मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

मन रिचार्ज – रिचार्ज !! – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.

रविवार…निवांत, आरामाचा दिवस…आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. 

सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज ‘लो बॅटरी’..

चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे…?? काय करावे तेच सुचेना…

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”

“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.

“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतोस ,इतके त्याला जपतोस .. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”

—- पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

“मनाचे चार्जिंग ?? हे काय नवीन.???”

“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, ॲप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतु, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते, ते मनाकडे.”

“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलांच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.

 माझे धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरंतर वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली. 

किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.

बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.

एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!” 

“दोस्ता…” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.

क्लासवरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार ?” 

“नको..तू हरलास तर मला बरे वाटणार नाही..”

“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”

बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.

मुलाने स्पोर्टींगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.

आता काय करायचे…?

अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली.

“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले. बॅगमध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पेटारा उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!

आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मुलं जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात… अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वत:चे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो. 

चटकन आरशात पाहिले.

“अरे..! फारसा फरक पडला नाही”. 

उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली. तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते. बराच वेळ पाहत राहिलो.

मन गलबलून आले .खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.

काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले ,’कसं असतं ना आपलं मन..?

अचानक आनंदून जाते..क्षणात गहिवरते, हळवे होते..

एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.’

—या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.

“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”

“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”

समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”

मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो.  त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.

लग्न पुन्हा एन्जॉय केलं.

“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचास तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेलास . उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”—डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.

“ थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अॅम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो. आपण मोठे झालो की मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरतो . रुटीन सोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे ,कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”

“ मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

“ चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो ” 

—बायकोला जोरात ठसका लागला.

“ मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय ” बायकोने चिमटा काढलाच….. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

(मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.) इथून पुढे —-

मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी।  पण फँक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फँक्टरीच्या प्राँडक्ट्सची ,त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगबद्ल  तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती.

जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता.त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा,तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी, हे सर्व पाहून मी खूप  भारावून गेलो होतो.

“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते”. 

मी होकारार्थी मान हलवली.

ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला.मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना.  म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पँसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा ! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा.एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो गोड वाटत होता.मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला. तेवढ्यात ती आली.

“रडत होता वाटतं!” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.

थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हाला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.

“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो.तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय” तिनं स्पष्टीकरण दिलं.

सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो.

एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.

“घरी कोणकोण असतं?” तिनं अचानक प्रश्न केला.

” मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीय”

“म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे”. 

“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार?”

तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली.बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मँनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना एसएमएस करते”. 

मी नाव सांगितलं।  तिनं एसएमएस केला.

“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून”

“संजना कोण?” मी विचारलं

"मीच। माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.

” थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी”

” सॉरी ?कशाबद्दल?” तिनं आश्चर्याने विचारलं

“काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो.मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात ,एका मुलाची आई आहात.माझी चूक झाली.आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर देट”

तीनं हलकसं स्मित केलं. म्हणाली.” फरगेट इट.अशा नजरांची मला सवय आहे.स्वतःची बायको सुंदर असतांना दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमँरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते”

थोडं थांबून ती म्हणाली, “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहिजेत. खरं ना?”

” नाही नाही” मी घाईघाईने म्हणालो. ” अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढेन”.  तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.

नागपूर आलं. मी खाली उतरलो.तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली.निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले.तो लगेच माझ्याकडे झेपावला.मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले.मग त्याला तिच्याकडे दिलं.रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.

“बेस्ट आँफ लक फाँर युवर इंटरव्ह्यू” ती म्हणाली.

“थँक्स” 

जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.

इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशे साठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली.त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.

संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही.पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच.  पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खूप चांगली शिकवणही देऊन गेली.

समाप्त 

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अदृश्य लेबल – भाग – 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ अदृश्य लेबल – भाग – 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

 माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले. ………) – आता पुढे 

 त्या एका प्रसंगाने माझ्या गाडीने नाही तर माझ्या डोक्यातल्या  विचारांनी आता प्रचंड वेग घेतला होता. खरं तर मी घरून उशिरा निघून दुकानांत वेळेवर पोचायचा अट्टाहास करत होतो. जरा उशीर झाला असता म्हणून खूप काही मोठे नुकसान किंवा कोणाला दिलेला शब्द मोडणार नव्हता. घरातून उशिरा निघणे ही माझी चूक होती. पण कारण नसतांना मी त्याचे उट्टे, हे त्या पुढच्या गाडीवर काढत होतो आणि महत्वाचे म्हणजे पुढचा गाडीवाला गाडी हळू  चालवत असेल तर प्रत्येकानी त्याचे कारण गाडीच्या मागे लिहिणे खरंच गरजेचे आहे का ? का मी माझा सोशिकपणा दाखवून जरा धीराने विचार करू शकत नाही ?  आजच्या घडीला घरातून बाहेर पडणारा, कामाला जाणारा, रोज कमाईला निघणारा प्रत्येक माणूस काही ना काही दडपणाखाली असतो. प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार घोळत असतात. कोणाची नोकरी गेलेली असते, तर कोणीतरी कॅन्सरसारख्या महाआजाराशी लढत असतात. कोणीतरी कोर्टातल्या भावनिक अशा घटस्फोटाच्या विचारात अडकलेला असतो, तर कोणीतरी आपला जवळचा प्रेमाचा माणूस गमावलेला असतो. कोणीतरी  त्याच्या धंद्यातल्या मोठ्या नुकसानाशी लढत असतो, तर कोणीतरी विजेच्या बिलाचे पैसे आजच्या शेवटच्या तारखेला कुठून आणू ह्या विचारात असतो. प्रत्येकजण आज आपल्या आव्हानात्मक आयुष्याबरोबर लढत असतो. कोणाच्याही चेहऱ्यावर त्याच्या मनात काय चाललंय, तो आज परिस्थितीशी कसा लढतोय, सुखाने सोडा पण समाधानाने जगण्यासाठी तो कुठच्या मनस्थितीत आहे ह्याचे लेबल लावलेले नसते, तसे त्याच्या कपाळावर लिहिलेले नसते. अशा वेळेला आज प्रत्येकाने एकमेकांना सोशिकतेने, धीराने बघितले पाहिजे. आज प्रत्येकाने फक्त आपल्याच समस्या, आपल्याच अडचणींचा विचार न करता समोरचाही काही अडचणीत आणि समस्येला सामोरे जात असेल हा विचार करून त्याचा आदर केला पाहिजे. माझीच समस्या मोठी आणि माझ्यापेक्षा मोठी समस्या दुसऱ्या कोणालाच नाही असा समज करून घेणे योग्य नाही.

प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करून धीराने थोडी सहनशीलता, सोशिकपणा आणि सबुरीने घेतले पाहिजे. महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपल्यासमोर आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा मान राखला पाहिजे. प्रत्येकाने ते अदृश्य लेबल वाचायची आपली क्षमता वाढवली पाहिजे, तरच आपल्याही कपाळावर लिहिलेल्या अदृश्य लेबलचा दुसरे मान  राखतील.

चांगल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन अदृश्य लेबल नेहमीच असतात. एक सहनशीलता आणि दुसरे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दुसऱ्यांना दिसून देत नाही आणि सहनशीलता त्याचे प्रश्न कमी करते.

चला प्रत्येकाच्या कपाळावरील अदृश्य लेबल वाचायचा प्रयत्न तरी करूया आणि त्याचा आदरही करूया.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

०१-०५-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतोे.रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.

नाशिक आलं तसा एक देखणा तरुण ब्यागा घेऊन आत चढला.माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली.तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली.तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !

“कुठं जाताय?”तो तरुण मला विचारत होता.

“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.

” थोडं लक्ष ठेवाल का?मिसेस गोंदीयाला जातेय.एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे” 

तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.

” हो ठेवेन की.त्यात काय विशेष!”

मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली.गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं.समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली.माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती.खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती.मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या.त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती.तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते.विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती.माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती.बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे.पण तीची फिगर अतिशय सुरेख होती.मनात विचार आला,स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का?की हिच्यापेक्षा जास्त?नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.

मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो.ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती.मुलाला बाटलीने दुध पाजतांना,त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.

एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं.तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली.नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती.पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा,भडकपणा नव्हता.घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती.काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं.ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा  तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती.

मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.

आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो.भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा.तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.

“या जेवायला”

अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम  गडबडून गेलो.

” मी आताच जेवलो बघा”

ती सौम्य हसली. मग म्हणाली

” हो पाहिलं मी.हे स्वीट तरी घ्या” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली.मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.

” नागपूरला रहाता?”

तिनं जेवता जेवता विचारलं.

“नाही.इंटरव्ह्यूला चाललोय”

” कोणत्या कंपनीत?”

मी कंपनीचं नाव सांगितलं.

“इंजीनियर आहात?”

“हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये” मी जरा अभिमानानेच सागितलं.

“मी सुध्दा इंजीनियर आहे”ती म्हणाली.”एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”

मी वरमलो.माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.

” मग जाँब करताय कुठे?”मी विचारलं

” नाही.करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं.”

