मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखी, प्रिय सखी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

माऊली टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची बस बेंगलोरहून उटीच्या दिशेने धावत होती. गाडीत पुण्या मुंबईकडचे सुमारे पंचवीस प्रवासी सहलीला जात होते. बहुतेक प्रवासी पन्नाशीच्या पुढचे होते. प्रत्येक सीट दोन प्रवाशांसाठी असल्याने एका सीटवर नवराबायको जोडी बसली होती. अपवाद फक्त डाव्या बाजूला समोरुन चौथ्या सीटवर एक पंचावन्न छप्पन वर्षाचा गृहस्थ हातात पुस्तक घेऊन त्यात रममाण झाला होता. दुसरी उजव्या बाजूला समोरुन पाचव्या सीटवर ज्योती पारकर एकटीच बसली होती. असा लांबचा प्रवास ज्योती कित्येक वर्षांनी करत होती. मुलगा, सून मागेच लागली आणि त्यांनी या माऊली टूरच्या सहलीत नाव नोंदवले त्यामुळे ज्योती बाहेर पडली. असे असले तरी ज्योतीचा जीव अजून पारकर क्लॉथ आणि पारकर एंटरप्रायझेस मध्ये अडकला होता. गेली पंचवीस वर्षे कापड आणि तयार कपडे यांच्याभोवती तिचे आयुष्य गेले होते. तिचा मुलगा आशु आणि सून प्राजक्ता यांची तिला आठवण आली. सांभाळतात दोघेही व्यवसाय पण अजून माझे मार्गदर्शन लागतेच. आपण पण व्यवसायातून हळूहळू बाहेर पडावे असे म्हणतो, पण जमत नाही. पण आता निर्णय घ्यायलाच हवा इतकी वर्षे सतत कामात राहण्याची सवय त्यामुळे घरी बसून वेळ कसा जाणार ही चिंता.
ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट समोरुन सरकू लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानशा गावात जन्म. तीन बहिणी आपण, घरची गरीबी. आपण सर्वात लहान. शाळेत हुशार होतो. विशेषतः भाषा विषय अतिशय चांगले. मराठी भाषा फार आवडायची. कविता सगळ्या तोंडपाठ. शाळेत शिकलेल्या कविता ज्योती आठवू लागली. कित्येक वर्षात कविता मनातल्या मनात सुध्दा म्हटल्या नाहीत. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शिवण क्लासात नाव घातले. बाजूच्याच गावातील पारकर टेलरचे स्थळ आले. दोन पारकर भाऊ, दोघेही टेलर. त्या चार पाच गावात चांगले कपडे शिवण्याबद्दल प्रसिध्द होते. मोठा भाऊ दिनू, त्याचे लग्न झालेले. धाकटा अरुण त्याचे स्थळ आले. मुलगा बरा आहे. अंगात कला आहे हे समजून आई बाबांनी लग्न लावून दिले. त्या काळात आपल्याला कुठे होते स्वातंत्र्य बरे वाईट म्हणायचे ? पदरी पडेल त्याच्याशी आयुष्यभर संसार करायची पध्दत. लग्नानंतर लक्षात आले सारा कारभार मोठ्या जावेच्या हातात. आपला नवरा पण वहिनीच्या पुढे बोलत नाही. दुकान मोठ्या भावाच्या हातात. सर्व पैसे भावाकडे जाणार. त्याच्याकडून त्याच्या बायकोकडे. काही हवे असेल तर मोठ्या जावेकडे मागावे लागे. ज्योतीला हे सहन होत नव्हते. यातून बाहेर पडायला हवे. तिने नवर्‍याच्या मागे तगादा लावला आपण वेंगुर्ल्याला जावू. माझी आते तिथे आहे. तिथे टेलरिंग दुकान काढू. मी कपडे विकीन. ज्योतीचा नवरा काही ऐकणारा नव्हता. मग तिच्या मोठ्या दिराला दारुचे व्यसन लागले. त्यात तो पैसे उडवू लागला. घरात पैसे येणे बंद झाले. त्यामुळे मोठी जाऊ आता तुम्ही वेगळे रहा आम्हाला तुमचा खर्च झेपत नाही असे म्हणू लागली. त्यामुळे तिच्या नवर्‍याचा नाईलाज झाला आणि शेवटी ती दोघं गाव सोडून वेंगुर्ल्याला आली.

वेंगुर्ल्याला ज्योतीची आते राहत होती. आतेच्या नवर्‍याचे इस्त्रीचे दुकान होते. स्वतःचे घर होते. आत्येचा मुलगा मुंबईला नोकरीला होता. त्यामुळे ती दोघंच राहत होती. म्हणून ज्योती आणि अरुणची रहायची सोय झाली. ज्योती धडपडी होती. आजुबाजूला फिरुन कुठे भाड्याने दुकान गाळा मिळतो काय? हे शोधत राहिली. तिला थोडीशी आतमध्ये पण कमी भाड्याची जागा मिळाली. त्या जागेत पारकर टेलर्सचा बोर्ड लागला आणि आतेकडे पडून असलेल्या शिलाई मशिनवर काम सुरु झाले. ज्योतीच्या मावशीचे मुंबईत परकर, साड्या, ब्लाऊज कटपीस यांचे लहानशे दुकान होते. ज्योती मुंबईत गेली आणि मावशीच्या ओळखीने स्त्रीयांसाठी लागणारे कपडे क्रेडिटवर घेऊन एसटी बसवर पार्सले घालून वेंगुर्ल्याला आणू लागली. तिला माहित होते आपली या शहरात ओळख नाही तर कोणी आपल्याकडे येणार नाही. त्यासाठी आपण त्यांच्याकडे जायला हवे. म्हणून ती सायकलच्या मागेपुढे पिशव्या बांधून घरोघरी कपडे विकू लागली. लाघवी बोलणे, दुकानापेक्षा रेट कमी आणि चांगला दर्जा यामुळे तिचे कपडे खपू लागले. तिच्या तोंडी जाहिरातीमुळे तिच्या नवर्‍याकडे कपडे शिवायला येऊ लागले. एकंदरित दोन वर्षात तिने या व्यवसायात जम बसवला. दर पंधरा दिवसांनी तिला मुंबईला जावे लागे. मागचे पैसे देऊन पुढचा माल आणायचा. या दरम्यान तिला मुलगा झाला. आशु एक महिन्याचा झाला त्याला आतेकडे ठेवून ती मुंबईची वारी करु लागली. अशीच पाच वर्षे गेली. तिचा व्यापार आता जोरदार होऊ लागला. आता तिला मार्वेâटमध्ये एखादा गाळा मिळावा अशी इच्छा झाली. शोधता शोधता तिला तसा गाळा मिळाला. या गाळ्यात तिने मस्त फर्निचर केले आणि भरपूर माल भरला. फक्त स्त्रियांसाठी कपडे, सर्व सेल्सगर्ल मुलीच ठेवल्या. अशी पध्दत तळकोकणात तेव्हा नवीनच होती. त्यामुळे तिच्याकडे मुलींची तसेच स्त्रियांची गर्दी होऊ लागली. आता सरळ ट्रान्सपोर्टने माल यायला लागला. गणपती, दिवाळी, लग्नसराई या काळात तिला जेवायला वेळ मिळत नव्हता अशी गर्दी. तिचा नवरापण टेलरिंग बंद करुन तिच्या दुकानात काम करु लागला.

एव्हाना आशु शाळेत जाऊ लागला. त्याच्याकडे लक्ष द्यायला आते होतीच म्हणून ती निर्धास्त होती. आशुपण अगदी गुणी निघाला. आपली आई सतत कामात असते हे पाहून तो फारसा हट्ट करायचा नाही. पण तिचे दुर्दैव तिच्या नवर्‍याला दारुचे व्यसन लागले. तिने त्याला खूप समजावले. ही दारु आयुष्याचा सत्यानाश करणार आहे. त्याचा मोठा भाऊ सुध्दा असाच दारुपायी आयुष्यातून बाद झाला. परंतु तिच्या नवर्‍यामध्ये कसलीही सुधारणा दिसेना. उलट त्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढू लागले. शेवटी तिने निग्रहाने सांगितले, यापुढे दारु पिऊन दुकानात आलास तर बाहेर हाकलून लावीन. घरात पाय ठेवू देणार नाही.

