही .मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.      

बाळाची आई रडत रडत “एक मिनिटांसाठी  घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत  असते.

एक छोटेसे टिपण करून त्याची  “लहान मुले  हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो.

त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो…

क्रमशः…

© श्री अजित देशमुख  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आकार… ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आकार… ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆ 

(पुस्तक दिन 💐)

गार वारं सुटलं तसं तिने वाऱ्याने वाजणार खिडकीचं तावदान बंद केलं,.. गॅसकडे वळताना गॅलरीच्या दारात ठेवलेली तुळशीची पान तोडली आणि चिंब पाऊस आल्यावर जसे नियम असल्यासारखे दोघे चहा घ्यायचेच तसा चहा देखील टाकला पण एकटीचाच,.. तो गेल्यानंतर आलेला हा पहिला पावसाळा तसा तिला जड जाणारा होता पण गेलेलं माणूस परत येत नाही हे दुःख पचवत ती सावरत होती स्वतःला.. चहा उकळला तसा त्याचा गंध एक वेगळाच उत्साह तिला देऊन गेला,.. तिने तो कपात घेतला आणि गॅलरीत झाडांच्या मध्ये ठेवलेल्या छोट्याश्या खुर्चीत ती जाऊन बसली,.. लग्ननंतर एकत्र घालवलेले पंचवीस पावसाळे आणि आता हा एकटेपणाचा पहिला पाऊस आठवणींनीची सर घेऊन येणारा,.. काय असतं संसार म्हणजे,..? ” एक माणूस जवळून सतत वाचायचा असतो.” असं अविनाश म्हणायचा ते काही खोटं नाही,..वाचन हा प्रांतच त्याचा आवडीचा,.. पहिला पाऊस आणि हातात ओली झालेली पुस्तकं आपलं पहिलं मोठं भांडण ते त्या पहिल्या पावसातलं,.. एवढा पाऊस असताना कशाला आणली पुस्तकं??ह्यावर त्याच शांत उत्तर,”आज दोन तारीख माझं ठरलेलं आहे पगार झाला की दुसऱ्या दिवशी पुस्तकं घ्यायचं एक तरी,..”त्याचा ऊन,पाऊस ,थंडी ह्याच्याशी संबंध नाही हे दर महिन्यांच गणित,..अग विचारांचा पाऊस पडायला हवा ना मनात त्यासाठी वेगवेगळ वाचन हवं,.. मला तरी वाटतं माणसाने अन्न, वस्त्र,निवारा आणि वाचन अश्या गरजा समजून घ्याव्या,..अविच्या ह्या गोष्टीशी आपलं कधीच एकमत नव्हतं,..तो नेहमी म्हणायचा,”अग मैत्री कर माझ्या पुस्तकांशी ती जगायला शिकवतात.”तेंव्हा आपण कधी ऐकलं नाही आणि आज त्या पुस्तकांनी जगवल,..अविचा झालेला अपघात,मग झालेले दवाखाना बिल आणि नंतर थांबलेली पैश्याची आवक,..काय करावं? हा केवढा मोठा प्रश्न समोर असताना पुस्तकं मदतीला आली,..अविला नोकरी लागल्या पासून तीस वर्षात जमा झालेली तीनशे साठ पुस्तकं वाचली नाही तरी मदतीला आली,.. घरपोच लायब्ररी किती छान कल्पना शेजारच्या वसु आजीने डोक्यात घातली आपल्या म्हणाल्या होत्या,”अग त्याने आपल्या कष्टाच्या पैश्याने ते पुस्तकं घेतले होते ना मग ती फुकट वाटून टाकू नकोस ठराविक महिना कर आणि घरोघर दे लोकांना पुस्तक माझ्या सारख्या अनेक जणांना लायब्ररीत जाणं होत नाही मग आम्हाला अल्पदरात घरपोच आली पुस्तक तर बरच आहे,..”

आजीच्या कल्पनेने सुरू झालेला व्यवसाय सहा महिन्यात किती बहरला,..तीनशेसाठ चे पाचशे पुस्तकं झाले,..आपणही वाचायला लागलो,जगायला शिकलो आणि दुःखही विसरायला शिकलो पण कधी तरी हा पाऊस येतोच आठवणींची सर घेऊन,..तिने हलकेच डोळे मिटले तेवढ्यात फोन आला,..तिने फोन उचलला,..”बोला.” ह्यावर पलीकडून आवाज आला,..”माझ्या पाच वर्षाच्या मुलीला कॅन्सर झाला हो, मला माझं मन खम्बीर राहिल असं काहितरी वाचायचं आहे..असं पुस्तक आहे का लायब्ररीत,..?” तिला मनाला उभारी देणारी अनेक पुस्तकं डोळ्यासमोर आली,..ती लगेच म्हणाली,”हो आहेत मी आणून देते पाऊस थांबला की,..”तिने फोन ठेवला,..आपल्या सारखीच पण वेगवेगळ्या आकाराची दुःख घेऊन माणसं जगत असतात आपल्यला उगाच वाटतं सगळ्यात मोठा आकार माझ्या दुःखाचा पण आपल्याकडे तर लोकांची दुःख कमी करणारे पुस्तकं आहेत हे किती छान असा विचार करत तिने भरभर पुस्तक चाळायला सुरुवात केली,..समोर त्याचा मोठा फोटो होता तिच्याकडे बघणारा,.. बाहेर पावसाने जोर धरला होता,..ती मात्र निश्चल झाली होती,..विचारांचा पाऊस पडणाऱ्या पुस्तकांना शोधण्यात,…स्वतःच्या दुःखाचा आकार आणखी लहान आहे हे मनात म्हणत.

