(तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असेही सांगतो……आता पुढे)
म्हातारा थोडा गडबडतो, काय बोलावे हे त्याला सुचत नाही, त्याचे अभिनंदन करून म्हातारा, मुलाला, मेहनत घेऊन वाढविलेल्या बँकेतल्या शिल्लक असलेल्या शून्यांविषयी काय करायचे ते विचारतो. आता परदेशातल्या शून्यांच्या मानाने म्हाताऱ्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते.
तो म्हाताऱ्याला एक सल्ला देतो, “एक काम करा ते पैसे एका वृद्धाश्रमाला द्या. पुढेमागे कदाचित तुम्हांला त्याचा उपयोग होईल.” पुढचे थोडेसे जुजबी बोलून मुलगा फोन ठेऊन देतो.
म्हाताऱ्याचा तोल जातो. स्वतःला सांभाळून तो पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसतो. म्हाताऱ्याला आज पहिल्यांदा जाणीव होते की आपल्या मुलापेक्षा आपण खूप नशीबवान होतो. आपल्याला, आपल्या आई वडिलांची सेवा करायचे भाग्य मिळाले. आपल्या मुलाच्या दुर्दैवाने त्याच्या नशिबात ते भाग्य नाही.
म्हातारीची दिवाबत्ती झालेली असते.
तो तिला हाक मारतो, “अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू.” आणि म्हातारी चक्क म्हणते, “हो आलेच”. म्हाताऱ्याचा विश्वासच बसत नाही. आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो, तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो…. त्याच्या डोळ्यातले तेज कमी कमी होत जाते…आणि काही क्षणांत त्याचे डोळे निस्तेज होतात. म्हातारी आपली देवपूजा आटपून म्हाताऱ्या शेजारी झोपाळयावर येऊन बसते आणि म्हणते, ” बोला काय बोलायचय”
म्हातारा काहीच बोलत नाही. ती म्हाताऱ्याचा हात आपल्या हातात घेते. शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे निस्तेज झालेले असले तरी एकटक म्हातीराला बघत असतात.
क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते. तिला काय करावे हेच सुचत नाही, पण लगेचच ती स्वतःला सवारते…हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते आणि पुन्हा झोपाळयावर येऊन बसते.
म्हाताऱ्याचा थंडगार हात ती पुन्हा आपल्या हातात घेते आणि म्हणते, ” चला कुठे नेता फिरायला आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला ? बोला “
म्हातारीच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळत असतात. एकटक नजरेन ती म्हाताऱ्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रुही गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाताऱ्याच्या खांद्यावर पडते.
बँकेतल्या शून्यांना बरोबर न घेता, ते आपल्या लाडक्या मुलासाठी येथेच सोडून, तो आणि ती, दोघांनी एका न संपणाऱ्या अशा लांबच्या प्रवासाला सुरवात केलेली असते.
बैंकेतील पाच शून्यांच्या आधी काही दोन आकडी संख्याही जमा झालेली असते. एका निवांत क्षणी, त्याला कॉलेजचे ते जुने दिवस आठवतात. आजूबाजूला कोणी नाही अशी वेळ साधून तो तिला म्हणतो, “अग, ये जरा अशी समोर, बस माझ्या जवळ. पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू. कुठे तरी फिरायला जाऊ.”
ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, ” कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला! जरा मुलगा मोठा झाला आहे त्याचे तरी भान ठेवा. ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत. चला व्हा बाजूला.”
मग येते पंचेचाळीशी, त्याच्या आणि तिच्या डोळ्यावर चश्मा चढलेला असतो. एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात. दोघांच्याही केसांनी आपला काळा रंग सोडून द्यायला सुरवात केलेली असते. मुलाने आता शाळेमधून कॉलेजसारख्या मोठ्या आणि वेगळ्या दुनियेत प्रवेश केलेला असतो. त्याच्या गरजा वाढत जातात. बैंकेतील सहा शून्यापर्यंत गेलेली शिल्लक वाढत न जाता कमी होत जाते. ती स्वतःचा वेळ मैत्रिणींबरोबर किटी पार्टी किंवा भजनी मंडळात घालवत असते. त्याचे वीकेंडच्या बैठकीचे कार्यक्रम सुरुच असतात. तरीही तो आणि ती, त्याची आई लवकर गेल्याने खचलेल्या म्हातार्याा वडिलांची काळजी घेत असतात. त्याच्या म्हातार्याआ वडिलांना त्याचा आणि तिचा एक मानसिक आधार कायम असतो. एकाचवेळी मागच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला सांभाळण्याचे एक अतिशय कठीण असे काम तो आणि ती सहजतेने करत असतात.
कॉलेज मधून बाहेर पडून मोठे झालेले बाळ आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्याला पंख फुटलेले असतात, आणि एक दिवस ते त्याच्या आणि तिच्या बँकेतले सगळे शून्य वापरून दूर परदेशी उडून जातो.
आता त्याच्या केसांनी, काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. आता तिलाही केसांना काळा रंग लावायचा कंटाळा आलेला असतो.
काही काळाने त्याच्या म्हातार्या झालेल्या वडिलांनी त्याला आणि तिला, म्हातारा- म्हातारी बनवून त्यांची साथ सोडून सुखाची झोप घेतलेली असते.
आता तो तिला म्हातारी म्हणू लागतो, कारण स्वतःही तो म्हातारा झालेला असतो. साठीची वाटचाल सुरु झालेली असते.
प्रॉव्हिडन्ट फंडामुळे बैंकेत आता परत काही शून्य जमा झालेली असतात. एव्हाना त्याचे बैठकीचं प्रोग्रॅम कमी झालेले असतात आणि डॉक्टरांच्या भेटी वाढून औषध, गोळ्या यांच्या वेळा ठरतात.
बाळ मोठे झाल्यावर लागेल म्हणून घेतलेले मोठे घर अंगावर येऊ लागते. बाळ कधीतरी परत येईल ह्याची वाट बघण्यात तो आणि ती आणखी म्हातारे होतात.
आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते. म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत आपल्याच गत आयुष्याचा विचार करत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबून तिच्यात झालेले बदल न्याहाळीत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने उठून फोन घेतो, फोनवरून मुलगा बोलत असतो. तो आपला फोन स्पीकरवर टाकतो. त्याचा आवाज ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाच्या स्मितरेषा उमटतात. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि त्याचा आणि तिचा, तो तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असल्याचे सांगतो.
वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजमध्ये भेटलेले तो आणि ती. पहिल्या नजरेत नाही पण जसजसे एकत्र दिवस गेले तेंव्हा त्यांना कळून चुकले की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत. चोरून भेटणे आणि चोरून प्रेम करण्याची एक वेगळी मजा असते ती दोघांनी चांगल्या प्रकारे अनुभवली. कॉलेजमधले प्रेमाचे ते सुवर्ण दिवस भराभर पुढे सरकले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेऊन स्वतःचं एक घरकुल उभं केलं. लग्नाची पहिली २-३ वर्षे छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात, हातात हात घालून गप्पा मारायची असतात, नवनवीन स्वप्न रंगवायची असतात. त्यांचीही ती दोन तीन वर्षे तशीच गेली. थोडी हौस मौज झाली. थोडे हिंडणे फिरणे झाले, एकमेकांना भेट वस्तू दिल्या गेल्या. तो आणि ती खूप खुषीत होते.
पण त्यांचे हे दिवस पटकन उडून गेले. त्याच काळात त्यांचे बँकेत जमवलेले शून्य थोडेसे कमी झाले. त्याचवेळी त्यांना हळूच चाहुल लागली बाळाची आणि वर्षभरातच त्यांच्या नवीन घरात एक पाळणा हलू लागला. आता तो आणि ती जरा गंभीर झाले. त्यांच्या वयापेक्षा ते जास्त जबाबदार झाले. त्या दोघांनी एकमेकांच्या खुषीचा विचार न करता त्यांचे सर्व लक्ष आता त्यांच्या बाळावर केंद्रीत केले. त्याचे खाणे पिणे, शू – शी, त्याची खेळणी, त्याचे कपडे, त्याचे लाड कौतुक वेळ कसा फटाफट निघून जात होता. सुरूवातीला सगळे दोघे मिळून करत होते ॰नंतर तिच्यावर बाळाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि तिचा हात नकळत त्याच्या हातून सूटत गेला. तो ही आता जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त पैसा कमविण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याचा जास्त वेळ घराबाहेर जाऊ लागला होता. त्यांचे गप्पा मारणे, हिंडणे, फिरणे केव्हाचं बंद झालेले होते आणि विशेष म्हणजे दोघांच्याही हे लक्षात आलेले नव्हते.
अशातच दोघांनी तिशीचा उंबरठा ओलांडलेला होता. बाळ मोठा होत होता. तो आणि ती दोघेही स्वतःच्या आवडी निवडी आणि गरजा बाजूला ठेऊन बाळाचे जमेल तसे लाड करत होते. . ती बाळात जास्त गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात जास्त गुरफटत जातो. घराचा हप्ता, बाईकचा हप्ता आणि त्यात बाळाची वाढत जाणारी जबाबदारी, त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि महत्वाचे म्हणजे बँकेतल्या शिलकीचे शून्य वाढवायचा ताण. घरात लहान लहान कारणांवरून दोघांमध्ये वाद चालू होऊन त्याचे रूपांतर छोट्या भांडणात होऊ लागले तरीही तो पूर्णपणे स्व:तला कामामध्ये झोकून देतो. बाळाचे शाळेत जाणे चालू होते. बाळ मोठा होऊ लागतो. आता तिचा सगळा वेळ त्याच्या मागे मागे करण्यातच सरतो.
एव्हाना पस्तीशी आलेली असते. स्वतःचे घर त्यांनी चांगले सजविलेले असते. हप्त्याने दाराशी चार चाकी गाडी आलेली असते. बैंकेत बऱ्यापैकी नाही पण पाच शून्य जमा झालेले असतात पण तरीही काही तरी कमी असते आणि ते म्हणजे समाधान.
रोजच्या धावपळीमुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढलेला असतो. आणि तो मग दर वीकेंड ला आपल्या मित्रांबरोबर बैठका सुरु करतो. सुरवातीच्या एकच प्यालाने झालेली सुरवात पुढच्या पाच एक वर्षात एका क्वार्टर पर्यंत पोचते.
दिवसामागुन दिवस जात असतात. बाळ मोठे होते. आता त्याचे स्व:तचे एक विश्व तयार होते. त्याची दहावी येते आणि त्याची दहावी येईपर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
☆ कथा लक्ष्मीची पावले ☆ प्रस्तुती – संपदा कानिटकर ☆
आईच्या चपलांची किंमत एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात जातो दुकानदाराला लेडीज साठी चप्पल दाखवा ना अशी विनंती करतो दुकानदार पायाचे माप विचारतो मुलगा सांगतो माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही पण पायाची आकृती आहे त्यावरून चप्पल देऊ शकाल का दुकानदाराला हे अजबच वाटले दुकानदार म्हणाला या आधी कधी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईला घेऊन का येत नाही मुलगा सांगतो माझी आई गावाला राहते आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे त्यातून आई साठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायाची आकृती घेतली होती असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला दुकानदाराचे डोळे पाणावले त्याने साधारण अंदाज घेत या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला आईला सांगा मुलाने आणलेल्या चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर पण अनवाणी फिरू नकोस हे ऐकून मुलगा भारावला त्याने पैसे देऊन चपलांचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला तेवढ्यात दुकानदार म्हणाला तुमची हरकत नसेल तर आईच्या पायांची आकृती असलेला कागद मला द्याल का मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला बाकीचे कर्मचारी आवक झाले त्यांनी कुतुहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा दुकानदार म्हणाला ही केवळ पावलांची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीचे पावले आहेत ज्या माऊलीच्या संस्काराने या मुलाला घडवले यशस्वी होण्याची प्रेरणा दिली ही पावले आपल्या ही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल…
संग्राहिका – सौ संपदा कानिटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चार दिवस झाले आजोबा बागेत आले नाहीत तेंव्हा स्मार्त आणि अर्थ अस्वस्थ झाले.. गेले तीन-चार महिने आजोबा आले नाहीत असे कधीही झाले नव्हते.