दिवाळी आलेली त्यामुळे भरपूर माल दुकानात आला. ती मुलींकडून पार्सले उघडवत होती. त्यावर दर चिकटवणे सुरु होते. एवढ्यात तिचा नवरा दारु पिऊन तर्र झालेला दुकानात शिरला. आणि कॅश काऊंटरवर जाऊन पैसे खिश्यात घालू लागला. तिच्या अंगाचा संताप संताप झाला. तिने कोपर्‍यात असलेली एक मोठी काठी उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. तो तिरमिरला आणि खाली पडला. तिने दुकानातील मुलींच्या सहाय्याने त्याला ओढून बाहेर काढले. आणि पुन्हा दारु पिऊन दुकानात आलास तर बघ तुझा जीव घेईन अशी तंबी दिली. थोड्या वेळाने तिचा नवरा उठून कुठेतरी गेला. तो रात्री येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता तो आलाच नाही. तिला वाटले कदाचित गावी गेला असेल. गावीपण तो गेला नाही. कदाचित नातेवाईकांकडे गेला असेल. पण तो कुठेच गेला नाही. दोन महिन्यांनी देवबाग किनार्‍यावर त्याचे प्रेत समुद्रात तरंगताना दिसले.

तिचा व्यवसाय जोरात सुरु होता. घरी आते, तिचे यजमान लक्ष ठेवून होते. आशु शाळेत जात होता. आता तिच्या बँकेत पैसे जमा होऊ लागले. तसे तिला मोठ्या जागेचे वेध लागले. भर बाजारात मोठ्या इमारतीचे काम सुरु होते. त्या इमारतीत दुकानासाठी जागेची तिने चौकशी केली. तिच्या बँकेने पण सहाय्य केले. आणि दोन हजार शंभर स्क्वेअर फूटाची जागा तिने विकत घेतली. आता पारकर एंटरप्रायझेस नवीन प्रशस्त जागेत सुरु झाले. इथे नवीन पिढीसाठी सर्व ब्रँडचे तयार कपडे मिळू लागले. सर्व व्यवसाय कॉम्प्युटराईज झाले. धंदा खूप वाढला. नवीन तरुण सेल्समन, सेल्सगर्ल यांच्या नेमणूकी झाल्या. चार वर्षापूर्वी आशुपण धंद्यात आला. दोन्ही दुकानांचा कारभार त्याने हातात घेतला. आणि ज्योतीला विश्रांती मिळू लागली. आशुचे त्याच्या वर्गातील मैत्रिण प्राजक्ता हिच्याशी लग्न झाले आणि अजून दोन हात मदतीला आले.

माऊली टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची गाडी उटीच्या दिशेने धावत होती आणि ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरुन सरकत होता. सर्वजण म्हणतात, आता साठी जवळ आली तुमच्या आवडीनिवडीत मन रमवा. तुमचे अपुरे छंद पुर्ण करा. तिच्या लक्षात येईना कसल्या होत्या आपल्या आवडी? कसले होते आपले छंद ? गेली पंचवीस तीस वर्षे गाडीला जुंपलेल्या बैलासारखे आपण राबत होतो. दिवसाचे  किती तास कोण जाणे ? एवढ्यात गाडीतील ट्रॅव्हल मॅनेजर अनिता हिने माईक हातात घेतला.

‘‘चला मंडळी, अजून दोन तास प्रवास बाकी आहे. तेव्हा गाणी म्हणा, भेंड्या लावा. नाटुकले करा. पण झोपू नका. आजुबाजूचा निसर्ग पहा. पहा कस बाहेर धुकं पडलयं ते एन्जॉय करा. चला करा सुरुवात.’’

असं म्हणून तिनं पहिल्या बाकावरील वर्दे जोडीला सुचविले तुम्ही काय करताय? वर्देंनी हिंदी गाणी म्हटली. दुसर्‍या बाकावरील जाधव यांनी नक्कल केली. कोणी श्लोक म्हटले. तिने डाव्या बाजूला चौथ्या सीटवर एकट्याच बसलेल्या गृहस्थाकडे पाहून म्हटले, ‘‘अत्रे सर, तुम्ही काय म्हणताय?’’

‘‘ मी माझ्या कविता म्हटल्या तर चालेल का?’’

‘‘अरे, तुम्ही कवी आहात, मग म्हणा.’’ कोणीतरी ओरडलं.

आणि प्रविण अत्रेने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केल्या.

पहिली ठिणगी पडते तेव्हा,

विचार व्हावा पाणी ।

मनात सूर जपतो तेव्हाच,

शब्द होतात गाणी ।।

कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा

बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा ।

बाकी उरणं महत्त्वाचे, तेवढीच श्री शिल्लक

कविता असेल साधी, पण विचार मात्र तल्लख ।।

ज्योतीला भारावल्यासारखे झाले. शाळेत असताना कविता तिचा जीव की प्राण होत्या. जीवनाच्या रहाटगाडग्यात ती सर्व विसरली. तिला ती ओळ पुन्हा आठवली.

‘‘कधी कधी आठवण्याहून, विसरण्यात मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा’’ काय विलक्षण कविता होती ही. ढगाळलेल्या वातावरणात मध्येच सूर्याची तिरीप अंगावर पडावी असे तिला वाटले. त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही काही कार्यक्रम केले. पण ज्योतीचे त्याकडे लक्ष नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. ‘‘बाकी उरणं महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक’’ आहाहा काय विचार आहे सुंदर !

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। आंधळी माया ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

।। आंधळी माया ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(सावनीचे सगळे लाड आजीने पुरवले ! किती attached होती सावनी आजीला !) इथून पुढे — 

सावनी आजीला दर आठवड्याला फोन करायची गप्पा मारायची.कधी एकटं वाटू दिलं नाही तिनं आजीला! सावनी चं एम एस झालं आणि तिला खूप सुंदर जॉब मिळाला.   दरम्यान आजीही अचानकच कालवश झाल्या!आता अमितवर कोणतीही जबाबदारी उरली नाही. सावनीने बोलावले म्हणून तो अमेरिकेला जाणार होता. अरुंधतीला त्याने हे अगदी कॅज्युअली सांगितले.ती म्हणाली,’ मला आणि आनंदला इथे टाकून तुम्ही लाडक्या लेकीकडे जाणार हो?आम्हाला पण सांगा तिला तिकडे न्यायला!’अमित संतापाने बघतच राहिला.’अरुंधती,शरम वाटते का काही बोलायला?ती तुझीही मुलगी होती ना?काय केलंस ग तिच्यासाठी?सतत हा मतिमंद मुलगा बसलीस सांभाळत आणि आमची आयुष्य उध्वस्त केलीस. बिचारी माझी गुणी मुलगी आजी आजोबांच्या छायेत वाढली!माझे आईवडील नसते तर कठीण होतं बरं तिचं!रहा इथेच,तूआणि तुझा हा लाडका लेक.

मी सावनीकडे जाणारच.कोणत्या तोंडाने म्हणतेस ग आम्ही येतो?शी!स्वार्थीपणाचीही हद्द झाली तुझ्या. आता बोलतोच!पत्नी म्हणून काय सुख दिलंस ग मला हा झाल्यापासून?माझं तरुण शरीर तळमळत असायचं  रात्रंदिवस! सतत हा  मुलगा घेऊन बसत होतीस,मी पण कमी नाही केलंय याच्यासाठी! प्रत्येक गोष्टीला लिमिटअसतेअरुंधती!तुझ्यातली फक्त आईतीही या आनंदची, सावनीची नाहीच ! शिल्लक राहिली आणि माझ्या आयुष्याचे वाळवंट झाले. दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने अमित निघून गेला.

 एअरपोर्ट वर सावनी आणि एक उमदा तरुण आले होते. बाबा,हा शिशिर!माझा कलिग आहे.आम्ही एकत्रच  एम एस केलं.शिशिरला आईवडील नाहीत.तो आत्याकडे इथेच usa मध्ये वाढला. एवढी ओळख पुरे सध्या!’सगळे सावनीच्या फ्लॅट मध्ये आले.किती सुंदर ठेवला होता तिनं फ्लॅट!अमितसाठी सुंदर स्वयंपाक करून ठेवला होता.

