मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – १” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची

दरवेळी हे नाट्यगीत ऐकताना हिमालयाची ओढ जागी व्हायची. खरं तर ती शुभ्र हिमशिखरे डोळा भरून पाहण्याची माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छा असते. पण ती प्रत्यक्षात येणे इतके सोपे नसते. इतकी वर्ष ती शिखरं साद घालीत होती. यावर्षी आम्ही तिला प्रतिसाद दिला. या सुट्टीत काश्मीरला भेट देण्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात आले.

भारतभूच्या  ‘नंदनवना’ची सफर ठरली. नियोजनाचे सर्व सव्यापसव्य पार करीत आम्ही अगदी सहकुटुंब त्या देवभूमीत जाऊन पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. त्या संधीप्रकाशात ‘दल’ सरोवरात एका शिकाऱ्यातून आमच्या नियोजित हाऊस बोटवर जाऊन पोहोचलो. विविध रंगात, विविध प्रकाराने, रोषणाईने सजविलेले शिकारे, मोठ्या हाऊस बोटस् आणि त्यांची पाण्यातील प्रतिबिंबे ! एकूणच भुरळ घालणारं मोठं मोहक वातावरण होतं.

आत्तापर्यंत सिनेमातून पाहिलेली शिकाऱ्यातली गाणी आठवली. काश्मिरी गालिचे, कलाकारी, लाकडी कलाकुसर, झुंबरं यामुळे हाऊस बोट मधील वातावरणात आपोआपच शाही महालाचा आभास जाणवत होता. या बोटीवर राहण्याचा अनुभव खूप खास होता. एक वेगळाच आनंद मिळला.

या हाऊस बोटची संपूर्ण लाकडी बांधणी आणि रचना खूप वेगळी असते. देवदार वृक्षापासून ती बनवतात. हे लाकूड पाण्यामधे खराब न होता सुरक्षित रहाते. एक बोट बनवायला अंदाजे ३ ते ५ कोटी पर्यंत खर्च येतो. या बोटी इथल्या पर्यटनाच्या खासियत आहेत. करोना काळानंतर आता पर्यटनाने पुन्हा वेग पकडला आहे.

चार चिनार’च्या बेटावर जाताना फक्त आपापल्या कुटुंबासोबत केलेली अडीच तीन तासांची शिकारा राईड केवळ अविस्मरणीय होती. साथीला ‘आपलं माणूस’, संथपणे जाणारी बोट, आजूबाजूला जाणारे असंख्य शिकारे,  दूरवर पसरलेले दल सरोवर, पार्श्वभूमी वरती उंच उंच चिनार, देवदारची झाडे, पर्वतरांगा केवळ अप्रतिम ! अगदी स्वप्नवत अनुभव होता तो.

चार चिनारच्या बेटावर प्रसन्न, आल्हाददायक वातावरण होते. दूरवर दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, ‘कावा’ चहाची सुंदर चव, कश्मिरी फिरन / फेरन मधील फोटो सेशन असे सुखद क्षण घेऊन परत फिरलो.

परत येताना फ्लोटिंग मार्केटमध्ये काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, कार्पेट्स, लाकडी वस्तू, ज्वेलरी यांच्या शोरूमस्, दुकाने बघितली. या सरोवरात गवताच्या बेटांवर वाफे बनवून शेती केली जाते ही गोष्ट खूप वेगळी होती.

यानंतर बघितले ते पुरातन धार्मिकस्थळ म्हणजे शंकराचार्य मंदिर. गोपाद्री पर्वत किंवा शंकराचार्य टेकडीवरील शंकराचार्य मंदिराला ‘जेष्ठेश्वर मंदिर ‘ असेही म्हणतात. या मंदिरात शंकराचे अति भव्य लिंग आहे. शंकराचार्यांचे साधना स्थळ पण तिथे आहे. उंच पायऱ्या चढण्याचा काहीही त्रास न होता आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या पवित्र मंदिराला भेट देता आली याचे मनाला खूप समाधान मिळाले. या मंदिर परिसरातून श्रीनगरचे आणि भव्य निसर्गाचे विलोभनीय दर्शन झाले‌. हा मंदिर परिसर मिलिटरीच्या अधिपत्याखाली असल्याने सर्व व्यवस्था, स्वच्छता वगैरे गोष्टी उत्तम आहेत.

त्यानंतर श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘निशात बागे’ला भेट दिली. असंख्य नमुन्याचे गुलाब पाहून मन अतिप्रसन्न झाले. अगदी छोट्या गुलाबापासून खूप मोठ्या आकाराचे कलमी गुलाब होते. असंख्य रंग, आकार, एकाच फुलात वेगवेगळ्या रंगछटा, वेली गुलाब असे एकाहून एक वेगवेगळे गुलाब पाहून ‘हे पाहून का ते’, ‘ हे सुंदर का ते जास्त सुंदर ‘ असे होऊन गेले.  शोभेची छोटी छोटी फुले सुद्धा तितकीच विविध आकार आणि रंगात आकर्षित करीत होती. चिनारचे मोठे मोठे वृक्ष वातावरण जास्तच शितल आणि आल्हाददायक बनवीत होते. बागेच्या मध्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा, कारंजी नेत्रसुखद होती. एकंदरीत ही बाग ‘ दि गार्डन ऑफ प्लेजर’ हे नाव सार्थ करत होती.  

त्यानंतर ‘शालिमार बागे’ला भेट दिली. इथेही मोठे मोठे चिनार वृक्ष, असंख्य रंगीत गुलाब, धबधबा, कारंजी, राणीमहाल, इतर दोन-तीन जुन्या इमारती आहेत. प्रचंड मोठी अशी ही बाग माणसांनी पण भरलेली होती.

एकंदरीतच अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, शिकारा सफर, शंकराचार्य मंदिर दर्शन यामुळे श्रीनगर मधील पहिला दिवस खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्यक्ष हिमशिखरावर जायची जास्ती उत्सुकता होती.

क्रमशः… 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पाठीवर हात असू दे… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘ रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं ‘..  

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी…  वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतीची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ ये इकडे, तिचं संपायचं नाही ‘. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे….  विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘ पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या ‘. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा !  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे….”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय, नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. .

लेखक : श्री जयंत विद्वांस

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा  आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा…” – लेखक : श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!

आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 

ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायणात लिहिले आहे, 

“मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा. 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”

माणूस जे काही जगतो, तर्क लावतो, शोध लावतो ते मृत्युपाशी येऊन थांबतात. मृत्यूनंतर पुढे काय होतं, हे कोणालाही माहित नाही. कारण आपण पराधीन आहोत. तरीही आपले डोळे, त्वचा, किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस, आतडी, स्वादुपिंड, हात, पाय दुसऱ्याला देऊन आपण आपल्या मृत्यूनंतरही अवयवाद्वारे ह्या जगात राहू शकतो. आपला मृत्यू नैसर्गिकपणे मेंदू बंद होऊन (ब्रेन डेड) झाला असेल तर आपण एकूण ९ व्यक्तींना विविध अवयव देऊ शकतो. अवयवदान करून झाल्यानंतर मृत व्यक्तीचा देह त्याच्या नातलगांकडे सोपवला जातो. जेणेकरून ते अंत्यविधी करू शकतील. संपूर्ण शरीर दान केलं असेल तर मात्र मृतदेह नातलगांकडे सोपवत नाहीत. ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल काॅलेजमध्ये शरीर दान केलं ते हॉस्पिटल साधारणपणे ५ वर्षे तो देह जपून ठेवतात. देह टिकाव म्हणून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. असा देह वैद्यकीय प्रशिक्षण व संशोधनासाठी उपयोगात आणतात. त्यानंतर काळजी व सन्मानपुर्वक मृतदेहाची विल्हेवाट लावतात. हा मृतदेह वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. ते विद्यार्थी मृत शरीर उघडून प्रत्येक अवयव प्रत्यक्ष पाहू व हाताळू शकतात. पुढे तेच डॉक्टर बनतात आणि वैद्यकीय सेवा पुरवून मानवी जीवन सुखकर बनवतात. 

एका आकडेवारीनुसार दरवर्षी ४,००,००० व्यक्ती अवयवाची वाट पाहत असतात. अवयव मिळाला नाही तर नाईलाजाने मृत्यू स्वीकारतात. त्यांच्याकडे एकच उपाय असतो तो म्हणजे अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीमध्ये नाव नोंदवणे! प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्यामुळे दर दोन मिनिटाला एक भारतीय माणूस आपले प्राण गमावत असतो. अवयव मागणाऱ्यांच्या प्रतिक्षा यादीत जरी नाव नोंदवले तरी अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे अवयव मिळत नाहीत. १९९५ सालापासून आतापर्यंत मेंदू बंद पडून मृत झालेल्या फक्त १४,००० व्यक्तिंनी अवयव दान केले आहेत. सामान्य भारतीय माणूस अवयव दान करायला राजी होतं नाही. कारण अवयव दान केल्यामुळे पुढील जन्मी दान केलेल्या अवयवाशिवाय जगावे लागेल, मृत व्यक्तीचे शरीर खराब होईल, ज्येष्ठ व्यक्तीचे अवयव दान करता येत नाहीत, मृत व्यक्तीच्या घरी सरकारी ऍम्ब्युलन्स अवयव काढून घ्यायला येते असे बरेच गैरसमज आहेत. मात्र ह्यातील काहीही खरं नाही. एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याचे शरीर जाळून किंवा पुरून टाकतात. मरणारा व्यक्ती आपला देह इथेच सोडून जातो. त्याची राख होते. पुढील जन्म असेल तर ते शरीर तो सोबत नेत नाही. थोडक्यात त्याचे शरीर वाया जाते. अवयवदान किंवा देहदान केलं तर शरीराचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

अवयव किंवा देहदानाला वयाची मर्यादा नाही. २४ तास, ७ दिवस केव्हाही दान स्वीकारले जाते, मात्र मृत्यूनंतर ठराविक अवधीत, शक्य तितक्या लवकर दान करावे लागते. त्यासाठी फक्त मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी परवानगी द्यावी लागते. हाॅस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असतानाच मेंदू बंद पडून मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे हाॅस्पिटलचे अधिकृत मार्गदर्शन व सेवा उपलब्ध असते. हृदय बंद पडून घरी मृत्यू आल्यास दानासाठी संबंधित संस्थेला किंवा व्यक्तीला कळवावे लागते (NGO). त्यांना कळवल्यानंतर त्वचादान व नेत्रदान स्वीकारण्यासाठी त्वचापेढी व नेत्रपेढीचे त्यांचे (Skin / Eye Bank) डॉक्टर घरी येऊन दान स्वीकारतात. मात्र दान दिल्यानंतर त्याबदल्यात पैसे मिळत नाहीत. हे दान निस्वार्थी मनाने करावे लागते. देहदानासाठी मृतदेह जवळील मेडिकल काॅलेजच्या एनाटॉमी डिपार्टमेंट मध्ये नेऊन द्यावा लागतो. (त्यासाठी काही मोजक्या मेडिकल काॅलेजकडून शववाहिनी पाठवली जाते). तसेच १८ वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती दान करण्यासाठी आपलं नाव नोंदवू शकते. नाव नोंदवले नसेल तरीही हे दान करता येते. 

अवयव दान करण्यासाठी प्रत्येक अवयवाचे “शेल्फ लाईफ” ठरवलेले आहे. “शेल्फ लाईफ” म्हणजे माणूस मृत झाल्यानंतर त्याचे अवयव काढून गरजू व्यक्तीवर ठराविक तासात प्रत्यारोपित करण्याचा कालावधी. त्वचा आणि डोळे दान करायचे असतील तर मृत्यूनंतर ५ ते ६ तासात काढून घ्यावे लागतात. हे अवयव काढून घेताना मृत व्यक्तीचं एक थेंबही रक्त सांडत नाही. त्वचा दान केली असेल तर ती आग, विद्युत अपघातात त्वचा गमावलेल्या व्यक्तीला जीवघेण्या संसर्गापासून बचावासाठी उपयोगी पडू शकते. त्वचा दान केल्यानंतर ती पुढील ५ वर्षे जतन करून ठेवता येते. 

डोळे दान केल्यावर ते ४८ तासांमध्ये अंध व्यक्तीला देता येतात. दान केलेल्या डोळ्यांचे प्रत्यारोपण केल्यामुळे त्या व्यक्तीला दिसू लागते. हात दान केला असेल तर तो १२ तासांमध्ये गरजू व्यक्तीला द्यावा लागतो. अवयव किंवा देहदान करण्यासाठी मृत्यूचे कारण तपासले जाते. तसेच, गरजू व्यक्तीचा रक्तगट जुळून येणे इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. सुदैवाने, विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीला लावण्यात फार अडचण येत नाही. 