” मिस्टर काय करतात तुमचे?”मी थोडं इर्ष्येने विचारलं.

” ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात.” 

” फँक्टरीज?”

” हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे,मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “

बापरे!मी गार झालो.एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो.तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो.माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील.तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती.कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.

” तुम्ही एकट्याच जाताय?नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?”

एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं

“का? कशासाठी?नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं.गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच.एका रात्रीचा तर प्रश्न होता.तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत.त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं “

” तरीपण कुणीतरी..….”

“अहो मागच्या महिन्यात  मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले,आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला.हा तर आपला महाराष्ट्र आहे.इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो.बाई मोठी धीट दिसत होती.

क्रमशः…

© श्री दीपक तांबोळी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-4☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागत आपण पाहिले,- ‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’  ‘नको. गावाकडची  दोघे-तिघे  आहेत.’ आता इथून पुढे )

ती आनंदाला सोडून गेली. तिला यायला दुपारचे तीन वाजले होते. नंतर तिने आंघोळ केली. मी दिलेली साडी नेसली. तिला जेवायला वाढलं. त्याक्षणी जीवनातील तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्याप्रमाणे,  ती एकेक घास मनापासून खाऊ लागली.

जेवण झाल्यावर तिला विचारलं,  ‘असं कसं झालं?’

ती म्हणाली, ‘रात्री दारूच्या नशेत गवताच्या गंजीवर जाऊन झोपला. झोपेत कधी तरी साप चावला. ओरडलासुद्धा  नाही. सकाळी  बघितलं तर काळा-निळा पडलेला. झोपण्यासाठी खाट आणायला  दोनदा पैसे साठवले होते. दोन्ही वेळा दारूत उडवले.’

मी  म्हंटलं,  ‘आता कसं  करणार?  डोंगराएवढं आयुष्य पुढे पडलय….’

‘मी  कष्टांना  घाबरत  नाही.’  मग जरा घुटमळली मग म्हणाली,  ‘मला थोडं  बोलायचय. आनंदाचं शाळेत जायचं वय झालय. त्याला तुमच्याकडे  ठेवू का? तुमच्याकडे  राहिला,  की चांगला शिकेल.  फुकट ठेवणार नाही. त्याच्या खर्चाची पै न पै मी देईन. मुलाला पोसायला माझे हात समर्थ आहेत. शे-सव्वाशे तरी दुध्या कोहळ्याचेच होतील. शिवाय भाजीपाला आहे. एखादी गाय पाळीन. म्हणजे दुभतं होईल. थोडं घरात. थोडं विकायला. माझ्या आनंदानं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, असं वाटतय मला. तसंही तो असता, तरी मी आनंदाला इथेच ठेवायचं ठरवलं होतं. त्याच्या सावलीत मला माझ्या मुलाला मुळीच वाढू द्यायचं नव्हतं.’

मग पुढे म्हणाली, ‘गावात तूर मका उगवेन. पेरू,  डाळिंबाची लागवड करेन. गावातील घर-शेत संभाळेन आणि इथे तुमचं अंगण, परसूही बघेन. साफ-सूफ करेन. फुला-फळांची रोपे लावेन.’

मी मुग्ध होऊन ऐकत राहिले. तिच्या बोलण्यातली जादू मला संमोहित करत होती. मला घरातले हंडे-कळशा झळझळलेल्या दिसू लागल्या. मागच्या बाजूच्या मुलूल पडलेल्या लिंबा-डाळिंबाच्या डहाळ्या टवटवित झाल्या. अंगणात चारी बाजूंनी पांढर्या  पिवळ्या फुलांच्या वेलींवर फुलांचे झुबके झुलू लागले.

मी म्हंटलं,  ‘हे घर तू आपलंच घर समज. तुझ्या मुलाला इथे कष्ट होणार नाहीत.’

ती थोडी थांबली. नंतर एखाद्या दु:स्वप्नातून मुक्त होत असल्यासारखी म्हणाली,

‘कुणाला आवडणारी लाजरी,  नखरेल कटाक्ष टाकणारी सुंदर पत्नी होणं, माझ्या आवाक्यात नव्हतं. हा देह,  हे रूप माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाधा होती. पण चांगली आई होऊन दाखवणं, तर माझ्या हातात आहे ना?  आई-मुलामध्ये कुरुप शरीर कधीच बाधा आणत नाही. हा मोठ्ठाच फरक आहे मर्द आणि मुलगा यात!’

तिचा सहा वर्षाचा मुलगा कधीपासून बावचळून आईच्या पदराला चिकटून उभा होता.