जेवल्यावर शिशिर त्याच्या घरी गेला. सावनी  बाबांजवळ बसली’.बाबा,बरे आहात ना?किती  वर्षांनी असे घराबाहेर पडत असाल ना?सगळं होतं हो तुमच्याकडे!हौसपैसा सगळं. पण एकेकाळी हौशी असलेली आई किती बदलली ना! सतत आनंद हेच दैवत झालं तिचं! बरोबर होतं तेही पण तिने  ढोर मेहनत करून तो सुधारणार होता का? ती सगळ्या लोकांपासून तुटत गेली.कधीही तिनं मान्य केलं नाही की हा मुलगा गतिमंद आहे.काय  मेहनत  घ्यायची ती हो बाबा!एकेक अक्षर तिने  शंभर शंभर वेळा शिकवलंय त्याला.पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याची पाटी कोरीच. पण निदान त्या स्पेशल स्कूल मध्ये घातल्याने तिथे सगळी मुलं अशीच असल्याने तो  इतका तरी शिकू शकला. आईने त्याला धडपड करून छोटासा का होईना जॉब मिळवून दिला.  बाबा,या सगळ्यात तुम्हाला फार सोसावं लागलं हो.आणि मलाही.मला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही.तुम्ही आजीनं ती उणीव भरून काढलीत नाहीतर माझं काय झालं असतं बाबा? बाबा,अनेक घरात असं  मूल येतं की जन्माला पण त्याचा कोणी इतका बाऊ करत नाही.शक्य तेवढं  सगळं करतात आईवडील आणि आपलं आयुष्यही सुखात जगतात.आपल्या आई सारखं स्वतःचं आयुष्य गहाण नाही हो टाकत. आईला हे असं मूल म्हणजे तिचा अपमान, कमीपणा वाटायचा.आणि मग मलाही तिने कधीच  न्याय दिला नाही हो. बाबा,मी शिशिरशी लग्न करायचं म्हणतेय.तुम्ही इथे आहात तर आमचं लग्न लावूनच जाल का?मला फार आनंद होईल हो बाबा.आता तर आजीआजोबा ही नाहीत माझं हे कौतुक बघायला. ‘बोलताना पाणी आलं सावनीच्या डोळ्यात.’ अग वेडे,रडतेस कशाला?तुझा बाबा भक्कम उभा आहे तुझ्या पाठीशी.मला खूप आवडलाय शिशिर.उत्तम जोडीदार निवडलास ग बाळा!

तू आता लग्नाची झाली आहेस,हेही अरुंधतीने लक्षात घेतलं नाहीये.पण देव असतो बघ पाठीशी उभा.मी आनंदाने लग्न लावून देईन ग पोरी.आधी बोलली असतीस तर आजीने तुला दिलेले सगळे दागिने घेऊन आलो असतो सावनी! ‘नको हो बाबा,मला काही नको .फक्त तुमचे आशीर्वाद द्या,तेच खूप मोलाचे आहेत आमच्यासाठी!लग्न झाल्यावर मग आईला मी तुम्ही,सावकाश कळवूया.तिला त्याचं काहीच सुखदुःख नसणार बाबा.जाऊ दे.माझे वडील हेच माझ्यासाठी आई बाबा दोन्हीही आहेत असं मी समजत आलेय.’ ठरलेल्या मुहूर्तावर सावनी आणि शिशिरचं लग्न खूप छान थोडक्यात करून दिलं अमितने! शिशिरच्या आत्याबाईही हजर होत्या. लग्न झाल्यावर सावनी  सासरी शिशिरच्या फ्लॅट मध्ये गेली.दुसऱ्या दिवशी सावनी पुन्हा आपल्या घरी आली आणि म्हणाली,’बाबा तुम्ही आता सहा महिने इकडे रहात जा.मी तुमचं ग्रीन कार्ड प्रोसेस करीन.तुम्ही इथेच छानसा जॉब बघा आणि रहा इथेच.तुम्हाला नक्की मिळेल जॉब हो बाबा,आणि पैशासाठी नाही पण मन गुंतावे म्हणून करा तुम्ही जॉब!बघा कसं वाटतंय ते!’ मी आग्रह नाही करत हं पण मला वाटतं तुमच्या बुद्धीचंही इथे चीज होईल आणि खरं तर तुम्हाला त्या घरापासून सुटका मिळेल हो बाबा. सावकाश विचार करा. आत्ता ठरवलंय तुम्ही तसे परत जा आणि मग पुढच्या वेळी याल तेव्हा मला निर्णय सांगा नक्की बाबा!’जड अंतःकरणाने तिचा निरोप घेऊन अमित परत आला पण मनात अतिशय समाधान होते,की सावनीचं भलं झालं.आपल्यालाशोधूनही असा उमदा मुलगा मिळाला नसता तिच्यासाठी!’  अरुंधतीला त्याने लग्नाचे फोटो पाठवले होतेच. चार दिवसांनी अमितने तिला  सांगून टाकलं  अरुंधती, मी सध्यातरी ग्रीन कार्ड होई पर्यंत सहा महिने सावनी कडे राहणार आहे आणि ग्रीन कार्ड नंतर मी तिकडेच राहीन.तुला भरपूर पेन्शन मिळेल आणि मीही तुला  इतके इतके पैसे फिक्स मध्ये टाकून जाणार आहे. याच घरात तुम्ही दोघेही रहा,तू आणि आनंद! मला मात्र आता इथे राहायचं नाही.बस झाला संसाराचा  फार्स.  आणि आता मला  अडवू नकोस.मी जायचा निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणार नाही.  तू तुझा मुलगा सुखाने रहा इथे’. निर्विकार पणे अरुंधतीने हे ऐकून घेतलं आणि एक शब्दही न बोलता, ती आत निघून गेली. अमित थक्क झाला.निदान, असे जाऊ नका, माझं चुकलं असेलही,हे तिने म्हणावे ही अपेक्षाही चुकीचीच ठरली अरुंधतीच्या बाबतीत!तिने सावनीच्या लग्नाबद्दल अवाक्षर ही काढले नाही.   अमितला अतिशय वाईट वाटले.काय विचित्र योग असतील आपल्या गुणी मुलीचे तिच्या सख्ख्या आईशी,याचं त्याला नेहमीच आश्चर्य वाटलं आलं होतं.ठरलेल्या वेळी अमित  अमेरिकेला निघून गेला.

राहिली ती अरुंधती आणि ज्या मुलासाठी रक्ताचं पाणी केलं तो आनंद.ज्याला तेवढंसमजण्याचीही कुवत नव्हती की आई आपल्यासाठी सगळी नाती तोडून  झिजत राहिली. जन्मभर तोडलेली नाती उतारवयात अरुंधती समोर फेर धरू लागली.आणि सोन्यासारखी मुलगी आपण गमावली तिच्या लग्नालाही तिने   आपल्याला बोलावलं नाही,याचं वाईट  वाटून तरी उपयोग नव्हताच.जसं तिनं पेरलं तसंच उगवलं. या एका मुलापायी नवरा, मुलगी सगळं सगळं गमावून बसली अरुंधती!वेळ निघून गेली होती आणि  आपली  असणारी माणसं तिने स्वतःहूनच परकी केली. अरुंधतीला ही पुढची अत्यंत अवघड वाट एकटीने चालायची होती.आता पश्चाताप करून काय फायदा होता?

तिच्या आईवडिलांनीही तिला किती तरी वेळा सांगितलं होतं,की अग बाई,तू या एका मुलापायी संसार उध्वस्त करतेआहेस.अमित सारखा नवरा आणि सावनीसारखी मुलगी भाग्यानेच मिळते बरं!काय तो आनंद घेऊन बसतेस जवळ सारखी ग!

करायचे ते सगळे प्रयत्न झालेत करून!त्याच्या पायी तू अतिशय अन्याय करते आहेस सगळ्यामाणसांवर.’त्याहीवेळी तिला आईवडिलांचेही पटले नाहीच. आता एवढ्या मोठ्या घरात उरली एकटी अरुंधती आणि हा  खुळा आनंद.वेळ निघून गेली आणि आता परतीचे दोरही स्वतःच कापून टाकलेली अरुंधती त्या भकास घरात एकटी उरली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। आंधळी माया ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