देहदानासाठी १९४९ साली आणि अवयवदानसाठी १९९४ साली कायदा झाला. पण पुरेशी जनजागृती नसल्यामुळे फार कमी प्रमाणात दान दिले जाते. मुळातच मृत्यूवर फारशी चर्चा होत नाही. अशी चर्चा करणे अशुभ मानले जाते. आपोआपच मृत्यूनंतर इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या अवयवांचं काय करायचं हा विचार मनात येणं कठीण असतं. 

लिव्हर, आतडी, स्वादुपिंड हे आपले अवयव आपला मेंदू बंद पडल्यानंतरही काम करू शकतात हे अनेकांना माहित नाही. जर जनजागृती झाली, मोठ्या प्रमाणावर दान झाले तर एकट्या नेत्रदानामुळे देशातील सर्व 

” कॉर्नियल अंध” व्यक्तींना दृष्टी मिळेल. ते हे सुंदर जग पाहू शकतील. 

मृत्यू दोन प्रकारे होतो. सामान्यपणे हृदय बंद पडून मृत्यू होतो. दुसरा प्रकार आहे मेंदू बंद पडून मृत्यू होणे. अवयवांना सतत रक्तपुरवठा लागतो. म्हणून हृदय बंद झाल्यानंतर काही अवयव निकामी होतात तर त्वचा, डोळे, हाडे हे अवयव कामी येऊ शकतात. हे अवयव मृत्यू झाल्यानंतर ५ तासांमध्ये काढून घ्यावे लागतात. त्वचेचे ३ थर असतात. त्वचा दान केली असेल तर मांडी व पाठीची त्वचा काढून घेतली जाते आणि त्यानंतर मृतदेह नातलगांकडे दिला जातो. ज्यांना अवयव दिले जातात त्यांची नोंद किंवा निवड सरकारी नियमानुसार होते. त्यात पारदर्शकता असते. 

मृत्यूनंतर संपूर्ण देह दान केला असेल तर रसायने वापरून हा देह ५ वर्षापर्यंत टिकवला जातो. एक देह डॉक्टर बनणाऱ्या १० विद्यार्थ्यांना उपयोगी पडतो. हे डॉक्टर दिवसाला किमान एका व्यक्तीचा जीव वाचवतात. 

४० वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत, ते सर्व मिळून १,२०,००० जणांचे प्राण वाचवू शकतात. म्हणजे मृत झाल्यानंतरही आपला देह इतक्या लोकांच्या उपयोगाला येतो! फक्त अपघातामुळे निधन पावलेल्या, किंवा पोस्टमॉर्टेम झालेल्या वा मृत्यूसमयी बेडसोर झालेल्या व्यक्तींचे मृतदेह आणि गँगरीन, हेपिटायटिस, एड्स, डेंगू, कोरोना इत्यादी कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह देहदानासाठी स्वीकारले जात नाहीत. 

पुराणामध्ये दधिची ऋषींनी मृत्यूनंतर आपल्या अस्थी दान केल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे प्राचीन काळीही अवयवदानाची संकल्पना होती. कविवर्य बा.भ. बोरकर ह्यांनी असे म्हटले की मी आयुष्यभर मासे खाल्ले. माझा मृत्यू झाल्यावर, माझा देह समुद्रात फेकून द्यावा. जेणेकरून मासे मला खातील. अवयवदान किंवा देहदानाचा विचार आधीही झाला होता. आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो शक्य होत आहे. ही एक मोठी चळवळ बनावी ह्यासाठी हा लेख पुढेही फॉरवर्ड करा. 

अवयवदान आणि देहदानासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही खालील क्रमांकावर फोन करू शकता, आपले नक्कीच स्वागत होईल. 

श्री आपटेकाका: + 91 9820078273 

सौ. नीला आपटे: 08291019157

लेखक : श्री निरेन आपटे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.

आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू,  लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.

मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”.  मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”

त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !

एसटी सुटायला अजून वेळ  होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.

तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.

म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य  आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?

गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं.  “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात.  त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया. 

देश पारतंत्र्यात होता.  ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे  पिचलेला होता.  समाज विस्कटलेला होता.  अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता.  ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही  होता.  मात्र सामान्य जनांना,   परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध  एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी,  स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे. 

वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते.  ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी  जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती,  उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून,  ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती.  आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.

लोकमान्य टिळकांनी १८९३साली  केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली.  समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता.  या माध्यमातून  त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली.  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले.  थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे  राष्ट्रकारण होते.  एक अत्यंत उदात्त,  प्रेरक असे कारण होते.  धर्मकार्य हा केवळ बहाणा होता.  स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते. 

या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली.  आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.

मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे  व्यक्त करावेसे वाटतात. 

माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला.  पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे.  या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले.  गणेश मूर्तीभोवती  केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले.  गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली.  कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले.  उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले.  ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते.  लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे.  त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय.  सण उत्सव हे संघटनात्मक असतात.  समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात.  अहमहमिका, चढाओढ दिसते.  राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो.  शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते.  म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही  एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली.  स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात.  ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच.  आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान  यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची,  ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.

म्हणूनच  नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको.  एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको.  नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे.  आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.

तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ तीन प्रकारचे भारतीय — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(पण काळाच्या ताकतीपुढे सर्वांना झुकावेच लागते. हळूहळू का होईना पण सर्व कालबाह्य प्रथापरंपरांचा नाश होतोच.) – इथून पुढे —-

परंपराबद्दल माझी समज मी आपल्याला सांगितली. पण खरे विचाराल तर मी विचारलेला प्रश्न सनातन परंपरांबद्दल नव्हताच मुळी!  उत्तर देणाऱ्या व्यक्तीचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे हे तपासण्यासाठीची ही परीक्षा होती. तुमच्या मनाला हा प्रश्न पडेलच की तुमची परीक्षा घेऊन मला काय मिळाले? मला तुमच्याकडून काहीच नकोय. उलट मलाच तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. मला तुम्हाला द्यायचे आहे सकारात्मक विचारांनी जगण्याचे भान! 

आमुक समाजातील सर्व परंपरावर चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत असा जनरल शिक्का मारणा-या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यातून दिसतो.  सर्व चांगल्या परंपरा असणारा आदर्श समाज कुठेही अस्तित्वात नाही. तसेच सर्वच परंपरा खराब असणारा समाजही कुठे अस्तित्वात नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या तर काही वाईट प्रथापरंपरा आहेत.  परंपराच काय तर आपल्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग वा संस्था यापैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. आपण स्वतःतरी कुठे परिपुर्ण आहोत? मग जगाकडून परिपुर्णतेची अपेक्षा ठेवायचा अधिकार आपल्याला कसा असेल? 

आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचार आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात ते पाहू. नवरा बायकोचे उदाहारण घेऊ. नवरा-बायको दोघेही परिपुर्ण नाहीत. दोघांमध्येही चांगले-वाईट गुण आहेत. बायकोने नव-यातील केवळ चांगले गुण पहायला सुरवात केली. या सकारात्मक विचारांमुळे काही वेळात ‘आपल्याला देवासारखा नवरा मिळाला आहे’ अशी भावना बायकोच्या मनात निर्माण होते. ही भावना बायकोच्या मनाला सुखावणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी समाधान निर्माण होते. आता त्याच बायकोने त्याच नव-यामधील सर्व दुर्गुण पहायला सुरूवात केली. तासाभरात तिला जाणवेल की ‘मला राक्षस नवरा मिळाला आहे’. ही भावना बायकोच्या मनात दुःख निर्माण करणारी आहे. या भावनेने तिच्या मनात वैवाहिक जिवनाविषयी असमाधान निर्माण होणार आहे. दुःख आणि असमाधानाने भरलेले मन सुख आणि समाधान शोधायला बाहेर पडते. आनंद आणि समाधान मिळवायचा एकच मार्ग आपण शिकलेलो असतो. अपेक्षा ठेवायच्या आणि त्या पुर्ण करायच्या. अपेक्षा पुर्ण झाल्या की मन, तात्पुरते का होईना पण, आनंदी आणि समाधानी होते. या अपेक्षा असतात तरी कुठल्या? कुणाला सत्ता हवी असते तर कुणाला संपत्ती मिळवून आनंद मिळतो. कुणी प्रतिष्ठेच्या मागे लागतो तर कुणी मुलांच्या यशात आनंद शोधतो. पुरेशा प्रमाणात सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि गोड नातेसंबंध मिळालेले असतील तर अशा व्यक्तीचे आयुष्य यशस्वी झाले असे आपण म्हणतो. 

अपेक्षांच्या शेवटी थोडाफार आनंद असला तरी अपेक्षापुर्तीचा मार्ग मात्र काटेरी आहे. यशाची अपेक्षा निर्माण झाली की सोबत अपयशाची भीती आपोआप निर्माण होते. भीती ही मोठी त्रासदायक भावना आहे. तिचे लवकरात लवकर निरसन करणे क्रमप्राप्त ठरते. मग भीतीचे कारण आणि उपाय शोधण्यासाठी चिंतन चालू होते. यशाच्या अपेक्षेच्या प्रमाणात अपयशाची भीती वाढते आणि भीतीच्या प्रमाणात चिंतन गहन होत जाते. चिंतन गहन झाले की त्यालाच चिंता असे म्हणतात. चिंता मनासाठी अतिशय खराब असते.

“चिता मृत शरीरको एक बार मे जला डालती है.

लेकीन चिंता जिंदा मन को हर वक्त जलाती रहती है.”

प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थांपैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. बघायचे काय याचे स्वातंत्रही प्रत्येकाला आहे. तरी केवळ वाईट गोष्टी बघून स्वतःच्या मनात दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंता अशा त्रासदायक भावनांना जन्म देणे कितपत शहाणपणाचे आहे? हा एक प्रकारे आत्मघातच आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी ८०% विचार हे आत्मघाती नकारात्मक विचार असतात. यामागे नेमके कारण काय? सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी समोर असताना लोक स्वतःलाच दुःखी करणाऱ्या नकारात्मक गोष्टीच का पाहतात?

जसे पाणी चढाकडून उताराकडे सहज वाहते तसाच मानवी मनाचा सहज प्रवाह सकारात्मकतेकडून नकारात्मतेकडे असतो. आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी या अपेक्षित असतात. अपेक्षित गोष्टी जागेवर असतील तर मेंदू त्याची नोंद सुद्धा घेत नाही. उदा. गृहणीने नेहमीप्रमाणे जेवनात अपेक्षित मीठ घातले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. याउलट सर्व नकारात्मक गोष्टी या अनपेक्षित असतात. उदा. नेहमी सुग्रण स्वयंपाक करणाऱ्या गृहणीने जेवनात जास्त किंवा कमी मीठ घातले तर सर्वजन लगेच ते बोलून दाखवतात. अनपेक्षित गोष्टी समोर आल्या तर आपल्या मेंदूला धक्का बसतो. मेंदू त्याची तात्काळ दखल घेतो. त्या धक्कादायक नकारात्मक गोष्टीची कारणमिमांसा होते. ती गोष्ट परत घडणार नाही यासाठी उपाय शोधले जातात. या चिंतनात एका नकारात्मक विचारांमधून दुसरा नकारत्मक विचार जन्माला येतो. प्रत्येक नकारात्मक विचाराचा शेवट दुःख, असमाधान, अपेक्षा, भीती आणि चिंतेत होतो.

प्रत्येकाला मनाच्या सहज प्रवाहाविरूद्ध नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रयत्नपुर्वक जायचे आहे याचे भान देण्यासाठी हा लेख लिहला आहे. मी सुद्धा हीच धडपड करतो आहे. मनाच्या प्रवाहासोबत दुःख आणि असमाधानाकडे वाहावत जायला प्रयत्न करावे लागत नाहीत. पण प्रवाहाविरूद्ध सुख आणि समाधानाकडे आयुष्याची नाव न्यायची असेल तर मात्र तिला सतत वल्हवावे लागते. हे भान सुटले आणि वल्हवणे थांबले की लगेच आपली नाव नकारात्मतेकडे वाहू लागते. एका बाजुला आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी प्रयत्नपूर्वक शोधून त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे. दुसऱ्या बाजुला धक्कादायकपणे समोर आलेल्या नकारात्मक गोष्टींना चघळत बसण्यात आत्मघात आहे याचे सदैव भान ठेवावे लागणार आहे. पण कुणी कर्तव्यास चुकले तरी पदरी दुःखच पडते. त्यामुळे नकारात्मक गोष्टी सुधारण्यासाठी आपल्या आवाक्यात असणारी आवश्यक ती कृती करून झाली की नकारात्मक गोष्टींशी गांधींजींच्या तीन माकडांप्रमाणे वागायचे. 

बुरा मत देखो

बुरा मत बोलो

बुरा मत सुनो

नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जाण्याचे भान प्रत्येकामध्ये सदैव जागृत व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! 