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बांगडीचं लेणं… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

 

? जीवनरंग ❤️

☆ बांगडीचं लेणं … ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

पाण्यांचे दोन हंडे भरले. गॅसवरून कुकर खाली ठेवला आणि चपात्या लाटायला घेतल्या. घरच काम आवरून आज हौसाच्या घरी जायचं होतं.

” शांता….हायस का घरात? पोरीला बांगड्या घालायच्या हायती.”

आतून काम करत शांताने विचारले “गीता कवा आली.”

” झाल आठ दिस.उद्या सासरी जाणार हाय.लई काम पडल्यात बघ. ये की बी.. गी, बी… गी”

नव्या नवलाईन गीता रंगीबेरंगी बांगड्याकडे बघत होती.कधी एकदा नवीन बांगड्या घालते असे झाले होते.गोऱ्यापान हातात कोणत्या बांगड्या शोभून दिसतील? माझा हात बघून धनी काय म्हणतील? सगळ्या साड्यांनवर कोणत्या रंगाच्या बांगड्या चांगल्या दिसतील.मॅचिंग   बांगड्या पण घ्याव्यात काय? असे किती तरी विचार तिच्या मनात आले.पदराला हात पुसत शांता आली ” कशी…..हायस पोरी?”

“बरी हाय”

” कंच्या बांगड्या आवडल्या तुला ?”बांगड्या दाखवत गीता म्हणाली ”  या घाला “

” त्यो इड तुज्या मापाचा नाय.तुला आठराने गाळा लागतोया.थांब दावते.”लाल, पिवळ्या,हिरव्या,निळ्या किती तरी सुंदर सुंदर बांगड्या समोर ठेवल्या.हिरवा कापकाटा तिला पंसत पडला.तिच्या मनासारखा हिरवागार रंग.शांताने बांगड्या उजव्या हाताच्या दोन बोटात पकडून टिचकी मारून ती पिचकी नाही ना हे पाहिले.पिचकी बांगडी बाजूला काढली. निवडलेल्या बांगड्या डाव्या हाताच्या करंगळीत घेतल्या गीताचा हात हातात घेतला.हिला बांगड्या चढवायला जरा पण त्रास होणार नाही. “काय…..लोण्यावाणी मऊ सुत हात हायती.असाच राहू दे.”

” ते नशिबात पायजे बघ.पोरीच्या जातीला काम काय चुकली नायत.कामाच्या रगाड्यात  हात निबरढोक होतोया.आता…माज्या हाताला कोण हात म्हणल का?”

” हे…मातुर…खरं हाय.तुजा हात लयी व्दाड हाय.बांगड्या घालताना लयी कळ सोसतीस बघ तू.आडव हाड हाय.सव्वा दोनचा गाळा बी दाबून भरावा लागतोया.”

” शेतात राबल्यावर गड्या सारखाच हात व्हायचा की.काय बी म्हण…. बांगड्या बीगर हाताला सोभा नाय.बांगडीला एकदा पाणी मुरल का वरीसभर बांगडी हलत नाय.मागल्या वरशी भरलेल्या बांगड्या अजून कश्या हायती बघ.”

बांगड्या भरुन झाल्यावर गीताने शांताबाईंना नमस्कार केला.त्यांनी तिची ओटी भरली.तोंडात साखर घातली प्रेमाने मिठी मारली.

” शांता आता वटी कश्याला?”

” लेक हाय माजी,पैल्यादा घरला आल्या,तशीच पाठवू व्हय ?तू लयी शानी हायस,गप बस.पोरी समद्यांना धरून रा.सुखी हो.”

” तुजा आशिर्वाद पुका जायाचा नाय बघ.घरला येवून जा.येतो आमी.”भरल्या मनाने दोघी बाहेर पडल्या.

माज्या आशिर्वादाचे काय मोल? माजच नशिब मला लिव्हता आल नाय.दुसऱ्याच म्या काय लिव्हणार? आज इस वरीस झाली ऐकली झगडत्या.तीस वरसामाग लगीन करून घरात आले.तवा काय व्हत इथ.एक मोकळा जापता.मायलेकर दोघच राहायची.पुढल्या अंगाला एक दार ,मागल्या अंगाला एक दार मागल्या दाराच्या अंगाला जोडून न्हानी.पाण्याचा एक बॅरल,एक बादली,एक खुटी.बाजूच्या भितीला चूल.त्याच्या जवळ एक लाकडी शेलफ,त्यावर चार भांडी.अन् पतऱ्याच चार मोठ डब.झाला संसार.चुलीवर चार भाकऱ्या थापल्या, का सासू भाईर बांगड्या घालाया जाया मोकळी‌.डोसक्यावर बांगड्यांची बुट्टी घेवून गावोगाव फिरायची.सिधा बांघून आणायची, तेल मीठ आणून माय लेकरं जगायची.आडावरन नाय तर बोरिंगवरन पाणी भरायची,धून  धुवायला नदीवर जायची.लयी सोसायची.लेकाला जपायची.म्या घरात आले.मला लयी अवघडल्या वाणी व्हईत व्हत.सासू म्हणाली दोघं बी जोडीनं डोंगराई देवीला वटी भरून या. पाया पडून या.देवीला जाताना गाव बघितला.धन्यानी शाव,भजी खायाला घेतली.सगळा डोंगूर हिरवागार व्हता.गार वारा झोंबत व्हता.पदूर वाऱ्यावर उडत व्हता.चढताना माजा पाय सरला तवा धन्यानी हात धरला.अजून काय पायजे ? देवी पावली मला. देवीची वटी भरली.माजी अडचण त्यांस्नी सांगितली.धन्याच्या संगतीत दिस कवा मावळला कळल नाय.