।। आंधळी माया ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

अरुंधतीला पहिली मुलगी झाली आणि घरात आनंद पसरला.  दात्यांच्या घरात मुलगी अशी ही पहिलीच. मोठ्या थाटात तिचं बारसं केलं आणि नाव  ठेवलं सावनी!  अरुंधतीला बँकेत छान जॉब होता आणि अमितला,  तिच्या नवऱ्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत खूपच छान पगाराची नोकरी होती. अशा सुखात भर पडली सावनीच्या बाळ पावलांनी.  दिवसामासानी सावनी वाढू लागली आणि तिच्या बाळलीलानी आजीआजोबा हरखून जाऊ लागले. अरुंधतीने आता एक चोवीस तासाची बाई घरी ठेवली आणि आजींचे,  तिचे काम हलके झाले. मीराबाई सगळं काम अगदी घरच्या सारखं करत आणि सावनीलाही खूप छान संभाळत. सावनी चार  वर्षांची झाली आणि अरुंधतीला मुलगा झाला. सगळं घर आनंदी झालं. सावनी शाळेत जायला लागली आणि  मग हा भाऊ आला घरी.  पहिले चार महिने कोडकौतुकात गेले आणि मग अरुंधतीच्या लक्षात आलं बाळ मान सावरत नाहीये पालथा पडत नाहीये. त्यांनी बाळाच्या डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी नीट तपासले आणि सांगितले, हा  स्लो लर्नर आहे. अगदी पूर्ण मतिमंद नाही पण गतिमंद होईल असं वाटतंय. बघूया तुम्ही लक्ष ठेवा आणि दरमहा  मला दाखवायला घेऊन येत जा. अमित आणि अरुंधतीवर हे ऐकून तर वज्राघात झाला.  सगळं सुरळीत चालू  असताना हे काय संकट आलं त्यांना समजेना. बरं, हे जन्माचेच होते आता. प्रयत्नाने काय होईल ते बघायचे. आठव्या महिन्यात आनंद मान धरायला लागला आणि हळूहळू पुढे सरकायला लागला. ब्रम्हानंद झाला अरुंधतीला. सगळे माईल स्टोन्स उशिरा उशिरा करत आनंद चार वर्षाचा झाला. सावनी शाळेत चमकतहोती. कधी शाळेत मिळालेले बक्षीस आईला दाखवायला आली की  आई म्हणायची,  सावनी,  कित्ती छान ग!शाब्बास!पण ते आनंदला नको दाखवू हं त्याला वाईट  वाटेल ना!’मग हिरमुसून सावनी आजी आजोबा आणि बाबांना तो कप ते मेडल दाखवायची. ते सगळे तिचं तोंडभरून कौतुक करायचे. बाबांची तर जास्तच लाडकी होती सावनी!होतीच ती गुणी मुलगी!  तिलाही आपल्या भावाचं प्रेम होतंच. पण आनंदला तेवढं कळायचं, ताईचे कौतुक जास्त होतं ती हुशार आहे . त्याला ते सहन व्हायचं नाहीआणि मग तो  आक्रमक हिंसक व्हायचा. एकदा त्याने सावनीची वही फाडून टाकली  हे बघितल्यावर अमितने दोन चांगल्या मुस्काडीत ठेवून दिल्यात्याच्या. हे बरं रे समजतं तुला?पुन्हा सांगतो अरुंधती,  ही याची लक्षणं बरी नाहीत. तू त्याला अशी पाठीशी घालत जाऊ नकोस.

तुला नवरा आहे एकसोन्यासारखी मुलगी आहे हे तू पार विसरली आहेस का?का मुद्दाम करतेस  ग तू हे?याचे परिणाम बरे होणारनाहीत. ‘ सगळं ऐकून घेऊन अरुंधती मख्खपणे तिथून निघून गेली.

एक दिवस घरी मुलं नसताना आजीआजोबा आणि अमित अरुंधतीशी बोलायला आले. ‘हे बघ अरुंधती, तू सावनीवर अतिशय अन्याय करते आहेस. आता मान्य करून टाक, आनंद नॉर्मल मुलगा नाहीये. नशिबाने तो गतिमंद आहे म्हणून पुण्यात त्या स्पेशल शाळेत तरी जाऊ शकतो. होईल तोही  ठीक ठीक,  शिकेलही अगदी कॉलेजमध्ये सुद्धा. पण म्हणून तू सावनीवर अतिशय अन्याय करते आहेस. सारखे काय तिला दडपतेस ग? सारखी म्हणतेस,  तुझी बक्षिसं दाखवू नको आनंदसमोर,  त्याला वाईट वाटेल. कधी तिला हौसेने  चांगले कपडे तरी  आणतेस का?का कधी तिच्या शाळेत जातेस पेरेन्ट्स मीटिंग ला?अभिमान वाटावा अशी मुलगी देवाने दिलीय तर नसलेले दुःख कुरवाळत बसू नकोस. झालाय मुलगा असा,  पण सारखं काय त्यालाच बसतेस गोंजारत?तिचंही कौतुक करत जा. ही काय पद्धत आहे ग तुझी?बंद कर असलं वागणं बघू!ते लेकरू एवढं यश मिळवूनही कोपऱ्यात रडत बसलेलं आम्ही बघितलं आहे. लहान आहे ग सावनी सुद्धा. म्हणत होती आजी,  मी आईला आवडत नाही का ग?मी पण आनंद सारखीच मंद झाले असते म्हणजे मग आवडले असते आईला!’पोटात तुटलं हे तिचं बोलणं ऐकून!तिची हुशारी हा तुझ्या दृष्टीनं गुन्हा आहे का ?मूर्खां सारखी वागू नकोस. तिलाही तुझी माया प्रेम मिळू दे. हक्क आहे तिचा तो!अशा वागण्याने तू ही मुलगीही गमावून बसशील बरं!’अमित आणि आजीआजोबा तळमळून म्हणाले. आजी तर रडायला लागल्या. ‘ असं नको करू अरुंधती. मान्य आहे आनंद दुबळा आहे त्याला तुझी जास्त गरज आहे पण  म्हणून सावनीही अजून लहानचआहे. तिलाही तुझी जास्त गरजआहे. विचारकर. ‘अरुंधतीचिडूनम्हणाली,  ,  ‘हो,  तुम्हाला तीच प्रिय असणार. माझा  आनंद कमी बुद्धीचा आहे म्हणून लाज वाटते तुम्हाला त्याची. पण मी करीन कष्टआणि उभा करीन त्याला आयुष्यात. सावनीला माझी गरज नाहीये. ‘हे ऐकून अमित आणि आजीआजोबा तिच्या समोरून निघूनच गेले. बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. अमित हताश झाला. बायको म्हणून तर कोणतेही सुख त्याला अरुंधतीकडून मिळत नव्हतेच आणि चोवीस तास आनंदला घेऊन बसलेली अरुंधती बघून तिडीक जायची त्याच्या डोक्यात!कुठे ट्रीपला जाणं नाही,  एवढी ऐपत असून परदेश प्रवास तर आनंद झाल्यापासून केलाच नव्हता त्यांनी!  या सगळ्यात सावनीचं बालपण होरपळून निघत होतं. आनंदला  स्पेशल स्कूल ला घातलं. त्याचा बुध्यांक कमी होता पण तो मतिमंद नव्हता. अरुंधतीने त्याला पेटीच्या क्लासला घातलं. त्यात त्याला चांगली होती गती. काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही अरुंधतीने! आनंद आठवीत गेला तेव्हा सावनी  बारावीला बोर्डात आली. अतिशय सुंदर मार्क्स मिळालेल्या सावनीला सगळी दार खुली होती प्रवेशासाठी!सावनीला आय आय टी ला ऍडमिशन मिळाली आणि सावनी पवईला निघून गेली. अमितचं आपल्या लाडक्या लेकीशी इतकं सुंदर नातं होतं की ती गेल्यावर त्याला अतिशय वाईट वाटलं. जायच्या आधी सावनी बाबांना म्हणाली बाबा,  तुम्ही आता फार एकटे पडाल हो. मला खूप काळजी वाटते तुमची!आजीआजोबा आता खूपम्हातारे झालेत,  त्यांनाही तुमची गरज आहे बाबा. आई तर कशातच नसते. सारखं आनंदच्या मागे लागून तो असा किती सुधारणार आहे बाबा? माझाही तो भाऊ आहेचकी!पण असल्या ओव्हरप्रोटेक्शन मुळे तो स्वार्थी आपमतलबी झालाय . हातपाय आपटून तो आईकडून हवं ते मिळवतोच! बाबा,  मला तुमचं फार वाईट वाटतं हो! मी इतकीही लहान नाही  हे समजायला, की कोणतेही संसारसुख तुम्हाला आनंद झाल्या पासून मिळालं नाही. बाबा, थोडे थांबा. मी कायम आहे तुमच्यासाठी!मी आय आय टी मधून डिग्री मिळवली की इथे रहाणार नाहीये. मी माझे  प्लॅन्स ठरवलेत. पण तुम्ही नीट राहा आणि आजी आजोबांची काळजी घ्या. घ्याल ना?’अमितच्या डोळ्यात पाणी आलं’. घेईन मी सावनी काळजी!अग, निदान आजीआजोबांसाठी तरी मला नीट उभं रहायला हवं. तुझी आई असून नसल्यासारखीच आहे घरात. कमाल वाटते मला, अशी आंधळी माया अरुंधतीने करावी?हजारवेळा मी  तिच्या आईवडिलांनीही,  ,  डॉक्टरांनी सांगून झालंय की एका ठराविक लेव्हल पुढे ही मुलं प्रगती करू शकत नाहीत. पण अरुंधतीला हे मान्य नाही. बघूया काय होतं ते!माझ्यानंतर कठीण आहे सगळं!’अमितला अश्रू आवरेनात!किती तरुण होता अमित!अजून पन्नाशीही उलटली  नाही तेवढ्यात हे वैराग्य आले नशिबाला!  आनंद गतिमंद आहे हे समजल्यापासून तर दोघांच्या बेडरुमही वेगळ्याच झाल्या होत्या. अरुंधतीच्या ध्यानधारणा, जपजाप्य यात अमित ला जागा नव्हती. आजीआजोबांचा जीव तुटे आपल्या या एकुलत्या एक मुलाला असे संन्याशासारखे जगताना बघून! सावनी अत्यंत उच्च श्रेणीत पास झाली आणि तिने जीआर ई दिली. सावनीला येल युनिव्हर्सिटीत अमेरिकेला ऍडमिशन मिळाली. अमितच्या आनंदाला सीमा उरल्या नाहीत!