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा गणेशा !… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ बा गणेशा !… ☆ श्री सतीश मोघे

बा गणेशा ! येण्याचे आवाहन करत असतांनाच तुझ्या विसर्जनाची तारीख आम्ही निश्चित करत असतो. मुर्तीच्या ठायी देवत्व पाहिल्यावर तिचे विसर्जन करणे योग्य नाही, या समर्थांनी सांगितलेल्या सीमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन आम्ही करत असतो. पण हा आमचा अपराध तू पोटी घालतोस. या उल्लंघनासाठी खरे तर आम्हाला तू दंड करायला हवा. पण तसे न करता उदंड उत्साह, आनंदाचे दान तू पदरात टाकून जातोस. ज्या प्रसन्न मुद्रेने येतोस, त्याच प्रसन्न मुद्रेने निरोप घेता होतोस.

‘तू अनादि, तू अनंत’ हे आम्ही जाणत का नाही ! तुझ्या व्यापक ब्रम्हस्वरूपाचा अनुभव घेऊन क्षणोक्षणी ब्रम्हचैतन्याची सळसळ आणि त्याच्या भेटीचा आनंद अनुभवणे, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, हे तूच दिलेल्या बुद्धीने आम्ही जाणून असतो. पण गरजा पूर्ण होऊनही इच्छा निर्माण होत राहतात. त्या अनंत इच्छांच्या मागे धावण्यात काळ लोटत असतो. तुला जाणण्यासाठी वेळच शिल्लक रहात नाही. पण तुला जाणणे, तुझे ध्यान करणे, किमान तुझ्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे, याची जाणीव मात्र आत खोलवर असते. ही जाणीवच वर्षातून दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, दहा दिवस का होईना, तुझ्यासाठी वेळ काढायला भाग पाडते. या दहा दिवसात तुझे व्यापक स्वरूप जाणणे शक्य नाही, हे आम्हाला ठाऊक असते. मग या व्यापक रूपाला आम्ही मुर्तीत पाहतो. छोट्याश्या मुर्तीच्या ठायी व्यापक ब्रम्हचैतन्याचा अनुभव घेऊ पाहतो. आभासी विश्वातले भास खरे मानून तुझ्या भेटीचा आनंद आम्ही घेऊ पाहतो. तू हा आनंद आम्हाला घेऊ देतोस. ‘तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुन खऱ्या देवा’,हे तुकारामानी म्हटलेले चालतं. विठ्ठलाने असं म्हणायचं नसतं, हे तू जाणतोस.काही दिवस का होईना, तहान भूक विसरून केवळ आपल्या भेटीच्या ओढीने येणाऱ्या भक्तांना दर्शनाचे, भेटीचे सुख घेऊ दयायचे असते, खरा भक्तीमार्ग सांगण्याची, दाखविण्याची ती वेळ नसते, हे भगवान पांडुरंग जाणतो, तसेच तुही जाणतोस. व्यग्र जीवनात वेळ काढून तुझ्या आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या, तुला स्थापन करणाऱ्या, तेवढे दिवस का होईना तुझी मनोभावे पूजा करणाऱ्या आम्हा भाविकजनांना मुर्तीच्याच ठायी भेटीचा, चैतन्याचा अनुभव तु सुखेनैव घेऊ देतोस. 

मुर्तीच्या रुपाच्या बाबतीत तर पांडुरंगाच्याही एक पाऊल तू पुढे. पांडुरंगाची मुर्ती ठरलेली. काळ्या पाषाणाची, कटेवरी कर, कानी कुंडले. तुझे मात्र तसे नाही. तुला घडविण्याची सृजनशीलता आणि कल्पकता यांना तू पूर्ण वाव देतोस. तू म्हणजे एखाद्या चित्रकाराचे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. त्यात तुला कोणीही, त्याला हवे तसे पाहू शकतो, हवे तसे घेऊ शकतो. कुणी तुला मूषकावर बसवतो, कुणी नंदीवर, कुणी कैलासावर तर कुणी चांद्रयानावर. विशिष्ट वाहनाचाही तुझा आग्रह नाही. कुणी तुला उभे ठेवतो, कुणी बसवितो यावरही तुझा आक्षेप नाही. केवळ गजानन आणि लंबोदर या दोन गोष्टी अंतर्भूत करून हवे तसे घडवून घ्यायला तू तयार असतोस.मुर्ती, बनविण्यापासून ते विसर्जनापर्यंत तुझ्या कोणत्याही अटी, शर्ती नाहीत. आम्हाला हवे तसे तू करू देतोस. आम्ही म्हणू तेव्हा निरोप घेतोस. बरे, निरोप घेतांना पुन्हा दूषणे लावत नाहीस वा खडे बोलही ऐकवत नाहीस. खरे सांगू… तू जेवढे आम्हाला मनाप्रमाणे करू देतोस, वागू देतोस ना, तेवढे दुसरे कुणीच करू देत नाहीत, वागू देत नाहीत. म्हणुनही असेल कदाचित….. तू आम्हाला सर्वांहून अधिक प्रिय आहेस.

तुझी मूर्ती साकारण्याचे कौशल्य तरी आमच्याकडे कुठे आहे ? आमच्यापैकी बोटावर मोजता येतील एवढयाच भाविकांना हे जमते. बाकी आम्ही सारे मुर्तीकाराने त्यांच्या कल्पकतेतून घडविलेल्या मूर्तींमधून तुझी मूर्ती निवडतो. ती निवडतांनाही मोजमाप घेऊन. घरात तुझ्यासाठी जागा किती, हे मोजतो. त्यानुसार तुझी उंची ठरवतो.  मुर्तीकाराने तुझी स्थापना केली असते, प्रदर्शन सजवले असते.त्यातून आमच्या मोजमापात बसणाऱ्या मुर्तीची आम्ही निवड करतो. तुला आणायचे मोजूनमापून. तुला ठेवायचे तेही काही दिवस मोजून. आमचे सर्वच मोजून मापून. पण तू मात्र या मोबदल्यात अमाप उत्साह आणि चैतन्याचे माप पदरात टाकून जातोस. समोरचा  कितीही मोजून मापून करत असो, आपण मात्र स्वतःला उधळतांना हिशेबी राहू नये, अशी छान शिकवण कृतीतून देऊन जातोस.