उजडायच्या आत आमा दोघींच्या अंगुळा व्हायच्या.धन्याच्या माग लागून घरात एक पारटीशन घातलं. भाकरी बांघून धनी शेतावर कामाला जात.सासूबाईपण बांगड्या घालाया भाईर जायी.म्या दिसभर ऐकली घरात.कटाळा यायचा. नंतर म्या बी सासूसंग जाया लागले.माज म्हायार गरीब.तकड कोनबी बांगड्या घालत नव्हत.बांगड्या घालताना त्या हुभ्या धरायच्या का आडव्या हे बी ठाव नव्हत.मग बांगड्याचा इड कसा कळणार? सासुबाई पटापटा बांगड्या भरायच्या.म्या बघत बसायची.इसकटलेल्या बांगड्या गोळा करायची,माळा बांधायची,फुटक्या काचा गोळा करायची,सिधा बांधून घ्यायची.लय भारी वाटायच.एक दिस सासूबाई म्हणाल्या   “शांता तू बांगड्या भर बघू.”

पैल्यादा चार दोन बांगड्या चढवल्या,दोन चार फुटल्या, हाताला लागल्या,रगत आलं.तवा सासूबाईनी हाताला धरून शिकवलं.हात कसा धरायचा,माप कस बघायचं, बांगड्या कश्या चढवायच्या . हळूहळू जमू लागल.मग म्या बी तयार झाले.आमी दोघी मिळून बाजारला,जत्रला जावू लागलो.दोन पोरं झाली.संसार वाढला.

खेडेगावात निवडणुका म्हणजी जीव का परान.लयी लगबग असे. त्यात धनी सरपंचाच्या घरी जात येत व्हते.सरपंचाच्या मरजीतल माणूस.रोज रातच्याला उशीरा यायच.म्या बडबड करी.कवा कवा तंटा बी व्हायचा.इस वरसा मागच्या निवडणुकीन माज घात केला. आयुश ढवळून गेलं. एक दिस प्रचाराला धनी गेले ते गेले.कुठ गायब झालं कुणास ठाव.पोराचा दोसरा काढून सासून हातरून धरलं. म्या लय वाट बघितली धनी काय आलं नायत.एकली म्या काय काय करणार? सासूबाईच्या जीवावर पोरं सोडता येत नव्हती.भाईर बांगड्या घालाया जाता येत नव्हत.घरातला सिधा बी संपत आला व्हता.खचून कसं चालेल?पायटीशन पुढ दुकान टाकल.गावातल्या बाया घरातच बांगड्या भराया येत.पोटाला चिमटा लावला पोरांना शिकवलं,मोठ केलं.

पोरीच लगीन लावून दिल.पोरान तिकडं शहरात आपल्या मरजीन लगीन केलं.त्याच्या घरात त्यो सुखी हाय.अजून काय पायजे.आजपातुर हे कळलं नाय,धनी एकाएकी गेलं कुठं ?पर मन म्हणतया ते नक्की परत येत्याल.पोर आपापल्या घरात.म्या मातुर ऐकली हाय.आज लयी आठवण येत्या.सगळा चितरपटच डोळ्या म्होर आला.म्या ऐकली काय मनाशी बोलत बसले.हौसाची नातं मोठी झाल्या, बांगड्या भराया बोलीवलया .तवा जाया पायजे.

हौसाच्या घरातून शांता आली तेव्हा घरात मुलगा, सून आले होते.बांगड्या ठेवून, नेहमीच्या सवयीने पत्र्याचे डबे खाली घेतले त्यात आणलेला सिधा ठेवायला लागली तेव्हा मुलगा म्हणाला “आई आता थांब हे सगळं कशासाठी बांगड्या घालतेस? कशाला सिधा गोळा करतेस?तुला काही कमी आहे का? चल माझ्या सोबत,एकटी कुठे राहणार? बांगड्याचे दुकान बंद कर.”

” हे बोलाया सोपं हाय पोरा.ही लक्षीमी हाय माजी.या बांगड्या व्हत्या, हा….सिधा व्हता, म्हणून तुमास्नी जगवल.म्या जगले.हे नुसतं डाळ, तांदूळ,पिठ,गुळ नाय, माज जीवन हाय.तुज्या आजीन बाला जगिवल,म्या तुमाला जगिवल,हा सिधा नाय, मान हाय….मान.कासारनीचा मान.तुला नाय कळायच ते पोरा.म्या इथच राहणार.”

” हेच खाऊन मी मोठा झालो.माहित आहे मला.किती कष्ट केलेस तू ,ते ही मला माहित आहे.म्हणूनच म्हणतोय बस कर. हे चल माझ्या सोबत.”पोराचा इशय टाळण्यासाठी ती सूनेला म्हणाली ” बांगड्या बिगर हात मुंडा दिसतोया.सोन्याच्या बांगड्या मद्यी चार हिरव्या बांगड्या घाल.झाक दिसतील.ये पोरी म्या घालते बांगड्या.”

“आ हो….आई या काचेच्या बांगड्या सांभाळन जिकिरीचे असतं.घरात काम करताना, आॅफिसात काम करताना अडचण होते.सारखा आवाज करतात त्या.मग मन डिस्टर्ब होत.लिंक तुटते.काम करताना बांगड्या सारख्या पुढे पुढे येतात.स्वयंपाक करताना बांगडी फुटली तर केवढ्याला पडेल.मी आॅफिस मधून आल्यावर अंगठी,कानातले,बांगडी,टिकली काढते.झोपताना मंगळसूत्र टोचते ते ही काढते. मग मोकळं मोकळं कसं छान वाटते.तसे ही सणासुदीला, समारंभाला बांगड्या चांगल्या दिसतात.तिथ फक्त मिरवायच असतं ना.मी एक तरी बांगडी घालते, किती तरी बायका एक ही बांगडी घालत नाहीत.आता ही ओल्ड फॅशन  झाली आहे.