सावनी म्हणाली बाबा,  जपून नीट रहा. आणखी थोडेच दिवस,  मग मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन जाणार आहे!तेव्हा कोणताही विचार न करता या . माझं एम एस झालं की मग बघूया. ‘ अमित अगदी एकटा पडला सावनी गेल्यावर!इथे ती निदान महिन्यातून एकदा तरी यायची किंवा अमित जायचा तिलाभेटायला. पण आता सात समुद्रापार गेली सावनी!   दरम्यान अचानक आजोबा हार्ट अटॅक ने गेले. आजी खचून गेल्या पण समंजसपणे म्हणाल्या अरे, म्हातारी माणसं रेआम्ही!कोणीतरी आधी,  कोणी नंतर जायचंच अमित!नको एवढं वाईट वाटून घेऊ रे! मीही कधी जाईन सांगता येणारे का बाबा?’ आजोबा गेल्यानंतर  आजी आणखी आणखी निवृत्त होत गेल्या. दिवसदिवस त्यांचं अरुंधतीशी बोलणं होत नसे. आनंदला एका कारखान्यात नोकरी लावून दिली अरुंधतीने! तो कसातरी एसेसी झाला  आणि  अरुंधतीने लाख प्रयत्न करून त्याला ही नोकरी लावून दिली. सावनी एवढी बीटेक् झाली तरी ना कधी अरुंधतीने तिच्या हातावर पैसे ठेवले का कधी तिला ड्रेसचे कापड आणले!सावनीचे सगळे लाड आजीने पुरवले!किती attached होती सावनी आजीला!

–क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिकवण… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

 ? जीवनरंग ?

☆ शिकवण… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.

छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.

मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.

मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”

“अगं ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.

आई म्हणाली, ”नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”

एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.

मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की गं आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला. 

आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता. 

आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.

त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”

“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची गरज आहे.” आजीने डोळे पुसले.

मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात. त्या म्हणाल्या, ”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”

मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”

मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे नोकरी लावून दिली व डॅाक्टरांना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.  

आई, तू किती चांगली आहेस ग!” म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, ”तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं… कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते, पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं. अपराध्याला काही न बोलता माफ करणं ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.

“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतंय. एखादी सवय अशी असते की आपलं चुकतंय हे माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं.” आई म्हणाली.

“मग आई, या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.

आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “ त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद  मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behavior therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्यांची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”

मी आईकडे अभिमानाने बघितलं.  १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढंच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं. 

मी आईला घट्ट मिठी मारली! “आई गं, तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”

आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असतं. आत लपलेले बरंच काही आपल्याला सहजी दिसत नाही..

“Before you judge someone, at least walk a mile in his shoes “ असं म्हणतात ते उगीच नाही !

लेखिका : सुश्री  ज्योती रानडे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.आता इथून पुढे)

दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही.’ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते.  एवढ्या माणसांचे  जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी  म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी  घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार  म्हाईसाठी माल नाही म्हणतो॰ “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर.’

” कुठे आई?

” रघु सोनार कितीपर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली  ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे,’. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला,  आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि  तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्या रूपात आत्ताच भेटली.’. दिपूची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम..ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ…. पु……

.म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला  म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम…ढम… ढम, ताड.. ताड… ताड…., शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी  म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी  ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई  म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर……

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर, पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने  संजयच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली  ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली.संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.’

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाई त्यांना शिक्षा देत नाही. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.’.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

– समाप्त –

म्हाई – गावदेवीची पालखीतून काढलेली मिरवणूक

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पहिले – आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता.दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले. आता इथून पुढे)

” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली  “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.

” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.

” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.

” हो का केव्हा आहे तुमची म्हाई?’

” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या  म्हाईची तयारी सुरु केली.

गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात  म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.

दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.

दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते.  त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली.

तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.

दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.

दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.

त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.

दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली  ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि  यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण.’

” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.

” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले  ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.

” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.

” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले  ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत.’ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली  “.

दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते.पण तिच्या मनाने उसळी घेतली.” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली  ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.

म्हाई – क्रमश: भाग २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय?’

तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

” घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय. ”

शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस?’

” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.

‘आता बर हाय का?’

” व्हय, घेणार का भाजी?’

” लाल माठ दे दोन जुड्या, “.

शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.

” दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

” काय सांगावं शांते, घरवाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे ‘

“. कुठल्या?’

‘ ती…. ती बुडाली त्या संस्थेत की काय?

” होय बाई, ‘

” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं?’

” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती. ’

” होय बाई, आणि दिपू अजून लहान हाय. ’

” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘

” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी  म्हाईचा लई खर्च असणार?’

” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. पन्नास – साठ लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. ”

‘मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?’

” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीसा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे  “.

” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.

” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात  “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत  म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.

एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खाण करावं लागतं. आणि माणसांना चहा पाणी.

” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?      ” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग  खाका वर करतात, ”

” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.

” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.

” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो  “.

” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.

” जातो मी उद्या’. ”

“जावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे  “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी  कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.

दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.

नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.

बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपूचं लग्न….

पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.

म्हाई – क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी

“तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायचीये म्हणून.ती संधी चालून आलीये बघ.येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत.तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव.आणि हो!यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत “

तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र,प्रताप फोनवर बोलत होता.

“ओके प्रताप.मी तयार आहे.माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत.ते काढून ठेवतो” तुषार आनंदाने म्हणाला.

काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून तुषारच्या मनात होत़ं.या कार्यक्रमाने त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती.शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती.

” अहो ऐकताय का?”

शितलच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.

” बोल काय म्हणतेय?”

“आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून “

” अगं आताच मी प्रतापला कबूल केलंय आदिवासींना कपडे द्यायचं.यावर्षी राहू देत कामवालीला.पुढच्या वर्षी बघू ” तुषार जरा चिडूनच बोलला.

” अहो.तुम्हांला माहितेय ना,तिचा नवरा टी.बी.च्या आजारामुळे घरीच असतो.मुलं लहान आहेत.कमावणारी ही एकटीच.तेही महिन्याला फक्त दिडदोन हजार कमावणार.काय होत असेल त्यात?आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो ३-४ हजारात.ती अख्खं कुटुंब चालवते त्या दिडदोन हजारात ” शितल त्याला समजावू लागली.

“असू दे.असंही तू तिला नेहमीच काही ना काही देत असते.यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं?आणि आता मी प्रतापला कबूल करुन बसलोय.समाजसेवा करायची चांगली संधी आलीये तर त्यात तू विघ्न आणू नकोस “

तुषार चढ्या आवाजात म्हणाला तशी शितल चुप बसली.

शेवटी तो दिवस उजाडला.तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला.मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोहचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता.पाड्यावर पोहचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती.तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता.त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या.त्याने चौकशी केली तेव्हा मंत्री,खासदार,आमदार आणि कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारेच झाडून हजर रहाणार असल्याचं त्याला कळलं.गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी?असा त्याला प्रश्न पडला पण  व्हि.आय.पी.व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचाराने तुषार खुश झाला.

पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तुषार बोलू लागला.त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या.दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागत होतं.म्हणायला वीजेचे खांब होते पण दिवसातून दोनतीन तासच वीज उपलब्ध असायची.काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायला येत नव्हतं.पाड्यावर दवाखाना नव्हता.तिथून अठरा किमी.वरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथे डाँक्टर क्वचितच उपलब्ध असायचे.खराब रस्त्यामुळे शहरात जाणयेणंही खुप त्रासदायक होतं.पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं.बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे.अडल्यानडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहचण्या अगोदरच प्रसुत व्हायच्या. कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं.आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची.अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची.सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची.मात्र निवडणुका संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पहात नव्हतं.ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला.आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली.

कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.हळूहळू एकेक पाहुणा यायला सुरुवात झाली.मंत्री महोदय तब्बल दोन तास उशीराने उगवले.त्यांच्यासोबत आलेल्या  आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की २५-३० लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं .पण ते खिशातली दमडीही खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात.निवडणुका आल्या की मग मात्र दानशुरपणाचा आव आणतात.