काही तुला विसर्जीत करतात, काही करत नाहीत..कायमचे घरात ठेवतात.तर काही ‘मुर्तीत देवच नसतो’, अशी वैचारिक बैठक असल्याने तुला स्थापितही करत नाहीत. महर्षि व्यासांचे महाभारत तुझ्या लेखणीतून उतरलेले. त्यातले अनेक दाखले देऊन, तुला विरोध करणाऱ्यांना खरे तर तू निरुत्तर करु शकतोस. पण तसे तू करत नाहीस. भूतलावावर आल्यावर समाजात वावरतांना सर्वांनीच तुला मोठे मानले पाहिजे, असा तूझा आग्रह नाही. विरोधी विचारधारेचाही तू आदर करतोस. तात्विक वाद घालून तिचे खंडन करुन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचाही तुझा स्वभाव नाही.  समाजभान राखण्यासाठी अंगी सहनशीलता, सहिष्णूता असणे आवश्यक असते, याचा परिपाठ तू घालून देतोस. प्रत्येक वेळी आपल्याविरुद्ध कुणी काही बोलले तर लगेच त्याच्या अंगावर धावून जाऊन, तात्विक वाद घालून, त्याच्या बोलण्याचे खंडन करुन, आपला तात्विक विजय उन्मादाने साजरा करायचा नसतो. समोरच्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार मान्य करायचा असतो, याची शिकवणच तू देत असतोस. म्हणूनच असेल कदाचित…. तुझे आगमन, वास्तव्य आणि विसर्जन यात आम्ही प्रत्येकजणच दुसऱ्याला स्वातंत्र्य देत असतो. तेवढे दिवस तरी दुसऱ्याच्या घरात डोकावून न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणे, वाद घालणे आम्ही टाळत असतो.

बा गणेशा ! तुझ्या आणखी एका गुणाचे आम्हाला खूप अप्रूप वाटते. सुखाने जगण्यासाठी तूझा हा गुण आत्मसात करायलाच हवा. हा गुण म्हणजे जीवन ‘तटस्थ साक्षीभावाने’ जगणं. खरं तर आम्हीच तुला बोलावतो. स्थापित करतो. पण तीन वेळच्या आरत्या सोडल्या तर तुझ्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळही नसतो. यावरही तुझा आक्षेप नाही. सकाळची फुलं तुला संध्याकाळी… बऱ्याचदा तर दुसऱ्या दिवशीही अर्पण करतो.. यावर तुझा आक्षेप नाही. नैवेद्य, आरती कधी वेळेत तर कधी उशीरा, तरीही तूझा आक्षेप नाही. हळदी, कुंकू थोडेसे जास्त लागले तरी लागलीच रुमालाने ते पुसणाऱ्या स्त्रिया आम्ही पाहतो. पण  येणारा प्रत्येकजण तुला हळदी-कुंकू लावत असतो. बऱ्याचदा ते तुझ्या डोळयातही जाते. तिकडेही आमचे लक्ष जात नाही, गेले तर बऱ्याच उशिरा जाते. त्याविषयी तुझी तक्रार नाही. स्थापना करतांना वर्षानुवर्षे तेच दागिने घातले तरी तुझी तक्रार नाही, विसर्जन करतांना दागिने काढले तरी तुझी तक्रार नाही. भक्तीगीतं लावली म्हणून तू अधिक प्रसन्न नाहीस वा नको ती गाणी लावली म्हणून तू नाराज नाहीस. ही तुझी तटस्थ साक्षीभावाने राहण्याची वृत्ती, हे आमचे खरे आकर्षण आहे. मधूनच वाटते, तू प्रकट व्हावेस, खडे बोल ऐकवावेस, खरे काय हे सांगावे. पण तू असे करत नाहीस. 

तटस्थता कधी अज्ञानातून येते,तर कधी ज्ञानातून. तुझी तटस्थता ज्ञानातून आलेली. तू जाणून असतोस.. तूझ्या खऱ्या, व्यापक, अनंत रूपाला. कोणी मोठी मुर्ती केली म्हणून तू मोठा होत नाहीस, लहान मूर्ती केली म्हणून लहान होत नाहीस, हे तू जाणून असतोस. आपल्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान असले आणि या जगात आपण काही दिवसाचे पाहुणे आहोत याचे भान असले की घडणाऱ्या गोष्टींकडे तटस्थपणे साक्षीदार म्हणून पाहता येते. त्यातल्या काही मनासारख्या आहेत म्हणून उन्माद नाही आणि काही मनाविरुद्ध आहेत म्हणून दु:ख, तक्रार नाही, असे होऊन जाते. आमच्यासाठी तू जडमुर्तीत येतोस. आमच्या आनंदाचे निमित्त होतोस. तुला निमित्त करून, आनंद भोगुन आम्ही तुझे विसर्जन केले तरी पुन्हा मूळ व्यापक रुपात विलीन होण्याच्या आनंदात ‘तुझा केवळ वापर आम्ही केला’, अशी नैराश्याची भावना नाही. बा गणेशा ! द्यायचाच झाला तर  होणाऱ्या गोष्टींकडे तटस्थ साक्षीभावाने बघण्याचा हा तुझा दृष्टीकोन आम्हाला कायमचा देऊन जा. म्हणजे दीड दिवसाचा आमच्या आयुष्यातला हा आनंदसोहळा वर्षभर सुरु राहील.  

बा गणेशा ! या आपल्या संवादातही आता निरोपाची वेळ झाली आहे. खरे तर तू आमचा, सृष्टीचा निर्माता. पण आमच्या हातून निर्माण होतोस, आमच्या हातून विसर्जित होतोस. कधी विसर्जित करायचे, हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला देतोस. जन्माला आला त्याला विसर्जित व्हायचे आहे आणि जो जन्माला घालतो त्यालाच,  विसर्जित कधी करायचे याचा अधिकार असतो, या दोन गोष्टी तू ठसवतोस. या गोष्टी आम्ही नक्कीच ठसवून घेऊ.तू ठरवशील त्याप्रमाणे विसर्जन स्वीकारू. तोपर्यंत आम्हाला सांभाळून घे.

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी

चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी… 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आभाळाचा भार ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

आभाळाचा भार ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

फुलांनी शाकारलेली शवपेटी….शवपेटीवरील त्या कोवळया फुलांचेही चेहरे मलूल झालेले !