” बर बाई तुजी मरजी.बांगड्या नग तर नग.म्या काय बोलणार?म्या पडले अडाणी.पर एक सांगते ‘म्हटल तर सूत नाय तर भूत’असत बघ.आपल्या मनावर असत सगळं”शांताबाई मनात म्हणाली तुज म्हणन बी खरं असल पोरी. या….. बांगड्या,कुकू, मंगळसूत्र यांची तुला अडचण व्हत असल, ही फाशन जुनी असल,पर यांनी माज आयुश सावरलं.जगण्याची उमेद दिली.बांगडीचं लेणं लेते.दुसऱ्याला देते.त्याच्या जोरावर गेली इस वरीस या खेडेगावात पाय रोवून टिकून हाय.इबरतीन जगते.कपाळावर कुकू अन् गळ्यात डोरल असल तर कुणाची वाकडी मान करून बघण्याची हिंमत होत नाय.सासू माग घर हुभ केलं,नवरा परागंदा झाला तरी डगमगले नाय.पोरास्नी शिकवून मोठ केल.कपाळावरच कुकू बघून, आज बी कासारीन बाय म्हणून हक्कान बोलीवत्यात,सवाष्णीचा मान देत्यात.तो या कुकवाच्या जोरावर.बांगड्या म्हणजे निसती काच नाय.बंधन नाय.बायाबापड्यांची ताकद हाय.ती वळकता आली पायजे.मग बांगडी घातली काय नाय घातली काय?बांगडी मनाला बळकटी देते, ती घेता आली पायजे.हे लेणं लेता आलं पायजे म्हंजी जीवनाचा तीर गाठता येतो.हे मला उमगल पर सुनेला कवा उमगणार देणार ? म्या सुनेला कस सांगणार?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 4 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 4 ☆ सौ. सुचित्रा पवार

झाल्या. पोरांच्या स्वतःच्या पोटाला मिळणं मुश्किल होतं तिथं आईवडिलांना कुठून आयतं देणार? म्हातारपणी बुवा गाडी बैलांचं भाडं मिळवू लागला पण आयुष्यभर वाडवडिलांच्या जीवावर बसून खाल्लेलं आता काम पचनी पडेना. शेवटी धुरपीला पण रोजगारास जाणं भाग पडलं,गोदीला तर पहिलीच सवय होती.

पण आयुष्यभर शरीर थोडेच साथ देते? आधीच हाडाची काडं झालेलं शरीर आता साथ देईना,रोजगार नाही तर खायला नाही ;पण भूक थोडीच थांबणार? कोण नसलेलं बघून गोदी इकडून तिकडून भाकरी तुकडा मागून  पदराआड लपवून खायची. पण म्हणतात ना,माणूस माणसाचा वैरी असतो तो दुसऱ्यांस सुखी बघू शकत नाही !गोदीची चहाडी कुणीतर केलीच ! आता तिच्यावर नजर राहू लागली. शिल्लक राहिलेलं तेव्हढंच खाण्याची शिक्षा तिला मिळाली. कोर अर्धी वाळून गेलेली भाकरी  गोदाबाई पाण्यात कालवून चापलायची. नजर अधू झालेली,दात पडून गेलेले,कुणीतरी नजर चुकवून तिला वाटीभर आमटी नाहीतर घरात शिल्लक राहिलेला चवीचा घास पुढ्यात टाकत होतं. गोठ्याच्या दारापाशी बसून ती धुण,भांडी करत बसायची,कोंबड्या राखत बसायची. कधी सुनांची पण भांडी कपडे धुवायची मग कोण नसताना सुना पोटभर खाऊ घालायच्या.

आणि एके दिवशी सकाळी सकाळी अंगणात चुलीला जाळ घालत असता जाळ बाहेर येऊन गोदाबाईच्या लुगड्यांने पेट घेतला. अंधुक नजरेनं तिच्या लक्षात काहीच आले नाही, तिनं आरडाओरडा केला पण लुगड्याने वरपर्यंत पेट घेतला होता. कुणीतरी धावत येऊन लुगडं सोडवण्याचा प्रयत्न केला पण कमरेला चिंधकाची बसलेली नीरगाठ लवकर सुटली नाही ;तोपर्यन्त कुणीतरी पाणी ओतलं. गोदाबाईच्या जीवाची,शरीराची तगमग होऊ लागली. कुणीतर बैलगाडी जोडली,चादर अंथरून त्यावर गोदाबाईला झोपवलं अन तालुक्याला नेलं पण रस्त्यातच गोदाबाईचा अवतार सम्पला होता.

डॉक्टरने मृत घोषित केले. गाडी तशीच माघारी फिरली. गोदाबाईचा जीव मुक्त झाला. गोदाबाई गेली पण जाताना कितीतरी प्रश्नांचे पायरव ठेऊन गेली –गोदाबाई खरेच वांझ असेल?  गोदाबाईचा पुनर्जन्म होईल? झाला तर तिला कोणता जन्म मिळेल? या जन्मातल्या तिच्या सर्व अतृप्त इच्छा पुढील जन्मी पूर्ण होतील? तिला पोटभर खायला मिळेल? आयुष्यभर तिच्या जीवाची झालेली  परवड पुढील जन्मी तरी थांबेल?

“सुटली एकदाची जाचातून गोदा !” आया बाया बोलू लागल्या. पण गोदीचं नशीबच फ़ुटकं ! जीवनाने गोदाबाईची परवड केलीच पण मृत्यूने देखील तिची परवड केली होती! आयुष्यभर आतून बाहेरून तडपत राहिलेल्या गोदाला मृत्यूने देखील तडपडायला लावूनच तिच्या जीवनाची सुटका केली होती!