भाषणांची सुरुवात झाली.प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरीरीने मांडत होता.त्याचबरोबर  प्रतापची स्तुती करत होता.त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता.

भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे दोन वाजून गेले.तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला स्पष्ट जाणवत होतं.तो स्वतःही कंटाळून गेला होता.कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिध्दीचा हेच त्याला कळेनासं झालं.

शेवटी एकदाची भाषणं संपली.मग मंत्री,खासदार ,आमदार आणि प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं.आदिवासींना कपडे देतांना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता. कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आला.सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठितांसोबत फोटोसेशन झालं.मंत्री,आमदार, खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती.त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरु होती.ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच तुषारला समजेनासं झालं.कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पहात होते.

वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला.कार्यक्रम कसा झाला हे शितलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नाही.

दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेने सात आठ वर्तमानपत्रं विकत घेऊन आला.बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री,आमदार,खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते.एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता.चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला.त्या संतापातच त्याने प्रतापला फोन लावला.त्याने तो उचलला नाही. तीन चार वेळा प्रयत्न केल्यावरच त्याने तो उचलला.

” यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाहीये.सगळे मंत्री आणि आमदार,खासदारांचेच फोटो आहेत.” तुषार जरा रागानेच बोलला.

” हो मी पाहिले फोटो.आपण तर सगळे फोटो दिले होते.पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत.आणि हे तर तुलाही माहितेय तुषार की न्युज व्हँल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्युज व्हँल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात.हाच कार्यक्रम आपण राजकारणी पुढाऱ्यांना न बोलावता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुध्दा घेतली नसती किंवा घेतलीही असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती.अशा बातमीला काहीच किंमत नसते “

तुषार काय समजायचं ते समजला.जे खरे दानी होते त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं.भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या,जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरीबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे आणि स्वतःच्या प्रसिध्दीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते.तुषारने न बोलता फोन कट केला.या अशा दिखावू समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्याने स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.

दुसऱ्या दिवशी तो शितलला म्हणाला “अगं,आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग.मी माझ्या काही मित्रांशी बोललोय.ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत “

शितलला एकदम हायसं वाटलं.

“चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ” ती समाधानाने म्हणाली.

धनतेरसच्या दिवशी तुषारने शितलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं.त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला.त्याच्या हातातल्या रेडिमेड कपड्यांच्या  पिशव्या पाहून शितलला आश्चर्याचा धक्काच बसला.

“अहो हे तर नवे कोरे कपडे दिसताहेत.तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना?”

” हो शितल.पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची?माझ्या मनाला ते पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो “

कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरुन आले.तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.तुषार त्यांना कपडे देत असतांनाच शितल आतून नवीकोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली, ‘”सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे रहातेस?तुही नवीनच साडी घे.”

तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला.

” थांबा आई बाबा .कपडे देतांना फोटो काढू या”

तुषार त्याला थांबवत म्हणाला, “नको बेटा फोटो नको काढू.ही काही राजकारण्यांची दिखावू आणि स्वार्थी समाजसेवा नाहीये.हे माणुसकीचं वस्त्रदान आहे “

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

शाळेतून निवृत्त झाल्यावर आयुष्य कसं आनंदात चालले होते. सकाळी पांच वाजता उठायचे, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक तास फिरून यायचे, आल्यावर बागेतून चक्कर मारायची. तोपर्यंत घरातील सर्वजण उठायचे. मग चहा करून बाल्कनी मध्ये बसून गरम चहाचे घोट घ्यायचे. कधी कधी फुले काढता काढता शेजारच्या काकूंशी गप्पा व्हायच्या. मग घरातील पुढचे व्यवसाय सुरू करायचे. पण आज माझी लगबग पाहून माझी मुलगी सोनू म्हणाली, “का ग आई !आज फार खुशीत दिसते आहेस आज काहीतरी विशेष दिसते “. मिस्टरांनी पेपर बाजूला करून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले”अगं माझी बाल मैत्रीण’ विद्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. त्यासाठी कलेक्टर मेधाताई साने प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत आणि त्या सोहळ्याला मला आग्रहाचे निमंत्रण आहे. “त्यावर माझा मुलगा म्हणाला, “कोणाच्या? विद्यामावशीचया पुस्तकाचे का?”त्यावर मी होकार दिला आणि माझे मन भूतकाळात गेले.

आम्ही सांगलीला रहात असताना आमच्या शेजारी जोशींचे बिऱ्हाड राहायला आले. ते जोशी काका जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुली आणि त्यांची आई असा परिवार होता. त्यांची थोरली मुलगी संध्या माझ्याच वर्गात होती व धाकटी विद्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. जोशी आजींना पहिली नात झाली तेव्हा त्या थोड्या नाराज झाल्या, त्यांना नातू हवा होता पण काही दिवसांनी दुसरी नात जन्मली आणि तिच्या दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचे यजमान अकस्मितपणे हृदयविकाराने स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याचे खापर विद्याच्या डोक्यावर फोडले गेले तिचे बारसेही केले नाही. ती दिसायला सुंदर होती. काळेभोर केस, टपोरे डोळे, गौरवर्ण आणि भरपूर बाळसे. इतकी सुंदर की पाहिली की उचलून घ्यावी अशी छान मुलगी होती ती, पण सगळेजण तिलाही हिडीस फिडीस करत. आजीनंतर तिचं नाव “नकोशी “ठेवलं होतं. आईचा मात्र तिच्यावर फार जीव होता. शेवटी मातृ हृदयच ते! आई तिला विद्या नावाने हाक मारत असे. ती अतिशय हुशार होती जणू तिच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. अर्थात या सर्व गोष्टी मी मोठी झाल्यावर माझ्या आईकडून मला कळल्या.

हळूहळू विद्या मोठी झाली. तिला आमच्या शाळेत प्रवेश घेतला गेला. कोणतीही स्पर्धा असो ती कशातच मागे नव्हती. तिचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होते.

प्रवेशद्वाराजवळील फलकावर सुविचार लिहिण्याचा मान तिलाच मिळायचा. शाळेमध्ये पहिला नंबर तिने कधीच सोडला नाही. दहावी परीक्षेत तर गुणवत्ता यादीत येण्याचे भाग्य तिला लाभले. तिला मोगऱ्याची फुले फार आवडत। कायम मोगऱ्याच्या दिवसात तिच्या शेपट्यावर मोगऱ्याचा गजरा असायचाच.

दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गौरवर्ण, बोलके डोळे लांब सडक केसांचा शेपटा व त्यावर मोगऱ्याचा गजरा यामुळे एकदम सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या. हुशारी आणि मनमोकळा स्वभाव या गुणांनी लवकरच “कॉलेज क्वीन “होण्याचा मान तिला मिळाला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन तिने केले होते

स्नेह संमेलनाच्या वेळी तिचे सौंदर्य ‘हुशारी व सभधीटपणा पाहून एका गर्भ श्रीमंत गृहस्थांनी माधवरावांनी, आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांनी आनंदाने तिचे कन्यादान केले. लग्न होऊन सोन पावलांनी घरची लक्ष्मी घरी आणली. घरचा व्याप सांभाळून ती घरच्या व्यवसायातही मदत करू लागली. माधवरावांना तिचे खूपच कौतुक होते, आपल्या गुणांनी तिने सर्वांची मने जिंकून घेतली माधवरावांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी तिने अंगावर घेतली व सुनीलच्या खांद्याला खांदा लावून ती मेहनत करत होती. अशा रीतीने दोन वर्षे भुरकन उडून गेली. आता मात्र सर्वांना लहान बाळाची चाहूल हवी होती. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले होते. . खूप डॉक्टरी उपचार करून झाले पण दैव साथ देत नव्हते. तिच्या मातृत्वाचा हक्क दैवाने नाकारला होता तिला मूल होणारच नाही हे समजता क्षणी घरची माणसे बदलली, सगळीच नाती विस्कटली. समारंभाला जाताना सारे जण तिला टाळू लागले पण नणंदेला तिचे कौतुक होते. विद्या मात्र शांत होती समईतील वातीसारखी. माणूस ठरवतो एक आणि नियती घडवते दुसरच आपण तिच्या हातातलं बाहुलं असतो हेच खरे!

पुढे दोन वर्षांनी नणंद बाळंतपणासाठी माहेरी आली. तिच्या डोहाळे जेवणाचा घाट विद्याने पुढाकार घेऊन घातला. तिला प्युअर सिल्कची साडी व गळ्यातील नेकलेस आणला. त्यावेळी सुद्धा ओटी भरताना विद्याच्या मावस सासूला ओटी भरायला सांगितले गेले, जाणून बुजून सुनेला डावलले गेले.