शवपेटीवर आपल्या भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज पांघरलेला. सभोवताली भरून राहिलेल्या नीरवतेला खूप काही बोलायचे आहे…पण शब्द सुचत नाहीयेत..सुचलेले ओठांपर्यंत येत नाहीयेत. आजवर कधीही न डगमगलेली पावलं आता ते आठ-दहा पावलांचं अंतर चालायला नकार देताहेत….खूप मोठं अंतर आहे हे..खूप मोठं ! पोटचा एकुलता एक लेक शवपेटीत विसावलाय….त्याने आपल्या शवपेटीवर फुलं वहावीत असं स्वप्न पाहिलं होतं मी कधी काळी…आणि आज मी त्याच्या आणि तो माझ्या भूमिकेत आहे…मी उभा आणि तो आडवा आहे जमिनीला समांतर….काही वेळानं तो जमिनीच्या आणखी जवळ जाईल…तिच्या कुशीत चिरनिद्रा घ्यायला ! कुणी तरी पाठीमागे उभे राहिलं आहे…मागून माझे दोन्ही दंड धरले आहेत मला आधार देण्यासाठी. आता यापुढे दुसरा कुठलाही आधार पुरेसा ठरणार नाही आयुष्यात…..आधारवड उन्मळून पडलाय माझ्या हृदयातील अंगणातला.

मी शवपेटीजवळ पोहोचलो…त्याच्या डोक्याच्या बाजूला. लहानपणी कितीतरी वेळा तो मांडीवर येऊन निजायचा आणि मी त्याचं मस्तक कुरवाळू लागायचो…आताही हात पुढे झाले सवयीने. पण त्याचं मस्तक थंड….डोळे अलगद मिटलेले ! मी मला आधार देणा-याला स्पर्शातून सांगितले…आता मला एकट्याने उभं राहू द्यात माझ्या मुलाच्या सन्निध !

देशाच्या सेवेत दाखल झालो तेव्हा हुतात्म्यांच्या पार्थिवांवर पुष्पचक्रं वाहण्याचे प्रसंग येतीलच हे ठाऊक होतंच. तसं अनेक वेळा घडलंही. किंबहुना एखादे दिवशी आपणही अशाच एखाद्या शवपेटीत पहुडलेलं असू असंही वाटून जायचं….युद्धात मरणाची सवय करून घ्यावी लागते सैनिकांना…आपल्या माणसांचे क्षतविक्षत झालेले सुकुमार देह बघायचा सराव होऊन जातो डोळ्यांना…नजर मरून जाते ! पण मनालाही डोळे असतात…त्यांना असं काहीही पाहणं नामंजूर असतं. पण काय पहावं हे या डोळ्यांच्या हाती नसतं.

थरथरत्या हातांनी मी पुष्पचक्र हाती घेतलं. असं कितीसं वजन असेल त्या फुलांचं? खूप जड वाटली फुलं. आपण स्वप्नात नसू खासच. कारण दुःख स्वप्नात असं थेट मिठी मारत नाही….पण इथं तर प्रत्यक्ष स्वप्नानेच मिठी मारली आहे….मृत्यूला ! दोन पावलं मागं सरलो. दोन्ही पाय जुळवून उभे राहिलो…उजवा हात कोपरात वाकवून अगदी त्वरेने कपाळापर्यंत जायला हवा होता…पण या हातावर जन्माचं ओझं टाकलं होतं कुणीतरी. सावकाश हात कपाळापर्यंत नेला…सल्यूट ! जय हिंद साहेब !

हो…साहेब होतं पोरगं माझं. बापासारखंच त्यालाही पोलिस अधिकारी व्हायचं होतं….आणि बापाला सल्यूट ठोकायचा होता…पूर्ण गणवेशात. त्यानं खूप मेहनत घेतली आणि माझ्याच खात्यात अधिकारी पदावर विराजमान झाला. कामानं माझ्याही पुढं गेला. देशाचे,शांततेचे,माणुसकीचे,मानवतेचे शत्रू आसपास लपून छपून वावरत असताना…मृत्यूची छाया पावलांखालून निघून कधी डोईवर पडेल याचा नेम नसताना तो वर्दी आणि ईमान यांसाठी ठाम उभा राहिला. आमच्या गावांमध्ये मरण काही नवलाईचं नाही राहिलेलं…पण कुणाला स्वत:ला ते अजिबात नको आहे. पण त्याला सामोरं जाण्याशिवाय गती नाही जन्माला. मातीसाठी लढताना मातीत मिसळून जाण्याची तयारी ठेवावीच लागते.

जनाजा तयार आहे ! त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी विशाल जनसमुदाय जमला आहे. मरणाच्या वाटेवर निघून जाणा-यासाठी लोक अमरत्वाच्या घोषणा देताहेत. रक्ताची नाती अश्रूंनी भिजलेली आहेत. मैत्रीच्या नात्यांना आपण बरेच काही गमावल्याची खंत आहे. आता चार पावलं त्याच्यासवे चालावे लागणार…पुढे कबरीनंतर तो आपल्या सोबत नाही चालणार. तो विसावणार आणि मी उसवणार…अंतर्बाह्य !

जनाजा उचलला गेला….खांद्यांवर विसावला ! मला त्याला शेवटचं खांद्यांवर खेळवायचं होतं….लहानपणी अनेकदा खांद्यांवर उचलून डोंगर,द-या,झाडं दाखवली होती, बाजारातून हिंडवून आणलं होतं. मी डाव्या खांद्यावर जनाज्याच्या उजव्या, जमिनीला समांतर असलेल्या आधारकाठीचा भार घेतला ! पृथ्वी इतकी जड असते? या विश्वाचं ओझं एवढं महाप्रचंड आहे? विश्वास नाही बसला !

अंत्ययात्रा मुक्कामी पोहोचली…म्हातारपणीसाठी लेकाच्या भरवशावर पाहिलेल्या सुखाच्या स्वप्नांच्या मातीची ओंजळ भरून घेतली आणि ती ओंजळ त्याच्या निर्जीव देहावर अलगद रिकामी केली आणि जन्मभरीचं ओझं आणि त्याच्या पराक्रमाची कथा सांगणारा राष्ट्रध्वज घेऊन घराकडे निघालो….आता एकांत हवा…रडण्यासाठी !

त्याची मोठी तसबीर. तो रूबाबदार गणवेशात. आता मात्र अगदी सरळ, ताठ उभा राहिलो..त्याच्या डोळ्यांत पाहिले…आणि अगदी कडक सल्यूट  बजावला…जय हिंद साहेब ! तो त्याच्या डोळ्यांतून म्हणत होता…कर्तव्यपूर्तीसाठी कामी आलो…..फक्र है !