(काल्पनिक)

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार

कडूस पडलं होतं अजून देवाला गेलेल्यांचा पत्ता नव्हता.तिनं कुलूप काढलं, जळणाचा भारा चुलीपुढं टाकला अन म्हसरं दावणीला बांधली.तेव्हा लाईटची सोय नव्हती, तिनं चिमणी पेटवली अन गोठ्यात ठेवली.रांजापशी हातपाय -तोंड धुतलं अन पदरानं तोंड पुसत देवाजवळ गेली.दिवा लावून चुलीजवळ एक चिमणी लावून टेम्भ्यावर ठेवली.राख केर भरून चुलीवर पाणी ठेवलं गावाला गेलेल्या माणसांच्या पायावर ओतायला ! आता चांगलं च अंधारून आलेलं,  गोठ्यात म्हशी धडपडत होत्या, गोदून मोठी कासांडी घेऊन धार काढायला सुरुवात केली इतक्यात बैलगाडी थांबल्याचा आवाज आला.

“गोदे s भाकरीचा तुकडा आण गं…”चंपाबाईने आवाज दिला ;तशी दुधाची कासांडी घेऊन गोदा लगबगीने गोठयातून धावली.अंधारात नीटसे काही दिसत नव्हतं म्हणून तिनं चिमणी वर धरली…अंधुक चित्र स्पष्ट झालं नवऱ्याच्या कपाळाला बाशिंग बघून गोदा हादरली. तिच्या हातापायातल अवसान गळाल.

“पण नवरी कोण ?”

डोईपासून पायापर्यंत लपेटलेल्या परकाळ्यातून तिला स्पष्ट काही दिसेना.गोदूच्या सर्वांगातून सरसरून भीतीची लहर शहारली, तिचं पाय लटलट कापू लागलं, डोळ्यापुढं गच्च अंधार दाटला, अंगातून जणू जीव कुणी काढून घेतेय असं झालं.जड पावलांनी तिने आत जाऊन भाकरीचा तुकडा आणला अन नवरा नवरीवरून उतरून टाकला. पायावर पाणी घातलं. उंबऱ्यातून आत आल्यावर पर काळ्यातील चेहरा नीट दिसला अन ती चरकली, “ही तर धुरपा ! चंपा आत्यानं डाव साधला तर!” गोदाला काही सुचेना अनपेक्षीत धक्क्याने गोदाच्या अंगातील त्राण नाहीसे झाले तिला हुंदका अनावर झाला पण पदराने तोंड दाबून धरून अंधारल्या कोपऱ्यात तिनं आसवाना वाट करून दिली. तिची एकुलती एक आशा दुर्दैवाच्या अंधारात विलीन झाली.

चंपाबाईने घरातून बक्कळ दूध, शेवया, तूप गूळ आणून नवरा नवरीला खायला घातल्या.देवाच्या आणि थोरल्या माणसांच्या पाया पडून गोदाच्या सवतीचा संसार सुरु झाला. गोदा कोपऱ्यात बसून सगळं टिपत होती.आज तिच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं किंवा तितकी गरजही नव्हती.गोदूच्या परवडी ला इथूनच सुरुवात झाली. तीच्या आसवाना थोपवायला अंधाराशिवाय कुणी नव्हतं, तिला एकदम परकं परकं वाटू लागलं.’कधीतरी आपली कूस उजवल ही भाबडी आशा मेली.दिवसभराचा कामाचा शीण आणि डोळ्यापुढला अंधार.. गोदू अस्वस्थ झाली, तिथंच पटकारावर ती आडवी झाली पण तिची झोप उडली होती, आडात जाऊ की विहिरीत उडी टाकू ?तिला काही कळेना.भल्या पहाटे दाराची  हलकेच कडी काढून गोदूने माहेरचा रस्ता धरला.

एव्हाना गावभर बुवाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.जेमतेम शे- दोनशे  लोकवस्तीच गाव, वरच्या आळीला पाणी सांडलं तर वगुळ ईशीपर्यंत जायचा ! गोदीच्या भावाच्या कानावर ही गोष्ट गेलीच पण जगराहाटीत तो एकटा थोडाच वेगळा होता ?बुवाच्या जागी तो असता तर त्यानं पण तेच केलं असतं ! गोदूची मनःस्थिती ओळखून तो शांत राहिला, आठ दिवस गोदुला ठेऊन घेऊन  चार समजुतीच्या गोष्टी सांगून गोदुला घेऊन भाऊ सासरी आला अन गोदुला परत सासरघरी सोडून परत फिरला.

“गोदे, तू बी आपलीच हैस, दुघी बी गुण्या गोविंदानं भनी भनी हून नांदा, डोसक्यात काय राख घालू नकू, धुरपी तुजी धाकली भण म्हणून पदराखाली घे.” चम्पाबाईन समजूत घातली. ” असं करा, धुरपी घर सांभाळल अन तू दार -मंजी गुरढोर जळण -काटूक, सांडलं -लवंडल..”

आत्याबाईंनी दुजोरा दिला.गोदुला कुणाबर बोलायची इच्छा नव्हती.सगळ्यांनी तिचा घात केला होता, तिच्या संसारात इस्तु पुरला होता.तिनं टोपल्यातली भाकरी फडक्यात गुंडाळली अन गुरांना सोडून ती रानात निघाली.आता फक्त पोटावारी राबणारी ती एक राकुळी होती वांझोटपणाचा शिक्का बसलेली..भाकड जनावरासारखी !