“अर्थ, आजही आजोबा आले नाहीत. का आले नसतील? ते आजारी तर नसतील ना? की त्यांच्या सुनेने त्यांना गावी पाठवून दिले असेल? “
“गावी गेले असते तर आपल्याला भेटून, सांगून गेले असते. कदाचित बरे वाटत नसेल त्यांना म्हणून आले नसतील. ए, आपण त्यांच्या घरी जाऊया का त्यांना भेटायला? आपल्याला अचानक समोर पाहून त्यांना खूप आनंद होईल. “
“हो. आपल्याला त्यांची आठवण येते तशी त्यांना ही आपली आठवण येत असणारच.. चल जाऊया. “
“कुठं राहतात रे ते? त्यांचा पत्ता काय आहे? “
“मला नाही ठाऊक. मला वाटलं तुला असेल माहीत. “
“नाही रे मलाही नाही माहीत. कुठं आणि कसं शोधायचे त्यांना? “
“कुठूनही, कसेही शोधून काढले असते रे, पण आजोबांचं नाव ही नाही माहीत आपल्याला.. “
अर्थ आणि स्मार्त रावसाहेबांनी वाट पाहत राहिले. रावसाहेब काही आले नाहीत.
स्मार्त, अर्थ दोघेही बागेत येतात. विटीदांडू खेळतात.. बराचवेळ रावसाहेब बसायचे तो बाक रिकामा असतो. रोजच खेळून झाल्यावर अर्थ, स्मार्त तिथे पूर्वीसारखेच त्या बाकावर विसावतात. दोघांच्यामध्ये रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू असतो.. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारतात बहुतेकवेळा विषय आजोबांचा म्हणजेच रावसाहेबांचा असतो. ते दोघेही रावसाहेबांची वाट पाहत असतात.. आणि बहुदा विटी-दांडूही त्यांचीच वाट पाहत असणार..
‘किती वाजले रे?’ स्मार्त विचारतो, ‘सात वाजून गेले असतील ‘ अर्थ उत्तर देतो.. अर्थचा निरोप घेऊन स्मार्त आपल्या घरी परततो. रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू घेऊन अर्थ ही आपल्या घरी जातो.. विटी खिशात असते तर आजोबांचं बोट धरावे तसा दांडू धरलेला असतो.
दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा विटीदांडूने खेळायला येणारच असतात.. आणि आजोबांची म्हणजे रावसाहेबांची वाट ही पाहणारच असतात.
रात्री जेवणे झाल्यानंतर रावसाहेब आपली मोठी ट्रंक काढून बसले.. या ट्रंकमध्ये राधाबाईंनी मुलाच्या लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी जपून ठेवल्या होत्या.
रावसाहेबांनी ती ट्रंक उघडली आणि त्यातील वस्तू पाहून ते त्यात स्वतःला हरवूनच बसले. एकेक वस्तू म्हणजे अनंत आठवणींचे पोळंच होतं. बराच वेळ ते पेटी उघडून बसले होते. मुलाने जेवायला हाक मारली तेंव्हा ते त्यातून भानावर आले. ट्रंक मध्ये तळाशी असणारी विटी आणि दांडू काढला आणि ट्रंक बंद करून जास्तानी ठेवून जेवायला गेले.
एका पिशवीत विटी-दांडू घेऊन ते बागेत गेले तेंव्हा स्मार्त आणि अर्थला स्मार्तच्या चेंडूने एकत्र खेळताना पाहून त्यांना बरे वाटले.. ते जाऊन नेहमीच्या बाकावर बसले. स्मार्तचे लक्ष त्यांच्याकडे गेले तसे दोघेही रावसाहेबांकडे गेले..
” आजोबा तुम्ही चला न आमच्यासोबत खेळायला.. “
” मी? “
“हो.. तिघे मिळून चेंडूने खेळू.. आज मी टेनिसचा चेंडू आणलाय कॅचने खेळण्यासाठी.. “
“मी पण तुमच्यासाठी गंमत आणलीय “
“आमच्यासाठी गंम्मत? दाखवा बघू आधी. “
स्मार्त आणि अर्थ ला केंव्हा एकदा गंम्मत पाहतोय असे झाले होते.
“हो दाखवतो.. पण त्याआधी हे घ्या “
“खडीसाखर ss ! मला खूप आवडते. माझे आजोबा आले की नेहमी देतात मला.. ते म्हणतात, ‘ चॉकलेट नको खात जाऊस.. त्यापेक्षा ही देशी खडीसाखर खात जा.. खूप चांगली असते’ ते असताना मी कधीच चॉकलेट खात नाही.. पण ते गावी गेले की…”
“बरोबरच आहे आजोबांचं. आता मी आहे ना.. आता रोज खडीसाखर खायची. आणि ही बघा गंमत विटी-दांडू. “
“पण आजोबा, आम्हांला नाही खेळायला येत विटीदांडू “
दोघेही विटीदांडू पाहून खुश झाले पण दुसऱ्याच क्षणी उदास होत म्हणाले.
“अरे, उदास कशाला होताय.. मी शिकविन ना. “
रावसाहेबांच्या वाक्याने त्यांच्या चेहंऱ्यावरची उदासीनता एका क्षणात नाहीशी झाली. रावसाहेबांना त्यांचे बालपण आठवले. त्यांच्या धाकट्या चुलत्यांनी त्यांना पहिला विटी-दांडू आणून दिला होता आणि शिकवलाही होता. सुरवातीला त्यांना विट्टी टिपता यायची नाही, नंतर दूर जायची नाही.. पण पुन्हा पुन्हा ते चांगले खेळू लागले.. कधी कधी पोरांचा खेळ थांबवून चुलते आणि त्यांचे मित्र विटी-दांडू खेळायचे. चुलते म्हणायचे, ‘दांडू म्हणजे सुखाचे, धीराचे, आणि धाडसाचेच प्रतीक असते आणि विटी म्हणजे दुःखाचे, अडचणीचे, संकटाचेच प्रतीक असते.. सुखाने दुःखाला दूर कोलायचे असते.. विटी सतत दांडूला म्हणजे सुखाला टिपायचा प्रयत्न करीत असते.. तिने टिपू नये यासाठीच तिला तडाखा देऊन दूर पिटाळायचे.. हेच धीर आणि अडचणी, धाडस आणि संकट याबाबतही असते ‘
चुलत्यांचे सांगणे त्यावेळी रावसाहेब लहान असल्याने त्यांना उमजले नव्हते पण त्यांचे ते शब्द मात्र मनात पेरले गेले होते.. नंतर कळू लागल्यावर विटी-दांडूचा खरा खेळ त्यांना समजू लागला होता. विटी-दांडूचा खेळ स्मार्त आणि अर्थला शिकवताना. ताना त्यांनी तोच मुद्दा स्पोप्या शब्दांत सांगितला होता.