आणि काळजावरचा भार उतरल्यासारखा भासला….शांतपणे आतल्या त्याच्या लेकाच्या पाळण्याकडे गेलो….त्याचं जणू प्रतिरूपच ते बाळ….दोन महिन्यांचं ! डोळे अलगद उघडझाप करीत टुकूटूकू पाहू लागलं माझ्याकडे….मी बाळाला उचलून छातीशी कवटाळलं….त्याचा भार नाही जाणवला मला ! तो निघून गेला….मला जगण्याचं कारण मागे ठेवून !

(जम्मू-कश्मिर पोलिस विभागाचे माजी डेप्यूटी इन्सपेक्टर जनरल गुलाम हसन भट यांचे चिरंजीव डेप्यूटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस हमायूं भट साहेब अतिरेक्यांशी लढताना कामी आले. गुलाम भट साहेबांनी मोठ्या धैर्याने आपल्या मुलाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या भूमिकेतून लिहिलेले हे काल्पनिक मनोगत. याच अतिरेकीविरोधी कारवाईमध्ये हुतात्मा झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग साहेब, मेजर आशिष धनौक साहेब, रायफलमॅन रविकुमार साहेब यांनाही तितकीच भावपूर्ण श्रद्धांजली.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जपानमधला टीचर्स डे… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

जपानमधला टीचर्स डे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

जपानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले.

तो म्हणाला: “आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्वात नाही.”

माझ्या मनात एक विचार आला. ‘एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक दिन’ का साजरा करत नाही?’

एकदा, कार्यालयातील कामानंतर, यमामोटा नावाच्या त्या मित्राने मला आपल्या घरी आमंत्रित केले. त्यासाठी आम्हाला मेट्रोने जावं लागलं. तिथं  लोकांची गर्दी होती. माझ्याकडे एक बॅग सुद्धा होती. अचानक, माझ्या बाजूला बसलेल्या वयस्क व्यक्तीने स्वतः उठून मला त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली. वृद्ध व्यक्तीच्या अशा सत्कारपूर्ण व्यवहाराने मी ओशाळून गेलो.

हा वृद्ध माणूस मला त्यांची जागा बसायला का देत असेल, हा प्रश्न मी यमामोटा यांना विचारला. माझ्याकडे असलेल्या ‘शिक्षक’ या टॅग कडे पाहून त्यांनी बसायला आसन दिले आहे, असं तो म्हणाला. मला अभिमान वाटला.

ही यमामोटांना भेटण्याची माझी पहिली वेळ होती, त्यामुळे एखादी भेटवस्तू त्यांच्यासाठी घ्यावी, असं मला वाटलं. मी दुकानाबद्दल विचारलं. ते म्हणाले की थोडं अंतरावर खास शिक्षकांसाठीचं एक दुकान आहे, ज्यात विविध वस्तू कमी किंमतीने विकत घेण्याची सुविधा दिली जाते. हा मला दुसरा सुखद धक्का होता.

या सोयीसुविधा फक्त शिक्षकांसाठीच आहेत का? मी प्रश्न केला.

यमामोटा म्हणाले:

जपानमध्ये, शिक्षकी पेशा हा सर्वात प्रतिष्ठित पेशा आहे आणि शिक्षक ही सर्वात आदरणीय व्यक्ती आहे. जपानी उद्योजकांना शिक्षक त्यांच्या दुकानांमध्ये येताच अत्यंत आनंद होतो.त्यांना तो त्यांचा सन्मान वाटतो.

जपानमध्ये माझ्या प्रवासाच्या काळात, मला शिक्षकांच्या प्रती जपानी लोकांकडून अत्यंत सम्मान मिळतो, याची अनेकदा प्रचिती आली.  त्यांना मेट्रोमध्ये विशेष आसने आरक्षित असतात, त्यांच्यासाठी विशेष दुकाने आहेत, जपानमध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या प्रवासाच्या तिकीटांसाठी रांगेत उभं राहावं लागत नाही.

म्हणूनच की काय ! जपानमध्ये शिक्षकांसाठी ‘शिक्षकदिन‘ या  दिवसाची गरज नाही, कारण तिथे शिक्षकांच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा सणच असतो.

 मी आपणां सर्वांकडून अनेक चांगल्या ज्ञानांचे धडे शिकलो…त्या माझ्या शिक्षकांनो, माझा तुमच्या चरणी प्रणाम!

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

शिवाजी सावंत

24 सप्टेंबर.!

1995 साली आजच्या तारखेला मृत्यंजय ह्या जगप्रसिद्ध लोकप्रीय पुस्तकाला,” भारतीय ज्ञानपीठ”ह्या संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक होते.

माझ्या स्वतः च्या अत्यंत आवडत्या पुस्तकांच्या यादीत  “मृत्युंजय” हे अगदीं वरच्या लेव्हल वर विराजमान झालंय.ह्या पुस्तकाने मला एक नवी दृष्टी दिली. ह्या पुस्तकाने नव्या भूमिकेत शिरून अंतरंग कसे जाणून घ्यायचे हे खूप छान शिकविले. बरेचदा आपण ज्यांना खलनायक समजतो ते कधी कधी परिस्थिती मुळे खलनायक बनतात हे समजावून सांगितले. प्रत्येकाचे वागणे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच असतं हे मृत्युंजयमधून शिकायला मिळाले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अभ्यासता आल्या.कुठलीही अजरामर, असामान्य कलाकृती निर्माण करतांना त्यात स्वतःला झोकून द्याव लागतं हे सावंत ह्यांनी मृत्यूंजय लिहीतांना दाखवून दिलं. मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत ह्यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.  

महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधी झाला नाही हे माहीत होते . ही  कादंबरी अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते . वाचकांना,मराठी साहित्याला ,शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली ही एक अद्भूत देणगीच म्हणावी लागेल.कादंबरीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकसुरी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा सगळया भूमिकांचा परिपाक आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातून झालेला  कर्णाचा असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंबहुना आपण कधी ह्या अँगल ने विचारच केला नसतो.  हे पुस्तक आपल्या कित्येक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं नीट खुलासेवार, पटण्याजोगे समजावून सांगत.

हे पुस्तक वाचण्या आधी मला असलेल्या जुजबी माहितीमुळे महाभारतातील खूप प्रश्न मला भेडसवायचे त्यांची उत्तरे मला ह्या पुस्तकानेच मिळवून दिलीत.

ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी आवर्जून वाचावे , एकदा हातात हे पुस्तक घेतले की वाचून पूर्ण केल्याखेरीज तुमच्याच हातून हे पुस्तक खाली ठेववणार हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print