दिवस भरल्यावर नणंदेला मुलगा झाला. तिच्या सोबत सासूबाई दवाखान्यात दोन दिवस राहिल्या. मुलगी व बाळ घरी आल्यावर तिच्या खोलीत जाण्यास विद्याला बंदी केली गेली, बारशाचया दिवशी तर कहरच झाला नणंदेची ओटी भरायला पुढे आलेल्या विद्याला हात धरून मागे ओढले गेले आणि” अगं ‘बाळंतिणीची ओटी लेकुरवाळी स्त्रीने भरायची असते हे तुला माहित नाही का? असे म्हणत सासूबाई डाफरल्या आणि शेजारच्या काकूंना ओटी भरण्याचा मान दिला. प्रत्येक ठिकाणी अपशकुनी ठरवून तिच्या सासूने, एका स्त्रीने एका स्त्रीची अवहेलना केली.

विद्याने कधीही चकार शब्द काढला नाही. येईल ती परिस्थिती निमूट पणे सहन करत होती. माहेरच्या माणसांना वाटे, ” विद्या नशीबवान आहे’ चांगला बंगला आहे, दारात  चार चाकी गाडी आहे, घरात नोकरांचा राबता आहे” आणि विद्या सुद्धा सर्वांच्या पुढे हसतमुख राहून आनंदी असल्यासारखी दाखवायची.

सुनील ‘तिचा नवरा सुद्धा रंग बदलू लागला सरड्यासारखा. ज्याच्या जीवावर आपलं घरदार सोडून, पुढील शिक्षण सोडून ती आली होती याचा विचार न करता तो तिला हिडीस-फिडीस करू लागला, मोलकरणी सारखा वागू लागला. मातृत्वाच्या कमतरतेवर वारंवार टोचून बोलू लागला. असेच दिवस चालले होते. नणंदेच मुलगा पाच वर्षाचा झाला. आजीने त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. कार्यक्रमासाठी बरेच मित्र नातेवाईक, विद्याची बहिण व मेहुणे मुलासह आले होते.

कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी घरातली मंडळी, नातेवाईक यांची सरबराई करण्यात विद्या दंग होती, त्यावेळी नणंदेचा मुलगा आणि तिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या आमराईत खेळायला गेले. तिथे कैऱ्या पडण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा दगड  चुकून उत्सव मूर्तीला लागला आणि कपाळाला खोक पडली. कोणीतरी  घरी येऊन सांगता क्षणीच नवऱ्याने तिच्यावर तोंड सुख घेतले” तू अवलक्षणी आहेस आता इतरांनाही तुझ्या पायगुणाचा प्रसाद मिळू लागला आहे तेव्हा तुझा घरात राहण्याचा अधिकार संपला आहे. तू घरातून चालती हो”

सर्व नातेवाईकांसमोर अपमानित झालेल्या विद्याने दोन कपड्यानिशी घर सोडले. रात्री ती स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तिने पुणे गाठले आणि “हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत” दाखल झाली. तिने आपली कर्म कहाणी तिथल्या संस्थापकांच्या कानी घातली. तिथल्या संस्थापक ताईंनी संस्थेमध्ये राहण्याची तिला परवानगी दिली. संस्थेत राहून तिने बी. एड. केले. तिच्यातील जिद्द पाहून तिला त्यांच्या शाळेत नोकरीत रुजू करून घेतले. नोकरी करता करता तिने पी. एच. डी. पदवी संपादन केली आणि वसतिगृहाच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.

नोकरीतून जमलेल्या पुंजीतून आणि काही कनवाळू लोकांच्या देणगीतून पुण्याजवळ मायेची पाखर घालणारी” स्नेहालय” ही संस्था तिने सुरू केली. त्या संस्थेत अनाथ मुलं, दुर्लक्ष केलेल्या स्त्रियांना आसरा दिला. त्यांच्यासाठी व्यवसायाभिमूख कार्यशाळा सुरू  केल्या, त्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आपलं स्वतःच नाही म्हणून काय झाले संस्थेत येणारी मुले आपलीच आहेत असे मानून यावर मातेप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला आणि आपले जीवन सार्थक केले.

आज तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. नाव होते “मोगरा फुलला “. समाजामध्ये अनेक सामान्य स्त्रिया आहेत की ज्यांच्या पदरी दुःख आले असताना सुद्धा त्यांनी दुःखावर मात करून यशस्वी वाटचाल केली होती. रूढी अंधश्रद्धा यांना झुगारून प्रयत्नांची कास धरली होती आणि  त्या यशस्वी झाल्या होत्या, अशा स्त्रियांचे उदाहरणे देऊन तिने कथा लिहिल्या होत्या.

मोगऱ्याचे छोटेसे सुंदर ताजे फूल सुगंध देते, गजरा करून डोक्यात माळला तर केसांनाही सुगंधित करते. ते हातात घेतलं तर हातांना सुगंध येतो, आपले सुगंध पसरविण्याचे काम ते सोडत नाही.

प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. प्रखर बुद्धिमत्ता, श्रमाची आवड, मन ओतून काम करण्याची पद्धती या विद्याच्या गुणांमुळे अनेक प्रतिष्ठित लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. कलेक्टर मेधाताईंनीही विद्याच्या कार्याचे कौतुक केले आणि तिच्या कामात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली. आता तिचं मित्र मंडळ ही मोठं होतं॰ कुठेच कमतरता,. . न्यूनता नव्हती. चहापानानंतर मेधाताईंना प्रवेशद्वाराशी निरोप देऊन आम्ही परत हॉलमध्ये आलो. त्यावेळी एक मोगऱ्याचा गजरा आणि चिठ्ठी असलेले एक तबक कार्यकर्त्याने विद्याच्या हाती दिले. चिठ्ठी कोणाकडून आली असावी ?असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर उमटले. शांत चित्ताने  विद्याने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.

विद्या

प्रिय विद्या म्हणण्याचा अधिकार मी केव्हाच गमावून बसलो आहे वर्तमानपत्रात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचली आणि  आर्जवून समारंभास येण्याचे धाडस केले. पण तुला  भेटण्याचे मनात असूनही पुढें आलो नाही. तसे पाहता माझ्याकडून तुझी अवहेलनाच झाली, मी तुझा शतशः अपराधी आहे. जमली तर मला क्षमा कर. मी माझं राहतं घर” स्नेहालय “संस्थेच्या नावे केले आहे त्याचा   अव्हेर करू नकोस. केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर होता माझ्या या विनंतीचा स्वीकार कर आणि यशस्विनी हो!.

सुनील !

अंधश्रद्धा आणि रुढीला चिकटून राहून सर्वांनी विद्याची अवहेलना केली होती पण त्या दुःखाला कवटाळित न बसता विद्याने पिडीत स्त्रियांना आणि निराधार बालकांना आधार दिला होता. त्यांची ती माय झाली होती. अशा प्रकारे महान कार्य करणारी माझी मैत्रीण खरोखर सर्वांची विद्याई झाली होती.

समारंभ संपता क्षणीच तिनं मला मिठी मारली. त्या मिठीत कौतुकाचा आनंद आणि पती न भेटता गेल्याचे दुःख सामावले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज खऱ्या अर्थाने विद्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.

*साहित्य प्रेमी भगिनी मंडळला पाठवलेली व प्रथम क्रमांक मिळालेली कथा

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मातीची ओढ… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली   

(पण एखाद्याला सोन्याचे अंडे खाण्यापेक्षा कोंबडीच कापून खायची असेल तर त्याला कोण काय करणार?)  इथून पुढे —–    

“सदाकाका, आम्हाला शेती करण्यात इंटरेस्ट नाहीय. इथे एकरी चार लाख रूपये भाव चालला आहे असं ऐकलंय. बारा लाख रूपये येतील. विकणेच रास्त ठरेल.” सुधीरने सांगून टाकले.

“ही शेतजमीन बाहेरच्या कुणालाही विकू नये अशी आमच्या आबांची इच्छा होती.”

“ठीक आहे, मग बारा लाख रूपये देऊन तुम्ही विकत घ्या.”

आक्का आणि काशिनाथकडे पाहत सदाभाऊ म्हणाले, “ठरलं तर. पुढच्या आठवड्यात सौदा पूर्ण करू. आमच्या एका भावानं आपला हिस्सा विकून खाल्ला आहे असं गावात बभ्रा व्हायला नको म्हणून विक्रीपत्राच्याऐवजी दानपत्र करून घेऊ. दुसरी अट, यापुढे किसन आमच्याबरोबर इथेच राहील. मंजूर असेल तर बोला.” किसनरावांना एका शब्दानंही न विचारता सुधीर आणि अविनाश यांनी दोन्ही अटी मान्य करून टाकल्या. विशाखाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. किसनरावांनी मायेनं विशाखाच्या पाठीवर हात ठेवला.