‘निघते….’ तिने मुलाचं बोट धरलं. ‘घराचं छप्पर मोडलय. ते दुरुस्त करायचय. दुसर्या् नांगराची व्यवस्था करायला हवी. ‘

ती गेली. दूरवर जात दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्या पाठमोर्याो  आकृतीकडे पहात राहिले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.)

पुढे आणखी काही दिवसांनी आणखी काही बातम्या आल्या. याच्या विपरितशा. मामाला दारूचं व्यसन लागलय. पैसे हाती आले, की नशापाणी करतो. पैसे नाही मिळाले, तर घरातल्या हाताला लागतील त्या वस्तू विकतो. तिने आपला कोल्हापूरी साज विकून नांगर आणला, तर मामाने पुन्हा तो नांगर विकून टाकला. कारण विचारलं, तर बाळंतपणाचा खर्च कुठून करायचा म्हणाला.

तिला मुलगा झाला. तिच्यासारखा नव्हे. मामासारखा गव्हाळी वर्णाचा. गोंडस. तो तिचा आनंद होता. तिचं सुखनिधान होतं. तिने मुलाचं नाव आनंद ठेवलं. मामाला असं झालं होतं, की ती कधी एकदा बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर येते आणि नेहमीसारखी विहिरीवरून पाणी आणणं, शेतात खपणं वगैरे कामे करते. रोजच्या रोज विहिरीतून कोण पाणी ओढणार? आपल्याच्यानं नाही होणार!

दहा दिवस सरले आणि तिने बाळंतिणीची खोली सोडली. ती पुन्हा कामाला लागली. घरात-शेतात राबू लागली. काटकी काटकी जोडून संसार बांधू लागली. शेतात पीक उभं राहिलं. लोक मामालाम्हणाले, ‘सगळं बायको करतेय. तू निदान राखण तरी कर. ‘ तो रात्रीचा राखणीला गेला. दारूचा अंमल जरा जास्तच झाला होता. मचाणावर आडवा पडला. रात्री चोरांनी उभं पीक कापून नेलं. याला जाग आली नाही. नंतर एकदा कोहाळे काढून ढीग लावून ठेवला होता. रात्री रानांजरं आली. कोहाळ्यांचा सत्यानाश झाला. हा दारूच्या नशेत.

मामाचं दारूचं व्यसन आता खूपच वाढलं होतं. ती काटकी काटकी जोडत होती. तो मोडून खात होता. अशातच तिचा आनंद वाढत होता. आता तो रांगायला लागला होता. ती एकदा विहिरवर धुणं धुवयला गेली. तिथेच असलेल्या सदाला त्याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणून सांगून गेली. ती धुणं धुवून येते, तर आनंदाने रांगत जाऊन चुलीतल्या गरम राखेत हात घातला. चटका बसताच रडायला लागला. सदा तिथेच, पण दारूच्या अमलाखाली. आनंदला जाऊन उचलणं, त्याला सुधारलं नाही. पुढे त्याला शहरातल्या दवाखान्यात नेऊन औषधपाणी करावं लागलं. आता तिने आनंदच्या बाबतीत त्याच्यावर विसंबणं सोडून दिलं.

दिवसामागून दिवस, रात्रीमागून रात्री, दिवस, महिने, वर्षं सरत होती. आमच्या घरातली मुलेही कुणी शिकण्यासाठी, कुणी नोकरीधंद्यासाठी शहरगावी जाऊन स्थिरावली. इथे आम्ही चार-सहा जणच उरलो. सगळ्या गावची अशीच तर्हार.

एक दिवस सुनुमामी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला हाताशी धरून माझ्या दारात उभी राहिली.

‘सुनुमामी तू?… आणि मामा कुठाय?’ तिने गल्लीच्या तोडाशी उभ्या असलेल्या हातगाडीकडे बोट दाखवलं. त्यावर मामाचं प्रेत बांधलं होतं. तिथे आणखी दोघे-तिघे उभे होते.

‘म्हणजे मामा…’ मी न बोललेले शब्द जसे तिने ऐकले.

‘तो जिवंत होता कधी?’ प्रश्नाचं उत्तर तिच्या डोळ्यात होतं.

इथपर्यंत याला घेऊन आले. इथून पुढे नेणं काही शक्य नाही. आनंदाला इथे ठेवते. मला यायला दोन-तीन तास तरी लागतील.’

‘तुला आणखी काही माणसे देते बरोबर!’

‘नको. गावाकडची दोघे-तिघे आहेत.’

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – या घरात आपला नवरा आणि आपण अश्रित आहोत, याची जाणीव तिला घरी आल्या आल्या दोन दिवसातच झाली होती. आता इथून पुढे)

एक दिवस गावाकडून निरोप आला,  सुनुमामीचे वडील अत्यावस्थआहेत. ती गावी जायला निघाली. आण्णा सदाला म्हणाले,  ‘तूही जा.’