रावसाहेब, स्मार्त, अर्थ आणि विटीदांडू अशी एक टीमच झाली होती. रावसाहेब त्याच्याएवढे होऊन त्यांच्याशी खेळत होते.. दिवसभर त्यांचे मन संध्याकाळची वाट पहात होते, गावची आठवण येत होती, नाही असे नाही पण आताशा तिथं रमतही होते.
खेळ खेळून झाल्यावर खडीसाखर आणि मग स्मार्त-अर्थ च्या हट्टाखातर गावाकडच्या, लहानपणीच्या गोष्टी. ते तर स्मार्त, अर्थचे आजोबा- मित्र झाले होते. राधाबाईं गेल्यानंतर एकाकी झालेल्या त्यांच्या मनाला, जगण्याला, आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित नव्या वळणाने सावरायला मदतच केली होती. खरेतर रावसाहेब, स्मार्त आणि अर्थ वेगवेगळ्या कारणाने, अर्थाने एकटेच होते, एकाकीच होते.. पण ते एकटेपण आता उरलं नव्हतं.
‘मssम्मी’ म्हणून छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला तसे रावसाहेब विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांचे लक्ष रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले.. एक मुलगा चेंडूने खेळता खेळता पडला होता. ते बाकावरून झटकन उठले आणि त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले. तोवर एक त्या पडलेल्या मुलाच्याच वयाचा एक मुलगा दुसरीकडून धावत आला होता.
“कसा पडलास? बघू कुठं लागलंय?”
त्या मुलाकडे अविश्वासाने, संशयाने पहात त्याने उठण्यासाठी पुढे केलेला हात न घेता पडलेला मुलगा आणखीनच रडू लागला होता. रावसाहेब त्याच्या जवळ गेले. गुडघ्याला थोडेसे खरचटले होते.
“अरे, एवढा मोठा शूरवीर मुलगा तू.. आणि एवढंसं लागलंय आणि रडतोस?”
पडलेला मुलगा त्यांच्याकडेही अविश्वासाने आणि संशयाने पाहू लागला होता.
“तुला सांगतो माझ्या आईला एक जादूचा मंत्र येत होता… “
रावसाहेबांच्या वाक्क्याने ती दोन्ही मुले त्यांच्याकडे आश्चर्याने आणि उत्सुकतेने पाहू लागली तसे ते म्हणाले,
“लहानपणी आम्ही भावंडे खेळताना धडपडलो, पडलो की आम्हीसुद्धा असेच रडत होतो.. मग आई धावत यायची आणि म्हणायची ‘ खूप दुखतंय ना? थांब हं.. मी जादूने दुखणे गायब करते…’अल्लामत्तीर कोल्लामत्तीर छु ss!’ हा जादूचा मंत्र म्हणून लागलेल्या ठिकाणी हळुवार फुंकर मारायची…”
“असते.. आईजवळ असतेच…पण आपल्यावर माया करणाऱ्या प्रत्येकाजवळही असते. थांब हं!”
रावसाहेबांनी ‘अल्लामत्तीर कोल्लामत्तीर….’ म्हणून त्या मुलाच्या जखमेवर हळूच फुंकर मारली. फुंकरीने त्याला बरं वाटले.
“आत्ता उठ आणि आपण हळूहळू चालत जाऊन बाकावर बसुया थोडावेळ.. आणखी बरं वाटेल “
“हो चल, मी ही येतो”
पडल्यावर मदतीसाठी धावत आलेला मुलगा उठण्यासाठी त्याच्यापुढं हात करत म्हणाला.
“नाही…”
पडलेला मुलगा अविश्वासाने, संशयाने रावसाहेबांकडे आणि दुसऱ्या मुलांकडे पहात म्हणाला.
“का रे? “
“आईने सांगितलंय अनोळखी माणसांशी बोलायचे नाही, त्यांच्याबरोबर कुठं जायचं नाही. अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही. “
“आईचे बरोबरच आहे पण आपण अनोळखी कुठं आहोत? काही दिवस तर आपण पाहतोय ना एकमेकांना?”
त्याचे बोलणे ऐकून काहीसे आश्चर्य वाटलेले रावसाहेब म्हणाले.
“हो पाहतोय.. आजोबा, तुम्ही तिथं बाकावर बसलेले असता आणि मी इथं एकटा खेळत असतो. पण आपली ओळख कुठं आहे? “
“ते ही खरंच आहे म्हणा.. आयुष्यभर एकत्र राहूनही बऱ्याचदा आपण ओळखू शकत नाही मग चार दिवस पाहिल्याने कसे ओळखणार? “
रावसाहेब स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणाले.
“काय म्हणालात? “
“काही नाही रे.. हुशार आहेस तू खूप.. तुझे नाव काय रे? “
“स्मार्त. “
“खूप छान आहे नाव… आणि तुझे रे? “
“अर्थ. “
“व्वा ! तुझेही चांगले आहे नाव. स्मार्त, तू आजोबा म्हणालास ना? मग आजोबांशी वेगळी ओळख कशाला लागते रे? चल, थोडा वेळ बाकावर बसूया. तुला बरं वाटेल.. मग पुन्हा खेळ. चल उठ बरं ! अर्थ, हात दे रे त्याला. “
रावसाहेब म्हणताच काहीशा द्विधा मनःस्थितीतच स्मार्त अर्थच्या हाताचा आधार घेत उठला आणि त्यांच्यासोबतच पण मनात काहीसा संशय बाळगून सावधसा बसला.
“अर्थ, तू का खेळत नव्हतास? “
“माझ्याकडे खेळायला काहीच नाही. “
“अरे मग स्मार्त बरोबर खेळायचे?”
“नाही.. माझ्या आईने अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही म्हणून सांगितलंय.. “
स्वतःचा चेंडू पोटाशी घट्ट धरत स्मार्त म्हणाला.
रावसाहेब हसले.
“अरे पण अर्थ आता अनोळखी कुठं राहिलाय? तू पडलास तेंव्हा मदतीसाठी तो धावत आला. तुला उठायला हात दिला. तुझा हात हातात घेऊन तुझी काळजी घेत हळूहळू इथंपर्यंत घेऊन आला. मदतीला धावणारी, काळजी घेणारी अनोळखी कुठं असतात? तुम्ही दोघे तर आता मित्रच झालात. “
“आजोबा, तुम्ही तर माझ्या आजोबांसारखेच बोलता. “
स्मार्त रावसाहेबांना म्हणाला.
“अरे आजोबाचं आहे मी तुमचा.. आणि काय रे तुझे आजोबा बागेत येत नाहीत.. ?