किसनरावांच्या शेतजमीनीची विक्री वा दानपत्र करण्यासाठी सुधीर आणि विशाखाकडून रीतसर संमतीपत्र तसेच किसनरावांच्या नावाने योग्य ते कुलमुख्त्यारपत्र लिहून रजिस्टर करून घेतलं. सदाभाऊ, आक्का आणि काशिनाथ या तिघांनी मिळून बारा लाख दिले. दानपत्र केलंच नाही, किसनरावांचं नांव सातबाऱ्यावर तसंच राहिलं. ते नियमितपणे शेतात जाऊन शेतीची कामं बघायला लागले. अकाउंटिंगच्या आणि बॅंकेच्या कामात काकांच्या रूपाने प्रशांतला मोठा आधार मिळाला.

अविनाशचं क्लिनिक सुरू झालं. सुधीरनं फ्लॅट बुक केला. बघता बघता दोन वर्षे सरून गेली. विशाखा आठवड्यातून एकदा तरी फोन करत होती. सुरूवातीला सुधीरचे येणारे फोन कमी कमी होत गेले. वाड्यावर किसनरावांची सर्वचजण काळजी घ्यायचे. त्यांना त्यांच्या नातवंडांची आठवण यायची.

अलीकडेच त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. एकदा फोनवर बोलताना ही गोष्ट विशाखाच्या लक्षात आली. “बाबा, आधीच फोन करायचं होतं ना. तुमचे जावईच डॉक्टर आहेत. मी तुम्हाला घेऊन जायला आले असते.”

किसनरावांनी सांगितलं, “बेटा, मला काहीही झालं नाही. प्रशांतने शहरात नेऊन सगळ्या टेस्ट्स करवून घेतल्या आहेत. औषधोपचारदेखील चालू आहे.”

विशाखाने सदाकाकांशी बोलून घेतलं. ‘दोनच दिवसात परत पाठवणार असशील तरच किसनला येऊन घेऊन जा.’ असं सदाभाऊंनी स्पष्टच सांगून टाकलं.

विशाखाने लगोलग सुधीरला फोनवर सांगितलं, ‘सुधीर, बाबांची तब्येत बरी दिसत नाहीये. उद्या सुटीच आहे. सकाळी लवकर ये. आपण जाऊन बाबांना काही दिवसासाठी इकडे घेऊन येऊ.’

सकाळी दोघे कारने गावाकडे निघाले. बाबांना परत आणण्याच्या कल्पनेनेच सुधीर अस्वस्थ झाला होता. अखेर त्यानं तोंड उघडलं, “ताई, बाबांच्या तब्येतीच्या दृष्टिने त्यांनी गावातच राहणं चांगलं आहे. इकडे कशाला बोलावते आहेस? तुला माहीत आहे की मी भाड्याच्या घरात राहतो ते. माझ्याकडे जागा कुठे आहे? बाबांना तुझ्याकडेच का घेऊन जात नाहीस? औषधोपचारासाठी तुमच्याकडे क्लिनिकही आहे.”

विशाखाला सुधीरचं बोलणं आवडलं नाही. पण तिने विचार केला, अविनाशने तर रूग्णांच्या सेवेचंच व्रत घेतलं आहे. पितृतुल्य सासऱ्यांना तो थोडंच नाही म्हणणार आहे?  “बरं, मी घेऊन जाईन. झालं.” विशाखा ठसक्यात म्हणाली.

खूप दिवसांनी बाबांना पाहिल्यावर विशाखाच्या डोळ्यांत पाणी आलं. किसनराव म्हणाले, “वेडाबाई मला काहीही झालं नाही. हे रिपोर्ट्स बघ आणि ही औषधे.”

“बाबा तुम्हाला इथे काही कमी आहे म्हणून आम्ही न्यायला आलो नाही. तुमची तब्येत बरी नाही हे ऐकून सुधीरही अस्वस्थ झाला होता आणि तुमचे जावई तुम्हाला घेऊन या म्हणून आग्रह करीत होते म्हणून आम्ही आलो.” विशाखाने रेटून सांगितलं. दुपारच्या जेवणानंतर किसनरावला घेऊन विशाखा आणि सुधीर निघाले.

सुधीरची मुलं आतेभावांना भेटायला म्हणून विशाखाच्या घरीच आली होती. सगळ्यांच नातवंडांना एकत्र पाहून किसनराव खूप सुखावले. थकवा वाटत असल्यामुळे जेवण करून ते झोपायला गेले.

अविनाश क्लिनिकहून उशीरा आले. जेवणं झाल्यानंतर विशाखाने अविनाशला सहज सांगितलं, “अहो, सुधीरचा फ्लॅट लहान पडतो म्हणून मी बाबांना आपल्याकडेच घेऊन आले आहे.”

त्यावर अविनाश एकदम भडकला, “इथे का आणलंस? तुझ्या बाबांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्या भावाची आहे. फ्लॅटसाठी पैसे घेताना त्याला लाज वाटली नाही. उद्या सकाळीच त्यांना सुधीरच्या घरी पाठव. त्याला जमत नसेल तर वृद्धाश्रमात दाखल कर म्हणावं. माझे बॅंकेचे लोन फिटताच मी घेतलेले पैसे परत करीन, हे तुझ्या बाबांना सांग. कळलं?”

विशाखा पहिल्यांदाच अविनाशचं हे वेगळं रूप पाहत होती. “अविनाश, तुम्ही रात्रंदिवस रूग्णांची इतकी सेवा करीत राहता म्हणून त्यांना चार दिवस इकडे आणलं होतं. तुमच्या मनांत, घरात माझ्या बाबांच्यासाठी काहीच का स्थान नाही? बरोबर आहे म्हणा, इतर रूग्णांची सेवा केल्याने तुम्हाला पैसे मिळतात. हे मी विसरलेच. आणि हो, माझ्या बाबांचे पैसे परत करायचं म्हणत होता, जेंव्हा त्यांचे पैसे परत कराल त्यावेळी पैसे घ्यायला ते असतील की नाही हे त्या देवालाच माहीत. नोकरी सोडायला लावून तुम्ही माझे पंख कापून टाकलेत. आता एक अगतिक कन्या आपल्या बापासाठी तरी काय करणार म्हणा.” असं म्हणून विशाखा पटकन तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश क्लिनिकला गेल्यानंतर नाष्टा घेऊन विशाखा बाबांच्या खोलीत गेली. किसनराव सामान बांधूनच बसले होते. “बेटा, काल रात्रीचं तुमचं बोलणं ऐकलंय मी. माझ्यामुळे तू आपल्या संसारात विष कालवू नकोस. मायेची ऊब आणि आपुलकीचा ओलावा गवसत नसल्याने शहरातील बरीचशी वृद्धमंडळी मुळातच खुरटल्यासारखी दिसतात. गजबजल्या गोकुळात असून देखील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे ते एकाकीच असतात. मला जाऊ दे.

घाबरू नकोस मी काही वृद्धाश्रमात जाणार नाहीय. कुणी शेतकरी बापडा वृद्धाश्रमात असल्याचं मी तरी आजवर ऐकलेलं नाही. गावाकडे माझी भावंडं माझी आतुरतेने वाट पाहताहेत. मला माझ्या मातीच्या मायेची ओढ लागून राहिलीय. टॅक्सी बोलावून घे. मी जाईन.” विशाखा स्वाभिमानी बाबांची संवेदनशीलता जाणून होती.

घरासमोर एक टॅक्सी येऊन थांबली. अगदी अकल्पितपणे टॅक्सीतून प्रशांत उतरला. “ताई, काका आहेत का ग?” असं म्हणत आत आला.

किसनराव बॅग घेऊन हसतच बाहेर आले. “प्रशांत गावाकडे चाललास ना?  बेटा, मला इथे करमत नाही. चल मी येतो.”

विशाखाच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवून किसनराव टॅक्सीत बसले. सुधीरने बाबांच्या तब्येतीची चौकशीही केली नाही. आपलं काळीज ज्या जावयाच्या हातात सोपवलं होतं, तो जावई किमान सासऱ्यांना भेटला  देखील नाही. ‘बाबा इथे आरामात रहा, जायची घाई करू नका’ किमान असं तोंडदेखलं तरी बोलून तरी अविनाशने बाबांचा मान राखायला हवा होता. दोनच दिवसांचा प्रश्न होता. बाबा कुठे इथे आयुष्यभर राहायला आले होते?’ असं विशाखाला वाटून गेलं.

बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता पण या विचारांच्या वावटळीत, अगतिक विशाखाच्या डोळ्यांतला पाऊस मात्र थांबतच नव्हता.

— समाप्त — 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print