‘मी जाऊन काय करणार?’

‘जे तिथे जाऊन करावं लागेल,  ते करायचं.’

सुनुमामीने पिशवी भरली. रोजच्या नेसायच्या दोन साड्या,  सदामामानं  अरेबियन नाईट्सचं पुस्तक पिशवीत टाकलं. सुनुमामीचे वडील तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. तिला बघण्यासाठी,  भेटण्यासाठीच जणू त्यांनी आपल्या कुडीत प्राण राखून ठेवले होते. सुनु आली. त्यांनी तिच्या डोक्यावरून, अंगावरून हात फिरवला. सुनु त्यांना थोपटत राहिली. हळूहळू त्यांचा श्वास कमी होत होत एका क्षणी थांबला. सुनुच्या डोळ्यातून जसा पाऊस सांडला. पण थोड्या वेळाने तिने स्वत:ला सावरले. शेजारी-पाजारी आधीपासूनच जमले होते. त्यांनी पुढची व्यवस्था केली.    

सुनुने स्वत:च वडलांना अग्नी दिला. मामा मात्र  त्याचा कशाशीच संबंध नसल्यासारखा बसून होता. दुसर्या: दिवशी घरी निघून गेला. सुनुमामी सगळे दिवस वगैरे यथासांग करून घरी परत आली. त्या पूर्वी तलाठ्याकडे जाऊन घर, जमिनीला आपलं नाव लावून आली. एका शेतकर्या.ला आपली जमीन अर्धुलीनं करायला देऊन आली.

दिवस सरत होते. एक दिवस माझी मुलगी मंजू म्हणाली, ‘आई, सुनुमामीच्या साड्या किती  विरल्यात  बघ.’ माझ्याही लक्षात आलंच होतं आणि दोन घरात  नेसायच्या बर्या  साड्या काढून ठेवाव्या असं म्हणत होते. एव्हाना कापणीचा हंगाम आला होता. सुनुमामी म्हणाली,  ‘चार दिवस गावाकडे जाऊन येते.’ तिच्या शेतात ज्वारीची मळणी चालू होती. आपल्या देखरेखीखाली तिने निम्मी ज्वारी घरात टाकायला लावली. एक पोतंभर ज्वारी भरून बाजूला ठेवली. गावात गुर्हाहळं लागली होती. गूळ करणं चालू होतं. एकाला ज्वारी देऊन बदल्यात गुळाची ढेप आणली. एकाला ज्वारी देऊन बदल्यात शेंगांचं पोतं घेतलं. बाकीची ज्वारी जयराम वाण्याला विकली. त्यातून स्वत:साठी दोन फिक्या रंगाच्या नाजुक फुलांचे  डिझाईन असलेल्या वायल घेतल्या. दोन पोलकी शिवून घेतली. दोन परकर आणले. मामासाठी दोन पायजमे,  कुडते, एक टेरिलीनची पॅंट बुशशर्ट घेतला. गाडी केली आणि सगळं घेऊन घरी आली. शेंगा, गूळ पाहून पोरं खूश. मामाने कपडे पुन्हा पुन्हा पारखून बघितले. ‘हं! बरय कापड!’ तो उद्गारला.

असेच आणखी काही दिवस गेले आणि तिच्या लक्षात आलं,  आपल्याला काही तरी होतय. एक नवा जीव तिच्या पोटात अंकुरत होता. ती खुशालली. घरात बाया-बापड्यांची मात्र बडबड सुरु झाली. ‘ आता हीचं बाळंतपण,  सेवा-सुश्रुषा,  खाणारी तोंडं दोनाच्या ऐवजी तीन होणार…’

एक दिवस तिने सांगून टाकलं,  मी माझ्या गावी जाऊन माझा संसार मांडते.’ घरातल्यांना हुश्श्य  झालं. सुंठीवाचून खोकला जातोय. जाऊ दे. तिने आपलं सामान गोळा केलं. गाठोडं बांधलं. पिशवी भरली आणि निघाली. घरचे मामाला म्हणाले, ‘तू पण नीघ.’

‘पण मी तिथे जाऊन  काय करू?  ना पाणी ना वीज.’ मामा कटकटला.

‘असं आहे. दिवस गेलेली बाई. पहिलटकरीण. एकटी  गेली, तर लोकात तरी बरं दिसेल का?’  मामाला  मग  निघावंच  लागलं. घराला चिकटलेलं बांडगूळ असं अचानक दूर करता आलं.

नंतर अधून मधून गावाकडच्या काही बातम्या येऊ लागल्या. तिने छप्पर नीट बांधून त्यावर कोहळ्या,  भोपळ्याचे वेल चढवलेत. दोडके,  शेंगा,  दुधे लावलेत. रेताड जमिनीत तूर आणि हरभरा लावलाय. निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.