“ते गावी असतात. एकटे एकटेच राहतात. मला खूप आवडतात ते.. ते कधी कधी येतात.. माझ्याशी खेळतात, मला छान छान गोष्टी सांगतात.. मला तर ते इथंच राहावेत असे वाटतं.. पण ते आले कि थोड्याच दिवसात आई बाबांना म्हणते, ‘ त्यांना काहीही कळत नाही.. ते गावीच असलेले बरे.. माझ्या स्मार्त वर गावाकडचे संस्कार नकोत व्हायला.. ‘ मग एक-दोन दिवसातच ते गावी निघून जातात.. मला त्यांची खूप आठवण येते हो.. “
“बरं झालं मला आजोबा नाहीत ते.. नाहीतर माझ्याही आईने त्यांना असंच गावी पाठवलं असतं कदाचित.. “
रावसाहेब स्मार्त व अर्थला जवळ घेतात.. त्यांच्या केसांवरून हात फिरवतात. स्वतःशीच पुटपुटतात.
“इथं राहून दुर्लक्षित, एकटे एकटे राहण्यापेक्षा गावी एकटे राहिलेले बरेच की.. “
“आजोबा, काही म्हणालात काय? “
“अरे, काही नाही रे.. म्हणले मला शिकवशील का तुझे खेळ? “
“आजोsबा ! तुम्हांला क्रिकेट नाही येत खेळायला? “
आश्चर्य वाटून स्मार्त व अर्थ एकाच वेळी म्हणाले.
“नाही रे येत ! “
“मग तुम्ही लहान असताना काय खेळत होता? “
“आम्ही विटीदांडू, आट्यापाट्या, कबड्डी, खो खो असे खूप खेळ खेळत होतो.. तुम्हांला विटीदांडू येतो का रे खेळायला?
“नाही “
“अरे मी तर माझा मुलगा लहान असताना त्याच्यासाठी सुताराकडून तीन विट्या आणि दांडू करून घेतला होता. दोन विट्या हरवल्या पण मी तो विटीदांडू त्याच्या बालपणाची आठवण म्हणून अजून जपून ठेवली आहे.. “
“आजोबा, माझे आजोबाही खूपदा सांगत असतात, विटीदांडू खेळबद्दल.. तुम्ही उद्या आणाल का तो विटीदांडू? “
“हो.. आणीनही आणि तुम्हाला शिकवीनही..
पण चला आता घरी आई वाट पाहत असेल. “
“आजोबा, किती वाजले? “
“सात.. का रे?”
“अरे बाप रे! सात? आजोबा पळतो मी.. आईने सांगितलंय सात ला घरात आला नाहीस तर पुन्हा खेळायला जायला परवानगी देणार नाही.. जातो मी.. बाय आजोबा, बाय अर्थ.. “
“सावकाश जा रे.. ! अर्थ तू ही सावकाश जा घरी.. “
“हो आजोबा, बाय ! “
स्मार्त आणि अर्थ घरी गेले तरी रावसाहेब बराचवेळ बाकावरच बसून होते.
सहा महिन्यांपूर्वी राधाबाई रावसाहेबांची अर्धांगिनी वारली. गावाकडे रावसाहेव एकटेच जगत होते. घरा-दारात सर्वत्र राधाबाईंच्या आठवणी वावरत होत्या. . त्या आठवणीसोबतच राहिलेले आयुष्य त्यांना काढायचे होते. मुलगा सोबत घेऊन जाण्यासाठी आला तेंव्हा त्यांना राधाबाईंच्या आठवणींनी भरलेले ते सोडून जायची इच्छा नव्हती पण त्यांचा मुलगा त्यांना तिथे एकटं सोडायला तयार नव्हता.
‘बाबा, आजवर खूप ऐकले तुमचे पण आता नाही. मी काही तुम्हाला एकटे सोडणार नाही इथं… तुम्हांला आमच्यासोबतच राहावे लागेल.’
असे मायेने, काळजीने निक्षून सांगून मुलाने त्यांना आपल्यासोबत आणलेले होते…
पदपथावरून चालता चालता नेहमीप्रमाणेच रावसाहेबांना मुलाचे वाक्य आठवले आणि ‘सोबत’ हा शब्द आठवताच त्यांच्या चेहऱ्यावर उदास हसू तरळुन गेले.
‘सोबत’ याचा अर्थ तरी कळतोय काय त्याला. . ? एकाच छताखाली राहणे म्हणजे सोबत नसते. . त्यांच्या मनात आले आणि त्यांना राधाबाईंची आठवण आली. राधाबाई म्हणाल्या असत्या, ‘अहो, काळ बदललाय.. त्यांचे सगळे राहणीमान बदललंय.. त्यांचे विचार, त्यांच्या सुखाच्या व्याख्या बदलल्यात.. आपण त्यांना समजून घ्यायला नको का?’
राधाबाईंचे दुसऱ्याला समजून घेणे हे नेहमीचेच होते. आधी सासू-सासऱ्यांच्या पिढीला समजून घेतले आणि नंतर सून-मुलाच्या पिढीला. मुलगा जेंव्हा त्याच्याच आयटी क्षेत्रातील मुलीशी लग्न करतो म्हणाला तेंव्हा रावसाहेबांना वाटले होते राधाबाई काहीसा विरोध करतील पण त्या मुलाला म्हणाल्या होत्या..
‘तुला करावेसे वाटतंय ना मग कर.. कधीतरी वर्षा-सहा महिन्यातून तिला घेऊन चार दिवस इकडे येत जा म्हणजे झाले. आपले गाव, आपले घर, आपली माणसे आपली वाटली पाहिजेत रे…!’ आणि नंतर रावसाहेबांना म्हणाल्या होत्या. ‘आपणच त्यांना समजून घ्यायला नको का?’
राधाबाईंचे सगळेच त्यांना पटत होते पण तरीही अलीकडे त्यांच्या मनात उलट सुलट विचार येत होते.