वर्षात धुरपीचा पाळणा हलला अन आधीच घरादाराची लाडकी धुरपी अजूनच कौतुकाची झाली कारण बुवाच्या वंशाला दिवा मिळाला होता.गोदी अजूनच आपलेपणा पासून दूर फेकली.गोदीनं एक दिवस पाळण्यातलं बाळ उचलून कडेवर घेतलं त्याचं पटापट मुकं घेतलं,  गोदुला मायेचा पान्हा फुटला, प्रेमाचा पाझर हृदयात ओसंडून गेला  इतक्यात धुरपी ओरडली…”अग अगं ठेव त्याला खाली..तुझ्या वांझोटीची नजर हुईल तेला..” गोदिला असंख्य नांग्या दंश करून गेल्या, तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं; पण तिनं स्वतःची समजूत घातली, परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं. धुरपीला लहान बहीण म्हणून धरलं होतं गपचूप बाळाला पाळण्यात ठेऊन ती बाहेर गेली.

धुरपी  पक्की होती. आणि चंपात्तीचा बळकट आधार होता. तीनं नवरा, सासू सासरे घर दार सगळंच कब्जात ठेवलं होतं अन गोदुला मोलकरीण म्हणून! गोदुन आपलं बाजलं गोठ्यातच एका कोपऱ्यात ठेऊन दिलं होतं.गुरं चारून येऊन गोठ्यात बांधायची, दिलं तेव्हढं खायचं न गप बाजल्यावर येऊन पडायचं.

दिवस जात होते त्यांच्या गतीनं, धुरपीन अजून दोन मुलांना जन्म दिला, घरदार धुरपीवर खुश होतं.यशोदाबाई अन मालक काशीला गेलं अन तिकडंच पटकीच्या साथीत सापडून संपलं.धुरपी आता सगळ्यांची मालकीण झाली.चम्पा आत्ती पाठिंब्याला भक्कम होती.घरात धुसफूस वाढली, धुरपी गोदुला नीट खायला प्यायला दीना की धडूतं !मरमर काम करून पोट भरंना की गोदी बोलायची.गोदीच तोंड दिसायचं पण धुरपीचा आतला खेळ कुणाला समजत नव्हता.घरातली भांडण एके दिवशी इशीत गेली आणि बुवानं गोदिला चाबकाने फोडलं ;धुरपीला तेच हवं होतं.उपाशी अनुशी गोदी कळवळत गोठ्यात जाऊन झोपली.

त्यादिवशीपासून धुरपीला जास्तच चेव चढला अन मुद्दामच गोदीला ती पाण्यात पाहू लागली.मरमर दिवसभर गुरांचं केलं तरी तिला वाटीभर दूध खायला मिळत नव्हतं का पोटभर अन्न मिळत नव्हतं.धडुत म्हणलं तर वर्षातून एक माहेरचं कोरं लुगडं मिळायचं ते फाटलं की धुरपीच जुनं चिंधकाला चिंधुक जोडून गोदी चालवायची.दिवस कुठलेच घर बांधून रहात नाहीत त्यांच्या गतीने ते कधी चालतात कधी पळतात.धुरपीची पोरं मोठी झाली पण त्यांना कष्टाची सवय लागली नाही.हळूहळू जमिनी कुळांच्या घशात जाऊ लागल्या.पोटभर चांगलं चुंगल खाणे, परीट घडीची कपडे घालून गावकी अन राजकारण यातच पोरांचे दिवस जात होते.दुष्काळ पडला अन्न अन्न होऊ लागले अन होती नव्हती तेवढी जमीन सावकाराकडे गहाण पडली.राहतं घर तेवढंच सुरक्षित राहिलं.कुणी म्हणायचे, ‘गोदी ची हाय लागली, ‘ कुणी म्हणायचं, ‘ चंम्पिची शिकवण भारी पडली.’गुरासारख्या कष्टानं गोदीची हाड कातडं एक झालं.

दुष्काळ सम्पला, पोरांची लग्न लागली.धुरपीच्या सुना कष्टाळू होत्या कुणी रोजगार करी, कुणी जनावरे हिंडवी आणि परपंच पुढं चालवत ;पण मुलं बाळं झाल्यावर कमतरता भासू लागली, धुसफूस वाढली, प्रत्येकानं मग आपली चूल वेगळी केली.बुवा न दोन बायका एकीकडं अन बाकी पोरं दुसरीकडं अश्या माणसांच्या पण वाटण्या झाल्या.

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार

आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली,’घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला  म्हणलीच,”आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा… दुसरी बायकू आणाया पायजे,तू वाणीवाणीचा योकच,एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत,चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती,बुवान होकार देऊन टाकला. यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग  जावंच्या कानी लागली,”आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती,ती लगोलग म्हणाली,”एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई,तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “

सगळं कसं मनासारखं जुळून आल्यालं.  ‘आता कारभारी व्हय म्हणलं की झालं! ‘यशोदाबाई हरखून  गेली. ‘कवा एकदा घराचं गोकुळ होतंय’ असं तिला झालं होतं.