क्रमश: …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सुनू मामी… – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सुनुमामी  म्हणजे  आमच्या  सदामामाची  बायको. सुनीता. तिला सुनीता या नावाने कुणीच,  कधीच   हाका  मारल्या  नाहीत. सदा मामा लग्न करून तिला घरी  घेऊन  आला, तेव्हा  घरातल्या  सगळ्यांना  आश्चर्याचा  धक्काच   बसला. आमच्या  गोर्या,पान  राजस रुपाच्या सदामामाची ही असली बायको. हे म्हणजे रेशमी शेल्याची गाठ चिंध्यांच्या वाकळीशी मारल्यासारखं होतं. काळा रंग. किंचित पुढे आलेले दात. जाड ओठ,  रुंद जबडा. फताडं नाक. खरोखर अगदी ध्यानच होतं ते! नाही म्हणायला तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. बघणार्या च्या डोळ्यात तिने थेट पाहिलं, की बघणार्यायने वरमून खाली बघितलंच पाहिजे.

‘सदामामा एक फुकट्या… आता हिलाही त्याच्याबोबर पोसलं पाहिजे. ‘ घरातल्या बायका बडबडत. कधी एकमेकींशी हळू आवाजात, कधी मोठ्याने हिला ऐकू  जाईल असं. सुनुमामी काहीच बोलत नसे. मान खाली घालून ती फक्त घरातली कामे  करी.  

त्याच्या लग्नाबद्दल घरातल्या बायका-पोरांना कल्पना नव्हती, पण पुरुष माणसांना माहीत  असावं. लग्न झाल्यावर तरी त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काही तरी कामधंद्याला लागेल, असं वाटलं होतं त्यांना. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नव्हतं.

सदामामाचा उद्योग म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकणे. त्यांच्याबरोबर पत्ते कुटणे, घरात आल्यावर बाहेरच्या दिवाणावर पडून अरेबियन नाईटस, हतीमताई, विक्रम वेताळ यासारखी पुस्तकं  वाचणे. घरातल्या पुरुषांनी त्याला कामालालावायचा अनेकदा प्रयत्न केला होता. घरातल्या पेढीवर ठेवला. पण दोनच दिवसात आपल्याला ते बैठं काम जमणार नाही म्हणाला आणि पेढीवर जाणं सोडून दिलं. एका ओळखीच्यांच्या किराणामालाच्या दुकानात समान देण्यासाठी ठेवला, तर तो मालात भेसळ करतो,  मला असला माल देणं जमणार नाही म्हणाला. एका गॅरेजमध्ये   ठेवला, तर असलं काम केल्याने तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल,  म्हणाला. थोडक्यात काय,  तर या ‘जोरूका भाई’ला कामाला लावायचे  सगळे प्रयत्न फसले. शेवटी  पुरुषांनी ठरवलं, घरात दहा माणसं जेवतात, हा अकरावा  जेवेल. लग्नं  झालं, पण सदामामाच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही.

सुनुमामीचं गाव शिवारी,  आमच्या  गावापासून  पंध्रा-वीस किलो मीटरवर. ती आणि तिचा म्हातारा बाप दोघेच होते एकमेकांना. तीन खोल्यांचं बैठं घर. थोडा जमीन तुकडा. दोघे राबत होते. पोटापुरतं मिळवत होते. म्हातार्या.ला एकच चिंता. मुलीच्या लग्नाची. मुलगी गुणाची, पण लग्नाच्या बाजारात गुणाला कुठली किंमत असायला?  रूप हवं. ते तर आजिबात नाही.

गावातले लोक काहिशा कुचेष्टेनेच सदामामाला विचारायचे, ‘काय सदाभाऊ, लाडू, कधी देणार?’

‘देऊ की…त्यातकाय?’

‘पण कधी? लग्न करायचा विचार आहे नं? की जन्मभर ब्रह्मचारीच रहाणार?’

‘अं… करायचं की लग्न!’

‘कधी?’

‘मुलगा मिळाली की.’

आता नाकर्ता सदा आणि कुरूप सुनीता,  लोकांनी जोडी लावून टाकली. ते सदाकडच्या पुरुषांना विचारायला आले. पुरुषांच्यात मसलत झाली. न जाणो, लग्न झाल्यावर सदामामाला जबाबदारीची जाणीव होईल,’  त्यांना वाटल़ं मग त्यांनी मध्यस्तांवरच जबाबदारी टाकली. मंदिरात लग्न लागलं. ना सनई. ना बँड. सुनीताला कुंकवाचा धनी मिळाला. गोरा-गोमटा जावई बघून म्हातारा खूश झाला. ‘आता मी मरायला मोकळा झालो.’ म्हणाला.