मुलगा हुशार होता. त्याने खूप शिकावे असे त्यांना वाटत होते. . त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलगा शिकला होता. इंजिनीअर झाला. स्वतःच्या पायावर उभा राहिला. आयटी क्षेत्रात नोकरीही करत होता. त्यांनी आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती एवढा मोठा पगार त्याला मिळत होता. या साऱ्याचा त्यांना खूप अभिमान होता. पण आज मात्र त्यांच्या मनात खूप वेगळे विचार येऊ लागले होते.. आपण त्याच्या मनात अशा मोठमोठ्या इच्छा, आकांक्षा पेरण्यात चूक तर केली नाही ना? आज मुलगा-सून जे जगतायत त्याला का जीवन म्हणायचे ? सकाळी जातात ते रात्री कधीही येतात, त्यातही येण्याची निश्चित अशी वेळ नाहीच. ‘दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी ! ‘म्हणतात तसे यांचे जीवन. एखाद्या मशीन सारखे नव्हे तर अलीकडे रोबोट का काय म्हणतात तसे ते जगतायत. . अगदीच यंत्रमानव होऊन गेलेत. . हे सारे आपल्या संस्काराचेच; खूप शिकावे, मोठे व्हावे या इच्छेचेच फळ आहे काय?
मुलाच्या लग्नानंतर त्याने टू बीएचके फ्लॅट घेतला तेंव्हा राधाबाई सुनेला म्हणाल्या होत्या. . ‘आता नातवंड खेळू दे आमच्या मांडीवर..’ तेंव्हा सून म्हणाली होती, ‘आई, आमचे ठरलंय, कमीतकमी नवा थ्री बीएचके फ्लॅट घेतल्याशिवाय मुलाचा विचार करायचा नाही.. त्याला सगळी सुखे द्यायची आहेत आम्हांला..’ एक स्वप्न पूर्ण झाले की त्याचा आनंद मिळवत राहण्याआधीच पुढच्या मोठ्या स्वप्नाकडे धावायला सुरवात करायची हे का जीवन आहे?
पस्तिशीला आले तरीही अजून मुलाचा विचारही करायला तयार नाहीत ते. . याला काय म्हणायचे?
गेल्या काही दिवसांच्या सवयीने रावसाहेब बागेत येऊन नेहमीच्या बाकावर येऊन बसले तरी त्यांच्या मनातील विचारांचे, आठवणींचे वादळ शमले नव्हते.
राधाबाई गेल्यानंतर ते मुलांसोबत आले होते पण त्यांचे एकाकीपण संपले नव्हते. इथं मुलगा आणि सून स्वतःच्या नोकरीत एवढे व्यस्त होते की त्यांना एकमेकांशी बोलालयलाही वेळ मिळत नव्हता. एखाद्या धर्मशाळेत अनोळखी पांथस्थ मुक्कामाला उतरावेत आणि त्यांच्या जेवढे आणि जसे बोलणे व्हावे तसे किंबहुना त्याहूनही कमीच बोलणे एकमेकांत होत होते. . निवांत बसून एकमेकांशी गप्पा मारणे हा प्रकारच नव्हता. गावाकडे आयुष्य घालवलेल्या रावसाहेबांना ते प्रकर्षाने जाणवत होते, त्या साऱ्याची उणीव जाणवत होती. तशी मुलगा-सून अगदी आपुलकीने, आपलेपणाने जाता येत त्यांची चौकशी करीत होते, त्यांना हवे-नको ते पाहत होते, नाही असे नाही पण गावाकडल्यांसारखा मोकळा वेळ त्यांच्याकडे नव्हता आणि रावसाहेबांकडे न सरणारा मोकळा वेळच वेळ होता. गावाकडे समोरून जाणा-येणारा कितीही घाई-गडबडीत असला तरी हटकून थांबतो. . हाक मारून दोन शब्द बोलून मगच पुढे जातो. . तसला काही प्रकार इथे नव्हता आणि या साऱ्यामुळेच रावसाहेबांचे मन इथं रुजलेंच नव्हते. . त्यांच्या सोबत इथं येऊनही ते काही दिवसातच गावाकडे परतले होते.
गेल्या काही वर्षात आधीच अनोळखी व्यक्तीबद्दल माणसाच्या मनात काहीशी साशंकता निर्माण केली होती. . कोरोनाने ओळखीच्या व्यक्तीबाबतही साशंकता निर्माण केली. घरांच्या दारे-खिडक्याआधीच मनांच्या दारे-खिडक्या बंद झाल्या. घरात ही सुरक्षित अंतर पाहिले जाऊ लागले. अपवाद वगळता माणसाची स्वयं-केंद्रितता वाढली. कोरोनाने सारे जनजीवनच उध्वस्त करून टाकले होते.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बऱ्याचअंशी सुरळीत होता पण तरीही भविष्यातील अनिश्चितता मनाला ग्रासत राहिल्याने संग्राहक वृत्ती वाढली होती. सारी कामे ठप्प झाल्याने हातावरती पोट असणाऱ्यांची उपासमार सुरू झाली होती. . मदतीचे हात होते पण ते ही कमी पडत होते. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठं कुठं आणि कसे लावायचे? असे वाटण्यासारखी सारी परिस्थिती निर्माण झाली होती.
काळजी घेणे आणि काळजी करणे हातात हात घालून क्षणोक्षणी प्रवास करत होते. कुणी काही सांगत होते, कुणी काही सुचवत होते.. सूचनांचा तर भडिमार चाललेला होता.. काही पटत होते, काही पटत नव्हते तरीही सारे भीतीपोटी अमलात आणले जात होते. . अवघ्या भवतालात अशाश्वततेचे भय दाटून राहिलेले होते. कोरोना झालाय या भीतीनेच माणसाचे धैर्य खच्ची होत होते.. अचानक अकल्पित बातम्या येत होत्या.. असे काही होईल असे ध्यानी-मनी नसताना नात्यातील, परिचितांतील, माहितीतील व्यक्ती कोरोनाने जग सोडून जात होत्या. हे धक्के पचवणे ही अतिशय अवघड होत होते. फक्त दुरध्वनीनेच दुरच्याच नव्हे तर जवळपासच्या, रोज भेटणाऱ्या शेजारच्याशीही संपर्क होत होता. संवाद होत होता नाही असे नाही पण मन भरत नव्हते. खरंतर व्यक्ती व्यक्तीकडे मोबाईल आल्यापासून चार पावलांवरील शेजाऱ्यांशीही आवर्जून समक्ष भेटणे बऱ्याचअंशी कमीच झालेले होते पण कोरोनामुळे निर्बंध आल्यावर मात्र ती जाणीव आणि प्रत्यक्ष भेटायची, जाण्या-येण्याची उर्मी वाढली होती.
इतरवेळी चार चार दिवस फोन न करणारा मुलगा आणि सून कोरोनाची साथ आल्यापासून आणि प्रामुख्याने निर्बंध लागू झाल्यापासून रोज एकदा, कधीकधी दोनदाही फोन करून रावसाहेबांची आणि राधाबाईंशी चौकशी करीत होते. त्यामुळे त्या दोघांनाही त्यांची ख्याली-खुशाली कळत होती.