गावातला उरूस जवळ आला होता. सारवण,धूण कामाला वेग आला होता. चंपान धुरपीला मदतीला बोलवून घेतलं आणि सगळ्यांच्या नजरेत भरवून टाकलं. यशोदाबाई पुढं म्हातारा कधीच जात नव्हता. ठरलं तर !या कानाच त्या कानाला न कळता ! भल्या पहाटे बुवा,यशोदाबाई चंपाबाई,आणि दोघींचे कारभारी पाच माणसं देवाला चालली, सहाव्या माणसाचं नांव पाची जणानाच ठावं.  भोळी भाबडी गोदू संसारातल्या आगीविषयी यत्किंचितही मागमूस नसलेली.. नव्हे,आपल्या संसारात इस्तु पडत आहे याची कल्पना नसलेली.. नेहमीप्रमाणं उठून कामाला लागलेली,उरसामुळं चार पै पावण येणार म्हणून कामाचा ढीग जास्तच ! रानातल्या कडधान्यांना राखत घालून गाडग्यात, मडक्यात,कणगीत  जमेल तसं मावेल तसं भरून ठेवायचं होतं. गोदूच्या हातापायाला दम नव्हता. उरूस कामं लावायचा पण उत्साहही द्यायचा. वर्षातन तेवढच दोन दिस आनंदाचं. पै पावण्यात मजेत जायचं,परत वर्षभर हायच आपला रामरगाडा ! गोदीनं आवरून म्हशी सोडल्या अन शेतावर गेली. म्हसर खुट्ट्याला बांधून मिसरीची दोन बोटं इकडून तिकडून दातांवर फिरवली,चूळ भरून कडवाळ कापून भारा  म्हशीच्या पुढ्यात टाकला, अन कामाला लागली. दिस मावळतीला आला,घरात जाऊन सैपाक करायचा होता. “आत्याबाई कवा येत्यात काय म्हैत !” ती स्वतःचीच पुटपुटली. तिनं लगोलग जळणाचा भारा बांधला,म्हसरं सोडली अन भारा घेऊन ती घराच्या वाटेला लागली.

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

गोदूबाई गेल्या शेवटी ! आयुष्याच्या सर्व कटकटीतून, दुर्भाग्यातून सुटका झाली अखेर !

गोदूबाई !गावातीलच दामाजी बुवाना दिली होती. दामाजीबुवा वारकरी – माळकरी – भजन कीर्तन पंढरीची वारी चुकायची नाही म्हणून सगळेजण बुवाच म्हणत त्याला. तरतरीत नाक, उंच -धिप्पाड शरीर , दररोज पांढरीशुभ्र परिट घडीची खळखळीत कपडे, जमीनजुमला  चिक्कार, गोठ्यात बैलजोडी, दुभती जनावरं, सोप्यात धान्याच्या थप्पी, एकूण खातं -पितं घर ; एकुलता एक पोरगा, आईवडील बस्स! एव्हढंच मर्यादित कुटुंब ;जास्त काही बघायची गरज नव्हती. खात्या पित्या घरात लेक पडत्या ना ? बास ! गोदाबाईच्या घरातल्याना तेवढंच बास होतं ; शिवाय लेक गावातच हाकेच्या अंतरावर नजरेसमोर रहाणार होती. गोदाबाई निरक्षर, कृश पण काटक देहाची, साधीभोळी, घरदार, गुरे ढोरं शेतातली कष्टाची कामे कशातच मागं नव्हती  ; हीच आपल्या लेकाचा  परपंच चांगला सांभाळील म्हणून दामाजी बुवाच्या आई वडिलांनी गोदूबाईला मागणी घातली.

लगीन हून गोदाबाई सासरी आली, गावातच सासर असल्यानं रुळायला वेळ नाही लागला. गोदुबाईंनी घराचा ताबा लगेचच घेतला  दिवसभर सारवण -पोतेरा, स्वयपाक, भांडी -धुण, दळण -जळण शेतातल्या मालाची उगानिगा गोदुबाईला काही सांगावे लागायचे नाही. घरादारात अंगणात गोदूबाईचा हात सतत हालत रहायचा, सासुसासरे खुश!

बघता बघता वर्ष दोन वर्षे गेली आता नातवंडांचं तोंड बघायचं आणि पंढरीची वारी धरायची म्हणून आस लागली पण दोन म्हणता चार वर्षे झाली तर गोदूबाईच्या पदरात देवाने काही दान दिलं नाही. त्या काळी डॉक्टर दवाखाने औषध असलं काही नव्हतं, गावातच झाडपाला, नवस, देवर्षी बघून झालं, काही उपाय चालला नाही. गोदाबाईला पण काळजी लागली होती पण तिला आशा होती ;तिच्या खानदानात कोणीच वांझोट नव्हतं सगळ्यांनाच डझनान पोरं होती. पण भावकीतल्या आया बाया गोदूच्या सासूला दबक्या आवाजात बोलू लागल्या, “येशे, ल्योक म्हातारा हुस्तोवर नातवाची वाट बघतीस का ? वाणी तिणीचा एकच हाय एकाच चार हूं देत बाई , लेकाचं दुसरं लगीन कर. “

आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली, ‘घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला  म्हणलीच, “आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा. . . दुसरी बायकू आणाया पायजे, तू वाणीवाणीचा योकच, एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत, चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती, बुवान होकार देऊन टाकला . यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग  जावंच्या कानी लागली, “आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती, ती लगोलग म्हणाली, “एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई, तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

हे वाचून जॉन ची माहिती आपल्याला कशी मिळणार? कोणाची मदत घ्यावी.? हां !या हॉस्पिटल मधल्या मॅटर्निटी  मधले सगळे रिपोर्ट्स पाहायला हवेत. सगळे रेकॉर्ड्स पाहायला हवेत. इतक्या वर्षापूर्वीची माहिती मिळणार का? बघू तरी. म्हणून म्हणून तिने आपला शोध त्या दिशेने सुरू केला. वीस वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळांची नावे, महिन्याचे रेकॉर्ड करत करत अचूक त्या दिवसापाशी ती आली. जॉन चे ना व पाचवे होते. शिवाय त्याच्या नावापुढे चांदणीची खूण केली होती. काय बरे सुचवायचे या चांदणीतून? त्या चांदणीच्या चिन्हाचा शोध घ्यायला तिने सुरुवात केली. त्या इन्स्टिट्यूट मधली अतिशय गुप्त बातमी तिला वाचायला मिळाली. त्या चांदणीची खूण म्हणजे ते बाळ” टिश्यू कल्चर”या नवीन प्रगत पद्धतीतून जन्माला आले. आहे. विशेष म्हणजे त्या बाळाची वाढ आईच्या युटेरस मध्ये नुसती झाली आहे. पण प्रत्यक्ष त्या आईचा, तो जीव निर्माण करण्यात काहीही वाटा नव्हता. फक्त वाढ करायची, त्याचे पालन पोषण करायचे. . नॉर्मल फलन प्रक्रिया इथे घडलीच नाही. टिशू कल्चर या अत्यंत प्रगत प्रक्रियेतून या बाळाचा जन्म झालाय.