सदा बायकोला घेऊन घरी आला. ही माझी बायको. त्याने घरात सांगितले. माप ओलांडणं नाही. गृहप्रवेशाचा सोहळा नाही.  थट्टा-मस्करी नाही. दहीभात ओवाळणं नाही. नाव घ्यायलासुद्धा कुणी तिला सांगितलं नाही. ती सरळ तशीच घरात आली.

क्रमश: …

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंध…भाग 3 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 3 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(कुठेतरी चांगल्या घरी चोवीस तासांची नोकरी मिळाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि डोक्यावर छप्परही राहील असा विचार त्यांनी केला, आणि आज त्या अशा प्रकारे नंदिनीच्या घरी दाखल झाल्या. )

हळूहळू दिवसागणिक नंदिनी आणि मावशींचे सूर चांगले जुळत चालले होते. त्यांच्या व्यक्तित्वाचे एकेक पैलू नंदिनीला उलगडत गेले. सेवानिवृत्त नंदिनी घरच्या घरीच गाण्याचे क्लास घेत होती. स्वयंपाकघरात काम करता करता मावशींचे कान मात्र क्लासमध्ये चाललेल्या गाण्याकडे असायचे. कोणाचा सूर चांगला आहे, कोण बेसुरा आहे हे त्यांना चांगले समजायचे. कानावर अती बेसूर स्वर पडले तर त्यांना सहन व्हायचे नाही. कसलीही भीडभाड न बाळगता सरळ तोंडावर सांगायच्या, “ताई तुमचा गळा बेसुरा आहे, त्याकडे पहिले लक्ष द्या. “नंदिनीला वाटायचे ह्या अशा एकदम कशा काय बोलू शकतात? किती वेळा नंदिनी त्यांना समजवायची, “मावशी, असे एकदम तीर सोडू नका. “पण मावशी म्हणजे स्ट्रेट फाॅरवर्ड.. . !

त्यांचा आवाज इतका गोड होता, सूर ताल, लय अगदी उत्तम. किती गवळणी त्या नंदिनीला गाऊन दाखवायच्या.  “हरी माझ्या पदराला सोड रे”ही गवळण त्या फार भावपूर्ण गात असत. कधी कधी तर दोघींची मैफीलच जमायची. मावशी गवळणी गायच्या आणि नंदिनी पेटीवर त्यांना साथ द्यायची. दोघी कशा अगदी रंगून जायच्या. नंदिनीकडे काही बायका भजने शिकायला येत असत. मावशीही बसायच्या त्यांच्याबरोबर.. ..

कधी शाळेत गेल्या नाहीत. लिहिता वाचता काही येत नव्हते पण त्यांचे बोलणे ऐकत रहावे असे. अगदी साधे बोलतानासुद्धा सहजपणे किती म्हणी आणि वाक् प्रचार वापरायच्या. नंदिनीची बहीण तर नेहमी सांगत असे, “ताई तू मावशींचे बोलणे लिहून ठेव. “

नंदिनीने त्यांच्यासाठी बाराखडी, मुळाक्षरांचे पुस्तक आणले, पाटी पेन्सील आणली आणि त्यांना ती लिहिण्या वाचण्यास शिकवू लागली.

रोज तासभर तरी अभ्यास करायचा असा नियमच नंदिनीने त्यांना घालून दिला.  त्याही ईमानाने शिकू लागल्या.  थोड्याच कालावधीत त्या वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचू लागल्या. करता करता जोडाक्षरांचीही त्यांना चांगली ओळख झाली. स्वतःची सही करायला शिकल्या.  नंदिनीने त्यांना बँकेत खातेही उघडून दिले.

प्रसंगामुळे त्या अशा दुसर्‍याच्या दारात आल्या पण खरोखरीच त्यांचे आचार विचार फार उच्च होते.

सहा महिन्यांच्या कालावधीतच त्या इतक्या रुळल्या की घर त्यांचे की नंदिनीचे असा प्रश्न पडावा कोणाला.. .

नंदिनीकडे येणार्‍या तिच्या मैत्रीणी, बहीणी, नणंदा, दीर हेही आल्या आल्या “काय मावशी,  कशा आहात तुम्ही?”म्हणून पहिली त्यांचीच चौकशी करणार. नेहमी नंदिनी आणि मावशी कुठेही एकत्रच जाऊ लागल्या. नाटक, सिनेमा, कधी सोशल व्हिजीट्स. बाजारातही दोघी एकत्र जात. चूकून कधी मावशी सोबत दिसल्या नाहीत तर वाटेत भेटणारी मंडळी विचारत, “ताई आज तुम्ही एकट्याच?मावशी कुठे गेल्या?”