कधी कधी रावसाहेबांच्या मनाला प्रश्न पडायचा… ‘कोरोनामुळे, निर्बंधांमुळे माणसे दुरावली की जवळ आली? मुलाच्या अपार्टमेंट मध्ये कोरोनाचे पेशंट सापडले.. अपार्टमेंट सील केले गेले. हे कळल्यापासून रावसाहेबांना आणि राधाबाईंना मुलाची आणि सुनेची जास्तच काळजी वाटू लागली होती. दिवसातून एकदा होणारा फोन दोनदा, तीनदा होऊ लागला होता.
दिवस पुढे सरकत होते. . वृत्तपत्रे, टीव्ही सगळीकडे कोरोनाच्याच बातम्या. माणसाच्या मनामधील भीती अधिकाधिक वाढत होती. रावसाहेब आणि राधाबाईंचे स्वतःच्या मनातील भीती लपवत दुसऱ्याला धीर देणे चालू होते. एकेदिवशी राधाबाईंना किंचितसा ताप आला पण त्यांनी ते रावसाहेबांना कळू दिले नाही. एकट्याच मनातील नाना शंका-कुशंकांना तोंड देत वावरत होत्या., दुसऱ्या दिवशी ताप वाढला आणि खोकला ही येऊ लागला तेंव्हा रावसाहेबांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी गावातल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरनी नेहमीच्याच स्वरात ‘ काही काळजी करण्यासारखे नाही. . हवामान बदलाचा परिणाम असणार. . पण आपल्या मनात शंका नको म्हणून कोरोनाची टेस्ट करूया. . ‘ असे धीर देत सांगितले. रावसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली पण त्यांनी राधाबाईंना धीर देत साथ आहे म्हणून टेस्ट करूया म्हणून सांगितले. ‘ डॉक्टरनी फोनवरूनच पाठवलेली औषधांची यादी औषधाच्या दुकानातून घरपोच मागवली.
राधाबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टमध्ये निष्पन्न झाले. तालुक्याच्या कोविड सेंटरची अँब्युलन्स त्यांना घेऊन गेली. जाताना राधाबाईंच्या मनावरचे दडपण चेहऱ्यावरती दिसत होते. रावसाहेब त्यांना धीर देत होते. आपलीही टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी होती असे रावसाहेबांना वाटले. . इतर कोणता आजार असता तर बरे झाले असते दवाखान्यात सोबत तरी जाता आले असते, राहता आले असते असे रावसाहेबांना वाटत होते. दोन दिवसातच राधाबाई गेल्या. रावसाहेबांना कळवण्यात आले. मुलाला कळवले पण त्याला येता आले नाही. रावसाहेबांनाही अंत्यदर्शन मिळाले नाही. फक्त त्यांना दूर अंतरावर उपस्थित राहता आले. राधाबाईंच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. रावसाहेब एकाकी झाले, सुन्न झाले. मुलाचा फोन येत होता पण कुणी कुणाचे आणि कोणत्या शब्दांत सांत्वन करायचे? गावातील लोक, शेजारी भले होते. . पण आजारच असला प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारा. . रावसाहेबांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह होती तरी ते आपल्यापासून कुणाला त्रास नको म्हणून दूर रहात होते. शेजारी आले तरी खिडकीतून बोलत होते. शेजारी मात्र त्यांची काळजी घेत होते. चहा- नाश्ता, जेवण देत होते. रावसाहेब एकाकी जगत होते. . काळ जाईल तसे सावरले जात होते.
विशेष बाब म्हणून काही अटींवर पोलीस खात्याकडून प्रवास करायला परवानगी द्यायला सुरुवात झाली. तेंव्हा मात्र तशी परवानगी काढून मुलगा आला आणि रावसाहेबांना घेऊन गेला. . हळूहळू कोरोनाची साथ आटोक्यात आली. निर्बंध शिथिल होत जनजीवन सामान्य होऊ लागले तरीही प्रत्येकाच्या मनात नकळत काहीशी भीती होतीच पण काहींनी आपल्या स्वकीयांना गमावले होते. . त्याचे दुःख त्यांना होतेच पण सर्वत्र बंधमुक्ततेचा आनंद आणि उत्साह होता. कोरोनाच्या या महाभयंकर वाटणाऱ्या साथीतही आपण सहीसलामत राहिलो, वाचलो. . याचा अनेकांना आनंद झाला होता.
रावसाहेब निवृत्त होऊन फंड-ग्रॅज्युईटीची रक्कम मिळून, निवृत्तिवेतन सुरू होईपर्यंत वर्ष कसे सरले हे समजलेच नाही. निवृत्तीनंतरही सारी कामे सुरळीत पार पडली तसे रावसाहेब, राधाबाई निवांत झाले. त्यांनी मुलाशी चर्चा करून एका चांगल्या यात्राकंपपनीची एक महिन्यानंतर निघणारी उत्तर भारताची सहल निवडली. त्याचे पैसे भरले. दोघेही रोज निवांत वेळी सहलीचीच चर्चा करू लागले. राधाबाईंनी तर सहलीची तयारीही सुरू करायला घेतली तसे रावसाहेब हसले.
” अगं, अजून जवळजवळ महिना आहे. आत्तापासून काय तयारी करतेस? आदल्यादिवशी बॅग भरायची आणि निघायचे. . “
” तुम्ही बॅग भरणार, ? उजेड. . अहो, एकदोन दिवसासाठी तुम्ही कुठं जाणार असला तरी अजूनही मला बॅग भरून हातात द्यावी लागते. . “
राधाबाई हसत म्हणाल्या,
” तू कधी काही करू दिलंयस का मला. . ? तू आल्यापासून सवयच नाही राहिलेली काही काम करायची…नुसता लाडाऊन ठेवले आहेस मला?”
” कशाला काय करू द्यायचे तुम्हांला? एक काम धड कराल तर शप्पथ ! तेच काम मला दुसऱ्यांदा करावे लागणार असेल तर मग तुम्हांला करायला सांगूनही काय फायदा. . त्यापेक्षा आधीच मी केलेलं बरे नाही का? “
खाली मान घालून काम करत करता राधाबाई म्हणाल्या आणि त्यांनी रावसाहेबांकडे पाहिले. . ते काहीसे गंभीर झाल्यासारखे दिसले तसे त्या हसत हसत म्हणाल्या, उगा माझ्या लाडोबाला कशाला त्रास? “
आणि रावसाहेबांकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाल्या,
” हो की नाही रे लाडोबा. . ?”
रावसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू तरळले. आपण बोलता बोलता नवऱ्याला एकेरी बोललो हे जाणवताच राधाबाईंनी जीभ चावली.
” हळूच. . नाहीतर मला आळणी खावे लागेल? “
” म्हणजे? “
मध्येच आळणी खाण्याचा विषय रावसाहेबांनी कुठून काढला? हे न समजून राधाबाईंनी विचारले.
” अगं, जीभ जोरात चावलीस तर तुझ्या तोंडाला तिखट लागू देणार नाही पण त्याची शिक्षा बिचाऱ्या माझ्या जिभेला नाही का मिळणार? “
आपण नकळत एकेरी बोलून गेलो ते रावसाहेबांच्याही लक्षात आलंय हे पाहून राधाबाईनी लाजून खाली मान घातली. त्यांचे लाजणे पाहून रावसाहेब सुखावले. . क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिले. . रावसाहेब गप्प झाल्याचे पाहून राधाबाईंनी चमकून वर पाहिले तर रावसाहेबांच्या डोळ्यांत मिश्किलता तरळत होती. . राधाबाई पाहतायत हे पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,
” तशीही तुझी चव जिभेला आवडतेच माझ्या. . आता इतकी वर्षे झाली पण आवड काही कमी झालेली नाही. . . . “
” अगं, चावटपणा काय केला मी. . . तुझ्या हातच्या जेवणाबद्दल म्हणतोय. “
” कळलं हं कळलं. . कहीपे निगाहे. . आणि तुम्हांला मी काही आज ओळखत नाही म्हणलं. बस झाल्या गप्पा. आता जावा बघू आत. काल वाचनालयातून आणलेलं पुस्तक तुमची वाट बघत असेल. मला माझी कामे करू देत जरा. . ”
रावसाहेब हसत हसत बाहेरच्या खोलीत गेले. पाठमोऱ्या रावसाहेबांकडे पाहत राधाबाईंच्या मनात आले. . ‘ अजूनही यांच्यात खोडकर, खेळकर बालक लपलेला आहे… असा नवरा मला मिळालाय ते माझे भाग्यच…’
सहलीला जायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला तसे राधाबाईंच्या मनातील अवस्थता वाढत चालली होती. कधी अशा दूरच्या आणि इतक्या दिवसांच्या सहलीला त्या गेल्याच नव्हत्या. ‘सहल नीट पार पडेल ना?’ त्यांना उगाचच धाकधूक लागून राहिली होती. रावसाहेबांना ते जाणवले तसे ते म्हणाले,
” अगं, तुझी खूप इच्छा होती ना सहलीला जायची. आजवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जायला कधी जमलंच नाही. आता जमतंय, निघालोय तर त्याचा आनंद होण्याऐवजी तू तर काळजीच करत बसलीयस. . “
” तसे नव्हे हो. . “
” अगं, आपण दोघेच का निघालोय काळजी वाटायला. यात्रा कंपनीतून जातोय, खूप लोक असतात. . अगदी ऐंशीच्या घरातलेही असतात… उगा नको काही विचार करुस.. तिथे यात्रेकरूंची काळजी घेणारे कंपनीचे लोकही असतात. . काळजी सोड आणि आपल्याला जायला मिळतंय, आपण जातोय याचा आनंद घे. “
” तरी पण…”
” राधे, आता हे काय वय आहे का गं ‘पण’ लावायचं? जेव्हा ‘पण’ लावायचा तेंव्हा बिनबोभाट प्रेमाने माळ घातलीस. . . . हां पण तेव्हा तुझा कोणताही ‘पण ‘ असता तर मी जिंकलोच असतो बरं का?. . “
रावसाहेब हसत म्हणाले तसे राधाबाई काहीशा खुलल्या आणि निर्धास्त झाल्या. किती दिवसांनी त्यांनी ‘ राधे ‘ म्हणून संबोधले होते. त्यांचे ते’राधे’ ऐकून त्यांना पूर्वीचे दिवस आठवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मित झळकले. राधाबाई खुललेल्या पाहून रावसाहेबांना बरे वाटले.
सहलीची सारी तयारी झाली होती. . चारपाच दिवसांनी पुण्याला जायचे आणि तिथून यात्राकंपनीसोबत उत्तर भारताची यात्रा. मन प्रसन्न झाले होते. कितीक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार होते. तशा काही दिवसांपासून कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पण भारतातील जनजीवन सुरळीत होते. शेजारचा बंडू दहावीच्या परीक्षेला बसला होता. रोज पेपरला जाण्याआधी तो नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला यायचा. राधाबाई जाताना त्याच्या हातावर दहीसाखर ठेऊन आशीर्वाद द्यायच्या. त्याचा शेवटचा भूगोलाचा पेपर. राधाबाईंनी वाटीत दहीसाखर तयारच ठेवले होते. रावसाहेब त्याची हॉल मध्ये वाटच पाहत होते. बंडूची येण्याची रोजची वेळ टळून गेली तसे दोघेही अस्वस्थ झाले. ‘ का आला नाही बंडू अजून? ‘ दोघांच्याही मनाला काळजी पोखरू लागली.
” अहो, बंडू का आला नाही अजून? त्याचा आज शेवटचा पेपर आहे. जरा हाक मारून बघता का? “
रावसाहेबांनी बंडूला हाक मारली तसे त्याचे बाबाच बाहेर आले. रावसाहेबांनी बंडू न आल्याबद्दल विचारताच ते म्हणाले,
” अहो काका, त्याचा पेपर रद्द झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालंय. बातम्या ऐकल्या नाहीत वाटते तुम्ही? अहो सगळेच बंद. बाहेर पडायचेच नाही घरातून. कोरोनाचे पेशंट वाढायला लागलेत. “
बराच वेळ बंडूचे बाबा माहिती सांगत होते. रावसाहेब, राधाबाई अस्वस्थ होऊन सारे ऐकत होते.
नेमकं काय झालंय? नेमकं काय घडतंय? काहीच समजत नव्हते. एक प्रकारची अस्थिरता, स्तब्धता, अनिश्चितता आणि अनामिक भय जगण्याला ग्रासून गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले. सारेच व्यवहार, व्यापार बंद होते. अत्यावश्यक कारण वगळता घरातून बाहेर पडायला बंदी होती. सारे जनजीवनच ठप्प झाले होते.