त्यावेळी डॉक्टर सु झी हॉस्पिटल मध्ये जॉईन होऊन दोनच वर्षे झाली होती. सु झी ला संशोधनात खूप इंटरेस्ट होता. रोज चे पेशंट तपासत तपासत तिचे निम्मे डोके काहीतरी वेगळे करावे याचाच विचार करत असे. अचानक तिच्या वॉर्डमध्ये एक तरुण, तरतरीत महाराष्ट्रीयन मुलगा बेशुद्ध अवस्थेत ऍडमिट झाला. पाय घसरून पडण्याचे निमित्त झा ले आणि तो बेशुद्ध झाला. तो – आपल्या डॉक्टरेटचा शोध निबंध

वाचण्यासाठी पॉंडेचरी मध्ये आला होता. अन अचानक तिथे अपघात झाला. त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारे कोणी नव्हते. डॉक्टर सु झी आणि तिच्या स्टाफ ने त्याची जबाबदारी स्वीकारली. सु झीला त्या तरुणाचा चेहरा खूप आवडला. तिने तरी लग्न न करण्याचे ठरवले होते. याचा चेहरा बघून ती इतकी भूलली की अशा चेह्ऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला असावी म्हणून तरी लग्न करावे असे तिला वाटले. पण तेवढ्यात साठी का त्या बंधनात गुंतायचे? छे छे ! नको. सु झीचे विचार चक्र जोरात फिरायला लागले. टिशू कल्चर च्या मदतीने आपण याच्या सारखे बाळ जन्माला घातले तर? यालाही काहीच कळणार नाही आणि आपली हौस फिटेल. हा आता बेशुद्ध असताना आज आपण त्याच्या शरीरातले टिश्यू प्रिझर्व करू शकू. पुढचे काम कसे करायचे नंतर पाहू आणि खरच सुहास च्या उजव्या दंडातली 5 एमजी टिशू काढून घेऊन दोन स्टिचेस घालून टाकले.

नंतर योग्य ट्रीटमेंट मुळे सुहास लवकर बरा होऊन आपल्या घरी गेला. त्याला काही पत्ताही नव्हता की आपल्या शरीराच्या प्रयोगासाठी अशा तर्‍हेने वापर झालेला आहे.

सुझीने मात्र नंतर आपल्या डि न ना आपली कल्पना सांगितली. त्या एक्स प्लांटचे इन प्लांटेशन स्वतःचा युटरस मध्ये करू घेऊन आपणच त्याला वाढवणार असल्याचे सांगितले.  

सुरुवातीला डिनअशा प्रकारच्या प्रयोगांना परवानगी द्यायला तयार नव्हते. अखेर खूप विचारांती आणि खूप गुप्तता पाळून डॉक्टर सु झिला परवानगी देण्यात आली. सु झी मोठ्या उत्साहाने कामाला लागली. तो टिश्यू तिने कल्चर मेडियम मध्ये त्याचे वाढ केली. पुढच्या योग्य त्या स्टेप्स वापरून छोटीशी सर्जरी करून सु झी च्या युटेरस मध्ये ते इम्प्लांट केले.

पूर्ण नऊ महिने सूझी डॉक्टरांच्या देखरेखी खालीच होती. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी डीन पासून नर्सेस पर्यंत सगळे जातीने लक्ष देत होते आणि अखेर दौंड मुलाच्या जन्मानंतर प्रयोगाची यशस्वी सांगता झाली. सुझीला अगदी हवा तसाच मुलगा झाला. हुबेहूब तिचा तो पेशंट !त्या बाळाचे रीत सर पालकत्व तिने मिळवले. आणि त्याला जीव लावून वाढवले.

मात्र म्हणतात ना, “रक्तातले अनुवंशिक गुण मुलात उतरतात”. इथेही तसेच झाले. हा मुलगा जरी  सुझी जवळ पांडेचरीत वाढत होता तरीआवड-निवड सगळी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलाची होती. त्यात तसूभरही बदल नव्हता. सुझी ने ही त्याच्या आवडीप्रमाणे त्याला वाढवले.

तोच जॉन पॉंडेचरी हून महाराष्ट्रात इंटरव्यू साठी आला होता.

ही सगळी माहिती गोळा करता करता सुखदा चा मेंदू अगदी पुरता शीण होऊन गेला. पण सुहासला ही माहित नसलेले गुपित तिला समजले होते. हा जॉन म्हणजे सुहास चा मुलगा !. म्हणजे तिचाच. पण छे ! याला मुलगा कसा म्हणता येईल? प्रतिकृती !

आपण आरशात कसे आपले प्रतिबिंब पाहतो, कशी हा सुहास ची प्रतिकृती!

सुखदाने घड्याळात पाहिले. बापरे !रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सगळा दिवस तिचा या संशोधनात गेला. एका नवीन संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच दुसरेच संशोधन नकळत तिच्याकडून झाले होते.

आता हे सगळे सुहासला कसे सांगायचे आणि कसे पटवून द्यायचे याचाच विचार करून ती परत आपल्या केबिन मधून गाडी कडे चालली.

ज्या उत्साहात ती सकाळी आली होती, त्याच उत्साहात पण मोठे गुपित शोधून ती घरी चालली होती. सुहास ला त्याच्या प्रतिकृती ची खबर सांगायला.

समाप्त

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print