हा काहीतरी दोघींचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंधच होता जणू. परमेश्वरी योजना. नंदिनीला देवाने एकटे ठेवले नाही. मावशींच्या रूपात ईश्वरच जसा नंदिनीला साथ देत होता. तिच्या एकट्या जीवनाला उभारी देत होता. तिला आनंदी ठेवीत होता.

समाप्त

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंध…भाग 1 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? जीवनरंग ❤️

☆ ऋणानुबंध…भाग 1 ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

नंदिनीच्या आयुष्यात मावशी आल्या आणि तिच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले. आई गेल्यावर ती अगदी एकाकी झाली. पती निधनानंतर दहा वर्ष्ये आईने तिला सावलीसारखी साथ दिली होती. पण आई का जन्मभर पुरणार? दोन्ही मुले अमेरिकेत. . . !एकटेपणा काय असतो ह्याची जाणीव खर्‍या अर्थाने आईच्या स्वर्गवासाने तिला झाली. तशी अवतीभवती बरीच माणसे होती, बहीणी होत्या, दीर~नणंदा होत्या, पण त्यांची साथ कायम कशी काय शक्य? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे संसार, जबाबदार्‍या होत्याच ना?

नंदिनी तशी अतिशय खंबीर मनाची. पतीच्या अकस्मात निधनानंतरही तिने स्वतःला पूर्णपणे सावरले, स्वतःचे व्यक्तिमत्व जपले.  आज एकटी आहे म्हणून रडत बसणे हा तिचा स्वभावच नव्हता.

तिच्या शेजारच्या घरात एक चोवीस तासांची बाई होती. शेजारीण फार चांगली. ती म्हणाली, “आँटी, तुम्ही एकट्या आहात म्हणून मी माझ्या बाईला रात्री तुमच्यासोबत झोपण्यासाठी पाठवत जाईन. ” तिला बरे वाटले नाही, परंतु शेजारणीने इतके आस्थेने सांगितल्यावर नाही म्हणणेही प्रशस्त वाटले नाही.

शेजारची बाई तिच्याकडे येऊ लागली. तिच्या मनात आले की आपणही अशीच एखादी चांगली बाई ठेवली तर?मग तिने चौकशीला सुरवात केली.  शेजारची बाई एका नोकरवर्ग पुरविणार्‍या एजन्सीतून आली असल्याचे रात्री झोपताना केलेल्या गप्पा~गोष्टींवरून नंदिनीला समजले. “ताई , तुम्ही आमच्या मॅडमना विचारा. त्यांच्याकडे एजन्सीचा नंबर असेल. त्या देतील तुम्हाला. “अशा रीतीने भंडारीबाईंकडून तिला नंबर मिळाला. एजन्सीमार्फत एक दोन बायका तिच्याकडे आल्याही परंतु त्यांच्या सोबत सतत रहाणे नंदिनीला रास्त वाटले नाही. दहा बारा दिवस असेच गेले. शेजारच्यांच्या बाईला असे किती दिवस बोलवायचे? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का?नंदिनी फार अस्वस्थ होती. एजन्सीला रोज फोन लावून चांगली बाई मिळण्याची शक्यता आहे की नाही याचा अंदाज घेत होती. “ताई तुम्ही निश्चिंत रहा. लवकरच आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखी चांगली बाई मिळवून देतोच” असे तिला आश्वासन मिळत होते.

एक दिवस संध्याकाळी दारावरची बेल वाजली, एजन्सीचा माणूस बाईला घेऊन आला होता.

साधारण पन्नाशीतली बाई. गळ्यात ठसठशीत सोन्याची बोरमाळ आणि कानात सोन्याचे झुमके, कानावर सोन्याच्या पट्या लावून

ठाकठीक बसवलेले. प्रथमदर्शनी कोणाचीही नजर खेचून घेणारे. सावळा वर्ण पण नाकी डोळी नीटस. पदर पिनप करून सिंथेटिक साडी व्यवस्थित परिधान केलेली. केस काळेच, मधूनच एखादी रूपेरी छटा. कपाळावर लाल मध्यम आकाराची टिकली. केसांना तेल लावून आंबाडा घातलेला. नीट नेटकी, स्वच्छ. चाल एकदम ताठ. . . !प्रथमदर्शनीच त्यांच्याशी जमण्यास काही अडचण येऊ नये असे नंदिनीला वाटले.

एजन्सीच्या माणसाने त्या बाईशी ओळख करून दिली आणि त्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेऊन “बघा तुम्हाला  ह्या बाई पटतात का, नाहीतर आम्हाला कळवा. आम्ही दुसरी बाई देऊ. “असे सांगून तो निघून गेला.

  क्रमशः…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print